मिट्ट काळोख लख्ख उजेड (Mitta kalokh lakkha ujed)




पुस्तक - मिट्ट काळोख लख्ख उजेड (Mitta kalokh lakkha ujed)
लेखक - सुमेध वडावाला रिसबूड (Sumedh Wadawala Risbud)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - २६०
प्रकाशन - रोहन प्रकाशन. जाने २०२२
छापील किंमत - ३४०
ISBN - 978-93-92374-37-1

"एक व्यसनी गर्दुल्ला ते सफल जीवन ... दत्ता श्रीखंडेचा स्तिमित करणारा जीवन प्रवास". मुखपृष्ठावरची ही ओळ पुस्तक कशाबद्दल आहे हे सांगते आणि उत्सुकता निर्माण करते. दत्ता श्रीखंडे ह्यांचे स्वानुभव श्री. रिसबूड ह्यांनी शब्दबद्ध केले आहेत. "दत्ता"चं आयुष्य प्रचंड वादळी ठरलं आहे. गरिबी, नशा, गुन्हेगारी, पोलिसी सजा ह्या सगळ्या पायऱ्या पायऱ्यांनी "मिट्ट काळोख" असणारं आयुष्य तो जगत होता. पुण्याच्या मुक्तांगण संस्थेनं त्याला सुधारणेचा किरण दाखवला. तो त्याने डोळे भरून पहिला. आणि तो सुधारला. त्याच्या आयुष्यात "लख्ख उजेड" पडला. यशस्वी व्यक्ती झाला. "दत्ता"ने आपले सगळे अनुभव, त्या मागच्या भावना अतिशय प्रामाणिकपणे ह्या पुस्तकात मांडल्या आहेत.

मुंबईचे उपनगर असलेल्या अंबरनाथ मधील एका गरीब वस्तीत जन्माला आलेला दत्ता. लहानपणापासून अभ्यासाची नावड. त्यात आजूबाजूचं वातावरण काही फार शिस्तीला पोषक असं नाही. उनाड मित्र पण अनायासे मिळाले. त्यामुळे शाळा सोडून फुकट हिंडण्याची सवय लहानपणीच लागली. ह्या टुकारपणाला घरून तरी किती पैसे मिळणार. त्यापेक्षा आपणच काहीतरी करून कमावू ही भावना मनात आल्यावर हॉटेल मध्ये पोऱ्याची नोकरी धरली. इतक्या लहान वयात "कमावता"होण्याचा आत्मविश्वास त्यातून मिळाला पण त्यासाठी मरेस्तोवर काम, गलिच्छ राहणं, अपमान, अन्याय असं सगळं सुद्धा सहन करावं लागलं. त्यातून सुटका झाली ती पुढच्या नोकरीमुळे .. जी होती मटक्याच्या, जुगाराच्या अड्ड्यावर. मटका, जुगार, पोलिसांच्या धाडी, गुन्हेगार ह्याची ओळख झालीच पण चरस , गर्द त्यातून मिळणार क्षणिक आनंद ह्याचीही ओळख झाली. आणि ओळख कसली व्यसनांनी गळाभेटच घेतली. पैसा मिळाला की तो व्यसनांत उडवायचा. आणि ती नशा उतरली की पुढच्या नशेसाठी पैसा कमवायचा. कुटुंबाची वाताहत आणि शरीराचीही. पण नशेने शरीराचा असा ताबा घेतलेला की नशा नाही केली तर त्याची प्रतिक्रिया म्हणजे उलट्या-जुलाब-पोटदुखी-प्रचंड वेदना ! पुस्तकातल्या नशेडी लोकांच्या भाषेत "टर्की" लागणे. त्यामुळे नशा पाहिजेच, पैसा पाहिजेच. मग तो कसा का मिळो. त्यातून चोरी, पाकिटमारी चा मार्ग त्याने स्वीकारला. आणि झाला एक सराईत गुन्हेगार. मग पुन्हा पुन्हा तुरुंगवास. तडीपारी.

हा सगळ्या पुस्तकाचा जवळपास निम्मा भाग आहे. लेखकाने तो अतिशय प्रभावीपणे लिहिला आहे. नशा करताना कशी "मझा" यायची, नशा करायची संधी मिळवण्यासाठी दत्ता काय काय करायचा क्लृप्ती लढवायचा ह्याचं मनोरंजक वर्णन आहे. पाकिटमारांचं जग, त्यांचे परवलीचे शब्द, पोलिसांकडून होणारी धरपकड, मारहाण, तुरुंगातलं वातावरण ह्याचं रसभरीत वर्णन आहे. खरं म्हणजे आपल्याला ते वाचताना मजा येते. कारण दत्ता बेरडपणे त्याची मजाच घेत होता. नशेपुढे सगळंच गौण होतं.

तुरुंगवासात असताना नशा करणं कठीण व्हायचं. त्यामुळे "टर्की"ला तोंड देत का होईना तगून राहावं लागायचं. आणि महिनापंधरा दिवस गर्द पासून दूर राहिल्यामुळे उलट तुरुंगवास मानवायचा; तब्येत सुधारायची. त्यामुळे बाहेर पडल्यावरही हे सगळं बंदच ठेवायचं ही भावना बळावायची. पण ते तेवढ्यापुरतंच. इतरवेळीही मध्ये मध्ये आपण वागतोय हे चुकीचं आहे असे त्याला वाटायचं. मात्र "आजपासून सगळं बंद" हा संकल्प थोडावेळच टिकायचा. ते वाचताना ती धडपड, तडफड वाचताना आपणही भावुक होतो. परिस्थितीचे आणि भावनांचे हे झोके वाचकाला वेगळीच वाचनानुभूती देतात. एका वेगळ्याच दुनियेची सैर घडवतात.

असाच एकदा "आता सुधारायचं" चा झटका आला. कोणाकडूनतरी "मुक्तांगण" ची माहिती कळली. डॉ. अनिता- अनिल अवचट, त्यांचे कुटुंबीय, डॉ. आनंद नाडकर्णी आणि त्यांचे सहकारी पुण्याच्या येरवडा मनोरुग्णालयाचा एक भाग म्हणून व्यसनमुक्ती केंद्र चालवत होते. तिथे दत्ता दाखल झाला. व्यसनाधीन माणसाला गुहेगार, टाकाऊ न समजता त्याच्यातल्या "माणसा"ला साद घालण्याची "मुक्तांगण"ची पद्धत होती. समुपदेशन, शारीरिक-मानसिक व्यायाम, योग्य आहार, हाताला सतत काम ज्यातून मनही गुंतून राहील असे वेगवेगळे उपाय त्यात होते. पूर्वी व्यसन करणारे पण आता व्यसनमुक्त झालेले लोक स्वतःचे अनुभव सांगत.

मुक्तांगणमध्ये पुन्हापुन्हा राहिल्यावर दत्ता सुद्धा व्यसनातून बाहेर पडला. मुक्तांगणचा एक भाग झाला. तिथेच आधी सहाय्यक मग स्वयंपाकी म्हणून नोकरी करू लागला. संस्थेच्या पुढाकारातून त्याचं लग्न झालं, स्वतःचं घर झालं. स्वतःचा वेगळा व्यवसाय सुरु केला. इतकंच काय बी.ए. एमए ची पदवी मिळवली. वाममार्गाला लागलेली बुद्धी मुक्तांगणने मुक्त करून सन्मार्गाला लावली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एकेकाळाचं नशेने उध्वस्त केलेलं शरीर असलं तरी दत्ताजींनी मनापासून व्यायाम सुरु केला. नुसते सुदृढ होऊन थांबले नाहीत तर शरीरसौष्ठव स्पर्धेत भाग घेऊन "महाराष्ट्रश्री" पर्यंत मजल मारली. अजूनही बरेच काही चांगले उद्योग त्यांनी केले; वेगवेगळ्या माध्यमांनी त्याची दखल घेतली. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी "मन की बात" मध्ये त्यांचं कौतुक केलं. हे सगळं पुस्तकात मांडलं आहे.

दत्ताजींच्या आयुष्याने घेतलेली कलाटणी अचंबित करणारी आहे. अवचट कुटुंब, डॉ. नाडकर्णी आणि त्यांचे सहकारी ह्यांनी शांतपणे पण किती महान कार्य उभं केलं आहे, हे जाणून आपण नतमस्तक होतो. ह्या सगळ्यांबद्दलच्या विशेषतः "मोठ्या मॅडम" अर्थात अनिता अवचट ह्यांच्याबद्दलच्या भावना प्रसंगोपात आल्या आहेत. त्या भावनांशी आपणही पूर्णपणे सहमत होतो.

नायकाचं आयुष्य हे नाट्यमयतेने भरलं असल्यामुळे त्यावरचं पुस्तक वाचनीय ठरलंच असत. पण श्री. रिसबूड ह्यांच्या खुसखुशीत लेखन शैलीने पुस्तक दुप्पट वाचनीय झालं आहे. नर्मविनोदी लेखन शैली, शब्दचमत्कृती, शाब्दिक कोट्या ह्याची धमाल आहे. त्यामुळे प्रसंग कठीण, करुण असले तरी पुस्तक वाचन रडकं होत नाही. गुंड, पोलीस किंवा गर्दुल्ले ह्यांच्या तोंडची भाषा शिव्यांसकट तशीच ठेवली आहे.

आता काही पानं वाचूया म्हणजे पुस्तकाची, शैलीची कल्पना येईल.
लेखकाबद्दल पुस्तकात दिलेली माहिती


अनुक्रमणिका

मटका, जुगार, गर्द आणि गुन्हेगारीचे संस्कार




व्यसनी
ची "व्यसन"दीक्षा ... नको तिथे आपुलकी दाखवल्यामुळे व्यसन सोडणं कसं कठीण होतं




मुक्तांगणच्या कार्यपद्धतीचा एक प्रसंग




हल्ली आपण कोणाचा वाढदिवस असेल, लग्न ठरलं, बढती मिळाली, काही कर्तृत्व गाजवलं की विचारतो ; "अभिनंदन, पार्टी कधी ?" त्यातून बऱ्याच जणांना विचारायचं असतं की "दारू पार्टी" कधी? न पिणारे सुद्धा ते सहजपणे किंवा गमतीत घेतात. पण हेच जर कोणी दत्ताजींना म्हटलं असतं तर ? सहज..गंमत म्हणूनच घेतलेला "एकच प्याला" त्यांच्या आयुष्याचा घात करून गेला नव्हता का ? दारू, सिगरेट आणि नशा ह्यांना मिळणारी सामाजिक प्रतिष्ठा खरंच कोणाच्या फायद्याची. आणि त्याप्रतिष्ठेपायी व्यसनांनकडे वळणाऱ्या तरुण पिढीने हे पुस्तक वाचलं पाहिजे. कारण ही वाट निसरडी आहे. "नियंत्रित षौक" कधी अनियंत्रित होतील कळणार नाही.

म्हणूनच तुम्ही निर्व्यसनी असाल; असलं भयानक जीवन वाट्याला आलं नसेल तर हे वाचून तुम्ही आपल्या सुदैवाचे आभारच मानाल.

अजून एक जाणवलं. आपल्याला भले अश्या पदार्थांचं व्यसन नसेल; पण टीव्ही, मोबाईल, समाज माध्यमं, बातम्या, व्हॉट्सअप फॉरवर्ड, हिंसक घटनांचे व्हिडीओ, अश्लील चित्रफीती, मोबाईल गेम ह्यांचं व्यसन आपल्यापैकी बऱ्याच जणांना नकळत लागलं आहे. आपली अवस्था दत्ता इतकी नसली तरी आपल्या मनःस्वास्थ्याचा, वेळेचा लचका ही व्यसनं तोडतायत हे नक्की. त्यापासून स्वतःला सावरण्याची सुरुवात केलीच पाहिजे.

एक गंभीर सामाजिक समस्या तिच्यावर मात करणारी हे यशोगाथा प्रत्येकाने वाचलीच पाहिजे.

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

अनाहत(Anahat)



पुस्तक - अनाहत (Anahat) 

लेखिका - प्रणिता खंडकर (Pranita Khandkar)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १३४
प्रकाशन - स्वयंप्रकाशित. २०२२.
ISBN - दिलेला नाही.
छापील किंमत - रु. २००/-


लेखिका प्रणिता खंडकर ह्यांनी पुस्तकाची प्रत मला घरपोच पाठवून माझा अभिप्राय जाणून घ्यायची इच्छा दर्शवली (माझे हौशी पुस्तकपरीक्षण लेखन असले तरी ) ह्याबद्दल त्यांचे सर्वप्रथम आभार मानतो.

हा कथासंग्रह आहे... माणुसकीच्या गोष्टींचा. स्वतः कुणाला त्रास देऊ नये; उलट अडल्यानडल्याला मदत करावी. आपल्याला होईल तेवढी दुसऱ्याला जगायला उमेद द्यावी. ही आपली मध्यमवर्गीय शिकवण. ही शिकवण मानणाऱ्या आणि अंमलात आणणाऱ्या पात्रांच्या ह्या गोष्टी आहेत. त्यामुळे ह्या गोष्टींत दोन मुख्य पात्रं आहेत. एक पात्र जे अडचणीत सापडलं आहे असं आणि दुसरं त्याला मदतीचा हात देणार. पात्रांचे परस्परसंबंध वेगवेगळे आहेत. दोन सह-कर्मचारी; बँकेचा अधिकारी आणि खातेधारक; मालक-नोकर तर कधी योगायोगाने एकेमकांना भेटलेल्या दोन अनोळखी व्यक्ती इ. आर्थिक अडचण, कुटुंबीयांचं आजारपण, कर्त्याव्यक्तीचा अपघाती मृत्यू, मानसिक धक्का असे वेगवेगळे प्रसंग आहेत. पण त्यात दुसऱ्याने मदतीचा हात पुढे केल्याने "शेवट गोड" झाला आहे.  मुखपृष्ठावरून हे पुस्तक योग किंवा ध्यान ह्यावरचे असेल की काय असं वाटतं पण कथांत दिसणारी सद्भावना दाखवण्यासाठी मुखपृष्ठाची अशी रचना असावी. 

अनुक्रमणिका

ही एक दोन उदाहरणं बघा
कथा १)



कथा २)




साधारण ५-६ पानांची एकेक कथा आहे. बहुतांश कथांचा साचा सारखा आहे. कथेची सुरुवात आज घडणाऱ्या प्रसंगाने होते. आणि निवेदन लगेच गतवर्णनात(फ्लॅशबॅक) मध्ये जाते. दोन पात्रं एकमेकांना कशी भेटली, मग एकाला 
अडचणी कशा आल्या, दुसऱ्याची मदत कशी झाली हा भाग येतो. आणि पुन्हा आजच्या प्रसंगावर येऊन कथा संपते. मधला निवेदनाचा भाग प्रसंगांतून उभा केलेला नाही. ते सगळं एखाद्या रिपोर्ट प्रमाणे कोरडे तपशील होतात. त्यामुळे गोष्टीतलं कथा-पण फक्त सुरुवातीला आणि शेवटी येतं.
ह्या गोष्टी सुट्या सुट्या वाचायला बऱ्या वाटतील पण सलग एक कथा संग्रह म्हणून वाचताना खूप तोचतोचपणा येतो.
म्हणजे पहिल्या काही गोष्टी वाचल्यावर पुढची गोष्ट वाचताना , असा भाव मनात येतो कि , "हं, आता कुठले कुठले बरं त्रास असातील पात्राला ? गरिबी+आजार हे मिश्रण आले का अपघात+फसवणूक असं काही ?"
भाषा सोपी सरळ आहे. गोष्टींचा वेगही झपाटेदार आहे. त्यामुळे कंटाळा येत नाही. पण आपण खूप गुंतूनही जात नाही.

लेखिकेला कल्पना चांगल्या सुचल्या आहेत. मात्र 
थेट निवेदन न करता त्यांनी पात्रांचं वर्णन संवाद, ह्यातून, काही घटना ह्यातून गोष्ट खुलवली तर जास्त मजा येईल. असं मला वाटलं.

पुस्तक विकत घेण्यासाठी तपशील


प्रणिताजींना पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा !!

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

मनोवेधस (Manovedhas)




पुस्तक - मनोवेधस (Manovedhas)
लेखक - चंद्रशेखर गोखले (Chandrashekhar Gokhale)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - ४३६
प्रकाशक - उमा गोखले. जानेवारी २०२२
ISBN - दिलेला नाही

ही एक काल्पनिक कथेवर आधारित कादंबरी आहे. बेलगिरी नावाच्या खेड्यात शंभर सव्वाशे वर्षांपूर्वीच्या काळात घडते आहे असं वर्णन आहे. ह्या गावातल्या "दाणी" नावाच्या सुखवस्तू घरात एक श्रीरामाची लाकडाची मूर्ती आहे. गावातल्या लोकांचं श्रद्धास्थान. जागृत देवस्थान असल्याप्रमाणे तिचे सर्व पूजाविधी आणि कर्मकांड पिढ्यानपिढ्या चालू आहेत. ह्या कुटुंबातली मुख्य वृद्ध स्त्री माताजी आहे. तिला मुलगा, सून आणि दोन नाती आहेत. त्यातली सुधा ही मुकी आहे. पण ते तिला कधी मुकी म्हणून दुय्यम वागणूक देत नाहीत. दुसऱ्यांनाही देऊ देत नाहीत. मुकी असली तरी खाणाखुणा करून आणि डोळे मिचकावून ती सगळ्यांशी अगदी सहज संवाद साधते. ह्या माताजींना आपल्या नातीची काळजी तशीच घरातल्या रामाला शोभेल अशी सीता पण हवी होती. अशी एक काळजी.

पुढे कर्मधर्म संयोगाने गावात एक शिल्पकार- जगदीश राहायला येतो. तो अशी जानकीची मूर्ती घडवायचं ठरवतो. त्याची सुधाशी सुद्धा ओळख होते. आणि जानकी अशीच - सुधासारखीच- असली पाहिजे हे मनोमन ठरवतो. सुधाच्या शालीन अबोल सहवासात तो तिच्या प्रेमात पडतो. पण सगळं लक्ष कामावर केंद्रित ठेवून. त्याच्या बरोबर शहरातून आलेली माणसे सुद्धा ह्या गावात रुळतात. आणि मूर्तीचं काम सुरू होतं.

ही मूर्ती घडेल का? त्यांची प्रेमकथा फुलेल का? 
हे सांगून मी रसभंग करत नाही.

काही पानं उदाहरणादाखल वाचा म्हणजे लेखकाच्या वर्णनशैलीची कल्पना येईल.

गावाचं, दाणी कुटुंबाचं आणि रामाच्या मूर्तीच्या महत्त्वाचं वर्णन



सुधाच्या आईला तिचे आणि शिल्पकार जगदीशची मैत्री आणि वाढणारी जवळीक आवडत नाही त्याविषयीचा प्रसंग


जानकीची मूर्ती घडवणं हे अलौकिक काम आहे असं माताजी जगदीशला सांगतात तो प्रसंग




कादंबरीची सुरुवात खूप आकर्षक झाली आहे. गावाचं, रामाचं त्याच्या भोवतीचं कर्मकांड ह्याचं खूप सविस्तर पण मोहक वर्णन आहे. जानकीची मूर्ती घडण्यामागे काहितरी रहस्य आहे असा पट उभा राहतो. पण जानकीची मूर्ती हा त्या माताजींचा ध्यास आहे तर आत्तापर्यंत त्यांनी मूर्ती घडवण्याचे काय प्रयत्न केले; ते अपयशी किंवा अपुरे ठरले का हे काहीच येत नाही. सुधा म्हणजे सुंदर, शालीन, सर्वगुणसंपन्न अशी एक साचेबद्ध नायिका. पण तिचे असे खास गुण दाखवणारे प्रसंग नाहीतच. ती आहे दैवी असं आपण स्वीकारायचं. जगदीश बरोबर आलेली पात्र आपलं घरदार सोडून तीनचार वर्ष इथेच राहतात. मध्येच कोणाला पूर्वजन्मीचं काहीतरी आठवतं. पण आजूबाजूचा कोणीही कुतूहल दाखवत नाही. हा काय प्रकार आहे ह्याबद्दल शोध घेत नाही. असं तर होतच असतं इतक्या सहजपणे तो बदल सगळे स्वीकारतात. मृत व्यक्ती स्वप्नांत येतांत. जणू ह्या सगळ्यांचा पूर्वजन्मीचा ऋणानुबंध आहे. पण हे सगळं रहस्य अखेरपर्यंत उलगडत नाही. त्यामुळे अशी अनेक कथासूत्र विस्कळीत आणि अर्धवट सोडलेली आहेत.

दोन व्यक्तींमधला संवाद असेल तेव्हा पात्रांची वाक्य आळीपाळीने दिली जातात. पण पुस्तकात एकाच पात्राची वाक्य वेगवेगळ्या ओळींवर तोडून तोडून दिली आहेत त्यामुळे वाचताना सारखा खडा लागल्यासारखं होतं. भाषा खूप पल्लेदार नाही साधीच आहे. आणि खास लक्षात राहतील अशी वाक्य, संवाद नाहीत. 

सुरुवात चांगली झाली. पण "जानकीची मूर्ती", "अलौकिक काम", "सुधा म्हणजे जणू जनकीच", "कधी पूर्ण होणार हे काम" हेच मुद्दे पुन्हा पुन्हा येऊन मध्यापासून
 ती रटाळ झाली आहे. शेवट काय होईल हा अंदाज सुरुवातीलाच येतो. त्यामुळे मी मधली पानं पटापट वाचली. पण ज्या "अलौकिक" किंवा "अतिमानवी" सृष्टीची सुरुवात लेखकाने केली तिला न्याय द्यायला, तिचं पूर्ण चित्र उभं करायला लेखक अपुरा पडला आहे. त्यामुळे एका प्रेमकथा+fantasy(कल्पनारम्यता) अशी छान सुरुवात असलेली कादंबरी. एक साचेबद्ध - उदात्त प्रेम वगैरे - दाखवणारी म्हणून उरते. त्यासाठी ४३० पानं खूपच झाली. शंभरेक पानांत पूर्ण संपवता आली असती. 

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

रेत समाधी (Ret Samadhi)




पुस्तक - रेत समाधी (Ret Samadhi)
लेखिका - गीतांजली श्री (Geetanjali Shree)
अनुवादक - सरिता आठवले (Sarita Athavale)
भाषा - मराठी 
पाने - ४१४
मूळ पुस्तक - रेत समाधी
भाषा - हिंदी
प्रकाशन - मधुश्री पब्लिकेशन, फेब्रुवारी २०२३
ISBN - 978-81-959784-3-4
छापील किंमत - रु. ४९९/-

वाचनालयात नवीन पुस्तक, "बुकर पारितोषिक" विजेते पुस्तक दिसल्यावर उत्सुकतेने हातात घेतलं. पाठमजकूर (ब्लर्ब) सुद्धा इंटरेस्टिंग वाटला. "ऐंशी वर्षाची एक वृद्धा पतिनिधनांनंतर घरात निराश बसली आहे. तिला पुन्हा माणसात आणण्यासाठी कुटुंबीय प्रयत्न करतायत. पण तिला हे काही नकोय आणि अचानक तिला काहीतरी नवीन आयुष्य हवंय. ती मुक्त स्वच्छंद होते .. " असं लिहिलं होतं(वरच्या फोटोत ते तुम्ही पूर्ण वाचू शकाल). त्यामुळे उत्सुकतेने पुस्तक वाचायला घेतलं. मात्र पहिली कितीतरी पानं वाचली तरी गोष्ट काही पुढेच सरकेना. घरातले लोक तिच्याशी बोलायचा प्रत्यन करतायत हे कळलं. पण ते काही खास करतायत असं दिसत नव्हतं. ज्या नेपथ्याकडे फक्त अंगुलीनिर्देश पुरेसा आहे त्या नेपथ्याचं, घरातल्या साध्या साध्या गोष्टींचं वर्णन करण्यात कितीतरी परिच्छेद. मग मी पानं झरझर वाचून मूळ कथानक कुठे सुरु होतंय ते बघतोय; तर नाहीच. वर्णनं, "रँडम" प्रसंग, कोणाचे कल्पनाविलास, काही स्वप्न, असंबद्ध बडबड.

कदाचित ह्या वेळी लेखिकेची शैली मला पटत नसेल; जरा ताजेतवाने असताना वाचूया म्हणून वेगळ्या वेळी वाचलं, दोन दिवसांनी वाचलं. पण काहीच अर्थबोध झाला नाही. पुस्तकाने पकड घेतली नाहीच. चाळून संपवून टाकलं.

नुसता शाब्दिक अतिसार ! बाहेर बरंच येतंय पण उपयोगाचं काहीच नाही ! त्यामुळे ते वाचण्यात वेळ घालवला नाही. 

तुम्ही सुद्धा ही थोडी पानं वाचून काही अंदाज येतोय का बघा. काही प्रसंगांची उदाहरणं खाली दिली आहेत. ते प्रसंग काय आहेत आणि का आहेत, हे मला कळलं नाही त्यामुळे त्यांची पार्श्वभूमी सांगू शकत नाही.

प्रसंग १




प्रसंग २




प्रसंग ३




"आंतरराष्ट्रीय पारितोषिक" प्राप्त पुस्तकांचा/लेखकांचा हा धडकी भरणारा अनुभव नवा नाही. "White tiger ", "God of small things", नेमाडे यांचे हिंदू, सलमान रश्दींचे “Shalimar the clown” अशीच कंटाळवाणी. 
"God of small things" मध्ये सुद्धा कसं भरताड वर्णन आहे हे मी लिहिलेल्या परीक्षणात वाचू शकाल
http://learnmarathiwithkaushik.com/courses/the-god-of-small-thing/
"हिंदू.. " पण तसंच
http://learnmarathiwithkaushik.com/courses/hindu-jaganyachi-sammruddh-adagal/


लेखक, संपादक, प्रकाशक, "सुजाण वाचक", पुरस्कार समिती, अनुवादक, अनुवादाचा संपादक,आणि अनुवादाचा प्रकाशक इतक्या चाळण्यांतून सुद्धा असा मजकूर बाहेर येतो आणि तो गौरवला जातो! काही वेगळ्याच मुशीतून ही माणसं घडवली असावी. 

हिंदीतल्या "रेत"ला मराठीत वाळू किंवा रेती म्हणतो. "रेत" चा मराठी अर्थ वीर्य, शुक्राणू असा आहे. भाषांतर करताना नाव बदलायला पाहिजे होते. हा सुद्धा एक विचित्रपणा आहे.

खरं म्हणजे हे परीक्षण लिहिण्यात सुद्धा वेळ घालवणार नव्हतो. पण कदाचित माझं परीक्षण वाचून वाचकांना कल्पना येईल आणि हे पुस्तक घेताना ते सावध होतील. आणि ज्यांना पुस्तक आवडलं असेल ते मला त्यांचं मत सांगतील. म्हणून परीक्षण लिहायचं ठरवलं. त्यामुळे तुम्ही पुस्तक वाचायचं धाडस केलं असेल तर अनुभव सांगा. 

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

अ-मृत पंथाचा यात्री (Amrut panthacha yatri )



पुस्तक - अ-मृत पंथाचा यात्री (A-mrut panthacha yatri)
लेखक - दिनकर जोशी (Dinakar Joshi)
अनुवादक - डॉ. सुषमा करोगल (Dr. Shushma Karogal)
भाषा - मराठी (Marathi)
मूळ पुस्तक - અ-મૃત પંથનો યાત્રી (अमृत पंथनो यात्री A-mrut panthano yatri)
मूळ पुस्तकाची भाषा - गुजराथी (Gujarati)
पाने - १९८
प्रकाशन - मेहता पब्लिशिंग हाऊस, ऑक्टोबर २०११
ISBN - 978-81-8498-291-4
छापील किंमत - रु. १८०/-

गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर ह्यांच्या जीवनावरची ही कादंबरी आहे. त्यांच्या लहानपणापासून निधनापर्यंत पूर्ण जीवनपट आहे. कथनाचा भर त्यांचे वैयक्तिक आयुष्य, त्यात पुन्हा पुन्हा होणारे आप्तजनांचे मृत्यू, परदेशांत भेटलेले खास चाहते व्यक्ती ह्यावर आहे. त्यामुळे रवींद्रनाथ - एक माणूस - म्हणून त्यांची जडणघडण कशी झाली असेल ह्याचा अंदाज येतो. त्यांच्या राजकीय आणि सामाजिक भूमिका आणि कार्य ह्यांचे चित्रण मनाला भिडत नाही. एका चांगल्या, बऱ्यापैकी नावाजलेल्या लेखक-कवीचे चरित्र वाचतोय असं वाटत राहतं. शांतिनिकेतनाची त्यांनी सुरुवात केली हे कळते पण नक्की काय प्रयोग केले. ते त्यांना कसे सुचले असतील. त्याचे अनुभव कसे असतील हा भाग काहीच येत नाही. रवींद्र संगीत हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा मोठा भाग आहे. तो प्रभावीपणे येत नाही. गांधीजी आणि त्यांच्या भेटी, जालियनवाला हत्याकांडाच्या वेळी त्यांनी घेतलेली भूमिका असे काही राजकीय प्रसंग येतात. पण एकूणच चार भेटी गाठी, थोडी पत्रकबाजी ह्यापेक्षा जास्त काही घडल्याचं दिसत नाही. मात्र प्रसंगांच्या वर्णनात त्यांचे लाखो चाहते, समाजावर प्रभाव असे उल्लेख येतात. त्यामुळे ताळमेळ लागत नाही.

लेखकाबद्दल पुस्तकात दिलेली माहिती


ठाकूर खानदान म्हणजे जुन्या जमीदारी कुटुंबाचे. त्यात वाढणाऱ्या रवींद्रला जरा पाश्चात्य जीवनशैलीची ओळख व्हावी, लंडनला जायची पूर्वतयारी व्हावी अशी त्यांच्या घरच्यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांना लहानपणी मुंबईला तर्खडकरांच्या घरी काही महिने राहायला पाठवलं होतं. त्यांच्या मुलीशी त्यांचे स्नेहसंबंध जमले. पण घरच्यांनी त्याला पसंती दिली नाही. त्या वास्तव्यातला एक प्रसंग




गांधी-ठाकूर भेटीचा प्रसंग




आज आपण त्यांना मोठे साहित्यिक म्हणून ओळखतो. त्या काळीही ते लोकप्रिय होतेच. पण समीक्षक आणि अभिजन वर्ग मात्र काही प्रमाणात त्यांची हेटाळणी करत होता त्याबद्दलचा एक प्रसंग.



परदेशात त्यांना भेटणारे चाहते अनेक होते. त्यातले काही
तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होत. महिला जणू एकतर्फी प्रेमात पडत. असं ह्या पुस्तकातून जाणवतं. वृद्ध ठाकूरांच्या परदेश प्रवासात त्यांची पूर्ण बडदास्त ठेवणारी परदेशी चाहती होती. संगीत, संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी परदेशी लोकसुद्धा शांतिनिकेतन मध्ये राहत होते. अशांपैकी एलिझाबेथ बद्दलचा एक प्रसंग





मी ठाकूरांचे एक पुस्तक वाचले आहे. आणि त्यांच्याबद्दल जुजबी सामान्य ज्ञान आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याबद्दल सविस्तर वाचावं अशी इच्छा होती. मला माहीत असलेले पैलू सुद्धा पुस्तकात स्पष्ट होत नाहीत. त्यामुळे अपरिचित पैलू तर बरेच सुटले असतील असं वाटतं. इतक्या मोठ्या आणि विविधांगी प्रतिभेच्या धनी असणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला २०० पानांत बांधण्याचं काम कठीण आहे. ह्या पुस्तकाने ते समर्थपणे पेललं आहे असं वाटत नाही. पुस्तकाचे निवेदन मध्येच ललित शैलीत संवादपर होते, मध्येच एखाद्या निबंधाप्रमाणे माहितीपर होते. त्यामुळे मी कथनात रममाण झालो नाही. अनुवाद चांगला झाला आहे.

पुस्तक वाचून समाधान झालं नाही. रवींद्रनाथांवर अजून चांगलं पुस्तक असेल तर नक्की सुचवा.

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

सुगंध गमावलेला मोगरा (Sugandh gamavalela mogara)

पुस्तक - सुगंध गमावलेला मोगरा (Sugandh gamavalela mogara) लेखक - बेन्यामिन (Benyamin) अनुवादक - ए आर नायर , जे ए थेरगावकर (A.R.Nair, J.A. Th...