जा जरा पूर्वेकडे (Ja jara purvekade)




पुस्तक - जा जरा पूर्वेकडे (Ja jara purvekade)
लेखक - आशुतोष जोशी (Ashutosh Joshi)
अनुवाद - सविता दामले, मोहना प्रभुदेसाई जोगळेकर (Savita Damle, Mohna Prabhudesai Joglekar)
भाषा - मराठी (Marathi)
मूळ पुस्तक - Journey to the east (जर्नी टू द ईस्ट)
मूळ पुस्तकाची भाषा - English (इंग्रजी)
पाने - १७५
प्रकाशन - ब्लीच पब्लिशिंग 2025
ISBN - 978-93-342-9139-1
छापील किंमत - रु. ५००/-

समाज माध्यमांवर पोस्ट वाचताना, व्हिडिओ बघताना कळलं की आशुतोष जोशी या पंचवीस-तिशीतल्या तरुणाने कोकणापासून बंगालच्या उपसागरापर्यंत पदयात्रा केली आहे. ह्या प्रवासापूर्वी तो इंग्लंडमध्ये फोटोग्राफीची व्यावसायिक कामे करत होता. पण त्याने भारतात परत यायचं ठरवलं. ही पदयात्रा केली. आणि सध्या तो त्याच्या गावी गावकऱ्यांसाठीचे काही सामाजिक प्रकल्प राबवतो आहे. ह्या जुजबी माहितीवरून त्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि त्याच्या प्रवासाबद्दल उत्सुकता वाटून त्याचे पुस्तक मी विकत घेतलं. "जा जरा पूर्वेकडे" या पुस्तकात त्याने त्याच्या पदयात्रेतल्या अनुभवांबद्दल लिहिले आहे. १८५० किलोमीटर इतकी लांब ही पदयात्रा होती त्याला ६७ दिवस लागले.

हे पुस्तक त्याच्या प्रवासाची रोजनिशी नाहीये. प्रवासाचा सुरुवातीचा दिवस, शेवटचा दिवस आणि मधल्या काळात घडलेल्या दहा पंधरा घटना त्यात आहेत. एखादा प्रसंग आणि त्यावर आधारित त्याचं बरंचसं तत्वचिंतन असं निवेदनाचं स्वरूप आहे.

पुस्तक वाचताना कळतं की मर्यादित सामान एका ढकलगाडीत घालून तो प्रवास करत होता. कधी कुणाच्या घरी, कधी देवळात, तर कधी उघड्यावरती तंबू ठोकून त्याने मुक्काम केला. वाटेतल्या लागणाऱ्या गावांमध्ये गावकऱ्यांनी त्याला खायला दिलं. काहीवेळा घरीही राहायला देऊन पाहुणचार केला. असं काहीमिळालं नाही तेव्हा त्याच्या स्वतः कडची मॅगी किंवा पॅकेट फूड खाऊन दिवस काढला. ऊन, पाऊस, जंगली दमटपणा, सिमेंटचा रस्ता, कच्चा रस्ता माळरान अशा वेगवेगळ्या परिस्थितीतून त्याने प्रवास केला.

काही पाने उदाहरणादाखल

लेखकाची पुस्तकात दिलेली माहिती.


गावकऱ्याशी संवाद आणि शेतीबद्दल चिंतन.



नक्षलप्रभावित भागात शिरताना पोलिसांनी चौकशी केली.



पंचविशीतला एक तरुण पदयात्रेवर निघतोय हे किती धाडसाचं आहे! अशा प्रवासात स्वतःला शारीरिक व मानसिक दृष्ट्या खंबीर ठेवणं महत्त्वाचं आहे. अनोळखी प्रदेशातून जाताना कधी त्रासदायक तर कधी चिंतेत टाकणारी परिस्थिती समोर येणार; तर कधी अनपेक्षित आनंदाचे क्षणही येणार. आशुतोषचं हे धाडस, त्याला आलेले अनुभव आणि त्यातून त्याच्या मनावर विचारांवर झालेला परिणाम हे सगळं ह्या पुस्तकात सापडेल असं वाटून मोठ्या औत्सुक्याने मी हे पुस्तक वाचायला घेतलं. परंतु पुस्तकाने माझी निराशा केली.

ज्या प्रसं
गांचं वर्णन केलं आहे त्या प्रसंगांचा स्थलकालाचा संदर्भच बहुतेक वेळा लागत नाही. अगदी सुरुवात म्हणजे त्याचं नरवण गाव कोकणात नक्की कुठे आहे हे मला माहिती नाही. शेवट ज्या गावात झाला ते माहिती नाही. त्याचा प्रवासाचा मार्ग कसा होता ते समजत नाही. नकाशा नाही तरी एखादं रेखाचित्र हवं होतं. रोजनिशी सारखं वर्णन नसल्यामुळे अचानक उड्या मारत मारत एका गावातलं वर्णन मग कुठल्यातरी पुढच्या गावाचं वर्णन मग त्याच्या पुढचं असं आहे. त्यामुळे मध्ये किती वेळ गेला, किती अंतर गेलं, काय केलं काही समजत नाही. त्यामुळे त्या प्रवासाचं गांभीर्य आपल्यापर्यंत पोहोचत नाही.

पुस्तकाच्या सुरुवातीला आशुतोष म्हणतो की परदेशात राहत असताना भारतात
ल्या  "कृषी कायदे" विरोधी आंदोलनाच्या बातम्या त्याने बघितल्या. शेतीच्या समस्या त्याला जाणवल्या. त्या नीट समजून घ्याव्यात हाही पदयात्रेचा उद्देश होता. पण पुस्तकात बघितलं तर; आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची भेट आणि गावातल्या एक दोन लोकांशी बदलत्या पीक पद्धती बद्दल बोलणं या व्यतिरिक्त काही खास संशोधनात्मक प्रसंग नाहीत. डोळेसपणे बातम्या बघणाऱ्या, वृत्तपत्रीय लेख वाचणाऱ्या कुठल्याही माणसाला जी जुजबी माहिती या समस्यांबद्दल असेल तेवढेच त्याला प्रत्यक्ष चालूनही समजली; असा समज वाचकाचा झाला तर नवल नाही. कदाचित त्याची वैयक्तिक समज खूप वाढली असेलही पण इथे ते ध्वनित होत नाही.

जंगलातल्या प्रवासात जाताना अस्वल अगदी त्याच्या जवळ आलं होतं. हल्ला व्हायची वेळ आली होती. हा एक प्रसंग वगळता पायी चालणे, उघड्यावर राहणे ह्यामुळे घडलेला कुठलाही थरारक प्रसंग पुस्तकात नाही. पदयात्रा करताना त्याला वारंवार संकटं यायला हवी होती आणि मग ती वाचायला आम्हाला मजा आली असती असं मला म्हणायचं नाहीये. मी सुरुवातीला म्हटलं तसं स्वतःची शारीरिक-मानसिक खंबीरता टिकवणे आणि स्वतःच्या रोजच्या सोयी करणे यासाठी केलेली धडपड सुद्धा वाचकाला समजून घ्यायला आवडलं असतं. पण पुस्तक त्याही बाबतीत लंगडं आहे. त्याला आलेले अजून अनुभव, भेटलेली माणसं, दिसलेला निसर्ग ह्यांचा अजून उल्लेख हवा होता. एक सलगता आली असती.

तिसरा पैलू म्हणजे सामाजिक परिस्थितीबद्दलचं त्याचं मुक्त चिंतन. एकूणच कथनाचा सूर असा आहे की शहरातले लोक आरामात जगतात आणि गावातले लोक फारच दुःखी आहेत. शहरातल्या लोकांना गावातल्या लोकांची जाण नाहीये. शहरातले लोक फक्त तंत्रज्ञानाचा आनंद घेत आहेत तर गावातले लोक मात्र निसर्गाशी तल्लीन झालेले आहेत. राग, क्रोध, ईर्षा हे सगळे अवगुण फक्त शहरी लोकांमध्ये आहेत. गावातले लोक मात्र मुक्त, स्वच्छंदी, आनंदी. हे काळंपांढरं चित्र फार खटकतं. एका प्रसंगात तो साधारणपणे असं म्हणतो की "माळरानावर भरपूर पाऊस पडत होता आणि दोन-तीन शेतकरी तिथे निवांत एकमेव च्या पाठीला पाठ लावून निवांत झोपले होते. द्वेषाचं ओझं त्यांच्या मनावर नव्हतं
पाऊस थांबल्यावर ते उठले. आकाश निरभ्र तशी त्यांची मनही निरभ्र. ते कसा छान आनंद घेत होते. शहरातल्या लोकांनी असा आनंद घेतला नसता". पण खरंच असं असेल का? ते शेतकरी पावसाचा आनंद घेत असतील, का कामाच्या चिंतेत असतील? आता हा पाऊस किती वेळ पडणार, यावर्षी जास्त पडणार, का कमी पडणार; ही भीती मनात नसेल का? तो पाऊस अवकाळी असेल तर त्यांच्याही मनात पावसाबद्दल शिव्याच असतील ना! दुसऱ्या एखाद्या गावकऱ्याकडे शेत जास्त आहे किंवा त्याची जमीन जास्त उपजावू आहे अशी असूयाही असेल. खेड्यात राहणाऱ्या लोकांमधली बांधांवरून भांडणं, भाऊबंदकी कोणाला ठाऊक नाही? "एक वेळ शहरातली कटकट परवडली पण भावकीतली भांडण नकोत", असं म्हणणारे कितीतरी गावकरी आपल्याला आजूबाजूलाही दिसतील. त्यामुळे लेखकाची शहरी जीवनाबद्दलची अनास्था, वैयक्तिक नावड आणि खेड्याबद्दलच्या काहीतरी रोमँटिक कल्पनारंजन अशा भावनेतूनच पूर्ण पुस्तक लिहिलं आहे. सरकार, नागरी व्यवस्था, आधुनिक जीवनपद्धती ह्यांना सरसकट अपराधी ठरवण्याची भूमिकाही दिसते. त्यामुळे त्याची तात्विक मल्लिनाथी ठिसूळ पायावर उभी आहे असंच मला वाटलं.

हे पुस्तक मूळ इंग्रजीत आहे. लेखकाने त्याच्या परदेशी परिचितांना डोळ्यासमोर ठेवून गोष्टींचं वर्णन केलं आहे असं जाणवतं. भारतात लग्नाच्या वेळी मांडव घालतात; काही वेळा काही खेड्यांमध्ये लोक प्रातर्विधीसाठी बाहेर जातात; भारतात स्थानिक राजकारणी आणि कॉन्ट्रॅक्टर याचं साटंलोटं असतं अशा प्रकारचे उल्लेख आहेत. सर्वसामान्य भारतीय वाचकाला हे नित्यनियमाचे आहे. पण कदाचित ही वर्णन परदेशी लोकांना दुर्लक्षित भारत ह्यात दिसला
. म्हणून सुरुवातीला तीन परदेशी लेखकांनी पुस्तकाची भलावण केलेली आहे. मला मुन्नाभाई एमबीबीएस मधल्या "आय वॉन्ट पुअर पीपल हंग्री पीपल" ह्या प्रसंगाची आठवण मला झाली.

असो ! पुस्तक जरी भावलं नसलं तरी आशुतोष सारखा परदेशात राहून आलेला उच्चशिक्षित, चिंतनशील तरुण कृतीशील होऊन आपल्या सभोवतालालकडे डोळसपणे बघतो आहे, त्याच्या क्षमतांनुसार प्रत्यक्ष काम करतो आहे हे खूप स्वागतार्ह आहे. त्याच्या कामासाठी खूप शुभेच्छा. त्याचा आयुष्याचा प्रवास सुखकर आणि यशस्वी होवो. आणि त्या प्रवासाचे पुस्तक काही वर्षांनी आपल्याला वाचायला मिळो ही सदिच्छा!!


——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

जा जरा पूर्वेकडे (Ja jara purvekade)

पुस्तक - जा जरा पूर्वेकडे (Ja jara purvekade) लेखक - आशुतोष जोशी (Ashutosh Joshi) अनुवाद - सविता दामले, मोहना प्रभुदेसाई जोगळेकर (Savita Dam...