The Log of Christopher Columbus ( द लॉग ऑफ ख्रिस्तोफर कोलंबस )




पुस्तक : The Log of Christopher Columbus (द लॉग ऑफ ख्रिस्तोफर कोलंबस)
लेखक : Christopher Columbus ख्रिस्तोफर कोलंबस
भाषा :  English इंग्रजी 
पाने : २५०

ISBN : 0-87742-951-0

युरोपाच्या पूर्वेला भारत आहे. युरोपातून पूर्वेच्या ऐवजी पश्चिमेकडून गेलं तर पृथ्वी गोल असल्याने भारतात पोचता येईल. या तर्कातून कोलंबसाने साहसी प्रवासाला सुरुवात केली. भारताच्या ऐवजी तो पोचला एका नव्या भूप्रदेशात. आणि कोलंबसाला अमेरिकेचा शोध लागला. इतपतच माहिती आणि कोलंबसाचे गर्वगीत ही कविता एवढंच साहित्य आत्तापर्यंत कोलंबसाबद्दल वाचलं होतं. सुमारे पाचशे वर्षांपूर्वी शिडाच्या जहाजातून अज्ञात प्रवासाला निघणारा कोलंबस आणि त्याचे साथी, त्यांच्या प्रवासातला थरार, नव्या भूप्रदेशाशी तिथल्या आदिवासींशी (शब्दशः) आलेला संपर्क हे सगळं थेट कोलंबसच्या शब्दात जाणून घ्यायची संधी या पुस्तकाने दिली. वाचनालयात एका कोपऱ्यात धूळ खात पडलेलं हे पुस्तक खूप मोठा ऐतिहासिक दस्तऐवजआहे.





३ ऑगस्ट १४९२ ला कोलंबस स्पेनमधून निघाला. दोन महिन्यांनी तो नव्या भूमीत पोचला. ऑक्टोबर ते जानेवारी तो नवीन प्रदेश, नवीन बेटं बघत तिथल्या आदिवासींशी भेटत राहिला. जानेवारीत परतीचा प्रवास सुरू करून मार्च १४९३ ला तो स्पेनला परत आला. भारताचा नवा मार्ग सापडल्याची बातमी घेऊन. या सर्व प्रवासात त्याने रोजच्या रोज डायरी लिहून या प्रवासाचा अहवाल स्पेनच्या राजाला सादर केला. मूळ स्पॅनिश मधल्या या डायरीचं हे इंग्रजी भाषांतर आहे. रोज किती प्रवास केला, समुद्रात नवीन काय दिसलं, बोटीवर काय घडलं हे कोलंबस सांगतो आणि आपणही त्याच्या बरोबर हा प्रवास करायला लागतो. कित्येक दिवस झाले तरी जमीन काही दिसत नाही यामुळे वैतागलेले आणि जिवंत काही परत जात नाही असं वाटून निराश झालेले नाविक आणि बाकी कर्मचारी यांना कोलंबसाने धीर कसा दिला हेही वाचायला मिळतं. आपण घरापासून खूप दूर आलोय असं वाटू नये म्हणून बोटीने कापलेल्या अंतरांची नोंद चक्क खोटी, कमी अंतर दाखवण्याची शक्कलही त्याला लढवायला लागली. त्याच्याच शब्दांत वाचा : 

(फोटो मोठा करण्यासाठी फोटोवर क्लिक करा)



पहिली भूमी लागल्यावर तो तिथे उतरला. त्या भूमीचा स्पेनच्या राजाचा प्रतिनिधी म्हणून आपण आता ताबा घेतला अशी त्याच्या लोकांच्या साक्षीने कागदपत्रं केली आणि या नव्या भूमिला नाव दिलं "सान साल्वादोर". कोलंबसाला जी नवीन बेटं लागली त्या सगळ्यांना आपल्या कल्पनाशक्ती आणि राजभक्तीनुसार राजपरिवारातल्या व्यक्तींची, देवांची, ग्रहांची वगैरे नावं तो ठेवत गेला. काही स्थानिक नावांचे अपभ्रंश झाले. पुढे पोर्तुगिजांनी मुंबई बेटाचं नाव "Bom Baim  म्हणजे "good little bay"" ठेवलं तो प्रसंगही असाच घडला असेल नाही. 


तिथल्या आदिवासी - "इंडियन" लोकांनी हे जहाज, गोरे लोक बघून हे 
लोक जणू स्वर्गातूनच आले आहेत अशा भावनेने, भीती आणि आदराने त्यांनी यांचं स्वागत केलं. खाणाखुणांच्या भाषेने एकमेकांचं बोलणं कसंबसं समजून घेतलं. कोलंबसाने त्यांचं वर्णन कसं केलंय पहा.




तिथली वनराजी, नद्यांचं पाणी बघून तो हरखून गेला. डायरीत जागोजागी त्याने इथल्या सौंदर्याचं, वनस्पती वैविध्याचं, त्यातून स्पेनला कसा व्यापरात फायदा होऊ शकेल याचं वर्णन केलंय. त्याचा मुख्य शोध होता सोनं. भारत सोन्याची खाण आहे या ज्ञानामुळे इथे कुठे सोनं दिसतंय, कुठल्या आदिवासींना याची माहिती आहे याचा शोध घेत तो आजूबाजूची बेटं आणि मोठा भूप्रदेश शोधत पुढे पुढे जात राहिला. आदिवासीही त्यांच्या बरोबर येऊन आपला भूप्रदेश त्यांना दाखवत होते. त्या बिचाऱ्यांना काय कल्पना; की स्वर्गातून आलेली ही माणसं एक दिवस आदिवासींसाठी नरकाहून भयंकर स्थिती उभी करणार आहेत. आज ज्यांचं स्वागत अतिथी म्हणून करतोय तेच उद्या आपल्याला गुलाम करणार आहेत. त्यांना काय कल्पना की दोन संस्कृतींचा, दोन जगांचा संगम आणि संघर्ष याची ही नांदी होती. कारण भोळेपणाने स्वागत करणऱ्या या लोकांच्याबद्दल कोलंबसाच्या मनात मात्र त्यांना धर्मांतरित करून ख्रिस्ती धर्मप्रचार करण्याची, गुलाम बनवून स्पेनच्या राजाच्या सेवेत आणण्याची स्पष्ट इच्छा होती. कोलंबसाच्या शब्दातच वाचा.




ही इच्छा डायरीत जागोजागी वाचायला मिळते. ईशान्य भारताच्या निसर्गपूजक आदिवासींमध्ये झालेल्या धर्मांतरणाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.

पुढे डायरीत आदिवासींशी झालेल्या भेटी, त्यांची राहण्याची पद्धत, दिसलेली झाडं, प्राणी याचं वर्णन पुन्हा पुन्हा येतं तो भाग थोडा एकसुरी होतो. परतीच्या प्रवासात पोर्तुगीज अखत्यारीतील एका बेटावर त्याच्या काही खलाशांना पोर्तुगीज लोक पकडतात. तेव्हा एका योद्ध्याप्रमाणे तो पोर्तुगिजांना आव्हान देतो. जहाजातून न उतरता, त्यांच्या ताब्यात न सापडता केलेल्या खेळीमुळे शेवटी ते लोक माघार घेतात आणि खलाशांची सुटका होते. युरोपात परतताना मात्र त्याला वादळामुळे पोर्तुगाल जवळ जावं लागतं. तिथेही बार्थोलोम्यू डायस या प्रसिद्ध खलाशी योद्ध्याबरोबर त्याचा संघर्ष होतो. शेवटी तो निवळून पोर्तुगालच्या बंदरात उतरतो. तिकडे त्याचं स्वागत होतं आणि शेवटी तो स्पेनला परततो. या सगळ्या नाट्यमय घडामोडींचही वर्णन आहे.


पुस्तकाच्या पहिल्या ५० पानांत कोलंबसाचं लघु चरित्र आणि या डायरीचा इतिहास आहे. डायरीची भाषांतरं, रूपांतरं कशी झाली आणि त्यावर संपादकीय प्रक्रिया काय करावी लागली आहे हे सविस्तर सांगितलं आहे. त्या काळाच्या नौकावहन शास्त्राची स्थिती कशी होती, काय साधनं वापरली जायची, काय अडचणी होत्या हे समजावून दिलं आहे. त्यामुळे कोलंबसाच्या साहसाचं गांभीर्य अजूनच वाढतं. उदा. वेळ मोजण्यासाठी वाळूचं घड्याळ वापरलं जायचं. नौकेचा वेग मोजण्यासाठी एक लाकूड जहाजाच्या सुरुवातीला पाण्यात टाकून पूर्ण जहाज पुढे जायला किती वेळ लागला ते बघायचं असा प्रकार! जहाज 
शिडाचं ! त्यामुळे प्रगती सगळी वाऱ्यावर अवलंबून. गंमत म्हणजे त्यांनी लिहिलंय की हे साहस ते करू धजले याचं कारण एक भौमितिक चूक. टोलेमी या शास्त्रज्ञाने पृथ्वीचा व्यास किती असावा याचा अंदाज केला होता. तो प्रत्यक्ष व्यासाच्या एक चतुर्थांशच होता. त्यामुळेच हजारभर मैल गेलं उजवीकडे की आलाच की भारत अशी कल्पना या लोकांची झाली. आणि त्यातून हे साहस सुचलं.

पुस्तकाच्या उपसंहारातही कोलंबसाच्या आधीच्या सफरी, कोलंबसाचं नंतरचं जीवन, काही नकाशे इ. आहे. पुस्तकात जागो जगी नंतरच्या चित्रकारांनी काढलेली प्रसंगांची रेखाचित्रं आहेत. प्रवास दाखवणारे नकाशे आहेत. पुस्तक जिवंत, अधिक बोलकं झालंय.


कोलंबसाने तोफेचा बार उडवून आदिवासींना आपलं सामर्थ्य दाखवलं तो प्रसंग


त्याकाळत भारताबद्दल किती आकर्षण होतं आणि भारत किती मोठा देश असेल याबाद्दल काय समजुती होत्या हे पण पुस्तकातून कळतं. त्याची एक झलक या नकाशावरून येईल. भारत किती मोठा आणि पसरलेला दाखवलाय पहा.




अडीचशे पानांचं आडवं (चित्रकलेच्या वह्यांसारखं)हे पुस्तक एक महत्त्वाचा ऐतिहासिक दस्तऐवजआहेच पण डायरीच्या आधी-नंतर दिलेल्या माहिती मुळे ते माहितीचा खजिनाही आहे. एका दमात वाचणं शक्य नाही. जो या नौकावहन क्षेत्राशी संबंधित नाही त्याला माहितीचा भडिमार झाल्यासारखं वाटेल. जरा धीराने, चिकाटीने पुस्तक पूर्ण वाचलंत तर एका अद्भुत सत्यइतिहासाची सफर केल्याचा आणि ज्ञानात भर पडल्याचा दुहेरी आनंद मिळेल. हे पुस्तक मराठीतही यायला हवं.



----------------------------------------------------------------------------------

मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )
----------------------------------------------------------------------------------



----------------------------------------------------------------------------------

आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक  )

----------------------------------------------------------------------------------

गोष्टी घराकडील (Goshti Gharakadil)




पुस्तक : गोष्टी घराकडील (Goshti Gharakadil)
लेखक : राजेंद्र बनहट्टी (Rajendra Banahatti)
भाषा : मराठी (Marathi)

ISBN : दिलेला नाही


राजेंद्र बनहट्टी यांच्या लहानपणच्या आठवणींचा हा संग्रह आहे. त्यांचे बालपण नागपुरात गेले. वडील कॉलेजात प्रोफेसर होते. त्याकाळच्या मानाने वडिलांचा पगार बराच चांगला असल्याने सुबत्तेत एका टोलेजंग वास्तूत त्यांचे बालपण गेले. वडील विद्वान म्हणून प्रख्यात असल्याने विद्याभ्यासाचे महत्त्व आणि आईची शिस्त आशा सुसंस्कारांचा त्यांना लाभ झाला. नऊ भावंडे, घरात वेगवेगळ्या कामांसाठी नोकरचाकर, शाळेतले मित्रमंडळी अशा मुलामाणसांनी भरलेल्या सुंदर बालपणातले वेगेवेगळे किस्से त्यांनी सांगितले आहेत.

त्यांच्या मोठ्या घराचं वर्णन आहे. लहान मुलांनी चालवलेल्या सार्वजनिक गणपती मधल्या गमती आहेत. 
घराजवळच्या रेल्वे यार्डात केलेल्या खोड्यांच्या गमती आहेत.

त्यांचे वडील स्वतःचं घर बांधायचं ठरवतात तेव्हा या विद्वान पण व्यावहारिक जगात कच्च्या माणसाची कशी फसवणूक होते तो घटनाक्रम मुलांच्या नजरेतून कसा दिसला ते या लेखात आहे.

एकदा त्यांचे वडील ही मानाची नोकरी सोडून गांधींच्या कामात स्वतःला झोकून द्यायचं ठरवतात. इतकी चांगली कमाई, मानसन्मान सोडून ओढगस्तीचं जगणं वाट्याला येईल म्हणून त्यांच्या आईची होणारी घालमेल होऊ लागली. त्यांच्या आप्तस्वकीयही त्यांचं मन वळवायचा प्रयत्न करतात. याचं गांभीर्य लहानमुलांच्या लक्षात येत नाही. त्यांना गंमत वाटत असते ती खूप पाहुणे येतायत आणि येताना काहीतरी खाऊ नाहीतर मुलांसाठी भेटी आणतायत. एकच प्रसंग मोठ्यांसाठी काळजीचा तर मुलांसाठी मौजमजेचा कसा झाला हे वाचायला खूप मनोरंजक आहे.

पुस्तकात काही व्यक्तिचित्र पण आहेत.

"हवा खराब आहे" असं पालुपद लावत रुग्णाला धीर देत उपचार करणारे जुन्या जमान्यातील डॉक्टर; शाळेतले शिस्तप्रिय , छड्या मारणारे शिक्षक तर काही अगदी रडवेले होऊन शिकवणारे शिक्षक (अगदी पुलंच्या लेखातल्यासारखे. "खबरदार जर टाच मारुनी" हे रडत शिकवणारे). सारखा नापास झाल्याने थोराड झाला तरी शाळेतच राहिलेला टारगट बंडू आणि त्याच्या उचापती. त्यांच्या कडे सणासुदीला खास फराळाचे पदार्थ, पक्वान्ने करायला येणारे तेलंगी ब्राह्मण आचारी इ.

अनुक्रमणिका :


त्यांच्या आईची शिस्त दाखवणाऱ्या प्रसंगातला एक उतारा :




तेव्हाच्या काळी मोठ्या घरी  देवघर कसे असायचे त्याचे वर्णन :



पूर्ण पुस्तक वाचायला मनोरंजक आहे. किस्से वाचायला कुणाला नाही आवडणार? एखाद्या मंगलकार्यासाठी घरात पाहुणे मंडळी जमलीयेत आणि रात्री गप्पा गोष्टी चालल्यात; कुणी जुन्या घराच्या, जीआजोबांच्या आठवणी सांगतंय, आमच्यावेळी असं नव्हतं किंवा आमच्या वेळी तसं नव्हतं हे कुणी सांगतंय, कुणी आपल्या भावंडांच्या लहानपणच्या खोड्या आणि झालेल्या फजितीबद्दल सांगतंय ... अशा गप्पा तासंतास रंगू शकतात. विषयाचे रूळ भराभर बदलत गप्पा मारणाऱ्यांना खिळवून ठेवू शकतात. या पुस्तकाचं रूप साधारण तसं आहे. या पुस्तकातल्या प्रत्येक लेखाला समांतर अशी आठवण तुमची, तुमच्या आईवडीलांची असेल. म्हणून हे पुस्तक वाचल्यावर वेगळं काही, सकस काही वाचल्याचं समाधान वाटणार नाही. विरंगुळा म्हणून छान आहे. १९४० च्या आसपासचा काळ म्हणजे खूप जुना काळही नाही. बरेचसे वाचक तो काळ जगलेले असतील. तरूण वाचकांनी इतर पुस्तकांमधून आपल्या ज्येष्ठ नातेवाईकांकडून ऐकलं असेल. त्यादृष्टिनेही पुस्तक फार आकर्षक नाही. कदाचित अजून शंभर दोनशे वर्षांनंतर १९४० च्या आसपास सधन घरांची कुटुंबव्यवस्था, मूल्यव्यवस्था कशी होती हे चित्र उभं करण्यासाठी हे पुस्तक एक चांगला सामाजिक दस्तैवज ठरेल हे मात्र नक्की.




----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------



----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक  )

----------------------------------------------------------------------------------

ट्विटरसंमेलन २०१८ अध्यक्ष कौशिक लेले (स्वघोषित :) ) यांचे भाषण




ट्विटरसंमेलन २०१८ अध्यक्ष कौशिक लेले (स्वघोषित :) ) यांचे भाषण


व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार. प्रत्येकाचं नाव घेऊन नमस्कार करत नाही. कारण या संमेलनात सर्वजण ट्वीटर व्यासपीठावरच बसले आहेत. हजार जणांची नावं घेऊन अभिवादन करणं शक्य नाही. आपल्यात कोणी उद्योगपती किंवा राजकारणी प्रायोजक म्हणूनही नाही. त्यामुळे तोही उपचार नाही. 

तरीही काही उद्योगपतींची नावं मात्र घेतलीच पाहिजेत. संमेलनाचे हे व्यासपीठ मोफत उपलब्ध करून दिल्याबद्दल ट्वीटरचे संस्थापक सीईओ जॅक डॉर्सी, ब्लॉग आणि यूट्यूब च्या रूपात साहित्य लेखनाला मोफत व्यासपीठ देणारे गूगलचे लॅरी पेज व सर्गी ब्रिन, वर्डप्रेस ब्लॉगिंगचे पदाधिकारी, फेसबुकच्या आणि  व्हॉट्सपच्या माध्यमातून साहित्य वितरणाची मोफत सोय करून देणारे मार्क झकरबर्ग यांना अभिवादन नक्कीच करायला हवे. जर तुम्ही स्वस्तातला डेटा प्लॅन वापरत असाल तर आपापाल्या प्लॅनप्रमाणे श्री. अंबानी, श्री. मित्तल, श्री. बिर्ला, श्री. टाटा यांनाही त्यांच्या अप्रत्यक्ष सहाय्यासाठी अभिवादन. भारतातल्या समस्त राजकीय आणि न्यायपालिकेला अभिवादन. इतर विकसनशील देशांप्रमाणे भारतात समाजमाध्यमांवर बंदी न घातल्याबद्दल, अतिरेकी सेन्सॉरशिप न लादल्याबद्दल त्यांनाही अभिवादन.

तुम्हाला उत्सुकता लागून राहिली असेल मला अध्यक्ष कोणी केलं? कुणीही नाही. माझा मीच झालो. खरं म्हणजे इथे अध्यक्षपदाची निवडणूक काय हे पदच नव्हतं. मग मीच जरा जागा साफसूफ केली, पद निर्माण केलं आणि झालो अध्यक्ष. आता तुम्ही म्हणाल ट्विटरसंमेलनाला लाभलेला अध्यक्ष हा कोण ? हा प्रश्न हल्लीच्या अ.भा.सा.सं च्या गेल्या काही वर्षांच्या परंपरेला धरूनच आहे. संमेलनाध्यक्षांची निवड झाल्यावर सर्वसामान्य वाचकाला हाच प्रश्न पडतो. मग त्या व्यक्तीबद्दल माहितीची शोधाशोध होते. तसंच इथेही. माझी माहिती फार नसल्याने तुम्हाला शोधायला फार कष्ट पडणार नाहीत. (टाळ्या :) :) )

असो! आपल्या पैकी बहुतेकांचं लिखाण हे कथा, कविता, प्रवासवर्णन, अनुभवाकथन असं ललित आणि भावनिक आहे. मला मांडायचे आहेत ते मुद्दे मात्र भावना बाजूला ठेवून, कोरडेपणाने विचार करायचे आहेत. 

मराठी भाषेच्या भवितव्याची चिंता सामान्य मराठीभाषाप्रेमी व्यक्तीपासून साहित्यिक, विचारवंत सगळेच करताना दिसतात. त्यातील बरेच जण हे भविष्य चांगलं असावं यासाठी सक्रिय प्रयत्न करतात. मी स्वतःही माझ्यापरीने त्यात हातभार लावतो आहे. अमराठी लोक मराठी शिकतायत हे चित्र एकिकडे तर दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या अभावी मराठी शाळा बंद पडण्याच्या बातम्या. वाचनसंस्कृती कमी होत्येय हे चित्र एकीकडे तर दुसरीकडे मराठी दूरदर्शन वाहिन्या, चित्रपटांची वाढती संख्या. अशा संमिश्र वातावरणातून मला जाणवलेले मुद्दे इथे मांडायचा प्रयत्न करतो आहे.

१) भाषा - एक साधन. साध्य नव्हे
समजा एका पन्नाशिच्या माणसाकडे त्याच्या तारुण्यात घेतलेली मारुती गाडी आहे. ती त्याने पैपैसा जमवून घेतली आहे. त्या गाडीने तो खूप लांबलांब प्रवास करून आला आहे. ती गाडी त्याच्या कर्तृत्त्वाचं आणि आठवणींचं प्रतिक आहे. पण आता ही गाडी जुनी झालिये, सारखं "काम काढते", स्पेअर पार्ट्स मिळत नाहीत. मुलासाठी त्याला हे मॉडेल जुनाट वाटतं. त्याला अद्ययावत गाडी पाहिजे; ज्यात खूप सोयी असतील, मायलेज जास्त असेल, प्रदूषण कमी होईल, दिसायला खूप आकर्षक असेल अशी. केवळ भावनेपोटी तो गाडी सोडू शकत नाहीये. पण एक ना एक दिवस त्याला ही गाडी विकून टाकावी लागेल. कदाचित भंगारातही द्यावी लागेल.

आज त्या माणसाचा मुलगा जुनी गाडी विकून नवी गाडी कदाचित मारुती कंपनीचीच घेईल. कदाचित होंडा, फोक्स्वॅगन किंवा आणि कुठल्या कंपनीची घेईल. जर मारुती कंपनीने अद्ययावत तंत्रज्ञान, सोयींनी युक्त आणि वाजवी किंमत अशी गाडी बजारत आणली असेल तरच ती घेतली जाईल. वडीलांचीच गाडी पुढे चालवत राहणं शहाणपणाचं नाही; वडीलांची मारुती गाडी होती म्हणून मारुतीचीच गाडी घेतली पाहिजे हेही गरजेचं नाही.
गाडी हे साध्य नाही तर प्रवास हे साध्य आहे. तो सुखकर आणि जलद ज्यामुळे होईल ते वाहनच ग्राहक विकत घेईल. 

भाषेचं तसंच आहे. मी मराठी का बोलतो? माझी मातृभाषा मराठी का आहे? तर योगायोगाने मी ज्या घरात जन्माला आलो त्या घरची भाषा मराठी आहे. पण भाषा हे संवादाचं, ज्ञानाची देवाणघेवाण करण्याचं साधन आहे. साध्य नाही. जर हे साधन जुनं झालं असेल तर ते सोडून देण्याचं, नवीन उपयुक्त साधन स्वीकारणं नैसर्गिक नाही का? माझ्या घरची गाडी मारुतीची म्हणून मी आणि पुढच्या पिढिने तीच वापरत राहिली पाहिजे हा अट्टाहास जसा चुकीचा तसाच. केवळ घरची भाषा मराठी म्हणून माझ्या पुढच्या पिढ्याही मराठीच झाल्या पाहिजेत हा अट्टाहासही चुकीचा नाही का? 

ज्यांना मराठी भाषेबद्दल प्रेम आहे (मीही त्यातच आहे) त्यांना हे खूप निर्दयी वाटेल. पण आजच्या व्यवहारिक युगात ते खरं आहे. 

२) भाषा टिकवण्याची जबबादारी भाषाप्रेमींची
मराठी अद्ययावत नसेल तर नवीन पिढी ती नाकारणार हे मी आधी सांगितलं. मग प्रश्न असा पडेल की मराठीला अद्ययावत कोण ठेवेल? मराठी समाजच ना? याचं उत्तर पूर्णपणे "हो" असं नाही. मराठीला अद्ययावत ठेवायची जबबदारी पूर्ण मराठी समाज घेणार नाही तर त्या समाजातील फक्त भाषाप्रेमींनी जबबदारी घ्यायची आहे. गाडीचंच उदाहरण पुढे घेऊया. मारुती कंपनीला जर असं वाटत असेल की नव्या ग्राहकांनीसुद्धा आपलीच गाडी विकत घ्यावी; तर त्या कंपनीला सतत नवं संशोधन करून प्रगतीत सर्वांच्या पुढे राहिलं पाहिजे. ग्राहकांसाठी गाडी हे साधन आहे तर मारुती कंपनी आणि त्यातल्या कर्मचाऱ्यांसाठी गाडी हे साधन आहे. 
तद्वतच सर्वसाधारण समजासाठी भाषा हे साधन आहे तर "मराठी भाषप्रेमी कंपनी" साठी मराठी भाषा हे साध्य आहे. भाषा अद्ययावत, अकर्षक ठेवणं हे या कंपनीचं साध्य अहे. जर ही कंपनी स्पर्धेत "इंग्रजी भाषाप्रेमी कंपनी ", "जपानी भाषाप्रेमी कंपनी" इ. कंपन्यांच्या मागे पडली आणि समजाने "इंग्रजीकंपनीचं" मॉडेल, "जर्मनप्रेमी" कंपनीचं मॉडेल जोरात विकत घ्यायला सुरुवात केली तर दोष ग्राहकाचा नाही कंपनीचा आहे.


३) सध्या मराठी ज्ञानभाषा नाही आणि होणं शक्य वाटत नाही.
मराठी ज्ञानभाषा आहे की नाही हा मुद्दा बऱ्याच वेळा चर्चिला जातो. माझं असं म्हणणं आहे की मराठीच काय आजच्या घडीला कुठलीच भारतीय भाषा ज्ञानभाषा नाही. मराठी भाषेमध्ये आवश्यक शब्द असतील. इंग्रजीत तयार झालेलं ज्ञान मराठीत व्यक्त करता येईलही पण. ते भाषांतर झालं. ज्या वेगाने ज्ञान निर्माण होतंय त्या वेगाने भाषांतर होत नाहीच आहे पण तितक्या वेगाने होणंही कठीण आहे. असं म्हणतात की दरवर्षी मनवजातीने मिळवलेलं ज्ञान आत्तपर्यंत मिळवलेल्या ज्ञानाच्या दुप्पट आहे. इतक्या महाप्रचंड माहिती विस्फोटाच्या समोर मराठीतील शब्द आणि भाषांतराचा वेग नगण्य आहे. आत्ताच असलेला अनुशेष आणि तयार होणारा अनुशेष लक्षात घेता आपण ही लढाई हरलो आहोत हे प्रामाणिक मान्य केलं पहिजे. 

) इतर भाषिकांना जमलं मग मराठीला का नाही.
इंग्रजीला स्पर्धा करणाऱ्या जपानी, कोरियन, जर्मन, हिब्रू भाषांची आणि त्यांच्या देशांची उदाहरणं लगेच आपल्या डोळ्यासमोर येतील. पण ते देश भारतापेक्षा फार लहान आहेत, समाज म्हणून खूप एकजिनसी आहेत. भारत इतका मोठा आहे की दोन भारतीयांना बोलायलाही एक मध्यस्थ भाषा - हिंदी किंवा इंग्रजी - लागते. तिथे सगळा समाज एकभाषी होऊन शिकतोय, ज्ञाननिर्मिती करतोय हे अशक्य आहे. 
भारतात मुळात ज्ञाननिर्मितीच कमी होत्येय आणि तीही एखाद्या भाषेतच झाली ( मराठी, बंगाली इ.) तरी परदेशी आणि देशी अशा सगळ्यांशी संवाद साधत तंत्रज्ञान, विज्ञान पुढे न्यायला करायला मध्यस्थ भाषा इंग्रजीच लागणार. म्हणून मराठी आणि इतर कुठल्याही भाषेला हे जमणार नाही हे कटू सत्य आपण स्वीकारायला हवं

) मग मराठी शाळा बंद पडू देत का ? 
नाही. इंग्रजी ज्ञानभाषा म्हणून मराठी शाळा बंद पाडण्याची गरज नाही. मराठीशाळाप्रेमी कार्यकर्ते म्हणात की "इंग्रजी शिकणं वेगळं आणि इंग्रजीतून शिकणं वेगळं. मातृभाषेतून शिकणं अधिक आनंददायी आहे, मुलं लवकर आत्मसात करतात. मनोवैज्ञानिकांनी हे संशोधनाअंती सिद्ध केलं आहे". यातला पहिल्या मुद्द्याशी मी पूर्ण सहमत आहे.  इंग्रजी शिकणं वेगळं आणि इंग्रजीतून शिकणं वेगळं. इंग्रजी चांगलं येण्यासाठी इंग्रजीतून शिकण्याची आवश्यकता नाही. मी स्वतः मराठी माध्यमातून शिकलो. चांगला इंजिनिअर झालो. एका मोठ्या कंपनीत चांगल्या हुद्द्यावर नोकरीला आहे. माझे शाळूसोबत्यांनी पण चांगली प्रगती केली. अमेरिकेत एम.एस. केलं. तिकडे सेटल झाले. मराठी माध्यमातून शिकले म्हणून त्यांचं काहीच अडलं नाही. परंतु मला हेही जाणवतं की माझ्या बरोबर काम करणारे कितीतरी आज इंग्रजी माध्यमातून शिकल्ले आहेत. तेही चांगली प्रगती करतायत. मातृभाषेतून शिकले नाहीत म्हणून त्यांचही अडलं नाही. आनंददायी शिक्षण म्हणाल तर त्यांचं शिक्षण रडतखडत झालं असंही नाही. 

माझ्या वर्गातल्या अभ्यास न आवडणाऱ्या मुलांसाठी मराठीत शिकणंही आनंददायी नव्हतं. मराठीतून शिकणंच काय मराठी शिकणं हेही आनंददायी नव्हतं. उलट पु.लंच्या बालपणावरच्या आत्मकथनात ते विनोदाने म्हणतात "बिगर यत्ते पासून मॅट्रिक होईपर्यंत माझं सारं आयुष्य मोठ्या हलाखीत गेलं.. मी पाढे भराभर म्हणत असे, पण ते भिऊन". वाचनाचं म्हणल तर माझे कितितरी मराठी मित्र रोअजहा पेपरही वाचत नाहीत तर माझे इंग्रजी भाषेत शिकलेले, अगदी कॉन्वेंट मध्ये शिकलेले मित्रही मराठी वाचतात, धार्मिक तत्त्वज्ञानाची पुस्तकं वाचतात. "मराठी अभिमानगीता"चा संगीतकार कौशल इनामदार हा इंग्रजी माध्यमात शिकलाय असं विकिपिडिया वरील माहिती वरून दिसतंय.

परदेशी - पाश्चिमात्य असो की पौर्वात्य - लोकांपेक्षा आपण भारतीय आणि त्यातही मराठी लोक शताकानुशतकं बहुभाषिक समाजव्यवस्थेत वावरत आलो आहोत. पूजापाठाची भाषा संस्कृत, घरातली मराठीची बोली (मालवणी, आग्री, धनगरी, अहिराणी इ.), शाळेत प्रमाण मराठी, शेजारी पाजारी कानडी, गुजराती, उ.भारतीय, द. भारतीय लोक, सिनेमा-कार्टून हिंदी, सरकारी, बॅंकेचे फॉर्म्स इंग्रजीत अशी मिश्र व्यवस्था आपली आहे. एकभाषी समाजाला दुसऱ्या भाषा जितक्या परक्या वाटतात तितक्या आपल्याला नाहीत. 

त्यामुळे मातृभाषा का इंग्रजी माध्यम हा निर्णय वाटतो तितका सरळ विषय नाही. तो पूर्णपणे वैयक्तिक आवडीनिवडीवर अवलंबून आहे असं मला वाटतं. आणि लोकांवर निर्णय सोडला की ते इंग्रजी माध्यमाकडेच जाणार हे उघड दिसतंय. कारण जास्त चिकित्सा न करता अंधानुकरण करणे, प्रवाहाच्या मागे वाहत जाणे हा आपल्या समाजाचा गुणधर्म आहे. इंग्रजी माध्यमात घातल्याने काही फायदा होणार नाही हे तो पटवून घेणर नाही. म्हणून मराठीशाळा प्रेमींनी तात्त्विक चर्चा करून मराठी समाजाला हे पटवून देण्याचा प्रयत्न न करता असा काय भावनिक मुद्दा आहे जो मराठी पालकांना आकर्षित करेल हे शोधलं पाहिजे. उदा. विकासाचं राजकारण करू असं म्हाणणऱ्या प्रत्येक पक्षाला शेवटी जातीच्या, धर्माच्या असा कुठलातरी भावनिक मुद्दाच घ्यावा लागतो. कारण अपरिपक्व मतदार त्यालाच भुलतात. तसंच इथेही आहे.

) सगळेच इंग्रजी माध्यमाकडे वळले तर मग?
ही भीती आहेच. मराठी भाषाप्रेमींची जबाबदारी इथे सुरू होईल. ज्ञानभाषा इंग्रजी पण भावभाषा मराठी हे धोरण आपण राबवलं पाहिजे. 
इंग्रजीतून शिकलो नाही तर मागे पडू ही भीती वाटत्ये ना, ठीक आहे. शिका इंग्रजी माध्यमातून. पण त्यासाठी मराठी विसरायची गरज नाही. आमच्या मुलाला मराठी वाचता येत नाही, नीट बोलता येत नाही हे सांगताना कमीपणा वाटणं सोडाच एक सुप्त अभिमान अनेकांच्या बोलण्यात जाणवतो. ही विकृती आहे. आणि ही विकृती समाजघातक आहे. इथे थोड्या कठोर भूमिका घेण्याची गरज मला वाटते. त्यासाठी महाराष्ट्रात पहिली ते बारावी मराठी अनिवार्य असावं. ही मागणी नवी नही. साध्या कार्यकर्त्यांपासून, साहित्यिकांपर्यंत सगळ्यांनी ती मागणी केलेली आहे. मला त्यात आणखी एक तपशील घालावासा वाटतो की. "लोअर मराठी", "लोअर इंग्लिश" हा प्रकार बंद केला पाहिजे. अत्ता होतंय काय की दहावी पर्यंत मराठी शिकूनही "कमळ नमन कर, छगन घर बघ" च्या पुढे गाडी गेलीच नाही असं वाटतं. मराठी माध्यमात जसं पहिलीपासून इंग्रजी आहे तसं अमराठी माध्यमांत पहिलीपासून मराठी हवं. आणि तो अभ्यासक्रम असा चढत्या भाजणीचा हवा की पाचवी पासून माध्यम कुठलंही असो मराठीचा अभ्यासक्रम, इंग्रजीचा अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती सगळ्यांना सारखीच. "लोअर स्टॅंडर्ड" गोष्ट कुणाचीच नाही. मराठी लेखन, वाचन, संभाषण उत्तमच असलं पाहिजे.  इंग्रजी लेखन, वाचन, संभाषण उत्तमच असलं पाहिजे. 
परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही यात सूट नसावी. त्यांच्यासाठी अभ्यासक्रम वेगळा असला पाहिजे. उदा. जर एखाद्या मुलगा चौथीत असतना महाराष्ट्रात आला तर त्याला चौथी , पाचवी , सहावी अशा तीन वर्षांत पहिल्या सहा वर्षांचा अभ्यास पूर्ण करता येईल आणि सातवी पासून तो सगळ्याच्या बरोबर येईल. एखादा आठवीत आला तर ८,९,१०,११,१२ अशा पाच वर्षांत तो दहावीपर्यंतचा अभ्यासक्रम पूर्ण करेल. तो मागून ११ वी १२ वीचं मराठी परीक्षा उत्तीर्ण होईई. तोपर्यंत "प्रोव्हिजनल सर्टिफिकिट" मिळेल. म्हणजे त्याचा नोकरी किंवा पुढचं शिक्षण अडणार नाही. पण सरकारी मराठीच्या द्रुष्टीने तो अजून बारावी पास नाही हे ठळक दिसेल.

इतिहास, मूल्यशिक्षण हे विषय तरी मराठीतून शिकवले पाहिजेत.  "नमस्कार करा" मधला भाव "join your hands" मध्ये नाही; "शिवरायांनी मावळे जमवून तोरणा किल्ल्यावर स्वराज्याचं तोरण बांधलं" मधला भाव "Shivaji gathered youngsters, conquered Torana fort and started his kingdom" मध्ये नाही. आपली संस्कृती, संस्कार, भावना नव्या पिढीपर्यंत पोचवायला आपलीच भाषा हवी. अन्यथा त्यांना शिवाजींची कोरडी माहिती मिळेल "स्वराज्य" स्थापन केलं म्हणजे काय हे कळणार नाही.

या योजनेची अंमलबजावणी होण्यासाठी दबावगट तयार करायला चालना दिली पहिजे. 

) शालेय शिक्षणातच नाही तर राजभाषा म्हणून मराठीचं स्थान बळकट करणे
मराठी ज्ञानभाषा म्हणून मागे पडली असली तरी राजभाष म्हणून ती सक्षम आहे. राजभाषा मराठी आणि त्रिभाषासूत्री यातून मराठीचं पहिलं आणि मानाचं स्थान कायदेशीरदृष्ट्या पक्कं आहे. असं  स्थान वास्तवातही मिळालं पाहिजे यासाठी "मराठी बोला चळवळ" हा उपक्रम दोन-तीन वर्षांपासून सुरू झालं आहे. राज्य शासकीय, केंद्र शासकीय, निमशासकीय असो अथवा खाजगी जिथे जिथे मराठी डावलली गेल्याचं दिसतंय तिथे संबंधित अधिकाऱ्यांना तक्रार करणं, पाठपुरावा करून बदल करून घेणं आणि तसा बदल होत नसेल तर कायदेशीर आव्हान देणं असं या चळवळीचं स्वरूप आहे. त्या बरोबरीने ग्राहकांचा दबावगाट तयारकरून मराठीला योग्य स्थान दिलं नाही तर मराठी लोक बहिष्कार घालतील आणि तुमच्या उद्योगावर, उत्पन्नावर परिणाम होईल हा कायदेशीर मार्गापेक्षा कमी वेळखाऊ आणि जास्त परिणामकारक मार्गही या चळवळीचा आहे. जास्तीत जास्त मराठी माणसांनी या दबावगटात सहभाजी होऊन त्याची परिणामकारकता वाषवली पाहिजे. मराठी माणसाने मराठी भाषेचा आग्रह धरला की "भाषा जोडनेका साधन है, तोडनेका नही" असं अमराठी लोक म्हणतात. की खरंच आपण संकुचित, देशाच्या एकात्मतेला विरोध करतोय की काय असा विचार करून संवेदनशील मराठी माणूस लगेच स्वतःलाच दोष देऊ लागतो. पण मराठीच्या स्थानाचा आग्रह म्हणजे दुसऱ्या भाषेचा द्वेष करणं नाही; संकुचितपणा नाही तर दुसऱ्यांचा मराठीद्वेष उघड करून, संकुचितपणा उघड करून आपण उलट देशकार्यच करत आहोत; बेकायदा कारवाईला आळा घालण्यात व्यवस्थेला मजबूत करत आहोत हे समजून घेतलं पाहिजे. 

)  मराठीची शब्दसंख्या वाढवणं
मराठीत इंग्रजी आणि इतर भाषांतले शब्द येणं अपरिहार्य आहे. परभाषेतल्या शब्दांसाठी नवीन शब्द घडवायची प्रक्रिया मात्र चालू राहिली पाहिजे. मूळ इंग्रजी शब्द आणि त्याला समानार्थी नवीन मराठी शब्द यांच्या रस्सीखेचेतून जो शब्द बहुसंख्यांना आवडेल तो आपोआप स्वीकारला गेला पाहिजे. या दृष्टीने मी स्वतः फेसबुकवर "नवीन मराठी शब्द " ह गट तयार केला आहे. ज्याची सुरुवात करताना मी म्हटलं होतं.

चला, नवीन मराठी शब्द घडवूया; असा शब्द सुचला की जास्तित जास्त जणांपर्यंत तो पोचवूया; एकापेक्षा जास्त पर्याय असतील तर कुठला जास्त चांगला वाटतो ते ठरवूया; आणि असे नवीन शब्द मराठी भाषेत रुळवुया. इतका साधा सोपा उपक्रम आहे हा !!.
हा उपक्रम माझं एकट्याचं किंवा कोणा एका व्यक्तीचं काम नाही. आपण सर्वांनी हा जगन्नाथाचा रथ ओढायचा आहे. आणि वाटतं तितकं हे काम अवघड नाही. या उपक्रमासाठी वेगळा वेळही काढायची गरज नाही. आपल्या रोजच्या मराठी बोलण्यात/वाचण्यात एखादा इंग्रजी शब्द ऐकला-वाचला की Back of the mind त्याचा सोपा मराठी शब्द काय असेल याचा विचार करायचा. आणि असा काही शब्द सुचला की आपल्या फेसबुक ग्रूप वर इतरांना सांगायचा. लोकांना कदाचित तो आवडून जाईल किंवा त्यातून अजून नवीन कल्पना सुचतील. 
साध्या मराठीत संगायचे तर तुमच्या "क्रिएटिव्हिटी" ला वाव आणि जरा "ब्रेन्स्टॉर्मिंग". रोजच्या धावपळीत ही "क्रिएटिव्हिटी" तुम्हाला "रिफ्रेशच" करेल. :)

एकदम वैज्ञानिक संज्ञांवर उडी न मारता रोजच्या वापरातल्या, इंटरनेट वर वापरल्या जाणाऱ्या शब्दांपासून सुरूवात करूया. उदा.
१) दुकानांवरच्या पाट्या 
२) टीव्ही वरच्या मराठी मालिकांमधले संवाद. उदा. "मी तुला खूप मिस्‌ करते" ई.
३) मराठी बातम्यांमधले शब्द उदा. ब्रेकिंग न्यूज, बंडखोराला तिकिटाची ऑफर, ई.
४) एफेम रेडीओ वरची रेडिओ-जॉकींची बडबड
५) वर्तमानपत्रांमधल्या. टीव्ही-रेडिओ वरच्या जाहिराती

तुम्हाला जाणवलंच असेल की यासाठी भाषातज्ञ, व्याकरणतज्ञ असण्याची काही गरज नाही. साधीसोपी माणसं आणि त्यांचे साधे सोपे शब्द !! 
तर नक्की या फेसबुक पेजला जॉइन व्हा आपल्या सर्व मित्र-मैत्रिणी नातेवईकांनाही जॉईन करायला सांगा. जितके जास्त सभासद तितक्या जास्त कल्पना आणि तितकी अधिक मजा एखादा ऑनलाईन गेम खेळल्या प्रमाणे !
https://www.facebook.com/groups/494409877351095/
आणि या ग्रूप वर चर्चा झालेले शब्द ह्या ब्लॉगवर टाकत जाईन जेणेकरून सगळे शब्द एकत्र बघता येतील.
http://navin-marathi-shabda.blogspot.in/
म्हणतात ना -"देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे". तुमचा हातही त्यातलाच एक नक्की आहे !! 

कुठला इंग्रजी शब्द आता अधिकृतरित्या मराठीत आहे, कुठला नवा शब्द अधिकृतरित्या मराठीत आहे हे ठरवण्याची ही व्यवस्था शासनाने निर्माण केली पाहिजे. आणि अद्ययावत शब्दकोश प्रसिद्ध केले पाहिजेत. शासन करत  नसेल तर आपल्या पैकीच कुणितरी तो प्रयत्न नेटाने सुरू ठेवला तर ऑक्स्फर्ड डिक्शनरीप्रमाणे आपण आपलं स्वयंभू स्थान निर्माण करू शकू.

) ई-साहित्याची साठवण.
आपल्या समाजात इंटरनेटस्नेही  लोक वाढत आहेत. तरूण आणि मध्यमवयीनच काय शहरातील ज्येष्ठ सुद्धा आता फेसबुक, व्हॉटसप सहज वापरतायत. मराठीत टायपिंग करतायत. आपले अनुभव, भावना व्यक्त करतायत. हे नुसतं टाईमपास म्हणून केलेलं लिखाण नाही. अभ्यासपूर्ण, संदर्भ, फोटो दिलेलं आणि उत्तमशैलीतलं लेखन पण मी मिसळपाव, मायबोली सारख्या संकेतस्थळांवर वाचलं आहे. अशी खूप संकेतस्थळं स्वतंत्रपणे काम करतायत. पण संकेतस्थाळांची रचना अशी असते की सगळ्यात नव्या पोस्ट किंवा लेख वरती दिसतात आणि जुन्या पोस्ट त्याखाली गाडल्या जातात. जुनं चांगलं लिखण दृष्टीआड होतं व विस्मृतीत जातं. कुणी उत्साहाने शोधाशोध केली किंवा योगायोगाने लिंक बघण्यात आली की एखादं घबाड हाती लगल्याचा आनंद मिळतो. माझी या सर्व सकस लिखाण करण्यांना विनंती आहे की आपल्या लिखाणाचं ई-बुक अवश्य तयार करा. तुमचं लिखाण एकाठिकाणी राहील. वाचकांशी शेअर करणं सोपं जाईल. तुमच्याच नावावर एक-दोन किंवा दहा बारा पुस्तकं आहेत याचं समाधान मिळेल. ई-बुकची संकल्पना मराठीत रुजायला वाढायला मदत होईल. याचा अवश्य विचार करा.

१०) मराठीला अभिजात भाषेचा दर्जा
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने काय फायदा होणार आहे माहीत नाही.  

आपली आपण करी स्तुती| स्वदेशीं भोगी विपत्ति |सांगे वडिलांची कीर्ती| तो येक मूर्ख 

हजार वर्षांपूर्वी आमच्या पूर्वजांनी जागतिक पातळीवरचे लेखन केले पण आज आम्ही ज्ञाननिर्मिती न करत स्वतःला आणि भाषेलाही मागे नेले आहे. आजीच्या भरजरी साडीच्या सोन्याची जर वितळवून दिवस काढतो आहोत असं वाटायला लागतं.
हा दर्जा मिळाला तर केंद्रसरकार कडून काही निधी मिळत असेल. एकाबाजूला राज्याकडे, मराठी माणसाकडे आहे त्याच निधीचा योग्य वापर होतोय का नाही ही शंका असताना अजून निधी म्हणजे फक्त संख्येत वाढ. गुणत्मक नाही. पण येत्या लक्ष्मीला आणि मिळ णाऱ्या मानाला नाही का म्हणा? म्हणून या कामाला शुभेच्छा.
११) मोडीलिपी चे जतन संवर्धन
अभिजात मराठी बद्दल बोलताना ऐतिहासिक मराठीचं मोठं लेखन मोडी लिपीत झालं आहे या वास्तवाकडे दुर्लक्ष होतं.  १२व्या शतकापासून शिवकाल, पेशवेकाल, ब्रिटिशकाल यांमध्ये मोडीलिपी मोठ्याप्रमाणवर वापरली जात असे. जिथे राजभाषा मराठी होती तिथे राजकीय पत्रसंवाद, व्यावसायिक व्यवहारांच्या नोंदी, जमिनीची इनामे, खरेदीविक्री यांच्या नोंदींसाठी मोडीलिपीचा वापर होत असे. माझ्या वडिलांनी सांगितलं की ४०-५० वर्षांपूर्वी त्यांच्या नातेवाईकांकडे घरगुती पत्रं पण मोडी लिपीत लिहिलेली त्यांनी बघितली आहेत. 

पण आता ही लिपी वापरात नसल्याने ही लिपी वाचू शकणारे लोक खूप कमी राहिले आहेत. जुने-जाणते लोक, इतिहाससंशोधक किंवा जुन्या लिपी-भाषांचे अभ्यासक यांपुरतीच ती मर्यादित राहिली आहे. शिवकाल-पेशवेकाल या मराठी माणसाला अभिमानस्पद असणाऱ्या कालखंडाचा इतिहास या मोडीलिपीत कुलुपबंद होऊन पडला आहे. सर्वसामान्य वाचक थेट जुनी कागदपत्रे वाचू शकत नाही.

पण आता मनु बदलतो आहे. मोडीलिपीचं महत्त्व जाणून तिच्याकडे आकर्षित होणाऱ्यांची संख्या वाढते आहे. मोडी जाणणारेही त्याला सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. तरूण आणि मध्यमवयीन पिढी नवीन तंत्रज्ञानाच्या सुयोग्य वापरातून या प्रसार-प्रचाराला गती देत आहेत. ही आनंदाची बाब आहे. 

१२) भाषाप्रेमींनी कर्तृत्त्वान झालं पाहिजे.
मराठीची शब्दसंख्या, इतिहास, साहित्य, देवाणघेवाण या बाबींचा विचार केला. पण भाषेचं अस्तित्त्व ती बोलणाऱ्या समाजामुळे आहे. तिची वाढ ती बोल णा ऱ्या समाजाच्या वाढीमुळे आहे. आणि तिचं स्थान,मान ती बोलणाऱ्या समजाच्या स्थान-मानामुळे आहे. जो समाज सत्ताधारी असतो (राजकीय, सामाजिक, धार्मिक) त्याचं म्हणणं लोक ऐकतात. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे "राज्यकर्ती जमात व्हायला" पाहिजे. 

मराठी माणसाने श्रीमंत व्हायला पाहिजे. क्रयशक्ती वाढवली पाहिजे. सर्वोत्तम वैज्ञानिक, सर्वोत्तम खेळाडू, सर्वोत्तम गुंतवणूकदार श्रीमंत, सर्वोत्तम कंपनी संचालक हे जेव्हा अस्खलित मराठीत बोलताना दिसतील तेव्हा "सर्वे गुणाः कांचनमाश्रयन्ते" या उक्तीप्रमाणे मराठी भाषेलाही सगळे गुण अपोआप चिकटतील.
मराठी चित्रपट हे त्याचं चांगलं उदाहरण आहे. मराठी भाषाप्रेमींनी सुंदर कलाकृती प्रदर्शित केल्यावर लोक आकर्षित झाले. आणि लोकांचा प्रतिसाद मिळतोय म्हटल्यावर हिंदीतले निर्माते, दिग्दर्श्क, अभिनेते ही त्यात सहभागी व्हयला ( शुद्ध व्यवसायिक फायद्याच्या हेतून ) धडपडू लागले.  म्हणून मराठीप्रेमींनी स्वतःवर कर्तृत्व सिद्ध करण्याची जबरदस्ती केली पाहिजे. मराठी भाषाप्रेमींनी ज्या क्षेत्रात आहोत तिथे स्वतःचा अमीट ठसा उमटवून बाकीच्यांना आपल्या मागे यायला भाग पाडलं पाहिजे. 

समृद्ध मराठी, सकस मराठी यशवी मराठी भाषा शिकायला अमराठी लोक रांगा लावतील

१३) अमराठी लोक मराठी शिकू शकतात आणि शिकताहेत. ऑनलाईन, मोफत.
हो. हे खरं आहे.

मी अमराठी व्यक्तींना मराठी शिकवण्यासाठी ऑनलाईन ट्युटोरियल्स तयार केली आहेत; जी माझ्या ब्लॉग्स च्या माध्यमातून पूर्णपणे मोफत उपलब्ध आहेत. 
http://kaushiklele-learnmarathi.blogspot.in/
http://learn-marathi-from-hindi-kaushiklele.blogspot.in/

Learn Marathi from English मध्ये १३९ धडे आहेत.
Learn Marathi from Hindi मध्ये १०१ धडे आहेत.

या ब्लॉग मध्ये देवनागरी लिपी, प्राथमिक व्याकरण (नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे शॉर्ट फॉर्म्स इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात मराठी शिकू इच्छिणाऱ्यांसाठी 'one-stop-shop' असा हा ब्लॉग आहे. 

 मी या ब्लॉग मधील संभाषणाच्या २०६ साउन्ड क्लिप्स ही YouTube channel वर “Kaushik Lele” नावाच्या चॅनल वर टाकल्या आहेत जेणेकरून विद्यार्थ्याना मराठी उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

You Tube Channel name :- Kaushik Lele
https://www.youtube.com/c/KaushikLele_Learn_Marathi

मे २०१२ मध्ये मी या उपक्रमाची सुरुवात केली.

माझ्या ट्युटोरियल्स वापरून मराठी शिकत असल्याचे आत्तापर्यंत दोनशे लोकांनी ईमेलवर कळवले आहे. तर यूट्यूब चॅनलचे तीन हजार तीनशे हजार हून अधिक सबस्क्रायबर्स आहेत.

त्यात महाराष्ट्रात शिक्षणासाठी किंवा कामनिमित्त परराज्यातून आलेल्या व्यक्ती, स्पर्धा परीक्षांसाठी मराठीचा अभ्यास करणाऱ्या अमराठी व्यक्ती, भाषांची आवड असणारे परदेशी नागरिक, अनिवासी मराठी आहेत. तसेच मराठी व्यक्तींच्या प्रेमात पडलेले किंवा लग्न केलेले परदेशी नागरिकही आहेत.

दोन्ही ब्लॉग आणि यूट्यूब चॅनलना सुमारे सात लाख वेळा लोकांनी भेट दिली आहे.
"क्रियापद रूपावली" अर्थात एका क्रियापदाची प्रत्येक काळातली, प्रत्येक सर्वनामासाठीची, वेगवेगळ्या वाक्प्रचारांतली रुपे दाखवणारे संकेतस्थळ मी तयार केले आहे. मराठी शिकणाऱ्यांसाठी नामाचे लिंग, अनेकवचन, सामान्यरूप देणारा शब्दकोश ही तयार केला आहे.

या सर्व उपक्रमांना फारच छान प्रतिसाद मिळाला असला तरी अजूनही मराठी शिकण्यासाठी काही सुविधा उपलब्ध नाही असाच (गैर)समज सगळीकडे आहे. वेबसाईट अधिकाधिक उपयुक्त व्हावी आणि प्रत्येकापर्यंत तिची माहिती पोचावी असा माझा प्रयत्न चालू आहे. या प्रयत्नात तुमच्या सूचना, टीकांचे मी स्वागत करतो आणि प्रसारात तुमच्या सहकार्यासाठी नम्र विनंती करतो.

१४) समारोप
लिहिता लिहिता भरपूर लिहिलं आता थांबतो. तुम्ही इथपर्यंत वाचत पोचला असाल तर तुमच्या संयमाला आणि मराठीप्रेमाला मी दाद देतो. माझ्या या विचारांवर, कामावर साधकबाधक चर्चा होईल; मलाही काही गोष्टी नाव्याने कळतील अशी अपेक्षा आहे. अध्यक्षीय भाषणात कुठल्याही महापुरुषांना वंदन, जुन्या साहित्यकांना वंदन असं काही केलं नाही रागावू नका. त्यांना आपल्या कृतीतूनच आपण सगळे वंदन करणार आहोत. 



तरी न्यून ते पुरतें। अधिक तें सरतें। करूनि घेयावें हें तुमतें। विनवितु असे


आपला,
कौशिक लेले

द फेसबुक इफेक्ट (The Facebook Effect)




पुस्तक : द फेसबुक इफेक्ट (The Facebook Effect)
भाषा : मराठी (Marathi)
मूळ भाषा : इंग्रजी (English)
मूळ लेखक : डेव्हिड कर्कपॅट्रिक (David Kirkpatrick)
अनुवाद : वर्षा वेलणकर (Varsha Welankar)
पाने : ३९४

ISBN : 978-93-8617-517-5 

फेसबुक, व्हॉटसप, जीमेल, व्हॉटसप हे आता आपल्या जगण्याचे अविभाज्य भाग झाले आहेत. या परिक्षणाची लिंक सुद्धा तुम्हाला फेसबुक किंवा व्हॉटसप वरच मिळाली असेल. या तंत्रज्ञानाने दोन व्यक्ती एकमेकांशी कसा संपर्क करतील, माहिती आणि भावभावना यांची देवाणघेवाण कशी करतील याचं पूर्ण चित्रच  बदलून टाकलं आहे. हा बदल पूर्वीसारखा शतकांच्या अवधीत न होता दशकांच्या किंवा अर्धदशकांच्या अवधीत होतो आहे. असाच एक बदल आपल्या डोळ्यासमोर समोर घडला आणि जो घडवण्यात आपण सक्रिय सहभाग घेतला तो म्हणजे फेसबुकचा प्रसार, महत्त्व आणि परिणामकारकता. "द फेसबुक इफेक्ट" या पुस्तकात लेखकाने याच बदलाचा आलेख मांडला आहे.

फेसबुकचा संस्थापक मार्क झकरबर्ग याने हार्वर्ड मध्ये उच्चशिक्षण घेताना तिथल्या विद्यार्थ्यांना एकमेकांनी निवडलेल्या विषयांची माहिती मिळावी म्हणून "कोर्स मॅच" नावाचं सॉफ्टवेअर बनवलं आणि थोड्याच दिवसात ते तिथे लोकप्रिय झालं. इथून मार्कच्या कल्पकतेला आणि त्यावर लोकांच्या पडणाऱ्या उड्या यांना सुरुवात झाली. अशा नवनवीन संकल्पना राबवत एकेदिवशी फेसबुकची निर्मिती झाली. 2003 मधल्या "कोर्स मॅच" पासून 2010 पर्यंत फेसबुक ने केलेल्या प्रगतीचा आढावा या पुस्तकात आहे. मार्कला नवीन सहकारी मिळत गेले, नवीन सोयी फेसबुकवर आणल्या जाऊ लागल्या, फेसबुकची लोकप्रियता वाढून त्यात मिलियन डॉलर्स गुंतवायला लोक पुढे आले, जगभरातले लोक फेसबुक वापरू लागल्यावर त्यातून सामाजिक बदलाचीही सुरुवात झाली. या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावरच्या वेगवेगळे पैलूंवर सविस्तर माहिती आणि चर्चा या पुस्तकात आहे.

मार्क चे हॉस्टेलमधील खोलीसोबती हे त्याचे पहिले सहकारी. नंतर फेसबुकचा व्याप जसा वाढत गेला तसं कोणी सर्वर मधील तज्ञ, कुणी डिझाइनिंग मधला तर कुणी कंपनी चालवण्यासाठी , मार्केटिंगसाठी उपयुक्त गुण असलेला; असे सहकारी त्यांनी जोडले. फेसबुकच्या प्रवासातले हे साथिदार आपल्याला पुस्तकात भेटतात. आधी हॉस्टेलची खोली, मग एक साधं घर असं करत करत फेसबुक वाढत गेलं. हे सगळेच तरूण विशीतिशीतले त्यामुळे फेसबुकचं सुरुवातीचं ऑफिस म्हणजे हॉस्टेलची खोलीच असावी असं वातावरण. कोणीही कुठेही लॅपटोप घेऊन बसलंय, कोक बर्गर खातायत, रात्री अपरात्री पर्यंत काम करतायत, स्विमिंग पूल जवळ बियरची पार्टी होत्ये, कोणी ऑनलाईन खेळ खेळतंय असं धमाल चालणारं. आयटी मध्ये काम करणऱ्यांना हेवा वाटायला लावणारं असं. त्याच्या गमतीजमती पण पुस्तकात आहेत.


तरीही ही तरूण मंडळी काहितरी भन्नाट काम करतायत हे जाणवल्यावर माध्यम आणि इंटरनेट विश्वातील मोठमोठ्यांना या कंपनीचं आकर्षण वाटलं. मायक्रोसॉफ्ट, गूगल, याहू आणि मुद्रितमाध्यमांतील उद्योग फेसबुक विकत घ्यायला उत्सुक होते. मार्क आणि त्याचा सहकारी शॉन पार्करची भेट घेऊन ते अनेकदा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आपला सौदा पुढे रेटायचा प्रयत्न करत होते. पण मार्कला ही कंपनी विकायची नव्हती. आपण जग बदलून टाकणारी व्यवस्था निर्माण करतोय याची त्याला जाणीव होती. चमकदार कल्पना प्रत्यक्षात आणायची, त्यावर कंपनी थोडी वाढवायची आणि चांगला सौदा मिळाला की ती विकून लाखो डॉलरचा फायदा खिशात टाकायचा ही त्याची मानसिकताच नव्हती. पण हे सौदे नाकारणं त्याच्यासाठी किती कठीण होतं. फेसबुक वाढवायचं तर पैसे पाहिजेत, गुंतवणूक तर पाहिजेच पण दुसऱ्याची मालकीही नको; वाटतंय तसं फेसबुक प्रगती करेल का? आणि नाही केली तर ? कंपनीतल्या अनेकांनाची सौदा करून नफा कमवावा ही स्वाभविक इच्छा नाकारल्याचा काय परिणाम होईल. अशा द्वन्द्वातून मार्क आणि त्याचे समविचारी सहकारी जात होते. असा सौदा आला फेसबुक कार्यालयातलं वातावरण कसं होत असे, मार्क ची तगमग कशी व्हायची हे लेखकाने व्यवस्थित दाखवलं आहे.

फेसबुक हे यशस्वी समूह माध्यम (सोशल मिडिया) ठरलं तरी ते पहिलंच नव्हतं, एकमेव नव्हतं आणि शेवटचंही नव्हतं. फेसबुक सुरु होताना मायस्पेस, फ्रेंडस्टर इ. माध्यमं कशी होती त्यांना प्रतिसाद कसा मिळत होता. फेसबुकने त्यांच्याशी गुणात्मक स्पर्धा कशी केली याचीही सविस्तर माहिती आहे. फेसबुकने अमेरिकेबाहेर पदार्पण करायचं ठरवल्यावर रशिया, चीन, जर्मनी इ. देशांतल्या स्थानिक समूहमाध्यमांशी लोकप्रियतेसाठी कडवी झुंज द्यावी लागली. काही ठिकाणी यश काही ठिकाणी अपयश आलं याचीही माहिती आहे. ऑर्कुट, ट्वीटर, लिन्क्ड-इन या समकालीन आणि प्रसिद्ध समाज माध्यमांचे फेसबुकशी साम्य, वेगळेपण, आणि स्पर्धा ही पुस्तकात मांडली आहे.

आज फेसबुक वापरताना आपण फेसबुक वॉल, न्यूजफीड, मेसेंजर, फोटो अल्बम, टॅगिंग इ. अगदी सहज वापरतो. फेसबुक पहिल्या दिवसापासून असं नव्हतं. एकेक नवीननवीन सोय तयार करताना फेसबुक मध्ये कशी चर्चा झाली, तिची सुरुवात झाल्यावर लोकांचा प्रतिसाद कसा मिळाला, यूजरची संख्या कशी वाढत गेली ; हे आपल्यासमोर घडलेल्या घटनांचे पडद्यामागचे तपशील वाचणं खूपच मनोरंजक आहे. आज आपल्याला न्यूज फीड अर्थात मित्रांचे अपडेट्स फेसबुकवर समोर दिसत असतात. पण तुम्हाला विश्वास वाटणार नाही की जेव्हा ही न्यूज फीड सेवा सुरू झाली तेव्हा लोकांनी तिचा तीव्र विरोध केला. आमच्या प्रत्येक गोष्टी इतरांना सतत कळतायत, जणू आमच्यावर कुणितरी सतत पाळत ठेवतंय असं वाटतंय. असं म्हणत फेसबुक विरोधी गट फेसबुकवरच तयार झाले होते. फेसबुकने मागे न हटत ही सोय चालूच ठेवली. हळूहळू लोकांना त्याची सवय झाली आणि आवडूही लागली. दुसऱ्या एका प्रकरणात - गोपनीयतेच्या अटी फेसबुकने थोड्या बदलल्या - तेव्हाही असाच गदारोळ झाला. सगळ्यांची माहिती फेसबुककडे जमा होईल आणि फेसबुक तीचा अनियंत्रित वापर करेल या भितीतून मोठा वादंग झाला तेव्हा. फेसबुकला दोन पावलं माघार घेत नवीन सेवा-नियम-अटी सादर कराव्या लागल्या. अशाप्रकारे फेसबुकच्या प्रत्येक फीचरची जन्म कहाणी फेसबुकबद्दलच नाही तर त्याचा युजरच्या मानसिकतेवरही चांगलाच प्रकाश टाकते.



फेसबुकच्या कमाईचं मुख्य साधन हे जाहिराती आहे. फेसबुकने सुरुवातीपासून आत्तापर्यंत नाविन्यपूर्ण प्रयोगांद्वारे ही कमाई कशी वाढेल हे बघितलं आहे. पण मार्क सुरुवातीपासून जाहिरातींच्या विरोधात आहे, ही त्यातली गंमत आहे. पण कमाईसाठी ते आवश्यक आहे याचीही त्याला जाणीव आहे. व्यावसायिक कंपनी चा प्रमुख आणि मार्कचं मन असं हे अजून एक द्वन्द्व आहे. म्हणूनच फेसबुकवर जाहिरातींचं प्रमाण कमी असावं, वापरणऱ्यांच्या अनुभवात बाधा येईल असं नसावं, त्याच्याशी संबंधित जाहिरातीच दाखवल्या जातील यासाठी प्रयत्न केले जातात. फेसबुकवर एखाद्या कंपनीने आपलं पेज बनवलं की त्याला कोण लाईक करतंय, कोण फॉलो करतंय, त्यांचा वयोगट, आवडीनिवडी, भौगोलिक स्थान अशी इत्थंभूत माहिती फेसबुक कडून जाहिरातदार कंपनीला विकली जाते ज्यातून त्या कंपनीला आपलं उत्पादन अजून आकर्षक बनवायला मदत होते. माहितीचा इतका खऱ्याच्या जवळ जाणारा आणि लोकांनी स्वतःहून भरलेला खजिना ही फेसबुकची मोठी मिळकत आहे. त्यातून "डेटा मायनिंग" चा व्यापारी वापर करून फेसबुक प्रचंड कमवू शकणार आहे. म्हणूनच या सगळ्याच्या बाबतीत मार्कचं म्हणणं काय हे त्याने आपल्या कृतीतून दाखवलं आहे भाषणांतही सांगितलं आहे वेगवेगळ्या प्रसंगात मार्कची विचार करण्याची पद्धत, त्याचं तत्वज्ञान, साधी राहणी त्याची भाषणं याचंही वर्णन आहे.





फेसबुकमुळे सामाजिक चळवळींची होणारी सुरुवात आणि मिळणारी चालना आपल्याला नवीन नाही. हे परिणाम फेसबुकच्या सुरुवातीच्या काही वर्षांपासूनच दिसायला लागले.ओबामा आणि इतर अमेरिकन राजकारण्यांनी निवडणुकीत वापर केला. कोलंबियातल्या दहशतवादाविरुद्ध तिथल्या सामान्य युवकाने फेसबुक ग्रुप सुरू केलेला. त्याला लाखो लोकांनी प्रतिसाद दिलाच आणि त्यातून देहव्यापी आंदोलन सुरू झाले. नैसर्गिक संकटात सापडलेल्या लोकांचा ठावठिकाणा आणि त्यांना कशाची गरज आहे याची माहिती प्रशासनाला मिळाली. अशी बरीच उदाहरणं पुस्तकात आहेत. 

पुस्तकाबद्दल अगदी थोडक्यात म्हटलं तरी इतकं लिहून झालं. बरेच मुद्दे लिहिलेच नाहीत -फेसबुक इतर भाषांत भाषांतरीत करण्याचा प्रयोग, फेसबुक गेम्स, एपिआय, फेसबुकप्लॅटफॉर्म..खरंच, या चारशे पानी पुस्तकात खूप माहिती आहे. जी वाचायला अजिबात कंटाळवाणी नाही तर खिळवून ठेवणारी आहे. फेसबुक हा आपल्या आवडीचा विषय आहे म्हणूनच नव्हे तर लेखकाची गोष्टीरूप शैलीही याला कारणीभूत आहे. लेखकाने मार्क आणि त्याच्या सहकाऱ्यांशी, गुंतवणूकदारांशी प्रत्य्क्ष भेटून, बोलून माहिती घेतली आहे. ते संवादही पुस्तकात आहेत. पुस्तकाला त्यातून जिवंतपणा आला आहे. जे आयटी मध्ये काम करतात त्यांना पुस्तकातल्या तांत्रिक बाजू लगेच समजतीलच. पण जे आयटीमध्ये नाहीत अश्या तरूण असो वा वयस्कर, जे किमान फेसबुक वापरतात त्यांना हे समजून घ्यायला काही अडचण येणार नाही इतपतच तांत्रिक बाबी आहेत. 

अनुवादाही तितकाच ताकदीचा, नैसर्गिक आहे. मूळ भाषा मराठीच आसावी असं वाटायला लावणारा. वरच्या फोटोंमधून हे तुम्हालाही जाणवलं असेलच. म्हणूनच अनुवादिकेचं नाव मुखपृष्ठावर नाही हे मला खटकलं.

पुस्तकात एकही फोटो नाही हे पण खटकलं. फेसबुकच्या जुन्या ऑफिसचे, मार्कच्या कुटुंबाचे, सुरुवातीच्या सहकाऱ्यांचे, जुने फेसबुक प्रोफाईल कसे दिसायचे याचे, एखाद दुसऱ्या सामाजिक चळवळीचे फोटो आवश्यक होते.


मराठी पुस्तक २०१६ मध्ये प्रकाशित झालं असलं तरी इंग्रजी पुस्तक २०११ चं आहे आणि माहिती २०१० पर्यंतची आहे. गेल्या आठ वर्षांत फेसबुकची लोकप्रियता कितितरी पटीने वाढली आहे. पंतप्रधान, राष्ट्राध्यक्षही आता फेसबुक वापरतात; नव्या पिढीशी सुसंवाद साधतात. भारतानेही सामाजिक आंदोलनांमध्ये फेसबुकचा सहभाग प्रत्यक्ष अनुभवला आहे. ट्विटर, यूट्यूब, ब्लॉग ची वाढही जोरात झाली आहे. हे सगळं लक्षात घेता २०१०-२०१७ या पुढच्या सात वर्षांवर "The Facebook effect continues (द फेसबुक इफेक्ट कंटिन्यूस)" असं पुस्तक लेखकाने लिहावं आणि वर्षाताईंनी ते अनुवादित करावं अशी मनापासून इच्छा आहे.

----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )
----------------------------------------------------------------------------------



----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक  )
----------------------------------------------------------------------------------

जयवंत दळवींचा विनोदनामा (Jayavant Dalavincha Vinodanama)





पुस्तक : जयवंत दळवींचा विनोदनामा (Jayavant Dalavincha Vinodanama)
लेखक : जयवंत दळवी (Jayavant Dalvi)
संपादक : मुकुंद टाकसाळे (Mukund Taksale)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : २५५
ISBN : दिलेला नही


प्रसिद्ध मराठी लेखक जयवंत दळवी यांच्या निवडक विनोदी साहित्यकृतींचा हा संग्रह आहे. अनुक्रमणिकेवर नजर टाकली की पुस्तकाबद्दल कल्पना येऊन जाईलच.



मराठीतल्या जुन्या विनोदी लेखकांची (चि.वि., गडकरी यांची)  काही पुस्तके मी वाचलेली पण त्यातल्या विनोदावर आता फार हसू येत नाही. दळवींच्या कथा ५० वर्षं जुन्या असल्या तरी आत्ताही वाचताना खळखळून हसायला येतं. विनोदांची शैली थोडी पुलं सारखी - मध्यमवर्गीय जीवन आणि जीवनमूल्य यांवर बोलणारी, गुदगुल्या करणारी - आहे पण कधीकधी गुदगुल्या "कंबरेखाली"देखील  होतात. शिव्या, स्त्रीपुरुषशरीरसंबंध यांचे कथेच्या ओघात येणारे उल्लेख टाळायचा अट्टाहास न करता सरळ लिहिलं आहे.
उदा. "एका सहलीची गोष्ट" मध्ये एक गावकरी माणूस मटण बनवून द्यायचे कबूल करून गावात सहलीला आलेल्या तरुणांकडून पैसे घेतो. कितितरी वेळ झाला तरी जेवण काही येतच नाही. इकडे दारू पार्टी केलेले तरूण चिडतात तो प्रसंग :

कल्पनारम्यता/फँटसी प्रकारातल्या विनोदी कथा पण मस्त आहेत.

पुस्तकाच्या उत्तरार्धातला भाग हा साहित्य आणि साहित्यिक यांच्याबद्दल दळवींनी लिहिलेल्या लेखांचा आहे. त्यांचाही बाज विनोदी, तिरकस, थट्टा करणारा असाच आहे. हल्ली वृत्तपत्रांत किंवा मासिकांत काहितरी टोपण नाव घेऊन चालू घडामोडींवर भाष्य करणारं सदर असतं उदा. पुर्वी लोकसत्तात "तंबी दुराई" या नावाने किंवा सध्या सकाळ मध्ये "ब्रिटीश नंदी" या नावाने लिहिले जाणारे सदर. या लेखांचे विषय बहुतेक वेळा राजकारण, कधी समाजकारण किंवा सिने-क्रिकेट जगत असं असतं. दळवींनी १९६४ ते १९८४ ही वीस वर्षं असं लेखन केलं. ठणठणपाळ व अलाणे-फलाणे या टोपणनावांनी. पण त्यांचे विषय हे नवीन पुस्तके, त्यावर नव्या-जुन्या जाणकरांकडून दिली जाणारी मतं, साहित्यिकांचे तऱ्हेवाईक स्वभाव हे आहेत.

उदा. जीए कुलकर्णी एकीकडे प्रसिद्धी पराङ्‍मुख म्हणून वागत तर दुसरीकडे भेटायला आलेल्या लोकांशी तऱ्हेवाईकपणे वागून आपल्याबद्दल गूढ/कुतुहल माणसाच्या मनात जागतं राहील असं वागत. पुण्यामुंबईतल्या साहित्यिक वर्तुळात काय घडतंय याची खडान्‌खडा माहिती ठेवत हे दिसतं.

भाउसाहेब (वि.स. खांडेकर)आणि भाऊराव (ग.त्र्यं.माडखोलकर) या श्रेष्ठ साहित्यिकांच्या सहवासात काय  फरक जाणवला, माडखोलकरांच्या स्वभावातला चावट-खोडकरपणा कसा होता हे एका लेखात आहे.

"मोहिनी दिवाकर" या नावाने मराठीतल्या बऱ्याच साहित्यिकांना पत्र येत होती. स्त्री वाचकाने पत्र पाठवलंय म्हणून भले भले लेखक "पाघळून" जाऊन कशी पत्रोत्तरं लिहित होते, तिला भेटायला बोलवत होते, तिला भेटायची जुळवाजुळव करत होते हे वाचून एकिकडे हसू येतं आणि आदर्शवादी लिहिणारे साहित्यिक पण असे कसे? याचं आश्चर्य वाटतं.

"अलाणे-फलाणे" या या सदरात श्री. अलाणे आणि श्री.फलाणे ही टोपणनावाने घेऊन दोन मित्रांचा मजेशीर पत्रव्यवहार आहे. एका पत्रात भालचंद्र नेमाडे हा विषय अहे. त्याची एक झलक:



"आपुले मरण पाहिले म्यां डोळा" पण मजेशीर आहे. दळवी गेले अशी अफवा पसरली आणि त्यांच्या घरी फोन, भेटायला माणसं यायला लागली. या बातमीवर प्रत्येकाच्या प्रतिक्रिया कशा होत्या आणि त्यावर दळवींच्या प्रति-प्रतिक्रिया कशा होत्या हे वाचतना खूप हसू येतं.

हा संग्रह संपादित करण्यामागची भूमिका टाकसाळे यांनी प्रस्तावनेच्या सुरुवातीलाच मांडली आहे. ती अशी :


प्रस्तावनेतही त्यांनी या पुस्तकात नसलेल्या काही विनोदी लेख किंवा कथांमधले परिच्छेद उद्धृत केले आहेत. त्यामुळे विनोदाची मेजवानी प्रस्तावनेपासूनच सुरू होते. दळवींच्या विनोदी लेखनशैलीचे त्यांनी विश्लेषण केले आहे. अत्रे-पुल यांना मराठी समाजाने डोक्यावर घेतलं तसं दळवींना का घेतलं नाही याचा ऊहापोह केला आहे. म्हणून प्रस्तावनाही तितकीच वाचनीय आहे.


पुस्तक विनोदी आहे म्हणुन वाचायला मजा येतेच पण तीसेक वर्षांपूर्वी साहित्य आणि नाटकं हे मध्यमवर्गीय मराठी माणसाच्या विरंगुळ्याचे आणि चर्चेचे विषय असतानाचं वातावरण कसं होतं हे आज (टीव्हीचा जमाना मागे पडून ऑनलाईनचा जमाना आल्यावर) वाचताना नव्या पिढीला वेगळी जाणीव आणि जुन्या पिढीला पुनर्भेटीचा आनंद नक्की देईल.

माझ्यासारख्या हौशी परिक्षण लेखकाला हे परीक्षण लिहिताना दळवींची इच्छा पूर्ण केल्याचं कारण ते म्हणतात.

आता दळवींनी हे विनोदाने लिहिलेलं आवाहन मी मात्र गांभिर्याने घेतो आहे हे बघून स्वर्गात अलाणे-फलाणे एकमेकांना काय बरं पत्रं पाठवतील?


----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )
----------------------------------------------------------------------------------



----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक  )
----------------------------------------------------------------------------------

अधर्मकांड (adharmakand)

पुस्तक - अधर्मकांड (adharmakand) लेखक - उदय भेंब्रे (Uday Bhembre) अनुवादिका - अकल्पिता राऊत देसाई (Akalpita Raut-Desai) भाषा - मराठी (Marat...