अमृतवेल (Amrutvel)




पुस्तक - अमृतवेल (Amrutvel)
लेखक - वि.स. खांडेकर (V. S. Khandekar)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १५०
छापील किंमत - रु. १८०/-
प्रकाशन - मेहता पब्लिशिंग हाऊस. प्रथमावृत्ती १९६७
ISBN - 9788177666281

"अमृतवेल" ही वि.स. खांडेकरांची गाजलेली कादंबरी आहे. जीवनविषयक तत्त्वचिंतन करणारी कादंबरी आहे. माणसाच्या आयुष्यातले दुःख कसे आहे; त्याला कसा प्रतिसाद दिला जातो आणि कसा प्रतिसाद दिला गेला पाहिजे ह्याबद्दल विचार मांडणारं; तेही ललित गोष्टीरूपातून मांडणारं हे पुस्तक आहे.

कादंबरीची नायिका नंदा दुःखात आहे कारण तिचा होणारा पती लग्नाच्या आधीच अपघातात मरण पावला आहे. त्यामुळे ती उद्विग्न झाली आहे. आत्महत्या करावी असे वाटण्याइतपत तिची अवस्था वाईट झाली आहे. ह्या वातावरणातून वेगळ्या वातावरणात गेली तर तिला बरं वाटेल असं मत तिच्या स्नेही आणि कुटुंबीयांचं होतं. आणि अशी संधी चालून येते. तिची कॉलेज मधली मैत्रीण - वसू - आता एका श्रीमंत घराण्याची सून झाली आहे. तिला स्वतःच्या सोबतीला (कम्पॅनियन म्हणून) कोणीतरी हुशार स्वभावाने चांगली अशी महिला सहकारी हवी असते. त्यामुळे नंदा वसू बरोबर तिच्या गावाला जाते. श्रीमंतांची हवेली; नोकरचाकर; मोठी लायब्ररी अशी सगळी सुखं वसूच्या आयुष्यात आहेत. पण वसू सुखी नाही. तिचं आणि तिच्या नवऱ्याचं पटत नाही हे तिला दिसतं. हे असं का होतं आहे आणि आपण वसूला काय मदत करू शकतो ह्याचा शोध घ्यायचा नंदा प्रयत्न करते. तिला सगळ्यांच्या पूर्वायुष्यातल्या घटना कळतात. वसूचं वागणं विक्षिप्त आहे कारण तिच्या नवऱ्याचं वागणं विक्षिप्त आहे. आणि त्याच्या विक्षिप्त वागण्याचं कारण त्याच्या लहानपणी घडलेल्या घटना; एका कुटुंबाची शोकांतिका आहे.

कथानकात पात्रांचे एकमेकांशी संवाद होतातच; पण एकमेकांशी थेट बोलायचा संकोच वाटल्यामुळे पात्रे घरातल्या घरात एकमेकांना दीर्घ पत्रं लिहितात. आपलं मन मोकळं करतात. अशाच जुन्या पत्रांतून पूर्वायुष्यातल्या घटना कळतात आणि नवीन घटना घडतात. पत्रांमधून पात्रे आपापल्या बाजू मांडतात. त्यांच्या वागण्यामागचं तत्त्वज्ञान सांगतात. त्यातून उभी राहते एक साधकबाधक चर्चा. ह्या जगण्याचं ध्येय काय ? माणसाच्या आयुष्यात जी दुःखे येतात त्यांना सामोरे कसे जावे ? पैसा मिळवण्याची इच्छा, आपल्या माणसांची माया मिळावी अशी इच्छा, कामवासना इ. भावना सगळ्यांच्याच ठायी असतात. त्यात चूकही काही नाही. पण माणूस त्यांच्या आहारी गेला तर अधःपतन कसं होतं. हे दिसतं. माणूस स्वतःचीच सुखे उपभोगत राहिला तर शेवटी त्याच्या अतिरेकातून दुःखच प्राप्त होतं. स्वतःची दुःखे कुरवाळत बसूनही दुःखाचं निराकरण होत नाही; उलट उद्वेग वाढतच जातो. हा आयुष्यातला विरोधाभाससुद्धा अधोरेखित केला आहे. आपल्या आजूबाजूच्या लोकांची दुःखे समजून घेऊन त्यांना आधार देत जगलो; आनंद आणि त्रास वाटून घेत जगलो तर हे आयुष्य अधिक हितकर आणि पूर्णत्वाकडे जाणारं असेल हा संदेश त्यातून अधोरेखित होतो.

दीडशे पानी छोटी कादंबरी असली तरी त्यात अनेक प्रसंग घडतात. "तत्वज्ञान चर्चा" काय करायची हे लेखकाने ठरवून त्याबरहुकूम योजलेले प्रसंग आहेत. त्यात सहजता कमी आहे. "हे असं कसं होईल", हा विचार वाचकाच्या मनात वेळोवेळी येईल. पण कादंबरीत कुठलाही प्रसंग जास्त रेंगाळत नाही. त्यामुळे आपण वाचनात गुंगून जातो. प्रसंगांची वर्णनं आटोपशीर तरी परिणामकारक आहेत. एकूण भर तत्त्वचिंतनावर असला तरी ते मांडण्याची लेखकाची शैली विद्वज्जड शब्दांची नाही. "सगळं डोक्यावरून गेलं" असं असं होत नाही किंवा कंटाळवाणं होत नाही. "पत्रांतून संवाद" ह्या स्वरूपामुळे वाद-विवादाच्या फैरी घडतायत असं चित्र शक्यतो नाही. जिथे आहे तिथेही ते फार लांबवलेलं नाही. ती चर्चा वाचकाने आपल्या मनात करावी; "आपलाच वाद आपणाशी" करावा अशी लेखकाची भूमिका असावी. कादंबरीच्या वाचनीयतेत त्यामुळे भरच पडली आहे.

आता काही पाने वाचूया.

लेखकाबद्दल पुस्तकात दिलेली माहिती

प्रियकराच्या निधनाने कोलमडून पडलेल्या नंदाला तिच्या वडिलांनी लिहिलेल्या पत्रातला भाग



नंदा आणि देवदत्त (वसू चा नवरा) ह्यांची ओळख होते तेव्हा



इतरांच्या आयुष्यात घडलेल्या भयानक गोष्टी समजल्यावर, त्यावर विचार केल्यावर नंदाच्या चित्तवृत्तीत झालेला बदल.



ज्यांना अशा गंभीर, तत्वज्ञानात्मक पुस्तकं आवडतात त्यांना नक्कीच आवडेल. इतरांनाही विचारप्रवृत्त करणारं तरीही एक वाचनीय कथानक म्हणून नक्की आवडेल. 


———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

चंद्रमुखी (Chandramukhi)




पुस्तक - चंद्रमुखी (Chandramukhi)
लेखक - विश्वास पाटील (Vishwas Patil)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - ३१५
प्रकाशन - राजहंस प्रकाशन, ऑगस्ट २००४
ISBN - 81-7434290-7
छापील किंमत - रु. २००/-


काही वर्षांपूर्वी मराठी चित्रपट म्हणजे तमाशाप्रधान कथानक असणारे असायचे. हल्लीच्या काळात ते प्रमाण कमी झालं आहे. तरी तमाशाशी संबंधित "नटरंग" आणि "चंद्रमुखी" हे चित्रपट गाजले. त्यातील "चंद्रमुखी" चित्रपट ज्या कादंबरीवर आधारित आहे ते हे पुस्तक. दौलतराव देशमाने हा तरुण आणि कर्तबगार राजकारणी आणि चंद्रमुखी ह्या तमाशा कलावंतिणीच्या प्रेमाची ही गोष्ट आहे.
लेखकाची पुस्तकात दिलेली ओळख
  

गरिबीतून वाढलेल्या पण बुद्धीने हुशार दौलत देशमाने ह्याच्याकडे एका प्रस्थापित राजकारण्याची नजर जाते. त्याच्या गुणांची पारख करून ते त्याला शिक्षणात मदत करून पुढे राजकारणात आणतात. आपला जावईसुद्धा करून घेतात. आता "दौलतराव" हुशार, कर्तबगार, लोकप्रिय असा खासदार आहे. पंतप्रधान "मॅडम"चा अतिशय विश्वासू सहकारी आहे. त्याचा साडू - नानासाहेब - त्याला एकदा तमाशा बघायला घेऊन जातो. खाजगी बैठकीत थोड्याच लोकांसमोर चंद्रमुखी लावणी सादर करते. आणि दौलतला ती पाहिल्या झटक्यात आवडते. मनात घर करते. मुंबईला परत आला तरी ती मनातून जात नाही. आणि मग सुरु होतो दौलत आणि चंद्राचा प्रेमसहवास.

विवाहित, दोन मुलांचा बाप असलेला दौलत एका "तमाशा वालीच्या" प्रेमात पडलाय ही घटना त्याच्या कौटुंबिक आयुष्यात वादळ निर्माण करतेच; आणि राजकीय जीवनातही. आपल्या बायकोला फसवणारा, आणि तमासगीर कलावतीचं शोषण करणारा अशी त्याची प्रतिमा निर्माण करून त्याच्या राजकीय कारकीर्दीला धुळीस मिसळण्याचा डाव विरोधक टाकतात.

हे डाव कोण टाकतं ? सगळ्या आतल्या खबरा कोण देतं? दौलत हे लपवणार का स्वीकारणार ? ह्या डावाचं पुढे काय होतं ? तो पराभूत होतो का ? चंद्राला सोडतो का स्वीकारतो ? का चंद्राच त्याला सोडते ? हे सगळं समजून घेण्यासाठी कादंबरी वाचा.

दौलतचं आयुष्य हा मुख्य धागा असला तरी पुस्तकात एक समांतर धागा आहे तो म्हणजे 'तमाशा कलावंतांचं आयुष्य'. चंद्रमुखी, तिची आई हिराबाई, तमाशा बारीची मालकीण लालन, नाच्या - बत्तासेराव, गायनमास्तर अशी पात्र येतात. त्यांच्या संवादातून तमाशा कलावंताचं आयुष्य, त्यातल्या अडचणी, अगतिकता, लैंगिक शोषण ह्या सगळ्याचं चित्र आपल्यासमोर उभं राहतं. छानचौकीच्या दुनियेत पैसे उडवून अय्याशी करणारे राजकारणी-बिल्डर-अधिकारी दिसतात तसेच अय्याशीच्या अतिरेकापायी भिकेला लागलेले नगही दिसतात. "शृंगारिक"लावणी गाणारी, त्यावर नाचणारी ही कलाकार असते. ती शृंगाराचा आभास निर्माण करणारी कलाकार आहे; शृंगाराची भोगवस्तू नाही अशी मर्यादा जपणाऱ्या स्वाभिमानी कलाकार दिसतात. तर "बारी"त नाचून "ओली बैठक"करून पैसा उधळणारा "मालक" कधी गावेल हे बघणाऱ्या धंदेवाईक नाच्या पण दिसतात. कलाविश्वाचा हा झगमगाट आणि त्या मागचा काळाकुट्ट अंधार कादंबरीला एक सामाजिक कादंबरी सुद्धा करतो.

काही प्रसंग वाचा
चंद्रमुखीची आई हिराबाई जुन्नरकर आणि तरुण चंद्रमुखीचा एक तमाशा प्रसंग




खूप दिवसांनी दौलत चंद्राला भेटायला येतो तेव्हा रुसलेली, लटके रागावलेली चंद्रा ह्यांचा प्रेमसंवाद




दौलतचा नाद सोड, तो मोठा माणूस त्याला आणखी कोणीतरी नटवी भेटेल, शेवटी तो पुरुषच... त्याच्या नदी लागण्यापेक्षा आपण स्वतःचा फड उभा करू असं चंद्राला तिची आई परोपरीने सांगत असते तो प्रसंग.





कादंबरीची मुख्य रूपरेषा तुम्हाला कळली. आता वळूया जरा त्याच्या मांडणीकडे. विश्वास पाटलांच्या "पांगिरा", "झाडाझडती", "महानायक" ह्या मी वाचलेल्या कादंबऱ्या जशा मनाची पकड घेतात, व्यक्तिरेखा मनात ठसतात; संवाद अगदी तसेच घडले असतील असे वाटतात तसे ह्या कादंबरीत होत नाही. कादंबरीची कथा रोचक आहे पण त्यातले प्रसंग, संवाद आणि व्यक्तिचित्रणे प्रभावी नाहीत.

ही कादंबरी नक्की कुठल्या काळात - ९० चे दशक, ८० चे दशक का कधी - हे कळत नाही. एखाद्या व्यक्तीचे तमाशा कलाकारांशी संबंध आहेत हे त्याच्या बायकोला आक्षेपार्ह वाटेल. पण त्यामुळे एक राजकारणी म्हणून प्रतिमाभंजन होईल, इतके बाळबोध आणि सोज्वळ राजकारण भारतात कधी होते ? तो मुख्य मुद्दाच तकलादू वाटतो.

दौलत परदेशात राहून आलेला आहे, तिथल्या मोकळ्या वातावरणात सुंदर बायांकडे बघून पघळला नाही; पण चंद्रमुखीकडे बघून पाघळतो. असं का होतं? केवळ सौंदर्यापेक्षा आणि काही वेगळं कारण असेल असं चित्र सुरुवातीला लेखकाने उभं केलं आहे. पण पुढे मात्र त्याचा पत्ता लागत नाही. सत्शील आणि कर्तबगार दौलत हे प्रेमप्रकरण वेगळ्या प्रकारे हाताळेल असा भास सुरुवातीला होतो. पण नंतर तो ट्रॅक सोडून दौलत पुढे पुढे लफडं लपवणारा पुरुष झाला आहे. बरं, लेखकाला त्या पात्राची ही स्खलशीलता लेखकाला दाखवायची असेल तर दौलतच्या मनात अशी काय उलथापालथ झाली हे काही स्पष्ट होत नाही. चंद्राच्या भावना जितक्या तीव्रतेने आल्या आहेत तितक्या दौलतच्या आल्या नाहीयेत. तमाशा आणि राजकरणी ह्याच्या गुंतागुंतीच्या कहाणीत केवळ तमाशाचा भाग समरसून लिहिला आहे. राजकारण आणि दौलत ह्या व्यक्तिरेखा तितक्या समरसून लिहिलेली नाही. त्यातून कादंबरीचा तोल बिघडला आहे.

अनेक अनाकलनीय प्रसंग किंवा वर्तणुकी आहेत. दौलतचे सासरे, बायको पण काहीतरी विचित्रच दाखवले आहेत. एका वाक्यात चिडतात, दुसऱ्या वाक्यात दौलतचं वागणं स्वीकारतात. नक्की त्यांचा विरोध आहे का? असेल तर कशाला? चंद्राच्या पूर्वायुष्यात तिच्यावर अत्याचार करणारा कोण आहे हे समजल्यावर तिचा "प्रियकर" दौलत काहीच बोलत नाही. चंद्राच्या आईला एक राजकीय डावपेच म्हणून "महाराष्ट्र गौरव" सारखा पुरस्कार जाहीर होतो पण पुढच्या प्रसंगात तिला जणू ते तिला कळलेलंच नाही असे प्रसंग घडतात. "बत्तासेराव" सारखा एक तमाशातला नाच्या एका मंत्र्याचा "पी.ए" होतो. काही दिवसांनी पुन्हा तमाशात जातो. चंद्रा दिल्लीत येते; एका मंत्र्याला हॉटेलात मारते पण कोणालाही कळत नाही. असे कितीतरी सुटे सुटे धागे आहेत. ज्यातून विरस होतो. लेखकाने कच्चा खर्डाच प्रकाशित केला की काय असं मला बऱ्याच वेळा वाटलं.

प्रसंगांच्या ओघात बऱ्याच लावण्या येतात. माझा काही लावण्यांचा अभ्यास नाही; पण तरी शेवटी ती एक कविता आहे, एक गाणं आहे. एका विशिष्ट वृत्त/छंद ह्यांच्या मध्ये बांधलेली असली पाहिजे ना. तश्या ह्या वाटत नाहीत. मुक्तछंदातल्या कविता वाटतात.  उदा.

पण असो ! तो माझा फार माहितीचा विषय नाही त्यामुळे मी फार काही लिहित नाही.

एकूणच ह्या कादंबरीने अपेक्षाभंग केला. तमाशावाल्यांचं आयुष्य समजून घ्यायचं असेल तर भरभर वाचायला हरकत नाही. पण पाठमजकूर(ब्लर्ब)मध्ये लिहिल्याप्रमाणे "लाल दिवा आणि घुंगराच्या गुंतावळीची रशीली कहाणी" ह्या अपेक्षेने वाचू नका.


———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

सुगंध गमावलेला मोगरा (Sugandh gamavalela mogara)

पुस्तक - सुगंध गमावलेला मोगरा (Sugandh gamavalela mogara) लेखक - बेन्यामिन (Benyamin) अनुवादक - ए आर नायर , जे ए थेरगावकर (A.R.Nair, J.A. Th...