वर्दीतल्या माणसाच्या नोंदी (Vardeetalya manasachya nondi)



पुस्तक - वर्दीतल्या माणसाच्या नोंदी (Vardeetalya manasachya nondi)
लेखक - सदानंद दाते (Sadanand Date)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १४४
प्रकाशन - समकालीन प्रकाशन. डिसेंबर २०२१
छापील किंमत - रु. २००/-
ISBN - 978-93-86622-78-5


"पोलीस" हा शब्द उच्चारल्यावर प्रत्येकाच्या मनात येणारे भाव वेगवेगळे असतील. सगळं नीट सुरु असताना अचानक "पोलीस आले" म्हणजे काहीतरी भानगड झाली असं वाटून भीती वाटेल. वादावादी झालेल्या, तक्रार झालेल्या ठिकाणी पोलीस आले की आता पापभिरू माणसाच्या मागेच नक्की लचांड लागणार; पंचनामा, साक्ष ह्यासाठी पोलीस स्टेशनच्या वाऱ्या कराव्या लागणार हे मनात येऊन त्रागा केला जाईल. "आता बघा, वरून फोन आला की नाहीतर पैसे दाबले की गुन्हेगार सुटणार" असा तुच्छतादर्शक स्वर निघेल. पण दंगल, जाळपोळ चालू असताना पोलीस आले की आश्वस्त वाटेल. देशविघातक आंदोलनाच्या वेळी पोलिसांनी लाठीमार, गोळीबार केला की "असंच सडकवलं ह्या लोकांना पाहिजे पोलिसांनी" असं म्हणून कौतुक केलं जाईल. एखाद्या अपहृत मुलाची सुटका केली, चोरटी टोळी पकडली, एन्काउंटर मध्ये गुंडाचा खात्मा केला की "भले शाब्बास, पोलिसांना आता सरळ मोकळा हात दिला पाहिजे" असं म्हणताना आश्वस्त वाटेल. तर नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात पोलीस जवान शहीद किंवा २६/११ च्या हल्ल्यात बलिदान देऊन अतिरेक्यांना थोपवणारे पोलीस दिसले की कृतज्ञतेने डोळे पाणावतील. पोलीस दलाबद्दल भावांनांचे हे कितीतरी रंग. प्रत्येक रंग आपापल्या जागी, आपापल्या वेळी तितकाच खरा. एका "खाकी वर्दी"मुळे आपल्याला इतके रंग दिसतात. तर ती वर्दी प्रत्यक्ष चढवल्यावर किती रंग दिसत असतील ?

खाकी वर्दीच्या आतल्या माणसाने स्वतःकडे बघितलं आणि इतरांनाही बघू दिलं तर काय दिसेल हे मांडणारं पुस्तक आहे - "वर्दीतल्या माणसाच्या नोंदी". पुस्तकाचे लेखक सदानंद दाते हे सध्या राष्ट्रीय तपास संस्थेचे (NIA) सध्याचे प्रमुख आहेत. ते १९९० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत ते ह्या पदावर असतील. त्या आधी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (ATS)चे प्रमुख होते. मुंबईत झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी अतुलनीय शौर्य दाखवले होते. त्याबद्दल त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्र पोलीस दलात अनेक महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केले आहे. सीबीआय मध्ये त्यांनी काम केले आहे. कर्त्यव्यदक्ष, कर्तबगार आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून पोलीस दलात आणि सर्वसामान्य लोकांमध्येही त्यांनी नावलैकिक मिळवलेला आहे.

अशा सदानंद दाते ह्यांनी पोलीस दलातल्या प्रवेशापासून पुस्तक लेखनापर्यंतच्या कालावधीतल्या महत्त्वाच्या अनुभवांबद्दल ह्या पुस्तकात लिहिले आहे. पण हे त्यांचे आत्मचरित्र नाही. गुन्हे शोधांची थरारक कथामाला नाही. पोलीस दलातल्या "आतल्या" खबरा सांगणारे पुस्तक नाही. प्रसिद्ध व्यक्तींची नावे घेऊन, लफडी बाहेर काढून, गौप्यस्फोट करून सनसनाटी निर्माण करणारे पुस्तकही नाही. बराच माल-मसाला हाताशी असूनही स्वयंपाक्याने सात्त्विक थाळी रांधावी तसे पुस्तकाचे सात्विक स्वरूप आहे. सात्विक, पौष्टिक, वैचारिक खाद्य वाचकाला मिळावे हा त्यांचा उद्देश आहे. चांगले - वाईट अनुभव जसे आले तसे गोपनीयतेच्या मर्यादेत राहून त्यांनी लिहिले आहेत. पोलीस दलात प्रवेश करणारा उमेदवार ते एक सक्षम अधिकारी हे जडणघडण कशी होत गेली, व्यक्तिमत्त्व विकास कसा होत गेला हे दाखवलं आहे. स्वतःकडे, पोलिसांकडे आणि व्यवस्थेकडे बघायचा दृष्टिकोन कसा परिपक्व होत गेला हे आपल्याला समजतं.

हे पुस्तक छोट्या छोट्या लेखांचा संग्रह आहे. एकेक मुद्दा घेऊन त्या संबंधीचे महत्त्वाचे प्रसंग, त्यांचे आधीचे विचार, त्यात झालेला बदल, कामाची परिणामकारकता अशा प्रकारे तो मुद्दा स्पष्ट केला आहे. उदा. पोलिसांवर असणारा राजकीय दबाव हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय. त्याबद्दल ते लिहितात ".. अनेकांना असं वाटतं, की पोलीस अधिकाऱ्यांना अनेक वरिष्ठांकडून किंवा राजकारण्यांकडून बेकायदा आदेश दिले जातात, आणि नोकरी टिकवण्यासाठी त्यांना ते पाळावेच लागतात. पण माझे प्रत्यक्ष अनुभव सांगतात की ते आदेश नसून विनंती असते. कारण आपण करायला सांगतोय ते बेकायदा असल्याची जाणीव त्या अधिकाऱ्यालाही असतेच. आपण सौम्यपणे 'हे शक्य नाही' असं सांगितलं तर आपल्यावर चुकीचं काम करण्याची सक्ती कोणीही करू शकत नाही. .... आपल्या शक्तीप्रमाणे आपण आपल्या आसापसाच्या गैरव्यवहारांची साखळी काही प्रमाणात तोडूही शकतो". अशाप्रकारे परिस्थितीचं वस्तुनिष्ठ स्वरूप ते लिहितात.

काही लेखांबद्दल सांगतो.
"पोलीस दलातला प्रवेश", "सुरवातीचे दिवस" - पोलीस दलात IPS अधिकारी म्हणून जॉईन झाल्यावर वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करायला मिळाले. रत्नागिरीला पहिल्याच दिवशी अधिकाऱ्याने थेट भाषणच द्यायला सुरुवात केली. "मोठ्या कामावर लक्ष द्या, दारू जुगाराच्या अड्ड्यांवर धाडी टाकण्यात धन्यता मानू नका ", वगैरे. पण लोकांच्या तक्रारी त्यासंबंधीच येऊ लागल्या. म्हणून कारवाई केली तर सहाव्या दिवशीच बदली ! पुढे विदर्भात नक्षलग्रस्त भागात काम करायला लागले/मिळाले. नक्षलग्रस्त शरण यावेत ह्यासाठी आदिवासींच्या साथीने जनजागृती केली ते अनुभव आहेत. आणि पोलीस भरती करताना स्थानिक राजकारण्याचा दबाव कसा आला हे अनुभव आहेत.

कामाचा भक्कम पाया : वाचन आणि मनन - यशस्वी माणसे भरपूर वाचतात. त्यावर चिंतन करतात. गुण आणि बदल आत्मसात करतात. सदानंद दाते त्या मालिकेतील एक. लहानपणापासून असलेली वाचनाची आवड त्यांनी पोलीस दलातल्या व्यग्र दिनाचर्येतही जोपासली आहे.

विरोधाभासांच्या राजधानीत, झेड सिक्युरिटीच्या अंतरंगात, पोलिसांची परीक्षा - उत्सवी गर्दी - हे सगळे लेख विशिष्ट प्रकारच्या बंदोबस्तावर आधारित आहेत. मुंबई महानगरात ड्युटी करताना, सण उत्सव, बंद, मोर्चे ह्यांना नेहमी तोंड द्यावं लागतं. जातीय दंगली होतात. एकेकडे श्रीमंत वस्ती तर दुसरीकडे अति गरिबी. थोड्या पैशांसाठी गुन्हेगारी करणारे लोक आढळतात. परिस्थती लवकरात लवकर निवळण्यासाठी पोलीस दलाला कुशल काम करावं लागतं. मुंबई दंगल, "मुंबई बंद", झोपडपट्टीवरची कारवाई असे हातघाईचे प्रसंग पुस्तकात आहेत. तत्कालीन उपपंतप्रधान अडवाणींच्या मुंबई दौऱ्याच्या उदाहरणातून अशा VIP दौऱ्यांसाठी प्रत्येक मिनिटाचे प्लँनिंग का आणि कसे करावे लागते हे समजते.

२६/११, फोर्स वनची जडणघडण - २६/११च्या हल्ल्याच्या वेळी दाते स्वतः कामा हॉस्पिटल मध्ये होते. तुटपुंज्या शास्त्रास्त्रांनिशी कसाब आणि इतर अतिरेक्यांना बराच काळ रोखून धरण्याची कामगिरी बजावली. तो प्रसंग त्यांच्या शब्दांतच वाचण्यासारखा आहे. ह्या हल्ल्यानंतर अशा प्रसंगाला तोंड देण्यासाठी विशेष पथक तयार केले गेले. त्यात सामील झालेल्या सदस्यांसाठी ध्येयधोरणे कशी ठरवली, ट्रेनिंग कसे दिले, गुणवत्ता कशी राखली याचे अनुभव सांगितले आहेत.

पुढच्या काही प्रकरणांत पोलीस दलातले चांगले अधिकारी कसे काम करत; त्यांचे वागणे बघून लेखकाने काय शिकवण घेतली हे सांगितले आहे. पोलीस दलातला भ्रष्टाचार त्यांनी नाकारला नाहीये. स्वतःच्या परीने भ्रष्टाचाराचा मुकाबला कसा केला, स्वच्छ वागणे कसे राखले, त्यासाठी कधी वरिष्ठांची नाराजी किंवा बदलीची शिक्षा मिळाली हे अनुभव लिहिले आहेत.

पोलिसांचे काम समाजापर्यंत पोचण्यासाठी पत्रकार, वृत्तपत्रे, दूरदर्शन वाहिन्यांची मदत होते. तर सनसनाटी बातम्या, पेरलेल्या बातम्या, खऱ्या घटनेला चुकीचा रंग देणे ह्याचा त्रासही पोलिसांना होतो. दात्यांनी केलेल्या पोलीस भरतीला असा चुकीचा रंग देऊन बातम्या प्रसारित केल्यावर ते अस्वस्थ झाले. पण ज्येष्ठ पत्रकार अरुण टिकेकर ह्यांच्या सल्ल्याने ह्या बातम्यांना किती महत्व द्यायचं ह्याचं तारतम्य वाढलं.

भ्रष्टाचार भारतीय समाजात अंतर्बाह्य मुरलेला आहे. राजकारणी आणि पोलीस हे त्याच समाजातून येतात म्हणून भ्रष्ट असतात. अशा सामाजिक परिस्थितीत बदल होण्यासाठी काय करावं लागेल; ते किती मोठं कार्य आहे; ह्याबद्दल त्यांचं चिंतन आहे. असा आदर्श समाज निर्माण व्हायला खूप वेळ लागेल. ह्या सामाजिक सत्याचा स्वीकार केला तरच किमान आपल्या हातातल्या गोष्टींमध्ये बदल घडवू शकू असे त्यांचे प्रतिपादन आहे. अशी परिपक्वता येण्यासाठी विपश्यनेचाही उपयोग झाल्याचा उल्लेख आहे. त्यांनी अमेरीकेत जाऊन वर्षभर अभ्यास केला, मग पी.एच.डी . मिळवली. ह्या अभ्यासातून त्यांनी पोलीस व्यवस्थेचे जागतिक भान मिळवले. हे सगळे अनुभव वाचताना कळते की नेहमीच्या पोलीस अधिकारी प्रतिमेपेक्षा ते का आणि कसे वेगळे ठरतायत.

काही पाने उदाहरणादाखल
अनुक्रमणिका


मुंबईतील झोपडपट्टी कारवाई वेळच्या बंदोबस्ताचा अनुभव



वरिष्ठांचा अहंकार दुखावल्यामुळे दिला जाणारा त्रास



पोलीस व्यवस्थेच्या दुरवस्थेबद्दल चिंतन



पोलीस खात्यातल्या स्वतःच्या प्रगतीसह स्वतःच्या मानसिक प्रगतीचा आणि पुढे सामाजिक प्रगतीचा आलेख मांडत हे पुस्तक पूर्ण होते. त्यामुळे हे पुस्तक फक्त वैयक्तिक अनुभवांच्या नोंदी न राहता एकूणच सध्याचा भारतीय समाजाबद्दलच्या नोंदी आहेत. नक्कीच वाचनीय आणि चिंतनीय आहेत. विशेष म्हणजे भाषा अतिशय प्रवाही आहे. प्रत्येक मुद्दा, प्रसंग थोडक्यात पण परिस्थितीची कल्पना येईल इतक्या तपशीलासह मांडला आहे. त्यामुळे कमी पानांतही मोठा आशय आहे.

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

रेडी फॉर टेक ऑफ (Ready for take off)



पुस्तक - रेडी फॉर टेक ऑफ (Ready for take off)
लेखक - सचित जैन (Sachit Jain)
अनुवाद - शुभदा पटवर्धन (Shubhada Patawardhan)
भाषा - मराठी
मूळ पुस्तक - Ready for take off (रेडी फॉर टेक ऑफ)
मूळ पुस्तकाची भाषा - English (इंग्रजी)
पाने - २६१
प्रकाशन - मनोविकास प्रकाशन ऑगस्ट २०१२
छापील किंमत - रुपये २५०/-
ISBN 978- 93-81636-98-5

लहानपणी आपण पंचतंत्र, इसापाच्या गोष्टींमधून कसे वागावे, कसे वागू नये , कसे जगावे याचे धडे शिकत असतो. गोष्टीरुपात सांगितल्यामुळे आपल्याला वाचताना मजा येते आणि त्या गोष्टीचे तात्पर्य मनात उतरते. कुठलाही जड उपदेश असा गोष्टीच्या स्वरूपात किंवा गोष्टीच्या वेष्टनात दिला की तो जास्त सुसह्य होतो हा आपला नेहमीचा अनुभव आहे. याचाच पुढचा प्रकार म्हणजे कथेच्या आडून उपदेश न देता प्रत्यक्ष कथेमध्येच दोन-तीन पात्रांच्या संवादातून एखादी गहन चर्चा घडवून आणली जाते. वाचकाला नीतिनियमांचं थेट शिक्षण दिलं जातं. भारतीय परंपरेमधील रामायण महाभारतासारखे ग्रंथ, संस्कृत काव्य किंवा ऐतिहासिक राजांनी लिहिलेले ग्रंथ बघितले तर दोन पात्रांच्या संवादात वेगवेगळ्या मुद्द्यांवर गहन चर्चा झालेली आढळते. राजाने कसे वागावे, ऋषीमुनींनी कसे वागावे, संसारी माणसाने काय करावे काय टाळावे याची सूत्रे तिथे असतात. अगदी भगवद्गीता हा सुद्धा कृष्ण-अर्जुनाचा संवाद महाभारताच्या मध्ये आहे. भीष्म-युधिष्ठिर संवाद विदुराचे संवाद, रामायणातील वालीचा प्रसंग, रावणाच्या अंतिम वेळचे संवाद यातून वेगवेगळे विषय वाचकांसमोर मांडले आहेत. हीच परंपरा चालवत आधुनिक व्यवस्थापनशास्त्राचे धडे देण्याचे काम सचित जैन यांनी "रेडी फॉर टेक ऑफ" पुस्तकात केले आहे.

ही एक काल्पनिक कादंबरी आहे. पण त्याला लेखकाच्या स्वानुभवाची जोड आहे. पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार स्वतः सचित जैन उच्चविद्याविभूषित आहेत आणि त्यांनी वर्धमान ग्रुप नावाच्या कंपनीत व्यवस्थापन उत्पादन, मार्केटिंग, इ. आर. पी. इम्प्लिमेंटेशनअशा विविध विभागांचे नेतृत्व केले आहे. या स्वानुभवातून त्यांनी एका कंपनीच्या प्रमुखाची कथा आपल्यासमोर मांडली आहे.

या कथेचा नायक अनुराग हा आय आय एम अहमदाबाद मधून एमबीए केलेला, दिल्लीच्या स्टीफन्स कॉलेज मधून अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केलेला आहे. व्यवसायाने इन्व्हेस्टमेंट बँकर. सिटी बँकेसारख्या नावाजलेल्या संस्थेत आर्थिक विश्लेषक, इन्व्हेस्टमेंट सल्लागार, मर्जर - टेक ओव्हर वगैरे करोडोंच्या उलाढाली मध्ये काम करणारा. पण त्याला प्रत्यक्षात एखादी कंपनी चालवण्याचा अनुभव नाही. तशी इच्छाही नाही. त्याची ओळख अरुण सेहगल नावाच्या प्रसिद्ध "टेक ओव्हर टायकून" यांच्याशी झाली आहे. यास हे गल्ली अजंता स्टील नावाची कंपनी विकत घेतली आहे. पूर्वी चांगली चालणारी पण आता व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळे अकार्यक्षमतेमुळे डबघाईला आलेली ही कंपनी चांगली चालवून ती नावारूपाला आणावी असा सेहगल यांचा मानस असतो. त्यासाठी योग्य माणूस म्हणून ते अनुरागची निवड करतात. कंपनी चालवण्यात सर्वस्वी नवखा असणारा अनुराग हो नाही करता करता एकदाची ती जबाबदारी स्वीकारतो. आपलं शिक्षण, इतक्या वर्षांचा अनुभव, जुन्या सहकाऱ्यांचा सल्ला व पत्नीचा सल्ला घेत घेत कंपनीचं नेतृत्व करायला लागतो. कंपनी हळूहळू सुधारू लागते .दीड दोन वर्षातच कंपनी तोट्यातून बाहेर येते आणि पुढे मोठी झेप घेण्यास सिद्ध होते. "रेडी फॉर टेक ऑफ" होते. हा प्रवास आपल्याला कादंबरीत दिसतो.

इथे अनुराग स्वतःच आपली गोष्ट सांगतोय. स्थिरस्थावर झालेल झालेलं करियर आणि लठ्ठ पगाराची नोकरी सोडून अनोळखी भूमिका स्वीकारताना त्याची घालमेल होते. पण सेहगल, त्याची पत्नी ह्यांचा त्याच्यावरचा विश्वास व प्रोत्साहन; स्वतःचं चिंतन यातून शेवटी तो ही जोखीम स्वीकारायला तयार होतो. कंपनीचा प्रमुख म्हणून आता त्याच्याकडे निर्णय घेण्याची शक्ती आहे. जबाबदारी आहे. तो म्हणेल तसं लोक आता वागणार आहेत. त्यामुळे त्याचा प्रत्येक निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. तो सुरुवातीला ही कंपनी नक्की कशी चालते, स्टील उत्पादन कसं होतं हे सगळं आपल्या हाताखालच्या लोकांकडून समजून घेतो. आधीच्या व्यवस्थापनाने कशी कार्यशैली ठेवली आहे हे समजून घेतो. त्यात काय बदल करायला लागतील याची चाचणी करायला लागतो. आय एम मध्ये शिकताना घेतलेला पुस्तकी अनुभव, इतर मित्रांचे सल्ले आणि कंपनीतल्या लोकांची प्रत्यक्ष भेटीगाठी यातून धडपडत तो स्वतःचा मार्ग चोखाळतो. परिस्थिती वरती आपली मांड ठोकतो. हा प्रवास वाचणे रंजक आहे.

प्रसंगाच्या ओघात अनुराग वेगवेगळ्या विभाग प्रमुखांशी चर्चा करतो. कर्मचाऱ्यांशी मीटिंग घेतो. कंपनीत काय चांगलं चालू आहे, काय वेगळं करायला पाहिजे, मॅनेजमेंटची तत्त्व काय, ती कशी अमलात आणता येतील, त्यासाठीची आव्हाने काय अशी सगळी चर्चा होते. ही सगळी चर्चा म्हणजे; सुरुवातीला मी म्हटलं तसं, व्यवस्थापनशास्त्राचे धडे आहेत. एखाद्या कंपनीच्या मिनिट्स ऑफ मीटिंग असाव्यात त्या पद्धतीने मुद्दा क्रमांक एक, मुद्दा क्रमांक दोन, मुद्दा क्रमांक तीन असे मुद्दे क्रमवार मांडले आहेत. मग, "मी असं म्हणालो", "श्री शर्मा असं म्हणाले", "श्री अग्निहोत्री असं म्हणाले" , "अरुणने हा प्रश्न उपस्थित केला"; अशी ती चर्चा शब्दांकित केलेली आहे. अनुराग एखादी कल्पना सांगतो. इतर लोक त्याला प्रश्न विचारतात. असं लिहीत तो तो मुद्दा स्पष्ट केला आहे. अनुरागला जेव्हा एखादा निर्णय घेणे अवघड जातं, काय करावं याबद्दल त्याच्या मनात गोंधळ होतो तेव्हा तो त्याची बायको, त्याची मित्रमंडळी यांच्याबरोबरही बोलतो. ती चर्चाही व्यवस्थापन शास्त्राच्या संकल्पनांभोवतीच घडते. तिथेही पुन्हा मुद्दा क्रमांक एक- दोन - तीन अशा पद्धतीने वर्णन आहे.

अनुरागला दोन मुली आहेत. त्या वयात येण्याच्या बेतात आहेत इतकी वर्षे करिअरच्या मागे धावताना मुलींना द्यायला पुरेसा वेळ मिळालेला नाही. त्याची चुटपुटही त्याला कधी कधी लागते. त्या प्रसंगात व्यवस्थापन शास्त्रातल्या संकल्पना घरगुती वातावरणातही कशा वापरता येतील असा विचार त्याच्या मनात येतो. बायकोशी झालेल्या संवादात तो भाग येतो.

कंपनीचा प्रमुख म्हणून काम करताना आर्थिक आणि तांत्रिक आव्हानांबरोबरच मानसिक आव्हाने कशी असतात हे आपल्या लक्षात येतं. निर्णय घेताना होणारी घालमेल, अनोळखी परिस्थितीत जोखीम उचलताना होणारा त्रास, बॉस म्हणून लोकांशी जाणून-बुजून कठोरपणे कसं वागावं लागतं हे कळतं. "नवा गडी नवं राज्य" या उक्तीप्रमाणे बॉस बदलला की सगळ्या कंपनीचं वातावरण बदलतं, संस्कृती बदलते. लोक काही वेळा ती नाईलाजाने स्वीकारतात पण नंतर त्याचा उपयोग झालेला दिसल्यावर खुशही होतात. कंपनीच्या मालकीत झालेला हा बदल मध्यमस्तरीय आणि अगदी खालच्या कामगारवर्गात कसा झिरपतो हे कादंबरीत दाखवलं आहे.

काही पाने उदाहरणादाखल

अनुक्रमणिका



कंपनीत आणि स्वतःत काय बदल केले ते अनुराग सेहगल ला सांगतो तो प्रसंग



अनुरागची मुलगी सहज सांगून जाते की "मला बॉयफ्रेंड आहे, हल्ली सगळ्यांनाच असतात", तेव्हा त्याचा आणि बायकोचा संवाद




वेळ, श्रम फुकट घालवणाऱ्या मूल्यरहित कामांबद्दलची चर्चा



एकूण कादंबरीची रचना मला आवडली. जिथे थेट शिकवण आहे तिथे सुद्धा ती ललित अंगाने, लोकांच्या भावभावना टिपत मांडल्यामुळे रुक्ष झालेली नाही. वाचायला चांगली वाटते. कंपनी मधल्या फॉर्मल मीटिंगमध्ये अशा पद्धतीने मुद्देसूच चर्चा होणं, लोकांना जबाबदारी देणं, पुनरावलोकन करणं हे सगळं अतिशय नैसर्गिक आहे. त्यामुळे कादंबरीच्या फ्लोमध्ये ते व्यवस्थित बसतं. पण अनुराग आणि त्याची बायको किंवा अनुराग आणि त्याचे मित्र यांच्यातल्या चर्चा सुद्धा मुद्दा एक, मुद्दा दोन, मुद्दा तीन अशा पद्धतीने मांडल्या आहेत ते फारच ओढून ताणून बसवलेलं वाटतं. ते अजून थोडं अप्रत्यक्ष पद्धतीनेच लिहायला हवं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे बॉस म्हणतोय म्हणून लोकांनी त्या निर्णयाची अंमलबजावणी करणं योग्यच आहे. पण इच्छा नसताना जेव्हा काम करावं लागतं तेव्हा त्यात टंगळमंगळ होणं, चुका होणं किंवा कामातल्या अडचणींबद्दल तक्रारी केल्या जाणंही स्वाभाविक आहे. पण पुस्तकात मात्र त्या पैलूचा फार विचार नाही. लोकांना बॉसचं म्हणणं पटतं ते पूर्ण क्षमतेने कामाला लागतात; काही छोटे मोठे बदल करतात आणि झटपट रिझल्ट मिळतात. असं फारच गुडी-गुडी वातावरण आहे. कादंबरीत असा उल्लेख आहे की पूर्वीचे व्यवस्थापन हे कामगारांशी कामगार संघटनेतल्या नेत्यांच्या माध्यमातून बोलायचं. त्यांना टाळून जाणं खूप कठीण आहे असा इशारा विभाग प्रमुख अनुरागला देतात. तरी अनुराग या पद्धतीत बदल करतो आणि थेट कामगारांशी संवाद साधतो. अशावेळी कामगार पुढाऱ्यांमध्ये नाराजी पसरणं; त्यांनी कामगारांना भडकवणं किंवा थेट अनुरागशी वाद घालणं अपेक्षित आहे पण पुस्तकात तसं काही दिसत नाही. सगळं सहजगत्या होतं. व्यवस्थापन शास्त्रातल्या संकल्पना प्रत्यक्ष राबवणं अतिशय सोपं आहे, लोकांच्या मानसिकतेत बदल करणे सोपं आहे असाच आपला समज होईल.

योगायोगाने, मी जिथे काम करतो ती कंपनी सुद्धा दुसऱ्या कंपनीने अधिकग्रहीत केली. त्यामुळे हे पुस्तक वाचताना मी अनुराग च्याजागी आमच्या कंपनीचे नवे व्यवस्थापन आल्यावर त्यांनी पण असाच विचार केला असेल का? असेच निर्णय घेतले असतील का? अशी तुलना करत होतो. आमच्याही नव्या कंपनीप्रमुखाची व्यवस्थापनशैली खूप वेगळी आहे. ती राबवताना मोठ्या प्रमाणावर कामगार कपात करावी लागली. त्यामुळे लोकांच्या मनात कायम धाकधूक असते. दोन वर्षे झाली तरी नव्या संस्कृतीशी जुळून घेताना सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना अडचणी आहेत. अधिग्रहणाची ही बाजू मांडण्यात पुस्तक कमी पडतं. इथे अनुरागचं आत्मनिवेदन असल्यामुळे इतरांच्या भावभावना मांडण्याची मुभा निवेदनाला नाही. त्याऐवजी त्रयस्थ निवेदकाच्या भूमिकेतून पुस्तक लिहिलं असतं तर हा पैलू ही जोरकसपणे मांडता आला असता असं मला वाटलं.

व्यवस्थापन शास्त्राबद्दल ललित प्रकारात लिहिलेलं मराठी पुस्तक दिसत नाहीत. त्यादृष्टीने हा अनुवाद मराठी साहित्यात वेगळी भर टाकतो आहे. शुभदा पटवर्धन ह्यांनी अनुवाद चांगला केला आहे. बहुतेक सर्व तांत्रिक संज्ञा मराठीतूनच लिहिल्या आहेत. पण सध्या तांत्रिक बाबतीत इंग्रजीच्या सवयीमुळे मनातल्या मनात उलट इंग्रजी भाषांतर केलं की ते लगेच लक्षात येतं. त्यात अनुवादिकेचा काही दोष नाही. शक्य तितक्या सोप्या मराठीतच त्यांनी लिहिलं आहे.

असं हे वेगळ्या धाटणीचं पुस्तक वाचून बघा. त्यातली काही तत्वे नवीन असतील तर काहींची उजळणी होईल. व्यवस्थापन विषयक काही वाचायची इच्छा असेल तर हे पुस्तक निवडून बघू शकता.

वर्दीतल्या माणसाच्या नोंदी (Vardeetalya manasachya nondi)

पुस्तक - वर्दीतल्या माणसाच्या नोंदी (Vardeetalya manasachya nondi) लेखक - सदानंद दाते (Sadanand Date) भाषा - मराठी (Marathi) पाने - १४४ प्रक...