चीन वेगळ्या झरोक्यातून (Chin vegalya zarokyatun)




पुस्तक - चीन वेगळ्या झरोक्यातून (Chin vegalya zarokyatun)
लेखिका - डॉ. अंजली सोमण (Dr. Anjali Soman)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १५०
ISBN - 978-81-938293-5-6


सर्वप्रथम, हे पुस्तक मला वाचनासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल granthpremi.com 
च्या द्वितीया सोनावणे ह्यांचे आभार मानतो.

चीनवरच्या ह्या पुस्तकात लेखिका अंजली सोमण ह्यांनी चीनचा इतिहास, भूगोल, सामाजिक क्रांती, महत्त्वाचे बदल आणि समाजाची आजची स्थिती अश्या विविधांगांनी चीन आपल्यासमोर उभा केला आहे. ह्यात महत्त्वाच्या आणि इतिहासाला कलाटणी देणाऱ्या घटना आहेत तसेच समाजात झालेले बदल आहेत. चीनमध्ये राज्यकर्ते आणि राजकीय विचारसरणी बदलल्या तसे त्याचे बरे-वाईट परिणाम - काहीवेळा टोक गाठणारे - समाजाला भोगावे लागले त्याचीही माहिती आहे. विशेष म्हणजे जे चांगलं घडलं ते मांडलं आहे तसंच काय भयंकर घडलं तेही मांडलं आहे. कुठलीही एक बाजू घेऊन ती पुढे रेटायचा लेखिकेचा प्रयत्न दिसत नाही. काही वाक्यांचा अपवाद वगळता स्वतःची शेरेबाजी केलेली नाही. त्यामुळे "चीन मला असा दिसला किंवा अभ्यासांतून असा सापडला" असं प्रांजळ देशवर्णन पुस्तकात वाचायला मिळतं.


पुस्तकात दिलेली लेखिकेची माहिती

अनुक्रमणिका




१५० पानांत मोठा आवाका साधल्यामुळे प्रत्येक पान, प्रत्येक परिच्छेद महत्त्वाचा आहे. त्यामुळे उदाहरणादाखल कुठली पाने घ्यावी हा प्रश्न मला पडला. तरी, वेगळ्या वेगळ्या पैलूंबद्दलची ही काही पाने झलक म्हणून

गुंफांमध्ये सापडणाऱ्या प्राचीन अवशेषांतून उलगडणारा इतिहास



माओ त्से तुंग ह्याच्या क्रांती लढ्याबद्दल




चीन मध्ये कम्युनिस्ट राजवटीला धर्म मान्य नाही. तरीही बौद्ध, ख्रिश्चन, मुस्लिम धर्म पाळणारे लोक तिकडे आहेत. त्याबद्दल एक प्रकरण आहे. त्यातली ही दोन पाने...




कम्युनिस्ट राजवटीत सगळं सरकारच्या मालकीचं. सरकार ठरवेल तसं वागायचं; त्याच वस्तूंची निर्मिती करायची अशी परिस्थिती होती. पण ९० च्या दशकात चीन ने आर्थिक उदारीकरण स्वीकारलं. मोठा बदल देशात झाला. परदेशी ज्ञान, संकल्पना, वस्तू सगळं बाजारात मिळू लागलं. त्यामुळे आधीची पिढी आणि आजची पिढी ह्यात खूप फरक आहे. त्याबद्दलच्या लेखातली ही पाने.




चीनने आज जागतिक बाजारपेठ काबीज केली आहे. मोठ्याप्रमावर उयोगधंदे आहेत. तरीही बेकारी आणि दारिद्र्य संपलेलं नाही. शहरं आणि गावं ह्यांच्यातली दरी वाढतेच आहे. प्रदूषणाची मोठी समस्या आहे. झगमगणाऱ्या शहरांच्या बाहेर डोकावलं की हे चिनी वास्तव नजरेस पडतं. त्याबद्दलही काही लेख आहेत. त्यातली ही पाने




भारतासारखाच चीन देखील खंडप्राय देश आणि त्याला हजारो वर्षांचा इतिहास. विविधता आणि सामाजिक अंतःप्रवाह भरपूर. त्यामुळे सांगण्यासारखं खूप आहे. विस्ताराने सांगत गेलं तर प्रत्येक प्रकरणासाठी स्वतंत्र पुस्तक होईल. तरीही लेखिकेने प्रत्येक पैलूचा झपाटयाने मागोवा घेतला आहे. आपल्या डोळ्यासमोर एक रूपरेषा उभी केली आहे. ज्याने चीनबद्दल आधी काहीच वाचलेलं नाही त्याला सुरवात करायला हे पुस्तक खूप उपयोगी पडेल. साम्राज्यशाही, कम्युनिझम आणि आता भांडवलशाहीशी हातमिळवणी करून कम्युनिझम; राजेशाही-माओची हुकुमशाही - एक पक्षीय व्यवस्था - पुन्हा एकव्यक्तीकेंद्रित सत्ता असे नाना प्रयोग चीनच्या इतिहासात घडलेले दिसतात. व्यवस्था कुठलीही असो त्यात दोष दिसतातच. त्यातून बदलाची धडपड सुरू होते. संघर्ष होऊन नवी व्यवस्था स्थिरावते. आणि नव्या व्यवस्थेत माणसांचे दोष/षड्रिपू ह्यामुळे नव्या रचनेचे नवे त्रास सुरू होतात. पुन्हा बदलाची आवाहने ! हे न संपणारं चक्र आहे. चीनच्या ह्या आकलनातून मला असंच जाणवलं.

ह्या पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेवरून असं वाटतंय की अंजली सोमण ह्यांनी चीन प्रवास केला आहे. पण तो त्यांनी कधी, किती दिवस केला; कुठे कुठे भेटी दिल्या; कोणाला भेटल्या हे पुस्तकात कुठेच आलेलं नाही. त्यामुळे लेखिकेचा स्वानुभव किती हे कळत नाही. पुढच्या आवृत्तीत हा बदल नक्की केलं पाहिजे जेणेकरून लेखिकेच्या निवेदनाची पार्श्वभूमी वाचकाच्या मनात तयार होईल. संदिग्धता राहणार नाही. पुस्तकात बऱ्याचवेळा आकडेवारी येते; किंवा काही निष्कर्ष मांडले आहेत. त्याचा आधार असणारे संदर्भ ग्रंथ किंवा वेबसाईट ह्यांची माहिती शेवटी दिली असती तर विचक्षण वाचकाला त्याचा फायदा झाला असता.

जगाचं उत्पादन केंद्र बनण्यासाठी काय नाविन्यपूर्ण उपाययोजना केल्या; आधुनिक तंत्रज्ञानात चीन कशी प्रगती करतोय; आपल्या भाषेत सगळं ज्ञान कसं आणतोय; "engineering marvel" म्हणवल्या जाणाऱ्या वास्तू कुठे कुठे आहेत इ. आधुनिक मुद्दे पुस्तकात आलेले नाहीत.

पुस्तकाच्या शीर्षकातल्या "वेगळ्या" झरोक्यातून ह्या उल्लेखामुळे मला असं वाटलं होतं की नेहमीच्या सामाजिक-राजकीय माहितीपेक्षा काहीतरी वेगळं सहसा न चर्चिलं जाणारं असं काहीतरी पुस्तकात असेल. पण तसं झालेलं नाही. त्यामुळे पुस्तकाचं शीर्षक "चीन - वेगवेगळ्या झरोक्यातून" असं ठेवायला हवं होतं.

चीनवरचं हे माहितीपूर्ण पुस्तक ज्ञानप्रेमी आणि वाचनप्रेमी वाचकांना आवडेल ह्यात शंका नाही.

हे पुस्तक ऑनलाईन विकत घेण्यासाठी लिंक
https://granthpremi.com/product/chin-vegalya-zarokyatun/



———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

मी, मनु आणि संघ (Mi, manu ani Sangh)




पुस्तक - मी, मनु आणि संघ(Mi, manu ani Sangh)
लेखक - रमेश पतंगे (Ramesh Patange)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १४३
प्रकाशन - मोरया प्रकाशन (वर्ष १९९६)

ISBN - दिलेला नाही


राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ह्या देशव्यापी संस्थेवर असे आरोप नेहमी केले जातात की ती जातीयवादी आहे, मनुवादी, दलितविरोधी आहे इ. पण ह्या टीकेमागे वस्तुस्थितीचं भान आहे; का केवळ आकस आणि संघाची प्रतिमा मलीन करण्याचा उद्देश ? प्रत्यक्ष संघाच्या कामात हिंदूंमधील उच्चनीचतेला स्थान आहे का ? भेदभाव केला जातो का ? कनिष्ठ जातीतल्या किंवा मागास जातीतल्या स्वयंसेवकांचा खरा अनुभव काय आहे ? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर "मी मनु आणि संघ" हे एक वाचनीय पुस्तक. आहे पुस्तकाचे लेखक रमेश पतंगे हे बहुजन समाजातले; झोपडपट्टीत, गरीबीत वाढलेले. पण लहानपणीच त्यांची शाखेशी ओळख झाली. शाखा त्यांना आवडू लागली. ते शाखेत जात राहिले. मनोभावे काम करत राहिले. त्यातून संघ पदाधिकारी म्हणून त्यांची वाटचाल झाली. "सामाजिक समरसता मंच" ह्या संघपरिवारातल्या संस्थेच्या स्थापनेत व ती वाढवण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग राहिला. ह्या मंचाच्या माध्यमातून संघकामाला दलितप्रश्नाशी अजून संमुख करण्याचं काम त्यांनी केलं. १९९६ साली प्रकशित झालेल्या ह्या पुस्तकात पतंगे ह्यांच्या तोवरच्या वाटचालीचा मागोवा त्यांनी घेतला आहे. इतक्या वर्षांत त्यांना संघकामात कधीही न आलेला जातीयतेचा अनुभव त्यांनी अधोरेखित करून संघ मनुवादी, जातीयवा
दी कसा नाही हे स्पष्ट केले आहे. त्याच बरोबरीने; स्वतःला पुरोगामी म्हणवणारी मंडळी; समाजवादी आणि कम्युनिस्ट हे संघाला, स्वयंसेवकांना कसे अस्पृश्य समजत ह्याचे त्यांना आलेले अनुभव सांगितले आहेत. व्यक्तिस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य ह्यांचा घोष करणारे विचारवंत आणि पत्रकार तेव्हाच्या काँग्रेस-पवार सरकारच्या कृपेसाठी जातीयवादाला कसे खतपाणी घालत होते ह्याचेही अनुभव सांगितले आहेत.

आज २०२२ मध्ये चित्र पूर्ण बदललं आहे. छद्म-पुरोगामी आज केंद्रीय सत्तावर्तुळाच्या बाहेर आहेत. एकेकाळी समाजवादी आणि कम्युनिस्टांची मक्तेदारी असलेल्या संस्थांमध्ये आज आज संघविचारांचा प्रभाव वाढतो आहे. भारतीय व्यवस्थांचा लंबक आज दुसऱ्या बाजूला झुकला आहे. हे सत्ता परिवर्तन आणि त्याहून महत्त्वाचं व्यवस्था परिवर्तन घडण्यासाठी रा.स्व.संघ किती दूरदृष्टीने आणि संयमाने काम करत होता हे पतंगे ह्यांचे ८०-९० च्या दशकातले अनुभव वाचताना आपल्याला जाणवते.

काही पाने उदाहरणादाखल बघूया.

इतर स्वयंसेवकांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे लहानपणच्या लेखकाशी प्रेमळ व्यवहार. मोठेपणी कळलं की ते वेगळ्या जातीचे, सवर्ण समाजातले. आणि मग जाणवलं की ती गोष्ट किती मोठी सामाजिक क्रांतिकारी होती.






लेखकाने हेही निरीक्षण नोंदवलं आहे की त्याकाळात आंबेडकरांचं नाव; त्यांचे विचार हे संघाच्या बौद्धिक चर्चांमध्ये येत नसे. मोठेपणी मग आंबेडकरांच्या लेखनाशी ओळख झाली. सुरुवातीला सर्वसामान्य स्वयंसेवकांचं आंबेडकरवादाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होता आणि बाबासाहेबांच्या कार्याची हिंदू हितकर्ते म्हणून मांडणी करायला कशी सुरुवात झाली त्याची एक झलक




मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांचं नाव द्यावं ह्या नामांतराच्या प्रश्नाला शिवसेना आणि स्वतःला पुरोगामी म्हणणारी मंडळी ह्यांचा विरोध होता. हिंदूंमध्ये दलित-सवर्ण अशा दंगली घडू लागल्या. त्यावेळी समरसता मंच आणि संघाने घेतलेली निर्णायक भूमिका.




पुरोगामी वैचारिक असहिष्णुता आणि पत्रकार-नेते-राज्यकर्ते ह्यांचं साटंलोटं.



हे पुस्तक म्हणजे संघावरील आरोपांना मुद्देसूद, साधार आणि संयत भाषेत दिलेलं उत्तर आहे. संघाच्या विरोधकांनी आणि संघप्रेमींनी संघासारख्या इतक्या महत्त्वाच्या संघटनेबद्दलची आपली माहिती वाढवण्यासाठी हे पुस्तक अवश्य वाचावं.

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

निपुणशोध (Nipunshodh)


पुस्तक - निपुणशोध (Nipunshodh)
लेखक - सुमेध वडावाला (रिसबूड) (Sumedh Wadawala Risbud)  
          गिरीश टिळक (Girish Tilak) ह्यांच्या अनुभवांचे शब्दांकन 
भाषा - मराठी (Marathi)
पाने - २३१
ISBN - 978-81-943051-5-6

एखाद्या कंपनीला किंवा संस्थेला त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे योग्य व्यक्ती हुडकून देण्याचं काम त्या कंपनीचे "एच.आर." डिपार्टमेंट हे काम करत असतोच. पण जेव्हा उच्च पदासाठी उमेदवाराचा शोध घ्यायचा असतो किंवा दुर्मिळ अश्या एखाद्या तज्ज्ञाची गरज असते तेव्हा ह्या निवडीसाठीही तज्ज्ञ व्यक्तीची/रिक्रुटमेंट कंपनीची मदत घेतली जाते. तिला म्हणतात "हेडहंटर". गिरीश टिळक हे प्रथितयश "हेडहंटर" आहेत. त्यांचं ह्याच नावाचं एक पुस्तक पूर्वी प्रसिद्ध (दोन्ही अर्थाने) झालं आहे. हेडहंटिंग अर्थात ह्या पुस्तकाच्या नावाप्रमाणे "निपुणशोधा"चे अनुभव त्यांनी ह्या पुस्तकात सांगितले आहेत. त्यांचं शब्दांकन सुमेध वडावाला रिसबूड ह्यांनी केलं आहे.


एखाद्या कंपनी कडून निपुणशोधाचे काम मिळणे, ते मिळाल्यावर आवश्यकते प्रमाणे उमेदवार शोधणे, त्यांच्यातील योग्य उमेदवारांची निवड करून ती माहिती कंपनीला पाठवणे, त्यातून कंपनीच्या आवडीच्या उमेदवारांच्या मुलाखती ठरवणे आणि त्यातील योग्य उमेदवाराला "ऑफर"मिळवून देऊन कंपनीत सामील होईपर्यंत सहभागी होणे; हे ह्या निपुणशोधाचे टप्पे. ह्या प्रत्येक टप्प्यावर आलेल्या बऱ्या वाईट अनुभवांपैकी काही अनुभव पुस्तकात वाचायला मिळतील.

निपुणशोधाचं कंत्राट कंपन्या देतीलच पण असे कंत्राट मिळण्याची शक्यता दिसली की स्वतःहून जाऊन कंपनीशी संपर्क साधणे आणि चाचपणी करण्याचा प्रसंग 

जेव्हा हेडहंटरलाच इंटरव्ह्यूला तोंड द्यावं लागतं तेव्हा 

घाऊक पातळीवर तंत्रज्ञांची निवड करण्यासाठी फक्त मुलाखतच नाही तर लेखी परीक्षा, मानसिक कल चाचणी हे सगळे सोपस्कार सुद्धा "हेडहंटिंग" कंपनीला करावे लागतात तो अनुभव 

शोधाचे टप्पे काय आहेत हे आपल्या लगेच लक्षात येतं. त्यात काही ना काही अडचणी येणारच हेही आपण गृहीत धरतोच . त्यामुळेच अनुभवांतलं वैशिष्ट्य / वेगळेपण लक्षात येण्यासाठी लेखकाला बरीच नेपथ्यरचना करावी लागते. खूप माहिती, पूर्वपीठिका समजावून समजावी लागते. त्यात बरीच पाने खर्च होतात. त्यामानाने आलेल्या अनुभवात, प्रत्येक वेळी फारच वेगळं घडलं असं होत नाही. म्हणजे असं; की योग्य उमेदवार शोधण्यात खूप वेळ जाणे; ठरवलेला उमेदवाराने आयत्यावेळी कंपनीत भरती न होणे हे अनुभव तर सगळ्या "एच.आर."ला नियमित येतंच असतात. "निपुणशोध" काही त्याहून वेगळा नाही. पारखून घेतलेला उमेदवार; ज्याच्यावर मोठ्या प्लॅंट ची जबाबदारी सोपवायची तोच अनैतिक निघावा किंवा त्यानेच फसवणूक करावी हे अनुभव मात्र नेहमीच्या "एच. आर." भरतीपेक्षा जास्त त्रासदायक आहेत. कारण त्याचा कंपनीवर होणार परिणामही तितकाच मोठा आहे. प्रतिस्पर्धी कंपनीची माहिती काढण्यासाठी प्रतिस्पर्धी कंपनीतल्या लोकांशी निवडीच्या बहाण्याने चर्चा करण्याचा प्रसंग सुद्धा पुस्तकात आहे. उमेदवाराची फसवणूक उघडकीला आणण्याचा प्रसंग नाट्यमय आहे.

ह्या क्षेत्रातली संभाषणे बहुदा इंग्रजीतूनच होतात. त्या संभाषणातलं वजन, गांभीर्य किंवा कधी उडालेले खटके जसेच्या तसे देण्यासाठी पूर्ण इंग्रजी वाक्य देवनागरी लिपीत दिलेली आहेत. त्यामुळे हे पुस्तक जरा द्विभाषिक होतं. 
गिरीश टिळक ह्यांची कंपनी "रिझ्युमे" आहे हे पुस्तकात कळतं. पण ही कंपनी नक्की किती मोठी असेल, त्यात किती लोक काम करत असतील ह्याचा अंदाज येत नाही. काही ठिकाणी टिळक ह्यांच्या सहकाऱ्यांचा उल्लेख येतो पण बहुतेक वेळा सगळी धावपळ, प्रवास टिळकांना एकट्यालाच करावा लागतो की काय असं वाटतं.

कुठलंही पुस्तक १००% लक्षात राहत नाही. त्यामळे पुस्तक वाचून झाल्यावर सार म्हणून किती लक्षात राहिलं, काय नवीन समजलं , काय शिकायला मिळालं हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं. ह्या कसोटीवर मला ह्यातून खूप काही हाती लागल्यासारखं वाटलं नाही. पण वाचायला आवडत होतं. प्रसंगांची पार्श्वभूमी सांगणारा भाग कमी करून अनुभव वाढवले असते तर अजून रंजक झालं असतं. 

वरच्या स्तरातल्या लोकांच्या निवडी कशा होत असतील हे जाणून घेण्यासाठी छान आहे. जे ह्या क्षेत्रात काम करत आहेत किंवा पदार्पण करू इच्छित आहेत त्यांना ह्या अनुभवातून खूप काही शिकण्यासारखं आहे. "हेडहंटिंग" सारख्या अनवट क्षेत्रातले अनुभव मराठीत आणून टिळक-रिसबूड जोडीने मराठी भाषा समृद्ध करण्याचं काम केलं आहे त्याला मात्र दाद दिली पाहिजे. म्हणूनच पुस्तकाच्या मुखपृष्ठावर गिरीश टिळक ह्यांचं नाव का नाही हा प्रश्न मला पडला. पाठमजकूर (ब्लर्ब) मध्येही ते नाव ठळक नाही. पुस्तक सुमेधजींनी लिहिलं असलं तरी ते प्रथमपुरुषी - गिरीश टिळक संवाद साधतायत - अश्या स्वरूपात आहे. सुमेधाजींनी अनुभवाचं शब्दांकन केलं असावं. अश्यावेळी लेखक म्हणून दोघांची नावं स्प्ष्टपणे समोर यायला हवी होती. 
———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
जवा ( जमल्यास वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

अधर्मकांड (adharmakand)

पुस्तक - अधर्मकांड (adharmakand) लेखक - उदय भेंब्रे (Uday Bhembre) अनुवादिका - अकल्पिता राऊत देसाई (Akalpita Raut-Desai) भाषा - मराठी (Marat...