अमृतवेल (Amrutvel)




पुस्तक - अमृतवेल (Amrutvel)
लेखक - वि.स. खांडेकर (V. S. Khandekar)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १५०
छापील किंमत - रु. १८०/-
प्रकाशन - मेहता पब्लिशिंग हाऊस. प्रथमावृत्ती १९६७
ISBN - 9788177666281

"अमृतवेल" ही वि.स. खांडेकरांची गाजलेली कादंबरी आहे. जीवनविषयक तत्त्वचिंतन करणारी कादंबरी आहे. माणसाच्या आयुष्यातले दुःख कसे आहे; त्याला कसा प्रतिसाद दिला जातो आणि कसा प्रतिसाद दिला गेला पाहिजे ह्याबद्दल विचार मांडणारं; तेही ललित गोष्टीरूपातून मांडणारं हे पुस्तक आहे.

कादंबरीची नायिका नंदा दुःखात आहे कारण तिचा होणारा पती लग्नाच्या आधीच अपघातात मरण पावला आहे. त्यामुळे ती उद्विग्न झाली आहे. आत्महत्या करावी असे वाटण्याइतपत तिची अवस्था वाईट झाली आहे. ह्या वातावरणातून वेगळ्या वातावरणात गेली तर तिला बरं वाटेल असं मत तिच्या स्नेही आणि कुटुंबीयांचं होतं. आणि अशी संधी चालून येते. तिची कॉलेज मधली मैत्रीण - वसू - आता एका श्रीमंत घराण्याची सून झाली आहे. तिला स्वतःच्या सोबतीला (कम्पॅनियन म्हणून) कोणीतरी हुशार स्वभावाने चांगली अशी महिला सहकारी हवी असते. त्यामुळे नंदा वसू बरोबर तिच्या गावाला जाते. श्रीमंतांची हवेली; नोकरचाकर; मोठी लायब्ररी अशी सगळी सुखं वसूच्या आयुष्यात आहेत. पण वसू सुखी नाही. तिचं आणि तिच्या नवऱ्याचं पटत नाही हे तिला दिसतं. हे असं का होतं आहे आणि आपण वसूला काय मदत करू शकतो ह्याचा शोध घ्यायचा नंदा प्रयत्न करते. तिला सगळ्यांच्या पूर्वायुष्यातल्या घटना कळतात. वसूचं वागणं विक्षिप्त आहे कारण तिच्या नवऱ्याचं वागणं विक्षिप्त आहे. आणि त्याच्या विक्षिप्त वागण्याचं कारण त्याच्या लहानपणी घडलेल्या घटना; एका कुटुंबाची शोकांतिका आहे.

कथानकात पात्रांचे एकमेकांशी संवाद होतातच; पण एकमेकांशी थेट बोलायचा संकोच वाटल्यामुळे पात्रे घरातल्या घरात एकमेकांना दीर्घ पत्रं लिहितात. आपलं मन मोकळं करतात. अशाच जुन्या पत्रांतून पूर्वायुष्यातल्या घटना कळतात आणि नवीन घटना घडतात. पत्रांमधून पात्रे आपापल्या बाजू मांडतात. त्यांच्या वागण्यामागचं तत्त्वज्ञान सांगतात. त्यातून उभी राहते एक साधकबाधक चर्चा. ह्या जगण्याचं ध्येय काय ? माणसाच्या आयुष्यात जी दुःखे येतात त्यांना सामोरे कसे जावे ? पैसा मिळवण्याची इच्छा, आपल्या माणसांची माया मिळावी अशी इच्छा, कामवासना इ. भावना सगळ्यांच्याच ठायी असतात. त्यात चूकही काही नाही. पण माणूस त्यांच्या आहारी गेला तर अधःपतन कसं होतं. हे दिसतं. माणूस स्वतःचीच सुखे उपभोगत राहिला तर शेवटी त्याच्या अतिरेकातून दुःखच प्राप्त होतं. स्वतःची दुःखे कुरवाळत बसूनही दुःखाचं निराकरण होत नाही; उलट उद्वेग वाढतच जातो. हा आयुष्यातला विरोधाभाससुद्धा अधोरेखित केला आहे. आपल्या आजूबाजूच्या लोकांची दुःखे समजून घेऊन त्यांना आधार देत जगलो; आनंद आणि त्रास वाटून घेत जगलो तर हे आयुष्य अधिक हितकर आणि पूर्णत्वाकडे जाणारं असेल हा संदेश त्यातून अधोरेखित होतो.

दीडशे पानी छोटी कादंबरी असली तरी त्यात अनेक प्रसंग घडतात. "तत्वज्ञान चर्चा" काय करायची हे लेखकाने ठरवून त्याबरहुकूम योजलेले प्रसंग आहेत. त्यात सहजता कमी आहे. "हे असं कसं होईल", हा विचार वाचकाच्या मनात वेळोवेळी येईल. पण कादंबरीत कुठलाही प्रसंग जास्त रेंगाळत नाही. त्यामुळे आपण वाचनात गुंगून जातो. प्रसंगांची वर्णनं आटोपशीर तरी परिणामकारक आहेत. एकूण भर तत्त्वचिंतनावर असला तरी ते मांडण्याची लेखकाची शैली विद्वज्जड शब्दांची नाही. "सगळं डोक्यावरून गेलं" असं असं होत नाही किंवा कंटाळवाणं होत नाही. "पत्रांतून संवाद" ह्या स्वरूपामुळे वाद-विवादाच्या फैरी घडतायत असं चित्र शक्यतो नाही. जिथे आहे तिथेही ते फार लांबवलेलं नाही. ती चर्चा वाचकाने आपल्या मनात करावी; "आपलाच वाद आपणाशी" करावा अशी लेखकाची भूमिका असावी. कादंबरीच्या वाचनीयतेत त्यामुळे भरच पडली आहे.

आता काही पाने वाचूया.

लेखकाबद्दल पुस्तकात दिलेली माहिती

प्रियकराच्या निधनाने कोलमडून पडलेल्या नंदाला तिच्या वडिलांनी लिहिलेल्या पत्रातला भाग



नंदा आणि देवदत्त (वसू चा नवरा) ह्यांची ओळख होते तेव्हा



इतरांच्या आयुष्यात घडलेल्या भयानक गोष्टी समजल्यावर, त्यावर विचार केल्यावर नंदाच्या चित्तवृत्तीत झालेला बदल.



ज्यांना अशा गंभीर, तत्वज्ञानात्मक पुस्तकं आवडतात त्यांना नक्कीच आवडेल. इतरांनाही विचारप्रवृत्त करणारं तरीही एक वाचनीय कथानक म्हणून नक्की आवडेल. 


———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

चंद्रमुखी (Chandramukhi)




पुस्तक - चंद्रमुखी (Chandramukhi)
लेखक - विश्वास पाटील (Vishwas Patil)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - ३१५
प्रकाशन - राजहंस प्रकाशन, ऑगस्ट २००४
ISBN - 81-7434290-7
छापील किंमत - रु. २००/-


काही वर्षांपूर्वी मराठी चित्रपट म्हणजे तमाशाप्रधान कथानक असणारे असायचे. हल्लीच्या काळात ते प्रमाण कमी झालं आहे. तरी तमाशाशी संबंधित "नटरंग" आणि "चंद्रमुखी" हे चित्रपट गाजले. त्यातील "चंद्रमुखी" चित्रपट ज्या कादंबरीवर आधारित आहे ते हे पुस्तक. दौलतराव देशमाने हा तरुण आणि कर्तबगार राजकारणी आणि चंद्रमुखी ह्या तमाशा कलावंतिणीच्या प्रेमाची ही गोष्ट आहे.
लेखकाची पुस्तकात दिलेली ओळख
  

गरिबीतून वाढलेल्या पण बुद्धीने हुशार दौलत देशमाने ह्याच्याकडे एका प्रस्थापित राजकारण्याची नजर जाते. त्याच्या गुणांची पारख करून ते त्याला शिक्षणात मदत करून पुढे राजकारणात आणतात. आपला जावईसुद्धा करून घेतात. आता "दौलतराव" हुशार, कर्तबगार, लोकप्रिय असा खासदार आहे. पंतप्रधान "मॅडम"चा अतिशय विश्वासू सहकारी आहे. त्याचा साडू - नानासाहेब - त्याला एकदा तमाशा बघायला घेऊन जातो. खाजगी बैठकीत थोड्याच लोकांसमोर चंद्रमुखी लावणी सादर करते. आणि दौलतला ती पाहिल्या झटक्यात आवडते. मनात घर करते. मुंबईला परत आला तरी ती मनातून जात नाही. आणि मग सुरु होतो दौलत आणि चंद्राचा प्रेमसहवास.

विवाहित, दोन मुलांचा बाप असलेला दौलत एका "तमाशा वालीच्या" प्रेमात पडलाय ही घटना त्याच्या कौटुंबिक आयुष्यात वादळ निर्माण करतेच; आणि राजकीय जीवनातही. आपल्या बायकोला फसवणारा, आणि तमासगीर कलावतीचं शोषण करणारा अशी त्याची प्रतिमा निर्माण करून त्याच्या राजकीय कारकीर्दीला धुळीस मिसळण्याचा डाव विरोधक टाकतात.

हे डाव कोण टाकतं ? सगळ्या आतल्या खबरा कोण देतं? दौलत हे लपवणार का स्वीकारणार ? ह्या डावाचं पुढे काय होतं ? तो पराभूत होतो का ? चंद्राला सोडतो का स्वीकारतो ? का चंद्राच त्याला सोडते ? हे सगळं समजून घेण्यासाठी कादंबरी वाचा.

दौलतचं आयुष्य हा मुख्य धागा असला तरी पुस्तकात एक समांतर धागा आहे तो म्हणजे 'तमाशा कलावंतांचं आयुष्य'. चंद्रमुखी, तिची आई हिराबाई, तमाशा बारीची मालकीण लालन, नाच्या - बत्तासेराव, गायनमास्तर अशी पात्र येतात. त्यांच्या संवादातून तमाशा कलावंताचं आयुष्य, त्यातल्या अडचणी, अगतिकता, लैंगिक शोषण ह्या सगळ्याचं चित्र आपल्यासमोर उभं राहतं. छानचौकीच्या दुनियेत पैसे उडवून अय्याशी करणारे राजकारणी-बिल्डर-अधिकारी दिसतात तसेच अय्याशीच्या अतिरेकापायी भिकेला लागलेले नगही दिसतात. "शृंगारिक"लावणी गाणारी, त्यावर नाचणारी ही कलाकार असते. ती शृंगाराचा आभास निर्माण करणारी कलाकार आहे; शृंगाराची भोगवस्तू नाही अशी मर्यादा जपणाऱ्या स्वाभिमानी कलाकार दिसतात. तर "बारी"त नाचून "ओली बैठक"करून पैसा उधळणारा "मालक" कधी गावेल हे बघणाऱ्या धंदेवाईक नाच्या पण दिसतात. कलाविश्वाचा हा झगमगाट आणि त्या मागचा काळाकुट्ट अंधार कादंबरीला एक सामाजिक कादंबरी सुद्धा करतो.

काही प्रसंग वाचा
चंद्रमुखीची आई हिराबाई जुन्नरकर आणि तरुण चंद्रमुखीचा एक तमाशा प्रसंग




खूप दिवसांनी दौलत चंद्राला भेटायला येतो तेव्हा रुसलेली, लटके रागावलेली चंद्रा ह्यांचा प्रेमसंवाद




दौलतचा नाद सोड, तो मोठा माणूस त्याला आणखी कोणीतरी नटवी भेटेल, शेवटी तो पुरुषच... त्याच्या नदी लागण्यापेक्षा आपण स्वतःचा फड उभा करू असं चंद्राला तिची आई परोपरीने सांगत असते तो प्रसंग.





कादंबरीची मुख्य रूपरेषा तुम्हाला कळली. आता वळूया जरा त्याच्या मांडणीकडे. विश्वास पाटलांच्या "पांगिरा", "झाडाझडती", "महानायक" ह्या मी वाचलेल्या कादंबऱ्या जशा मनाची पकड घेतात, व्यक्तिरेखा मनात ठसतात; संवाद अगदी तसेच घडले असतील असे वाटतात तसे ह्या कादंबरीत होत नाही. कादंबरीची कथा रोचक आहे पण त्यातले प्रसंग, संवाद आणि व्यक्तिचित्रणे प्रभावी नाहीत.

ही कादंबरी नक्की कुठल्या काळात - ९० चे दशक, ८० चे दशक का कधी - हे कळत नाही. एखाद्या व्यक्तीचे तमाशा कलाकारांशी संबंध आहेत हे त्याच्या बायकोला आक्षेपार्ह वाटेल. पण त्यामुळे एक राजकारणी म्हणून प्रतिमाभंजन होईल, इतके बाळबोध आणि सोज्वळ राजकारण भारतात कधी होते ? तो मुख्य मुद्दाच तकलादू वाटतो.

दौलत परदेशात राहून आलेला आहे, तिथल्या मोकळ्या वातावरणात सुंदर बायांकडे बघून पघळला नाही; पण चंद्रमुखीकडे बघून पाघळतो. असं का होतं? केवळ सौंदर्यापेक्षा आणि काही वेगळं कारण असेल असं चित्र सुरुवातीला लेखकाने उभं केलं आहे. पण पुढे मात्र त्याचा पत्ता लागत नाही. सत्शील आणि कर्तबगार दौलत हे प्रेमप्रकरण वेगळ्या प्रकारे हाताळेल असा भास सुरुवातीला होतो. पण नंतर तो ट्रॅक सोडून दौलत पुढे पुढे लफडं लपवणारा पुरुष झाला आहे. बरं, लेखकाला त्या पात्राची ही स्खलशीलता लेखकाला दाखवायची असेल तर दौलतच्या मनात अशी काय उलथापालथ झाली हे काही स्पष्ट होत नाही. चंद्राच्या भावना जितक्या तीव्रतेने आल्या आहेत तितक्या दौलतच्या आल्या नाहीयेत. तमाशा आणि राजकरणी ह्याच्या गुंतागुंतीच्या कहाणीत केवळ तमाशाचा भाग समरसून लिहिला आहे. राजकारण आणि दौलत ह्या व्यक्तिरेखा तितक्या समरसून लिहिलेली नाही. त्यातून कादंबरीचा तोल बिघडला आहे.

अनेक अनाकलनीय प्रसंग किंवा वर्तणुकी आहेत. दौलतचे सासरे, बायको पण काहीतरी विचित्रच दाखवले आहेत. एका वाक्यात चिडतात, दुसऱ्या वाक्यात दौलतचं वागणं स्वीकारतात. नक्की त्यांचा विरोध आहे का? असेल तर कशाला? चंद्राच्या पूर्वायुष्यात तिच्यावर अत्याचार करणारा कोण आहे हे समजल्यावर तिचा "प्रियकर" दौलत काहीच बोलत नाही. चंद्राच्या आईला एक राजकीय डावपेच म्हणून "महाराष्ट्र गौरव" सारखा पुरस्कार जाहीर होतो पण पुढच्या प्रसंगात तिला जणू ते तिला कळलेलंच नाही असे प्रसंग घडतात. "बत्तासेराव" सारखा एक तमाशातला नाच्या एका मंत्र्याचा "पी.ए" होतो. काही दिवसांनी पुन्हा तमाशात जातो. चंद्रा दिल्लीत येते; एका मंत्र्याला हॉटेलात मारते पण कोणालाही कळत नाही. असे कितीतरी सुटे सुटे धागे आहेत. ज्यातून विरस होतो. लेखकाने कच्चा खर्डाच प्रकाशित केला की काय असं मला बऱ्याच वेळा वाटलं.

प्रसंगांच्या ओघात बऱ्याच लावण्या येतात. माझा काही लावण्यांचा अभ्यास नाही; पण तरी शेवटी ती एक कविता आहे, एक गाणं आहे. एका विशिष्ट वृत्त/छंद ह्यांच्या मध्ये बांधलेली असली पाहिजे ना. तश्या ह्या वाटत नाहीत. मुक्तछंदातल्या कविता वाटतात.  उदा.

पण असो ! तो माझा फार माहितीचा विषय नाही त्यामुळे मी फार काही लिहित नाही.

एकूणच ह्या कादंबरीने अपेक्षाभंग केला. तमाशावाल्यांचं आयुष्य समजून घ्यायचं असेल तर भरभर वाचायला हरकत नाही. पण पाठमजकूर(ब्लर्ब)मध्ये लिहिल्याप्रमाणे "लाल दिवा आणि घुंगराच्या गुंतावळीची रशीली कहाणी" ह्या अपेक्षेने वाचू नका.


———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

Droupadi Murmu (द्रौपदी मुर्मू)




पुस्तक - Droupadi Murmu (द्रौपदी मुर्मू)
लेखिका - Kasturi Ray (कस्तुरी राय)
भाषा - English इंग्रजी
पाने - २४२
प्रकाशन - रूपा पब्लिकेशन. २०२३
ISBN - 978-93-5702-200-2

भारताच्या सध्याच्या राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मू ह्यांचा वैयक्तिक आणि राजकीय आयुष्याचा मागोवा घेणारे हे पुस्तक आहे. ओडिसातल्या मयूरभंज जिल्ह्यातील उपरबेडा गावात द्रौपदी मुर्मू ह्यांचा जन्म झाला. जन्मनाव "पुत्ति तुडू". आदिवासीबहुल आणि प्राथमिक सुविधांपासून वंचित असं हे दूर वसलेलं खेडं आणि त्यातलं संथाळ जमातीचे स्थानिक "प्रधान" असणारे "तुडू" कुटुंब. "प्रधान" असले तरी सततच्या दुष्काळामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती काही विशेष नव्हती. मात्र वडिलांना आपल्या मुलीने शिकावं असं वाटत होतं. त्यामुळे गावात प्राथमिक शिक्षण मग दुसऱ्या गावात जाऊनयेऊन माध्यमिक शिक्षण त्यांनी घेतलं. शाळेतल्या शिक्षिकेने त्यांना "द्रौपदी" हे नाव दिलं. पुढे भुवनेश्वरला सरकारी कॉलेज मध्ये आदिवासींसाठी मोफत शिक्षण आणि निवासाची सोय असलेल्या ठिकाणी राहून त्यांनी आर्टस् चं शिक्षण घेतलं. मुर्मू ह्यांचा ह्या प्रवासाचा वेध लेखिकेने घेतला आहे. त्यासाठी मुर्मू ह्यांच्या जुन्या मुलाखती, त्यांच्या शाळाकॉलेज मधले वर्गमित्र, जुने परिचित ह्यांच्याशी संवाद साधून "लहान द्रौपदी" कशी होती हे लेखिकेने शोधण्याचा प्रयत्न केला आहे. अभ्यासू, गंभीरवृत्ती, स्वतःच्या गरिबीची लहानपणापासून जाणीव असल्याने आहे त्यात समाधान मानायचा विचार, शाळेतून बाणवली गेलेली शिस्त, कला-क्रीडा ह्यांची आवड अशी स्वभाव वैशिष्टये आपल्याला दिसतात.

घरच्या गरिबीमुळे कॉलेज पूर्ण करण्यापूर्वीच समोर आलेली नोकरीची संधी त्यांनी घेतली. त्यांचा विवाह झाला. "द्रौपदी तुडू" च्या "द्रौपदी मुर्मू" झाल्या. आदिवासी समाजाच्या रीतीनुसार नवरा मुलगा मुलीच्या आईवडिलांना हुंडा देतो आणि मुलीचे आईवडील भाव खातात. त्यामुळे श्याम चरण मुर्मू ह्यांनी द्रौपदीच्या आईवडिलांना मागे लागून लागून कसं राजी केलं हे पुस्तकात आहे. भुवननेश्वरला नोकरी, पतीची बदली होणारी नोकरी, माहेरचं गाव एकीकडे, तर सासरचं गाव दुसरीकडे अशी संसारिक कसरत सुरु झाली. नोकरी, मुलं, घर ह्याच्या जबाबदाऱ्या पेलत असतानाच त्यांच्या एका मुलाचं वयाच्या तिसऱ्या वर्षीच निधन झालं. नोकरी सोडून त्यांना सासरगावी रायरंगपूर ला यावं लागलं. पुस्तकाच्या ह्या टप्प्यावरसुद्धा लेखिकेने मुर्मू ह्यांचे सहकारी आणि नातेवाईकांच्या मुलाखतींतून हे प्रसंग व मुर्मूंचे तेव्हाचे वर्तन मांडले आहे.

रायरंगपूरला शिक्षिका म्हणून काम करू लागल्यावर त्या मुलांच्या आवडत्या शिक्षिका कशा झाल्या. सुशिक्षित आणि नोकरी केलेली असल्यामुळे तेव्हा सामाजिक कामांत त्या भाग घेऊ लागल्या. ह्याचं सविस्तर वर्णन आहे. आयुष्याच्या ह्या टप्प्यावर राजकारणाने प्रवेश केला. स्थानिक पालिकेच्या निवडणुकीत त्या राहत असलेला भाग अनुसूचित जमातींसाठी राखीव झाला होता. त्यामुळे सुशिक्षित आणि योग्य उमेदवारांची कमतरता जाणवणाऱ्या ह्या समाजातील मुर्मूंकडे राजकीय पक्षांचं लक्ष गेलं. मुर्मूंनी आपल्या पक्षाकडून निवडणूक लढवावी ह्यासाठी सर्वच पक्षांनी प्रयत्न केले. पूर्णपणे अपरिचित क्षेत्र, पारंपरिक विचारांचं घर ह्यामुळे सुरुवातीला त्यांनी नकार दिला. पण भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे प्रयत्न आणि पतीची साथ ह्यातून त्यांनी होकार दिला. निवडणूक लढवली आणि निवडूनही आल्या. नगरसेविका पदावर त्यांनी स्थानिक स्वच्छता, शाळा, प्रथामिक सुविधांवर लक्ष केंद्रित केलं. गरिबीचं आणि समस्यांचं आयुष्य स्वतः जगलेलं असल्यामुळे लोकांचे खरे प्रश्न सोडवण्याची तळमळ ह्यातून दिसते.

पुढे आमदारकीची निवडणूक त्या जिंकल्या. ओडिशा मध्ये मंत्री झाल्या. त्याचा आढावा पुस्तकात आहे. त्यात थोड्याच प्रसंगांचा उल्लेख आहे. पण आहेत तेच प्रसंग फार वर्णन करून, तपशीलवार सांगितले आहेत. संथाळी समाजाची "संथाळी" भाषा भारताच्या मान्यताप्राप्त भाषांमध्ये यावी ह्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि त्याला यश आले. पुस्तकात मंत्री म्हणून त्यांनी केलेली आणि फार छाप सोडणारी कामं दिसली नाहीत. पण सभ्य आणि स्वच्छ वर्तणुकीने खात्याचं नियमित काम त्यांनी केलं असंच जाणवतं. पुढे खासदारकीच्या निवडणुकीत त्यांना पराभूत व्हावं लागलं.

वैयक्तिक आयुष्यात एक भयानक दुःखद पर्व आलं. त्यांच्या एका मुलाचा ऐन तारुण्यात अचानक मृत्यू झाला. थोड्याच वर्षांत दुसऱ्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला. आणि त्यापाठोपाठ पतीचाही. आई आणि भाऊही त्याच काळात जग सोडून गेले. त्या खचल्या, कोलमडून पडल्या. पुन्हा उभ्या राहिल्या पुन्हा कोलमडल्या. पुन्हा सावरल्या. दुर्दैव जणू परीक्षाच बघत होते. तावून सुलाखून व्यक्तिमत्त्व घडवत होतं. ह्या काळातली त्यांची मनःस्थिती, स्वतःला पुन्हा उभं करणं, "प्रजापिता ब्रह्मकुमारी" ह्या अध्यात्मिक पंथाच्या विचाराची झालेली मदत, भाजप पक्षाने दिलेली साथ ह्याचं सविस्तर वर्णन पुस्तकात आहे.

पुढे त्या सहा वर्षे झारखंडच्या राज्यपाल होत्या. तेव्हा आदिवासींसाठी सरकार काम करेल ह्याची त्यांनी काळजी घेतली. आदिवासींच्या जमिनीविषयीची दोन विधेयके विधानसभेने पारित केली तरी; पूर्ण तपासाअंती ती अन्यायकारक आहेत हे जाणवल्यामुळे त्यांनी मान्यता न देता सरकारला परत पाठवण्याचा बाणेदारपणा दाखवला. राज्यपाल म्हणून विद्यापीठांच्या त्या पदसिद्ध कुलगुरू होत्या. हे पद फक्त शोभेचं न ठेवता "लोक दरबार"पद्धतीचे प्रकल्प राबवून शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे हजारो प्रलंबित खटले त्यांनी निकाली लावले. त्यासाठी न्यायमूर्तींची मदत घेतली. प्रशासन कामाला लावले. त्यांच्या घटनात्मक हक्क आणि मर्यादा ह्यांचे भान राखून "कृतिशील" राज्यपाल म्हणून त्यांनी काम केले. ह्यांना प्रोत्साहन दिले. स्वतःसुद्धा एक शाळा चालवली. ह्या सगळ्या टप्प्याचे सविस्तर वर्णन पुस्तकात आहे.

राष्ट्रपती म्हणून निवड झाल्यावरही वेगवेगळ्या प्रसंगी त्यांनी भाषणांमधून शिक्षण, महिलासबलीकरण, आदिवासींचे हक्क इ. वर कसा भर दिला आहे. इतक्या व्यग्र दिनक्रमातही वेळोवेळी त्यांचे जुने मित्र, नातेवाईक सहकारी ह्यांच्याशी त्या संपर्क साधतात; प्रोटोकॉल सांभाळून लोकांशी मिसळण्याचा त्यांचा प्रयत्न करतात. अजूनही साधी राहणी आहे वगैरे वर्णन पुढील काही पानांत आहे.

पुस्तकातली काही पाने वाचूया

लेखिकेबद्दल पुस्तकात दिलेली माहिती

अनुक्रमणिका


बालद्रौपदी बद्दल




मंत्री द्रौपदी मुर्मू




राज्यपाल द्रौपदी मुर्मू



पुस्तकात काही नवीजुनी छायाचित्रे देखील आहेत



अश्या पद्धतीने राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मूंचा सामाजिक आणि वैयक्तिक संघर्ष; त्यांचे व्यक्तिमत्त्व आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. मिळालेल्या जबाबदाऱ्या आणि मिळालेले अधिकार ह्याचा वापर त्यांनी कसा केला हे जाणवते.

पुस्तक हे एका गौरव ग्रंथसारखे आहे. मुर्मूंच्या नकारात्मक बाजू किंवा कमकुवत बाजू ह्यात येत नाहीत. त्यांचे विरोधक, टीकाकार ह्यांची मते ह्यात नाहीत. आमदार, मंत्री, राज्यपाल म्हणून त्यांना अजून काय करता येऊ शकलं असतं, काय करायला जमलं नाही ह्याचं विश्लेषण हवं होतं. त्या निवडणुकीत पराभूत का झाल्या ह्याची कारणमीमांसा हवी होती. त्यातून पुस्तक अजून दखलपात्र झालं असतं. "राज्यपाल" आणि "राष्ट्रपती" ह्या पदावरील व्यक्ती सरकारच्या सल्ल्याने काम करतात;सामाजिक समारंभांमध्ये प्रमुख पाहुणे असतात. त्यांच्या हातून उद्घाटन झालेली कामे किंवा भाषणे हे एका अर्थी सरकारचं काम असतं. काही वेळा ही कामे सुद्धा मुर्मूंनी केल्यासारखे वर्णन आहे. ते जरा अतिशयोक्त वाटतं. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल लिहितानाही साधेपणा; कर्तव्यनिष्ठा वगैरे मुद्दे पुन्हा पुन्हा मांडून, लोकांची अवतरणे उद्धृत करून कापूस पिंजल्यासारखा मजकूर वाढवला आहे. आणि फार गोड-गोड वर्णन केलं आहे. एक माणूस म्हणून द्रौपदी मुर्मू ह्यांचा चांगला परिचय पुस्तकातून झाला तरी, राजकारणी मुर्मू समजून घेण्यासाठी अजून एखादं पुस्तक वाचावं लागेल अशी भावना पुस्तक पूर्ण करताना मनात आली. 
आपल्या राष्ट्रपतींचा प्रगतीचा प्रवास सामाजिक, आर्थिक आणि भावनिक संघर्षांतून कसा झाला ही प्रेरणादायी कहाणी समजून घेण्यासाठी हे पुस्तक वाचा.


———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

It ends with us (इट एन्ड्स विथ अस)





पुस्तक - It ends with us (इट एन्ड्स विथ अस)
लेखिका - Colleen Hoover (कॉलिन हूवर)
भाषा - इंग्रजी (English )
पाने - ३७६
प्रकाशन - Atria Paperback , २०१६
ISBN - 978-1-5011-10368

ही कॉलिन हूवर लिखित एक प्रेमकहाणी आहे. प्रेमाचे वेगवेगळे पैलू, प्रेमाचे वेगवेगळे टप्पे गुंफणारी ही कादंबरी आहे. वयात येतानाच्या काळातलं प्रेम, कॉलेजमधलं प्रेम, थोडं मोठं झाल्यावर देखणेपणावर, व्यक्तिमत्त्वावर भाळून केलेलं प्रेम, लग्नानंतरचं प्रेम, जोडीदाराच्या नकारात्मक बाजू दिसल्यावरचं प्रेम, प्रेमाचा त्रिकोण हे सगळं ह्यात आहे. त्याचबरोबरीने कादंबरीचा एक समांतर अंतःस्थ प्रवाह आहे. तो म्हणजे - आईवडिलांच्या नात्यातल्या प्रेमाचा आणि घरगुती हिंसेचा मुलांवर होणारा परिणाम; आणि मोठेपणी त्यांच्या प्रेमसंबंधांवर होणारा परिणाम.

कथेची नायिका लिली हीच निवेदिका आहे. ती आपल्याला आज काय झालं हे सांगायला सुरुवात करते. तिच्या वडिलांच्या निधनाच्या शोकसभेत ती वडिलांबद्दल काहीच चांगलं बोलू शकली नाही ह्याबद्दल ती अस्वस्थ आहे. अशाच अवस्थेत तिला रायल किंकेड (Ryle Kincaid) भेटतो. तोही थोडा विमनस्कच आहे. पण ते एकमेकांकडे आकर्षित होतात. हे सगळं भारतातल्या नायिकेबाबतीतही घडू शकतं. पण ही गोष्ट खास अमेरिकन आहे हे आपल्याला सुरुवातीपासून जाणवतं. कारण, भारतात कसं असतं... पहिली भेट, मग ओळख, मग जुजबी बोलणं, प्रेमाच्या आणाभाका, मग शारीरिक जवळीक; तीही बहुतेकदा लग्नानंतरच. पण ह्या अमेरिकन गोष्टीत रायल थेट तिला विचारतो "माझ्याशी एकदा शरीरसंबंध करशील का? एकदाच ! मला पुन्हा पुन्हा त्या व्यक्तीला भेटायला आवडत नाही" :) त्यांचं तसं काही होत नाही. पण बोलचाल सुरु होते.

लिलीला पूर्वी डायरी लिहायची सवय असते. लिली ती डायरी काढून वाचायला लागते. त्यातून तिच्या लहानपणीच्या प्रेमप्रकरणाबद्दल - ॲटलास बद्दल - आपल्याला कळतं. पुढे वर्तमानातले प्रसंग आणि डायरी वाचनातून जुने प्रसंग ह्यांची छान गुंफण घातली आहे. ह्यापुढची गोष्ट सांगणं म्हणजे रसभंग होईल.

पण इतकंच सांगतो की, लिलीच्या आईच्या वाट्याला जो त्रास आला तोच लिलीला सुद्धा भोगावा लागतोय कि काय अशी परिस्थिती निर्माण होते. आईने जे भोगलं त्याचा लिलीवर मानसिक परिणाम झाला. आता तिने जर भोगलं तर तिच्या मुलीवर परिणाम होईल का? ते टाळायचं का स्वीकारायचं ह्याची द्विधा मनःस्थिती लिलीची होते. म्हणून It ends with us - हा निर्णय आपल्यापाशीच येऊन थांबतो; असं समर्पक शीर्षक पुस्तकाचं आहे. आणि हा निर्णय घेणं कठीण असतं कारण पुस्तकाच्या पाठपानावर म्हटलं आहे तसं Sometimes the one who loves you is the one who hurts you the most. लेखिकेने हा सगळा प्रवास ताकदीने मांडला आहे.

प्रसंगांच्या ओघात ह्या तिघांचे कुटुंबीय कथेत येतात. आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला अमेरिकन कुटुंबसंस्थेतले अनेक प्रकार/समस्या दिसतात. लिव्ह-इन मध्ये राहणं, आईवडिलांचा घटस्फोट आणि आईचं दुसरं लग्न झाल्यामुळे सावत्र वडिलांबरोबर वाढणं; तसंच सावत्र घरी न घेतल्यामुळे बेघर होणं, १६ वर्ष झाली की लैंगिक संबंधांना मुक्त परवाना - आईवडील पण काही बोलू शकणार नाहीत. एकटं वाटलं कि डेट वर जाणं आणि तेवढ्यापुरतं बॉयफ्रेंड/गर्लफ्रेंड बनवणं. मोठं झाल्यावर स्वतंत्र राहणं. आपलं आपलं लग्न ठरवणं. म्हातारे झाले तरी सतत जोडीदाराचा शोध चालूच राहणं. म्हताऱ्या आईचा बॉयफ्रेंड आपल्या दिवंगत वडिलांसारखा नाही हे समजून सुखावणं इ.

सगळी पात्र छान रंगवली आहेत. हाडामासाची माणसं. आपलेआपले गुणदोष असलेले. पुस्तकाची पहिली शंभरेक पानं वाचताना असं वाटतं की ही एक नेहमीची प्रेमकथा आहे. देखणा, उमदा, यशस्वी, आदर्श नायक आणि त्याच्या प्रेमात पडलेली हळवी नायिका. तिच्या डायरील्या प्रसंगांचा चालू घडामोडीशी काय संबध हे कळत नाही. पण नंतर कथानक वेग घेत. आधी मांडलेले सगळे बिंदू एकत्र येऊन आकार घेऊ लागतात. उत्कंठा वाढवतात. पुढे काय होईल? लिली, रायल, ॲटलास कसे भेटतील; कसे वागतील ह्यात आपण रंगून जातो. पुन्हा पुन्हा डाव मांडतात, भांडतात, मोडतात आणि वाचकाला "रोलर कोस्टर राईड" घडवतात. तसंच विचारप्रवणही करतात.

ही प्रेमकथा आहे आणि वर म्हटलं तसं मुक्त शरीरसंबंधांचे संदर्भ असले तरी पुस्तकात शृंगाराची उत्तान वर्णने नाहीत. सूचक वाक्ये लिहून फक्त प्रसंगनिर्मिती करायची मर्यादा लेखिकेने पाळली आहे.

काही पाने वाचा
पहिला प्रसंग जेव्हा अनोळखी दोघं एकमेकांना आपापल्या समस्या सांगतात. आणि वर म्हटलं तसं, थेट शारीरिक जवळिकीचं आमंत्रण.
 


लिली च्या डायरीतलं एक पान. ज्यात ती अमेरिकन विनोदी कलाकार एलन ला उद्देशून सगळं लिहीत असते. आपल्या भावना मोकळ्या करते.
 


अमेरिकन लग्न...म्हणजे ते होण्याआधीपासूनच सुरु झालेले रोमँटिक दिवस.
 


एकूणच ज्यांना प्रेमकादंबऱ्या, भावनिक कादंबऱ्या वाचायला आवडतात त्यांना हे पुस्तक रुचेल. इंग्रजी खूप सोपं ओघवतं आहे. मूळ इंग्रजी लेखकांच्या कादंबऱ्या वाचताना मला नेहमी हे जाणवतं की भारतीय इंग्रजी लेखक विनाकारण क्लिष्ट इंग्रजी लिहितात. नेटवर शोधताना असं कळलं की लवकरच ह्या कादंबरीवर इंग्रजी चित्रपट सुद्धा येणार आहे.


———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :-
प्रेमकहाण्या आवडत असतील तर जवा ( जमल्यास वाचा )
नाहीतर वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

मिट्ट काळोख लख्ख उजेड (Mitta kalokh lakkha ujed)




पुस्तक - मिट्ट काळोख लख्ख उजेड (Mitta kalokh lakkha ujed)
लेखक - सुमेध वडावाला रिसबूड (Sumedh Wadawala Risbud)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - २६०
प्रकाशन - रोहन प्रकाशन. जाने २०२२
छापील किंमत - ३४०
ISBN - 978-93-92374-37-1

"एक व्यसनी गर्दुल्ला ते सफल जीवन ... दत्ता श्रीखंडेचा स्तिमित करणारा जीवन प्रवास". मुखपृष्ठावरची ही ओळ पुस्तक कशाबद्दल आहे हे सांगते आणि उत्सुकता निर्माण करते. दत्ता श्रीखंडे ह्यांचे स्वानुभव श्री. रिसबूड ह्यांनी शब्दबद्ध केले आहेत. "दत्ता"चं आयुष्य प्रचंड वादळी ठरलं आहे. गरिबी, नशा, गुन्हेगारी, पोलिसी सजा ह्या सगळ्या पायऱ्या पायऱ्यांनी "मिट्ट काळोख" असणारं आयुष्य तो जगत होता. पुण्याच्या मुक्तांगण संस्थेनं त्याला सुधारणेचा किरण दाखवला. तो त्याने डोळे भरून पहिला. आणि तो सुधारला. त्याच्या आयुष्यात "लख्ख उजेड" पडला. यशस्वी व्यक्ती झाला. "दत्ता"ने आपले सगळे अनुभव, त्या मागच्या भावना अतिशय प्रामाणिकपणे ह्या पुस्तकात मांडल्या आहेत.

मुंबईचे उपनगर असलेल्या अंबरनाथ मधील एका गरीब वस्तीत जन्माला आलेला दत्ता. लहानपणापासून अभ्यासाची नावड. त्यात आजूबाजूचं वातावरण काही फार शिस्तीला पोषक असं नाही. उनाड मित्र पण अनायासे मिळाले. त्यामुळे शाळा सोडून फुकट हिंडण्याची सवय लहानपणीच लागली. ह्या टुकारपणाला घरून तरी किती पैसे मिळणार. त्यापेक्षा आपणच काहीतरी करून कमावू ही भावना मनात आल्यावर हॉटेल मध्ये पोऱ्याची नोकरी धरली. इतक्या लहान वयात "कमावता"होण्याचा आत्मविश्वास त्यातून मिळाला पण त्यासाठी मरेस्तोवर काम, गलिच्छ राहणं, अपमान, अन्याय असं सगळं सुद्धा सहन करावं लागलं. त्यातून सुटका झाली ती पुढच्या नोकरीमुळे .. जी होती मटक्याच्या, जुगाराच्या अड्ड्यावर. मटका, जुगार, पोलिसांच्या धाडी, गुन्हेगार ह्याची ओळख झालीच पण चरस , गर्द त्यातून मिळणार क्षणिक आनंद ह्याचीही ओळख झाली. आणि ओळख कसली व्यसनांनी गळाभेटच घेतली. पैसा मिळाला की तो व्यसनांत उडवायचा. आणि ती नशा उतरली की पुढच्या नशेसाठी पैसा कमवायचा. कुटुंबाची वाताहत आणि शरीराचीही. पण नशेने शरीराचा असा ताबा घेतलेला की नशा नाही केली तर त्याची प्रतिक्रिया म्हणजे उलट्या-जुलाब-पोटदुखी-प्रचंड वेदना ! पुस्तकातल्या नशेडी लोकांच्या भाषेत "टर्की" लागणे. त्यामुळे नशा पाहिजेच, पैसा पाहिजेच. मग तो कसा का मिळो. त्यातून चोरी, पाकिटमारी चा मार्ग त्याने स्वीकारला. आणि झाला एक सराईत गुन्हेगार. मग पुन्हा पुन्हा तुरुंगवास. तडीपारी.

हा सगळ्या पुस्तकाचा जवळपास निम्मा भाग आहे. लेखकाने तो अतिशय प्रभावीपणे लिहिला आहे. नशा करताना कशी "मझा" यायची, नशा करायची संधी मिळवण्यासाठी दत्ता काय काय करायचा क्लृप्ती लढवायचा ह्याचं मनोरंजक वर्णन आहे. पाकिटमारांचं जग, त्यांचे परवलीचे शब्द, पोलिसांकडून होणारी धरपकड, मारहाण, तुरुंगातलं वातावरण ह्याचं रसभरीत वर्णन आहे. खरं म्हणजे आपल्याला ते वाचताना मजा येते. कारण दत्ता बेरडपणे त्याची मजाच घेत होता. नशेपुढे सगळंच गौण होतं.

तुरुंगवासात असताना नशा करणं कठीण व्हायचं. त्यामुळे "टर्की"ला तोंड देत का होईना तगून राहावं लागायचं. आणि महिनापंधरा दिवस गर्द पासून दूर राहिल्यामुळे उलट तुरुंगवास मानवायचा; तब्येत सुधारायची. त्यामुळे बाहेर पडल्यावरही हे सगळं बंदच ठेवायचं ही भावना बळावायची. पण ते तेवढ्यापुरतंच. इतरवेळीही मध्ये मध्ये आपण वागतोय हे चुकीचं आहे असे त्याला वाटायचं. मात्र "आजपासून सगळं बंद" हा संकल्प थोडावेळच टिकायचा. ते वाचताना ती धडपड, तडफड वाचताना आपणही भावुक होतो. परिस्थितीचे आणि भावनांचे हे झोके वाचकाला वेगळीच वाचनानुभूती देतात. एका वेगळ्याच दुनियेची सैर घडवतात.

असाच एकदा "आता सुधारायचं" चा झटका आला. कोणाकडूनतरी "मुक्तांगण" ची माहिती कळली. डॉ. अनिता- अनिल अवचट, त्यांचे कुटुंबीय, डॉ. आनंद नाडकर्णी आणि त्यांचे सहकारी पुण्याच्या येरवडा मनोरुग्णालयाचा एक भाग म्हणून व्यसनमुक्ती केंद्र चालवत होते. तिथे दत्ता दाखल झाला. व्यसनाधीन माणसाला गुहेगार, टाकाऊ न समजता त्याच्यातल्या "माणसा"ला साद घालण्याची "मुक्तांगण"ची पद्धत होती. समुपदेशन, शारीरिक-मानसिक व्यायाम, योग्य आहार, हाताला सतत काम ज्यातून मनही गुंतून राहील असे वेगवेगळे उपाय त्यात होते. पूर्वी व्यसन करणारे पण आता व्यसनमुक्त झालेले लोक स्वतःचे अनुभव सांगत.

मुक्तांगणमध्ये पुन्हापुन्हा राहिल्यावर दत्ता सुद्धा व्यसनातून बाहेर पडला. मुक्तांगणचा एक भाग झाला. तिथेच आधी सहाय्यक मग स्वयंपाकी म्हणून नोकरी करू लागला. संस्थेच्या पुढाकारातून त्याचं लग्न झालं, स्वतःचं घर झालं. स्वतःचा वेगळा व्यवसाय सुरु केला. इतकंच काय बी.ए. एमए ची पदवी मिळवली. वाममार्गाला लागलेली बुद्धी मुक्तांगणने मुक्त करून सन्मार्गाला लावली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एकेकाळाचं नशेने उध्वस्त केलेलं शरीर असलं तरी दत्ताजींनी मनापासून व्यायाम सुरु केला. नुसते सुदृढ होऊन थांबले नाहीत तर शरीरसौष्ठव स्पर्धेत भाग घेऊन "महाराष्ट्रश्री" पर्यंत मजल मारली. अजूनही बरेच काही चांगले उद्योग त्यांनी केले; वेगवेगळ्या माध्यमांनी त्याची दखल घेतली. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी "मन की बात" मध्ये त्यांचं कौतुक केलं. हे सगळं पुस्तकात मांडलं आहे.

दत्ताजींच्या आयुष्याने घेतलेली कलाटणी अचंबित करणारी आहे. अवचट कुटुंब, डॉ. नाडकर्णी आणि त्यांचे सहकारी ह्यांनी शांतपणे पण किती महान कार्य उभं केलं आहे, हे जाणून आपण नतमस्तक होतो. ह्या सगळ्यांबद्दलच्या विशेषतः "मोठ्या मॅडम" अर्थात अनिता अवचट ह्यांच्याबद्दलच्या भावना प्रसंगोपात आल्या आहेत. त्या भावनांशी आपणही पूर्णपणे सहमत होतो.

नायकाचं आयुष्य हे नाट्यमयतेने भरलं असल्यामुळे त्यावरचं पुस्तक वाचनीय ठरलंच असत. पण श्री. रिसबूड ह्यांच्या खुसखुशीत लेखन शैलीने पुस्तक दुप्पट वाचनीय झालं आहे. नर्मविनोदी लेखन शैली, शब्दचमत्कृती, शाब्दिक कोट्या ह्याची धमाल आहे. त्यामुळे प्रसंग कठीण, करुण असले तरी पुस्तक वाचन रडकं होत नाही. गुंड, पोलीस किंवा गर्दुल्ले ह्यांच्या तोंडची भाषा शिव्यांसकट तशीच ठेवली आहे.

आता काही पानं वाचूया म्हणजे पुस्तकाची, शैलीची कल्पना येईल.
लेखकाबद्दल पुस्तकात दिलेली माहिती


अनुक्रमणिका

मटका, जुगार, गर्द आणि गुन्हेगारीचे संस्कार




व्यसनी
ची "व्यसन"दीक्षा ... नको तिथे आपुलकी दाखवल्यामुळे व्यसन सोडणं कसं कठीण होतं




मुक्तांगणच्या कार्यपद्धतीचा एक प्रसंग




हल्ली आपण कोणाचा वाढदिवस असेल, लग्न ठरलं, बढती मिळाली, काही कर्तृत्व गाजवलं की विचारतो ; "अभिनंदन, पार्टी कधी ?" त्यातून बऱ्याच जणांना विचारायचं असतं की "दारू पार्टी" कधी? न पिणारे सुद्धा ते सहजपणे किंवा गमतीत घेतात. पण हेच जर कोणी दत्ताजींना म्हटलं असतं तर ? सहज..गंमत म्हणूनच घेतलेला "एकच प्याला" त्यांच्या आयुष्याचा घात करून गेला नव्हता का ? दारू, सिगरेट आणि नशा ह्यांना मिळणारी सामाजिक प्रतिष्ठा खरंच कोणाच्या फायद्याची. आणि त्याप्रतिष्ठेपायी व्यसनांनकडे वळणाऱ्या तरुण पिढीने हे पुस्तक वाचलं पाहिजे. कारण ही वाट निसरडी आहे. "नियंत्रित षौक" कधी अनियंत्रित होतील कळणार नाही.

म्हणूनच तुम्ही निर्व्यसनी असाल; असलं भयानक जीवन वाट्याला आलं नसेल तर हे वाचून तुम्ही आपल्या सुदैवाचे आभारच मानाल.

अजून एक जाणवलं. आपल्याला भले अश्या पदार्थांचं व्यसन नसेल; पण टीव्ही, मोबाईल, समाज माध्यमं, बातम्या, व्हॉट्सअप फॉरवर्ड, हिंसक घटनांचे व्हिडीओ, अश्लील चित्रफीती, मोबाईल गेम ह्यांचं व्यसन आपल्यापैकी बऱ्याच जणांना नकळत लागलं आहे. आपली अवस्था दत्ता इतकी नसली तरी आपल्या मनःस्वास्थ्याचा, वेळेचा लचका ही व्यसनं तोडतायत हे नक्की. त्यापासून स्वतःला सावरण्याची सुरुवात केलीच पाहिजे.

एक गंभीर सामाजिक समस्या तिच्यावर मात करणारी हे यशोगाथा प्रत्येकाने वाचलीच पाहिजे.

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

अमृतवेल (Amrutvel)

पुस्तक - अमृतवेल (Amrutvel) लेखक - वि.स. खांडेकर (V. S. Khandekar) भाषा - मराठी (Marathi) पाने - १५० छापील किंमत - रु. १८०/- प्रकाशन - मेहत...