मी सरकारी डॉक्टर (Mi sarakari doctor)



पुस्तक - मी सरकारी डॉक्टर (Mi sarakari doctor)
लेखक - डॉ. कुमार ननावरे (Dr. Kumar Nanaware)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - ३३०
प्रकाशन - स्वयंप्रकाशित
ISBN - 978-93-5607-798-0
छापील किंमत - रू. ३५०/-

हे पुस्तक मला वाचायला उपलब्ध करून दिल्याबद्दल मी लेखक डॉ. कुमार ननावरे ह्यांचे सर्वप्रथम मन:पूर्वक आभार मानतो.


अन्न,वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य ह्या आधुनिक मानवाच्या सामाजिक गरजा. आधुनिक समाज व्यवस्थेत "सरकार" नावाची व्यवस्था ह्या गरजांच्या पूर्ततेसाठी काम करते. त्यासाठी नागरिकांकडून कर गोळा करते. भारतात सुद्धा केंद्र सरकार आणि राज्य सरकारे अशा आरोग्य यंत्रणा चालवतात. त्यातून औषधोपचार, शस्त्रक्रिया कमी दरात केल्या जातात. काही औषधे सर्वांना मोफत आहेत. तर गरीबांना अजून बऱ्याच गोष्टी मोफत मिळतात. म्हटलं तर अतिशय आदर्श व्यवस्था. पण तितक्या आदर्श पध्दतीने ती चालत नाही हे आपण सगळेच जाणतो. औषधांचा तुटवडा, डॉक्टर - नर्स उपलब्ध नसणे, प्रचंड गर्दी, सवलत मिळवण्यासाठी वशिलेबाजीची गरज, लाचलुचपत, चुकीचे औषधोपचार अशा नाना समस्यांच्या बातम्या आपण वृत्तपत्रांत वाचत असतो. व्यवस्थेच्या अनागोंदीचा फटका जेव्हा रुग्णांना बसतो तेव्हा रुग्णाच्या नातेवाईकांनी रागाने केलेली तोडफोड, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मारहाण आणि प्रसंगी डॉक्टरला मारहाण ह्याच्या बातम्याही आपण वाचत असतो. पण ह्या बातम्यांमध्ये डॉक्टरांची बाजू काय होती हे प्रत्येकवेळी प्रकर्षाने मांडलं जातं असं नाही. कानफाट्या नाव पडलं असल्यामुळे प्रत्येकवेळी दोष डॉक्टरचाच असणार हे गृहीत धरलं जातं. सनसनाटी बातम्या तशाच दिल्या जातात. म्हणूनच ह्या गृहितकाला छेद देणारं, "सरकारी डॉक्टरां"ची बाजू मांडणारं हे पुस्तक वाचनीय ठरतं.

पुस्तकाचे लेखक स्वतः सरकारी डॉक्टर आहेत. ते त्वचारोग तज्ज्ञ आहेत. ३३ वर्ष त्यांनी प्रामाणिकपणे रुग्णसेवा बजावली आहे. ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्रापासून जिल्हा रुगणालायांपर्यंत सगळ्या प्रकारच्या "सिस्टीम" कशा चालतात हे त्यांनी जवळून बघितलं आहे. त्यातून आलेले विदारक अनुभव पुस्तकात मांडले आहे.

त्यांचं म्हणणं आहे की डॉक्टर हे ह्या व्यवस्थेचा भाग आहेत पण ह्या व्यवस्थेचा बळी सुद्धा आहेत. सार्वजनिक रुग्णालयात मुळातच सर्व गोष्टींचा अभाव असतो. पुरेशी औषधं नसतात. यंत्र सामुग्री नादुरुस्त असते. लोकसंख्येच्या तुलनेत फारच कमी डॉक्टर असतात. तरी सरकारी डॉक्टर प्रामाणिकपणे होता होईल तितकी मदत करत असतात. मोफत औषधोपचार करत असतात. गरिबांचे लक्षावधी रुपये ते वाचवत असतात. पण जेव्हा अतिताण, औषध न मिळणं किंवा खरंच गंभीर प्रकृतीमुळे रोगी दगावतो तेव्हा स्थानिक राजकारणी अर्थात गुंड मध्ये पडून डॉक्टरला मारहाण करतात. ह्या राजकारणी गुंडांना फक्त आपल्या इलाक्यातल्या लोकांना आपली ताकद दाखवायची असते. पण असे प्रसंग वारंवार घडायला लागल्यामुळे कोणी सरकारी डॉक्टर व्हायला तयारच होत नाही. लोक लवकर बदली घेतात, निवृत्त होतात किंवा critical केस असेल तर जोखीम न घेता सरळ मोठ्या इस्पितळात पाठवायला सांगतात. मुळातच डॉक्टरांची संख्या कमी त्यात त्यात ह्या अनुभवांमुळे नोकरी सोडणाऱ्यांची संख्या वाढते आहे आणि नवीन यायलाही तयार होत नाहीत. त्यामुळे आहेत त्यांच्यावरचा ताण अजून वाढतो आहे. असं हे दुष्टचक्र तयार झाले आहे.

पुस्तकांमध्ये लेखकाने स्वतःची आणि स्वतःच्या सहकाऱ्यांची अशी बरीच उदाहरणे दिली आहेत अनेक वर्ष प्रामाणिकपणे काम करणारा डॉक्टर आहे पण मारहाणीमुळे त्या डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे किंवा कायमस्वरूपी तो नैराश्यग्रस्त झाला आहे त्याचं कुटुंब उद्ध्वस्त झाले अशी सुद्धा उदाहरण पुस्तकात आहेत.

"गोल्डन आवर- सोनेरी तास" हे प्रकरण अशा काही खास केसेसबद्दल सांगते ज्यामध्ये रुग्णाला अतिशय तातडीने उपचाराची गरज असते. सर्पदंश , हार्टअटॅक यामध्ये रुग्णाला योग्य प्रथमोपचार मिळाले तर तो तगून राहू शकतो. पूर्ण उपचार मिळाल्यावर त्यातून पूर्ण बाहेर येऊ शकतो. पण त्या सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये काही तासांमध्ये प्रथमोपचार मिळाले नाहीत तर मात्र केस हाताबाहेर जाऊ शकते. रुग्णाचा दुर्दैवी अंत होऊ शकतो. त्यामुळे जेव्हा असे रुग्ण सरकारी रुग्णालयात येतात तेव्हा तिथे उपस्थितीत असलेल्या डॉक्टरांना तातडीने उपचार करावे लागतात. भले डॉक्टर हृदयरोगतज्ञ नसला तरी त्याला त्याच्या ज्ञानानुसार वकुबानुसार हे उपचार करावे लागतात. सर्पदंशावरची सगळी औषधे किंवा लसी उपलब्ध नसतील तरी हाताशी असलेली सलाईन आणि औषधे घेऊन प्रथमोपचार सुरू करावे लागतात. नियमानुसार बघितलं तर ज्याला अधिकार नाहीत असा डॉक्टर उपचार करतोय किंवा शंभर टक्के आवश्यक ते उपचार दिले जात नाहीत. पण हे वास्तव स्वीकारावे लागते. अशाच सिस्टीम मुळे हजारो लोकांचे प्राण वाचत आहेत. पण

एखादा रोगी दगावला तर डॉक्टरची नाचक्की. त्याला मारहाण होते. विभागीय/न्यायालयीन चौकशी बसली तर त्याच्या पूर्ण करिअरची बरबादी होते. चौकशी संपेपर्यंत पदोन्नती किंवा पुढचे लाभ मिळणार नाहीत. निवृत्तीला जवळ आला असेल तर निवृत्ती वेतन रोखले जाईल. मग अशावेळी कुठला सरकारी डॉक्टर स्वतःचा जीव आणि करिअर धोक्यात घालून रुग्णांना प्रथमोपचार देईल बरं? लेखकांनी याचीही कितीतरी उदाहरण लिहिली आहेत त्यातून काही डॉक्टरांनी नोकऱ्या का सोडल्या हा मुद्दा स्पष्ट केला आहे.

एकाच डॉक्टरला तीन-तीन शिफ्ट मध्ये काम करावं लागतं. सलग दोन दिवस काम करावे लागतं. मुख्य कामाबरोबरच प्रशासकीय जबाबदाऱ्या आणि सरकारी कामांच्या अतिरिक्त जबाबदाऱ्याही असतातच. असं असूनही म्हणे डॉक्टरांना बायोमेट्रिक उपस्थितीनोंद अनिवार्य आहे. म्हणजे सकाळी आठची-नऊची जी ठराविक वेळ असेल त्यावेळी डॉक्टर आला नाही तर त्याचा पगार कापला जातो. मग भले तो रात्री दोन वाजेपर्यंत प्रसूतीगृहात का असेना. किती हा क्रूरपणा! अमानुषता !! डॉक्टर अधिक वैद्यकीय अधिकाऱ्यांना सुद्धा कारकुनी लोकांसमोर बाबापुता करून आपली वेतनाची कामं करून घ्यावी लागतात. 

स्त्री कर्मचाऱ्यांचा त्रास या प्रकरणात महिला हक्क आणि कायदे ह्यांचा गैरफायदा घेणारे कर्मचारी आणि त्याचे प्रत्यक्ष लेखकाला आलेले अनुभव त्यांनी सांगितले आहेत. वैयक्तिक स्वार्थापोटी किंवा दुसऱ्या कुणाच्या सांगण्यावरून डॉक्टरला अडकवण्यासाठी म्हणून विनयभंगाची तक्रार करणे वगैरे गोष्टी घडतात. ते विशद केलं आहे.

रुग्णालयातील औषध खरेदी, सामग्री खरेदी मध्ये संबंधितांचा भ्रष्टाचार चालतो अशात एखादा प्रामाणिक डॉक्टर जो त्या रुग्णालयाचा प्रशासकीय अधिकारीही असेल त्याने विरोध केला की मग हाच कसा लाजखोर आहे भ्रष्टाचारी आहे हे दाखवण्याचे उद्योग होतात. अँटी करप्शन ब्युरो चा सापळा रचून अशा डॉक्टरला दोषी ठरवलं जातं. खुद्द लेखक अशा खोट्या सापळ्यात अडकता अडकता कसा वाचला ह्याचे अनुभव त्यांनी सांगितले आहेत.

आता काही पाने उदाहरणादाखल वाचूया.
अनुक्रमणिका  
(पेनाच्या खुणा मला मिळालेल्या प्रतीवर आधीपासूनच होत्या 😀)

राजकीय हस्तक्षेप




गोल्डन अवर. सर्पदंशावर उपलब्ध साधनांनी उपचार आणि झाला चमत्कार




सरकारी डॉक्टरांची पदे भरण्याचे अपयशी प्रयत्न.




लेखकाने फार प्रामाणिकपणे, तळमळीने सगळे अनुभव सांगितले आहेत. विषयाचे गांभीर्य अजिबात कमी न करता, तरी गप्पा मारण्याच्या शैलीत सर्व लिहिले आहे. त्यामुळे डॉ. ननावरे ह्यांच्या समोर आपण बसून सगळं ऐकतो आहोत असंच वाटतं. वाचनाची उत्सुकता टिकून राहते. मारहाणीचा मुद्दा काही उदहरणांतूनच लक्षात येतो. त्यामुळे पुन्हा पुन्हा त्याची उदाहरणे आल्यामुळे तो जरा ताणला गेला आहे असं वाटलं. कदाचित लेखकाला त्या त्या डॉक्टराच्या विशिष्ट वर्तनामागे काय काय वेगवेगळी करणे असू शकतात हे अधोरेखित करायचं असेल.
पुस्तकात वृत्तपत्रांतील कात्रणे दिली आहेत. त्यातून निवेदनाची वैधता प्रस्थापित होतेच पण ह्या घटना तात्पुरत्या सनसनाटी झाल्या तरी पुढे त्याचं काही होत नाही हे सामाजिक सत्य सुद्धा पुढे येते.

ह्या समस्येवर डॉक्टर मंडळी किंवा त्यांच्या संघटना काय प्रयत्न करत आहेत, त्याचे यशापयश काय ? तसेच  भविष्यात काय धोरण बदल झाले पाहिजेत हा भाग पुस्तकात आला असता तर निवेदनात तर ते पूरक ठरले असते   

जीवन मरणाच्या काठावर असणारा रुग्ण, वेदनेने तळमळत असणारा रुग्ण, अचानक 
त्रास सुरू झालेला रुग्ण डॉक्टर समोर येतो तेव्हा आपलं ज्ञान व अनुभव पणाला लावून त्या रुग्णाला बरं करणे हे  आव्हान किती मोठं असतं !
त्याला सामोरे जाणाऱ्या डॉक्टरची वाहवाच व्हायला पाहिजे. ते काम त्याला सुरळीत करता येईल; निश्चिन्त मनाने करता येईल यासाठी जास्तीत जास्त पोषक वातावरण तयार झाले पाहिजे. त्या उलट, आपली एकूणच राजकीय आणि सामाजिक परिस्थिती त्या डॉक्टरची कुचंबणा करण्यात धन्यता मानते. हे वाचून आपण खिन्न आणि उदास होतो. जे जे या व्यवस्थित संबंधित आहेत त्यांनी हे पुस्तक अवश्य वाचावं.  आपल्या  विवेकबुद्धीला साथ घालावी आणि हा क्रूर खेळ आपल्या परीने थांबवण्याचा प्रयत्न करावा.  
भ्रष्टाचाराने आणि बेशिस्तेने पोखरलेल्या आपल्या समाजात हे एका दिवसात होणार काम नाही. पण भविष्यात बदल घडेल अशी अपेक्षाठेवलीच पाहिजे. नाहीतर लेखकाने मुखपृष्ठावर म्हटलं आहे त्याप्रमाणे...पूर्वी डॉक्टरांच्या दवाखान्यात "शांतता राखा" असा फलक असायचा. भविष्यात, "डॉक्टरांकडे बंदूक आहे. वेडावाकडा विचार करू नका. नाहीतर तुमचा जीव वाचवायचे ऐवजी डॉक्टर तुमचा जीव घेतील" असे फलक दिसायला लागतील. सरकारी आरोग्य व्यवस्था पूर्णपणे बंद होईल. 



——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

उत्तरकांड (Uttarkand)



पुस्तक - उत्तरकांड (Uttarkand)
लेखक - डॉ. एस. एल. भैरप्पा (Dr. S. L. Bahirappa)
अनुवादक - उमा कुलकर्णी (Uma Kulkarni)
भाषा - मराठी (Marathi)
मूळ पुस्तकाचे नाव - ಉತ್ತರಕಾಂಡ (उत्तरकांड)
मूळ पुस्तकाची भाषा - कन्नड (Kannada)
प्रकाशन - मेहता पब्लिशिंग हाऊस. ऑगस्ट २०१९
छापील किंमत - रु. ३९५/-
ISBN - 9789353173104

रामायण आणि महाभारत ही महाकाव्ये भारतीयांचा चिरंतन ठेवा. कितीही वेळा ऐकली तरी पुन्हा पुन्हा ऐकावी अशा गोष्टी. इतकी वैशिट्यपूर्ण पात्रे, नाट्यमय प्रसंग, नैतिक तिढे की प्रत्येक लेखकाला ती कथा आपल्या पद्धतीने, आपल्या दृष्टिकोनातून, आपल्या विचारसरणीतून सांगावीशी वाटते. मूळ लिखित कथानकात असलेले प्रसंग कसे घडले असतील ह्याचं तपशीलवार चित्र उभं करावंसं वाटतं. मूळ लिखित कथानकात नसलेले प्रसंग, गाळलेल्या जागा किंवा प्रसंगांची सांधे जोडणी स्वतःच्या प्रतिभेने उभी करावीशी वाटते. त्या त्या प्रसंगात संबंधित पात्राच्या मनात काय विचार आले असतील, काय चलबिचल झाली असेल, आनंद, दुःख, द्वेष, मत्सर, हताशा, प्रेम, वात्सल्य हे जाणून घेण्याचं आव्हान त्यांना पेलावंसं वाटतं. त्यामुळे रामायण, महाभारत आणि त्यावर आधारित कथा, कादंबऱ्या, नाटकं, लोकनाट्य, लोकनृत्य, गौळणी, कीर्तने ह्या सगळ्या माध्यमातून हजारो वर्षे नाना रूपांत हा ठेवा आपल्या पर्यंत पोचला आहे. भारतीय सहिष्णुतेचं वैशिष्ट्य हे की ह्यातली कितीतरी कथानकं परस्परविरोधी आहेत. तरी समाजाने त्याचा खुल्या मानाने स्वीकार केला आहे. "असंही घडलं असू शकतं" ही शक्यता मांडण्याचं लेखक-कलाकाराचं स्वातंत्र्य आपण मान्य करतो. ह्याच पुनर्कथनच्या ऐतिहासिक परंपरेतलं एक पुस्तक म्हणजे भैरप्पांचं "उत्तरकांड". मूळ कन्नड भाषेतलं पुस्तक उमाताईंनी मराठीत आणून मोलाची भर मराठी साहित्यात घातली आहे.

लेखकाची पुस्तकात दिलेली माहिती

हे रामायण आहे. त्यामुळे त्यात काय प्रसंग येतात हे कोणालाही वेगळं सांगायची गरज नाही. तुम्हाला कथनाच्या मांडणीतलं वेगळेपण सांगतो. ह्या कादंबरीत रामायण सीतेच्या नजरेतून मांडलं आहे. ती इथे निवेदिका आहे. तिच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत आणि रामाच्या जन्मापासून रामाच्या मृत्यूपर्यंत महत्त्वाचे प्रसंग त्यात आहे. त्या आधीचेही काही प्रसंग आहेत. ज्या प्रसंगात सीता उपस्थित होती ते प्रसंग ती स्वतः सांगते आहे. तर इतर प्रसंग तिला कोणीतरी गप्पागोष्टींत सांगतंय अशी निवेदनाची रचना आहे. त्यामुळे रामायणातले बरेचसे महत्त्वाचे प्रसंग त्यात येतात.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रामायण ही दैवी कथा नसून ते हाडामासाच्या-भावभावना असणाऱ्या माणसांची गोष्ट आहे अशा पद्धतीने प्रसंग मांडले आहेत. त्यामुळे रामायणातले चमत्कार इथे नाहीत. असे प्रसंग प्रत्यक्ष घडले असू शकतील असे मांडले आहेत. म्हणजे सीता जमिनीत सापडली असं न दाखवता यज्ञासाठीच्या भूमीत एक अनाथ बालक सापडलं असं दाखवलं आहे. वानरसेना असं न दाखवता, माणसांचीच पण बलदंड आणि शरीर सौष्ठवाचे महत्त्व असणारी ती जमात होती. असं दाखवलं आहे. त्यामुळे हनुमान ह्या दैवी वानराने उड्डाण करून लंका गाठली असं नाही तर एक बलदंड ब्रह्मचारी गुप्तवेशाने तिथे आला असं वर्णन आहे. "अहिल्या शिळा राघवें उध्दरिली" असं न होता, रामाने गौतम ऋषींची समजूत काढून अहिल्येला क्षमा करायला लावलं. परित्यक्तेचं जीवन जगणाऱ्या, "शिळे सम" कठीण आयुष्य जगणाऱ्या अहिल्येला पुन्हा माणसांत आणलं असं वर्णन केलं आहे. सीतेचं अग्निदिव्य आणि सीता भूमीत गडप झाली ह्याचा लावलेला अर्थ फारच पटणारा आणि भावुक करणारा आहे. 

तिसरं म्हणजे राम, लक्ष्मण, सीता, उर्मिला, कैकयी, कौसल्या, दशरथ ह्या व्यक्तिरेखांच्या मनात काय चाललं असेल ह्याचा वेध घेतला आहे. राम म्हणजे सत्यनिष्ठ आणि न्यायप्रिय हे चित्र आपल्या डोळ्यासमोर असतं. पण सत्य काय किंवा योग्य काय हे जेव्हा परिस्थितीवर अवलंबून असेल तेव्हा रामाने जे निर्णय घेतले ते लक्ष्मणाला, सीतेला पटले असतील का? "नियमांवरवर बोट ठेवून", केवळ "शाब्दिक अर्थ घेऊन" स्वतःला त्रास करून घेणे म्हणजेच सत्यप्रियता का? हा प्रश्न पूर्ण कादंबरीभर आहे. अहिल्येला क्षमा मिळवून देणारा राम राजा झाल्यावर मात्र सीतेला न केलेल्या पापाची शिक्षा देतो. का ? तर... राजा म्हणून असा त्याग केलेला दाखवणं हे त्याच्या स्वप्रतिमामग्नतेमुळे का ? असा प्रश्न कादंबरी उभी करते. वनवासात सीता जाते पण त्यात होणार त्रास, मातृत्व न मिळण्याचं दुःख, रामाने त्याग केल्यानंतर झालेला संताप, रामाशी संबंध पूर्ण तोडण्याचा तिचा प्रवास ह्यातून एक "माणूस" म्हणून सीता आपल्यासमोर उभी राहते. हे कादंबरीचं बलस्थान. स्त्रीला देवी म्हणून पुजून तिचं माणूसपण झाकोळण्याच्या आपल्या सामाजिक सवयीला हे पुस्तक छेद देतं.

सीता आणि लक्ष्मण ह्यांच्यातील भावनिक नातं हा सुद्धा कादंबरीचा एक समांतर प्रवाह आहे. राम नियमांवर बोट ठेवून वागणारा तर लक्ष्मण सारासार विचार करून प्रॅक्टिकल वागणारा. राम हा पुस्तकी ज्ञानात जास्त रस असलेला तर लक्ष्मण हा शेती, अंगमेहनतीची कामं, कारागिरी ह्याची आवड असणारा असा दाखवला आहे. त्यामुळे सीतेला वनवासात त्याचा आधार असतो. पण "सुवर्णमृगाच्या" प्रसंगात जेव्हा तो रामाला वाचवायला जात नाही तेव्हा सीता त्याच्यावर अश्लाघ्य आरोप करते. त्यामुळे लक्षण दुखावला जातो तो कायमचा. अबोला धरतो. त्यामुळे पुढच्या कितीतरी प्रसंगांत सीता लक्ष्मणाबद्दल इतरांमार्फत कशी चौकशी करते; तिला काय अनुभव येतात असं वर्णन केलं आहे.

काही पाने उदाहरणादाखल
वनवासात सुरुवातीच्या दिवसांत त्रास सहन करताना मनात उठणारे विचारांचे वादळ


वनवासातल्या ब्रहमचर्य व्रतामुळे मातृत्वसुखापासून वंचित झालेल्या सीतेच्या वात्सल्यभावनेबद्दलचा प्रसंग


लवकुशांना घेऊन वाल्मिकी अयोध्येत येतात. सीतेलाही बोलावलं जात. तेव्हा राजसभेत सीता आपलं मन मोकळं करते तेव्हा

आधीच्या प्रसंगात दशरथ-कैकयी ह्यांच्या विवाहाबद्दल उर्मिला सीतेला सांगते


अशी एकूण निवेदनाची रचना आहे. सगळे प्रसंग माहित असले तरी वर लिहिलेल्या तीन बाजूंनी लेखकाला काय वेगळं सांगायचं आहे ह्याची उत्सुकता शेवटच्या पानापर्यंत राहते. एक निराळ्या पद्धतीचं रामायण, "मानवी रामाची कथा" वाचल्याचा साहित्यिक आनंद मिळतो. "असंही घडलं असेल" असा वेगळा दृष्टीकोन मिळतो. तो दृष्टिकोन पटेलच असं नाही पण "छद्म-सेक्युलरां"प्रमाणे लेखकाचा उद्देश राम - सीता - हनुमान ह्या पूज्य आणि धार्मिक श्रद्धास्थानांचा अपमान अथवा विडंबन नाही हे आपल्याला अगदी स्पष्ट समजतं. संवेदनशील तरीही तार्किक निवेदन हे लेखकाचं कौशल्य. उगीच नाही भैरप्पा लोकप्रिय लेखक आहेत.

इतर पात्रांमधले संवाद आणि प्रसंग वाचताना मात्र "सास-बहू" मालिका बघत असल्याचा भास मला झाला. म्हणजे कैकयीचं दशरथाशी लग्न झाल्यावर तिने म्हणे कौसल्या-सुमित्रा ह्यांना मिळणाऱ्या सुविधांवर कात्री लावली. त्यांची अगदी हालाखीची परिस्थिती झाली असं वर्णन आहे. रामाने धनुष्य मोडल्यावर लग्न ठरतं. दशरथ मिथिलेला येतात. पण "मुलगी दत्तक आहे, आम्हाला चालणार नाही" असं व्याही म्हणतात. मग पळापळ होते. असं वर्णन आहे. दशरथाचं निधन झालं तेव्हा राम वनवासात नुकताच गेला होता. पण "भारतभेटी"च्या प्रसंगात त्याला दशरथाच्या निधनाची बातमी सांगताना मंत्री सांगतात - सीमा भागात गुंडागर्दी सुरु आहे, स्त्रियांना घराबाहेर पडणं अवघड झालंय, तिजोरीत कर भरणा होत नाहीये. हे असं ! दहा पंधरा दिवसांत !! आपण नेहमी म्हणतो की राम-लक्ष्मण-भरत-शत्रुघ्न हे सगळेच गुणी. गीतरामायणातलं वर्णन राम म्हणजे "हीरकांच्या मेळाव्यात नीलमणी". पण इथे लेखक असं लिहितो की भरत म्हणजे आळशी. राज्यकारभाराची जाण नसलेला. राम वनवासातून परत आले तेव्हा पूर्ण राज्याची वाट लागली होती. ते फार अतिशयोक्त वाटलं. असे बरेच छोटे छोटे प्रसंग आणि संवाद सांगता येतील.

रामायणातले चमत्कार टाळण्याचा प्रकार सुद्धा काही वेळा तितकासा पटत नाही. "सीताहरण" म्हणजे रावणाचे सैनिक सीतेला बांधून घेऊन गेले असं वर्णन आहे. जर ते चालत गेले तर पंचवटी ते लंका किती वेळ लागेल. किती गावं, शहरं वाटेत लागतील. कोणालाच अपहरण झाल्याचं लक्षात येणार नाही का? रावणाने काहीतरी चमत्कार करून तो तिला वायुमार्गाने घेऊन गेला हेच जास्त सयुक्तिक वाटतं. जटायूचा उल्लेख टाळण्यासाठी, शबरीने रामाला अंतर्ज्ञानाने लंकेबद्दल सांगितलं असा थोडा कमी प्रतीचा चमत्कार घेतला आहे. युद्ध चाललं आहे त्याचा आवाज, बाणांचा आवाज सीतेला ऐकू येत होता असं लिहिलं आहे. युद्ध लंकेच्या वेशीवर झालं असेल की गावात ? रावण सीतेला वश करायचा प्रयत्न करतो , बळजबरी करत नाही. असं का ? ह्याचं पौराणिक उत्तर रावणाला मिळालेला शाप असं आहे. पण पुस्तकात तार्किक उत्तर नाही.

वनवासात किंवा नंतरही सीता रामाशी कधीच मोकळेपणाने बोलली नसेल का? सीतेच्या शुद्धतेबद्दल चर्चा होते आहे हे तिला समजलं नसेल का ? त्याबद्दल तिने रामाशी सल्लामसलत केली नसेल का? कादंबरीत संपूर्ण रामायणातले प्रसंग सांगण्यापेक्षा सीतेच्या भावनांवरचे प्रसंग अजून जास्त घेता आले असते का ? असे पण प्रश्न मनात आले.

ही अनुवादित कादंबरी आहे. उमाताई म्हणजे अनुवादाचा मापदंड. अनुवादाच्या दर्जाबद्दल मी लिहिणं म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेणं होईल. भैरप्पा-उमाताई ही जोडी प्रसिद्धच आहे. रामाला सेतू बांधून सीतेपर्यंत नेण्यात सिंहाचा वाटा असणाऱ्या हनुमानाप्रमाणे भैरप्पांना अनुवादसेतू बांधून देऊन मराठी वाचकांपर्यंत पोचवण्याचं काम करणाऱ्या उमाताई. म्हणून गमतीने माझ्या डोक्यात असं आलं की हनुमान म्हणजे "रामचंद्र के काज सवांरे" तसं, भैरप्पांच्या साहित्यिक कामाबद्दल उमाताई म्हणजे "भैरप्पा के काज सवांरे" !!

मानवी रामायण, सीतेच्या दृष्टीने रामायण वाचण्यासाठी हे पुस्तक वाचा. विचारला नक्की खाद्य मिळेल. "हरी अनंत हरिकथा अनंत"चा अनुभव घ्या.

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

The bridges of Madison county (द ब्रिजेस ऑफ मॅडिसन काऊंटी)



पुस्तक - The bridges of Madison county (द ब्रिजेस ऑफ मॅडिसन काऊंटी)
लेखक - Robert James Waller (रॉबर्ट जेम्स वॉलर)
भाषा - English (इंग्रजी)
पाने - १७१
प्रकाशन - पेंग्विन रँडम हाऊस, १९९२
छापील किंमत - रु. ५५०/-
ISBN - 978-0-099-42134-4

ही एक गाजलेली इंग्रजी कादंबरी आहे. गोष्ट अशी आहे की रॉबर्ट किंकेड हा एक मध्यमवयीन छायाचित्रकार नॅशनल जियपोग्राफिक सारख्या मासिकांसाठी निसर्ग छायाचित्रणाचे काम करतो आहे. त्यासाठी तो जगभर फिरतो आहे. सतत फिरणं, निसर्ग बघणं , फोटो काढणं हेच त्याचं आयुष्य आहे. जणू वेगळ्या प्रकारच्या "भटक्या जमतीतला"च एक सदस्य. अमेरिकेतल्या "मॅडिसन काऊंटी " भागातल्या वैशिष्ट्यपूर्ण पुलांवर स्टोरी करण्यासाठी तो आला आहे. अनोळखी भागात रस्त्याची चौकशी करताना त्याची अनपेक्षित गाठ पडते एका घरातल्या मध्यमवयीन विवाहितेशी -फ्रान्सिस्काशी. नजरानजरेतून, जुजबी बोलण्यातून त्यांना एकमेकांबद्दल काहीतरी वेगळं आकर्षण वाटतं. दोघेही मध्यमवयीन. फ्रान्सिस्का विवाहित, दोन मुलांची आई. तर रॉबर्ट घटस्फोटित. मग पुढे काय होतं ? त्यांची ओळख वाढते का ? एकेमेकांना भेटतात का ? प्रेमात पडतात का ? भेटत राहतात का ? मग घरच्यांचं काय ? लोक काय म्हणाले असतील ? हे सगळं जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचावं लागेल.

कादंबरीचे कथानक अगदी लहान आणि सोपे आहे. पण ज्या पद्धतीने प्रसंग रंगवले आहेत, व्यक्तीचित्रणे रंगवली आहेत त्यातून कादंबरी आकर्षक आणि वाचनीय झाली आहे. रॉबर्ट कसा आहे, फ्रान्सिस्का कशी आहे, ते तसं का वागले, त्यांनी तसेच निर्णय का घेतले हे आपल्याला पटतं, आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. भारतीय कुटुंबव्यवस्थेत अशा दोन व्यक्तींचा संबंध म्हणजे व्यभिचारच. ग्रामीण अमेरिकन समाजातही तो तसाच समाजला गेला असेल असंच पुस्तक वाचून जाणवतं. तरीही भारतापेक्षा अमेरिकेत लोकांनी ते लवकर पचवलं असतं किंवा लवकर विस्मृतीत गेलं असतं. त्यामुळे हे कथानक तिथेच घडू शकेल आणि तिकडेच शोभेल.

पुस्तकाची कथन शैली वेगळी आहे. आधी लेखिका थेट आपल्याशी बोलते की तिला हे प्रसंग कसे कळले. मग ती रॉबर्टचं आयुष्य सांगायला लागते. त्याचं व्यक्तिमत्त्व पूर्ण उभं राहतं. प्रसंग घडत घडत रॉबर्ट मॅडिसन काऊंटी पर्यंत येतो. तिथून फ्रान्सिस्का चे आजचे जीवन. तिच्या जीवनातल्या आठवणींतून, पूर्व दृश्यांतून रॉबर्ट-फ्रान्सिस्का ची भेट उलगडते. पुढे काय झालं असेल ह्याची उत्कंठा वाढते. पुढच्या काही पानांत ते वर्णन येत. पण पुस्तक तिथे थांबत नाही. तर, ही खाजगी गोष्ट लेखिकेला कशी कळली ह्याचे उपकथानक जे पुस्तकाच्या सुरुवातीला आलं होतं त्याचा पूर्वार्ध येतो. अशी ही काळात पुढे-मागे जाणारी तरी गोंधळात न टाकणारी शैली आहे. रॉबर्टच्या फोटो काढण्याच्या प्रसंगांचं अतिशय तपशीलवार वर्णन आहे. कुठली लेन्स वापरली, कसा अँगल लावला, हालचाली कशा केल्या ह्यातून अस्सल प्रसंग आपल्याला दिसतो. त्यांच्या भेटीचे, प्रेमाचे, विरहाचे भावपूर्ण चित्रण आहे. कुठेही बटबटीतपणा न आणता. हे बहुतांश वाचकांना आवडलं असणार म्हणून ही कादंबरी "बहुखपाची"/"बेस्ट सेलर" झाली असणार. कदंबरीवर हॉलिवूड चित्रपट सुद्धा आला आहे.

पुस्तकाची काही पाने वाचून बघा म्हणजे अजून नीट कल्पना येईल

रॉबर्ट पुलाचे फोटो काढतो तेव्हाचे वर्णन



फ्रान्सिस्का रॉबर्टचे स्वागत घरी करते. आकर्षण वाढू लागते आहे. ते एकमेकांबरोबर घरात नृत्य करतात.



त्यांचं छायाचित्रणाचं काम संपल्यावर त्याला निघावं लागतं. निरोपाचा, पुन्हा भेटण्याचं ठरवण्याचा प्रसंग.



तुम्हाला सुद्धा प्रेमकहाण्या वाचायला आवडत असतील तर ही कादंबरी आवडेल.



——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

अंतर्नाद - एका मासिकाचा उदयास्त (Antarnad - Eka masikacha udayast)



पुस्तक - अंतर्नाद - एका मासिकाचा उदयास्त (Antarnad - Eka masikacha udayast)
लेखक - भानू काळे (Bhanu Kale)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - २७२
प्रकाशन - मौज प्रकाशन. फेब्रुवारी २०२४
ISBN - 978-93-5079-073-1
छापील किंमत - रु. ५००/-

पुस्तकप्रेमी, साहित्यप्रेमी वाचकांनी "अंतर्नाद" नावाचं मासिक कधी ना कधी नक्कीच वाचलं असेल. त्याचा दिवाळी अंक वाचला असेल. बरेच जण त्याचे पूर्वी नियमित वाचकही असतील. १९९५ ते २०१९ इतका काळ हे मासिक सुरु होतं. ह्या मासिकाचे संस्थापक, संपादक आणि सर्वेसर्वा भानू काळे आहेत. त्यांनी ह्या मासिकाची जन्मकहाणी, वाढ, विस्तार, संघर्ष आणि अपरिहार्य शेवट हे सगळे टप्पे ह्या पुस्तकातून आपल्यासमोर उलगडले आहेत. त्यावेळचे अनुभव, इतर व्यक्तींचा सहभाग, मान्यवरानाचे सहकार्य व मार्गदर्शन, मासिकाने केलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांमागच्या प्रेरणा, मिळालेला प्रतिसाद आणि त्याचा साहित्यसृष्टीवर झालेला परिणाम हे सगळं पुस्तकात आहे. एकूणच "अंतर्नाद" मासिकाच्या आयुष्याचं हे डॉक्युमेंटेशन आहे. पण हे डॉक्युमेंटेशन आपोआपच १९९५ ते २०१९ ह्या कालावधीतल्या बदलत्या मराठी समाजाचं, बदलत्या/घसरत्या वाचन संस्कृतीचं आणि एकूणच घसरत्या संस्कृतिकतेचं डॉक्युमेंटेशनसुद्धा आहे. त्यामुळे भले तुम्ही "अंतर्नाद" चे वाचक असा नसा; ह्या अनुभवांशी तुम्ही स्वतःला जोडून घेऊ शकता.

"अंतर्नाद" मासिक सुरू झालं त्या आधीच्या काळात चांगली मराठी नियतकालिकं बंद पडत होती. तरी स्वतः लेखक असणाऱ्या आणि मुद्रण व्यवसायात असणाऱ्या भानू काळे ह्यांनी एक नवं मासिक सुरु करायचा निर्णय घेतला. मुद्रण व्यवसाय बंद करून, मुंबईहुन पुण्याला स्थलांतर करून पूर्ण वेळाचा व्यवसाय मासिकाचा म्हणून स्वीकार केला. त्यापूर्वी त्यांनी ह्या क्षेत्रातल्या अनेकांशी संपर्क साधून आपला मनोदय कळवला. हे काम आर्थिकदृष्ट्या अव्यवहार्य ठरू शकेल, लोकांचा प्रतिसाद मिळेल की नाही ह्याबद्दल अनेकांनी त्यांना सावध केलं. तरीही स्वतःवर विश्वास ठेवून, स्वतःच्या कल्पना घेऊन त्यांनी मासिक सुरु केलं. ह्या टप्प्याबद्दल सविस्तर वर्णन पुस्तकात आलं आहे.

मासिक चालवायचं ते दर्जेदार साहित्य लोकांसमोर यावं म्हणून. तसंच नवोदितांना व्यासपीठही मिळावं म्हणून. मासिकात साहित्याची निवड कशी केली, लेखकांशी संपर्क कसा साधला, त्याचे वेगवेगळे अनुभव पुस्तकात आहेत. वैचारिक आणि दीर्घ लेख "अंतर्नाद" मध्ये प्रकाशित होत. पुढे त्यातल्या काही लेखसंग्रहांची पुस्तकं सुद्धा प्रकाशित झाली. अंतर्नाद ने आपल्या वाचकवर्गाची पसंती मिळवली होती.

लिखाणाचा दर्जा हे जसे मासिकाचे वैशिट्य होते तसेच त्याचे सादरीकरण सुद्धा सुयोग्य दर्जाचे असावे ह्यासाठी त्यांनी केलेल्या महेनतीबद्दल सुद्धा सविस्तर लिहिले आहे.

मासिकातल्या लिखाणात अचूकता यावी ह्यासाठी खास काळजी घेतली जायची. यास्मिन शेख ह्या मराठी भाषा विदुषीचे सहकार्य त्यांना लाभले. स्वतः श्री. काळे ह्यांचे मजकूर तपासणीकडे लक्ष होते. मुखपृष्ठासाठी प्रसिद्ध कलावंतांची चित्र मिळवली. "रवींद्रनाथ विशेषांक", कालिदास विशेषांक", "शेक्सपियर विशेषांक" कसे तयार झाले ते अनुभव पुस्तकात आहेत. नवीन लेखक कवी तयार व्हावेत ह्यासाठी कथालेखन स्पर्धा राबवल्या होत्या. वाचन वाढावे ह्यासाठी मासिकातल्या लेखनावर आधारित खुल्या लेखन स्पर्धा घेण्यात आल्या. त्याची माहिती पुस्तकात आहे.

वरचे सगळे मुद्दे वाचताना फार छान छान, यशस्वी, सकारात्मक असं वाटत असेल. पण तसं नव्हतं. पूर्ण पुस्तकभर ह्या अनुभव कथनाला एक विषण्णतेचे, हतबलतेचे, संघर्षाचे पार्श्वसंगीत आहे. कारण प्रत्येक महिन्याचा अंक, प्रत्यके दिवाळी अंक, प्रत्येक उपक्रम हा एक संघर्ष होता. वर्गणीदार वाढवायचा संघर्ष. अंकासाठी जाहिराती मिळवण्यासाठी संघर्ष. "दिवाळी अंकांपेक्षा दिवाळीच्या फटाक्यांचा खप जास्त होतो. तुम्हाला जाहिराती देऊन काय फायदा" असा बाजाराचा सूर. राजकीय वाद टाळले तरी मासिकातल्या मजकुरावर होणारी नाहक टीका. डावे-उजवे-भांडवलशाहीवादी-समाजवादी अशी कुठलीही एक भूमिका घेतली नाही त्यामुळे कुठलाच "हक्काचा मतदारसंघ" तयार झाला नाही अशी स्थिती. वाढता निर्मिती खर्च. छपाईसाठी कागद मिळवणे, टपालाने अंक पाठवणे ह्या नियमित गोष्टीसुद्धा त्रासदायकच होत्या. अंक पोचला नाही तर पुन्हा पाठवा. येणी वसूल करा. देणी वेळेत द्या. एक ना दोन बारा भानगडी. पुस्तकात हे सगळं वाचताना मासिक चालवायचं म्हणजे, पुलंच्या रावसाहेबांच्या भाषेत "सोपं काम काय हो ते? पीडाच की ती !" असाच भाव माझ्या मनात आला.

श्री. काळे ही सगळी पीडा सहन करत होते ते समाजाची संस्कृतिक समृद्धी वाढावी ह्यासाठी. पण तिथेही एकूण निराशाच पदरी येत होती. खालावत जाणाऱ्या लेखनदर्जामुळे अंकाचा दर्जा कसा शाबूत ठेवायचा ह्याची काळजी वाढत होती. तरुण मुलांनी वाचावं, लिहितं व्हावं ह्यासाठी कॉलेजमध्ये चालवलेल्या उपक्रमांना मिळाला थंड प्रतिसाद. नवी पिढी इंग्रजी माध्यमाकडे वळल्यामुळे मराठी वाचनच मुळात कमी झाले. त्यात टीव्ही, मोबाईल, सोशल मीडिया, व्हॉट्सअप चे जबरदस्त आव्हान उभे राहिले होते. "संपादक संवाद" असा संपादकांचं संगठन बांधायचा प्रयत्न सुद्धा पुढे गेला नाही. प्रत्येक नियतकालिक स्वतंत्रपणे झुंजत राहिलं. ही सगळी आव्हाने पुस्तकात सविस्तरपणे मांडली आहेत. त्या विवेचनातून ही आव्हानं फक्त "अंतर्नाद"ची नाहीत तर भारतीय आणि मराठी समाजाचीच आहेत हे वास्तव अधोरेखित होतं.

लोक वाचत का नाहीत ? न वाचणाऱ्यांचं असं काय नुकसान झालं ? वाचनाने सुसंस्कृतपणा येतो असं म्हटलं तरी जे वाचतात ते तरी खरंच सुसंस्कृतपणे वागतात का ? लेखक, कलावंत ह्यांच्या भ्रष्ट वागण्याचे किस्से ऐकू येतातच ना ? उपयुक्ततावादाच्या जगात, पैशाच्या जगात कथा-कादंबऱ्या-ललित साहित्य ह्यांच्या वाचनाचं त्यातून मिळणाऱ्या आनंदाचं मोल पैशात कसं करायचं? मनोरंजनाच्या थिल्लरपणाला "थोडं डोकं लावायला लावणाऱ्या" सकसतेकडे कसं वळवणार? मराठी ज्ञानभाषा होण्याची लढाई आपण हरलो आहोत हे आपण मान्य करणार का ? मराठी टिकेल का? आणि टिकवायची तरी कशासाठी? असे कितीतरी प्रश्न हे पुस्तक आपल्या मनात उभे करते.
"अंतर्नाद" जात्यात तर आपण सुपात आहोत, नाही का !

"अंतर्नाद"च्या यशापयशात सामाजिक स्थितीचा भाग मोठा असला तरी काळे ह्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, त्यांच्या स्वतःच्या गुणदोषांचा, आवडीनिवडीचा सुद्धा परिणाम निश्चितच होता. त्यादृष्टीने काळे ह्यांनी आत्मपरीक्षण सुद्धा केलं आहे. स्वतःच्या उणीवा स्पष्टपणे मांडल्या आहेत. "अंतर्नाद"ला संस्थात्मक रूप , एका टीमचं रूप देण्यात आलेलं अपयश त्यांनी प्रांजळपणे कबूल केलं आहे. "म्हाताऱ्यांचं मासिक" अशी मासिकाची प्रतिमा तयार झाली त्याला काही अंशी स्वतःचा गंभीर स्वभाव कारणीभूत असावा हेही स्वीकारलं आहे. पुस्तकाने त्यातून समतोल साधला आहे. ह्याच काळात इतर कुठली मासिकं सुरु झाली, वाढली, बंद पडली हे पण थोडक्यात सांगितलं असतं तर नियतकालिकसृष्टीचं चित्र अजून स्पष्ट झालं असतं.

हे पुस्तक वाचतांना मला स्वतःला प्रश्न पडला की मी स्वतः अंतर्नाद किंवा नियतकालिकं किती वाचतो? तर फार क्वचित. मी पुस्तकं भरपूर वाचतो. पण वेगळे वेगळे लेख वाचण्यापेक्षा एक पुस्तक वाचणं भावतं. तसंच आठवड्याला एक लेख असं वर्षभर लेखमाला वाचण्यापेक्षा ती लेखमाला पुस्तक स्वरूपात सलग वाचायला आवडते. वाचकांमधला पण हा पोटभेद ! पुस्तक वाचनालयातून घेऊन वाचन जास्त होतं प्रत्यक्ष विकत घेऊन पुस्तक वाचन कमी होतं. म्हणजे जरी मी एक चांगला, नियमित वाचक असलो तरी नियतकालिकांच्या दृष्टीने उपयुक्त नाही !

आता काही पाने उदाहरणादाखल
अनुक्रमणिका


मासिकासाठी साहित्य निवडीबाबत



वर्गणीदार वाढवण्याची धडपड



"पुस्तक" आणि "वाचन" ह्यांना नवीन तंत्रज्ञानाचे आव्हान ह्याबद्दल चिंतन.




मी ज्या वाचनालयाचा सभासद आहे आणि जिथून मी हे पुस्तक घेतलं आहे त्या "फ्रेंड्स लायब्ररी"च्या पै काकांच्या योगदानाचे योग्य कौतुक पुस्तकात आहे



"डॉक्युमेंटेशन"ची फार सवय नि आवड नसणाऱ्या आपल्या समाजात हे पुस्तक दस्तऐवजीकरण म्हणून वेगळं आहे.

हे पुस्तक वाचल्यावर जाणवलं की प्रतिकूलतेसमोर शरणागतीचं "पांढरं निशाण" न दाखवणारे "काळे" हे एक योद्धाच आहेत. हे युद्ध कठीण आहे. कोणाला ह्या लढाईत उतरायचं असेल तर केवळ भावनेच्या भरात न उतरता सर्व बाजूने कसा विचार करावा लागेल ह्याचं प्रामाणिक दर्शन पुस्तकातून घडेल. लेखक, प्रकाशक, सुजाण वाचक, भाषा-संस्कृती ह्यात रस असणाऱ्या प्रत्येकाला हे चिंतन आवडेल. लेखकाचे विचार सगळेच सगळ्यांना पटतीलच असे नाही किंवा मागे वळून बघताना, "अरे, तुम्ही हे का केलं नाही, ते 
का केलं" असं सुद्धा वाटू शकतं. पण तसं वाटण्याला काही अर्थ नाही. ज्याच्याकडे खरंच काही प्लॅन आहे त्याने ह्या लढाईत उतरावं आणि करून दाखवावं. 

भानू काळे ह्यांच्या कष्टाला प्रणाम !




——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

डॅडी लॉंगलेग्ज (Daddy LongLegs )





पुस्तक - डॅडी लॉंगलेग्ज (Daddy LongLegs )
लेखिका - जीन वेब्स्टर (Jean Webster)
भाषा - मराठी (Marati)
मूळ पुस्तकाची भाषा - इंग्रजी (English)
अनुवादिका - सरोज देशपांडे (Saroj Deshpande)
पाने - १४३
प्रकाशन - राजहंस प्रकाशन, २००८
मूळ पुस्तक प्रकाशन - १९१२
छापील किंमत - रु. १२०/-
ISBN - 978-81-7434-407-6

"डॅडी लॉंगलेग्ज" ही एक पत्ररूपात लिहिलेली कादंबरी आहे. एक अठरावर्षीय मुलगी जेरुशा तिची नायिका आहे. ती लहानपणापासून अनाथाश्रमात लहानाची मोठी झाली आहे. आता शाळेचं वय संपलं तरी आयुष्यात पुढे काय करायचं हा प्रश्न तिच्यापुढे, अनाथाश्रमापुढे आहेच. तात्पुरते तरी आश्रमातच राहण्या-जेवण्याबदल्यात आश्रमाचीच सगळी कामं तिने करायची अशी सोय लागली आहे. ती हुशार आहे, थोडी अवखळ आहे. एके दिवशी आश्रमाची संचालिका तिला सांगते की आश्रमाच्या एका विश्वस्तांना तिने लिहिलेला निबंध-विनोदी शैलीतली कथा आवडली. तिच्यात कल्पकता आहे, बुद्धिमत्ता आहे हे त्यांना जाणवलं. कदाचित पुढे ती लेखिका होऊ शकेल असं वाटून पुढे प्रगती करण्यासाठी कॉलेजात पाठवायची तयारी त्यांनी दाखवली आहे. तिच्या कॉलेजचा खर्च तेच करतील. अट एकच तिने तिची प्रगती आणि रोजच्या साध्यासुध्या गोष्टीसुद्धा नियमित पत्रांतून कळवायच्या. जणू आईवडिलांना पत्र लिहितेय अशा. पण त्यांची खरी ओळख तिला सांगितली जाणार नाही. जेरुशा ला हा सुखद धक्काच असतो. पण आपल्याला मदत करणारा हा माणूस कोण ? त्याने आपलं खरं नाव गुप्त का ठेवलं आहे हे तिला काहीच कळत नाही. त्या विश्वस्तांना ती एकदाच दुरून पाठमोरं आणि ओझरतं पाहते. ते मध्यमवयीन आणि लंबूटांग आहेत. एवढंच तिच्या लक्षात येतं.

ती ही संधी मनापासून स्वीकारते. ती पहिल्यांदाच आश्रमाबाहेर खुल्या जगात एकटीने वावरु लागते. पत्र लिहू लागते. "जॉन स्मिथ" हे त्यांचं खोटं नाव तिला आवडत नाही. त्याऐवजी ती त्यांना स्वतःच नाव देते - लंबूटांग म्हणून "डॅडी लॉंगलेग्ज". ह्याच पत्रांतून उलगडतं तिचं मन, तिचा स्वभाव. अनाथाश्रमात वाढलेली, बाहेरच्या जागत वावरायला बुजणारी ती ह्या खुल्या जगाशी कशी जुळवून घेते. कशी मोठी होते हा प्रवास आपल्याला त्या पत्रांतून उलगडतो. आपला हा भूतकाळ लोकांना, मैत्रिणींना कळला तर त्या काय म्हणतील ? हसतील, नाक मुरडतील का सहानुभूतीने वागतील. असं काहीच वाट्याला येऊ नये म्हणून ती काहीतरी कामचलाऊ उत्तरं देऊन वेळ मारून नेते. मुली ज्या विषयांवर गप्पा मारतात त्यातलं काहीच आपल्याला ठाऊक नाही म्हणून अधाश्यासारखी पुस्तकं वाचून काढते. असं ती पत्रांतून कळवते.

पत्रांत दिसते तिचा निखळ स्वभाव. "डॅडी' ने आपली ओळख सांगावी किमान तिला उलट टपाली उत्तर तरी पाठवावं म्हणून ती मधून मधून विनवते, हट्ट करते. तिच्यासाठी "डॅडी' हेच आपलं एकमेव माणूस या ती त्यांना चिडून पण पत्र लिहिते. पण पुढच्या पत्रात तिची चूक दुरुस्त करते "डॅडी'ने दिलेल्या मदतीमुळे तिला नवीन अनुभव घ्यायला मिळतायत ह्याबद्दल ती कृतज्ञता व्यक्त करते. तर कधी मी तुमचे उपकार - पैसे तरी - परत करीन अशी प्रौढ भूमिका पण घेते. परीक्षेत नापास झाले हे मजेत सांगते; पण पुढच्यावेळी असं होणार नाही असा प्रेमळ वायदा पण करते. तिच्या कादंबरी लेखनाच्या कथा लेखनाच्या प्रयत्नाबद्दल लिहिते. आणि त्यात आलेलं अपयश, निराशा आणि झालेली रडारड हे पण सांगते. छोट्या छोट्या रेखाचित्रांतून ही पत्र अजून खुलतात. आश्रमातलं एकसुरी आयुष्य, लोकांच्या दयाळू नजरा ह्यांची आठवण जेव्हा जेव्हा होते तेव्हा ती अस्वस्थ होते. पण त्याच अभावग्रस्त आयुष्याच्या अनुभवामुळे आज तिला मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं तिला महत्त्व आहे. त्यामुळे इतर मुलींपेक्षा ती जास्त समाधानी आहे, आनंदी आहे असं पण ती लिहिते.

चार वर्षांचा हा पत्रव्यवहार एका लहान मुलीचा तरुणीत होणारा बदल टिपतो. तिचं ज्ञान, अनुभव, जगण्याबद्दल जाणिवा कशा विकसित होत गेल्या ह्याचा हा प्रवास आहे. हाडामासाच्या माणसासारख्या राग, लोभ, क्रोध, आनंद, उत्सुकता, यश, अपयश, गंमत , धमाल, कंटाळा असे सगळे रंग पत्रांतून दिसतात. त्यामुळे वाचन रंजक होते. पण पुढे पुढे वाचताना असं वाटू लागतं की अशी पत्रे कधी संपणारच नाहीत. आयुष्यभर ती लिहू शकेल. ह्या पुस्तकाला काही तार्किक शेवट असेल का ? आणि असा विचार येऊ लागत असतानाच लेखिका एका अनपेक्षित पण सुंदर वळणार पुस्तकाचा शेवट करते. काय असेल हा शेवट ? "डॅडी" कोण हे तिला कळेल का ? ती लेखिका होईल का ? वयात आलेली पोर कॉलेजात कोणाच्या प्रेमात पडेल का ? अनाथ मुलीच्या आयुष्याचं पुढे काय होईल ? हे सगळं जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचा.

असं हे पुस्तक वाचायला छान आहे. त्यातली काही पानं उदाहरणादाखल वाचा

अगदी सुरुवातीच्या काळातलं पत्र .. डॅडी शी ओळख वाढवताना ... जगाची ओळख वाढवताना



न्यू यॉर्क भेट... इतकी मोठी उडी पहिल्यांदाच



अशानिराशेचा क्षण आणि नवनव्या विचारसरणींशी ओळख




पुस्तकाबद्दल थोडं नेटवर शोधल्यावर माहिती मिळाली की Jean Webster हे लेखिकेचं टोपण नाव आहे. तिचं नाव Alice Jane Chandler Webster. है पुस्तकावर आधारित चित्रपट आणि नाटकं सुद्धा येऊन गेली आहेत. युट्युबवर एक चित्रपट मिळाला https://www.youtube.com/watch?v=xl4qYg7ONak

जेरुशा च्या रूपाने अनाथ मुलीच्या मनात डोकावताना जाणवतं की अशा एखाद्या गरजू व्यक्तीला आपण मदत करतो ही चांगलीच गोष्ट आहे. पण ती हळुवारपणे, त्याचा स्वाभिमान न दुखावता देता आली तर ते सोन्याहून पिवळं. आणि दुसरी गोष्ट अधोरेखित होतेच, ती म्हणजे आपल्याकडे जे आहे त्याचा पूर्ण आनंद घेणं किती महत्त्वाचं आहे. दोन व्यक्तींची पत्ररूपाने वाढत जाणारी ओळख आणि शेवटचे अनपेक्षित वळण ही लेखनशैली आवडली. सरोज देशपांडे ह्यांनी अगदी ओघवता अनुवाद केला आहे. परीक्षेत "गचकले", "वाग्गंगेला पूर", "नावावर फुली मारून टाकली आहे" अशा सारख्या चपखल वाक्प्रचारांतून भाषेची खुमारी वाढली आहे. त्यामुळे जेरुशा आणि डॅडी दोघंही अमेरिकेतले मराठीच असतील असं वाटतं.

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

ज्युलियस सीझर (Julius Caesar)

पुस्तक - ज्युलियस सीझर (Julius Caesar) लेखक - विल्यम शेक्सपियर (William Shakespeare) अनुवाद - शिरीष सहस्रबुद्धे (Shirish Sahasrabuddhe) भाष...