इथियोपियी सुरस कथा (Ethiopiyi suras katha)




पुस्तक - इथियोपियी सुरस कथा (Ethiopiyi suras katha)
लेखक - उमेश कदम (Umesh Kadam)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १६०
प्रकाशन - मेहता पब्लिशिंग हाऊस, जानेवारी २०२६
छापील किंमत - रु. २६०/-
ISBN - 9789357201704

आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस या जागतिक मानवतावादी संस्थेसाठी वेगवेगळ्या देशांमध्ये वीस वर्षे कायदा सल्लागार म्हणून उमेश कदम यांनी काम केलं आहे. त्यापैकी २००८ ते १८ ही दहा वर्ष ते आफ्रिकेमध्ये होते. त्यातील पहिली अडीच वर्षे ते इथियोपियात वास्तव्याला होते. त्यानंतर इतर देशात त्यांची बदली झाली. इथिओपिया आणि आजूबाजूच्या बऱ्याच आफ्रिकी देशांना कमीअधिक कालावधीसाठी भेट देण्याचीही संधी मिळाली. प्रत्यक्ष वास्तव्य करताना तिथली संस्कृती, खानपान, हवामान याचा त्यांना प्रत्यक्ष अनुभव घेता आला. रेडक्रॉस च्या कामामुळे आदिवासींची जीवनपद्धती, एकूण सामाजिक समस्या आणि त्यांची राजकीय कारणे इ . जवळून बघता आले. भारतापेक्षा इतिहास, भूगोल, संस्कृती, गरिबी, सामाजिक प्रश्न, सशस्त्र बंडखोरी, अंतर्गत यादवी या सर्व बाबतीत इथिओपिया खूपच वेगळा आहे. तिथे कामानिमित्त जाऊन राहणं हे युरोपअमेरिके सारख्या प्रगत देशांमध्ये स्थायिक होण्यासारखं नक्कीच नाही. आपल्यापैकी असं धाडसाचं काम फारच थोडे लोक करतील. आपल्यासाठी आफ्रिकेचा इतका मोठा विभागभूभाग अपरिचितच राहू शकतो. म्हणूनच उमेश कदम यांच्यासारखी धाडसी आणि संवेदनशील व्यक्ती जेव्हा तिचे अनुभव आपल्यासमोर मांडेल तेव्हा ती संधी तरी आपण दवडता कामा नये.

लेखकाबद्दल पुस्तकात दिलेली माहिती. (जन्मवर्ष चुकलेलं आहे असं वाटतंय.)


हे पुस्तक प्रवासवर्णन नाही किंवा सामाजिक -ऐतिहासिक असं दस्तऐवजीकरणही नाही, तर शीर्षकात म्हटल्याप्रमाणे या सुरस कथा आहेत. किस्से आहेत. लेखकाला आलेले अनुभव आहेत. तिथल्या वास्तव्यात सहकाऱ्यांकडून समजलेल्या घटना आहेत. काही मजेशीर, काही गंभीर. तर काही आश्चर्यचकित करणाऱ्या. त्याला थोडी कल्पनेची जोड देऊन कथास्वरूप आणलं आहे. ह्यांत आफ्रिकन आदिवासींच्या चालीरीतींची धमाल दिसेल तर काही वेळा त्यातून निर्माण झालेला पेचप्रसंग वाचायला मिळेल. आदिस अबाबा शहराचे वातावरण, राहणीमान कसं झकास आहे हे समजेल. दुसरीकडे अंतर्गत यादवीमुळे लोक आपला जीव मोठे धरून परागंदा होत निर्वासित म्हणून इतर देशात जायची धडपड का करतात हेही समजेल. आता यातल्या काही कथांबद्दल सांगतो

तुम्ही भयानक आहात - लेखक त्याच्या एका आफ्रिकन सहकाऱ्याला कौटुंबिक समस्येबद्दल सल्ला देतो. त्या सल्ल्यानुसार वागल्याने समस्या सुटते. तो लेखकाला अभिनंदनपर पत्र पाठवतो. पण आफ्रिकन सहकाऱ्याचे इंग्रजीचे ज्ञान यथातथा असल्यामुळे त्या लिखाणातून झालेल्या गैरसमजातून लेखकाच्या घरीच कौटुंबिक समस्या उभी राहू लागते.

आफ्रिकी युती आणि सम्राटांची युक्ती - साऱ्या आफ्रिकी राष्ट्रांची एक विभागीय संघटना स्थापन करावी या उद्देशाने इथियोपियाच्या सम्राटांनी १९६३ मध्ये एक शिखर परिषद बोलावली होती. बहुतेक सगळ्या मुद्द्यांवर सर्व राष्ट्रांचं एकमत झालं. पण संघटनेचं मुख्यालय कुठे असावं यासाठी दोन-तीन देशांमध्ये चुरस निर्माण झाली. मुख्यालय आपल्या देशात आदिस अबाबा इथे यावं यासाठी इथिओपियन सम्राट काय प्रलोभन दाखवतात ते वाचा . इतक्या उच्च दर्जाच्या वाटाघाटींमध्ये असंही घडत असेल हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

मेंगेशाची महत्त्वकांक्षा - गरिबीतून बाहेर पडण्याची धडपड करणाऱ्या, सन्मार्गाने चालणाऱ्या मेंगेशा नावाच्या मुलाची ही गोष्ट आणि त्याचा सुखांत शेवट.

चाट खाऊन पडावे - "चाट" नावाच्या वनस्पतीची पानं आफ्रिकेत तंबाखू सारखी खाल्ली जातात. त्याची नशा चढते. तिथल्या बाजारात म्हणे ती सर्रास दिसते आणि आजूबाजूच्या देशात निर्यातही होते. या चाट खाण्याची मनोरंजक निरीक्षणे या लेखात आहेत.

मसूर मॅक्रोनी नि मुर्सी - आदिवासींच्या चित्रविचित्र सवयींचे, स्वागताचे आणि बेरकीपणाचे किस्से

मियाझाची मुलगी मरीना - इथिओपिया देशाला लागून एरिट्रिया नावाचा देश आहे. लेखकाच्या घरी स्वयंपाककाचं काम करणाऱ्या मियाझाची मुलगी मरीना एरिट्रियात होती. मायलेकींची अशी ताटातून कशी झाली. निर्वासित म्हणून परागंदा होण्याचा निर्णय मरीनाने कसा घेतला आणि शेवटी तिसऱ्याच देशात मायलेकींची भेट कशी झाली याची एक अस्वस्थ करणारी पण सुखान्त कहाणी.

अपहरण( होऊ घातलेल्या) पत्नीचे - लग्नाच्या बाबतीत आफ्रिकन आदिवासी जमातींचे आपापले रीतीरिवाज आहेत. एका जमातीत अशी प्रथा आहे की, मुलगा वयात आला की त्याने आपल्या आवडीच्या मुलीचे चक्क अपहरण करायचे! तिला पटवायचे आणि मग लग्न करायचे !! अहो पण हा रिवाज आफ्रिकेच्या बाहेर युरोपात पाळायला गेलात तर घोटाळा नाही का होणार? पण हा घोटाळा केला "बिर्हानू"ने. हा बिर्हानू कोण युरोपात कसा पोहोचला आणि त्याच्या घोटाळ्याचा शेवट काय झाला की धमाल वाचण्यासारखी आहे.

एक धक्कादायक गोष्ट - इथे पुन्हा गरिबीतून बाहेर पडण्याची त्यासाठी निर्वासित होण्याची , रेफ्युजी बनण्याची कहाणी आहे. पण ही मेंगेशासारखी सरळमार्गी व्यक्ती नाही तर इथे एक बनेल बाई आहे. ही बाई इथियोपियातून कशी बाहेर पडते आणि काय काय "उद्योग" करते हे लेखकाला तिच्या नवऱ्याच्या तोंडूनच ऐकायला मिळते.

मी इथिओपियी तुरुंगात जातो - आपले लेखक महाशय तुरुंगात गेले होते... पण फक्त बघायला, सामाजिक उपक्रमांचा सर्वेक्षण करायला. आणि ते तुरुंग इतके सुंदर दिसले की कदाचित तुम्हीही तिथल्या तुरुंगात जायचा विचार कराल.

चिन्मय आफ्रिका - हे शीर्षक वेगळं आहे. भक्तिमय, सूरमय च्या धर्तीवर "चीन"मय" याअर्थी चिन्मय असा उल्लेख लेखकाने केला आहे. आफ्रिकेमधल्या अराजकाचा आपल्या फायद्यासाठी वापर करत चीनने आपले पाय आफ्रिकेत रोवले आहेत. तिथल्या नैसर्गिक साधन संपत्तीवर हक्क प्रस्थापित केला आहे. रस्ते, पूल रेल्वे, सरकारी इमारती अशा सर्व पायाभूत सुविधांमध्येही चीनचाच वरचष्मा आहे. एका अर्थाने चीनचा हा नववसाहतवादच आहे. त्याचं लेखकाला दिसलेलं स्वरूप.

काही पाने उदाहरणादाखल

अनुक्रमणिका

"चाट" विषयी


"अस्सा तुरुंग सुरेख बाई "


आदिवासींच्या तलावात पोहल्यामुळे ते रागावले


कष्ट करून पोट भरणारा आणि प्रगतीचा विचार करणारा मेंगेशा


अशा कथा व अनुभववर्णनपर ललित लेख आहेत. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर "फक्त प्रौढांसाठी" असा उल्लेख आहे. पुस्तकावर असा उल्लेख मी पहिल्यांदाच बघितला. त्याबद्दल मनोगतात लेखक असे म्हणतात की; "सुरस कथा" म्हटल्यावर या कथा फक्त लहान मुलांसाठी असाव्यात असा समज झाला असता. पण तसं नसल्यामुळे कंसात फक्त प्रौढांसाठी असा उल्लेख जाणीवपूर्वक केला आहे. पण "फक्त प्रौढांसाठी" म्हटल्यावर पुस्तक अश्लील, शृंगारिक किंवा अति हिंसक
 असेल असं मनात येतं. प्रत्यक्षात तसं काही नाही. दोन-तीन गोष्टींमध्ये नवराबायकोचे संबंध , गर्भधारणा, फसवणूक, व्यभिचार यांचे उल्लेख येतात. पण इतपत उल्लेख हल्ली कुठल्याही कादंबरीत वा सामाजिक लेखांमध्ये वाचायला मिळतात -"फक्त प्रौढांसाठी" असं न लिहिता. त्यामुळे हे असं स्वतंत्र लिहिण्याचा उलटा परिणाम होऊ शकतो. काही वाचक पुस्तक घेणार नाहीत तर काही वाचक फार अपेक्षेने पुस्तक घेतील. :) गोंधळ टळेल असं आकर्षक शीर्षक सुचलं असतं. (एक गंमत ... हे पुस्तक वाचत असताना पंकज भोसले यांचं "फ्रेन्च मेनिॲक" असं पुस्तक वाचण्यात आलं. त्यात तर पानोपानी अश्लील चित्रफितींची सूचक वर्णनं आणि पॉर्नस्टार ह्यांचे उल्लेख आहेत. किंबहुना तोच पुस्तकाचा आत्मा आहे. तरी त्या पुस्तकावर "फक्त प्रौढांसाठी" असं लिहावसं वाटलं नाहीये . असो. ) 

प्रत्येक लेख हा मिश्र निवेदनशैलीचा आहे. लेखक त्यावेळी तिथे कसा आणि का होता हे सांगितलं आहे. किस्सा समजून घेण्यासाठी आवश्यक ती ऐतिहासिक, भौगोलिक पार्श्वभूमी सुद्धा थोडक्यात स्पष्ट केली आहे. लेखक आणि इतर पात्रांच्या संवादातून किस्सा खुलतो. पुन्हा लेखक आपलं मत मांडतो. अशाप्रकारे त्या त्या कथेला आवश्यक अशा पद्धतीने निवेदन होतं. लेखकाची शैली मिश्किल, नर्मविनोदी आहे त्यामुळे आपण त्याच्याबरोबर समोरासमोर गप्पा मारतोय असंच वाटतं. त्यातून पुस्तकाची वाचनीयता दुणावते.
मुखपृष्ठ आकर्षक आहे. आदिवासी व्यक्ती आणि तिच्या पार्शवभूमीवर गोष्टीच्या संदर्भातले दृष्य असं चित्र आहे. सरदार जाधव ह्यांनी मुखपृष्ठ केलं आहे. पुस्तकाच्या आतही खरे फोटो किंवा किमान रेखाचित्र असती तर अजून प्रेक्षणीय झालं असतं. 

काही वर्षांपूर्वी लेखकाचं झांजिबारी मसाला हे पुस्तक वाचलं होतं आता हे दुसरं. लेखकाचे अनुभव हे सहसा मराठी समाजात न घेतले जाणारे आहेत.
 त्यामुळे त्यांनी लिहित राहावं आणि अशा अनोख्या प्रदेशाची सैर वाचकांना घडवत राहावी.

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

ओडिसी (odyssey)



पुस्तक - ओडिसी (odyssey)
लेखक - होमर (Homer)
अनुवादक - प्रणव सखदेव (Pranav Sakhadeo)
भाषा - मराठी (Marathi)
मूळ पुस्तक - Ὀδύσσεια (Odýsseia)
मूळ पुस्तकाची भाषा - प्राचीन ग्रीक
पाने - १८४
प्रकाशन - मधुश्री पब्लिकेशन, जुलै २०२६
छापील किंमत - रु. २५०
ISBN - 978-93-47457-06-7

संस्कृत, ग्रीक, लॅटिन, हिब्रू, चिनी सारख्या प्राचीन भाषांमधली ग्रंथपरंपरा अनोखी आहेत. हे साहित्य म्हणजे माणसाच्या सामाजिक बदलाची शब्दरूपातली संग्रहालयंच आहेत. त्यांच्या वाचनातून हजारो वर्षांपूर्वी माणूस कसा होता, समाजव्यवस्था कशी होती हे लक्षात येतं. खानपान, कुटुंबव्यवस्था, राज्यव्यवस्था, नैतिकतेच्या कल्पना, सुखाच्या कल्पना काय होत्या हे समजतं. इतकंच काय, त्यावेळचा माणूस कल्पनाशक्तीची भरारी म्हणून काय अद्भुतरंजक विचार करत होता हे सुद्धा जाणवतं. आपल्या भारतीयांना रामायण-महाभारत-पुराणांचा अद्भुत वारसा मिळालेला आहे. चार वेद आणि ही दोन महाकाव्य यांना जगन्मान्यता आहे. जगभर त्यांचा अभ्यास केला जातो. त्याप्रमाणेच ग्रीक भाषेतील होमर या कवीने लिहिलेली इलियड आणि ओडिसी ही दोन महाकाव्य जगन्मान्य आहेत. त्यामुळे त्यांचं वाचन, ते समजून घेणं सुजाणवाचकाला नक्की आवडेल. मधुश्री पब्लिकेशन आणि प्रणव सखदेव यांनी हे काम आपल्यासाठी अतिशय सोपं केलं आहे. होमरच्या ओडिसी या महाकाव्याचा मराठी अनुवाद त्यांनी आपल्यासाठी प्रकाशित केला आहे. त्यामुळे प्रणवची फेसबुकवर पुस्तकाबद्दल पोस्ट बघितल्या बघीतल्या पुस्तक लगेच विकत घेतलं. आणि पुस्तक वाचून हजारो वर्षांपूर्वीच्या ग्रीसमध्ये भ्रमंती करून आलो.

होमरच्या "इलियड" या काव्यात ग्रीस परिसरातील दोन राज्यांच्या युद्धाचं वर्णन आहे. ट्रॉय चं युद्ध, ट्रोजन हॉर्स हे शब्द कदाचित तुम्ही ऐकले असतील. ग्रीक लोकांच्या राणीला ट्रॉय नावाच्या देशाच्या राजपुत्राने पळवलेलं असतं. तिला परत आणण्यासाठी ग्रीक लोक ट्रॉय वरती हल्ला करतात. हे युद्ध बराच काळ म्हणजे दहा वर्ष चालतं. शेवटी ग्रीक लोकांचा विजय होतो आणि ते आपल्या घराकडे परतू लागतात. त्यांच्या या परतीच्या प्रवासाबद्दलचं वर्णन हे पुढच्या महाकाव्यात म्हणजे "ओडिसी" मध्ये आलं आहे.

या प्रवासाचं वर्णन करण्याचं कारण म्हणजे हा प्रवास साधासुधा झाला नाही. परतीच्या प्रवास सुरुवात झाल्यावर त्यांना वादळाचा सामना करायला लागतो. सैन्याच्या तुकड्या विखुरलेला जातात. ग्रीक लोकांचा एक महत्त्वाचा सरदार म्हणजे ओडिसियस आणि त्याचे सैन्य यांच्यावर आलेली संकटे फारच जास्त होती. त्यांचं झालेलं नुकसान हे सगळं इतरांपेक्षा फारच जास्त होतं. त्याला परत यायला अजून दहा वर्ष लागली. त्या सगळ्याचा तपशील या काव्यात येतो. पण हे प्रवासवर्णन नाही. ओडिसियस ट्रॉयहून निघाला आणि आपल्या "इथाका" राज्यात परतला याची ही डायरी नाही. तर हे काव्य आहे त्यामुळे ट्रॉयच युद्ध संपल्यानंतर दहा वर्षांनी इथाका मध्ये काय चालू आहे इथून वर्णनाला सुरुवात होते. दहा वर्षे झाली तरी ओडिसियस चा पत्ता नाही, म्हणून त्याचा मुलगा त्याच्या शोधार्थ बाहेर पडतो. तो आजूबाजूच्या राज्यांना युद्धात सहभागी असलेल्या लोकांना भेटतो. त्यातून माहितीचे तुकडे त्याला मिळतात आणि वाचकालाही मिळतात. मग दुसरीकडे ओडिसियसचं सध्या काय चालू आहे, कुठे अडकून पडला आहे याचं वर्णन घेतलं. तिथून निघायच्या प्रयत्नात तो जेव्हा लोकांना भेटतो तेव्हा त्याने काय काय अनुभवलं याचा तो वर्णन करतो. त्यातून आपल्याला अजून काही गोष्टी समजतात. थोडं आजचं वर्णन, थोडं मागचं, तर कधी एखाद्या भविष्यवेत्त्याच्या पुढचं वर्णन असं करत करत आपल्यासमोर चित्र उभं राहू लागतं.

पण ओडिसियसला अडचणी येतात म्हणजे ते नक्की काय, हे वाचताना आपल्याला ग्रीक लोकांची "देव" ही संकल्पना थोडी थोडी लक्षात येते. भारतात परमेश्वर म्हणजे सर्वशक्तिमान, उत्पत्ती-स्थिती आणि लय करणारा, दयाळू न्यायी अशी संकल्पना आहे. पुराणांमध्ये देव-दानव, देवांचा राजा इंद्र, पाऊस पाडणारा वरुण, समुद्रदेवता, वृक्षदेवता, जलदेवता, वायूदेवता, यक्ष असे वेगवेगळे देवगणही असतात. ग्रीक लोकांची देवता संकल्पना सुद्धा आपल्यासारखीच आहे. समुद्राचा देव पॉसिडॉन. सगळ्या देवांचा प्रमुख झ्यूस. ऑलिंपिया पर्वतावर राहणारे बारा देव, जादू करणाऱ्या पऱ्या, देवदूत, देवपुत्र अशा अद्भुत संकल्पना तिथे आहेत. आपल्या इथल्यापेक्षा त्यांचे देव फारच लहरी आहेत. बळी दिला नाही तर रुसतात...बळी दिला की सुखावतात. माणसाला स्वतःच्या लहरीनुसार मुद्दामून संकटात टाकतात. दोन देवांचं आपापसात भांडण होऊन एक देव माणसाला संकटांत टाकतो तर दुसरा संकटात सापडलेल्या मदत करतो असं सगळं घडू शकतं.

तर या सगळ्या देवगणांच्या आणि पारलौकिक शक्तींच्या लहरीमुळे ओडिसियसला समोर वेगवेगळी आव्हानं उभी राहतात.पॉसिडॉन देवाच्या अवकृपेमुळे समुद्रात मोठ मोठी वादळ येऊन ओडिसीस आणि चमूची जहाजं भटकतात, फुटतात. एक अप्सरा त्याला आपल्या बेटावर कैद करून ठेवते. एक डोळा असणारा महाकाय राक्षस त्यांना गुहेत कोंडून ठेवतो आणि त्याच्या साथीदारांना खाऊन टाकतो. सायरन नावाच्या यक्षिणी गाणं गाऊन त्यांना मोहित करायचा, घरी परत जाणं विसरायला लावायचा प्रयत्न करतात. या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी त्यामुळे ओडिसियसला कधी स्वतःच्या शक्तीचा वापर करतो, कधी युक्तीचा वापर करतो. कधी त्याच्या बाजूने असलेली देवपुत्री "अथनी" त्याला चमत्कार करून करून मदत करते. तर कधी काही जादुई वस्तू त्याला मिळतात. लहान मुलांसाठीच्या चेटकिणीच्या, जादूगाराच्या, राक्षसाच्या गोष्टी कशा असतात तशाच साधारण या घटना आहेत. इतकं होऊन अथक परिश्रम करून जेव्हा आवडीचेच परत येतो तेव्हाही त्याचं राज्य बळकवण्यासाठी टपलेल्या लोकांशी त्यांला सामना करावा लागतो आणि शेवट गोड होतो.

रामायण-महाभारताप्रमाणे इथे सुद्धा भरपूर पात्रं आहेत, चमत्कार आहेत. पण तिथल्या तुलनेत इथे नैतिक पेच फार काही नाहीत. रामायण-महाभारतात प्रत्येक पात्र तसं का वागलं, वेगळं वागलं असतं तर काय झालं असतं, वेगळं वागणं परिस्थितीमुळे जमलं असतं का, अशी खूप गुंतागुंत आहे. बरीच उपकथानकं आहेत. धर्म,नीती, स्वभाव, परिस्थतीचा रेटा असे ताणेबाणे आहेत. त्या तुलनेत ओडिसीची रचना ही एकरेषीय आहे. फक्त ते पुढे-मागे, उलट-सुलट करून सांगितल्यामुळे उत्सुकता टिकून राहते. या सगळ्या घटनांना कारणीभूत असलेल्या देवांच्या लहरीपणालाही "आले देवाजीच्या मना" याच्या शिवाय दुसरं उत्तर नाही. 
जागतिक प्रसिद्धीचं हे कथानक तुम्हीही वाचून बघा. त्याचं साहित्यिक मूल्यमापन, टीकात्मक रसग्रहण, इतर महाकाव्यांशी तुलनात्मक विश्लेषण हा पुढचा भाग झाला. पण एकूण वाचायला मजा येते. आता पुढे काय होतंय ह्या उत्सुकतेने मी भराभर वाचत गेलो. व्यक्तींची नावं, ठिकाणं आणि घटना नीट समजून पुन्हा एकदा नजरेखालून घालणार आहे. ओडिसीच्या अद्भुतरम्यतेची चे भुरळ अजूनही लोकांना आहे नुकताच (जुलै २०२६) ख्रिस्तोफर नोलान या प्रथितयश दिग्दर्शकाचा इंग्रजी चित्रपटही प्रदर्शित झाला आहे.

काही पानं उदाहरणादाखल

ओडिसियस त्याची गोष्ट सांगायला सुरुवात करतो.



देवी अथिनीचे ओडिसियसला मार्गदर्शन


अनोळखी पण संकटग्रस्त व्यक्तीला भरभरून मदत करण्याची वृत्ती




ओडिसी काव्य आहे म्हणजे मूळ पद्य स्वरूपात असेल असा माझा अंदाज आहे. पण हे पुस्तक गद्य स्वरूपात आहे. प्रणवने केले
लं भाषांतर अतिशय सुगम आणि ओघवतं आहे. मराठी माणसाने ग्रीसवर आधारित एक दीर्घ कादंबरी लिहिली आहे असंच वाटतं. पौराणिक किंवा ऐतिहासिक पुस्तकांत वापरली जाते तशी औपचारिक, संस्कृतप्रचुर भाषा फार न वापरता आजची मराठी वापरली आहे. त्यातून वाचनीयता वाढली आहे. नव्या वाचकवर्गाला भाषांतर जास्त भावेल. त्याबद्दल प्रणवला शंभर टक्के गुण.

पुस्तकात बरीच रेखाचित्र आहेत. भार्गवकुमार कुलकर्णी ह्यांनी मुखपृष्ठ आणि आतली चित्रं काढली आहेत. त्यामुळे पुस्तक देखणं झालं आहे. उदा. वरच्या अथिनी व ओडिसियस भेटीच्या प्रसंगाच्या बाजूला असलेलं चित्र.


या पुस्तकाच्या प्रकाशकांना मला काही सुचवावंसं वाटतं....जर एखाद्या व्यक्तीला ट्रॉय, ग्रीक देवतांची संकल्पना माहिती नसेल तर वाचताना सुरुवातीला गोंधळ होऊ शकतो. ओडिसियस कोण? ट्रोजन कोण? पॉसिडॉन कोण? अथिनी काय? असे प्रश्न पडू शकतील. त्यादृष्टीने सुरुवातीला एक प्रकरण घालून पार्श्वभूमी तयार करायला हवी. ज्यात होमरची माहिती, इलियड मधले प्रसंग, प्रमुख व्यक्तिरेखा ह्यांचा गोषवारा घ्यावा. मुख्य म्हणजे पुस्तकात येणाऱ्या ग्रीक देवता, त्यांचा स्वभाव आणि एकमेकांशी संबंध ही माहिती असायला हवी होती. हे सगळं डोक्यात असेल तर वाचनाची मजा वाढेल. योगायोगाने मी नुकतीच नेटफ्लिक्सवर "ट्रॉय" ही सिरीज बघितली होती त्यामुळे त्यातले काही संदर्भ लक्षात आले. ग्रीक देवतांबद्दल सुद्धा नेटवर थोडं वाचून समजून घेतलं. त्याचा हे पुस्तक वाचताना उपयोग झाला. मूळ ग्रंथ किती मोठा आहे आणि या भाषांतरात तो पूर्ण घेतला आहे का संक्षिप्त, हे पुस्तक मूळ ग्रीक पुस्तकावरून भाषांतरित केलं आहे का इंग्रजी भाषांतरावरून मराठी भाषांतर केले आहे ही माहितीही द्यायला हवी होती. त्यातून त्या पुस्तकाच्या उपयुक्तेत आणि रसग्रहणात भर पडेल.

मी इथे थांबतो. पण तुम्ही ग्रीक ज्ञानदेवता अथिनीला प्रणाम करून हे पुस्तक लवकर वाचायला घ्या !

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

भारत माझ्या नजरेतून (Bharat majhya najaretoon)









पुस्तक - भारत माझ्या नजरेतून (Bharat majhya najaretoon)
लेखक - कोबी शोशानी (Kobbi Shoshaani)
अनुवादक - गौरी जोशी (Gauri Joshi)
भाषा - मराठी
मूळ पुस्तक -
שבעה נהרות שבעה שערים הודו ישראל
(shav'a neharot shav'a sharim hodo yisral)
अर्थ - सात नद्या, सात दरवाजे, भारत, इस्राएल
मूळ पुस्तकाची भाषा - हिब्रू
पाने - २००
प्रकाशन - बुकगंगा पब्लिकेशन, मे २०२६
छापील किंमत - रु. २९९/-
ISBN - 978-93-47786-53-2

एक भारतीय म्हणून भारताचं वर्णन करा असं तुम्हाला सांगितलं तर तुम्ही काय लिहाल? किंबहुना काय काय लिहाल? हजारो वर्षांची संस्कृती आणि परंपरा लिहाल. मोठमोठ्या साम्राज्यांचा इतिहास, हजारो वर्षांची आक्रमण आणि त्याला पूर्ण उरलेला भारत हे लिहाल. जाती व्यवस्था सामाजिक अव्यवस्था याबद्दल लिहाल. भारताच्या भाषा, वेशभूषा, खानपान ह्यातलं वैविध्य लिहाल. उत्सवप्रियता हे लिहाल. इतिहासातले महत्त्वाचे टप्पे, प्रमुख व्यक्तिरेखा यांबद्दल लिहाल. कितीही पान लिहिलं तरी भारतासारख्या खंडप्राय देशाचं समग्र वर्णन करणे अशक्यच. अशावेळी भारतात काही वर्ष राहिल्यावर एखाद्या परदेशी व्यक्तीला, "तुला भारत कसा दिसला, तुझ्या मनात भारताची प्रतिमा काय तयार झाली" हे विचारलं तर तो काय सांगेल? आपण भारतीय दुसऱ्याला कसे जाणवतो, वास्तव आणि प्रतिमा यात किती अंतर आहे हे तपासून बघायला आवडेल का? तसं असेल तर "भारत माझ्या नजरेतून" हे पुस्तक वाचलं पाहिजे.

कोबी शोशानी ९० च्या दशकात वर्षभर भारतात होते. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी २०२१ ते २५ मध्ये इस्रायल देशाचे भारतातील कौन्सिल जनरल म्हणून काम केले. त्यावेळी त्यांचे ऑफिस मुंबईमध्ये होते. परक्या देशातल्या दूतावासात काम करणे म्हणजे दुसऱ्या देशाची सांस्कृतिक, राजकीय, लष्करी जडणघडण तपशीलवार समजून घेणे, तिचा स्वदेशाच्या हितसंबंधाच्या दृष्टीने सकारात्मक वापर करणे, दोन देशातील संबंधात विविध पातळ्यांवर सुधारणा घडवून आणणे. या जबाबदाऱ्या पाडायचा व भारत देश मनापासून समजून घ्यायचा प्रयत्न त्यांनी केला. ते करताना भारत कसा दिसला ह्याचे अनुभव त्यांनी पुस्तकात शब्दबद्ध केले आहेत.

सुरुवातीच्या काही प्रकरणात ब्रिटिशराज, स्वातंत्र्यलढा, स्वातंत्र्यानंतरच्या महत्त्वाच्या टप्प्यांचा त्यांनी धावता आढावा घेतला आहे. तेव्हा डेव्हिड ससून हे प्रथितयश ज्यू असामी भारतात होते. त्याचाही उल्लेख आहे. भारत आणि इजरायल अगदी लागोपाठ स्वतंत्र झाले त्या दोन्ही देशांच्या विकासाच्या टप्प्यांची ही तुलना कथनाच्या ओघात होते. नेहरू आणि इंदिरा गांधी यांची कार्यपद्धती ही समाजवादी आणि थोडी डाव्या विचारसरणीकडे झुकणारी होती. इस्रायलच्या सुरुवातीच्या काळातल्या नेतृत्वाचीही धारणा अशीच होती. गेल्या काही वर्षात भारतात बदल होऊन उजव्या विचारसरणीकडे नेतृत्व आलं आहे, तशीच परिस्थिती तिकडे आहे. हे समान टप्पे त्यांनी छोटी छोटी उदाहरण देऊन सांगितले आहेत.

भारतात जातीव्यवस्था खोलवर रुजलेली आहे. इस्रायलमध्ये त्या अर्थाने जातीव्यवस्था नाही. मात्र भेदभावाची एक सुप्त जाणीव तिथेही आहे. युरोपातून गेलेले गोरे ज्यू - अश्केनाझी - ज्यू स्वतःला इतरांपेक्षा थोडे वरचे वरिष्ठ मानतात. सरकारमधली महत्त्वाची पदे, महत्वाच्या नियुक्त्या होताना हा भेदभाव दिसतो असे लेखकाचे निरीक्षण आहे. त्याचीही उदाहरणे लेखकाने मनमोकळेपणे सांगितली आहेत.

भारतातील भगवद्गीता रामायण महाभारत हे ग्रंथ, ब्रह्माविष्णूमहेश अशा संकल्पना, ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग, समाजाच्या चार वर्णांची निर्मितीची पुरुषसुक्तातले वर्णन, वेगवेगळे सण उत्सव यांची मोघम ओळख त्यांनी वाचकाला करून दिली आहे. ज्यू परंपरांमध्ये त्यातलं काय दिसतं ही तुलना आहे. अभारतीय वाचकांसाठी तो भाग उपयुक्त आहे.

"मोदी युग" या प्रकरणात नरेंद्र मोदी आणि इजरायल चे बेंजामिन नेतन्याहू यांची मैत्री, मोदींचा परराष्ट्र धोरणाकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन, आलिंगन देऊन नेत्यांना भेटणे, राम मंदिर निर्माण, 370 कलम हटवणे, भारतीय अस्मितेला बढावा देणे अशी मोदी राजवटीची व्यवच्छेदक लक्षणं समजावून दिली आहेत. राम मंदिर निर्माण आणि जेरुसलेम मधील मशिदीचा वाद, काश्मीर आणि पॅलेस्टाईन ह्याची तुलना करून इस्रायली वाचकावर परिस्थितीचं गांभीर्य ठसवलं आहे.

भारताचे अण्वस्त्र धोरण, महत्त्वाचे उद्योजक, मुंबई नगरी याबद्दलच्या प्रकरणात अशाच प्रकारे गोषवारा घेतला आहे. अंबानी-अदानी ही नावं, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या बंडखोरी मुळे झालेले सत्तापरिवर्तन, आदित्य ठाकरे, शरद पवार या सगळ्यांचे मोघम उल्लेख एका परकीय माणसाच्या लिखाणात वाचताना मजेशीर वाटलं. भारतात घडणाऱ्या प्रत्येक छोट्या छोट्या बदलाकडेही इतर देशांचं किती बारकाईने लक्ष आहे हे जाणवलं.

भारतातही ज्यू अगदी कमी संख्येने का होईना राहतात. कोकण परिसरात राहणारे बेने इस्रायली आणि केरळातील कोचीन ज्यू यांची माहिती पुस्तकात आहे. मुंबईवर झालेल्या २६/११ च्या हल्ल्यात ज्यूधर्मीयांच्या नरिमन हाऊसला लक्ष्य करण्यात आलं होतं. त्या प्रसंगाला या पुस्तकात स्थान मिळणं अपेक्षितच होतं. मुंबईत आल्यावर लेखकाने त्या स्थळालाही भेट दिली. त्याचंही वर्णन आहे. ज्यू वारसा टिकवण्याचे सरकार आणि सामाजिक संस्थांचे प्रयत्न चालू आहेत. त्याबद्दल काही परिच्छेद आहेत.

भारतीय समाजाचं वर्णन अजून व्यापक करताना "बॉलिवूड" प्रकरणात महत्त्वाचे कलाकार कोण, त्यांची लेखकाने घेतलेली भेट, काश्मीर फाईल चित्रपटावर प्रतिक्रिया दिल्यामुळे झालेला वाद हेही पुस्तकात आहे. दोन देशातल्या लोकांचे परस्पर संबंध यावेत एकमेकांना समजून घ्यावं यासाठी लेखक वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांना हजेरी लावतो, लोकांची संवाद साधतो, त्याबद्दल समाज माध्यमांवर लिहितो त्याची उदाहरणे दिली आहेत.

उपसंहार या भागात लेखकाने इजरायली परराष्ट्र मंत्रालयाचे कामकाज, राजदूतांची नियुक्ती, पदोन्नतीची प्रक्रिया याबद्दल त्याला जाणवलेल्या समस्या आणि नाराजी व्यक्त केली आहे. सर्वसामान्य वाचकाला तो भाग फार समजेल असं वाटत नाही.

काही पाने उदाहरणादाखल.
अनुक्रमणिका

स्वातंत्र्यलढ्याच्या धावत्या आढाव्यातली दोन पाने. गांधी, जिना, मोपले, नाविकांचे बंड अशा विविध पैलूंना स्पर्श करण्याचा प्रयत्न.


लेखकाचे जनसंपर्काचे प्रयत्न

अमीर खान बरोबर फोटो काढल्याने टीका आणि काश्मीर फाईल बघितल्याबद्दलही टीका. बदलत्या सामाजिक जाणिवांचा प्रत्यक्ष अनुभव.



लेखकाची निवेदनशैली थेट आहे. फार आडपडदा ठेवून लिहिलेलं नाही. तरीही "सामान्य ज्ञान" ह्या सदरात मोडेल अशीच माहिती आहे. वादग्रस्त ठरेल किंवा खूप आतली बातमी असं काही नाही. बरेच मुद्दे सांगायचे असल्यामुळे निवेदनाचे रूळ खटाखट बदलतात. त्यामुळे वाचताना सतत अडखळायला होतं. उदा., एका परिच्छेदात आपण योगा बद्दल वाचत असतो आणि अचानक पुढच्या परिच्छेदात खेळाबद्दल वर्णन येतं आणि ते दोन परिच्छेद संपतायत न संपतायत तोच, लेखक आणि एका सायकलपटूच्या भेटीची चार वाक्य येतात. त्याऐवजी छोटे छोटे परिच्छेद करून, एकेक उपशीर्षक दिलं असतं तर वाचनीयतेत भर पडली असती.

मराठी भाषांतर ठीक झालं आहे. बऱ्याच वेळा इंग्रजी वाक्यरचना तशीच ठेवून भाषांतर केलं आहे असं वाटतं. शब्दरचना चुकीची नाही पण त्यात मराठी आत्मा गवसत नाही. सतत हे वाक्य इंग्रजीत कसं लिहिलं असेल हे लक्षात येत राहतं. त्यामुळे मुळातच विस्कळीत असलेल्या मजकुरात अजूनच ठेचकाळायला होतं.

हे पुस्तक मुळात इस्रायली लोकांना भारताची ओळख करून देण्यासाठी आहे. त्यामुळे मराठी वाचकाला त्यात भारताबद्दल काही नवं सापडणार नाही. इस्रायलबद्दल थोडी माहिती कळेल. तो ऐवज खूप मोठा आहे असं नाही. तरी भारताबद्दल इतर लोक काय विचार करतात हे वाचायचं असेल तर हे पुस्तक वाचा.

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

पुण्यभूमी भारत (Punyabhumi Bharat)

पुस्तक - पुण्यभूमी भारत (Punyabhumi Bharat)
लेखिका - सुधा मूर्ती (Sudha Murty)
अनुवादिका - लीना सोहोनी (Leena Sohoni)
मूळ पुस्तक - The old man and his god (Discovering the spirit of India) द ओल्ड मॅन अँड हिज गॉड - डिस्कव्हरिंग द स्पिरिट ऑफ इंडिया
मूळ पुस्तकाची भाषा - इंग्रजी (English)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १६६
प्रकाशन - ऑक्टोबर २००६, मेहता पब्लिशिंग हाऊस
ISBN - 9788177667608

इन्फोसिस फाउंडेशनच्या प्रमुख सुधा मूर्ती आपल्या समाजसेवेसाठी प्रसिद्ध आहेत. पैसा-प्रसिद्धी-मान मिळूनही त्यांची साधी राहणी, कुटुंबवत्सल वागणं ह्यामुळे त्यांच्याबद्दल आदराइतकाच आपलेपणाही वाटतो. त्यांचं ह्या पुस्तकातलं लेखनही त्यांच्या सरळ वागण्याचं, दुसऱ्याला समजून घेण्याच्या वृत्तीचं प्रतिबिंब आहे. त्यांच्या कुटुंबातल्या, मित्रपरिवारातल्या व्यक्तींच्या बऱ्यावाईट अनुभवांचे वर्णन त्यांनी ह्यात केलं आहे. त्याचबरोबरीने समाजसेवेचे अनुभव सुद्धा लिहिले आहेत. सुनामीग्रस्त, पूरग्रस्त लोकांसाठी त्यांनी काम केलं आहे. आर्थिक, सामाजिक दुर्बल वस्त्यांत काम केलं आहे. त्यांच्या फाउंडेशन मध्ये अनेक तरुण व्यक्तींचं सहकार्य त्यांना मिळतं. ह्या समाजकामासाठी विविध कंपन्या, उद्योगपती देणग्या देतात. त्यांच्याशी संपर्क ठेवून निधी संकलन करावं लागतं. सरकारी अधिकारी आणि शासन यंत्रणेशी संबंध ओघाने येतोच. अशा प्रकारे गरजू व्यक्ती, त्यांना मदत देणारे, कामात हातभार लावणारे, कामात आडकाठी आणणारे, गरीब-मध्यमवर्गीय-श्रीमंत, सगळ्या प्रकारच्या व्यक्तींशी त्यांचा संबंध येतो. "पिंडे पिंडे मतिर्भिन्ना" उक्तीप्रमाणे लोकांच्या वागण्याचे, विचार करण्याचे नाना रंग नाना ढंग त्यांना दिसतात. ते जसे दिसले तसे आपल्यासमोर इथे उलगडले आहेत.

ह्यात ३१ लेख आहेत. प्रत्येक लेखाची एक मध्यवर्ती कल्पना आहे. त्याभोवती आलेले चांगले-वाईट, अपेक्षित-अनपेक्षित असे अनुभव सांगितले आहेत. उदा. मातृत्व ह्या पहिल्याच लेखात त्यांनी त्यांच्या भाषणाचा एक प्रसंग सांगितला आहे. भाषणात त्या आईची महती सांगतात. आई मुलांसाठी कशी त्याग करते, खस्ता खाते, प्रसंगी संकटं झेलते वगैरे. भाषण श्रोत्यांनाही भावलं. पण त्या कार्यक्रमानंतर एक मुलगी त्यांना भेटून स्वतःची जन्मकथा सांगते. लहानपणी त्या मुलीला अंधत्व येऊ लागलं. औषधोपचारासाठी आईवडिलांकडे पैसे नव्हते. एकेदिवशी आईवडील बसस्टँडवर घेऊन आले. तिला बिस्किटाचा पुडा दिला. तिथेच थांब म्हणाले. आणि जे गेले ते कायमचेच. परत कधी आलेच नाहीत. ती मुलगी अनाथ म्हणून बेवारस वाढली. ती मुलगी विचारते "गरीबी ही मातृत्वापेक्षा जास्त मोठी असते का हो?"

ह्या उलट शेवटच्या "सलाम नमस्ते" लेखात गरिबीतली सामाजिक बांधिलकी दिसते. एक गरजू गरीब माणूस पत्नीच्या औषधोपचारांसाठी सुधाजींकडून पन्नास हजार रुपये घेतो. काही महिन्यांनी तीन हजार रुपये परत आणून देतो. म्हणतो की, "औषधोपचारांना प्रतिसाद मिळणं कठीण दिसतंय, मृत्यू अटळ आहे हे कळल्यावर माझ्या पत्नीने अजून खर्च करायला नकार दिला. उरलेले पैसे मॅडमना परत करा. दुसऱ्या कोणाच्या कामी ते येतील असं म्हणाली. म्हणून हे उरलेले पैसे". हे वाचून आपणही अवाक होतो.

सगळ्या कहाण्या गरिबीच्या नाहीत. श्रीमंत दानशूर व्यक्तींनी स्वतःहून कशी मदत केली, कोणा अधिकाऱ्याने कशी मदत केली ह्याची उदाहरणे आहेत. घर - बांगला - गाडी सगळं असून सतत दुसऱ्याशी तुलना करून आपल्यातली असलेली-नसलेली उणीव बघून दुःखी होणाऱ्या श्रीमंत मैत्रिणीची गोष्ट आहे. तर "निवडीचं स्वातंत्र्य" मध्ये दोन मैत्रिणींची गोष्ट आहे. दोघी जिवाभावाच्या मैत्रिणी. शाळेपासून कॉलेजपर्यंत कायम एकत्र राहणाऱ्या. पुढे लग्नानंतर दोघींच्या वाटा वेगळ्या झाल्या. दोघी दोन शहरांत गेल्या. एकीच्या नवरा आर्थिक प्रगती साधून श्रीमंत झाला. तर दुसरी मध्यमवर्गीयच राहिली. तरीही श्रीमंत मैत्रीण पूर्वीच्याच आपुलकीने बोलत राहिली, भेटायचा प्रयत्न करत राहिली. गरीब मैत्रिणीने स्वतःच समज करून घेतला की आपण आता मैत्रिणीच्या योग्यतेचे नाही. तिच्यासारख्या महागड्या वस्तू भेट देऊ शकत नाही. ह्या दोन मैत्रिणींचा - सुधाजींच्या विद्यार्थिनींचा - समेट घालून देण्याचं काम सुधाजी करतात. "प्रेमाची किंमत पैशात करायची नसते. चुकीच्या कल्पना मनात बाळगून चांगल्या मैत्रीला तडा जाऊ देऊ नको. न्यूनगंड बाळगू नको." असा सल्ला देतात. बरेच लेख असे "सुधाजींच्या बोधकथा" प्रकारचे आहेत.

"दुधारी सुरी" मध्ये प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व असण्याचे फायदेतोटे कसे अनुभवायला येतात ह्याचे अनुभव सांगितले आहेत. नावाच्या वजनामुळे सरकार दरबारी कामं लवकर होतात हा फायदा आहे. पण संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला मनापासून आपलेपणा वाटत असेल असं नाही. सुधाजींशी आपली ओळख आहे हे जगाला दाखवून कॉलर ताठ करण्यासाठी जवळीक साधणारेही पुष्कळ असतात. अशी दोन तीन अपेक्षाभंगाची उदाहरणं त्यांनी मोकळेपणे सांगितली आहेत. त्यांना एका लग्नाचं आमंत्रण मिळालं होतं. अगदी आग्रहाचं. लग्नाच्या दिवशी नवरानवरीबरोबर छान फोटोही काढले गेले. पण "जेवून जा", "जेवलात ना" हे विचारायची तसदीही घेतली नाही. यजमानांच्या घरच्या मंडळींनी बोलत बोलत थेट मांडवाच्या बाहेरच आणून सोडलं की!

आफ्रिकेतली जंगल सफारी, तिबेट भेट, पाकिस्तान भेट अशी काही प्रवास वर्णनं सुद्धा आहेत. "पुण्यभूमी भारत" हा तिबेट भेटीवरचा लेख आहे. तिकडे भेटलेली तिबेटी महिला म्हणते की दलाई लामांना भारताने आश्रय दिला आहे. भारत पुण्यभूमी आहे. त्यावरून ह्या लेखाचं आणि लेखावरून पुस्तकाचं शीर्षक घेण्यात आलं आहे.

काही पाने उदाहरणादाखल

श्रीमंतीचं प्रदर्शन करावं की करू नये. दोन मैत्रिणी दोन तऱ्हा



"मला काहीच प्रॉब्लेम नाही" असं सांगणाऱ्या नीताची खरी अवस्था वेगळीच असते. "आधी" आणि "नंतर"चे एकेक पान.



सुखी आयुष्याबद्दल


लीनाजींनी केलेला अनुवाद सरस आहे. ओघवत्या मराठीतला आहे. त्याला १००% गुण !

"पुण्यभूमी भारत" हे शीर्षक वाचून हे पुस्तक भारताची प्राचीन परंपरा, तीर्थक्षेत्रे किंवा महान व्यक्ती वगैरे बद्दलचे असेल अशी माझी कल्पना झाली. तसं काही ह्या पुस्तकात नाही. माणसांच्या बऱ्यावाईट तऱ्हा तर प्रत्येक समाजात आहेतच. त्यामुळे पुस्तकाच्या पाठमजकूरातील (ब्लर्ब) "भारतीय समाजाचा आत्माच या पुस्तकाच्या रूपानं प्रतिबिंबित झाला आहे" हे वाक्य मला पटलं नाही. शीर्षकही नाही.

मुखपृष्ठ मात्र शीर्षकाला साजेसं आणि आतल्या मजकुराला साजेसं आहे. झेंड्याचे तीन रंग आणि एखाद्या गवताळ कुरणाचे निसर्गदृश्य असा मोहक संगम साधलाय.

पुस्तकातले प्रसंग, वर्णनं फार आगळीवेगळी नाहीत. केवळ सुधाजींसारख्या प्रसिद्ध व्यक्तीलाच येतील असे नाहीत. सर्वसामान्य वाचकाच्या आयुष्यात, आजूबाजूलाही असे अनुभव येत असतील. फार नैतिक तिढे आहेत अशातलाही भाग नाही. ती व्यक्ती असं का वागली असा शोध घेण्याचा प्रयत्नही नाही. त्यामुळे लेख वाचायला चांगले, समजायला सोपे असले तरी खूप भरीव वाचल्याचं समाधान मिळालं नाही.


——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

रोमियो अँड ज्युलिएट (Romeo and Juliet)



पुस्तक - रोमियो अँड ज्युलिएट (Romeo and Juliet)
लेखक - विल्यम शेक्सपियर (William Shakespeare)
अनुवादक - अनघा नाटेकर (Anagha Natekar)
भाषा - मराठी (Marathi)
मूळ पुस्तक - Romeo and Juliet (रोमियो अँड ज्युलिएट)
मूळ पुस्तकाची भाषा - English (इंग्रजी )
प्रकाशन - वैशाली प्रकाशन, २०२६
छापील किंमत - रु. ३००/-
ISBN - 978-93-48129-73-4

व्हेरोना शहरात दोन मोठी घराणी - मॉंटेग्यू आणि कॅप्युलेट - असतात. त्यांच्यात पक्कं हाडवैर असतं. ह्या घराण्यातले दोन पुरुष समोरासमोर आले की एकमेकांना पाण्यात पाहणे, तुच्छता दाखवणे असे प्रकार घडत असतात. वादाची खुमखुमी दोन्हीकडे असल्यामुळे वादाचे पर्यावसान मारामारीत, तलवारबाजीने होऊन कोणाचानाकोणाचा जीव त्यात जात असतो. मॉंटेग्यू घराण्यातला रोमियो नावाचा तरुण एका मुलीच्या - रोझालीन -प्रेमात वेडा झालेला असतो. पण ती त्याच्या प्रेमाचा स्वीकार करत नाही म्हणून तो व्याकुळ झालेला असतो. त्याचे मित्र सल्ला देतात की तिच्यापेक्षा सुंदर मुलगी बघितलीस की तू नव्या प्रेमात पडशील. होतं तसंच. एका पार्टीत रोमियो बघतो कॅप्युलेट घराण्यातल्या ज्युलिएटला. बघता क्षणी दोघं प्रेमात पडतात. रात्री रोमियो ज्युलिएटच्या बाल्कनीत चढून तिला चोरून भेटतो. दोघं प्रेमाच्या आणाभाका घेतात. दुसऱ्या दिवशी दोघं चोरून लग्न करतात. पुन्हा आपापल्या घरी जातात.

दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे मॉंटेग्यू आणि कॅप्युलेट लोकांची मारामारी होते. रोमियो ते थांबवायचा प्रयत्न करतो पण भांडणारे लोक थांबत नाहीत. रोमियोचा मित्र मरतो. म्हणून रोमियो कॅप्युलेट व्यक्तीला मारतो. ह्याची शिक्षा म्हणून राजा रोमियोला हद्दपार करतो. ज्युलिएट प्रचंड दुःखी होते. तेवढ्यात तिचे वडील तिचं लग्न ठरवतात. चार दिवसांवर लग्नविधी ठेवतात. तेव्हा ज्या पाद्र्याने रोमियो-ज्युलिएटचं लग्न लावलं तो एक क्लृप्ती सांगतो. ज्युलिएटला असं औषध देतो की ज्यामुळे ती निपचित पडेल, मेली असं वाटेल. लग्न टळेल. तिचे कबरीत दफन होईल. रोमियोला गुप्त निरोप सांगितला जाईल आणि तो तिला कबरीतून बाहेर काढेल. साधारण त्याच वेळी औषधाचा परिणाम होऊन ती पुन्हा हालचाल करायला लागेल.

अर्धा भाग ठरल्याप्रमाणे होतो. पण रोमियोला निरोप मिळत नाही. त्याला बातमी समजते की ज्युलिएट मेली. तो रात्री तिच्या कबरीजवळ येतो. कबर खोदतो. तेव्हा तिचा नियोजित पती - पॅरिस - पण तिथे आलेला असतो. रोमियो आणि पॅरिस च्या तलवार लढाईत पॅरिस मरतो. ज्युलिएट मृत आहे असं वाटून रोमियो विष पिऊन मरतो. मग ज्युलिएट जागी होते. रोमियोला मेलेला बघून स्वतः खंजीर खुपसून आत्महत्या करते.

ही बातमी सगळीकडे पसरते. नोकराचाकरांकरवी सगळं चित्र स्पष्ट होतं. मॉंटेग्यू आणि कॅप्युलेट लोकांना पश्चात्ताप होतो. रोमियो - ज्युलिएट चा सोन्याचा पुतळा उभा करायचा निश्चय होतो.


चार पाने उदाहरणादाखल.

रोमियो रात्री ज्युलिएटच्या हवेलीखाली लपून जात असताना त्याचे मित्र थांबायचा प्रयत्न करतात तेव्हाचा प्रसंग



पाद्री फ्रायर लॉरेन्स ज्युलिएटला कबरीतून बाहेर काढायला येतो तेव्हा



अशी ही नाटकाची पूर्ण गोष्ट. शेक्सपियरच्या मी आधी वाचलेल्या दोन नाटकांत (मॅकबेथ, मर्चंट ऑफ व्हेनिस) नाटकांत जशी विचारांची गुंतागुंत, व्यक्तिमत्त्वाचे कंगोरे, परिस्थतीचे हळूहळू परिपक्व होणे वगैरे इथे फार दिसलं नाही. रोमियो तर दिसली मुलगी, सुंदर वाटली की पड प्रेमात असाच रंगवला आहे. ज्युलिएट पार्टीत रोमियोला बघते आणि आकर्षित होते हे समजू शकतं. पण सहवास, संवाद, प्रेम अशा कुठल्याही तपशिलाच्या भानगडीत न पडता शेक्सपियर त्यांचं लग्न लावून टाकतो. तेही एकवेळ मान्य केलं तरी ज्युलिएट निपचित पडली म्हणजे ती थेट मेलीच ! नाडी तपासणं, वैद्यांना बोलावणं वगैरे काही नाहीच. इतकं होऊन ती कबरीत गुदमरून पण मरत नाही. तिला बाहेर काढायला पाद्री येतो तेव्हा ती जिवंत असते आणि मग ती खंजीर खुपसते. पण तो आवाज ऐकून पाद्री थांबत नाही. शिपाई येतात कोणी तिला वाचवायचा प्रयत्न करत नाही. सगळंच शेक्सपियरच्या मनासारखं... वैद्यक आणि शरीरशास्त्र सुद्धा !

कथानक चांगलं असलं तरी मांडणी फारच भोंगळ आणि वरवरची झाली आहे. संवाद पण कधी फारच अनैसर्गिक बोजड तर काही वेळा घाई घाई केलेले असे आहेत. मराठी भाषांतर मूळ कृतीशी सुसंगत असल्यामुळे तेही तसंच अनैसर्गिक आहे. त्यात अनुवादकाचा दोष नाही. एकूण ह्या नाटकाचं वाचन म्हणजे माझ्यासाठी "नाव मोठं लक्षण खोटं" असा अनुभव देणारं ठरलं.

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

मोरबांगडी (Morbangadi)




पुस्तक - मोरबांगडी (Morbangadi)
लेखिका - डॉ. छाया महाजन (Dr. Chhaya Mahajan)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १६२
प्रकाशन - एक दिशा मन्वंतर पब्लिकेशन. १९९३
छापील किंमत - रु. २६६/-
ISBN - 978-81-950433-6-1

सुशिक्षित मध्यमवर्गीय समाजात घडणाऱ्या कौटुंबिक घटना, बोलले जाणारे आणि टाळले जाणारे विषय, त्यात गेल्या काही वर्षांत झालेले बरेवाईट बदल, आणि हे बघत असताना संवेदनशील मनात जी विचारांची आवर्तने उठतात त्याचे शब्दांकन म्हणजे "मोरबांगडी" हे ललित गद्य. ह्यात १९ लेख आहेत. एकेक लेख साताठ पानी आहे. विषय वेगवेगळे आहेत. एक मुख्य विषय घेऊन त्या अनुषंगाने मनात येणारे विचार, आयुष्यात घडलेल्या घटना, दुसऱ्यांकडून ऐकलेले किस्से लेखात येतात. मग त्या घटनेतल्या व्यक्तीच्या मनात डोकावण्याचा थोडा प्रयत्न आणि त्यातून परिस्थितीचा साधकबाधक विचार आहे. काही वेळा, एका गोष्टीचा विचार करताना आलेली आठवण, त्यातून दुसराच विचार, तिसराच किस्सा असा लेखाचा ओघ आपल्या अचपळ मनाचे दर्शनही घडवतो.

पहिलाच लेख "हिशेब". ह्यात लेखिकेच्या लहानपणी त्यांच्या आजोबांच्या हाताखाली काम करणाऱ्या नानामामांचे व्यक्तिचित्रण आहे. स्वभावाने प्रेमळ पण बुद्धीने हिशेबात कच्चे. घरचा शेतमाल घेऊन विकायला बाजारात जाऊन विकण्याची जबाबदारी त्यांची. हिशेबात चुकले की आजोबांची बोलणी खायचे. मोठ्या माणसाने बोलणी खावी ह्याचं मुलांना अप्रूप वाटायचं. हा पैशाच्या हिशेबाचा किस्सा. मग "हिशेब" ही संकल्पना घेऊन, वेळेचा हिशेब, आयुष्याचा हिशेब असा तिचा विस्तार लेखिका करते. "भोळसट रंगाबाबाची पोरगी भामट्याने फितवली", "अवेळी प्रेमात पडून छबीने आत्महत्या केली " ह्यातून आयुष्याचा हिशेब चुकल्याचे दाखले आहेत. पुढे ह्या सगळ्या घटना बघताना स्वतःच्या मनात काय विचार आले होते, आपल्या स्वतःच्या आयुष्याचा हिशेब जमला आहे का असा आत्मसंवाद रंगला आहे.

"नमस्कार" - मोठ्यांना, गुरुजनांना नमस्कार करणे ही आपली संस्कृती. त्यात आदर, सन्मान ही भावना असते. त्याला प्रतिसाद म्हणून समोरच्याकडून आशीर्वाद येतो. पण हल्ली वाकून नमस्कार करायची पद्धत कमी होते आहे. नव्या पिढीला मोठ्यांना नमस्कार करायची लाज वाटते, अवघडल्यासारखं वाटतं. नमस्काराबद्दल विचार करताना लेखिकेच्या लहानपणी, नवविवाहितेने शेजारी मोठ्यांना नमस्कार केला नाही म्हणून घरात झालेली वादावादी आठवली. तर आता मुलं देवालाही नमस्कार करायला टाळाटाळ करतात इथपर्यंत आपण येऊन पोचलो आहोत हे जाणवतंय.

"अलिप्त" ह्या लेखात शहरातल्या आणि गावाकडच्या लोकांच्या मनोवृत्तीतला फरक मांडला आहे. शहरात राहणारे, नावाजलेले मान्यवर कार्यक्रमाच्या निमित्ताने, सत्काराच्या निमित्ताने छोट्या गावांमध्ये येतात. तिथल्या लोकांचा आदरसत्कार घेतात. अगदी घरच्यासारखे मोकळेपणाने रहातात. मात्र हेच शहरी लोक स्वतःच्या शहरी आलेल्या, घरी आलेल्या लोकांचे स्वागत करण्यात कोतेपणा करतात, प्रसंगी ओळखही दाखवत नाहीत. ह्याचे लोकांनी सांगितलेले अनुभव लेखात आहेत.

"हरवण्याचं दुःख" मध्ये घरात ठेवलेले पैसे हरवले आणि त्याची शोधाशोध ह्याची धमाल आहे. पैसे हरवले तर ते आता कायमचे गेले हे स्वीकारून पुढे जाण्याचा सल्ला एक पोक्त व्यक्ती देते. त्यातून "हरवणे" ह्या कल्पनेचा विस्तार करत अकाली मृत्यूमुळे प्रेमाची व्यक्ती "हरवण्याचं दुःख" मांडलं आहे.

"रातराणी" लेख नववर्ष स्वागताबद्दलचा आहे. ३१ डिसेंबरची रात्र लोक नाचत, गात आनंदाने साजरी करतात. नवीन वर्षाचं उत्साहाने, जल्लोषात स्वागत करतात. ३१ डिसेंबर हा काही आपला पारंपरिक सण नव्हे, तो साजरा करण्याची पद्धतही पाश्चात्य. पण आपण ते मनापासून स्वीकारलं आहे. कुठल्याही धार्मिक सणांमध्ये, रीतीरिवाजांपेक्षा खूप वेगळेपणा ह्यात आहे. मोकळेपणे, सर्वांगाने नाचण्याची, चित्कार करण्याची, स्वतःचा असा स्वीकार करण्याची मुभा ३१ डिसेंबरची रात्र आपल्याला देते. हे वेगळेपण लेखिकेने अधोरेखित केलं आहे.

काही पानं उदाहरणादाखल.

अनुक्रमणिका


साबणाचे फुगे उडवण्याच्या खेळण्यामागची तात्विक दृष्टी



लहान मुलाला घेऊन पहिला विमान प्रवास करताना उडालेली तारांबळ आणि मदतीचा हात



आपत्ती व मानवाचे त्यातून सावरणे ह्याबद्दलचे चिंतन



असे खूप वेगवेगळे लेख ह्यात आहेत. मजेशीर किस्से, भावनिक चिंतन ह्यातून सगळे लेख वाचनीय झाले आहेत. बहुतेक लेख हे स्मरणरंजन करणारे (नॉस्टॅल्जीक), "गेले ते दिन गेले" अशा स्वरूपाचे आहेत. थोडे उदासवाणे, मानवी हतबलता दाखवणारे आहेत. मराठी भाषेतले वाक्प्रचार, हल्ली कानावर कमी पडणारे शब्द इथे वाचायला मिळतात. अगदी कमी वाक्यांत नेपथ्य उभं करण्याची हातोटी लेखिकेची ताकद दाखवते. सुंदर उपमा आणि वर्णनं ह्यातून नेमके भाव वाचकांपर्यंत पोचतात. त्यामुळे सकस भाषेतले पुस्तक वाचल्याचा आनंद मिळतो.

"पाऊस" - लेखिकेच्या लहानपणी गावात पाऊस पडून गेल्यावर चांदणं पडलं असेल तर बैलगाडीतून सगळे चांदणी रात्र बघायला बाहेर पडत. त्याचं वर्णन लेखिका करते "नांगरटीमुळे शेतात छोट्या छोट्या खड्ड्यांत थोडं थोडं पाणी साचलेलं असायचं. त्यात चांदण्याची प्रतिबिंब पडायची. शेतभर, मातीच्या पणत्यांत पाण्याचं तेल असायचं आणि चांदण्या ज्योती होऊन त्यावर नाचायच्या. त्या जमिनीतल्या पणत्या तेऊन उठायच्या. दिवाळीची आरास फिक्की पाडावी". व्वा ! काय विलक्षण उपमा.

"ऊन" लेखातला प्रसंग. लेखिकेचे आजोबा लहान मुलांना मुद्दामून उन्हातून बाहेर फिरायला पाठवायचे. त्यावर रागावलेल्या आजीला त्यांचं सांगणं असायचं "घरादाराचा उन्हाळा होतो. म्हणून पोरांनी ऊन पाहावं. आपल्या डोक्यावर सावली आहे तोवर ठीक आहे. पण छप्पर गेलं आणि उन्हाळाच डोक्यावर आला तर तयारी असावी". आजोबांचं हे परखड काव्य आजीला अभद्र वाटलं. ती म्हणाली, "छप्पर असताना मोठाल्या खिडक्या-दारांतून ऊन कळत नाही की काय? त्यासाठी छप्परच नको उडायला, डोळे उघडे असले की झालं".

"दुपार" ह्या लेखात वर्णन आहे की.. सकाळची कोवळीक कणाकणानं बदलते आणि होते दुपारची प्रौढा. ही प्रौढा प्रत्येकाची आहे ...दुपार आणि झोप हे समीकरण आहे. सकाळपासून केलेल्या कामानं थकलेलं मन आणि शरीर या प्रौढीची वाट पाहतं. जसं वाक्य लिहिताना लागणार स्वल्पविराम, तशी ही दुपार. दुपारची विश्रांती हा खरा स्वल्पविरामच. खरी झोप नव्हे. दुपार हे मानाचं अंगण आहे. स्वतःचं हक्काचं तिथे ते एकटं बागडतं"

अशी कितीतरी सुखावणारी, टोचणारी, गुदगुल्या करणारी पण थेट भिडणारी वाक्यं आणि वर्णनं वाचनाचा आनंद द्विगुणित करतात.


——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

चित्तर-बित्तर (Chittar-Bittar)




पुस्तक - चित्तर-बित्तर (Chittar-Bittar)
लेखिका - सारिका कुलकर्णी (Sarika Kulkarni)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १५९ 
प्रकाशन - ग्रंथाली प्रकाशन, मार्च २०२६ 
छापील किंमत - ३००/- रुपये 
ISBN - 978-93-5650-557-5

दैनंदिन आयुष्यामध्ये आपण 
बऱ्याच लोकांना वरचेवर भेटत असतो. आपले शेजारी, नोकरीव्यवसायातले सहकारी, आजूबाजूचे दुकानदार, रिक्षावाले, सफाईकर्मचारी, घरकाम करणाऱ्या बायका, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, सुतार वगैरे वगैरे. बहुतेकांची नाव-व्यवसाय आपल्या लक्षात असतात. पण व्यक्ती लक्षात राहण्याची पुढची पायरी म्हणजे तिचं व्यक्तिमत्त्व लक्षात राहणं. हे मात्र फार थोड्या लोकांच्या बाबतीत घडतं. ज्या माणसांच्या वागण्यात, बोलण्यात, हावभावात, हातवाऱ्यात काही वैशिष्ट्य असतं ती माणसं नमुनेदार माणसं म्हणून मनात बसतात. कोणाचं बोलणं सामान्यच असतं पण स्वभाव नमुनेदार असतो म्हणून लक्षात राहतात. अशी माणसं जेव्हा भेटतात तेव्हा त्यांच्या गमतीजमती किस्से हे आपल्याला इतरांनाही सांगावेसे वाटतात. सारिका कुलकर्णी यांचं "चित्तर बित्तर" पुस्तक अशाच नमुनेदार माणसांचे किस्से आपल्याला सांगून आपली करमणूक करणारं आहे.

यात १९ नमुनेदार माणसांची ओळख करून दिली आहे. या पुस्तकात आपल्याशी बोलणाऱ्या निवेदिकेचे आडनाव कुलकर्णीच आहे. श्री. व सौ. कुलकर्णी आणि त्यांची मुलगी हे पुण्यातल्या शांतिप्रसाद सोसायटीत राहतायत.  सोसायटीतले त्यांचे लक्षात राहणारे शेजारी, कुलकर्णी बाईंच्या ऑफिसमधले सहकारी ह्यात आहेत. प्रवासानिमित्त बाहेरगावी गेल्यावर भेटलेली, लक्षात राहिलेली माणसे सुद्धा आहेत. चालण्याबोलण्याच्या विशिष्ट लकबी किंवा वेशभूषा काहीतरी विचित्र आहेत असं वर्णन करून इथे विनोद साधला नाहीये तर व्यक्तींचे स्वभाव व त्याच्या अतिरेकामुळे लक्षात राहणारे प्रसंग अशा पद्धतीचे वर्णन आहेत. यातलं कोणीच खलनायक पद्धतीचं अवगुणी नाही. उलट बहुतेक सगळे मनाने चांगले आणि सुसंस्कृतच आहेत. पण त्यांचा चांगुलपणा, प्रेम, पुढाकार घ्यायची वृत्ती किंवा मदत करायची वृत्ती बऱ्याच वेळा "आता यांना आवरा !!" असं म्हणायला लावणारी आहे.

कोण कोण बरे दिसतय याच्यात ? काही वल्लींची ओळख करून घेऊया ..

पाटील - सोसायटी मधल्या सर्व कामांत पुढाकारघेणारे श्री. पाटील. सोसायटीचा गणपती-नवरात्र असो की कुठला कार्यक्रम. सगळी व्यवस्था स्वतः बघणारे, प्रसंगी स्वतःचे पैसे खर्च करणारे पाटील. समोर काम दिसलं, काही अडचण दिसली की स्वतःहून परिस्थितीचा ताबा ते घेतात. काही वेळा समोरच्याला अवघडल्यासारखं झालं तरी त्याकडे अजिबात लक्ष न देता... याचे मजेशीर किस्से यात आहेत

रोतीजा - "रोती जा". बाई तू रड! काही दुःखद वाईट बातमी ऐकली की हुकमी रडू येणारी ऋतुजा. कुलकर्णी काकूंची ऑफिसमधली सहकारी. ऋतुजाच्या वेळी अवेळी रडण्याने निर्माण होणारे अनावस्था प्रसंग छान दाखवले आहेत.

चंदू - लहानपणापासून वडिलांच्या स्टेशनरी दुकानात काम करणारा, वह्यापुस्तकात राहूनही अभ्यासात चमक दाखवू न शकलेला पण इतरांच्या अभ्यासाची मात्र काळजी करणारा विनोद.

सेवाव्रती जोशी काकू - बिल्डिंग मधल्या प्रत्येक अडल्यानडल्या माणसाला मदत करणं, लोकांना आवडीचे पदार्थ करून खायला घालणं आणि त्या बदल्यात कुठलीही अपेक्षा न ठेवणं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जोशी काकू. या काकूंनी कोणाकोणाला आणि कशीकशी मदत केली, काकूंच्या या स्नेहाने गुदमरून जाण्याचे प्रसंग तिऱ्हाइतांनाही कसे आले कसे याचे प्रसंग या लेखात आहेत.

"मी काकू"जोशीकाकूंच्या उलट, काही न करता प्रत्येक गोष्टीचं श्रेय घेण्यासाठी पुढे पुढे करणाऱ्या "मी काकू" सुद्धा पुस्तकात आहेत.

इथे बडबड करणाऱ्या फटकळ कामवाल्या चंद्रा मावशी भेटतील. प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमात समारंभात माइकचा ताबा आला की तो न सोडणारे "माइक"ल काका आपल्याला बोलून बोलून हैराण करतील. घरकामाची कंत्राटे घेणारे अप्पा स्वतःच्या कामाविषयीच्या अभिमानाने सांगतील. त्या दर्जाचं काम मजुरांकडून करून घेण्यासाठी शिव्या देऊन आपलं घर बांधतील आणि आपल्या मनातही घर करतील. पंजाबचे दिलखुलास "टिप्सी अंकल" वाहनाची काळजी घेतीलच, पुढे जाऊन परगावाहून आलेल्या माणसाला कायमचं आपलंसंही करतील. 

एकदाच भेट झालेले, पण ती भेट कायमची लक्षात राहिली अशाही काही भेटी आणि माणसे पुस्तकात आहेत. पर्यटन स्थळाची, तिथल्या माणसांची स्तंभूत माहिती असणारा पोरसवदा पितळे, टॅक्सीवाले भाडं नाकारतात म्हणून आवाज वाढवून मिळवून देणारा दमदार माणूस सुद्धा आपल्याला भेटेल.

अशी नाना रंगाची नाना ढगांची चित्तरवित्तर माणसं या पुस्तकात आहेत. ह्याला साजेसे असे मुखपृष्ठ आहे. 
पेनातून बाहेर पडलेले विविधरंगी ठिपके, नावामागचे रंगबेरंगी फरांटे आहेत. पुस्तकाच्या मुखपृष्ठवरच सर्वांची नावे अर्थात अनुक्रमणिका देण्याचा वेगळा प्रयोग केला आहे. पुंडलिक वझे ह्यांनी मुखपृष्ठ केले आहे. तर मजकूराबरोबर असणारी चित्रे आशुतोष वाळे ह्यांची आहेत. "मार्मिक" नियतकालिकात ही लेखमाला प्रकाशित झालेली आहे. 

पुस्तक वाचताना खदखदून हसायला येईल असं नाही पण चेहऱ्यावर स्मितहास्य फुलून, वाचनाचा आनंद नक्की मिळेल. विनोदी लिहिलंय म्हणजे ते पोरकट, हलकं आहे असं वाचकांना वाटायला नको म्हणून मुद्दामून काहीतरी गांभीर्य आणायचा किंवा करुणादायक डोळे पाणवणारा शेवट करायचा प्रयत्न केलेला नाही. हे छानच.

व्यक्तिचित्रण म्हटल्यावर पुलंच्या "व्यक्ती आणि वल्लीशी" तुलना मनात सुरू होणे स्वाभाविक आहे. पण एकदोन लेख वाचल्यावर लक्षात येतं ही दोन्हीचा बाज पूर्णपणे वेगळा आहे. "व्यक्ती आणि वल्ली" मधले लेख दीर्घ आहेत. त्यात  व्यक्तीच्या आयुष्यातले वेगवेगळ्या कालखंडात घडणारे प्रसंग आहेत. वल्लीपणा मागच्या प्रेरणांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न आहे. पण सदर पुस्तकाचा उद्देश वेगळा आहे. या पुस्तकातले लेख हे आकाराने लहान आहेत. मर्यादित कालावधीत समोर घडणाऱ्या प्रसंगांतून निखळ मनोरंजन करणारे आहेत. शब्दयोजना वर्णन शैलीसुद्धा वेगळी आहे.

काही पाने उदाहरणादाखल

लेखिकेबद्दल पुस्तकात दिलेली माहिती.



चौकशा करून भंडावून सोडणारे भोसले.... लेखांमध्ये "मी काय म्हणते ..." असं म्हणत शेवट करण्याची लेखिकेने वापरलेली स्टाईल्



माइकल काका



चित्रविचित्र व्यवसाय करून बघण्याची आवड असलेली एकता.



लेखिका आणि मी, दोघेही "पुस्तकप्रेमी" नावाच्या साहित्यविषयक उपक्रमाचे सदस्य आहोत. मे २०२६ मध्ये आमच्या पुस्तकप्रेमी समूहाचे संमेलन कराड येथे साजरे झाले. तिथे थेट लेखिकेकडून पुस्तक विकत घेण्याची संधी मिळाली. तेव्हाचा हा फोटो.


संमेलनात सारिकाताईंनी "टिप्सी अंकल" ह्या लेखाचं अभिवाचन केलं होतं. त्यांच्या तोंडून व्यक्तिचित्रण ऐकायला मजा आली. त्याची युट्युब लिंक 

पुस्तक वाचताना आपल्या आजूबाजूला सुद्धा अशी माणसं आहेत हे सतत वाटत राहील. जणू आपल्याच ओळखीच्या जोशी काकूंना, पाटील काकांना, आपल्याच प्लंबर आप्पांना किंवा असंख्य चौकशा करणाऱ्या आपल्याच नातेवाईकाला ही लेखिका भेटली होती काय असं वाटेल. आपण सुद्धा असं शब्दांकन करावं अशी ही प्रेरणा पुस्तक वाचून मिळू शकेल.

लेखिकेची शैली उसनी घेऊन ... मी काय म्हणतो, तर हे पुस्तक हातात घ्या, कुठलाही लेख काढा, वाचा आणि निर्विष विनोदाचा आनंद घ्या.

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

इथियोपियी सुरस कथा (Ethiopiyi suras katha)

पुस्तक - इथियोपियी सुरस कथा (Ethiopiyi suras katha) लेखक - उमेश कदम (Umesh Kadam) भाषा - मराठी (Marathi) पाने - १६० प्रकाशन - मेहता पब्लिशिं...