कांचनगंगा (Kanchanganga)




पुस्तक : कांचनगंगा (Kanchanganga)
लेखिका : माधवी देसाई (Madhavi Desai)
भाषा : मराठी (Marati)
पाने : २१६
ISBN :8177661337 (For printed)ISBN :9788184987386 (for e-book)

लेखिकेबद्दल पुस्तकात दिलेली माहिती :


अंजनीबाई मालपेकर या जुन्या जमान्यातल्या प्रसिद्ध गायिका; हिराबाई पेडणेकर या महाराष्ट्रातील पहिल्या नाट्यलेखिका आणि राजा रविवर्मा या महान चित्रकाराची प्रेरणा असणारी सुरंगा मुळगावकर; या तिघींवर आधारलेली ही कादंबरी आहे असं लेखिकेने प्रस्तावनेत सांगितलं आहे. मात्र या तिघींपैकी अंजनीबाई हेच या कथेचं मुख्य पात्र आहे आणि त्यांच्या जन्मापासून वृद्धापकाळपर्यंतचा प्रवास त्यात आहे. या तिघी बालमैत्रिणी. एकाच शाळेत शिकलेल्या, मुंबईत स्थायिक असलेल्या गोवेकर समजातल्या. त्यामुळे शाळेत आणि अंजनीबाईंच्या नंतरच्या आयुष्यात जेव्हा त्यांची भेट झाली असेल त्या त्या वेळच्या प्रसंगात त्या येतात. हिराबाईंनी लेखनात खूप नाव कमवले. पण त्यांच्या गुणांपेक्षा त्यांच्या सौंदर्याकडे आकर्षित होऊन सलगी करणरेच त्यांना जास्त भेटले. शेवटी योग्य जोडिदार मिळाल्यावर त्या सगळ्यांपासून दूर रहायला गेल्या. या पेक्षा जास्त माहिती कादंबरीतून कळत नाही. तसंच तरूण सुरंगाला पाहून राजा रविवर्मा मोहित झाले. त्यांनी आपल्या चित्रांत देवी, अप्सरा या रूपात सुरंगाचीच प्रतिमा चितारली. सनातनी मंडळींना ही चित्र आवडली नाहीत. या लोकापवादातून सुरंगाने आत्महत्या केली इतकीच माहिती पुस्तकातून मिळते. 

आता मुख्य पात्र सुरंगाकडे वळूया. लेखिकेने प्रस्तावनेत म्हटलंय की "..चारित्र्यसंपन्न अशी अंजनी,गोमंतक मराठा समाज, त्या समाजाची, त्या काळची अवस्था या साऱ्या चौकटीतूनंजनीचं मोठेपण जाणवून द्यायचं होतं.  गायिका म्हणून अंजनीबाईंना मी पूर्णपणे व्यक्त करू शकले नसेनही...पण व्यक्ती म्हणून त्यांचं मोठेपण व्यक्त व्हावं हा माझा प्रयत्न आहे". कादंबरी वाचताना हे तिन्ही प्रयत्न फसलेले दिसतात. तो काळ, म्हणजे नक्की कुठला ? ते कळत नाही. ब्रिटिशराजवटीतला काळ आहे हे कळतं पण नक्की कुठले साल कळत नाही. खऱ्या व्यक्तिवर कादंबरी असताना काळ, तारखा यांचा उल्लेख असला की संदर्भ नीट लागतो. ते या पुस्तकात होत नाही. तसंच अंजनी बाईंचा समाज/जात नक्की कोणता याचाही उल्लेख नाही. मी गोव्यावरच्या कादंबऱ्या आधी वाचल्या होत्या ( प्रार्थनातांडव, होमकुंड) त्यामुळे कलावंतिणी, भाविणी, यजमान, त्यांची कुटुंबव्यवस्था या बद्दल जुजबी माहिती होती. म्हणून मला पुस्तकातल्या गोष्टींचा संदर्भ लागला. पण ज्याला याची काहीच माहिती नाही त्याला पुस्तकातले प्रसंग नीट कळणार नाही किंवा तीव्रता जाणवणार नाही. त्या समाजावरचे संदर्भ ग्रंथ काही मी वाचलेले नाहीत तरी आधीचा कादंबऱ्या वाचून जे जाणवलं, समजलं तसं काही या कादंबरीने होत नाही. 

अंजनीबाई कलावंत समाजात जन्मल्या. गाणं-वाजवणं-नृत्य करणं हे या समाजाच्या उपजीविकेचं साधन आहे. त्यामुळे त्या गाणं शिकल्या, कुठल्याही महान कलाकाराप्रमाणे भरपूर रियाज केला, आवाज खूप चांगला होता म्हणून भरपूर प्रसिद्धी, पैसे, मानसन्मान मिळाले. शेवटी पतीच्या आर्थिक अडचणींमुळे आणि शारिरिक व्याधींमुळे बहुतेक संपत्ती गमवावी लागली हा सरधोपट प्रवास दिसतो (हा प्रवास कथा म्हणून बघताना. प्रत्यक्ष व्यक्तीचं आयुष्य सरधोपट असं म्हणयचं नाहिये). यात "वेगळेपणा" ,"व्यक्ती म्हणून मोठेपणा" असलं काहीच कादंबरीतून जाणवत नाही. 

लेखिकेने प्रस्तावनेत म्हटलं आहे की त्यांनी अंजनीबाईंवरचा एक लेख वाचला आणि त्यातून हे कथाबीज निर्माण झालं. ही कादंबरी पूर्ण वाचल्यावर असं वाटलं की तो लेख आणि लेखिकेच्या संशोधनातून मिळलेली माहिती उदा. - त्यांचे गुरु,त्यांचे घराणे, गाण्याची वैशिष्ट्ये, सन्मान, शिष्य, सहकलाकार इ. जरी कादंबरीच्या सुरुवातीला दिला असता तरी पूर्ण कादंबरी वाचायची गरज पडली नसती. या कादंबरीपेक्षा पण एखाद्या लेखातून अंजनीबाईंची ओळख अजून छान आणि लक्षात राहील झाली असती.


----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------



----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक  )
----------------------------------------------------------------------------------


डॉ. केतकर (Dr.Ketkar)







पुस्तक :  डॉ. केतकर (Dr.Ketkar)
लेखक : द. न. गोखले (D.N. Gokhale) 
भाषा : मराठी (Marathi)
पाने : ३३९
ISBN : दिलेला नाही

ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचे हे चरित्र आहे. "ज्ञानकोश" म्हणजे मराठीत सांगायचं तर "एनसाक्लोपिडिया" हं :). "एनसाक्लोपिडिया ब्रिटानिका" हे नाव नाव तुम्ही ऐकलं असेल. ऑनलाईन "विकिपिडिया" हे संकेतस्थळ वापरले असेल. विविध भाषांमधील छापिल ज्ञानकोशांची परंपरा बरीच जुनी आहे. त्याच प्रकारचा ज्ञानकोश मराठीत १९२० च्या दशकातच प्रकाशित झाला होता. हा पूर्ण ज्ञानकोश आता ऑनलाईन वाचायला उपलब्ध आहे: http://ketkardnyankosh.com/ 
२३ खंडांचा हजारो पानांचा हा ज्ञानकोश बनवण्याचं मुख्य श्रेय जातं डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांना. 


कुशाग्र बुद्धिमत्तेच्या डॉ. केतकरांनी अमेरिकेतून शिक्षण घेतलं होतं. तिथे समाजशास्त्रिय अभ्यास केला होता. या संशोधनातून त्यांच्या प्रतिभेला वैश्विक सामजिक सत्य आणि भारताच्या उन्नतीचे मार्ग सापडले. भारतात परत येऊन लोकांना त्यानुसार मार्गदर्शन करायला सुरुवात केली. त्यांचं ठाम मत असं होतं की देशी भाषांचा विकास होणं राष्ट्राच्या उन्नतीसाठी आवश्यक आहे. मराठी ज्ञानभाषा व्ह्यायची असेल तर जागातलं उत्तमोत्तम ज्ञान मराठीत उपलब्ध असलं पाहिजे. त्यासाठी मराठीतही ज्ञानकोश असला पाहिजे. "हे असलं पाहिजे; कुणितरी काहितरी करायला पाहिजे" असं म्हणत वाट बघत बसणारं व्यक्तिमत्त्व ते नव्हतं. त्यांनी हे काम स्वतःच करायचं ठरवलं. १९१६ ते १९२८ इतका काळ ह्या कामाला वाहून २३ खंडांचं काम पूर्ण केलं. आजपासून १०० वर्षांपूर्वी दळणवळणाची, संपर्काची साधनं कमी असताना त्यांनी इतकी माहिती जमवली. अनेक मोठ्या विद्वानांनी वेगवेगळी कारणं देऊन मदत करायचं नाकारलं. टिळकांसारख्या व्यक्तीने लिहायची दाखवली पण लिहिण्याआधीच त्यांचं निधन झालं. ज्ञानकोश कुणा संस्थानिकाच्या, धनिकाच्या देणगीवर नको; इतकंच काय लोकांच्या दानदक्षिणेतूनही नको असा विचार पुढे करत त्यांनी "लिमिटेड कंपनी" स्थापन केली आणि त्याद्वारे भागधारकांकडून (शेअर होल्डर्सकडून) पैसे उभारून काम सुरू केलं. हुशार लेखनिक, संपादक जमवले आणि काम सुरू केलं. त्यांनी पगारावर लोक ठेवले. ज्ञानाची उपासना म्हणजे पदरमोड करून, उपाशीपोटी करायची गोष्ट अशी कल्पना असणाऱ्या समाजात संशोधनासाठी पगार, "लिमिटेड कंपनी" या कल्पना अभिनव होत्या. आजुबाजुच्या समाजाच्या कितितरी पुढे त्यांचे विचार होते; कल्पना खूप पुढच्या होत्या.

काम सुरू झालं म्हणून ते सुरळीत पार पडलं असं नव्हे. व्यवस्थापकीय मंडळातले हेवेदावे, छपखान्यांची दिरंगाई, श्रेयाची लढाई या सगळ्यातून त्यांना जावं लागलं. ज्ञानकोश प्रसिद्ध झाल्यावर त्या प्रती खपवणं, ज्ञानपराङमुख समाजाला त्याची आवश्यकता पटवून पैसे खर्चायला लावणं हे देखील दिव्य होतं. त्यांच्या सहकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून ते स्वतः देखील ऊनपावसात घरोघरी हिंडून ज्ञानकोशाची विक्री करत होते. ज्ञानकोशात वेगवेगळ्या जातींबद्दल, धर्मगुरूंबद्दल संशोधनाअंती त्यांनी लिहिलं होतं. असं सत्य ज्यांच्या स्वाभिमानाआड आलं त्यांच्याशीही त्यांचे वाद झाले. पण तेव्हा वादाचं नियतकालिकांमध्ये लेख लिहिणे, निषेध पत्र पाठवणे, कायदेशीर लढाई लढणे असं होतं. आजच्या सारखं आक्रस्ताळं नव्हतं. नाही म्हणायला मुस्लिम समाजाने तेव्हाही आपले बाहुबल दाखवत त्यांना जिवे मारायची धमकी दिली होती आणि शेवटी महंमद पैगंबरांबद्दलचा भाग गाळायला लावला होता. 

ज्ञानकोशाची निर्मितीप्रक्रिया आणि त्यातला केतकरांचा सिंहाचा वाटा हा या पुस्तकाचा मुख्य गाभा. या कामाला सुरुवात होण्या आधीचा आणि नंतरचा या दोन्ही काळाबद्दलही लेखकाने सविस्तर लिहिलं आहे. बालपण, तेव्हाचा स्वभाग, संस्कार, अमेरिकेतील शिक्षण, तिथे मिळालेली विद्वद्जनांची मान्यता, भारतात परत आल्यावर "राष्ट्रगुरू"च्या भूमिकेतून देशभर लोकांना मार्गदर्शन, ज्ञानकोशानंतर इतर संशोधन; कथा, कादंबऱ्या, राजकीय लेख यांचं लेखन; भारताच्या स्वातंत्र्यासाठी केलेले वेगेवेगळे प्रयोग, इतर भाषांमध्ये ज्ञानकोश तयार करण्यासाठी घेतलेला पुढाकार हे सगळं आहे.

डॉक्टरांच्या च्या पत्नी श्री. शीलवती केतकर या मूळच्या जर्मन-ज्यू मिस. कोहेन. त्या केतकरांना इंग्लंडमध्ये भेटल्या आणि त्यांचा स्नेह जुळला. पण देशभक्ती करू इच्छिणाऱ्याने या बंधनात अडकणं इष्ट नाही म्हणुन ते त्यांचा स्वीकार करत नव्हते. स्वतःची जाज्वल्य हिन्दुत्ववादी भूमिकाही त्यांना परधर्मिय युवतीशी लग्न करायला मागे ओढत होती. ते तसेच भारतात आले. ७-८ वर्षं गेली तरी त्यांच्या प्रेयसीने मात्र त्यांच्यावर पत्राद्वारे प्रेम जागेच ठेवले. आणि बरेच वर्षांनी हो-नाही करता केतकर लग्नाला तयार झाले. मिस. कोहेन या आधी हिंदू झाल्या आणि मग त्या दोघांचे लग्न झाले. कोहेनबाईंना हिंदू करून घेण्यासाठी स्वतःच्या वैदिक अभ्यासातून "व्रात्यस्तोम" नावाचा वैदिक विधी त्यासाठी त्यांनी पुन्हा उजेडात आणला. सहाजिकच सनातनी मंडळींना ही बाब रुचली नाही. केतकरांचा हा आणि या पुढचा वैयक्तिक प्रवासही लेखकाने आपल्यासमोर दाखवला आहे. 

पुस्तक साधारण ६० वर्षांपूर्वीचं असल्यामुळे पुस्तकाची भाषा त्यावेळची, औपचारिक, बरीचशी संस्कृतप्रचुर, जरा जड आहे. काही जुनी छायचित्रे आहेत. हे चरित्र म्हणजे कादंबरी नाही तर लेखकाने निवेदकाची भूमिका घेऊन चरित्र उलगडले आहे. केतकरांनी ज्या भूमिका घेतल्या, विचार मांडले, कृती केल्या त्याचं सडेतोड विश्लेषणही जागोजागी आहे. केतकरांनी केलेल्या चुका, बुद्धिमत्तेच्या अहंकारातून आलेला दडपेपणा, अचाट कल्पनाशक्तीचा अतिरेक होऊन कधिकधी त्याचा संशोधनावर झालेला परिणाम, वागण्यातला विक्षिप्तपणा हे सगळंही निःसंकोचपणे मांडलं आहे.

त्यामुळे हे चरित्र नुसत्ती घटनांची जंत्री न होता जिवंत चरित्र होते. राजकारणी, उद्योजक, कलाकार यांचा संघर्ष आपल्या वाचनात येतो. पण बौद्धिक संशोधकालाही संघर्ष करावा लागतो; व्यवहारात लक्ष दिलं तरच काम पूर्णत्वाला जातं; काम कितीही चांगलं असलं आणि आपण निस्वार्थभावनेने काम करत असलो तरी क्षुद्र्भावनेच्या व्यक्तींचा सामना करावाच लागतो हेही आपल्याला मार्गदर्शक ठरेल.  पुस्तकाची भाषा आणि त्यातल्या तपशीलांमुळे सर्वसामान्य वाचकाला पूर्ण चरित्र वाचणं जरा जड वाटू शकतं. पण  मराठीला ज्ञानभाषा बनवायला एका महान व्यक्तीने आयुष्य अर्पण केलं या कृतज्ञतेतून ज्ञानकोशाच्या निर्मितीचा भाग तरी मराठीप्रेमींनी वाचायलाच हवा.


------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- जवा ( जमल्यास वाचा )
------------------------------------------------------------------


---------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------




पुस्तकाची अनुक्रमणिका :








शिवभारत - Shivabharat Biography Of Shivaji Maharaj in Sanskrit






नेटवर अचानक काहीही हाताला लागू शकतं. आज माझ्या मराठी शिकवण्याचा कामासंबंधी शोधताना अचानक वेगळंच घबाड हाती लागलं. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र असलेले "शिवभारत". विशेष म्हणजे आज शिवप्रतापदिन आहे ज्या दिवशी महाराजांनी अफजलखानाचा वध केला. सुंदर योगायोग. 

"शिवभारत" हा मूळ संस्कृत ग्रंथ आणि त्याचे समश्लोकी मराठी भाषांतर ऑनलाईन उपलब्ध आहे. ऑनलाइन वाचू शकतो. त्यासाठी या लिंकवर जा.
https://archive.org/stream/ShriShivbharat#page/n1/mode/2up


मी वाचलं कि त्याबद्दल अधिक लिहीन पण तुम्हाला सांगायला उशीर नको म्हणून लगेच लिंक शेअर केली.
शिवप्रेमी, इतिहासप्रेमी, संस्कृतप्रेमी मित्रांशी शेअर करा. 

अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade)

पुस्तक - अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade) लेखिका - लीना सोहोनी (Leena Sohoni) भाषा - मराठी पाने - २३९ प्रकाशन - मेहता पब...