

पुस्तक - समर्थांची लेक (Samarthanchi lek)
लेखिका - सारिका कंदलगांवकर (Sarika Kandalgaonkar)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १९९
प्रकाशन - संवेदना प्रकाशन, एप्रिल २०२४
ISBN - 978-81-1973783-3
छापील किंमत - रु. ३००/-
हे पुस्तक मला वाचायला उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वप्रथम लेखिका सारिका कंदलगांवकर ह्यांचे मी आभार मानतो !
गीतरामायणाल्या "दैवजात दुःखे भरता" गाण्यात ओळ आहे "मरणकल्पनेशी थांबे तर्क जाणत्याचा". मृत्यू म्हणजे काय? मृत्यूनंतर काय होते? हे कोणी स्वानुभवाच्या आधारे जाणून घेऊ शकत, म्हणून "तर्क" थांबतो...पण माणूस त्याबद्दल विचार करणं, कल्पना करणं थांबवत नाही. म्हणूनच या गीताच्या ओळीचा व्यत्यास असा की "मरणकल्पनेशी रंगे खेळ कल्पनांचा ". वेगवेगळ्या धर्मात, पंथात मृत्यूनंतरचं जीवन ह्याबद्दल वेगवेगळ्या कल्पना आहेत; आपापली एक विचारपद्धती आहे. त्यातलीच एक आहे की मृत्यूनंतर आत्मा राहतो. जर माणसाच्या इच्छा अपूर्ण राहिल्या असतील तर तो आत्मा भटकत राहतो. इच्छा पूर्ण करून घ्यायचा प्रयत्न करतो. जर अन्याय-अत्याचार-फसवणूक ह्यामुळे मरण आलं असेल तर तो आत्मा सूड घ्यायचा प्रयत्न करतो. तंत्र-मंत्र विद्येतून अशा आत्म्यांना वश करून घेता येतं. आत्म्याच्या अचाट शक्तीचा वापर करून घेऊन गुप्तधन मिळवणे, इतरांवर हुकूमत गाजवणे असे सुद्धा जमू शकते. तर इतर पूजापाठ, मंत्र-तंत्र वापरून ह्या भटकणाऱ्या आत्म्यांना मुक्ती मिळू शकते. त्यामुळे आत्मा, भूत, अतृप्त आत्मा, मांत्रिक, जादूटोणा, वशीकरण हे सगळे आपल्या परिचयाचे शब्द. भयपट, भयकथा ह्यांमधले परवलीचे शब्द. ह्याच शब्दांशी, त्यातून तयार होणाऱ्या अद्भुत कथानकाची गुंफण म्हणजे "समर्थांची लेक" ही कादंबरी.
ह्या कादंबरीची नायिका आहे एक युवती - अक्षता. तिच्या घराण्यात दत्तप्रभू, नाथसंप्रदाय ह्याची उपासना चालत आली आहे. त्यातून ह्या घराण्यातल्या व्यक्तींना सिद्धी प्राप्त झाली आहे की ते अतृप्त आत्म्यांना बघू शकतात. मंत्र, भस्म, गंगाजल वगैरे विधींचा वापर करून ते ह्या आत्म्यांना कायमची मुक्ती देऊ शकतात. तरुण अक्षता सुद्धा तिच्या सिद्धींचा वापर चांगल्यासाठी करते आहे. एखाद्या ठिकाणी अनाकलनीय घटना घडत असतील, माणसं अचानक मरत असतील किंवा एखादी जागा भुताने झपाटलेली असं कळलं की कोणाच्या नकळत तिकडे जाते. मग ते भटकणारे - सूडाने पेटलेले आत्मे तिच्यावर हल्ला करायचा कसा प्रयत्न करतात आणि ती त्यातून सहीसलामत कशी सुटते आणि आत्म्यांनाही मुक्ती देते ह्याचे अद्भुतरम्य प्रसंग पुस्तकात आहेत.
हे प्रसंग घडताना "पूर्वदृश्य" तंत्राचा वापर करून एक समांतर कथानक आपल्यासमोर उभं राहतं की ; तिचे आजोबा, वडील सुद्धा अशा प्रसंगांना कसे सामोरे जात होते. त्यांचे गुरु त्यांना दृष्टांत देत, तर कधी मंत्राची शक्ती. कधी दोन जादूगारांच्या लढाईप्रमाणे आत्म्याबरोबर लढाई, दोन मांत्रिकांची लढाई वगैरे. आपल्या शक्तीचा चांगल्यासाठी वापर करणारे अक्षताचे घराणे. तर त्यांना स्पर्धक म्हणजे ह्या शक्तीचा कपाटासाठी, ऐहिक स्वार्थासाठी वापर करणारी दुसरी टोळी. सुष्ट-दुष्टांच्या ह्या लढाईत हत्यारं आहेत - आत्मे, मंत्रतंत्र, अद्भुत शक्ती. ह्या लढाईत काय प्रसंग घडतील, कोण कोणाला कसा शह देईल, शक्तींची लढाई कशी होईल ह्या सगळ्या वर्णनातून साकार झाली आहे "समर्थांची लेक".
काही प्रसंग वाचा म्हणजे लेखिकेच्या शैलीची कल्पना येईल.
एका बाईचं बाळ तिच्यापासून हिरावून घेतलं होतं. त्या बाईचं भूत आता इतर लोकांना त्रास देत होतं. त्याबद्दलचा एक प्रसंग.



भुताखेतांवर ताबा मिळवण्याची अद्भुत शक्ती गुरु आपल्या शिष्यांना देत. अमर नावाच्या एका पात्राच्या शिक्षणावेळचा एक अद्भुत प्रसंग.



ज्यांना भयपट किंवा अशा पद्धतीच्या कादंबऱ्या आवडतात त्यांना ही कादंबरी आवडेल. मला ही अद्भुतता विशेष रंजक वाटत नाही. सुरुवातीला म्हटलं तसं "तर्क थांबवूनच" मृत्युपश्चातच्या जीवनाची कल्पना करावी लागते. त्यामुळे असे लेखन म्हणजे लेखिकेने स्वतः उभारलेले विश्व. ती म्हणेल ते नियम. त्यामुळे काही वेळा अचाट शक्ती असणारी पात्र आजूबाजूचं जग स्तब्ध करतात, अंतर्ज्ञानाने सगळं जाणतात, मेलेल्याला जिवंत करतात पण तीच पात्र मध्येच हतबल होतात, "जे होणार आहे ते होणारच" असं म्हणतात; "आपण कोणाचा जन्म आणि मृत्यू बदलू शकत नाही" असं म्हणतात. ते मला सुसंगत वाटत नाही. काही वेळा, पुढे काय होणार आहे हे त्यांना दिसतं आणि काही वेळा ते भविष्यच बदलायचा प्रयत्न करतात. काही वेळा आत्म्याची शक्ती येते; काही वेळा जाते. असं खूप गोंधळात टाकणारं चित्रण आहे. ह्या कादंबरीतच नाही पण एकूणच भयपट, भुताच्या गोष्टी किंवा "सुपर ह्युमन फँटसी" प्रकारचे हॉलिवूड चित्रपट ह्यामध्ये पण गोंधळ नेहमी दिसतो. त्यामुळे थोडे प्रसंग वाचायला मजा येते पण पुढेपुढे ते एकसुरी आणि न जुळणारे वाटतात. ही कादंबरी पण त्याला अपवाद नाही. त्यामुळे मी खूप आनंद घेऊ शकलो नाही.
तुम्हाला भुताच्या गोष्टी मनापासून आवडत असतील तर कादंबरी वाचून बघा.
——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
No comments:
Post a Comment