प्रोपगंडा (Proaganda)



पुस्तक - प्रोपगंडा (Proaganda)
लेखक - रवि आमले (Ravi Amale)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - ३७६
प्रकाशन - मनोविकास प्रकाशन. प्रथमावृत्ती जाने २०२०
ISBN -978-81-943491-7-4


तुम्ही-आम्ही सगळे टीव्हीवरच्या वृत्तवाहिन्या, रोजची वर्तमानपत्रे, मासिके, रेडियो, फेसबुक-ट्विटर-व्हॉट्सअप सारखी समाजमाध्यमे अश्या वेगवेगळ्या रीतीने बातम्या आणि नवनवीन माहिती मिळवत असतो. आपल्या रोजच्या जगण्यात कसं वागावं, काय खावं, काय वाचावं इथपासून कोणाला मतदान करावं, जगात चाललेलं युद्ध चांगलं का वाईट इथपर्यंत - सगळ्याबद्दल आपल्या भूमिका ठरवत असतो. मुद्दामून चुकीच्या बातम्या आपण वाचायला जात नाही. सतत होणाऱ्या माहितीच्या भडिमारात बनावट बातम्या - फेक न्यूज - असतात हे सुद्धा आपल्याला माहिती असतं. पण त्याही पुढे जाऊन; अगदी खऱ्या बातम्यांतून; खऱ्या मजकुरातून(कंटेन्टमधून)सुद्धा आपल्याला फसवलं जातं. घडलेल्या घटनेचा थोडाच भाग दाखवायचा, एखादा भाग प्रमाणापेक्षा जास्त मोठा करून दाखवायचा, चुकीच्या पद्धतीने किंवा मीठ-मसाला लावून दाखवायचा जेणेकरून आपलं लक्ष त्यांना हवं त्या बाबीवरच केंद्रित होईल; त्यांना हव्या त्याच पद्धतीने आपण विचार करायला लागून असं सादरीकरण केलं जातं. एखादी व्यक्ती, कंपनी, राजकीय पक्ष, देश, विचारपद्धती आणि धर्म ह्यांच्याकडे लोकांना असं खेचणं आणि विरुद्ध बाजूपासून दूर लोटणं म्हणजेच इंग्रजीत "प्रोपगंडा". यशस्वी "प्रोपगंडा"चं वैशिष्टय हे आहे की तो "प्रोपगंडा" वाटत नाही; म्हणूनच आपण त्याच्या आहारी जातो - आपल्या नकळत. आपल्या मर्जीने निर्णय घेतोय असं वाटलं तरी "प्रोपगंडा"ने आपलं काम केलेलं असतं. कळसूत्री बाहुल्यांप्रमाणे तो आपल्याला नाचवत असतो.

अश्या "प्रोपगंडा"ची विविध रूपे आपल्यासमोर उलगडून दाखवणारं हे पुस्तक आहे. प्रोपगंडा काही आजचा विषय नाही. इतिहासापासून हे चालू आहे. ख्रिश्चन धर्माच्या प्रचारासाठी केलेल्या योजनेला प्रोपगंडा म्हटलं गेलं. पण आता फक्त धर्मप्रचार नाही तर कुठल्याही गोष्टीच्या प्रचारासाठी हे तंत्र वापरलं जातं. प्रोपगंडा शब्दाचा अर्थ आता नकारात्मक झाला आहे. वाढत्या तंत्रज्ञानातून त्याचा छुपेपणा अनेकपटीने वाढलाय आणि परिणामकारकतासुद्धा ! म्हणूनच "प्रोपगंडा" कडे डोळे उघडे ठेवून बघणं आवश्यक आहे. ते समजून घेणं आवश्यक आहे. म्हणूनच हे पुस्तक प्रत्येकाने वाचणं आवश्यक आहे.

प्रोपगंडाचा इतिहास, पहिल्या-दुसऱ्या महायुद्धात त्याच्या पैलूंचा विकास, त्यात योगदान देणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्ती, भयानक परिणाम हे पुस्तकाच्या पहिल्या ८०% भागात आहे. ह्यात बहुतेककरून युरोप आणि अमेरिकेचे संदर्भ आहेत. पण पुरेश्या माहितीसह ते सादर केले असल्यामुळे घटना अपरिचित राहत नाहीत. शेवटच्या २०% भागात भारतातील उदाहरणे आहेत. विशेषतः मोदी लाटेच्या निर्मितीपासून घटना त्यात आहेत.

पुस्तकात दिलेली लेखकाची माहिती 

अनुक्रमणिकेवर एक नजर टाकूया


महायुद्धात युरोपियन देशांना भाग घ्यायचा होता. त्यासाठी जनतेचा पाठिंबा आवश्यक होता. लोकांनी स्वतःहून सैन्य भरतीत भाग घ्यावा, युद्धात होणारा त्रास सहन करायची तयारी ठेवावी ह्यासाठी समाजमन तयार करण्यासाठी वापरला गेलेला प्रोपगंडा. त्याबद्दल पुस्तकात बरंच सविस्तर लिहिलं आहे. त्यातली काही पाने.



एखादे वृत्तपत्र स्वतःचा खप वाढवण्यासाठी सनसनाटी बातम्या देते. त्याला उत्तर म्हणून दुसरे वृत्तपत्र त्याहून भडक, सवंग बातम्या देते. त्यातून लोकभावना चेतून एखादं युद्ध सुद्धा घडवलं जाऊ शकत. माध्यमांच्या ह्या स्वार्थी प्रोपगंडाचे, "पीत पत्रकारितेचं" हे एक उदाहरण.


चित्रपटाकडे प्रामुख्याने मनोरंजनाचे साधन म्हणून बघितले जाते. मनोरंजन साधता साधता प्रबोधन करण्याची विलक्षण क्षमता चित्रपटांत आहे. थेट प्रचारकी चित्रपट त्यामुळे काढले जातातच. पण वरवर पूर्णपणे काल्पनिक, मनोरंजात्मक चित्रपटांतूनही छुपा संदेश दिला जातो. अचानक एकाच प्रकारचा छुपा संदेश देणारे चित्रपट बाहेर पडू लागतात. हा खरा "प्रोपगंडा". समोरच्याला नकळत आपल्या जाळ्यात ओढणारा. ह्या पैलूबद्दल पुस्तकात एक प्रकरण आहे. त्यातली ही उदाहरणे.


प्रोपगंडाचा वापर फक्त धर्मप्रसार, समाजकारण किंवा राजकारणासाठीच होतो असं नाही. प्रोपगंडा वापरून एखाद्या कंपनीचं नवीन उत्पादन खपवण्यासाठी त्याची "खोटी गरज" निर्माण केली जाते. एखादा आजार किती भयानक आहे ह्याबद्दल लोकांच्या मनात भीती तयार केली जाते. लोक आपसूक उपायाकडे वळतात. नवं उत्पादन विकत घ्यायला लागतात. त्याची ही काही उदाहरणे.


लोकशाहीत लोक आपले प्रतिनिधी आणि सरकार निवडत असले तरी. त्यांनी कोणाची निवड करावी ह्यावर प्रोपागंडाचा मोठा प्रभाव असतो. म्हणून जनमत बदलणारे लोक हे खरं "अदृश्य सरकार" असतं. हे पुस्तकात अनेक ठिकाणी अधोरेखित केलं आहे.

विरोधकांचे बद-नामकरण (नेम कॉलिंग), राक्षसीकरण (डेमनायझेशन) ही प्रोपगंडाचीच तंत्रे. प्रत्येक माणसात काही तरी चांगुलपणा असतोच. विरोधकांनीही काही तरी चांगले काम केलेले असतेच. पण त्याचा साधा उल्लेखही येथे करायचा नसतो. त्यांचे सतत राक्षसीकरण करायचे असते. त्यांची खिल्ली उडवायची असते. बदनाम करायचे असते. त्यांच्याबाबत विशिष्ट पर्सेप्शन - मानसचित्र - तयार करायचे असते. विरोधकांना नेस्तनाबूत करणे, हतवीर्य करणे हाच यामागील हेतू असतो. ही तंत्रे पुस्तकात उलगडून दाखवली आहेत.

असं माहितीने आणि उदाहरणांनी भरलेलं हे पुस्तक आहे. रवि आमले ह्यांनी हा महत्त्वाचा, थोडा किचकट विषय अतिशय रंजक पद्धतीने हाताळला आहे. पूर्वी लोकांना ह्या "प्रोपगंडा"ने कसं गंडवलं ह्याच्या गमती जमती वाचता वाचता मनातल्या मनात आजच्या परिस्थितीशी तुलना करतो. आपल्याला सुद्धा कसं गंडवलं गेलं होतं/असतं हे पण आपल्याला जाणवतं.

काही पुस्तकं अशी असतात की ती आपल्याला नवी दृष्टी देतात, आपल्यात कायमस्वरूपी बदल घडवतात. हे पुस्तक मला तसंच वाटलं. हे पुस्तक वाचून झाल्यावर तुमच्यासमोर येणारी बातमी, माहिती, चित्रपट, जाहिरात ह्याकडे तुम्ही वेगळ्या दृष्टीने नक्की बघाल. त्यात वृत्तपत्राचा, बातमीदाराचा, कंपनीचा, चित्रपट दिग्दर्शकाचा, लेखकाचा, प्रकाशकाचा छुपा हेतू काय असेल; कुठल्या "मोठ्या योजनेतलं" हे एक "छोटं अदृश्य पाऊल" असेल हा विचार तुम्ही नक्की कराल.
गंमत म्हणजे - पुस्तकात युद्धखोर सरकारे व हिटलर ह्यांच्या प्रचारतंत्राची माहिती व उदाहरणाने देताना त्यांचं आणि नरेंद्र मोदींच्या प्रचारशैलीचं साधर्म्य नकळत अधोरेखित केलं गेलं आहे असं वाटतं. म्हणजे हे पुस्तक वरवर बघता जनरल प्रोपगंडावरचं असलं तरी ह्यातून "मोदी कसं लोकांना प्रचाराच्या जाळ्यात ओढतायत बघा, पूर्वी पण लोकांना असंच मूर्ख बनवलं गेलं होतं हे लक्षात घ्या" हा छुपा संदेश तर नाही ना. नेमकं आत्ताच बरं प्रोपगंडाबद्दल लिहावंसं वाटलं! मोदीविरोधी बुद्धिवंतांच्या व्यापक योजनेचा भाग तर नाही ना असा संशय येतो. 😆😆😆
पण असा संशय आला तरी लेखकाचा "उघडा डोळे, बघा नीट" हा संदेश सफल झाला हे म्हणायला हरकत नाही. लेखकाला त्यात आनंदच वाटेल; अशी माझी भावना आहे.

पुस्तकात इंग्रजी शब्द आणि त्यांचे मराठी प्रतिशब्द सुद्धा वापरले आहेत. पण "प्रोपगंडा"ला पर्यायी शब्द वापरला नाहीये. मला "प्रचारजाल" (लोकांना जाळ्यात अडकवणे), "प्रचारयुद्ध"(प्रतिस्पर्ध्याशी सामना), "प्रचारगंडा"(गंडा घालून फसवणूक), "प्रचारव्यूह' असे शब्द सुचले. पण असा "प्रचारव्यूह" जास्त आवडला. ज्यात प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करता करणे; लोकांना जाळ्यात ओढणे, फसवणे असे सगळे अर्थ त्यातून प्रतीत होतात.

ह्या पुस्तकातला बराचसा भाग हा युरोप-अमेरिकेतल्या उदाहरणांनी भरलेला आहे. म्हणून लेखकाने ह्या पुस्तकाचा पुढचा भाग लेखकाने लिहावा जो पूर्णपणे भारतावर आधारित असेल. भारताच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींचं ह्या चष्म्यातून विश्लेषण उद्बोधक ठरेल.

म्हणून हे पुस्तक आवर्जून वाचा, त्यावर विचार करा आणि इतरांना वाचायला सांगा.

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

शिवनेत्र बहिर्जी (Shivanetra Bahirji)




पुस्तक - शिवनेत्र बहिर्जी (Shivanetra Bahirji)
लेखक - प्रेम धांडे (Prem Dhande)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - २९८
प्रकाशन - रुद्र एंटरप्राईज (Rudra Enterprise)
ISBN - 978-93-92121-01-2
छापील किंमत - ३९९ /-

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचताना, त्यावरचे चित्रपट बघताना "बहिर्जी नाईक" हे नाव आपण नेहमी ऐकतो. महाराजांचे गुप्तहेर, हेर खात्याचे प्रमुख - बहिर्जी नाईक. वेष पालटून शुत्रूच्या गोटात शिरून खबरी काढणे; शत्रू काय योजना आखतोय ते शोधणे किंवा आपला व्यूह योग्य ठरण्यासाठी आजूबाजूच्या परिसराची खडानखडा माहिती काढणे अशी जोखमीची कामं करताना आपण त्यांना पाहिलं आहे. बहिर्जी नाईक काम करणार गुप्तपणे, निरोप कळवणार गुपतपणे; त्यामुळे त्यांच्या कामाबद्दलचे तपशील लिखित असण्याची शक्यता कमीच. ते ह्या मोहिमा कशा आखात असतील, आपले हेर कसे पेरत असतील, निरोप कसा पोचवत असतील हे सगळं आपल्याला कल्पनाशक्तीद्वारेच समजून घ्यायला लागेल. त्याला मोठी प्रतिभा पाहिजे. अशी एक प्रतिभावन व्यक्ती आहे - प्रेम धांडे. प्रेम धांडे ह्यांनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर "शिवनेत्र बहिर्जी" ही कादंबरी लिहिली आहे. पुस्तकाच्या सुरवातीला त्यांनी स्पष्ट केलं आहे की; "ही कथा इतिहासातील मूळ कथा आणि लोककथांच्या गाभ्यावर आधारित असली तरी त्यातील प्रसंग हा लेखकाचा कल्पनाविस्तार आहे". लेखकाने ही कल्पनागम्य इमारत खूप छान उभी केली आहे. ही कादंबरी तीन खंडांत असणार आहे. हे पुस्तक पहिला भाग आहे. लेखक प्रेम धांडे ह्यांनी स्वतः मला पुस्तक वाचण्यासाठी आणि अभिप्रायासाठी पाठवलं ह्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे.


पुस्तकात दिलेली लेखकाची माहिती


कादंबरीच्या सुरुवातीला तरुण "दौलतराव"ची भेट तरुण शिवबाशी होते. जिजाऊ आणि शिवबा त्याच्या युद्धकौशल्याची पारख करतात आणि तो शिवबाचा सावंडगडी बनतो इथून कादंबरीची सुरुवात होते. कान्होजी जेधे "दौलतराव"ला गुप्तहेराच्या कामात तयार करतात. मग शिवाजी महाराज गुप्तहेर पथकाची स्थापना करतात - बहिर्जी पथक - आणि दौलतराव त्याचा प्रमुख म्हणून - "बहिर्जी नाईक". हे बहिर्जी मावळातल्या योग्य व्यक्तींना हेरतात; काही वेळा प्रसंगोपात शूर व्यक्तींशी (त्यात स्त्रियासुद्धा आहेत) गाठ पडते. त्यांना ते आपल्या पथकात समाविष्ट करतात. शौर्य, धैर्य, स्वराज्यवरील प्रेम, चतुराई, धिटाई, स्वार्थत्याग, भावनांनवर नियंत्रण असे गुणसमुच्चय ह्या हेरांमध्ये विकसित केले जातात. ह्या प्रसंगांचं मनोज्ञ वर्णन पुस्तकात आहे. हे हेर एखाद्या ठिकाणी कसे शिरत असतील; एखाद्या गावात कारागीर म्हणून, शिपाई म्हणून काम करत आपल्या मालकाचा विश्वास संपादन करून गोपनीय माहिती कशी गोळा करत असतील; सांकेतिक पद्धतीने निरोपांची देवाणघेवाण कशी करत असतील ह्याचे रोमांचक प्रसंग पुस्तकात आहेत.



काही उदाहरणे
बहिर्जी पथक गुप्तस्थळे कशी तयार करतात; नवीन हेर कसे मिळवले जातात ह्या बद्दलचा एक प्रसंग




गुप्तहेर वेषांतर करून गावात वावरतात आणि इतर खबऱ्यांकडून माहिती मिळवतात तो प्रसंग





मिळालेल्या माहितीनुसार शिवाजी महाराज श्रीगोंदा आणि जुन्नर इथल्या पेठांच्या लुटीची मोहीम आखातात तो प्रसंग




हे वाचताना आपण त्यात गुंगून जातो. पुढे काय घडेल ह्याची उत्सुकता लागून राहते. रहस्यपट किंवा गुप्तहेरांवरच्या चित्रपटांसारखीच कहाणी आहे. त्याला ऐतिकासिक संदर्भ आहे इतकंच. हेर असो की शिवाजी महाराज; सगळे शेवटी भावना असणाऱ्या व्यक्तीच. पण स्वराज्याच्या कामासाठी मनावर दगड ठेवून, आपल्या भावनावेगाला मुरड घालत त्यांना काम करावं लागलं. ते करताना त्यांच्या मनाचा कसा कोंडमारा होत असेल ह्याबद्दलचे प्रत्यकरी प्रसंग आणि संवाद पुस्तकात आहेत.

पुस्तकाची भाषा आणि पात्रांच्या संवादाची भाषा प्रमाण मराठीच ठेवली आहे. मावळ्यांच्या तोंडी मावळी बोली, मुसलमानांची दख्खनी किंवा उर्दू; महाराजांच्या तोंडी ऐतिहासिक मराठी असा प्रकार केला नाहीये. जेणेकरून नवीन वाचकही गोंधळणार नाही. पण त्यातून निवेदनाला काही उणेपणा येत नाही.

क्वचित काही वेळा बहिर्जी किंवा त्यांचे साथी - आत्ता इथे आणि थोड्याच वेळात तिथे गेले असं दिसतं. दोन ठिकाणांमधलं अंतर लक्षात घेता चालत किंवा घोड्यावरून जायला फार वेळ लागेल. त्यातून गुप्तपणे जायचं तर आणि वेळ आणखी वाढणार. त्यामुळे ते वर्णन थोडं अतिशयोक्त वाटतं. किंवा एखादा हेर साधा सैनिक म्हणून पेरला की तो थोड्याच काळात तो आपल्या गुणांनी प्रगती करत सरदाराच्या अगदी जवळचा होतो. हे शक्य असलं तरी पदोन्नती फारच भराभर झाली ; असं वाटतं. मात्र काल्पनिक कथेतलं लेखकाचं स्वातंत्र्य म्हणून ते मान्य करून पुढे वाचत राहतो कारण पुढे वाचण्यातली गंमत आपल्याला येत असते. ही गंमत घेण्यासाठी, शिवकाळातल्या गुप्तमोहिमांचा भाग होण्यासाठी हे पुस्तक वाचा. 


———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

१९४८ चं अग्नितांडव (1948 cha Agnitandav)





पुस्तक - १९४८ चं अग्नितांडव (1948 cha Agnitandav)
लेखक - रांगा दाते (Ranga Date)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १०४
प्रकाशक - भालचंद्र कुलकर्णी (Bhalchandra Kulkarni)
ISBN - दिलेला नाही

काही दिवसांपूर्वी "काश्मीर फाईल्स" हा सिनेमा आला होता. ९०च्या दशकात कशमीर मधल्या पंडितांचा वंशविच्छेद कसा करण्यात आला होता हे त्यात दाखवलं होतं. पंडितांवर झालेले अत्याचार आणि क्रूर प्रसंगांची आठवण समस्त भारतीय समाजाला ह्या चित्रपटाने करून दिली. अन्यथा फार थोड्याप्रमाणावर लोकांना ह्याबद्दल माहिती होतं. माहिती असलेल्यांनाही त्याची तीव्रता पूर्णपणे माहिती असेलच असं नाही. कारण इतके वर्षात सरकार, समाज आणि माध्यमांनी एकूणच ह्या प्रकार "विसरून जाण्यातच" धन्यता मानली होती. असाच एक वंशविच्छेद जो सरकार, समाज आणि माध्यमांनी "विसरून जाण्यातच" यश मिळवलं आहे तो म्हणजे १९४८ च्या ब्राह्मण विरोधी दंगली. "१९४८ चं अग्नितांडव" हे पुस्तक ह्या विषयाला हात घालते.

३० जाने १९४८ रोजी नथुराम गोडसे ह्याने गांधीजींची हत्या केली. त्यातून देश हादरला, सुन्न झाला. पण काही जण पिसाळले. नथुराम गोडसे हा चित्पावन ब्राह्मण जातीचा म्हणून गोडसेच्या कृत्याची शिक्षा सगळ्या ब्राह्मण जातीला द्यायला ते पुढे आले. अहिंसक गांधींचा कार्यकर्ता म्हणवणारा, हिंदू-मुस्लिम दंगली गांधींनी थांबवल्या असा प्रचार करणारा हा कार्यकर्ता हिंसक झाला, दंगली घडवायला तयार झाला. पण ह्या दंगली नव्हत्या कारण ह्यात दोन्हीकडून प्रहार प्रतिप्रहार नव्हते. होता तो एकतर्फी ब्राह्मणवंशविच्छेदाचा प्रयत्न.

थोड्याच दिवसांत महाराष्ट्रातल्या अनेक शहरांत, गावांत हे लोण पसरले. गावातल्या ब्राह्मण कुटुंबाना घराबाहेर काढून घरं, दुकानं, व्यवसाय लुटले गेले. जाळले गेले. जळत्या आगीत स्त्रीपुरुषांना ढकलून जिवंत जाळण्यात आलं. अमानुष मारहाण करून ठार मारण्यात आलं. मुलींची, स्त्रियांची अब्रू लुटण्यात आली.

गांधी हत्येशी दुरान्वयेही संबंध नसणारे ब्राह्मण इतकेच काय गांधीवादी, खादीधारी, काँग्रेस कार्यकर्ते असणारे ब्राह्मण सुद्धा ह्यातून सुटले नाहीत. तर मग गावाशी एकोप्याने राहणाऱ्या गरीब ब्राह्मण कुटुंबांची काय कहाणी. ते देशोधडीला लागले. नेसत्या कपड्यांनिशी परगावी, शहरी आपल्या नातेवाईकांच्या आधारे राहू लागले.

आज हे वाचताना खरे वाटणार नाही इतक्या सफाईदारपणे ही घटना भारताच्या इतिहासातून गाळली गेली आहे. मी माझ्या आजीकडून ह्याबद्दल ऐकलं होतं. ह.मो. मराठे ह्यांचं पुस्तक, उपेंद्र साठे ह्यांचे "चौऱ्याऐंशी पावलं" ह्या पुस्तकांत त्यांनी अनुभवलेले, प्रत्यक्षदर्शीनी सांगितलेले प्रसंग वाचले होते. त्यामुळे त्याची धग थोडी जाणवली होती.

ह्या पुस्तकाच्या लेखकाने ब्राह्मणविरोधी दंगलींचे अनुभव, माहिती लोकांकडून मागवली होती. ह्या माहितीचे, प्रसंगांचे संकलन असे हे पुस्तक आहे. 
पुस्तकात लेखकाबद्दल दिलेली माहिती.

मुळातच हा ज्वलंत विषय. त्यात सध्याच्या काळ टोकदार जातीय अस्मितांचा. त्यामुळे विषय मांडायचा पण नवीन वाद निर्माण न करता, अशी लेखकाची भूमिका असावी असे मला वाटले. ब्राह्मण कुटुंबाशी जवळीक असणाऱ्या ब्राह्मणेतर शेजाऱ्यापाजाऱ्यांनी त्यांना सावध करायचा प्रयत्न केला, पळून जायला मदत केली काहीवेळा ह्यातून सावरायला हात दिला. हे सुद्धा स्पष्टपणे दिसते आहे. काही प्रसंग बघूया

फलटण मधला पूर्ण नियोजित कट




गांधीवादी समाजसेवक कार्यकर्ता असला म्हणून काय झालं ... ब्राह्मण होता ना? मग जाळपोळीतून तो ही सुटला नाही.



फक्त लूटमार, हत्या नाहीत तर महिलांवर बलात्कारसुद्धा




असे कितीतरी भयंकर प्रसंग पुस्तकात आहेत. मुंबई पुण्यातले सुद्धा असे प्रसंग घडले. अनुक्रमणिकेवरून गावांची नवे कळतील.



असे प्रसंग अजून कोणाला माहिती असतील तर त्यांची माहिती लेखकाला कळवावी असे आवाहन पुस्तकात केले आहे. त्यासाठी त्यांचा ईमेल आयडी आणि फोन नंबर दिलेला आहे. तो पुढीलप्रमाणे 
९८५०८०२१२१
rangadate@hotmail.com 

हे पुस्तक थोडे ललित शैलीत लिहिले गेले आहे. पण ह्या घटनांचे, बातम्यांचे, पोलीस रिपोर्ट, सरकारी अहवाल ह्यांचं दस्तऐवजीकरण झालं पाहिजे. "पुरोगामी" म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात आणि त्यातही विशेषकरून पश्चिम महाराष्ट्रात हे का घडले ह्याचे विश्लेषण संकलित झाले पाहिजे. ह्या घटनांचे दूरगामी परिणाम महाराष्ट्रात झाले आहेत. खेडेगावांतून ब्राह्मण संख्या घटली, महाराष्ट्राच्या राजकारणातून व समाजकारणातून मराठी ब्राह्मण दूर फेकला गेला. दुसरीकडे शेती आणि पारंपरिक व्यवसायांपासून दूर ढकलला गेला. तरीही त्याला तोंड देत, चिकाटीने काम करत ब्राह्मण उद्योजक तयार झाले. ह्या पैलूचेही संकलन झाले पाहिजे. असे संकलन झालेले असेल तर जाणकार वाचकांनी त्याबद्दल सांगावे. 

हे पुस्तक महत्त्वाच्या विषयाला परिणामकारकपणे वाचा फोडते. आजही राजकीय स्वार्थासाठी महाराष्ट्रात ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद महाराष्ट्रात पेटवण्याचा प्रयत्न होतो आहे. त्याचे धोके ओळखण्यासाठी हे पुस्तक महत्त्वाचे आहे. समाज कुठलाही असो गरिबी, निरक्षरता, सामाजिक असहाय्यता ह्या समस्या सगळीकडे सारख्या आहेत. दुसऱ्या समाजाला "बळीचा बकरा" बनवून दोषारोप करून समस्या सुटणार नाहीत; त्यासाठी एकत्र येऊनच प्रयत्न करावे लागतील. पुढाऱ्यांच्या क्षुद्र राजकारणासाठी सामाजिक घडी पुन्हा पुन्हा विस्कटू न देणे ह्यासाठी सगळ्यांनाच प्रयत्न करावे लागतील. 

हे पुस्तक ऑनलाईन विक्रीत उपलब्ध आहे. मी बुकगंगा वरून घेतले


———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

अधर्मकांड (adharmakand)

पुस्तक - अधर्मकांड (adharmakand) लेखक - उदय भेंब्रे (Uday Bhembre) अनुवादिका - अकल्पिता राऊत देसाई (Akalpita Raut-Desai) भाषा - मराठी (Marat...