चित्तर-बित्तर (Chittar-Bittar)




पुस्तक - चित्तर-बित्तर (Chittar-Bittar)
लेखिका - सारिका कुलकर्णी (Sarika Kulkarni)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १५९ 
प्रकाशन - ग्रंथाली प्रकाशन, मार्च २०२६ 
छापील किंमत - ३००/- रुपये 
ISBN - 978-93-5650-557-5

दैनंदिन आयुष्यामध्ये आपण 
बऱ्याच लोकांना वरचेवर भेटत असतो. आपले शेजारी, नोकरीव्यवसायातले सहकारी, आजूबाजूचे दुकानदार, रिक्षावाले, सफाईकर्मचारी, घरकाम करणाऱ्या बायका, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, सुतार वगैरे वगैरे. बहुतेकांची नाव-व्यवसाय आपल्या लक्षात असतात. पण व्यक्ती लक्षात राहण्याची पुढची पायरी म्हणजे तिचं व्यक्तिमत्त्व लक्षात राहणं. हे मात्र फार थोड्या लोकांच्या बाबतीत घडतं. ज्या माणसांच्या वागण्यात, बोलण्यात, हावभावात, हातवाऱ्यात काही वैशिष्ट्य असतं ती माणसं नमुनेदार माणसं म्हणून मनात बसतात. कोणाचं बोलणं सामान्यच असतं पण स्वभाव नमुनेदार असतो म्हणून लक्षात राहतात. अशी माणसं जेव्हा भेटतात तेव्हा त्यांच्या गमतीजमती किस्से हे आपल्याला इतरांनाही सांगावेसे वाटतात. सारिका कुलकर्णी यांचं "चित्तर बित्तर" पुस्तक अशाच नमुनेदार माणसांचे किस्से आपल्याला सांगून आपली करमणूक करणारं आहे.

यात १९ नमुनेदार माणसांची ओळख करून दिली आहे. या पुस्तकात आपल्याशी बोलणाऱ्या निवेदिकेचे आडनाव कुलकर्णीच आहे. श्री. व सौ. कुलकर्णी आणि त्यांची मुलगी हे पुण्यातल्या शांतिप्रसाद सोसायटीत राहतायत.  सोसायटीतले त्यांचे लक्षात राहणारे शेजारी, कुलकर्णी बाईंच्या ऑफिसमधले सहकारी ह्यात आहेत. प्रवासानिमित्त बाहेरगावी गेल्यावर भेटलेली, लक्षात राहिलेली माणसे सुद्धा आहेत. चालण्याबोलण्याच्या विशिष्ट लकबी किंवा वेशभूषा काहीतरी विचित्र आहेत असं वर्णन करून इथे विनोद साधला नाहीये तर व्यक्तींचे स्वभाव व त्याच्या अतिरेकामुळे लक्षात राहणारे प्रसंग अशा पद्धतीचे वर्णन आहेत. यातलं कोणीच खलनायक पद्धतीचं अवगुणी नाही. उलट बहुतेक सगळे मनाने चांगले आणि सुसंस्कृतच आहेत. पण त्यांचा चांगुलपणा, प्रेम, पुढाकार घ्यायची वृत्ती किंवा मदत करायची वृत्ती बऱ्याच वेळा "आता यांना आवरा !!" असं म्हणायला लावणारी आहे.

कोण कोण बरे दिसतय याच्यात ? काही वल्लींची ओळख करून घेऊया ..

पाटील - सोसायटी मधल्या सर्व कामांत पुढाकारघेणारे श्री. पाटील. सोसायटीचा गणपती-नवरात्र असो की कुठला कार्यक्रम. सगळी व्यवस्था स्वतः बघणारे, प्रसंगी स्वतःचे पैसे खर्च करणारे पाटील. समोर काम दिसलं, काही अडचण दिसली की स्वतःहून परिस्थितीचा ताबा ते घेतात. काही वेळा समोरच्याला अवघडल्यासारखं झालं तरी त्याकडे अजिबात लक्ष न देता... याचे मजेशीर किस्से यात आहेत

रोतीजा - "रोती जा". बाई तू रड! काही दुःखद वाईट बातमी ऐकली की हुकमी रडू येणारी ऋतुजा. कुलकर्णी काकूंची ऑफिसमधली सहकारी. ऋतुजाच्या वेळी अवेळी रडण्याने निर्माण होणारे अनावस्था प्रसंग छान दाखवले आहेत.

विनोद - लहानपणापासून वडिलांच्या स्टेशनरी दुकानात काम करणारा, वह्यापुस्तकात राहूनही अभ्यासात चमक दाखवू न शकलेला पण इतरांच्या अभ्यासाची मात्र काळजी करणारा विनोद.

सेवाव्रती जोशी काकू - बिल्डिंग मधल्या प्रत्येक अडल्यानडल्या माणसाला मदत करणं, लोकांना आवडीचे पदार्थ करून खायला घालणं आणि त्या बदल्यात कुठलीही अपेक्षा न ठेवणं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जोशी काकू. या काकूंनी कोणाकोणाला आणि कशीकशी मदत केली, काकूंच्या या स्नेहाने गुदमरून जाण्याचे प्रसंग तिऱ्हाइतांनाही कसे आले कसे याचे प्रसंग या लेखात आहेत.

"मी काकू"जोशीकाकूंच्या उलट, काही न करता प्रत्येक गोष्टीचं श्रेय घेण्यासाठी पुढे पुढे करणाऱ्या "मी काकू" सुद्धा पुस्तकात आहेत.

इथे बडबड करणाऱ्या फटकळ कामवाल्या चंद्रा मावशी भेटतील. प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमात समारंभात माइकचा ताबा आला की तो न सोडणारे "माइक"ल काका आपल्याला बोलून बोलून हैराण करतील. घरकामाची कंत्राटे घेणारे अप्पा स्वतःच्या कामाविषयीच्या अभिमानाने सांगतील. त्या दर्जाचं काम मजुरांकडून करून घेण्यासाठी शिव्या देऊन आपलं घर बांधतील आणि आपल्या मनातही घर करतील. पंजाबचे दिलखुलास "टिप्सी अंकल" वाहनाची काळजी घेतीलच, पुढे जाऊन परगावाहून आलेल्या माणसाला कायमचं आपलंसंही करतील. 

एकदाच भेट झालेले, पण ती भेट कायमची लक्षात राहिली अशाही काही भेटी आणि माणसे पुस्तकात आहेत. पर्यटन स्थळाची, तिथल्या माणसांची स्तंभूत माहिती असणारा पोरसवदा पितळे, टॅक्सीवाले भाडं नाकारतात म्हणून आवाज वाढवून मिळवून देणारा दमदार माणूस सुद्धा आपल्याला भेटेल.

अशी नाना रंगाची नाना ढगांची चित्तरवित्तर माणसं या पुस्तकात आहेत. ह्याला साजेसे असे मुखपृष्ठ आहे. 
पेनातून बाहेर पडलेले विविधरंगी ठिपके, नावामागचे रंगबेरंगी फरांटे आहेत. पुस्तकाच्या मुखपृष्ठवरच सर्वांची नावे अर्थात अनुक्रमणिका देण्याचा वेगळा प्रयोग केला आहे. पुंडलिक वझे ह्यांनी मुखपृष्ठ केले आहे. तर मजकूराबरोबर असणारी चित्रे आशुतोष वाळे ह्यांची आहेत. "मार्मिक" नियतकालिकात ही लेखमाला प्रकाशित झालेली आहे. 

पुस्तक वाचताना खदखदून हसायला येईल असं नाही पण चेहऱ्यावर स्मितहास्य फुलून, वाचनाचा आनंद नक्की मिळेल. विनोदी लिहिलंय म्हणजे ते पोरकट, हलकं आहे असं वाचकांना वाटायला नको म्हणून मुद्दामून काहीतरी गांभीर्य आणायचा किंवा करुणादायक डोळे पाणवणारा शेवट करायचा प्रयत्न केलेला नाही. हे छानच.

व्यक्तिचित्रण म्हटल्यावर पुलंच्या "व्यक्ती आणि वल्लीशी" तुलना मनात सुरू होणे स्वाभाविक आहे. पण एकदोन लेख वाचल्यावर लक्षात येतं ही दोन्हीचा बाज पूर्णपणे वेगळा आहे. "व्यक्ती आणि वल्ली" मधले लेख दीर्घ आहेत. त्यात  व्यक्तीच्या आयुष्यातले वेगवेगळ्या कालखंडात घडणारे प्रसंग आहेत. वल्लीपणा मागच्या प्रेरणांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न आहे. पण सदर पुस्तकाचा उद्देश वेगळा आहे. या पुस्तकातले लेख हे आकाराने लहान आहेत. मर्यादित कालावधीत समोर घडणाऱ्या प्रसंगांतून निखळ मनोरंजन करणारे आहेत. शब्दयोजना वर्णन शैलीसुद्धा वेगळी आहे.

काही पाने उदाहरणादाखल

लेखिकेबद्दल पुस्तकात दिलेली माहिती.



चौकशा करून भंडावून सोडणारे भोसले.... लेखांमध्ये "मी काय म्हणते ..." असं म्हणत शेवट करण्याची लेखिकेने वापरलेली स्टाईल्



माइकल काका



चित्रविचित्र व्यवसाय करून बघण्याची आवड असलेली एकता.



लेखिका आणि मी, दोघेही "पुस्तकप्रेमी" नावाच्या साहित्यविषयक उपक्रमाचे सदस्य आहोत. मे २०२६ मध्ये आमच्या पुस्तकप्रेमी समूहाचे संमेलन कराड येथे साजरे झाले. तिथे थेट लेखिकेकडून पुस्तक विकत घेण्याची संधी मिळाली. तेव्हाचा हा फोटो.


संमेलनात सारिकाताईंनी "टिप्सी अंकल" ह्या लेखाचं अभिवाचन केलं होतं. त्यांच्या तोंडून व्यक्तिचित्रण ऐकायला मजा आली. त्याची युट्युब लिंक 

पुस्तक वाचताना आपल्या आजूबाजूला सुद्धा अशी माणसं आहेत हे सतत वाटत राहील. जणू आपल्याच ओळखीच्या जोशी काकूंना, पाटील काकांना, आपल्याच प्लंबर आप्पांना किंवा असंख्य चौकशा करणाऱ्या आपल्याच नातेवाईकाला ही लेखिका भेटली होती काय असं वाटेल. आपण सुद्धा असं शब्दांकन करावं अशी ही प्रेरणा पुस्तक वाचून मिळू शकेल.

लेखिकेची शैली उसनी घेऊन ... मी काय म्हणतो, तर हे पुस्तक हातात घ्या, कुठलाही लेख काढा, वाचा आणि निर्विष विनोदाचा आनंद घ्या.

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

मर्चंट ऑफ व्हेनिस (Merchant of Venice) , मॅकबेथ (Macbeth)








१) पुस्तक - मर्चंट ऑफ व्हेनिस (Merchant of Venice)
लेखक - विल्यम शेक्सपियर (William Shakespeare)
अनुवादक - शिरीष सहस्रबुद्धे (Shirish Shasrabuddhe)
भाषा - मराठी 
मूळ पुस्तकाची भाषा - इंग्रजी 
पाने - १२७
प्रकाशन - वैशाली प्रकाशन. एप्रिल २०२६
ISBN 978-93-48129-53-6
छापील किंमत - रु. ३००/-

२) पुस्तक - मॅकबेथ (Macbeth) 
लेखक - विल्यम शेक्सपियर (William Shakespeare)
अनुवादक - सुरश्री जोशी (Surashri Joshi)
भाषा - मराठी 
मूळ पुस्तकाची भाषा - इंग्रजी 
पाने - ११०
प्रकाशन - वैशाली प्रकाशन. एप्रिल २०२६
ISBN 978-93-48129-71-0
छापील किंमत - रु. ३००/-

शेक्सपियर हा इंग्रजीतला विख्यात नाटककार. जगप्रसिद्ध नाटककार. सोळाव्या शतकात हा नाटककार होऊन गेला असला तरी त्याच्या नाटकांची मोहिनी अजूनही जगभरातल्या नाट्यप्रेमींवर, साहित्यप्रेमींवर, भाषाप्रेमींवर आहे. त्या नाटकांचे प्रयोग अजूनही होतात. त्या नाटकांची जगभरातल्या भाषांमध्ये भाषांतरे होतात. रूपांतरे होतात. मूळ नाटकातली भाषा पाचशे वर्षांपूर्वीची जुनी इंग्रजी असल्यामुळे ती जुनी नाटकं जशीच्या तशी वाचायला घेतल्यावर प्रत्येकालाच समजतील असं नाही. पण त्या नाटकांच्या कथानकांबाबत उत्सुकता आपल्या सर्वांनाच असते. अशावेळी या नाटकांचे मराठीमध्ये असलेले भाषांतर नक्की उपयोगी पडतं.

मराठी भाषेतही वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या कालखंडात ही नाटके भाषांतरित केलेली आहेत. पण आता त्या भाषांतरित पुस्तकांमधली मराठी भाषा सुद्धा थोडी जुन्या वळणाची, कदाचित क्लिष्ट वाटू शकेल. त्यामुळे आजच्या मराठीत, सोप्या मराठीत शेक्सपियरचे साहित्य भाषांतरित झाले तर ती मराठी वाचकांसाठी आनंदाची बाबच आहे.

२३ एप्रिल हा शेक्सपियर चा जन्मदिवस आणि मृत्यू दिवस. म्हणूनच तो जागतिक पुस्तक दिवस म्हणूनही साजरा केला जातो. यावर्षी(२०२६) मध्ये २३ एप्रिल च्या मुहूर्तावर वैशाली प्रकाशनने शेक्सपियरच्या सहा नाटकांची आजच्या आणि सोप्या मराठीत नव्याने भाषांतरे प्रकाशित केली आहेत. मी त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो आणि तेव्हा ती सहाही पुस्तके विकत घेतली. त्यातली दोन वाचून झाली. त्याबद्दल आता लिहितो. सुरुवातीलाच स्पष्ट करतो की, नेहमीप्रमाणे हे माझे पुस्तक परीक्षण नाही; तर नव्याने आलेल्या पुस्तकांची माहिती आणि मी ती वाचली याची वाचन नोंद आहे.

"मर्चंट ऑफ व्हेनिस" या नाटकात एक ज्यू सावकार, एक ख्रिश्चन व्यापारी, व्यापाऱ्याचा मित्र आणि मित्राची प्रेयसी अशी पात्रे आहेत. ज्यू सावकार - शायलॉक - आपल्या धंद्यात पक्का आहे. दिलेले कर्ज वसूल करण्यात तो वाकबगार आहे. कर्ज फेडू न शकणाऱ्यांकडून कसंही करून तो पैसा मिळवतोच. त्यामुळे लोकांचं त्याच्याबद्दलचं मत, तो एक दुष्ट,लोभी, पाषाणहृदयी माणूस आहे, असं झालं तर नवल नाही.

या उलट ख्रिश्चन व्यापारी - अँटोनियो - लोकांना बिनव्याजी कर्ज देतो. सावकाराची कर्ज फेडायला मदत करत असतो. त्यामुळे शायलॉक अँटोनीयोवर डूख धरून आहे.

पुढे परिस्थिती अशी होते की अँटोनियो मित्रासाठी शायलॉक कडून कर्ज घेतो. कर्ज फेडलं नाही तर अँटोनियोला भयंकर शिक्षा होईल अशा शर्ती ठरतात. मित्राला ते कर्ज फेडणं का शक्य होत नाही, त्या भयानक अटी काय असतात आणि त्या भयानक अटींपासून त्याची सुटका कशी होते हे सगळं नाट्य म्हणजे "मर्चंट ऑफ व्हेनिस".

काही पाने उदाहरणादाखल

मित्राची प्रेयसी पोर्शिया या पात्राच्या स्वयंवराच्या वेळचा पण आणि मोरोक्कोच्या राजपुत्राचा त्याला प्रतिसाद.


कर्ज वेळेत फेडू न शकल्याने ठरवलेली जीवघेणी शिक्षा अँटोनियोला मिळालीच पाहिजे यासाठी हट्टाला पेटलेल्या शायलॉकचे संवाद.



दुसरं नाटक मी वाचलं ते "मॅकबेथ". स्कॉटिश राजा डंकनचा सरदार मॅकबेथ. मॅकबेज अतिशय शूरवीर धडाडीचा आणि डंकनचा विश्वासू सरदार. पण आपल्या बायकोच्या हट्टाला बळी पडून तो डंकनचा स्वतःच्या घरी खून करतो. स्वतः राजा बनतो. डंकनची मुले परागंदा होतात. इतर सरदारांचेही खून घडवले जातात. राज्यात असंतोषाचे वातावरण पसरतं. अराजक निर्माण होतं. मॅकबेथ आणि त्याची पत्नी कपटाने मिळवलेलं यश मनापासून उपभोग होऊ शकत नाहीत. आपल्या अपराधाची टोचणी त्यांच्या मनात सतत सलत असते. जुन्या राजाशी प्रामाणिक सरदार मॅकबेथविरुद्ध उठाव करायचं ठरवतात. शौर्य, विश्वासघात, पश्चाताप, महत्वकांक्षा, बंड, राजनिष्ठा या सगळ्याचं नाट्य म्हणजे "मॅकबेथ".

काही पाने उदाहरणादाखल.
मॅकबेथ नाटकातल्या प्रसिद्ध चेटकिणींची गुरु हेकेट चा संवाद


खून केल्यानंतर मॅकबेथ आणि त्याच्या बायको मधला संवाद




वरच्या दोन परिच्छेदात मी थोडक्यात कथानक सांगितले आहे. पण या ढोबळ कथानका पलीकडे प्रत्येक पात्र, त्याची वैचारिक व मानसिक भूमिका, त्यांचे संघर्ष हे सगळं तितकंच महत्त्वाचं आहे. गेली चारशे वर्ष हजारोंनी साहित्यप्रेमी साहित्यअभ्यासक शेक्सपियरच्या साहित्याचा अभ्यास करतायत, प्रबंध लिहितायत, पीएचडी करतायत. त्यामुळे मी त्यावर नव्याने स्वतंत्रपणे काही लिहावं इतका माझा अभ्यास नाही.

पण ह्या पुस्तकांमुळे मराठीत ही नाटके वाचायला मिळाली, त्याचं कथानक समजलं, त्यातली गुंतागुंत थोडक्यात लक्षात आली हेही नसे थोडके.

दोन्ही अनुवादकांनी उत्तम अनुवाद केला आहे. मुळातच ही नाटके आहेत त्यामुळे भाषा थोडी नाटकी असणारच. तिचं मराठीकरण करताना तो नाटकीपणा, औपचारिकपणा मराठीत येणं ही स्वाभाविक आहे. मूळ नाटकातली भाषा पद्य स्वरूपाकडे झुकणारी आहे. पण इथे तसा तंतोतंत अनुवाद, यमक जुळवत पद्य स्वरूपातला अनुवाद न करता थेट गद्य स्वरूपातच संवाद आहेत. त्यामुळेच ते वाचायला आणि कथानक समजून घ्यायला सोपं आहे.
दोन्ही पुस्तकांच्या प्रस्तावनेत अनुवादक शिरीष सहस्त्रबुद्धे यांनी नाटकातल्या प्रतिमा, पत्रांच्या वर्तनातले ताणेबाणे, शेक्सपियरची शैली याबद्दल थोडक्यात निरीक्षणे मांडली आहेत. त्या दोन्ही प्रस्तावना वाचनीय आहेत.

शेक्सपियरच्या साहित्याबद्दल उत्सुकता असणाऱ्या पण मूळ इंग्रजी वाचू न शकणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाने अवश्य वाचावं अशी ही दोन पुस्तके आहेत.

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

त्सुबाकी स्टेशनर्स (Tsubaki Stationers)

पुस्तक - त्सुबाकी स्टेशनर्स (Tsubaki Stationers)
लेखक - इतो ओगावा (Ito Ogawa)
अनुवाद - मयुरेश कुलकर्णी (Mayuresh Kulkarni)
भाषा - मराठी (Marathi)
मूळ पुस्तक - ツバキ文具店 (त्सुबाकी बुंगुतेन) Tsubaki Bunguten
मूळ पुस्तकाची भाषा - जपानी (Japanese)
प्रकाशन - कलासक्त. ऑगस्ट २०२५
छापील किंमत - रु. ५५०/-
ISBN- 978-81-944022-7-5

सध्याच्या संपर्कक्रांतीच्या जगात व्हिडीओ कॉल च्या माध्यमातून क्षणार्धात पृथ्वीवरच्या दुसऱ्या टोकावरच्या माणसाला बघून त्याच्याशी बोलता येतं. काही माहिती पाठवायची असेल तर व्हॉट्सअप, ईमेलद्वारे ती तात्काळ पाठवता येते. दुसऱ्याला मेसेज पोचले की नाही, त्याने वाचले की नाही हे सुद्धा समजते. त्यामुळे पूर्वीसारखं एकेमेकांना पत्र लिहायचं प्रमाण फारच नगण्य झालं आहे. तरीही ज्यांनी पूर्वी पत्र लिहिली आहेत त्यांना ते जुने दिवस आठवतात. गंमत अशी झाली आहे की; पत्र ह्या माध्यमाच्या मर्यादाच आता त्या माध्यमाची वैशिष्ट्य वाटतात. ईमेल आपण टाईप करतो, पत्र हाताने लिहितो. लिहिणाऱ्याचा वैयक्तिक स्पर्श त्याला असतो. ईमेल कितीही मोठा लिहू शकतो, कितीही मोठी अटॅचमेंट पाठवू शकतो. पण हाताने पत्र लिहिताना मजकुराला काही मर्यादा पडतात. दोन-तीन पाने लिहिली तरी किती मोठं पत्र लिहिलं आहे असं वाटणार. त्यामुळे कमी जागेत, कमी शब्दांत जास्तीत जास्त माहिती, मजकूर, भावभावना प्रभावीपणे मांडणे आवश्यक होते. लिहिणाऱ्याच्या विचारांचा, शब्दांचा तिथे कस लागतो. शब्दांव्यतिरिक्त पत्राचा कागद, त्यावरची नक्षी, सजावट, हस्ताक्षरातले बदल, त्यात काढलेली चित्र , रेघोट्या, पत्राबरोबर पाठवलेलं एखादं फूल, सुगंधाचा थेंब ह्यातून "शब्देविण संवादु"ही करता येतो. असं मनापासून लिहिल्यावर ते कधी पोचेल, वाचणाऱ्याला काय वाटेल, तो काय उत्तर देईल, त्याचं उत्तर कधी येईल ह्याची वाट बघावी लागते. "त्वरित प्रतिसादाच्या" instant gratification च्या जमान्यात असे वाट बघणे, झुरणे सुद्धा आपण विसरलो आहोत ते पुन्हा मिळवल्याचा अनुभव येईल.

पत्रलेखनाच्या ह्या वैशिष्ट्यांची जाणीव असणाऱ्या व्यक्तींभोवती फिरणारी ही कादंबरी आहे. जपानमध्ये टोकियोपासून जवळ असणाऱ्या कामाकुरा गावात घडणारी ही ही गोष्ट आहे. कमाकुरा अगदी खेडेगाव नाही पण खूप मोठे शहरही नाही. तिथल्या जुन्या मंदिरांमुळे ते पर्यटकांनाही भुरळ घालणारे समुद्राकाठचे छान गाव आहे. या गावात "त्सुबाकी स्टेशनर्स" नावाचं स्टेशनरीचं दुकान आहे. दुकान चालवणारी तरुण हातोको अमेमिया काही वर्षे परदेशात राहून आता जपानला परत आली आहे. दुकानाच्या वरच तिचं घर आहे. पूर्वी तिची आजी आणि ती तिथे राहायचे. पण काही महिन्यांपूर्वी तिच्या आजीचं निधन झाल्यानंतर ती पुन्हा जपानला आली आणि हे दुकान चालवायला लागली आहे. कागद, पेन्सिल, पेनं शालेय वस्तू दुकानात मिळतातच पण पत्रलेखन हे ह्या दुकानाचे वैशिष्ट्य आहे.

कामापुरा गावातल्या लोकांना आपल्या नातेवाईकांना, सहकाऱ्यांना, मित्र-मैत्रिणींना काही खास प्रसंगी पत्रच लिहाविशी वाटतात. वर म्हटल्याप्रमाणे, फोन ई-मेल यापेक्षा पत्रातून आपल्या भावना चांगल्या पोचतील असं त्यांना वाटतंय. पण पत्रलेखनाची सवय गेली असल्यामुळे म्हणा, भाषेवर तितकं प्रभुत्व नाहीये म्हणा किंवा अगदी हस्ताक्षर चांगलं नाही म्हणा अशा कारणांमुळे त्यांना ते पत्र स्वतः लिहायचं नाहीये. ते कोणाकडूनतरी लिहून घ्यायचे आहे. हे काम करायची हातोकोची आजी. पत्रलेखन करून घेणाऱ्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे, व्यक्तिमत्व कसं आहे, पत्र कोणाला पाठवायचं आहे, पत्रातून राग, लोभ, ताटातूट, विरह अशा कुठल्या भावना व्यक्त करायची आहे हे सगळं लक्षात घेऊन प्रत्येक पत्राला स्वतंत्र, अनोखं करण्याचा तिच्या आजीचा प्रयत्न असायचा. त्यामुळे त्या त्या प्रसंगाला साजेसा कागद, रंग, शाईचा कमीअधिक गडदपणा, पत्राची नक्षी, पत्राला लावायचा स्टॅम्प, पत्र घालायचा लिफाफा, हे सगळं सगळं वेगवेगळं असायचं. त्सुबाकी स्टेशनर्स कामाकुराच्या लोकांमध्ये जिव्हाळ्याचं होतं . ही कला आपल्या नातीतही उतरावी अशी आजीची मनापासून इच्छा होती. त्यामुळे लहानपणापासून हातोकोकडून चांगली अक्षरं गिरवून घेणं, पत्रलेखनाचे सर्व नियम सोपस्कार व संकेत तिने घटवून घेतले होते. आजीच्या माघारी हातोको आता पहिल्यांदाच स्वतंत्रपणे या कामात उतरलीये. आता तिला कोण कोण व्यक्ती भेटतात आणि किती वैशिष्ट्यपूर्ण पत्र तिला लिहावी लागतात याची ही गोष्ट आहे.

एक व्यक्ती येऊन सांगते की आमचा माझा आता घटस्फोट होणार आहे. आम्ही नवराबायकोने एकत्र चांगलं आयुष्य घालवलं. पण बायकोला दुसरा कोणीतरी आवडू लागला आहे. ते दोघं लग्न करणार आहेत. जे लोक माझ्या लग्नाला आले होते त्या सगळ्यांना आमच्या घटस्फोटाची बातमी कळवायची आहे. पत्रात आमच्या सहजीवनात घेतलेला आनंद दिसू दे. आमच्यात कटुता नाही पण घटस्फोट होतोय याचा खेद मात्र नक्की आहे. हे सगळं त्या पत्रातून येऊ द्या.

दुसरी एक व्यक्ती येते. तिला तिच्या तरुणपणीच्या प्रेयसीला पत्र पाठवायचं असतं. तो आणि ती दोघेही आता आपल्या संसारात रमले आहेत. परत एकत्र भेटण्याची शक्यता नाही. पण तरीही एकदा नुसती आठवण जगवायची इच्छा आहे. हे पत्र प्रेमपत्र वाटता कामा नये. माझ्या प्रेयसीच्या संसारात त्याने काही खळबळ माजू नये. आपल्या भावना तिच्यापर्यंत तरी पोचाव्यात. अतिशय तरल आणि कठीण कामगिरी हातोकोवर येते.

असे बरेच प्रसंग या कादंबरीत येतात. प्रत्येक वेळी ती कसा विचार करते, कुठले शब्द वापरते, कशी वाक्यरचना करते, कुठला कागद घेते, अक्षर कसं काढते, पेन शाई कशी निवडते हे सगळं वर्णन वाचत वाचत कादंबरी रंगते. पत्रलेखनाचे किस्से हा कथानकाचा एक भाग आहे. हातोकोचे आणि तिच्या आजीचे संबंध हा कादंबरीच्या प्रसंगांच्या पार्श्वभूमीवरती येणारा धागा आहे. हातोकोला तिची आजी एकटीने वाढवतेले आहे. हातोकोचे आई-वडील कोण हे आजीने तिला कधी सांगितलं नाही. आजही हातोको पत्रलेखन करत असली तरी लहानपणी जेव्हा आजी तिला शिस्त लावत होती, इतर मुलांप्रमाणे मजा करू न देता सतत अक्षर सुधारायचा सराव करायला लावत होती ते तिला आवडत नव्हतं. हळूहळू आजीबरोबर तिचे संबंध कटू होत गेले. ताणले गेले. ती आजीला सोडून परदेशी गेली. आजीच्या माघारी पत्रलेखन करायचं ठरवल्यावर तिला पदोपदी आजीने शिकवलेल्या गोष्टी आठवतात. आजूबाजूच्या लोकांच्या बोलण्यातून आजीबद्दलच्या काही गोष्टी कळतात. आपल्या ग्राहकांच्या भावना शब्दात मांडताना ती स्वतःच्या भावनांचाही नकळत विचार करते . आजीच्या आणि तिच्या नात्याचा पुन्हा पुन्हा विचार करते.

पत्रलेखनाच्या कामातून तिची काही वैशिष्ट्यपूर्ण लोकांशी ओळख होते. मैत्री होते. शेजारणीशी मैत्री होते. त्यांच्या गप्पा, कामाकुरात फिरणं, हॉटेलिंग करणं ह्यातून कामाकुरा गाव, तिथली शांतता, स्वच्छता, निसर्गसौंदर्य, जुनी मंदिरं, चेरीब्लॉसम प्लमब्लॉसम सारखी निसर्गाची लोभसवाणी रूपं, तिथली जीवनपद्धती हे सगळं नेपथ्य उभं राहतं. हे सगळं कादंबरीला आणि कथानकाला पोषकच आहे.

कादंबरी हळूहळू उमलत जाणाऱ्या फुलाप्रमाणे हातोकोचं व्यक्तिमत्व, तिचा भूतकाळ, तिच्या आजीचं व्यक्तिमत्त्व थोडं थोडं उलगडत एका सुंदर वळणावर येऊन पूर्ण होते. पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटले तसं नवरसांपैकी शांतरस हे या कादंबरीचं वेगळेपण आहे. कादंबरीत कुठेही फार मोठं नाट्यमय, धक्कादायक असं काही घडत नाही, तरी प्रत्येक पानात काही ना काही घडत असतंच. एकाच प्रसंगाचं विनाकारण तपशीलवार वर्णन करून पानंच्या पान भरली आहेत असंही नाही. पत्रलेखनाच्या कामातून वेगवेगळे किस्से आपल्यासमोर येतात. पण कुठलाही किस्सा ताणलेला नाही. पत्र सांगणाऱ्या व्यक्तीचे वर्णन, हातोकोची निवड प्रक्रिया आणि पत्राचा झालेला परिणाम असं समजून कथानक पुढे सरकतं. एखाद्या शांत जलप्रवाहात लहान नाव वल्हवत वल्हवत आपण आपल्याच गतीने हळूहळू पुढे सरकावं, आजूबाजूची दृश्य बघावी त्यापद्धतीच्या शांततेचा निवांततेचा अनुभव हे पुस्तक आपल्याला देतं. जपानी संस्कृती, तिथली खाद्यपद्धती, मंदिरं, पत्रलेखनाचे नियम व संकेत या गमतीजमतीही आपल्याला वाचायला मिळतात.

मयुरेश कुलकर्णी यांनी थेट जपानीतून मराठीत याचं भाषांतर केलं आहे. इंग्रजी पुस्तकावरून नाही. भाषांतर अप्रतिमच झालं आहे. फक्त मजकूरच नाही, तर नायिकेने लिहिलेल्या पत्रांमधली शब्दरचनासुद्धा त्या त्या पत्राला साजेशी अशी वेगळी वेगळी ठेवण्यात मयुरेशने यश मिळवलं आहे. वर्णनात जपानची भूमी आणि शब्दांत मराठी माती असा मिलाफ सुंदर जमला आहे.

काही पाने उदाहरणादाखल

लेखिकेची पुस्तकात दिलेली माहिती.


सासूबाईंना साठाव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पत्र लिहा.




नवीन वर्षाचे स्वागत करण्याच्या वेगळ्या समजुती



कामकुरातली भटकंती




कथानकात आलेल्या पत्रांमध्ये हातोकोने काय लिहिले याच बरोबरीने, कसं हस्ताक्षर काढलं आणि सरतेशेवटी ते पत्र कसं दिसलं हे समजणंसुद्धा वाचकासाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळे मूळ पुस्तकात जपानी हस्तलिखित पत्रांचे फोटो छापले आहेत. मयुरेशने सुद्धा देवनागरी लिपी वेगवेगळ्या पद्धतीने लिहून त्या पत्रांचे फोटो छापलेले आहेत. पुस्तक निर्मितीत, पुस्तक छपाईत हा एक वेगळाच प्रयोग आहे. मराठीतही उत्तमपणे साधला गेला आहे.

कथाबीज, कथा घडते ती जागा व तिथली संस्कृती आणि कादंबरीचा बाज या सगळ्यातच नेहमी वाचायला मिळणाऱ्या मराठी किंवा अनुवादित पुस्तकांपेक्षा खूप वेगळेपणा आहे. वैशिष्ट्य आहे. मराठी वाचकांसाठी हा अनुभव आणल्याबद्दल एक वाचक म्हणून आणि मराठी भाषा प्रेमी म्हणून मयुरेशचे व प्रकाशकाचे मनापासून आभार मानतो.

मयुरेशची पुस्तकात दिलेली माहिती


फेसबुक वर तृप्ती कुलकर्णी यांनी पोस्ट लिहून या पुस्तकाचा परिचय करून दिला होता. नंतर तन्वी राऊत हिने लिहिलेला परिचय मी वाचला होता. ते दोन्ही परिचय वाचून पुस्तक वाचायची इच्छा निर्माण झाली. पुस्तक विकत घेतलं आणि ते आवडलं. म्हणून तृप्तीजी आणि तन्वी यांचेही आभार. तृप्ती कुलकर्णी चालवत असलेल्या ऑनलाइन मुलाखती आणि सादरीकरण्याच्या उपक्रमात मागच्या महिन्यात मयुरेशची मुलाखत घेण्यात आली (Youtube link https://www.youtube.com/watch?v=IacLsc72JGM). तेव्हा तो या पुस्तकाबद्दल बोलला. जपानी पुस्तकांच्या वाचनाचे अनुभव, त्याची जपानी भाषेबद्दलची व जपानी साहित्याबद्दलची ओढ आमच्या लक्षात आली. म्हणून त्याने अजून उत्तमोत्तम जपानी पुस्तकांचा अनुवाद मराठीत करावा असा त्याला आग्रह करतो.

तुम्ही हे पुस्तक वाचा आणि तुमचा अनुभव मला नक्की कळवा.



——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

सफाई (saphai)




पुस्तक - सफाई (Saphai)
लेखक - सुमेध वडावाला रिसबूड आणि उत्तमकुमार जैन (Sumedh Wadawala Risbud & Uttamkumar Jain)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १३६
प्रकाशन - नवता बुक वर्ल्ड. ऑक्टोबर २०१३
छापील किंमत रु. १४०/-
ISBN - दिलेला नाही

सुमेध वडावाला रिसबूड ह्यांनी केलेले आत्मकथनांचे शब्दांकन अप्रतिम असते. त्यांची तशी तीन चार पुस्तके मी वाचली आहेत. त्या पुस्तकांची मी लिहिलेली परीक्षणे सुमेधजींनी वाचली होती. त्यांना ती आवडली. त्या ओळखीतून काही दिवसांपूर्वी त्यांना प्रत्यक्ष भेटायचा योग आला. भरपूर गप्पा झाल्या. माझ्या वाचनाला आणि पुस्तक परिचय देण्याच्या उपक्रमाला त्यांनी प्रोत्साहित केले. 



ह्यावेळी आत्मकथनाऐवजी त्यांनी लिहिलेली ललित कादंबरी वाचली. "सफाई" ही एक सामाजिक कादंबरी आहे. दलित वर्गातल्या आणि शहरात राहूनही शहरी प्रगतीपासून काहीशा तुटक राहिलेल्या समाजाची ही कहाणी आहे. हा समाज म्हणजे सफाई कामगार समाज आहे. गावोगावी शहरोशहरी स्वतः घाणीत उतरून स्वच्छतेचे काम करणारा, नागरिकांचे आरोग्य जपणारा हा समाज. घाणीत राहून समाजासाठी काम करणाऱ्या या व्यक्तींकडे बघण्याचा दृष्टिकोन खरं म्हणजे कृतज्ञतेचा असला पाहिजे. पण ह्या समाजातील व्यक्ती आजूबाजूला असेल तर त्या व्यक्तीलाच घाणीसारखं झटकून टाकण्याची प्रतिक्षिप्त क्रिया काही लोकांकडून घडते. तर दुसरीकडे सफाई कामगार समाजातले काही लोकसुद्धा शिक्षण, स्वच्छता,आरोग्य यासाठी उपलब्ध असलेल्या सरकारी सोयीसुविधा यांकडे दुर्लक्ष करून व्यसन, उधारी, वाईट संगती यांच्या दुष्टचक्रातच अडकून राहतात आणि पुढच्या पिढीलाही जबरदस्ती त्यात अडकवून ठेवतात. अशा दुहेरी सामाजिक परिस्थितीच्या खड्ड्यात रुतलेलं रथचक्र उद्धरण्याचं धाडस करू पाहणाऱ्या मायलेकींची ही गोष्ट आहे.

लक्ष्मी ही सफाई कामगार. तिची मुलगी समिधा. या दोघी कथेच्या नायिका. समिधाने दहावीची परीक्षा दिली आहे. लक्ष्मीचा नवरा फार विशेष काम करत नाहीये. तरी दारू आणि जुगाराच्या व्यसनापायी उधारी करत बायकोच्या जीवावर जगतोय. आजूबाजूच्या सगळ्या घरातली म्हणावी तर हीच स्थिती. या परिस्थितीतून बाहेर निघायचं तर मुलीने शिकलं पाहिजे यासाठी लक्ष्मी घरच्यांचा विरोध पत्करून मुलीला शिकवते आहे.

समिधा दहावीतलीच असली तरी मूळची समंजस, संवेदनशील स्वभावाची. बुद्धीने हुशार. त्यात वडिलांची व्यसनाधीनता, आई-वडिलांचं त्यावरून होणारं भांडण, तुटपुंज्या पगारात आईचं घर चालवणं. हे तिच्या चांगलं लक्षात आलं आहे. परिस्थितीने तिला जणू अकाली प्रौढ केलं आहे.

या दोघींच्या आयुष्यात घडणाऱ्या दोन-तीन महिन्यातल्या घटना येथे मुख्य आहेत आणि पात्रांच्या संवादातून लक्ष्मीच्या तरुणपणाच्या, तिच्या सासूच्या काही गोष्टी कळतात. त्यांच्या वस्तीची एकूणच वैचारिक दयनीयता लक्षात येते. घर आणि नोकरी सांभाळताना लक्ष्मीची होणारी तारांबळ, कमीत कमी पैशात घर चालवणं याचा ताण, समिधासाठी पुरेसा खर्च आपण करू शकत नाही याची अपराधीपणाची भावना याचं मनोज्ञ चित्रण आहे. तर केवळ कुंकवाला आधार असणाऱ्या नवऱ्याची चिडही येते, जुने सुखाचे क्षण आठवून आपलेपणाही वाटतोय, त्याच्या व्यसनाला पैसेही द्यावे लागतायत आणि आता व्यसनाशिवाय दुसरं तो काय करणार असा समंजसपणाही मनात येतो. लक्ष्मीच्या मनाची ही विदीर्ण अवस्था छोट्या छोट्या प्रसंगातून आपल्यासमोर पूर्णपणे उभी राहते.

समिधाला मात्र वडिलांचा मनस्वी तिरस्कार वाटत असतो. ती तो स्पष्टपणे बोलूनही दाखवते. बाप-मुलगी, आई-मुलगी आणि नवरा-बायको अशा त्रिकोणातली ही रस्सीखेच आहे.

लक्ष्मी आणि समिधाच्या शिक्षणातून प्रगती साधण्याच्या प्रयत्नांना यश येईल का? बाहेरच्या समाजातले कुठले मदतीचे हात तिला उभारी देतील? तुच्छतेचे कुठले कटाक्ष कसे घायाळ करतील? तिची धडपड समजून घेण्याची कुवत त्या वस्तीतल्या लोकांकडे असेल का? रथचक्र उद्धरेल का ? या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी ही कादंबरी वाचा.

वाचनीय कादंबरी आहे. दोन प्रमुख नायिका असल्या तरी इथल्या प्रत्येक प्रसंगातून, त्यात क्षणभर डोकावणाऱ्या माणसांतून समाजातल्या माणसांच्या वेगवेगळ्या रंगछटा दिसतात आणि हळूहळू चित्र पूर्ण होऊ लागतं. लक्ष्मी, तिचा नवरा, तिची सासू, लक्ष्मीच्या लोकल मधल्या मैत्रिणी, तिला मदत करणारे काही जण आणि वस्तीतले लोक या सगळ्यांची वर्णने , त्यांच्या तोंडचे संवाद नैसर्गिक वाटतात. फक्त समिधाच्या तोंडचे संवाद हे फारच पोक्त, प्रौढ भाषेतले, पुस्तकी वाटतात. त्या मुलीला घरच्या परिस्थितीची जाण आहे हे आपण समजू शकतो पण जणू तिने जगाचाच अनुभव घेतला आहे असं तिचं बोलणं, आईला आणि तिऱ्हाईतांना शिकवणं हे तितकं नैसर्गिक वाटलं नाही.
कादंबरीच्या पहिल्या भागात प्रसंग सविस्तरपणे येतात आणि शेवटच्या काही पानांमध्ये फार पटपट प्रसंग घडून कादंबरी संपते.

काही पाने उदाहरणादाखल.

पैशाची तंगी, बापाचं वागणं आणि समिधाचा राग दाखवणार आहे प्रसंग



दहावीत बोर्डात पहिली आल्याबद्दल नगरसेवक सत्कार करायल येतात तेव्हा समिधाच्या बोलण्यातून वस्तीची व्यथा व्यक्त होते



समाजात बदल घडताना तो अचानक पूर्ण समाजाचा होणार नाही तर तो बदल हळूहळू आधी एकेका व्यक्तीचा, त्याच्या कुटुंबाचा होईल. अशा अनेक व्यक्ती आणि कुटुंबाच्या बदलातून रूपात सामाजिक परिवर्तनाचे प्रमाण वाढेल. ही जाणीव करून देणारी ही कादंबरी आहे.

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

जपानी लघुकथा (Japani laghukatha)





पुस्तक - जपानी लघुकथा भाग एक, दोन  (Japani laghukatha Part 1& 2)
लेखिका -सुजाता गोखले (Sujata Gokhale)
भाषा -मराठी (Marathi)
पाने - प्रत्येक भागात ९४
प्रकाशन - आदिती अकॅडमी ऑफ जपानी लँग्वेज (भाग एक जानेवारी २०२४, भाग दोन मार्च २०२५)
छापील किंमत - रु. ४००/- प्रत्येकी
ISBN - भाग एक 979-889233677-2 
           भाग दोन 979-889744249-2

काही दिवसांपूर्वी "ऋणानुबंध पूर्वेचा" ह्या पुस्तकाचं परीक्षण लिहिलं होतं. त्याच्या लेखिका सुजाता गोखले ह्या जपानी भाषेच्या शिक्षिका आहेत. त्यांनी बऱ्याच वेळा शैक्षणिक कामाच्या निमित्ताने जपानला भेटी दिल्या आहेत त्या अनुभवांवरचं ते खूप सुंदर पुस्तक आहे. (त्याच्या परिक्षणाची लिंक https://learnmarathiwithkaushik.com/courses/runanubandh-purvecha/ ). त्या पुस्तकाचं परीक्षण लिहिल्यानंतर मला सुजाताजींना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाली. आणि त्यांनी पुस्तकाचे पुढचे भाग आणि अजून काही पुस्तकं मला भेट दिली. त्यातलीच ही दोन पुस्तकं "जपानी लघुकथा- भाग एक आणि दोन"


पुस्तकाचं नाव वाचून असा समज होऊ शकतो की हे एक भाषांतरित पुस्तक असेल. जपानी भाषेतल्या लघुकथा किंवा पारंपारिक जपानी लोककथांचे भाषांतर या पुस्तकात असेल. पण हे पुस्तक तसं नाही. या सुजाताजींनी स्वतः स्वतंत्रपणे लिहिलेल्या गोष्टी आहेत. जपान, जपानी भाषा आणि जपानी संस्कृती यांच्यावर त्यांचे प्रेम आहे. त्या सर्वांची त्यांच्या विद्यार्थ्यांना आणि इतर सर्वसाधारण वाचकांनाही ओळख व्हावी यासाठी त्यांनी या कथा लिहिलेल्या आहेत. या गोष्टींमधली पार्श्वभूमी जपानची आहे. पहिल्या काही गोष्टींमध्ये एखाद दुसरे भारतीय पात्र आणि बाकी जपानी पात्रं अशी रचना आहे. नंतर बहुतेक गोष्टी मधली सगळी पात्रं जपानीच आहेत. ह्या गोष्टींतून जपान मधले एखादे ठिकाण, एखादी परंपरा किंवा त्या लोकांची विचार करण्याची पद्धत, जगण्याची पद्धत असं आपल्याला आपसूक जाणवतं. गोष्टीत जेव्हा जपानी शब्द येतात तेव्हा कंसात त्याचा अर्थ सांगितला आहे. जपानी संस्कृतीची ओळख करून देणे हा विचार असला तरी या गोष्टी कुठेही डॉक्युमेंटरी पद्धतीच्या अशा झालेल्या नाहीत. बहुतेक गोष्टी या फॅन्टसी(कल्पनारंजन) या प्रकारातल्या आहेत. तर एकदोन रहस्य कथांसारख्या. त्यामुळे त्या रंजक आहेत. खरंच असं घडलं तर काय होईल, कसं वाटेल असा मजेशीर विचार मनात सोडणाऱ्या आहेत.

दोन्ही भाग मिळून 22 कथा आहेत. सगळ्या गोष्टींबद्दल सांगत नाही पण मला इंटरेस्टिंग वाटलेल्या गोष्टींपैकी सात-आठ गोष्टींबद्दल सांगतो.

तो - पुण्यात राहणाऱ्या एका महिलेच्या घरी अचानक एक जपानी तरुण मुलगा येतो. अस्खलित मराठी बोलत असतो. येताना त्याने त्या बाईंसाठी जपानमधून छान छान भेटवस्तू आणलेल्या असतात असतात. हा तरुण कोण असेल हे गोष्टीच्या शेवटी कळतं एका फॅन्टसीच्या स्वरूपात. एक फॅन्टसी लघुकथा म्हणून आहे ती वाचायला इंटरेस्टिंग आहे. तो जपानी मुलगा ज्या वस्तू घेऊन येतो त्या वस्तूंचा जपानी संस्कृतीतला अर्थ काय हे गोष्टीच्या ओघात येतं, त्यातून जपानची ओळख होते.

तो मी नव्हे - ही जपानमध्ये घडणारी एक रहस्य कथा आहे. ती घडते एका जपानी पुस्तकांच्या दुकानात जिथे पुस्तक विकतही घेता येतात, बसून वाचता येतात. एक वाचक तिकडे नेहमी येत असतो. अचानक त्याचं येणं थांबतं. काय झालं असेल? काय रहस्य असेल ?

"बंदिस्त" आणि "निंजा" - या दोन गोष्टीत पर्यटक एका विशिष्ट ऐतिहासिक स्थळाला भेट द्यायला जातात. कथेच्या ओघात "हिमेजी किल्ला" आणि त्याचा इतिहास, निंजा योद्ध्यांची घरे ह्यांची माहिती कळते आणि शेवट पुन्हा एकदा अद्भुत चमत्कारिक होतो.

"लाट"- या गोष्टीमध्ये एक लेखक एक गोष्ट लिहितो आहे. अगदी काल्पनिक. पण जेव्हा तो प्रकाशकाला भेटायला जातो तेव्हा कळतं की ते सगळे प्रसंग खरेखुरे घडलेले आहेत. पण मग गोष्टीचा शेवट जसा लेखकाने केला आहे तसंच पुढे घडणार का ?

"घड्याळ" - एक जुनंपुराणं घड्याळ दुरुस्तीचं दुकान आहे. त्या दुकानात खूप घड्याळं दिसत आहेत. इतक्या लोकांनी घड्याळात दुरुस्तीला टाकली, ती दुरुस्त झालेली आहेत तरी लोकांनी परत का नेली नसतील?

निवा - जपानी भाषेत निवा म्हणजे घराभोवतालची बाग. अशी बाग बनवण्याचं कंत्राट घेणाऱ्या माणसाला घरमालकाची मुलगी भेटते आणि तो तिच्या प्रेमात पडतो. पण पुढे काही चमत्कारिक गोष्टी घडतात आणि या गोष्टीतली फॅन्टसी आपल्यासमोर येते.

शिबा इनु - "शिबा इनु" ही जपान मधली कुत्र्यांची एक जात आहे. कोल्ह्यासारखी दिसणारी तगडी जात. या गोष्टीतला नायक एका लॉजवरती राहायला उतरतो तेव्हा त्याच्याकडे एक शिबा इनु कुत्रा येतो. 
कुत्रा चक्क माणसाच्या आवाजात बोलू लागतो. कुत्रा माणसाच्या आवाजात कसा बोलेल? काय असेल ही जादू? त्या कुत्र्याचं याच्याकडे काय काम?

पाचिंको - मशीन द्वारे खेळाच्या जुगारातल्या एका दुकानातली ही गोष्ट. चीनमधनं जपानमध्ये पळून आलेली तरुणी या दुकानात काम करायला लागते लोकांनी जुगारात हरलेले पैसे हीच या दुकानाची कमाई. तिला स्वतःला पैशाची गरज आहे आणि लोक जुगारात हरून निराश होतायत हेही दिसतंय. या दोन्हीचा मेळ कसा बरं साधला जाईल?

आता काही पाने उदाहरणादाखल.
लेखिकेची पुस्तकात दिलेली माहिती


अचानक आलेल्या जपानी तरुणाने काय काय भेटवस्तू आणल्या होत्या बघा.


निंजाच्या घराला भेट


प्रियकराने केला प्रेयसीचा खून... पुढच्या अद्भुत अनुभवाची नांदी



फुग्यासारखा फुगणारा फुगू मासा विषारी असतो. पण तरी जपानी लोक खातात. एका हॉटेलात हा फुगू मासा शेफशी बोलू लागतो तेव्हा.



शीर्षकातच म्हटलं आहे तसं त्या लघुकथा आहेत. पुस्तकातल्या अक्षरांचा आकार(फॉन्ट साईज) जरा नेहमीपेक्षा मोठा आणि मांडणी सुटसुटीत आहे म्हणून त्या सात आठ पानांच्या दिसतात. नेहमीच्या पुस्तकाच्या टाईप मध्ये तर त्या अजून लहान होतील. त्यामुळे त्या लघुकथाच आहेत. वाचायला मजा येते. गोष्टी सलग वाचल्या की त्यांचा साचा/पॅटर्न लक्षात येतो की... गोष्टींमधल्या व्यक्ती एकमेकांशी भेटतात बोलतात पण गोष्टीच्या शेवटी अचानक त्यातल्या एखाद्या पात्राचं अस्तित्व हा भास असतो, ती व्यक्ती आधीपासूनच मेलेली असते. त्या दृष्टीने कथबीजाची पुनरुक्ती फार झाली आहे. त्यात काही वेगळेपणा आणता आला तर या कथांची रंजकता वाढेल असं मला वाटतं. तरी प्रत्येक गोष्ट वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परिस्थितीत घडते आहे आणि त्यातून नवीन जपानी शब्द, संकल्पना कळतात. प्रत्येक गोष्ट आपण उत्सुकतेने वाचतो.

मराठी भाषेत इतर भाषेतून भाषांतरित झालेली पुस्तकं बरीच आहेत. परदेशाची प्रवासवर्णनं खूप आहेत. अभ्यासपूर्ण लेखसंग्रह आहेत. पण त्यापेक्षा वेगळं, स्वतःच्या प्रतिभेतून काहीतरी निर्माण करून, ललित अंगाने परदेशी संस्कृतीची ओळख करून देण्याचा हा प्रकार मला आगळावेगळा वाटला. याआधी असे प्रयोग मराठीत झाले आहेत का हे अभ्यासक सांगू शकतील. हा प्रयोग अगदी पहिलाच नसेल तरीही फार कमी लोकांनी केलेला हा प्रयोग आहे. तो सुजाताजींनी चांगलाच पेलला आहे.

पुस्तकाचं नाव काहीतरी वेगळं असावं असं मला सारखं वाटतंय. "जपानी लघुकथा" या नावाने जो "भाषांतरित गोष्टी" असा भाव मनात येतोय, तो टाळण्यासाठी जपानशी संबंधित एक दोन शब्दांचं शीर्षक चांगलं वाटेल.

मराठीत एक वेगळी वाट मराठी वाचकांना दाखवल्याबद्दल सुजाताजींचे एक वाचक म्हणून आणि एक मराठी भाषाप्रेमी म्हणून मनापासून आभार मानतो. त्यांनी असंच लिहित राहावं, प्रयोग करत राहावेत व त्यात त्यांना यश मिळावं अशा खूप शुभेच्छा. सुजाण वाचकही ही पुस्तकं वाचून त्यांच्या प्रयत्नांना दाद देतील, अभिप्राय कळवतील आणि त्यातून मराठी कथाविश्व अजून समृद्ध होईल अशी मी आशा करतो.


——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

चित्तर-बित्तर (Chittar-Bittar)

पुस्तक - चित्तर-बित्तर (Chittar-Bittar) लेखिका - सारिका कुलकर्णी (Sarika Kulkarni) भाषा - मराठी (Marathi) पाने - १५९  प्रकाशन - ग्रंथाली प्र...