Deep state (डीप स्टेट)






पुस्तक - Deep state (डीप स्टेट)
लेखक - मंदार जोगळेकर ( Mandar Joglekar)
भाषा - 
इंग्रजी (English)
पाने - १६०
प्रकाशन - बुकगंगा पब्लिकेशन, डिसेंबर २०२४
ISBN 978-93-92803-87-1
छापील किंमत रू. ३००/-

माझ्या पुस्तक परीक्षणाच्या उपक्रमामुळे बुकगंगाचे संस्थापक मंदार जोगळेकर यांची ऑनलाइन ओळख झाली होती. पुणे बुक फेस्टिवलच्या निमित्ताने बुकगंगाच्या स्टॉलवर त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट झाली. तेव्हा त्यांनी स्वलिखित पुस्तक मला भेट दिलं याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो.


लेखकाची पुस्तकात दिलेली माहिती


लोकशाहीमध्ये लोक निवडणुकांमार्फत आपले प्रतिनिधी निवडतात आणि त्या प्रतिनिधींमधून सरकारची निवड होते. लोकांनी निवडून दिलेले असल्यामुळे सहाजिकच लोकांच्या लोकांच्या इच्छेनुसार सरकार काम करेल असं मानलं जातं. परंतु प्रत्येकवेळी तसं होतच असं नाही. लोकांच्या अपेक्षांच्या विपरीत ही सरकारं काम करतात. असे निर्णय घेतात ज्यामुळे लोक नाराज होतात मात्र विशिष्ट एका उद्योगाला किंवा विशिष्ट उद्योगक्षेत्राला त्याचा फायदा होतो. तसंच काही वेळ विशिष्ट उद्योग क्षेत्र दाबलं जाईल असे निर्णय घेतले जातात. अशा घटना घडल्या की, हे सरकार लोकांसाठी नाही तर त्या त्या उद्योग समूहासाठी किंवा विशिष्ट व्यक्तींसाठी काम करत आहे हा आरोप केला जातो. भ्रष्टाचार व लागेबांधे यातून काही प्रभावशाली व्यक्ती जणू कठपुतळीसारखं सरकार आपल्या तालावर नाचवतात असं म्हटलं जातं. आणि तेव्हा शब्द येतो "डीप स्टेट". समोर दिसतंय ते खरं सरकार नाही तर डीप स्टेट देश चालवत आहे अशी भावना पसरते. त्यात वावगही काही नाही. उलट त्यात तथ्य आहेच. हे तथ्य मांडण्याचं काम लेखकाने पुस्तकात केलं आहे.

लोकनियुक्त सरकार असले तरी लोकप्रतिनिधी हे काही प्रत्येक बाबतीतले तज्ञ नसतात. अशावेळी त्यांना वेगवेगळ्या सर्वेक्षण समित्याने नेमाव्या लागतात. तज्ञांचे सल्ले घ्यावे लागतात. संस्था निर्माण कराव्या लागतात. संशोधन करून घ्यावे लागते. समाजाची गरज म्हणून काही उद्योगांना सवलत देण्याचे धोरण ठरवावे लागतं तर काही उद्योगांना उत्पादनांवर बंदी घालावी लागते. प्रशासन म्हणून अधिकारी नेमावे लागतात. वरवर बघता हे सगळं योग्यच दिसतं . पण मराठीतल्या दोन म्हणीमधल्या - "तळे राखी तो पाणी चाखी" आणि "कुंपणानेच शेत खाणे" - मधल्या विकृती जेव्हा या व्यवस्थेमध्ये येतात तेव्हा लोकांच्या भल्यासाठी निर्णय न होता स्वतःच्या भल्यासाठी निर्णय घेतले जातात . लोकशाही संस्थांच्या, लोकशाही व्यवस्थेच्या आड अशी स्वार्थाची समांतर व्यवस्था उभी राहते त्यालाच आपण ढोबळमानाने डीप स्टेट म्हणू शकतो. हे डीप स्टेट कुठल्या कुठल्या प्रकाराने आपल्या समाजात अस्तित्वात येतं आणि सध्या अस्तित्वात आहे त्याचा उहापोह या पुस्तकात केला आहे. पुस्तकाच्या प्रकरणांच्या यादीवर नजर टाकली की तुम्हाला कोणकोणते पैलू लेखकाने लक्षात घेतले आहेत हे समजेल



अगदी सोपं उदाहरण द्यायचं झालं तर बँकांचे नियंत्रण करण्यासाठी मध्यवर्ती बँक बाजार, नियंत्रक संस्था इत्यादी प्रत्येक देशात तयार केल्या जातात. पण या नियंत्रकांच्यामध्येच डीप स्टेट आपले लोक घुसवतात आणि स्वतःला फायदेशीर असे निर्णय घेतात. वरवर पाहताना, सरकारने नेमलेले तज्ञ किंवा नियंत्रक निर्णय घेतायत पण निर्णय मात्र देशाऐवजी दुसऱ्या कोणाला तरी फायदेशीर असे होतात. बँकिंग प्रमाणेच संरक्षण क्षेत्रही. देशाच्या संरक्षणासाठी योग्य असे निर्णय घेतले जातीलच याची शाश्वती नाही. संरक्षणासाठी नेमलेल्या समित्या , त्यावर संशोधन करणारे लोक यांच्यामध्ये डीप स्टेट ची माणसं घुसवली जातात. मग संरक्षण खर्चात वाढ केली पाहिजे, विशिष्ट प्रकारची शस्त्रसामुग्री सरकारने घेतली पाहिजे असा अहवाल दिला जातो . मग त्याची अंमलबजावणी करण्यात येते. लोकांचा पैसा डीप स्टेट कडे जातो.
प्रत्येक क्षेत्रामध्ये अशा प्रकारचे हे लागेबांधे युती आहे अशा वेगवेगळ्या क्षेत्रांचा मागवा पुस्तकात घेतला आहे. डीप स्टेट आपली माणसं सरकारमध्ये किंवा संबंधित व्यवस्थेत कशी घुसवतं ह्याची जाणीव आपल्याला होते. उदाहरणादाखल काही पानं वाचूया.

गुप्तहेर संघटना गुप्तपणेच काम करणार. पण त्यामुळेच त्यांच्याकडून सरकारवर कसं नियंत्रण ठेवलं, लोकांवर कसं नियंत्रण ठेवलं जातं जातं हे सुद्धा गुप्त राहतं. वाढत्या तंत्रज्ञानामुळे लोकांची माहिती मिळवणं त्यावर नियंत्रण ठेवणे हे अजूनच सोपे होत आहे त्याबद्दल ही दोन पानं.


न्यायव्यवस्थेतील डीप स्टेट बद्दल


अशाप्रकारे डीप स्टेट या महत्त्वाच्या सामाजिक संकल्पनेबद्दल लेखकाने चांगला विषयप्रवेश केलेला आहे त्यामुळे जागरूक वाचकांना हे पुस्तक वाचायला आवडेल.

पण या पुस्तकात दिलेली उदाहरणं ही अमेरिकेतली आहेत. अमेरिकेतले कायदे, तिथल्या प्रशासकीय संस्था, तिथल्या घटना यांची उदाहरण आहेत. सर्वसामान्य भारतीयाला त्या गोष्टी माहिती असण्याची शक्यता कमी आहे. त्याऐवजी किंवा त्याबरोबरीनेच लेखकाने भारतीय उदाहरण घेतली असती तर पुस्तक अजून रिलेट करता आलं असतं.
दुसरी गोष्ट अशी की पुस्तकात दिलेली उदाहरणं ही एक दोन ओळीत संपवलेली आहेत. कुठलंही उदाहरण किंवा प्रसंग खोलात जाऊन सविस्तरपणे सांगितलेला नाही.त्यामुळे "लागेबांधे निर्माण होतात" हा मुद्दा पोचतो; पण ते खरंच कसं होतं, कसं झालं, त्याचे मोठे परिणाम काय झाले हे, याची ठोस उदाहरण कळत नाहीत. ते तपशील असते तर विवेचनाचं गांभीर्य अधोरेखित झालं असतं आणि पुस्तकही जास्त रंजक झालं असतं. आता ते फारच वरून वरून जातय असं सारखं वाटत राहतं.

उद्योग-सरकार, बिल्डर-सरकार, वाळूमाफिया-सरकार, कंत्राटदार-सरकार अशा अभद्र युतीपेक्षाही "डीप स्टेट" ही मोठी घडामोड आहे. वेगवेगळ्या देशातले लोक पडद्यामागे एकत्र येऊन दुसऱ्या देशातसुद्धा सामाजिक राजकीय उलथापालत करू शकतात हा मुद्दा मात्र पुस्तकातून ठळकपणे येत नाही. भारताच्या शेजारी देशांमध्ये- बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान येथे झालेल्या आंदोलनांमधून सरकार उलथून टाकण्यात आलं या घटनांमुळे खरंतर भारतात डीप स्टेट हा मुद्दा जास्त चर्चेला आला आहे. भारतातले राजकीय पक्ष, काही शैक्षणिक संस्था, मीडिया हाऊसेस हे सगळे मिळून असं समांतर सरकार चालवण्याचा किंवा सध्याचे सरकार उलथून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत असा अनेकांचा दावा असतो. ते लोकांमध्ये जाणून-बुजून असंतोष पसरवत आहेत अराजकाला निमंत्रण देत आहे असा दावा असतो. हा मोठा पैलू पुस्तकातून निसटला आहे पुस्तक हातात घेताना खरंतर मी ह्या अपेक्षेने पुस्तकात कडे बघत होतो.
त्यामुळेच डीप स्टेट बद्दल विषयप्रवेश म्हणून वाचायला चांगलं पुस्तक आहे. पुढच्या आवृत्तीत वरच्या मुद्द्यानुसार जर निवेदनात वाढ करण्यात आली तर पुस्तक अजून उपयुक्त होईल असं मला वाटतं.

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

खुलूस (Khuloos)



पुस्तक - खुलूस (Khuloos)
लेखक - समीर गायकवाड (Sameer Gaikwad)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १९६
प्रकाशन - रोहन प्रकाशन, प्रथम आवृत्ती जाने २०२३
छापील किंमत - रु. ३००/-
ISBN - 978-93-92374-67-8

"वेश्या" हा शब्द किंवा त्याअर्थाचे शब्द सुसंकृत कुटुंबात जाहीरपणे उच्चारले जात नाहीत. चारचौघांमध्ये बोलताना असे शब्द उच्चारले गेले तरी ते बहुतेकवेळा दुसऱ्याला शिवी देतानाच. ते शब्द, तो शरीरविक्रयाचा व्यवसाय आणि तो चालणाऱ्या जागा म्हणजे सभ्य समाजासाठी निषिद्ध बाब. पण गावोगावी अशी बदनाम वस्ती असते हे प्रत्येकालाच ठावूक असतं. सभ्य लोक तिकडे जात नाहीत, सभ्यतेचा बुरखा पांघरलेले लोक तिथे गेल्याचं उघडपणे सांगत नाहीत तर असभ्यांना तिथे गेल्याशिवाय करमत नाही. पण लेखक समीर गायकवाड तिथे गेले आहेत ते वेश्यांचं माणूसपण मान्य करून; ते माणूसपण समजून घेण्यासाठी. त्यातून त्यांना ज्या असंख्य स्त्रिया भेटल्या त्यांचे अनुभव ह्या पुस्तकात शद्बबद्ध केलेले आहेत. पुस्तकात वेगवेगळ्या वेश्यांच्या आयुष्याबद्दल, त्यातल्या महत्त्वाच्या प्रसंगांचे वर्णन आहे. लेखकाच्या मनोगतात लिहिलेला हा परिच्छेद पुस्तकात काय वाचायला मिळेल हे सांगतो

"या गोष्टी ज्या स्त्रियांच्या आहेत त्या आता हयात आहेत की नाहीत हे देखील छाती ठोकपणे सांगता येणार नाही या बायका खोट्या नाहीत की यांची दुःख बेगडी नाहीत. त्यांनी स्वीकारलेलं हे आयुष्यही त्यांचं स्वतःचं नाही. जगाने लादलेलं हे बाईपणाचं ओझं त्यांनी अगदी इमानाने असोशीने आयुष्यभर जतन केलंय. त्याची तक्रारही कधी कुठे केली नाही. जरी त्याची कुठे कैफियत केली असती तरी त्याचा काही उपयोग झाला नसता हे कदाचित त्यांना ठाऊक असावं. या गोष्टींमधल्या नायिका जीवनाच्या विविध टप्प्यावर भेटत गेल्या. काही प्रत्यक्ष भेटल्या तर काहींच्या निव्वळ स्मृतींची अनुभूती. तर काहींची चित्तरकथा ऐकीव असली तरी ती काही सांगोवांगीची बात नाही. त्याला आगापिछा आहे, शेंडी-बुडखा आहे. या कथांमध्ये भौगोलिक संदर्भ मात्र नाव बदलून लिहिले आहेत."

लेखकाबद्दल पुस्तकात दिलेली माहिती


अनुक्रमणिका



ह्या सगळ्या बायका काय तिथे आनंदाने येतात ? स्वखुशीने येतात ? आर्थिक परिस्थितीमुळे पैसे मिळवण्यासाठी मोलमजुरी करताना शरीर झिजवणे किंवा शरीर विकून - झिजवणे ह्यात समाज नैतिक - अनैतिक असा भेद करतो ना ! मग ह्या बायका तिथे आनंदाने कशा येत असतील ? "शरीरविक्रय" करणाऱ्या ह्या बायकांना "बाजारबसव्या" हा हेटाळणीपूर्वक शब्द वापरला जातो. पण त्यांना बाजारात बसायला भाग पडणारा समाजच आहे. ह्या जहाल वास्तवाची जाणीव करून देणारं हे पुस्तक आहे. बहुतेकींना लहानपणीच त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनीच विकलं होतं. गरीबीपोटी उत्पन्नाचं साधन म्हणून ह्या मुलींना धंद्याला लावण्यात आलं. काहीवेळा जवळच्या पुरुष नातेवाईकांनीच शारीरिक अत्याचार केले आणि वर मुलीलाच कुलटा ठरवून घराबाहेर घालवलं आणि ह्या धंद्याकडे ढकललं. "डोक्यात जट आली" ही अंधश्रद्धा सुद्धा पुरेशी होते. काही जणींना मित्राने तर कधी प्रत्यक्ष नवऱ्यानेच फसवून परगावी आणलं आणि जबरदस्ती विकून टाकलं. अशा कितीतरी करुण कहाण्या पुस्तकात आहेत.

बाजारात बसायला लागणे हाच खरा तर दुर्दैवाचा परमोच्च बिंदू असायला हवा. पण ही तर दुर्दैवाची सुरुवात ठरते. शारीरिक अत्याचार, पैशांची फसवणूक, घरादारापासून कायमचं तुटलेपण, व्यसनाधीनता आणि अनाम मरण अशा पुढच्या पायऱ्याही ठरलेल्या. ह्या करुण वास्तवाची जाणीव करून देणारं हे पुस्तक आहे. कामातून मिळणारे पैसे पै पै करत साठवायचे. पण तिथेही चोऱ्यामाऱ्या होऊन लुबाडणूक होते. पैसे साठवून तरी करणार काय ? मग ते पैसे व्यसनात उडवले जातात. देणी, उधारी ह्यांचं दुष्टचक्र सुरु होतं. कधी एखादं गिऱ्हाइक प्रेमाच्या गोष्टी बोलतं, जीव लावतं आणि गोडबोलून पैसे घेऊन पळून जातं. ह्या नादात दिवस गेले आणि बाळाला जन्म द्यायचं ठरवलं तर हाल दुप्पटच. बाळ सांभाळून धंदा करायचाच. नवरा असेल तर तोही मारहाण करून पैसे उकळणार. पोलीस, राजकारणी बडी धेंडं ह्यांची अरेरावी विकृती सुद्धा झेलावी लागते. असे अंगावर शहारे आणणारे प्रसंग पुस्तकात आहेत.

"कुंटणखाना" हेच घर आणि तिथल्या इतर बायका, मालकीण, दल्ले , गिऱ्हाईक हेच आता आपले नातेवाईक, आपले सर्वस्व हे नाईलाजाने मान्य केले जाते. मग इथेच कोणी कोणाची मानलेली बहीण होतं, कुणी आई. एकमेकींना भावनिक आधार देतात. एखाद्या गिऱ्हाइकाच्या प्रेमात पडून दिवस जाऊन कोणी होतं खरं आई. अशा दुसरीच्या मुलांना जीव लावून कोणी पुरवून घेतं आपलं आईपणाचं स्वप्न. ज्या मनाने अजून खमक्या आहेत त्या बनतात इतरांचा आधार. गिऱ्हाईक - दलाल ह्यांच्याकडून होणाऱ्या फसवणुकीत एकमेकांसाठी खंबीर पणे उभं राहून , कधी जीवाची बाजी लावून संकट टाळतात. कधी त्यांच्यातही चालते सुप्त स्पर्धा तर कधी "मालकीण" होण्यासाठीची लढाई. असे बरेच किस्से पुस्तकात आहेत. बाहेरच्या समाजातून वेगळ्या काढून छोट्या समाजात कोंडल्या गेलेल्या ह्या वेश्यांमध्येही दिसतात तेच गुण-दोष-भावना-राग-लोभ. म्हणून त्यांच्यातलं माणूसपण अधोरेखित करणारं हे पुस्तक आहे.

कोरोना काळात सगळं जग बंदी झालं. "स्पर्श टाळा", "एकमेकांपासून दूर रहा" हे सांगणं म्हणजे वेश्याव्यवसायाला विपरीतच. त्यामुळे ह्याकाळात वेश्यांच्या हलाखीत भरच पडली. काही जणी उपासमारीने मेल्या अशीही काही उदाहरणं पुस्तकात आहेत. गणपती, नवरात्र, ईद, ख्रिसमस ह्या उत्सवांच्या काळात सगळीकडे धामधूम असते. बाजारपेठा सजतात. तशीच चलती असते "चमडीबाजारात" सुद्धा. त्याबद्दलसुद्धा एकदोन लेख आहेत. वेश्यांच्या मुली साहजिक ह्याच धंद्याकडे वळवल्या जातात तर मुलं दलाल, गुंड, व्यसनाशी संबंधित कामात गुरफटली जातात. ह्यावर एक लेख आहे.

एकूण वास्तवच भयाण असल्याने पुस्तकाचं वाचन आपल्यालाही अस्वस्थ करतं. पण त्या अंध:कारात प्रकाशाची तिरीप असावी असे दोन लेख आहेत. काही स्वयंसेवी संस्था ह्या वेश्यांना मदत मिळावी, त्यांच्या मुलांनी ह्या बाजारातून बाहेर पडावं, फसवणूक झाली असेल तर न्याय मिळावा, थोडंफार शिक्षण मिळावं ह्यासाठी प्रयत्न करत आहेत. एनजीओ च्या कामाचं एक यशस्वी उदाहरण "एक कळी वाचली" लेखात आहे. तर गुजराथ मधील प्रसिद्ध संत व प्रवचनकार "मुरारीबापू" ह्यांनी वेश्यांना सनामनापूर्वक वागणूक कशी दिली ह्यावरही एक लेख आहे.

पुस्तकाची काही पाने उदाहरणादाखल

कोठीची मालकीण पन्नीबाई आणि तिथे धंदा करणाऱ्या सुरखी चं हे वर्णन. एकदा धंद्यात पडलं की त्याचे छक्केपंजे समजून घेतल्याशिवाय गत्यंतर नाही.



नलिनी गरीब घरी जन्माला आली. लहानपणी आई वारली. सावत्र आईने छळ केला. वडिलांनी तिला काकाकडे - सिद्धू - कडे पाठवलं. पण अवस्था आगीतून फुफाट्यात. दारिद्र्य आणि नीतिहीन कुटुंब ह्यामुळे मुली ह्या धंद्यात कशा ढकलल्या जातात ह्याचं प्रातिनिधिक उदाहरण



शकीला आणि नसीम ह्या आईमुली. दोघीही धंदा करणाऱ्या. नसीम ला शंका आली की आईला पैसे मिळतात पण तिच्याकडे तेवढी शिल्लक नाही. ती कोणाला देते ? मुलीने आईचा पाठलाग केला आणि तिला दिसलं वेगळंच सत्य. तिला दिसलं आपल्या आईमधलं मातृप्रेम



लेखकाच्या शैलीने पुस्तकातलं गांभीर्य, दैन्य यथार्थ टिपलं आहे. तरी पुस्तक रुक्ष सरकारी अहवाल होत नाही. ह्याचं कारण लेखकाची शैली खेळकर, कधी विनोदी तर कधी नागवं सत्य मांडायला आवश्यक अशी रोखठोकच. अश्लील वर्णन कुठे नसलं तरी नक्की काय होतं आहे ह्याचा थेट भाव पोचतो. लेखांचा शेवट बहुतेक वेळा एका साहित्यिक-ललित अंगाने त्या प्रसंगाचे अमूर्त वर्णन करत केलेला आहे.

आपल्या समाजाचा एक भाग कसा आहे हे समजून घेण्यासाठी प्रत्येक संवेदनशील व्यक्तीने हे वाचलंच पाहिजे. ह्या वाचनातून वेश्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन माणुसकीचा तरी होईल. ज्याच्या त्याच्या वकुबानुसार मदतीचा हातही पुढे करावासा वाटेल. तितकं झालं तरी हे पुस्तकाचे लेखक - प्रकाशक ह्यांच्या कामाचं चीज झालं असं म्हणता येईल.

शेवटी पुस्तकाबद्दल लेखकाचे शब्दच उसने घ्यायचे तर ..

"खुलूस" म्हणजे निर्मळ सच्चेपण, आस्था, निष्ठा ... किटाळ ठरवून समाज ज्यांचा तिरस्कार करतो, त्यांच्यातील निर्मळ सच्चेपणाचा धांडोळा घेणाऱ्या या रेड लाईट डायरीज ..."

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

विद्रोह (Vidroh)

पुस्तक - विद्रोह (Vidroh) लेखक - हेन्री डेन्कर (Henry Denker) अनुवाद - लीना सोहोनी (Leena Sohoni) भाषा - मराठी (Marathi) मूळ पुस्तक - Outrag...