चार्वाक (Charvak)




पुस्तक - चार्वाक (Charvak)
लेखक - सुरेश द्वादशीवार (Suresh Dwadashiwar)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १३२
प्रकाशन - साधना प्रकाशन मार्च २०२१
छापील किंमत २००/- रुपये
ISBN - 978-93-92962-21-9  

पुणे पुस्तक महोत्सवात खूप वेगवेगळ्या विषयांवरची, वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं बघायला मिळत होती. अशाच एका स्टॉलवर लक्ष गेलं या पुस्तकाकडे - "
चार्वाक"हा विषय कमी वाचनात आलेला म्हणून पुस्तक लगेच विकत घेतलं. 

चार्वाक म्हटलं की हा श्लोक आठवतो
यावज्जीवेत सुखं जीवे ऋणं कृत्वा घृतं पिबेत, भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः ||
अर्थात जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत मजेत जगा. कर्ज काढून तूप प्या (चैन करा). मेल्यानंतर देहाची राख होणार आहे. मग कुठला पुनर्जन्म आणि कशाची चैन?  असे चार्वाकाचे सांगणे आहे असे वाचण्यात येते. 
चार्वाक नास्तिकमत मांडणारा आहे. या देहाचे सुख, आत्ताच्या जगातलं सुख हे महत्त्वाचं आहे. पूर्वजन्म, पुनर्जन्म, ईश्वर यांची पर्वा न करता जगायला सांगणारा अशी साधारण समाजातली समजूत आहे. तशीच माझीही आहे. तरीही भारतीय तत्त्वज्ञानातले द्वैत- अद्वैत, आस्तिक - नास्तिक, सांख्य , योग असे वेगवेगळे मतप्रवाह मांडताना चार्वाकांचं नावही नेहमी येतं. त्यामुळे या महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वाचं अजून योगदान काय आहे; त्याचे तत्वज्ञान अजून काय आहे हे समजून घेण्याची मला उत्सुकता वाटली. पुस्तकाचा पाठ मजकूर बघितला तर त्यात असा उल्लेख आहे की "चार्वाकांचा एकही ग्रंथ सध्या संशोधकांना सापडलेला नाही. त्यांची परंपरा समजली नाही की तिचे अवशेषही हाती लागले नाहीत". आता मला गंमत वाटली की, काहीच उपलब्ध नसताना लेखकाने १२० पाने काय बरं मजकूर लिहिला असेल? त्याने स्वतः संशोधन करून आत्तापर्यंत न सापडलेलं काही शोधून काढलं की काय? म्हणून उत्सुकतेने पुस्तक विकत घेतलं.

पुस्तकाचं सांगणं असं आहे की... चार्वाक बुद्धीप्रामाण्य मानणारे होते. प्रत्यक्ष अनुभव, प्रमाण, अनुमान, तर्क यातून जे ज्ञान मिळतं तेच खरं. त्याहून वेगळं कोणी सांगत असेल तर त्या फक्त कल्पनाच. ईश्वर सृष्टीचा निर्माता, स्वर्ग-नरक, पूर्वजन्म, पुनर्जन्म, या गोष्टी कोणीही न पाहिलेल्या प्रत्यक्ष न अनुभवलेल्या. त्या खऱ्या नाहीत. मोक्ष, ब्रह्म, आत्मा वगैरे भानगड पण काही खरी नाही. "जग खोटं आहे आणि ब्रम्ह सत्य आहे" असं मानण्यात काही हशील नाही. उलट हे जगच खरं आहे. तेच समजून घेतलं पाहिजे. या जगात सुखी होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशी चार्वाकांची विचारसरणी आहे. "
ऋणं कृत्वा घृतं पिबेत" हा मूळ चार्वाकांचा श्लोक नसून त्यांच्यावर टीका करण्यासाठी त्यांना भोगीविलासी ठरवण्यासाठी नंतरच्या लोकांनी त्यांच्या श्लोकाचा असा विपर्यास केला आहे. 

लेखकाचं म्हणणं असं आहे की हजारो वर्ष चालत आलेली वैदिक परंपरा स्थिरस्थावर होण्याच्या आधी सुद्धा चार्वाकमत अस्तित्वात होतं. त्याला "लोकायत" मत असं म्हटलं जायचं. पण पुढे वैदिक संस्कृती असो, बौद्ध धर्म असो की जैनधर्म; प्रत्येक पंथाला आपापल्या श्रद्धा अत्यावश्यक वाटत होत्या. त्यांनी चार्वाकांना वैचारिक हद्दपार केलं. समाजाला खोट्या संकल्पनांच्या नादी लावलं. ईश्वर न मानणारे गौतम बुद्ध सुद्धा त्यांच्या शिष्यांना चार्वाकाचे ग्रंथ वाचू नका, त्याचा उपदेश ऐकू नका असा संदेश देतात. पाश्चात्य धर्मांना कदाचित चार्वाक हे नाव माहिती नसेल. पण पाश्चात्य धर्म सुद्धा - मी म्हणतो तेच सत्य; मी म्हणतो त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवा - अशीच आज्ञा देतात
. धर्माला प्रश्न विचारणारे वैज्ञानिक, बायबल मधलं ज्ञान खोटं आहे असं सांगणारे समाजसुधारक यांना ग्रीक व रोमन लोकांनी विरोधच केला. थोडक्यात तिकडेही चार्वाकवृत्तीला वैचारिकतेतून हद्दपार करण्यात आले होते.

पूर्वीच्या काळी पाऊस, वारा, सूर्य ह्यांना देव म्हणून पूजलं जायचं मग ईश्वर या संकल्पनेचा विकास झाला. प्रतीकं  आली मूर्ती आल्या वगैरे गोष्टी मांडल्या आहेत. माणूस भीतीपोटी किंवा अजून लाभ व्हावा यासाठी स्वतःच्या कल्पनेतून प्रथा, परंपरा, पूजा तयार केला. अस्तित्वात नसणाऱ्या देवाला मागणीपत्रे पाठवण्याचा खटाटोप ह्याहून जास्त त्याला अर्थ नाही. संतमहात्म्यांचा उद्देश उदात्त असला तरी उपदेश मात्र लोकांना भोळसट बनवणारा आहे. 

पुस्तकाच्या प्रतिपादनाचा हा मूलाधार आहे. हाच मुद्दा पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या पैलूंनी सांगितलेला आहे. या पुस्तकात पंधरा लेख आहेत. अनुक्रमणिकेवरती एक नजर टाकली की त्यांचे विषय कळतील.


हे पुस्तक वाचायला घेताना माझी अपेक्षा अशी होती की चार्वाकांचा काळ, आयुष्य, कार्य, विचारसरणी, त्यांची परंपरा, विचारपद्धतीचे वेगवेगळे पैलू या सगळ्याबद्दल माहिती मिळेल. पण पुस्तकाने साफ निराशा केली. वर म्हटल्याप्रमाणे चार्वाकांचे ग्रंथ उपलब्ध नाहीयेत आणि ह्या लेखकालाही त्याहून जास्त काही माहिती नाहीये. त्यामुळे पूर्ण पुस्तक वाचून माहितीत फार भर पडत नाही. चार्वाकांबद्दल माहिती नाही तर मग १२० पानं काय लिहिले हा प्रश्न आता तुम्हालाही पडला असेल.

लेखकाचा सगळा भर हे दाखवण्यावर आहे की आजच्या सर्व धर्मांमध्ये भरपूर दोष आहेत. धर्माधर्मांमध्ये संघर्ष चालू आहेत. धार्मिक माणसांमुळे नीती प्रस्थापित झाली आहे असं काही दिसत नाही. धर्मसत्ता, राज्यसत्ता आणि धनसत्ता हे एकत्र येऊन लोकांना मूर्ख बनवण्याचे धंदे चालू आहेत. लोकही त्यामागे इतके वेडे झाले आहेत की वेगळा विचार करणारा माणूस त्यांना नको वाटतो. थोडक्यात आजचे धर्म सर्व वाईट. त्याचा व्यत्यास म्हणून चार्वाकांची परंपरा विचारपद्धती योग्य !! हेच पुन्हा पुन्हा पटवून देण्यासाठी त्यांनी आत्ताच्या धर्मातली वैगुण्ये विशद केली आहेत. थोडक्यात चार्वाकांची उंची दाखवण्याऐवजी प्रस्थापित धर्मांचं खुजेपण दाखवले आहे.

लेखकाने मांडलेले मुद्दे अयोग्य आहेत असं नाही. पण हे मुद्दे काही नवीन नाहीत? "देव दानवा नरे निर्मिले हे मत लोकां कावळू द्या" हे केशवसुतांनी शंभर दीडशे वर्षांपूर्वीच लिहून ठेवलं आहे. युरोपामध्ये झालेला रेनेसांस, भारतामध्ये झालेले प्रबोधनपर्व, समाजसुधारणा आणि आजही चालू असलेल्या सुधारणा यातून प्रत्यही हे मुद्दे पुन्हापुन्हा चर्चिले जातातच. देव आहे की नाही? पुनर्जन्म म्हणावा की नाही? पूजा करावी की नाही? मंदिरे, चर्च मशिदी इत्यादींची गरज आहे का? याबद्दल सतत चर्चा चालू असते. थोडक्यात श्रद्धा का बुद्धीप्रामाण्य हा वाद कायम टिकणार आहे.

लेखकाचं म्हणणं असं आहे की वेदपूर्वकाळात "लोकायत" अर्थात चार्वाकांचे मतच प्रचलित होते. हे वाचून मला असा प्रश्न पडला की ते जर प्रचलित होते तर ईश्वर, श्रद्धा, धर्म यांची गरज माणसाला का पडली? गरज ही शोधाची जननी आहे त्याअर्थी चार्वाकांच्या मतात काय कमतरता होती ज्यामुळे माणसाला ईश्वर, पूजाअर्चना, आराधना यांची निर्मिती करावी लागली? फक्त भारतात नाही तर जगभर. ह्याबद्दल लेखक ताकदीने बोलत नाही. 

अनुभवजन्य ज्ञान महत्त्वाचं आहे हे म्हणणं १००% योग्य. पण एवढं एक वाक्य पुरेस होत नाही ना! डेव्हिल लाईज इन द डिटेल्स. जसजशी लोकसंख्या वाढली, श्रमविभागणी झाली, लोक एकमेकांवर अवलंबून राहू लागले, व्यवहारांची व्याप्ती वाढली तेव्हा समाजाची धारणा करण्यासाठी नियम आले, कायदे आले, नीती- अनीती आली, शिक्षा आल्या, न्याय- अन्याय आला. चार्वाकमतानुसार या सगळ्याची व्यवस्था कशी लावली जाईल याची तपशीलवार मांडणी करण्याची करणे लेखकाने टाळले आहे. समाजव्यवस्था चांगली टिकण्यासाठी, हजारो प्रकारच्या स्वभाव आणि इच्छाआकांक्षा असणाऱ्या माणसांना एकत्र घेऊन समाज टिकवण्यासाठी काय केले पाहिजे याबद्दल पुस्तक पूर्णपणे मौन बाळगतं. 
केवळ चार्वाकमत आधीपासून अस्तित्वात होतं म्हणून ते योग्य महान कसं म्हणणार? फारफार तर ती अप्रगत समाजाची पहिली पायरी होती इतकंच. पुढच्या पायऱ्यांवर जाताना मानवजातीचा पाय थोडा घसरत असेल म्हणून "पहिली पायरीच बरी" असा तर्क प्रतिपादित होतो. 

आज आपण आजूबाजूला बघतो की सगळ्या सुखसोयी असणारी बरीच माणसं सुद्धा मनाने समाधानी व आनंदी नसतात. काहीतरी उणीव राहिली आहे असं त्यांना वाटत असतं. अशावेळी केवळ भौतिक समाधानापेक्षा वेगळं आत्मिक समाधान त्यांना हवं असतं. या सगळ्याचा ताळमेळ चार्वाकमतात कसा घातला जातो हा कळीचा मुद्दा लेखक विचारात घेत नाही.

समाधी ध्यान आणि चार्वाक या प्रकरणात समाधी , मनाची एकाग्रता ह्या बद्दल थोडं लिहिलं आहे. इथे तर प्रत्यक्ष अनुभव आहे. आजपर्यंत कितीतरी योगी मुनींनीसन्यास्यांनी तो घेतलेला आहे. याची उदाहरणे स्वतः लेखकाने दिली आहेत. योगमार्गाचा अवलंब करून कोणीही तो अनुभव घेऊ शकतो. इथे तरी चार्वाक आणि परंपरा यामध्ये विरोधाभास असण्याचे कारण नव्हते. हा अनुभव घेण्याचा प्रयत्न लेखकाने केला का किंवा स्वतःला नास्तिक म्हणणाऱ्यांनी हा अनुभव घेण्याचा प्रयत्न केला का याबद्दल लेखक काही लिहू शकला असता. पण ती निसरडी वाट आहे हे लक्षात येताच; धर्मात असे चमत्कार सांगितले आहेत, चमत्कारांवर विश्वास ठेवू नये बुद्धी वापरावी हीच कॅसेट पुन्हा सुरू होते.

फक्त एक चांगली बाब म्हणजे फक्त हिंदू धर्म किंवा भारतीय धर्म यांच्यावर टीका न करता ख्रिश्चन आणि इस्लाम यांच्या यांची उदाहरणे सुद्धा दिली आहेत. त्यांच्या मधले दोषही दाखवलेले आहेत.
"चार्वाक" या नावाने जरी पुस्तक असलं तरी यातला "चार्वाक" हा शब्द गाळून त्याजागी बुद्धीप्रामाण्य किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन असं म्हटलं असतं तरी या पुस्तकाच्या मजकुरामध्ये काही फरक पडला नसता.

थोडक्यात मला हे पुस्तक आत्ता नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीतल्या प्रचारासारखे वाटले. जोतो उठतो आणि  दुसऱ्या पक्षावर भ्रष्टाचाराचे, गैरव्यवहाराचे आरोप करतो. दुसऱ्याच्या चुकीच्या निर्णयांमुळे बेरोजगारी आणि गरिबी कशी वाढली, प्रदूषण कसं वाढलं हे सगळं सांगतो. पण ह्यावर उपाय म्हणून मी ठोस काय करीन हे सांगत नाहीत. माझ्या उपायांचा फायदातोटा काय, त्याची किंमत किती, दीर्घकाळ टिकण्याची क्षमता किती, त्यासाठी काय त्याग करायला लागेल हे कोणी सांगत नाही. एकदा मला निवडून द्या स्वर्ग तुमच्या समोर. तसंच हे पुस्तक इतरांच्या चुका दाखवत स्वतःची मूठ झाकलेली ठेवत, उज्ज्वल भवितव्याची आशा दाखवतं. जुन्या निवडणूक घोषणेच्या - "न जात पार न पात पार, इंदिराजी की बात पर" च्या धर्तीवर "न जात पार न पात पार, चार्वाकजी की बात पर" !!


——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

शीतपेटीतून जेव्हा जाग येते (Shitpetitun Jevha Jaag Yete)



पुस्तक - शीतपेटीतून जेव्हा जाग येते (Shitpetitun Jevha Jaag Yete)
लेखक - क्षितिज देसाई (Kshitij Desai)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १०४
प्रकाशन - सृजनसंवाद प्रकाशन, सप्टेंबर २०२५
छापील किंमत - २५०/-
ISBN - 978-93-91895-55-6

मराठीतून चांगल्या विज्ञानकथा किंवा कल्पनारंजन(फँटसी) प्रकारचं लेखन इतर साहित्यप्रकारांइतकं मोठ्या प्रमाणावर दिसत नाही. त्यामुळे मराठीत असं लेखन दिसलं तर मी मुद्दामून वाचायचा प्रयत्न करतो. विशेषतः त्यात नवीन लेखकाचं नाव दिसलं तर ह्या लेखकाने काय वेगळे प्रयोग केले असतील ह्याची जास्त उत्सुकता वाटते. त्यामुळे क्षितिज देसाई हे मला अनोळखी नाव आणि त्याचा विज्ञानकथा संग्रह ह्याबद्दल फेसबुक पोस्ट्स बघितल्यावर पुस्तक लगेच विकत घेतले. आवडलेही. पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार कळले की क्षितिज च्या कथा २०११ पासून प्रकाशित होतायत. हा त्याचा दुसरा कथासंग्रह आहे.

पुस्तकात दिलेली लेखकाची माहिती


पुस्तकात नऊ कथा आहेत. भविष्यात विज्ञान - तंत्रज्ञान ह्यांच्या प्रगतीने आपल्या जगण्यात काय बदल घडतील, त्यातून काय नवीन समस्या तयार होतील, त्यावरचे उपाय पण कसे अभिनव असतील ह्याची कल्पना करणाऱ्या ह्या कथा आहेत. रहस्यभेद न करता कथांचे विषय थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो

ब्ल्यूबेरीचं ब्रेसलेट - भविष्यात माणूस इतका प्रगती साधेल की परग्रहांवरही मानवी वस्ती होईल. वस्ती आली की तिचे व्यवस्थापन करणारी व्यवस्था आली. मग आज जशा upsc - mpsc स्पर्धा परीक्षा असतात तशा तेव्हाही mpsc परीक्षा असतील. मात्र "मार्स पब्लिक सर्व्हिस कमिशन". तिची निवडप्रक्रिया सुद्धा आधुनिक. फक्त उमेदवाराची बुद्धीच नाही तर नैतिकता कशी तपासली जाईल, त्यासाठी थेट डोक्यात कसे डोकावतील ह्याची भन्नाट कल्पना.

ओरिगामीचं ओबडधोबड ऑर्किड - परग्रहांवर वस्ती झाली की तिकडे समाजव्यवस्था तयार होणार. त्यापाठोपाठ नव्या व्यवस्थेला विरोध करणारे विरोधक सुद्धा तयार होतील. कदाचित परग्रहवासी अतिरेकी सुद्धा तयार होतील. अशा अतिरेक्यांच्या अंतराळात होणाऱ्या कारवाईला विरोध करण्याची योजना कशी आखली जाते आणि त्यात यंत्रमानव कसे काम करतात याबद्दल ची कथा.

इंडेक्स पेशंट - टाईम ट्रॅव्हल / कालप्रवास अर्थात भूतकाळात परत जाण्याचे तंत्रज्ञान हा सर्व विज्ञान कथांचा एक आवडीचा विषय. या कथेत सरकारी व्यवस्थेला कळतं की एक व्यक्ती कालप्रवास करून भूतकाळात गेली आहे. पण ती व्यक्ती सरकारमान्य किंवा योग्य परवानगी घेऊन गेलेली नाही. मग ती कोण? कशासाठी? हे शोधण्यासाठी सरकारी अधिकारी पण कालप्रवास करून मागे जातात. कालप्रवास अधिक चोर-पोलीस अशी गोष्ट. तिचा शेवट मात्र अगदी अनपेक्षित.

शीतपेटीतून जेव्हा जाग येते - अमर व्हायची इच्छा प्रत्येक माणसालाच असते. समजा तसं होता आलं तर? आपलं शरीर जपून ठेवता आलं आणि आपल्याला हवं तेव्हा भविष्यात पुन्हा जागा होत आलं तर? जाग आल्यावर नव्या काळाशी, नव्या सभोवतालाशी जोडून घ्यावे लागेल. मेंदूमध्ये नवे ज्ञान भरावे लागेल. पण आपली ओळख तर तीच राहील. एक तंत्रज्ञान कंपनी अशी सेवा लोकांना पुरवते आहे. शीतपेटीत लोकांना ठेवते. पण इथे झालं असं की कथानायक शीतपेटीतून उठला आणि त्याला देह मात्र दुसऱ्याच माणसाचा मिळाला. आता पुढे काय?

रोबोनॅप - आज आपल्या प्रत्येकाकडे मोबाईल फोन आहे. ती गरज झाली आहे. भविष्यात यंत्रमानव सुद्धा 
असेच अतिशय कॉमन होतील. प्रत्येक माणसाकडे, घरोघरी यंत्रमानव असतील; आपली काम करून देण्यासाठी, आपलं मनोरंजन करण्यासाठी. जणू आपले ते सहकारीच. तेव्हा गुन्ह्याचं प्रकारही बदलेल. आज मोबाईल चोरीला जातात तसा भविष्यात यंत्रमानव चोरीला गेला तर? आपला सहचर असणारा रोबो किडनॅप (रोबोनॅप) झाला तर?

एआय विरुद्ध विक्रांत - यंत्रमानव कॉमन होतील. सैन्यात सैनिकांच्या बरोबरीने यंत्रमानव काम करतील. मग फितूर म्हणून सुद्धा एखादा यंत्रमानवच सैन्यात घुसला तर? अगदी माणसासारखा दिसणारा वागणारा एआय वापरणारा फितूर यंत्रमानव आला तर ? त्याला ओळखायचं कसं ?

देही देवाचा वास - हातचलाखी आणि विज्ञानातले प्रयोग करून आपण चमत्कार करतो आहेत असे भासवणारा बुवा लोकांना फसवतोय. त्याचा पर्दाफाश करणारी एक तरुणी कशी करते ते वाचा.

बुद्धी विरुद्ध बळ - ह्या कथेतही पुन्हा तंत्रज्ञान वापरून दुसऱ्याची फसवणूक आणि त्याची पोलखोल आहे. पण इथे फसवणूक एक खेळाडू करतोय. कायम जिंकावं म्हणून खुबीने आणि लपूनछपून तंत्रज्ञान वापरतोय.

ह्या नऊ कथा आपल्याला आजच्या काळापासून दूर भविष्यापर्यंत, घरापासून मंगळापर्यंत, बुद्धिबळाच्या पटापासून आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या पटापर्यंत, यंत्रमानवांच्या भावभावनांपासून भविष्यात जाग्या झालेल्या खऱ्याखुऱ्या माणसांच्या भावनांपर्यंत सफर घडवून आणतात. आपण त्या सफरीचा समरसून आनंद घेतो. शेवटच्या दोन कथांमध्ये दाखवलेली फसवणूक कदाचित आजही घडू शकेल असं तंत्रज्ञान आसपास आहे. त्यामुळे कल्पना किती झपाट्याने सत्य होतायत ह्याची जाणीव होते. म्हणून इतर कथांमधले तंत्रज्ञान आत्ता उपलब्ध नसलं तरी या कल्पना शक्यतेच्या टप्प्यात आहेत असं आपल्याला वाटतं. त्यातून या गोष्टी अतर्क्य वाटत नाहीत. खरंच असं होऊ शकतं असा विश्वास वाचकाच्या मनात निर्माण करतात. असं झालं तर काय काय होईल याबद्दल वाचकांनाही विचार प्रवृत्त करतात.

मुख्य कल्पनेच्या गाभ्याप्रमाणेच कथांची लेखनशैलीही दृश्यात्मक आहे. कमीत कमी वर्णनात लेखक परिस्थिती आपल्यासमोर उभी करतो. अनावश्यक वर्णनाचा फापटपसारा मांडलेला नाही. निवेदन व संवाद असं दोन्ही वापरलेलं आहे त्यामुळे कथा एकसुरी होत नाही. योग्य तिथे इंग्रजी व मराठी शब्द वापरून तोही मेळ चांगला साधला आहे. प्रसंगही वेगवान घडतात आणि उत्सुकता शेवटपर्यंत टिकून राहते. एक कथा वाचून झाली की लगेच पुढची वाचायची इच्छा निर्माण होते. एका बैठकीत पुस्तक वाचून संपवलंत तर नवल नाही.

काही पाने उदाहरणे दाखल
माणूस मंगळावर गेला तसा पृथ्वीवरचा भ्रष्टाचारही तिथे पोहोचला तर ?



कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणारा फितूर कसा शोधायचा ?



क्षितिज देसाई २०११ पासून विज्ञानकथालेखन करतो आहे. आता त्याच्या इतर गोष्टी वाचायची उत्सुकता आहे. हे पुस्तक वाचून झाल्यावर त्याच्याशी संपर्क साधला तेव्हा कळलं की तोही मूळचा डोंबिवलीकर आहे. माझा गाववाला! त्यातही आयटी क्षेत्रात काम करणारा. त्यामुळे कौतुक अजूनच वाढले. क्षितिजच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा ! क्षितिजच्या लेखनाने मराठी विज्ञानकथांचे क्षितिज कायम उजळत राहो !!



——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

ऋणानुबंध पूर्वेचा (Runanubandh Purvecha)




पुस्तक - ऋणानुबंध पूर्वेचा (Runanubandh Purvecha)
लेखिका - सुजाता गोखले (Sujata Gokhale)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १४२
प्रकाशन - डॉ. स्मृती निकुंभ - हावळ, सुकर्मयोगी. ऑक्टोबर २०२२
ISBN - 978-81-931362-4-9
छापील किंमत - रु. ३९९/-

जपान देश मला नेहमी आकर्षित करतो. जपानचे फोटो आणि व्हिडीओ बघताना तिथली प्रत्येक गोष्ट किती देखणी वाटते. आखीवरेखीव रस्ते, स्वच्छ इमारती, नीटनेटकी-शिस्तीत प्रवास करणारी माणसे, हिरवी शेते - निळेशार पाणी - प्रदूषण मुक्त हवा, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा आणि तरी पारंपरिक पोशाख आणि देवळे ह्यांचा सहज अस्तित्व, आनंदी आणि कार्यरत वृद्ध ... काय काय लिहावं..किती पहावं..आणि किती किती वाचावं...म्हणून एका पुस्तकप्रदर्शनात हे पुस्तक बघितल्यावर हात आपोआप तिकडे वळले. पुस्तकाचं मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ पण सोपं, ठसठशीत आणि आकर्षक. जपानी किल्ला, साकुरा (चेरी चा बहार), माउंट फुजी आणि प्रवासी स्त्रीची प्रतिमा. पुस्तक बघायला उद्युक्त करणारे.

लेखिका सुजाता गोखले गेली २२ वर्षे विविध स्तरावर जपानी भाषा शिकत आहेत. त्यांनी जपानी भाषेत बी.ए., एम. ए. पण केलं आहे. २००८, २०११, २०१७ आणि २०१९ असा चार वेळा त्या काही आठवडे, काही महिने जपानमध्ये राहिल्या होत्या. तेव्हा स्थानिक लोकांना भेटल्या, होम स्टे मध्ये राहिल्या, त्यांच्या जपानी सहकाऱ्यांबरोबर भरपूर फिरल्या, तिथले वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ खाल्ले, अनवट ठिकाणांनाही भेटी दिल्या. ह्या सगळ्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभवनाचे दिलखुलास वर्णन पुस्तकात आहे.

लेखिकेबद्दल पुस्तकात दिलेली माहिती


नेहमीपेक्षा मोठ्या आकारातले हे पुस्तक आहे (लॉंगबुक / बहुतेक A4 साईज). एकेक ठिकाण, एकेक अनुभव किंवा एकेक भेट ह्यांच्यावर एक किंवा दोन पान असं वर्णनाचं स्वरूप आहे. टोकियो, माउंट फुजी, हिरोशिमा, योकोहामा अशी नेहमीची नावं आहेत. पण बरीच अनवट ठिकाणं आहेत. उदा.
ओमिया - बोन्साय (लघुवृक्षे)चे गाव. दोनदोनशे वर्षे जुनी बोन्सायची झाडे तिथे आहेत. बोन्साय शिकवणारे क्लासेस तिथे आहेत.
ओसाका किल्ला
गिओन - खास झगा, केसांचा मोठा आंबाडा, भरपूर मेकअप अशा बाहुलीसारख्या दिसणाऱ्या जपानी सौंदर्यवती - गेईशा -चे गाव
शिंतो देवळे
समुद्रात बांधलेले कानसाई विमानतळ
हिमेजी किल्ला
कप नूडल्स म्युझियम
इ.

जपानी बुलेट ट्रेन ने प्रवास, गगनचुंबी इमारतीच्या उंचीवरून दर्शन आणि विविध जपानी बागांच्या भेटीचा अनुभव घेतलाच. पण जपानची शाळा, कचरा व्यवस्थापन केंद्र, इकेबाना पुष्परचना वर्ग , हानाबी (फटाक्यांची आतषबाजी), साइतामा गावाच्या मेयरशी भेट, "आंतरराष्ट्रीय मैत्री जत्रा आणि प्रदर्शनात" स्टॉल लावून भारतीय कलात्मक वस्तूंची विक्री हे सगळंही अनुभवलं.

अनुक्रमणिकेवर एक नजर टाकली की लक्षात अजून काय काय आहे हे.



ज्या ठिकाणी गेल्या त्या ठिकाणचे मुख्य वैशिष्ट्य, सौंदर्यस्थळ थोडक्यात सांगितलं आहे. तिथे कसा प्रवास केला, जाता येता काय खाल्लं, आजूबाजूची माणसं कशी दिसली असं सगळं सांगत त्या पुढे पुढे गेल्या आहेत. एकटीने प्रवास करताना झालेली फजिती, अनोळखी पदार्थ चाखताना झालेला अपेक्षाभंग किंवा "खास जपानी स्वभावा"चा फटका सुद्धा त्यांनी मोकळेपणाने सांगितला आहे. त्यामुळे जपानची माहितीपुस्तिका किंवा गंभीर लेखमाला असं न होता लेखिकेच्या आपल्याशी गप्पा होतात. जणू आपण त्यांच्या घरी गेलो आहोत आणि त्या एकेक फोटो दाखवत, "तेव्हा आम्ही इकडे गेलो, आणि मग हे खाल्लं, हे असं असेल असं वाटलंच नव्हतं" असं सांगतायत !

काही पाने उदाहरणादाखल

जपानची शाळा
बोन्साय चे गाव
शिंतो देवळे 

स्थलवर्णन शब्दांत कितीही चांगलं केलं तरी a picture tells a thousand words ह्या उक्तीनुसार फोटो हवेतच. ह्या पुस्तकात भरपूर फोटो आहेत. ते रंगीत आहेत. आणि मोठ्या आकाराचे स्पष्ट आहेत. फोटो देताना काचकूच केली नाहीये हे बघून आनंद झाला. पुस्तकाची परिणामकारकता वाढली आहे. हे फोटो पुस्तकाच्या मध्ये मध्ये काही पाने एकत्र असे दिले आहेत. त्याऐवजी ते वर्णनाच्या सोबतच देता आले असते तर ... (ये दिल मांगे मोअर :) ). किमान फोटो कुठल्या पानावर आहे तो क्रमांक मजकुराच्या मध्ये दिला तरी अजून फायदा होईल. 

हे पुस्तक माहिती, वर्णन, फोटो ह्यांनी भरलेलं आहे. जपानबद्दल बरीच नवी माहिती कळेल. तिथल्या लोकांची विचारपद्धती आणि जीवनपद्धती कळेल. जपानबद्दलचं कुतूहल अजूनच वाढेल. लेखिकेच्या आगामी जपान प्रवासात आपल्यालाही सहप्रवासी होण्याची संधी मिळावी असं वाटायला लागेल. जपान भेटीची संधी मिळेल तेव्हा मिळेल तोपर्यंत हा वाचनानंद चुकवू नका.

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

जो जे वांछील (Jo je vancheel)

पुस्तक - जो जे वांछील (Jo je vancheel)
लेखक - नचिकेत क्षिरे (Nachiket Kshire)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १८८
प्रकाशन - नीम ट्री पब्लिशिंग हाऊस नोव्हेंबर २०२३
छापील किंमत - रु. ३२५/-
ISBN 978-81-957778-2-2

पुणे पुस्तक महोत्सवात प्रकाशक द्वितीय सोनावणे, श्री. गुलाब सपकाळ यांची भेट झाली. तिथेच लेखक नचिकेत क्षिरेही उपस्थित असल्यामुळे त्यांच्याशीही बोलण्याची, ओळख करून घेण्याची संधी मिळाली. तेव्हा दोघांनी मिळून मला हे पुस्तक भेट दिले. त्याबद्दल दोघांचे आभार.




याआधी मी लिहिलेलं पुस्तक परीक्षण हे सुद्धा महोत्सवात घेतलेल्या पुस्तकाबद्दल होतं (https://learnmarathiwithkaushik.com/courses/mazi-janmkhep). त्याचे लेखक रीलस्टार युट्युबर आहेत. तर या पुस्तकाचे लेखक नचिकेत क्षिरे हे पॉडकास्टर आहेत. आजच्या पिढीची समाज माध्यम हाताळणाऱ्या ताज्यादमाच्या लेखकांनी ही माध्यमांच्या भोवती फिरणारी कथानके घेऊन पुस्तकं लिहिली आहेत. हे त्याचं वेगळेपण नक्की आहे.

लेखकाबद्दल पुस्तकात दिलेली माहिती



ही एक कादंबरी आहे. नायक अनिकेत जोशी हा एक पत्रकार आहे. पत्रकारितेची नोकरी बरी चालली आहे. पण त्याच्या मनात महाराष्ट्रातल्या सामाजिक परिस्थितीबद्दल संशोधन करून पुस्तक लिहिण्याची इच्छा आहे. बरीच वर्षे ते स्वप्न तो मनात धरून आहे. पण त्यावर काम मात्र सुरू करायला टाळाटाळ करतो आहे. त्याच्या संसारिक जीवनातही वादळ आलं आहे. त्याचा घटस्फोट झालाय. त्याच्या लहान मुलाचा ताबा त्याच्याकडे आहे. या परिस्थितीमुळे तो गांजला आहे. त्याचा आत्मविश्वास खचला. आपल्या आयुष्याकडे मागे वळून बघताना त्याला स्वतःचे दोषच दिसतायत. भावंडांसारखे आपण परदेशी स्थायिक झालो नाही. मित्रांसारखी भारीभरकम पगाराची नोकरी नाही. अंगात काही खास गुण नाहीत. एखादं ध्येय घेऊन त्याच्या मागे जाण्याची धडाडी नाही. आपण एक अपयशी व्यक्ती आहोत असं त्याच्या मनाने घेतलं आहे.

योगायोगाने कामाच्या निमित्ताने त्याला एका यशस्वी व्यक्तीची मुलाखत घेण्याची संधी मिळते आणि त्यातून स्वतःच्या आयुष्याकडे, स्वतःच्या गुणांकडे बघण्याची नवी उमेद त्याला प्राप्त होते. आपण स्वप्न बघूया, त्याचा ध्यास घेऊया याकडे त्याचा कल होतो. आणि तो कामाला लागतो. पण पुढचा प्रवास अगदी सुखकर व त्याच उत्साहात होतो असं नाही. त्याला स्वतःच्या स्वभावाशी, स्वतःच्या परिस्थितीशी झगडावं लागतं. पुन्हा पुन्हा प्रेरित व्हावं लागतं. तिथेही त्याला मोटिवेशनल स्पीकर/प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांची पॉडकास्ट उपयोगाला येतात. प्रत्येकाकडनं काही ना काही शिकत तो पुढे प्रवास करतो. धडपडत राहतो. कौटुंबिक आयुष्यातही
 एकीकडे त्याला नवा जोडीदार मिळण्याची शक्यता तयार होते. दुसरीकडे जुनी मागे सोडलेली नाती पुन्हा भेटू लागतात. त्यातून नवा मानसिक संघर्ष तयार होतो. कादंबरीत ही प्रेमकथा समांतरपणे चालू राहते.

अनिकेतचं पुस्तक पूर्ण होईल का? झालं तर चांगलं खपेल का? पुढे पुढे तो पुस्तक लिहीत राहील का? त्याला नवा जोडीदार मिळेल का? कोण असेल तो? हे सगळं समजून घेण्यासाठी तुम्हाला पुस्तक वाचावे लागेल.
काही पाने उदाहरणादाखल.

उद्योजक चौगुले यांच्याबरोबर झालेल्या संवादाचा प्रसंग.

त्याची शेजारीण अमृता तिच्याबरोबर सलगी वाढत असते तेव्हाचा एक प्रसंग. आई-वडील, मुलगा, अमृताची इच्छा, स्वतःचं मन अशा सगळ्या गोष्टींची संगती लावायची धडपड


पुस्तकाचे लिखाण करत असताना काही तांत्रिक गडबडीमुळे सगळं लेखनच डिलीट होऊन जातं तेव्हाचा प्रसंग आणि त्यात एका पॉडकास्ट चा उल्लेख


पूर्णपणे खचलेला, निराश झालेला नायक आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करू लागतो याचं भावपूर्ण, संतुलित व पटेल असं चित्रण या कादंबरीत आहे. "मोटिवेशनल स्पीकर्स"चे भाषण ऐकून आलेले "मोटिवेशन" थोडा वेळ जरी टिकलं तरी त्यातून लांब पल्ल्याच्या बदलाची बीजं रुजू शकतात. त्यावर काम करत राहिलं तर बदल घडू शकतो; हे सांगणारं हे पुस्तक आहे. त्याच वेळी स्वतःत बदल केला तरी हमखास यश येईलच असं नाही. परिस्थिती व नशीब यासारखे आपल्या हातात नसणारे घटकही तितकेच महत्त्वाचे असतात हेही आपसूक सुचवलं आहे.
स्वतःला सर्वसामान्य समजणाऱ्या माणसाने असामान्य होण्यासाठी प्रयत्न केले तर चांगलीच गोष्ट आहे. पण किमान त्याने आपल्यात असलेल्या गुणांचा जास्तीत जास्त विकास करत राहावा. अडचणी आल्या तरी न थांबता पुढे पुढे तरी जात राहावे. जमेल तितकी प्रगती करावी असा सकारात्मक दृष्टिकोन देणारं पुस्तक आहे. लेखक पॉडकास्टर असल्यामुळे त्यांनी नायकाच्या आयुष्यात या पॉडकास्टचं महत्त्व दाखवून या माध्यमाकडेही वाचकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.

कादंबरी मधले प्रसंग आपली उत्सुकता टिकून ठेवणारे आहेत. ललित लेखनाच्या माध्यमातून "सेल्फ हेल्प" प्रकारचे ज्ञान असा वेगळा प्रयोग लेखक नचिकेत यांनी केला आहे. वाचकांना तो भावेल असं मला वाटतं.

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

माझी जन्मखेप (Mazi Janmkhep)



पुस्तक - माझी जन्मखेप (Mazi Janmkhep)
लेखक - मनोज शिंगुस्ते (Manoj Shinguste)
भाषा - मराठी
पाने - १४१
प्रकाशन - रायटर पब्लिकेशन, डिसेंबर २०२५
छापील किंमत - रु. २९०/-
ISBN - दिलेला नाही


पुणे पुस्तक महोत्सवाला १३ डिसेंबर पासून फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रांगणात सुरुवात झाली. १४ डिसेंबरला रविवारी मी तिथे बराच वेळ होतो. वेगवेगळ्या दालनांना भेट दिली. सध्या गाजणारा युवा लेखक नितीन थोरात यांच्या रायटर पब्लिकेशनच्या दालनालाही भेट दिली. तिथे त्याच्या पुस्तकांबरोबरच एक वेगळं पुस्तक दिसलं. "माझी जन्मखेप". लेखक मनोज शिंगुस्ते . पुस्तकाचे मुखपृष्ठ व पाठमजकूर बघून, पुस्तक चाळून लक्षात आलं की हे एक विनोदी पुस्तक आहे. ह्या लेखकाचे हे पहिलेच पुस्तक आहे. माझ्या वयाची तरुण लेखकांचं लेखन वाचण्याची मला नेहमीच उत्सुकता असते. विशेषतः पौराणिक किंवा ऐतिहासिक कादंबऱ्यांपेक्षा ते लेखन जर आजच्या जगण्यावर आधारित किंवा भविष्यवेधी असेल तर त्याबद्दल जास्त उत्सुकता वाटते. त्यामुळे हे पुस्तक लगेच विकत घेतलं.
नितीन आणि मनोज दोघांबरोबर फोटोही काढला.

घरी आल्यावर लेखक मनोज शिंगुस्ते कोण आहे याचाही जरा सोशल मीडिया वरती शोध घेतला. तेव्हा असं कळलं की मनोज चं स्पायसीकिक (spicykick) नावाचं instagram handle आहे. त्यात तो पुणे परिसरातील वेगवेगळी खाण्याची ठिकाणं , हॉटेल, स्थानिक उद्योग वगैरेंची माहिती लोकांना देतो. त्यात त्याची पत्नी आणि पुतण्या - बारक्या - असतात.
त्याची reel बघताना त्याच्या शाब्दिक कोट्या, समालोचन केल्यासारखी शैली आणि स्वतःचा झालेला पचका, बारक्याकडून झालेला अपमान असे विनोदी पैलू दिसले. रीलमधली माहिती आणि विनोद ह्यामुळे तो चांगलाच प्रसिद्ध आहे. जवळजवळ तीन लाख फॉलोवर्स. थोडक्यात आजच्या पिढीतला तो रील स्टार आहे. माझं रील बघणं फार कमी होतं आणि माझ्या आवडीचे विषय थोडे वेगळे असल्यामुळे मनोज बद्दल मला माहिती नव्हती यात काही विशेष नाही.

तर अशा मनोजने मनोगतात त्याच्या लेखनाच्या उर्मीबद्दल लिहिलं आहे. रील करताना काही मिनिटांच्या आत सगळं सादरीकरण करावं लागतं. त्याची सवय असतानाही मनोजने मोठ्या विनोदी कथा लिहिल्या हे कौतुकास्पद वाटलं. त्यामुळे रात्री आल्या आल्या हे पुस्तक वाचलं आणि एका बैठकीत वाचून पूर्णही केलं. वाचताना मजा आली.

या पुस्तकात मनोज स्वतःच निवेदक आहे. एक रीलस्टार म्हणून त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या गमतीजमती, फजिती या माध्यमातून आपल्यासमोर छान विनोद निर्मिती केली आहे. प्रसिद्ध व्यक्ती असताना विशेषतः तरुणांच्यात प्रसिद्ध असताना चाहत्यांच्या अतिउत्साहामुळे किंवा काहींच्या विचित्र स्वभावामुळे अनवस्था प्रसंग ओढवतो हे काही कथांमध्ये आहे. तर काही वेळा उलट घडतं की आपण प्रसिद्ध आहोत, आपल्याला सगळे ओळखतात ,आपलं कौतुक होईल या भावनेतून एखाद्या ठिकाणी गेल्यावर फार मोजकेच लोक ओळखतात किंवा जे ओळखतात त्यांनाही फार विशेष कौतुक वाटत नाही. आणि मग कसा हिरमोड होतो त्याच्या मजेशीर घटना पुस्तकात आहेत.

पुस्तकात एकूण दहा गोष्टी आहेत प्रत्येक गोष्टीबद्दल अगदी थोडक्यात सांगतो.

लय मोठा गेम - मनोजच्या स्वतःच्या गावात निवडणुकीच्या प्रचाराला "स्टार प्रचारक" रूपात
त्याला बोलावलं जातं. पण रिल सटार म्हणून त्याचे चाहते महाराष्ट्रभर असले तरी प्रत्यक्ष गावात चाहते मतदार फारच कमी आहेत हे लक्षात येतं. लोकांना आकर्षित करायसाठी दुसरा नाचगाण्याचा कार्यक्रम ठेवायची टूम निघते आणि स्टार प्रचारकाचा "को-स्टार प्रचारक" होतो आणि काय धमाल उडते.

"पुण्याचा फेमस फुडगॉगल" - वडिलोपार्जित जमिनीच्या कामासाठी गावी जाताना त्याला भेटतात उत्साही युट्यूब वाले. त्यांच्या उत्साहाने नाकी नऊ येतात. प्रवास खड्ड्यांनी त्रासदायक. त्यावर कडी म्हणजे त्याला गावात भेटलेली आजीबाई. त्याला फुफुड ब्लॉगर च्या ऐवजी "फूडगॉगल" म्हणत राहते. पण अशी बाई अडाणी, भोळी म्हणावी का तिच्या वागण्यातून बेरकी.. वाचून तुम्हीच ठरवा.

"लॉर्ड ऑटो" - मनोज गाडी विकत घेतो. घरच्यांना सरप्राईज म्हणून कुठली गाडी आहे हे न सांगता त्यांना शोरूम मध्ये नेतो. आपला मुलगा, काका, दीर एवढा लाखो फॉलोवर असणारा स्टार व्यक्ती गाडी घेणार म्हटल्यावर सगळ्यांच्या अपेक्षा प्रचंड उंचावतात. त्यांची अपेक्षा आणि सत्य वेगळं आहे हे सांगायचा तो प्रयत्न करतो. पण घरचे कुठे ऐकायला तयार.


"रेश्मा लॉज"- अचानक पोलीस स्टेशन मधून फोन येतो की तुमच्या भावाने दारू पिऊन एका म्हाताऱ्याला उडवले आहे. त्याला सोडवायला या. आता हा भाऊ कोण याचा विचार करत, मनोज तिकडे पोचतो, पोलिसांना पटवून त्याला बाहेर काढतो त्या सगळ्या प्रसंगाची धमाल.

"पुरुष म्हणजे नेमकं काय?"- व्हिडिओ, सोशल मीडिया चाहते, घरातली वादावादी या गडबडीतून जरा निवांत बसावं म्हणून मनोज एका डोंगरावर जातो. तिकडे त्याला भेटतो एक वल्ली गावकरी. बोलण्या बोलण्यातून तो स्टारगिरीतली हवाच काढतो आणि मनोजला जमिनीवर आणतो. पण नंतर पुन्हा हवेत कसं नेतो त्याची धमाल.

"मैतं रे मैतं"- एका नातलगाच्या अंत्यसंस्काराला गेल्यावर तिथल्या गावातल्या चाहत्यांनी मांडलेला उच्छाद , अतिउत्साहात अंत्यसंस्काराचाच बट्ट्याबोळ.

"टॉम लिब्सन गिअर" - एका हॉटेलमध्ये शूटिंगसाठी गेला असताना तिथला मालक त्याला एक कुत्रा भेट देतो. कुत्र्याचं नाव. मनोजला आणि कुटुंबीयांना नको असताना कुत्रा गळ्यात पडतो आता हे विकतच दुखणं कसं मिटवायचं ह्याची उलाढाल.

"व्यासपीठ मानापमान नाट्य"- रीलस्टार म्हणून पाहुणा म्हणून "कार्यक्रमाची सुपारी" मिळाली. पण जेमतेम काहीतरी मानधन आणि आणि तिथली प्रसिद्धी सुद्धा आज स्थानिक राजकारण हायजॅक केली तर कशी होईल तगमग. खास पाहुणचार होईल असं वाटत असताना पोलिसांनीच पकडलं तर ?

"सुका पाटील"- नातेवाईकांचा फोन आला मामा आजारी आहेत. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर कळलं मामांना प्रसूती गृहात नेलं आहे. म्हणजे मामाच गरोदर आहेत ? काय आहे भानगड ?

"अकलेचा कांदा" - फुडब्लॉगिंग करताना वेगवेगळ्या हॉटेलमध्ये भेटी दिल्या जातात. तिथले पदार्थ चाखले जातात. ते पदार्थ कसे वाटतात ते व्हिडिओमध्ये मनोज सांगतो. पण इतके पदार्थ चाखायचे म्हटल्यावर सगळे पदार्थ पोटभर थोडेच खाता येणार सगळं थोडं संपवता येणार मग काय बर करायचं?

अशा या वेगवेगळ्या कथा सूत्रांवर आधारलेल्या गोष्टी आहेत. चार पाने उदाहरणादाखल देतो जेणेकरून त्याच्या शैलीची कल्पना येईल.

मोठ्या गाडीबद्दलच्या कल्पनांच्या उड्यांवर उड्या


अंत्यसंस्कारातले अतिउत्साही चाहते


शाब्दिक कोट्यांची धमाल आणि प्रासंगिक विनोद आहेत. काही ठिकाणी द्वयर्थी वाक्ये आहेत; पण अगदी मोजकीच. थेट अश्लीलता आलेली नाही. सध्याच्या स्टँड अप विनोदवीरांना अश्लीलता आणि शिव्या यांशिवाय विनोद करता येत नाही. मनोजने मात्र ती निसरडी वाट टाळलेली आहे. रील स्टार ही तशी अलीकडची सामाजिक पदवी. त्याचे अनुभव हे खास आजचे, आत्ताच्या पिढीचे आहेत. त्यामुळे  पुस्तकातल्या प्रसंगांशी आपण लगेच जोडले जाऊ शकतो. प्रमाण मराठी, गावाकडची बोली दोन्हीचा खुबीने वापर केला आहे. शहर आणि गाव ह्यातल्या कमी होत जाणारं सामाजिक अंतर आपोआप ह्यात टिपलं गेलंय. पुस्तक प्रसन्न आहे. निखळ करमणुकीसाठी, आजच्या पिढीचं लेखन वाचण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचा. 

मनोजला त्याच्या पुढच्या लेखनाच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा !!


——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

वर्दीतल्या माणसाच्या नोंदी (Vardeetalya manasachya nondi)



पुस्तक - वर्दीतल्या माणसाच्या नोंदी (Vardeetalya manasachya nondi)
लेखक - सदानंद दाते (Sadanand Date)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १४४
प्रकाशन - समकालीन प्रकाशन. डिसेंबर २०२१
छापील किंमत - रु. २००/-
ISBN - 978-93-86622-78-5


"पोलीस" हा शब्द उच्चारल्यावर प्रत्येकाच्या मनात येणारे भाव वेगवेगळे असतील. सगळं नीट सुरु असताना अचानक "पोलीस आले" म्हणजे काहीतरी भानगड झाली असं वाटून भीती वाटेल. वादावादी झालेल्या, तक्रार झालेल्या ठिकाणी पोलीस आले की आता पापभिरू माणसाच्या मागेच नक्की लचांड लागणार; पंचनामा, साक्ष ह्यासाठी पोलीस स्टेशनच्या वाऱ्या कराव्या लागणार हे मनात येऊन त्रागा केला जाईल. "आता बघा, वरून फोन आला की नाहीतर पैसे दाबले की गुन्हेगार सुटणार" असा तुच्छतादर्शक स्वर निघेल. पण दंगल, जाळपोळ चालू असताना पोलीस आले की आश्वस्त वाटेल. देशविघातक आंदोलनाच्या वेळी पोलिसांनी लाठीमार, गोळीबार केला की "असंच सडकवलं ह्या लोकांना पाहिजे पोलिसांनी" असं म्हणून कौतुक केलं जाईल. एखाद्या अपहृत मुलाची सुटका केली, चोरटी टोळी पकडली, एन्काउंटर मध्ये गुंडाचा खात्मा केला की "भले शाब्बास, पोलिसांना आता सरळ मोकळा हात दिला पाहिजे" असं म्हणताना आश्वस्त वाटेल. तर नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात पोलीस जवान शहीद किंवा २६/११ च्या हल्ल्यात बलिदान देऊन अतिरेक्यांना थोपवणारे पोलीस दिसले की कृतज्ञतेने डोळे पाणावतील. पोलीस दलाबद्दल भावांनांचे हे कितीतरी रंग. प्रत्येक रंग आपापल्या जागी, आपापल्या वेळी तितकाच खरा. एका "खाकी वर्दी"मुळे आपल्याला इतके रंग दिसतात. तर ती वर्दी प्रत्यक्ष चढवल्यावर किती रंग दिसत असतील ?

खाकी वर्दीच्या आतल्या माणसाने स्वतःकडे बघितलं आणि इतरांनाही बघू दिलं तर काय दिसेल हे मांडणारं पुस्तक आहे - "वर्दीतल्या माणसाच्या नोंदी". पुस्तकाचे लेखक सदानंद दाते हे सध्या राष्ट्रीय तपास संस्थेचे (NIA) सध्याचे प्रमुख आहेत. ते १९९० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत ते ह्या पदावर असतील. त्या आधी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (ATS)चे प्रमुख होते. मुंबईत झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी अतुलनीय शौर्य दाखवले होते. त्याबद्दल त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्र पोलीस दलात अनेक महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केले आहे. सीबीआय मध्ये त्यांनी काम केले आहे. कर्त्यव्यदक्ष, कर्तबगार आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून पोलीस दलात आणि सर्वसामान्य लोकांमध्येही त्यांनी नावलैकिक मिळवलेला आहे.

अशा सदानंद दाते ह्यांनी पोलीस दलातल्या प्रवेशापासून पुस्तक लेखनापर्यंतच्या कालावधीतल्या महत्त्वाच्या अनुभवांबद्दल ह्या पुस्तकात लिहिले आहे. पण हे त्यांचे आत्मचरित्र नाही. गुन्हे शोधांची थरारक कथामाला नाही. पोलीस दलातल्या "आतल्या" खबरा सांगणारे पुस्तक नाही. प्रसिद्ध व्यक्तींची नावे घेऊन, लफडी बाहेर काढून, गौप्यस्फोट करून सनसनाटी निर्माण करणारे पुस्तकही नाही. बराच माल-मसाला हाताशी असूनही स्वयंपाक्याने सात्त्विक थाळी रांधावी तसे पुस्तकाचे सात्विक स्वरूप आहे. सात्विक, पौष्टिक, वैचारिक खाद्य वाचकाला मिळावे हा त्यांचा उद्देश आहे. चांगले - वाईट अनुभव जसे आले तसे गोपनीयतेच्या मर्यादेत राहून त्यांनी लिहिले आहेत. पोलीस दलात प्रवेश करणारा उमेदवार ते एक सक्षम अधिकारी हे जडणघडण कशी होत गेली, व्यक्तिमत्त्व विकास कसा होत गेला हे दाखवलं आहे. स्वतःकडे, पोलिसांकडे आणि व्यवस्थेकडे बघायचा दृष्टिकोन कसा परिपक्व होत गेला हे आपल्याला समजतं.

हे पुस्तक छोट्या छोट्या लेखांचा संग्रह आहे. एकेक मुद्दा घेऊन त्या संबंधीचे महत्त्वाचे प्रसंग, त्यांचे आधीचे विचार, त्यात झालेला बदल, कामाची परिणामकारकता अशा प्रकारे तो मुद्दा स्पष्ट केला आहे. उदा. पोलिसांवर असणारा राजकीय दबाव हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय. त्याबद्दल ते लिहितात ".. अनेकांना असं वाटतं, की पोलीस अधिकाऱ्यांना अनेक वरिष्ठांकडून किंवा राजकारण्यांकडून बेकायदा आदेश दिले जातात, आणि नोकरी टिकवण्यासाठी त्यांना ते पाळावेच लागतात. पण माझे प्रत्यक्ष अनुभव सांगतात की ते आदेश नसून विनंती असते. कारण आपण करायला सांगतोय ते बेकायदा असल्याची जाणीव त्या अधिकाऱ्यालाही असतेच. आपण सौम्यपणे 'हे शक्य नाही' असं सांगितलं तर आपल्यावर चुकीचं काम करण्याची सक्ती कोणीही करू शकत नाही. .... आपल्या शक्तीप्रमाणे आपण आपल्या आसापसाच्या गैरव्यवहारांची साखळी काही प्रमाणात तोडूही शकतो". अशाप्रकारे परिस्थितीचं वस्तुनिष्ठ स्वरूप ते लिहितात.

काही लेखांबद्दल सांगतो.
"पोलीस दलातला प्रवेश", "सुरवातीचे दिवस" - पोलीस दलात IPS अधिकारी म्हणून जॉईन झाल्यावर वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करायला मिळाले. रत्नागिरीला पहिल्याच दिवशी अधिकाऱ्याने थेट भाषणच द्यायला सुरुवात केली. "मोठ्या कामावर लक्ष द्या, दारू जुगाराच्या अड्ड्यांवर धाडी टाकण्यात धन्यता मानू नका ", वगैरे. पण लोकांच्या तक्रारी त्यासंबंधीच येऊ लागल्या. म्हणून कारवाई केली तर सहाव्या दिवशीच बदली ! पुढे विदर्भात नक्षलग्रस्त भागात काम करायला लागले/मिळाले. नक्षलग्रस्त शरण यावेत ह्यासाठी आदिवासींच्या साथीने जनजागृती केली ते अनुभव आहेत. आणि पोलीस भरती करताना स्थानिक राजकारण्याचा दबाव कसा आला हे अनुभव आहेत.

कामाचा भक्कम पाया : वाचन आणि मनन - यशस्वी माणसे भरपूर वाचतात. त्यावर चिंतन करतात. गुण आणि बदल आत्मसात करतात. सदानंद दाते त्या मालिकेतील एक. लहानपणापासून असलेली वाचनाची आवड त्यांनी पोलीस दलातल्या व्यग्र दिनाचर्येतही जोपासली आहे.

विरोधाभासांच्या राजधानीत, झेड सिक्युरिटीच्या अंतरंगात, पोलिसांची परीक्षा - उत्सवी गर्दी - हे सगळे लेख विशिष्ट प्रकारच्या बंदोबस्तावर आधारित आहेत. मुंबई महानगरात ड्युटी करताना, सण उत्सव, बंद, मोर्चे ह्यांना नेहमी तोंड द्यावं लागतं. जातीय दंगली होतात. एकेकडे श्रीमंत वस्ती तर दुसरीकडे अति गरिबी. थोड्या पैशांसाठी गुन्हेगारी करणारे लोक आढळतात. परिस्थती लवकरात लवकर निवळण्यासाठी पोलीस दलाला कुशल काम करावं लागतं. मुंबई दंगल, "मुंबई बंद", झोपडपट्टीवरची कारवाई असे हातघाईचे प्रसंग पुस्तकात आहेत. तत्कालीन उपपंतप्रधान अडवाणींच्या मुंबई दौऱ्याच्या उदाहरणातून अशा VIP दौऱ्यांसाठी प्रत्येक मिनिटाचे प्लँनिंग का आणि कसे करावे लागते हे समजते.

२६/११, फोर्स वनची जडणघडण - २६/११च्या हल्ल्याच्या वेळी दाते स्वतः कामा हॉस्पिटल मध्ये होते. तुटपुंज्या शास्त्रास्त्रांनिशी कसाब आणि इतर अतिरेक्यांना बराच काळ रोखून धरण्याची कामगिरी बजावली. तो प्रसंग त्यांच्या शब्दांतच वाचण्यासारखा आहे. ह्या हल्ल्यानंतर अशा प्रसंगाला तोंड देण्यासाठी विशेष पथक तयार केले गेले. त्यात सामील झालेल्या सदस्यांसाठी ध्येयधोरणे कशी ठरवली, ट्रेनिंग कसे दिले, गुणवत्ता कशी राखली याचे अनुभव सांगितले आहेत.

पुढच्या काही प्रकरणांत पोलीस दलातले चांगले अधिकारी कसे काम करत; त्यांचे वागणे बघून लेखकाने काय शिकवण घेतली हे सांगितले आहे. पोलीस दलातला भ्रष्टाचार त्यांनी नाकारला नाहीये. स्वतःच्या परीने भ्रष्टाचाराचा मुकाबला कसा केला, स्वच्छ वागणे कसे राखले, त्यासाठी कधी वरिष्ठांची नाराजी किंवा बदलीची शिक्षा मिळाली हे अनुभव लिहिले आहेत.

पोलिसांचे काम समाजापर्यंत पोचण्यासाठी पत्रकार, वृत्तपत्रे, दूरदर्शन वाहिन्यांची मदत होते. तर सनसनाटी बातम्या, पेरलेल्या बातम्या, खऱ्या घटनेला चुकीचा रंग देणे ह्याचा त्रासही पोलिसांना होतो. दात्यांनी केलेल्या पोलीस भरतीला असा चुकीचा रंग देऊन बातम्या प्रसारित केल्यावर ते अस्वस्थ झाले. पण ज्येष्ठ पत्रकार अरुण टिकेकर ह्यांच्या सल्ल्याने ह्या बातम्यांना किती महत्व द्यायचं ह्याचं तारतम्य वाढलं.

भ्रष्टाचार भारतीय समाजात अंतर्बाह्य मुरलेला आहे. राजकारणी आणि पोलीस हे त्याच समाजातून येतात म्हणून भ्रष्ट असतात. अशा सामाजिक परिस्थितीत बदल होण्यासाठी काय करावं लागेल; ते किती मोठं कार्य आहे; ह्याबद्दल त्यांचं चिंतन आहे. असा आदर्श समाज निर्माण व्हायला खूप वेळ लागेल. ह्या सामाजिक सत्याचा स्वीकार केला तरच किमान आपल्या हातातल्या गोष्टींमध्ये बदल घडवू शकू असे त्यांचे प्रतिपादन आहे. अशी परिपक्वता येण्यासाठी विपश्यनेचाही उपयोग झाल्याचा उल्लेख आहे. त्यांनी अमेरीकेत जाऊन वर्षभर अभ्यास केला, मग पी.एच.डी . मिळवली. ह्या अभ्यासातून त्यांनी पोलीस व्यवस्थेचे जागतिक भान मिळवले. हे सगळे अनुभव वाचताना कळते की नेहमीच्या पोलीस अधिकारी प्रतिमेपेक्षा ते का आणि कसे वेगळे ठरतायत.

काही पाने उदाहरणादाखल
अनुक्रमणिका


मुंबईतील झोपडपट्टी कारवाई वेळच्या बंदोबस्ताचा अनुभव



वरिष्ठांचा अहंकार दुखावल्यामुळे दिला जाणारा त्रास



पोलीस व्यवस्थेच्या दुरवस्थेबद्दल चिंतन



पोलीस खात्यातल्या स्वतःच्या प्रगतीसह स्वतःच्या मानसिक प्रगतीचा आणि पुढे सामाजिक प्रगतीचा आलेख मांडत हे पुस्तक पूर्ण होते. त्यामुळे हे पुस्तक फक्त वैयक्तिक अनुभवांच्या नोंदी न राहता एकूणच सध्याचा भारतीय समाजाबद्दलच्या नोंदी आहेत. नक्कीच वाचनीय आणि चिंतनीय आहेत. विशेष म्हणजे भाषा अतिशय प्रवाही आहे. प्रत्येक मुद्दा, प्रसंग थोडक्यात पण परिस्थितीची कल्पना येईल इतक्या तपशीलासह मांडला आहे. त्यामुळे कमी पानांतही मोठा आशय आहे.

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

रेडी फॉर टेक ऑफ (Ready for take off)



पुस्तक - रेडी फॉर टेक ऑफ (Ready for take off)
लेखक - सचित जैन (Sachit Jain)
अनुवाद - शुभदा पटवर्धन (Shubhada Patawardhan)
भाषा - मराठी
मूळ पुस्तक - Ready for take off (रेडी फॉर टेक ऑफ)
मूळ पुस्तकाची भाषा - English (इंग्रजी)
पाने - २६१
प्रकाशन - मनोविकास प्रकाशन ऑगस्ट २०१२
छापील किंमत - रुपये २५०/-
ISBN 978- 93-81636-98-5

लहानपणी आपण पंचतंत्र, इसापाच्या गोष्टींमधून कसे वागावे, कसे वागू नये , कसे जगावे याचे धडे शिकत असतो. गोष्टीरुपात सांगितल्यामुळे आपल्याला वाचताना मजा येते आणि त्या गोष्टीचे तात्पर्य मनात उतरते. कुठलाही जड उपदेश असा गोष्टीच्या स्वरूपात किंवा गोष्टीच्या वेष्टनात दिला की तो जास्त सुसह्य होतो हा आपला नेहमीचा अनुभव आहे. याचाच पुढचा प्रकार म्हणजे कथेच्या आडून उपदेश न देता प्रत्यक्ष कथेमध्येच दोन-तीन पात्रांच्या संवादातून एखादी गहन चर्चा घडवून आणली जाते. वाचकाला नीतिनियमांचं थेट शिक्षण दिलं जातं. भारतीय परंपरेमधील रामायण महाभारतासारखे ग्रंथ, संस्कृत काव्य किंवा ऐतिहासिक राजांनी लिहिलेले ग्रंथ बघितले तर दोन पात्रांच्या संवादात वेगवेगळ्या मुद्द्यांवर गहन चर्चा झालेली आढळते. राजाने कसे वागावे, ऋषीमुनींनी कसे वागावे, संसारी माणसाने काय करावे काय टाळावे याची सूत्रे तिथे असतात. अगदी भगवद्गीता हा सुद्धा कृष्ण-अर्जुनाचा संवाद महाभारताच्या मध्ये आहे. भीष्म-युधिष्ठिर संवाद विदुराचे संवाद, रामायणातील वालीचा प्रसंग, रावणाच्या अंतिम वेळचे संवाद यातून वेगवेगळे विषय वाचकांसमोर मांडले आहेत. हीच परंपरा चालवत आधुनिक व्यवस्थापनशास्त्राचे धडे देण्याचे काम सचित जैन यांनी "रेडी फॉर टेक ऑफ" पुस्तकात केले आहे.

ही एक काल्पनिक कादंबरी आहे. पण त्याला लेखकाच्या स्वानुभवाची जोड आहे. पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार स्वतः सचित जैन उच्चविद्याविभूषित आहेत आणि त्यांनी वर्धमान ग्रुप नावाच्या कंपनीत व्यवस्थापन उत्पादन, मार्केटिंग, इ. आर. पी. इम्प्लिमेंटेशनअशा विविध विभागांचे नेतृत्व केले आहे. या स्वानुभवातून त्यांनी एका कंपनीच्या प्रमुखाची कथा आपल्यासमोर मांडली आहे.

या कथेचा नायक अनुराग हा आय आय एम अहमदाबाद मधून एमबीए केलेला, दिल्लीच्या स्टीफन्स कॉलेज मधून अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केलेला आहे. व्यवसायाने इन्व्हेस्टमेंट बँकर. सिटी बँकेसारख्या नावाजलेल्या संस्थेत आर्थिक विश्लेषक, इन्व्हेस्टमेंट सल्लागार, मर्जर - टेक ओव्हर वगैरे करोडोंच्या उलाढाली मध्ये काम करणारा. पण त्याला प्रत्यक्षात एखादी कंपनी चालवण्याचा अनुभव नाही. तशी इच्छाही नाही. त्याची ओळख अरुण सेहगल नावाच्या प्रसिद्ध "टेक ओव्हर टायकून" यांच्याशी झाली आहे. यास हे गल्ली अजंता स्टील नावाची कंपनी विकत घेतली आहे. पूर्वी चांगली चालणारी पण आता व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळे अकार्यक्षमतेमुळे डबघाईला आलेली ही कंपनी चांगली चालवून ती नावारूपाला आणावी असा सेहगल यांचा मानस असतो. त्यासाठी योग्य माणूस म्हणून ते अनुरागची निवड करतात. कंपनी चालवण्यात सर्वस्वी नवखा असणारा अनुराग हो नाही करता करता एकदाची ती जबाबदारी स्वीकारतो. आपलं शिक्षण, इतक्या वर्षांचा अनुभव, जुन्या सहकाऱ्यांचा सल्ला व पत्नीचा सल्ला घेत घेत कंपनीचं नेतृत्व करायला लागतो. कंपनी हळूहळू सुधारू लागते .दीड दोन वर्षातच कंपनी तोट्यातून बाहेर येते आणि पुढे मोठी झेप घेण्यास सिद्ध होते. "रेडी फॉर टेक ऑफ" होते. हा प्रवास आपल्याला कादंबरीत दिसतो.

इथे अनुराग स्वतःच आपली गोष्ट सांगतोय. स्थिरस्थावर झालेल झालेलं करियर आणि लठ्ठ पगाराची नोकरी सोडून अनोळखी भूमिका स्वीकारताना त्याची घालमेल होते. पण सेहगल, त्याची पत्नी ह्यांचा त्याच्यावरचा विश्वास व प्रोत्साहन; स्वतःचं चिंतन यातून शेवटी तो ही जोखीम स्वीकारायला तयार होतो. कंपनीचा प्रमुख म्हणून आता त्याच्याकडे निर्णय घेण्याची शक्ती आहे. जबाबदारी आहे. तो म्हणेल तसं लोक आता वागणार आहेत. त्यामुळे त्याचा प्रत्येक निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. तो सुरुवातीला ही कंपनी नक्की कशी चालते, स्टील उत्पादन कसं होतं हे सगळं आपल्या हाताखालच्या लोकांकडून समजून घेतो. आधीच्या व्यवस्थापनाने कशी कार्यशैली ठेवली आहे हे समजून घेतो. त्यात काय बदल करायला लागतील याची चाचणी करायला लागतो. आय एम मध्ये शिकताना घेतलेला पुस्तकी अनुभव, इतर मित्रांचे सल्ले आणि कंपनीतल्या लोकांची प्रत्यक्ष भेटीगाठी यातून धडपडत तो स्वतःचा मार्ग चोखाळतो. परिस्थिती वरती आपली मांड ठोकतो. हा प्रवास वाचणे रंजक आहे.

प्रसंगाच्या ओघात अनुराग वेगवेगळ्या विभाग प्रमुखांशी चर्चा करतो. कर्मचाऱ्यांशी मीटिंग घेतो. कंपनीत काय चांगलं चालू आहे, काय वेगळं करायला पाहिजे, मॅनेजमेंटची तत्त्व काय, ती कशी अमलात आणता येतील, त्यासाठीची आव्हाने काय अशी सगळी चर्चा होते. ही सगळी चर्चा म्हणजे; सुरुवातीला मी म्हटलं तसं, व्यवस्थापनशास्त्राचे धडे आहेत. एखाद्या कंपनीच्या मिनिट्स ऑफ मीटिंग असाव्यात त्या पद्धतीने मुद्दा क्रमांक एक, मुद्दा क्रमांक दोन, मुद्दा क्रमांक तीन असे मुद्दे क्रमवार मांडले आहेत. मग, "मी असं म्हणालो", "श्री शर्मा असं म्हणाले", "श्री अग्निहोत्री असं म्हणाले" , "अरुणने हा प्रश्न उपस्थित केला"; अशी ती चर्चा शब्दांकित केलेली आहे. अनुराग एखादी कल्पना सांगतो. इतर लोक त्याला प्रश्न विचारतात. असं लिहीत तो तो मुद्दा स्पष्ट केला आहे. अनुरागला जेव्हा एखादा निर्णय घेणे अवघड जातं, काय करावं याबद्दल त्याच्या मनात गोंधळ होतो तेव्हा तो त्याची बायको, त्याची मित्रमंडळी यांच्याबरोबरही बोलतो. ती चर्चाही व्यवस्थापन शास्त्राच्या संकल्पनांभोवतीच घडते. तिथेही पुन्हा मुद्दा क्रमांक एक- दोन - तीन अशा पद्धतीने वर्णन आहे.

अनुरागला दोन मुली आहेत. त्या वयात येण्याच्या बेतात आहेत इतकी वर्षे करिअरच्या मागे धावताना मुलींना द्यायला पुरेसा वेळ मिळालेला नाही. त्याची चुटपुटही त्याला कधी कधी लागते. त्या प्रसंगात व्यवस्थापन शास्त्रातल्या संकल्पना घरगुती वातावरणातही कशा वापरता येतील असा विचार त्याच्या मनात येतो. बायकोशी झालेल्या संवादात तो भाग येतो.

कंपनीचा प्रमुख म्हणून काम करताना आर्थिक आणि तांत्रिक आव्हानांबरोबरच मानसिक आव्हाने कशी असतात हे आपल्या लक्षात येतं. निर्णय घेताना होणारी घालमेल, अनोळखी परिस्थितीत जोखीम उचलताना होणारा त्रास, बॉस म्हणून लोकांशी जाणून-बुजून कठोरपणे कसं वागावं लागतं हे कळतं. "नवा गडी नवं राज्य" या उक्तीप्रमाणे बॉस बदलला की सगळ्या कंपनीचं वातावरण बदलतं, संस्कृती बदलते. लोक काही वेळा ती नाईलाजाने स्वीकारतात पण नंतर त्याचा उपयोग झालेला दिसल्यावर खुशही होतात. कंपनीच्या मालकीत झालेला हा बदल मध्यमस्तरीय आणि अगदी खालच्या कामगारवर्गात कसा झिरपतो हे कादंबरीत दाखवलं आहे.

काही पाने उदाहरणादाखल

अनुक्रमणिका



कंपनीत आणि स्वतःत काय बदल केले ते अनुराग सेहगल ला सांगतो तो प्रसंग



अनुरागची मुलगी सहज सांगून जाते की "मला बॉयफ्रेंड आहे, हल्ली सगळ्यांनाच असतात", तेव्हा त्याचा आणि बायकोचा संवाद




वेळ, श्रम फुकट घालवणाऱ्या मूल्यरहित कामांबद्दलची चर्चा



एकूण कादंबरीची रचना मला आवडली. जिथे थेट शिकवण आहे तिथे सुद्धा ती ललित अंगाने, लोकांच्या भावभावना टिपत मांडल्यामुळे रुक्ष झालेली नाही. वाचायला चांगली वाटते. कंपनी मधल्या फॉर्मल मीटिंगमध्ये अशा पद्धतीने मुद्देसूच चर्चा होणं, लोकांना जबाबदारी देणं, पुनरावलोकन करणं हे सगळं अतिशय नैसर्गिक आहे. त्यामुळे कादंबरीच्या फ्लोमध्ये ते व्यवस्थित बसतं. पण अनुराग आणि त्याची बायको किंवा अनुराग आणि त्याचे मित्र यांच्यातल्या चर्चा सुद्धा मुद्दा एक, मुद्दा दोन, मुद्दा तीन अशा पद्धतीने मांडल्या आहेत ते फारच ओढून ताणून बसवलेलं वाटतं. ते अजून थोडं अप्रत्यक्ष पद्धतीनेच लिहायला हवं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे बॉस म्हणतोय म्हणून लोकांनी त्या निर्णयाची अंमलबजावणी करणं योग्यच आहे. पण इच्छा नसताना जेव्हा काम करावं लागतं तेव्हा त्यात टंगळमंगळ होणं, चुका होणं किंवा कामातल्या अडचणींबद्दल तक्रारी केल्या जाणंही स्वाभाविक आहे. पण पुस्तकात मात्र त्या पैलूचा फार विचार नाही. लोकांना बॉसचं म्हणणं पटतं ते पूर्ण क्षमतेने कामाला लागतात; काही छोटे मोठे बदल करतात आणि झटपट रिझल्ट मिळतात. असं फारच गुडी-गुडी वातावरण आहे. कादंबरीत असा उल्लेख आहे की पूर्वीचे व्यवस्थापन हे कामगारांशी कामगार संघटनेतल्या नेत्यांच्या माध्यमातून बोलायचं. त्यांना टाळून जाणं खूप कठीण आहे असा इशारा विभाग प्रमुख अनुरागला देतात. तरी अनुराग या पद्धतीत बदल करतो आणि थेट कामगारांशी संवाद साधतो. अशावेळी कामगार पुढाऱ्यांमध्ये नाराजी पसरणं; त्यांनी कामगारांना भडकवणं किंवा थेट अनुरागशी वाद घालणं अपेक्षित आहे पण पुस्तकात तसं काही दिसत नाही. सगळं सहजगत्या होतं. व्यवस्थापन शास्त्रातल्या संकल्पना प्रत्यक्ष राबवणं अतिशय सोपं आहे, लोकांच्या मानसिकतेत बदल करणे सोपं आहे असाच आपला समज होईल.

योगायोगाने, मी जिथे काम करतो ती कंपनी सुद्धा दुसऱ्या कंपनीने अधिकग्रहीत केली. त्यामुळे हे पुस्तक वाचताना मी अनुराग च्याजागी आमच्या कंपनीचे नवे व्यवस्थापन आल्यावर त्यांनी पण असाच विचार केला असेल का? असेच निर्णय घेतले असतील का? अशी तुलना करत होतो. आमच्याही नव्या कंपनीप्रमुखाची व्यवस्थापनशैली खूप वेगळी आहे. ती राबवताना मोठ्या प्रमाणावर कामगार कपात करावी लागली. त्यामुळे लोकांच्या मनात कायम धाकधूक असते. दोन वर्षे झाली तरी नव्या संस्कृतीशी जुळून घेताना सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना अडचणी आहेत. अधिग्रहणाची ही बाजू मांडण्यात पुस्तक कमी पडतं. इथे अनुरागचं आत्मनिवेदन असल्यामुळे इतरांच्या भावभावना मांडण्याची मुभा निवेदनाला नाही. त्याऐवजी त्रयस्थ निवेदकाच्या भूमिकेतून पुस्तक लिहिलं असतं तर हा पैलू ही जोरकसपणे मांडता आला असता असं मला वाटलं.

व्यवस्थापन शास्त्राबद्दल ललित प्रकारात लिहिलेलं मराठी पुस्तक दिसत नाहीत. त्यादृष्टीने हा अनुवाद मराठी साहित्यात वेगळी भर टाकतो आहे. शुभदा पटवर्धन ह्यांनी अनुवाद चांगला केला आहे. बहुतेक सर्व तांत्रिक संज्ञा मराठीतूनच लिहिल्या आहेत. पण सध्या तांत्रिक बाबतीत इंग्रजीच्या सवयीमुळे मनातल्या मनात उलट इंग्रजी भाषांतर केलं की ते लगेच लक्षात येतं. त्यात अनुवादिकेचा काही दोष नाही. शक्य तितक्या सोप्या मराठीतच त्यांनी लिहिलं आहे.

असं हे वेगळ्या धाटणीचं पुस्तक वाचून बघा. त्यातली काही तत्वे नवीन असतील तर काहींची उजळणी होईल. व्यवस्थापन विषयक काही वाचायची इच्छा असेल तर हे पुस्तक निवडून बघू शकता.

चार्वाक (Charvak)

पुस्तक - चार्वाक (Charvak) लेखक - सुरेश द्वादशीवार (Suresh Dwadashiwar) भाषा - मराठी (Marathi) पाने - १३२ प्रकाशन - साधना प्रकाशन मार्च २०२...