मोगरा फुलला (Mogara Phulala)




पुस्तक - मोगरा फुलला (Mogara Phulala)
लेखक - गोपाळ नीलकंठ दांडेकर (Gopal Neelkanth Dandekar)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - ३४५
प्रकाशन - प्रथम आवृत्ती - मॅजेस्टिक प्रकाशन १९७५. सध्या मृण्मयी प्रकाशन.
छापील किंमत - रु. ४००/-
ISBN - दिलेला नाही

"मोगरा फुलला" ही ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रावर आधारित नितांतसुंदर कादंबरी आहे. महाराजांच्या आईवडिलांच्या तरुणपणापासून त्यांच्या समाधीपर्यंतचे प्रसंग यात घेतले आहेत. त्याकाळातल्या दोन व्यक्ती आपल्याला ही गोष्ट सांगतायत असं निवेदन आहे. त्यांच्यासमोर घडणाऱ्या घटना ते आपल्याला सांगतात. तेही त्यावेळच्या भाषेत. त्यांचा हात धरून आपण थेट बाराव्या शतकात पोचतो. बाराव्या शतकातले एक छोटे खेडे आळंदी. तिथे दोन शेजारी शेजारी राहणाऱ्या ब्राह्मण घरातील दोन बालमैत्रिणी - कावेरी आणि रुक्मिणी. ही कावेरी आपल्याला गोष्ट सांगते आहे रुक्मिणीची- भविष्यातल्या ज्ञानोबांच्या आईची. त्याच वेळी भट्टदेव नावाचा एक यात्रेकरू महाराष्ट्रात पायी तीर्थयात्रा करतो आहे. त्यांना भेटतात दुसरे एक तरुण यात्रेकरू. विट्ठल. भट्टदेव आपल्याला सांगतोय गोष्ट विट्ठलपंतांची - भविष्यातल्या ज्ञानोबांच्या वडिलांची.

कावेरी आणि भट्टदेवाच्या वर्णनातून त्यावेळची यादवकाळातली परिस्थिती कशी आहे ते कळतं आणि दोन्ही नायकांचे स्वभाव कळतात. रुक्मिणी लहानपणापासून आदर्श मुलगी, गृहकृत्यदक्ष, समंजस. तर विठ्ठलपंत प्रथमपासून ज्ञानमार्गी, विरक्त स्वभावाचे. ते चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. कथा पुढे सरकते. यात्रेकरू फिरत फिरत आळंदीला येतात. योगायोगाने विट्ठलपंत आणि रुक्मिणीच्या वडिलांची भेट होते. इतका ज्ञानी, सद्गुणी मुलगा रुक्मिणीच्या वडिलांना आवडतो. आपल्या मुलीसाठी हाच योग्य वर आहे असा ते निश्चय करतात. पण स्वभावाने संसारात ना रमणाऱ्या विठ्ठलाला हे रुचत नाही. मग ह्या विठ्ठलाची मनधरणी ते कशी करतात, काही दैवी संकेत कसे मिळतात, कावेरीचे वडील कसा आक्षेप घेतात, तरी शेवटी लग्न लागते; हे सगळे प्रसंग छान रंगले आहेत. कावेरीच्या वडिलांना रुक्मिणीचे लग्न आपल्या मुलाशी व्हावे असे वाटत असते. ते न झाल्याने त्यांचा अहंकार दुखावतो. ते लग्नाला विरोध करतात. कावेरीचे वडीलच, आपल्या शेजारच्या मुलीसाठी कसे खलनायक ठरतायत हे बघून पुढच्या घटनांचे सूतोवाच होते.

पुढे कावेरीचे सुद्धा लग्न होते. ती संसारात रमते. पण रुक्मिणी मात्र संसाराची गोडी नसणारा जोडीदार लाभल्यामुळे संसारसुखाला पारखी होत राहते. तरी समजूतदारपणे, पतिव्रतेच्या सहनशीलतेने, नवऱ्याच्या वृतीचा स्वीकार करून राहते. रुक्मिणी आणि कावेरीच्या संवादातून त्यांचे मनोभाव समोर येतात. पुढे विठ्ठलपंतांचा गृहत्याग, अनेक वर्षे बाहेर राहणे, काशीला वास्तव्य, भट्टदेवांची अनपेक्षित गाठ पडणे हे प्रसंग येतात. योगायोगाने विठ्ठलपंतांच्या गुरूंना ते पूर्वी विवाहित आहे हे कळते. ते रागावून विठ्ठलपंतांना पुन्हा संसारी होण्यास सांगतात. प्रायश्चित्त म्हणून व्रतवैकल्ये सांगतात. ती करून ते आळंदीला परत येतात. कावेरीचे वडील जुना सूड पूर्ण करण्यासाठी गावकऱ्यांच्या मनात विठ्ठल-रुक्मिणीबद्दल विखार भरवतात. संन्यास घेऊन पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारल्याबद्दल दोघांना वाळीत टाकायला लावतात. संन्यास सोडून पुन्हा संसारात येण्याची ही घटना ना पूर्वी कोणी पहिली, ना ऐकली. त्यातून गावात खळबळ माजते. समजून घेणारे आणि न घेणारे असे दोन्ही लोक गावात असतात. विठ्ठलपंतांना शासन केलं नाही तर चुकीचा संदेश समाजात जाईल, स्वैरवर्तन समाजात वाढेल, हा एक विचार; तर गुरूच्या आज्ञेने, प्रायश्चित्त घेऊन घेतलेला निर्णय योग्य आहे हा विरोधी विचार. तेव्हाची ही सामाजिक घुसळण डोळ्यासमोर उभी राहते.

विठ्ठल रुक्मिणी गावाबाहेर राहतात. भिक्षेवर, अतिशय गरिबीत उदरनिर्वाह करतात. अशा शोचनीय स्थितीतही समाधानी राहणे, लोकांचा दुस्वास न करणे, शास्त्रांचा अभ्यास सुरु ठेवणे ह्यातून जोडप्याची स्तिथप्रज्ञ वृत्ती दिसते. कादंबरीच्या अर्ध्यापर्यंत हा सगळा भाग येतो. पुढे चारी भावंडांचा जन्म आणि लहानपणापासूनच ते सगळे कसे समंजस, ज्ञानी, पोक्त आणि परिपक्व होते, अवतारी व्यक्तीच होते हे कावेरी आणि भट्टदेवांच्या अनुभवातून कळते. ह्या पुढच्या भागात ज्ञानदेवांच्या चरित्रातले प्रसंग आहेत उदा. पैठणला जाणे, रेड्यामुखी वेद वदवणे, ज्ञानेश्वरीची रचना, चांगदेवांना भेटायला जण्यासाठी भिंत चालवणे, ग्रंथ रचना, आणि शेवटी समाधी. आपल्याला हे सगळे प्रसंग माहित असलेतरी एका बहिष्कृत मानल्या मुलाचे हळूहळू समाजापुढे येणे, त्यांचे महत्त्व आणि ज्ञानाचा अधिकार लोकांना लक्षात येणे हे प्रसंग टप्प्याटप्प्याने उलगडत जातात. जेव्हा कीर्ती पसरून ते आळंदीला परत येतात तेव्हा त्यांचे झालेले स्वागत, विरोधकांना झालेली उपरती बघून आपणही सुखावतो. शेवटी जेव्हा समाधीचा प्रसंग येतो तेव्हा आपणही तितकेच भावनिक होतो, डोळ्यात पाणी येतं. कावेरी आणि भट्टादेवांप्रमाणे आपणही दोन पिढ्यांचे भोग बघितलेले असतात. आता त्याचा पश्चात्ताप समाजाला झालेला असताना ज्ञानदेवांनी आपल्याला सोडून जावू नये ही आपलीही भावना होते. ओल्या डोळ्यांनी कादंबरी पूर्ण करतो.

आता काही पाने उदाहरणादाखल वाचा.

लग्नानंतर कावेरी रुक्मिणीला तिच्या संसाराबद्दल बोलते करते तेव्हा



गावाने वाळीत टाकले तरी ते प्रसन्नचित्ताने स्वीकारून ईश्वरोपासना करत जगण्याची वृत्ती दाखवणारा प्रसंग



आळंदी ते प्रतिष्ठान पायी प्रवासातील एक प्रसंग. तेव्हाच्या समाजाचे वर्णन आणि हरिपाठाची रचना इथे दिसते.



ज्ञानेश्वरीच्या एका अध्यायाच्या निरूपणाचा भाग


पाहिल्यापानापासून शेवटच्या पानापर्यंत मोहून ठेवणारे हे पुस्तक आहे. कथानक माहिती असले तरी ते कसे कसे घडले असेल हे नव्याने बघितल्यासारखे वाटते. जुन्या भाषेची गोडी आणि वेगळेपणा मनात असा मुरतो की खूप वेळ पुस्तक वाचल्यावर आपण सुद्धा त्याच भाषेत बोलू की काय असे वाटते. चरित्रात चमत्कार हे चमत्कार म्हणूनच दाखवले आहेत. त्याचे तार्किक स्पष्टीकरण किंवा खरं काय वेगळं घडलं असेल वगैरे प्रयोग केलेला नाही.

ज्ञानेश्वर महाराजांच्या कार्याचे चिरस्थायी महत्त्व, त्यांच्या कुटुंबाला कराव्या केलेल्या संघर्षाची सामाजिक मांडणी आणि गोनीदांची लेखणी असा त्रिवेणी संगम आहे. मराठी साहित्यातले हे अढळ स्थान मिळालेले पुस्तक आहे. सुजाण वाचक वाचतच राहतील.

ता.क. पुस्तकाच्या प्रतीचंही आपलं आपलं भाग्य... ह्या पुस्तकाचं वाचन चालू असतानाच आळंदीला जायचा योग आला. थेट समाधीवर हे पुस्तक ठेवण्याची संधी मिळाली... विषय, आशय आणि लेखक ह्या दृष्टीने प्रसिद्ध असणारे हे पुस्तक. हजारो प्रति निघाल्या असतील. पण असा योगायोग फार कमी प्रतींच्या बाबतीत घडला असेल.




——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-








No comments:

Post a Comment

मोगरा फुलला (Mogara Phulala)

पुस्तक - मोगरा फुलला (Mogara Phulala) लेखक - गोपाळ नीलकंठ दांडेकर (Gopal Neelkanth Dandekar) भाषा - मराठी (Marathi) पाने - ३४५ प्रकाशन - प्र...