साखळीचे स्वातंत्र्य(Sakhaliche Swatantrya)




पुस्तक - साखळीचे स्वातंत्र्य (Sakhaliche Swatantrya)
लेखक - गौरव सोमवंशी (Gaurav Somwanshi)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - २४५
प्रकाशन - मधुश्री पब्लिकेशन, मे २०२२
ISBN - 978-81-95377-24-4

"ब्लॉकचेन" ह्या गेल्या काही वर्षांत तयार झालेल्या आणि फोफावणाऱ्या तंत्रज्ञानाची सखोल ओळख करून देणारं हे पुस्तक आहे. विशेष म्हणजे हे इंग्रजीतून मराठीत भाषांतरित पुस्तक नाही तर ते स्वतंत्र मराठी पुस्तकच आहे. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे नेटवर उपलब्ध माहिती गोळाकरून ती मराठीत आणली आहे असंही नाही. तर मराठी वाचकाला, तंत्रज्ञानाशी जवळून संबंध नसणाऱ्या व्यक्तीला योग्य अश्या पद्धतीचा मूळ मराठी मजकूर आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे तंत्रज्ञान नवं असूनही त्यावर प्रत्यक्ष काम केलेल्या लेखकाने स्वानुभवातून लिहिलं आहे. लोकसत्ता वृत्त्तपत्रात लेखकाने जी लेखमाला चालवली होती त्या लेखांचा हा लेखसंग्रह आहे. हे पुस्तक मराठीला ज्ञानभाषा बनवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी मार्गदर्शक नमुना ठरेल. त्यासाठी लेखक गौरव सोमवंशी, लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर, मधुश्री पब्लिकेशन व इतर सहभागी लोकांना मी सर्वप्रथम खूप धन्यवाद देतो.

पुस्तकात दिलेला लेखकाचा परिचय


"ब्लॉकचेन" हे तंत्रज्ञान सध्या "बिटकॉइन" आणि तत्सम आभासी चलनांमुळे नेहमी चर्चेत असते. एका बिटकॉइन ची किंमत अमुक अमुक रुपये वगैरे बातम्या ऐकायला येतात. पण म्हणजे "बिटकॉइन" नक्की काय, ते चलन कसं झालं, लोक त्यासाठी पैसे का देतायत हे समजून घेण्यासाठी पुस्तक अतिशय योग्य आहे. 




"बिटकॉइन" हे आभासी चलन आहे. म्हणजे आपल्या हातात नोटेसारखं येत नाही. पण नोट म्हटली तरी शेवटी तो कागदाचा तुकडाच.म्हणून नोटेला "किंमत" कशी प्राप्त होते हे समजलं की "बिटकॉइन" ला मूल्य कसं प्राप्त होतं ते कळतं. म्हणून लेखकाने अतिशय सध्या सोप्या भाषेत, दैनंदिन उदाहरणांतून "पैसा", "चलन", "बँक" ही संकल्पना पहिल्या काही प्रकरणांत समजावून सांगितली आहे.
नंतर "बिटकॉइन" मागचं तंत्रज्ञान, संगणक शास्त्रांतील संकल्पना (हॅश, एन्क्रिप्शन, डिस्ट्रीब्युटेड सिस्टीम इ.) समजावून सांगितल्या आहेत. आयटी क्षेत्रात काम न करणाऱ्या लोकांनाही बरीच कल्पना त्यातून येईल. पुढच्या प्रकरणांसाठी वाचक तयार होईल.

मग प्रत्यक्ष "बिटकॉइन" चलनाची माहिती, गुणधर्म, त्याची सुरुवात कशी झाली हे सांगितलं आहे. "बिटकॉइन" प्रमाणेच इतर कूटचलने (क्रिप्टो करन्सी) कशी आली; हा इतिहास आणि त्यामागची सामाजिक कारणे विशद केली आहेत. एका कूटचलनातल्या तांत्रिक त्रुटींचा उपयोग करून एक मोठा घोटाळा कसा झाला आणि त्यावर काय तोडगा काढला गेला हे एका प्रकरणात आहे. "नवा गडी नवे राज्य" प्रमाणे "नव्याप्रकारचे चलन आणि नव्या नव्याप्रकारच्या चोऱ्या" असंच म्हणावं लागतं.

"ब्लॉकचेन" तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर "बिटकॉइन" रूपात झाला असला तरी. तो केवळ एकच एक उपयोग नाही. माहिती एकाच ठिकाणी न साठवता अनेक ठिकाणी साठवायची, एकाच एका मध्यवर्ती संस्थेकडे सगळी मालकी नाही तर माहितीवर सर्वांचा अधिकार; एकदा नोंद झाली की ती अपरिवर्तनीय इ. "ब्लॉकचेन"ची तत्त्वे आहेत. ह्या तत्वांचा वापर करून वेगवेगळ्या देशांत त्याचा वापर सुरु झाला आहे. फक्त आर्थिक नोंदणी नव्हे तर जमिनीच्या मालकीची नोंदणी, हिऱ्यांचा व्यापार, शेती व्यवस्थापन अश्या भिन्न भिन्न क्षेत्रांतल्या संगणकीकरणात "ब्लॉकचेन"चा वापर सुरु झाला आहे. ह्या वापरातून व्यवस्था अधिक पारदर्शी आणि विश्वासार्ह होतायत असं लेखकाचं प्रतिपादन आहे. भारतात तामिळनाडू राज्याने ब्लॉकचेन धोरण आखलं आहे. लेखकाने स्वतः छत्तीसगड राज्य सरकारच्या एका ब्लॉकचेन प्रकल्पावर काम केलं आहे. महाराष्ट्रात काही शेतकी कंपन्या हे वापरू लागल्या आहेत. ही सगळी उदाहरणं सविस्तपणे देऊन नव्या तंत्रज्ञानातून सामाजिक बदल कसा घडू शकण्याच्या सुखद शक्यता अधोरेखित केल्या आहेत.

अनुक्रमणिका

 

काही उदाहरणे बघूया.
"वितरित" आणि "विकेंद्रित" ह्या संकल्पना सोप्या शब्दांत




बिटकॉइन ची संख्या २.१ कोटी अशी पक्की ठरवलेली आहे. त्याबद्दल.




घाना देशात जमीन व्यवहार नोंदणी साठी ब्लॉकचेन वापरले गेले त्याबद्दल
 



पुस्तक वाचताना काही शंका मनात येतात. 
ब्लॉकचेन सिस्टीम मधले संगणक चालवण्यासाठी खूप मोठे संगणक लागतात. त्यासाठी खूप ऊर्जाही खर्च होते असं लेखकाने मांडलं आहे. पण मग ह्या विकेंद्रित रचनेमध्ये सहभागी संगणक सुद्धा असेच मोठे पैसेवाल्यांचे, कंपन्यांचे असणार किंवा सरकारचेच ना ? मग ज्या सामाजिक विकेंद्रीकरणाच्या उद्देशाचा उल्लेख वारंवार झाला ते कसं साध्य होणार हा गोंधळ मनात तयार झाला.

दुसरं म्हणजे ब्लॉकचेनच्या सामाजिक वापराची जी उदाहरणे दिली त्यात ती यंत्रणा सरकारची किंवा एखाद्या कंपनीने उभारली आहे. म्हणजे सगळा विदा (data) त्या कंपनीकडे आहे. त्यांच्या वेबसाईटवर किंवा मोबाईल app वर ज्या सोयी असतील त्याच सोयी त्याचे वापरक (user) वापरणार. त्यांना तेवढाच data दिसणार. मग पारदर्शकता कशी?

आणि ज्या सिस्टीम ची उदाहरणे दिली आहेत ती नेहमीच्या संगणकीकरणाची वाटली. तिथे ब्लॉकचेनच का? इतर विदासाठा (डेटाबेस) तंत्रज्ञान का नाही हे स्पष्ट होत नाही. कदाचित हा तिसरा मुद्दा खूप तांत्रिक असल्यामुळे ह्या पुस्तकाच्या परिघाबाहेरचा आहे. पण पहिले दोन मुद्दे तरी पुढच्या आवृत्तीत विशद करावेत ही लेखकाला विनंती.

वरच्या शंका आणि पुस्तकातली पाने वाचून तुमच्या हे लक्षात आलं असेल की पुस्तकाने नव्या तंत्रज्ञानाची फार छान तोंडओळख करून देत, त्याची भीती घालवत उलट अजून जिज्ञासा जागवली आहे. तेही मराठीत. तांत्रिक संज्ञांना सोपे मराठी प्रतिशब्द वापरून. लेखनशैली अतिशय खेळकर आहे. किचकटपणा नाही. किचकट भाग छान छोटे छोटे घास करून भरावला आहे :)

लेखक, प्रकाशक आणि लोकसत्ता ह्या तिघांची
 ही अभिनव निर्मिती तुम्हालाही नक्की आवडेल. त्यांनी अजून ताज्या आणि तंत्रज्ञान-विज्ञाना बद्दल मराठीत लिहत राहावं ही त्यांना विनंती!


———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

जरा जाउन येतो (jara jaun yeto)




पुस्तक - जरा जाउन येतो (jara jaun yeto)
लेखक - दि. बा. मोकाशी (D. B. Mokashi)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १९३
प्रकाशन - प्रतिमा प्रकाशन जून १९८७
ISBN - दिलेला नाही

दि. बा. मोकाशी हे मराठी साहित्य क्षेत्रातलं प्रसिद्ध नाव. परंतु याआधी मी त्यांची पुस्तकं वाचली नव्हती. "देव चालले" ही त्यांची कादंबरी आणि "आमोद सुनासी आले" ही कथा; यांच्या बद्दल वेगवेगळ्या ठिकाणी पुन्हा पुन्हा वाचनात आलं त्यामुळे यावेळी उत्सुकतेने मी मोकाशींचं पुस्तक घेतलं. हा त्यांचा कथासंग्रह आहे. सरोजिनी वैद्य आणि माधुरी पणशीकर यांनी कथांची निवड केली आहे. पुस्तकाच्या प्रस्तावनेत त्यांनी कथांचं रसग्रहणही केले आहे.

अनुक्रमणिका 


सगळ्याच कथा अतिशय छान गुंगवून ठेवणाऱ्या आहेत. एकेका विशिष्ट प्रसंगावर त्या कथा आधारलेल्या आहेत. प्रसंगात दृश्य स्वरूपात जे घडतं त्याचबरोबर त्यातल्या मुख्य पात्राच्या मनात काय करतो याचं चित्र मोकाशींनी रेखाटलं आहे. प्रसंग खूप नाट्यमय किंवा क्वचितच घडणारे असे नाहीत. अगदी साधे साधे आहेत. सर्वसामान्य मध्यमर्गीय लोकांचे आपले स्वतःचे अनुभव असतील तर काही आजूबाजूला पाहिलेले. प्रत्येक घटनेत त्यावेळी सामील असणाऱ्या माणसांच्या पिंडानुसार त्याचे मनात उठणारे तरंग निराळे. म्हणूनच प्रसंग साधे असले तरी अशा-अशा वेळी अशा-अशा स्वभावाची व्यक्ती असेल तर काय घडेल हे वाचणं रंजक ठरतं. 

काही गोष्टी मधल्या मुख्य प्रसंगांबद्दल सांगतो म्हणजे तुम्हाला कल्पना येईल.

"गोष्टीची मोहिनी" - दोन सख्ख्या भावांची भांडण आणि त्यातून होणारा रुसवा,

"रोमच्या सुताराची गोष्ट", "काय रानटी लोक आहेत!" - नवीनच प्रेम जोडून आलेल्या जोडप्यांचा लाडिकपणा. एका गोष्टीत शारीरिक जवळीकीची उत्सुकता तर दुसऱ्या गोष्टीत अशा जवळची पेक्षा मनं जुळण्याची उत्सुकता.

"आपला तुपला चहा"- संसाराच्या रगाड्यात गुंतला गृहस्थ जेव्हा तासभर घरात कोणी नाही तेव्हा ती शांतता एन्जॉय करायची ठरवतो. पण शांततेची सवय नसल्यामुळे अधिकच अस्वस्थ होतो

"मजोर"- एका प्राणीसंग्रहालयातल्या पिंजऱ्यात हरणांच्या रूपात नवीन जन्मलेले पिल्लू मोठं होत आहे आणि प्रमुख नराशी स्पर्धा देऊ लागतं.

"लेणी"- एक जोडपं लेणी बघायला गेलं आहे. त्या लेण्यांचं सौंदर्य आणि त्याचा इतिहास तरुणाला इतकं मंत्रमुग्ध करतो आहे की त्याला आपली प्रेयसीचा सुद्धा क्षणभर विसर पडतो. आजूबाजूच्या गावातले लोक अपल्यासुरखे इतके भारावून कसे गेले नाहीत म्हणजे किती आरसिक आहेत असं वाटतं.

"आमोद सुनासी आले" - ह्या कथेवर "दिठी" नावाचा मराठी चित्रपट आला होता त्या कथेत मुलाचं अकाली निधन सोसणारा बाप गावातल्या गाईचं बाळंतपण करायला दुःख विसरून पुढे जातो हा जन्म मृत्यूचा खेळ रंगवला आहे.

"वास्तू"-एका व्यक्तीला स्वतःचं घर बांधायचं असतं वाटेत फिरताना त्याला रिकामा प्लॉट दिसतो आणि त्या प्लॉटवर घराचं बांधकाम चालू असतं. कोण घर बांधेल कसं घर बांधलेले याची उत्सुकता आणि दुसऱ्याचं घर पूर्ण होतंय याचा कुठेतरी हेवा. घर बांधताना खोदकामामध्ये मातीतली मुंग्यांची वारुळे, उंदरांची बिळे, सापांची बिळे, झाडावरची घरटी नष्ट होत आहेत म्हणजे प्राण्यांची घरे पाडून माणसाचं घर बनतय असा एक तात्विक भाग ही मनात आहे. अशा या भावभावनांचं सुंदर मिश्रण यात आहे.

"डोंगर चढण्याचा दिवस"- मुलं मुलं मिळून गावाजवळच्या डोंगरावर डोंगर चढाई करायला जातात जंगलाची वाट अवघड चढण हे सगळं अनुभवतात आणि परत येतात म्हटलं तर वेळोवेळी धडपडायची अगदी जीव जाण्याची शक्यता होती पण बालपणात ते कळत नाही मोठेपणी मात्र छोट्या छोट्या गोष्टीतही भीती वाटते याची गंमत दाखवणारी कथा.

"जरा जा
न येतो"- सगळं सुखवस्तू संसार असूनही अचानक विरक्ती येऊ नाहीसा झालेल्या माणसाची गोष्ट

"तिसरी हकीकत" - एक सिद्धहस्त, प्रसिद्ध असा लेखक पण स्वतःच्या बायकोच्या मनात डोकावायचं कधी त्याच्या लक्षात नाही आलं. पण "क्रिएटिव्ह ब्लॉक" आल्यावर जेव्हा तो बायकोकडे वळतो तेव्हा.

काही पाने वाचून बघा.
गावाजवळच्या डोंगरात वणवा लागला. गावकऱ्यांची धावपळ सुरु झाली. ती डोळ्यासमोर उभे करणारे वर्णन 





"लेणी" गोष्टीतला प्रसंग 




लहान मुलांचा डोंगर चढण्याचा अनुभव. आणि ह्याच अनुभवाकडे पोक्त झाल्यावर बघितलं की किती वेगळाच विचार डोक्यात येतो.




मोकाशींची भाषा साधी सरळ अर्थवाही आहे. पण तरीही प्रसंग चपखल डोळ्यासमोर उभा करणारी आहे. गुंतवून ठेवणारी आहे. सुखदुःख, आशा-निराशा, जन्म-मृत्यू,भूतकाळातल्या गोष्टींची आठवण तर येणाऱ्या काळाबद्दल हुरहुर, चुकांबद्दल पश्चाताप तर नवं काही करायची भीती.... अशा एक ना अनेक मानवी भावभावनांचं सुंदर चित्रण या सर्व कथांमधून घडतं. मराठी साहित्यप्रेमींना एकाच वेळी हलकंफुलकं पण त्याचवेळी अतिशय गहन जीवनदर्शन घडवणाऱ्या या गोष्टी आहेत. नक्की आवडतील.

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- कथा आवडणाऱ्यांनी आवा ( आवर्जून वाचा )
                                         इतरांनी जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

संशयकल्लोळ (Sanshaykallol)



पुस्तक - संशयकल्लोळ (Sanshaykallol)
लेखक - गोविंद बल्लाळ देवल (Govind Ballal Deval)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - ११४
प्रकाशन - कॉन्टिनेन्टल प्रकाशन , १९७० (मूळ नाटकाचा प्रयोग १९१६ साली झाला)
ISBN - दिलेला नाही

मराठी संगीत नाटकांच्या युगात "संशयकल्लोळ" नाटक फार लोकप्रिय होतं असं मी ऐकलं होतं पण प्रत्यक्ष कधी बघितलं नव्हतं. नुकत्याच डोंबिवलीत पार पडलेल्या पुस्तक आदान-प्रदान सोहळ्यात हे पुस्तक हाती लागलं. म्हणून उत्सुकतेने वाचायला घेतलं. आवडलंही. 

अर्धवट माहितीवर विश्वास ठेवून काहीतरी संशय घ्यायचा आणि तो संशय खरा धरून त्याच्यावर पुढचे मनसुबे रचायचे. मग त्यातून संशयात अजून भर; त्यातून गोंधळ. ह्या सगळ्या प्रकाराला आपण मराठीत म्हणतो "संशयकल्लोळ". ते बहुदा ह्या नाटकाच्या नावावरूनच.

लेखक गोविंद बल्लाळ देवल ह्यांची पुस्तकात ह्यांची पुस्तकात दिलेली माहिती.


नाटकाची गोष्ट साधारण अशी आहे - फाल्गुनराव आणि कृत्तिका हे नवराबायको. दोघेही संशयी. आपला जोडीदार बाहेर लफडे करतो आहे अशी ह्यांची मनोमन खात्रीच. जोडीदाराविरुद्ध काही पुरावा सापडतोय का; त्याला रंगेहाथ सापडतोय का ह्यासाठी टपून बसलेले दोघे. त्यामुळे समोर घडणाऱ्या साध्या गोष्टीचा वेगळाच अर्थ काढतात - सुतावरून स्वर्ग गाठतात. अशाच स्वभावाचं अजून एक पात्र आहे अश्विनशेट. त्याचं रेवती नावाच्या नायकिणीवर प्रेम जडलं आहे. ते लग्न करणार आहेत. तरीही आतून थोडासा संशय आहे. योगायोगाने फाल्गुनराव आणि रेवतीची गाठ पडते. ती चक्कर येऊन पडत असताना फाल्गुनराव तिला सावरतो. कृत्तिका हे बघते. ह्या दोघांचं लफडं आहे असं तिची समजूत होते. त्यांना रंगेहाथ पकडायला जाते पण तिला ते दोघे दिसत नाहीत. त्याजागी पडलेला अश्विनशेटचा फोटो सापडतो. पुढे फाल्गुनरावला कृत्तिकेच्या हातात हा फोटो दिसतो आणि त्याचा समज होतो की ह्या दोघांचं लफडं आहे !! आणि अश्विनशेटला नंतर फोटो फाल्गुनरावच्या हातात दिसतो. आणि त्याला वाटतं की फाल्गुन आणि रेवती ह्यांचं लफडं आहे. आपल्या संशयाची खात्रीच करण्यासाठी हे तिघे अजून क्लृप्त्या लढवतात. योगायोगाने घटना अश्या घडतात की त्या खऱ्या घटनांचा वेगळा अर्थ काढल्यामुळे त्यांचा संशय बळावतच जातो. एका संशयातून दुसरा; दुसऱ्यातून तिसरा गैरसमज अशी धमाल फटाक्यांची माळ फुटत राहते. पण शेवटी सर्व संशय फिटतात आणि शेवट गोड होतो. 

वाचक म्हणून आपण त्यात रंगून जातो. आणि ह्या लोकांना मनोमन म्हणतो, "बाबांनो, जरा थांबा. दुसऱ्याचं पूर्ण एका. समजून घ्या. पूर्ण शहानिशा करा रे !!"

फाल्गुनराव आणि कृत्तिकेचा एकमेकांवर संशय आणि त्यासाठी नोकरांची साक्ष काढणे
 

अश्विनशेट रेवतीवर रागावतो तेव्हाचा प्रसंग



नाटक जुनं असलं तरी त्या कथानकातली मजा जुनी झाली नाही. मराठीतली अनेक प्रसिद्ध नाट्यगीतं/पदं ही "संशयकल्लोळ" नाटकातली आहेत हे मला वाचल्यावर कळलं. नाट्यसंगीताची जुजबी माहिती असणाऱ्या मलासुद्धा मुखडे ठाऊक आहेत अशी काही पदे म्हणजे - "सुकांत चंद्रनाना पातली", "कर हा करी धरिला शुभांगी ..", "संशय का मनी आला ..", "मजवरी तयांचे प्रेम खरे", "मृगनयना रसिक मोहिनी" इ.

ह्या पदांची एक गंमत वाटली की गाणं म्हणण्यासाठी काही विशेष कारण फार भावनिक प्रसंग लेखकाला लागला नाही. कुठल्याही प्रसंगात गाणी घातली आहेत. दारावर आलेल्या भिक्षेकऱ्याला हाकलवायला सुद्धा गाणं; तसबीर सापडत नाहीये; इथेच तर ठेवली होती हे सांगायला सुद्धा गाणं; संवाद चालू असताना मध्येच गाणं आणि पुन्हा पुढे तोच मुद्दा गद्यात सुरु. कदाचित तेव्हाचा प्रेक्षकांची मागणी असेल की भरपूर गाणी पाहिजेत. ही पदे सुद्धा संस्कृतप्रचुर मोठमोठ्या सामासिक शब्दांची. त्यावेळच्या लेखनशैलीची, सामाजिक स्थितीची आणि अभिरुचीची जाणीव होते.

जुन्या पुस्तकांच्या वाचनाचा माझा अनुभव असा आहे की आता वाचताना ती तितकी गमतीदार वाटत नाहीत (गडकरींचे बाळकराम किंवा चि.वि. चे चिमणराव इ.) कारण विनोदाची आपली अभिरुची बदलली आहे; आपली सामाजिक जीवनशैली बदलली आहे. म्हणून ती पुस्तके वाचताना आपल्याला जुन्या काळाचं भान ठेवूनच वाचायला लागतं. जुनी भाषा सुद्धा खूप क्लिष्ट आणि बोजड वाटते. त्यामानाने "संशयकल्लोळ" मधली गंमत आणि भाषा तितकी शिळी वाटली नाही. छोटे आणि खुसखुशीत संवाद आहेत. कृत्तिकेच्या तोंडाच्या म्हणींनी मजा आणली आहे. ह्यातल्या पुरुष पात्रांची नावं ही मराठी महिन्यांची - फाल्गुनराव , अश्विनशेट, भादव्या, आषाढ्या, कार्तिकस्वामी(देव) अशी तर स्त्री पात्रांची नावं नक्षत्रांची - रेवती, कृत्तिका, भरणीबाई इ. अशी वेगळी चमत्कृती आहे. भाषेची मजा लेखनात आहे.

हे नाटक एका इंग्रजी नाटकाचं भाषांतर आहे. हे देवलांनीच सांगून ठेवलं आहे. पण त्यांनी मूळ नाटकाचं नाव सांगितलं नव्हतं. नंतर लोकांनी संशोधन करून ते मूळ नाटक शोधून काढलं. ह्या पुस्तकात मूळ नाटकाचे संवाद आणि "संशयकल्लोळ"मधले संवाद बाजूबाजूला ठेवून त्यातलं साम्य दाखवलं आहे. भाषांतर किती अस्सल झालं आहे हे आपल्या मनावर ठसतं.

तुम्हालाही मराठी साहित्यातलं, नाट्यइतिहासातलं, सांगितिक इतिहासातलं मानाचं पान वाचायला नक्की आवडेल.



———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

After Dark (आफ्टर डार्क)




पुस्तक - After Dark (आफ्टर डार्क)
लेखक - Haruki Murakami (हारुकी मुराकामी)
भाषा - English (इंग्रजी)
मूळ पुस्तक - アフターダーク  (Afutā Dāku)
मूळ पुस्तकाची भाषा - Japanese (जपानी)
अनुवाद - Jay Rubin (जे रुबीन)
पाने - २०१
ISBN - 978-0-099-50624-9


ह्या कादंबरीला निश्चित अशी गोष्ट नाही. एका रात्रीत घडणाऱ्या घटना आहेत. योगायोगाने एकत्र आलेल्या व्यक्ती एकमेकांशी मोकळेपणाने गप्पा मारतात. आपल्या आयुष्यातला सल किंवा काही दु:ख एकेमेकांना सांगून मन मोकळं करतात. त्यातून आपल्याला प्रत्येकाच्या आयुष्यातली दुःखद किनार समजते. पण ह्या सगळ्या कोलाज कामातून काही मुख्य आकृतीबंध तयार होत नाही.
कादंबरीच्या सुरुवातीला एका मुलीचं - एरीचं - वर्णन आहे. ती एका खोलीत गाढ झोपली आहे. आहे. तिथल्या टीव्हीचा स्क्रीन थोडा वेगळा आहे. त्या स्क्रीन मधून कोणीतरी तिला बघतंय असं वर्णन आहे. नंतर, एखाद्या वैद्यानिक कल्पनारंजनाप्रमाणे त्या स्क्रीन मधून ती मुलगी एका अनोळख्या ठिकाणी आपोआप जाते. एखाद्या बंद खोली प्रमाणे ती जागा असते. तिकडे तिला जाग येते. आणि कादंबरीच्या शेवटी ती मुलगी पुन्हा मूळ जगात येते, पण इथे पुन्हा ती निद्रिस्तच.
ह्या एरीची बहीण मारी, तिला रात्री एक तरुण - एरीचा शाळूसोबती - भेटतो, ते गप्पा मारतात. तो एका "वेश्याव्यवसाय" चालणाऱ्या हॉटेलात मदतनीस असतो. तिथे एका मुलीला मारहाण होते, तेव्हा हे दोघे मदत करतात. मारहाण करणाऱ्या व्यक्तीच्या ऑफिसचं वर्णन आहे. असे बरेच प्रसंग घडत राहतात. ते वाचताना खूप कंटाळा येतो तरी आपण वाचत राहतो कारण असं वाटत राहतं की ह्या सगळ्या कड्या एकत्र होऊन शेवटी त्या चमत्काराची उकल होईल असं आपल्याला वाटत राहतं.
पण असं काहीच होत नाही. सगळं अधांतरी सोडून कादंबरी संपते.

काही पाने उदाहरणादाखल
एरीच्या खोलीचं वर्णन.





"मारी"चा मित्र तिला तिच्या आयुष्यातल्या समस्या सांगतो तेव्हा




हॉटेलातली महिला कर्मचारी तिच्यामागे लागलेल्या ससेमिऱ्याबद्दल सांगते.





सगळा वेळ फुकट. मुराकामी च्या बंडल पुस्तकाचा हा दुसरा अनुभव. ह्या आधी वाचलेलं "
Colorless Tsukuru Tazaki and His years of Pilgrimage" हे पुस्तक असंच. त्याचं परीक्षण पुढील लिंकवर वाचू शकाल
निरर्थक वर्णन आणि कशाचा कशाला पत्ता नाही. हा लेखक इतका बेस्टसेलर कसा झाला कळत नाहीये! खरं तर काही अर्थ नाही असं लिहून मग "मी स्पष्ट सांगणार नाही, लोकांनी ते शोधावं" असा खेळ मुराकामी ने केला असावा; त्यात लोक गंडले. "काही कळलं नाही" असं म्हणून बावळट ठरण्यापेक्षा "हो हो , खूप मोठा अर्थ आहे" असं म्हणून लोकांनी डोक्यावर घेतलेलं दिसतंय.

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

सूर्योपासना (Suryopasana)



पुस्तक - सूर्योपासना (Suryopasana)
लेखक - निखिल कुलकर्णी (Nikhil Kulkarni)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १०४
प्रकाशन - विवेकानंद केंद्र, मराठी प्रकाशन विभाग,जून २०२२ (Vivekananda Kendra)
छापील किंमत - १५०/- रू.
ISBN - दिलेला नाही

सूर्यनमस्कार हा शब्द ऐकला नसेल असा मराठी माणूस विरळाच. सूर्यनमस्कार घालणारे लोकही बरेच आहेत. परंतु सूर्यनमस्कार न घालणारे लोक दुर्दैवाने जास्त आहेत. म्हणूनच सूर्यनमस्कार का घालावेत हे वेगवेगळ्या पद्धतीने लोकांसमोर येणे आवश्यक आहे. त्या प्रयत्नांमधलेच हे पुस्तक आहे.
जे लोक सूर्यनमस्कार घालतात ते सुद्धा बहुतेककरुन ह्याकडे फक्त एक व्यायाम प्रकार म्हणून बघतात. पण हेच सूर्यनमस्कार एका ध्यान-धारणे प्रमाणे केले तर मनाची शांतता, एकाग्रता साधता येईल हे ह्या पुस्तकाने दाखवलं आहे.
इतकंच नाही; तर शरीरातली चक्रे, कुंडलिनी ह्या संकल्पना लक्षात घेऊन जर सूर्यनमस्कार घातले तर अध्यात्मिक प्रगतीही साधता येईल ह्याकडे पुस्तक दिशानिर्देश करते.
एकूणच शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा यांच्या सर्वांगीण विकासासाठी सूर्यनमस्कार कसे घालावेत याचं सोपं आणि सुटसुटीत मार्गदर्शन करणारं हे पुस्तक आहे.

लेखक स्वत: उच्चिद्याविभूषित आहेत. आधुनिक तांत्रिक ज्ञान आणि सूर्यन
स्काराचा अभ्यास असा दुहेरी संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आहे. त्यामुळे त्यांचं सांगणं फक्त भावनिक नाही तर तार्किक सुद्धा आहे. लेखकाबद्दल पुस्तकात दिलेली माहिती.


अनुक्रमणिका

पहिले प्रकरण - सूर्यनमस्काराचे प्राचीन उल्लेख कुठे आढळतात, अर्वाचीन काळात स्वामी रामदास आणि औंधचे राजे यांच्यामुळे सूर्यनमस्कारप्रचारात मोलाची भर कशी पडली हे सांगितले आहे.

दुसरे प्रकरण - मनाची एकाग्रता, विचार थांबणे या "संप्रज्ञात समाधी"च्या संकल्पनेबद्दल सांगितले आहे. आपल्या मेंदूची एकावेळी चार कामे करण्याची क्षमता, त्याचा पूर्ण वापर इ. संकल्पना पाश्चात्य वैद्यकीय ज्ञान आणि संशोधनाचा आधार घेऊन स्पष्ट केल्या आहेत.

तिसरे प्रकरण - आपल्या शरीराचे एक नैसर्गिक चक्र आहे जे सूर्याच्या भ्रमणाशी निगडित आहे; पचन चांगलं असेल तर आपली तब्येत कशी चांगली राहते आणि सूर्यनमस्कार यासाठी कसे फायदेशीर ठरू शकतात हे तिसऱ्या प्रकरणात आहे.

चौथे प्रकरण - आत्मा, ऊर्जा, प्राण या संकल्पना सोप्या शब्दात समजून सांगितले आहेत जेणेकरून पुढच्या प्रकरणांमध्ये त्यांचा संदर्भ घेता येतो.

पाचवे प्रकरण - सूर्यनमस्कार कुठेही घातले तरी शरीराला त्याचा फायदा होईलच पण त्यांचा मानसिक-अध्यात्मिक फायदा घ्यायचा असेल तर योग्य स्थळे कशी निवडावीत याबद्दल मार्गदर्शन.

सहावे प्रकरण - प्रत्येक स्थितीमध्ये श्वास घ्यावा/सोडावा/रोखून धरावा याबद्दल संक्षेपात मार्गदर्शन आहे. अशा पद्धतीने श्वासावर लक्ष केंद्रित केलं की हळूहळू आपल्या विचारांची साखळी तुटून ध्यानाची अवस्था साधणं कसं शक्य आहे हे समजावून सांगितलं आहे. श्वास आणि विचार ह्याचं अद्वैत आपल्या मनावर बिंबवतं.

सातवे प्रकरण- सूर्यनमस्काराच्या आधी आणि नंतर कुठल्या प्रार्थना म्हणाव्यात जेणेकरून आपल्याला या सूर्याविषयी कृतज्ञता व्यक्त करता येईल; या कृतज्ञतेचा आपल्या शरीरावर कसा सकारात्मक परिणाम होतो हे सांगितले आहे. 

आठवे प्रकरण - सूर्यस्तुती - सूर्याची बारा नावे आणि त्याचा भक्तीपूर्ण अर्थ काय हे सांगणारं प्रकरण.  सूर्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी, त्याच्या तेजाविषयी आदर दाखवणारी, सूर्याकडून मिळणाऱ्या चैतन्याने आनंदित करणारी ही नावे आहेत.

नववे प्रकरण - आपल्या शरीरात सात चक्रे आहेत, तीन नाड्या आहेत असं तुम्ही वाचलं असेल. मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, इडा-पिंगला नाड्या अशी नावे कदाचित तुम्ही वाचली असतील. ही चक्रे आणि नाड्या काय भानगड आहे हे सोप्या शब्दात समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या कल्पना अतिशय गहन आहेत आणि या पुस्तकाचा तो मूळ उद्देशही नाही. त्यामुळे शंभर टक्के समजेलच असं नाही मात्र सूर्यनमस्कार घालताना एकेका चक्रावर लक्ष केंद्रित करण्याचे फायदे काय हे यातून आपल्याला नीट समजतं.

दहावे प्रकरण -मेडिटिव्ह फॉर्म - यात आधीच्या प्रकरणांचा गोषवारा घेऊन सूर्यनमस्कार म्हणजे एक प्रकारचे ध्यान कसे आहे हा मुद्दा पुन्हा सांगितला आहे.

अकरावे प्रकरण - एरोबिक फॉर्म - एरोबिक व्यायाम प्रकारात हृदयाची गती मोठ्या प्रमाणावर वाढवली जाते. यातून आपला दमसास/स्टॅमिना वाढवला जातो. सूर्यनमस्कार भराभर घालण्याने आपण हे साध्य करू शकतो. म्हणून ज्यांना सूर्यनमस्कार नीट जमत आहेत व ज्यांचा चांगला सराव झाला आहे अशांनी आपली गती वाढवून एरोबिक प्रकाराने सूर्यनमस्कार कसे घालावे याचं मार्गदर्शन आहे.

बारावे प्रकरण - संगीत विचार- संगीत किंवा गाणी लावून सूर्यनमस्कार घातले तर एकाग्रता होण्यासाठी मदतच होईल. ते कसे याबद्दल थोडक्यात माहिती आहे. कुठले संगीत ऐकावे याबद्दल स्वानुभव सांगितले आहेत.

नंतर वेगवेगळ्या वेबसाईट आणि पुस्तके ह्यांची संदर्भसूची आहे.

आता काही पाने उदाहरणादाखल बघू


इतिहासातले उल्लेख




नमस्कार आणि श्वास ह्याच्या मिलाफातून विचारांवर नियंत्रण.


स्थितींचा फोटो.

चक्र विचार


एरोबिक



ह्या पुस्तकाचा भर प्रत्यक्ष सूर्यनमस्कार शिकवण्यावर नसून; हे बिंबवण्यावर आहे की ते घातलेच पाहिजेत आणि विशिष्ट पध्दतीने घालावेत. त्यामुळे ह्यातल्या स्थितींचे फोटो आहेत. पण प्रत्येक स्थितीवर सविस्तर मार्गदर्शन नाही. प्रत्येक स्थिती समजून घ्यायची असेल तर इतर पुस्तके किंवा योग गुरूचे मार्गदर्शन घ्यावे लागेल.

महत्त्वाच्या पारंपरिक विषयाचा त्याच्या आधुनिक आणि बहुविध अंगांनी वेध घेणारे अवश्य वाचावे असे हे पुस्तक.


पुस्तक विकत घेण्यासाठी संपर्क -
विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग,
अश्विनी हाईट्स, ग्राहक पेठेजवळ, सदाशिव पेठ, पुणे-४११०३०
फोन नं. -
(०२०)२४४३२३४२ / ९८८१०६१६८६


———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

चित्तर-बित्तर (Chittar-Bittar)

पुस्तक - चित्तर-बित्तर (Chittar-Bittar) लेखिका - सारिका कुलकर्णी (Sarika Kulkarni) भाषा - मराठी (Marathi) पाने - १५९  प्रकाशन - ग्रंथाली प्र...