छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर (Chhatrapati Shivaji Maharaj zale nasate tar)



पुस्तक - छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर (Chhatrapati Shivaji Maharaj zale nasate tar)
लेखक - गजानन भास्कर मेहंदळे (Gajanan Bhaskar Mehandale)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - ६२
प्रकाशन - ऐतिहासिक साहित्य प्रकाशन, फेब्रुवारी २०२१
छापील किंमत - रु. ५०/-
ISBN - दिलेला नाही.

आज १९फेब २०२६. तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. महाराजांना त्रिवार प्रणाम !! आज ह्या पुस्तकाबद्दल लिहिण्याचा आनंद वेगळाच आहे.

काही दिवसांपूर्वी मी रायगडावर गेलो होतो तेव्हा तिथल्या वस्तू आणि पुस्तकांच्या दुकानात हे छोटेखानी पुस्तक दिसलं. मेहंदळे सर हे अतिशय मुद्देसूदपणे आणि पुराव्यांच्या आधारे खरा इतिहास मांडणारे अभ्यासक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यामुळे त्यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याचा काय अन्वयार्थ लावला आहे, काय वैशिष्ट्य मांडलं आहे हे बघणं औत्सुक्याचं आणि महत्त्वाचं वाटलं. म्हणून हे पुस्तक लगेच विकत घेतलं.

पुस्तकाच्या पाठमजकुरावर त्यांनी त्यांचा आगामी पुस्तकाचा हेतू स्पष्ट केला आहे. इतिहासाची मोडतोड करून, महत्त्वाचे मुद्दे गाळून, हेतुपुरस्सर खोटारडेपणा केल्याची उदाहरणे नामवंत इतिहासकारांपासून पाठ्यपुस्तकांपर्यंत दिसतात. त्यांच्या हेतू विषयी न बोलता पुराव्यांच्या आधारे त्यांचा खोटारडेपणा उघड करत राहतात. शिवाजी महाराजांच्या आधी हजार वर्ष या भारतावर सत्ता गाजवणाऱ्या इस्लामी राजवटींचे धार्मिक धोरण, त्याचा परिणाम आणि शिवाजी महाराजांनी त्या प्रवाहाला कोणते वळण दिले हे ते सोदाहरण सांगणार आहेत. हे आगामी पुस्तक १४०० पानांचे होईल. पण त्या पुस्तकाची झलक आणि त्याचे सार रूप असावे असे हे प्रस्तुक पुस्तिक आहे. ६० पानांची पुस्तिकाच. पण आशयाच्या रूपात तुमच्या विचारप्रक्रियेवर कायमचा परिणाम करेल अशी. पुस्तकाच्या मजकुराचे दोन भाग आहेत. पहिला भाग इस्लामी राजवटींचे स्वरूप आणि दुसरा भाग महाराजांच्या राज्याचा हेतू.

शिवाजी महाराजांच्या आधी हजार वर्षे भारतातील बऱ्याच भूभागावर इस्लाम धर्म मानणाऱ्या शासकांचे राज्य होते. हे सगळे मुसलमानी सत्ताधीश किती क्रूरपणे कत्तली करत होते, स्त्रियांवर अत्याचार करत होते, पुरुषांची गुलाम म्हणून विक्री करत होते, बायकांना वेश्या बनवत होते. सर्वसाधारण इतिहासकार अशा घटनांचा उल्लेख आला की ती एखाद्या माथेफिरू राजाने केलेले दुष्कृत्य म्हणून त्याची दाहकता कमी करण्याचा नाकारण्याचा प्रयत्न करतात. पण लेखक हे दाखवून देतात की ते एखाद दुसरी घटना नाही. एखाद्या माथेफिरू राजाने केलेले हे कृत्य नाही तर अल्लाउद्दीन खिलजी पासून टिपू सुलतानापर्यंत प्रत्येकाने हे केलं आहे. जाणूनबुजून केलं आहे. इतिहासातलं क्रौर्य नाकारण्यात अर्थ नाही हे त्यांनी दाखवून दिलं आहे.

दुसरा मुद्दा असतो की हे असं काही झालं असेल पण इतक्या मोठ्या प्रमाणात नाही. ते आकडे फुगवून खोटी भीती निर्माण केली जाते. इथेही ऐतिहासिक पुराव्यातली आकडेवारी दिली आहे. बखरींमधली अतिशयोक्ती असेल असं गृहीत धरून तर्काच्या आधारे आकडेवारीचा अंदाज घेतला तरी तो किती महाभयंकर आहे. हे वाचून अंगावर शहारे येतात. केवळ नव्या इतिहासकारांना सोयीचा नाही म्हणून तो आकडा कमी होत नाही.

तिसरा मुद्दा असतो की, हे जे काय झालं ते त्या त्या राजाने स्वतःचं राज्य वाढवण्यासाठी केलं. शत्रूला नेस्तनाबूत करण्यासाठी, जरब बसवण्यासाठी केलं, शत्रू संपत्ती हडप केली इतकंच. त्यात सामाजिक धार्मिक काही नाही. आता लेखकाने पुन्हा पुराव्या आधारे दाखवून दिलं आहे की असं नाही. ही इस्लामची शिकवण होती म्हणूनच करण्यात आलं. इस्लाम न मानणारे ते काफर, त्यांच्या विरुद्ध सतत जिहाद करायचा, त्यांना जबरदस्तीने मुसलमान करायचे, न मानले तर हालहाल करून मारायचे ही इस्लामचीच शिकावण आहे. मुसलमान सत्ताधीशांनी स्वतः लिहून घेतलेल्या किंवा त्यांच्या दरबारी लोकांनी लिहिलेल्या वृत्तांतात इस्लाम धर्माच्या आज्ञेचं पालन म्हणून आपण हे करतो आहोत ह्याबद्दल स्वतःची, असं करणाऱ्या सरदारांची पाठ थोपटून घेतली आहे. काफरांना त्यांची जागा - नरक - दाखवल्याचं प्रचंड समाधान आहे. काफरांवर जिझिया कर लावून त्यांना दाबून ठेवल्याचं समाधान आहे. त्यांच्या बायकांना जनानखान्यात कोंडलं, दासी म्हणून वाटलं ह्याची प्रौढी आहे.

चौथा मुद्दा येतो की इतकं सगळं चालू होतं तर अख्खा भारत पूर्णपणे मुसलमान कसा झाला नाही. धर्मवेडाला पडलेल्या व्यावहारिक मर्यादा असल्यामुळे लूट-कत्तल-धर्मांतर ह्यांचा वेग कमी अधिक होत होता. आक्रमकांपेक्षा भारताची लोकसंख्या प्रचंड असल्यामुळे लक्ष्य पूर्ण व्हायला वेळ लागत होता इतकंच.

पाचवा मुद्दा येतो की धर्मांतर हे सुफी लोकांच्या मवाळ भूमिकेमुळे, प्रेमाच्या संदेशामुळे, हिंदू - मुस्लिम ऐक्याच्या भूमिकेमुळे झालं. इतिहासकारांचं हे बोलणं किती लबाडीचं आहे हे पुन्हा पुराव्याच्या आधारे दिलं आहे. काफरांना जबरदस्ती मुसलमान करा, नाहीतर मारा हे सुफी लोकांचं सुद्धा म्हणणं होतं. त्यांनी सुलतानांना साथ दिलीच, प्रसंगी तसं करण्याबद्दल उद्युक्तही केलं.

अशा पद्धतीने भारतभूमीची ह्या इस्लामी वरवंट्याखाली कशी वाट लागली होती हे स्पष्ट केल्यावर लेखक शिवाजी महाराजांच्या धोरणाकडे वळतात. स्वराज्य हे निःसंशय हिंदू राज्य होतं हे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केलं आहे. शिवाजी महाराजांनी जिथे जिथे आपला जम बसवला तिथल्या तिथल्या हिंदू तीर्थक्षेत्रांची पुनर्स्थापना केली. मंदिरे तोडून मशिदी बांधल्या होत्या तिथे त्या जागी पुन्हा मंदिरे निर्माण केली. महाराष्ट्रातच नव्हे थेट तामिळनाडूमध्ये तिरुवन्नामलै येथील अरुणाचलम शिवालयाची मशिद त्यांच्यामुळे पुन्हा मंदिर झाली. "कार्तिक दीपम" उत्सव पुन्हा सुरु झाला. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, गोवा इथे महाराजांनी मुक्त केलेल्या मंदिरांची उदाहरणे पुस्तकात आहेत.

महाराज हे इतर धर्माबद्दल सहिष्णू होते म्हणून ते सगळ्या धर्मांना एकसारखे बघत होते असे नाही. त्यांचा राज्यकारभार हिंदू पद्धतीने चालत होता. हिंदू समाजाच्या रीती, उत्सव, मठ ह्यांना देणग्या आणि प्रतिष्ठा दिली जात होती. तुर्क - म्लेंछ ह्यांचा विद्ध्वंस करून स्वत्त्वाची प्रतिष्ठापना करणे हे त्यांचे धोरण होते. त्याबद्दल त्यांचे शत्रू त्यांना कसे शिव्या घालत होते ह्याचीही उदाहरणे दिली आहेत. इस्लामी राजवटींचा नाश आणि हिंदू समाजाचा उत्कर्ष कसा होत होता ह्याची ही उलटी प्रमाणपत्रेच म्हणायला हवी.

छत्रसालासारख्या इतर हिंदू राजांनाही शिवाजी महाराजांनी ह्या धोरणात प्रोत्साहित केले. त्यांच्या समकालीनांमध्ये ते बिंबलेच. त्यांच्या शिकवणुकीनुसार पुढे मराठा साम्रज्याचा दक्षिणोत्तर विस्तार झाला तेव्हा ह्याच धोरणाचे विस्तृत स्वरूप देशाला बघायला मिळाले.

काही पाने उदाहरणादाखल.

अनुक्रमणिका

जिझिया

युद्धकैदी स्त्रियांची विटंबना

सूफींचा पर्दाफाश

हिंदुधर्माला प्रोत्साहन आणि तुर्कांचा नाश करण्याचे महाराजांचे धोरण.

असे हे पुस्तक किमान शब्दांत कमाल आशय सांगून जाते. क्रौर्याने भरलेल्या घटना सांगताना घटना "रंगवून" न सांगता हे हे असं असं झालं, पत्रांत असा उल्लेख आहे, त्याचे संदर्भ असे आहेत; असं सरळ सोपं वर्णन आहे. त्या घटना रक्तरंजितच आहेत. चीड आणणाऱ्या आहेत. हे सत्य प्रभावीपणे अधोरेखित होतं. प्रचलित इतिहासकारांचा खोटारडेपणा त्यांनी पानोपानी उघड केला आहे. तरीही आता तुम्हाला खोटं पडतो असा अभिनिवेश नाही. पुन्हा एकदा, मी खरं ते सप्रमाण सांगतो, मग इतिहासकारांची वासलात वाचकच लावतील अशी अभ्यासू वृत्ती आहे. "सर्वधर्मसमभावा"च्या ढोंगाचा जराही ताण न घेता उलट ते जोखड झुगारून लिहिलेलं हे पुस्तक आहे. "अगर न होते शिवाजी तो सुन्नत होती सबकी" ह्या प्रसिद्ध ओळी किती गंभीर आणि दूरदृष्टीच्या आहेत ते ताकदीने सांगणारे हे पुस्तक आहे. ते आवर्जून वाचून, मनन चिंतन करून त्याचे सार आपल्या कृतीत उतरले पाहिजे.

जय भवानी ! जय शिवाजी !!
छत्रपती शिवाजी महारांजाचा विजय असो !!

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वा ( आवर्जून आवर्जून वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

No comments:

Post a Comment

छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर (Chhatrapati Shivaji Maharaj zale nasate tar)

पुस्तक - छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर (Chhatrapati Shivaji Maharaj zale nasate tar) लेखक - गजानन भास्कर मेहंदळे (Gajanan Bhaskar Meha...