पुण्यभूमी भारत (Punyabhumi Bharat)

पुस्तक - पुण्यभूमी भारत (Punyabhumi Bharat)
लेखिका - सुधा मूर्ती (Sudha Murty)
अनुवादिका - लीना सोहोनी (Leena Sohoni)
मूळ पुस्तक - The old man and his god (Discovering the spirit of India) द ओल्ड मॅन अँड हिज गॉड - डिस्कव्हरिंग द स्पिरिट ऑफ इंडिया
मूळ पुस्तकाची भाषा - इंग्रजी (English)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १६६
प्रकाशन - ऑक्टोबर २००६, मेहता पब्लिशिंग हाऊस
ISBN - 9788177667608

इन्फोसिस फाउंडेशनच्या प्रमुख सुधा मूर्ती आपल्या समाजसेवेसाठी प्रसिद्ध आहेत. पैसा-प्रसिद्धी-मान मिळूनही त्यांची साधी राहणी, कुटुंबवत्सल वागणं ह्यामुळे त्यांच्याबद्दल आदराइतकाच आपलेपणाही वाटतो. त्यांचं ह्या पुस्तकातलं लेखनही त्यांच्या सरळ वागण्याचं, दुसऱ्याला समजून घेण्याच्या वृत्तीचं प्रतिबिंब आहे. त्यांच्या कुटुंबातल्या, मित्रपरिवारातल्या व्यक्तींच्या बऱ्यावाईट अनुभवांचे वर्णन त्यांनी ह्यात केलं आहे. त्याचबरोबरीने समाजसेवेचे अनुभव सुद्धा लिहिले आहेत. सुनामीग्रस्त, पूरग्रस्त लोकांसाठी त्यांनी काम केलं आहे. आर्थिक, सामाजिक दुर्बल वस्त्यांत काम केलं आहे. त्यांच्या फाउंडेशन मध्ये अनेक तरुण व्यक्तींचं सहकार्य त्यांना मिळतं. ह्या समाजकामासाठी विविध कंपन्या, उद्योगपती देणग्या देतात. त्यांच्याशी संपर्क ठेवून निधी संकलन करावं लागतं. सरकारी अधिकारी आणि शासन यंत्रणेशी संबंध ओघाने येतोच. अशा प्रकारे गरजू व्यक्ती, त्यांना मदत देणारे, कामात हातभार लावणारे, कामात आडकाठी आणणारे, गरीब-मध्यमवर्गीय-श्रीमंत, सगळ्या प्रकारच्या व्यक्तींशी त्यांचा संबंध येतो. "पिंडे पिंडे मतिर्भिन्ना" उक्तीप्रमाणे लोकांच्या वागण्याचे, विचार करण्याचे नाना रंग नाना ढंग त्यांना दिसतात. ते जसे दिसले तसे आपल्यासमोर इथे उलगडले आहेत.

ह्यात ३१ लेख आहेत. प्रत्येक लेखाची एक मध्यवर्ती कल्पना आहे. त्याभोवती आलेले चांगले-वाईट, अपेक्षित-अनपेक्षित असे अनुभव सांगितले आहेत. उदा. मातृत्व ह्या पहिल्याच लेखात त्यांनी त्यांच्या भाषणाचा एक प्रसंग सांगितला आहे. भाषणात त्या आईची महती सांगतात. आई मुलांसाठी कशी त्याग करते, खस्ता खाते, प्रसंगी संकटं झेलते वगैरे. भाषण श्रोत्यांनाही भावलं. पण त्या कार्यक्रमानंतर एक मुलगी त्यांना भेटून स्वतःची जन्मकथा सांगते. लहानपणी त्या मुलीला अंधत्व येऊ लागलं. औषधोपचारासाठी आईवडिलांकडे पैसे नव्हते. एकेदिवशी आईवडील बसस्टँडवर घेऊन आले. तिला बिस्किटाचा पुडा दिला. तिथेच थांब म्हणाले. आणि जे गेले ते कायमचेच. परत कधी आलेच नाहीत. ती मुलगी अनाथ म्हणून बेवारस वाढली. ती मुलगी विचारते "गरीबी ही मातृत्वापेक्षा जास्त मोठी असते का हो?"

ह्या उलट शेवटच्या "सलाम नमस्ते" लेखात गरिबीतली सामाजिक बांधिलकी दिसते. एक गरजू गरीब माणूस पत्नीच्या औषधोपचारांसाठी सुधाजींकडून पन्नास हजार रुपये घेतो. काही महिन्यांनी तीन हजार रुपये परत आणून देतो. म्हणतो की, "औषधोपचारांना प्रतिसाद मिळणं कठीण दिसतंय, मृत्यू अटळ आहे हे कळल्यावर माझ्या पत्नीने अजून खर्च करायला नकार दिला. उरलेले पैसे मॅडमना परत करा. दुसऱ्या कोणाच्या कामी ते येतील असं म्हणाली. म्हणून हे उरलेले पैसे". हे वाचून आपणही अवाक होतो.

सगळ्या कहाण्या गरिबीच्या नाहीत. श्रीमंत दानशूर व्यक्तींनी स्वतःहून कशी मदत केली, कोणा अधिकाऱ्याने कशी मदत केली ह्याची उदाहरणे आहेत. घर - बांगला - गाडी सगळं असून सतत दुसऱ्याशी तुलना करून आपल्यातली असलेली-नसलेली उणीव बघून दुःखी होणाऱ्या श्रीमंत मैत्रिणीची गोष्ट आहे. तर "निवडीचं स्वातंत्र्य" मध्ये दोन मैत्रिणींची गोष्ट आहे. दोघी जिवाभावाच्या मैत्रिणी. शाळेपासून कॉलेजपर्यंत कायम एकत्र राहणाऱ्या. पुढे लग्नानंतर दोघींच्या वाटा वेगळ्या झाल्या. दोघी दोन शहरांत गेल्या. एकीच्या नवरा आर्थिक प्रगती साधून श्रीमंत झाला. तर दुसरी मध्यमवर्गीयच राहिली. तरीही श्रीमंत मैत्रीण पूर्वीच्याच आपुलकीने बोलत राहिली, भेटायचा प्रयत्न करत राहिली. गरीब मैत्रिणीने स्वतःच समज करून घेतला की आपण आता मैत्रिणीच्या योग्यतेचे नाही. तिच्यासारख्या महागड्या वस्तू भेट देऊ शकत नाही. ह्या दोन मैत्रिणींचा - सुधाजींच्या विद्यार्थिनींचा - समेट घालून देण्याचं काम सुधाजी करतात. "प्रेमाची किंमत पैशात करायची नसते. चुकीच्या कल्पना मनात बाळगून चांगल्या मैत्रीला तडा जाऊ देऊ नको. न्यूनगंड बाळगू नको." असा सल्ला देतात. बरेच लेख असे "सुधाजींच्या बोधकथा" प्रकारचे आहेत.

"दुधारी सुरी" मध्ये प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व असण्याचे फायदेतोटे कसे अनुभवायला येतात ह्याचे अनुभव सांगितले आहेत. नावाच्या वजनामुळे सरकार दरबारी कामं लवकर होतात हा फायदा आहे. पण संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला मनापासून आपलेपणा वाटत असेल असं नाही. सुधाजींशी आपली ओळख आहे हे जगाला दाखवून कॉलर ताठ करण्यासाठी जवळीक साधणारेही पुष्कळ असतात. अशी दोन तीन अपेक्षाभंगाची उदाहरणं त्यांनी मोकळेपणे सांगितली आहेत. त्यांना एका लग्नाचं आमंत्रण मिळालं होतं. अगदी आग्रहाचं. लग्नाच्या दिवशी नवरानवरीबरोबर छान फोटोही काढले गेले. पण "जेवून जा", "जेवलात ना" हे विचारायची तसदीही घेतली नाही. यजमानांच्या घरच्या मंडळींनी बोलत बोलत थेट मांडवाच्या बाहेरच आणून सोडलं की!

आफ्रिकेतली जंगल सफारी, तिबेट भेट, पाकिस्तान भेट अशी काही प्रवास वर्णनं सुद्धा आहेत. "पुण्यभूमी भारत" हा तिबेट भेटीवरचा लेख आहे. तिकडे भेटलेली तिबेटी महिला म्हणते की दलाई लामांना भारताने आश्रय दिला आहे. भारत पुण्यभूमी आहे. त्यावरून ह्या लेखाचं आणि लेखावरून पुस्तकाचं शीर्षक घेण्यात आलं आहे.

काही पाने उदाहरणादाखल

श्रीमंतीचं प्रदर्शन करावं की करू नये. दोन मैत्रिणी दोन तऱ्हा



"मला काहीच प्रॉब्लेम नाही" असं सांगणाऱ्या नीताची खरी अवस्था वेगळीच असते. "आधी" आणि "नंतर"चे एकेक पान.



सुखी आयुष्याबद्दल


लीनाजींनी केलेला अनुवाद सरस आहे. ओघवत्या मराठीतला आहे. त्याला १००% गुण !

"पुण्यभूमी भारत" हे शीर्षक वाचून हे पुस्तक भारताची प्राचीन परंपरा, तीर्थक्षेत्रे किंवा महान व्यक्ती वगैरे बद्दलचे असेल अशी माझी कल्पना झाली. तसं काही ह्या पुस्तकात नाही. माणसांच्या बऱ्यावाईट तऱ्हा तर प्रत्येक समाजात आहेतच. त्यामुळे पुस्तकाच्या पाठमजकूरातील (ब्लर्ब) "भारतीय समाजाचा आत्माच या पुस्तकाच्या रूपानं प्रतिबिंबित झाला आहे" हे वाक्य मला पटलं नाही. शीर्षकही नाही.

मुखपृष्ठ मात्र शीर्षकाला साजेसं आणि आतल्या मजकुराला साजेसं आहे. झेंड्याचे तीन रंग आणि एखाद्या गवताळ कुरणाचे निसर्गदृश्य असा मोहक संगम साधलाय.

पुस्तकातले प्रसंग, वर्णनं फार आगळीवेगळी नाहीत. केवळ सुधाजींसारख्या प्रसिद्ध व्यक्तीलाच येतील असे नाहीत. सर्वसामान्य वाचकाच्या आयुष्यात, आजूबाजूलाही असे अनुभव येत असतील. फार नैतिक तिढे आहेत अशातलाही भाग नाही. ती व्यक्ती असं का वागली असा शोध घेण्याचा प्रयत्नही नाही. त्यामुळे लेख वाचायला चांगले, समजायला सोपे असले तरी खूप भरीव वाचल्याचं समाधान मिळालं नाही.


——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

रोमियो अँड ज्युलिएट (Romeo and Juliet)



पुस्तक - रोमियो अँड ज्युलिएट (Romeo and Juliet)
लेखक - विल्यम शेक्सपियर (William Shakespeare)
अनुवादक - अनघा नाटेकर (Anagha Natekar)
भाषा - मराठी (Marathi)
मूळ पुस्तक - Romeo and Juliet (रोमियो अँड ज्युलिएट)
मूळ पुस्तकाची भाषा - English (इंग्रजी )
प्रकाशन - वैशाली प्रकाशन, २०२६
छापील किंमत - रु. ३००/-
ISBN - 978-93-48129-73-4

व्हेरोना शहरात दोन मोठी घराणी - मॉंटेग्यू आणि कॅप्युलेट - असतात. त्यांच्यात पक्कं हाडवैर असतं. ह्या घराण्यातले दोन पुरुष समोरासमोर आले की एकमेकांना पाण्यात पाहणे, तुच्छता दाखवणे असे प्रकार घडत असतात. वादाची खुमखुमी दोन्हीकडे असल्यामुळे वादाचे पर्यावसान मारामारीत, तलवारबाजीने होऊन कोणाचानाकोणाचा जीव त्यात जात असतो. मॉंटेग्यू घराण्यातला रोमियो नावाचा तरुण एका मुलीच्या - रोझालीन -प्रेमात वेडा झालेला असतो. पण ती त्याच्या प्रेमाचा स्वीकार करत नाही म्हणून तो व्याकुळ झालेला असतो. त्याचे मित्र सल्ला देतात की तिच्यापेक्षा सुंदर मुलगी बघितलीस की तू नव्या प्रेमात पडशील. होतं तसंच. एका पार्टीत रोमियो बघतो कॅप्युलेट घराण्यातल्या ज्युलिएटला. बघता क्षणी दोघं प्रेमात पडतात. रात्री रोमियो ज्युलिएटच्या बाल्कनीत चढून तिला चोरून भेटतो. दोघं प्रेमाच्या आणाभाका घेतात. दुसऱ्या दिवशी दोघं चोरून लग्न करतात. पुन्हा आपापल्या घरी जातात.

दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे मॉंटेग्यू आणि कॅप्युलेट लोकांची मारामारी होते. रोमियो ते थांबवायचा प्रयत्न करतो पण भांडणारे लोक थांबत नाहीत. रोमियोचा मित्र मरतो. म्हणून रोमियो कॅप्युलेट व्यक्तीला मारतो. ह्याची शिक्षा म्हणून राजा रोमियोला हद्दपार करतो. ज्युलिएट प्रचंड दुःखी होते. तेवढ्यात तिचे वडील तिचं लग्न ठरवतात. चार दिवसांवर लग्नविधी ठेवतात. तेव्हा ज्या पाद्र्याने रोमियो-ज्युलिएटचं लग्न लावलं तो एक क्लृप्ती सांगतो. ज्युलिएटला असं औषध देतो की ज्यामुळे ती निपचित पडेल, मेली असं वाटेल. लग्न टळेल. तिचे कबरीत दफन होईल. रोमियोला गुप्त निरोप सांगितला जाईल आणि तो तिला कबरीतून बाहेर काढेल. साधारण त्याच वेळी औषधाचा परिणाम होऊन ती पुन्हा हालचाल करायला लागेल.

अर्धा भाग ठरल्याप्रमाणे होतो. पण रोमियोला निरोप मिळत नाही. त्याला बातमी समजते की ज्युलिएट मेली. तो रात्री तिच्या कबरीजवळ येतो. कबर खोदतो. तेव्हा तिचा नियोजित पती - पॅरिस - पण तिथे आलेला असतो. रोमियो आणि पॅरिस च्या तलवार लढाईत पॅरिस मरतो. ज्युलिएट मृत आहे असं वाटून रोमियो विष पिऊन मरतो. मग ज्युलिएट जागी होते. रोमियोला मेलेला बघून स्वतः खंजीर खुपसून आत्महत्या करते.

ही बातमी सगळीकडे पसरते. नोकराचाकरांकरवी सगळं चित्र स्पष्ट होतं. मॉंटेग्यू आणि कॅप्युलेट लोकांना पश्चात्ताप होतो. रोमियो - ज्युलिएट चा सोन्याचा पुतळा उभा करायचा निश्चय होतो.


चार पाने उदाहरणादाखल.

रोमियो रात्री ज्युलिएटच्या हवेलीखाली लपून जात असताना त्याचे मित्र थांबायचा प्रयत्न करतात तेव्हाचा प्रसंग



पाद्री फ्रायर लॉरेन्स ज्युलिएटला कबरीतून बाहेर काढायला येतो तेव्हा



अशी ही नाटकाची पूर्ण गोष्ट. शेक्सपियरच्या मी आधी वाचलेल्या दोन नाटकांत (मॅकबेथ, मर्चंट ऑफ व्हेनिस) नाटकांत जशी विचारांची गुंतागुंत, व्यक्तिमत्त्वाचे कंगोरे, परिस्थतीचे हळूहळू परिपक्व होणे वगैरे इथे फार दिसलं नाही. रोमियो तर दिसली मुलगी, सुंदर वाटली की पड प्रेमात असाच रंगवला आहे. ज्युलिएट पार्टीत रोमियोला बघते आणि आकर्षित होते हे समजू शकतं. पण सहवास, संवाद, प्रेम अशा कुठल्याही तपशिलाच्या भानगडीत न पडता शेक्सपियर त्यांचं लग्न लावून टाकतो. तेही एकवेळ मान्य केलं तरी ज्युलिएट निपचित पडली म्हणजे ती थेट मेलीच ! नाडी तपासणं, वैद्यांना बोलावणं वगैरे काही नाहीच. इतकं होऊन ती कबरीत गुदमरून पण मरत नाही. तिला बाहेर काढायला पाद्री येतो तेव्हा ती जिवंत असते आणि मग ती खंजीर खुपसते. पण तो आवाज ऐकून पाद्री थांबत नाही. शिपाई येतात कोणी तिला वाचवायचा प्रयत्न करत नाही. सगळंच शेक्सपियरच्या मनासारखं... वैद्यक आणि शरीरशास्त्र सुद्धा !

कथानक चांगलं असलं तरी मांडणी फारच भोंगळ आणि वरवरची झाली आहे. संवाद पण कधी फारच अनैसर्गिक बोजड तर काही वेळा घाई घाई केलेले असे आहेत. मराठी भाषांतर मूळ कृतीशी सुसंगत असल्यामुळे तेही तसंच अनैसर्गिक आहे. त्यात अनुवादकाचा दोष नाही. एकूण ह्या नाटकाचं वाचन म्हणजे माझ्यासाठी "नाव मोठं लक्षण खोटं" असा अनुभव देणारं ठरलं.

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

मोरबांगडी (Morbangadi)




पुस्तक - मोरबांगडी (Morbangadi)
लेखिका - डॉ. छाया महाजन (Dr. Chhaya Mahajan)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १६२
प्रकाशन - एक दिशा मन्वंतर पब्लिकेशन. १९९३
छापील किंमत - रु. २६६/-
ISBN - 978-81-950433-6-1

सुशिक्षित मध्यमवर्गीय समाजात घडणाऱ्या कौटुंबिक घटना, बोलले जाणारे आणि टाळले जाणारे विषय, त्यात गेल्या काही वर्षांत झालेले बरेवाईट बदल, आणि हे बघत असताना संवेदनशील मनात जी विचारांची आवर्तने उठतात त्याचे शब्दांकन म्हणजे "मोरबांगडी" हे ललित गद्य. ह्यात १९ लेख आहेत. एकेक लेख साताठ पानी आहे. विषय वेगवेगळे आहेत. एक मुख्य विषय घेऊन त्या अनुषंगाने मनात येणारे विचार, आयुष्यात घडलेल्या घटना, दुसऱ्यांकडून ऐकलेले किस्से लेखात येतात. मग त्या घटनेतल्या व्यक्तीच्या मनात डोकावण्याचा थोडा प्रयत्न आणि त्यातून परिस्थितीचा साधकबाधक विचार आहे. काही वेळा, एका गोष्टीचा विचार करताना आलेली आठवण, त्यातून दुसराच विचार, तिसराच किस्सा असा लेखाचा ओघ आपल्या अचपळ मनाचे दर्शनही घडवतो.

पहिलाच लेख "हिशेब". ह्यात लेखिकेच्या लहानपणी त्यांच्या आजोबांच्या हाताखाली काम करणाऱ्या नानामामांचे व्यक्तिचित्रण आहे. स्वभावाने प्रेमळ पण बुद्धीने हिशेबात कच्चे. घरचा शेतमाल घेऊन विकायला बाजारात जाऊन विकण्याची जबाबदारी त्यांची. हिशेबात चुकले की आजोबांची बोलणी खायचे. मोठ्या माणसाने बोलणी खावी ह्याचं मुलांना अप्रूप वाटायचं. हा पैशाच्या हिशेबाचा किस्सा. मग "हिशेब" ही संकल्पना घेऊन, वेळेचा हिशेब, आयुष्याचा हिशेब असा तिचा विस्तार लेखिका करते. "भोळसट रंगाबाबाची पोरगी भामट्याने फितवली", "अवेळी प्रेमात पडून छबीने आत्महत्या केली " ह्यातून आयुष्याचा हिशेब चुकल्याचे दाखले आहेत. पुढे ह्या सगळ्या घटना बघताना स्वतःच्या मनात काय विचार आले होते, आपल्या स्वतःच्या आयुष्याचा हिशेब जमला आहे का असा आत्मसंवाद रंगला आहे.

"नमस्कार" - मोठ्यांना, गुरुजनांना नमस्कार करणे ही आपली संस्कृती. त्यात आदर, सन्मान ही भावना असते. त्याला प्रतिसाद म्हणून समोरच्याकडून आशीर्वाद येतो. पण हल्ली वाकून नमस्कार करायची पद्धत कमी होते आहे. नव्या पिढीला मोठ्यांना नमस्कार करायची लाज वाटते, अवघडल्यासारखं वाटतं. नमस्काराबद्दल विचार करताना लेखिकेच्या लहानपणी, नवविवाहितेने शेजारी मोठ्यांना नमस्कार केला नाही म्हणून घरात झालेली वादावादी आठवली. तर आता मुलं देवालाही नमस्कार करायला टाळाटाळ करतात इथपर्यंत आपण येऊन पोचलो आहोत हे जाणवतंय.

"अलिप्त" ह्या लेखात शहरातल्या आणि गावाकडच्या लोकांच्या मनोवृत्तीतला फरक मांडला आहे. शहरात राहणारे, नावाजलेले मान्यवर कार्यक्रमाच्या निमित्ताने, सत्काराच्या निमित्ताने छोट्या गावांमध्ये येतात. तिथल्या लोकांचा आदरसत्कार घेतात. अगदी घरच्यासारखे मोकळेपणाने रहातात. मात्र हेच शहरी लोक स्वतःच्या शहरी आलेल्या, घरी आलेल्या लोकांचे स्वागत करण्यात कोतेपणा करतात, प्रसंगी ओळखही दाखवत नाहीत. ह्याचे लोकांनी सांगितलेले अनुभव लेखात आहेत.

"हरवण्याचं दुःख" मध्ये घरात ठेवलेले पैसे हरवले आणि त्याची शोधाशोध ह्याची धमाल आहे. पैसे हरवले तर ते आता कायमचे गेले हे स्वीकारून पुढे जाण्याचा सल्ला एक पोक्त व्यक्ती देते. त्यातून "हरवणे" ह्या कल्पनेचा विस्तार करत अकाली मृत्यूमुळे प्रेमाची व्यक्ती "हरवण्याचं दुःख" मांडलं आहे.

"रातराणी" लेख नववर्ष स्वागताबद्दलचा आहे. ३१ डिसेंबरची रात्र लोक नाचत, गात आनंदाने साजरी करतात. नवीन वर्षाचं उत्साहाने, जल्लोषात स्वागत करतात. ३१ डिसेंबर हा काही आपला पारंपरिक सण नव्हे, तो साजरा करण्याची पद्धतही पाश्चात्य. पण आपण ते मनापासून स्वीकारलं आहे. कुठल्याही धार्मिक सणांमध्ये, रीतीरिवाजांपेक्षा खूप वेगळेपणा ह्यात आहे. मोकळेपणे, सर्वांगाने नाचण्याची, चित्कार करण्याची, स्वतःचा असा स्वीकार करण्याची मुभा ३१ डिसेंबरची रात्र आपल्याला देते. हे वेगळेपण लेखिकेने अधोरेखित केलं आहे.

काही पानं उदाहरणादाखल.

अनुक्रमणिका


साबणाचे फुगे उडवण्याच्या खेळण्यामागची तात्विक दृष्टी



लहान मुलाला घेऊन पहिला विमान प्रवास करताना उडालेली तारांबळ आणि मदतीचा हात



आपत्ती व मानवाचे त्यातून सावरणे ह्याबद्दलचे चिंतन



असे खूप वेगवेगळे लेख ह्यात आहेत. मजेशीर किस्से, भावनिक चिंतन ह्यातून सगळे लेख वाचनीय झाले आहेत. बहुतेक लेख हे स्मरणरंजन करणारे (नॉस्टॅल्जीक), "गेले ते दिन गेले" अशा स्वरूपाचे आहेत. थोडे उदासवाणे, मानवी हतबलता दाखवणारे आहेत. मराठी भाषेतले वाक्प्रचार, हल्ली कानावर कमी पडणारे शब्द इथे वाचायला मिळतात. अगदी कमी वाक्यांत नेपथ्य उभं करण्याची हातोटी लेखिकेची ताकद दाखवते. सुंदर उपमा आणि वर्णनं ह्यातून नेमके भाव वाचकांपर्यंत पोचतात. त्यामुळे सकस भाषेतले पुस्तक वाचल्याचा आनंद मिळतो.

"पाऊस" - लेखिकेच्या लहानपणी गावात पाऊस पडून गेल्यावर चांदणं पडलं असेल तर बैलगाडीतून सगळे चांदणी रात्र बघायला बाहेर पडत. त्याचं वर्णन लेखिका करते "नांगरटीमुळे शेतात छोट्या छोट्या खड्ड्यांत थोडं थोडं पाणी साचलेलं असायचं. त्यात चांदण्याची प्रतिबिंब पडायची. शेतभर, मातीच्या पणत्यांत पाण्याचं तेल असायचं आणि चांदण्या ज्योती होऊन त्यावर नाचायच्या. त्या जमिनीतल्या पणत्या तेऊन उठायच्या. दिवाळीची आरास फिक्की पाडावी". व्वा ! काय विलक्षण उपमा.

"ऊन" लेखातला प्रसंग. लेखिकेचे आजोबा लहान मुलांना मुद्दामून उन्हातून बाहेर फिरायला पाठवायचे. त्यावर रागावलेल्या आजीला त्यांचं सांगणं असायचं "घरादाराचा उन्हाळा होतो. म्हणून पोरांनी ऊन पाहावं. आपल्या डोक्यावर सावली आहे तोवर ठीक आहे. पण छप्पर गेलं आणि उन्हाळाच डोक्यावर आला तर तयारी असावी". आजोबांचं हे परखड काव्य आजीला अभद्र वाटलं. ती म्हणाली, "छप्पर असताना मोठाल्या खिडक्या-दारांतून ऊन कळत नाही की काय? त्यासाठी छप्परच नको उडायला, डोळे उघडे असले की झालं".

"दुपार" ह्या लेखात वर्णन आहे की.. सकाळची कोवळीक कणाकणानं बदलते आणि होते दुपारची प्रौढा. ही प्रौढा प्रत्येकाची आहे ...दुपार आणि झोप हे समीकरण आहे. सकाळपासून केलेल्या कामानं थकलेलं मन आणि शरीर या प्रौढीची वाट पाहतं. जसं वाक्य लिहिताना लागणार स्वल्पविराम, तशी ही दुपार. दुपारची विश्रांती हा खरा स्वल्पविरामच. खरी झोप नव्हे. दुपार हे मानाचं अंगण आहे. स्वतःचं हक्काचं तिथे ते एकटं बागडतं"

अशी कितीतरी सुखावणारी, टोचणारी, गुदगुल्या करणारी पण थेट भिडणारी वाक्यं आणि वर्णनं वाचनाचा आनंद द्विगुणित करतात.


——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

चित्तर-बित्तर (Chittar-Bittar)




पुस्तक - चित्तर-बित्तर (Chittar-Bittar)
लेखिका - सारिका कुलकर्णी (Sarika Kulkarni)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १५९ 
प्रकाशन - ग्रंथाली प्रकाशन, मार्च २०२६ 
छापील किंमत - ३००/- रुपये 
ISBN - 978-93-5650-557-5

दैनंदिन आयुष्यामध्ये आपण 
बऱ्याच लोकांना वरचेवर भेटत असतो. आपले शेजारी, नोकरीव्यवसायातले सहकारी, आजूबाजूचे दुकानदार, रिक्षावाले, सफाईकर्मचारी, घरकाम करणाऱ्या बायका, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, सुतार वगैरे वगैरे. बहुतेकांची नाव-व्यवसाय आपल्या लक्षात असतात. पण व्यक्ती लक्षात राहण्याची पुढची पायरी म्हणजे तिचं व्यक्तिमत्त्व लक्षात राहणं. हे मात्र फार थोड्या लोकांच्या बाबतीत घडतं. ज्या माणसांच्या वागण्यात, बोलण्यात, हावभावात, हातवाऱ्यात काही वैशिष्ट्य असतं ती माणसं नमुनेदार माणसं म्हणून मनात बसतात. कोणाचं बोलणं सामान्यच असतं पण स्वभाव नमुनेदार असतो म्हणून लक्षात राहतात. अशी माणसं जेव्हा भेटतात तेव्हा त्यांच्या गमतीजमती किस्से हे आपल्याला इतरांनाही सांगावेसे वाटतात. सारिका कुलकर्णी यांचं "चित्तर बित्तर" पुस्तक अशाच नमुनेदार माणसांचे किस्से आपल्याला सांगून आपली करमणूक करणारं आहे.

यात १९ नमुनेदार माणसांची ओळख करून दिली आहे. या पुस्तकात आपल्याशी बोलणाऱ्या निवेदिकेचे आडनाव कुलकर्णीच आहे. श्री. व सौ. कुलकर्णी आणि त्यांची मुलगी हे पुण्यातल्या शांतिप्रसाद सोसायटीत राहतायत.  सोसायटीतले त्यांचे लक्षात राहणारे शेजारी, कुलकर्णी बाईंच्या ऑफिसमधले सहकारी ह्यात आहेत. प्रवासानिमित्त बाहेरगावी गेल्यावर भेटलेली, लक्षात राहिलेली माणसे सुद्धा आहेत. चालण्याबोलण्याच्या विशिष्ट लकबी किंवा वेशभूषा काहीतरी विचित्र आहेत असं वर्णन करून इथे विनोद साधला नाहीये तर व्यक्तींचे स्वभाव व त्याच्या अतिरेकामुळे लक्षात राहणारे प्रसंग अशा पद्धतीचे वर्णन आहेत. यातलं कोणीच खलनायक पद्धतीचं अवगुणी नाही. उलट बहुतेक सगळे मनाने चांगले आणि सुसंस्कृतच आहेत. पण त्यांचा चांगुलपणा, प्रेम, पुढाकार घ्यायची वृत्ती किंवा मदत करायची वृत्ती बऱ्याच वेळा "आता यांना आवरा !!" असं म्हणायला लावणारी आहे.

कोण कोण बरे दिसतय याच्यात ? काही वल्लींची ओळख करून घेऊया ..

पाटील - सोसायटी मधल्या सर्व कामांत पुढाकारघेणारे श्री. पाटील. सोसायटीचा गणपती-नवरात्र असो की कुठला कार्यक्रम. सगळी व्यवस्था स्वतः बघणारे, प्रसंगी स्वतःचे पैसे खर्च करणारे पाटील. समोर काम दिसलं, काही अडचण दिसली की स्वतःहून परिस्थितीचा ताबा ते घेतात. काही वेळा समोरच्याला अवघडल्यासारखं झालं तरी त्याकडे अजिबात लक्ष न देता... याचे मजेशीर किस्से यात आहेत

रोतीजा - "रोती जा". बाई तू रड! काही दुःखद वाईट बातमी ऐकली की हुकमी रडू येणारी ऋतुजा. कुलकर्णी काकूंची ऑफिसमधली सहकारी. ऋतुजाच्या वेळी अवेळी रडण्याने निर्माण होणारे अनावस्था प्रसंग छान दाखवले आहेत.

चंदू - लहानपणापासून वडिलांच्या स्टेशनरी दुकानात काम करणारा, वह्यापुस्तकात राहूनही अभ्यासात चमक दाखवू न शकलेला पण इतरांच्या अभ्यासाची मात्र काळजी करणारा विनोद.

सेवाव्रती जोशी काकू - बिल्डिंग मधल्या प्रत्येक अडल्यानडल्या माणसाला मदत करणं, लोकांना आवडीचे पदार्थ करून खायला घालणं आणि त्या बदल्यात कुठलीही अपेक्षा न ठेवणं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जोशी काकू. या काकूंनी कोणाकोणाला आणि कशीकशी मदत केली, काकूंच्या या स्नेहाने गुदमरून जाण्याचे प्रसंग तिऱ्हाइतांनाही कसे आले कसे याचे प्रसंग या लेखात आहेत.

"मी काकू"जोशीकाकूंच्या उलट, काही न करता प्रत्येक गोष्टीचं श्रेय घेण्यासाठी पुढे पुढे करणाऱ्या "मी काकू" सुद्धा पुस्तकात आहेत.

इथे बडबड करणाऱ्या फटकळ कामवाल्या चंद्रा मावशी भेटतील. प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमात समारंभात माइकचा ताबा आला की तो न सोडणारे "माइक"ल काका आपल्याला बोलून बोलून हैराण करतील. घरकामाची कंत्राटे घेणारे अप्पा स्वतःच्या कामाविषयीच्या अभिमानाने सांगतील. त्या दर्जाचं काम मजुरांकडून करून घेण्यासाठी शिव्या देऊन आपलं घर बांधतील आणि आपल्या मनातही घर करतील. पंजाबचे दिलखुलास "टिप्सी अंकल" वाहनाची काळजी घेतीलच, पुढे जाऊन परगावाहून आलेल्या माणसाला कायमचं आपलंसंही करतील. 

एकदाच भेट झालेले, पण ती भेट कायमची लक्षात राहिली अशाही काही भेटी आणि माणसे पुस्तकात आहेत. पर्यटन स्थळाची, तिथल्या माणसांची स्तंभूत माहिती असणारा पोरसवदा पितळे, टॅक्सीवाले भाडं नाकारतात म्हणून आवाज वाढवून मिळवून देणारा दमदार माणूस सुद्धा आपल्याला भेटेल.

अशी नाना रंगाची नाना ढगांची चित्तरवित्तर माणसं या पुस्तकात आहेत. ह्याला साजेसे असे मुखपृष्ठ आहे. 
पेनातून बाहेर पडलेले विविधरंगी ठिपके, नावामागचे रंगबेरंगी फरांटे आहेत. पुस्तकाच्या मुखपृष्ठवरच सर्वांची नावे अर्थात अनुक्रमणिका देण्याचा वेगळा प्रयोग केला आहे. पुंडलिक वझे ह्यांनी मुखपृष्ठ केले आहे. तर मजकूराबरोबर असणारी चित्रे आशुतोष वाळे ह्यांची आहेत. "मार्मिक" नियतकालिकात ही लेखमाला प्रकाशित झालेली आहे. 

पुस्तक वाचताना खदखदून हसायला येईल असं नाही पण चेहऱ्यावर स्मितहास्य फुलून, वाचनाचा आनंद नक्की मिळेल. विनोदी लिहिलंय म्हणजे ते पोरकट, हलकं आहे असं वाचकांना वाटायला नको म्हणून मुद्दामून काहीतरी गांभीर्य आणायचा किंवा करुणादायक डोळे पाणवणारा शेवट करायचा प्रयत्न केलेला नाही. हे छानच.

व्यक्तिचित्रण म्हटल्यावर पुलंच्या "व्यक्ती आणि वल्लीशी" तुलना मनात सुरू होणे स्वाभाविक आहे. पण एकदोन लेख वाचल्यावर लक्षात येतं ही दोन्हीचा बाज पूर्णपणे वेगळा आहे. "व्यक्ती आणि वल्ली" मधले लेख दीर्घ आहेत. त्यात  व्यक्तीच्या आयुष्यातले वेगवेगळ्या कालखंडात घडणारे प्रसंग आहेत. वल्लीपणा मागच्या प्रेरणांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न आहे. पण सदर पुस्तकाचा उद्देश वेगळा आहे. या पुस्तकातले लेख हे आकाराने लहान आहेत. मर्यादित कालावधीत समोर घडणाऱ्या प्रसंगांतून निखळ मनोरंजन करणारे आहेत. शब्दयोजना वर्णन शैलीसुद्धा वेगळी आहे.

काही पाने उदाहरणादाखल

लेखिकेबद्दल पुस्तकात दिलेली माहिती.



चौकशा करून भंडावून सोडणारे भोसले.... लेखांमध्ये "मी काय म्हणते ..." असं म्हणत शेवट करण्याची लेखिकेने वापरलेली स्टाईल्



माइकल काका



चित्रविचित्र व्यवसाय करून बघण्याची आवड असलेली एकता.



लेखिका आणि मी, दोघेही "पुस्तकप्रेमी" नावाच्या साहित्यविषयक उपक्रमाचे सदस्य आहोत. मे २०२६ मध्ये आमच्या पुस्तकप्रेमी समूहाचे संमेलन कराड येथे साजरे झाले. तिथे थेट लेखिकेकडून पुस्तक विकत घेण्याची संधी मिळाली. तेव्हाचा हा फोटो.


संमेलनात सारिकाताईंनी "टिप्सी अंकल" ह्या लेखाचं अभिवाचन केलं होतं. त्यांच्या तोंडून व्यक्तिचित्रण ऐकायला मजा आली. त्याची युट्युब लिंक 

पुस्तक वाचताना आपल्या आजूबाजूला सुद्धा अशी माणसं आहेत हे सतत वाटत राहील. जणू आपल्याच ओळखीच्या जोशी काकूंना, पाटील काकांना, आपल्याच प्लंबर आप्पांना किंवा असंख्य चौकशा करणाऱ्या आपल्याच नातेवाईकाला ही लेखिका भेटली होती काय असं वाटेल. आपण सुद्धा असं शब्दांकन करावं अशी ही प्रेरणा पुस्तक वाचून मिळू शकेल.

लेखिकेची शैली उसनी घेऊन ... मी काय म्हणतो, तर हे पुस्तक हातात घ्या, कुठलाही लेख काढा, वाचा आणि निर्विष विनोदाचा आनंद घ्या.

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

मर्चंट ऑफ व्हेनिस (Merchant of Venice) , मॅकबेथ (Macbeth)








१) पुस्तक - मर्चंट ऑफ व्हेनिस (Merchant of Venice)
लेखक - विल्यम शेक्सपियर (William Shakespeare)
अनुवादक - शिरीष सहस्रबुद्धे (Shirish Shasrabuddhe)
भाषा - मराठी 
मूळ पुस्तकाची भाषा - इंग्रजी 
पाने - १२७
प्रकाशन - वैशाली प्रकाशन. एप्रिल २०२६
ISBN 978-93-48129-53-6
छापील किंमत - रु. ३००/-

२) पुस्तक - मॅकबेथ (Macbeth) 
लेखक - विल्यम शेक्सपियर (William Shakespeare)
अनुवादक - सुरश्री जोशी (Surashri Joshi)
भाषा - मराठी 
मूळ पुस्तकाची भाषा - इंग्रजी 
पाने - ११०
प्रकाशन - वैशाली प्रकाशन. एप्रिल २०२६
ISBN 978-93-48129-71-0
छापील किंमत - रु. ३००/-

शेक्सपियर हा इंग्रजीतला विख्यात नाटककार. जगप्रसिद्ध नाटककार. सोळाव्या शतकात हा नाटककार होऊन गेला असला तरी त्याच्या नाटकांची मोहिनी अजूनही जगभरातल्या नाट्यप्रेमींवर, साहित्यप्रेमींवर, भाषाप्रेमींवर आहे. त्या नाटकांचे प्रयोग अजूनही होतात. त्या नाटकांची जगभरातल्या भाषांमध्ये भाषांतरे होतात. रूपांतरे होतात. मूळ नाटकातली भाषा पाचशे वर्षांपूर्वीची जुनी इंग्रजी असल्यामुळे ती जुनी नाटकं जशीच्या तशी वाचायला घेतल्यावर प्रत्येकालाच समजतील असं नाही. पण त्या नाटकांच्या कथानकांबाबत उत्सुकता आपल्या सर्वांनाच असते. अशावेळी या नाटकांचे मराठीमध्ये असलेले भाषांतर नक्की उपयोगी पडतं.

मराठी भाषेतही वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या कालखंडात ही नाटके भाषांतरित केलेली आहेत. पण आता त्या भाषांतरित पुस्तकांमधली मराठी भाषा सुद्धा थोडी जुन्या वळणाची, कदाचित क्लिष्ट वाटू शकेल. त्यामुळे आजच्या मराठीत, सोप्या मराठीत शेक्सपियरचे साहित्य भाषांतरित झाले तर ती मराठी वाचकांसाठी आनंदाची बाबच आहे.

२३ एप्रिल हा शेक्सपियर चा जन्मदिवस आणि मृत्यू दिवस. म्हणूनच तो जागतिक पुस्तक दिवस म्हणूनही साजरा केला जातो. यावर्षी(२०२६) मध्ये २३ एप्रिल च्या मुहूर्तावर वैशाली प्रकाशनने शेक्सपियरच्या सहा नाटकांची आजच्या आणि सोप्या मराठीत नव्याने भाषांतरे प्रकाशित केली आहेत. मी त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो आणि तेव्हा ती सहाही पुस्तके विकत घेतली. त्यातली दोन वाचून झाली. त्याबद्दल आता लिहितो. सुरुवातीलाच स्पष्ट करतो की, नेहमीप्रमाणे हे माझे पुस्तक परीक्षण नाही; तर नव्याने आलेल्या पुस्तकांची माहिती आणि मी ती वाचली याची वाचन नोंद आहे.

"मर्चंट ऑफ व्हेनिस" या नाटकात एक ज्यू सावकार, एक ख्रिश्चन व्यापारी, व्यापाऱ्याचा मित्र आणि मित्राची प्रेयसी अशी पात्रे आहेत. ज्यू सावकार - शायलॉक - आपल्या धंद्यात पक्का आहे. दिलेले कर्ज वसूल करण्यात तो वाकबगार आहे. कर्ज फेडू न शकणाऱ्यांकडून कसंही करून तो पैसा मिळवतोच. त्यामुळे लोकांचं त्याच्याबद्दलचं मत, तो एक दुष्ट,लोभी, पाषाणहृदयी माणूस आहे, असं झालं तर नवल नाही.

या उलट ख्रिश्चन व्यापारी - अँटोनियो - लोकांना बिनव्याजी कर्ज देतो. सावकाराची कर्ज फेडायला मदत करत असतो. त्यामुळे शायलॉक अँटोनीयोवर डूख धरून आहे.

पुढे परिस्थिती अशी होते की अँटोनियो मित्रासाठी शायलॉक कडून कर्ज घेतो. कर्ज फेडलं नाही तर अँटोनियोला भयंकर शिक्षा होईल अशा शर्ती ठरतात. मित्राला ते कर्ज फेडणं का शक्य होत नाही, त्या भयानक अटी काय असतात आणि त्या भयानक अटींपासून त्याची सुटका कशी होते हे सगळं नाट्य म्हणजे "मर्चंट ऑफ व्हेनिस".

काही पाने उदाहरणादाखल

मित्राची प्रेयसी पोर्शिया या पात्राच्या स्वयंवराच्या वेळचा पण आणि मोरोक्कोच्या राजपुत्राचा त्याला प्रतिसाद.


कर्ज वेळेत फेडू न शकल्याने ठरवलेली जीवघेणी शिक्षा अँटोनियोला मिळालीच पाहिजे यासाठी हट्टाला पेटलेल्या शायलॉकचे संवाद.



दुसरं नाटक मी वाचलं ते "मॅकबेथ". स्कॉटिश राजा डंकनचा सरदार मॅकबेथ. मॅकबेज अतिशय शूरवीर धडाडीचा आणि डंकनचा विश्वासू सरदार. पण आपल्या बायकोच्या हट्टाला बळी पडून तो डंकनचा स्वतःच्या घरी खून करतो. स्वतः राजा बनतो. डंकनची मुले परागंदा होतात. इतर सरदारांचेही खून घडवले जातात. राज्यात असंतोषाचे वातावरण पसरतं. अराजक निर्माण होतं. मॅकबेथ आणि त्याची पत्नी कपटाने मिळवलेलं यश मनापासून उपभोग होऊ शकत नाहीत. आपल्या अपराधाची टोचणी त्यांच्या मनात सतत सलत असते. जुन्या राजाशी प्रामाणिक सरदार मॅकबेथविरुद्ध उठाव करायचं ठरवतात. शौर्य, विश्वासघात, पश्चाताप, महत्वकांक्षा, बंड, राजनिष्ठा या सगळ्याचं नाट्य म्हणजे "मॅकबेथ".

काही पाने उदाहरणादाखल.
मॅकबेथ नाटकातल्या प्रसिद्ध चेटकिणींची गुरु हेकेट चा संवाद


खून केल्यानंतर मॅकबेथ आणि त्याच्या बायको मधला संवाद




वरच्या दोन परिच्छेदात मी थोडक्यात कथानक सांगितले आहे. पण या ढोबळ कथानका पलीकडे प्रत्येक पात्र, त्याची वैचारिक व मानसिक भूमिका, त्यांचे संघर्ष हे सगळं तितकंच महत्त्वाचं आहे. गेली चारशे वर्ष हजारोंनी साहित्यप्रेमी साहित्यअभ्यासक शेक्सपियरच्या साहित्याचा अभ्यास करतायत, प्रबंध लिहितायत, पीएचडी करतायत. त्यामुळे मी त्यावर नव्याने स्वतंत्रपणे काही लिहावं इतका माझा अभ्यास नाही.

पण ह्या पुस्तकांमुळे मराठीत ही नाटके वाचायला मिळाली, त्याचं कथानक समजलं, त्यातली गुंतागुंत थोडक्यात लक्षात आली हेही नसे थोडके.

दोन्ही अनुवादकांनी उत्तम अनुवाद केला आहे. मुळातच ही नाटके आहेत त्यामुळे भाषा थोडी नाटकी असणारच. तिचं मराठीकरण करताना तो नाटकीपणा, औपचारिकपणा मराठीत येणं ही स्वाभाविक आहे. मूळ नाटकातली भाषा पद्य स्वरूपाकडे झुकणारी आहे. पण इथे तसा तंतोतंत अनुवाद, यमक जुळवत पद्य स्वरूपातला अनुवाद न करता थेट गद्य स्वरूपातच संवाद आहेत. त्यामुळेच ते वाचायला आणि कथानक समजून घ्यायला सोपं आहे.
दोन्ही पुस्तकांच्या प्रस्तावनेत अनुवादक शिरीष सहस्त्रबुद्धे यांनी नाटकातल्या प्रतिमा, पत्रांच्या वर्तनातले ताणेबाणे, शेक्सपियरची शैली याबद्दल थोडक्यात निरीक्षणे मांडली आहेत. त्या दोन्ही प्रस्तावना वाचनीय आहेत.

शेक्सपियरच्या साहित्याबद्दल उत्सुकता असणाऱ्या पण मूळ इंग्रजी वाचू न शकणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाने अवश्य वाचावं अशी ही दोन पुस्तके आहेत.

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

त्सुबाकी स्टेशनर्स (Tsubaki Stationers)

पुस्तक - त्सुबाकी स्टेशनर्स (Tsubaki Stationers)
लेखक - इतो ओगावा (Ito Ogawa)
अनुवाद - मयुरेश कुलकर्णी (Mayuresh Kulkarni)
भाषा - मराठी (Marathi)
मूळ पुस्तक - ツバキ文具店 (त्सुबाकी बुंगुतेन) Tsubaki Bunguten
मूळ पुस्तकाची भाषा - जपानी (Japanese)
प्रकाशन - कलासक्त. ऑगस्ट २०२५
छापील किंमत - रु. ५५०/-
ISBN- 978-81-944022-7-5

सध्याच्या संपर्कक्रांतीच्या जगात व्हिडीओ कॉल च्या माध्यमातून क्षणार्धात पृथ्वीवरच्या दुसऱ्या टोकावरच्या माणसाला बघून त्याच्याशी बोलता येतं. काही माहिती पाठवायची असेल तर व्हॉट्सअप, ईमेलद्वारे ती तात्काळ पाठवता येते. दुसऱ्याला मेसेज पोचले की नाही, त्याने वाचले की नाही हे सुद्धा समजते. त्यामुळे पूर्वीसारखं एकेमेकांना पत्र लिहायचं प्रमाण फारच नगण्य झालं आहे. तरीही ज्यांनी पूर्वी पत्र लिहिली आहेत त्यांना ते जुने दिवस आठवतात. गंमत अशी झाली आहे की; पत्र ह्या माध्यमाच्या मर्यादाच आता त्या माध्यमाची वैशिष्ट्य वाटतात. ईमेल आपण टाईप करतो, पत्र हाताने लिहितो. लिहिणाऱ्याचा वैयक्तिक स्पर्श त्याला असतो. ईमेल कितीही मोठा लिहू शकतो, कितीही मोठी अटॅचमेंट पाठवू शकतो. पण हाताने पत्र लिहिताना मजकुराला काही मर्यादा पडतात. दोन-तीन पाने लिहिली तरी किती मोठं पत्र लिहिलं आहे असं वाटणार. त्यामुळे कमी जागेत, कमी शब्दांत जास्तीत जास्त माहिती, मजकूर, भावभावना प्रभावीपणे मांडणे आवश्यक होते. लिहिणाऱ्याच्या विचारांचा, शब्दांचा तिथे कस लागतो. शब्दांव्यतिरिक्त पत्राचा कागद, त्यावरची नक्षी, सजावट, हस्ताक्षरातले बदल, त्यात काढलेली चित्र , रेघोट्या, पत्राबरोबर पाठवलेलं एखादं फूल, सुगंधाचा थेंब ह्यातून "शब्देविण संवादु"ही करता येतो. असं मनापासून लिहिल्यावर ते कधी पोचेल, वाचणाऱ्याला काय वाटेल, तो काय उत्तर देईल, त्याचं उत्तर कधी येईल ह्याची वाट बघावी लागते. "त्वरित प्रतिसादाच्या" instant gratification च्या जमान्यात असे वाट बघणे, झुरणे सुद्धा आपण विसरलो आहोत ते पुन्हा मिळवल्याचा अनुभव येईल.

पत्रलेखनाच्या ह्या वैशिष्ट्यांची जाणीव असणाऱ्या व्यक्तींभोवती फिरणारी ही कादंबरी आहे. जपानमध्ये टोकियोपासून जवळ असणाऱ्या कामाकुरा गावात घडणारी ही ही गोष्ट आहे. कमाकुरा अगदी खेडेगाव नाही पण खूप मोठे शहरही नाही. तिथल्या जुन्या मंदिरांमुळे ते पर्यटकांनाही भुरळ घालणारे समुद्राकाठचे छान गाव आहे. या गावात "त्सुबाकी स्टेशनर्स" नावाचं स्टेशनरीचं दुकान आहे. दुकान चालवणारी तरुण हातोको अमेमिया काही वर्षे परदेशात राहून आता जपानला परत आली आहे. दुकानाच्या वरच तिचं घर आहे. पूर्वी तिची आजी आणि ती तिथे राहायचे. पण काही महिन्यांपूर्वी तिच्या आजीचं निधन झाल्यानंतर ती पुन्हा जपानला आली आणि हे दुकान चालवायला लागली आहे. कागद, पेन्सिल, पेनं शालेय वस्तू दुकानात मिळतातच पण पत्रलेखन हे ह्या दुकानाचे वैशिष्ट्य आहे.

कामापुरा गावातल्या लोकांना आपल्या नातेवाईकांना, सहकाऱ्यांना, मित्र-मैत्रिणींना काही खास प्रसंगी पत्रच लिहाविशी वाटतात. वर म्हटल्याप्रमाणे, फोन ई-मेल यापेक्षा पत्रातून आपल्या भावना चांगल्या पोचतील असं त्यांना वाटतंय. पण पत्रलेखनाची सवय गेली असल्यामुळे म्हणा, भाषेवर तितकं प्रभुत्व नाहीये म्हणा किंवा अगदी हस्ताक्षर चांगलं नाही म्हणा अशा कारणांमुळे त्यांना ते पत्र स्वतः लिहायचं नाहीये. ते कोणाकडूनतरी लिहून घ्यायचे आहे. हे काम करायची हातोकोची आजी. पत्रलेखन करून घेणाऱ्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे, व्यक्तिमत्व कसं आहे, पत्र कोणाला पाठवायचं आहे, पत्रातून राग, लोभ, ताटातूट, विरह अशा कुठल्या भावना व्यक्त करायची आहे हे सगळं लक्षात घेऊन प्रत्येक पत्राला स्वतंत्र, अनोखं करण्याचा तिच्या आजीचा प्रयत्न असायचा. त्यामुळे त्या त्या प्रसंगाला साजेसा कागद, रंग, शाईचा कमीअधिक गडदपणा, पत्राची नक्षी, पत्राला लावायचा स्टॅम्प, पत्र घालायचा लिफाफा, हे सगळं सगळं वेगवेगळं असायचं. त्सुबाकी स्टेशनर्स कामाकुराच्या लोकांमध्ये जिव्हाळ्याचं होतं . ही कला आपल्या नातीतही उतरावी अशी आजीची मनापासून इच्छा होती. त्यामुळे लहानपणापासून हातोकोकडून चांगली अक्षरं गिरवून घेणं, पत्रलेखनाचे सर्व नियम सोपस्कार व संकेत तिने घटवून घेतले होते. आजीच्या माघारी हातोको आता पहिल्यांदाच स्वतंत्रपणे या कामात उतरलीये. आता तिला कोण कोण व्यक्ती भेटतात आणि किती वैशिष्ट्यपूर्ण पत्र तिला लिहावी लागतात याची ही गोष्ट आहे.

एक व्यक्ती येऊन सांगते की आमचा माझा आता घटस्फोट होणार आहे. आम्ही नवराबायकोने एकत्र चांगलं आयुष्य घालवलं. पण बायकोला दुसरा कोणीतरी आवडू लागला आहे. ते दोघं लग्न करणार आहेत. जे लोक माझ्या लग्नाला आले होते त्या सगळ्यांना आमच्या घटस्फोटाची बातमी कळवायची आहे. पत्रात आमच्या सहजीवनात घेतलेला आनंद दिसू दे. आमच्यात कटुता नाही पण घटस्फोट होतोय याचा खेद मात्र नक्की आहे. हे सगळं त्या पत्रातून येऊ द्या.

दुसरी एक व्यक्ती येते. तिला तिच्या तरुणपणीच्या प्रेयसीला पत्र पाठवायचं असतं. तो आणि ती दोघेही आता आपल्या संसारात रमले आहेत. परत एकत्र भेटण्याची शक्यता नाही. पण तरीही एकदा नुसती आठवण जगवायची इच्छा आहे. हे पत्र प्रेमपत्र वाटता कामा नये. माझ्या प्रेयसीच्या संसारात त्याने काही खळबळ माजू नये. आपल्या भावना तिच्यापर्यंत तरी पोचाव्यात. अतिशय तरल आणि कठीण कामगिरी हातोकोवर येते.

असे बरेच प्रसंग या कादंबरीत येतात. प्रत्येक वेळी ती कसा विचार करते, कुठले शब्द वापरते, कशी वाक्यरचना करते, कुठला कागद घेते, अक्षर कसं काढते, पेन शाई कशी निवडते हे सगळं वर्णन वाचत वाचत कादंबरी रंगते. पत्रलेखनाचे किस्से हा कथानकाचा एक भाग आहे. हातोकोचे आणि तिच्या आजीचे संबंध हा कादंबरीच्या प्रसंगांच्या पार्श्वभूमीवरती येणारा धागा आहे. हातोकोला तिची आजी एकटीने वाढवतेले आहे. हातोकोचे आई-वडील कोण हे आजीने तिला कधी सांगितलं नाही. आजही हातोको पत्रलेखन करत असली तरी लहानपणी जेव्हा आजी तिला शिस्त लावत होती, इतर मुलांप्रमाणे मजा करू न देता सतत अक्षर सुधारायचा सराव करायला लावत होती ते तिला आवडत नव्हतं. हळूहळू आजीबरोबर तिचे संबंध कटू होत गेले. ताणले गेले. ती आजीला सोडून परदेशी गेली. आजीच्या माघारी पत्रलेखन करायचं ठरवल्यावर तिला पदोपदी आजीने शिकवलेल्या गोष्टी आठवतात. आजूबाजूच्या लोकांच्या बोलण्यातून आजीबद्दलच्या काही गोष्टी कळतात. आपल्या ग्राहकांच्या भावना शब्दात मांडताना ती स्वतःच्या भावनांचाही नकळत विचार करते . आजीच्या आणि तिच्या नात्याचा पुन्हा पुन्हा विचार करते.

पत्रलेखनाच्या कामातून तिची काही वैशिष्ट्यपूर्ण लोकांशी ओळख होते. मैत्री होते. शेजारणीशी मैत्री होते. त्यांच्या गप्पा, कामाकुरात फिरणं, हॉटेलिंग करणं ह्यातून कामाकुरा गाव, तिथली शांतता, स्वच्छता, निसर्गसौंदर्य, जुनी मंदिरं, चेरीब्लॉसम प्लमब्लॉसम सारखी निसर्गाची लोभसवाणी रूपं, तिथली जीवनपद्धती हे सगळं नेपथ्य उभं राहतं. हे सगळं कादंबरीला आणि कथानकाला पोषकच आहे.

कादंबरी हळूहळू उमलत जाणाऱ्या फुलाप्रमाणे हातोकोचं व्यक्तिमत्व, तिचा भूतकाळ, तिच्या आजीचं व्यक्तिमत्त्व थोडं थोडं उलगडत एका सुंदर वळणावर येऊन पूर्ण होते. पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटले तसं नवरसांपैकी शांतरस हे या कादंबरीचं वेगळेपण आहे. कादंबरीत कुठेही फार मोठं नाट्यमय, धक्कादायक असं काही घडत नाही, तरी प्रत्येक पानात काही ना काही घडत असतंच. एकाच प्रसंगाचं विनाकारण तपशीलवार वर्णन करून पानंच्या पान भरली आहेत असंही नाही. पत्रलेखनाच्या कामातून वेगवेगळे किस्से आपल्यासमोर येतात. पण कुठलाही किस्सा ताणलेला नाही. पत्र सांगणाऱ्या व्यक्तीचे वर्णन, हातोकोची निवड प्रक्रिया आणि पत्राचा झालेला परिणाम असं समजून कथानक पुढे सरकतं. एखाद्या शांत जलप्रवाहात लहान नाव वल्हवत वल्हवत आपण आपल्याच गतीने हळूहळू पुढे सरकावं, आजूबाजूची दृश्य बघावी त्यापद्धतीच्या शांततेचा निवांततेचा अनुभव हे पुस्तक आपल्याला देतं. जपानी संस्कृती, तिथली खाद्यपद्धती, मंदिरं, पत्रलेखनाचे नियम व संकेत या गमतीजमतीही आपल्याला वाचायला मिळतात.

मयुरेश कुलकर्णी यांनी थेट जपानीतून मराठीत याचं भाषांतर केलं आहे. इंग्रजी पुस्तकावरून नाही. भाषांतर अप्रतिमच झालं आहे. फक्त मजकूरच नाही, तर नायिकेने लिहिलेल्या पत्रांमधली शब्दरचनासुद्धा त्या त्या पत्राला साजेशी अशी वेगळी वेगळी ठेवण्यात मयुरेशने यश मिळवलं आहे. वर्णनात जपानची भूमी आणि शब्दांत मराठी माती असा मिलाफ सुंदर जमला आहे.

काही पाने उदाहरणादाखल

लेखिकेची पुस्तकात दिलेली माहिती.


सासूबाईंना साठाव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पत्र लिहा.




नवीन वर्षाचे स्वागत करण्याच्या वेगळ्या समजुती



कामकुरातली भटकंती




कथानकात आलेल्या पत्रांमध्ये हातोकोने काय लिहिले याच बरोबरीने, कसं हस्ताक्षर काढलं आणि सरतेशेवटी ते पत्र कसं दिसलं हे समजणंसुद्धा वाचकासाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळे मूळ पुस्तकात जपानी हस्तलिखित पत्रांचे फोटो छापले आहेत. मयुरेशने सुद्धा देवनागरी लिपी वेगवेगळ्या पद्धतीने लिहून त्या पत्रांचे फोटो छापलेले आहेत. पुस्तक निर्मितीत, पुस्तक छपाईत हा एक वेगळाच प्रयोग आहे. मराठीतही उत्तमपणे साधला गेला आहे.

कथाबीज, कथा घडते ती जागा व तिथली संस्कृती आणि कादंबरीचा बाज या सगळ्यातच नेहमी वाचायला मिळणाऱ्या मराठी किंवा अनुवादित पुस्तकांपेक्षा खूप वेगळेपणा आहे. वैशिष्ट्य आहे. मराठी वाचकांसाठी हा अनुभव आणल्याबद्दल एक वाचक म्हणून आणि मराठी भाषा प्रेमी म्हणून मयुरेशचे व प्रकाशकाचे मनापासून आभार मानतो.

मयुरेशची पुस्तकात दिलेली माहिती


फेसबुक वर तृप्ती कुलकर्णी यांनी पोस्ट लिहून या पुस्तकाचा परिचय करून दिला होता. नंतर तन्वी राऊत हिने लिहिलेला परिचय मी वाचला होता. ते दोन्ही परिचय वाचून पुस्तक वाचायची इच्छा निर्माण झाली. पुस्तक विकत घेतलं आणि ते आवडलं. म्हणून तृप्तीजी आणि तन्वी यांचेही आभार. तृप्ती कुलकर्णी चालवत असलेल्या ऑनलाइन मुलाखती आणि सादरीकरण्याच्या उपक्रमात मागच्या महिन्यात मयुरेशची मुलाखत घेण्यात आली (Youtube link https://www.youtube.com/watch?v=IacLsc72JGM). तेव्हा तो या पुस्तकाबद्दल बोलला. जपानी पुस्तकांच्या वाचनाचे अनुभव, त्याची जपानी भाषेबद्दलची व जपानी साहित्याबद्दलची ओढ आमच्या लक्षात आली. म्हणून त्याने अजून उत्तमोत्तम जपानी पुस्तकांचा अनुवाद मराठीत करावा असा त्याला आग्रह करतो.

तुम्ही हे पुस्तक वाचा आणि तुमचा अनुभव मला नक्की कळवा.



——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

पुण्यभूमी भारत (Punyabhumi Bharat)

पुस्तक - पुण्यभूमी भारत (Punyabhumi Bharat) लेखिका - सुधा मूर्ती (Sudha Murty) अनुवादिका - लीना सोहोनी (Leena Sohoni) मूळ पुस्तक - The old ...