बियॉंड सेक्स (Beyond sex)

पुस्तक - बियॉंड सेक्स (Beyond sex)
लेखिका - सोनल गोडबोले (Sonal Godbole)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - ९६
ISBN - 978-93-88009-85-0 

ही ९६ पानी एक छोटेखानी कादंबरी आहे. कादंबरीची गोष्टही तशीच छोटी आहे. दोन मध्यमवयीन, सुखवस्तू, मुलं बाळं असलेले 
विवाहित स्त्री आणि पुरुष - मीरा आणि सागर - एकमेकांकडे आकर्षिले जातात. एकमेकांना भेटत राहतात. पण मर्यादेत राहून एकमेकांशी शरीससंबंध न ठेवणारे मित्र-प्रेमिक बनून राहतात. त्यांच्या घरच्यांनाही ते मान्य असतं. ही कादंबरी म्हणजे त्यांच्या भेटीचे, गप्पांचे, पिकनिकचे प्रसंग आहेत.

कादंबरी च्या नावातून काहितरी सनसनाटी निर्माण करायचा प्रयत्न केलाय पण कादंबरीत नाट्य नाहीच.

त्यांच्या संसारात असं काय कमी असतं ज्यामुळे त्यांना इतर व्यक्तीची ओढ वाटावी हे नीट समजत नाही. शारीरिक आकर्षण हेच कारण वाटतं. मग एकमेकांमध्ये "सुरक्षित अंतर" ठेवताना त्यांच्या मनाची काय घालमेल होत असेल हे "ताणेबाणे" लेखिकेला दाखवता आले नाहीयेत. अगदी सहज प्रेमात पडतात अगदी सहज दूर राहतात.

त्यांच्या घरचे, मुलं, शेजारपाजारचे सुद्धा काहीच विचारत नाहीत. मीराचा नवरा तर, "अरे वा, छान मित्र मिळाला" असल्या पद्धतीने प्रतिसाद देतो. हे असं खऱ्या आयुष्यात घडलं तर चांगलंच आहे. पण तसं होत नाही ना; त्यामुळे ते खोटं वाटतं आणि कादंबरी म्हणून नाट्यहीन सपक वाटतं.

दोघांच्या भेटीचा एक प्रसंग

मीराचा मित्र सागर आणि नवरा समीर ह्यांच्या संवादाचा एक प्रसंग



सुरवातीला असं वाटतं की भेटणारा माणूस मीराला फसवणारा असेल, मग वाटतं "काही तरी मागच्या जन्माचं रहस्य" असेल, मग वाटतं अजून काहीतरी आक्रीत घडणार आहे पण सगळे धागे लेखिकेने तसेच सोडून दिले आहेत. भराभर वाचून आपण कादंबरी संपवतो.


———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

दारा शिकोह (Dara Shikoh)




पुस्तक - दारा शिकोह (Dara Shikoh) 
लेखक - काका विधाते (Kaka Vidhate)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - ८४०
ISBN - 978-81-87549-81-9
प्रकाशक -  प्रफुल्लता प्रकाशन (दुसरी आवृत्ती २०१६)
छापील किंमत - रु. ७८०/-

सर्वप्रथम हे पुस्तक मला वाचायला उपलबद्घ करून दिल्याबद्दल  "ग्रंथप्रेमी.कॉम" द्वितीया सोनावणे ह्यांचे आभार मानतो.

ऐतिहासिक लेखांत हे वाचलं होतं की औरंगजेबाने त्याच्या बापाला तुरुंगात टाकलं, भावांची हत्या केली आणि गादी बळकावली. त्याने मारलेल्यापैकी
 दारा शिकोह हा त्याचा भाऊ विद्वान होता. ह्या कादंबरीच्या रूपाने दारा शिकोह, त्याचे वैचारिक धोरण आणि त्याला सामोऱ्या जावे लागलेल्या युद्धांबद्दल सविस्तर वाचायला मिळाले.

कादंबरीची सुरुवात होते दारा शिकोह चा आजोबाच्या - जहांगीराच्या - मृत्यूपासून. जहांगीरानंतर वारस कोण; पुढचा बादशहा कोण होणार हे ठरवण्यासाठी जहांगीराची बायको, मेव्हणा, मुलं, जावई ह्यांच्यात रससीखेच सुरू होते. त्यात बाजी मारतो शहाजहान. आपल्या भावंडानां, पुतण्यांना ठार मारून तो गादीच्या सगळ्या दावेदारांचा काटा काढतो. हे सर्व बघत होता त्याचा मोठा मुलगा दारा शिकोह. स्वभावाने धार्मिक, मनमिळावू दाराला बापाचं हे रूप धक्कादायक होतं. पण लहान वयातल्या दाराची शहाजहान ने कशीबशी समजूत काढतो.

दारा मोठा होताना त्याचा धार्मिक, अध्यात्मिक विशेषतः तत्त्वज्ञानात रस असणारा पिंड उघड होऊ लागला. घरच्या इस्लामची शिकवण त्याला मिळत होती. सूफी संप्रदायांतल्या ध्यानधारणा, नामस्मरण आणि अध्यात्म तो वेगाने आत्मसात करत होता. पण प्रजेतले, सरदारांतले बहुसंख्य हिंदू असल्यामुळे त्यांच्या धर्माबद्दलसुद्धा त्याला आकर्षण वाटू लागले. हिंदू पंडित, कवी, भाषातज्ज्ञ ह्यांच्याशीही त्याच्या चर्चा सुरू झाल्या. भाषा वेगळ्या असल्या तरी अंतिम सत्य एकच आहे हे त्याला उमगू लागलं होतं. अंतिम सत्य साधण्याची पद्धत सुद्धा थोड्याफार फरकाने सारखीच आहे. हे जाणवून उपनिषदे, योगवासिष्ठ इ. हिंदू धर्म ग्रंथांचं फारसी मध्ये भाषांतर करवून घेतलं. स्वतः अध्यात्मावर ग्रंथ, भाष्य काव्य लिहिले.

राजदरबाराच्या कामात लक्ष घालायची संधी मिळाल्यावर राज्यधोरण हिंदूना जाचक नसावे, धर्माच्या नावाखाली त्यांच्यावर अत्याचार होऊ नयेत अशी भूमिका तो घेऊ लागला. इस्लामच्या नावाने राज्य चालवणाऱ्या मुघलांच्या हे विरुद्ध होतं. त्यामुळे बादशहा, मुल्ला मौलवी, दरबारातले धर्मवेडे सरदार आणि औरंगजेब ह्याच्या मनात त्याच्या विरुद्ध चीड निर्माण होऊ लागली. भविष्यात होणाऱ्या संघर्षाची बीजे नियतीने पेरली होती.

शाहजहानच्या चार मुलांना वेगवेगळ्या जहागिरी मिळाल्या. आपल्याला दिलेली जहागीर संभाळायची प्रत्येकाची पद्धत वेगळी. दिलेली जहागिरी दारा चांगली सांभाळत होता. पण फार स्वाऱ्यांचा अनुभव त्याला आला नव्हता. मग त्याला मिळाली काबुल-कंदाहारची मोहीम. अशी मोहीम ज्यात स्वतः बादशहा तसंच योद्धा औरंगेजबसुद्धा पूर्वी दोनदा पराभूत झाले होते. दाराला मोहिमेवर जावे लागले पण अपयशी होऊन तोही परत आला. सरदारांमधला बेबनाव, राजकारणातली अनिश्चितता त्याने जवळून बघितली. पराभूत झाला तरी शहाजहानने त्याला वारस म्हणून त्याला नेमले आणि त्याच्या विरोधकांचे पित्त खवळले. औरंगजेबाकडे दख्खन, महाराष्ट्राचा सुभा होता. त्याचं कामकाज आपल्या मनाप्रमाणे दारा करू देत नाही; बादशाहा आता त्याच्या सल्ल्याने करतात ही जखम त्याला सतत खुपू लागली.

शाहजहान आजारी पडल्यावर औरंगजेब, मुराद आणि शुजा ह्या तिघांनी स्वतःला स्वतंत्र घोषित केले. औरंगजेबाने त्यादोघांना आपल्याबरोबर घेतले आणि दाराच्या विरुद्ध फितवले. आणि सुरु झाली स्वार्थाची लढाई. कोणी सरदार ह्याच्या बाजूने, कोणी त्याच्या बाजूने; कोणी जड होणाऱ्या पारड्याकडे. असं करत करत लढायांमागे लढाया होऊ लागल्या. महत्त्वाच्या लढाईत पराभूत दारा झाला. पळून जाऊन पुन्हा लढाईसाठी तयार होत राहिला. औरंगजेबाचं सैन्य किंवा त्याचे सरदार त्याचा मागावर. माळवा, दिल्ली, पंजाब, सिंध, कच्छ, गुजरात, पुन्हा राजस्थान, सिंध, बलुचिस्तान अशी महिनोन्महिने परागंदा अवस्थेत काढून शेवटी एकदाचा तो पकडला गेला. औरंगजेबाने त्याची धिंड काढली. त्याचा शिरच्छेद केला.  त्याच्या बायका औरंग्याच्या बायका झाल्या. मुलगा सुद्धा तुरुंगात खितपत पडून मारला गेला.

"सुलह-इ-कुल" म्हणजे सर्वांशी सामोपचाराचं धोरण ठेवण्याची इच्छा असणाऱ्या ह्या ज्योतीचा अंत झाला आणि औरंग्याच्या रूपाने मुघली धर्मांधतेचा मूळचा अंधार अजूनच गडद झाला. शोकांतिका पूर्ण झाली.

काका विधाते ह्यांनी ही शोकांतिका तितक्याच ताकदीने आपल्यापुढे मांडली आहे. आठशे पानी कादंबरी वाचताना आपण अक्षरश: मुघल काळात वावरत असतो. प्रसंगांचे तपशीलवार वर्णन; योग्य संवाद ह्यातून आपल्या डोळ्यासमोर दृश्य उभे राहते. पात्रांच्या तोंडात फारसी शब्दयुक्त मराठी भाषा आहे. त्यातल्या अनोळखी फारसी शब्दांचे शब्दार्थ शेवटी दिले आहेत. त्यामुळे वाचताना अडत नाही. वातावरण निर्मिती छान होते.

काही पाने वानगीदाखल वाचून बघा. 

शहाजहानच्या आज्ञेने इतर शहाजाद्यांचा खातमा करण्यात आला तो प्रसंग 


आपल्या सूफी पंथीय उस्तादाशी दाराची धार्मिक चर्चा


हिंदू तत्त्वज्ञानाच्या फारसी भाषांतराच्या महान कार्याबद्दलचा एक प्रसंग


दारा बद्दलची औरंगजेबाची बादशाहकडे तक्रार आणि पक्षपाती दरबारी राजकारणाची एक झलक 

दाराची धिंड 

कादंबरीच्या पूर्वार्धात दारा शिकोहला तत्त्वज्ञानात कसा रस वाटत होता; त्यात तो प्रगती करत होता, त्यामार्गावर जिज्ञासू वृत्तीने कसे प्रश्न विचारत होता हे दाखवणारे खूप प्रसंग आहेत. अध्यात्मातल्या जड-जड अमूर्त संकल्पनांवर चर्चा कशी चालली असेल हे अगदी सविस्तपणे उभे केले आहे. तसंच हिंदू-मुस्लिम तत्त्वज्ञानाच्या संकल्पना कशा सारख्या आहेत हे दाखवणारा सुद्धा खूप मजकूर आहे. त्यातून दारा ह्या पात्राच्या ज्ञानाची, गांभीर्याची आणि प्रामाणिकपणाची भूमिका वाचकाच्या मनावर निश्चितपणे ठसते. आपण सुद्धा त्याच्या बाजूने उभे राहतो. मात्र, हा भाग वाचायला खूप जड आहे. संस्कृत आणि फारसी शब्द खूप येतात. मूळ संकल्पनाच माहित नसल्यामुळे त्यांच्यावरची चर्चा डोक्यावरून जाते. ही चर्चा पुस्तकाचा मूळ उद्देश नाही. तो भाग थोडा कमी करायला हवा होता.

बाकी एका दीर्घ कादंबरीसाठी आवश्यक असा सगळा सविस्तारपणा त्यात आहे. दाराची प्रेमप्रकरणे, युद्धात चढाईतले डावपेच, दरबारी लोकांचे स्वार्थ, हिंदू राजांची साथ किंवा विरोध, दाराच्या भावभावनांचा कल्लोळ ह्यातून वाचकही कथेत समरसून जातो.

मुस्लिम समाजात चुलत भावांची लग्न होतात हे ऐकलं होतं. ह्या मुघल घराण्यात हे पदोपदी दिसतं. इतकंच काय बाईच्या पाहिल्या लग्नापासूनच्या मुलीचं दुसऱ्या लग्नापासूनच्या मुलाशी लग्न झालेलं दिसतं. त्यामुळे दोनजण एकमेकांचे भाऊ तेच व्याही कधी मेव्हणे तर कधी सासरे-जावई असली भलतीच गोंधळात टाकणारी नाती तयार होतात. पुस्तकाच्या शेवटी कादंबरीत आलेल्या पात्रांची थोडक्यात ओळख आणि परस्परसंबंध सांगितले आहेत त्याची मदत होते.

संदर्भ ग्रंथांची यादी, दाराच्या पलायनाचा पूर्ण मार्गाचा नकाशा, मुघल वंशावळ, जुनी चित्रे ह्यामुळे ही कादंबरी एक कल्पित कादंबरी राहत नाही तर कलात्मक पद्धतीने मांडलेला एक ऐतिहासिक अभ्यासग्रंथ ठरतो. 

दारा शिकोहचं आयुष्य हे दाखवतं की भारतातल्या सर्वधर्मसमभावाचा स्वीकार मुस्लिम धर्माभिमानी व्यक्तीनेसुद्धा करणं किती सोपं आहे. मात्र अश्याप्रकारे विचार करणाऱ्या मुस्लिम व्यक्तीला त्याच्या स्वधर्मियांकडून किती धोका आहे आणि झगडा किती मोठा आहे हे सुद्धा हे चरित्र दाखवतं. मुघलांना आक्रमक न मानणारे, त्यांचं गौरवगान करणारे लोक सुद्धा दारा शिकोहला सोयीस्करपणे विसरतात हेच आपलं दुर्दैव. हे पुस्तक जास्तीत जास्त लोकांनी वाचून, विशेषतः मुस्लिम वाचकांनी वाचून आपला दृष्टिकोन विस्तारला पाहिजे. 

हे पुस्तक पुढील लिंकवर ऑनलाईन विकत घेता येईल 


———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

I came upon a lighthouse (आय केम अपॉन या लाईटहाऊस)


पुस्तक - I came upon a lighthouse (आय केम अपॉन या लाईटहाऊस)
लेखक - Shnatanu Naidu (शंतनू नायडू)
भाषा - English (इंग्रजी)
पाने - २१६
ISBN - 978-93-9032-752-2

काही दिवसांपूर्वी एक छोटी चित्रफित बघितली होती त्यात ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा वाढदिवस साजरा करतानाचे दृश्य होते.

https://youtu.be/n87nYuuZiDo

अतिशय साधेपणाने सगळं चाललं होतं. एक छोटासा कपकेक त्यावरील छोटी मेणबत्ती. एखाददुसरी व्यक्तीच तिथे उपस्थित आहे. तिथे आपल्याला एक तरुण मुलगा दिसतो पंचवीशीतला. ह्या वाढदिवसाचा एक फोटो सुद्धा पसरला होता. त्यात असं म्हटलं होतं की होतं की हा रतन टाटा यांचा स्वीय सहाय्यक आहे त्याचं नाव शंतनु नायडू. त्याची आणि रतन टाटा यांची ओळख कशी झाली ह्याचा किस्सा असा दिला होता की; शंतनू नायडू हा तरुण प्राणीप्रेमी. रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांच्या अंगावरून वाहने गेल्यामुळे त्यांचे होणारे मृत्यू बघून त्याला वाईट वाटलं. ह्यावर काहीतरी उत्तर शोधावं म्हणून त्याला एक कल्पना सुचली. कुत्र्यांच्या गळ्यात "रिफ्लेक्टर बँड" -प्रकाशपरावर्तन करणारे पट्टे - बांधण्याची. ह्या पट्टयांमुळे वाहनचालकाला लांबूनच समोर काहीतरी आहे ह्याचा अंदाज येऊन तो वेग कमी करेल व अपघात टळेल. पट्टे लावण्याच्या कामाची माहिती त्याने रतन टाटा यांच्यापर्यंत पोहोचवली. प्राणीप्रेमी रतन टाटा यांना हे काम आवडलं आणि त्यांनी त्यांच्या व्हेंचर कॅपिटल फंडातून शंतनूला प्रायोजकत्व दिलं. अशा पद्धतीने टाटा पुरस्कृत स्टार्टअप सुरू झाली. पुढे ह्या ओळखीचं रूपांतर घनिष्ठ मैत्री झालं. शंतनू परदेशातून शिक्षण घेऊन परत आल्यावर टाटांनी त्याला नोकरी दिली तेही स्वतःच्या ऑफिसमध्ये, स्वतःचा स्वीय सहाय्यक/ मॅनेजर म्हणून.

इंटरनेटवर सगळ्याच गोष्टी खऱ्या असतात असं नाही त्यामुळे हे खरं आहे का हे पडताळून बघितले. कळलं की हे खरं आहे. इतकंच नाही तर शंतनुने स्वतःच्या आयुष्यातल्या ह्या टाटा पर्वावर एक पुस्तक देखील लिहिलं आहे. योगायोगाने माझ्या वाचनालयात (डोंबिवलीची पै'ज फ्रेंड्स लायब्ररीमध्ये) मला हे पुस्तक सुद्धा काही दिवसात नजरेस पडलं. तेच हे पुस्तक " आय केम अपॉन अ लाईटहाऊस".

शंतनूने पुस्तकाची सुरुवात भटक्या कुत्रांच्या अपघाती मृत्यूची समस्या त्याला कशी जाणवली ह्या प्रसंगापासून केली आहे. चमकणाऱ्या पट्ट्यांचा उपाय कसा सुचला, त्याच्या मित्रांबरोबर पुण्यात असे पट्टे बांधण्याची मोहीम त्यांनी राबवली हे सांगितलं आहे. ही बातमी टाटांना कळवावी असे त्यांच्या घरच्यांच्या मनात आलं. कारण चार पिढ्यांपासून त्या कुटुंबातले गृहस्थ टाटांच्या वेगवेगळ्या कंपन्यात काम करत होते. टाटा समूहाच्या योगदानाबद्दल, औदार्याबद्दल आणि व्यक्तिमत्त्वाबद्दल त्यांना सार्थ अभिमान होता. श्रद्धा होती. पण रतन टाटांसारख्या मोठ्या व्यक्तीला रोज हजारो पत्रे येणार. त्यात आपलं पत्र त्यांच्या पर्यंत पोहोचेल का नाही. पोचले तरी त्यांना ते बघता येईल; त्याला उत्तर देतील अशी खात्री अजिबात वाटत नव्हती. ह्या सगळ्या वेळातली हुरहूर शंतनूने छान शब्दबद्ध केली आहे. पण टाटांचे उत्तर आले. प्रत्यक्ष भेट झाली आणि त्यांनी कामातही गुंतवणूक केली आणि शंतनुच्या आयुष्यातल्या टाटा पर्वाची सुरुवात झाली. ती भेट कशी झाली असेल टाटा काय बोलले असतील ह्याची उत्सुकता आपल्या मनातही जागी होते. ह्या भेटीचं आणि टाटांचा साधेपणाचं नेमकं वर्णन पुस्तकात आहे,.

टाटांनी गुंतवणूक केल्यामुळे "मोटोपॉव" ह्या स्टार्टअपच्या कामाचा अहवाल देण्यामुळे दोघांचा संबंध पुन्हापुन्हा येऊ लागला. ऐंशीच्या पुढे टाटा आणि तिशीच्या आतला शंतनू ! पण वयाचा, मानाचा, पदाचा अजिबात गर्व नसलेले टाटा ह्यांनी शंतनुचा एक मित्र म्हणून, मुलासारखा किंवा नातवंडासारखा त्याचा स्वीकार केला. शंतनूला उच्चशिक्षणासाठी कॉलेजला जायचं होतं त्यासाठी त्याची तयारी चालू होती. अपेक्षित होता तसा हार्वर्डमध्ये प्रवेश मिळाला नाही म्हणून तो निराश झाला. पण नंतर कॉर्नेल कॉलेजमध्ये मिळाला. या सगळ्या उतार-चढावांत तो टाटांच्या संपर्कात होता. टाटांनी त्याला प्रेरित ठेवलं. तेव्हा त्याने ठरवलं की उच्च शिक्षण घेऊन परत आल्यावर जर टाटांनी परवानगी दिली तर टाटा ट्रस्ट मध्येच काहीतरी सामाजिक काम करायचं. अमेरिकेत असतानाही टाटा त्याला प्रोत्साहित करायचे. न्यूयॉर्कला गेल्यावर तिकडे भेट घ्यायचे. दोघे बाहेर फिरायला, शॉपिंग ला जायचे. एकमेकांची थट्टा मस्करी करायचे. दोघांमधला हा खेळकर जिव्हाळा मोहित करतो.

अमेरिकेतून परतल्यावर टाटांनी त्याला आपल्या ऑफिस मध्ये स्वतःचा स्वीय सहाय्यक मॅनेजर म्हणून नोकरी दिली. आत्तापर्यंत मैत्री, दिलदार व्यक्तिमत्व असणारे टाटा आता त्याचे साहेब सुद्धा झाले! पूर्वी कधी केलं नाही अश्या कामाच्या जबाबदाऱ्या त्याच्या खांद्यावर पडल्या. टाटांच्या कामाच्या जबाबदाऱ्या, कामातले ताण-तणाव याच्यातून आणि कामातली शिस्त याच्यामधून कधीकधी टाटा आपल्याशी कठोरपणे वागत आहेत; आता पूर्वीचा मित्र राहिला नाही का असंही त्याला वाटायचं. पण काम झालं की पुन्हा थोड्या वेळाने दोघांच्या गप्पा गोष्टी सुरु व्हायच्या. त्याला लक्षात आलं की टाटा त्याला नोकरीसाठी तयार करत आहेत; आयुष्यासाठी तयार करत आहे. ह्या प्रसंगांत स्वतःच्या भावभावनांचं प्रामाणिक चित्रण त्याने केलंय. त्यामुळे योग्य तिथे टाटा कसे शिस्तशीरपणे वागत होते; मैत्रीत वाहवत गेले नव्हते हे आपल्याला देखील बघायला मिळतं.

शंतनूला स्वीय सहाय्यक म्हणून त्याला वेगवेगळ्या मीटिंगमध्ये उपस्थित राहायला जायचं. टाटा गोष्टी कश्या पारखतात, त्यांना कुठली माहिती लागते; माहिती अचूक आणि वेळेवर कशी लागते याचे त्याला धडे मिळाले. नवा असल्यामुळे कधीकधी कामाचा ताण वाटायचा हे सुद्धा त्याने प्रांजळपणे कबूल केलं आहे. असे ताणाचे बरेच प्रसंग पुस्तकात आहेत. त्यामुळे पुस्तक म्हणजे "टाटा टाटा गोड गोड" असं होत नाही. मोठ्या व्यक्तीबरोबरचा सहवास, त्याच्याबरोबर काम हे त्रासदायकसुद्धा असतं हे कळतं.

"जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण" म्हणतात त्याप्रमाणे सतत कामात गर्क असणारे टाटा त्याला बघायला मिळाले. सतत कामाचे दौरे आणि गाडीतही काम करत टाटांबरोबर प्रवास करायला मिळाला. फार क्वचितच ते सुट्टी घेत. पण त्यांच्याबरोबर सुट्टी घालवण्यासाठी ही मजा त्याला अनुभवता आली. काम बंद ठेवून पूर्ण मजा कशी घ्यायची हेही त्याला दिसलं. वेगवेगळ्या विषयात रस असणारे टाटा त्याला बघायला मिळाले. इतक्या उच्च पदावर राहूनही टाटा साधेपणा वागतात. बॉडीगार्ड ठेवणं, लोकांना टाळणं त्यांना आवडत नाही. टाटांनी हाताला धरून "असं वाग" हे कधी शिकवलं नाही पण त्यांच्या 
त्यांच्या वागण्याबोलण्यातून ते खूप काही शिकवत होते. सगळ्या अनुभवांचे, किश्श्यांचे सुंदर वर्णन शंतनू नायडू यांनी आपल्या पुस्तकात केला आहे. 


अनुक्रमणिका

पहिल्या भेटीतच टाटा शंतनू आणि त्याच्या मित्राला आपल्या बंगल्यावर घेऊन जातात. त्यांच्या दोन कुत्र्यांशी ओळख करून देतात तो प्रसंग

अमेरिकेत शंतनू कुत्रा पाळतो आणि जगण्याला नवी उमेद मिळवतो. त्या कुत्र्याबद्दलचा हा प्रसंग

कामात झालेल्या चुकांबद्दल टाटांकडून कानउघडणी


टाटाच नव्हे तर ऑफिसमधल्या इतर महिला सहकारी सुद्धा त्याला अगदी मायेने वागवत, शिकवत होत्या त्यांचा विशेष उल्लेख पुस्तकात आहे. त्यातली ही दोन पाने

विशेष म्हणजे रतन टाटा ही मध्यवर्ती कल्पना असली तरी शंतनूचे स्वतःचं व्यक्तिमत्व पुस्तकात निश्चितपणे अधोरेखित होतं. त्यामुळे अमेरिकेत गेल्यावर त्याला एकटेपणा वाटायला लागला तेव्हा त्याने फोटोग्राफीचा आधार घेतला; तिथे कुत्रा पाळला आणि कुत्रा पाळल्यावर त्या कुत्र्याच्या निमित्ताने त्याला मित्र मिळाले असे इतर प्रसंगही ह्यात आहेत. त्याचं हे व्यक्तिमत्व कळत गेल्यामुळेच त्यामुळेच तिशीतला शंतनू आणि ऐंशी पार टाटा यांचं समीकरण कसं जुळतंय हे बघायला मजा येते. एक खोडकर मुलगा आणि तर एक मोठे गंभीर उद्योगपती. कधी कधी उदास, निराश होणारा होणारा मुलगा तर आयुष्यातले चढ-उतार बघितलेले पोक्त आजोबा. मोठ्या व्यक्तिमत्त्वाची सादर भीती बाळगणारा मुलगा तर मोठेपणाची झूल ना बाळगता थट्टा मस्करी करून त्याला आश्वस्त करणारं मिश्किल व्यक्तिमत्त्व !

शंतनू हा तुमच्या आमच्या सारख्या साध्या घरातला एक मुलगा. पण वेगळ्या कल्पनेमुळे त्याच्या आयुष्याला सुंदर कलाटणी मिळू शकली हे वाचणं सुखदायक आहे. प्रोत्साहित करणारं आहे. कदाचित आपल्या हातूनही असं काहीतरी काम घडू शकतं. एखाद्या मोठ्या व्यक्तीला ते आवडेल आणि त्यातून आपले स्नेहबंध जुळतील असा आशावाद जागवणारं पुस्तक आहे. दुसरीकडे रतन टाटा यांच्यासारख्या व्यक्ती माणूस म्हणून कशी आहे हे कळतं. जर आपण आत्ता आपल्या क्षेत्रात यशस्वीतेच्या पायऱ्या चढत असू, सेलिब्रिटी होण्याच्या मार्गावर असू तर मोठं झाल्यावर कसं वागलं पाहिजे हे जाणवतं. "अत्युच्चपदी थोरही बिघडतो" ह्या उक्तीला छेद देणं शक्य आहे हे सुद्धा आपल्याला कळतं.

शंत
नू ची भाषा खिळवून ठेवणारी, खेळकर, मिश्किल आणि अतिशय प्रामाणिक आहे. त्यात कुठेही अभिनिवेश नाही. एखादी गोष्ट मुद्दामून मोठी करून सांगितली आहे असं अजिबात वाटत नाही. त्यामुळे आपण सहज पुढे पुढे वाचत राहतो. रमत राहतो.

पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे या पुस्तकात पानोपानी प्रसंगांची रंगीत चित्रे आहेत. छायाचित्रे नव्हेत अर्कचित्रे. त्यामुळे तो प्रसंग आपल्या डोळ्यासमोर छान उभा राहतो. एखाद्या लहान मुलांच्या पुस्तकासारखं रंगीबेरंगी आणि सचित्र पुस्तक आहे. विषय आणि मांडणी गंभीर असली तरी या पुस्तकामुळे या चित्रांमुळे पुस्तकाला एक वेगळा हलकेपणा आला आहे. वाचनीयता वाढली आहे. संजना देसाई ह्यांनी ही चित्रे काढली आहेत. सर्वसाधारणपणे मोठ्यांच्या पुस्तकात छायाचित्रं असतात किंवा एखाद दुसरं स्केच असतं. पण कादंबरी मध्ये खरंच अशी चित्रं असतील तर वाचकाला अजून समरसून वाचता येईल. हा प्रयोग जास्तीत जास्त लेखकांनी, प्रकाशकांनी करून बघावा असं मला वाटलं.


चांगली लेखनशैली असणारा नवीन लेखक, वेगळा विषय, पुस्तकाची मांडणी सजावट सर्वच उत्कृष्ट आहे. त्यामुळे हे उत्कृष्ट पुस्तक तुम्हाला वाचायला आवडेलच.

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :-  
आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-



———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

सुगंध गमावलेला मोगरा (Sugandh gamavalela mogara)

पुस्तक - सुगंध गमावलेला मोगरा (Sugandh gamavalela mogara) लेखक - बेन्यामिन (Benyamin) अनुवादक - ए आर नायर , जे ए थेरगावकर (A.R.Nair, J.A. Th...