मृत्युंजय (Mrutyunjay)



पुस्तक - मृत्युंजय  (Mrutyunjay)
लेखक - शिवाजी सावंत (Shivaji Sawant)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - ६०१
प्रकाशन - कॉन्टिनेन्टल प्रकाशन, प्रथमावृत्ती १९६७
ISBN - ह्या आवृत्तीत दिलेला नाही.

"मृत्युंजय" ही मराठीतील अतिशय गाजलेली आणि लोकप्रिय कादंबरी. इतकी, की बऱ्याच जणांनी मराठीच्या अभ्यासक्रमाबाहेरचं पहिलं पुस्तक वाचलेलं असतं ते "मृत्युंजय". काही लोक असे बघायला मिळतात; जे म्हणतात, "मी फार पूर्वी थोडं वाचायचो; किंवा फारच थोडं वाचलं आहे.. मृत्युंजय वगैरे". तर असं हे १९६७ साली प्रथम प्रकाशित झालेलं पुस्तक. ५५ वर्षांनंतरही आपली जादू टिकवून आहे. अजूनही नवीन आवृत्त्या/पुनर्मुद्रण होत आहे. पुन्हा पुन्हा त्यावर लोक लिहीतही असतात त्यामुळे ह्या कादंबरीच्या परीक्षणाची तशी गरज नाही आणि मी नव्याने काही सांगावं असं नाही. तरी मी पण माझ्या पुस्तक परीक्षणाच्या यादीत हे पुस्तक वाचलं ह्याची इतर पुस्तकांप्रमाणे नोंद व्हावी आणि मला त्यातलं काय आवडलं हे सांगावं म्हणून हे छोटे लिखाण.

"मृत्युंजय" कादंबरी ही महाभारतातलं पात्र "कर्ण" ह्याच्या जीवनावर आधारित आहे. कुंतीला लग्नाआधी मंत्रसामर्थ्यामुळे सूर्यापासून झालेला मुलगा कर्ण. कुमारिका असताना मूल झाल्यामुळे ती जन्मतःच त्याचा त्याग करते. एका पेटाऱ्यात ठेवून नदीत सोडून देते. हा पेटारा वाहत वाहत दुसऱ्या गावी जातो. तिथे एका सारथ्याला तो सापडतो. तो सारथी अधिरथ आणि पत्नी राधा त्याचा सांभाळ करतात. कर्ण नाव ठेवतात. त्याला जन्मतःच कानात कुंडलं आणि अंगावर कवच असतं. शस्त्रास्त्रांची आवड असते. अधिरथ धृतराष्ट्रांचा सारथी असल्यामुळे ते वसुसेनाला हस्तिनापुरात शिकायला घेऊन येतात. गुरु द्रोण ह्यांच्या आश्रमात पाठवतात. कर्ण एक सारथीपुत्र आहे; क्षत्रिय नाही त्यामुळे द्रोण त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. पण तिथून आयुष्यभर सारथीपुत्र/सूतपुत्र म्हणून त्याची अवहेलना होत राहते. तरी तो शास्त्रविद्येत प्रविण होतो. त्याचा पराक्रम सगळ्यांना दिसत असतो. मात्र कितीही कर्तृत्व दाखवा त्याला क्षत्रियांच्या बरोबरीचा मानायला कोणी तयार होत नाही. तू हलक्या कुळातला आहेस हे सांगून त्याला कमी लेखलं जातं. दुर्योधन ह्याचा आपल्या स्वार्थासाठी उपयोग करून घेतो.

कर्णाच्या ह्या दुर्दैवी आयुष्याचे भावपूर्ण चित्रण म्हणजे "मृत्युंजय". ह्या कादंबरीचं स्वरूप आत्मकथनासारखं आहे. आधी कर्ण आपल्या बालपणाबद्दल सांगतो. मग कुंती आपल्या बालपणाबद्दल, आयुष्याबद्दल सांगते. तिचं जीवनसुद्धा काही सोपं नाही. ती एक राजकुमारी. पण वडील तिला बालपणी मित्राला दत्तक देतात. तिथं तिचं आयुष्य बदलतं. दुर्वासांनी दिलेल्या वरामुळे कुमारी माता बनते आणि आयुष्य बदलतं. मग राजा पांडुची पत्नी होते. पण त्याला मिळालेल्या शापामुळे वनवास भोगावा लागतो. पांडु मरण पावल्यावर विधवा राजमाता म्हणून पुन्हा हस्तिनापूर. पुढे कौरव-पांडवांचा कलह आणि कर्ण-पांडवांचा संघर्ष तिला बघावा लागतो.

कर्णाच्या बालपणावरून कथानक पुढे जाते ते त्याची पत्नी वृषाली, शोण, दुर्योधन, कर्ण ह्यांच्या निवेदनांतून. शेवटचे प्रकरण आहे श्रीकृष्णचे निवेदन. कर्णाचं धैर्य, शौर्य, औदार्य, अवहेलनेतून आलेला कडवटपणा, त्याचा प्रतिशोध घेण्याची ऊर्मी, त्याला दुर्योधनाने दिलेलं बळ आणि त्यातून आलेली कौरवांशी निष्ठा वाहण्याची गुलामी हे सगळे ताणेबाणे स्पष्ट होतात. कर्णावर प्रभाव टाकणाऱ्या दुर्योधन, कुंती आणि श्रीकृष्ण ह्यांची मनोभूमिका त्या त्या निवेदनातून कळते. इतर पात्रांचे वर्तन फक्त दिसते. ह्या सगळ्या वर्णनातून कर्ण आणि त्याच्या सभोवतालच्या पात्रांच्या मनोभूमिका आपल्या समोर स्पष्ट उभ्या राहतात. अश्वत्थामा आणि कर्ण ह्यांच्या पुन्हा पुन्हा येणाऱ्या संवादात "जीवन म्हणजे दवबिंदू आहे ... जीवन म्हणजे वस्त्र आहे .." अशा प्रकारचे जीवनविषयक तात्विक चर्चा मध्येमध्ये घडते 

श्रीकृषणाचं निवेदन मात्र प्रसंग वर्णन जास्त आहे. त्याचं हे सगळे प्रसंग घडण्या/घडवण्यामागचं तत्त्वज्ञान मात्र नीट ठसत नाही. त्यामुळे, कर्ण, दुर्योधन, कुंती जशा ठसतात तसा कृष्ण ठसत नाही. कदाचित कर्ण आणि कृष्ण ह्या दोन प्रभावी व्यक्तिमत्त्वांची तुलना होऊन "कादंबरीच्या नायकावरून" वाचकाचं लक्ष कमी होईल; विचार प्रवाह तात्त्विक चर्चेकडे वळेल आणि त्यामुळे कादंबरीचा अपेक्षित परिणाम साधणार नाही असा साहित्यिक विचार करून लेखकाने कृष्णाला आवरते घेतले असावे.

महाभारतात प्रत्येक पत्राचा एक स्वभावधर्म/पिंड आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात घटना घडतायत ज्यातून चांगलं किंवा वाईट काहीतरी करायला प्रत्येक जण उद्युक्त होतो आहे. पूर्ण चूक किंवा पूर्ण बरोबर; पूर्ण नायक किंवा पूर्ण खलनायक; पूर्ण दोषी किंवा पूर्ण निर्दोष असं कोणी दिसत नाही. स्वभाव, परिस्थिती, घटना अश्या अनेक घटकांच्या मिश्रणातून प्रत्येकाच्या स्वभावाची नवी घडण होते आहे; त्यातून ते नवी परिस्थिती तयार करतायत आणि काही अनिच्छेने घटना घडत आहेत; त्यातून पुन्हा नवी परिस्थिती, नवे अनुभव; असं रोमहर्षक चित्रण आहे. हजारो वर्ष झाली तरी महाभारत अजूनही आपली मोहिनी सर्वांवर टाकतं आहे आहे; त्याचं कारण हेच असावं. महाभारताच्या ह्या आत्म्याला साजेसं असंच हे मृत्युंजय !

पुस्तकाची भाषा पौराणिक पुस्तकांना असते तशी भारदस्त, संस्कृतप्रचुर आहे. त्यातून साधली जाणारी भावचित्रनिर्मिती, रसनिष्पत्ती अगदी रोचक, त्यामुळे कथानक सर्वपरिचित असलं तरी आपण उत्सुकतेने आणि रंगून वाचत राहतो.

उदाहरणादाखल काही पाने.

द्रोणाचार्यांकडचे शिक्षण पूर्ण झाल्यावर शौर्यदर्शनाच्या समारंभात कुंती कर्णाला बघते. त्याचा पराक्रम, "सूतपुत्र" म्हणून लोकांनी केलेला अपमान आणि अंगदेशाचा राजा म्हणून दुर्योधनाने दिलेला मान असं सगळं बघते. तेव्हाची तिची अवस्था

"वस्रहरणाच्या" प्रसंगी जे घडतंय ते अनैतिक पण ते पूर्णपणे अयोग्य का ? दोषी फक्त कौरवच का ? जुगारी युधिष्ठिर आणि अहंकारी द्रौपदीच्या कर्माचीच ही फळं नाहीत का ! तरी तिने एकदा आपल्याकडे मदत मागावी मग "अबलेचं" रक्षण करायला मी तयार आहे असल्या विचारांच्या भोवऱ्यात अडकलेला कर्ण




कर्णाच्या पराक्रमाचे त्याचा भाऊ "शोण" ह्याच्या निवेदनातून वर्णन





पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि निवेदक पात्रांची चित्रे दीनानाथ दलालांची आहे.


इतकी प्रसिद्ध आणि वाचनीय कादंबरी तुम्ही वाचली नसेल तर नक्की वाचा हे वेगळं सांगायला नको.


———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

द मदर (The Mother)





पुस्तक - द मदर (The Mother)
लेखिका - पर्ल बक (Pearl Buck)
अनुवादक - भारती पांडे (Bharati Pande)
भाषा - मराठी
मूळ पुस्तक - The Mother (द मदर)
मूळ पुस्तकाची भाषा - English इंग्रजी
प्रकाशन - मेहता पब्लिशिंग हाऊस, एप्रिल २०२३
ISBN 9789357200103
छापील किंमत - रु. ३००/-


पर्ल बक ह्या अमेरिकन लेखिकेची "द गुड अर्थ" ही त्रिखंडात्मक कादंबरी प्रसिद्ध आहे. ह्या कादंबरीचे भारती पांडे भारती पांडे ह्यांनी केलेले अनुवाद आधी मी वाचले आहेत. त्या कादंबऱ्या मला आवडल्या. त्यांचेही परीक्षण मी लिहिले होते.
काळी (Kali) http://learnmarathiwithkaushik.com/courses/kali-the-good-earth/
पिढी दर पिढी (Pidhi dar pidhi) http://learnmarathiwithkaushik.com/courses/pidhi-dar-pidhi
ह्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर म्हटलं आहे की "द गुड अर्थ" कादंबरीचा तिसरा भाग. पण नेटवर शोधल्यावर असं वाटतं आहे की हा तिसरा भाग नसून स्वतंत्र कादंबरी आहे. तसेच ह्यातल्या पात्रांचा आणि कथानकाचा इतर तीन पुस्तकांशी सबंध नाहीये. असो !


सुमारे १०० वर्षापूर्वी चीनमधल्या खेड्यात घडणारे हे कथानक आहे. कथेची नायिका ही एक तरुण शेतकऱ्याची तरुण बायको आहे. तिच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रसांगात ह्या बाईच्या मनाची होणारी घालमेल, भावनेचे आवेग ह्याचं भावगम्य चित्रण म्हणजे ही कादंबरी आहे.


तिला मुलं आहेत. म्हणून पुस्तकभर तिचा उल्लेख "आई" असाच आहे. "आई", तिचा नवरा, म्हातारी सासू, दोन मुले असं कुटुंब आहे. स्वतःच्या मालकीची थोडी आणि खंडाने कसायाला घेतलेली थोडी; अशा जमिनीवर हे दांपत्य शेती करतंय. वर्षभर सतत शेतीची कष्टाची कामे ते करतायत. नवऱ्याला शेतात मदत करून झाल्यावर घरचा स्वयंपाक आणि कामंही "आई"ला आहेतच. "आई" असो की गावातल्या इतर स्त्रिया, सगळ्यांची अवस्था अशीच. त्यातच पुन्हा पुन्हा होणारी बाळंतपणं आहेतच. पण ह्यात कष्टाचा भाग असला तरी आनंदाचा आणि स्वाभिमानाचा भाग सुद्धा आहे. मी दरवर्षी पोटुशी राहते; मी "उपजाऊ जमीन" आहे वांझोटी नाही, माझी प्रसूती चट्कन होते; धडधाकट मुलं जन्माला येतात; "मुलगे" जास्त होतात मुली कमी .. ही सगळी त्यांच्या अभिमानाची स्थानं. तर असं हे निसर्गचक्र आणि प्रसूतीचक्रात अडकलेलं संथ आणि तोचतोचपणा असलेलं आयुष्य.


"आई"चं आणि तिच्या नवऱ्याचं एकमेकांवर प्रेम आहे, एकमेकांच्या सहवासाची सवयही आहे आणि कडाक्याची भांडणही आहेत. हे चाकोरीबद्ध आयुष्य असंच जात राहणार अशी मनात खात्री असताना तिचा नवरा परागंदा होतो. ते लोकांना कळू नये म्हणून तो बाहेरगावी नोकरीसाठी गेल्याचं ती खोटं सांगते. लोकांना खरं वाटावं असे काही बनाव रचते. आपला नवरा परत येईल ही आशा उरी बाळगून कच्च्याबच्च्यांसह कष्ट करून ती त्यांना वाढवू लागते. काही वर्षे जातात. पण एक बाई म्हणून - दरवर्षी गर्भवती राहण्याची सवय असलेला एक देह म्हणून - तिला हा विरह सहन होत नाही. तिचा पाय घसरतो. एक मोहाचा क्षण ती टाळू शकत नाही. पण अनौरस मूल पोटात वाढतंय म्हटल्यावर ती गुपचूप गर्भपात करून घेते. ह्या अनुभवातून मनाने खचते. शरीराने पिचते. तिची ही व्याकुळता लेखिकेने यथार्थपणे चित्रित केली आहे.


झाल्या घटनेचा तीव्र पश्चात्ताप तिला होत असतो. "आपण पाप केलं, आपल्या पापाची शिक्षा आपल्याला मिळत राहील" अशी भीती तिच्यामानात वास्तव्य करते. काळ पुढे सरकतो आहे. मुलं मोठी होतायत. मोठा मुलगा तिला कामात मदत करतोय. लहान मुलगा उडाणटप्पूपणा करतोय. तरी लहानग्यावर तिचा जास्त जीव आहे. आईच्या ह्या वागणुकीमुळे मोठ्या मुलाची कुचंबणा होत असते. शेवटी आई त्याचं लग्न लावून देते. इतके दिवस सून असणारी, घराची मालकीण असणारी "आई" आता "सासू" आणि "घरची म्हातारी" झाली आहे. धाकटा मुलगा पळून शहरात जातो. कधीमधी येतो. अशाच संथ पद्धतीने कथानक पुढे जात राहतं. अजून काही बरे वाईट प्रसंग घडतात. प्रत्येक वाईट प्रसंगी "आपल्या पापाची शिक्षा" ही तिची भावना उचल खात राहते. आपला वंश खुंटणार का ही भीती तिला सतावत राहते. कौटुंबिक वातावरणातल्या ह्या बदलांचं वर्णन सुद्धा अतिशय तपशीलवार केलं आहे.


ह्या शेतकरी कुटुंबाचे संथ आणि चाकोरीबद्ध जीवनाचे वर्णन



नवरा परागंदा झाल्यावरची विरहिणी अवस्था


मोठ्या मुलाच्या लग्नाचा आणि नवी सून घरी येण्याचा प्रसंग. चिनी रीतीरिवाजानुसार ती एका सवाष्णीच्या हातून सुनेसाठी कपडे शिवून घेते अशी ह्या प्रसंगाची सुरुवात आहे.


टीव्ही वरच्या दैनंदिन मालिकांप्रमाणे नवेनवे प्रसंग घडत राहतात. खरं बोलायचं तर, लेखिका थांबली म्हणून; अन्यथा अजून दोनतीनशे पानं लिहीत राहू शकली असती. लेखिकेची "काळी" ही कादंबरी मला खूप आवडली कारण त्यात एका कुटुंबाची आणि त्यावेळच्या खेड्याची कहाणी होती. त्याचा पुढचा भाग असलेली "पिढी दर पिढी" पण चांगली होती. त्यात जुन्या चीनच्या बदलत्या समाजाचं चित्रण होतं. त्यातुलनेत ही कादंबरी एकच एक पात्राची, अतिशय संथ, करुण आणि ताणलेली वाटली. नवरा जाणं, विरह सहन करणं, पाय घसरणं, मुलांची भाऊबंदकी, सासू-सुनेचे ताणलेले संबंध हे सगळे विषय सुद्धा खूप गोष्टी, कादंबऱ्या आणि "डेली सोप" मालिकांमध्ये चावून चोथा झालेले विषय. कथानक चीन मध्ये घडत असलं तरी ते भारतातल्या एखाद्या खेड्यात असंच घडलं असतं असं वाटतं. त्यामुळे चिनी कदंबरी असा वेगळेपणा जाणवत नाही. जरी वाचायला कंटाळा आला नाही तसंच आपण पात्राशी समरस झालो तरी पुस्तक पूर्ण केल्यावर खूप वेगळं वाचल्याचा भाव येत नाही. विशेषतः आधीच्या दोन कादंबऱ्यांनी वाढवलेल्या अपेक्षांसमोर हे पुस्तक अगदीच फुसके ठरते. लेखिकेची शैली एकसुरी वाटू लागते. म्हणून "काळी" ला "आवर्जून वाचा" ; "पिढी दर पिढी" ला "जमल्यास वाचा" तर ह्या कादंबरीला "वाठीनावाठी" म्हणावंसं वाटत.

अनुवादिका भारती पांडे ह्यांना पुन्हा १००% मार्क. सहज, सोपं आणि आपल्या मातीतलं वाटेल तरी चिनी ठसा मिटणार नाही असा ओघवता अनुवाद.



———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

सुगंध गमावलेला मोगरा (Sugandh gamavalela mogara)

पुस्तक - सुगंध गमावलेला मोगरा (Sugandh gamavalela mogara) लेखक - बेन्यामिन (Benyamin) अनुवादक - ए आर नायर , जे ए थेरगावकर (A.R.Nair, J.A. Th...