व्हिटॅमिन्स (Vitamins)




पुस्तक : व्हिटॅमिन्स (Vitamins)
लेखक : अच्युत गोडबोले आणि डॉ. वैदेही लिमये (Achyut Godbole & Dr. Vaidehi Limaye)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : ४४७
ISBN : 978-93-5220-193-8

व्हिटॅमिन अर्थात जीवन्सत्त्वे शरीराच्या वाढीसाठी आणि आरोग्यासाठी आवश्यक असतात...सूर्यप्रकाशातून ड जीवनसत्त्व मिळते, लिंबूवर्गीय फळांतून क जीवनसत्त्व मिळते...जीवनसत्त्वांच्या अभवातून बेरीबेरी, रातांधळेपणा, मुडदूस इ. विकार होतात...हे अगदी सामान्य ज्ञान आहे, जे बहुतेक आपण सगळे शाळा कॉलेजमध्येच शिकलो असू. पण खरंच माणसाला ही अशी जीवनसत्त्व आहेत हे कसं कळलं? त्यांना ही नावं कशी पडली? अमुक एका पदार्थात अमुक जीवनसत्त्व मिळतं हे कोणी आणि कसं शोधलं? हे शोधणं इतकं सोपं होतं का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्या अभ्यासक्रमात नव्हती. त्यामुळे माझ्यासारखे जे वैद्यकीय क्षेत्रात नाहीत त्यांना हे सगळं माहीत नसेल.
पण गोडबोले-लिमये जोडीने आपल्यासाठी माहितीचा सागर ढवळून त्याचं सार साडेचारशे पानी पुस्तकात आपल्यासमोर मांडलं आहे. जीवन्सत्त्वांच्या शोधांची अद्भुतरम्य कहाणी आपल्या समोर उलगडली आहे.

अच्युत गोडबोले हे सुपरिचित आहेतच. तरीही दोन्ही लेखकांची पुस्तकात दिलेली ओळख परीक्षणाच्या शेवटी दिली आहे.

अनुक्रमणिका :



दोन शतकांपूर्वी लुई पाश्चर या शास्त्रज्ञाच्या जमान्यात रोगांचं कारण वेगवेगळे जिवाणू(बॅक्टेरिया) असतात हे पाश्चात्त्य जगाला कळलं होतं. त्यामुळे स्कर्व्ही , पेलाग्रा, बेरीबेरी इ. साथीच्या किंवा मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या रोगांचे कारणही काहितरी जीवाणूच असणार अशीच धारणा होती. पण ते जीवाणू शोधण्यात काही यश येत नव्हतं. अश्यावेळी बेरीबेरी, मुडदूस सारखे रोग गरीब समाजात, अस्वच्छ रहणाऱ्या लोकांत न दिसता सुखवस्तू कुटुंबात, शहरांत दिसत होते. आणि काही विशिष्ट पदार्थ खाल्ले की ते बरे होतात हे शास्त्रज्ञांना दिसत होतं. या निरीक्षणांतून असा युक्तीवाद पुढे आला की आहारातच असं काहीतरी महत्त्वाचं आहे की ज्यांचा अभाव या रोगांना कारणीभूत ठरतोय. हे मांडलं गेलं आणि एक नवं दालन उघडलं गेलं.

जगभरातले सामान्य लोक, डॉक्टर आणि पारंपारिक आहाराच्या कल्पना यांच्या देवाणघेवाणीतून, "काय खाल्लं" की रोग बरा होतो याचं ज्ञान मानवजातीला होत होतं. उदा. स्कर्व्ही सारखा रोग समुद्रसफरींवर जाणाऱ्या नाविकांना व्हायचा. कितीतरी वर्षं वेगवेगळे अन्नप्रकार आणि पारंपारिक औषधांचा वापर त्यावर केला जात होता. त्यातून लक्षात आलं की आंबट फळांचा वापर केला की स्कर्व्ही होत नाही. मग सफरींवर जाताना ही फळं न्यायला सुरुवात केली. स्कर्व्ही आटोक्यात येतोय असं वाटताना एकदा फळं नेऊन सुद्धा एकदा खूप स्कर्व्ही झाला. मग लक्षात आलं की लिंबांच्या ऐवजी "लाईम" प्रकारची जास्त आंबट फळं नेली होती आणि त्यांचा उपयोग होत नाही. म्हणजे फक्त आंबट फळं नाही तर विशिष्ट फळंच पाहिजेत, हे समजलं. पुढे फळं साठवायला त्रास होतो म्हणून त्याऐवजी फळांचा रस न्यायला सुरुवात केली. तर स्कर्व्हीने पुन्हा डोकं वर काढलं. लोक मेले. रस गरम केला की त्यातील क जीवनसत्त्व निघून जातं हे आपल्याला माहिती आहे. पण हे माहिती होण्यासाठी कितीतरी लोकांना प्राण गमवावे लागले. देशोदेशी येणाऱ्या अनुभवांतून संपूर्ण मनवजातीच्या ज्ञानात कणाकणाने भर पडत होती. हे सगळं वाचणं रोमांचकारी आहे.

पण अन्नात "काहितरी" आहे इथपासून ते "नक्की काय आहे" हा प्रवास खूप खडतर, काही दशकांचा आणि दोन-तीन पिढ्यांच्या संशोधनाचा परिपाक होता. उंदरांवर(गिनिपिग), कोंबड्यांवर, कुत्र्यांवर आणि शेवटी माणसांवर प्रयोग करून हे शोधायचं होतं. प्रयोगात थोडा जरी फरक पडला तरी निष्कर्ष चुकीचे निघायचे आणि संशोधन भरकटायचं. उंदरांना पाळा, त्यांचे गट करा, प्रत्येक गटाला वेगळा आहार द्या जेणेकरून आहारातला बदल आणि उंदरांतला बदल बघता येईल. मग त्यांची विष्ठा तपासा, डोळे तपास, शवविच्छेदन करा असा किचकट कार्यक्रम होता तो. "अ" जीवनसत्त्वाबद्दलचा हा प्रयोग बघा.
(फोटोंवर क्लिक करून झूम करून वाचा)




या शस्त्रज्ञांनी फक्त मुक्या प्राण्यांवरच प्रयोग केले असं नाही. तर कैद्यांवर, गुलामांवर प्रयोग केले. प्रसंगी स्वतःलाही रोग घडवून आणला आणि प्रयोग केले. उदा. बी-१२ जीवन्सत्त्वावर प्रयोग करताना एका डॉक्टरने काय केलं पहा.
अशी बरीच विलक्षण उदहरणं पुस्तकात आहेत.

पुस्तकात गरज असेल तिथे थोडं खोलात जाऊन विज्ञानही समजावून सांगितलं आहे. ज्यामुळे त्या त्या जीवनसत्त्वाचा परिणाम असाच का होतो हे सुद्धा आपल्याला कळतं. उदा. ब जीवनसत्त्व कसं कम करतं याबद्दल.


वरच्या पानांवरून लक्षात आलं असेलच की विषय किचकट तांत्रिक असला तरी पुस्तकाची भाषा तशी नाही. आपल्याला आवडेल अशीच आहे. त्यामुळे असं पुस्तक अभ्यासक्रमात असतं तर मजा आली असती असं वाटतं. पण तेव्हाच पुस्तकभर अनेक शास्त्रज्ञांची, संस्थांची, ठिकाणांची, रसायनांची नावं येतात आणि ती मात्र लक्षात रहत नाहीत हे जाणवल्यावर परीक्षेत नावं, सनावळ्या विचारल्यवर काय अवस्था झाली असती याचीही भीती वाटते. कही वेळा तेच तेच प्रायोग, तीच तिच निरीक्षणं यांची पुनरावृत्ती होते. कारण वर्षानुवर्षे शास्त्रज्ञ तिथल्या तिथे घुटमळत होते. तो भाग थोडा वरवर वाचला तर कंटाळा टाळून वाचन चालू ठेवता येतं. पुस्तकाच्या शेवटी संदर्भ ग्रंथ, लेख, जर्नल यांची सूची आहे. ही मोठ्ठी जंत्री बघून लेखकद्वयींच्या मेहनतीला मी सादर प्रणाम केला.

या पुस्तकाच्या वाचनातून वैज्ञनिक इतिहास कळतोच. पण आपल्या अन्नाकडे डोळसपणे बघायची निकड निर्माण होते. कृत्रिम अन्न किंवा पूरकदार्थांची (सप्लिमेंट्स) कितीही जाहिरात केली तरी नैसर्गिक पूर्णान्नातले काहिना काही घटक त्यात यायचे राहणारच, हे जाणवेल. प्रक्रिया केलेलं अन्न (प्रोसेस्ड फूड) खायला छान लागतं पण त्यात आवश्यक अन्नघटक निघून गेलेले असतात हे आपल्याला माहिती आहे तरी त्याची पुन्हा एकदा आठवण हे पुस्तक करून देईल. आज आपण जो आहारशास्त्राबद्दलचा टप्पा गाठला आहे त्यासाठी ज्ञात-अज्ञात शस्त्रज्ञांचे आपण किती ऋणी असलं पाहिजे हे जाणवेल.

आजही देशोदेशी रोग-विकार आहेत, संशोधन चालूच आहे. आजचे काही समज उद्या चुकीचे ठरतील, काहींची पुष्टी होईल, काही गोष्टी नव्याने कळतील. कुणी सांगावं सूर्यप्रकाशामुळे शरीरात ड जीवनसत्त्व तयार होतं तसं चंद्रप्रकाशामुळे "च" जीवनसत्त्व तयार होतं आणि ते मेंदूच्या निकोप वाढीसाठी आवश्यक आहे असा शोध लागेल. अजून ५० वर्षांनी जेव्हा इतिहासात आजच्या दिवसांबद्दल लिहिलं जाईल तेव्हा ते वाचक म्हणतील, "बापरे, कसे दिवस होते तेव्हा. जगभर लोक कसं काय असं वेड्यासारखे वागायचे, चंद्रप्रकाश न घेता घरी चक्क झोपायचे". ज्ञान-अज्ञानाच्या या झोक्यांचा अनुभव घ्यायला हे पुस्तक वाचाच.



----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
----------------------------------------------------------------------------------




----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
---------------------------------------------------------------------------------

लेखकांची पुस्तकात दिलेली ओळख:




The TCS Story & Beyond (द टीसीएस स्टोरी अ‍ॅंड बियॉंड)




पुस्तक : The TCS Story & Beyond (द टीसीएस स्टोरी अ‍ॅंड बियॉंड)
लेखक : S. Ramadorai ( एस. रामदुरै)
भाषा : English (इंग्रजी)
पाने : २८७
ISBN : 978-0-143-41966-2

माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची भारतात पायाभरणी करणाऱ्या, वटवृक्षापणे फोफावून महत्त्वाची आयटी कंपनी ठरलेल्या टाटा कन्सल्टिंग सर्विसेस (टीसीएस) कंपनीचा हा इतिहास आहे. टीसीएसचे माजी सीईओ एस. रामदुरै यांनी हा इतिहास शब्दबद्ध केला आहे. 

अनुक्रमणिका :



टाटा समूह नेहमीच भारतात नवनवीन तंत्रज्ञान आणून भविष्यवेधी पावले उचलण्यात अग्रेसर रहिला आहे. त्याचप्रमाणे १९६०च्या दशकात टाटासमूहातील कर्नल सोहनी (Colonel Sawhney) यांनी कंपनीच्या आतली व्यवस्था सुलभ करण्यासाठी तेव्हाच्या संगणक प्रणाली तंत्रज्ञन वापरायची कल्पना पुढे आणली. जे. आर. डीं टाटांच्या गुणग्राहकतेमुळे ती कल्पना स्वीकारली गेली. आणि एका नव्या उद्योगाचे बीज रोवले गेले. 

TCS जन्मली गं TCS सखी जन्मली :
(कालच्या रामनवमीचा परीणाम :) 



पण अनोळखी तंत्रज्ञान, यंत्रांमुळे नोकऱ्या जातील ही भीती, समाजवादी पगड्यामुळे खाजगी उद्योगाकडे अविश्वासाने बघण्याची राजकीय पद्धती, अनिर्बंध निर्बंध (लायसन्स राज) मुळे होणारी दफ्तरदिरंगाई, आधीच महाग असणऱ्या यंत्रांवर दामदुप्पट कर, तुटपुंजे परकीय चलन अशा समस्यांचे पर्वत तेव्हा या बीजापुढे उभे होते. म्हणूनच पुढची दोन दशके संघर्षातच गेली. भारतातल्या या समस्यांमुळे भारतात उच्च शिक्षण घेतेलेल्या हुशार युवकांना तंत्रिक प्रशिक्षण देऊन परदेशात कामाला पाठवण्याचे प्रारूप टीसीएसने स्वीकारले. आपले पाय रोवून स्वतंत्र स्थान निर्माण केले. भारताची ओळख निर्माण केली. टीसीएस च्या पहिल्या काही कर्मचार्यांपैकी एक असणारे रामदुरै निवृत्त होईपर्यंत आणि अजूनही टीसीएसशी संबंधितच राहिले आहेत. त्यामुळे ह्या प्रवासाचे ते भागिदार साक्षिदार आहेत. त्यांच्या तोंडून हा सगळा इतिहास वाचणं रोमहर्षक आहे. कारण "युद्धस्य कथा रम्या"! हो, ही रक्तविहीन क्रांतीच आहे.

लेखकाने आतिशय खोलात जाऊन, तपशिलवार घटना लिहिल्या आहेत पहिला कॉंप्युटर भारतात कसा आला, सरकारी लालफीतशाहीतून संगणक हातात पडणं म्हणजे काय दिव्य होतं ते वाचल्यावरच कळेल. 

पहिला संगणक भारतात आणण्याच्या प्रसूतिवेदना :



पुढे प्रोजेक्ट कसे मिळवले, प्रत्येकाने दिवसरात्र मेहनत करून नवीन तंत्रज्ञान शिकून घेतलं, ग्राहक कंपन्यांचा विश्वास संपादन केला हे लिहिले आहे. टीसीएस वाढायला लागल्यावर कामाचा तोच दर्जा आणि तीच "टाटा नीतीमत्ता" प्रत्येकात असावी यासाठी ट्रेनिंग ची पद्धती सुरू झाली. वाढीबरोबरच "अप्रेजल"ची सिस्टीम मध्ये बदल करावे लागले. कंपनीची कॉंट्रॅक्ट वेगवेगळ्या देशात वाढू लागली. भारतात पुणे, मुंबई, चेन्नई, तिरुवनंतपुरम इ. ठिकाणी कँपस तयार झाली. तिथेही निसर्गस्नेही वातावरण असेल याची काळजी घेतली गेली.

९० च्या दशकात टीसीएसचं "ब्रँडिंग" केलं गेलं. कंपनीच्या नावात बदल करायचा का, पूर्ण नाव वापरायचं का अद्याक्षरं, घोषवाक्य काय असलं पाहिजे यावर कशी चर्चा झाली आणि कंपनीच्या क्षमतांचे योग्य दर्शन होईल असे ब्रॅंडिं कसे झाले हे सविस्तर लिहिलं आहे. वरकरणी साध्या वाटणऱ्या गोष्टीही किती काळजीपूर्वक करायला लागतात हे कळतं. 

टीसीएस हे नाव या उद्योगात सर्वज्ञात आणि सर्वमान्य झाल्यावर पुढचा टप्पा होता आयपीओचा. आत्तापर्यंत टाटा सन्सचा एक विभाग म्हणून काम चालत होतं. आता स्वतःचे समभाग भांडवल बाजारात विकून स्वतंत्र कंपनी स्वरूपात पुढे आली. हा उपक्रम सुद्धा अनेक वर्षांच्या चर्चा, अर्थिक फायदे तोट्याची गणिते, कायदेशीर किचकटपणा यांच्यातून कसा आकाराला आला याची सविस्तर माहिती दिली आहे. असाच किचकट भाग म्हणजे टीसीएसने केलेले दुसऱ्या कंपन्यांचं अधिग्रहण. त्यावरही स्वतंत्र प्रकरण आहे.

टीसीएस भारतातल्या संगणकीकरणाची प्रथम पासून भागिदार किंवा सेवा पुरवठादार कंपनी रहिली आहे. एनएसई सारखी स्टॉक मार्केट, मोठमोठे सरकारी प्रकल्प, समाजोपयोगी सरकारी किंवा सार्वजनिक मालकीच्या कंपन्याची कंत्राटेतीसीएसने मिळवून गरीब, शेतकरी, सर्वसामान्य व्यक्ती यांच्या उत्थानात कसा हातभार लावला आहे. तंत्रज्ञानाची वाटचाल या विकासात कसा हातभार लावू शकेल यावरही स्वत्रंत्र प्रकरणे आहेत.

या सगळ्यात सीईओ म्हणून लेखकाचा मोठा वाटा होता. सीईओ पदावर स्वतःच्या कार्यशैलीबद्दल लेखक लिहितात :



शेवटच्या प्रकरणात रामदुरै यांच्याबरोबर काम केलेल्या व्यक्तींनी त्यांचे आणि रामदुरै यांचे अनुभव सांगितले आहेत. टीसीएसच्या सुरुवातीच्या काळापासून आत्तापर्यंत त्यांनी जणू टीसीएसला वाहून घेतलं होतं. दिवस-रात्र, थकवा, सुट्टी याचा विचार न करता दिलेल्या डेडलाईन पाळण्यासाठी मेहनत करत राहिले. नवनवीन आव्हानं स्विकारत राहिले, आपल्या सहकाऱ्यांनाही त्यासाठी प्रोत्साहित करत राहिले. "..जणू माझं पहिलं लग्न टीसीएसशी झालं" होतं असं रामदुरै यांचं म्हणणं पुस्तकात बरेच वेळा येतं. "जया अंगी मोठेपण तया यातना कठीण" हे प्रत्ययाला येतंच. पण भारतीय "सर्विस बेस्ड" कंपन्या कर्मचाऱ्यांना पिळून घेतात, अमेरिकन "प्रॉडक्ट बेस्ड" कंपन्यांपेक्षा तिथे "वर्क-लाईफ बॅलन्स" वाईट असतो याचं कारण उच्चपदस्थांच्या या मानसिकतेत दिसतं. स्वतःही कामाला जुंपून घेतात आणि दुसऱ्यालाही त्याच चक्रात ओढतात असं वाटतं. 

टीसीएसच्या नंतर सुरू झालेल्या इतर भारतीय कंपन्यांबद्दल- पटणी, इन्फोसीस, विप्रो याबद्दल फर उल्लेख येत नाहीत. त्यांच्याशी स्पर्धा कशी होती हे जाणणंही रोचक ठरलं असतं. टीसीएस "प्रॉडक्ट बेस्ड" का झाली नाही किंवा बाजारात दबदबा निर्माण करेल असे प्रॉडक्ट का तयार करू शकली नाही याबद्दलही काही भाष्य नाही. 

तरीही भूत-भविष्य-वर्तमान अशा तीन्ही काळांना स्पर्षून खूप माहिती आपल्यासमोर मांडणारं हे तीनशे पानी पुस्तक आहे. वाचायला आणि माहिती पचवायला वेळ घेणारं आहे. पण वाचणं गरजेचं आहे.  याची एक संक्षिप्त आवृत्ती पण काढायला पाहिजे. पुस्तकप्रेमी, इतिहासप्रेमी, उद्योगप्रेमी, स्वमदत-पुस्तकप्रेमी, आयटी कर्मचारी सगळ्यांनी हे पुस्तक वाचावं.

----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )
----------------------------------------------------------------------------------




----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
---------------------------------------------------------------------------------

FaceIT (फेसआयटी)




पुस्तक / Title : FaceIT (फेसआयटी)
लेखिका / Author : Smieetaa Dimber (स्मीता डिंबेर)
भाषा / Language : English इंग्रजी
पाने / Page count : १७५
ISBN : 978-93-88644-08-2


Review in English is given after review in Marathi.


"व्यक्ती तितक्या प्रकृती" हे सगळ्यांच्या माहितीचं वाक्य. घरी, शाळा-कॉलेजात, नोकरीच्या ठिकाणी, शेजारी-पाजारी, समाजात, राजकारणात सगळीकडे आपल्याला या वाक्याचा अनुभव येतो. आयटी अर्थात माहिती तंत्रज्ञान(मा.तं.) क्षेत्रही त्याला अपवाद कसं असेल? आयटी क्षेत्रात या प्रकृती कुठल्या रूपात समोर येतात यावर आधारित हे पुस्तक आहे. लेखिका स्वतः मा.तं. क्षेत्राच काम करते.

एका छोट्या आयटी कंपनीत घडणाऱ्या प्रसंगांच्या मलिकेतून लेखिकेने हे नमुने आपल्यासमोर सादर केले आहेत. मनापासून काम करणारे, पाट्या टाकणारे, आपण बरं आपलं काम बरं असं असं म्हणणारे, सगळ्यांच्या चहाड्या करत हिंडणारे, कामाच्या आधारे पुढे जाणारे, मॅनेजरला आतल्या खबरी सांगत बढती पटकावणारे अशा वेगवेगळे नमुने यात दिसतात. 

उदा. बॉसच्या मर्जीतले दोघं इंटरव्यूत कसे वागतात याबद्दल



काही वर्षं अमेरिकेत राहून भारतात परतल्यावर जर आपलं अमेरिकन ज्ञान दाखवण्याची खुमखुमी असणाऱ्यांपैकी एक



पुस्तकात येणारे प्रसंग खूप वेगळे नाहीयेत आपल्या ओळखीचेच आहेत. पुस्तकाची शैली निबंधासारखी आहे. प्रसंगातून व्यक्तीची तिच्या स्वभावाची ओळख न होता लेखिका त्या व्यक्तीच्या स्वभावाची चर्चा आधी करते आणि मग प्रसंग येतात. त्यामुळे प्रसंगात पुढे काय होणार हे साधारण लक्षात येतं. पुस्तकाचा एकूण उद्देश वेगवेगळे स्वभाव किंवा वैचित्र्य दाखवणे असा असल्यामुळे पुस्तकातल्या पात्रांचं बहुअंगी चित्र आपल्या समोर उभं राहत नाही; तर हे श्री. कमचुकार, ही कु. लाळघोटे, हा कु. काम-कमी-गप्पा-जास्त असे मुखवटे समोर येतात. त्यामुळे व्यक्ती चित्रणात जी सहजता अपेक्षित असते ती जाणवत नाही. प्रकरणं वेगवेगळी असली तरी एका प्रसंगातून दुसऱ्या प्रसंगात जाण्याची सांधेजोड चांगली केली आहे.

एकूण हे पुस्तक वाचायला ठीक आहे. आयटी बाहेरच्या वाचकांना कदाचित फार मजा येणार नाही. पण आयटीतल्या लोकांना प्रत्येक प्रसंग वाचताना स्वतःचे तसे अनुभव आठवतील आणि वेगळी मजा येईल.

काही दिवसांपूर्वी यटीवरचं LOSER-Life of software engineer (लूजर - लाईफ ऑफ सॉफ्टवेअर इंजिनियर) - Dipen ambalia (दिपेन अंबालिया) हे पुस्तक वाचलं होतं. खूप छान आहे. आयटीतले लोक आयटीबद्दल लिहायला लागले आहेत हे विशेष कौतुकाचं आहे. दलित साहित्य, कामगार साहित्य, स्त्रीवादी साहित्य, मध्यमवर्गीयांचं जगणं मांडणारं साहित्य अश्या प्रकारांत आत आयटीवाल्यांचं साहित्य या नव्या प्रकाराला हळूहळू सुरुवात होते अहे. त्याला प्रोत्साहन म्हणून आयटीवाल्यांनी तरी हे पुस्तक जमल्यास वाचा. 

लेखिका स्मीता यांनी हे स्वतःहून पुस्तक मला पाठवून माझा अभिप्राय जाणून घ्यायची इच्छा व्यक्त केली. हे माझ्या परीक्षण लिखाणाला एक प्रकारचे प्रोत्साहन आहे. त्याबद्दल त्यांचे आभार. त्यांच्या पुढील लिखाणासाठी, वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.



----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- IT कर्मचाऱ्यांनी 
जवा ( जमल्यास वाचा )
                              इतरांनी वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------




----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
---------------------------------------------------------------------------------

Review in English

Author Smieeta is working in IT industry and in this book she presents us a bouquet of "personalities" in IT. These are not the legends in IT industry but these are the ones who linger in our mind forever. We all have colleagues and friends of different natures. Some work day in day out, some wont even complete 9 hours, some focus on work, some focus on everything but work, some die for onsite, some treat the career like extra curricular activity. The IT company in this book is no exception. Through series of events, she introduces use to different employees of this company and their interactions.

e.g. See what she tells us about a duo, a very close to manager



e.g. How a manager repatriated to India after being in US for few years shows off 




The events in this book are not very different than the ones which we see or hear everyday. Her style of narration is like a serious essay where she explains the traits of the character and then the event follow. So we can sometimes foresee the plot which is bit disappointing. Presentation style should have been subtler and oriented towards feelings of characters. She doesn't peel of the surface layer of these human onions.

Though book is divided into different chapters they are not completely independent stories. The way she has smoothly transitions from one chapter to other, from one incidence to other is commendable. The flow is maintained very well. The language is simple Indian English; but not Hinglish.

Those who are not working in IT may not enjoy the book a lot; but for IT folks, it will remind them their own experiences, friends, colleagues. They will be able to relate it more.

Few days ago I had read LOSER-Life of software engineer (लूजर - लाईफ ऑफ सॉफ्टवेअर इंजिनियर) - Dipen ambalia (दिपेन अंबालिया) I had liked that very much. It is heartening to see that IT folks ("IT wala" in Hinglish ) are writing about life in IT.
In literature, we have different sections like the war stories, stories of downtrodden, feminist literature, stories of middle class, those portraying life of peasants etc. In that list now adds the books portraying life of IT industry. This is a welcome move. 

It was pleasant surprise for me when Smieeta asked if I would like to read and review this book. I treat it as appreciation for my review writing endeavour and thank her for this gesture. 

I think those working IT should read this book and encourage our fellow on her writing journey. I wish her all the best.


चिनीमाती (Chinimati)




पुस्तक : चिनीमाती (Chinimati)
लेखिका : मीना प्रभु (Meena Prabhu)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : ३६२
ISBN : दिलेला नाही

मीना प्रभु यांचं नाव मराठी साहित्यात प्रवासवर्णनांसाठी खूप प्रसिद्ध आहे. यावेळी त्यांचं पुस्तक वाचायचा योग आला. २००० साली त्यांनी चीनला भेट दिली. सर्वसाधारण पर्यटकांसारखे ७-८ दिवसात एक देश न बघता चांगलं दीडेक महिने त्या चीनमध्ये राहिल्या होत्या. एखाद्या पर्यटन कंपनी बरोबर न जाता स्वतः प्रवासाची आखणी करून आपल्या आवडीनं, चवीचवीनं देश बघण्याची त्यांची शैली त्यांनी इथेही सोडली नाही. त्यामुळे बीजिंग, शांघाय, हॉंगकॉंग सारख्या सर्वपरिचित शहरांना भेट दिलीच पण आडवाटेनं जाऊन इतर शहरांना, गावांना भेट दिली. भाषेच्या अडचणींमुळे स्थानिक मार्गदर्शक घेणं क्रमप्राप्त होतंच. त्यांच्या सल्ल्याने त्या त्या ठिकाणचे स्थलदर्शन त्यांनी केलं.

अनुक्रमणिका: 


पुस्तक वाचताना चीनमधले कितीतरी पुरातन राजवाडे, बागा, संग्रहालये, स्तूप, लेणी, मोठमोठाल्या बुद्ध मूर्ती, अशा चीनच्या हजारो वर्षांच्या इतिहासाची आणि संस्कृतीची भेट होते. यांगत्से नदी चीनमधली खूप मोठी नदी. तिच्या काठची पर्यन स्थळं बघत पाच दिवसाच्या जलप्रवास त्यांनी केला. नदी जेव्हा पर्वतांच्या दरीमधून जाते ते "थ्री गॉर्जेस" ठिकाणही त्यांनी बघितलं. निसर्गाने तयार केलेले दगडांचे रान "कुनमिंग" त्यांनी बघितलं. चीन म्हटल्यावर चीनची भिंत, "तिआनामेन स्केवर" हे तर आलेच. थोडक्यात पर्टनासाठी कमी-अधिक प्रसिद्ध असणारी स्थळं त्यांनी बघितली, अनुभवली आणि आपल्या लेखणीतून ती आपल्या समोर उभी केली आहेत. लोकांच्या वागण्याच्या पद्धती, हॉटेलात, रेल्वेत काम करणाऱ्यांच्या तऱ्हाही सांगितल्या आहेत.

रोमँटिक हॉंगझौ चं वर्णन:
(फोटोंवर क्लिक करून झूम करून वाचा)

ज्याच्याकडे वेळ पैसा आहे अशा पर्यटनप्रेमीने देखील हे बघितलं असतं. पण लेखिकेचं वेगळेपण हे अनवट जागी भेट देण्यात आहे. उदा. स्थानिक वाटाड्यांच्या मदतीने त्यांनी तिथल्या शाळा, कॉलेज, विद्यापीठ यांना भेट दिली. तिथल्या सोयी, वातावरण समजून घेतलं. सायकल वरून प्रवास केला. गर्दीचे बाजार, गरीब वस्त्या, मुस्लीम मोहल्ले यांच्यातही हिंडल्या. भाषेची अडचण असूनही रस्त्यावरचे नाना खाद्यपदार्थ खाऊन बघितले. चायनीज मसाज करून घेतला. चायनीज व्यक्तींच्या घरी जाऊन तिथलं वातावरण बघितलं. गर्दीने भरलेल्या बसने प्रवास केला. रेल्वेत जनता क्लासने प्रवास केला. हे सगळं करणं खूप धाडसाचं होतं. तरी त्यांनी हे धाडस केल्यामुळे आपल्याला हे रोमांचक अनुभव वाचायला मिळतायत.

चिनी जेवणाचा हा एक अनुभव:


लेखिकेने फक्त चिनी स्थळांना भेट दिली नाही तर चिनी मनांनाही भेट दिली. त्यांना जे जे चिनी भेटले त्यांच्याशी - त्यांचे वाटाड्ये, रेल्वेतले सहप्रवासी, विद्यापीठातले विद्यार्थी, शाळांतले शिक्षक - अशा सर्वांशी त्यांनी संवाद साधला. बदलता चीन, एकपक्षीय कम्युनिस्ट राजवट, माओच्या काळात झालेली उलथापालथ आणि हिंसा, एक मूल धोरण, परकियांशी संबंध ठेवण्यावरचे निर्बंध अशा ज्वलंत व हळव्या प्रश्नांवर त्यांची मतमतांतरं जाणून घेतली. ही गोष्ट त्यांच्या प्रवासाला वेगळ्याच उंचीवर घेऊन जाते. हे सगळे संवाद वाचकाला नीट समजावेत म्हणून ते ते संदर्भ नीट समजावून सांगितले आहेत. त्यामुळे प्रवास वर्णन वाचताना आपल्यालाही चिंग घराणं, मिंग घराणं, ब्रिटिश-चीनचं अफू युद्ध, रेशीम मार्गाचा विकास, चहाचा इतिहास, माओ ने केलेली क्रांती, सामाजिक क्रांतीच्या नावाखाली पांढरपेशा लोकांचं हत्याकांड, अर्थव्यवस्थेतले उलटसुलट प्रयोग ही सगळी माहिती आपल्याला मिळते. त्यांची दाहकता, परिणामकारकता आणि आजच्या चीनवरचा त्यांचा प्रभाव जाणवतो.

एका वाटाड्याबरोबर झालेली ही गरमागरम चर्चा पहा:



लेखिकेचा प्रवास आणि चीनचा इतिहास दोन्ही जितके रंजक आहेत तितकीच लेखिकेची लेखनशैली सुद्धा. आपणच त्यांच्याबरोबर फिरतोय असं वाटत राहतं अशी दृष्यमय शैली आहे. प्रवासात कधी फसगत होते, सामान हरवतं, वेळ-उशीर होतो, ठरवलेल्या प्लॅनची वाट लागते, भाषेमुळे गोंधळ उडतात या सगळ्या गमतीजमती, फटफिजिती सुद्धा त्या मोकळेपणे लिहितात. उदा. एकदा बोटीवर शांत डेकवर त्या उभ्या असतात. डेकवर बाकी जर्मन प्रवाशंचा गटसुद्धा असतो. अचानक बोटीचा भोंगा जोरात वाजतो आणि त्या दचकतात. त्यांचं दचकणं बघून जर्मन गट हसायला लागतो. तेव्हा त्या म्हणतात, "मला त्यांचा अस्सा राग आला, बरं झालं महायुद्धात हरले ते". लिखाणाच्या या संवादी शैलीमुळे आपण लिहिलेलं वाचतोय असं न वाटता त्यांच्याशीया प्रवासाबद्दल त्यांच्या घरी मोकळेपणे गप्पा मारतोय असंच वाटत राहतं. 

ही एक गंमत वाचा, चिनी मसाजची.

पुस्तकात प्रत्येक प्रकरणाच्या आधी एक कृष्णधवल फोटो आहे. आणि दोन-तीन रंगीत फोटो आहेत. पण प्रत्येक प्रकरणात त्या त्या स्थळाचा फोटो नावासकट दिला असता तर दृष्य डोळ्यासमोर आणायला अजून मदत झाली असती. पुस्तक वाचताना काहीवेळा या ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ नेटवर बघून वाचताना अजून मजा आली.

आपला शेजारी, महासत्ता, पोलादी पडद्याच्या आड असणाऱ्या देशात डोकावण्याची ही संधी सोडू नका.


----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
----------------------------------------------------------------------------------





----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
---------------------------------------------------------------------------------

Listen to me (लिसन टू मी)




पुस्तक : Listen to me (लिसन टू मी)
लेखिका : Shashi Deshpande (शशी देशपांडे )
भाषा : English (इंग्रजी)
पाने : ३७०
ISBN: 978-938-757-8920

इंग्रजी भाषेत लेखन करणार्‍याज्ञानपिठ पुरस्कार प्राप्त लेखिका शशी देशपांडे यांचे हे आत्मचरित्र आहे.


लेखिकेबद्दल :






















अनुक्रमणिका





शशी देशपांडे यांचं साहित्य अजून मी काही वाचलं नाही आहे. त्यांचं नावही ऐकलं नव्हतं. पण नवीन पुस्तकांच्या यादीत हे पुस्तक दिसलं. मोठ्या लेखिका आहेत म्हणून हे पुस्तक हाती घेतलं. पण "साहित्य अकादमी"शी वावडं इथेही सुरू राहिलं. हेही पुस्तक आवडलं नाही. 

बाई असतील मोठ्या पण पुस्तक काही विशेष नाही. त्यांच्या आयुष्यातले प्रसंग खूप रोमांचक, संघर्षाचे, अद्वितीय कर्तृत्वाचे,काही शिकवून जाणारे असे काही वाटले नाहीत. सरधोपट मध्यमवर्गीय जीवन शैली होती, लिहू लागल्या, लिखाणात उमेदवारी केली, प्रसिद्धी मिळत गेली. असा सरळ सोपा मामला वाटला.

पुस्तकाची सुरुवातच आत्मचरित्र का लिहू नये, लिहिण्यातल्या अडचणी, त्रास, का लिहायचं नव्हतं अशा सगळ्या नकारात्मक  गोष्टींनी भरलेलं आहे. पुढे लिखाणातही मला हे आठवत नाही, बहुतेक तसं झालं असेल, नक्की काळवेळ आठवत नाही, लिहायचं नाहीये तरी लिहित्ये अशा वाक्य रचना येतात त्यामुळे अधिकच विरस होतो. त्यांची सांगण्याची पद्धतही कंटाळवाणी वाटली. त्यामुळे हे का वाचतोय असं होऊन शेवटी फक्त फक्त चाळलं.

त्यामुळे तुम्ही शशी देशपांडे यांचे निस्सीम चाहते असाल, किंवा अशा प्रसिद्ध व्यक्तींच्या साध्या साध्या गोष्टी/घटनांतही तुम्हाला कुतूहल वाटत असेल तरच वाचा.

पुस्तकातील पाने :

कादंबरी लिखाणाच्या सुरुवातीबद्दल
(फोटोवर क्लिक करून झूम करून वाचा)





पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याबद्दल






----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------





----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
---------------------------------------------------------------------------------

नर्मदा परिक्रमा एक आनंदयात्रा (Narmada Parikrama Ek Anandayatra)




पुस्तक : नर्मदा परिक्रमा एक आनंदयात्रा (Narmada Parikrama Ek Anandayatra)
लेखक : उदयन्‌ आचार्य (Udayan Acharya)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : ३२४
ISBN : 978-81-937187-4-2

नर्मदा नदी भारताच्या मध्यभागातून वाहणारी महत्त्वाची नदी आहे. मध्यप्रदेशातल्या अमरकंटक जवळ उगम पावून पश्चिम दिशेला वाहत गुजराथ मध्ये भरूच जवळ समुद्राला मिळते. म.प्र. आणि गुजराथेतून मुख्यत्वे वाहताना थोडासा भाग महाराष्ट्रातूनही जातो. खूप मोठ्या भूभागावरच्या मानवी संस्कृतीचा आणि निसर्गाचा आधार ही नदी आहे. सर्वांभूती देव मानणाऱ्या, निसर्गाशी सानुकूल जीवनशैली आणि निसर्गतत्वांबद्दल कृतज्ञता शिकवणाऱ्या भारतीय संस्कृतीत नद्यांना लोकमाता, देवतास्वरूप मानून त्या वंदनीय, पूजनीय आहेत. त्यातही सात महत्त्वाच्या नद्या विशेष पवित्र मानल्या आहेत. 

नर्मदा ही अशी देवतास्वरूप नदी. एखादी देवता म्हटली की तिचे रूप, किती हातांची मूर्ती, वाहन, त्या अनुषंगाने कथा, पुराणे, चमत्कार, आवडते रंग, पदार्थ, उत्सव, उपासना, व्रतवैकल्यं ही सगळी परिसंस्था आपली लोकसंस्कृती निर्माण करते. नर्मदेच्याबाबतीतही हे सगळं आहे. मगर हे तिचं वाहन आहे. ती कुमारिका आहे. नर्मदेची परिक्रमा करणं हा तिच्या उपासनेचा भाग आहे. नर्मदेच्या काठावरून चालायला सुरुवात करायची आणि नदी उजवीकडे ठेवून चालत राहायचं. कुठे नदी ओलांडायची नाही. जिथे समुद्राला मिळते तिथे बोटीतून समुद्रातून जाऊन दुसऱ्या काठावर जायचं आणि चालणं सुरू ठेवायचं. आणि चालायला जिथून सुरुवात केली तिथे पुन्हा पोचून प्रदक्षिणा पूर्ण करायची असं परिक्रमेचं स्वरूप आहे. नर्मदेच्या काठावर अनेक तीर्थस्थळं आहेत, अनेक महान ऋषिमुनींनी, साधूसंतांनी तिच्या काठावर तपश्चर्या केली असल्याने अध्यात्माच्या मार्गावर चालणाऱ्यांना या नदीकाठाचं आणि परिक्रमेचं विशेष महत्त्व आहे. इतकं चालणं हेही मोठंच काम आहेच आणि त्यातही अध्यात्ममार्गावर प्रगतीसाठी, एखाद्या तपश्चर्येप्रमाणे ही परिक्रमा करतात. नेहमीच्या तीर्थयात्रेप्रमाणे स्वतःच्या पैशातून, सुखसोयींनी युक्त अशी यात्रा न करता संन्याशाप्रमाणे रहायचे, जिथे मिळेल तिथे राहायचे, जे लोक देतील ते खायाचे आणि सर्व वेळ नामस्मरण, पूजाअर्चा यात घालवायचा असे हे खडतर व्रत आहे. हजारो वर्षांपासून भारतातले साधक हे व्रत करत आले आहेत. या पुस्तकाचे लेखक उदयन आचार्य यांनी अशी परिक्रमा केली आणि तिचे अनुभव आपल्याला सांगितले आहेत.

परिक्रमेच्या वेळी नर्मदेची आणि निसर्गाची दिसणारी निरनिराळी रूपं, लेखकाला अध्यात्मिक येणारे अनुभव आणि आजूबाजूच्या लोकसंस्कृतीचं दर्शन अशा तीन पातळींवर ही अनुभव गाथा पुढे जाते.

सुरुवातीला लोकसंस्कृतीबद्दल बोलूया. वाचताना आपल्याला दिसते की परिक्रमेच्या मार्गावरच्या सर्व गाव व शहरांत परिक्रमावासींचे आदरातिथ्य करायची संस्कृती रुजलेली आहे. त्यामुळे बहुतेक ठिकाणी या परिक्रमावासींचे छान आदरातिथ्य होते. "महाराज आसन लगाओ" म्हणत स्वागत होते. आणि यजमानाच्या सोयीनुसार खिचडी, डाळ, टिक्कड, गोड पदार्थ असा प्रसाद दिला जातो. उपास असेल तर खिचडी, बटाटे, चिवडा यांची सोय होते. वाटेतले दुकानदार प्रेमाने चहा पाजतात, खाण्यापिण्याचे पदार्थ देतात. वेगवेगळ्या मठांमधून राहण्या-जेवण्याची सोय होते. विशेष म्हणजे जेव्हा वाट अगदी खेड्यापाड्यातून जाते तेव्हा गरीब लोकही आपल्या तुटपुंज्या उत्पन्नातून जमेल तशी सेवा करतात. प्रसंगी स्वतः उपाशी राहून परिक्रमावासींना खायला घालतात. तेही इतक्या आनंदाने, सहजतेने की आपण दिङ्‍मूढ होऊन जातो. असे कितितरी रोमांचक अनुभव यात आहेत.

नर्मदेची नाना तीर्थस्थळे, विशाल पात्रं, हजार छोट्या प्रवाहातून वाहणारे रूप, कुठे निर्मळ पाणी, तर कुठे खडकाळ किनारा अशी रूपे जाता जाता दिसतात. पण यांचं वर्णन खूप सविस्तर नाही. उदयन आचार्य हे काही व्यावसायिक लेखक नसल्यामुळे तसा साहित्यिक ढंग किंवा चित्रमय शैली असा प्रकार नाही. ओझरते उल्लेख होतात इतकेच.
उदा. अस्वलं वाटेत आडवी येतात तो क्षण
(फोटोवर क्लिक करून झूम करून वाचा)


ही सगळी परिक्रमा हे पर्यटन नसल्यामुळे पहिले दोन मुद्दे तसे गौण आहेत तर अध्यात्मिक अनुभव हा मुख्य गाभा आहे. त्या अनुभवांची इथे रेलचेल आहे. दृष्टांत होणे, स्वप्नात दर्शन घडणे, मनात एखादी इच्छा आली की ती लगेच पूर्ण होणे, एखादी व्यक्ती काहितरी सांगून जाते आणि नंतर तिची प्रचिती येणे असे अनुभव पानोपानी भरलेले आहेत. परिक्रमेच्या आधी एकाने त्यांच्याकडे येताना शिवलिंग आणायला सांगितलेलं असतं आणि एका मठात एक साधू महाराज आपणहून त्यांना शिवलिंग देतात, कुणीही न सांगता. एकदा एक साधू महाराज त्यांच्या स्वप्नात येतात. आधी कधीही न पाहिलेले साधू महाराज. ते कोण, काय, काही कळत नाही. आणि दुसऱ्या दिवशी लेखक अनायसे एका मंदिरात पोचतात तर तिथल्या साधूंची मुर्ती अगदी तशीच. जणू काही या साधूंनीच लेखकाला खेचून आणलं. प्रवासात त्यांची स्लीपिंग बॅग खराब होते. बरेच दिवसांनी एका मठात एक आंधळे साधूबाबा जणूकाही अंतर्ज्ञानाने ते ओळखून आपल्या शिष्याकरवी नवीन बॅग पाठवतात. हे सगळे बाह्यानुभव वाचणं कोड्यात टाकणारं आहे. एखाददुसरा अनुभव असता तर फक्त योगायोग म्हणून सोडून देता आलं असतं पण पुन्हा पुन्हा आलेले अनुभव पाहून हे काहितरी वेगळंच आहे हे जाणवतं.
उदा. एका मनकवाड्या साधूचा आलेला अनुभव



या बाह्य अनुभवाप्रमाणेच लेखकाने आपल्या मनात येणाऱ्या भावभावना आणि विकल्प यांचे अगदी प्रामाणिक वर्णन केले आहे. मी खूप मोठा कोणी आहे असा बिलकुल अभिनिवेश ते बाळगत नाहीत. उलट आपण अध्यात्माक्षेत्रात अगदी पहिल्या पायरीवर आहोत, आपले सद्गुरू आणि नर्मदामैया यांच्या कृपेने आपण हे शिवधनुष्य पेलत आहोत हा नम्रभाव पूर्ण पुस्तकभर आहे. जर त्या दिवशी काही चांगलं घडलं, मनात एखादी इच्छा आली आणि ती लगेच पूर्ण झाली की माई तू किती प्रेमळ आहेस, भक्तांचे कसे लाड पुरवते आहेस असा प्रेमळ भाव आहे. कधी खायला नाही मिळाले, राहायची गैरव्यवस्था झाली, अपवादात्मकच पण अपमान झाला तर, माई तू माझी परीक्षा बघते आहेस असा भाव आहे. काहीवेळा खाण्याची, राहण्याची उत्तम व्यवस्था उत्तम झाली की जरा अजून खावं, तिथेच अजून रेंगाळावं असे भाव मनात आले की उदयनजी कातर होतात. मन या सुखासीनतेपासून अजून दूर जात नाहीत, वैराग्यभाव अजूनही पूर्ण जागृत होत नाही म्हणून व्याकूळ होतात. देवीची प्रार्थना करतात. कधी कुणावर चकून रागावले, वेडावाकडा शब्द गेला की अजूनही "अचपळ मन माझे नावरे आवरीता" ही भावना त्यांना उदास करते. त्यांच्या आईची आठवणही त्यांना व्याकूळ करते. साधकाला समस्थिती, स्थितप्रज्ञत्वतेकडे नेण्यासाठी ही परिक्रमा फलदायी कशी ठरत असेल हे आपल्याला यातून कळतं.
उदा. आइस्क्रिम खायला मिळालं तो प्रसंग

पुस्तकात ८ पाने रंगीत फोटो ही आहेत तीर्थस्थळांचे.

तीनशे पानी पुस्तकातून आपणही उदयनजींबरोबर परिक्रमा करतो. पुस्तकाची भाषाही सहज संवादी आहे. पुस्तकाचे स्वरूप रोजनिशीप्रमाणे आहे. त्यामुळे कुठे जेवलो, काय जेवलो, कुठे आंघोळ केली, काय नामस्मरण केलं, कोणाकडे  जेवलो, जेवणात काय काय होतं, वाटेत काय खाल्लं इ. सगळे तपशील दिलेले आहे. यातला काही भाग कापून, द्विरुक्ती टाळून किंवा पुन्हापुन्हा येणारे जेवण्या-राहण्याचे संदर्भ टाळता आले असते तर जास्त रोचक झालं असतं. हे प्रवासवर्णन नाही तरी परिसरवर्णन थोडं वाढवलं असतं तर पुस्तक अजून माहितीपूर्ण झालं असतं.

लेखक, प्रकाशक - मोरया प्रकाशन आणि ज्यांच्या हस्ते प्रकाशन झाले ते सच्चिदानंद शेवडे सगळे डोंबिवलीचे - माझे गाववाले आहेत याचं मला आणि कौतुक (गाड्यासोबत नळ्याची यात्रा :) ). या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यालाही मी गेलो होतो.

परिक्रमेवरचे गो.नि.दांचे कुणा "एकाची भ्रमणगाथा", जगन्नाथ कुंटे यांचं "नर्मदे हर हर", आणि ध्रुव भट्ट यांचं गुजराथी "તત્ત્વમસિ" ही पुस्तके आधी वाचली होती. तरी प्रत्येकाचे अनुभव वेगळे, सांगायचे कथाभाग वेगळे, शैली वेगळी. त्यानुसार हे चौथे पुस्तक असले तरी वेगळेच आहे.


सश्रद्ध लोकांना हे पुस्तक आवडेलच; इतरांनाही हे अनुभवविश्व जाणून घ्यायला आवडेल.

----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा (जमल्यास वाचा)
----------------------------------------------------------------------------------




----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
---------------------------------------------------------------------------------

ग्रंथ स्पंदन (Granth Spandan)

पुस्तक - ग्रंथ स्पंदन (Granth Spandan) लेखक - चन्द्रशेखर टिळक (Chandrashekhar Tilak) भाषा - मराठी (Marathi) पाने - १८४ प्रकाशन - ऑगस्ट २०२६...