पथेर पांचाली (Pather Panchali)


पुस्तक : पथेर पांचाली (Pather Panchali)

लेखक : बिभूतिभूषण बॅनर्जी ( Bibhutibhushan Banerjee)

भाषा : मराठी (Marathi)

मूळ पुस्तकाची भाषा : बंगाली (Bengali) 

अनुवाद : प्रसाद ठाकूर  (Prasad Thakur)

पाने : ३२८

ISBN : 9789353173890

पथेर पांचाली ही अतिशय लोकप्रिय कादंबरी आहे. याच कादंबरीवरचा सत्यजित रे यांचा चित्रपट सुद्धा खूप गाजलेला आहे . बंगाली भाषेतली कादंबरी प्रसाद ठाकुर यांनी मराठीत अनुवादीत केली आहे


लेखकाबद्दल पुस्तकात दिलेली माहिती 

अनुवादकाबद्दल पुस्तकात दिलेली माहिती

ब्रिटिश कालीन बंगालमधल्या एका लहानशा खेड्यात राहणाऱ्या एका गरीब ब्राह्मण परिवारातील व्यक्तींची ही गोष्ट आहे. नवरा-बायको आणि त्यांची दोन मुलं(दुर्गा व अपू) ही मुख्य पात्रं आणि आजूबाजूचे शेजारी, गावकरी इत्यादी सहपात्रं असं पुस्तकाचं स्वरूप आहे. गरिबीमुळे शी परिस्थिती अशी भोगावी लागते; कोंड्याचा मांडा करुन राहावं लागतं याचे प्रसंग पुस्तकात आहेत. एकच एक सलग कथानकापेक्षा छोट्या छोट्या घटना एकेका गोष्टीप्रमाणे लिहिल्या आहेत. प्रत्येक गोष्टीला नाव आहे. ही त्यावेळच्या कादंबऱ्यांमध्ये आढळणारी नेहमीची पद्धत आहे.

लहान मुले म्हटले  की आपल्या या कल्पनाशक्तीने खेळ खेळणार, लहान मुलांमध्ये रमणार, खोड्या काढणार, काहीतरी चुकीची कामे करून गोंधळ घालणार, तर कधी मारामारी करणार. कादंबरीतल्या बऱ्याचशा गोष्टी या प्रकारच्या आहे आहेत. लहान भावंडांच्या खोड्या, खेळ, भेटणारे मित्र असे प्रसंग यात आहेत. त्याचं एक उदाहरण कवड्यांच्या खेळाचं.




गावातली पोरं म्हटल्यावर त्यांचे खेळ पण दगड, माती, पाणी , झाडंझुडपं यांच्याशी जोडलेले. निसर्गत मुक्त हिंडत आपली लहर होईल तसा आनंद घेत जगायचं. त्यातला एक प्रसंग. 




गरीब माणसाला शारीरिक कष्ट करावे लागतातच आणि मानसिक कष्ट व अपमानही झेलावे लागतात. या अपमानाचे काही प्रसंग पुस्तकात आहेत. दुर्गावर आलेल्या चोरीच्या आळाचा हा प्रसंग.






दुर्दैव सुद्धा कुटुंबाच्या पाचवीला पुजलेलं आहे. त्यामुळे कुटुंबियांचे अकाली मृत्यु धंद्यात अपयश  हे सुद्धा कादंबरीत आहे. नवऱ्याच्या मागे मुलं वाढवताना सर्वजायला मोलकरीण व्हावं लागलं.





अशी अतिशय करूण कादंबरी आहे.  पण "अपू"  सोडला तर इतर पात्रांच्या मनात डोकावायचा खूप प्रयत्न केलेला दिसत नाही केलं. त्यांच्याशी आपण समरस होत नाही. त्यामुळे दुर्दैवाचा दशावतारांची जंत्री असं कादंबरीचे स्वरूप वाटतं .

खेड्यातील जीवन, तिथलं दैन्य, शेतकऱ्यांची वाईट अवस्था इत्यादीवर दिवस आधारित "गोदान", "बारोमास"; लहान मुलाच्या भावजीवनावर आधारित  "पाडस"; "श्यामची आई" ही पुस्तकं प्रचंड प्रभावशाली आहेत . त्यामुळे ही कादंबरी गाजायचं कारण काय हे मला कळलं नाही. कदाचित, शंभर वर्षांपूर्वी पुराणातल्या चमत्कारांच्या, देवादिकांच्या, राजे महाराजांच्या कथा साहित्यातून प्रगट होत असतील; तेव्हा खरं जीवन जसं आहे तसं समोर ठेवणारी कादंबरी असल्यामुळे आवडली असेल. आता अशा प्रकारचे साहित्य खूप लिहिलं जातं. त्यामुळे या कादंबरीचा वेगळेपणा जाणवत नाही. शहर असो वा गाव, आता जगण्याची क्लिष्टता देखील खूप वाढली आहे. त्यामुळे ही कादंबरी फार सपक, सरधोपट वाटते.

अनुवाद मात्र छान झाला आहे. कुठेही बोजडपणा, कृत्रिमपणा आलेला नाही. त्यामुळे वाचताना कंटाळा येत नाही .


----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------





----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
---------------------------------------------------------------------------------

Mother Teresa (मदर टेरेसा)

 




पुस्तक - Mother Teresa (मदर टेरेसा)
लेखक - Meg Greene (मेग ग्रीन)
भाषा - English (इंग्रजी)
पाने - १५२
ISBN - 978-81-8495-357-2

मदर टेरेसा हे नाव ऐकलं नाही ही असा माणूस विरळाच. गरिबांची सेवा आणि ख्रिश्चन धर्मप्रसारासाठी आपला आयुष्य स्वार्थी केलेल्या मदर टेरेसा यांचं हे चरित्र आहे. मदर टेरेसा यांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत आणि मृत्यूनंतर त्यांना मिळालेल्या ख्रिश्चन संत पदापर्यंतचा पूर्ण कालावधी यात समाविष्ट आहे. त्यांच्या आयुष्यातले महत्त्वाचे टप्पे, त्यांनी घेतलेले निर्णय, त्यांच्या निर्णयावर प्रभाव पाडणाऱ्या व्यक्ती यांची माहिती आपल्याला पुस्तकातून मिळते. अजिबात पाल्हाळ न लावता; कादंबरी प्रमाणे प्रसंगांचं सादरीकरण असं न करता एखाद्या अधिकृत रिपोर्ट प्रमाणे प्रसंग आणि तथ्य सांगितलेली आहेत. पुस्तकात लेखकाने स्वतःची मते मांडलेली नाहीत. त्यामुळे बरेवाईट प्रसंग आणि मदर टेरेसा यांच्यावर झालेल्या टीका व स्तुती अशा दोन्ही बाजू समतोल प्रमाणात पुस्तकात आल्या आहेत.




वयाच्या सोळा सतराव्या वर्षी मदर टेरेसा यांनी स्वतःचं जीवन ख्रिश्चन धर्मप्रसारासाठी वाहून घ्यायचं ठरवलं. भारतातून आलेल्या धर्मप्रसारकांचं सेवाकार्य त्यांनी ऐकलं होतं त्यामुळे त्या गटालाच जाऊन मिळायचं त्यांनी ठरवलं आणि त्या भारतात आल्या. सुरुवातीला कलकत्त्यातल्या एका कॉन्व्हेंट स्कूल मध्ये शिक्षिका म्हणून त्या काम करू लागल्या. त्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल पुस्तकातला हा मजकूर. 


पुढे कलकत्त्यातली गरिबी बघून आपलं काम गरिबांची सेवा करावी, तेच जीझसचं रूप आहे असं त्यांच्या मनाने घेतलं. एका रेल्वे प्रवासात त्यांना जणू साक्षात्कार झाला की हेच आपलं जीवनध्येय आहे. तो प्रसंग पुस्तकात आहे. त्यांनी स्वतःचा नवीन पंथ काढायचं ठरवलं जो गरीबांच्या सेवेसाठी समर्पित असेल, स्वतः गरीब राहून गरिबांची सेवा करेल. परंतु ख्रिश्चन धर्म हा अतिशय संघटित आहे. नन पासून पोपपर्यंत व्यवस्थापनाची उतरंड असणार आहे. त्यामुळे त्यांना स्थानिक धार्मिक अधिकार्‍यांपासून पोपर्यंत सर्वांची परवानगी घ्यावी लागली. पुढे आयुष्यातही त्यांच्या पंथाच्या विस्तारासाठी धर्मसत्तेची परवानगी मिळवणे, त्यांची मदत मिळवणे हा भाग पुस्तकात वारंवार येतो. त्यातून ख्रिश्चन धर्मियांच्या धर्मप्रसारासाठी चाललेल्या अतिशय शिस्तबद्ध जागतिक योजनेची कल्पना आपल्याला येते. त्यातल्या सुरुवातीच्या परवानगी मिळवण्याच्या अनुभवाबद्दल हे थोडंसं.





नवीन पंथ सुरू केल्यावर झोपडपट्टीत जाऊन मुलांना शिकवणं त्यांनी सुरू केलं. आधी उघड्यावरच आणि मग एखाद दुसऱ्या खोपटात शाळा सुरू झाली. आजूबाजूला आढळणाऱ्या विकलांग मरणप्राय व्यक्तींना आसरा देऊन मरताना त्यांच्यासाठी प्रार्थना म्हणणे त्यांना प्रेमाने निरोप देणे हा प्रकार त्यांनी सुरू केला. हळूहळू यांना साथीदार जोगीणी मिळत गेल्या. प्रसंगी विरोधही झाला. उदा. मारणाऱ्या लोकांसाठी "निर्मल हृदय" त्यांनी काली मंदिराच्या बाजूला स्थापन केलं. त्यामुळे देवाच्या ठिकाणी अशी संस्था नको म्हणत विरोध झाला. कुष्ठरोग्यांसाठी काम सुरू केल्यावर आपल्या विभागात असलं काम नको म्हणून काही वेळा लोकांचा विरोध झाला. पण त्यांनी आपलं काम निष्ठेने सुरू ठेवलं.

गरीब राहणं ही त्यांच्या पंथाची प्रतिज्ञा होती. त्या गरिबीचा आणि लोकांकडून मिळणाऱ्या मदतीचा अनुभव त्यांना रोज येत होता त्यातलेच हे काही प्रसंग.


त्यांच्या पंथाची पुरुष शाखा सुद्धा पुढे त्यांनी सुरू केली. चर्चच्या नियमाप्रमाणे महिला असल्यामुळे त्या स्वतः याचे नेतृत्व करू शकत नव्हत्या. त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीची नेमणूक त्यांना करावी लागली. पण सर्व अधिकार स्वतःकडे ठेवायची त्यांची वृत्ती असल्यामुळे त्या नव्या प्रमुखाबरोबर अनेकदा त्यांचे वाद झाले. शेवटी त्या प्रमुखाने हे पद सोडलं आणि तेरेसाना साजेशी भूमिका असणाऱ्या माणसाची या पदी नियुक्ती झाली.

आपला पंथ जगभर पसरवण्याची परवानगी पुढे चर्चने त्यांना दिली. यातून मदर तेरेसा यांचे देशोदेशी दौरे सुरू झाले. वेगवेगळ्या ठिकाणी अनाथ मुलांसाठी अनाथाश्रम, मरणासन्न व्यक्तींसाठी आश्रम, नैसर्गिक संकटामध्ये मदत कार्य इ. सुरू झाले. देशोदेशींचे लोक त्यांना येऊन मिळाले. काही जमेल तशी मदत करू लागले. सामान्य लोकांपासून राष्ट्रप्रमुखांपर्यंत आणि उद्योगपतींपर्यंत त्यांची ऊठ-बस वाढू लागली. मोठमोठ्या देणग्या मिळू लागल्या या सगळ्या घटनांचा उहापोह पुस्तकात आहे. त्यांच्या कामाबद्दल विविध देशांच्या प्रसारमाध्यमांमध्ये कार्यक्रम झाले, वृत्तपत्रांत लेख लिहून आले. त्यातून त्यांची प्रसिद्धी अजून वाढत गेली. त्यातले काही महत्त्वाचे टप्पे प्रसंग, मुलाखती इ. त्याबद्दल या पुस्तकात लिहिले आहे




जसजशी मदर टेरेसा यांच्या कामाची व्याप्ती आणि प्रसिद्धी वाढत होती तसतशी त्यांच्या कामाची निर्भिड चिकित्सा होऊ लागली. वाजवी आणि कठोर टीकाही होऊ लागली. मदर टेरेसा मरणातून व्यक्तींसाठी आश्रम चालवतात पण प्रत्यक्षात तिथे लोकांवर उपचार करण्याऐवजी मरताना म्हणायच्या प्रार्थनाच म्हटल्या जातात. त्यांना लोकांना वाचवायचं नव्हतं तर मरताना केवळ प्रेमाचा हात द्यायचा होता; अशी टीका होऊ लागली. गरिबांसाठी केलेल्या कामातही गरिबी हटवण्याचे उपाय करण्याऐवजी केवळ गरिबांना तात्पुरती मदत देत राहणं हेच त्यांनी स्वीकारलं. त्यामुळे त्यांचं प्रेम गरिबांवर नसून; गरिबांना दिल्या जाणाऱ्या मदतीतून होणारा धर्मप्रसार आहे असं अनेकांचं मत झालं. त्यात फक्त ख्रिश्चनेतर भारतीयच नव्हते तर युरोपियन, अमेरिकन, ख्रिस्ती लोकही होते. गर्भपात व संततिनियमन याबद्दलही त्यांची मतं सनातनी ख्रिस्ती व्यक्तीची होती. गर्भपाताला विरोध होता. संततिनियमन नैसर्गिक पद्धतीने करावं हे त्यांनी उघडपणे सतत सांगितलं. आणि हे आपल्या कामाचं मुख्य ध्येय आहे असं त्या म्हणत. त्यामुळे बेसुमार लोकसंख्यावाढ गरीबीला कारणीभूत होत असली तरी त्याच्याशी त्यांना घेणंदेणं नव्हतं. कारण ख्रिश्चन धर्मात बसत नव्हतं. त्यांच्या पंथा साठी काम करणाऱ्या व्यक्तींना गरिबीत राहण्याची आज्ञा होती. प्रत्यक्ष पैसा मिळेलअसं काम करण्याची मनाई होती. पण राजकारण्यांकडून, उद्योगपतींकडून देणग्या घ्यायला मात्र त्या तयार होत्या.  देणग्या घेताना तो माणूस कसा आहे; त्याने वाममार्गाने पैसा मिळवला आहे की काय हे बघण्याची त्यांची तयारी नव्हती. उलट काळे धंदे करणार्‍या व्यक्तींकडून आपण पैसा घेतला आणि तो देवाच्या कामासाठी वापरला तर आपोआपच त्यालाही याचं अध्यात्मिक पुण्य मिळेल असा त्यांचा विचार होता. त्यामुळे मिळालेल्या देणग्या आणि त्यांची व्यवस्था कशी लावली याबद्दल बहुतेक वेळा त्यांनी उत्तर देणं टाळलं किंवा देव सगळे बघून घेईल अशा पद्धतीची उत्तरे दिली. आयुष्यात अगदी गलितगात्र होईपर्यंत आपलं पद सोडून उत्तराधिकारी नेमायची त्यांनी तयारी दाखकली नाही. या आणि अशा बऱ्याच टीकां वरचा सविस्तर लेख पुस्तकात आहे. त्यांच्याबद्दल टीकात्मक लेख, पुस्तके प्रसिद्ध झाली, कार्यक्रम, सिनेमा किंवा फिल्म तयार झाल्या हे सगळे लेखकाने मांडला आहे.




हा सगळा वाद संवेदनशील आहे आणि व्यक्ती प्रसिद्ध आहे. त्यामुळे लेखकाने जागोजागी पुस्तकांचे, वेबसाइटचे, रिपोर्टचे संदर्भ दिलेले आहेत. यातून पुस्तकाची विश्वासार्हता वाढते. 

पुस्तकातून श्रद्धाळू, समर्पित आणि दुराग्रही अशा मदर टेरेसा यांच्या बऱ्या-वाईट बाजूची माहिती आपल्याला होते. बाबा अमटेंसारख्या समाजसेवकांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. ज्या कुष्ठरोग्यांना हात लावायला सर्वसामान्य लोक तयार होत नाही अशा कुष्ठरोग्यांना त्यांनी प्रेमाने जवळ केलं, आपल्या पायावर उभं केलं. पण संघटित धर्मशक्तीचं पाठबळ यावर टेरेसांचं नाव आणि काम जगभर पोचलं. चार पिढ्या समाजसेवेत खपणाऱ्या आमटे परिवाराचं मात्र तसं होत नाहिये.  असो. ही तुलना या विषयातल्या तज्ज्ञांकडून समजून घ्यावी; त्याबद्दल अजून खोलात जाऊन वाचावं अशी इच्छा अनेकांना वाटेल. त्यादृष्टीने सुरुवात म्हणून हे पुस्तक नक्की वाचण्यासारखे आहे.


----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
आवा ( आवर्जून वाचा )
----------------------------------------------------------------------------------





----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
---------------------------------------------------------------------------------

इकिगाई (Ikigai)






पुस्तक : Ikigai (इकिगाई )
लेखक : Hector Garcia & Farncess Miralles ( हेक्टर गार्सिया , फ्रान्सिस मीरेलस )
भाषा : English (इंग्रजी)
पाने : १९४
ISBN : 978-1-786-33089-5

मोठ्या व्यक्तीला वाकून नमस्कार केला की बहुतेक वेळा आशीर्वाद मिळतो "औक्षवंत व्हा". वाढदिवशी आपण शुभेच्छा देतो "जीवेत शरदः शतम्". आपल्याला, आपल्या कुटुंबियांना दीर्घायुष्य, आरोग्यपूर्ण आयुष्य मिळावं अशी आपली सर्वांचीच इच्छा असते. म्हणूनच दीर्घआयुष्याचं रहस्य काय हे जाणून घ्यायची उत्सुकता आपल्याला नेहमीच असते. जगभरातल्या लोकांच्या आयुष्यमानाची सरासरी बघितली तर जगात काही निश्चित प्रदेशांमध्ये दीर्घायुषी लोकांचं प्रमाण जास्त आहे. त्यात जपान सर्वात पुढे आहे. विशेषतः जपानमधल्या ओकिनावा प्रांतात शंभर किंवा त्याहून जास्त वर्ष जगणाऱ्या लोकांचं प्रमाण लक्षणीय आहे. म्हणून पुस्तकाच्या लेखकाने या जपानी लोकांचा अभ्यास करून त्याची निरीक्षणे व निष्कर्ष या पुस्तकात मांडले आहेत.

"इकिगाई" म्हणजे अशी गोष्ट जी करताना आपल्याला खूप आनंद मिळतो, आपलं वेळेचं भान हरपतं, आपल्याला पूर्ततेचा आनंद मिळतो. अशी गोष्ट जी करताना आपलं आयुष्याचं ध्येय सापडल्याची भावना येते. आपला "स्वधर्म". ज्या लोकांना आपली "इकिगाई" काय आहे हे नक्की माहित असतं  आणि जे आपला जास्तीत जास्त वेळ अश्या कामात घालवतात ते लोक दीर्घायुषी असतात असा लेखकांचा निष्कर्ष आहे. त्यासाठी काही व्यक्तींची उदाहरणे देऊन समजावून संगितले आहे. अशी कामं करताना जी सहजपणाची (flow ची) भावना होते ते महत्त्वाचं आहे. त्यामुळे इतर कामं करताना पण असा "फ़्लो" आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं लेखकाचं म्हणणं आहे. 


गंमत म्हणजे हे पुस्तक वाचत असताना नेमकं याच स्वरूपाचं पु.ल. देशपांडे यांनी केलेले एक विधान वाचाण्यात आलं. हे विधान शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याबद्दल आहे आणि आज तेही शंभरीच्या घरात आहेत.




"इकिगाई" बद्दल साधारण इतकेच आहे. पुढे मोठं आणि आरोग्यपूर्ण आयुष्यावर परिणाम करणाऱ्या इतर घटकांचा उहापोह आहे. "योग्य आहार, व्यायाम, विश्रांती आणि विचार ही आपल्या आरोग्याची गुरुकिल्ली" आहे हे आपण वाचलेलं असतंच. या पुस्तकाचं सुद्धा हेच सांगणं आहे. त्यातही हे पुस्तक  जपानवर, जपानी संस्कृतीवर आधारित आहे. जपानी संस्कृतीवर बौद्धधर्माचा म्हणजेच भारतीय तत्वज्ञान आणि संस्कृतीचा मोठा पगडा आहे. त्यामुळे मांडलेले विचार आपल्यासाठी, दिलेल्या टिप्स फार वेगळ्या नाहीत. उदा. जपान मधले दीर्घायुषी लोकही सकस आहार घेतात; मिताहार घेतात; उपास करतात माझी आजीपण सांगायची "अति खाणं नि मसणात जाणं. गळेघाशी खाऊ नका. दोन घास कमीच खा !"  :) . .


पुढे एक प्रकरण व्यायामावर आहे. दीर्घायुषी लोकांमध्ये आढळणारा एक सामान धागा म्हणजे ते सतत हिंडते फिरते होते(आहेत). या लोकांनी तरुणपणी किंवा सध्या खूप व्यायाम केला असं नाही. पण ते सतत हालचाल करत असतात.  चालणं, फिरणं, बागकाम करणं, आपली कामं स्वतः करणं इ. त्याच जोडीला देशोदेशीचे लोक सहज सोप्या हालचालींचे व्यायाम प्रकार करतात. त्यांची तोंडओळख पुस्तकात करून दिली आहे. त्यात सूर्यनमस्कार, ताईची , छिगॉन्ग , "रेडिओ तायसो" इ. चा समावेश आहे. पुस्तकात काही आकृत्या काढून हा काय प्रकार आहे हे समजावून दिलं आहे. हे करणं किती सोपं आहे हे जाणवतं. "मूर्ती लहान पण कीर्ती महान" असं या व्यायाम प्रकारांबद्दल म्हणू शकतो. 


"ज़िंदगी बड़ी होनी चाहिए लंबी नहीं बाबू मोशाय." असा एक सिनेमातला संवाद आहे. या "लंबी उम्र वाल्यांचा" या बाबतीत काय अनुभव ? हे लोक आनंदी आहेत का ? कर्तृत्ववान आहेत का ? त्यांचं रोजचं जगणं कसं असतं ? असे प्रश्न आपल्याला पडू शकतात. याचाही वेध एका प्रकरणात आहे. हे लोक "असामान्य कर्तृत्त्ववान" वर्गातले नाहीत. पण आनंदी नक्की आहेत. आणि आनंद घेणं, आनंद देणं, इतरांशी मिळूनमिसळून बोलणं हा त्यांच्या स्वभाव झाला आहे. आनंदी आयुष्यासाठी फक्त वैयक्तिक आरोग्यच नाही तर आपला सामाजिक संपर्क, मित्रमैत्रणींशी होणाऱ्या गप्पा टप्पा, सण-उत्सव साजरे करणे हे पण महत्त्वाचे आहे. हे अधोरेखित करणारे हे प्रकरण आहे.

पुढचा महत्त्वाचा पैलू म्हणजे "विचार". पाश्चात्त्य समाजावर आधारित स्वमदत पुस्तकांपेक्षा हा भाग खूप वेगळा आहे. उलट पाश्चात्त्य जीवनशैली मुळेच अनेक मानसिक समस्या निर्माण होत असून त्यावर उतारा म्हणजे पौर्वात्य - जपानी - भारतीय विचारपद्धती. काही गोष्टींचा अपरिहार्य म्हणून स्वीकार करणे; आत्ताच्या क्षणात जगणे; आपल्या  जीवनाची क्षणभंगुरता लक्षात ठेवणे, श्वासावर लक्ष केंद्रित करून विचारांकडे समदृष्टीने पाहणे इ. टिप्स त्यात आहेत. 


अशी एकूण प्रकरणे आहेत. अनुक्रमणिकेवरून पुस्तकाची रचना अजून लक्षात येईल .

अनुक्रमणिका 



पुस्तकाच्या "मागेमाहिती" (blurb साठी मला सुचलेला नवीन शब्द) तुम्हाला एक आकृती दिसेल. पुस्तकाच्या सुरुवातीला सुद्धा ती आकृती दिसते. 

आज इकिगाई असं नेटवर शोधलं तर हीच आकृती दिसते. पण पूर्ण पुस्तकात या आकृतीचा पुढे संदर्भ किंवा स्पष्टीकरण दिलेलं नाही. आपली आवड, आपलं उत्पन्नाचं साधन , समाजाची गरज या सगळ्यातून तयार होणारं ते इकिगाई. या सगळ्याचा समतोल साधणं म्हणजे इकिगाई असा समज सुरुवातीला होतो. पण तसं नाही. नेटवर शोधल्यावर असं दिसलं की खरं म्हणजे या आकृतीचा आणि इकिगाई संकल्पनेचा तसा काही संबंध नाही.  पण  ग्यानबाची मेख इथेच आहे.  आपला स्वधर्म समाजला तरी वेळ, पैसा , जबाबदाऱ्या यांच्या ओझ्याखाली तसं वागणं जमेलच का ? ज्यांना ते जमलं त्यांनी ते कसं जमवलं हे पुस्तकात सांगितलं असेल असं मला वाटलं. त्याबाबतीत पुस्तक काही बोलत नाही. ही मोठी कमतरता आहे.

या दीर्घायुषी लोकांचे कौटुंबिक संबंध कसे होते, जॉब वर ते कसे होते, काही समजोपयोगी कामं त्यांनी केली का त्यांच्याबद्दल इतर लोकांचं म्हणणं काय हे पैलू सुद्धा पुस्तकात दुर्लक्षित आहेत.

जगण्याचं प्रयोजन शोधायला लावणारं, निरोगी, आनंदी आणि तितकेच समाधानी किंवा कृतार्थ वाटणारे आयुष्य जगणं किती सोपं आहे हे सांगणारं पुस्तक प्रत्येकाने वाचलंच पाहिजे, त्यातलं जे पटेल, रुचेल, जमेल तितकं आचरणात आणलं पाहिजे. लहान मुलांनी , तरुण मुलांनी हे वाचलं तर पूर्ण आयुष्यभर त्याचा उपयोग होईल आणि जर वृद्धांनी वाचलं तर कदाचित त्यांचीही मरगळ जाऊन आनंदाच्या दृष्टीने अजून पावले पुढे पडतील. 

पुस्तकाचे मराठी भाषांतर सुद्धा उपलब्ध आहे .


----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
आवा ( आवर्जून वाचा )
----------------------------------------------------------------------------------





----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
---------------------------------------------------------------------------------

अधर्मकांड (adharmakand)

पुस्तक - अधर्मकांड (adharmakand) लेखक - उदय भेंब्रे (Uday Bhembre) अनुवादिका - अकल्पिता राऊत देसाई (Akalpita Raut-Desai) भाषा - मराठी (Marat...