रती महारथी (Rati Maharathi)



पुस्तक - रती महारथी  (Rati Maharathi)
लेखक - डॉ. शरद वर्दे (Dr. Sharad Varde)
भाषा - मराठी
पाने - २६३
प्रकाशन - मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस. मार्च २०२४
छापील किंमत - रु. ३५०/-
ISBN - 978-93-93528-41-4

शरद वर्दे हे माझे आवडते लेखक. ह्यांची "राशा", "झुळूक अमेरिकन तोऱ्याची", "फिरंगढांग", "बोलगप्पा" ही पुस्तकं वाचली होती फार आवडली होती. त्यामुळे वाचनालयात त्यांचं नवीन प्रकाशित पुस्तक दिसल्यावर लगेच घेतले. ह्या पुस्तकाने सुद्धा आधीच्या पुस्तकांप्रमाणे वाचनानंद दिला.
(ह्या आधीच्या पुस्तकांची मी लिहिलेली परीक्षणे पुढील लिंकवर वाचू शकाल 
"झुळूक अमेरिकन तोऱ्याची" 
"फिरंगढांग"
"राशा"
"बोलगप्पा"
)

कामाच्या निमित्ताने लेखक देशोदेशी फिरतात, राहतात, परदेशी लोकांना भेटतात. अनेक परदेशी लोकांबरोबर बरेच दिवस काम करायची संधी मिळते. तर काही वेळा सामान्य लोकांशीही ओळख होऊन गप्पा मारल्या जातात. ह्या भेटीगाठींतून अनेक वल्ली व्यक्तिमत्त्व समोर येतात. अशा बऱ्याच वल्लींशी ओळख लेखक आपल्याला करून देतात. लेखकाने निवडलेल्या बहुतेक व्यक्तिरेखा ह्या फक्त वेगळ्या स्वभावाच्या, वेगळ्या पिंडाच्या आहेत म्हणून निवडलेल्या नाहीत तर त्या व्यक्तीच्या तशा वागण्यामागे तिच्या समाजाची, देशाची संस्कृती, इतिहास, भूगोल सुद्धा कारणीभूत आहे. त्यामुळे ही व्यक्तिचित्रणे असली तरी त्यातून फक्त एक व्यक्ती नाही तर एक अनोळखी संस्कृती, विचारपद्धती आपल्या डोळ्यासमोर उभी राहते.

एकेका प्रकरणाबद्दल सांगतो

१) सिनियर परी आणि ज्यूनियर ताई
लेखक अमेरिकेत मुलीच्या घरी राहायला गेले होते. त्या भाड्याच्या घरात तिच्याबरोबर अजून एक बल्गेरियाची तरुणी आणि तिची आई राहत होती. तरुणी कॉलेजला जाणारी आणि मोकळंढाकळं वागणारी. तर तिची आई तिच्याहून स्वतःला नीटनेटकी, आकर्षक ठेवणारी, मधाळ बोलणारी. लेखकाची मुलगी आणि त्यांची घरमालकीण सुद्धा म्हणते ह्या बाईपासून जरा सावध राहा. ती पुरुषांना आदी लावते असं वाटतंय. तीच ही "सिनियर परी". इतकं सांगूनही लेखक आणि "सिनियर परी" ह्यांची ओळख होतेच, गप्पा होतात. आणि त्यातून उलगडतं की "सिनियर परी" अशी का वागते. बल्गेरियातली विवाहसंस्कृती आणि कुटुंबव्यवस्था बघता हे वागणं किती स्वाभाविक आहे. आपल्यापेक्षा वेगळी पाश्चात्य संस्कृती असं म्हणतो. पण त्यातलाही हा उपप्रकार अचंबित करणारा आहे.

२) गुप्त हार
एक अमेरिकन पाहुणा लेखकाला एका प्रवासात भेटला. त्याचं नाव केविन. व्यवसायानिमित्त जागोजागी भटकंती करणारा, लोकांचं निरीक्षण करून त्यांच्या हावभावातून बोलीतून त्यांच्या मनाचा वेध घेणारा - मनकवडा. आपल्या वागण्याने लेखकावर छाप पडलीच आणि योगायोगाने दोघांच्या कंपन्यांचं कामही जुळलं. प्रत्येक भेटीतून केविनबद्दल थोडं थोडं कळत होतं. त्याच्या घरच्या लोकांसाठी भेटी देण्याइतपत मैत्री झाली. आणि एकदा थेट त्याच्या अमेरिकन घरी जायला मिळालं. आणि मग कळलं मानकवड्या केविनच्या मनातलं दुःख !

३) ओ मारिया
प्रकरणाची सुरुवात होते अशी ... "ई काडेक बुदी सेतीयावान आणि मारिया बुहा डेबोरा पासारिबू ह्यांना लग्न करायचं होतं. अर्थातच एकमेकांशी तुम्ही विचाराल की ही कुठली विचित्र नावं "... ही नावं आहेत इंडोनेशिया देशातल्या एका तरुण आणि तरुणीची. एक बाली बेटावरचा हिंदू. एक सुमात्रा बेटावरची ख्रिश्चन. आणि इंडोनेशिया मुस्लिम राष्ट्र. ह्या नावांचा अर्थ समजून घेताना आपण "तिथल्या हिंदू" धर्माबद्दल समजून घेतो. "आधी शरीरसंबंध , आणि गर्भधारणा झाली तर लग्नासाठी जोडपं अनुरूप" ह्या वेगळ्याच पद्धतीबद्दल. पुढे लेखक आणि त्या दोघांच्या गप्पांतून उलगडते इंडोनेशियातली त्रिधर्मी रचना. आणि ह्या अंतरधर्मिय विवाहाचं त्रांगडं !
बालीतल्या पर्यटन स्थळांबद्दल ऐकलं किंवा पाहिलं असेलच. पण "सामाजिक पर्यटन" करण्यासाठी हे प्रकरण वाचाच

४) ढोल्याशास्त्री
एका अरबी शेखला त्याच्या कंपनीतले लोक "ढोल्याशास्त्री" म्हणतात. शरीराने प्रचंड लठ्ठ "ढोल्या" आणि पण "शास्त्री" का बरं ? भरपूर वाचणारा आणि भरपूर बोलणाऱ्या ह्या वैशिष्टयपूर्ण शेखाच्या गमती

५) रोझी
बसमधल्या सहप्रवासाशी झालेल्या गप्पा आहेत ह्या. एक बडबडकरणारी, भोचक म्हातारी. गप्पा सहज जातात माझ्याघरी कोण, तुझ्या घरी कोण ; ह्या वळणावर. ती सांगते की ... मुलीच्या मुलांना भेटायला जाते आहे. पाच नातवंडं आहेत. - एक तिची आणि तिच्या नवऱ्याची, दोन तिची पहिल्या नवऱ्याची, एक दुसऱ्या नवऱ्याची पहिल्या लग्नाची आणि सर्वात मोठी मुलगी तिचीच पण "अशीच" झालेली. हे सगळं इथे कसं स्वीकारलं जातं अमेरिका कशी मोकळ्याढाकळ्या स्वभावाची, भारत कसा मागास अशा टिप्पण्या. मग लेखकही भारताची बाजू मांडतो. चर्चा होत राहते. भांडण नाही. पण ह्या सगळ्याचा शेवट कसा होईल ?

६) सेन आणि नॉनसेन्स
स्वीडन मध्ये राहणाऱ्या बंगाली कुटुंबाची ही कहाणी. दोन बंगाली बंधू. एकाची बायको स्थानिक स्वीडिश बायको. तर दुसऱ्याची बंगाली. त्यातून दोन भिन्न संस्कृतींची सरमिसळ होणं , विरोधाभास दिसणं स्वाभाविकच. स्वीडिश लोक म्हणजे कमी बोलणारे, दुसऱ्याचे स्वातंत्र्य जपणारे, शिस्तप्रिय. भारताच्या बरेचसे विरुद्ध. पण स्वीडिश बाईला भारतातली कुटुंबव्यवस्था, उत्सवी वातावरण आवडतंय तर बंगाली बाईला ह्या सगळ्याचा तिटकारा. आपलं भारतीयत्व सोडून - स्वीडिश - होण्याचा तिचा प्रयत्न. पुरुष स्वीडनला राहून "जाज्वल्य भारतीयपणा" जपणारे. "पिकतं तिथे विकत नाही" चा अनुभव 
वाचणं मजेशीर आणि उद्बोधकही आहे.

७) इव्हिनिंग इन पॅरिस
"स्त्रीवादी" किंबहुना "पुरुषद्वेष्ट्या" स्त्री अधिकाऱ्याशी व्यावसायिक बैठका करण्याचा अनुभव

८) कॅबी
लेखक अमेरिकेत गेला असता तिथला कॅब चालवणारा वाटत होता भारतीय. पण बोलता बोलता तोच म्हणाला की तो बेकायदारित्या अमेरिकेत आला. त्यामुळे अशा माणसाच्या गाडीत बसणं धोकादायक. लेखकाने त्याला टाळायचा प्रयत्न केला तरी पुन्हा पुन्हा तोच प्रवासासाठी यायचा. प्रत्येक भेटीतून त्याच्याबद्दल थोडं थोडं कळत होतं. एकदा लेखकाने थोडी दारू पाजून बोलतं करायचा प्रयत्न केला. त्यातून मालवाहू जहाजातून, धोकादाकय रित्या केलेला प्रवास त्याने सांगितला. अमेरिकेत कसा राहण्याचा परवाना मिळवला ते सांगितलं. आणि ... बऱ्याच वर्षांनी पुन्हा गेल्यावर बरंच काही धक्कादायक कळलं.

९) मिस लेबनॉन
लेबनॉन देशातल्या सुंदरीचा आधी तोरा , मग पुरुषांपासून सावध राहायची वृत्ती आणि मग अनपेक्षित फसवणूक

१०) शिकार
कंपनीतल्या व्यवस्थापनात बदल झाल्यामुळे एक नवीन ब्रिटिश अधिकारी नेमला गेला. भारतात आल्यावर त्याच्या कार्यशैलीचा फटका लोकांना बसायला लागला. दोन सहकाऱ्यांमध्ये अविश्वास निर्माण करून, स्पर्धा निर्माण करून "फोडा आणि राज्य करा"ची अंमलबजावणी चक्क कंपनीतच व्हायला लागली. राज्यकर्त्या ब्रिटिशांना "भारत छोडो" म्हणता येत होतं, "बॉस"ला कसं म्हणणार ? पण लेखकाच्या सहकाऱ्याने ह्या बॉसची माहिती, इतिहास शोधून काढला. आणि तो वापरून "गोळी" न घालता साहेबाला 'फुटाची गोळी" दिली.

११) नशीबवान
ही सुद्धा एका अमेरिकेत बेकायदा घुसलेल्या शरणार्थीची कहाणी आहे. लेखकाच्या घरी काम करणारी मोलकरीण एल साल्वाडोर देशातून बेकायदेशीररित्या अमेरिकेत आली आहे. त्या देशातली गुन्हेगारी, अमानुष वातावरण, मेक्सिकोमार्गे चालत प्रवास, त्यात झालेले अत्याचार, अमेरीकेत स्वतःची मूळ ओळख उघड होणार नाही असं राहायला लागणं, मागे राहिलेल्या नातेवाईकांच्या आठवणींनी व्याकुळ होणं हे सगळं तिच्या बोलण्यातून आपल्यासमोर येतं.

आता काही पाने उदाहरणादाखल
मनोगत


चौथ्या लग्नाच्या गडबडीत असणारी "सिनियर परी"



अमेरिकेत बेकायदा घुसलेल्या टॅक्सी चालकाने नागरिकत्त्व कसं मिळवलं



"शिकार" प्रकरणातल्या ब्रिटिश अधिकाऱ्याला लक्षात आलं की मीटिंग मध्ये लोक हिंदीत काहीतरी कुजबुजतात. त्याचे अर्थ विचारल्यावर लेखकाची उडालेली तारांबळ





तर अशीही वैविध्यपूर्ण प्रकरणं जगाची सफर घडवून आणतात. ह्यातले विषय आणि माहिती महत्त्वाची आहेच पण लेखकाच्या विनोदी, शाब्दिक कोट्यांच्या शैलीने ती हलकीफुलकी होते. ज्ञानरंजक (Edu-tainment) असं हे पुस्तक आहे. लेखकाच्या मिश्किल टिप्पण्या, परदेशी पाहुण्याला शालजोडीतले हाणण्याचे किस्से किंवा कधी झालेली फजिती हे सगळं वाचताना पुस्तक खाली ठेववत नाही. तुम्हीही लवकरात लवकर पुस्तक हाती घ्या.


——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-


प्रीत ही बावरी (Preet hi baawari)



पुस्तक - प्रीत ही बावरी (Preet hi baawari)
लेखक - अविनाश गडवे (Avinash Gadwe)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १२२
प्रकाशन - युगंधरा प्रकाशन नोव्हेंबर २०२४
छापील किंमत - २००/- रु.
ISBN - 978-81-967821-5-3

मी "पुस्तकप्रेमी" या साहित्यविषयक व्हॉट्सॲप समूहाचा सदस्य आहे. त्याच समूहातील कथालेखक, कवी, उत्तम सूत्रसंचालक, खुसखुशीत बोलण्याने सर्वांना हसवणारे असे लोभस व्यक्तिमत्व म्हणजे अविनाश गडवे. ह्या वर्षीच्या(२०२५) जून महिन्यात कराडला झालेल्या पुस्तकप्रेमी समूहाच्या संमेलनात अविनाश गडवे यांनी मला त्यांचा हा कथासंग्रह भेट दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.



हा त्यांचा दुसरा कथासंग्रह. कथासंग्रहातल्या गोष्टी या प्रेमकथा आहेत. यशस्वीतप्रेम कथा म्हटलं की; मुलगा-मुलगी एकमेकांना भेटले, एकमेकांबद्दल आकर्षण वाटलं, जवळीक वाढली, प्रेमात रूपांतर झालं, लग्न झालं आणि त्यानंतर ते सुखाने नांदू लागले. पण प्रत्येक गोष्ट तितकी सरळ नसते. किंवा ती तितकी सरळ झाली तर त्यात गोष्ट म्हणून सांगण्यासारखं काही विशेष असत नाही. "कहानी में ट्विस्ट" आला की मगच ते सांगावसं वाटतं. अविनाश यांच्या कथा या अशाच "कहाणीत ट्विस्ट" असणाऱ्या आहेत.

भेट,ओळख, प्रेम, लग्न, संसार या प्रत्येक टप्प्यावर काही ना काही तरी वेगळं घडू शकतं ज्यामुळे या प्रवासातला पुढचा टप्पा खुंटतो, कधी पुढचा टप्पा फार दूर जातो, तर कधी पुढच्या टप्प्यावरून पुन्हा मागे यावसं वाटतं. अशा कितीतरी शक्यतांचा विचार अविनाशजींनी या कथांमध्ये केला आहे. इंजीनियरिंग च्या भाषेत बोलायचं तर बरीच "परम्युटेशन-कॉम्बिनेशन" ट्राय करून नवनवीन "सिनॅरिओ" त्यांनी आपल्यापुढे मांडले आहेत.

एकूण 25 कथा आहेत त्यामुळे प्रत्येक कथेबद्दल सांगणं कठीण आहे. त्यातून भावी वाचकाचा रसभंगही होऊ शकतो म्हणून साधारण गोषवारा देतो. आणि तीन-चार गोष्टींबद्दल सांगतो.

"असेच असावे हास्य ओठी " - निराधार महिलांच्या आश्रमात राहणाऱ्या एका तरुणीच्या प्रेमात त्या आश्रमाच्या संचालिकेचा मुलगा पडला आहे. मुलीचे गुण बघून मनापासून तिच्याबद्दल प्रेम वाटत आहे. त्याचं प्रेम तो कसा व्यक्त करेल ? ती ते स्वीकारेल का? समाज काय म्हणेल?

"गिफ्ट"- एका कॉलेजकुमाराला त्याची वर्गमैत्र आवडते आहे. ती खूप साधी, समंजस, लाघवी आहे आता तिच्या वाढदिवसाला इतरांपेक्षा वेगळं काय गिफ्ट द्यावं हा प्रश्न त्याला पडला आहे. त्याचे आजोबा त्याला एक वस्तू सुचवतात. वस्तू भले साधी आणि जुन्या वळणाची. पण म्हणूनच इतर मित्रांपेक्षा वेगळी आणि अनोखी. त्या प्रसंगाची गंमत.

पुस्तकात बऱ्याच विरह कथा आहेत म्हणजे परिस्थितीमुळे प्रेमाचे रूपांतर लग्नात, संसारात होऊ शकले नाही किंवा अपघात, आजारपण यामुळे जोडीदाराचे निधन झाले .अशावेळी साध्या साध्या गोष्टीतून जोडीदाराची आठवण येते ते भावपूर्ण प्रसंग लेखकाने टिपले आहेत.

इतर बऱ्याच कथा हे "जुनं प्रेम पुन्हा परत येतं" अशा पद्धतीच्या आहेत. नायकनायिकेचे लग्न झालं असेल तर जुना प्रियकर परत भेटल्यावर मनात होणारी खळबळ; काही वेळा नायक/नायिका का अविवाहित राहून जुन्या प्रेमाच्या आठवणीवर जगत आहेत. अशावेळी अनपेक्षितरित्या प्रिय व्यक्ती पुन्हा भेटते. तर काही वेळा जाणूनबुजून लग्न न करून वेगळे राहत असतानाही पुन्हा पुन्हा गाठ पडणे अशा स्वरूपाच्या आहेत. प्रत्येक वेळी उठणारे भावनांचे कल्लोळ लेखकाने एक दोन प्रसंगात आणि थोडक्यात शब्दात आपल्यासमोर चित्रित केले आहेत. "मधु", "सोन्याचे बिस्किट", "रानफूल ", "संकेत मिलनाचा" या गोष्टी तशाआहेत.

"मधु" या कथेत असेच दोन मित्र एका लग्नसमारंभात एकमेकांसमोर येतात. नजरा नजर होऊनही नजर चुकवतात. शेवटी नायिका जी आता मध्यमवहीन बाई झाली आहे, तीच पुढाकार घेऊन बोलते. सूचक शब्दांतून आपण एकत्र यायला पाहिजे होतं पण आलो नाही हे व्यक्त होतं आणि तरीही निरोप घेऊन दोघेजण परत जातात.

"आई", "पैंजण", "सावली" या कथा अजून थोड्या वेगळ्या आहेत. नायकनायिकेच्या यांच्या आई-वडिलांच्या भूतकाळामुळे त्यांच्या नात्यावर कसा परिणाम होतो हे दाखवणाऱ्या गोष्टी आहेत. थरारक आणि अनपेक्षित प्रसंगांची गुंफण त्यात आहे.

आता काही पाने उदाहरणादाखल वाचा म्हणजे निवेदनशैलीची कल्पना येईल.
अनुक्रमणिका 


"असेच पाहिजे असेच पाहिजे" गोष्ट. बायकोमुलं सोडून गेल्यावर त्यांचं महत्त्व नायकाला कळतं. एकटेपणा जाणवतो आणि पिंजऱ्यातल्या पोपटाच्या एकटेपणाची अनुभूती येते.


"मधू" - जुनं प्रेम लग्नाच्या जेवणात अचानक समोर येत तेव्हा



"स्वप्न" ही दोन पानीच कथा पण प्रत्येक परिच्छेदात गोष्ट इतके झोके घेते की शेवटी आपणही म्हणतो, "हुश्श ! झालं बरं एकदाचं !!".



एका कथेत लेखकाने शेवट वाचकांवर सोडला आहे. ते वाचल्यावर असं मनात आलं की ह्यातल्या बऱ्याच पात्रांचं शेवटचं वागणं योग्य का अयोग्य असाही प्रश्न वाचकांना विचारता येईल. "विक्रम वेताळ" कथांसारखं आपापल्या स्वभावानुसार आपलं आकलन वेगळं.

ह्या सर्व लघुकथा आहेत. दोन-तीन पानाच्या. एखाद दुसरीच कथा जरा मोठी चारेक पानांची असेल. त्यामुळे कमीत कमी शब्दात परिस्थिती समजेल अशा पद्धतीने संवादांची निवेदनाची रचना आहे. एका परिस्थितीतून दुसऱ्या परिस्थितीत फार झपाट्याने आपण जातो. पात्रांचं बोलणं हे साधं रोजच्या जगण्यातलं आहे. त्यात साहित्यिक तत्त्वज्ञानात्मक अशी शाब्दिक फुलोरा आणलेली वाक्ये नाहीत. त्यामुळे ती घटना आपल्या समोरच घडते आहे असं आपल्याला वाटतं आणि आपण गोष्ट पुढे पुढे उत्सुकतेने वाचत राहतो. बऱ्याच वेळा आपल्याला अनपेक्षित असे प्रसंग त्यात घडतात आणि एक नवीन सिनेमा आपल्यासमोर उभा राहतो.

लघुकथा असल्यामुळे गोष्ट वाचून लगेच संपते; पण ती गोष्ट मनात नक्की रेंगाळते. पुढच्या गोष्टीकडे वळण्याआधी आपण दोन मिनिटं वाचलेल्या गोष्टीवर विचार करतो. असं झालं तर खरंच काय होईल? त्या त्या व्यक्तीची मानसिक अवस्था कशी होईल? हा विचार येतो. मनातल्या मनात त्या लघुकथेचं दीर्घकथेत आणि पाच वाक्यातल्या संवादांचं दीर्घ मानसिक द्वंद्वात रूपांतर आपण करतो. अविनाशजींच्या कथेची ही जमेची बाजू आहे असं मला वाटतं. अविनाशजींच्या लेखणीतून त्या दीर्घकथा किंवा यातल्या काही कथाबीजांवर आधारित एक छान कादंबरी वाचायला मला नक्की आवडेल.

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
जवा ( जमल्यास वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-


राक्षस आणि पोपटाची ॲडल्ट कथा (Rakshas ani popatachi adult katha)





पुस्तक - राक्षस आणि पोपटाची ॲडल्ट कथा (Rakshas ani popatachi adult katha)
लेखक - श्रीकांत बोजेवार (Shrikant Bojewar)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १२३
प्रकाशन - रोहन प्रकाशन, ऑगस्ट २०२४
ISBN - 978-93-89458-32-9

काही महिन्यांपूर्वी श्रीकांत बोजेवार ह्यांची दोन पुस्तके घेतली होती. "क्ष क्षुल्लकची कहाणी" आणि "राक्षस आणि पोपटाची ॲडल्ट कथा" हे दोन कथा संग्रह. अद्भुतता (फँटसी) आणि वास्तव ह्यांचा मेळ साधत एका रंजक परिस्थतीत घेऊन जाणाऱ्या गोष्टी "क्ष क्षुल्लक.." मध्ये होत्या. मला ते पुस्तक खूप आवडले. विशेष म्हणजे त्याचे मी लिहिलेले परीक्षण लेखकालाही आवडले. महाराष्ट्र टाइम्स मध्ये ते प्रकाशितही झाले होते. ते तुम्ही ह्या लिंकवर वाचू शकाल https://learnmarathiwithkaushik.com/courses/ksha-kshullakachi-black-comedy/.
ते पुस्तक वाचल्यापासून दुसरे पुस्तक वाचायची उत्सुकता होती. पण लागोपाठ त्याच प्रकारची किंवा त्याच लेखकाची पुस्तके न वाचण्याच्या माझ्या सवयीमुळे हे पुस्तक मुद्दाम बाजूला ठेवले आणि थोड्या दिवसांनी वाचायला घेतले.
हे पुस्तक नऊ कथांचा संग्रह आहे. आशय, विषय, मांडणी वेगवेगळी आहे. म्हणून आधी प्रत्येक गोष्टीबद्दल थोडक्यात सांगतो.

राक्षस आणि पोपटाची ॲडल्ट कथा - एका मध्यमवयीन जोडप्याची ही गोष्ट आहे. नवरा म्हणतोय बायकोने माझ्या पायावर जोरात काठी मारली, मुद्दामून. बायको म्हणतेय मी झुरळ मारत होते ह्यांना चुकून लागली. इतके वर्ष ज्या बायकोला पुरुषी वर्चस्व दाखवत मुठीत ठेवली ती आज अशी जुमानत नाही बघून नवरा संतापलाय. कसला राग बायको काढत असेल? इतकी वर्ष दबून राहणारी बायको ह्या वयात अशी बंडखोर कशी झाली? गोष्ट पूर्ण वाचल्यावर कथेच्या नावाची गंमत अजून वाटेल.

शब्द - एक लेखक त्याच्या लॅपटॉपवर कथा लिहितो आहे. बरंच टाईप करून झालं आहे . पण अचानक पुढचा शब्द लिहिला तो आपोआप डिलीट झाला. पुन्हा लिहिला पुन्हा डिलीट. ही काय भुताटकी? तो शब्द योग्यच आहे त्यामुळे "ऑटो करेक्ट" ने तो चुकीचा ठरवायला नको. म्हणून शब्दकोशांत बघितला तर तो शब्द तिथेही नाही. त्याला माहिती असणारे अनेक शब्द कोशात पूर्वी दिसत होते आता तिथे जागा रिकाम्या. काय झालं शब्दाचं? भाषेचं बदलतं रूप सांगणारी अद्भुतरम्य गोष्ट आहे ही.

काळा गूळ आणि कावळा - एक नव्याने लग्न झालेलं जोडपं आहे. एकमेकांचा सहवास पुरेपूर उपभोगतायत. पण त्यांच्या खाजगी क्षणी कोणीतरी त्यांच्याकडे बघतंय असं बायकोला वाटायला लागतं. मग तिच्या लक्षात येतं की एक कावळा नेमका त्यावेळी आपल्या गॅलरी समोर बसतो आणि एकटक पाहत राहतो. तिची आई तिला तोडगा सांगते "काळा गूळ ठेव". पण खरंच कावळा बघत असेल; का दुसरं कोणी? कोणाच्या अतृप्त इच्छा अपूर्ण असतील?

चेटकीणी - "चेटकीणी" म्हणजे घर संसारात राहून पण घराला हातभार म्हणून आपल्या शारीरिक आकर्षकतेच्या बळावरएखाद्या परपुरुषाला भुलवण्याची कला अवगत असणाऱ्या बायका.. ही कला ते आपल्या पुढच्या पिढीकडे कशा देतात त्याची ही गोष्ट.

झूओ - एका पुस्तकवेड्या माणसाकडचं एक पुस्तक अचानक नाहीसं होतं. पुस्तक होतं चिनी दंतकथेतील व्यक्तिरेखा "झूओ" बद्दलचं. हा झूओ म्हणे बुद्धिमान आणि रंगेल माणूस. त्याला सगळे ग्रंथ तोंडपाठ कसे होते, त्याने अनेक बायकांशी संबंध कसे ठेवले होते ह्याच्या लोककहाण्या प्रसिद्ध आहेत म्हणे. नेमकं तेच पुस्तक चोरीला गेलं. कोणी नेलं? नक्कीच मित्रांपैकी कोणी. म्हणून तो मित्रांकडे चौकशी करतो. मित्र नाही म्हणतात. पण त्याचा विश्वास बसत नाही. पुढे त्याहून अविश्वसनीय घटना घडते म्हणजे अनपेक्षितरित्या पुस्तक परत मिळतं. दंतकथा झालेल्या झूओ च्या पुस्तकाच्या बाबतीतही पुस्तक मिळणे, हरवणे, सापडणे च्या जणू नव्या दंतकथा अजूनही घडत आहेत.

एकांतभ्रम - मोबाईल इंटरनेटच्या जमान्यात आपला डिजिटल ट्रॅक रेकॉर्ड, आपली स्वतःची शेअर करण्याची वृत्ती यामुळे आपल्याबद्दल माहिती वेगवेगळ्या ॲपकडे किंवा सिस्टीम हॅकर कडे जाऊ शकते. अशी माहिती वापर वापरून आपल्या अगदी मनाचा वेध घेणार ॲप निघालं तर ? खरा एकांत मिळणं आता कठीणच होणार की काय? अशी शक्यता दाखवणारी गोष्ट आहे.

संवाद एकांताशी - एका माणसाला एकटेपणा छळतोय . त्याला त्याच्या प्रेयसीची आठवण होते आहे. "नको हा एकांत" असं म्हणत असताना एकांतच जणू मूर्त स्वरूपात येऊन त्याच्याशी बोलायला लागला. एकांत माणसाला कधी आवडतो कधी नाही त्याचे काय फायदे काय तोटे अशी चर्चा त्यांच्यात रंगते. असे कल्पना रंजन करून लिहिलेली ही कथा आहे.

क...शो...ले - कथेच्या शोधात लेखक म्हणून "क...शो...ले". बसच्या प्रवासात असताना एका लेखकाला एक चमकदार कल्पना सुचते. ती कुठे लिहून ठेवायची म्हणून कागद शोधत असतानाच नेमका त्याचा उतरण्याचा स्टॉप येतो आणि तो उतरतो. झालं ! त्या गडबडीत काही क्षणापूर्वी सुचलेली कल्पना त्याच्या डोक्यातून निघून जाते. त्याला काही केल्या त्या आठवत नाही. मग तो जातो मेंदू तज्ञ डॉक्टरांकडे. त्यांना म्हणतो, माझ्या मेंदूत बघा आणि ती कल्पना शोधून द्या. खरंच, माणसाच्या डोक्यात बघण्याची त्यातले चालू विचार, जमा झालेल्या आठवणी यंत्राच्या साहाय्याने काढायची सोय असती तर? मेंदूत डोकावून बघितल्यावर काय काय दिसेल? जुन्या आठवणी चाळवल्यावर काय होईल? या कल्पनेवर पुढच्या गमती घडतात.

एव्हरी एडिट इज नॉट अ लाय - चित्रपटामध्ये संकलनाचं (एडिटिंगचं) काम करणाऱ्या एका माणसाकडे अचानक एक व्यक्ती येते आणि म्हणते "सध्या शूटिंग चालू असलेल्या चित्रपटात मी एका दृश्यात काही सेकंदात दिसणार आहे कृपया संकलन करताना ते दृश्य कापून टाकू नका". वरवर साधी वाटणारी मागणी आणि साधी वाटणारी ही व्यक्ती. पण दिग्दर्शकाशी बोलताना लक्षात येतं की हा माणूस काहीतरी काळी जादू करतो. संकलकालाही तसाच काही अनुभव येतो. म्हणून तो त्या व्यक्तीचा माग काढतो. एका छोट्या दृश्याचं इतकं का महत्व ? आणि त्यासाठी काळी जादू करण्यापर्यंत तो का गेला आहे याचं भावुक करणार कारण त्याला कळतं.

अशा या नऊ गोष्टी आहेत विषय वेगळे वेगळे आहेत. काही पाने उदाहरणादाखल वाचा.
"शब्द" हरवल्यावर काय झालं ??



"चेटकिणीं"चे संस्कार



पुस्तकाच्या नावात "ॲडल्ट कथा" असा उल्लेख आहे. ह्यातल्या गोष्टी "ॲडल्ट" गोष्टी नाहीत. काही गोष्टींचा गाभा स्त्रीपुरुष शरीरसंबंध ह्यावर आधारित आहे. पण इतर गोष्टींमध्ये त्याबद्दलची वाक्य, प्रसंग विनाकारण आली आहेत असं वाटलं. "झूओ" आणि "एकांतभ्रम" या गोष्टी छान रंगलेल्या असताना मध्येच थांबवल्या सारख्या वाटल्या (
"क...शो...ले" गोष्टीसारखं झालं होतं की काय). "एकांताशी संवाद" म्हणजे 'एकांत चांगला की वाईट' असा निबंध संवादस्वरूपात लिहिल्यासारखा झाला आहे. "काळा गूळ.." आणि "चेटकिणी" या दोन गोष्टींमधले प्रसंग थोडे ओढूनताणून आणल्यासारखे वाटतात तरीही शेवटपर्यंत उत्सुकता आणि रंजकता टिकवून ठेवणाऱ्या आहेत.  "राक्षस..", "शब्द", "क...शो...ले", "एव्हरी एडिट... " ह्या चार गोष्टी भन्नाट आहेत. 

काही गोष्टींमध्ये फॅन्टसी/अद्भुततेचा आधार घेतला आहे तर काही वास्तविक जीवनात घडू शकतील अशा घटना आहेत. लेखकाची शैली आणि कथेतल्या प्रसंगांचा वेग यामुळे आपण उत्सुकतेने पुढे पुढे वाचत राहतो. काही ठिकाणी हलका विनोद, थेट आणि नेमके संवाद, वेगवान घडामोडी ह्यामुळे गंभीर विषय अंगावर येत नाही. नवनवीन शक्यता आपल्याही डोक्यात येतात. कौटुंबिक, सामाजिक कथांपेक्षा वेगळ्या बाजाच्या कथा मराठीत वाचायला मिळाल्याचे समाधान नक्की मिळेल.

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

ब्रँड गुरु (Brand Guru)



पुस्तक - ब्रँड गुरु (Brand Guru)
लेखिका - जान्हवी राऊळ (Janhavi Raul)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १४२
प्रकाशन - बिग आयडिया पब्लिकेशन , मार्च २०१२
ISBN - दिलेला नाही
छापील किंमत - रु. २२५/-

कुठलाही व्यवसाय सुरु केल्यावर आपलं उत्पादन ग्राहकापर्यंत पोचावं, त्याने ते पुन्हापुन्हा खरेदी करावं आणि लोकप्रिय व्हावं असं स्वप्न बघणं, ध्येय ठेवणं स्वाभाविक आहे. हे ध्येय गाठण्यासाठी मालाची गुणवत्ता उत्तम ठेवणं आणि त्याचा वापर केल्यावर लोकांना समाधान मिळणं ह्याचा भाग मोठा आहे. तरीही "बोलणाऱ्याची माती खपते, न बोलणाऱ्याचे सोनंही विकलं जात नाही" हे आपलं पारंपरिक शहाणपण आहेच ! त्यामुळे विक्री होण्यासाठी "मार्केटिंग", जाहिरात आवश्यकच. ह्या जाहिरातींतून तुम्ही लोकांना स्वतः बद्दल सांगता, माझं उत्पादन कसं चांगलं, उपयुक्त, फायदेशीर आहे ते सांगता. विक्रीनंतरही वेगवेगळ्या मार्गाने ग्राहकांच्या संपर्कात राहता. त्यातून तयार होतो तुमचा ब्रँड. तुमचं नाव, उत्पादनं, बोधचिन्ह (लोगो), घोषवाक्य (टॅगलाईन) सगळं लोकांच्या मनात ठसतं. हा प्रवास सोपा नाही, कमी कालावधीचा नाही. सहज, आपोआप होईल असाही नाही. अतिशय गांभीर्याने करायची ही कृती आहे. ती कशी केली पाहिजे, कसा विचार केला पाहिजे ह्याची जाण वाढवणारं हे पुस्तक आहे.

पुस्तकातल्या लेखिकेच्या मनोगतातल्या माहितीनुसार त्यांनी रहेजा स्कुल ऑफ आर्टस् मधून कमर्शियल आर्टसची पदवी घेतली. पतीच्या जाहिरातक्षेत्रातील १८ वर्षांच्या अनुभवानंतर स्वतःचा व्यवसाय सुरु केला. त्यात त्यांनी उतार चढाव बघितले. त्या आज यशस्वी ब्रँड सल्लागार आणि स्वतःच्या "बिग आयडिया कम्युनिकेशन" या कंपनीच्या सर्वेसर्वा आहेत. त्यांचे पतीही नोकरी सोडून "बिग आयडिया"त सहभागी झाले आहेत .

ह्या पुस्तकात ब्रॅंडिंग चे वेगवेगळे पैलू कसे महत्त्वाचे आहेत. हे प्रकरणवार सांगितले आहे. ब्रँड म्हणजे काय, तो तयार करायचा म्हणजे काय, त्यासाठी कसा विचार करायचा इथपासून सुरुवात केली आहे. स्वतःकडे, आपल्याच धंद्याकडे, उत्पादनाकडे वेगवेगळ्या कोनातून बघण्यासाठी प्रश्नावली दिली आहे. त्याची उत्तरं निश्चित झाली की आता हे ब्रॅण्डिंग सांधण्याचे मार्ग - बोधचिन्ह (लोगो), घोषवाक्य (टॅगलाईन) , माहितीपुस्तक , विक्रीयोग्य वस्तू, प्रेझेंटेशन , कंपनीने छापलेली दिनदर्शिका, टीशर्ट इ. वर एकेक प्रकरण आहे. उदा.  कुठला रंग कुठली भावना दर्शवतो. त्यानुसार आपल्या लोगोमध्ये रंगनिवड कशी करावी लागते. ग्रीटिंग कार्ड, बिझनेस कार्ड कसे कलात्मक करता येईल. माहितीपुस्तिकेचे महत्त्व. प्रदर्शनात मांडण्याच्या तक्त्यांचे विविध प्रकार. प्रत्येक मार्गाची माहिती पोचवण्याची पद्धत वेगळी, सामर्थ्य निराळे त्यामुळे त्यामागची अभिव्यक्तीकला सुद्धा निराळी. ब्रॅण्डिंग करणाऱ्या कंपन्यांना तांत्रिकता, कलात्मकता, लोकभावना ह्याची कशी कसरत करावी लागत असेल हे त्यातून जाणवते.

काही पाने उदाहरणादाखल
अनुक्रमणिका



ब्रॅण्डिंग प्रश्नावलीची सुरुवात



एका मार्गाबद्दल विचार



वाचकाला प्रोत्साहित करणारे पान


ब्रॅण्डिंगचा प्रत्येक मार्ग स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. आणि तसे व्यवसायिक अभ्यासक्रम सुद्धा आहेत. त्यामुळे एका पुस्तकातून ते सगळं मांडणं आणि समजून येणं शक्यच नाही. पण ह्या क्षेत्रात काम न करणाऱ्या; टीव्ही, सोशल मीडिया, वृत्तपत्रे ह्यात जाहिरात बघणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीला ब्रॅण्डिंग जगताचे दार किलकिले करून आत डोकावण्याची संधी ह्या पुस्तकातून मिळते. नव-व्यावसायिकांनी हे पुस्तक वाचले तर ब्रॅण्डिंगबद्दलची त्यांची जाणीव विकसित होईल. इतरांचं ब्रॅण्डिंग बघताना ते कसं केलं आहे हे थोडं अजून समजून घ्यायचाही आपण प्रयत्न करू.

हे तांत्रिक विषयावरचं पुस्तक आहे. अशावेळी आपल्याला मराठी शब्दांपेक्षा इंग्रजी शब्दांची जास्त सवय असते. ते लक्षात घेऊन लेखिकेने मराठी शब्दांबरोबर कंसात इंग्रजी शब्दही दिले आहेत. काहीवेळा पूर्ण वाक्य, प्रश्न पुन्हा इंग्रजीतही दिले आहेत. हे योग्यच. त्यामुळे मराठी माणसाला मराठी पुस्तक वाचण्यात अडचण येणार नाही !! मात्र ही द्विभाषिकता डोक्यात ठेवून लिखाण केल्यामुळे असेल पण बऱ्याच ठिकाणी मराठी मजकूर हा इंग्रजीचे बोजड भाषांतर झाल्यासारखा आहे. तो अजून ओघवता करता आला असता.

हे पुस्तक हातात घेताना लेखिकेच्या ह्या क्षेत्रातला अनुभव वाचायला मिळेल अशी माझी अपेक्षा होती. त्यांनी केलेली कामे, त्यांचे ग्राहक, मिळालेला प्रतिसाद, चुका, अनपेक्षित बरावाईट प्रतिसाद असं काही वाचायला मिळेल असे वाटले होते. पीयूष पांडे ह्यांच्या "पांडेपुराण" सारखे काहीतरी. पण तसे अजिबात झाले नाही. त्यामुळे हे पुस्तक जरा पाठ्यपुस्तकासारखे रुक्ष झाले आहे.

पुस्तक वाचताना माझे भाषा शिकवण्याचे उपक्रम, पुस्तक परीक्षणाचा उपक्रम ह्यांचं पण ब्रॅण्डिंग करावं असं वाटू लागलं. ह्या उपक्रमांतून विक्री किंवा कमाई अपेक्षित नसली तरी लक्ष्यप्रेक्षकांपर्यंत (target audience) पोचण्यासाठी असं काहीतरी केलं पाहिजे. बिगरसरकारी संस्था, समाजोपयोगी प्रकल्प ह्यंनासुद्धा ब्रॅण्डिंगची आवश्यकता असतेच.

विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग ह्याबद्दल मराठीत पुस्तक असेल तर त्याचे मला कौतुक वाटते. मराठी ज्ञानभाषा करण्यातले ते योगदान असते. लेखक मराठी, मूळ पुस्तक मराठी असेल तर ते कौतुक दुणावते. इथे स्वतःच्या कामाने मराठी माणसाचा ठसा ह्या क्षेत्रात उमटवणारी व्यक्ती मराठी पुस्तक लिहिते आहे. त्यामुळे कौतुक तीणावले ! जान्हवीताईंनी स्वानुभवरचे पुस्तक लिहिले आहे का मला माहिती नाही. पण तसे नसेल तर नक्की लिहावे.


——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
व्यवसाय करणाऱ्यांनी आवा ( आवर्जून वाचा )
इतरांनी जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

नागालँडच्या अंतरंगात (Nagalandchya Antarangat)




पुस्तक - नागालँडच्या अंतरंगात (Nagalandchya Antarangat)
लेखिका - अर्चना जगदीश (Archana Jagadeesh)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - २००
प्रकाशन - प्रफुल्लता प्रकाशन, नोव्हेंबर २०१७
छापील किंमत - रु. २५०/-
ISBN - 978-81-87549-85-7

डिसेंबर २०२४ मध्ये पुण्यात झालेल्या "विश्व मराठी संमेलना"तल्या पुस्तक प्रदर्शनात ज्येष्ठ प्रकाशक गुलाब सकपाळ आणि त्यांची कन्या द्वितीया सोनावणे (त्याही प्रकाशक) ह्यांची भेट झाली. भेट झाली. ह्याआधी फक्त फेसबुकवर गप्पा झाल्या होत्या. प्रत्यक्ष भेटून सर्वांना आनंद झाला. काकांनी मला भेट देण्यासाठी त्यांच्या प्रकाशनाचे पुस्तक मला निवडायला सांगितले. तेव्हा ह्या पुस्तकाने माझे लक्ष वेधले. मी फारसा न वाचलेला विषय असल्यामुळे उत्सुकता वाटली. पुस्तक चाळल्यावर कळले की ह्या पुस्तकाला २०१७, १८ मध्ये मान्यवर संस्था व वाचनालयांचे पुरस्कार मिळाले आहेत. ह्या भेटीसाठी काकांचे मनापासून आभार.



लेखिका अर्चना जगदीश ह्या वनस्पतिशास्त्रज्ञ आणि संशोधक आहेत. १९९४ मध्ये त्यांनी ह्याविषयातली पी.एच.डी. मिळवली आहे. भारत सरकारच्या "वनस्पती सर्वेक्षण विभागा"त त्यांनी पुण्यात काही वर्षे नोकरी केली. कामासाठी आणि आवडीमुळे सह्याद्री पर्वत आणि इतर डोंगराळ भागांत त्यांची भटकंती चालू होती. ईशान्य भारताच्या पर्वतराजींमध्ये दडलेल्या घनदाट जंगलांचे आकर्षण तेव्हापासून त्यांना होते. पुढे त्यांनी सरकारी नोकरी सोडून स्वतःची स्वयंसेवी संस्था काढून ह्याच विषयात स्वतःच्या रुचीनुसार काम सुरु केले. त्यातूनच नागालँडच्या सरकारने सुरु केलेल्या एका प्रकल्पावर काम करण्याची संधी त्यांना मिळाली. "नेपेड"नावाचा हा प्रकल्प तिथल्या लोकांची जीवनपद्धती, वनस्पती वैविध्य, शेतीच्या पद्धती ह्यांचे सर्वेक्षण, नोंदी करणे व त्यातून ग्रामविकासाचे उपाय सुचवणे असा बहुउद्देशीय होता. त्यासाठी १९९०च्या दशकात अर्चनाजींनी नागालँड मध्ये बरेच महिने प्रवास केला. सुदूर दुर्गम खेडेगावांत जाऊन गावकऱ्यांशी भेटीगाठी घेतल्या. दुभाषांमार्फत लोकांशी संवाद साधला. जंगलात जाऊन पानं-फुलं गोळा केली. ह्या सगळ्या अनुभवांचे वर्णन पुस्तकांत आहे. त्यांनी अरुणाचल प्रदेशला सुद्धा भेट दिली होती. त्या अनुभवावर एक लेख आहे. 

महाराष्ट्रापासून खूप दूर, दुर्गम असलेला नागालँड. तिथे नागा आदिवासी राहतात. ख्रिश्चन मिशनऱ्यांनी त्यांचे पूर्ण धर्मांतरण केले आहे. नागा सशस्त्र बंडखोरी, सीमावर्ती भाग असल्यामुळे घुसखोरी अशा सुरक्षाविषयक समस्या सुद्धा आहेत. इतपतच माहिती मला होती. टीव्हीवरच्या बातम्या, समाजमाध्यमे, वर्तमानपत्रातले लेख ह्याममध्ये पण नागालँड हा काही नेहमी येणारा विषय नाही. त्यामुळे हे पुस्तक माहिती वाढवणारे आहे. पण बघितलेल्या ठिकाणांचे स्थलवर्णन नाही. प्रवासवर्णन नसलं तरी ह्यातलं "प्रवासाचं"वर्णन वाचण्यासारखं आहे. पुणे - कोलकाता - दिमापूर विमान प्रवास आणि मग बस, छोट्या गाड्या तर कधी मैलोनमैल चालत इष्टजागी पोचायला लागायचं. प्रत्येक प्रवासाचं हे दिव्य वाचताना ते लोक मुख्य भारतापासून (इंडियन प्लेन्स पासून) किती दुरावलेले आहेत हे जाणवते.

आदिवासींची शेती पद्धती म्हणजे "झूम" पद्धती. जंगल तोडून जागा शेतीयोग्य करतात. तिथे एकदोन वर्ष शेती केली की ती जागा सोडून दुसरी जागा साफ करतात. असं करत करत साताठ वर्षांनी पुन्हा पाहिल्याजागी येतात. तोपर्यंत तिथे पुन्हा रान माजलेलं असतं. शेती कशी करतात, त्यात काय लावतात, पुरुष कुठली कामं करतात, बायका कुठली कामं करतात याचं सुद्धा सविस्तर वर्णन आहे. किती वर्षांनी पुन्हा त्याच जागी यायचं, झाडं कशी तोडायची, प्रत्येक जागेला काय म्हणायचं हे सुद्धा प्रत्येक जमातीनुसार वेगवेगळं आहे. एक छोटं राज्य असलं तरी कितीतरी जमाती, उपजमाती आहेत. त्यांचं खानपान वेगळं, बोलीसुद्धा वेगळ्या. इतक्या, की एकमेकांनाही न समजणाऱ्या. तिथल्या तिथे फिरताना सुद्धा वेगवेगळ्या दुभाषांची गरज पडावी. हे वाचल्यावर जाणवतं की दुर्गमतेमुळे किती कप्पे पडले आहेत. आपल्या भाषेचा, जमातीचा टोकाचा अभिमान बाळगला गेला तर पदोपदी संघर्षाला वाव आहे. "विविधतेत एकता", "हम सब एक है" ह्या घोषणा किती आव्हानात्मक आहेत.


इतके महिने तिकडे राहिल्यावर तिथलं वेगवेगळ्या प्रकारचं खाणं त्यांनी "बघितलं" तरी. नागा लोक सर्वभक्षी. चिकन, मटण हे साधं झालं. डुक्कर, गायबैल खाणं नेहमीचंच. इतकंच काय खारी, पक्षी, किडे, अळ्या, मधमाश्या असं सगळं खातात. कुत्र्याचं मांस हे तर "स्वादिष्ट". शहरातल्या बाजारांत, गावच्या बाजारांत असा मांडलेला "रानमेवा" त्यांनी बघितला. तांदळाची दारू "झू" हे तर सर्वमान्य पेय. अशा काही गमती त्यात आहेत. खाण्यापिण्याच्या अशा सवयी वाचून असं वाटतं की भारतापेक्षाही चिनी लोकांशी जास्त साम्य आहे. दिसण्यातही तसे ते मंगोलवंशीय. त्यामुळे पुन्हा एकदा "विविधतेत एकता" टिकवण्याचं जबरदस्त आव्हान लक्षात येतं. पुस्तकात असं म्हटलं आहे की नागा जमाती म्यानमार मध्ये सुद्धा आहेत. मनात असा विचार आला की निसर्गाच्या ह्या लेकरांना "निसर्गापासून दूर गेलेल्या लेकरां"नी असं कृत्रिम सीमांनी विभागून टाकलं आहे.

आदिवासी सगळे मिळून मिसळून काम करणारे. पण तरीही तिथे गावाचा/जमातीचा राजा अशी संकल्पना आहेच. पण तो राजा म्हणजे काही फार श्रीमंत , महालात राहणार असा नाही. इतरांपेक्षा थोडी मोठी झोपडी आणि केवळ एक मनाची पदवी असंच. पूर्वीच्या काळी मुलगा वयात आला की त्याला दुसऱ्या जमातीच्या माणसाला मारून त्याचं मुंडकं आणायला लागे. मात्र ते नरभक्षी नव्हेत. आता ही परंपरा मागे पडली आहे. पण "हेड हंटिंग" च्या कवट्या त्यांनी बघितल्या. गावात एका सार्वजनिक झोपडीत अशा कवट्या ठेवल्या जात. अशा झोपड्या म्हणजे गावाच्या वयस्करांनी आपलं शहाणपण पुढच्या पिढीकडे देण्याच्या जागा. नागा वनवासींच्या अशा त्यांना दिसलेल्या प्रथांविषयी ही त्यांनी लिहिलं आहे. तिथल्या फुटीरतावादी, सशस्त्र बंडखोरांशीही अवचित गाठ पडली. ती क्रूर नजर, हिसंक कृत्य ह्यातून सुदैवाने त्या सुखरूप बाहेर पडल्या. त्याचे दोन थरारक किस्सेही आहेत. स्थानिकांशी त्याविषयी जास्त न बोलता, आपल्या कामावर लक्ष देण्याचे धोरण ठेवून त्यांनी स्वतःला अलिप्त व सुरक्षित ठेवले.

पुस्तकात ९४-९५ च्या आसपासचा नागालँड आहे. तिथल्या लोकांना सुद्धा मुख्य भारताप्रमाणे विकसित व्हायचं आहे, तरुणांना साहजिकपणे शहरी जगण्याचं आकर्षण आहे. पैसे मिळवण्यासाठी तिथे नगदी पिकं आणि लाकूडतोड मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. शहरात राहून आलेली, जीन्स टीशर्ट घालणारी मुलं शेती-जंगल आधारित जगण्यापासून दूर जात आहेत. त्याला चूक तरी कसं म्हणणार ? पण काहीतरी चुकतंय हे खरं. म्हणूनच नागालँडची जाणीव वाढवून पण विकास करायचा म्हणजे नक्की काय, कसा, लोकसहभाग कसा मिळवायचा , प्रयोग आर्थिकदृष्टया सक्षम कसे करायचे असे असंख्य प्रश्न मनात घेऊनच त्यांनी आपल्या संशोधन कामाचा शेवट केल्याचं लक्षात येतं.

आता काही पानं उदाहरणादाखल वाचा.

नागांच्या सर्वभक्षित्वाची एक झलक



सर्वांनी मिळून घरं - झोपड्या बांधायची पद्धत



अंतर्गत प्रवासाची काठिण्यपातळी आणि दिसणारं निसर्गसौंदर्य




असं हे पुस्तकाचं स्वरूप आहे. ह्यात प्रवास असला तरी हे नमुनेदार प्रवासवर्णन नाही. संशोधनपर कामाशी संबंधित असलं तरी रुक्ष आकडेवारी, तांत्रिक तपशील नाहीत. वने, शेती, सामाजिक पद्धती ह्यांचं हे दस्तऐवजीकरणही नाही. तर प्रवास करताना, माणसांना भेटताना सहजपणे काय दिसलं, जाणवलं, वेगळेपण भावलं ह्याच्या नोंदी आहेत. लेखिकेने आपल्याशी मारलेल्या गप्पा आहेत. त्यामुळे बऱ्याच वेळा त्याच त्या प्रकारच्या वर्णनाची पुनरुक्तीही जाणवते. ती थोडी कमी करता आली असती. तिथला भूगोल आणि दिशा आपल्या परिचयाच्या नाहीत त्यामुळे प्रवासाची दिशा कळत नाही. अजून नकाशे टाकून ते सांगायला हवं होतं. पुस्तकात फक्त मुखपृष्ठाच्या आत सहा फोटो आहेत. वर्णनाच्या बाजूला अजून फोटो किंवा रेखाचित्रे हवी होती. लेखिकेने केलेल्या संशोधनाचं/सर्वेक्षणाचं काय निष्पन्न झालं हा प्रश्न, "नेपेड" प्रकल्पात त्याचा काय हातभार लागला हे मला कळलं नाही. पुस्तक वाचताना आपण लेखिकेचे सह-सर्वेक्षक बनतो. त्यामुळे "आपल्या" सर्वेक्षणाची फलश्रुती काय हे न कळल्यामुळे चुटपुट लागते.

अर्चनाजींच्या धाडसामुळे, मन लावून केलेल्या कामामुळे आणि ते पुस्तक स्वरूपात आणल्यामुळे नागालँड सारख्या आपल्याच देशाच्या एका भागाबद्दलची आपली जाणीव वाढेल. ती अजून वाढली पाहिजे अशी उत्सुकता होईल हे नक्की. अशा अनवट मराठी पुस्तकासाठी लेखिका अर्चना जगदीश आणि प्रकाश गुलाब सकपाळ ह्यांचे आभार.

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

स्टीव्ह जॉब्स (Steve Jobs)



पुस्तक - स्टीव्ह जॉब्स (Steve Jobs)
लेखक - डॉ. अनंत लाभसेटवार (Dr. Anant Labhsetwar)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - २१८
प्रकाशन - विजय प्रकाशन. जून २०१४
छापील किंमत - रु. २५०/-
ISBN - दिलेला नाही.

"ॲपल" हा शब्द उच्चारल्यावर काही लोकांच्या डोळ्यासमोर सफरचंद येईल तर बहुतेक जणांच्या डोळ्यासमोर येईल "आयफोन". ॲपल कंपनीचा "आयफोन" एक महागडा फोन. दिसायला देखणा, हाताळायला सोपा, उत्तम छायाचित्रे काढता येणारा असा फोन गेली कित्येक वर्षे मोबाईल वापरणाऱ्यासांठी "स्टेस्टस सिम्बॉल" झाला आहे. ॲपलचाच लॅपटॉप "मॅक"सुद्धा तंत्र जगतात लोकांची प्रथम क्रमांकाची पसंती असते. हातात धरण्याजोगा, वागवायला सोपा "आयपॅड" आणि भरपूर गाणी ऐकायला देणारा "आयपॉड" देखील तितकेच लोकांच्या आवडीचे. आज आपण कॉम्प्युटर वापरताना माउस वापरतो आणि "चिन्हांवर"(आयकॉन) वर क्लिक करतो त्या तंत्रज्ञानाची सुरुवात केली ती देखील ॲपलनेच. तंत्रज्ञानाच्या युगात मोलाची कामगिरी ॲपल करू शकली ह्याचं कारण तिचा सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्सची दृष्टी, कलात्मकता, स्वतःच्या निर्णयांवर ठाम राहण्याची वृत्ती, अपयश पचवून पुन्हा उभारी घेण्याची क्षमता आणि बरंच काही. अशा स्टीव्ह जॉब्सचे चरित्र डॉ. लाभसेटवारांनी मराठीत लिहिलं आहे.

स्टीव्हच्या कुटुंबाच्या पार्श्वभूमीपासून सुरुवात करून, त्याचा जन्म, बालपण, शिक्षण, त्यातली धरसोड ह्याबद्दल सुरुवातीच्या प्रकरणात माहिती आहे. त्याचा जन्म अरबी वडील आणि अमेरिकन आईच्या पोटी त्यांच्या लग्नाच्या आधीच झाला. नाचक्की टाळण्यासाठी जन्म झाल्या झाल्या तो दत्तक दिला गेला. एका कष्टकऱ्याच्या घरात. त्यामुळे आपल्या जैविक वडिलांशी त्याचे संबंध कायमचे दुरावले. दत्तक गेल्याबद्दलचा न्यूनगंड तयार झाला. त्याची वृत्ती लहानपणापासून बंडखोर झाली. तरुणपणात तर चक्क अमली पदार्थांच्या व्यसनात बुडाला. "हिप्पी" लोकांची बेपर्वा जीवनशैली त्याने स्वीकारली. कसाबसा कॉलेजात शिकत राहिला. एका नशेडी, वाया गेलेल्या, उद्धट मुलाचं वर्णन आपण वाचतो आहोत असंच वाटतं. पण विजेवर चालणाऱ्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू ह्यांचे आकर्षण त्याला होते. त्या वस्तू उघडून बघायच्या, पुन्हा जोडून बघायच्या. ही त्याची सवयच पुढे जाऊन "ॲपल"झाली. स्टीव्हचा हा सगळा प्रवास सविस्तर मांडला आहे.

ॲपलचा दुसरा साहसंस्थापक - स्टीव्ह वोझनीयॅक - अर्थात वॉझ. ते दोघं एकत्र प्रयोग करत असताना वॉझने सुटे भाग जुळवून संगणक तयार केला. त्यासाठी स्वतः संगणक प्रणाली लिहिली. सगळं हौसेपोटी, आवडीपोटी चालू होतं. फक्त वॉझ असता तर ते काम तिथेच विरूनही गेलं असतं. पण स्टीव्हची उद्योगशीलता व दूरदृष्टी तिथे कमी आली. लोकांनी सुटेभाग घेऊन घरगुती संगणक बनवण्यापेक्षा आपण असे छोटेखानी तयार संगणक विकले तर लोक ते विकत घेतील. त्यातून फायदा होईल हे त्याच्या लक्षात आलं आणि सुरू झाली "ॲपल". कायदेशीर कंपनी स्थापन करणे, भागीदारी ठरवणे, मग भांडवलदार गोळा करणे, त्यांचा हिस्सा ठरवणे हे सगळे सोपस्कार झाले. अमेरिकन संस्कृतीतले वातावरण उद्योगाला किती पोषक होते हे सुद्धा इथे जाणवते.

पुढच्या प्रकरणांमध्ये स्टीव्हची स्वतःची मते कशी होती आणि त्यांनी कंपनीची वेगवेगळी उत्पादने कशी घडवली ह्याची स्वविस्तर वर्णने आहेत. यंत्रांची माणसाला भीती वाटता कामा नये. ते ओबडधोबड नाही तर सुंदर दिसलं पाहिजे, हाताळायला सोपं पाहिजे हा त्याचा आग्रह - हट्टच. ते साधायचं तर यंत्रांची सामुग्री (हार्डवेअर) आणि प्रणाली (सॉफ्टवेअर) सुद्धा आपलंच पाहिजे. हा दुसरा हट्ट. आणि इतकं सगळं झालं की ते सुंदर उत्पादन विकायचं ते सुद्धा नजाकतीने. दुकानात जाणे, चौकशी करणे, विकत घेणे हे सुद्धा लोकांना आनंददायक, छाप पडणारे वाटले पाहिजे. म्हणून "ॲपल स्टोअर" सुरु झाली. हा सगळा प्रवास, ॲपलच्या प्रत्येक उत्पदनाची जन्म कहाणी, त्यावेळचे किस्से प्रत्यक्ष वाचण्यासारखेच आहेत.

हे सगळं वाचून असा समज होईल की स्टीव्ह फारच लोकप्रिय असेल व ॲपल नेहमीच यशस्वी ठरली असेल. पण तसं नाही. "हिप्पी" स्टीव्हचं वागणं आयुष्यभर चक्रमपणाचं राहिलं. पुस्तकात असं वर्णन आहे की तरुणपणात अनेक दिवस अंघोळ न केल्यामुळे त्याच्या अंगाला घाण वास येत असे. राहणं ओंगळ होतं. लोकांना ते सहन करून काम करावं लागायचं. बोलणं अतिशय तुसडं. दुसऱ्याला थेट प्रश्न, पाणउतारा, शिवीगाळ नेहमीचीच तेही चारचौघांत. कंपनीच्या कामात लोक कसे टिकले, "पापी पेट का सवाल" किंवा "येडXXX असला तरी त्याचं बोलणं खरं ठरतं आणि कंपनीला पैसा मिळतो" असा फायद्याचा विचार करून राहिले असतील बिचारे. पण जेव्हा हे चुकीचं ठरलं तेव्हा थेट स्टीव्हलाच "ॲपल"च्या बाहेर काढलं गेलं. स्वतःच्या घरातून बाहेर काढल्याचा धक्का त्याला पचवावा लागला. त्या दिवसांत त्याने "ॲनिमेशन" क्षेत्रातली "पिक्सर" कंपनी काढली. नावारूपाला आणली. "टॉय स्टोरी" चित्रपटाला ऑस्कर मिळाला. अजून बरेच चित्रपट गाजले. आणि त्यानंतर त्याचं "डिस्नी"शी पण "वाजलं". मायक्रोसॉफ्ट चा बिल गेट्स आणि तो एकाचवेळी प्रतिस्पर्धक, टोकाचे टीकाकार आणि तरी एकमेकांसाठी काम करणारे होते. स्टीव्हच्या व्यक्तिमत्त्वाची ही नकारात्मक बाजू, थोडी व्यावसायिक क्रूर बाजूसुद्धा पुस्तकात सविस्तर मांडली आहे.

स्टीव्ह बाहेर पडल्यावर "ॲपल" बरी चालली पण काही वर्षांनी आर्थिक संकटात सापडली. हळूहळू स्टीव्ह पुन्हा "ॲपल"मध्ये येऊ लागला आणि पुढे त्याने पुन्हा कंपनीचा ताबा घेतला. पुढे नवी उत्पादने बाहेर आली. त्याला अचानक कर्करोगाने ग्रासले. तरी शेवटची चारपाच वर्षे आयफोनच्या नव्या आवृत्त्यांनी बाजारपेठ गाजवली. त्याच्या मृत्यूपश्चात सुद्धा गाजवत आहे. असा मोठा चरित्रपट पुस्तकात आहे.

काही पाने उदाहरणादाखल

अनुक्रमणिका

तरुण स्टीव्हचा भारत प्रवास



स्टीव्हच्या सौंदर्य दृष्टीबद्दल



"पिक्सर" कंपनीतला स्टीव्हचा "हम करे सो कायदा"




एक गंमत जाणवली. २०१४ मधले लेखकाचे निरीक्षण आहे की फोन कॉम्प्युटरची निर्मिती अमेरिकेत व्हावी असा आग्रह अमेरिकी राष्ट्रध्यक्ष धरत होते. ॲपल चीन मध्ये उत्पादन करत होते. आणि भारताकडे ढुंकूनही पाहत नाही. गंमत म्हणजे १० वर्षांनी अमेरिकी राष्ट्रध्यक्ष तोच आग्रह धरतायत. फक्त आता म्हणतायत की भारतात उत्पादन पुरे. भारताच्या "मेक इन इंडिया" ने कसा बदल घडवला आहे हे असं आपसूक समोर येतं. 

स्टीव्हचं हे लोकविलक्षण व्यक्तिमत्त्व, अस्थिर कौटुंबिक संबंध, टोकाची घृणास्पद वागणूक आणि त्याचवेळी सौंदर्यदृष्टीचे टोक गाठणे, जमान्याच्या चार पावलं पुढे जाणारी उत्पादने तयार करून अख्ख्या जगालाच पुढे नेणे हे सगळं समजून घेण्यासाठी हे चरित्र वाचलंच पाहजे. लेखकाने ओघवत्या शैलीत लिहिलं आहे त्यामुळे वाचायला मजा येते. काही काही मुद्द्यांची पुनरावृत्ती झाली आहे ती कदाचित कमी करता आली असती.

प्रत्येक इंग्रजी शब्दाला मराठी प्रतिशब्द देण्याचा लेखकाचा प्रयत्न (स्टीव्ह सारखा हट्ट) दिसतो. उदा. "कृष्णधवल रंगाच्या पटलावर रंगीत चित्र उमटवण्याचा शोध लावला.. पटलावर माहिती उपलब्ध करून देण्यासाठी उंदरावर टिचकी मारण्याचा शोध लावला". "विभागीय दुकानातून (Departmental store ) फिरताना .. ", "संगणक कृत्या (Application)", "स्मरण चकत्या (memory chips)", "कुठल्याही संगणकाचं आतडं म्हणजे चकत्यांचे फलक (Chip boards)", "प्रदर्शनात गाळे (stall) आरक्षित केले" इ. हे वाचताना गंमत वाटते. हे शब्द योग्य आहेत. आपण ते वापरत राहिले पाहिजेत म्हणजे ते रुळतील. त्यासाठी लेखकांचे विशेष अभिनंदन. एक चुकीची वाक्यरचना मात्र पूर्ण पुस्तकभर खटकते. "केले जाते", "समजली जाईल", "बोलला गेला" ह्या कर्मणी वाक्यांमध्ये पुस्तकभर "केल्या जाते", "समजल्या जाईल", "बोलल्या गेला" अशी वाक्यरचना आहे. ही मुद्रितशोधनाची चूक का लेखकाच्या बोलीचा प्रभाव?

पुस्तकाचे सहशीर्षक यथायोग्य आहे. "काव्य आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालून मानवी जीवन सुखकर करणारा". विषय, आशय आणि मांडणी ह्या दृष्टीने उपयुक्त पुस्तकासाठी लेखक डॉ. लाभसेटवारांचे आणि प्रकाशकांचे आभार.


——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

रती महारथी (Rati Maharathi)

पुस्तक - रती महारथी  (Rati Maharathi) लेखक - डॉ. शरद वर्दे (Dr. Sharad Varde) भाषा - मराठी पाने - २६३ प्रकाशन - मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस. मा...