रणांगण (ranangan)





पुस्तक :- रणांगण (ranangan)
लेखक :- विश्राम बेडेकर (Vishram Bedekar)
भाषा :- मराठी (Marathi) 
पाने :- ११४

विश्राम बेडेकर लिखित "रणांगण" ही छोटेखानी कादंबरी किंबहुना दीर्घकथा आहे. 

पहिलं महायुद्ध होऊन गेलं आहे. दुसऱ्या महायुद्धाचे पडघम वाजू लागले आहेत. आणि युरोपात राहिलेला एक भारतीय तरूण बोटीचा प्रवास करून भारतात परत येतो आहे. तिकडे जाण्याच्या आधी झालेल्या प्रेमभंगामुळे स्त्रीजातीविषयी त्याच्या मनात अढी आहे; त्यांच्या प्रेमभावनेविषयी शंका आहे. तरीही विषयोपभोग करत युरोपात या तरूणाने बरीच चैन केली आहे. त्याच्या बोटीवरच जर्मनीतून परगंदा झालेले, नाझी छळापासून सुटका करून पळालेली बरीच दरिद्री ज्यू मंडळीही आहेत. अशाच एका यहुदी तरुणीशी बोटीवर त्याची दृष्टभेट होते. एकेमेकांकडे ते आकर्षिले जातात. 

या बोटीमधल्या त्यांच्या प्रेमभावनेची ही छोटी कहाणी आहे. आपल्या मागे राहिलेल्या प्रियकराची आठवण, ज्यू म्हणून मिळलेल्या अमानुष वागणुकीनंतर कुणितरी तिला आपलं म्हणतं आहे यामुळे ती वेडावून जाते. तरीही हे नातं क्षणभंगुर आहे; या प्रवासाबरोबर संपणार आहे याची जाणीव तिला आहे. अश्या वेगवेगळ्या भावकल्लोळात ती तरुणी आहे. आणि तो तरुणही हे आकर्षण, की प्रेम, की सहानुभूती; या नात्याचं नेमकं भविष्य काय अशा गोंधळात ! 

ज्यूंना मिळालेली वागणूक, तेव्हाच्या काही लोकांचे ज्यूंबद्दल ते कंजूष, नफेखोर आहेत असं झालं होतं हे काही प्रसंगात कळतं. त्यावेळच्या बोटीवरच्या प्रवाशांची रोडरोमियोगिरीही वाचून ७०-८० वर्षांपूर्वी देखील लोक असे वागत होते याचं आश्चर्य वाटतं. 

कादंबरी अशाच प्रसंगात घडते संपते. मुख्य विषयाची खोली लक्षात घेता मात्र खूप वरवर लिहिली आहे असं वाटतं. व्यक्तिचित्रे फार परिणाम कारक वाटली नाहीत. ही कादंबरी १९३९ साली सर्वप्रथम प्रकाशित झाली आणि तेव्हा खूप गाजली व साहित्याचा मानदंड ठरली असा उल्लेख मलपृष्टावर आहे. तितकी "ग्रेट" काही मला वाटली नाही. इतपत कथा दिवाळी अंकातही वाचायला मिळतात. ७०-८० वर्षांपूर्वीची असली तरी भाषा जुनाट वाटत नाही. म्हणजे पल्लेदार वाक्य, बोजड शब्द, उपमांच्या भडिमाराचा कृत्रिमपणा असा प्रकार नाही. आजच्याच भाषेतली वाटते. म्हणजे तेव्हा ती खूप नवी वाटली असेल. दुसरं महायुद्ध होऊ घातलेलं असताना ही कादंबरी प्रकाशित झाली या प्रासंगिकतेचा वाटा कादंबरीच्या प्रसिद्धीत असेल. भिन्नधर्मिय स्त्री-पुरुषसंबंध हे सुद्धा तेव्हा खूप "बोल्ड" वाटलं असेल.

कादंबरी किंबहुना दीर्घकथा वाचायला कंटाळवाणी नाही पण आत्ता खूप लक्षात राहीलशी वाटली नाही.



------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
------------------------------------------------------------





----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)

---------------------------------------------------------------------------------- 

हा तेल नावाचा इतिहास आहे!... (ha tel navacha itihas ahe!..)




पुस्तक :- हा तेल नावाचा इतिहास आहे!... (ha tel navacha itihas ahe!..)
लेखक :- गिरीश कुबेर (Girish Kuber)
भाषा :- मराठी (Marathi)
पाने :- २५५


पेट्रोल दोन रुपयांनी वाढणार, डिझेल मध्यरात्रीपासून तीस पैशांनी स्वस्त होणार, विनाअनुदानित सिलेंडरच्या किंमतीत मोठी वाढ अशा बातम्या आपण नेहमी ऐकतो आणि भावाच्या चढ-उताराप्रमाणे खुश होतो तर कधी चिडतो. बहुतेक वेळा चिडायचीच पाळी येते आणि आपण सरकारला शिव्या देतो. पण पेट्रोल-डिझेल इत्यादींचा भाव ठरवण्यात सरकारचा वाटा आहेच, पण सरकार व्यतिरिक्त अनेक घटक यासाठी कारणीभूत असतात. हे फार कमी लोकांना माहीत असतं. तेलाचं उत्पादन, तेल कंपन्यांचा नफा, उत्पादक आणि विक्रेते देशांचं राजकारण, चाललेली युद्ध अशी एक ना अनेक कारणं/घटक यात सामील असतात. पण खरंच तेलाला ही वेगळी वागणूक का ? एखाद्या कंपनीनं तेल काढलं, आपला नफा धरून हव्या त्या किंमतीला ग्राहकाला विकलं; इतका साधा सोपा व्यवहार का नाही ? देशांचं राजकारण त्यात मधे कुठे आलं ? तेलाचा आणि युद्धाचा काय संबंध ? ... तुम्हाला जर असे प्रश्न पडत असतील तर त्यांची उत्तरं मिळवण्यासाठी तुम्ही "हा तेल नावाचा इतिहास आहे !.." हे पुस्तक वाचायलाच हवं.

लोकसत्ता या दैनिकाचे विद्यमान संपादक श्री. गिरीश कुबेर यांनी हे पुस्तक सखोल अभ्यास करून लिहिलं आहे.
२७ ऑगस्ट १८५९ या दिवशी अमेरिकेतल्या पेनसिल्वेनियातील टायटसव्हिल इथं कर्नल एडविन ड्रेक याच्या विहिरीला तेल लागलं. जगातली ही पहिली तेलविहीर. इथपासून ते पुस्तक प्रकाशित झालं तो पर्यंतचा- म्हणजे २००६ पर्यंतचा - तेलाचा इतिहास, तेलाने कंपन्यांना, देशांना कसं झुलवलं याचा मोठा कालपट लेखक आपल्यासमोर मांडतो.

यात अनेक रोचक, रंजक प्रसंग येतात. वानगी दखल काही.

तेलाच्या सुरुवातीच्या दिवसात जॉन रोकफेलर यांच्या "स्टॅंडर्ड ऑइल" कंपनीने आपला दबदबा निर्माण केला.  बजारात मक्तेदारी निर्माण करण्यासाठी योग्य-अयोग्य सर्व मार्गांचा वापर करून प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम केलं. शेवटी या अनैतिक मक्तेदारीला आळा घालण्यासाठी अमेरिकन सरकारला मक्तेदारी विरुद्ध "अ‍ॅंटीट्रस्ट" कायदा करावा लागला.

रशीयतल्या बाकू प्रदेशात तेल सापडलं. त्या तेलाच्या धंद्यात नोबेल बंधू - ज्यांच्या नावने नोबेल दिलं जातं ते आल्फ्रेड नोबेल यांचे भाऊ - उतरले. आणि रशियातल्या तेल उद्योगाला सुरुवात झाली. महाकाय "स्टॅंडर्ड ऑइल" ला टक्कर देत स्वतःचं अस्तित्व त्यांनी टिकवलं आणि वाढवलं. पुढे या बाकू प्रदेशात खूप मोठ्या प्रमाणावर तेल विहिरी उद्योग सुरू झाले. तिथल्या कामगार चळवळीतून स्टॅलिनचा उदय झाला.

तेलाने खरा रंग दाखवला तो पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात. तोपर्यंत घरगुती वापर, वाहने, जहाजे आणि इतर उद्योगांसाठी तेलाचा वापर खूप वाढला होता. त्यामुळे देश चालवायचा अर्थव्यवस्था टिकवायची तर तेलाचा पुरवठा सतत होत राहिला पाहिजे. त्यामुळे शत्रूराष्ट्राचं तेल रोखणं, दुसऱ्यांच्या कंपन्यांना नामोहरम करणं, तेलवाहू जहाजं फोडणं प्रसंगी तेलविहिरी नष्ट करणं ही सर्व पावलं सामरिक योजनेचा भाग होती. हिटलर आणि त्याच्या सहकाऱ्यांचा विस्तारवाद आणि मित्रराष्ट्रांचं प्रत्युत्तर हा इतिहास अनेक वेळा आपण वाचतो पण त्याची ही "तेलकट" बाजू फार पुढे येत नाही. म्हणून ही सर्व प्रकरणे माहितीत मोलाची भर घालतात.

अपण ज्यांना मित्र राष्ट्रे म्हणतो ती देखील स्वार्थासाठीच एकत्र आलेली; स्वतःचं तेल शाबूत ठेवण्यासाठीच "मित्र" बनलेली होती. कारण युद्ध संपताच सुरू झाली ती त्यांच्यतलीच सुंदोपसुंदी. पश्चिम अशिया, पर्शिया इथल्या तेल साठ्यांवर नियंत्रण सर्वांनाच हवं होतं. एकमेकांचे पाय ओढत स्वतःचा स्वार्थ बघत या पाश्चिमात्य देशांनी या भूभागाच्या हव्या तशा फाळण्या केल्या आणि संघर्शाची बीजं रोवली. पाण्यासारखा पैसा ओतून अरबस्तानातल्या शेखांना, राज्यकर्त्यांना आपल्या कह्यात आणलं. तिथल्या स्थानिकांच्या आशाआकांक्षा, त्यांचं कल्याण या पेक्षा सर्वांना महत्वाचा होता तो तेलकंपन्यांचा स्वार्थ, त्यांचा अबाधित तेलपुरवठा आणि त्यांचा नफा. त्यासाठी वेळोवेळी युद्ध खेळली गेली. इस्राएल-इजिप्त आणि शेजारी राष्ट्र यांची युद्धं झाली. एकाच्या बाजूने रशिया तर दुसऱ्याच्य बाजूने अमेरिका असे उभे राहिले; दुसऱ्याचं पारडं जड होऊ नये म्हणून. इराणच्या खोमेनी ला शह देण्यासाठी अमेरिकेने पैसा, शस्त्र देवून उभं केलं सद्दामला आणि झालं इराक-इराण युद्ध. पण पुढे सद्दाम दोईजड होतोय म्हटल्यावर त्याच्या विरोधात अमेरिकेनेच युद्ध सुरू केलं. राशिया अफगाणिस्तानात घुसल्यावर अमेरिकेने त्याच्या विरुद्ध अफगाणी अतिरेक्यांना पाठबळ दिलं आणि आता त्याच अतिरेक्यांविरुद्ध लढायला लागतंय अमेरिकेला. थोडक्यात काय सद्दाम सारख्याची सत्ताकांक्षा असो, काही देशांतला लोकप्रक्षोभ असो की धार्मिक तेढ प्रत्येक बाबीचा वापर इथे केला गेला तेलाकंपन्यांच्या राजकारणासाठी.

तेलावरच पुस्तक असल्यामुळे स्टॅंडर्ड ऑइल,शेल, कोनोको फिलिप्स, अ‍ॅंग्लो अमेरिकन, बर्मा-शेल, ब्रिटिश पेट्रोलियम(BP), एक्सॉन, गल्फ अशा नावाजलेल्या तेलकंपन्यांच्या जन्मकथा त्यांच्या नावामागच्या गोष्टी आपल्याला वाचयला मिळतात. "ओपेक" या तेल उत्पादक देशांच्या संघटनेचा इतिहास आणि युद्ध घडवून आणण्यातलं योगदान हे ही पुस्तकात आहे.

शेवटची काही प्रकरणं या सर्व काळात भारतात काय घडत होतं या बद्दल आहे. पं. नेहरूंच्या मंत्रीमंडळातले केशव देव मालवीय यांच्या नेत्तृत्वामुळे भारतात तेल उद्योग कसा सुरू झाला, तेव्हा आलेल्या अडचणी, अमेरिकेला शह देण्यासाठी रशियाने आपल्याला केलेली मदत, अंकलेश्वर रिफायनरी व बॉम्बे हाय यांच्या जन्मकथा हे सगळं वाचयला मिळेल. भारतातले तेल उत्पादन, वापर, त्याच्यावरची करप्रणाली इ. तांत्रिक भगही लेखकाने समजवून सांगितला आहे.

पुस्तकात काय आहे हे अगदी थोडक्यात सांगायचं म्हटलं तरी इतकं लिहावं लागलं. हे बघूनच हे पुस्तक किती महितीपूर्ण अहे याची कल्पना आली असेलच. इतकी माहिती असूनही हे पुस्तक म्हणजे सनावळ्या, आकडेवारी यांची जंत्री नाही. तर कुबेरांनी ओघवत्या, कथाकथन शैलीत सगळं सांगितलं आहे. आपल्या समोर बसून गप्पांच्या ओघात, गप्पांच्या थाटात ते सांगतायत असंच वाटत राहतं. त्यामुळे वाचताना कंटाळा आला असं होत नाही. पुस्तकात काही जुने फोटो आणि नकाशे देखील आहेत.

तेलाचं राजकारण, राजकारणामागचं कंपन्यांचं अर्थकारण, अर्थकारणामागचा स्वार्थ, स्वार्था मागची सत्ताकांक्षे मागचं तेल; हे सगळं त्रांगडं समजून घ्यायचं आणि या जगाबद्दलचं आपलं आकलन अधिक परिपक्व करायचं तर हे पुस्तक वाचयलाच हवं.



------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )
------------------------------------------------------------





----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------









लोकमत दीपोत्सव (दिवाळी अंक २०१६) Lokamat Deepotsav Diwali edition 2016





पुस्तक :- लोकमत दीपोत्सव (दिवाळी अंक २०१६) Lokamat Deepotsav Diwali edition 2016
पृष्ठ संख्या :- २५६

किंमत  :- रु. २००/-


पुस्तक परीक्षणाच्या ब्लॉग मध्ये दिवाळी अंकाचं परीक्षण कसं आलं असं तुम्हाला वाटू शकेल. पण हा दिवाळी अंक चांगला मोठा २५६ पानांचा आहे. त्यातली शंभर जाहिरातींची सोडली तरी हे दीडेकशे पानांचं पुस्तक - लेखसंग्रहच आहे. म्हणूनच या अंकाचं हे परीक्षण या ब्लॉगवर टाकत आहे. 

या अंकात कुठले लेख आहेत ते वर दिलेल्या अनुक्रमणिकेत दिसतंय पण नावावरून लेखाचा विषय लक्षात येईलच असं नाही. म्हणून या लेखांबद्दल थोडंसं. 

हे लेख एखाद-दोन पानी छोटे लेख नाहीत तर सात-आठ पानांपासून पंचवीस-तीस पानी दीर्घ लेख आहेत. 

"एनएच ४४" हा सगळ्यात मोठा आणि विशेष लेख आहे. लोकमतच्या टीमने एका गाडीने कन्याकुमारीपासून श्रीनगर पर्यंत राष्ट्रीय महामार्ग एनएच ४४ ने ३७४५ किमी चा प्रवास केला. ३५ दिवस ३५ रात्री. या भारत भ्रमणात त्यांना जसा भारत दिसला, जाणवला ते ते अनुभव त्यांनी शब्दबद्ध केले आहेत. ते वाचताना जणू आपणही त्यांच्या बरोबर प्रवास करतो. भारताच्या विविधतेचा अनुभव घेतो. किती तरी वेगवेगळी माणसं भेटतात. स्वतःच्या जगण्याला आकार देण्यासाठी धाडपडणारी, गरीबी झेलणारी, शहरी करणाचे फायदे-तोटे भोगणारी...  रस्ता पुढे जातो तशी राज्यं बदलतात, हवा बदलते, भाषा बदलते, विचार करण्याची पद्धत बदलते. दक्षिण भारताकडून उत्तर भारताकडे जाताना हा बदल जाणावतो विकास-आधुनिकता-व्यक्तीगतप्रगती यात होणारी कमी जाणवते. काश्मीर मध्ये तर सध्याच्या धुमसत्या परीस्थितीत या कलंदरांना कर्फ्यू, दगडफेक, भारतविरोधी घोषणा, पॅलेट गन्स हे सगळं अनुभवायला मिळतं. आणि त्यांच्या लेखातून आपल्यालाही. 

इतकं वाचल्यावर या दीर्घलेखासाठी तुम्ही दिवाळी अंकावर उडी घेणार हे निश्चित. पण इथेच या अंकातला वाचनीय भाग सपंत नाही. अजून बरंच काही वाचायचंय तुम्हाला.

रतन टाटा यांनी भारतात रुजू पाहणाऱ्या स्टार्टप कंपनी संस्कृती बद्दल त्यांची मतं आणि भावना एका लेखात मांडल्या आहेत.फेसबुक निर्माता आणि अतिश्रीमंत अशा मार्क झुकेर्बर्गची पत्नी प्रिसिला चान-झुकेर्बर्ग हिचा एक लेख आहे. तिचं आयुष्य आणि ती मार्कसह काय समाजपयोगी कामं करत्ये या बद्दलचा हा लेख आहे. तिचं कुटुंब हे चिनी निर्वासित कुटुंब. त्यांनी अमेरिकेत स्थलांतर केलं. अशा कुटंबात जन्म घेऊन वाढताना केलेला संघर्ष, मार्कशी ओळख आणि संबंध, स्वतःचा विकास आणि गरीब समाजातल्या (हो अमेरिकेतही गरीबी, झोपडी, गलिच्छ वस्ती आहे) मुलांच्या शिक्षणासाठी त्यांचं कार्य  याबद्दल माहिती आहे. 

"कांझा जावेद" या पाकिस्तानी लेखिकेने पाकिस्तानी मुलांच्या मनात भारता बद्दल काय भावना आहेत - तिरस्कार, द्वेश भीती - आणि त्या कशा निर्माण होतात; निर्माण केल्या जातात हे मांडणारा लेख लिहिला आहे. तर "टेकचंद सोनावणे" यांनी त्यांना दिसलेला चीन आपल्याला दखवला आहे. पत्रकारितेनिमित्त ते चीन मध्ये राहत असल्यामुळे त्यांना अतिशय जवळून चीन बघता आला आहे. चिनीची शिस्त, आदरातिथ्य, प्रगती, समाजावरची नियंत्रणे, एक-मूल-योजनेचे दुष्परिणाम त्यांना जाणवले. चीनी माणसांमध्ये भारतीय कुटुंबव्यवस्था, चित्रपट, पेहराव या बद्दल आकर्षण आहे. पण भारतातला भ्रष्टाचार, स्त्रीयांवरचे अत्याचार यामुळे एक अढीही आहे. चीनमधल्या नियंत्रित लोकशाहीमुळे त्यांना भारतातली आंदोलने म्हणजे अराजकता वाटते. असे चिनी प्रगतीचे, विचार पद्धतीचे आणि भारताबद्दलच्या मतांचे वेगवेगळे पदर आपल्याला वाचायला मिळतील.

"फिक्सर्स" हा देखील वेगळाच, एका आगळ्या वेगळ्या पेशाबद्दल माहिती सांगणारा लेख आहे. अनेक परदेशी प्रवासी मुंबईत येतात. त्यांना नेहमीचं पर्यटन करायचं नसतं. त्यांच्या वाटा जरा अनपेक्षितच असतात. मुन्नाभाई मध्ये दाखवलंय तसं - "पुअर पीपल हंग्री पीपल" बघायचे असतात. धारावी बघायची असते, इथला वेश्या व्यवसाय बघायचा असतो. कुणाला इथलं रस्त्यावरचं खाद्यजीवन अनुभवायचं असतं. या पर्यटकांसारखे हल्ली हॉलिवूडचे निर्माते-दिग्दर्शकही शूटिंगसाठी इथे येतात आपल्या अनोख्या कल्पना घेऊन. या सगळ्यांच्या या गरजा पूर्ण करण्याचं काम असतं मुंबईतल्या काही हरहुन्नरी तरुणांचं. ज्यांना म्हणतात "फिक्सर्स". धारावीत फिरवणं, एखाद्या ठिकाणी शूटींगसाठी परवानग्या मिळवणं, नुस्तं सरकारीच नाही तर वेळ पडल्यास स्थानिक गुंडाला मॅनेज करणं, शूटिंगसाठी आवश्यक स्थानिक कलाकार शोधणं, दुभाषे मिळवणं, एखाद्या स्थानिक व्यक्तीची भेट ठरवणं असं जे-काही-लागेल-ते-पडेल-ते सहाय्य उपलब्ध करून देणं हे "फिक्सर्स"चं आयुष्य. अशा दोन "फिक्सर्स"शी या लेखातून आपण गप्पा मारतो. त्यांचे अनुभव ते आपल्याला सांगतात. ते अनुभव रोचक आणि रोमांचक आहेत. तसंच धारावीत फक्त गरीबी नाही तर जगण्यासाठीचा सकारात्मक संघर्ष कसा आहे, परदेशांत परदेशी म्हणून विकला जाणारा माल इथे कसा तयार होतो ही नवी दृष्टीही आपल्याला मिळते. 

युरोपातल्या निर्वासितांच्या समस्येचा ऊहापोह करणारा "रानोमाळ" हा लेख आहे.

अभिनेत्री प्रियांका चोप्रा, ब्रिटिश भारतीय लेखक रस्किन बॉंड, ज्येष्ठ गायिका गिरिजा देवी, घटम्‌ वादक विक्कू विनायकराम यांच्या बद्दलचे दीर्घ लेख आहेत. त्यांच्या क्षेत्रातल्या त्यांच्या नुभवांची भ्रमंती निःसंशय वाचनीय. 

थोडक्यात कुठलंही पान वाचण्यातून वगळावं असं नाहीच. मासिकाच्या सुरुवातीला विजय दर्डा यांनी त्यांच्या मनोगतात लिहिलं आहे की या अंकाच्या दोन लक्ष प्रतींची नोंदणी प्रसिद्धी आधीच केली गेली आहे. हा अंक या सर्व नोंदणीदारंचा विश्वास सार्थ ठरवतो यात शंकाच नाही. तुम्हीही हा अंक विकत घ्या किंवा तुमच्या दिवाळी अंकांच्या वाचनालयातून नक्की आणा.

या अंकाची ऑनलाईन खरेदी, ई-उक, अधिक छायाचित्रे आणि व्हिडिओजसाठी त्याचं संकेतस्थळ आहे
http://www.deepotsav.lokmat.com



------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )
------------------------------------------------------------





----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)


----------------------------------------------------------------------------------

अधर्मकांड (adharmakand)

पुस्तक - अधर्मकांड (adharmakand) लेखक - उदय भेंब्रे (Uday Bhembre) अनुवादिका - अकल्पिता राऊत देसाई (Akalpita Raut-Desai) भाषा - मराठी (Marat...