इंडियाज रेल्वेमॅन (India's railwayman)




पुस्तक - इंडियाज रेल्वेमॅन (India's railwayman)
लेखक - राजेंद्र बी. आकलेकर (Rajendra B. Aklekar)
अनुवाद - अनुराधा राव (Anuradha Rao)
भाषा - मराठी (Marathi)
मूळ पुस्तक - India's railwayman. २०१४ मध्ये प्रकाशित
मूळ पुस्तकाची भाषा - इंग्रजी (English)
प्रकाशन - मेहता पब्लिशिंग हाऊस, मे २०२४
पाने - १९२
छापील किंमत - रु. ३२०/-
ISBN - 9789357207126

"कोकण रेल्वे" आणि "दिल्ली मेट्रो"च्या उभारणीचे नेतृत्व करून त्यात सिंहाचा वाटा असणाऱ्या ई. श्रीधरन ह्यांचे हे चरित्र आहे. श्रीधरन ह्यांच्या बालपणाबद्दल थोडी माहिती, त्यांच्या सुरुवातीच्या नोकऱ्यांबद्दल थोडी माहिती, मग त्यांच्या कारकिर्दीतले महत्त्वाचे मानबिंदू असणारे - "पाम्बन" पुलाची दुरुस्ती, "कोकण रेल्वे" आणि "दिल्ली मेट्रो" ह्याबद्दल सविस्तर माहिती आहे. उभारणीतले प्रसंग, तांत्रिक माहिती, श्रीधरन ह्यांच्या मुलाखतीतले अंश, इतर व्यक्तींच्या टिप्पण्या अशी निवेदन शैली आहे.

श्रीधरन ह्यांचा रेल्वेमध्ये वेगवेगळ्या पदांवर आणि भारतात नाना ठिकाणी काम करण्याचा अनुभव आपल्या पुढे येतो. रेल्वेमध्ये ३६ वर्षे नोकरी करून निवृत्त झाल्यावर त्यांनी नव्या दमाने "कोकण रेल्वे"ची धुरा सांभाळली. जॉर्ज फर्नांडिस ह्यांच्या राजकीय इच्छाशक्तीमुळे हा प्रकल्प पुढे रेटला गेला. श्रीधरन ह्यांनी स्वतःच्या कामासाठी पूर्ण स्वायत्तता मागितली. सरकारी निधीबरोबरच भांडवली बाजारातूनही पैसा उभा केला. इतर सरकारी अधिकाऱ्यांप्रमाणे नियम-अटींचा बागुलबुवा करणे, कागदी घोडे नाचवणे आणि स्वतःला धनलाभ कसा होईल; हे श्रीधरन ह्यांनी कधीच केलं नाही. कर्तव्यबुद्धीने आणि सचोटीने काम केलं. ही सचोटी आणि जबाबदारीची जाणीव इतर अधिकाऱ्यांमध्ये आणि कंत्राटदारांमध्ये सुद्धा येईल अशी व्यवस्था निर्माण केली. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी उरलेला वेळ दाखवणारे "उलटी गणती"करणारे घड्याळ त्यांनी सर्व कार्यालयांत लावले होते. विभागीय अधिकाऱ्यांना निर्णय घ्यायचे स्वातंत्र्य दिले होते. निर्णयातली चूक स्वीकारली जायची, पण दिरंगाई नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांना अधिकार व कर्तव्य ह्या दोन्हीची पूर्ण जाणीव होती. कंत्राटदारांनादेखील वेळेत पैसे मिळतील, आवश्यक त्या सुविधा मिळतील ह्याची खात्री दिली गेली. त्यामुळे "पाट्या टाकण्याची" वृत्ती कमी झाली. जनतेचा पैसा वाचावा, काम वेळेत आणि योग्य दर्जाने पूर्ण व्हावं ह्यासाठी त्यांनी उपाययोजना केल्या. अशाच पद्धतीने त्यांनी काम "दिल्ली मेट्रो"तही केले. ह्या सगळ्या उपाययोजनांची सविस्तर माहिती पुस्तकात आहे.

प्रकल्प प्रमुखाला दिलेली स्वायत्तता सहज वागवण्यासारखी गोष्ट नव्हती. राजकीय दबावाला झुगारणे, रेल्वे बोर्डाच्या एकाधिकारशाहीला आव्हान देणे हे सुद्धा त्यांना करावे लागले. श्रीधरन हे मनमानी काम करतात, चुकीचे निर्णय घेतात अशा टीका झाल्या. "कोकण रेल्वे"सुरु झाल्यावर दरड कोसळणे, मार्ग खचणे ह्यातून बऱ्याच वेळा वाहतुकीचा खोळंबा झाला. काही जीवितहानी झाली. पुस्तकात "हारतुरे आणि टीकाटिप्पणी" ह्या भागात वेगवेगळ्या लोकांची श्रीधरन ह्यांच्याविषयी बरीवाईट मतं मांडली आहेत. श्रीधरन ह्यांच्यावर झालेल्या टीका आणि त्याला श्रीधरन ह्यांचे उत्तर हा भाग सुद्धा पुस्तकात आला आहे. त्यातून दुसरी बाजू सुद्धा लेखकाने मांडली आहे. प्रकल्प व त्याची अंमलबजावणी ह्यांचा तांत्रिक आढावा हा पुस्तकाचा मूळ विषय नाही त्यामुळे ह्या चर्चेचा भाग थोडक्यातच आटोपला आहे. जाणकार वाचकांना अधिक वाचन व संशोधन करण्याला प्रोत्साहन मिळेल.

एक गोष्ट जाणवली की भ्रष्टाचाराचा, आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप झालेला दिसत नाही. उलट पुस्तकातून एक धक्कादायक किस्सा कळला. "कोकण रेल्वे"चे प्रमुख म्हणून काम करताना सरकारने ठरवलेला पगार सुद्धा त्यांना पूर्ण दिला जात नव्हता. ते रेल्वेचे निवृत्तीवेतन धारक आहेत म्हणून, ती रक्कम वजा करून फक्त उर्वरित रक्कम - काही हजार रुपये- इतकेच त्यांना मिळत असे. म्हणजे प्रकल्पाचा प्रमुख.. दिवसरात्र मेहनत करणार.. सर्वस्व पणाला लावून काम करणार आणि त्याचा पगार हाताखालच्या लोकांपेक्षाही कमी.. का ? कारकुनी करिष्मा ! रेल्वेशी पत्रव्यवहार आणि नंतर न्यायालयीन लढाई करून त्यांनी हा अन्याय दूर करून घेतला. न्यायालयाने सर्व थकबाकी सव्याज द्यायला लावली. आपण खरंच अशा परिस्थितीत काम केलं असतं का ? पहिल्या महिन्यात चुकीचा पगार दिसल्या दिसल्या नोकरी सोडली असती. नाहीतर नाव- ओळख ह्यांचा वापर करून लोकांना वठणीवर आणलं असतं. पण श्रीधरन सरळ मार्गाने न्यायालयीन लढत राहिले कित्येक वर्ष. विशेष म्हणजे ही मोठी रक्कम मिळाल्यावर ती त्यांनी समाजकार्यासाठी वापरली. काय वेगळंच पाणी आहे हे !

अशी निस्पृहता आणि कर्तव्यनिष्ठा असण्यामागे मूळ अध्यात्मिक वृत्ती, वाचन , सत्संग कसा कारणीभूत आहे हे पुस्तकात उलगडून दाखवलं आहे. श्रीधरन ह्यांचे अध्यामिक गुरु श्री भूमानंदतीर्थ ह्यांनी केलेले व्यक्तिचित्रण पुस्तकात आहे. श्रीधरन ह्यांच्या पत्नीचं मनोगत पुस्तकात असायला हवं होतं. "रेल्वे मॅन" श्रीधरन असे पूर्णवेळ कामाला वाहून घेतलेले, जागोजागी बदल्या होणारे, निस्पृहतेने काम करणारे असल्यामुळे संसाराकडे, कौटुंबिक जाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी उपलब्ध वेळ, घरात उपस्थिती कमीच असणार. त्यांच्या पत्नीने चार मुलांचा संसार नेटाने सांभाळला म्हणूनच हे शक्य झालं. यशस्वी पुरुषामागच्या ह्या भक्कम आधाराची जास्त दखल घ्यायला हवीच.

पुस्तकातील काही पाने उदाहरणादाखल

अनुक्रमणिका



नोकरीच्या सुरुवातीच्या वर्षांत "पाम्बन" पुलाच्या पुनर्निर्माणाचे काम विक्रमी वेळात पूर्ण केले त्याबद्दल



कोकण रेल्वे आणि राजकीय इच्छशक्ती जागवण्याची कसरत



दिल्ली मेट्रो यशस्वी होण्यासाठी केलेले नियोजन




पुस्तकाचा मराठी अनुवाद छान झाला आहे. तांत्रिक शब्दांमध्ये इंग्रजी आणि मराठी असा चांगला मेळ साधल्यामुळे पुस्तक सुबोध झाले आहे. हे पुस्तक मराठीत आणल्याबद्दल अनुवादिका अनुराधा राव ह्यांचे आभार !

निवृत्ती नंतर पंधरा वर्ष दोन मोठे प्रकल्प हाताळून श्रीधरन आता पुन्हा निवृत्त झाले असले तरी रेल्वे, मेट्रो, सार्वजनिक दळणवण ह्या विषयाशी संबंधित कितीतरी प्रकल्पांचे ते सलागार आहेत, समित्यांवर सदस्य आहेत त्याची माहिती पुस्तकात आहे . आजही दिवसाचे कितीतरी तास ते ह्यासाठी देतात. कार्यप्रवणतेचे हे प्रेरणादायी उदाहरण आहे.

सरकारी नोकरीच्या मर्यादा आणि त्यातलं राजकारण, भ्रष्टाचार ह्यांना आपण नावं ठेवणं अगदी स्वाभाविक आहे. पण ह्या काटेरी वाटेवरही देशहिताची फुलबाग फुलवता येते; हवी फक्त श्रीधरन ह्यांच्यासारखी निस्पृहता, कामावरचं प्रेम आणि कार्यक्षेत्राचं उत्तम ज्ञान ! व्हायला हवे शरीर-मन-बुद्धीने कर्मयोगी !


——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

नवे शैक्षणिक धोरण (Nave shaikashnik dhoran)




पुस्तक - नवे शैक्षणिक धोरण (Nave shaikashnik dhoran)
लेखक - प्रा. डॉ. नितीन करमळकर आणि मंगला गोडबोले (Pro.Dr. Nitin Karmalkar & Mangala Godbole)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १५०
प्रकाशन - राजहंस प्रकाशन. जुलै २०२४
छापील किंमत - रु. २४०/-
ISBN -978-81-19625-03-1

२०१४ साली नरेंद्र मोदीजी भारताचे पंतप्रधान झाल्यापासून मोठ-मोठे निर्णय त्यांनी घेतले आहेत. 370 कलम रद्द करणे, राममंदिर उभारणी, जीएसटी लागू करणे, जनधन योजना, नोटबंदी, डिजिटल इकॉनॉमी, रस्ते-महामार्ग-मेट्रो यांच्यात झालेली वाढ, रेल्वे सुधारणा... अशा कितीतरी निर्णयांची यादी आपल्याला देता येईल. या प्रत्येक निर्णयामागची पार्श्वभूमी, त्याची अंमलबजावणी आणि परिणाम याबद्दल बरंवाईट मत नक्की असू शकतं. पण हे सर्व निर्णय हे धाडसी, मूलगामी आणि त्यामुळेच दूरगामी परिणाम करणारे आहेत याबद्दल मात्र दुमत नसेल. याच यादीत अजून एक महत्त्वाचा निर्णय घेतला गेला आहे तो म्हणजे "नवीन शैक्षणिक धोरण २०२० / न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020". ह्या धोरणावर मात्र तितक्या मोठ्याप्रमाणावर चर्चा होत नाही. अर्थसंकल्प, वंदे-भारत गाडीची सुरुवात होणे किंवा नोटाबंदी इतकी ही गोष्ट सनसनाटी नसते. शिक्षणतज्ज्ञांनी काहीतरी ठरवलं असेल आणि आता "सिलॅबस बदलला असेल" इतपतच जाणीव बहुतांश लोकांमध्ये असेल. जेव्हा कॉलेजमध्ये जायचं असेल तेव्हा बघू..कुठल्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा असेल तेव्हा बघू.. अशी सर्वसाधारण भूमिका असेल. पण ज्या देशाला खरंच प्रगतीशील राष्ट्र विकसित राष्ट्र बनायचं आहे त्याने आपली पुढची पिढी काय शिकणार आहे कशी शिकणार आहे याकडे खरंतर डोळसपणे बघायला हवं. त्यामुळे शिक्षण धोरणाची चर्चा सर्वसामान्य लोकांमध्ये सुद्धा व्हायला हवी. त्यांनी सुद्धा ते समजून घेतलं पाहिजे.

मी जरी शिक्षक नसलो आणि सध्या विद्यार्थीही नसलो तरी शाळेत असताना अभ्यास आवडणारा विद्यार्थी होतो. त्यामुळे नव्या धोरणाद्वारे येणाऱ्या वर्षात मुलं कसा अभ्यास करतील हे समजून घ्यायची उत्सुकता होती. चार वर्षे इंजीनियरिंग मध्ये घेतलेलं शिक्षण आणि आयटी क्षेत्रात प्रत्यक्ष काम करताना लागणारा लागणारे ज्ञान यामध्ये असलेली तफावत जाणवत असल्यामुळे येणाऱ्या पिढीच्या उच्च शिक्षणामध्ये काही बदल घडणार आहे का हे सुद्धा जाणून घ्यायची उत्सुकता होती. सरकारने असे काही धोरण जाहीर केले आहे हे समजल्यावर इंटरनेटवरती काही वेळा त्याबद्दल वाचलं. पण सविस्तर तरीही महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घालणारी सोपी मांडणी माझ्या वाचनात आली नव्हती. काही दिवसांपूर्वी लेखिका मंगला गोडबोले यांची हे पुस्तक प्रकाशित झाल्याची फेसबुक पोस्ट वाचली आणि या पुस्तकातून नक्की काहीतरी माहिती हाती लागेल अशी खात्री वाटली आणि पुस्तक लगेच ऑनलाईन मागवले आणि हे पुस्तक वाचून माझा निर्णय योग्य होता हे मी नक्की सांगू शकतो. लेखक श्री. करमळकर ह्या धोरणाच्या अमंलबजावणीसाठी महाराष्ट्र शासनाने गठित केलेल्या सुकाणू समितीचे अध्यक्ष आहेत. तर सहलेखिका मंगला गोडबोले ह्या ख्यातनाम लेखिका आहेत.

पुस्तकात दिलेल्या दोघांच्या माहितीतला थोडा भाग




आधी या शिक्षण धोरणाबद्दल थोडक्यात सांगतो म्हणजे पुस्तक का वाचावं हे लक्षात येईल.
इस्रोचे अध्यक्ष श्रीयुत कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली भारत सरकारने एक समिती नेमली होती. त्यात वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ञ होते. त्यांनी देशभरातून मते मागवली. समितीकडे लाखोंनी सूचना आल्या. त्या सगळ्यांचा अभ्यास करून समितीने हे नवे धोरण जाहीर केले आहे. हे धोरण शिशुबालवर्ग म्हणजे वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून पदव्युत्तर पदवी /पोस्ट ग्रॅज्युएशन /पीएचडी इथपर्यंतच्या पूर्ण शिक्षण व्यवस्थेबद्दल काही विशिष्ट रचना मांडते. अभ्यासक्रम कसा असावा परीक्षा कशा घ्याव्यात विद्यार्थ्यांना विषय निवडायचं स्वातंत्र्य कसं असावं मुख्य विषयाला पूरक विषय कसे असावेत आपल्या आवडीच्या विषयातलं ज्ञान सुद्धा कसं घेता यावं एखाद्याचे शिक्षण काही करण्यामुळे थांबले तर ते परत कसे सुरु करता येईल पुस्तकी ज्ञानाबरोबरच अनुभवाची जोड कशी मिळेल माणसाचं कौशल्य कसं वाढेल रोजगार क्षमता कशी वाढेल अशा असंख्य मुद्द्यांचा परामर्श या धोरणात घेतला आहे आणि त्याबाबत निश्चित एक रचना सांगितली आहे.

या पुस्तकात सुरुवातीला या धोरणामाची भूमिका स्वातंत्र्य स्वातंत्र्योत्तर काळात राबवलेली धोरण याबद्दल सांगून पार्श्वभूमी तयार केली आहे. त्यानंतर या धोरणाचा गोषवारा दिला आहे. मग प्रश्नोत्तरांच्या रूपात या धोरणाचे महत्त्वाचे मुद्दे समजावून सांगितले आहेत धोरणातल्या एखाद्या मुद्द्याचा अर्थ काय हे समजावून सांगितले आहे किंवा तो मुद्दा वाचल्यावर आपल्या मनातल्या शंकांचे निरसन केले आहे.

या धोरणाबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे सांगतो म्हणजे या धोरणाबद्दलची तुमची उत्सुकता आणि म्हणूनच पुस्तकाबद्दलची उत्सुकता अजून वाढेल.

आतापर्यंत शिक्षण पद्धती ही घोकंपट्टीवर आधारित होती. वाचा, घोका आणि पेपरात ओका !! त्यामुळे अभ्यास करणं म्हणजे बहुतेकांसाठी कंटाळावाणे काम. अभ्यासात हुशार असणारा पदवीप्राप्त मुलगा सुद्धा प्रत्यक्ष त्या क्षेत्रात काम करू शकेल का नाही याची आपल्याला खात्री नसते. दुसरे म्हणजे सायन्स कॉमर्स आर्ट्स अशी आपल्याकडे एक विनाकारण उतरंड तयार झाली आहे. त्यामुळे आवडीच्या क्षेत्रात हुशार विद्यार्थी न जाता काही विशिष्ट क्षेत्रातच जातात. त्यातून त्या विद्यार्थ्याचं आणि समाजाचंही नुकसान होतं. ह्या वैगुण्यांवर मात करण्यासाठी आता ठराविक एक अभ्यासक्रम असं न करता एक मुख्य विषय, एक सहविषय, प्रात्यक्षिक करून अनुभव घेण्याचा विषय, मग आवडीचा कलाविषय, एक दोन भाषा असा आपल्याला स्वतःला विषयांचा गुच्छ निवडायचा आहे. परदेशी विद्यापीठात आढळणारी मेजर मायनर सब्जेक्ट ची संकल्पना आता अशी रुजू होईल. हा खूप मोठा बदल आहे.

रोजच्या जगण्यातल्या साध्या साध्या गोष्टी जसं की सोपं सुतारकाम, इलेक्ट्रिकचं काम, इतर रिपेअरिंग पासून आपण ज्या क्षेत्रात काम करणार आहोत त्या क्षेत्रातले प्रॅक्टिकल उपकरण हाताळायचं काम आलं पाहिजे. अशा पद्धतीची रचना शाळेपासून "पीजी"पर्यंत केलेली आहे. जेणेकरून व्यक्ती फक्त पुस्तकी कीडा होणार नाही तर तिच्या अंगात अशी थेट जगण्याला भिडण्याची कौशल्ये असतील. अशी काम करताना सुद्धा किती मेहनत आणि कुशलता लागते हे जाणवल्यामुळे साहजिकच श्रमप्रतिष्ठा मनात निर्माण होईल. नवीन शिक्षण पद्धतीमधला हा बदल खूप आश्वासक आहे.

एकीकडे आधुनिक शिक्षण पद्धती म्हटलं की आपल्याला पाश्चात्य शिक्षण पद्धती डोळ्यासमोर येते तर दुसरीकडे भारतामधल्या जुन्या ग्रंथांमध्ये सगळं ज्ञान होतं असंही मत असतं. ही दरी सांधण्याचा प्रयत्नदेखील या शिक्षण धोरणात केलेला आहे. भारतीय परंपरागत ज्ञान समजावून सांगणारे विषय आता उपलब्ध असतील. आणि "विषयगुच्छा"त असा एक विषय निवडावा लागेल. हे अभिनंदनीय.

एका परीक्षेवर सगळे गुण न आधारित ठेवता वर्षभर केलेल्या कामाच्या मूल्यमापनाचे श्रेयांक (क्रेडिट्स) जमा करून पुढे जायचं आहे . काही कारणांनी शिक्षण थांबलं तरी हे क्रेडिट्स भविष्यात ग्राह्य धरले जातील .आणि जिथून शिक्षण सोडलं तिथून पुन्हा नव्याने शिकायला सुरुवात करता येईल.

हे धोरण केंद्र सरकारचं असलं तरी शिक्षण हा राज्य सरकारचा विषय असल्यामुळे या धोरणाच्या अंमलबजावणी कशी करायची हे त्या त्या राज्य सरकारवर आहे. महाराष्ट्रात या योजनेच्या या धोरणाची अंमलबजावणी सुरू होते आहे.
आता पुस्तकातली काही पाने उदाहरणादाखल वाचा. फोटोंवर क्लिक करून झूम करून वाचा.

क्रमिक पुस्तकांच्या उपलब्धतेची अडचण ह्यावरचा एक प्रश्न, भाषा शिक्षणाबद्दल एक प्रश्न.



वेगळ्या पद्धतीने परीक्षा घेण्याबद्दलाचा प्रश्न.



इंटर्नशिप apprenticeship शी निगडित प्रश्न 



धोरणाची बरीच वैशिष्ट्ये आणि त्यामागची भूमिका मला पुस्तकातून कळली. ही रचना खूप आदर्श आहे. जशीच्या तशी प्रत्यक्षात उतरली तर खूप फायदेशीरही आहे. पण भारतासारखा खंडप्राय देश, स्थितीशील समाज, कुठले ना कुठले वाद उकरून काढण्याची राजकीय खुमखुमी, सरकारी यंत्रणा आणि शिक्षण व्यवस्था यात माजलेला भ्रष्टाचार, लोकांची "चलता है" वृत्ती, प्रत्यक्ष मेहनत करण्यापेक्षा झटपट रिझल्ट मिळण्याची वृत्ती अशा कितीतरी अडचणी या धोरणापुढे आहेत. पुस्तकातही लेखकाने अंमलबजावणी विषयीच्या शंका उपस्थित केल्या आहेत पण त्याचे उत्तर देताना लेखकांनी घेतलेली भूमिका काही वेळा अतिआदर्शवादी आणि गोड गोड झाली आहे. पण या पुस्तकाचा उद्देश धोरणावर साधकबाधक चर्चा किंवा धोरणाच्या अंमलबजावणी वरची चर्चा नसून ते धोरण काय आहे हे समजावून देणं असं असल्यामुळे तिकडे आपण थोडं दुर्लक्ष करू शकतो. प्रत्येक स्तरावरचे शिक्षण आणि त्यातले पैलू यांच्या बद्दल प्रश्न आहेत त्यामुळे पुस्तक वाचताना आपण एखाद्या तज्ञासमोर बसून हे धोरण समजून घेतोय असंच वाटतं. शंका दूर होतात. आपल्या कदाचित लक्षात न आलेले पैलू समोर येतात.

इतक्या मोठ्या धोरणासाठी नेमके प्रश्न निवडणे आणि त्याची योग्य उत्तरे थोडक्यात देणे हे कठीण काम लेखक द्वयीने केले आहे. त्याबद्दल दोघांना प्रणाम !

शिक्षण धोरण जसेच्या तसे वाचून समजून घेण्यापेक्षा एक सर्वसामान्य नागरिक म्हणून अशा पद्धतीने समजून घेणे नक्कीच रोचक आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक असाल किंवा समाजाबद्दल आस्था असणारे कोणीही असाल तर पुस्तक वाचा आणि "सावध ऐका पुढल्या हाका" !!

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

मेड इन चायना (Made in China)



पुस्तक - मेड इन चायना (Made in China)
लेखक - गिरीश कुबेर (Girish Kuber)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - २५५
प्रकाशन - राजहंस प्रकाशन. मे २०२४
छापील किंमत - रु. ४५०/-
ISBN - 97881119625178

"लोकसत्ता" वृत्तपत्राचे संपादक गिरीश कुबेर ह्यांची आंतरराष्ट्रीय राजकारण, समाजकारण ह्यावरची बरीच पुस्तके गाजली आहेत. त्याच मालिकेतील अजून एक ताजे पुस्तक "मेड इन चायना". भारताचा शेजारी देश चीन बद्दल भारतीयांच्या भावना संमिश्र असतात. जुना देश आणि संस्कृती म्हणून ते आपल्यासारखेच आहेत अशी भावना असते. तर चीनच्या युद्धखोरीमुळे शत्रुत्व वाटते. स्वस्त आणि उपयुक्त चिनी उत्पदनांचं आकर्षण. तर जगाची उत्पादनक्षमता ताब्यात घेऊन जगावर नियंत्रण मिळवण्याच्या योजनेची धडकी. विज्ञान-तंत्रज्ञान-क्रीडा स्पर्धा ह्यांमध्ये चीनचा दबदबा निर्माण करण्यासाठी लहानपणापासून कठोर मेहनत करणाऱ्या चिनी लोकांबद्दल आदर. तर इंटरनेटचा वापरसुद्धा "सरकारी देखरेखीखाली" करायला लागतो असे आयुष्य जगणारे चिनी लोकांबद्दल सहानुभूती. अशा आपल्या संमिश्र भावना योग्यच आहेत. कारण चीन आहेच तसा. संमिश्र-व्यामिश्र. तो तसा का बनला ह्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न म्हणजे हे पुस्तक ""मेड इन चायना".

पुस्तकात सुरुवातील ऐतिहासिक चीन मध्ये कोणाची राजवट होती; कोणाचा पराभव करून कोण पुढे आले; काही शे-हजार वर्ष जुन्या काळात कुठले तत्वज्ञ होऊन गेले ह्याचा धावता आढावा घेतला आहे. मग माओंचा उदय कसा झाला ते थोडक्यात सांगितलं आहे. "कवी-क्रांतिकारी-क्रूरकर्मा" प्रकरणात माओंच्या व्यक्तिमत्त्वाचे परस्परविरोधी पैलू, चक्रमपणा ह्याबद्दलचे किस्से सांगितले आहेत.

तिथपासून पुढचा पुस्तकाचा भाग म्हणजे माओंपासून आत्तापर्यंत कोण कोण राष्ट्रप्रमुख झाले, ते त्यापदापर्यंत कसे पोचले ह्याची तपशीलवार माहिती आहे. भारताप्रमाणे तिथे लोकशाही नाही. एकपक्षीय सत्ता आहे. त्यामुळे माझी कल्पना अशी होती की तिथे पक्षांतर्गत चर्चा, वादविवाद होऊन पुढचा सत्ताधीश ठरत असेल आणि किमान वरच्या स्तरावर तरी घाणेरडे राजकारण, एकमेकांचे पाय ओढणे हा प्रकार नसेल. पण हे पुस्तक वाचताना लक्षात येतं की आपल्यापेक्षा भयंकर राजकारण तिथे चालतं. कारण जो राष्ट्रप्रमुख होतो तो सर्वसत्ताधीश हुकूमशहाच होतो. त्याच्या विरुद्ध काही मतप्रदर्शन केलं की सूडबुद्धीने कारवाई होणार. कधी तुरुंगवास, कधी दूर खेड्यात कष्टाचं जीवन जगण्याची शिक्षा तर कधी थेट मृत्युदंड. त्यामुळे विद्यमान राजा ऐन भरात असताना त्याची हांजी हांजी करणारे लोक उच्चपदांवर, मोक्याच्या पदांवर बसून माया गोळा करणार. विरोधी गट तोंडदेखलं समर्थन करून योग्य वेळेची वाट बघणार. राजाचा भर ओसरायला लागला की विरोधकांच्या कुरुबुरी सुरु. आणि काही वर्ष, काही बळी जात जात सत्तांतर झालं की पारडं दुसऱ्या बाजूला फिरणार. कालचे "राजनिष्ठ" आता "राजद्रोही" तर कालचे "क्रांतिकारी" आज "आदर्श कार्यकर्ते". जुन्या राष्ट्रप्रमुखाची सुद्धा तातडीने उचलबांगडी किंवा जाहीर अपमान सुद्धा ! मग तोच जुना खेळ पुन्हा सुरू.

माओंच्या काळात "डेंग शियाओपिंग" ह्यांना असा त्रास भोगायला लागला पण मागाहून ते सत्ताधीश झाले. आत्ताचे अध्यक्ष "क्षी जिन पिंग" ह्यांच्या वडिलांवर पण राज्यकर्त्यांची खप्पामर्जी झाली होती. त्यामुळे "क्षी जिन पिंग" तरुण असताना हालअपेष्टा आणि अपमान सोसत जगले. पण आता ते सत्तेत आहेत. आणि विरोधक त्रासात.

पुस्तकातला बराचसा भाग ह्या राजकीय खेळी, कोणी कोणी विरोध केला, कोणावर काय कारवाई झाली, किती लोक मारले गेले, कुठली आंदोलनं झाली, कशी चिरडली गेली, कशी फोफावली ह्याचे सुरस-चमत्कारिक किस्से आहेत. त्यामुळे चिनी राजकारणातली कितीतरी नावे ह्या विवेचनाच्या ओघात येतात.

चीन वाढत असताना अमेरिकेचं तिकडे लक्ष होतंच. रशिया तर कम्युनिस्ट म्हणून चीनला जवळचाच. ह्या देशांच्या राज्यकर्त्यांनी वेळोवेळी चीनबद्दल घेतलेली भूमिका हा भाग सुद्धा निवेदनाच्या ओघात येतो. लेनिन, गोब्राचेव्ह, किसिंजर, क्लिंटन, हो ची मिन्ह वगैरेंचे दाखले आहेत. चीनला कधी पाठिंबा, कधी विरोध. चीनची उत्पादनक्षमता बघून व्यापाराच्या दृष्टीने सहकार्य तर मानवाधिकार डावलले जातायत ह्याबद्दल नक्राश्रू ढाळणे हे पूर्वीपासून चालू आहे. गंमत म्हणजे पुस्तकात सुरुवातीला उल्लेख आहे की युरोप पेक्षा चीन प्राचीनकाळी प्रगत असल्यामुळे ते स्वतःला उच्चभ्रू समजत तर युरोपियन लोकांना रानटी, अप्रगत, अडाणी. त्यामुळे तेव्हाच्या चीनच्या राजाने ब्रिटनच्या राजदूताचा अपमान केला होता आणि अगदी अलीकडे "डेंग शियाओपिंग" ह्यांनी ब्रिटनच्या पंतप्रधान मार्गारेट थॅचर ह्यांचा. त्या इतक्या संतापल्या की ब्रिटनला परत आल्यावर म्हणाल्या "चीनच्या एकाही नेत्याला जागतिक अर्थव्यवस्था, व्यापार कसा चालतो ह्याची काडीचीही अक्कल नाही !"

पुस्तकाच्या निवेदनात एक दोन प्रकरणं चीनच्या आर्थिक धोरणांवर आहेत. विशेषतः "डेंग शियाओपिंग" ह्यांच्या अर्थनीतीमुळे - नियंत्रित भांडवलशाही -मुळे आज दिसणाऱ्या चीनची पायाभरणी कशी झाली हे सांगितलं आहे. "विशेष आर्थिक क्षेत्र" - special economic zone (सेझ) ही कल्पना त्यांनी मंडळी. सेझ मध्ये लोकांना मुक्तद्वार दिलं. कामगार कायदे, मानवीहक्क वगैरेंची फारशी तमा ना बाळगता उत्पादन करायला प्रोत्साहन दिलं. उत्पादन करताना त्यामागचं तंत्र, मंत्र आणि रहस्य सुद्धा शिकून घ्यायला आणि चक्क त्याची चोरी करायला प्रोत्साहन दिलं. त्यातूनच सुरु झाला चीनच्या वस्तूंनी जग काबीज करायचा प्रवास. चांगली उत्पादने पण तिथे बनू लागली आणि "चाले तो चांद तक, नाही तो शाम तक" अशी नकली उत्पादने पण तिथलीच. इंटरनेटवर नियंत्रण ठेण्यासाठी गूगल ला बंदी पण चीनचं गूगल - "baidu" तयार झालं. स्वतःची "फायरवॉल" सारखी तंत्रे विकसित केली. असे कुठले महत्त्वाचे निर्णय चीनने घेतले ह्याबाद्दल पुस्तकात माहिती आहे. "क्षी जिनपिंग" ह्यांचा पण मोठा वाटा आहे. ते आता तहहयात अध्यक्ष झाले आहेत. आपलं म्हणणं लोकांच्या गळी उतरवण्यासाठी तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर ते करतात. कोविड ची साथ, चीनचं "टाळेबंदी"चं कडक धोरण आणि त्यातून मंदावलेली अर्थव्यवस्था इथे पुस्तकाचा शेवट होतो. परिशिष्ठात चीनच्या व्यापाराबद्दल, संरक्षण धोरणाबद्दलची आकडेवारी आहे.

पुस्तकातला हा अर्थविषयक भाग थोडा गोंधळात टाकणारा वाटला. कारण एकीकडे सेझमुळे व्यापारवृद्धी झाली असं म्हटलं आहे तर दुसरीकडे चीनची अर्थव्यवस्था रसातळाला गेली; चलनवाढ, बेरोजगारी ह्यांनी कळस गाठला असं सुद्धा म्हटलं आहे. पुढे मध्येच चीनच्या आर्थिक प्रगतीबद्दल उदाहरणं आहेत तर मध्येच कशी अधोगती होते आहे ह्याचे. आता चीनची अर्थव्यवस्था उताराकडे लागली आहे असं लेखकाला वाटतं आहे. अर्थव्यवस्थेत चढउतार होत असतातच. पण पुस्तकातून १०६० ते २०२४ मधला आर्थिक प्रवास सलग डोळ्यासमोर उभा राहत नाही. भविष्याचा वेध घेतला जात नाही. लेखकाचे मुख्य लक्ष "राजकारण आणि सत्ताबदल" ह्याकडेच राहिले आहे.

काही पाने उदाहरणादाखल

अनुक्रमणिका


माओ आणि डेंग ह्यांच्यातला सुप्त संघर्ष



सेझ ची सुरुवात



मुक्त बाजारपेठेचे फायदे घेत स्वतःची बाजारपेठ मात्र नियंत्रित ठेवण्याचा चीनचा दुटप्पीपणा. परकीय गंगाजळीचा प्रचंड साठा ह्याबद्दल



भारत-चीन युद्ध ह्याविषयी बरंच लिखाण उपलब्ध आहे तर "डोकलाम- गलवान"वाद ह्याबद्दल फार माहिती उपलब्ध नाही. म्हणून हे दोन्ही मुद्दे पुस्तकात घेतले नाहीयेत असं लेखकाने मनोगतात स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पूर्ण पुस्तकात भारत फार क्वचित दिसतो.

माओंनी केलेली क्रांती, "ग्रेट लीप फॉरवर्ड", "सांस्कृतिक क्रांती" वगैरेचे संदर्भ पुस्तकात येतात. पण तो नक्की काय प्रकार होता हे जर तुम्हाला माहिती नसेल तर पुस्तकातल्या वाक्याचं गांभीर्य कदाचित लक्षात येणार नाही असं मला वाटलं. त्याबद्दल थोडं इंटरनेटवर वाचून मग हे पुस्तक वाचलं तर जास्त फायदा होईल.

आपण चिनी नावांचे उच्चार त्याच्या रोमन स्पेलिंग प्रमाणे करतो. पण त्यांचे खरे उच्चार वेगळे आहे. Mao Zedong ह्या स्पेलिंगमुळे त्याचं मराठी लेखन "माओ त्से तुंग", "माओ झेडॉंग" असं केलं जतन. पण त्याचा मूळ उच्चार साधारण "माओ द्झ दोंग". परिशिष्टात अशा नावांची आणि त्यांचे मूळ उच्चार देवनागरीत दिले आहेत.

चीन म्हणजे माओ आणि त्यांच्या विचाराने चालणारा देश अशीच माझी कल्पना होती. पण पुस्तक वाचून तो समज बदलला. नव्या चीन च्या धोरणात "डेंग" ह्यांचे योगदान, माओंच्या पूर्णपणे विरुद्ध आर्थिक भूमिका, नंतरच्या राजकारण्यांनी वेळोवेळी बदललेले पवित्रे आणि तरीही आम्ही "माओ आमचं दैवतच" हे म्हणत राहायची मखलाशी वाचून आपल्या राजकारण्यांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही.

गिरीश कुबेरांचे वृत्तपत्रातले लेख किंवा अग्रलेख वाचणाऱ्यांना त्यांचा मोदीविरोध, भाजपविरोध परिचित आहे. पुस्तकात मोदी, भाजप येत नसले तरी तिकडची हुकूमशाही वृत्ती आणि मोदी ह्यांच्यात कसं साम्य आहे जाता जाता सुचवायची संधी लेखकाने सोडली नाहीये हे पण चतुर वाचकाच्या लक्षात येईल.

चीन हा देश आणि त्याचं भूत-भविष्य-वर्तमान ह्यावर कितीही लिहिलं तरी कमीच आहे. गिरीश कुबेरांच्या ह्या पुस्तकातून चीनचं अंतर्गत राजकारण आणि आर्थिक निर्णयांची मालिका ह्याचा अंदाज मराठी वाचकाला येईल. पुस्तकातली नावे, मुद्दे, प्रसंग अजून कुतूहल निर्माण करतील. त्यादृष्टीने एक सकस वाचनानुभव म्हणून सुजाण वाचकांनी अवश्य वाचावं.




——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

Heart bones (हार्ट बोन्स )



पुस्तक - Heart bones (हार्ट बोन्स )
लेखिका - Colleen Hoover (कॉलीन हूवर)
भाषा - English (इंग्रजी)
पाने - ३२४
प्रकाशन - २०२०
ISBN - 9798671981742

"बेया" आणि "सॅमसन" अशा दोन तरुणांची ही प्रेमकहाणी आहे. बेया एक कॉलेज तरुणी तिच्या आईबरोबर राहते आहे. तिचे वडील परराज्यात राहतात. आईवडील एकत्र राहत नाहीयेत. बेयाची आई तरुण असताना घडलेल्या शरीरसंबंधातून - वन नाईट स्टॅन्ड मुळे - झालेली ही संतती. पण त्या तरुणाने आपली जबाबदारी पूर्णपणे स्वीकारलीही नाही आणि पूर्णपणे टाकलीही नाही. वर्षांतून काही वेळा तो मुलीला फोन करतो. वर्षातून एकदा दोन आठवडे स्वतःच्या घरी नेतो. पण मुलीचा आणि वडिलांचा प्रेमाचा धागा जुळला गेला नाहीये. तिची आई अमली पदार्थांच्या व्यसनाच्या आहारी गेलेली आहे. किडूकमिडूक कामं करून कधी पुरुषांशी सलगी करून ती पैसे मिळवते. पण एकूण मुलीकडे दुर्लक्षच. बेया कशीबशी काम करून पैसे मिळवते आहे. शिक्षण थोडंफार चालू आहे.

एकेदिवशी अमली पदार्थाच्या अतिसेवनाने बेयाची आई मरण पावते. बेया निराधार होते. घराचं भाडं थकलेलं असल्यामुळे घरमालक सुद्धा तिला घर सोडायला सांगतो. मनाचा हिय्या करून ती वडिलांना फोन करते. काय झालं आहे हे न सांगता फक्त त्यांच्याबरोबर थोडे दिवस राहायचं आहे असं सांगते.

वडिलांचं लग्न एका घटस्फोटितेशी झालं आहे. वडील, त्यांची बायको आणि तिची पहिल्या लग्नाची मुलगी असे ते एकत्र राहतायत. हे तिघे बेयाचं चांगलं स्वागत करतात. वडील प्रेमाने वागत असले तरी त्यांनी तिचा वडिलांवर रागच असतो. तिची सावत्र बहीण आपल्या मित्रांशी ओळख करून देते. त्यातल्या "सॅमसन"ला बॉयफ्रेंड बनव म्हणून मागे लागते. बेयाला ह्या कशातही रस नसतो. आपलं उद्ध्वस्त आयुष्य कसं सावरायचं ह्याची तिला चिंता सतावत असते. प्रत्येक वेळी तिची आणि सॅमसन ची भेट होते तेव्हा काहीतरी गैरसमजच होतात. दुसरीकडे सॅमसन सुद्धा घुमा, आपलं आपलं काम करणारा, पण श्रीमंत, तरी मुलींशी संबंध ठेवणारा आणि बेयात रस न घेणारा असा.

आपल्याला एकमेकांत काही रस नाहीये हे एकमेकांना सुचवत असतात. सांगत असतात. पण त्यातूनच "असं का" अशी उत्सुकता पण निर्माण होते. ते बोलू लागतात. पुढे त्यातून प्रेमकहाणी कशी फुलते, सॅमसन चं एक गुपित अचानक कसं बाहेर येतं; आणि त्या गुपितामुळे प्रेम पुन्हा कोमेजतं का? हे सगळं समजून घेण्यासाठी तुम्हाला कादंबरी वाचावी लागेल.

काही पाने उदाहरणादाखल

बेयाचे वडील तिला समजून घेण्याचा प्रयत्न करतानाचा संवाद



बेया आणि सॅमसन चा संवाद .. एकमेकांपासून थोडं लपवत, थोडं सांगत, थोडं विचारत चालणारं बोलणं




"ते दोघे भेटले, एकमेकांशी ओळख झाली, ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं" अशीच ही टिपिकल प्रेम कहाणी असली तरी भारतीय वाचकांसाठी थोडी वेगळी वाटेल. ह्याचं कारण ह्या कादंबरीत घडणाऱ्या घटना भारतीय समाजव्यवस्थेत आणि कुटुंब व्यवस्थेत इतक्या सहजपणे घडणं शक्य नाही. लग्नाआधी होणारं मूल वाढवणं; ते पण लग्न न करता त्या पुरुषाकडून बालसंगोपनाचे पैसे घेऊन... एखादी बाई मेल्यावर तिच्या पोरक्या मुलीची चौकशी करायला नातेवाईक, शेजारीपाजारी, समाजसेवी संस्था कोणी येत नाही. किती भयाण एकटेपण आहे ह्या समाजात. एक महिना सुट्टीवर गेलेल्या मुलीला तिची बहीण लगेच "बॉयफ्रेंड" बनवायला सांगते; "महिनाभर तर महिनाभर कर की एन्जॉय !!". मुलींची आई त्यांना स्पष्टपणे विचारते; "तुम्ही गर्भनिरोधनाचे उपचार केले आहेत ना .. म्हणजे तुम्ही काही करायला मोकळ्या". ज्याला बॉयफ्रेंड "करायचं" आहे तो दुसऱ्या मुलीशी लगट करतोय; पण काही हरकत नाही कारण दुसरी मुलगी दोन दिवसांनी बाहेरगावीच जाणार आहे. मग तो "अव्हेलेबल"च आहे. अजूनही बऱ्याच गोष्टी आहेत. ह्याच लेखिकेच्या "इट एन्ड्स विथ अस" कादंबरीत सुद्धा असेच अमेरिकन कुटुंब व्यवस्थेच्या थोड्या वेगळ्या समस्येचं दर्शन घडलं होतं. त्यामुळे हे पुस्तक वाचताना मूळ कथेपेक्षा ही सामाजिक निरीक्षणं वाचायला मला जास्त उत्सुकता वाटली.

पुस्तक वाचताना खूप उत्सुकता लागून राहत नाही. अर्धं पुस्तक "बेया" च्या निराधारपणाचे व त्यातून स्वभावात आलेल्या काडवटपणाचे कंगोरे रंगवण्यात गेलं आहे. तो भाग जरा जास्तच ताणला गेलाय. त्यामानाने सॅमसन चं गुपित तितकं ठोसपणे पटण्यासारखं मांडलं नाहीये. तो भाग मी पटापट वाचून उरकला.

तुम्हाला प्रेमकथा आवडत असतील तर वाचून बघा.



——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

समर्थांची लेक (Samarthanchi lek)



पुस्तक - समर्थांची लेक (Samarthanchi lek)
लेखिका - सारिका कंदलगांवकर (Sarika Kandalgaonkar)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १९९
प्रकाशन - संवेदना प्रकाशन, एप्रिल २०२४
ISBN - 978-81-1973783-3
छापील किंमत - रु. ३००/-

हे पुस्तक मला वाचायला उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वप्रथम लेखिका सारिका कंदलगांवकर ह्यांचे मी आभार मानतो !

गीतरामायणाल्या "दैवजात दुःखे भरता" गाण्यात ओळ आहे "मरणकल्पनेशी थांबे तर्क जाणत्याचा". मृत्यू म्हणजे काय? मृत्यूनंतर काय होते? हे कोणी स्वानुभवाच्या आधारे जाणून घेऊ शकत, म्हणून "तर्क" थांबतो...पण माणूस त्याबद्दल विचार करणं, कल्पना करणं थांबवत नाही. म्हणूनच या गीताच्या ओळीचा व्यत्यास असा की "मरणकल्पनेशी रंगे खेळ कल्पनांचा ". वेगवेगळ्या धर्मात, पंथात मृत्यूनंतरचं जीवन ह्याबद्दल वेगवेगळ्या कल्पना आहेत; आपापली एक विचारपद्धती आहे. त्यातलीच एक आहे की मृत्यूनंतर आत्मा राहतो. जर माणसाच्या इच्छा अपूर्ण राहिल्या असतील तर तो आत्मा भटकत राहतो. इच्छा पूर्ण करून घ्यायचा प्रयत्न करतो. जर अन्याय-अत्याचार-फसवणूक ह्यामुळे मरण आलं असेल तर तो आत्मा सूड घ्यायचा प्रयत्न करतो. तंत्र-मंत्र विद्येतून अशा आत्म्यांना वश करून घेता येतं. आत्म्याच्या अचाट शक्तीचा वापर करून घेऊन गुप्तधन मिळवणे, इतरांवर हुकूमत गाजवणे असे सुद्धा जमू शकते. तर इतर पूजापाठ, मंत्र-तंत्र वापरून ह्या भटकणाऱ्या आत्म्यांना मुक्ती मिळू शकते. त्यामुळे आत्मा, भूत, अतृप्त आत्मा, मांत्रिक, जादूटोणा, वशीकरण हे सगळे आपल्या परिचयाचे शब्द. भयपट, भयकथा ह्यांमधले परवलीचे शब्द. ह्याच शब्दांशी, त्यातून तयार होणाऱ्या अद्भुत कथानकाची गुंफण म्हणजे "समर्थांची लेक" ही कादंबरी.

ह्या कादंबरीची नायिका आहे एक युवती - अक्षता. तिच्या घराण्यात दत्तप्रभू, नाथसंप्रदाय ह्याची उपासना चालत आली आहे. त्यातून ह्या घराण्यातल्या व्यक्तींना सिद्धी प्राप्त झाली आहे की ते अतृप्त आत्म्यांना बघू शकतात. मंत्र, भस्म, गंगाजल वगैरे विधींचा वापर करून ते ह्या आत्म्यांना कायमची मुक्ती देऊ शकतात. तरुण अक्षता सुद्धा तिच्या सिद्धींचा वापर चांगल्यासाठी करते आहे. एखाद्या ठिकाणी अनाकलनीय घटना घडत असतील, माणसं अचानक मरत असतील किंवा एखादी जागा भुताने झपाटलेली असं कळलं की कोणाच्या नकळत तिकडे जाते. मग ते भटकणारे - सूडाने पेटलेले आत्मे तिच्यावर हल्ला करायचा कसा प्रयत्न करतात आणि ती त्यातून सहीसलामत कशी सुटते आणि आत्म्यांनाही मुक्ती देते ह्याचे अद्भुतरम्य प्रसंग पुस्तकात आहेत.


हे प्रसंग घडताना "पूर्वदृश्य" तंत्राचा वापर करून एक समांतर कथानक आपल्यासमोर उभं राहतं की ; तिचे आजोबा, वडील सुद्धा अशा प्रसंगांना कसे सामोरे जात होते. त्यांचे गुरु त्यांना दृष्टांत देत, तर कधी मंत्राची शक्ती. कधी दोन जादूगारांच्या लढाईप्रमाणे आत्म्याबरोबर लढाई, दोन मांत्रिकांची लढाई वगैरे. आपल्या शक्तीचा चांगल्यासाठी वापर करणारे अक्षताचे घराणे. तर त्यांना स्पर्धक म्हणजे ह्या शक्तीचा कपाटासाठी, ऐहिक स्वार्थासाठी वापर करणारी दुसरी टोळी. सुष्ट-दुष्टांच्या ह्या लढाईत हत्यारं आहेत - आत्मे, मंत्रतंत्र, अद्भुत शक्ती. ह्या लढाईत काय प्रसंग घडतील, कोण कोणाला कसा शह देईल, शक्तींची लढाई कशी होईल ह्या सगळ्या वर्णनातून साकार झाली आहे "समर्थांची लेक".


काही प्रसंग वाचा म्हणजे लेखिकेच्या शैलीची कल्पना येईल.

एका बाईचं बाळ तिच्यापासून हिरावून घेतलं होतं. त्या बाईचं भूत आता इतर लोकांना त्रास देत होतं. त्याबद्दलचा एक प्रसंग.




भुताखेतांवर ताबा मिळवण्याची अद्भुत शक्ती गुरु आपल्या शिष्यांना देत. अमर नावाच्या एका पात्राच्या शिक्षणावेळचा एक अद्भुत प्रसंग.





ज्यांना भयपट किंवा अशा पद्धतीच्या कादंबऱ्या आवडतात त्यांना ही कादंबरी आवडेल. मला ही अद्भुतता विशेष रंजक वाटत नाही. सुरुवातीला म्हटलं तसं "तर्क थांबवूनच" मृत्युपश्चातच्या जीवनाची कल्पना करावी लागते. त्यामुळे असे लेखन म्हणजे लेखिकेने स्वतः उभारलेले विश्व. ती म्हणेल ते नियम. त्यामुळे काही वेळा अचाट शक्ती असणारी पात्र आजूबाजूचं जग स्तब्ध करतात, अंतर्ज्ञानाने सगळं जाणतात, मेलेल्याला जिवंत करतात पण तीच पात्र मध्येच हतबल होतात, "जे होणार आहे ते होणारच" असं म्हणतात; "आपण कोणाचा जन्म आणि मृत्यू बदलू शकत नाही" असं म्हणतात. ते मला सुसंगत वाटत नाही. काही वेळा, पुढे काय होणार आहे हे त्यांना दिसतं आणि काही वेळा ते भविष्यच बदलायचा प्रयत्न करतात. काही वेळा आत्म्याची शक्ती येते; काही वेळा जाते. असं खूप गोंधळात टाकणारं चित्रण आहे. ह्या कादंबरीतच नाही पण एकूणच भयपट, भुताच्या गोष्टी किंवा "सुपर ह्युमन फँटसी" प्रकारचे हॉलिवूड चित्रपट ह्यामध्ये पण गोंधळ नेहमी दिसतो. त्यामुळे थोडे प्रसंग वाचायला मजा येते पण पुढेपुढे ते एकसुरी आणि न जुळणारे वाटतात. ही कादंबरी पण त्याला अपवाद नाही. त्यामुळे मी खूप आनंद घेऊ शकलो नाही.

तुम्हाला भुताच्या गोष्टी मनापासून आवडत असतील तर कादंबरी वाचून बघा.


——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

The housemaid (द हाऊसमेड)





पुस्तक - The housemaid (द हाऊसमेड)
लेखिका - Freida McFadden (फ्रीडा मॅकफॅडन)
भाषा - English (इंग्रजी)
पाने - ३०६
प्रकाशन - पेंग्विन रँडम हाऊस. २०२२
ISBN - 978-0-143-46115-9
छापील किंमत - रु. ४९९/-

फ्रीडा मॅकफॅडन लिखित ही एक रहस्यमय कादंबरी आहे. पुस्तकाची सुरवात होते की एका घरातल्या वरच्या मजल्यावर एक मृतदेह सापडला आहे. पोलीस येऊन चौकशी करतायत. त्या प्रसंगातल्या बाईला वाटतंय की पोलीस आता आपल्याला पकडणार. दोन पानांत ही घटना आहे. पण ती बाई कोण, मृतदेह कोणाचा हे लेखिका सांगत नाही. पुढे एकदम तीन महिन्यांपूर्वीच्या घटनांनी कादंबरीच्या कथनाची खरी सुरुवात होते. "मिली" नावाची एक बाई "नीना" नावाच्या बाईकडे घरकामासाठी - हाऊसमेड म्हणून - कामाला आली आहे. मोठं श्रीमंत घर. नीना, तिचा नवरा अँड्र्यू आणि लहान मुलगी "सिसी" असं कुटुंब. एवढ्या मोट्ठ्या बंगल्यात श्रीमंतांकडे चांगल्या पगाराची नोकरी मिळणार म्हणून मिली खुश आहे. सध्या ती बेघर आहे. एक जुनाट कार हेच तिचं घर. जुन्या कामावरून काढून टाकलेले. त्याहून महत्त्वाचे म्हणजे तिचा भूतकाळ... तुरुंगातून राहून सध्या ती "पॅरोल" वर. नीनाला हे बहुतेक माहित नसावं, म्हणूनच तिने नोकरीवर ठेवलं असावं.

नोकरी लागल्यावर तिला जाणवतं नीना चक्रम सारखी वागतेय. स्वतःच घरभर पसारा करते आणि मिलीला ओरडते. आधी एक काम सांगते आणि नंतर ते काम केल्याबद्दल मिनीलाच झापते, "तू हे का केलंस, मी तर असं सांगितलंच नव्हतं". तिचा नवरा अँड्र्यू मात्र तिचे हे सगळे रुसवे सहन करतोय. अगदी चांगला नवऱ्यासारखा वागतोय. पण पुढे पुढे मिलीला कळतं की वरवर चांगलं दिसत असलं तरी काहीतरी कुरबुरी आहेत. काहीतरी गडबड आहे.

मिलीला राहायला दिलेली खोली पोटमाळ्यावरची. कोंदट. एखादा बेड, छोटं कपाट, छोटा फ्रीज अशी. खास म्हणजे दारालाही फक्त बाहेरून कुलूप लावता येईल अशी खोली. असं का बरं असावं ? हीच खोली मिलीला का दिली असावी ? निनाच्या चक्रमपणामागे काही तब्येतीचं कारण असेल का स्वभावच तसा? अँड्र्यू सगळं इतक्या शांतपणे सगळं कसं घेतो ? निनाला कंटाळून मिलीबद्दल त्याला आकर्षण वाटलं तर ? त्यांना मिलीच्या भूतकाळाबद्दल कळलं तर ? किंवा मिलीला ह्या दोघांच्या भूतकाळाबद्दल कळलं तर ? का ह्या खोलीचा काही भूतकाळ असेल ? तुरुंगातून आलेली मिली काही गुन्हा करेल का ? हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर कादंबरी नक्की वाचा.

कादंबरीच्या पहिल्या भागात मिली निवेदक आहे, दुसऱ्या भागात नीना. पुन्हा मिली आणि शेवटी पुन्हा नीना. अशा शैलीत दोन्ही कडच्या वेगळ्या वेगळ्या वेळी घडणाऱ्या घटना दाखवल्या आहेत. त्यातून हळूहळू पूर्ण कथानक आकाराला येतं. निवेदनाचा भर प्रसंगाच्या महत्त्वाच्या भागावर आहे. नेपथ्यरचनेची फापटपसारा वर्णनं नाहीत. त्यामुळे प्रत्येक पान वेगवान आहे. उत्कंठावर्धक आहे. कथानक अनपेक्षित वळणं घेते पण ती अतर्क्य नाहीत. कादंबरीत एका क्षणी एक पात्र खलनायक आणि एक नायक असं स्पष्ट चित्र उभं राहतं. खलनायकाचा हलकटपणा बघून त्याला आता कसा धडा शिकवला जातो हे बघायला आपणही उतावीळ होतो.

ही रहस्य कथा असल्यामुळे दोन तीन पानांचे फोटो देऊन काही उपयोग नाही. त्या प्रसंगाचा संदर्भ नसेल तर त्यात काही विशेष वाटणार नाही. जास्त पानांचे फोटो दिले तर कथेचा अंदाज येऊन भावी वाचकांचा रसभंग होईल. म्हणून ह्या परीक्षणात फोटो देत नाही.

पात्रांच्या तशा वागण्यामागे एक मनोवैज्ञानिक सूत्र आहे. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचा खोलवर प्रभाव कसा पडतो, त्यातून मनोविकृती कशा रुजतात हा कथानकाचा अंतःप्रवाह आहे. त्यातून कथानकाचं वैचारिक वजन वाढलं आहे. रहस्यकथा, गुन्हेगारी कथा म्हटलं की, हे असं कसं घडू शकतं; इतक्या गुप्तपणे कसं घडेल, सगळेच कसे सामील होऊ शकतील .. असे प्रश्न पडतात. ह्या पुस्तकातल्या प्रसंगांची चिरफाड केली तर असे "loose ends" सापडतीलही. पण वाचन थांबवावं असं काही लक्षात येत नाही. प्रसंगांचा झपाटा असा आहे की असे प्रश्न चट्कन उभे राहत नाहीत, किंवा मनात आले तरी आपण तात्पुरतं "असं झालं असेल" हे गृहीत धरून पुढे जातो. हे लेखिकेचं सामर्थ्य.

म्हणून ही कादंबरी मला आवडली. मी सहसा गूढकथा वाचत नाही. एक काल्पनिक खून आणि त्या खुनाचा शोध हे वाचायचा मला कंटाळा येतो. पण इथे तसं नव्हतं. नेहमीच्या ललित कादंबरी सारखे प्रसंग होते. आणि त्यातून रहस्य तयार होत होतं. ते वाचायला मजा आली. रंजक कादंबरी तुम्हालाही आवडेल.



——————————————————————————-

मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

निसर्गपुत्र (Nisargaputra)



पुस्तक - निसर्गपुत्र (Nisargaputra)
लेखक - लायल वॉटसन (Lyall Watson)
अनुवाद - निरंजन घाटे (Niranjan Ghate)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १४६
मूळ पुस्तक - The Lightning Bird (द लायटनिंग बर्ड)
मूळ पुस्तकाची भाषा - इंग्रजी (English)
प्रकाशन - मेहता पब्लिशिंग हाऊस. फेब्रुवारी १९८९
ISBN - 9789357209465


हे पुस्तक अ‍ॅड्रियन बोशियर (Adrian Boshier) ह्या इंग्लिश तरुणाची विलक्षण सत्यकथा आहे. सोळाव्या वर्षी हा तरुण आफ्रिकेत आला. आपलं पाश्चात्त्य पद्धतीचं शहरी जीवन त्याला आवडत नव्हतं. त्याला आवड होती फिरायची, जंगलात भटकायची. तसा तो फिरला. दक्षिण आफ्रिकेच्या रानावनांत एकटा फिरला. डिस्कव्हरी चॅनल वर "मॅन वर्सेस वाईल्ड" दाखवतात तसं. पण पूर्णपणे खरं. ह्या मालिकेपेक्षाही त्यापेक्षाही कठीण. कारण त्याच्याकडे असायचं फक्त एक चाकू आणि थोडं मीठ. जंगलात राहायचं. मिळेल तिथे झोपायचं. जमेल त्या प्राण्याची, पक्ष्याची, किड्याची शिकार करून खायचं. जणू तो जंगलाशी एकरूप झाला होता. आदिमानव झाला होता. त्यामुळेच जेव्हा त्याचा आफ्रिकेतल्या आदिवासी लोकांशी संबंध आला तेव्हा "गोरा असूनही काळ्यांसारखाच" वागणारा माणूस आदिवासींना जाणवला. त्यांना आश्चर्य वाटलं. मात्र त्या लोकांनी त्याला आपल्यात सामावून घेतलं. त्यातून तो ह्या आदिवासींच्या भाषा शिकला, चालीरीती शिकला. त्यांच्या समजुती, श्रद्धा जाणून घेतल्या. हे सगळं त्याचं स्वान्त:सुखाय चालू होतं. जंगलात हिंडायचं आणि मध्येच शहरात यायचं अशी त्याने वर्षानुवर्षे काढली. एकदा त्याची भेट प्राध्यापक रेमंड डार्ट ह्यांच्याशी झाली. प्रागैतिहासिक आफ्रिका ह्या विषयाचे ते अभ्यासक. अ‍ॅड्रियनने आपले अनुभव सांगितल्यावर किती महत्त्वाची माहिती, पुरावे ह्यातून आपोआप गोळा होतायत हे त्यांना जाणवलं. त्यांनी अ‍ॅड्रियनला मार्गदर्शन करून माहिती गोळा करण्याला दिशा दिली. त्याने जमवलेली माहिती आणि वस्तू हे संग्रहालयात उपयोगी ठरेल ह्या हिशेबाने त्याला आर्थिक मानधनाची सुद्धा तरतूद केली. ह्यातून आपल्या समोर आलं आदिवासीचं भन्नाट जग ! आदिमानवाशी नातं सांगणाऱ्या वस्तू, प्रथा, गुहाचित्रं ह्यांचा खजिना. ह्या सगळ्याचा अर्थ लावण्याचा नवा दृष्टिकोन.

१९७८ मध्ये वयाच्या अवघ्या ३९व्या वर्षी अ‍ॅड्रियनचं निधन झालं. पण त्याने लिहून ठेवलेल्या नोंदी, रोजनिशी, त्याच्या मित्रांच्या मुलाखती ह्यावर आधारित "द लायटनिंग बर्ड" पुस्तक लायल वॉटसन ह्यांनी लिहिलं. त्याचाच हा मराठी अनुवाद. अ‍ॅड्रियन बोशियर चा हात धरून आपण जंगलात फिरतो. कठीण डोंगर चढतो. गुहेत राहतो. सापांशी खेळतो. आदिवासींच्या गावात राहतो. त्यांच्या परंपरा - जादूटोणा शिकतो. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं नियंत्रण "आत्मे" करतात हा त्यांचा दृष्टिकोन समजून घेतो. कधीच न अनुभवलेलं जग आपण ह्या पुस्तकात अनुभवतो.

पुस्तकात बरीच प्रकरणे आहेत. त्यातल्या निवडक प्रकरणात काय आहे हे थोडक्यात सांगतो.

१) हाडे - आफ्रिकेतल्या मांत्रिकाला "डिंगाका" म्हणतात. त्याच्याकडे वेगवेगळ्या प्राण्यांच्या हाडांपासून तयार केलेले फासे असतात. त्यावर नक्षी असते. असे फासे फेकले की त्यांची जी रचना होते. त्यातून ते भविष्य सांगतात.

२) "लिकोमेंग - गूढ कुजबुज" - भटकंती दरम्यान बोशीयरने हाडाची सुरी वापरली होती. अजूनही आदिवासी ती वापरतात. बोशीयरला त्याचं नवल वाटत नव्हतं. पण प्राध्यापकांच्या भेटीनंतर अशी सुरी हा किती महत्त्वाचा ठेवा आहे हे त्याला उमगलं. त्याचे अजून अनुभव आणि प्राध्यापकांशी भेट ह्याबद्दल हे प्रकरण आहे.

३) खडक - गोल गरगरीत दगड हे सुद्धा आदिमानवांचे आयुध. हे दगड वापरून इतर दगडांना आकार दिला जातो. त्याचा अनुभव.

४) "मोरूतिवा - विद्यार्थी" - जंगलात कसं राहायचं, तगायचं हे शिकण्याचे अनुभव. जंगलात झोपायचं कसं ? तर पोटावर, पाय ना मुडपता. कारण माहितीये? अंग मुडपून झोपलं तर उबेला प्राणी, साप आश्रयाला येतात. एकदा तो सकाळी उठला तर "पफ अ‍ॅडर" नावाचा विषारी साप ! असे शिकारीचे, साप पकडण्याचे रोमहर्षक अनुभव ह्यात आहेत.

५) "पितला - नागाचा जन्म" - विषारी साप, अजगर पकडण्याचे अनुभव. त्यात तो इतका माहीर झाला की आदिवासी त्याला म्हणू लागले "राडिनोगा" - म्हणजे सापांचा बाप.

६) "रक्त" - अफ्रीकनांची "मोया" ही संकल्पना. एखादी गोष्ट वैशिष्ट्यपूर्ण आहे असं वाटलं की त्यात मोया आहे असं म्हणतात. जीवनझरा किंवा आत्मिकबल असं त्याचं स्वैर भाषांतर करता येईल.

७) "फोकोलो - आजार" - बोशीयरला अपस्माराचा त्रास होता. "फिट" यायच्या. पण आफ्रिकन लोकांच्या मते असा आजार म्हणजे उलट दैवी शक्ती. बोशीयरच्या "अंगात येत होतं". त्याला मान मिळत होता.

८) "लेडी बोगो - पाण उतार" आणि "मोहालासना - झुडूप". जंगलात गुहांमध्ये , खडकांच्या निवासस्थानांत बरीच चित्र काढलेली रंगवलेली दिसतात. युरोपियन लोकांनी त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. पण मूळ आफ्रिकन परंपरांची जाणीव नसल्यामुळे काही वेळा चुकीचे अर्थ लावले गेले. बोशीयरला थेट आदिवासींकडून खरे अर्थ कळले. उदा. एका गावाच्या तटावर एक चेहरा, त्याभोवती लंबवर्तुळाकार नक्षीकाम होतं. मुलाच्या जन्माचं हे चित्र आहे. आणि त्याचा अर्थ या गावात सुईण आहे. अशा वेगवेगळ्या आकृत्यांबद्दल ह्या प्रकरणांत आहे.

९) "मोरारा - महान वेल" - आदिवासींना औषधी वनस्पतीचे ज्ञान असते. त्यांचे मांत्रिक करत असलेले असलेले विधी हे थोडे वैज्ञानिक थोडे मनाला उभारी देणारे तर काही खरंच श्रद्धेच्या बळावर सभोवताल समजून घेण्याचे असतात. सरसकट "थोतांड" किंवा अंधश्रद्धा म्हणून त्याची बोळवण करता येणार नाही. हा अनुभव बोशीयरने स्वतः घेतला. त्याने स्वतः मांत्रिकाची दीक्षा घेतली. विधी शिकला. दुसऱ्या मांत्रिकाने केलेली जादू सुद्धा त्याने उलटवून दाखवली.

१०) पुढची प्रकरणे - फिरता फिरता एका गुहेत लपवलेले पारंपरिक नागरे त्याला दिसले. गावकऱ्यांना त्यांनी त्याची माहिती दिली. त्यातून जुन्या परंपरांना उजाळा मिळाला. ह्या नगाऱ्यांचे पुनरुज्जीवन करण्याचे विधी, ते वाजवून पावसाची आळवणी करण्याचे विधी हे प्रसंग त्यात आहेत.

काही पाने उदाहरणादाखल वाचा. फोटोंवर क्लिक करून झूम करून वाचा. 

"रासेबे" नावाची मांत्रिक बोशीयरला मांत्रिक दीक्षा देते, त्याचा अभ्यास शिकवते त्यातला एक प्रसंग 
 


विषारी नागाशी - "मांबा"शी - झटापट
गुहाचित्रांचा अर्थ 

वरची पाने वाचताना लक्षात आलं असेल की मराठी अनुवाद फर्मास जमला आहे. मराठमोळे शब्द वापरले आहेत. त्यांचे विधी किंवा त्यामागचे तत्वज्ञान सांगताना भारतीय संस्कृतीतले शब्द वापरले आहेत. त्यातून नेमका आशय वाचकापर्यंत पोचतो. ह्याबद्दल अनुवादक निरंजन घाटे ह्यांचे मनापासून आभार. 
भारतातही आदिवासी आहेत पण आधुनिक जगाशी ते बऱ्यापैकी जोडले गेले आहेत. त्या तुलनेत आफ्रिकन आदिवासी जास्त पारंपरिक जीवन जगतायत ते मागासलेले आहेत असं आपण म्हणू शकत नाही हेच ह्या पुस्तकाच्या वाचनातून जाणवतं. निसर्गाचे सान्निध्य, त्याची ओळख आणि पूरक जीवनशैली ते जगतायत. निसर्गाचे सौंदर्य आणि क्रौर्य दोन्ही अनुभवत त्यातून शिकत, पंचमहाभूतांची भीती बाळगत ते जगतायत. आधुनिक शहरे, खेडी, पदे, वस्ती, आदिवासी आणि आदिमानव ह्या मानवी सामाजिक बदलाची महत्त्वाची कडी ते आहेत. बोशीयरच्या लिखाणातून ह्या पुस्तकातून ती घरबसल्या अनुभवायची संधी आपल्याला मिळते. चोखंदळ वाचक ती हातची घालवणार नाही.

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

इंडियाज रेल्वेमॅन (India's railwayman)

पुस्तक - इंडियाज रेल्वेमॅन (India's railwayman) लेखक - राजेंद्र बी. आकलेकर (Rajendra B. Aklekar) अनुवाद - अनुराधा राव (Anuradha Rao) भा...