मसालाकिंग (Masalaking)




पुस्तक : मसालाकिंग (Masalaking)
लेखक : धनंजय दातार (Dhananjay Datar)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : १८१
ISBN : दिलेला नाही

मराठी माणूस सहसास धंद्यात पडत(!) नाही. पण पडलाच तर निग्रहाने पडतो. सर्वोत्तम व्यवसाय करण्याची त्याची इच्छा असते. त्यासाठी मेहनत घ्यायची इतकी तयारी असते की पुढे त्याचे यश सर्वांना अचंबित करते. अशा यशस्वी उद्योगपती पैकी  धनंजय दातार आहेत. दुबई आणि आखाती देशांमध्ये  त्यांचा मसाल्याचा व्यापार व्यापार आहे.  या व्यापाराचा दबदबा इतका आहे की प्रत्यक्ष दुबईच्या राजघराण्यातल्या व्यक्तीने त्यांना "मसालाकिंग" म्हणत गौरवले होते. त्यांच्याबद्दल पुस्तकात दिलेली थोडी माहिती.



या पुस्तकात धनंजय दातार यांनी स्वतः त्यांच्या आठवणी सांगितल्या आहेत. लहानपणापासून आत्तापर्यंतचा प्रवास प्रवास आठवणींच्या साखळीतून उलगडला आहे त्यांच्या आयुष्यातले महत्त्वाचे टप्पे टप्पे त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम करणाऱ्या घटना रंजक पद्धतीने सांगितले आहेत.

अनुक्रमणिका :


आज किंग झालेले झालेले दातार लहानपणी मात्र निम्न मध्यम वर्गीय वर्गीय गरीब घरातच वाढले लहानपणच्या परिस्थिती ची एक आठवण


परदेशी जाऊन आलेली माणसं खूप श्रीमंत होतात त्यामुळे गरिबीतून बाहेर पडायचं असेल तर आपणही परदेशात जायला जायला आपणही परदेशात जायला परदेशात जायला जायला पाहिजे हा विचार किंवा वेड तरुण वयातच त्यांना प्रदेशाकडे खेचत होतं. त्यामुळे शिक्षण पूर्ण व्हायच्या आधीपासूनच व्हायच्या आधीपासूनच परदेशात जायचं वेड त्यांच्या मनात संचारलं होतं. त्यांच्या वडिलांनी दुबई मध्ये जाऊन छोटासं दुकान काढलं होतं आणि ते ठीक-ठाक चालत होतं. त्यामुळे त्यांनाही दुबईला जाण्याचा मार्ग खुला झाला. वडिलांची फारशी संमती नसताना ते दुबईला वडिलांचा दुकानात कामाला गेले आणि मग खरा परदेश, परदेशातले कष्ट त्यांना दिसले. त्यांच्या वडिलांनी त्यांना मालकाचा मुलगा म्हणून डोक्यावर न चढवता सर्व लहान-मोठी काम कष्टाचे काम करायला लावली आणि उमेदवारी सुरु झाली त्यावेळच्या वसुलीच्या कामाचा एक प्रसंग




ह्या सुरुवातीपासून त्यांचा आजपर्यंतचा खडतर प्रवास, आलेल्या अडचणी, काढलेले मार्ग, शिकलेले धडे, अपघात आणि शारीरिक व्याधींची संघर्ष इत्यादी त्यांनी पुढे पुस्तकात मांडले आहे. या सगळ्याचा उद्देश उद्देश स्वतःची शेखी मिरवणे नसून हे एक प्रांजळ आत्मकथन आहे. त्यांच्याप्रमाणे ज्यांना व्यवसाय करायचा असेल त्यांना हे अनुभव मार्गदर्शक ठरावे ही प्रामाणिक इच्छा इच्छा आहे.  म्हणून स्वतःच्या अनुभवावर आधारित काढलेले निष्कर्ष सुद्धा त्यांनी होतकरू व्यावसायिकांसाठी सांगितले आहेत हे काही सल्ले वाचा




पुस्तकात त्यांनी त्यांच्या आई-वडील पत्नी आणि मुलांबद्दल एक एक लेख लिहिला आहे त्यांच्या यशात या प्रत्येकाचा वाटा आहे आई-वडिलांच्या संस्काराचा, पत्नीने दिलेल्या साथीचा, मुलांनी वडिलांना आपल्याला जास्त वेळ देता येत नाहीये हे समजून घेतल्याचा...  दातारां बद्दल त्यांच्या पत्नीने आणि मुलांनी लिहिलेले छोटे लेख पुस्तकात आहेत. धनंजय ज्यांची कुटुंबवत्सलता आणि यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले कुटुंबाचे पाठबळ सपोर्ट सिस्टीम अधोरेखित होते.



गरिबीतून श्रीमंत झाल्यावर, हातात पुरेपूर पैसा खेळू लागल्यावर काहीजण त्या पैशाने आंधळे होतात होतात तर काहीजण गरिबीच्या भीतीने कवडीचुंबक होऊ लागतात. ही दोन्ही टोके टाळत स्वतःच्या पैशाचा समाजासाठी उपयोग दातार करतात आणि संपत्तीचा तितक्यात आनंदाने उपभोग घेतात. पत्नीला दिलेली महागड्या गाडीची भेट, मुलांची विमानात लावलेली मुंज, लोकप्रिय कलावंतांच्या हस्ते दुकानांच्या शाखांचे उद्घाटन असे आनंदाचे क्षणही पुस्तकात पुस्तकात आहेत. यश आणि श्रीमंती कशी पेलावी हेसुद्धा त्यातून ते सांगतात.

या पुस्तकाची लेखनशैली चांगली आहे. अजिबात पाल्हाळ न लावता ठळक घटना पटापट सांगितल्या आहेत. लेखक अतिशय प्रांजळपणे आपले गुणदोष सांगतात. वाचकांच्या भावनांना हात घालण्यासाठी गरीबी आणि कठीण प्रसंगांचं उगाळत बसले नाहीयेत. आणि यशाच्या प्रसंगांत आत्मप्रौढी नाहीये.  

दातार यांना मिळालेले पुरस्कार



त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातून नवे उद्योजक निर्माण व्हावेत यासाठी दातार स्वतः मार्गदर्शन करण्यासाठी जातात. असे मार्गदर्शन नक्कीच फायदेशीर ठरेल. परदेशात भारताचे महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करणाऱ्या धनंजय दातार यांच्या कर्तुत्वाला अभिवादन करण्यासाठी पुस्तक अवश्य वाचा.

----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
----------------------------------------------------------------------------------


----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------

वास्तविक (vastavik)




पुस्तक : वास्तविक (vastavik)
लेखक : सुहास शिरवळकर (Suhas Shirvalkar)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : १९२
ISBN : दिलेला नाही

"सुशि..", "सुशि.." अर्थात सुहास शिरवळकर हे नाव पुस्तक वाचकांच्या फेसबुक गटावर बऱ्याचवेळा ऐकलं होतं. पण अजूनपर्यंत मी त्यांचं एकही पुस्तक वाचलं नव्हतं. म्हणून यावेळी वाचनलयातून "सुशी आणायची" असं ठरवूनच गेलो होतो. वाचनालयात त्यांच्यासाठी स्वतंत्र कप्पा होता. आणि कादंबऱ्यांचा रतीब घातलेला दिसला. त्यांच्या "दुनियादारी" कादंबरीचं नाव माहीत होतं. त्यावरचा चित्रपट बघितला असल्यामुळे ती सोडून वेगळं पुस्तक घ्यायचा विचार केला. शेवटी हे पुस्तक घेतलं.

जाहिरात क्षेत्रात अभिनय किंवा रूपदर्शन ( मॉडेलिंग ला मी सुचवलेला शब्द) करणाऱ्या एका युवकाची ही गोष्ट आहे. प्रेमकथा आहे. या क्षेत्रातला नायक म्हटल्यावर साहजिकच कादंबरीला आवश्यक असा देखणा, उमदा तरूण नायक. त्याच्या भोवती अपेक्षितपणे सुंदर मुली घोटाळणारच. त्या मुली सुद्धा या क्षेत्रातल्या असल्यामुळे त्यातल्या बऱ्याचशा फक्त ओळख किंवा फक्त मैत्री या पातळीवर न राहता शरीरसंबध ठेवण्यास तयार किंवा उत्सुक किंवा त्याबद्दल फार काही न वाटणाऱ्या अश्या आहेत. हा नायक एकीचं प्रेम अव्हेरतो, दुसरीच्या प्रेमात ठरवून पडतो, परिस्थितीमुळे तिसरीशी लग्न करायला लागतं म्हणून दुसरीचा त्याग वगैरे करतो आणि शेवटी चौथीला जवळ करतो. त्याचवेळी त्याच्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या मैत्रिणीसुद्धा त्यांच्या त्यांच्या पहिल्या दुसऱ्या बरोबर ये जा करतात. असं एकूण लफड्यांचं कथानक आहे. आणि हे सगळं घडवण्यासाठी बेतलेल्या घटना आहेत.

काही वेळा पात्र आणि घटना पटतात तर काही वेळा "काहीही हं ... सुशी" असं म्हणावं लागतं. हे तरूण तरुणी त्यांच्या आजूबाजूल घरचेदारचे, समाजातले लोक नसल्यागत सगळ्यांचं स्वैर वागताना दाखवलं आहे. ती पात्रं बेफिकीर आहेत असं नाही पण कादंबरीसाठी लेखकाने सभोवतालच्या परिस्थितीची फार फिकीर केलेली नाही.

तरीही प्रसंग पटापट पुढे जातात, खटकेदार संवाद, अजिबात पाल्हाळ न लावता पुढे जाण्याची शैली यामुळे वाचायला कंटाळा येत नाही. पॉकेटबुक आकारात छोटी कादंबरी असल्यामुळे एका बैठकीत पूर्ण करू शकता. चार घटका हलकेफुलके मनोरंजन म्हणून ठीक आहे.

काही प्रसंग.
 उदा. नायक एका नायिकेला जाहिरात क्षेत्रातले धोके आणी त्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी वास्तववादी कसं वागायला पाहिजे ते सांगतो









नायकाला खोट्या गुन्ह्यात गुंतवायचा प्रयत्न होतो तो प्रसंग






"दुनियादारी" हा चित्रपट आणि हे पुस्तक दोन्ही काही भावलं नाही. सुशिंबद्दल पूर्वग्रह होऊ नये म्हणून त्यांचं सर्वोत्तम पुस्तक कुठलं सुचवाल ? खाली कमेंटमध्ये किंवा पेसबुक पोस्टवर कमेंट करून सांगा.



----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------


----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------

राशा (Rasha)






पुस्तक - राशा (Rasha)
लेखक - शरद वर्दे (Sharad Varde)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - २५९
ISBN - दिलेला नाही

एकोणीसशे ऐंशीच्या दशकातला रशिया तुम्ही पाहिला आहे का? त्यावेळी रशियाला जाण्याचा योग तुम्हाला आला असेल तर तुम्ही तिथली पर्यटन स्थळ पाहिली असतील.  पण तुम्हाला त्या वेळच्या एखाद्या रशियन कंपनीबरोबर वाटाघाटींसाठी कधी जावं लागलं होतं का? तुम्ही अशा कामासाठी रशियात गेला असता तर कम्युनिस्ट राजवट कशी होती, तिचा लोकांच्या वागण्यावर, विचारांवर रोजच्या जगण्यावर कसा परिणाम झाला होता हे तुमच्या लक्षात आलं असतं. असो ! आता ती संधी मिळाली नाही म्हणून वाईट वाटून घेऊ नका. कारण शरद वर्दे यांच्या या पुस्तकात आपल्याला ही संधी मिळणार आहे.

पुस्तकात दिलेली लेखकाची माहिती.


रशियन लोक आपल्या मातृभूमीचा जो उच्चार करतात तो आपल्या कानांना र शी या असा ऐकू न येता राशा असा ऐकू येतो  म्हणून पुस्तकाचं नाव राशा कंपनीच्या कामानिमित्त लेखकाने रशियाला अनेक वेळा भेट दिली. तिथल्या सरकारी अधिकाऱ्यांशी वाटाघाटी करून आपल्या कंपनीच्या उत्पादनांसाठी ऑर्डर्स मिळवल्या. हे सगळं करताना रशियन बाबूंची खाबूगिरी, त्यांचा परदेशी वस्तूंचा सोस, रशियातले निर्बंध, परदेशी माणसांवर सतत ठेवली जाणारी पाळत अश्या नाना प्रकारच्या अनुभवातून त्यांना जावं लागलं. हे चित्र-विचित्र अनुभव त्यांनी राशा या पुस्तकात शब्दबद्ध केले आहेत. तेही एका डॉक्युमेंटरी सारखे नाहीत तर एखाद्या कादंबरी प्रमाणे प्रसंगांच्या मालिकेतून.

त्यांनी वर्णन केलेल्या प्रसंगात भेटलेली माणसं आपल्याला पुढच्या प्रकरणात पुन्हा पुन्हा भेटत राहतात आणि गमतीजमती घडवत राहतात. त्या त्या प्रसंगात ते तसे का वागले हे थोडं थोडं स्पष्ट होतं आणि ती एकेक व्यक्तिरेखा म्हणून आपल्यापुढे साकार होऊ लागतात.

लेखकाची प्रसंग आणि माणसांचं वर्णन करायची शैली अफलातून आहे. शाब्दिक कोट्या, स्वतःवरचे विनोद, दोन प्रसंगांची गमतीदार तुलना अशा खुसखुशीत शैलीतून प्रत्येक पान अन् पान आपल्याला हसवतं आणि तरीही त्यावेळच्या परिस्थितीचं गांभीर्य आणि कारुण्य आपल्यापर्यंत थेट पोचतं.पुढे दिलेले प्रातिनिधिक उतारे वाचले की तुम्हाला समजेल मी काय म्हणतोय ते.

परदेशात उतरताना त्या देशाच्या सिस्टिमचा अनुभव पहिल्यांदा येतो तो इमिग्रेशन मध्ये. जरा हा रशियन इमिग्रेशनचा अनुभव बघा. संथ चाललेल्या कारभारात बराच वेळ रांगेत उभे राहावे लागले आणि रांगेत नंबर लागल्यावर हे असं झालं..



रशियामध्ये कम्युनिझम किंवा साम्यवाद असल्यामुळे सर्वांना एकच पगार, सगळ्यांनी एकाच सरकारी दुकानातून एकाच पद्धतीच्या वस्तू विकत घ्यायच्या असा प्रकार त्यामुळे परदेशी मालाबद्दल प्रचंड आकर्षण तयार झालं होतं. मग एखादा परदेशी पाहुणा आपल्याकडे कॉन्टॅक्ट मिळवायला आला की हे सरकारी बाबू दारूसाठी, परदेशी वस्तूंसाठी अगदी चटावलेले असायचे. कंपनीच्या लोकांनी अशा स्वरूपात लाच देणे हे गृहीतच होतं. कोणी नाही दिली तर ते सरळ स्पष्टपणे मागत सुद्धा होते. अशा वस्तू मिळत राहाव्या म्हणून वेळकाढूपणा करत मीटिंग लांबविण्याचे प्रकार व्हायचे तशातला हा एक प्रसंग


लेखक जेव्हा रशियाला पुन्हापुन्हा जायला लागला तेव्हा साहजिकच तिथल्या लोकांशी जवळीक वाढली आणि वरवर दिसणारं हे दिसणारे चित्र असं का याबद्दल लोकांशी बोलणे होऊ लागलं. साम्यवादात लोकांची कशी कुचंबणा होते ते समजू लागलं. उदा. तरुण मुली सतत सुंदर राहण्याचा प्रयत्न करत होत्या ते चांगला परदेशी पाहुणा गटवावा आणि रशियातून एकदाच बाहेर बाहेर पडावं यासाठी.



पुढे रशियाचे विघटन झालं रशियातून छोटे छोटे देश निर्माण झाले साम्यवादी राजवटीचा पगडा कमी झाला इतके दिवस बंदिस्त वातावरणात राहणारे लोक अचानक खुल्या वातावरणात आले. खुलं वारं त्यांना सुरुवातीला आल्हाददायक वाटलं पण त्या वार्‍याचं हा हा म्हणता वादळात रूपांतर झालं. यंत्राप्रमाणे ठराविक पठडीत काम करणार्‍या माणसांना स्वातंत्र्य, स्पर्धा यांच्याशी जुळवून घेणं कठीण झालं. त्या स्थित्यंतराचा लेखकाने घेतलेला अनुभव.



पूर्वीची सरकारी मक्तेदारी गेली म्हणून लाचखोरीला चटावलेल्या अधिकाऱ्यांचे साधू झाले नाहीत. भ्रष्टाचाराचे नवीन मार्ग त्यांनी धुंडाळले. लेखकाच्या भागीदाराच्या बोलण्यातून त्याची जाणवलेली झलक.




पुस्तकात रशियाच्या आणि लेखकाला भेटलेल्या व्यक्तींच्या- खरं म्हटलं तर वल्लींच्या- अशा कितीतरी सुरस चमत्कारिक कथा आहे आहेत. ते वाचायला मजा येते. हे पुस्तक विचारप्रवृत्त सुद्धा करतं. समाजात उच्च-नीच, गरीब-श्रीमंत असा भेदभाव आहे; श्रमाला प्रतिष्ठा नाही असं आपल्याला दिसतं. पण म्हणून सगळ्यांना सारखं काम, सारखा पगार, सारखा मान असं द्यावं, तरी समाजाचं समाधान होत नाहीच. लोकांची झटून काम करण्याची वृत्ती जाते. नवं काही करायची उमेदच जणू नाहीशी होते. आणि "समानांमध्ये जास्त समान" असा वर्ग तयार होतो. त्याउलट भांडवलशाहीत काळाबरोबर पावलं न टाकणाऱ्याची असहाय्य फरफट होते. या दोन्हीचा तोल साधणारी समाजव्यवस्था कशी असेल, ती कशी येईल आणि कशी टिकेल यावर समाजशास्त्रज्ञ विचार करतच आलेत. आपल्याही मनात तो विचार सुरू होईल. शरद वर्दे यांचं हे पुस्तक म्हणून नक्की वाचा त्यांची मी आधी वाचलेली दोन पुस्तकही नक्की वाचावी अशीच आहेत. त्यांची परीक्षण इथे वाचू शकाल.



----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
----------------------------------------------------------------------------------


----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------

अद्वैताचं उपनिषद (Advaitach Upnishad)



पुस्तक : अद्वैताचं उपनिषद (Advaiyacha Upanishad)
लेखिका : शुभांगी भडभडे (Shubhangi Bhadbhade)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : ४७६
ISBN : दिलेला नाही

श्रीमद्‌ आदिशंकराचार्यांच्या जीवनावरची ही कादंबरी आहे. शंकरांचार्यांच्या लहानपणापासून त्यांच्या समाधीपर्यंतच्या पूर्ण जीवनपटाचे यात वर्णन आहे. जन्मापासून अतिशय प्रज्ञावान असणाऱ्या शंकराचार्यांनी तिसऱ्या वर्षांपर्यांतच अनेक ग्रंथ मुखोद्गत केले होते. त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर पाचव्या वर्षीच त्यांची मुंज होऊन ते त्यांच्या गावाजवळच्या गुरूंकडे शिक्षणासाठी गेले. त्यांनंतर नर्मदेकाठी गोविंदाचार्यांकडे शिकायला गेले. पुढे त्यांच्या गुरू गौडपादाचार्यांकडे शिकण्यासाठी हिमालयात गेले. ज्ञानसंपन्न बालशंकर या भ्रमणातून अनुभवसंपन्नसुद्धा होत होता. देशस्थिती बघत होता. बौद्ध आणि जैनधर्माचे वाढलेले प्रस्थ, हिंदू धर्मात अनेक पंथांचा सुळसुळाट आणि परस्परद्वेष, कर्मकांडात गुरफटलेले विद्वान, नरबळीसारख्या अघोरी प्रथांना मिळालेले स्थान यामुळे ते अस्वस्थ होत होते. या सगळ्यातून देशाला बाहेर काढण्यासाठी पुन्हा पुन्हा भारतभर फिरले. वेगवेगळ्या पंथांच्या शिष्यांशी अध्यात्मिक शास्त्रचर्चा केली. सर्व पंथांमध्ये आराध्यदेवता वेगळ्या असल्या तरी शेवटी सगळे एकाच ईशतत्त्वाला भजतात हे त्यांना पटवून त्यांच्यात सामंजस्य निर्माण केलं. एकीकडे लोकांमध्ये असा प्रचार तर विद्वानांबरोबर चर्चा करून ते कर्मकांड, द्वैत यापेक्षा अद्वैत मताची यथार्थता पटवून देत होते. म्हणजे तार्किक पातळीवर अद्वैत, निराकाराची उपासना प्रतिपादताना सर्वसामान्यांना या अवघड वाटेवर न ढकलता सोप्या भक्तीमार्गाचे मनापासून स्वागत राहिले. कर्मकांड टाळून शुद्ध भक्तीसाठी असंख्य स्तोत्रं रचली. त्यांचं हे कार्य चिरस्थायी रहावं यासाठी त्यांनी भारताच्या चारही दिशांना मठ स्थापन केले. त्यांची योग्य व्यवस्था लावून दिली.

शंकराचार्यांनी ३२ वर्षांच्या अल्प आयुष्यात इतकं प्रचंड काम केलं, इतक्या व्यक्तींशी वाद-संवाद साधले, स्तोत्रं रचली की ते सगळ्या घटना कादंबरीत मांडणं मोठं आव्हान आहे. लेखिकेने ते छान पेलले आहे. पौराणिक कादंबऱ्यांत वापरली जाणारी प्रौढ संस्कृतप्रचुर मराठी भाषा आहे. वेगवेगळे शास्त्रार्थ कसे झाले असतील, काय प्रश्न विचारले गेले असतील याचं मनोज्ञ चित्रण आहे. हे चरित्र नसून कादंबरी आहे त्यामुळे कादंबरीचे नायक शंकराचार्यांच्या भावभावनाही यथार्थ वर्णन केल्या आहेत. बाल शंकर; आपला अकाली मृत्यू होणार आहे हे जाणवल्यावरचा शंकर; गुरूप्राप्ती होऊन आचार्य झाल्यावरचे शंकर;  मठाधिपती म्हणून शिष्यांची नेमणूक केल्यावर आता त्यांची भेट होणार नाही म्हणून व्याकुळ होणारे आचार्य; आपल्या आईला आपण पुत्रसुख देऊ शकलो नाही हा सल सहन करत कर्तव्य-भावना यांचा तोल सांभाळणारे पुत्र, कार्यपूर्ती झाल्यावर समाधीकडे प्रस्थान करणारे जगद्गुरू असे भावनांचे नाना रंग लेखिकेने भरले आहेत.काही उतारे वाचलेत की पुस्तकाचे रूप समजून घेता येईल.

बाल शंकरच्या आयुष्यातील एक प्रसंग :



बौद्धधर्माच्या प्रचारामुळे बरेच ठिकाणी हिंदूमंदिरातील मूर्तीपूजा बंद पडली होती, मूर्ती नाहिशा झाल्या होत्या. अश्या मंदिरात शंकराचार्यांनी मूर्तिस्थापना करून हिंदूधर्मियांना आत्मविश्वास दिला अशी वर्णने कादंबरीत आहेत. त्यातला एक प्रसंग



शास्त्र-वेद-विज्ञानाच्या चर्चांतून त्यांनी नाना पंथीयांना एकत्र आणले. ही रक्तविहीन क्रांती होती ज्यातून देश एकत्र आला. असाच एक प्रसंग



पीठस्थापनेचा हा प्रसंग


वर म्हटलं त्याप्रमाणे शंकराचार्यांच्या मनोवृत्तीचाही वेध घेण्याचा प्रयत्न अनेक प्रसंगांत केला आहे. शंकराचार्यांच्या मनाची कातर अवस्था दाखवणारे हे स्वगत


त्यांनी वेगवेगळी स्तोत्रे प्रसंगोपत रचली. प्रसंगाच्या ओघात त्याचाही उल्लेख आहे. शास्त्रार्थ करून अद्वैत मत सिद्ध करण्याचे प्रसंग कादंबरीत पुन्हापुन्हा येतात त्यामुळे काहीवेळा ते कंटाळावाणं होतं. कारण प्रत्यक्ष चर्चा खूप गहन असणार ते सगळं तसं पुस्तकात मांडणं शक्य नाही आणि पुस्तकाचा तो मुख्य विषयसुद्धा नाही. पण त्यामुळे त्याचप्रकारचे प्रसंग पुन्हापुन्हा वाचल्यासारखे वाटतात.

बौद्ध आणि जैनमताचा प्रचार झाला होता होता हा उल्लेख वारंवार येतो. पण त्यामुळे नक्की समाजाचं काय वाईट झालं होतं हे शेवटपर्यंत कळत नाही. एका शास्त्रार्थात हा प्रश्न विचारला गेल्याचं दाखवलं आहे. पण आचार्यांच्या तोंडून त्याचं स्पष्ट उत्तर नाही.

शंकराचार्यांच्या आयुष्यात घडलेले चमत्कार सुद्धा पुस्तकात आहेत पण ते योगायोग असावेत किंवा काही कल्पना असाव्यात अश्या रूपात मांडून अंधश्रद्धा पसरवल्या जाणार नाहीत आणि आचार्यांचं मानवत्त्व पुसलं जाणार नाही याची काळजी घेतली आहे.

पुस्तकात दिलेली लेखिकेची माहिती


वाचकाला थेट आदिशंकराचार्यांच्या काळात नेऊन त्यांच्या महान कार्याचं महत्त्व मनावर बिंबवणारी ही कादंबरी रसिक वाचकाला वाचायला आवडेल.


----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )
----------------------------------------------------------------------------------


----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------

अधर्मकांड (adharmakand)

पुस्तक - अधर्मकांड (adharmakand) लेखक - उदय भेंब्रे (Uday Bhembre) अनुवादिका - अकल्पिता राऊत देसाई (Akalpita Raut-Desai) भाषा - मराठी (Marat...