तौलनिक लोकमान्य (Taulanik Lokamany)




पुस्तक - तौलनिक लोकमान्य (Taulanik Lokamany)
लेखक - चंद्रशेखर टिळक (Chandrashekhar Tilak)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १२८
प्रकाशन - भाग्यश्री प्रकाशन सप्टेंबर २०२५ 
ISBN - 978-81-987168-1-1
छापील किंमत रुपये २००/-



लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक अग्रगण्य नाव. त्यांचे वृत्तपत्रातले लेख, भाषणे, भारतभर केलेले दौरे, आणि स्वतः भोगलेला तुरुंगवास यातून ब्रिटिश सत्तेविरुद्ध जनमानस जागृत झाले. ब्रिटिश विरोधी जनतेच्या भावना मांडणाऱ्या त्यांच्या आधीच्या भारतीय नेत्यांपेक्षा त्यांची भूमिका जास्त जहाल, कृतीशील होती. थेट "स्वराज्य मिळविणारच" हे ठासून सांगणारी होती. स्वातंत्र्याची चळवळ टिळकांच्या आधी सुरू झाली होती. टिळकांनी तिला मोठा लोकाश्रय मिळवून दिला. त्यांच्या निधनानंतरही ती चळवळ पुढे चालत राहून शेवटी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले.

टिळक जसा स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करत होते तसाच प्रयत्न इतर अनेक महान व्यक्तिमत्व सुद्धा करत होती. प्रत्येकाची आपापली विचारसरणी होती, आपापली आंदोलनाबद्दलची धारणा होती. परस्पर विरोधी मते होती. जहाल- मवाळ, सशस्त्र- नि:शस्त्र, सैन्यात जावं की न जावं, सामाजिक सुधारणा आधी का राजकीय स्वातंत्र्य आधी, सुधारणांसाठी ब्रिटिशांचे सहकार्य घ्यावे की न घ्यावे, पारंपारिक स्वदेशी विचार घ्यावा का आधुनिक पाश्चिमात्य विचार आचरावा ... असे असंख्य मतभेदाचे मुद्दे होते. प्रत्येकाची कार्यशैली वेगळी होती आणि समाजावर प्रभाव टाकण्याची क्षमता देखील वेगळी.

त्यामुळे कुठेही एका चरित्र नायकाचा अभ्यास करताना त्याचे तत्कालीन नेत्यांची आलेले संबंध नक्कीच अभ्यासनीय ठरतात. या नेत्याने आपल्या पूर्वसुरींकडून काय बोध घेतला होता हे समजणं महत्त्वाचं असतं. तर हा नेता दिवंगत झाल्यावर काय झालं त्यांचे विचार टिकले का काळाच्या कसोटी उतरले का हे जाणणं देखील महत्त्वाचं आहे. एकूणच हा प्रचंड मोठ्या अभ्यासाचा आणि व्यासंगाचा विषय आहे. ज्याला इतिहासात खरंच मनापासून रस आहे तोच हे करू जाणो. पण इतरांनी मात्र नाराज व्हायचं कारण नाही. कारण लोकमान्य टिळकांच्या संदर्भात असा अभ्यास करून ते सार रूपात आपल्यासमोर मांडण्याचं मोठं काम लेखक चंद्रशेखर टिळक यांनी सदर पुस्तकाच्या रूपात केलं आहे.

लेखकाची पुस्तकात दिलेली ओळख


हे पुस्तक २५ लेखांचा संग्रह आहे यात पहिल्या बारा लेखांमध्ये लोकमान्य टिळक आणि एक एक भारतीय नेतृत्व याची तुलना केलेली आहे. दोघांचा स्वभाव, विचार, कामाची पद्धत केलेले लिखाण, लोकांचा प्रतिसाद, परदेश प्रवास, भोगलेल्या शिक्षा अशा वेगवेगळ्या पैलूंद्वारे सारखेपणा आणि फरक दाखवून दिलेला आहे. यात शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास असे टिळकांच्या आधीच्या दोन विभूती आहेत. गांधीजी, योगी अरविंद, स्वामी विवेकानंद, गोपाळ कृष्ण गोखले, न्यायमूर्ती रानडे आणि सावरकर, विनोबा भावे ही त्यांच्या कार्यकाळच्या आसपास झालेली व्यक्तिमत्व आहेत. गंमत म्हणजे पुस्तकाची सुरुवात होते ती अटलजी, मोदीजी आणि इंदिरा गांधी ह्यांच्याशी तुलनेतून.

अनुक्रमणिका



समकालीन लोकांवरच्या लेखात टिळक आणि दुसरी व्यक्ती ह्यांची भेट कधी, कुठे झाली होती, त्यांच्यात कुठल्या मुद्द्यावर चर्चा झाली होती, त्यांनी एकत्र काम केले किंवा नाही, एकमेकांवर टीका कशी केली, एकमेकांची स्तुती कधी केली, त्यांच्याबद्दल इतर पत्रकार किंवा नेते काय म्हणत अशी उदाहरणे दिली आहेत. 
लेखकाने तुलनेसाठी घेतलेले काही मुद्दे आपल्याला आश्चर्यचकितही करतील. उदा. टिळक आणि सावरकर ह्यांच्या जीवनावर आधारित कलाकृती किती आणि त्या व्यावसायिक दृष्ट्या किती चालल्या (किंबहुना नाही चालल्या) असाही मुद्दा घेतलाय. टिळक आणि आगरकर ह्यांच्या लेखनशैलीची देखील तुलना आहे. "गीतारहस्य" व "गीताई" ह्यांच्यातले साम्यभेद एका लेखात आहेत. असे विचार डोक्यात येणं आणि त्याबरहुकूम माहिती गोळा करून ती मांडणं ह्याबद्दल लेखकाला प्रणाम.

शेवटचे दहा बारा लेख हे टिळक आणि एखादे ठिकाण, समुदाय, वस्तू ह्यांचा पुन्हा पुन्हा संपर्क कसा आला किंवा आलेला संपर्क कसा महत्त्वाचा ठरला ह्याची माहिती आहे. टिळकांनी स्वातंत्र्य लढ्यात मुसलमानांचा सहभाग मिळवण्यासाठी प्रयत्न केले. त्यातून काँग्रेस व मुस्लिम लीग ह्यांच्यातला "लखनौ करार" झाला होता. तो वादग्रस्त ठरला पण. टिळकांबद्दल मुस्लिम समाजात किती विश्वासाची भावना होती हे त्या प्रकरणातून दिसतं. टिळक समाजाचा सर्वांगीण विकास करणारे राजकीय नेते होते. त्यांनी कामगार चळवळीला कसा पाठिंबा दिला हे एका लेखात आहे. टिळकांचा अर्थकारणाचा अभ्यासही दांडगा होता. "बॉम्बे स्वदेशी" कंपनीत ते संचालक सदस्य होते. समभाग (शेअरची) किंमत किती ठेवावी, कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ता म्हणून कंपनीचे शेअर द्यावेत इ. निर्णय त्याकाळात त्यांनी घेतले. "टिळक आणि शेअर बाजार " लेख वाचताना ही अपरिचित बाजू पुढे येते.

काही पाने उदाहरणार्थ
टिळक आणि रामदास

टिळक आणि योगी अरविंद

टिळक आणि मुसलमान

परकीयांच्या शब्दांत टिळक


कितीही लिहिलं आणि कितीही व्यक्तिमत्त्वांशी तुलना करत लिहिलं तरी अजून लिहायला वाव राहणारच. तरी कामगार कायदे, आर्थिक बाबी ह्याबद्दल वाचताना आंबेडकरांची आठवण झाली. आर्थिक, कायदेशीर बाबी, ब्राह्मण-ब्राह्मणेतरांकडे बघायचा दृष्टिकोन हे मुद्दे घेऊन आंबेडकर- टिळक एखादं प्रकरण जोडता आलं तर छान. "अर्थकारणी लोकमान्य" ह्या आगामी पुस्तकात तो मुद्दा सविस्तर येणार आहे.
ह्या पुस्तकात उल्लेख झालेल्या टिळकांच्या आयुष्यातल्या घटना वाचकाला नीट माहिती असतील तर विवेचन व्यवस्थित कळेल. तो गृहपाठ वाचकानेच केला पाहिजे. तरी.. सूरत काँग्रेस, लखनौ करार, चिरोल खटला ह्यांच्याबद्दल सुरुवातीलाच तपशील दिले तर मदत होईल. "मुसलमान" प्रकरण वाचताना मी आत्ता नेट वर शोधून वाचलं की नक्की सहकार्य म्हणजे काय करार केला होता. ते वाचल्यावर चित्र अजून स्पष्ट झालं.

सुरुवातीला म्हटलं तसं लेखकाच्या अभ्यासाचं, व्यासंगाचं सार आपल्या समोर असल्यामुळे हे लेख वाचताना शाळेतलं "नवनीत गाईड" वाचतो आहे असं वाटलं. "टिळक आणि अमुक अमुक ह्यांच्यातील पाच फरक आणि पाच साम्यस्थळे सांगा; "टिळक आणि अमुक अमुक आव्हान ह्यावर शंभर ओळींचा निबंध लिहा".. अशा प्रश्नाची तयार उत्तर म्हणजे एकेक लेख. त्यामुळे ह्या लेखांमध्ये मुद्द्याला ओझरता स्पर्श करून लेखक पुढच्या मुद्द्याकडे वळतो. ते वाचताना तयार उत्तर मिळाल्याचा आनंद आपल्याला मिळेल. तर अभ्यासू वाचकाला प्रत्येक तुलनेचा मुद्दा अभ्यासाची नवीन वाट दाखवेल.

पुस्तकातले विवेचनाचे स्वरूप वस्तुनिष्ठ तुलना आहे. कुठल्याही महापुरुषाला कमी लेखण्याचा किंवा चढे दाखवण्याचा हेतू ह्यात दिसत नाही. छुपा अजेंडा दिसत नाही. अजेंडा असलाच तर; तो हा असावा की लोकमान्यांचे विचार, कर्तृत्व आजही किती अभ्यासनीय, अनुकरणीय आहे; समाज आणि शासन पातळीवर त्याबद्दलची अनास्था दूर केली तर आपलंच भलं आहे हे जाणवून देणे !

काकासाहेब चितळे सहवेदनेतून समृद्धीकडे (Kakasaheb Chitale - Sahavedanetun Samruddhikade)

पुस्तक - काकासाहेब चितळे सहवेदनेतून समृद्धीकडे (Kakasaheb Chitale - Sahavedanetun Samruddhikade)
लेखिका - वसुंधरा काशीकर (Vasundhara Kashikar)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - २६५
प्रकाशन - सकाळ प्रकाशन, जुलै २०२५
छापील किंमत रु.४९९/-
ISBN 978-93-49487-78-9

"चितळे बंधू मिठाईवाले" हे नाव ऐकलं नाही असा महाराष्ट्रातील माणूस विरळाच. पुण्यासारख्या ऐतिहासिक सांस्कृतिक नगरीची एक ओळख बनलेला "चितळे बंधू" हा ब्रँड आहे. चितळ्यांची बाकरवडी, श्रीखंड, इतकंच काय, दुकानाच्या चालूबंद असण्याच्या वेळा हा सुद्धा लोकांच्या आवडीचा आणि चर्चेचा विषय राहिलेला आहे. चितळे दूध, चक्का, तूप इतर दुग्धजन्य पदार्थ मिठाया तिखट मिठाचे पदार्थ या सगळ्यांचे चाहते महाराष्ट्रभर पसरलेले आहेत. परदेशस्थ मराठी माणसांमुळे ही नाममुद्रा सातासमुद्रापलीकडेही पोचली आहे. चव, स्वच्छता, मालाचा दर्जा ह्यातली उत्तमता त्यांनी कायम राखली आहे. त्यांच्या उत्पादनांमध्ये व व्यवसायामध्ये दिवसेंदिवस वृद्धीच होते आहे. एका मराठी माणसाने सुरू केलेला, त्याच्या कुटुंबीयांनी वाढवलेला आणि चौथ्या पिढीपर्यंत एकत्र राहून प्रगतीपथावर राखलेला हा उद्योग असल्यामुळे सहसा उद्योगाच्या वाटेला न जाणाऱ्या मराठी माणसासाठी अजूनच कौतुकाचा आहे.

मला तर त्यांच्या मिठाया आणि तिखटमिठाचे पदार्थ इतके आवडतात की वरचेवर दुकानात खरेदी होत असते. मित्रांना - सहकाऱ्यांना काही खाऊ न्यायाचा असेल तर तो हमखास चितळेंचाच असतो. त्यामुळे मला तर माझे मित्र थट्टेने चितळ्यांचा ब्रँड अम्बॅसेडरच म्हणतात. त्यांच्या दोन कारखान्यांना खाजगी भेट देण्याची संधी योगायोगाने मिळाली. त्यांचे वर्णन फेसबुकवरच्या माझ्या पोस्टमध्ये वाचू शकाल

https://www.facebook.com/kaushik.lele/posts/pfbid0raGA1C4bdzD1Z8RAQsSWH7s3HsZq56nXazzDPh4AqnWijNy4cKqsEZXxGpktMWNrl

https://www.facebook.com/kaushik.lele/posts/pfbid0rBsfxsyuAUQr6t7oZNRENjCg4CTuV82DBYcsKWxZcQ1e97PMS1fku6qxm3hRTAHfl

सांगली जवळच्या भिलवडी गावामध्ये भास्कर चितळे अर्थात बाबासाहेब चितळे यांनी एक छोटा दुधाचा धंदा सुरू केला. त्या बीजाचा आज वटवृक्ष झालेला आपल्याला दिसतो. या विस्तारात बाबासाहेबांची मुलं, सुना, नातवंडं आणि आता पतवंडंही कार्यरत आहेत. बाबासाहेबांचे चिरंजीव दत्तात्रय उर्फ काकासाहेब चितळे हे त्यापैकी एक. काकासाहेबांच्या कर्तृत्वाची, दातृत्वाची आणि सहृदयतेची विविधांगी ओळख करून देणारं असं हे पुस्तक आहे. या आधी मी काकासाहेबांबद्दल काही विशेष वाचलं नव्हतं. चितळे समूहाच्या सामाजिक कामाबद्दलही विशेष माहिती नव्हती. पण या पुस्तकातून त्या दोन्ही बद्दल फार छान ओळख झाली. चितळ्यांच्या खास पेढ्यांसारखं उद्योजगतेच्या गोड खव्याच्या आत सामाजिक बांधिलकीचं सारण कसं भरलेलं आहे हे जाणवलं.

पुस्तक वाचल्यावर असं वाटलं की, नवनवीन तंत्रज्ञान आणून, नवीन संकल्पना राबवून काकासाहेबांनी केवळ उद्योग वाढ केली असती तरीही एक यशस्वी उद्योगपती म्हणून आपल्या मनात कौतुकाचे स्थान मिळवते झाले असते. पण काकासाहेबांचं वैशिष्ट्य असं की त्यांनी आपला धंदा वाढवताना नफेखोरी केली नाही. आपले ग्राहक, पुरवठादार कर्मचारी यांची पिळवणूक करून उत्पन्नाचे मोठमोठे आकडे गाठण्याची खेळी केली नाही, उलट या सर्वांचा आर्थिक, सामाजिक व वैचारिक विकास कसा होईल याची काळजी घेतली. त्याचे योग्य परिणाम दिसलेच. मालक-कर्मचारी, मालक-पुरवठादार असे कोरडे संबंध न राहता ते संबंध परस्पर विश्वासाचे झाले, जिव्हाळ्याचे झाले. चितळे समूहाच्या विस्तारित कुटुंबाचे ते सगळे भाग झाले. इतकं केलं असतं तरी एक सहृदय उद्योजक म्हणून आपला आदर दुणावला असता. पण काकासाहेब इतक्यावर थांबले नाहीत. ते ज्या गावात उद्योग करत होते त्या "भिलवडी" गावाचा, पंचक्रोशीचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले. शिक्षण संस्था आणि इतर सामाजिक कामांना भरभरून देणग्या दिल्या. गरजूंना मदत केली. इतकं केलं असतं तरी ते दानशूर सहृदय उद्योजक ठरले असते. पण काकासाहेब फक्त देणग्या देऊन थांबले नाहीत तर जिथे आर्थिक मदत केली आहे तिथे तिथे आपल्या अनुभवाचा वापर करून योग्य मार्गदर्शन केलं. वेगवेगळ्या संस्था सुरू केल्या. त्यांच्या दैनंदिन कामात भाग घेऊन संस्था कार्यप्रवण केल्या. ग्रामस्वच्छतेसाठी श्रमदान असो, महापूर येऊन गेल्यावर गावात झालेला गाळ काढण्याचे असो; काम काका हातात कुदळ-फावडं घेऊन कमला पुढे. शेजाऱ्यापाजाऱ्यांच्या घरी लग्नकार्य किंवा दुःखद प्रसंग असो, संस्थेच्या कामासाठी आलेल्या पाहुण्यांची उठबस असो; काका तिथे प्रत्यक्ष काम करत होते. हे वाचल्यावर तर कर्ता सुधारक, दानशूर, सहृदय यशस्वी उद्योजक अशी किती विशेषणे त्यांना लावावी ! समजत नाही.

इतक्या सगळ्या गोष्टींमध्ये व्यग्र असणाऱ्या माणसाला घरच्यांना वेळ देणं, आपल्या मुलानातवंडांशी प्रेमाचे संबंध ठेवण्यासाठी पुरेसा वेळ आणि मानसिक स्थैर्य मिळणं कठीण जातं. बऱ्याच वेळा आपण बघतो की महापुरुषांच्या सावलीत त्यांची पुढची पिढी तितकी यशस्वी वाढत नाही. समाजासाठी वाहून घेतलेल्या लोकांच्या कामाची झळ कुटुंबीयांना भोगावी लागते. पण पुस्तकात दिलेल्या वर्णानुसार काकांचे आपल्या घरच्या मंडळींशी सुद्धा अतिशय प्रेमाचे, आनंदाचे संबंध होते. एकत्र कुटुंब म्हणून नांदणाऱ्या चितळे घरात घरच्या आनंदाच्या आणि अडचणीच्या प्रसंगातही काका उपलब्ध होते.

भारतीय परंपरेने सांगितलेले चार पुरुषार्थ धर्म-अर्थ-काम आणि मोक्ष. या ऐहिक जगातले धर्म, अर्थ आणि काम हे पुरुषार्थ काकासाहेबांनी साधले आहेत. चौथा पुरुषार्थही नक्कीच परमेश्वराने त्यांना आनंदाने दिला असेल.

चरित्र नायकाची ही धावती ओळख वाचून तुम्हाला पुस्तकाबद्दल नक्कीच उत्सुकता वाटत असेल त्यामुळे थोडं पुस्तकाच्या मजकुराबद्दल सांगतो. पुस्तकात एकूण २२ प्रकरणं आहेत. त्यात काकांनी केलेल्या वेगवेगळ्या कार्याची वर्गवारी केलेली आहे. 
काही प्रकरणाबद्दल थोडक्यात सांगतो म्हणजे कल्पना येईल.

"अशी म्हैस सुरेख बाई" - म्हशीचं दूध हा चितळ्यांचा मुख्य धंदा. त्यासाठी चांगल्या जातीच्या, भरपूर दूध देणाऱ्या म्हशी निवडण्यासाठी काका परराज्यात जायचे. परिसरातील शेतकऱ्यांना, पशुपालकांना म्हशी घेण्यासाठी मदत करायचे. म्हशींचे आरोग्य सांभाळण्यासाठी डॉक्टरांची सोय त्यांनी उपलब्ध करून दिली. म्हशींचा विमा काढण्याच्या प्रक्रियेत सुद्धा त्यांनी लक्ष घालून ती शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त सोपी कशी होईल हे बघितले. आजाराने म्हशी दगावणे, अपघात होणे किंवा परराज्यातून म्हैस आणताना अपघात होणे या सगळ्या गोष्टींसाठी कमीत कमी हप्त्यामध्ये जास्तीत जास्त विमा कवच त्यांनी शेतकऱ्यांना मिळवून दिलं.

"भिलवडी चे गाडगेबाबा" - गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान २००२ साली भिलवडीत राबविण्यात आलं. त्यात काकांनी पुढाकार घेतला. कामाचं पूर्ण नियोजन केलं. गटारे बांधणे, शौचालये बांधणे, उद्यान तयार करणे, वृक्षारोपण करणे, वैद्यकीय शिबिर घेणे, कचरा व्यवस्थापन करणे अशा प्रत्येक गोष्टीत त्यांनी स्वतःचा अनुभव आणि नेनेतृत्त्वगुण कामाला लावले. जिथे शासकीय मदत वा गावाचा निधी कमी पडत होता तिथे चितळे समूहातर्फे पैसे देऊन काम मार्गी लावलं. राज्यात भिलवडीचा दुसरा क्रमांक आला.

"सार्वजनिक वाचनालय आणि भिलवडी शिक्षण संस्था" - फक्त इमारत बांधून, चांगली पुस्तकं तिथे आणून काका थांबले नाहीत तर जास्तीत जास्त लोक तिथे यावेत यासाठी वाचन कट्टा, पुस्तक भेट असे कार्यक्रमही राबवले. शिशुवर्गापासून उच्च शिक्षणापर्यंत सोयी उभारण्यात मोठा सहभाग घेतला.

"मी अजून जहाज सोडलेलं नाही" - भिलवडीला आलेल्या दोन महापुरात काकासाहेब भिलवडी न सोडता तिथेच राहिले. लोकांना बाहेर काढणं, जनावरांना बाहेर काढणं, बाहेरगावाहून मदत आणणं आणि त्याचं योग्य वाटप करणं ह्या सगळ्यात त्यांनी जीवाचं रान केलं ते सगळे प्रसंग यात आहेत.

काकांचे भाऊ, मुलं, सुना, नातू यांच्या काकांविषयीच्या आठवणी दोन लेखात आहेत तर. "व्रतस्थ इमानाची यात्रा ८५ वर्षांची" ह्या लेखात चितळे समूहाच्या स्थापनेपासून आतापर्यंतच्या प्रगतीचा धावता आढावा घेतला आहे. कुटुंबातल्या कुठल्या व्यक्ती कुठल्या जबाबदारीवर आहे याची माहिती दिलेली आहे.

काही पाने उदाहरणादाखल

आजूबाजूच्या होतकरू तरुणांना स्वतः आर्थिक मदत करणे, स्वतःची पत खर्ची घालून बँकेकडून मोठ्या रकमांची कर्ज मिळवून देणे आणि परतफेडीची योग्य व्यवस्था लावणे याबद्दलची दोन पाने


फक्त धान्यशेती आणि दूध इतपतच मर्यादित न राहता शेतकऱ्यांनी फळबागा कराव्यात, नवीन प्रकारची पिकं घ्यावी यासाठीही ते प्रोत्साहन देत. मार्गदर्शन करत. आर्थिक मदत देत आणि पुढाकार घेऊन संस्थात्मक काम करत त्यातील एक उदाहरण.

असंख्य सामाजिक विषयात काम करणारे काकासाहेब नेत्रदानासाठीही सक्रिय होते त्याबद्दल



अशा पद्धतीने काकासाहेबांच्या सामाजिक कामाची माहिती अतिशय जोरकसपणे या पुस्तकात येते हे या पुस्तकाचं  नक्की यश आहे. पण काकासाहेबांचं पूर्ण चरित्र किंवा त्यांचा जीवनपट असा डोळ्यासमोर येत नाही. सर्वसामान्य वाचकांना चितळ्यांची मिठाई माहिती आहे पण "चितळे बंधू" म्हटल्यावर चितळ्यांच्या कुटुंबात कोण कोण आहेत; कोण उद्योगात आहेत; त्यांची परस्पर नाती काय हे माहिती नाही. त्यामुळे ह्या चितळ्यांपैकी काकासाहेब हे नक्की कोणाचे कोण हे आधी स्पष्ट व्हायला हवं होतं. चितळे वंशवृक्षाची माहिती, काकासाहेबांच्या आयुष्यातले मुख्य टप्पे, त्याचा काळ, त्याची ठिकाणं हे थोडक्यात सांगायला हवं होतं. ही स्थलकालनिश्चिती झाल्यावर पुढची प्रकरणे अजून परिणामकारक झाली असती. प्रत्यक्ष चितळे डेअरी साठी 
त्यांनी केलेलं काम हे देखील तुटक तुटकपणे समोर येतं. ते अजून जोरकसपणे यायला हवं होतं. त्यांच्या बुद्धीचा, तांत्रिक कौशल्याचा वापर त्यांनी प्रत्यक्ष डेअरी साठी कसा केला; काय काय पद सांभाळली, कुठल्या भूमिका निभावल्या, उत्पादनांची संख्या गुणवत्ता आणि उत्पन्न कसं वाढवलं हा सगळा भाग तितका जोरकसपणे येत नाही. त्यांनी उद्योगात मिळवलेले यश आणि "उत्तम व्यवहाराने जोडलेले धन" हे त्यांच्या पुढच्या सामाजिक कामासाठी एक मजबूत पाया झाले आहे. तो पाया कसा घडला हे सविस्तर वाचायला मिळणं आवश्यक होतं.पुढच्या आवृत्तीत त्यात एक प्रकरण सुरुवातीला जोडावं असं मला वाटतं.

काकासाहेबांचं काम जितक्या सकारात्मकतेने आणि ऊर्जेने भरलेलं आहे ते तितक्याच ऊर्जाभरल्या शब्दांनी आपल्यासमोर आणलं आहे वसुंधरा काशीकर यांनी. निवेदन, एखाद्या व्यक्तीच्या मुलाखतीतला भाग, थोडी माहिती अशा स्वरूपातलं लेखन अतिशय प्रवाही आहे. थेट लोकांच्या तोंडून काकासाहेबांचे अनुभव ऐकतोय आहोत असंच वाटतं. लेखिकेने वाचकाने घ्यायचा बोध सोप्या शब्दांत सांगितला आहे. गाण्याच्या ओळी, गजलेच्या ओळी, उद्धृते ह्यांनी मजकूर नटलेला आहे. म्हणूनच पुस्तक रुक्ष चरित्र किंवा कामाची जंत्री असं होत नाही. ही एक सुंदर ललित कलाकृती आहे.

"सकाळ प्रकाशना"ने पूर्ण मजकूरही वेगवेगळ्या रंगात सादर केला आहे. ठळक शीर्षक, त्याच्याखाली दाट रेघ, डावीकडचे पानभर रेखाचित्र, चित्र मजकूर ठळक दाखवण्यासाठी रंगांचा वापर केला आहे. "Kaka says" असं म्हणत काकांची त्या त्या प्रसंगाला साजेशी वाक्ये ठळक दिलेली आहेत. वृत्तपत्रे लेखातील चौकटीप्रमाणे. यामुळे हे पुस्तक सुद्धा तितकंच देखणं आणि अभिरुचीपूर्ण झालं आहे.

पुस्तकात भरपूर फोटोही आहेत विशेष म्हणजे प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला एक छान रेखाचित्र आहे. अनंत खासबारदार यांनी ही चित्रे काढली आहेत. एक उदाहरण पहा.

महापुराच्या वेळी काकांनी केलेल्या कामा ची ओळख करून देणारे हे चित्र किती यथायोग्य आहे, सुरेख आहे, आकर्षक आहे. "अ पिक्चर इज वर्थ थाउजंड वर्ड्स" चा प्रत्यय देणारं आहे.

तर असं हे पुस्तक वाचाच. हवं तर चितळ्यांची श्रीखंड आणि बाकरवडी खात खात पुस्तक वाचा 😀😀. काकासाहेबांच्या कामाची गोडी चाखताना पदार्थांची गोडी आणि खुमारीही वाढेल. लक्ष्मी आणि सरस्वतीचं एकत्र वास्तव्य दिसेल. आपल्या वकुबानुसार समाजासाठी काही करायची ऊर्मीही वाढेल.

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

जा जरा पूर्वेकडे (Ja jara purvekade)




पुस्तक - जा जरा पूर्वेकडे (Ja jara purvekade)
लेखक - आशुतोष जोशी (Ashutosh Joshi)
अनुवाद - सविता दामले, मोहना प्रभुदेसाई जोगळेकर (Savita Damle, Mohna Prabhudesai Joglekar)
भाषा - मराठी (Marathi)
मूळ पुस्तक - Journey to the east (जर्नी टू द ईस्ट)
मूळ पुस्तकाची भाषा - English (इंग्रजी)
पाने - १७५
प्रकाशन - ब्लीच पब्लिशिंग 2025
ISBN - 978-93-342-9139-1
छापील किंमत - रु. ५००/-

समाज माध्यमांवर पोस्ट वाचताना, व्हिडिओ बघताना कळलं की आशुतोष जोशी या पंचवीस-तिशीतल्या तरुणाने कोकणापासून बंगालच्या उपसागरापर्यंत पदयात्रा केली आहे. ह्या प्रवासापूर्वी तो इंग्लंडमध्ये फोटोग्राफीची व्यावसायिक कामे करत होता. पण त्याने भारतात परत यायचं ठरवलं. ही पदयात्रा केली. आणि सध्या तो त्याच्या गावी गावकऱ्यांसाठीचे काही सामाजिक प्रकल्प राबवतो आहे. ह्या जुजबी माहितीवरून त्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि त्याच्या प्रवासाबद्दल उत्सुकता वाटून त्याचे पुस्तक मी विकत घेतलं. "जा जरा पूर्वेकडे" या पुस्तकात त्याने त्याच्या पदयात्रेतल्या अनुभवांबद्दल लिहिले आहे. १८५० किलोमीटर इतकी लांब ही पदयात्रा होती त्याला ६७ दिवस लागले.

हे पुस्तक त्याच्या प्रवासाची रोजनिशी नाहीये. प्रवासाचा सुरुवातीचा दिवस, शेवटचा दिवस आणि मधल्या काळात घडलेल्या दहा पंधरा घटना त्यात आहेत. एखादा प्रसंग आणि त्यावर आधारित त्याचं बरंचसं तत्वचिंतन असं निवेदनाचं स्वरूप आहे.

पुस्तक वाचताना कळतं की मर्यादित सामान एका ढकलगाडीत घालून तो प्रवास करत होता. कधी कुणाच्या घरी, कधी देवळात, तर कधी उघड्यावरती तंबू ठोकून त्याने मुक्काम केला. वाटेतल्या लागणाऱ्या गावांमध्ये गावकऱ्यांनी त्याला खायला दिलं. काहीवेळा घरीही राहायला देऊन पाहुणचार केला. असं काहीमिळालं नाही तेव्हा त्याच्या स्वतः कडची मॅगी किंवा पॅकेट फूड खाऊन दिवस काढला. ऊन, पाऊस, जंगली दमटपणा, सिमेंटचा रस्ता, कच्चा रस्ता माळरान अशा वेगवेगळ्या परिस्थितीतून त्याने प्रवास केला.

काही पाने उदाहरणादाखल

लेखकाची पुस्तकात दिलेली माहिती.


गावकऱ्याशी संवाद आणि शेतीबद्दल चिंतन.



नक्षलप्रभावित भागात शिरताना पोलिसांनी चौकशी केली.



पंचविशीतला एक तरुण पदयात्रेवर निघतोय हे किती धाडसाचं आहे! अशा प्रवासात स्वतःला शारीरिक व मानसिक दृष्ट्या खंबीर ठेवणं महत्त्वाचं आहे. अनोळखी प्रदेशातून जाताना कधी त्रासदायक तर कधी चिंतेत टाकणारी परिस्थिती समोर येणार; तर कधी अनपेक्षित आनंदाचे क्षणही येणार. आशुतोषचं हे धाडस, त्याला आलेले अनुभव आणि त्यातून त्याच्या मनावर विचारांवर झालेला परिणाम हे सगळं ह्या पुस्तकात सापडेल असं वाटून मोठ्या औत्सुक्याने मी हे पुस्तक वाचायला घेतलं. परंतु पुस्तकाने माझी निराशा केली.

ज्या प्रसं
गांचं वर्णन केलं आहे त्या प्रसंगांचा स्थलकालाचा संदर्भच बहुतेक वेळा लागत नाही. अगदी सुरुवात म्हणजे त्याचं नरवण गाव कोकणात नक्की कुठे आहे हे मला माहिती नाही. शेवट ज्या गावात झाला ते माहिती नाही. त्याचा प्रवासाचा मार्ग कसा होता ते समजत नाही. नकाशा नाही तरी एखादं रेखाचित्र हवं होतं. रोजनिशी सारखं वर्णन नसल्यामुळे अचानक उड्या मारत मारत एका गावातलं वर्णन मग कुठल्यातरी पुढच्या गावाचं वर्णन मग त्याच्या पुढचं असं आहे. त्यामुळे मध्ये किती वेळ गेला, किती अंतर गेलं, काय केलं काही समजत नाही. त्यामुळे त्या प्रवासाचं गांभीर्य आपल्यापर्यंत पोहोचत नाही.

पुस्तकाच्या सुरुवातीला आशुतोष म्हणतो की परदेशात राहत असताना भारतात
ल्या  "कृषी कायदे" विरोधी आंदोलनाच्या बातम्या त्याने बघितल्या. शेतीच्या समस्या त्याला जाणवल्या. त्या नीट समजून घ्याव्यात हाही पदयात्रेचा उद्देश होता. पण पुस्तकात बघितलं तर; आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची भेट आणि गावातल्या एक दोन लोकांशी बदलत्या पीक पद्धती बद्दल बोलणं या व्यतिरिक्त काही खास संशोधनात्मक प्रसंग नाहीत. डोळेसपणे बातम्या बघणाऱ्या, वृत्तपत्रीय लेख वाचणाऱ्या कुठल्याही माणसाला जी जुजबी माहिती या समस्यांबद्दल असेल तेवढेच त्याला प्रत्यक्ष चालूनही समजली; असा समज वाचकाचा झाला तर नवल नाही. कदाचित त्याची वैयक्तिक समज खूप वाढली असेलही पण इथे ते ध्वनित होत नाही.

जंगलातल्या प्रवासात जाताना अस्वल अगदी त्याच्या जवळ आलं होतं. हल्ला व्हायची वेळ आली होती. हा एक प्रसंग वगळता पायी चालणे, उघड्यावर राहणे ह्यामुळे घडलेला कुठलाही थरारक प्रसंग पुस्तकात नाही. पदयात्रा करताना त्याला वारंवार संकटं यायला हवी होती आणि मग ती वाचायला आम्हाला मजा आली असती असं मला म्हणायचं नाहीये. मी सुरुवातीला म्हटलं तसं स्वतःची शारीरिक-मानसिक खंबीरता टिकवणे आणि स्वतःच्या रोजच्या सोयी करणे यासाठी केलेली धडपड सुद्धा वाचकाला समजून घ्यायला आवडलं असतं. पण पुस्तक त्याही बाबतीत लंगडं आहे. त्याला आलेले अजून अनुभव, भेटलेली माणसं, दिसलेला निसर्ग ह्यांचा अजून उल्लेख हवा होता. एक सलगता आली असती.

तिसरा पैलू म्हणजे सामाजिक परिस्थितीबद्दलचं त्याचं मुक्त चिंतन. एकूणच कथनाचा सूर असा आहे की शहरातले लोक आरामात जगतात आणि गावातले लोक फारच दुःखी आहेत. शहरातल्या लोकांना गावातल्या लोकांची जाण नाहीये. शहरातले लोक फक्त तंत्रज्ञानाचा आनंद घेत आहेत तर गावातले लोक मात्र निसर्गाशी तल्लीन झालेले आहेत. राग, क्रोध, ईर्षा हे सगळे अवगुण फक्त शहरी लोकांमध्ये आहेत. गावातले लोक मात्र मुक्त, स्वच्छंदी, आनंदी. हे काळंपांढरं चित्र फार खटकतं. एका प्रसंगात तो साधारणपणे असं म्हणतो की "माळरानावर भरपूर पाऊस पडत होता आणि दोन-तीन शेतकरी तिथे निवांत एकमेव च्या पाठीला पाठ लावून निवांत झोपले होते. द्वेषाचं ओझं त्यांच्या मनावर नव्हतं
पाऊस थांबल्यावर ते उठले. आकाश निरभ्र तशी त्यांची मनही निरभ्र. ते कसा छान आनंद घेत होते. शहरातल्या लोकांनी असा आनंद घेतला नसता". पण खरंच असं असेल का? ते शेतकरी पावसाचा आनंद घेत असतील, का कामाच्या चिंतेत असतील? आता हा पाऊस किती वेळ पडणार, यावर्षी जास्त पडणार, का कमी पडणार; ही भीती मनात नसेल का? तो पाऊस अवकाळी असेल तर त्यांच्याही मनात पावसाबद्दल शिव्याच असतील ना! दुसऱ्या एखाद्या गावकऱ्याकडे शेत जास्त आहे किंवा त्याची जमीन जास्त उपजावू आहे अशी असूयाही असेल. खेड्यात राहणाऱ्या लोकांमधली बांधांवरून भांडणं, भाऊबंदकी कोणाला ठाऊक नाही? "एक वेळ शहरातली कटकट परवडली पण भावकीतली भांडण नकोत", असं म्हणणारे कितीतरी गावकरी आपल्याला आजूबाजूलाही दिसतील. त्यामुळे लेखकाची शहरी जीवनाबद्दलची अनास्था, वैयक्तिक नावड आणि खेड्याबद्दलच्या काहीतरी रोमँटिक कल्पनारंजन अशा भावनेतूनच पूर्ण पुस्तक लिहिलं आहे. सरकार, नागरी व्यवस्था, आधुनिक जीवनपद्धती ह्यांना सरसकट अपराधी ठरवण्याची भूमिकाही दिसते. त्यामुळे त्याची तात्विक मल्लिनाथी ठिसूळ पायावर उभी आहे असंच मला वाटलं.

हे पुस्तक मूळ इंग्रजीत आहे. लेखकाने त्याच्या परदेशी परिचितांना डोळ्यासमोर ठेवून गोष्टींचं वर्णन केलं आहे असं जाणवतं. भारतात लग्नाच्या वेळी मांडव घालतात; काही वेळा काही खेड्यांमध्ये लोक प्रातर्विधीसाठी बाहेर जातात; भारतात स्थानिक राजकारणी आणि कॉन्ट्रॅक्टर याचं साटंलोटं असतं अशा प्रकारचे उल्लेख आहेत. सर्वसामान्य भारतीय वाचकाला हे नित्यनियमाचे आहे. पण कदाचित ही वर्णन परदेशी लोकांना दुर्लक्षित भारत ह्यात दिसला
. म्हणून सुरुवातीला तीन परदेशी लेखकांनी पुस्तकाची भलावण केलेली आहे. मला मुन्नाभाई एमबीबीएस मधल्या "आय वॉन्ट पुअर पीपल हंग्री पीपल" ह्या प्रसंगाची आठवण मला झाली.

असो ! पुस्तक जरी भावलं नसलं तरी आशुतोष सारखा परदेशात राहून आलेला उच्चशिक्षित, चिंतनशील तरुण कृतीशील होऊन आपल्या सभोवतालालकडे डोळसपणे बघतो आहे, त्याच्या क्षमतांनुसार प्रत्यक्ष काम करतो आहे हे खूप स्वागतार्ह आहे. त्याच्या कामासाठी खूप शुभेच्छा. त्याचा आयुष्याचा प्रवास सुखकर आणि यशस्वी होवो. आणि त्या प्रवासाचे पुस्तक काही वर्षांनी आपल्याला वाचायला मिळो ही सदिच्छा!!


——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

तिमिरपंथी (Timirapanthi)


पुस्तक - तिमिरपंथी (Timirapanthi)
लेखक - ध्रुव भट्ट (Dhruv Bhatt)
अनुवाद - सुषमा शाळिग्राम (Sushama Shaligram)
भाषा - मराठी (Marathi)
मूळ पुस्तक - तिमिरपंथी 
(Timirapanthi)
मूळ पुस्तकाची भाषा - गुजराती
प्रकाशन - मेहता पब्लिशिंग हाऊस 
जुलै २०१८.
ISBN - 9789387789951
छापील किंमत - ३२० रु. 

चोरीच्या दरोड्याच्या बातम्या ऐकल्या की आपल्याला त्या चोरांचा राग येतो.
 दरोडेखरांची भीती वाटते. पोलिसांनी त्वरित कारवाई करून त्यांना पकडावं फटकवावं, अशी जबरदस्त शिक्षा करावी की पुन्हा कधी कोणी चोरी करू नये. असं मनात येतं. पोलीस चोरांना पकडतातही. मुद्देमाल काही वेळा परत मिळतो. पण चोरीच्या घटना मात्र थांबत नाहीत. उलट प्रत्येक वेळी चोरी करण्याचं तंत्र प्रगत होत जातं आणि चोर पोलिसांचा खेळ रंगतच जातो. हा खेळ आजचा नाही तर अनादी कालापासून चालत आलेला आहे. भारतीय समाजव्यवस्थेत जिथे एक काम म्हणजे एक जात/समाज अशी वर्गवारी झाली. तिथे चोरी हे सुद्धा एक काम आहे, एक हस्तकला आहे आणि ती वापरून उपजीविका चालवणे हे सुद्धा योग्यच आहे असे मानणारा एक समाज निर्माण झाला. अशाच समाजाची कहाणी म्हणजे "तिमिरपंथी" हे पुस्तक.

चोरी करणं, दरोडा घालणं याचेही वेगवेगळे प्रकार आहेत. लोकांच्या घरात शिरून चोरी करणे, शेतातले धान्य चोरणे, लोकांची गायईगुरे चोरणे, वाटसरूचे दागिने पैसे लुटणे, दुकान किंवा सावकारी पेढ्यांवर दरोडा घालून माल लुटणे असे कितीतरी प्रकार. गंमत म्हणजे ह्या प्रत्येक प्रकाराने चोरी करणारे लोक हे पुन्हा या चोरांच्या उपजाती. म्हणजे एका उपजातीत फक्त घरात आणि शेतीत चोरी करून धान्य चोरणार. पैशांना हात लावणार नाही. स्वतःच्या आवश्यकते पुरतंच वस्तू चोरणार जास्ती चोरणार नाही. फक्त रात्री चोरी करणार दिवसाढवळ्या चोरी करणार नाहीत. अशा एका "अडोडीया" नावाच्या उपजातीतल्या एका कुटुंबावर आधारित तिमिरपंथी ही कादंबरी आहे. ब्रिटिश काळातला किंवा स्वातंत्र्य मिळाल्यावरच्या पहिल्या काही वर्षातला काळ ह्यात आहे. गुजरात राजस्थानचा परिसर आहे.

"सती" या मुलीच्या लहानपणापासून ती थोडी मध्यमवयीन होईपर्यंतच्या घटना यात आहेत. सतीच्या आजीच्या तोंडून आधीच्या काळातले किस्से, चोरीच्या घटना सतीपर्यंत आणि वाचकांपर्यंत पोहोचतात. सतीच्या स्वतःच्या चोरीच्या सहसामधून समकालीन चोरीच्या गोष्टी कळतात. चोरीची कला एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कशी सुपूर्त होते हे पण दिसतं.

या जाती भटक्या-विमुक्त म्हणाव्या अशा. त्यांचा तांडा आज एका गावात तर उद्या दुसऱ्या गावात, काही दिवसांनी पुढच्या गावात असा सतत फिरत असे. गावाच्या बाहेर राहायचं वेगवेगळ्या रूपात गावात फिरायचं. कधी विक्रेता म्हणून; कधी सुरीला धार लावणारा म्हणून किंवा काही काम काढून. फेरफटका मारताना सावज हेरून ठेवायचं आणि मग रात्रीच्या अंधारात कार्यभाग उरकायचा. लोकांना कळायच्या आत तांडा दुसरीकडे गेलेला. लोकांना संशय आलाच तरी लोक तांड्याकडे वळेपर्यंत चोरलेल्या वस्तू बाजारात कुठेतरी विकल्या जाणार. सोनं वितळवलं जाणार. मुद्देमालाचा मागमूसही राहणार नाही इतकी सफाई.

ब्रिटिशांनी अशा जातींना ओळखून त्यांना गावाच्या बाहेर कुंपणाच्या आत स्वतंत्र वस्ती अर्थात सेटलमेंट मध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या सेटलमेंट मध्ये राहायचं आणि रोज सकाळ संध्याकाळी पोलीस स्टेशनवर हजेरी लावायची.  जेणेकरून कोणी चोरी करून फरार झाला नाहीये हे स्पष्ट व्हावे. तरीसुद्धा गावात चोरी झाली तर पोलीस येऊन या सेटलमेंट मधल्या लोकांना पकडून बेदम मारून चौकशी करायचे. सतीचे कुटुंबीय अशा सेटलमेंट मध्ये नव्हते. अजूनही गावोगावी तांडा घेऊन भटकतच होते पण त्यांचे काही नातेवाईक मात्र सेटलमेंट मध्ये राहत होते. सतीपण लग्नानंतर सेटलमेंट मध्ये राहायला लागते. त्यामुळे या कादंबरीत तांड्यातलं आणि सेटलमेंटमधलं दोन्हीकडचं आयुष्य आपल्यासमोर उभं राहतं.

लेखक मनोगतात म्हणतो
"नगरात वस्त्यांवर पाड्या-तांड्यात राहणाऱ्या कित्येकांना भेटून मी त्यांच्या कहाण्या ऐकल्या. ज्या काळातल्या गोष्टी मला कळत गेल्या त्या काळाप्रमाणेच या लिखाणातही वेगवेगळ्या काळाचा समावेश आहे. अगदी अलीकडचा उल्लेख १९९३ च्या जवळपासचा थोडा पुढे मागे आहे. त्यानंतर कथा आजच्या घडी पर्यंत आणण्याचा प्रयत्न मी केला नाही. नवलाची गोष्ट अशी की ज्यावेळी ज्या कोणापाशी आजच्या काळाचा विषय निघाला त्या प्रत्येकाने मला एकच विचारलं "अब तो विद्या कडे? - आज आता विद्या कुठे आहे"

चोरी करणे यात काही पाप नाही. जसं जंगलामध्ये वाघ- सिंह हरिण, ससे यांची शिकार करतात त्याप्रमाणे आपण चोर सुद्धा आपली कला वापरून दुसऱ्याकडचं सामान चोरतो. त्यात त्याला त्रास द्यायचा उद्देश नसतो. पण हेच आपलं पारंपारिक काम आहे. अशी निखळ भावना त्यांच्या मनात दृढ आहे . जातीचे स्वतःचे काही नीतिनियमही आहेत. चित्रपटात म्हणतात तसं "बेईमानी का काम इमानदारी से करनेका". गावातलं सावज ज्याने हेरलं आहे त्याला म्हणायचं या कामातला "मालक". त्याने या कामासाठी लोक निवडायचे. चोरी कधी, कुठे, कशी करायची हे सगळं मालक ठरवणार. बाकीच्यांनी फक्त त्याबरहुकूम काम करायचं. चोरीच्या ऐवजातला मुख्य वाटा मालकाला मिळणार. घेतलेल्या जोखमीच्या प्रमाणत भागीदारांना वाटा मिळणार. चोरीबद्दल कोणी कुणाला सांगायचं नाही. ना आपल्या मित्रमंडळीत ना आपल्या घरी. ना त्याची कोणी चौकशी करायची. सगळा मामला गुप्ततेवर आणि परस्पर विश्वासावर अवलंबून.

पण... चोरी करता करताना लोकांना जाग आली आणि लोकांनी पकडलं तर मात्र बेदम मारहाण. संतापाच्या भरात केलेल्या मारहाणीत चोराचा जीवही जायचा. या भीतीमुळेच सतत सावध राहावं लागतं आणि लोकांची चाहूल लागली तर काम अर्धवट टाकून पळावं लागतं. सतीची आजी "नानकी" आणि तिच्या आजूबाजूच्या बायका यांच्या संवादातून असे घडलेले किस्से सतीला कळतात आणि त्यातून चोराने कसं वागलं पाहिजे; काय केले पाहिजे; काय नाही केलं पाहिजे याचे "सुसंस्कार" तिच्यावर होत असतात. तिच्यातली चोर घडत असते.. नव्हे नव्हे चोर नव्हे... कलाकार !!

सेटलमेंट चा कायदा, नव्याने होता असलेला शिक्षणाचा प्रसार ह्यामुळे सतीच्या मनातही आपल्या वस्तीतल्या मुलांनी शिकावं, काही वेगळा काम धंदा शिकावा अशी इच्छा मनात उमटू लागते. पण वंशपरंपरेने चोरी करणाऱ्या या लोकांवर बाहेरच्या समाजाचा सहज विश्वास बसत नाही आणि कितीही प्रयत्न केला तरी चोरीचा शिक्का पुसला जात नाही याची जाणीवही तिला होत असते. तर दुसरीकडे; हा शिक्का पुसण्याची तयारी तिच्याच समाजात नसते. "चोरी सोडून पुस्तकं शिकणं, दुसरं काम करणं म्हणजे आपण आपल्या पूर्वजांनी केलेल्या कलेचा कामाचा अपमान करतो आहोत; आपल्या मुलांनी आपली कलाच चालवली पाहिजे" हे त्यांचं म्हणणं असतं. हेही वास्तव पुस्तकात दिसतं.

पुस्तकामध्ये चोरांच्या प्रकारांचे, त्यांच्या "विद्ये"बद्दलचे संस्कृत शब्द पण दिले आहेत. काही वाक्य बघा.

... सती स्वतः "मालक" होती विठ्ठल केवळ 'वटाविक' ( भागीदार चोर) होता.
... शास्त्रात सुद्धा हेच सांगितले की ' त्रप'ने (स्वतःच्या निष्काळाचीपणामुळे अचानक अडचणीत सापडलेला चोर) कुठेही थांबायचं नसतं.
... शिवाय आत शिरलेला 'कुसुमाल'(फुलांसारखी लोभस वस्तू चोरणारा) आपला कार्यभाग साधत असतो.
... तायु (चोर)
.. लट (लांडीलाबडी करून लुटणारा)
... कसबी वर्गानुनं(चोरांनं) ही कला साध्य केली असेल, नाही असं नाही. पण खिसेकापू म्हणवणारा प्रत्येक पटच्चर (सार्वजनिक जागी लुटणारा) खिसा कापतो हे खोटं.
आयुर्वेद, धनुर्वेद ह्या सारखा कुठला "चौर्यवेद" ग्रंथ आहे ज्यातून हे शब्द घेतले आहेत कल्पना नाही.

आता काही पानं उदाहरणादाखल वाचा.
पुस्तकात दिलेली लेखकाची माहिती 


कुठल्या जातीच्या घरी चोरताना कशी काळजी घ्यावी याबद्दलचं लोकगीत

एका दरोड्याची तयारी आणि तो करता करता जुना एक किस्सा.


सती पोलिसांशी भांडून आली, मुलांना शिकवायचं म्हणतेय..त्यावर जात पंचायतीत चर्चा


पुस्तकाची निवेदन शैली म्हणजे फक्त किश्श्यांची जंत्री नाही तर एक सलग कथानक आहे. सतीच्या आयुष्यातला प्रसंग आणि त्या प्रसंगाच्या वेळी झालेल्या बोलण्यातून भूतकाळातल्या घटना कळतात. मग पुन्हा आत्ताची घटना व पुन्हा मागे. असा काळ पुढे मागे सरकत राहतो. पुस्तक वाचताना आपण चोरांच्या बाजूचे होतो.. आता हे "कलाकार" कशी "कला" दाखवतात याची उत्सुकता आपल्याला लागते. ते यशस्वी व्हावेत, मारहाण न होता त्यांना पळता यावं अशी आपली इच्छा होते ह्याची गंमत वाटते. रहस्यकथा, गुन्हेगारी कथा, पोलीसकथा ह्यांपेक्षा पुस्तकाचा बाज वेगळा आहे हे लक्षात आलं असेलच. म्हणून हे पुस्तक म्हणजे "जावे चोरांचीया वंशा तेव्हा कळे" असा अनुभव देणारं आहे. 


——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

काकांचे स्वप्न (Kakanche Swapn)



पुस्तक - काकांचे स्वप्न (Kakanche Swapn)
भाषा - मराठी (Marathi)
मूळ पुस्तक - द्यादुश्किन सोन (Dyadushkin son)
मूळ लेखक - फ्योदर दस्तयेवस्की (Fyodor Dostoevsky )
मूळ पुस्तकाची भाषा - रशियन (Russian)
अनुवाद - अविनाश बिनीवाले (Avinash Biniwale)
पाने - २०३
प्रकाशन - काँटिनेंटल प्रकाशन १९८७. दुसरी आवृत्ती २०१३
छापील किंमत - रु. १७५/-
ISBN - दिलेला नाही

फ्योदर दस्तयेवस्की - ज्याचा बहुतेक वेळा उल्लेख डोटोव्हस्की असाही केला जातो - हा गाजलेला रशियन लेखक, कादंबरीकार. त्याची कादंबरी थेट रशियन भाषेतून मराठीत आणण्याचं मोठं काम श्री. अविनाश बिनीवाले ह्यांनी केलं आहे. विशेष म्हणजे ह्या पुस्तकाची प्रत थेट त्यांच्याकडून मला भेट म्हणून मिळाली ही अजून आनंदाची गोष्ट.

कादंबरीचे कथानक १९व्या शतकातल्या रशियातल्या समाजात घडणारे आहे. मुख्य शहरांपासून दूर एका छोट्या गावात घटना घडतात. मोठमोठ्या जमिनी असणारे जमीनदार, त्यांच्या शेतात राबण्यासाठी शेकडो गुलाम आणि त्यातून मिळणारे उत्पन्न पिढीजात वाढत जाऊन जणू अतिश्रीमंत स्थानिक राजेच झालेले लोक तेव्हा होते. असेच एक व्यक्तिमत्त्व इथे नायक आहेत; ते म्हणजे "प्रिन्स". आता उतारवयाला लागलेले, केस-डोळे-पाय-कान ह्या सगळ्यातला जोम गेलेला. पण खोट्या केसांपासून खोट्या लाकडी पायांपर्यंत सगळं वापरून अजून आपण उत्साही तरुण आहोत असं दाखवणारी ही वल्ली आहे. ऐकू कमी येतंय म्हणून मोघम काहीतरी बोलून हो हो करायचं, खोटं हसायचं. तरुणपणी केलेल्या आणि ना केलेल्या पराक्रमांच्या गोष्टी लोकांना ऐकवत राहायचं अशी विनोदी वल्ली.

ह्या म्हातारबुवांची काळजी करतोय हे दाखवण्याची चढाओढ त्यांच्या जवळच्या नातेवाईकांमध्ये आणि त्यांच्याशी संबंध येणाऱ्या इतर लोकांमध्ये सुद्धा आहे. सगळ्यांचा डोळा प्रिन्सच्या संपत्तीवर आहे. तर काही नातेवाईक त्याला आता असहाय्य, डोक्यावर परिणाम झालेला म्हातारा असं दाखवून संपत्तीचा सांभाळ ते करू शकत नाहीत असं दाखवून संपत्ती हडप करायचा प्रयत्न सुद्धा करतायत.

तर असे हे प्रिन्स प्रवास करता करता एका गावात येतात. बऱ्याच वर्षानंतर त्या गावात त्यांचं येणं होतं त्यामुळे त्या गावातले, त्यातल्या त्यात प्रतिष्ठित, मोठी घर असणारे लोक प्रिन्सचे स्वागत आपल्याला करायला मिळो; त्यांच्याशी सलगी वाढायला मिळो आणि त्यातून काहीतरी फायदा आपल्याला मिळो अशा लोभाने हुरळून जातात. प्रिन्स बरोबर त्यांच्या लांबच्या नात्यातला एक पुतण्या -मझग्ल्यागोफ - सुद्धा असतो जो याच गावात राहत असतो. या गावातल्या जहांबाज बाई मार्या ची मुलगी झिना वर तो प्रेम करत असतो. एकतर्फी प्रेमच. हा पुतण्या आपल्या काकाला मार्याच्या घरी घेऊन येतो. मार्या ही संधी साधून प्रिन्सचं आपल्या मुलीवर लक्ष जावं, त्यांनी तिच्याशी लग्न करावं असा बेत रचते. पण म्हाताऱ्या माणसाशी लग्न करायला झिना कशी तयार होणार? त्यामुळे मार्या तिला वेगवेगळ्या मार्गाने पटवायचा प्रयत्न करते. "त्याच्याशी लग्न कर आणि राणी सारखी रहा. थोडेच दिवसात तो मरून गेला की तू पुन्हा तुझ्या आवडत्या माणसाशी लग्न कर" असं आमीष दाखवते आणि बरीच वेगळी वेगळी कारण तिला देते. झिनाच्या मनात अजून पहिला प्रियकर असतो; ज्याच्याबरोबर लग्न करणं घरच्यांच्या विरोधामुळे शक्य झालेलं नसतं. मर्याचा डाव मझग्ल्यागोफला कळल्यावर तोही अस्वस्थ होतो; तर मार्या त्याला उलटसुलट सांगून त्यालाही घोळात घेते. पण झिना आपल्या हातून जाणार की काय असं त्याला वाटत राहतं. नोकर मंडळींकडून जेव्हा गावातल्या इतर बायकांना ही गोष्ट कळते तेव्हा काही अस्वस्थ होतात कारण प्रिन्स आपल्या हातून जाणार की काय असं त्यांना वाटतं. त्याची ही गोष्ट.

मार्या, झिना, पुतण्या इतर बायका ह्यांचा एकेमकांशी बोलत बोलत कसा शह-काटशह देतात ; त्यांच्या वागण्याचा-बोलण्याचा फार्स हा या कादंबरीचा मुख्य भाग आहे एकूण कथानक खूप विनोदी नाही पण हलकफुलक आहे. काही वेळा प्रसंग गमतीशीर आहेत तर काही वेळा ते जरा ओढून काढून आणल्यासारखे वाटतात. एकूण संवादाची भाषा खूपच नाटकी आहे पूर्वीच्या मराठी नाटकांमध्ये जसे नाटकी संवाद होते तशीच परिस्थिती पूर्वी रशियन कथानगांमध्येही रशियन कथनशैलीमध्येही असावं असं दिसतंय. पात्रांचं गुपित गोष्टी पण मोठयाने बोलणं आणि दुसऱ्याच्या कानावर पडणं, एखाद्या पात्राने घरातच लपून राहून प्रसंग ऐकणं असले प्रसंग आहेत. चक्रम-विसराळू-गोंधळलेला म्हातारा आहेच जोडीला. प्रिन्स, मझग्ल्यागोफ, मार्या, झिना, मार्याचा नवरा, झिनाचा पहिला प्रियकर ही पात्र चांगली रंगवली आहेत. मार्याचे संवाद छान आहेत. त्यामुळे आपण सहज पुढे पुढे वाचत राहतो. कादंबरीच्या शेवटी सगळ्यांचेच डावपेच फसल्यावरती पुढे काय झालं हे लेखकाने उपसंहार पद्धतीने सांगितलं आहे.

काही पाने उदाहरणादाखल

प्रिन्सचं वर्णन




मार्याचा झिनाला पटवायचा प्रयत्न



गावातल्या बायका मार्याचा डाव हाणून पाडण्यासाठी तिच्या घरीच ठिय्या मारतात तेव्हा



अविनाश बिनीवाले ह्यांनी अनुवादाला पूर्ण न्याय दिला आहे. व्यक्तींची आणि जागांची रशियन नावे सोडल्यास सगळं मराठी आहे आणि मराठमोळं आहे. म्हणी, वाक्प्रचार ह्यांच्या वापरातून सहज संवादी अनुवाद झाला आहे. त्यामुळे रशियन वातावरण आणि मराठी निवेदन हातात हात घालून जातं. त्यामुळेच पुस्तक वाचनीय झालं आहे. जर भाषांतर बोजड झालं असतं तर वाचण्यातला रस फार लवकर निघून गेला असता.


ही कादंबरी वाचताना २०० वर्षांपूर्वीचा रशिया, तेव्हाची परिस्थिती, लोक कसे विचार करत होते, लग्न संस्थेकडे बघण्याचा रशियन दृष्टिकोन इ. आपल्याला कळतं त्यामुळे रंजक कथानकाच्या ओढीपेक्षा या पैलूंची माहितीसाठी पुस्तक वाचता येईल. एका प्रथितयश कादंबरीकाराची कादंबरी कशी होती, तेव्हा कादंबरीची शैली कशी असायची हे आपल्याला कळेल.

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

अनुभाषिते (Anubhashite)



पुस्तक - अनुभाषिते (Anubhashite)
लेखिका - मंजिरी धामणकर (Manjiri Dhamankar)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १४८
प्रकाशन - अल्टिमेट असोसिएट्स. मी २०२५
छापील किंमत - रु. २५०/-
ISBN - 978-93-91763-61-9

भारताची प्राचीन भाषा संस्कृत अतिशय समृद्ध आहे. वेद-उपनिषदे, रामायण, महाभारत, आयुर्वेद, काव्य, अर्थशास्त्र, स्थापत्यशात्र अशा हजारो ग्रंथांनी आपले पारंपरिक ज्ञान जतन केले आहे. मोठमोठी काव्ये आणि ग्रंथ जसे प्रसिद्ध आहेत तसा अजून एक प्रकार लोकप्रिय आहे तो म्हणजे "सुभाषित". एक मोठा आशय, संदेश, आयुष्याबद्दल मार्गदर्शन करणारा दोन किंवा चार ओळींच्या श्लोक म्हणजे सुभाषित असं ढोबळमानाने म्हणता येईल. वेगवेगळ्या उपमा देऊन मुद्दा स्पष्ट करणे, शब्द-अक्षरं ह्यांच्या पुनरुक्तीतून नादमाधुर्य साधणे, दोन ओळींची शेवटची अक्षरे समान ठेवणे (यमक जुळवणे) अशा नाना प्रकारांनी ही सुभाषिते आपल्यापर्यंत ज्ञान व भाषासौंदर्य पोचवतात. ज्यांनी शाळेत संस्कृतचा थोडा अभ्यास केला असेल त्यांना ही सुभाषिते थोडी आठवत असतील. अजूनही काही पाठ असतील. म्हणी, वाक्प्रचारांप्रमाणे सहज बोलता बोलता सुभाषितांचा वापरही कोणी करत असेल. काहीवेळा तर चारपाच शब्दांची एखादी संस्कृत ओळ आपण म्हणीसारखी वापरतो. पण ती ओळ एका श्लोकाचा - सुभाषिताचा - भाग आहे हे आपल्या लक्षात येत नाही. "अतिपरिचयादवज्ञा", "बादरायण संबंध", "वसुधैव कुटुंबकम्" हे ऐकल्यासारखं वाटतंय ना? हे शब्द सुभाषितांचे भाग आहेत. त्यामुळे सुभाषिते वाचणे व ती आचरणात आणणे हे प्रत्येकासाठी उपयुक्त आहे. सुभाषितांच्या शब्दांचा, रचेनचा आस्वाद घेत 
ती वाचली तर गंमत अजूनच वेगळी. परीक्षेच्या दडपणाखाली पाठांतर केलं असेलही आणि आता विसरालाही असाल. पण आता निखळ आनंदासाठी सुभाषितं वाचून बघा, समजून बघा, पाठ करून बघा. त्यासाठी वाचा हे पुस्तक "अनुभाषिते".

लेखिका मंजिरी धामणकर ह्यांनी आपल्यासाठी उत्तमोत्तम सुभाषिते निवडून त्यांचा मराठीत अर्थ दिला आहे. त्याचबरोबर मराठीतही श्लोक स्वरूपात त्याचं भाषांतर दिलं आहे. त्या सुभाषिताची गंमत, शब्दांचं वेगळेपण सांगितलं आहे. आणि हे सगळं निवेदन लेखिका आपल्याशी संवाद साधते आहे अशा पद्धतीने लिहिलं आहे. त्यामुळे तुम्हाला संस्कृत भाषा येत असो वा नसो, तुम्हाला ह्या पुस्तकाचा आनंद घेता येईल.

पुस्तकात २८ प्रकरणे आहेत. एकेक विषय घेऊन त्या त्या विषयांशी संबंधित सुभाषिते दिली आहेत. त्यामुळे आपल्या पूर्वजांनी एक संदेश किती वेगवेगळ्याप्रकारे आपल्याला सांगितला आहे हे समजतं. तर काही वेळा काही शब्द, उपमा, साहित्यिक संकेत पुन्हापुन्हा येतात तेव्हा त्या सगळ्या गोष्टी पूर्वी किती रूढ झाल्या होत्या हे ही जाणवतं. सुभाषितांचा संदेश गांभीर्याने घ्यायचा असला तरी ते सांगताना काही वेळा विनोदी शैली सुद्धा दिसते. त्यासाठी मूर्खांची लक्षणे बघण्यासारखी आहेत.

काही पाने उदाहरणादाख
ल...

अनुक्रमणिका


मित्र ह्या विषयी सुभाषित


कधी बोलावं आणि कधी बोलू नये हे "कोकिळेला" सांगणारी सुभाषितं.. "लेकी बोले सुने" लागे ह्या न्यायाने आपल्यालाच सांगतायत.


प्रहेलिका अर्थात कोडी सुद्धा आहेत.


पुढची लक्षणे आणि स्वतःचे वागणे ताडून बघूया. काही साम्य आढळलं तर "सावर रे !"


वरील उदाहरणे वाचून ही सुभाषितं किती अर्थगर्भ आहेत, लेखिकेने त्याचा अर्थ कसा थोडक्या आणि सोप्या शब्दांत सांगितला आहे हे लक्षात आलं असेलच. मराठीतले श्लोक सुद्धा मराठीतली सुभाषितेच झाली आहेत. त्यामुळे "अनुभाषिते" हे नाव सार्थ आहे.

भाषा हा माझ्या आवडीचा विषय असल्यामुळे पुस्तक मला आवडलेच. लेखिका मंजिरीताई आणि मी एकाच "पुस्तकप्रेमी" नावाच्या व्हॉट्सअप आधारित साहित्यिक चळवळीचे सदस्य आहोत. आणि ह्या समूहाच्या संमेलनात पुस्तकाचे अनौपचारिक प्रकाशन काही सदस्यांच्या हस्ते झाले त्यातला मी एक होतो. त्यामुळे पुस्तक अधिकच जवळचे झाले. 
पुस्तकाचे औपचारिक प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले त्यालाही मी उपस्थित होतो.

तर असे हे पुस्तक लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना वाचनीय आणि आचरणीय आहे. संग्राह्य आहे.



——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

तौलनिक लोकमान्य (Taulanik Lokamany)

पुस्तक - तौलनिक लोकमान्य (Taulanik Lokamany) लेखक - चंद्रशेखर टिळक (Chandrashekhar Tilak) भाषा - मराठी (Marathi) पाने - १२८ प्रकाशन - भाग्य...