मुक्ति पथावर (Mukti Pathavar)




पुस्तक - मुक्ति पथावर (Mukti Pathavar)
लेखक - स्वामी आत्मानंद पुरी (Swami Atmanand Puri)
अनुवाद - ब्रह्मचारी एकनाथ (Brahmachari Ekanath)
भाषा - मराठी (Marathi)
मूळ पुस्तक - On the road to freedom (ऑन द रोड टू फ्रीडम)
मूळ पुस्तकाची भाषा - English (इंग्रजी)
पाने - २४०
प्रकाशन - माता अमृतानंदमयी मिशन ट्रस्ट, जानेवारी २००७
छापील किंमत - दिलेली नाही 
ISBN - दिलेला नाही

भारताचा अध्यात्मिक वारसा खूप मोठा आहे. वेद उपनिषदातील तत्त्वज्ञान, योग, आयुर्वेद, शास्त्रीय संगीत, नृत्य, कुटुंबव्यवस्था अशा अनेक गोष्टींचं प्रदेशातल्या लोकांना आकर्षण असतं. त्यातून बरेच परदेशी लोक भारतात या पारंपारिक विद्यांचा अभ्यास करायला येतात. त्यातले काहीजण इथेच रमतात. स्थायिकही होतात. काहीजण ह्या अध्यात्ममार्गावर, ज्ञानमार्गावर स्वतःला इतके झोकून  देतात की ते एखाद्या भारतीय हिंदू व्यक्ती प्रमाणे संन्यास दीक्षा घेतात. असे परदेशी संन्यासी आपण क्वचित वेगवेगळ्या साधुसंतांच्या संस्थांमध्ये, कुंभमेळ्यासारख्या धार्मिक महोत्सवांमध्ये बघितले असतील. या व्यक्तींना भारताची ओळख कशी झाली असेल, त्यांना आकर्षण का वाटलं असेल आणि इथेच कायमस्वरूपी राहण्याचा धाडसी निर्णय कसा घेतला असेल त्याच्या प्रत्येकाच्या कहाण्या वेगवेगळ्या असतील. ती कहाणी समजून घ्यायला, त्यांना कशात आनंद मिळाला, कुठल्या आव्हानांना सामोरे जावे लागले आणि मागे वळून बघताना त्या निर्णयाबद्दल त्यांना समाधान वाटते आहे का हे सगळं समजून घ्यायला तुम्हाला आवडेल का? तसं असेल तर "मुक्ति पथावर" हे पुस्तक तुम्हाला वाचायला आवडेल.

पुस्तकाचे लेखक स्वामी परमात्मनंदजी हे मूळचे अमेरिकन. त्यांचं आधीचं नाव नील. एका मध्यमवर्गीय घरात नील वाढत होता कॉलेजमध्ये जाऊ लागला होता. शिकून चांगली नोकरी मिळवणं, भरपूर पैसे कमावणं, आरामाचं जीवन जगणं, प्रसिद्ध पर्यटन स्थळांना भेटी देणं ही भौतिक प्रगती हे सर्वसाधारणपणे लोकांना प्रवृत्त करणारी स्वप्न होती. अशाच वातावरणात तोही वाढत होता. पण यापेक्षाही काहीतरी वेगळं आपण केलं पाहिजे अशी भावना बळावत होती. कॉलेजच्या वयात असतानाच त्याला योग, भगवद्गीता याबद्दल जुजबी माहिती मिळाली आणि त्याच्या हृदयाची तार छेडली गेली. त्यातलं तत्वज्ञान लगेच पूर्णपणे समजलं नाही तरी आयुष्याकडे बघायची दृष्टी बदलू लागली. चाकोरीबद्ध शिक्षणाचा उद्देश केवळ पैसा कमावणे एवढाच असून त्या माध्यमातून जीवनातील सुखोपभोग घेण्यासाठीच हे सर्व आहे असे त्याला वाटू लागले. अत्यंत साधी जीवनशैली पुरेशी आहे त्यासाठी अधिक पैशाची गरज नसून एखाद्या लहानशा नोकरीने काम भागू शकेल असेही वाटू लागले. भारताबद्दल अनावर ओढ वाटू लागली. सुरुवातीला योग, हठयोग, यांच्याबद्दल वाचन आणि ते शिकवणाऱ्या शिक्षकांच्या भेटीसाठी त्याने थेट नेपाळ गाठलं. वास्तव्य केलं. पण नेपाळ ही आपली कर्मभूमी नाही तर भारतच आहे हे त्याचं हृदय सांगत राहिलं. तो भारतात आला .भारतीय तत्त्वज्ञानावरची पुस्तके वाचत होता. तमिळनाडूमधील तिरुवन्नामलै येथे पूर्वी राहत असणाऱ्या रमण महर्षींचा संदर्भ त्याला मिळाला. रमण महर्षी पूर्वीच समाधीस्थ झाले असले तरी आणि त्याने रमण महर्षींना मनोमन गुरु मानले. थेट तिरुवन्नामलै गाठली.

आतला आवाज, नियती किंवा जणू हे सर्व पूर्वनियोजित असावं अशा पद्धतीने रमण महर्षी आश्रमातल्या रत्नमजी यांनी त्याच्या मार्गदर्शनाची जबाबदारी स्वीकारली. अमेरिकन नीलची दिनचर्या पूर्णपणे बदलली. नील आता साधक झाला. रत्नमजी आपले गुरु.  ते सांगतील तसं वागायचं त्यांनी ठरवलं. शरीरावरची आसक्ती उडून जावी म्हणून रत्नमजींनी त्यांना अतिशय खडतर दिनचर्या पाळायला लावली. फक्त शारीरिक कष्ट नव्हे तर राग, लोभ, भूक, तहान, या नित्य भावनांवर सुद्धा विजय मिळवण्यासाठी त्यांना सतत उद्युक्त केले. ध्यानधारणा कशी करावी, कसा नेम पाळावा हे शिकवले. पुन्हा पुन्हा त्यांची परीक्षा घेऊन मडकं अजून किती कच्चं आहे हे सुद्धा दाखवत राहिले. रत्नमजींबरोबर त्यांनी भारतात वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास केला. रत्नमजींच्या दैवी शक्तीचा अनुभव घेतला, त्यांच्या कृपेने उच्च मानसिक अवस्थेच्या अनुभवाची झलक काही वेळा पाहायला मिळाली.

पुढे रत्नमजींच्या देहावसनानंतर पुन्हा एकदा पूर्वनियोजित असल्याप्रमाणे केरळ मधल्या माता अमृतानंदमयी (अम्मा) यांचा शिष्य त्यांच्याकडे आला. आतापर्यंत आम्हांबद्दल काहीही माहिती नसणाऱ्या नीलला आता आपल्या पुढच्या प्रवासासाठी गुरु अम्मा आहेत हे पटलं आणि ते तिकडे राहायला गेले. ते १९७९ साल होतं. माता अमृतानंदमयी आत्ताएवढ्या प्रसिद्ध झालेल्या नव्हत्या. केरळमधील त्यांच्या खेडेगावाच्या आसपासचे लोक त्यांना ओळखू लागले होते. जिच्या अंगात येतं अंगात देवी संचार होतो आणि जी आपल्या समस्यांवर उपाय सांगते अशी एक तरुणी इतपतच लोकांना समजत होतं. ज्या पद्धतीने नीलना अम्मांनी बोलवून घेतलं, जेवढा नीलचा अभ्यास आणि साधना झाली होती त्यावरून त्यांनी ओळखलं की ही इतर लोक समजतात तशी एक केवळ अंगात येणारी येणारी मुलगी नाही. तर ही आत्मसाक्षात्कार झालेली विभूती आहे. सर्वसामान्य लोकांमध्ये ती मिळून मिसळून राहते, मी एक वेडी मुलगी आहे असा अविर्भाव आणून राहत असली तरी ते केवळ त्यांचं वरवरचं रूप आहे. ज्यांना खरंच साधना करून आत्मज्ञान प्राप्त करायचं आहे अशांसाठी त्या परमेश्वराने धाडलेल्या गुरूच आहेत. नील त्यांच्या गावातच राहू लागला. अजूनही तीन-चार शिष्य त्यांना येऊन मिळाले. रत्नमजींप्रमाणेच अम्मासुद्धा त्यांना खडतर परिश्रम करायला लावू लागल्या. परीक्षा घेऊ लागल्या. नीलच्या मनातले भाव थेट ओळखून त्याला अचंबित करत होत्या. मनात येणारे विकल्प, कधीकधी गुरुंच्या निर्णयावर येणारे शंका हे सगळे भाव ओळखून त्यांना मार्गदर्शन करत गेल्या.

अनुभव कथनाच्या या पहिल्या भागात अमेरिकन नीलचा इथपर्यंतचा प्रवास आहे.
काही पाने उदाहरणादाखल

रमण महर्षींच्या आश्रमात पहिल्या दिवशी आलेला दैवी अनुभव



मनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न आणि गुरुंनी घेतलेली परीक्षा



अम्मांच्या आश्रमात येणारे लोक सर्वसामान्य लोक त्यांच्या घरगुती समस्या घेऊन येतात, अम्मांच्या सहवासात शांतता वाटते म्हणून येतात. ते तपस्वी साधक नसतात. ह्या परिस्तितीमुळे आश्रम सोडावा असं वाटत असताना अम्मांनी केलेलं मार्गदर्शन.



ज्ञानमार्गाने अध्यात्मिक मार्गावर प्रगती करणे किती कठीण आहे, किती त्रासदायक आहे याचीच प्रचिती या पुस्तकाच्या वाचनातून येते. असंख्य शारीरिक कष्ट लेखक स्वतः भोगत होते आणि आपल्या गुरूंनाही भोगताना बघत होते. पण तरीही मन विचलित होऊ द्यायचं नाही. दिलेलं काम करायचं. सांगितलेली ध्यानधारणा करायची. हे करताना स्वतःच्या शारीरिक-मानसिक क्षमतेवर पुन्हा पुन्हा शंका उपस्थित होत्या. कधी खूप आत्मिक समाधान लाभले आहे, मन एकाग्र झाले आहे अशी अनुभूती आली की आपण  आत्मसाक्षात्काराच्या जवळ पोहोचलो अशी भावना यायची. तर काही वेळा इतकी वर्ष तपश्चर्या करूनही आपली काहीच प्रगती झाली नाही; अजूनही मनावर नियंत्रण नाही; मन शुद्ध झालेले नाही असं वाटून ते खचलेही. जणू सापशिडीचा खेळच. त्यामुळे हे पुस्तक अध्यात्मिक विषयावरचे असले तरी एखाद्या रहस्यचित्रपटाप्रमाणे वाटते. आता पुढे काय होतंय?  त्यांना देव दिसला का? आता त्यांची समाधी लागली का? याची उत्कंठा आपल्यालाही लागू राहते. पैशाची किंवा कुठल्या वस्तूची गरज असताना ती गरज आपोआप भागली जाणे, गुरूंना मनातले कळणे, गुरु आणि इतर संतांच्या तपाचं तेज डोळ्याने दिसणे, गुरु मार्गदर्शन करताना वेगळी अनुभूती येण्याची वर्णने असे काही अद्भुत अनुभव या पुस्तकात आहेत. त्यामुळे पुस्तक वाचन रंजकही होतं. अनुवाद सरस झाला आहे. 

आपल्या भारतीय जीवनपद्धतीमध्ये तत्वज्ञान किती सहजपणे वर्षानुवर्षे सामावले गेले आहे ह्याची जाणीवही हे पुस्तक वाचताना होते. लेखक म्हणतात की .... "भारतीय लोक आई-वडिलांना गुरुजनांचा आदर करतात. त्यामुळे आदराची, भक्तीची सवय त्यांना असते. त्याचंच विशाल स्वरूप म्हणजे ईश्वराची भक्ती होते. पण अमेरिकन जीवनशैलीमध्ये आई-वडिलांकडे सुद्धा इतक्या भक्तीभावाने, आदराने बघितले जात नाही. पण परमेश्वर परमपिता आहे म्हणून त्याच्यावरच्या भक्तीची अपेक्षा केली जाते. भक्तीची, आदराची सवय घरातच नसल्याने अचानक परमेश्वराबद्दलचा भक्तीभाव सहजपणे उत्पन्न होत नाही.".  लेखकाचा हा दृष्टिकोन मला वैशिष्ट्यपूर्ण वाटला. लेखक भारताकडे नितांत कौतुकाने बघतो.

बराच वेळा घर-संसाराला, आयुष्याच्या कटकटीला वैतागलेले लोक म्हणतात की हे सगळं सोडून संन्यास घ्यावा असं वाटतं. पण संन्यासी होणं म्हणजे काही खायचं काम नाही हे या पुस्तकाच्या वाचनातून कळेल. सर्वसामान्य संसारी आयुष्यात असणाऱ्या कष्टांच्या कितीतरी जास्त कष्ट त्या मार्गावर आहेत. संसारी जीवनात तुम्ही केलेल्या कामाचा मोबदला तुम्हाला लगेच मिळतो. त्याचा उपभोग तुम्ही घेऊ शकता. पण इथे मात्र किती वर्ष तपश्चर्या करून आत्मज्ञान प्राप्त होईल? सांगता येत नाही. खरंच आत्मज्ञान असतं; का ते एक आभासी मृगजळ आहे ज्याच्या मागे आपण धावण्याचा वेडेपणा करतो आहे असंही वाटण्याची दाट शक्यता आहे. हे उमगेल.

अशाप्रकारे हे पुस्तक आपल्याला ज्ञानसाधना करणाऱ्या तपस्वी लोकांच्या वेगळ्या दुनियेत डोकावून बघायची, ते थोडं समजून घेण्याची संधी देते. ती संधी सुजाणवाचक नक्की घेतील.

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

महानगर (Mahanagar)



पुस्तक - महानगर (Mahanagar)
लेखक - मिलिंद बोकील (Milind Bokil)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १४७
प्रकाशन - मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस,एप्रिल २०२५
छापील किंमत - २५०/-
ISBN - 978-93-93528-84-1

मिलिंद बोकील यांच्या सात दीर्घ कथांचा हा संग्रह आहे. पूर्वी वेगवेगळ्या नियतकालिकांत १९८१ पासून २०२३ पर्यंत प्रकाशित झालेल्या या कथा आहेत. प्रत्येक गोष्टीबद्दल थोडक्यात सांगतो

पुन्हा सूर्य पुन्हा प्रकाश - एका कारखान्यातल्या रसायन साठवणूक करणाऱ्या प्रचंड मोठ्या टाकीमध्ये तिथला एक कर्मचारी उतरला आहे. टाकीची तांत्रिक पाहणी करणे हे त्याचे काम. या कामात त्याच्याबरोबर नेहमी कोणीतरी मदतनीस असतो. पण आज घाईघाईने तो एकटाच त्या टाकीत उतरलाय. मात्र घात झाला!! अचानक कोणीतरी टाकीचं झाकण बंद केलं. पूर्ण ग्रुप अंधारात तो आता त्या टाकीत अडकला आहे. बाहेर कोणालाच माहिती नाही. किती ओरडलं तरी त्या खोल जाड टाकीच्या बाहेर आवाज जात नाही. तो असाच अडकून राहणार का टाकीत? रसायन भरायला सुरुवात झाली तर काय होईल? झाकण बंद झाल्या झाल्या एका क्षणात बाहेरच्या प्रकाशमय जगातून तो पूर्ण अंधाऱ्या जगात कोंडला गेला आहे. एका क्षणात बाहेरच्या प्रत्येक गोष्टीची जणू अपूर्वाई वाटावी अशी भयंकर अवस्था झाली आहे. आता तो काय करेल? तो कसा सुटेल? त्याला पुन्हा सूर्य, पुन्हा प्रकाश दिसेल का? याची ही अतिशय उत्कंठावर्धक अंगावर शहारे आणणारी कथा.

एक रिकामे शून्य - या कथेतला नायक वेगळ्या परिस्थितीत अडकला आहे. नायक हॉस्पिटल मधल्या वैद्यकीय उपकरणांची देखभाल दुरुस्ती करणारा तंत्रज्ञ आहे. त्याला एका हॉस्पिटलमध्ये तातडीने मशीन रिपेअर करायला बोलावलं आहे. कारण ते मशीन वापरून एक ऑपरेशन करायचं आहे. रुग्णाच्या जीवन-मरणाचा प्रश्न आहे. ते उपकरण दुरुस्त झालं नाही तर त्याशिवाय शस्त्रक्रिया करणे खूप धोक्याचे आहे. आता काय होणार? यंत्र दुरुस्त होणार का? का त्या आधीच शस्त्रक्रिया करावी लागेल? इतकी धडपड करून शस्त्रक्रिया झाल्याचा फायदा होईल होईल का?
मशीन दुरुस्त करण्याचे नायकाचे प्रयत्न, हे काम आपण का अंगावर घेतलं हा सतत स्वतःलाच पडणारा प्रश्न, वेळ निघून चालली आहे म्हणून डॉक्टरांची होणारी धावपळ, रुग्णाच्या जीवनाची करुणा भाकणारे नातेवाईक हे सगळे चित्र लेखकाने अतिशय प्रत्ययकारी चित्र उभं केलं आहे. वाचता वाचता आपणही त्या चित्राचा एक भाग होऊन जातो.

लोखंड आणि घोडा - एक सुखवस्तू मध्यमवर्गीय जोडपं. एकमेकांचे गुण दोष सांभाळून, समजून घेत ते संसार करत आहेत. पण पती-पत्नीमध्ये अनपेक्षित पणे तिसरा येतो. नवऱ्याला कळणार नाही अशा बेताने सुरू झालेले संबंध हळूहळू वेगळे रूप घेतात. नायिकेला हे कळत असतं की आपण नवऱ्याला फसवतोय. पण तरीही या संबंधांची गोडी तिला वाटत असते. ते संबंध अजून गंभीर रूप घेऊ लागतात. या संबंधातून आपल्याला काय हवं आहे हे समजून घेता घेता तिला स्वतःची, तिच्या नवऱ्याची प्रियकराची आणि एकूणच आपल्या संसाराची काही वेगळीच कल्पना येते.
आधीच्या कथांप्रमाणे नायिका एखाद्या विशिष्ट ठिकाणी अडकलेली नाही. पण एका अदृश्य भावनिक वर्तुळात अडकली आहे. तिच्या आणि तिच्या नवऱ्याच्या भावभावनांचे हिंदोळे आपल्यालाही वाचनात झुलवतात.

रणभूमी - यातही एक सुखवस्तू जोडपं आहे. यातल्या बाईचं वागणं फार लहरी आहे. कधी उच्च शिक्षण घेण्याचा नाद तर कधी नाटकात काम करण्याचा नाद असं काहीतरी. इतका नाद की घरदार, मुलंबाळं विसरून त्याच गोष्टीच्या मागे. नवऱ्याला असं जाणवतं की त्या नादाबरोबरच तिथे संपर्कात येणाऱ्या पुरुषांच्या मागे ती विनाकारण वाहवत जाते आहे. तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यासारखा नसला तरी इतर पुरुषांच्या वृत्ती बद्दल मात्र त्याला संशय येत असतो. अशा प्रत्येक घसरणीच्या वेळी नवरा तिला कसा सावरतो आणि बायको त्याच्यासमोर नवनवीन आव्हान कशी ठेवते त्याची ही गोष्ट.

स्मरण - एका स्मशानात घडणारी ही गोष्ट आहे. एका अंत्यविधीला आलेल्या लोकांचा हा पूर्ण संवाद आहे. त्या क्षणी तिथे प्रत्यक्ष काहीच घडत नाही. ते लोक एकमेकांशी फक्त गप्पा मारत आहेत. पण त्या संवादातून ते चार जण कोण आहेत, अंत्यविधी कोणाचा आहे, त्या चार जणांचा आणि मृत व्यक्तीचा काय संबंध, त्या मृतव्यक्तीने त्यांच्या पूर्वायुष्यावर कसा परिणाम केला हे हळूहळू उलगडत जातं. ही कथा थोडी आर्ट फिल्म सारखी आहे. संवादातून तुकडे जोडत जोडत काही एक धूसर चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं. इतर गोष्टींएवढी ही मला भावली नाही.

कॅमेरा - कोरोना काळात घरी बेकार बसलेला एक छायाचित्रकार काहीतरी काम करायचं म्हणून एक काम स्वीकारतो. ते काम असतं अश्लील चित्रफितीच्या चित्रीकरणाचं. पॉर्न फिल्मचं शूटिंग. अशा शूटिंगचा हा त्याचा पहिलाच अनुभव (कदाचित पुस्तकाच्या वाचकांचाही हा पहिलाच अनुभव असेल !) त्यामुळे अशा पद्धतीच्या फिल्मचं शूटिंग कसं होतं याचा आखो देखा हाल आपल्याला या कथेत वाचायला मिळतो. चित्रफितीत काम करणारे लोक शृंगाराचा अभिनय कसा करतात, दिग्दर्शक त्यांना किती सहजपणे त्यांना सूचना देतो, हसत खेळत कसं काम होतं, त्यातून तिथे काम करणाऱ्या माणसांचे वेगवेगळे रंग हे सगळं दिसतं. इथे सुद्धा "पब्लिक डिमांड" काय असते हे दिग्दर्शकाला लक्षात घ्यावं लागतं हे वाचन मजेशीर आहे. परिस्थितीच्या नाईलाजापोटी अशा चित्रफितीत लोकांना काम करावं लागतं ती निकड अधोरेखित होते.
लेखक तुम्हाला थेट त्या चित्रीकरणाच्या सेटवर दिग्दर्शकाच्या बाजूला खुर्चीवरच बसवतो !!

काही पाने उदाहरणे दाखल
रसायनाच्या टाकीत अडकलेल्या नायकाची अवस्था.

लहर आली की वाहत जाणाऱ्या रंजनाची अवस्था.

अश्लील चित्रपटाच्या चित्रीकरणातील एक प्रसंग.


अशा ह्या विविध विषयांवरच्या पण माणसाच्या मनात चालू असणाऱ्या संघर्षाच्या आहेत. परिस्थितीशी संघर्ष, स्वतःच्या वासनांशी संघर्ष, स्वतःच्या भावनांशी किंवा आपल्या जवळच्या माणसाच्या मानसिकतेशी. त्यामुळे सर्व कथा गंभीर आहेत पण रटाळ अजिबात नाहीत. जितक्या उत्कंठावर्धक आहेत तितक्याच त्या विचार प्रवृत्त करणाऱ्या देखील आहेत. माणसांच्या नाना रंगछटा दाखवणाऱ्या आहेत.

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-












चार्वाक (Charvak)




पुस्तक - चार्वाक (Charvak)
लेखक - सुरेश द्वादशीवार (Suresh Dwadashiwar)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १३२
प्रकाशन - साधना प्रकाशन मार्च २०२१
छापील किंमत २००/- रुपये
ISBN - 978-93-92962-21-9  

पुणे पुस्तक महोत्सवात खूप वेगवेगळ्या विषयांवरची, वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं बघायला मिळत होती. अशाच एका स्टॉलवर लक्ष गेलं या पुस्तकाकडे - "
चार्वाक"हा विषय कमी वाचनात आलेला म्हणून पुस्तक लगेच विकत घेतलं. 

चार्वाक म्हटलं की हा श्लोक आठवतो
यावज्जीवेत सुखं जीवे ऋणं कृत्वा घृतं पिबेत, भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः ||
अर्थात जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत मजेत जगा. कर्ज काढून तूप प्या (चैन करा). मेल्यानंतर देहाची राख होणार आहे. मग कुठला पुनर्जन्म आणि कशाची चैन?  असे चार्वाकाचे सांगणे आहे असे वाचण्यात येते. 
चार्वाक नास्तिकमत मांडणारा आहे. या देहाचे सुख, आत्ताच्या जगातलं सुख हे महत्त्वाचं आहे. पूर्वजन्म, पुनर्जन्म, ईश्वर यांची पर्वा न करता जगायला सांगणारा अशी साधारण समाजातली समजूत आहे. तशीच माझीही आहे. तरीही भारतीय तत्त्वज्ञानातले द्वैत- अद्वैत, आस्तिक - नास्तिक, सांख्य , योग असे वेगवेगळे मतप्रवाह मांडताना चार्वाकांचं नावही नेहमी येतं. त्यामुळे या महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वाचं अजून योगदान काय आहे; त्याचे तत्वज्ञान अजून काय आहे हे समजून घेण्याची मला उत्सुकता वाटली. पुस्तकाचा पाठ मजकूर बघितला तर त्यात असा उल्लेख आहे की "चार्वाकांचा एकही ग्रंथ सध्या संशोधकांना सापडलेला नाही. त्यांची परंपरा समजली नाही की तिचे अवशेषही हाती लागले नाहीत". आता मला गंमत वाटली की, काहीच उपलब्ध नसताना लेखकाने १२० पाने काय बरं मजकूर लिहिला असेल? त्याने स्वतः संशोधन करून आत्तापर्यंत न सापडलेलं काही शोधून काढलं की काय? म्हणून उत्सुकतेने पुस्तक विकत घेतलं.

पुस्तकाचं सांगणं असं आहे की... चार्वाक बुद्धीप्रामाण्य मानणारे होते. प्रत्यक्ष अनुभव, प्रमाण, अनुमान, तर्क यातून जे ज्ञान मिळतं तेच खरं. त्याहून वेगळं कोणी सांगत असेल तर त्या फक्त कल्पनाच. ईश्वर सृष्टीचा निर्माता, स्वर्ग-नरक, पूर्वजन्म, पुनर्जन्म, या गोष्टी कोणीही न पाहिलेल्या प्रत्यक्ष न अनुभवलेल्या. त्या खऱ्या नाहीत. मोक्ष, ब्रह्म, आत्मा वगैरे भानगड पण काही खरी नाही. "जग खोटं आहे आणि ब्रम्ह सत्य आहे" असं मानण्यात काही हशील नाही. उलट हे जगच खरं आहे. तेच समजून घेतलं पाहिजे. या जगात सुखी होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशी चार्वाकांची विचारसरणी आहे. "
ऋणं कृत्वा घृतं पिबेत" हा मूळ चार्वाकांचा श्लोक नसून त्यांच्यावर टीका करण्यासाठी त्यांना भोगीविलासी ठरवण्यासाठी नंतरच्या लोकांनी त्यांच्या श्लोकाचा असा विपर्यास केला आहे. 

लेखकाचं म्हणणं असं आहे की हजारो वर्ष चालत आलेली वैदिक परंपरा स्थिरस्थावर होण्याच्या आधी सुद्धा चार्वाकमत अस्तित्वात होतं. त्याला "लोकायत" मत असं म्हटलं जायचं. पण पुढे वैदिक संस्कृती असो, बौद्ध धर्म असो की जैनधर्म; प्रत्येक पंथाला आपापल्या श्रद्धा अत्यावश्यक वाटत होत्या. त्यांनी चार्वाकांना वैचारिक हद्दपार केलं. समाजाला खोट्या संकल्पनांच्या नादी लावलं. ईश्वर न मानणारे गौतम बुद्ध सुद्धा त्यांच्या शिष्यांना चार्वाकाचे ग्रंथ वाचू नका, त्याचा उपदेश ऐकू नका असा संदेश देतात. पाश्चात्य धर्मांना कदाचित चार्वाक हे नाव माहिती नसेल. पण पाश्चात्य धर्म सुद्धा - मी म्हणतो तेच सत्य; मी म्हणतो त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवा - अशीच आज्ञा देतात
. धर्माला प्रश्न विचारणारे वैज्ञानिक, बायबल मधलं ज्ञान खोटं आहे असं सांगणारे समाजसुधारक यांना ग्रीक व रोमन लोकांनी विरोधच केला. थोडक्यात तिकडेही चार्वाकवृत्तीला वैचारिकतेतून हद्दपार करण्यात आले होते.

पूर्वीच्या काळी पाऊस, वारा, सूर्य ह्यांना देव म्हणून पूजलं जायचं मग ईश्वर या संकल्पनेचा विकास झाला. प्रतीकं  आली मूर्ती आल्या वगैरे गोष्टी मांडल्या आहेत. माणूस भीतीपोटी किंवा अजून लाभ व्हावा यासाठी स्वतःच्या कल्पनेतून प्रथा, परंपरा, पूजा तयार केला. अस्तित्वात नसणाऱ्या देवाला मागणीपत्रे पाठवण्याचा खटाटोप ह्याहून जास्त त्याला अर्थ नाही. संतमहात्म्यांचा उद्देश उदात्त असला तरी उपदेश मात्र लोकांना भोळसट बनवणारा आहे. 

पुस्तकाच्या प्रतिपादनाचा हा मूलाधार आहे. हाच मुद्दा पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या पैलूंनी सांगितलेला आहे. या पुस्तकात पंधरा लेख आहेत. अनुक्रमणिकेवरती एक नजर टाकली की त्यांचे विषय कळतील.


हे पुस्तक वाचायला घेताना माझी अपेक्षा अशी होती की चार्वाकांचा काळ, आयुष्य, कार्य, विचारसरणी, त्यांची परंपरा, विचारपद्धतीचे वेगवेगळे पैलू या सगळ्याबद्दल माहिती मिळेल. पण पुस्तकाने साफ निराशा केली. वर म्हटल्याप्रमाणे चार्वाकांचे ग्रंथ उपलब्ध नाहीयेत आणि ह्या लेखकालाही त्याहून जास्त काही माहिती नाहीये. त्यामुळे पूर्ण पुस्तक वाचून माहितीत फार भर पडत नाही. चार्वाकांबद्दल माहिती नाही तर मग १२० पानं काय लिहिले हा प्रश्न आता तुम्हालाही पडला असेल.

लेखकाचा सगळा भर हे दाखवण्यावर आहे की आजच्या सर्व धर्मांमध्ये भरपूर दोष आहेत. धर्माधर्मांमध्ये संघर्ष चालू आहेत. धार्मिक माणसांमुळे नीती प्रस्थापित झाली आहे असं काही दिसत नाही. धर्मसत्ता, राज्यसत्ता आणि धनसत्ता हे एकत्र येऊन लोकांना मूर्ख बनवण्याचे धंदे चालू आहेत. लोकही त्यामागे इतके वेडे झाले आहेत की वेगळा विचार करणारा माणूस त्यांना नको वाटतो. थोडक्यात आजचे धर्म सर्व वाईट. त्याचा व्यत्यास म्हणून चार्वाकांची परंपरा विचारपद्धती योग्य !! हेच पुन्हा पुन्हा पटवून देण्यासाठी त्यांनी आत्ताच्या धर्मातली वैगुण्ये विशद केली आहेत. थोडक्यात चार्वाकांची उंची दाखवण्याऐवजी प्रस्थापित धर्मांचं खुजेपण दाखवले आहे.

लेखकाने मांडलेले मुद्दे अयोग्य आहेत असं नाही. पण हे मुद्दे काही नवीन नाहीत? "देव दानवा नरे निर्मिले हे मत लोकां कावळू द्या" हे केशवसुतांनी शंभर दीडशे वर्षांपूर्वीच लिहून ठेवलं आहे. युरोपामध्ये झालेला रेनेसांस, भारतामध्ये झालेले प्रबोधनपर्व, समाजसुधारणा आणि आजही चालू असलेल्या सुधारणा यातून प्रत्यही हे मुद्दे पुन्हापुन्हा चर्चिले जातातच. देव आहे की नाही? पुनर्जन्म म्हणावा की नाही? पूजा करावी की नाही? मंदिरे, चर्च मशिदी इत्यादींची गरज आहे का? याबद्दल सतत चर्चा चालू असते. थोडक्यात श्रद्धा का बुद्धीप्रामाण्य हा वाद कायम टिकणार आहे.

लेखकाचं म्हणणं असं आहे की वेदपूर्वकाळात "लोकायत" अर्थात चार्वाकांचे मतच प्रचलित होते. हे वाचून मला असा प्रश्न पडला की ते जर प्रचलित होते तर ईश्वर, श्रद्धा, धर्म यांची गरज माणसाला का पडली? गरज ही शोधाची जननी आहे त्याअर्थी चार्वाकांच्या मतात काय कमतरता होती ज्यामुळे माणसाला ईश्वर, पूजाअर्चना, आराधना यांची निर्मिती करावी लागली? फक्त भारतात नाही तर जगभर. ह्याबद्दल लेखक ताकदीने बोलत नाही. 

अनुभवजन्य ज्ञान महत्त्वाचं आहे हे म्हणणं १००% योग्य. पण एवढं एक वाक्य पुरेस होत नाही ना! डेव्हिल लाईज इन द डिटेल्स. जसजशी लोकसंख्या वाढली, श्रमविभागणी झाली, लोक एकमेकांवर अवलंबून राहू लागले, व्यवहारांची व्याप्ती वाढली तेव्हा समाजाची धारणा करण्यासाठी नियम आले, कायदे आले, नीती- अनीती आली, शिक्षा आल्या, न्याय- अन्याय आला. चार्वाकमतानुसार या सगळ्याची व्यवस्था कशी लावली जाईल याची तपशीलवार मांडणी करण्याची करणे लेखकाने टाळले आहे. समाजव्यवस्था चांगली टिकण्यासाठी, हजारो प्रकारच्या स्वभाव आणि इच्छाआकांक्षा असणाऱ्या माणसांना एकत्र घेऊन समाज टिकवण्यासाठी काय केले पाहिजे याबद्दल पुस्तक पूर्णपणे मौन बाळगतं. 
केवळ चार्वाकमत आधीपासून अस्तित्वात होतं म्हणून ते योग्य महान कसं म्हणणार? फारफार तर ती अप्रगत समाजाची पहिली पायरी होती इतकंच. पुढच्या पायऱ्यांवर जाताना मानवजातीचा पाय थोडा घसरत असेल म्हणून "पहिली पायरीच बरी" असा तर्क प्रतिपादित होतो. 

आज आपण आजूबाजूला बघतो की सगळ्या सुखसोयी असणारी बरीच माणसं सुद्धा मनाने समाधानी व आनंदी नसतात. काहीतरी उणीव राहिली आहे असं त्यांना वाटत असतं. अशावेळी केवळ भौतिक समाधानापेक्षा वेगळं आत्मिक समाधान त्यांना हवं असतं. या सगळ्याचा ताळमेळ चार्वाकमतात कसा घातला जातो हा कळीचा मुद्दा लेखक विचारात घेत नाही.

समाधी ध्यान आणि चार्वाक या प्रकरणात समाधी , मनाची एकाग्रता ह्या बद्दल थोडं लिहिलं आहे. इथे तर प्रत्यक्ष अनुभव आहे. आजपर्यंत कितीतरी योगी मुनींनीसन्यास्यांनी तो घेतलेला आहे. याची उदाहरणे स्वतः लेखकाने दिली आहेत. योगमार्गाचा अवलंब करून कोणीही तो अनुभव घेऊ शकतो. इथे तरी चार्वाक आणि परंपरा यामध्ये विरोधाभास असण्याचे कारण नव्हते. हा अनुभव घेण्याचा प्रयत्न लेखकाने केला का किंवा स्वतःला नास्तिक म्हणणाऱ्यांनी हा अनुभव घेण्याचा प्रयत्न केला का याबद्दल लेखक काही लिहू शकला असता. पण ती निसरडी वाट आहे हे लक्षात येताच; धर्मात असे चमत्कार सांगितले आहेत, चमत्कारांवर विश्वास ठेवू नये बुद्धी वापरावी हीच कॅसेट पुन्हा सुरू होते.

फक्त एक चांगली बाब म्हणजे फक्त हिंदू धर्म किंवा भारतीय धर्म यांच्यावर टीका न करता ख्रिश्चन आणि इस्लाम यांच्या यांची उदाहरणे सुद्धा दिली आहेत. त्यांच्या मधले दोषही दाखवलेले आहेत.
"चार्वाक" या नावाने जरी पुस्तक असलं तरी यातला "चार्वाक" हा शब्द गाळून त्याजागी बुद्धीप्रामाण्य किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन असं म्हटलं असतं तरी या पुस्तकाच्या मजकुरामध्ये काही फरक पडला नसता.

थोडक्यात मला हे पुस्तक आत्ता नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीतल्या प्रचारासारखे वाटले. जोतो उठतो आणि  दुसऱ्या पक्षावर भ्रष्टाचाराचे, गैरव्यवहाराचे आरोप करतो. दुसऱ्याच्या चुकीच्या निर्णयांमुळे बेरोजगारी आणि गरिबी कशी वाढली, प्रदूषण कसं वाढलं हे सगळं सांगतो. पण ह्यावर उपाय म्हणून मी ठोस काय करीन हे सांगत नाहीत. माझ्या उपायांचा फायदातोटा काय, त्याची किंमत किती, दीर्घकाळ टिकण्याची क्षमता किती, त्यासाठी काय त्याग करायला लागेल हे कोणी सांगत नाही. एकदा मला निवडून द्या स्वर्ग तुमच्या समोर. तसंच हे पुस्तक इतरांच्या चुका दाखवत स्वतःची मूठ झाकलेली ठेवत, उज्ज्वल भवितव्याची आशा दाखवतं. जुन्या निवडणूक घोषणेच्या - "न जात पार न पात पार, इंदिराजी की बात पर" च्या धर्तीवर "न जात पार न पात पार, चार्वाकजी की बात पर" !!


——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

शीतपेटीतून जेव्हा जाग येते (Shitpetitun Jevha Jaag Yete)



पुस्तक - शीतपेटीतून जेव्हा जाग येते (Shitpetitun Jevha Jaag Yete)
लेखक - क्षितिज देसाई (Kshitij Desai)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १०४
प्रकाशन - सृजनसंवाद प्रकाशन, सप्टेंबर २०२५
छापील किंमत - २५०/-
ISBN - 978-93-91895-55-6

मराठीतून चांगल्या विज्ञानकथा किंवा कल्पनारंजन(फँटसी) प्रकारचं लेखन इतर साहित्यप्रकारांइतकं मोठ्या प्रमाणावर दिसत नाही. त्यामुळे मराठीत असं लेखन दिसलं तर मी मुद्दामून वाचायचा प्रयत्न करतो. विशेषतः त्यात नवीन लेखकाचं नाव दिसलं तर ह्या लेखकाने काय वेगळे प्रयोग केले असतील ह्याची जास्त उत्सुकता वाटते. त्यामुळे क्षितिज देसाई हे मला अनोळखी नाव आणि त्याचा विज्ञानकथा संग्रह ह्याबद्दल फेसबुक पोस्ट्स बघितल्यावर पुस्तक लगेच विकत घेतले. आवडलेही. पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार कळले की क्षितिज च्या कथा २०११ पासून प्रकाशित होतायत. हा त्याचा दुसरा कथासंग्रह आहे.

पुस्तकात दिलेली लेखकाची माहिती


पुस्तकात नऊ कथा आहेत. भविष्यात विज्ञान - तंत्रज्ञान ह्यांच्या प्रगतीने आपल्या जगण्यात काय बदल घडतील, त्यातून काय नवीन समस्या तयार होतील, त्यावरचे उपाय पण कसे अभिनव असतील ह्याची कल्पना करणाऱ्या ह्या कथा आहेत. रहस्यभेद न करता कथांचे विषय थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो

ब्ल्यूबेरीचं ब्रेसलेट - भविष्यात माणूस इतका प्रगती साधेल की परग्रहांवरही मानवी वस्ती होईल. वस्ती आली की तिचे व्यवस्थापन करणारी व्यवस्था आली. मग आज जशा upsc - mpsc स्पर्धा परीक्षा असतात तशा तेव्हाही mpsc परीक्षा असतील. मात्र "मार्स पब्लिक सर्व्हिस कमिशन". तिची निवडप्रक्रिया सुद्धा आधुनिक. फक्त उमेदवाराची बुद्धीच नाही तर नैतिकता कशी तपासली जाईल, त्यासाठी थेट डोक्यात कसे डोकावतील ह्याची भन्नाट कल्पना.

ओरिगामीचं ओबडधोबड ऑर्किड - परग्रहांवर वस्ती झाली की तिकडे समाजव्यवस्था तयार होणार. त्यापाठोपाठ नव्या व्यवस्थेला विरोध करणारे विरोधक सुद्धा तयार होतील. कदाचित परग्रहवासी अतिरेकी सुद्धा तयार होतील. अशा अतिरेक्यांच्या अंतराळात होणाऱ्या कारवाईला विरोध करण्याची योजना कशी आखली जाते आणि त्यात यंत्रमानव कसे काम करतात याबद्दल ची कथा.

इंडेक्स पेशंट - टाईम ट्रॅव्हल / कालप्रवास अर्थात भूतकाळात परत जाण्याचे तंत्रज्ञान हा सर्व विज्ञान कथांचा एक आवडीचा विषय. या कथेत सरकारी व्यवस्थेला कळतं की एक व्यक्ती कालप्रवास करून भूतकाळात गेली आहे. पण ती व्यक्ती सरकारमान्य किंवा योग्य परवानगी घेऊन गेलेली नाही. मग ती कोण? कशासाठी? हे शोधण्यासाठी सरकारी अधिकारी पण कालप्रवास करून मागे जातात. कालप्रवास अधिक चोर-पोलीस अशी गोष्ट. तिचा शेवट मात्र अगदी अनपेक्षित.

शीतपेटीतून जेव्हा जाग येते - अमर व्हायची इच्छा प्रत्येक माणसालाच असते. समजा तसं होता आलं तर? आपलं शरीर जपून ठेवता आलं आणि आपल्याला हवं तेव्हा भविष्यात पुन्हा जागा होत आलं तर? जाग आल्यावर नव्या काळाशी, नव्या सभोवतालाशी जोडून घ्यावे लागेल. मेंदूमध्ये नवे ज्ञान भरावे लागेल. पण आपली ओळख तर तीच राहील. एक तंत्रज्ञान कंपनी अशी सेवा लोकांना पुरवते आहे. शीतपेटीत लोकांना ठेवते. पण इथे झालं असं की कथानायक शीतपेटीतून उठला आणि त्याला देह मात्र दुसऱ्याच माणसाचा मिळाला. आता पुढे काय?

रोबोनॅप - आज आपल्या प्रत्येकाकडे मोबाईल फोन आहे. ती गरज झाली आहे. भविष्यात यंत्रमानव सुद्धा 
असेच अतिशय कॉमन होतील. प्रत्येक माणसाकडे, घरोघरी यंत्रमानव असतील; आपली काम करून देण्यासाठी, आपलं मनोरंजन करण्यासाठी. जणू आपले ते सहकारीच. तेव्हा गुन्ह्याचं प्रकारही बदलेल. आज मोबाईल चोरीला जातात तसा भविष्यात यंत्रमानव चोरीला गेला तर? आपला सहचर असणारा रोबो किडनॅप (रोबोनॅप) झाला तर?

एआय विरुद्ध विक्रांत - यंत्रमानव कॉमन होतील. सैन्यात सैनिकांच्या बरोबरीने यंत्रमानव काम करतील. मग फितूर म्हणून सुद्धा एखादा यंत्रमानवच सैन्यात घुसला तर? अगदी माणसासारखा दिसणारा वागणारा एआय वापरणारा फितूर यंत्रमानव आला तर ? त्याला ओळखायचं कसं ?

देही देवाचा वास - हातचलाखी आणि विज्ञानातले प्रयोग करून आपण चमत्कार करतो आहेत असे भासवणारा बुवा लोकांना फसवतोय. त्याचा पर्दाफाश करणारी एक तरुणी कशी करते ते वाचा.

बुद्धी विरुद्ध बळ - ह्या कथेतही पुन्हा तंत्रज्ञान वापरून दुसऱ्याची फसवणूक आणि त्याची पोलखोल आहे. पण इथे फसवणूक एक खेळाडू करतोय. कायम जिंकावं म्हणून खुबीने आणि लपूनछपून तंत्रज्ञान वापरतोय.

ह्या नऊ कथा आपल्याला आजच्या काळापासून दूर भविष्यापर्यंत, घरापासून मंगळापर्यंत, बुद्धिबळाच्या पटापासून आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या पटापर्यंत, यंत्रमानवांच्या भावभावनांपासून भविष्यात जाग्या झालेल्या खऱ्याखुऱ्या माणसांच्या भावनांपर्यंत सफर घडवून आणतात. आपण त्या सफरीचा समरसून आनंद घेतो. शेवटच्या दोन कथांमध्ये दाखवलेली फसवणूक कदाचित आजही घडू शकेल असं तंत्रज्ञान आसपास आहे. त्यामुळे कल्पना किती झपाट्याने सत्य होतायत ह्याची जाणीव होते. म्हणून इतर कथांमधले तंत्रज्ञान आत्ता उपलब्ध नसलं तरी या कल्पना शक्यतेच्या टप्प्यात आहेत असं आपल्याला वाटतं. त्यातून या गोष्टी अतर्क्य वाटत नाहीत. खरंच असं होऊ शकतं असा विश्वास वाचकाच्या मनात निर्माण करतात. असं झालं तर काय काय होईल याबद्दल वाचकांनाही विचार प्रवृत्त करतात.

मुख्य कल्पनेच्या गाभ्याप्रमाणेच कथांची लेखनशैलीही दृश्यात्मक आहे. कमीत कमी वर्णनात लेखक परिस्थिती आपल्यासमोर उभी करतो. अनावश्यक वर्णनाचा फापटपसारा मांडलेला नाही. निवेदन व संवाद असं दोन्ही वापरलेलं आहे त्यामुळे कथा एकसुरी होत नाही. योग्य तिथे इंग्रजी व मराठी शब्द वापरून तोही मेळ चांगला साधला आहे. प्रसंगही वेगवान घडतात आणि उत्सुकता शेवटपर्यंत टिकून राहते. एक कथा वाचून झाली की लगेच पुढची वाचायची इच्छा निर्माण होते. एका बैठकीत पुस्तक वाचून संपवलंत तर नवल नाही.

काही पाने उदाहरणे दाखल
माणूस मंगळावर गेला तसा पृथ्वीवरचा भ्रष्टाचारही तिथे पोहोचला तर ?



कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणारा फितूर कसा शोधायचा ?



क्षितिज देसाई २०११ पासून विज्ञानकथालेखन करतो आहे. आता त्याच्या इतर गोष्टी वाचायची उत्सुकता आहे. हे पुस्तक वाचून झाल्यावर त्याच्याशी संपर्क साधला तेव्हा कळलं की तोही मूळचा डोंबिवलीकर आहे. माझा गाववाला! त्यातही आयटी क्षेत्रात काम करणारा. त्यामुळे कौतुक अजूनच वाढले. क्षितिजच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा ! क्षितिजच्या लेखनाने मराठी विज्ञानकथांचे क्षितिज कायम उजळत राहो !!



——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

ऋणानुबंध पूर्वेचा (Runanubandh Purvecha)




पुस्तक - ऋणानुबंध पूर्वेचा (Runanubandh Purvecha)
लेखिका - सुजाता गोखले (Sujata Gokhale)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १४२
प्रकाशन - डॉ. स्मृती निकुंभ - हावळ, सुकर्मयोगी. ऑक्टोबर २०२२
ISBN - 978-81-931362-4-9
छापील किंमत - रु. ३९९/-

जपान देश मला नेहमी आकर्षित करतो. जपानचे फोटो आणि व्हिडीओ बघताना तिथली प्रत्येक गोष्ट किती देखणी वाटते. आखीवरेखीव रस्ते, स्वच्छ इमारती, नीटनेटकी-शिस्तीत प्रवास करणारी माणसे, हिरवी शेते - निळेशार पाणी - प्रदूषण मुक्त हवा, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा आणि तरी पारंपरिक पोशाख आणि देवळे ह्यांचा सहज अस्तित्व, आनंदी आणि कार्यरत वृद्ध ... काय काय लिहावं..किती पहावं..आणि किती किती वाचावं...म्हणून एका पुस्तकप्रदर्शनात हे पुस्तक बघितल्यावर हात आपोआप तिकडे वळले. पुस्तकाचं मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ पण सोपं, ठसठशीत आणि आकर्षक. जपानी किल्ला, साकुरा (चेरी चा बहार), माउंट फुजी आणि प्रवासी स्त्रीची प्रतिमा. पुस्तक बघायला उद्युक्त करणारे.

लेखिका सुजाता गोखले गेली २२ वर्षे विविध स्तरावर जपानी भाषा शिकत आहेत. त्यांनी जपानी भाषेत बी.ए., एम. ए. पण केलं आहे. २००८, २०११, २०१७ आणि २०१९ असा चार वेळा त्या काही आठवडे, काही महिने जपानमध्ये राहिल्या होत्या. तेव्हा स्थानिक लोकांना भेटल्या, होम स्टे मध्ये राहिल्या, त्यांच्या जपानी सहकाऱ्यांबरोबर भरपूर फिरल्या, तिथले वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ खाल्ले, अनवट ठिकाणांनाही भेटी दिल्या. ह्या सगळ्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभवनाचे दिलखुलास वर्णन पुस्तकात आहे.

लेखिकेबद्दल पुस्तकात दिलेली माहिती


नेहमीपेक्षा मोठ्या आकारातले हे पुस्तक आहे (लॉंगबुक / बहुतेक A4 साईज). एकेक ठिकाण, एकेक अनुभव किंवा एकेक भेट ह्यांच्यावर एक किंवा दोन पान असं वर्णनाचं स्वरूप आहे. टोकियो, माउंट फुजी, हिरोशिमा, योकोहामा अशी नेहमीची नावं आहेत. पण बरीच अनवट ठिकाणं आहेत. उदा.
ओमिया - बोन्साय (लघुवृक्षे)चे गाव. दोनदोनशे वर्षे जुनी बोन्सायची झाडे तिथे आहेत. बोन्साय शिकवणारे क्लासेस तिथे आहेत.
ओसाका किल्ला
गिओन - खास झगा, केसांचा मोठा आंबाडा, भरपूर मेकअप अशा बाहुलीसारख्या दिसणाऱ्या जपानी सौंदर्यवती - गेईशा -चे गाव
शिंतो देवळे
समुद्रात बांधलेले कानसाई विमानतळ
हिमेजी किल्ला
कप नूडल्स म्युझियम
इ.

जपानी बुलेट ट्रेन ने प्रवास, गगनचुंबी इमारतीच्या उंचीवरून दर्शन आणि विविध जपानी बागांच्या भेटीचा अनुभव घेतलाच. पण जपानची शाळा, कचरा व्यवस्थापन केंद्र, इकेबाना पुष्परचना वर्ग , हानाबी (फटाक्यांची आतषबाजी), साइतामा गावाच्या मेयरशी भेट, "आंतरराष्ट्रीय मैत्री जत्रा आणि प्रदर्शनात" स्टॉल लावून भारतीय कलात्मक वस्तूंची विक्री हे सगळंही अनुभवलं.

अनुक्रमणिकेवर एक नजर टाकली की लक्षात अजून काय काय आहे हे.



ज्या ठिकाणी गेल्या त्या ठिकाणचे मुख्य वैशिष्ट्य, सौंदर्यस्थळ थोडक्यात सांगितलं आहे. तिथे कसा प्रवास केला, जाता येता काय खाल्लं, आजूबाजूची माणसं कशी दिसली असं सगळं सांगत त्या पुढे पुढे गेल्या आहेत. एकटीने प्रवास करताना झालेली फजिती, अनोळखी पदार्थ चाखताना झालेला अपेक्षाभंग किंवा "खास जपानी स्वभावा"चा फटका सुद्धा त्यांनी मोकळेपणाने सांगितला आहे. त्यामुळे जपानची माहितीपुस्तिका किंवा गंभीर लेखमाला असं न होता लेखिकेच्या आपल्याशी गप्पा होतात. जणू आपण त्यांच्या घरी गेलो आहोत आणि त्या एकेक फोटो दाखवत, "तेव्हा आम्ही इकडे गेलो, आणि मग हे खाल्लं, हे असं असेल असं वाटलंच नव्हतं" असं सांगतायत !

काही पाने उदाहरणादाखल

जपानची शाळा
बोन्साय चे गाव
शिंतो देवळे 

स्थलवर्णन शब्दांत कितीही चांगलं केलं तरी a picture tells a thousand words ह्या उक्तीनुसार फोटो हवेतच. ह्या पुस्तकात भरपूर फोटो आहेत. ते रंगीत आहेत. आणि मोठ्या आकाराचे स्पष्ट आहेत. फोटो देताना काचकूच केली नाहीये हे बघून आनंद झाला. पुस्तकाची परिणामकारकता वाढली आहे. हे फोटो पुस्तकाच्या मध्ये मध्ये काही पाने एकत्र असे दिले आहेत. त्याऐवजी ते वर्णनाच्या सोबतच देता आले असते तर ... (ये दिल मांगे मोअर :) ). किमान फोटो कुठल्या पानावर आहे तो क्रमांक मजकुराच्या मध्ये दिला तरी अजून फायदा होईल. 

हे पुस्तक माहिती, वर्णन, फोटो ह्यांनी भरलेलं आहे. जपानबद्दल बरीच नवी माहिती कळेल. तिथल्या लोकांची विचारपद्धती आणि जीवनपद्धती कळेल. जपानबद्दलचं कुतूहल अजूनच वाढेल. लेखिकेच्या आगामी जपान प्रवासात आपल्यालाही सहप्रवासी होण्याची संधी मिळावी असं वाटायला लागेल. जपान भेटीची संधी मिळेल तेव्हा मिळेल तोपर्यंत हा वाचनानंद चुकवू नका.

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

जो जे वांछील (Jo je vancheel)

पुस्तक - जो जे वांछील (Jo je vancheel)
लेखक - नचिकेत क्षिरे (Nachiket Kshire)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १८८
प्रकाशन - नीम ट्री पब्लिशिंग हाऊस नोव्हेंबर २०२३
छापील किंमत - रु. ३२५/-
ISBN 978-81-957778-2-2

पुणे पुस्तक महोत्सवात प्रकाशक द्वितीय सोनावणे, श्री. गुलाब सपकाळ यांची भेट झाली. तिथेच लेखक नचिकेत क्षिरेही उपस्थित असल्यामुळे त्यांच्याशीही बोलण्याची, ओळख करून घेण्याची संधी मिळाली. तेव्हा दोघांनी मिळून मला हे पुस्तक भेट दिले. त्याबद्दल दोघांचे आभार.




याआधी मी लिहिलेलं पुस्तक परीक्षण हे सुद्धा महोत्सवात घेतलेल्या पुस्तकाबद्दल होतं (https://learnmarathiwithkaushik.com/courses/mazi-janmkhep). त्याचे लेखक रीलस्टार युट्युबर आहेत. तर या पुस्तकाचे लेखक नचिकेत क्षिरे हे पॉडकास्टर आहेत. आजच्या पिढीची समाज माध्यम हाताळणाऱ्या ताज्यादमाच्या लेखकांनी ही माध्यमांच्या भोवती फिरणारी कथानके घेऊन पुस्तकं लिहिली आहेत. हे त्याचं वेगळेपण नक्की आहे.

लेखकाबद्दल पुस्तकात दिलेली माहिती



ही एक कादंबरी आहे. नायक अनिकेत जोशी हा एक पत्रकार आहे. पत्रकारितेची नोकरी बरी चालली आहे. पण त्याच्या मनात महाराष्ट्रातल्या सामाजिक परिस्थितीबद्दल संशोधन करून पुस्तक लिहिण्याची इच्छा आहे. बरीच वर्षे ते स्वप्न तो मनात धरून आहे. पण त्यावर काम मात्र सुरू करायला टाळाटाळ करतो आहे. त्याच्या संसारिक जीवनातही वादळ आलं आहे. त्याचा घटस्फोट झालाय. त्याच्या लहान मुलाचा ताबा त्याच्याकडे आहे. या परिस्थितीमुळे तो गांजला आहे. त्याचा आत्मविश्वास खचला. आपल्या आयुष्याकडे मागे वळून बघताना त्याला स्वतःचे दोषच दिसतायत. भावंडांसारखे आपण परदेशी स्थायिक झालो नाही. मित्रांसारखी भारीभरकम पगाराची नोकरी नाही. अंगात काही खास गुण नाहीत. एखादं ध्येय घेऊन त्याच्या मागे जाण्याची धडाडी नाही. आपण एक अपयशी व्यक्ती आहोत असं त्याच्या मनाने घेतलं आहे.

योगायोगाने कामाच्या निमित्ताने त्याला एका यशस्वी व्यक्तीची मुलाखत घेण्याची संधी मिळते आणि त्यातून स्वतःच्या आयुष्याकडे, स्वतःच्या गुणांकडे बघण्याची नवी उमेद त्याला प्राप्त होते. आपण स्वप्न बघूया, त्याचा ध्यास घेऊया याकडे त्याचा कल होतो. आणि तो कामाला लागतो. पण पुढचा प्रवास अगदी सुखकर व त्याच उत्साहात होतो असं नाही. त्याला स्वतःच्या स्वभावाशी, स्वतःच्या परिस्थितीशी झगडावं लागतं. पुन्हा पुन्हा प्रेरित व्हावं लागतं. तिथेही त्याला मोटिवेशनल स्पीकर/प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांची पॉडकास्ट उपयोगाला येतात. प्रत्येकाकडनं काही ना काही शिकत तो पुढे प्रवास करतो. धडपडत राहतो. कौटुंबिक आयुष्यातही
 एकीकडे त्याला नवा जोडीदार मिळण्याची शक्यता तयार होते. दुसरीकडे जुनी मागे सोडलेली नाती पुन्हा भेटू लागतात. त्यातून नवा मानसिक संघर्ष तयार होतो. कादंबरीत ही प्रेमकथा समांतरपणे चालू राहते.

अनिकेतचं पुस्तक पूर्ण होईल का? झालं तर चांगलं खपेल का? पुढे पुढे तो पुस्तक लिहीत राहील का? त्याला नवा जोडीदार मिळेल का? कोण असेल तो? हे सगळं समजून घेण्यासाठी तुम्हाला पुस्तक वाचावे लागेल.
काही पाने उदाहरणादाखल.

उद्योजक चौगुले यांच्याबरोबर झालेल्या संवादाचा प्रसंग.

त्याची शेजारीण अमृता तिच्याबरोबर सलगी वाढत असते तेव्हाचा एक प्रसंग. आई-वडील, मुलगा, अमृताची इच्छा, स्वतःचं मन अशा सगळ्या गोष्टींची संगती लावायची धडपड


पुस्तकाचे लिखाण करत असताना काही तांत्रिक गडबडीमुळे सगळं लेखनच डिलीट होऊन जातं तेव्हाचा प्रसंग आणि त्यात एका पॉडकास्ट चा उल्लेख


पूर्णपणे खचलेला, निराश झालेला नायक आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करू लागतो याचं भावपूर्ण, संतुलित व पटेल असं चित्रण या कादंबरीत आहे. "मोटिवेशनल स्पीकर्स"चे भाषण ऐकून आलेले "मोटिवेशन" थोडा वेळ जरी टिकलं तरी त्यातून लांब पल्ल्याच्या बदलाची बीजं रुजू शकतात. त्यावर काम करत राहिलं तर बदल घडू शकतो; हे सांगणारं हे पुस्तक आहे. त्याच वेळी स्वतःत बदल केला तरी हमखास यश येईलच असं नाही. परिस्थिती व नशीब यासारखे आपल्या हातात नसणारे घटकही तितकेच महत्त्वाचे असतात हेही आपसूक सुचवलं आहे.
स्वतःला सर्वसामान्य समजणाऱ्या माणसाने असामान्य होण्यासाठी प्रयत्न केले तर चांगलीच गोष्ट आहे. पण किमान त्याने आपल्यात असलेल्या गुणांचा जास्तीत जास्त विकास करत राहावा. अडचणी आल्या तरी न थांबता पुढे पुढे तरी जात राहावे. जमेल तितकी प्रगती करावी असा सकारात्मक दृष्टिकोन देणारं पुस्तक आहे. लेखक पॉडकास्टर असल्यामुळे त्यांनी नायकाच्या आयुष्यात या पॉडकास्टचं महत्त्व दाखवून या माध्यमाकडेही वाचकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.

कादंबरी मधले प्रसंग आपली उत्सुकता टिकून ठेवणारे आहेत. ललित लेखनाच्या माध्यमातून "सेल्फ हेल्प" प्रकारचे ज्ञान असा वेगळा प्रयोग लेखक नचिकेत यांनी केला आहे. वाचकांना तो भावेल असं मला वाटतं.

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

माझी जन्मखेप (Mazi Janmkhep)



पुस्तक - माझी जन्मखेप (Mazi Janmkhep)
लेखक - मनोज शिंगुस्ते (Manoj Shinguste)
भाषा - मराठी
पाने - १४१
प्रकाशन - रायटर पब्लिकेशन, डिसेंबर २०२५
छापील किंमत - रु. २९०/-
ISBN - दिलेला नाही


पुणे पुस्तक महोत्सवाला १३ डिसेंबर पासून फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रांगणात सुरुवात झाली. १४ डिसेंबरला रविवारी मी तिथे बराच वेळ होतो. वेगवेगळ्या दालनांना भेट दिली. सध्या गाजणारा युवा लेखक नितीन थोरात यांच्या रायटर पब्लिकेशनच्या दालनालाही भेट दिली. तिथे त्याच्या पुस्तकांबरोबरच एक वेगळं पुस्तक दिसलं. "माझी जन्मखेप". लेखक मनोज शिंगुस्ते . पुस्तकाचे मुखपृष्ठ व पाठमजकूर बघून, पुस्तक चाळून लक्षात आलं की हे एक विनोदी पुस्तक आहे. ह्या लेखकाचे हे पहिलेच पुस्तक आहे. माझ्या वयाची तरुण लेखकांचं लेखन वाचण्याची मला नेहमीच उत्सुकता असते. विशेषतः पौराणिक किंवा ऐतिहासिक कादंबऱ्यांपेक्षा ते लेखन जर आजच्या जगण्यावर आधारित किंवा भविष्यवेधी असेल तर त्याबद्दल जास्त उत्सुकता वाटते. त्यामुळे हे पुस्तक लगेच विकत घेतलं.
नितीन आणि मनोज दोघांबरोबर फोटोही काढला.

घरी आल्यावर लेखक मनोज शिंगुस्ते कोण आहे याचाही जरा सोशल मीडिया वरती शोध घेतला. तेव्हा असं कळलं की मनोज चं स्पायसीकिक (spicykick) नावाचं instagram handle आहे. त्यात तो पुणे परिसरातील वेगवेगळी खाण्याची ठिकाणं , हॉटेल, स्थानिक उद्योग वगैरेंची माहिती लोकांना देतो. त्यात त्याची पत्नी आणि पुतण्या - बारक्या - असतात.
त्याची reel बघताना त्याच्या शाब्दिक कोट्या, समालोचन केल्यासारखी शैली आणि स्वतःचा झालेला पचका, बारक्याकडून झालेला अपमान असे विनोदी पैलू दिसले. रीलमधली माहिती आणि विनोद ह्यामुळे तो चांगलाच प्रसिद्ध आहे. जवळजवळ तीन लाख फॉलोवर्स. थोडक्यात आजच्या पिढीतला तो रील स्टार आहे. माझं रील बघणं फार कमी होतं आणि माझ्या आवडीचे विषय थोडे वेगळे असल्यामुळे मनोज बद्दल मला माहिती नव्हती यात काही विशेष नाही.

तर अशा मनोजने मनोगतात त्याच्या लेखनाच्या उर्मीबद्दल लिहिलं आहे. रील करताना काही मिनिटांच्या आत सगळं सादरीकरण करावं लागतं. त्याची सवय असतानाही मनोजने मोठ्या विनोदी कथा लिहिल्या हे कौतुकास्पद वाटलं. त्यामुळे रात्री आल्या आल्या हे पुस्तक वाचलं आणि एका बैठकीत वाचून पूर्णही केलं. वाचताना मजा आली.

या पुस्तकात मनोज स्वतःच निवेदक आहे. एक रीलस्टार म्हणून त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या गमतीजमती, फजिती या माध्यमातून आपल्यासमोर छान विनोद निर्मिती केली आहे. प्रसिद्ध व्यक्ती असताना विशेषतः तरुणांच्यात प्रसिद्ध असताना चाहत्यांच्या अतिउत्साहामुळे किंवा काहींच्या विचित्र स्वभावामुळे अनवस्था प्रसंग ओढवतो हे काही कथांमध्ये आहे. तर काही वेळा उलट घडतं की आपण प्रसिद्ध आहोत, आपल्याला सगळे ओळखतात ,आपलं कौतुक होईल या भावनेतून एखाद्या ठिकाणी गेल्यावर फार मोजकेच लोक ओळखतात किंवा जे ओळखतात त्यांनाही फार विशेष कौतुक वाटत नाही. आणि मग कसा हिरमोड होतो त्याच्या मजेशीर घटना पुस्तकात आहेत.

पुस्तकात एकूण दहा गोष्टी आहेत प्रत्येक गोष्टीबद्दल अगदी थोडक्यात सांगतो.

लय मोठा गेम - मनोजच्या स्वतःच्या गावात निवडणुकीच्या प्रचाराला "स्टार प्रचारक" रूपात
त्याला बोलावलं जातं. पण रिल सटार म्हणून त्याचे चाहते महाराष्ट्रभर असले तरी प्रत्यक्ष गावात चाहते मतदार फारच कमी आहेत हे लक्षात येतं. लोकांना आकर्षित करायसाठी दुसरा नाचगाण्याचा कार्यक्रम ठेवायची टूम निघते आणि स्टार प्रचारकाचा "को-स्टार प्रचारक" होतो आणि काय धमाल उडते.

"पुण्याचा फेमस फुडगॉगल" - वडिलोपार्जित जमिनीच्या कामासाठी गावी जाताना त्याला भेटतात उत्साही युट्यूब वाले. त्यांच्या उत्साहाने नाकी नऊ येतात. प्रवास खड्ड्यांनी त्रासदायक. त्यावर कडी म्हणजे त्याला गावात भेटलेली आजीबाई. त्याला फुफुड ब्लॉगर च्या ऐवजी "फूडगॉगल" म्हणत राहते. पण अशी बाई अडाणी, भोळी म्हणावी का तिच्या वागण्यातून बेरकी.. वाचून तुम्हीच ठरवा.

"लॉर्ड ऑटो" - मनोज गाडी विकत घेतो. घरच्यांना सरप्राईज म्हणून कुठली गाडी आहे हे न सांगता त्यांना शोरूम मध्ये नेतो. आपला मुलगा, काका, दीर एवढा लाखो फॉलोवर असणारा स्टार व्यक्ती गाडी घेणार म्हटल्यावर सगळ्यांच्या अपेक्षा प्रचंड उंचावतात. त्यांची अपेक्षा आणि सत्य वेगळं आहे हे सांगायचा तो प्रयत्न करतो. पण घरचे कुठे ऐकायला तयार.


"रेश्मा लॉज"- अचानक पोलीस स्टेशन मधून फोन येतो की तुमच्या भावाने दारू पिऊन एका म्हाताऱ्याला उडवले आहे. त्याला सोडवायला या. आता हा भाऊ कोण याचा विचार करत, मनोज तिकडे पोचतो, पोलिसांना पटवून त्याला बाहेर काढतो त्या सगळ्या प्रसंगाची धमाल.

"पुरुष म्हणजे नेमकं काय?"- व्हिडिओ, सोशल मीडिया चाहते, घरातली वादावादी या गडबडीतून जरा निवांत बसावं म्हणून मनोज एका डोंगरावर जातो. तिकडे त्याला भेटतो एक वल्ली गावकरी. बोलण्या बोलण्यातून तो स्टारगिरीतली हवाच काढतो आणि मनोजला जमिनीवर आणतो. पण नंतर पुन्हा हवेत कसं नेतो त्याची धमाल.

"मैतं रे मैतं"- एका नातलगाच्या अंत्यसंस्काराला गेल्यावर तिथल्या गावातल्या चाहत्यांनी मांडलेला उच्छाद , अतिउत्साहात अंत्यसंस्काराचाच बट्ट्याबोळ.

"टॉम लिब्सन गिअर" - एका हॉटेलमध्ये शूटिंगसाठी गेला असताना तिथला मालक त्याला एक कुत्रा भेट देतो. कुत्र्याचं नाव. मनोजला आणि कुटुंबीयांना नको असताना कुत्रा गळ्यात पडतो आता हे विकतच दुखणं कसं मिटवायचं ह्याची उलाढाल.

"व्यासपीठ मानापमान नाट्य"- रीलस्टार म्हणून पाहुणा म्हणून "कार्यक्रमाची सुपारी" मिळाली. पण जेमतेम काहीतरी मानधन आणि आणि तिथली प्रसिद्धी सुद्धा आज स्थानिक राजकारण हायजॅक केली तर कशी होईल तगमग. खास पाहुणचार होईल असं वाटत असताना पोलिसांनीच पकडलं तर ?

"सुका पाटील"- नातेवाईकांचा फोन आला मामा आजारी आहेत. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर कळलं मामांना प्रसूती गृहात नेलं आहे. म्हणजे मामाच गरोदर आहेत ? काय आहे भानगड ?

"अकलेचा कांदा" - फुडब्लॉगिंग करताना वेगवेगळ्या हॉटेलमध्ये भेटी दिल्या जातात. तिथले पदार्थ चाखले जातात. ते पदार्थ कसे वाटतात ते व्हिडिओमध्ये मनोज सांगतो. पण इतके पदार्थ चाखायचे म्हटल्यावर सगळे पदार्थ पोटभर थोडेच खाता येणार सगळं थोडं संपवता येणार मग काय बर करायचं?

अशा या वेगवेगळ्या कथा सूत्रांवर आधारलेल्या गोष्टी आहेत. चार पाने उदाहरणादाखल देतो जेणेकरून त्याच्या शैलीची कल्पना येईल.

मोठ्या गाडीबद्दलच्या कल्पनांच्या उड्यांवर उड्या


अंत्यसंस्कारातले अतिउत्साही चाहते


शाब्दिक कोट्यांची धमाल आणि प्रासंगिक विनोद आहेत. काही ठिकाणी द्वयर्थी वाक्ये आहेत; पण अगदी मोजकीच. थेट अश्लीलता आलेली नाही. सध्याच्या स्टँड अप विनोदवीरांना अश्लीलता आणि शिव्या यांशिवाय विनोद करता येत नाही. मनोजने मात्र ती निसरडी वाट टाळलेली आहे. रील स्टार ही तशी अलीकडची सामाजिक पदवी. त्याचे अनुभव हे खास आजचे, आत्ताच्या पिढीचे आहेत. त्यामुळे  पुस्तकातल्या प्रसंगांशी आपण लगेच जोडले जाऊ शकतो. प्रमाण मराठी, गावाकडची बोली दोन्हीचा खुबीने वापर केला आहे. शहर आणि गाव ह्यातल्या कमी होत जाणारं सामाजिक अंतर आपोआप ह्यात टिपलं गेलंय. पुस्तक प्रसन्न आहे. निखळ करमणुकीसाठी, आजच्या पिढीचं लेखन वाचण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचा. 

मनोजला त्याच्या पुढच्या लेखनाच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा !!


——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

मुक्ति पथावर (Mukti Pathavar)

पुस्तक - मुक्ति पथावर (Mukti Pathavar) लेखक - स्वामी आत्मानंद पुरी (Swami Atmanand Puri) अनुवाद - ब्रह्मचारी एकनाथ (Brahmachari Ekanath) भाष...