
पुस्तक - तिमिरपंथी (Timirapanthi)
लेखक - ध्रुव भट्ट (Dhruv Bhatt)
अनुवाद - सुषमा शाळिग्राम (Sushama Shaligram)
भाषा - मराठी (Marathi)
मूळ पुस्तक - तिमिरपंथी (Timirapanthi)
मूळ पुस्तकाची भाषा - गुजराती
प्रकाशन - मेहता पब्लिशिंग हाऊस जुलै २०१८.
अनुवाद - सुषमा शाळिग्राम (Sushama Shaligram)
भाषा - मराठी (Marathi)
मूळ पुस्तक - तिमिरपंथी (Timirapanthi)
मूळ पुस्तकाची भाषा - गुजराती
प्रकाशन - मेहता पब्लिशिंग हाऊस जुलै २०१८.
ISBN - 9789387789951
छापील किंमत - ३२० रु.
चोरीच्या दरोड्याच्या बातम्या ऐकल्या की आपल्याला त्या चोरांचा राग येतो. दरोडेखरांची भीती वाटते. पोलिसांनी त्वरित कारवाई करून त्यांना पकडावं फटकवावं, अशी जबरदस्त शिक्षा करावी की पुन्हा कधी कोणी चोरी करू नये. असं मनात येतं. पोलीस चोरांना पकडतातही. मुद्देमाल काही वेळा परत मिळतो. पण चोरीच्या घटना मात्र थांबत नाहीत. उलट प्रत्येक वेळी चोरी करण्याचं तंत्र प्रगत होत जातं आणि चोर पोलिसांचा खेळ रंगतच जातो. हा खेळ आजचा नाही तर अनादी कालापासून चालत आलेला आहे. भारतीय समाजव्यवस्थेत जिथे एक काम म्हणजे एक जात/समाज अशी वर्गवारी झाली. तिथे चोरी हे सुद्धा एक काम आहे, एक हस्तकला आहे आणि ती वापरून उपजीविका चालवणे हे सुद्धा योग्यच आहे असे मानणारा एक समाज निर्माण झाला. अशाच समाजाची कहाणी म्हणजे "तिमिरपंथी" हे पुस्तक.
चोरीच्या दरोड्याच्या बातम्या ऐकल्या की आपल्याला त्या चोरांचा राग येतो. दरोडेखरांची भीती वाटते. पोलिसांनी त्वरित कारवाई करून त्यांना पकडावं फटकवावं, अशी जबरदस्त शिक्षा करावी की पुन्हा कधी कोणी चोरी करू नये. असं मनात येतं. पोलीस चोरांना पकडतातही. मुद्देमाल काही वेळा परत मिळतो. पण चोरीच्या घटना मात्र थांबत नाहीत. उलट प्रत्येक वेळी चोरी करण्याचं तंत्र प्रगत होत जातं आणि चोर पोलिसांचा खेळ रंगतच जातो. हा खेळ आजचा नाही तर अनादी कालापासून चालत आलेला आहे. भारतीय समाजव्यवस्थेत जिथे एक काम म्हणजे एक जात/समाज अशी वर्गवारी झाली. तिथे चोरी हे सुद्धा एक काम आहे, एक हस्तकला आहे आणि ती वापरून उपजीविका चालवणे हे सुद्धा योग्यच आहे असे मानणारा एक समाज निर्माण झाला. अशाच समाजाची कहाणी म्हणजे "तिमिरपंथी" हे पुस्तक.
चोरी करणं, दरोडा घालणं याचेही वेगवेगळे प्रकार आहेत. लोकांच्या घरात शिरून चोरी करणे, शेतातले धान्य चोरणे, लोकांची गायईगुरे चोरणे, वाटसरूचे दागिने पैसे लुटणे, दुकान किंवा सावकारी पेढ्यांवर दरोडा घालून माल लुटणे असे कितीतरी प्रकार. गंमत म्हणजे ह्या प्रत्येक प्रकाराने चोरी करणारे लोक हे पुन्हा या चोरांच्या उपजाती. म्हणजे एका उपजातीत फक्त घरात आणि शेतीत चोरी करून धान्य चोरणार. पैशांना हात लावणार नाही. स्वतःच्या आवश्यकते पुरतंच वस्तू चोरणार जास्ती चोरणार नाही. फक्त रात्री चोरी करणार दिवसाढवळ्या चोरी करणार नाहीत. अशा एका "अडोडीया" नावाच्या उपजातीतल्या एका कुटुंबावर आधारित तिमिरपंथी ही कादंबरी आहे. ब्रिटिश काळातला किंवा स्वातंत्र्य मिळाल्यावरच्या पहिल्या काही वर्षातला काळ ह्यात आहे. गुजरात राजस्थानचा परिसर आहे.
"सती" या मुलीच्या लहानपणापासून ती थोडी मध्यमवयीन होईपर्यंतच्या घटना यात आहेत. सतीच्या आजीच्या तोंडून आधीच्या काळातले किस्से, चोरीच्या घटना सतीपर्यंत आणि वाचकांपर्यंत पोहोचतात. सतीच्या स्वतःच्या चोरीच्या सहसामधून समकालीन चोरीच्या गोष्टी कळतात. चोरीची कला एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कशी सुपूर्त होते हे पण दिसतं.
या जाती भटक्या-विमुक्त म्हणाव्या अशा. त्यांचा तांडा आज एका गावात तर उद्या दुसऱ्या गावात, काही दिवसांनी पुढच्या गावात असा सतत फिरत असे. गावाच्या बाहेर राहायचं वेगवेगळ्या रूपात गावात फिरायचं. कधी विक्रेता म्हणून; कधी सुरीला धार लावणारा म्हणून किंवा काही काम काढून. फेरफटका मारताना सावज हेरून ठेवायचं आणि मग रात्रीच्या अंधारात कार्यभाग उरकायचा. लोकांना कळायच्या आत तांडा दुसरीकडे गेलेला. लोकांना संशय आलाच तरी लोक तांड्याकडे वळेपर्यंत चोरलेल्या वस्तू बाजारात कुठेतरी विकल्या जाणार. सोनं वितळवलं जाणार. मुद्देमालाचा मागमूसही राहणार नाही इतकी सफाई.
ब्रिटिशांनी अशा जातींना ओळखून त्यांना गावाच्या बाहेर कुंपणाच्या आत स्वतंत्र वस्ती अर्थात सेटलमेंट मध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या सेटलमेंट मध्ये राहायचं आणि रोज सकाळ संध्याकाळी पोलीस स्टेशनवर हजेरी लावायची. जेणेकरून कोणी चोरी करून फरार झाला नाहीये हे स्पष्ट व्हावे. तरीसुद्धा गावात चोरी झाली तर पोलीस येऊन या सेटलमेंट मधल्या लोकांना पकडून बेदम मारून चौकशी करायचे. सतीचे कुटुंबीय अशा सेटलमेंट मध्ये नव्हते. अजूनही गावोगावी तांडा घेऊन भटकतच होते पण त्यांचे काही नातेवाईक मात्र सेटलमेंट मध्ये राहत होते. सतीपण लग्नानंतर सेटलमेंट मध्ये राहायला लागते. त्यामुळे या कादंबरीत तांड्यातलं आणि सेटलमेंटमधलं दोन्हीकडचं आयुष्य आपल्यासमोर उभं राहतं.
लेखक मनोगतात म्हणतो
"नगरात वस्त्यांवर पाड्या-तांड्यात राहणाऱ्या कित्येकांना भेटून मी त्यांच्या कहाण्या ऐकल्या. ज्या काळातल्या गोष्टी मला कळत गेल्या त्या काळाप्रमाणेच या लिखाणातही वेगवेगळ्या काळाचा समावेश आहे. अगदी अलीकडचा उल्लेख १९९३ च्या जवळपासचा थोडा पुढे मागे आहे. त्यानंतर कथा आजच्या घडी पर्यंत आणण्याचा प्रयत्न मी केला नाही. नवलाची गोष्ट अशी की ज्यावेळी ज्या कोणापाशी आजच्या काळाचा विषय निघाला त्या प्रत्येकाने मला एकच विचारलं "अब तो विद्या कडे? - आज आता विद्या कुठे आहे"
चोरी करणे यात काही पाप नाही. जसं जंगलामध्ये वाघ- सिंह हरिण, ससे यांची शिकार करतात त्याप्रमाणे आपण चोर सुद्धा आपली कला वापरून दुसऱ्याकडचं सामान चोरतो. त्यात त्याला त्रास द्यायचा उद्देश नसतो. पण हेच आपलं पारंपारिक काम आहे. अशी निखळ भावना त्यांच्या मनात दृढ आहे . जातीचे स्वतःचे काही नीतिनियमही आहेत. चित्रपटात म्हणतात तसं "बेईमानी का काम इमानदारी से करनेका". गावातलं सावज ज्याने हेरलं आहे त्याला म्हणायचं या कामातला "मालक". त्याने या कामासाठी लोक निवडायचे. चोरी कधी, कुठे, कशी करायची हे सगळं मालक ठरवणार. बाकीच्यांनी फक्त त्याबरहुकूम काम करायचं. चोरीच्या ऐवजातला मुख्य वाटा मालकाला मिळणार. घेतलेल्या जोखमीच्या प्रमाणत भागीदारांना वाटा मिळणार. चोरीबद्दल कोणी कुणाला सांगायचं नाही. ना आपल्या मित्रमंडळीत ना आपल्या घरी. ना त्याची कोणी चौकशी करायची. सगळा मामला गुप्ततेवर आणि परस्पर विश्वासावर अवलंबून.
पण... चोरी करता करताना लोकांना जाग आली आणि लोकांनी पकडलं तर मात्र बेदम मारहाण. संतापाच्या भरात केलेल्या मारहाणीत चोराचा जीवही जायचा. या भीतीमुळेच सतत सावध राहावं लागतं आणि लोकांची चाहूल लागली तर काम अर्धवट टाकून पळावं लागतं. सतीची आजी "नानकी" आणि तिच्या आजूबाजूच्या बायका यांच्या संवादातून असे घडलेले किस्से सतीला कळतात आणि त्यातून चोराने कसं वागलं पाहिजे; काय केले पाहिजे; काय नाही केलं पाहिजे याचे "सुसंस्कार" तिच्यावर होत असतात. तिच्यातली चोर घडत असते.. नव्हे नव्हे चोर नव्हे... कलाकार !!
सेटलमेंट चा कायदा, नव्याने होता असलेला शिक्षणाचा प्रसार ह्यामुळे सतीच्या मनातही आपल्या वस्तीतल्या मुलांनी शिकावं, काही वेगळा काम धंदा शिकावा अशी इच्छा मनात उमटू लागते. पण वंशपरंपरेने चोरी करणाऱ्या या लोकांवर बाहेरच्या समाजाचा सहज विश्वास बसत नाही आणि कितीही प्रयत्न केला तरी चोरीचा शिक्का पुसला जात नाही याची जाणीवही तिला होत असते. तर दुसरीकडे; हा शिक्का पुसण्याची तयारी तिच्याच समाजात नसते. "चोरी सोडून पुस्तकं शिकणं, दुसरं काम करणं म्हणजे आपण आपल्या पूर्वजांनी केलेल्या कलेचा कामाचा अपमान करतो आहोत; आपल्या मुलांनी आपली कलाच चालवली पाहिजे" हे त्यांचं म्हणणं असतं. हेही वास्तव पुस्तकात दिसतं.
पुस्तकामध्ये चोरांच्या प्रकारांचे, त्यांच्या "विद्ये"बद्दलचे संस्कृत शब्द पण दिले आहेत. काही वाक्य बघा.
... सती स्वतः "मालक" होती विठ्ठल केवळ 'वटाविक' ( भागीदार चोर) होता.
... शास्त्रात सुद्धा हेच सांगितले की ' त्रप'ने (स्वतःच्या निष्काळाचीपणामुळे अचानक अडचणीत सापडलेला चोर) कुठेही थांबायचं नसतं.
... शिवाय आत शिरलेला 'कुसुमाल'(फुलांसारखी लोभस वस्तू चोरणारा) आपला कार्यभाग साधत असतो.
... तायु (चोर)
.. लट (लांडीलाबडी करून लुटणारा)
... कसबी वर्गानुनं(चोरांनं) ही कला साध्य केली असेल, नाही असं नाही. पण खिसेकापू म्हणवणारा प्रत्येक पटच्चर (सार्वजनिक जागी लुटणारा) खिसा कापतो हे खोटं.
आयुर्वेद, धनुर्वेद ह्या सारखा कुठला "चौर्यवेद" ग्रंथ आहे ज्यातून हे शब्द घेतले आहेत कल्पना नाही.
आता काही पानं उदाहरणादाखल वाचा.
पुस्तकात दिलेली लेखकाची माहिती
एका दरोड्याची तयारी आणि तो करता करता जुना एक किस्सा.
पुस्तकाची निवेदन शैली म्हणजे फक्त किश्श्यांची जंत्री नाही तर एक सलग कथानक आहे. सतीच्या आयुष्यातला प्रसंग आणि त्या प्रसंगाच्या वेळी झालेल्या बोलण्यातून भूतकाळातल्या घटना कळतात. मग पुन्हा आत्ताची घटना व पुन्हा मागे. असा काळ पुढे मागे सरकत राहतो. पुस्तक वाचताना आपण चोरांच्या बाजूचे होतो.. आता हे "कलाकार" कशी "कला" दाखवतात याची उत्सुकता आपल्याला लागते. ते यशस्वी व्हावेत, मारहाण न होता त्यांना पळता यावं अशी आपली इच्छा होते ह्याची गंमत वाटते. रहस्यकथा, गुन्हेगारी कथा, पोलीसकथा ह्यांपेक्षा पुस्तकाचा बाज वेगळा आहे हे लक्षात आलं असेलच. म्हणून हे पुस्तक म्हणजे "जावे चोरांचीया वंशा तेव्हा कळे" असा अनुभव देणारं आहे.
——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
No comments:
Post a Comment