त्सुबाकी स्टेशनर्स (Tsubaki Stationers)

पुस्तक - त्सुबाकी स्टेशनर्स (Tsubaki Stationers)
लेखक - इतो ओगावा (Ito Ogawa)
अनुवाद - मयुरेश कुलकर्णी (Mayuresh Kulkarni)
भाषा - मराठी (Marathi)
मूळ पुस्तक - ツバキ文具店 (त्सुबाकी बुंगुतेन) Tsubaki Bunguten
मूळ पुस्तकाची भाषा - जपानी (Japanese)
प्रकाशन - कलासक्त. ऑगस्ट २०२५
छापील किंमत - रु. ५५०/-
ISBN- 978-81-944022-7-5

सध्याच्या संपर्कक्रांतीच्या जगात व्हिडीओ कॉल च्या माध्यमातून क्षणार्धात पृथ्वीवरच्या दुसऱ्या टोकावरच्या माणसाला बघून त्याच्याशी बोलता येतं. काही माहिती पाठवायची असेल तर व्हॉट्सअप, ईमेलद्वारे ती तात्काळ पाठवता येते. दुसऱ्याला मेसेज पोचले की नाही, त्याने वाचले की नाही हे सुद्धा समजते. त्यामुळे पूर्वीसारखं एकेमेकांना पत्र लिहायचं प्रमाण फारच नगण्य झालं आहे. तरीही ज्यांनी पूर्वी पत्र लिहिली आहेत त्यांना ते जुने दिवस आठवतात. गंमत अशी झाली आहे की; पत्र ह्या माध्यमाच्या मर्यादाच आता त्या माध्यमाची वैशिष्ट्य वाटतात. ईमेल आपण टाईप करतो, पत्र हाताने लिहितो. लिहिणाऱ्याचा वैयक्तिक स्पर्श त्याला असतो. ईमेल कितीही मोठा लिहू शकतो, कितीही मोठी अटॅचमेंट पाठवू शकतो. पण हाताने पत्र लिहिताना मजकुराला काही मर्यादा पडतात. दोन-तीन पाने लिहिली तरी किती मोठं पत्र लिहिलं आहे असं वाटणार. त्यामुळे कमी जागेत, कमी शब्दांत जास्तीत जास्त माहिती, मजकूर, भावभावना प्रभावीपणे मांडणे आवश्यक होते. लिहिणाऱ्याच्या विचारांचा, शब्दांचा तिथे कस लागतो. शब्दांव्यतिरिक्त पत्राचा कागद, त्यावरची नक्षी, सजावट, हस्ताक्षरातले बदल, त्यात काढलेली चित्र , रेघोट्या, पत्राबरोबर पाठवलेलं एखादं फूल, सुगंधाचा थेंब ह्यातून "शब्देविण संवादु"ही करता येतो. असं मनापासून लिहिल्यावर ते कधी पोचेल, वाचणाऱ्याला काय वाटेल, तो काय उत्तर देईल, त्याचं उत्तर कधी येईल ह्याची वाट बघावी लागते. "त्वरित प्रतिसादाच्या" instant gratification च्या जमान्यात असे वाट बघणे, झुरणे सुद्धा आपण विसरलो आहोत ते पुन्हा मिळवल्याचा अनुभव येईल.

पत्रलेखनाच्या ह्या वैशिष्ट्यांची जाणीव असणाऱ्या व्यक्तींभोवती फिरणारी ही कादंबरी आहे. जपानमध्ये टोकियोपासून जवळ असणाऱ्या कामाकुरा गावात घडणारी ही ही गोष्ट आहे. कमाकुरा अगदी खेडेगाव नाही पण खूप मोठे शहरही नाही. तिथल्या जुन्या मंदिरांमुळे ते पर्यटकांनाही भुरळ घालणारे समुद्राकाठचे छान गाव आहे. या गावात "त्सुबाकी स्टेशनर्स" नावाचं स्टेशनरीचं दुकान आहे. दुकान चालवणारी तरुण हातोको अमेमिया काही वर्षे परदेशात राहून आता जपानला परत आली आहे. दुकानाच्या वरच तिचं घर आहे. पूर्वी तिची आजी आणि ती तिथे राहायचे. पण काही महिन्यांपूर्वी तिच्या आजीचं निधन झाल्यानंतर ती पुन्हा जपानला आली आणि हे दुकान चालवायला लागली आहे. कागद, पेन्सिल, पेनं शालेय वस्तू दुकानात मिळतातच पण पत्रलेखन हे ह्या दुकानाचे वैशिष्ट्य आहे.

कामापुरा गावातल्या लोकांना आपल्या नातेवाईकांना, सहकाऱ्यांना, मित्र-मैत्रिणींना काही खास प्रसंगी पत्रच लिहाविशी वाटतात. वर म्हटल्याप्रमाणे, फोन ई-मेल यापेक्षा पत्रातून आपल्या भावना चांगल्या पोचतील असं त्यांना वाटतंय. पण पत्रलेखनाची सवय गेली असल्यामुळे म्हणा, भाषेवर तितकं प्रभुत्व नाहीये म्हणा किंवा अगदी हस्ताक्षर चांगलं नाही म्हणा अशा कारणांमुळे त्यांना ते पत्र स्वतः लिहायचं नाहीये. ते कोणाकडूनतरी लिहून घ्यायचे आहे. हे काम करायची हातोकोची आजी. पत्रलेखन करून घेणाऱ्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे, व्यक्तिमत्व कसं आहे, पत्र कोणाला पाठवायचं आहे, पत्रातून राग, लोभ, ताटातूट, विरह अशा कुठल्या भावना व्यक्त करायची आहे हे सगळं लक्षात घेऊन प्रत्येक पत्राला स्वतंत्र, अनोखं करण्याचा तिच्या आजीचा प्रयत्न असायचा. त्यामुळे त्या त्या प्रसंगाला साजेसा कागद, रंग, शाईचा कमीअधिक गडदपणा, पत्राची नक्षी, पत्राला लावायचा स्टॅम्प, पत्र घालायचा लिफाफा, हे सगळं सगळं वेगवेगळं असायचं. त्सुबाकी स्टेशनर्स कामाकुराच्या लोकांमध्ये जिव्हाळ्याचं होतं . ही कला आपल्या नातीतही उतरावी अशी आजीची मनापासून इच्छा होती. त्यामुळे लहानपणापासून हातोकोकडून चांगली अक्षरं गिरवून घेणं, पत्रलेखनाचे सर्व नियम सोपस्कार व संकेत तिने घटवून घेतले होते. आजीच्या माघारी हातोको आता पहिल्यांदाच स्वतंत्रपणे या कामात उतरलीये. आता तिला कोण कोण व्यक्ती भेटतात आणि किती वैशिष्ट्यपूर्ण पत्र तिला लिहावी लागतात याची ही गोष्ट आहे.

एक व्यक्ती येऊन सांगते की आमचा माझा आता घटस्फोट होणार आहे. आम्ही नवराबायकोने एकत्र चांगलं आयुष्य घालवलं. पण बायकोला दुसरा कोणीतरी आवडू लागला आहे. ते दोघं लग्न करणार आहेत. जे लोक माझ्या लग्नाला आले होते त्या सगळ्यांना आमच्या घटस्फोटाची बातमी कळवायची आहे. पत्रात आमच्या सहजीवनात घेतलेला आनंद दिसू दे. आमच्यात कटुता नाही पण घटस्फोट होतोय याचा खेद मात्र नक्की आहे. हे सगळं त्या पत्रातून येऊ द्या.

दुसरी एक व्यक्ती येते. तिला तिच्या तरुणपणीच्या प्रेयसीला पत्र पाठवायचं असतं. तो आणि ती दोघेही आता आपल्या संसारात रमले आहेत. परत एकत्र भेटण्याची शक्यता नाही. पण तरीही एकदा नुसती आठवण जगवायची इच्छा आहे. हे पत्र प्रेमपत्र वाटता कामा नये. माझ्या प्रेयसीच्या संसारात त्याने काही खळबळ माजू नये. आपल्या भावना तिच्यापर्यंत तरी पोचाव्यात. अतिशय तरल आणि कठीण कामगिरी हातोकोवर येते.

असे बरेच प्रसंग या कादंबरीत येतात. प्रत्येक वेळी ती कसा विचार करते, कुठले शब्द वापरते, कशी वाक्यरचना करते, कुठला कागद घेते, अक्षर कसं काढते, पेन शाई कशी निवडते हे सगळं वर्णन वाचत वाचत कादंबरी रंगते. पत्रलेखनाचे किस्से हा कथानकाचा एक भाग आहे. हातोकोचे आणि तिच्या आजीचे संबंध हा कादंबरीच्या प्रसंगांच्या पार्श्वभूमीवरती येणारा धागा आहे. हातोकोला तिची आजी एकटीने वाढवतेले आहे. हातोकोचे आई-वडील कोण हे आजीने तिला कधी सांगितलं नाही. आजही हातोको पत्रलेखन करत असली तरी लहानपणी जेव्हा आजी तिला शिस्त लावत होती, इतर मुलांप्रमाणे मजा करू न देता सतत अक्षर सुधारायचा सराव करायला लावत होती ते तिला आवडत नव्हतं. हळूहळू आजीबरोबर तिचे संबंध कटू होत गेले. ताणले गेले. ती आजीला सोडून परदेशी गेली. आजीच्या माघारी पत्रलेखन करायचं ठरवल्यावर तिला पदोपदी आजीने शिकवलेल्या गोष्टी आठवतात. आजूबाजूच्या लोकांच्या बोलण्यातून आजीबद्दलच्या काही गोष्टी कळतात. आपल्या ग्राहकांच्या भावना शब्दात मांडताना ती स्वतःच्या भावनांचाही नकळत विचार करते . आजीच्या आणि तिच्या नात्याचा पुन्हा पुन्हा विचार करते.

पत्रलेखनाच्या कामातून तिची काही वैशिष्ट्यपूर्ण लोकांशी ओळख होते. मैत्री होते. शेजारणीशी मैत्री होते. त्यांच्या गप्पा, कामाकुरात फिरणं, हॉटेलिंग करणं ह्यातून कामाकुरा गाव, तिथली शांतता, स्वच्छता, निसर्गसौंदर्य, जुनी मंदिरं, चेरीब्लॉसम प्लमब्लॉसम सारखी निसर्गाची लोभसवाणी रूपं, तिथली जीवनपद्धती हे सगळं नेपथ्य उभं राहतं. हे सगळं कादंबरीला आणि कथानकाला पोषकच आहे.

कादंबरी हळूहळू उमलत जाणाऱ्या फुलाप्रमाणे हातोकोचं व्यक्तिमत्व, तिचा भूतकाळ, तिच्या आजीचं व्यक्तिमत्त्व थोडं थोडं उलगडत एका सुंदर वळणावर येऊन पूर्ण होते. पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटले तसं नवरसांपैकी शांतरस हे या कादंबरीचं वेगळेपण आहे. कादंबरीत कुठेही फार मोठं नाट्यमय, धक्कादायक असं काही घडत नाही, तरी प्रत्येक पानात काही ना काही घडत असतंच. एकाच प्रसंगाचं विनाकारण तपशीलवार वर्णन करून पानंच्या पान भरली आहेत असंही नाही. पत्रलेखनाच्या कामातून वेगवेगळे किस्से आपल्यासमोर येतात. पण कुठलाही किस्सा ताणलेला नाही. पत्र सांगणाऱ्या व्यक्तीचे वर्णन, हातोकोची निवड प्रक्रिया आणि पत्राचा झालेला परिणाम असं समजून कथानक पुढे सरकतं. एखाद्या शांत जलप्रवाहात लहान नाव वल्हवत वल्हवत आपण आपल्याच गतीने हळूहळू पुढे सरकावं, आजूबाजूची दृश्य बघावी त्यापद्धतीच्या शांततेचा निवांततेचा अनुभव हे पुस्तक आपल्याला देतं. जपानी संस्कृती, तिथली खाद्यपद्धती, मंदिरं, पत्रलेखनाचे नियम व संकेत या गमतीजमतीही आपल्याला वाचायला मिळतात.

मयुरेश कुलकर्णी यांनी थेट जपानीतून मराठीत याचं भाषांतर केलं आहे. इंग्रजी पुस्तकावरून नाही. भाषांतर अप्रतिमच झालं आहे. फक्त मजकूरच नाही, तर नायिकेने लिहिलेल्या पत्रांमधली शब्दरचनासुद्धा त्या त्या पत्राला साजेशी अशी वेगळी वेगळी ठेवण्यात मयुरेशने यश मिळवलं आहे. वर्णनात जपानची भूमी आणि शब्दांत मराठी माती असा मिलाफ सुंदर जमला आहे.

काही पाने उदाहरणादाखल

लेखिकेची पुस्तकात दिलेली माहिती.


सासूबाईंना साठाव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पत्र लिहा.




नवीन वर्षाचे स्वागत करण्याच्या वेगळ्या समजुती



कामकुरातली भटकंती




कथानकात आलेल्या पत्रांमध्ये हातोकोने काय लिहिले याच बरोबरीने, कसं हस्ताक्षर काढलं आणि सरतेशेवटी ते पत्र कसं दिसलं हे समजणंसुद्धा वाचकासाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळे मूळ पुस्तकात जपानी हस्तलिखित पत्रांचे फोटो छापले आहेत. मयुरेशने सुद्धा देवनागरी लिपी वेगवेगळ्या पद्धतीने लिहून त्या पत्रांचे फोटो छापलेले आहेत. पुस्तक निर्मितीत, पुस्तक छपाईत हा एक वेगळाच प्रयोग आहे. मराठीतही उत्तमपणे साधला गेला आहे.

कथाबीज, कथा घडते ती जागा व तिथली संस्कृती आणि कादंबरीचा बाज या सगळ्यातच नेहमी वाचायला मिळणाऱ्या मराठी किंवा अनुवादित पुस्तकांपेक्षा खूप वेगळेपणा आहे. वैशिष्ट्य आहे. मराठी वाचकांसाठी हा अनुभव आणल्याबद्दल एक वाचक म्हणून आणि मराठी भाषा प्रेमी म्हणून मयुरेशचे व प्रकाशकाचे मनापासून आभार मानतो.

मयुरेशची पुस्तकात दिलेली माहिती


फेसबुक वर तृप्ती कुलकर्णी यांनी पोस्ट लिहून या पुस्तकाचा परिचय करून दिला होता. नंतर तन्वी राऊत हिने लिहिलेला परिचय मी वाचला होता. ते दोन्ही परिचय वाचून पुस्तक वाचायची इच्छा निर्माण झाली. पुस्तक विकत घेतलं आणि ते आवडलं. म्हणून तृप्तीजी आणि तन्वी यांचेही आभार. तृप्ती कुलकर्णी चालवत असलेल्या ऑनलाइन मुलाखती आणि सादरीकरण्याच्या उपक्रमात मागच्या महिन्यात मयुरेशची मुलाखत घेण्यात आली (Youtube link https://www.youtube.com/watch?v=IacLsc72JGM). तेव्हा तो या पुस्तकाबद्दल बोलला. जपानी पुस्तकांच्या वाचनाचे अनुभव, त्याची जपानी भाषेबद्दलची व जपानी साहित्याबद्दलची ओढ आमच्या लक्षात आली. म्हणून त्याने अजून उत्तमोत्तम जपानी पुस्तकांचा अनुवाद मराठीत करावा असा त्याला आग्रह करतो.

तुम्ही हे पुस्तक वाचा आणि तुमचा अनुभव मला नक्की कळवा.



——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

सफाई (saphai)




पुस्तक - सफाई (Saphai)
लेखक - सुमेध वडावाला रिसबूड आणि उत्तमकुमार जैन (Sumedh Wadawala Risbud & Uttamkumar Jain)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १३६
प्रकाशन - नवता बुक वर्ल्ड. ऑक्टोबर २०१३
छापील किंमत रु. १४०/-
ISBN - दिलेला नाही

सुमेध वडावाला रिसबूड ह्यांनी केलेले आत्मकथनांचे शब्दांकन अप्रतिम असते. त्यांची तशी तीन चार पुस्तके मी वाचली आहेत. त्या पुस्तकांची मी लिहिलेली परीक्षणे सुमेधजींनी वाचली होती. त्यांना ती आवडली. त्या ओळखीतून काही दिवसांपूर्वी त्यांना प्रत्यक्ष भेटायचा योग आला. भरपूर गप्पा झाल्या. माझ्या वाचनाला आणि पुस्तक परिचय देण्याच्या उपक्रमाला त्यांनी प्रोत्साहित केले. 



ह्यावेळी आत्मकथनाऐवजी त्यांनी लिहिलेली ललित कादंबरी वाचली. "सफाई" ही एक सामाजिक कादंबरी आहे. दलित वर्गातल्या आणि शहरात राहूनही शहरी प्रगतीपासून काहीशा तुटक राहिलेल्या समाजाची ही कहाणी आहे. हा समाज म्हणजे सफाई कामगार समाज आहे. गावोगावी शहरोशहरी स्वतः घाणीत उतरून स्वच्छतेचे काम करणारा, नागरिकांचे आरोग्य जपणारा हा समाज. घाणीत राहून समाजासाठी काम करणाऱ्या या व्यक्तींकडे बघण्याचा दृष्टिकोन खरं म्हणजे कृतज्ञतेचा असला पाहिजे. पण ह्या समाजातील व्यक्ती आजूबाजूला असेल तर त्या व्यक्तीलाच घाणीसारखं झटकून टाकण्याची प्रतिक्षिप्त क्रिया काही लोकांकडून घडते. तर दुसरीकडे सफाई कामगार समाजातले काही लोकसुद्धा शिक्षण, स्वच्छता,आरोग्य यासाठी उपलब्ध असलेल्या सरकारी सोयीसुविधा यांकडे दुर्लक्ष करून व्यसन, उधारी, वाईट संगती यांच्या दुष्टचक्रातच अडकून राहतात आणि पुढच्या पिढीलाही जबरदस्ती त्यात अडकवून ठेवतात. अशा दुहेरी सामाजिक परिस्थितीच्या खड्ड्यात रुतलेलं रथचक्र उद्धरण्याचं धाडस करू पाहणाऱ्या मायलेकींची ही गोष्ट आहे.

लक्ष्मी ही सफाई कामगार. तिची मुलगी समिधा. या दोघी कथेच्या नायिका. समिधाने दहावीची परीक्षा दिली आहे. लक्ष्मीचा नवरा फार विशेष काम करत नाहीये. तरी दारू आणि जुगाराच्या व्यसनापायी उधारी करत बायकोच्या जीवावर जगतोय. आजूबाजूच्या सगळ्या घरातली म्हणावी तर हीच स्थिती. या परिस्थितीतून बाहेर निघायचं तर मुलीने शिकलं पाहिजे यासाठी लक्ष्मी घरच्यांचा विरोध पत्करून मुलीला शिकवते आहे.

समिधा दहावीतलीच असली तरी मूळची समंजस, संवेदनशील स्वभावाची. बुद्धीने हुशार. त्यात वडिलांची व्यसनाधीनता, आई-वडिलांचं त्यावरून होणारं भांडण, तुटपुंज्या पगारात आईचं घर चालवणं. हे तिच्या चांगलं लक्षात आलं आहे. परिस्थितीने तिला जणू अकाली प्रौढ केलं आहे.

या दोघींच्या आयुष्यात घडणाऱ्या दोन-तीन महिन्यातल्या घटना येथे मुख्य आहेत आणि पात्रांच्या संवादातून लक्ष्मीच्या तरुणपणाच्या, तिच्या सासूच्या काही गोष्टी कळतात. त्यांच्या वस्तीची एकूणच वैचारिक दयनीयता लक्षात येते. घर आणि नोकरी सांभाळताना लक्ष्मीची होणारी तारांबळ, कमीत कमी पैशात घर चालवणं याचा ताण, समिधासाठी पुरेसा खर्च आपण करू शकत नाही याची अपराधीपणाची भावना याचं मनोज्ञ चित्रण आहे. तर केवळ कुंकवाला आधार असणाऱ्या नवऱ्याची चिडही येते, जुने सुखाचे क्षण आठवून आपलेपणाही वाटतोय, त्याच्या व्यसनाला पैसेही द्यावे लागतायत आणि आता व्यसनाशिवाय दुसरं तो काय करणार असा समंजसपणाही मनात येतो. लक्ष्मीच्या मनाची ही विदीर्ण अवस्था छोट्या छोट्या प्रसंगातून आपल्यासमोर पूर्णपणे उभी राहते.

समिधाला मात्र वडिलांचा मनस्वी तिरस्कार वाटत असतो. ती तो स्पष्टपणे बोलूनही दाखवते. बाप-मुलगी, आई-मुलगी आणि नवरा-बायको अशा त्रिकोणातली ही रस्सीखेच आहे.

लक्ष्मी आणि समिधाच्या शिक्षणातून प्रगती साधण्याच्या प्रयत्नांना यश येईल का? बाहेरच्या समाजातले कुठले मदतीचे हात तिला उभारी देतील? तुच्छतेचे कुठले कटाक्ष कसे घायाळ करतील? तिची धडपड समजून घेण्याची कुवत त्या वस्तीतल्या लोकांकडे असेल का? रथचक्र उद्धरेल का ? या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी ही कादंबरी वाचा.

वाचनीय कादंबरी आहे. दोन प्रमुख नायिका असल्या तरी इथल्या प्रत्येक प्रसंगातून, त्यात क्षणभर डोकावणाऱ्या माणसांतून समाजातल्या माणसांच्या वेगवेगळ्या रंगछटा दिसतात आणि हळूहळू चित्र पूर्ण होऊ लागतं. लक्ष्मी, तिचा नवरा, तिची सासू, लक्ष्मीच्या लोकल मधल्या मैत्रिणी, तिला मदत करणारे काही जण आणि वस्तीतले लोक या सगळ्यांची वर्णने , त्यांच्या तोंडचे संवाद नैसर्गिक वाटतात. फक्त समिधाच्या तोंडचे संवाद हे फारच पोक्त, प्रौढ भाषेतले, पुस्तकी वाटतात. त्या मुलीला घरच्या परिस्थितीची जाण आहे हे आपण समजू शकतो पण जणू तिने जगाचाच अनुभव घेतला आहे असं तिचं बोलणं, आईला आणि तिऱ्हाईतांना शिकवणं हे तितकं नैसर्गिक वाटलं नाही.
कादंबरीच्या पहिल्या भागात प्रसंग सविस्तरपणे येतात आणि शेवटच्या काही पानांमध्ये फार पटपट प्रसंग घडून कादंबरी संपते.

काही पाने उदाहरणादाखल.

पैशाची तंगी, बापाचं वागणं आणि समिधाचा राग दाखवणार आहे प्रसंग



दहावीत बोर्डात पहिली आल्याबद्दल नगरसेवक सत्कार करायल येतात तेव्हा समिधाच्या बोलण्यातून वस्तीची व्यथा व्यक्त होते



समाजात बदल घडताना तो अचानक पूर्ण समाजाचा होणार नाही तर तो बदल हळूहळू आधी एकेका व्यक्तीचा, त्याच्या कुटुंबाचा होईल. अशा अनेक व्यक्ती आणि कुटुंबाच्या बदलातून रूपात सामाजिक परिवर्तनाचे प्रमाण वाढेल. ही जाणीव करून देणारी ही कादंबरी आहे.

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

जपानी लघुकथा (Japani laghukatha)





पुस्तक - जपानी लघुकथा भाग एक, दोन  (Japani laghukatha Part 1& 2)
लेखिका -सुजाता गोखले (Sujata Gokhale)
भाषा -मराठी (Marathi)
पाने - प्रत्येक भागात ९४
प्रकाशन - आदिती अकॅडमी ऑफ जपानी लँग्वेज (भाग एक जानेवारी २०२४, भाग दोन मार्च २०२५)
छापील किंमत - रु. ४००/- प्रत्येकी
ISBN - भाग एक 979-889233677-2 
           भाग दोन 979-889744249-2

काही दिवसांपूर्वी "ऋणानुबंध पूर्वेचा" ह्या पुस्तकाचं परीक्षण लिहिलं होतं. त्याच्या लेखिका सुजाता गोखले ह्या जपानी भाषेच्या शिक्षिका आहेत. त्यांनी बऱ्याच वेळा शैक्षणिक कामाच्या निमित्ताने जपानला भेटी दिल्या आहेत त्या अनुभवांवरचं ते खूप सुंदर पुस्तक आहे. (त्याच्या परिक्षणाची लिंक https://learnmarathiwithkaushik.com/courses/runanubandh-purvecha/ ). त्या पुस्तकाचं परीक्षण लिहिल्यानंतर मला सुजाताजींना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाली. आणि त्यांनी पुस्तकाचे पुढचे भाग आणि अजून काही पुस्तकं मला भेट दिली. त्यातलीच ही दोन पुस्तकं "जपानी लघुकथा- भाग एक आणि दोन"


पुस्तकाचं नाव वाचून असा समज होऊ शकतो की हे एक भाषांतरित पुस्तक असेल. जपानी भाषेतल्या लघुकथा किंवा पारंपारिक जपानी लोककथांचे भाषांतर या पुस्तकात असेल. पण हे पुस्तक तसं नाही. या सुजाताजींनी स्वतः स्वतंत्रपणे लिहिलेल्या गोष्टी आहेत. जपान, जपानी भाषा आणि जपानी संस्कृती यांच्यावर त्यांचे प्रेम आहे. त्या सर्वांची त्यांच्या विद्यार्थ्यांना आणि इतर सर्वसाधारण वाचकांनाही ओळख व्हावी यासाठी त्यांनी या कथा लिहिलेल्या आहेत. या गोष्टींमधली पार्श्वभूमी जपानची आहे. पहिल्या काही गोष्टींमध्ये एखाद दुसरे भारतीय पात्र आणि बाकी जपानी पात्रं अशी रचना आहे. नंतर बहुतेक गोष्टी मधली सगळी पात्रं जपानीच आहेत. ह्या गोष्टींतून जपान मधले एखादे ठिकाण, एखादी परंपरा किंवा त्या लोकांची विचार करण्याची पद्धत, जगण्याची पद्धत असं आपल्याला आपसूक जाणवतं. गोष्टीत जेव्हा जपानी शब्द येतात तेव्हा कंसात त्याचा अर्थ सांगितला आहे. जपानी संस्कृतीची ओळख करून देणे हा विचार असला तरी या गोष्टी कुठेही डॉक्युमेंटरी पद्धतीच्या अशा झालेल्या नाहीत. बहुतेक गोष्टी या फॅन्टसी(कल्पनारंजन) या प्रकारातल्या आहेत. तर एकदोन रहस्य कथांसारख्या. त्यामुळे त्या रंजक आहेत. खरंच असं घडलं तर काय होईल, कसं वाटेल असा मजेशीर विचार मनात सोडणाऱ्या आहेत.

दोन्ही भाग मिळून 22 कथा आहेत. सगळ्या गोष्टींबद्दल सांगत नाही पण मला इंटरेस्टिंग वाटलेल्या गोष्टींपैकी सात-आठ गोष्टींबद्दल सांगतो.

तो - पुण्यात राहणाऱ्या एका महिलेच्या घरी अचानक एक जपानी तरुण मुलगा येतो. अस्खलित मराठी बोलत असतो. येताना त्याने त्या बाईंसाठी जपानमधून छान छान भेटवस्तू आणलेल्या असतात असतात. हा तरुण कोण असेल हे गोष्टीच्या शेवटी कळतं एका फॅन्टसीच्या स्वरूपात. एक फॅन्टसी लघुकथा म्हणून आहे ती वाचायला इंटरेस्टिंग आहे. तो जपानी मुलगा ज्या वस्तू घेऊन येतो त्या वस्तूंचा जपानी संस्कृतीतला अर्थ काय हे गोष्टीच्या ओघात येतं, त्यातून जपानची ओळख होते.

तो मी नव्हे - ही जपानमध्ये घडणारी एक रहस्य कथा आहे. ती घडते एका जपानी पुस्तकांच्या दुकानात जिथे पुस्तक विकतही घेता येतात, बसून वाचता येतात. एक वाचक तिकडे नेहमी येत असतो. अचानक त्याचं येणं थांबतं. काय झालं असेल? काय रहस्य असेल ?

"बंदिस्त" आणि "निंजा" - या दोन गोष्टीत पर्यटक एका विशिष्ट ऐतिहासिक स्थळाला भेट द्यायला जातात. कथेच्या ओघात "हिमेजी किल्ला" आणि त्याचा इतिहास, निंजा योद्ध्यांची घरे ह्यांची माहिती कळते आणि शेवट पुन्हा एकदा अद्भुत चमत्कारिक होतो.

"लाट"- या गोष्टीमध्ये एक लेखक एक गोष्ट लिहितो आहे. अगदी काल्पनिक. पण जेव्हा तो प्रकाशकाला भेटायला जातो तेव्हा कळतं की ते सगळे प्रसंग खरेखुरे घडलेले आहेत. पण मग गोष्टीचा शेवट जसा लेखकाने केला आहे तसंच पुढे घडणार का ?

"घड्याळ" - एक जुनंपुराणं घड्याळ दुरुस्तीचं दुकान आहे. त्या दुकानात खूप घड्याळं दिसत आहेत. इतक्या लोकांनी घड्याळात दुरुस्तीला टाकली, ती दुरुस्त झालेली आहेत तरी लोकांनी परत का नेली नसतील?

निवा - जपानी भाषेत निवा म्हणजे घराभोवतालची बाग. अशी बाग बनवण्याचं कंत्राट घेणाऱ्या माणसाला घरमालकाची मुलगी भेटते आणि तो तिच्या प्रेमात पडतो. पण पुढे काही चमत्कारिक गोष्टी घडतात आणि या गोष्टीतली फॅन्टसी आपल्यासमोर येते.

शिबा इनु - "शिबा इनु" ही जपान मधली कुत्र्यांची एक जात आहे. कोल्ह्यासारखी दिसणारी तगडी जात. या गोष्टीतला नायक एका लॉजवरती राहायला उतरतो तेव्हा त्याच्याकडे एक शिबा इनु कुत्रा येतो. 
कुत्रा चक्क माणसाच्या आवाजात बोलू लागतो. कुत्रा माणसाच्या आवाजात कसा बोलेल? काय असेल ही जादू? त्या कुत्र्याचं याच्याकडे काय काम?

पाचिंको - मशीन द्वारे खेळाच्या जुगारातल्या एका दुकानातली ही गोष्ट. चीनमधनं जपानमध्ये पळून आलेली तरुणी या दुकानात काम करायला लागते लोकांनी जुगारात हरलेले पैसे हीच या दुकानाची कमाई. तिला स्वतःला पैशाची गरज आहे आणि लोक जुगारात हरून निराश होतायत हेही दिसतंय. या दोन्हीचा मेळ कसा बरं साधला जाईल?

आता काही पाने उदाहरणादाखल.
लेखिकेची पुस्तकात दिलेली माहिती


अचानक आलेल्या जपानी तरुणाने काय काय भेटवस्तू आणल्या होत्या बघा.


निंजाच्या घराला भेट


प्रियकराने केला प्रेयसीचा खून... पुढच्या अद्भुत अनुभवाची नांदी



फुग्यासारखा फुगणारा फुगू मासा विषारी असतो. पण तरी जपानी लोक खातात. एका हॉटेलात हा फुगू मासा शेफशी बोलू लागतो तेव्हा.



शीर्षकातच म्हटलं आहे तसं त्या लघुकथा आहेत. पुस्तकातल्या अक्षरांचा आकार(फॉन्ट साईज) जरा नेहमीपेक्षा मोठा आणि मांडणी सुटसुटीत आहे म्हणून त्या सात आठ पानांच्या दिसतात. नेहमीच्या पुस्तकाच्या टाईप मध्ये तर त्या अजून लहान होतील. त्यामुळे त्या लघुकथाच आहेत. वाचायला मजा येते. गोष्टी सलग वाचल्या की त्यांचा साचा/पॅटर्न लक्षात येतो की... गोष्टींमधल्या व्यक्ती एकमेकांशी भेटतात बोलतात पण गोष्टीच्या शेवटी अचानक त्यातल्या एखाद्या पात्राचं अस्तित्व हा भास असतो, ती व्यक्ती आधीपासूनच मेलेली असते. त्या दृष्टीने कथबीजाची पुनरुक्ती फार झाली आहे. त्यात काही वेगळेपणा आणता आला तर या कथांची रंजकता वाढेल असं मला वाटतं. तरी प्रत्येक गोष्ट वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परिस्थितीत घडते आहे आणि त्यातून नवीन जपानी शब्द, संकल्पना कळतात. प्रत्येक गोष्ट आपण उत्सुकतेने वाचतो.

मराठी भाषेत इतर भाषेतून भाषांतरित झालेली पुस्तकं बरीच आहेत. परदेशाची प्रवासवर्णनं खूप आहेत. अभ्यासपूर्ण लेखसंग्रह आहेत. पण त्यापेक्षा वेगळं, स्वतःच्या प्रतिभेतून काहीतरी निर्माण करून, ललित अंगाने परदेशी संस्कृतीची ओळख करून देण्याचा हा प्रकार मला आगळावेगळा वाटला. याआधी असे प्रयोग मराठीत झाले आहेत का हे अभ्यासक सांगू शकतील. हा प्रयोग अगदी पहिलाच नसेल तरीही फार कमी लोकांनी केलेला हा प्रयोग आहे. तो सुजाताजींनी चांगलाच पेलला आहे.

पुस्तकाचं नाव काहीतरी वेगळं असावं असं मला सारखं वाटतंय. "जपानी लघुकथा" या नावाने जो "भाषांतरित गोष्टी" असा भाव मनात येतोय, तो टाळण्यासाठी जपानशी संबंधित एक दोन शब्दांचं शीर्षक चांगलं वाटेल.

मराठीत एक वेगळी वाट मराठी वाचकांना दाखवल्याबद्दल सुजाताजींचे एक वाचक म्हणून आणि एक मराठी भाषाप्रेमी म्हणून मनापासून आभार मानतो. त्यांनी असंच लिहित राहावं, प्रयोग करत राहावेत व त्यात त्यांना यश मिळावं अशा खूप शुभेच्छा. सुजाण वाचकही ही पुस्तकं वाचून त्यांच्या प्रयत्नांना दाद देतील, अभिप्राय कळवतील आणि त्यातून मराठी कथाविश्व अजून समृद्ध होईल अशी मी आशा करतो.


——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

मोगरा फुलला (Mogara Phulala)




पुस्तक - मोगरा फुलला (Mogara Phulala)
लेखक - गोपाळ नीलकंठ दांडेकर (Gopal Neelkanth Dandekar)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - ३४५
प्रकाशन - प्रथम आवृत्ती - मॅजेस्टिक प्रकाशन १९७५. सध्या मृण्मयी प्रकाशन.
छापील किंमत - रु. ४००/-
ISBN - दिलेला नाही

"मोगरा फुलला" ही ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रावर आधारित नितांतसुंदर कादंबरी आहे. महाराजांच्या आईवडिलांच्या तरुणपणापासून त्यांच्या समाधीपर्यंतचे प्रसंग यात घेतले आहेत. त्याकाळातल्या दोन व्यक्ती आपल्याला ही गोष्ट सांगतायत असं निवेदन आहे. त्यांच्यासमोर घडणाऱ्या घटना ते आपल्याला सांगतात. तेही त्यावेळच्या भाषेत. त्यांचा हात धरून आपण थेट बाराव्या शतकात पोचतो. बाराव्या शतकातले एक छोटे खेडे आळंदी. तिथे दोन शेजारी शेजारी राहणाऱ्या ब्राह्मण घरातील दोन बालमैत्रिणी - कावेरी आणि रुक्मिणी. ही कावेरी आपल्याला गोष्ट सांगते आहे रुक्मिणीची- भविष्यातल्या ज्ञानोबांच्या आईची. त्याच वेळी भट्टदेव नावाचा एक यात्रेकरू महाराष्ट्रात पायी तीर्थयात्रा करतो आहे. त्यांना भेटतात दुसरे एक तरुण यात्रेकरू. विट्ठल. भट्टदेव आपल्याला सांगतोय गोष्ट विट्ठलपंतांची - भविष्यातल्या ज्ञानोबांच्या वडिलांची.

कावेरी आणि भट्टदेवाच्या वर्णनातून त्यावेळची यादवकाळातली परिस्थिती कशी आहे ते कळतं आणि दोन्ही नायकांचे स्वभाव कळतात. रुक्मिणी लहानपणापासून आदर्श मुलगी, गृहकृत्यदक्ष, समंजस. तर विठ्ठलपंत प्रथमपासून ज्ञानमार्गी, विरक्त स्वभावाचे. ते चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. कथा पुढे सरकते. यात्रेकरू फिरत फिरत आळंदीला येतात. योगायोगाने विट्ठलपंत आणि रुक्मिणीच्या वडिलांची भेट होते. इतका ज्ञानी, सद्गुणी मुलगा रुक्मिणीच्या वडिलांना आवडतो. आपल्या मुलीसाठी हाच योग्य वर आहे असा ते निश्चय करतात. पण स्वभावाने संसारात ना रमणाऱ्या विठ्ठलाला हे रुचत नाही. मग ह्या विठ्ठलाची मनधरणी ते कशी करतात, काही दैवी संकेत कसे मिळतात, कावेरीचे वडील कसा आक्षेप घेतात, तरी शेवटी लग्न लागते; हे सगळे प्रसंग छान रंगले आहेत. कावेरीच्या वडिलांना रुक्मिणीचे लग्न आपल्या मुलाशी व्हावे असे वाटत असते. ते न झाल्याने त्यांचा अहंकार दुखावतो. ते लग्नाला विरोध करतात. कावेरीचे वडीलच, आपल्या शेजारच्या मुलीसाठी कसे खलनायक ठरतायत हे बघून पुढच्या घटनांचे सूतोवाच होते.

पुढे कावेरीचे सुद्धा लग्न होते. ती संसारात रमते. पण रुक्मिणी मात्र संसाराची गोडी नसणारा जोडीदार लाभल्यामुळे संसारसुखाला पारखी होत राहते. तरी समजूतदारपणे, पतिव्रतेच्या सहनशीलतेने, नवऱ्याच्या वृतीचा स्वीकार करून राहते. रुक्मिणी आणि कावेरीच्या संवादातून त्यांचे मनोभाव समोर येतात. पुढे विठ्ठलपंतांचा गृहत्याग, अनेक वर्षे बाहेर राहणे, काशीला वास्तव्य, भट्टदेवांची अनपेक्षित गाठ पडणे हे प्रसंग येतात. योगायोगाने विठ्ठलपंतांच्या गुरूंना ते पूर्वी विवाहित आहे हे कळते. ते रागावून विठ्ठलपंतांना पुन्हा संसारी होण्यास सांगतात. प्रायश्चित्त म्हणून व्रतवैकल्ये सांगतात. ती करून ते आळंदीला परत येतात. कावेरीचे वडील जुना सूड पूर्ण करण्यासाठी गावकऱ्यांच्या मनात विठ्ठल-रुक्मिणीबद्दल विखार भरवतात. संन्यास घेऊन पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारल्याबद्दल दोघांना वाळीत टाकायला लावतात. संन्यास सोडून पुन्हा संसारात येण्याची ही घटना ना पूर्वी कोणी पहिली, ना ऐकली. त्यातून गावात खळबळ माजते. समजून घेणारे आणि न घेणारे असे दोन्ही लोक गावात असतात. विठ्ठलपंतांना शासन केलं नाही तर चुकीचा संदेश समाजात जाईल, स्वैरवर्तन समाजात वाढेल, हा एक विचार; तर गुरूच्या आज्ञेने, प्रायश्चित्त घेऊन घेतलेला निर्णय योग्य आहे हा विरोधी विचार. तेव्हाची ही सामाजिक घुसळण डोळ्यासमोर उभी राहते.

विठ्ठल रुक्मिणी गावाबाहेर राहतात. भिक्षेवर, अतिशय गरिबीत उदरनिर्वाह करतात. अशा शोचनीय स्थितीतही समाधानी राहणे, लोकांचा दुस्वास न करणे, शास्त्रांचा अभ्यास सुरु ठेवणे ह्यातून जोडप्याची स्तिथप्रज्ञ वृत्ती दिसते. कादंबरीच्या अर्ध्यापर्यंत हा सगळा भाग येतो. पुढे चारी भावंडांचा जन्म आणि लहानपणापासूनच ते सगळे कसे समंजस, ज्ञानी, पोक्त आणि परिपक्व होते, अवतारी व्यक्तीच होते हे कावेरी आणि भट्टदेवांच्या अनुभवातून कळते. ह्या पुढच्या भागात ज्ञानदेवांच्या चरित्रातले प्रसंग आहेत उदा. पैठणला जाणे, रेड्यामुखी वेद वदवणे, ज्ञानेश्वरीची रचना, चांगदेवांना भेटायला जण्यासाठी भिंत चालवणे, ग्रंथ रचना, आणि शेवटी समाधी. आपल्याला हे सगळे प्रसंग माहित असलेतरी एका बहिष्कृत मानल्या मुलाचे हळूहळू समाजापुढे येणे, त्यांचे महत्त्व आणि ज्ञानाचा अधिकार लोकांना लक्षात येणे हे प्रसंग टप्प्याटप्प्याने उलगडत जातात. जेव्हा कीर्ती पसरून ते आळंदीला परत येतात तेव्हा त्यांचे झालेले स्वागत, विरोधकांना झालेली उपरती बघून आपणही सुखावतो. शेवटी जेव्हा समाधीचा प्रसंग येतो तेव्हा आपणही तितकेच भावनिक होतो, डोळ्यात पाणी येतं. कावेरी आणि भट्टादेवांप्रमाणे आपणही दोन पिढ्यांचे भोग बघितलेले असतात. आता त्याचा पश्चात्ताप समाजाला झालेला असताना ज्ञानदेवांनी आपल्याला सोडून जावू नये ही आपलीही भावना होते. ओल्या डोळ्यांनी कादंबरी पूर्ण करतो.

आता काही पाने उदाहरणादाखल वाचा.

लग्नानंतर कावेरी रुक्मिणीला तिच्या संसाराबद्दल बोलते करते तेव्हा



गावाने वाळीत टाकले तरी ते प्रसन्नचित्ताने स्वीकारून ईश्वरोपासना करत जगण्याची वृत्ती दाखवणारा प्रसंग



आळंदी ते प्रतिष्ठान पायी प्रवासातील एक प्रसंग. तेव्हाच्या समाजाचे वर्णन आणि हरिपाठाची रचना इथे दिसते.



ज्ञानेश्वरीच्या एका अध्यायाच्या निरूपणाचा भाग


पाहिल्यापानापासून शेवटच्या पानापर्यंत मोहून ठेवणारे हे पुस्तक आहे. कथानक माहिती असले तरी ते कसे कसे घडले असेल हे नव्याने बघितल्यासारखे वाटते. जुन्या भाषेची गोडी आणि वेगळेपणा मनात असा मुरतो की खूप वेळ पुस्तक वाचल्यावर आपण सुद्धा त्याच भाषेत बोलू की काय असे वाटते. चरित्रात चमत्कार हे चमत्कार म्हणूनच दाखवले आहेत. त्याचे तार्किक स्पष्टीकरण किंवा खरं काय वेगळं घडलं असेल वगैरे प्रयोग केलेला नाही.

ज्ञानेश्वर महाराजांच्या कार्याचे चिरस्थायी महत्त्व, त्यांच्या कुटुंबाला कराव्या केलेल्या संघर्षाची सामाजिक मांडणी आणि गोनीदांची लेखणी असा त्रिवेणी संगम आहे. मराठी साहित्यातले हे अढळ स्थान मिळालेले पुस्तक आहे. सुजाण वाचक वाचतच राहतील.

ता.क. पुस्तकाच्या प्रतीचंही आपलं आपलं भाग्य... ह्या पुस्तकाचं वाचन चालू असतानाच आळंदीला जायचा योग आला. थेट समाधीवर हे पुस्तक ठेवण्याची संधी मिळाली... विषय, आशय आणि लेखक ह्या दृष्टीने प्रसिद्ध असणारे हे पुस्तक. हजारो प्रति निघाल्या असतील. पण असा योगायोग फार कमी प्रतींच्या बाबतीत घडला असेल.




——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-








छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर (Chhatrapati Shivaji Maharaj zale nasate tar)



पुस्तक - छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर (Chhatrapati Shivaji Maharaj zale nasate tar)
लेखक - गजानन भास्कर मेहंदळे (Gajanan Bhaskar Mehandale)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - ६२
प्रकाशन - ऐतिहासिक साहित्य प्रकाशन, फेब्रुवारी २०२१
छापील किंमत - रु. ५०/-
ISBN - दिलेला नाही.

आज १९फेब २०२६. तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. महाराजांना त्रिवार प्रणाम !! आज ह्या पुस्तकाबद्दल लिहिण्याचा आनंद वेगळाच आहे.

काही दिवसांपूर्वी मी रायगडावर गेलो होतो तेव्हा तिथल्या वस्तू आणि पुस्तकांच्या दुकानात हे छोटेखानी पुस्तक दिसलं. मेहंदळे सर हे अतिशय मुद्देसूदपणे आणि पुराव्यांच्या आधारे खरा इतिहास मांडणारे अभ्यासक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यामुळे त्यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याचा काय अन्वयार्थ लावला आहे, काय वैशिष्ट्य मांडलं आहे हे बघणं औत्सुक्याचं आणि महत्त्वाचं वाटलं. म्हणून हे पुस्तक लगेच विकत घेतलं.

पुस्तकाच्या पाठमजकुरावर त्यांनी त्यांचा आगामी पुस्तकाचा हेतू स्पष्ट केला आहे. इतिहासाची मोडतोड करून, महत्त्वाचे मुद्दे गाळून, हेतुपुरस्सर खोटारडेपणा केल्याची उदाहरणे नामवंत इतिहासकारांपासून पाठ्यपुस्तकांपर्यंत दिसतात. त्यांच्या हेतू विषयी न बोलता पुराव्यांच्या आधारे त्यांचा खोटारडेपणा उघड करत राहतात. शिवाजी महाराजांच्या आधी हजार वर्ष या भारतावर सत्ता गाजवणाऱ्या इस्लामी राजवटींचे धार्मिक धोरण, त्याचा परिणाम आणि शिवाजी महाराजांनी त्या प्रवाहाला कोणते वळण दिले हे ते सोदाहरण सांगणार आहेत. हे आगामी पुस्तक १४०० पानांचे होईल. पण त्या पुस्तकाची झलक आणि त्याचे सार रूप असावे असे हे प्रस्तुक पुस्तिक आहे. ६० पानांची पुस्तिकाच. पण आशयाच्या रूपात तुमच्या विचारप्रक्रियेवर कायमचा परिणाम करेल अशी. पुस्तकाच्या मजकुराचे दोन भाग आहेत. पहिला भाग इस्लामी राजवटींचे स्वरूप आणि दुसरा भाग महाराजांच्या राज्याचा हेतू.

शिवाजी महाराजांच्या आधी हजार वर्षे भारतातील बऱ्याच भूभागावर इस्लाम धर्म मानणाऱ्या शासकांचे राज्य होते. हे सगळे मुसलमानी सत्ताधीश किती क्रूरपणे कत्तली करत होते, स्त्रियांवर अत्याचार करत होते, पुरुषांची गुलाम म्हणून विक्री करत होते, बायकांना वेश्या बनवत होते. सर्वसाधारण इतिहासकार अशा घटनांचा उल्लेख आला की ती एखाद्या माथेफिरू राजाने केलेले दुष्कृत्य म्हणून त्याची दाहकता कमी करण्याचा नाकारण्याचा प्रयत्न करतात. पण लेखक हे दाखवून देतात की ते एखाद दुसरी घटना नाही. एखाद्या माथेफिरू राजाने केलेले हे कृत्य नाही तर अल्लाउद्दीन खिलजी पासून टिपू सुलतानापर्यंत प्रत्येकाने हे केलं आहे. जाणूनबुजून केलं आहे. इतिहासातलं क्रौर्य नाकारण्यात अर्थ नाही हे त्यांनी दाखवून दिलं आहे.

दुसरा मुद्दा असतो की हे असं काही झालं असेल पण इतक्या मोठ्या प्रमाणात नाही. ते आकडे फुगवून खोटी भीती निर्माण केली जाते. इथेही ऐतिहासिक पुराव्यातली आकडेवारी दिली आहे. बखरींमधली अतिशयोक्ती असेल असं गृहीत धरून तर्काच्या आधारे आकडेवारीचा अंदाज घेतला तरी तो किती महाभयंकर आहे. हे वाचून अंगावर शहारे येतात. केवळ नव्या इतिहासकारांना सोयीचा नाही म्हणून तो आकडा कमी होत नाही.

तिसरा मुद्दा असतो की, हे जे काय झालं ते त्या त्या राजाने स्वतःचं राज्य वाढवण्यासाठी केलं. शत्रूला नेस्तनाबूत करण्यासाठी, जरब बसवण्यासाठी केलं, शत्रू संपत्ती हडप केली इतकंच. त्यात सामाजिक धार्मिक काही नाही. आता लेखकाने पुन्हा पुराव्या आधारे दाखवून दिलं आहे की असं नाही. ही इस्लामची शिकवण होती म्हणूनच करण्यात आलं. इस्लाम न मानणारे ते काफर, त्यांच्या विरुद्ध सतत जिहाद करायचा, त्यांना जबरदस्तीने मुसलमान करायचे, न मानले तर हालहाल करून मारायचे ही इस्लामचीच शिकावण आहे. मुसलमान सत्ताधीशांनी स्वतः लिहून घेतलेल्या किंवा त्यांच्या दरबारी लोकांनी लिहिलेल्या वृत्तांतात इस्लाम धर्माच्या आज्ञेचं पालन म्हणून आपण हे करतो आहोत ह्याबद्दल स्वतःची, असं करणाऱ्या सरदारांची पाठ थोपटून घेतली आहे. काफरांना त्यांची जागा - नरक - दाखवल्याचं प्रचंड समाधान आहे. काफरांवर जिझिया कर लावून त्यांना दाबून ठेवल्याचं समाधान आहे. त्यांच्या बायकांना जनानखान्यात कोंडलं, दासी म्हणून वाटलं ह्याची प्रौढी आहे.

चौथा मुद्दा येतो की इतकं सगळं चालू होतं तर अख्खा भारत पूर्णपणे मुसलमान कसा झाला नाही. धर्मवेडाला पडलेल्या व्यावहारिक मर्यादा असल्यामुळे लूट-कत्तल-धर्मांतर ह्यांचा वेग कमी अधिक होत होता. आक्रमकांपेक्षा भारताची लोकसंख्या प्रचंड असल्यामुळे लक्ष्य पूर्ण व्हायला वेळ लागत होता इतकंच.

पाचवा मुद्दा येतो की धर्मांतर हे सुफी लोकांच्या मवाळ भूमिकेमुळे, प्रेमाच्या संदेशामुळे, हिंदू - मुस्लिम ऐक्याच्या भूमिकेमुळे झालं. इतिहासकारांचं हे बोलणं किती लबाडीचं आहे हे पुन्हा पुराव्याच्या आधारे दिलं आहे. काफरांना जबरदस्ती मुसलमान करा, नाहीतर मारा हे सुफी लोकांचं सुद्धा म्हणणं होतं. त्यांनी सुलतानांना साथ दिलीच, प्रसंगी तसं करण्याबद्दल उद्युक्तही केलं.

अशा पद्धतीने भारतभूमीची ह्या इस्लामी वरवंट्याखाली कशी वाट लागली होती हे स्पष्ट केल्यावर लेखक शिवाजी महाराजांच्या धोरणाकडे वळतात. स्वराज्य हे निःसंशय हिंदू राज्य होतं हे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केलं आहे. शिवाजी महाराजांनी जिथे जिथे आपला जम बसवला तिथल्या तिथल्या हिंदू तीर्थक्षेत्रांची पुनर्स्थापना केली. मंदिरे तोडून मशिदी बांधल्या होत्या तिथे त्या जागी पुन्हा मंदिरे निर्माण केली. महाराष्ट्रातच नव्हे थेट तामिळनाडूमध्ये तिरुवन्नामलै येथील अरुणाचलम शिवालयाची मशिद त्यांच्यामुळे पुन्हा मंदिर झाली. "कार्तिक दीपम" उत्सव पुन्हा सुरु झाला. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, गोवा इथे महाराजांनी मुक्त केलेल्या मंदिरांची उदाहरणे पुस्तकात आहेत.

महाराज हे इतर धर्माबद्दल सहिष्णू होते म्हणून ते सगळ्या धर्मांना एकसारखे बघत होते असे नाही. त्यांचा राज्यकारभार हिंदू पद्धतीने चालत होता. हिंदू समाजाच्या रीती, उत्सव, मठ ह्यांना देणग्या आणि प्रतिष्ठा दिली जात होती. तुर्क - म्लेंछ ह्यांचा विद्ध्वंस करून स्वत्त्वाची प्रतिष्ठापना करणे हे त्यांचे धोरण होते. त्याबद्दल त्यांचे शत्रू त्यांना कसे शिव्या घालत होते ह्याचीही उदाहरणे दिली आहेत. इस्लामी राजवटींचा नाश आणि हिंदू समाजाचा उत्कर्ष कसा होत होता ह्याची ही उलटी प्रमाणपत्रेच म्हणायला हवी.

छत्रसालासारख्या इतर हिंदू राजांनाही शिवाजी महाराजांनी ह्या धोरणात प्रोत्साहित केले. त्यांच्या समकालीनांमध्ये ते बिंबलेच. त्यांच्या शिकवणुकीनुसार पुढे मराठा साम्रज्याचा दक्षिणोत्तर विस्तार झाला तेव्हा ह्याच धोरणाचे विस्तृत स्वरूप देशाला बघायला मिळाले.

काही पाने उदाहरणादाखल.

अनुक्रमणिका

जिझिया

युद्धकैदी स्त्रियांची विटंबना

सूफींचा पर्दाफाश

हिंदुधर्माला प्रोत्साहन आणि तुर्कांचा नाश करण्याचे महाराजांचे धोरण.

असे हे पुस्तक किमान शब्दांत कमाल आशय सांगून जाते. क्रौर्याने भरलेल्या घटना सांगताना घटना "रंगवून" न सांगता हे हे असं असं झालं, पत्रांत असा उल्लेख आहे, त्याचे संदर्भ असे आहेत; असं सरळ सोपं वर्णन आहे. त्या घटना रक्तरंजितच आहेत. चीड आणणाऱ्या आहेत. हे सत्य प्रभावीपणे अधोरेखित होतं. प्रचलित इतिहासकारांचा खोटारडेपणा त्यांनी पानोपानी उघड केला आहे. तरीही आता तुम्हाला खोटं पडतो असा अभिनिवेश नाही. पुन्हा एकदा, मी खरं ते सप्रमाण सांगतो, मग इतिहासकारांची वासलात वाचकच लावतील अशी अभ्यासू वृत्ती आहे. "सर्वधर्मसमभावा"च्या ढोंगाचा जराही ताण न घेता उलट ते जोखड झुगारून लिहिलेलं हे पुस्तक आहे. "अगर न होते शिवाजी तो सुन्नत होती सबकी" ह्या प्रसिद्ध ओळी किती गंभीर आणि दूरदृष्टीच्या आहेत ते ताकदीने सांगणारे हे पुस्तक आहे. ते आवर्जून वाचून, मनन चिंतन करून त्याचे सार आपल्या कृतीत उतरले पाहिजे.

जय भवानी ! जय शिवाजी !!
छत्रपती शिवाजी महारांजाचा विजय असो !!

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वा ( आवर्जून आवर्जून वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

पुढचं सोंग (Pudhach Song)




पुस्तक - पुढचं सोंग (Pudhach Song)
लेखक - नितीन थोरात (Nitin Thorat)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - २३२
प्रकाशन - रायटर पब्लिकेशन फेब्रुवारी २०२५ छापील किंमत ३००/- रु.
ISBN - 978-93-342-07439


डिसेंबर २०२४ मध्ये पुण्यात झालेल्या विश्व मराठी संमेलनात लेखक नितीन थोरात याच्याशी भेट झाली तेव्हा त्याचं "सोंग" हे पुस्तक विकत घेतलं होतं. मला ते पुस्तक खूप आवडलं. डिसेंबर 
२०२५ मध्ये "पुणे पुस्तक महोत्सवा"मध्ये पुन्हा नितीन ची भेट झाली तेव्हा या कादंबरीचा पुढचा भाग आलेला दिसला. लगेच "पुढचं सोंग" आणि त्याच्या प्रकाशनाचं अजून एक पुस्तक विकत घेतलं.



पहिल्या भागाचे मी लिहिलेले परीक्षण आणि त्या कथेचा थोडक्यात गोषवारा तुम्हाला पुढील लिंकवर वाचता येईल. ते वाचा म्हणजेच मी या पुस्तकाबद्दल जे लिहिलं आहे त्याचा संदर्भ तुम्हाला लागेल.

पहिल्या भागात कथानायक संजयने स्वतःला तृतीयपंथी/हिजडा करून घेतलं आहे. त्याचं नाव आता "तम्मा" आहे. हिजड्यांच्या पंथातच तो राहतोय. हिजड्यांसारखं साडी नेसणं, मेकअप करणं आणि लोकांकडून भीक मागून पैसे गोळा करणं ही त्याची दिनचर्या झाली आहे. गावकऱ्यांनी केलेला अन्याय, जातीभेदाचा त्रास, प्रेयसी वरचे व्यक्त न करता येणारे प्रेम ह्या सगळ्याचा उबग येऊन त्याने तृतीयपंथी होण्याचा निर्णय घेतला होता. जात-धर्म-लिंगविरहित असा हिजडा आपण बनू; आपल्याला त्रास देणाऱ्यांना चांगला हिसका दाखवू असं त्याच्या मनात होतं. पण काही वर्षे लोटली तरी त्याची ती अपेक्षा पूर्ण झाली नाही. इतकंच नव्हे तर स्वतःच्या या नव्या अस्तित्वाशीही तो अजून पूर्णपणे एकरूप झालेला नाही. नव्या वास्तवाशी जुळवून घेत जगणं नियतीला
ही मान्य नाही. 
ज्या गावाततून तो पळून आला त्या गावातल्या लोकांची त्याची पुन्हा भेट होते आणि आपल्या गावाची ओढ त्याला वाटू लागते. आपले आईवडील, अडचणीत साथ देणारे आपले मित्र ह्यांना पुन्हा भेटावेसे वाटू लागते. मित्रांना शोधण्याच्या प्रयत्नात त्याला त्याच्या हिजडेपणाचं मोल द्यावं लागतं. तरी तो त्यांना भेटतो तम्माने गावात जाण्याचा आग्रह सोडून आपल्याबरोबर राहावं ही मित्रांची इच्छा असते. पण गावाला भेट द्यायची त्याची इच्छा अनावर होते. गावात कोणी ओळखू नये, आई-वडिलांनी ओळखावं अशी योजना करून सर्वजण ते धाडस करतात. गावात पोहोचल्यावरही त्याला अनेक धक्कादायक गोष्टी करतात काही नवीन संदर्भ लागतात.

या धक्क्यांनी त्याची द्विधा मनस्थिती अजूनच गहिरी होते. हिजडा बनवण्याचा निर्णय चुकीचा का बरोबर? आपण शरीराने, मनाने खरोखरच हिजडा झालो का? आपण आपल्या जुन्या लोकांना विसरलो का? आपल्याला वाटत होतं तसं एक कणखर हिजडा बनवून अन्याय करणाऱ्या लोकांना लोकांशी दोन हात करू शकलो? हे सगळं कशासाठी गेलं त्यापेक्षा पुरुषच राहिलो असतो तर चाललं असतं का? प्रेम विसरून गेलो असतो तर चाललं असतं का? आपली प्रेयसी काय करत असेल? आता या अवस्थेतही त्या आपल्याला स्वीकारेल का? आई वडील काय म्हणतील? आपण असे तृतीयपंथी आहोत हे कळल्यावर गावातले आपले शत्रू आपली कशी फजिती करतील? आई-वडिलांना काय त्रास देतील ? असे असंख्य प्रश्न, त्यात नियतीने घातलेल्या 
प्रश्नांची भर. असा हा प्रश्नांचा आणि हळूहळू त्याची उत्तरं सापडत जाण्याचा प्रवास आहे.

कादंबरीच्या पहिल्या भागात तरुण पुरुष संजय हिजडा बनतो. लाक्षणिक अर्थाने हिजड्याचा सोंग घेतो. त्यात हतबलपणा लक्षात आल्यावर हे 
सोंग टाकून मूळचं रूप घ्यावं अशी इच्छा त्याला होते. पण परिस्थिती त्याला अजून काय काय सोंगं घ्यायला लावते हे कादंबरीच्या दुसऱ्या भागात दाखवलं आहे. म्हणूनच "पुढचं सोंग" हे नाव बरोब्बर आहे.

काही पाने वाचून बघा

तम्माच्या डोक्यात माजलेलं विचारांचं काहूर


गावात पोचल्यावर आठवणींनी उध्वस्त झालेला तम्मा आपली ओळख दाखवू शकत नव्हता, काही विचारू शकत नव्हता.



मनःशांती मिळावी म्हणून पंढरपूरच्या वारीतल्या दिंडीतल्या लोकांशी तो संवाद साधतो तेव्हा.



या कादंबरीचे उपशीर्षकच "वाळवंटी प्रेमाचा हिरवा गार अंत" असे आहे. त्यातून तुमच्या लक्षात आलं असेल की वाळवंटात भाजणारा दाहक संघर्ष या पुस्तकात मांडलेला आहे पण शेवट मात्र सुखांत झालेला आहे. हा सर्व प्रवास वाचनीय आहे. नितीन थोरात यांनी पहिल्या भागाप्रमाणेच अतिशय गतिमान कथानक, वेगवेगळे योगायोग, नियतीचे खेळ ह्यातून संजय उर्फ तम्माचे आयुष्य, त्याची तगमग प्रभावीपणे सादर केली आहे. दोन भागांची तुलना केली तर मागच्या भागापेक्षा या भागात प्रसंगाचे चढ-उतार अजूनच जास्त आहेत. तरी पहिला भाग काकणभर सरस होता. इथेही भाषा रांगडी, गावरान आणि मनातल्या शिव्यांचा स्पष्ट उल्लेख करणारी आहे. दुसऱ्या भागात बऱ्याच वेळा तम्माच्या पूर्वायुष्यातल्या घटनांची पुनरुक्ती झालेली आहे. तीच ती माणसं पुन्हा पुन्हा भेटण्याचे योगायोग फारच घडत आहेत असंही वाटतं पण, पहिल्या भागाच्या वेळी लिहिलं होतं तेच आताही लिहावसं वाटतं. हे असं कसं होऊ शकतं; किंवा या ऐवजी काहीतरी वेगळं व्हायला पाहिजे होतं असे विचार मनात येतील. पण प्रसंगांचा वेग, संवादाची पकड यातून ते वाचताना हे सगळं आपण चटकन बाजूला टाकून पुढे उत्सुकतेने वाचत राहतो हे मला जास्त भावलं.

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

त्सुबाकी स्टेशनर्स (Tsubaki Stationers)

पुस्तक - त्सुबाकी स्टेशनर्स (Tsubaki Stationers) लेखक - इतो ओगावा (Ito Ogawa) अनुवाद - मयुरेश कुलकर्णी (Mayuresh Kulkarni) भाषा - मराठी (Mar...