खुलूस (Khuloos)



पुस्तक - खुलूस (Khuloos)
लेखक - समीर गायकवाड (Sameer Gaikwad)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १९६
प्रकाशन - रोहन प्रकाशन, प्रथम आवृत्ती जाने २०२३
छापील किंमत - रु. ३००/-
ISBN - 978-93-92374-67-8

"वेश्या" हा शब्द किंवा त्याअर्थाचे शब्द सुसंकृत कुटुंबात जाहीरपणे उच्चारले जात नाहीत. चारचौघांमध्ये बोलताना असे शब्द उच्चारले गेले तरी ते बहुतेकवेळा दुसऱ्याला शिवी देतानाच. ते शब्द, तो शरीरविक्रयाचा व्यवसाय आणि तो चालणाऱ्या जागा म्हणजे सभ्य समाजासाठी निषिद्ध बाब. पण गावोगावी अशी बदनाम वस्ती असते हे प्रत्येकालाच ठावूक असतं. सभ्य लोक तिकडे जात नाहीत, सभ्यतेचा बुरखा पांघरलेले लोक तिथे गेल्याचं उघडपणे सांगत नाहीत तर असभ्यांना तिथे गेल्याशिवाय करमत नाही. पण लेखक समीर गायकवाड तिथे गेले आहेत ते वेश्यांचं माणूसपण मान्य करून; ते माणूसपण समजून घेण्यासाठी. त्यातून त्यांना ज्या असंख्य स्त्रिया भेटल्या त्यांचे अनुभव ह्या पुस्तकात शद्बबद्ध केलेले आहेत. पुस्तकात वेगवेगळ्या वेश्यांच्या आयुष्याबद्दल, त्यातल्या महत्त्वाच्या प्रसंगांचे वर्णन आहे. लेखकाच्या मनोगतात लिहिलेला हा परिच्छेद पुस्तकात काय वाचायला मिळेल हे सांगतो

"या गोष्टी ज्या स्त्रियांच्या आहेत त्या आता हयात आहेत की नाहीत हे देखील छाती ठोकपणे सांगता येणार नाही या बायका खोट्या नाहीत की यांची दुःख बेगडी नाहीत. त्यांनी स्वीकारलेलं हे आयुष्यही त्यांचं स्वतःचं नाही. जगाने लादलेलं हे बाईपणाचं ओझं त्यांनी अगदी इमानाने असोशीने आयुष्यभर जतन केलंय. त्याची तक्रारही कधी कुठे केली नाही. जरी त्याची कुठे कैफियत केली असती तरी त्याचा काही उपयोग झाला नसता हे कदाचित त्यांना ठाऊक असावं. या गोष्टींमधल्या नायिका जीवनाच्या विविध टप्प्यावर भेटत गेल्या. काही प्रत्यक्ष भेटल्या तर काहींच्या निव्वळ स्मृतींची अनुभूती. तर काहींची चित्तरकथा ऐकीव असली तरी ती काही सांगोवांगीची बात नाही. त्याला आगापिछा आहे, शेंडी-बुडखा आहे. या कथांमध्ये भौगोलिक संदर्भ मात्र नाव बदलून लिहिले आहेत."

लेखकाबद्दल पुस्तकात दिलेली माहिती


अनुक्रमणिका



ह्या सगळ्या बायका काय तिथे आनंदाने येतात ? स्वखुशीने येतात ? आर्थिक परिस्थितीमुळे पैसे मिळवण्यासाठी मोलमजुरी करताना शरीर झिजवणे किंवा शरीर विकून - झिजवणे ह्यात समाज नैतिक - अनैतिक असा भेद करतो ना ! मग ह्या बायका तिथे आनंदाने कशा येत असतील ? "शरीरविक्रय" करणाऱ्या ह्या बायकांना "बाजारबसव्या" हा हेटाळणीपूर्वक शब्द वापरला जातो. पण त्यांना बाजारात बसायला भाग पडणारा समाजच आहे. ह्या जहाल वास्तवाची जाणीव करून देणारं हे पुस्तक आहे. बहुतेकींना लहानपणीच त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनीच विकलं होतं. गरीबीपोटी उत्पन्नाचं साधन म्हणून ह्या मुलींना धंद्याला लावण्यात आलं. काहीवेळा जवळच्या पुरुष नातेवाईकांनीच शारीरिक अत्याचार केले आणि वर मुलीलाच कुलटा ठरवून घराबाहेर घालवलं आणि ह्या धंद्याकडे ढकललं. "डोक्यात जट आली" ही अंधश्रद्धा सुद्धा पुरेशी होते. काही जणींना मित्राने तर कधी प्रत्यक्ष नवऱ्यानेच फसवून परगावी आणलं आणि जबरदस्ती विकून टाकलं. अशा कितीतरी करुण कहाण्या पुस्तकात आहेत.

बाजारात बसायला लागणे हाच खरा तर दुर्दैवाचा परमोच्च बिंदू असायला हवा. पण ही तर दुर्दैवाची सुरुवात ठरते. शारीरिक अत्याचार, पैशांची फसवणूक, घरादारापासून कायमचं तुटलेपण, व्यसनाधीनता आणि अनाम मरण अशा पुढच्या पायऱ्याही ठरलेल्या. ह्या करुण वास्तवाची जाणीव करून देणारं हे पुस्तक आहे. कामातून मिळणारे पैसे पै पै करत साठवायचे. पण तिथेही चोऱ्यामाऱ्या होऊन लुबाडणूक होते. पैसे साठवून तरी करणार काय ? मग ते पैसे व्यसनात उडवले जातात. देणी, उधारी ह्यांचं दुष्टचक्र सुरु होतं. कधी एखादं गिऱ्हाइक प्रेमाच्या गोष्टी बोलतं, जीव लावतं आणि गोडबोलून पैसे घेऊन पळून जातं. ह्या नादात दिवस गेले आणि बाळाला जन्म द्यायचं ठरवलं तर हाल दुप्पटच. बाळ सांभाळून धंदा करायचाच. नवरा असेल तर तोही मारहाण करून पैसे उकळणार. पोलीस, राजकारणी बडी धेंडं ह्यांची अरेरावी विकृती सुद्धा झेलावी लागते. असे अंगावर शहारे आणणारे प्रसंग पुस्तकात आहेत.

"कुंटणखाना" हेच घर आणि तिथल्या इतर बायका, मालकीण, दल्ले , गिऱ्हाईक हेच आता आपले नातेवाईक, आपले सर्वस्व हे नाईलाजाने मान्य केले जाते. मग इथेच कोणी कोणाची मानलेली बहीण होतं, कुणी आई. एकमेकींना भावनिक आधार देतात. एखाद्या गिऱ्हाइकाच्या प्रेमात पडून दिवस जाऊन कोणी होतं खरं आई. अशा दुसरीच्या मुलांना जीव लावून कोणी पुरवून घेतं आपलं आईपणाचं स्वप्न. ज्या मनाने अजून खमक्या आहेत त्या बनतात इतरांचा आधार. गिऱ्हाईक - दलाल ह्यांच्याकडून होणाऱ्या फसवणुकीत एकमेकांसाठी खंबीर पणे उभं राहून , कधी जीवाची बाजी लावून संकट टाळतात. कधी त्यांच्यातही चालते सुप्त स्पर्धा तर कधी "मालकीण" होण्यासाठीची लढाई. असे बरेच किस्से पुस्तकात आहेत. बाहेरच्या समाजातून वेगळ्या काढून छोट्या समाजात कोंडल्या गेलेल्या ह्या वेश्यांमध्येही दिसतात तेच गुण-दोष-भावना-राग-लोभ. म्हणून त्यांच्यातलं माणूसपण अधोरेखित करणारं हे पुस्तक आहे.

कोरोना काळात सगळं जग बंदी झालं. "स्पर्श टाळा", "एकमेकांपासून दूर रहा" हे सांगणं म्हणजे वेश्याव्यवसायाला विपरीतच. त्यामुळे ह्याकाळात वेश्यांच्या हलाखीत भरच पडली. काही जणी उपासमारीने मेल्या अशीही काही उदाहरणं पुस्तकात आहेत. गणपती, नवरात्र, ईद, ख्रिसमस ह्या उत्सवांच्या काळात सगळीकडे धामधूम असते. बाजारपेठा सजतात. तशीच चलती असते "चमडीबाजारात" सुद्धा. त्याबद्दलसुद्धा एकदोन लेख आहेत. वेश्यांच्या मुली साहजिक ह्याच धंद्याकडे वळवल्या जातात तर मुलं दलाल, गुंड, व्यसनाशी संबंधित कामात गुरफटली जातात. ह्यावर एक लेख आहे.

एकूण वास्तवच भयाण असल्याने पुस्तकाचं वाचन आपल्यालाही अस्वस्थ करतं. पण त्या अंध:कारात प्रकाशाची तिरीप असावी असे दोन लेख आहेत. काही स्वयंसेवी संस्था ह्या वेश्यांना मदत मिळावी, त्यांच्या मुलांनी ह्या बाजारातून बाहेर पडावं, फसवणूक झाली असेल तर न्याय मिळावा, थोडंफार शिक्षण मिळावं ह्यासाठी प्रयत्न करत आहेत. एनजीओ च्या कामाचं एक यशस्वी उदाहरण "एक कळी वाचली" लेखात आहे. तर गुजराथ मधील प्रसिद्ध संत व प्रवचनकार "मुरारीबापू" ह्यांनी वेश्यांना सनामनापूर्वक वागणूक कशी दिली ह्यावरही एक लेख आहे.

पुस्तकाची काही पाने उदाहरणादाखल

कोठीची मालकीण पन्नीबाई आणि तिथे धंदा करणाऱ्या सुरखी चं हे वर्णन. एकदा धंद्यात पडलं की त्याचे छक्केपंजे समजून घेतल्याशिवाय गत्यंतर नाही.



नलिनी गरीब घरी जन्माला आली. लहानपणी आई वारली. सावत्र आईने छळ केला. वडिलांनी तिला काकाकडे - सिद्धू - कडे पाठवलं. पण अवस्था आगीतून फुफाट्यात. दारिद्र्य आणि नीतिहीन कुटुंब ह्यामुळे मुली ह्या धंद्यात कशा ढकलल्या जातात ह्याचं प्रातिनिधिक उदाहरण



शकीला आणि नसीम ह्या आईमुली. दोघीही धंदा करणाऱ्या. नसीम ला शंका आली की आईला पैसे मिळतात पण तिच्याकडे तेवढी शिल्लक नाही. ती कोणाला देते ? मुलीने आईचा पाठलाग केला आणि तिला दिसलं वेगळंच सत्य. तिला दिसलं आपल्या आईमधलं मातृप्रेम



लेखकाच्या शैलीने पुस्तकातलं गांभीर्य, दैन्य यथार्थ टिपलं आहे. तरी पुस्तक रुक्ष सरकारी अहवाल होत नाही. ह्याचं कारण लेखकाची शैली खेळकर, कधी विनोदी तर कधी नागवं सत्य मांडायला आवश्यक अशी रोखठोकच. अश्लील वर्णन कुठे नसलं तरी नक्की काय होतं आहे ह्याचा थेट भाव पोचतो. लेखांचा शेवट बहुतेक वेळा एका साहित्यिक-ललित अंगाने त्या प्रसंगाचे अमूर्त वर्णन करत केलेला आहे.

आपल्या समाजाचा एक भाग कसा आहे हे समजून घेण्यासाठी प्रत्येक संवेदनशील व्यक्तीने हे वाचलंच पाहिजे. ह्या वाचनातून वेश्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन माणुसकीचा तरी होईल. ज्याच्या त्याच्या वकुबानुसार मदतीचा हातही पुढे करावासा वाटेल. तितकं झालं तरी हे पुस्तकाचे लेखक - प्रकाशक ह्यांच्या कामाचं चीज झालं असं म्हणता येईल.

शेवटी पुस्तकाबद्दल लेखकाचे शब्दच उसने घ्यायचे तर ..

"खुलूस" म्हणजे निर्मळ सच्चेपण, आस्था, निष्ठा ... किटाळ ठरवून समाज ज्यांचा तिरस्कार करतो, त्यांच्यातील निर्मळ सच्चेपणाचा धांडोळा घेणाऱ्या या रेड लाईट डायरीज ..."

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

No comments:

Post a Comment

गोष्ट माझी, तुमची कदाचित सर्वांचीही (Gosht majhi, tumachi kadachit sarvanchihi)

पुस्तक - गोष्ट माझी, तुमची कदाचित सर्वांचीही (Gosht majhi, tumachi kadachit sarvanchihi) लेखक - सुरेश देशपांडे (Suresh Deshpande) भाषा - मर...