काळी (Kali) - द गुड अर्थ (The Good Earth)





पुस्तक - काळी (Kali)
भाषा - मराठी (Marathi)
मूळ पुस्तक - द गुड अर्थ (The Good Earth)
लेखिका - पर्ल बक (Pearl Buck)
अनुवाद - भारती पांडे (Bharati Pande)
पाने - २८६
ISBN - 978-81-8498-331-9
प्रकाशन - मेहता पब्लिशिंग हाऊस. प्रथमावृत्ती फेब २०१२

अंतरराष्ट्रीय ख्यातीच्या लेखिकेची ही एक नावाजलेली आणि पुरस्कारप्राप्त कादंबरी आहे. लिहिलेबद्दल आणि ह्या मूळ कादंबरी बद्दल ह्या पुस्तकात दिलेली माहिती.

चीनमधल्या शेतकरी कुटुंबाची ही कहाणी आहे. सुमारे १०० वर्षापूर्वी चीनमधल्या खेड्यात शेतकरी कुटुंब कसं राहत असेल; अस्मानी सुलतानी संकटांना तोंड देत स्वतःची प्रगती कशी करत असेल याचं चित्रमय वर्णन या पुस्तकात आहे. पुस्तकाच्या सुरुवातीला ह्या कथेचं मुख्यपात्र - एका शेतकऱ्याचा मुलगा - वांगलुंग तारुण्यात पदार्पण करतो आहे. त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी एक मुलगी पत्नी म्हणून निवडली आहे. ही मुलगी एका श्रीमंत घरात दासी म्हणून काम करते आहे. वांगलुंग काही रक्कम देऊन त्या श्रीमंत कुटुंबाकडून तिला पत्नी म्हणून विकत घेणार आहे ! ही मुलगी दिसायला फारशी सुरेख नसली तरी "कामाला वाघ" अशी आहे. तिच्याबरोबर वांगलुंगचा संसार फुलतो. तिच्या आणि वांगलुंगच्या एकत्र कष्टामुळे त्यांचं शेतीचे उत्पन्नही वाढतं आणि दरवर्षी मुलं होऊन पोरांची संख्याही वाढते. पण दुष्काळामुळे या कुटुंबावर परागंदा व्हायची वेळ येते. शहरात मोलमजुरी करून; प्रसंगी भीक मागून हे कुटुंब तगतं. पण वांगलुंगच्या मनातला सच्चा शेतकरी सतत आपल्या जमिनीची आठवण काढत असतो. त्यामुळे मिळेल तेव्हा, मिळेल तसे पैसे मिळवून तो पुन्हा आपल्या घरी परत येतो.

तो कष्टाने आपली शेती वाढवतो. दैवही त्याच्यावर पसंत होतं आणि तो एक मोठा जमीनदार होतो. ज्या जमीनदाराकडून त्याने आपली पत्नी विकत घेतली होती त्या जमीनदाराच्या बरोबरीचा होतो. पण श्रीमंत होता होता श्रीमंती शौकही त्याच्या मनात शिरतात. एकीकडे गरीब शेतकरी हा पिंड तर दुसरीकडे नव्याने मिळालेली आर्थिक सुबत्ता व सामाजिक स्थान याचा अनुभव घ्यायची ओढ! आपण जमीन टिकवली, कष्ट करून शेती वाढवली हा अभिमान एकीकडे तर गरीब, अडाणी असल्यामुळे कधी स्वप्नातही बघितली नव्हती अशी सुख हापापल्यासारखी मिळवायची वृत्ती ! अशा दोन विसंगत वृत्तींनी त्याचं वागणं-बोलणं घडतंय बिघडतंय. त्याची मुलं सुद्धा आता शेतकऱ्याची मुलं राहिली नाहीत तर जमीनदाराची मुलं आहेत साहजिकच त्यांच्या वागण्यातही बदल आहे. त्याच्यावर अवलंबून असणारे नातेवाईक सुद्धा आता त्याला लुबाडायला उत्सुक आहेत. अशावेळी त्याच्यावर पुन्हा एकदा संकट येतं. वांगलुंगला म्हातारा होई पर्यंतचे प्रसंग ह्यात आहेत. 

एकूणच गरिबी-श्रीमंतीचा खेळ; दैव-सुदैवाचा खेळ आणि त्या त्या परिस्थितीनुसार बदलत जाणारी मानवी वृत्तीचा आविष्कार याचं अतिशय सुंदर दर्शन या पुस्तकातून आपल्याला घडतं. त्यावेळच्या चीनची सामाजिक परिस्थिती सुद्धा आपल्या लक्षात येते. आजही आपल्या समाजात मुलींना योग्य तो सन्मान मिळत नाही. शंभर वर्षांपूर्वी परिस्थिती फारच भीषण होती. या पुस्तकात तर असं दिसतं की मुलगी झाली म्हणजे ती एकतर लग्न करून पाठवण्यासाठी किंवा दासी म्हणून कोणाला विकण्यासाठी हेच जणू गरिबांचं धोरण. म्हणून दासी विकत घेतली, मुलगी दासी म्हणून विकली असे प्रसंग आपल्याला पुस्तकात दिसतात. सर्व कुटुंबीयांची काळजी घेण्याची जबाबदारी जशी कुटुंबप्रमुखाची त्याच बरोबर सगळे कुटुंबीय ही त्याची मालमत्ता सुद्दा असायचे. त्यामुळे आपल्या मुलांनी काय शिकावं, काय शिकू नये, कोणाशी लग्न करावं हे सगळं आपल्या व्यव्यसायाला पूरक ठरेल त्याप्रमाणे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य कुटुंबप्रमुखाच. आजच्यासारखं प्रत्येकाची आवडनिवड असली भानगड नाही. 

दुष्काळामुळे लोक अन्नाच्या कणाकणासाठी एकमेकांवर तुटून पडतात. अगदी आपली जनावरही त्यांना खावी लागतात. दरोडेखोर बनून लूटमारही होते. याचं भीषण वर्णन पुस्तकात आहे. कष्टकऱ्यांचं दुःखदायक आयुष्य, श्रीमंतांची ऐष. दोघांचा एकमेकांकडे बघण्याचा दृष्टिकोन परस्पर तिरस्काराचा. गरिबाला श्रीमंत व्हायची अनिवार इच्छा आणि ते जमत नसेल तर प्रसंग मिळेल तेव्हा श्रीमंताला शब्दशः लुटण्याची त्यांची तयारी. हा सत्ता संघर्ष सुद्धा या कादंबरीत अतिशय परिणामकारकपणे मांडला आहे.

कादंबरीचा कालपट मोठा आहे. वांगलुंगचं पूर्ण जीवन त्यात येतं. तरीही प्रसंगांचा झपाटा चांगला आहे. त्यामुळे आपण खिळून राहतो पुढे काय होईल याची उत्सुकता सतत राहते. असं असूनही प्रत्येक प्रसंग मात्र योग्य तितक्या तपशिलात, अतिशय शांतपणे वर्णन करून सांगितला आहे. जेणेकरून त्या प्रसंगाचं गांभीर्य म्हणा किंवा त्या पात्रांच्या मनात उठणारे तरंग आपल्यापर्यंत अगदी स्पष्ट पोहोचतात.

वांगलुंगची पत्नी "ओ लान" ही एक दासी आणि त्यानंतर एक पत्नी असूनही तिचं स्थान दासी सारखंच. हे त्यावेळच्या पुरुषप्रधान कुटुंब व्यवस्थेचं अगदी परिणामकारक चित्र. तर त्याचवेळी शौक म्हणून; एक खेळणं म्हणून अंगवस्त्र बाळगणं ही कशी पुरुषी वृत्ती आहे हा सुद्धा भाग त्यात येतो.


चीनी समाजातले चमत्कारिक काही रीतिरिवाज सुद्धा ह्यात आपल्याला दिसतात. एक उदा. माणूस मरायला टेकला की त्याची शवपेटी आधीच बनवून घेतली जाते. ती घरी पण आणून ठवतात. आणि मारणारा माणूस पण आपल्या कुटुंबाने आपली किती छान काळजी घेतली हे बघून कृतकृत्य होतात.

काही प्रसंग बघूया.
वांगलुंग आपल्या पत्नीला आणायला जातो तो सुरुवातीचा प्रसंग.



भीषण दारिद्र्यात त्यांना भीक मागून जगावं लागतं तो प्रसंग.


श्रीमंत झाल्यावर वांगलूंच्या वागण्यातला बदल


वांगलुंगचा चुलत भाऊ सैनिक म्हणून जातो आणि काही वर्षांनी वांगलूंच्या घरी येतो तेव्हा त्याच्या वासनापूर्तीसाठी एक दासी त्याला दिली जाते तो प्रसंग.


अजून खूप छोट्या मोठ्या गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. लक्षात राहण्यासारख्या आहेत. पण त्या सगळ्या सांगितल्या तर भावी वाचकांना रसभंग होईल. म्हणून अधिक ना लिहिता थांबतो.


पुस्तकाच्या मागील बाजूस म्हटलं आहे त्याप्रमाणे ही गोष्ट जरी चीन मध्ये घडत असली तरी ती जगात कुठेही घडू शकेल अशी आहे. शेतकरी, त्यांचं आपल्या मातीवर प्रेम, ओला-सुका दुष्काळ, गरीबांना श्रीमंतांबद्दल वाटणारी असूया, श्रीमंतीची स्वप्ने, कष्ट करून श्रीमंत होणाऱ्या माणसाचे वर्तन आणि श्रीमंती आयती मिळालेल्या त्याच्या पुढच्या पिढ्यांचे वर्तन, कुटुंबासाठी झिजणारी गृहिणी ... ह्या सगळ्या वैश्विक गोष्टी आहेत. त्यामुळे ही कादंबरी परकी अजिबात वाटत नाही. अनुवादही तितकाच सहज, सुंदर आणि ताकदीचा आहे. चिनी पार्श्वभूमी, मूळ पुस्तकाची इंग्रजी भाषा, अमेरिकन लेखिका, त्याचा मराठी अनुवाद (आणि सध्या चिनी भाषा शिकणारा मी) असा जगप्रवास पुस्तकाने केला आहे.

वांगलुंगच्या आयुष्याचे सहप्रवासी नक्की व्हा. एक गंभीर, रंजक, सकस, अर्थपूर्ण कादंबरी वाचल्याचं समाधान नक्की लाभेल.

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————


निवडक विश्वसंवाद (Nivadak Vishwasamwaad)


पुस्तक - निवडक विश्वसंवाद (Nivadak Vishwasamwaad)
लेखक - मंदार कुलकर्णी (Mandar Kulkarni)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - २४३
प्रकाशन - राजहंस प्रकाशन, जून २०२२
ISBN - 978-93-91469-77-1

विश्वसंवाद ह्या "पहिल्या मराठी पॉडकास्ट" मध्ये श्री. मंदार कुलकर्णी ह्यांनी वेगवेगळ्या मराठी व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या आहेत. ह्या मुलाखती त्यांच्या पॉडकास्ट वर आणि युट्युब चॅनल वर ऐकता येतात. ह्या ६०हून अधिक मुलाखतींपैकी निवडक १३ मुलाखती आता पुस्तक रूपाने प्रसिद्ध होत आहेत. ह्या आणि इतर मुलाखतीचे नायक-नायिका रूढार्थाने प्रसिद्ध/लोकप्रिय नाहीत. पण आपापल्या क्षेत्रात वेगळी उंची गाठून त्यांनी स्वतःचं नायक्तत्व सिद्ध केलं आहे. "ज्ञानाधारित समाज" जिथे - व्यक्तीचं ज्ञान, कौशल्य - अधिकाधिक महत्त्वाचं ठरणार आहे - तिथे ह्या व्यक्तींचं काम पथदर्शी आहे.

सर्वप्रथम आपण मंदार कुलकर्णी ह्यांची ओळख करून घेऊया.



आता प्रत्येक व्यक्तीबद्दल थोडक्यात समजून घेऊया

१) अतुल-प्राजक्ता - हे दाम्पत्य नागपूरला राहतं आणि स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी चालवतात. पण त्याचबरोबर ‘Angel Mentoring’ म्हणून ज्याचं वर्णन करता येईल असं अगदी वेगळं क्षेत्र त्यांनी आपल्या कामातून निर्माण केलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचं सामाजिक काम करू पाहणाऱ्या तरुण मंडळींना आर्थिक मदत तर करतातच पण त्यांना व्यवसायिक मार्गदर्शन, व्यवस्थापन मार्गदर्शन करतात. त्यामुळे "फक्त देणगी देऊन थांबलो", असं ना होता नव्या सामाजिक कामाला योग्य आधार मिळतो . आणि ते काम पुढे टिकून राहण्याचे शक्यता वाढते.
सामाजिकता आणि व्यावसायिकता ह्यांचा सुरेख मिलाफ साधून ते समाज शांतपणे समाज परिवर्तन करत आहेत.
त्यांची ह्यामागची भावना किती तर्कशुद्ध आणि निखळ आहे पहा - 



२) सानिया किर्लोस्कर - "टीच फॉर इंडिया" चळवळीच्या माध्यमातून महाराष्ट्रात आणि सुदूर ईशान्य भारतातील दुर्गम भागात शिक्षण पोचवण्यासाठी झटणारी युवती.

३) काशिराज कोळी - "घर तिथे वाचक" ही चळवळ सुरु केली आहे. स्वखर्चातून गावात बैलगाडीतून फिरते आणि मोफत वाचनालय सुरु केले. आज उपक्रम वाढत आहे.

४) सुनील खांडबहाले - बहुभाषिक शब्दकोशाची निर्मिती करणारे सुनील ! आधी सीडी, मग एसएमएस आणि नंतर वेबसाईटच्या माध्यमातून मराठी आणि इतर भारतीय भाषांच्या डिक्शनरी त्यांनी तयार केल्या आहेत. नाशिक मध्ये आयोजित होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तिथल्या सॉफ्ट्वेअर कंपन्या, उद्योजक, व्यक्तिगत प्रोग्रामर ह्यांना एकत्र आणून कुंभमेळ्यातील वेगळावेल्या समस्यांसाठी तंत्रज्ञानाधारित सिस्टीम तयार करण्यात त्यांनी पुढाकार घेतला आहे. ह्या माध्यमातून काही स्टार्टअप सुद्धा सुरु झाल्या आहेत.
कॉलेजच्या वयात एक मोठं ध्येय डोळ्यासमोर ठेवून स्वतःचे पैसे, कष्ट ह्या कामात लावण्याचा हा टप्पा 


५) अपूर्वा जोशी - "फॉरेन्सिक अकाउंटींग" म्हणजे "न्याय-सहायक लेखापरीक्षण" ह्या नवोदित क्षेत्रात अपूर्वाजींनी स्वतःचा ठसा उमटवला आहे. जेव्हा आर्थिक गुन्हा घडतो तेव्हा त्या खटल्याच्या आर्थिक बाजूचं जे शोधकाम आहे ते नेहमीच्या गुन्ह्यांपेक्षा खूप वेगळं आहे. त्यासाठी आर्थिक व्यवहाराच्या बाजू एखाद्या बँकर प्रमाणे समजून घ्यायच्या , कर-कायदे कानून एखाद्या सी ए प्रमाणे समजून घ्यायच्या आणि ऑनलाईन व्यवहारांतलं तांत्रिक बाजूही समजावून घ्यायची. असं बहुपेडी काम आहे.
त्या स्वतः ह्या क्षेत्रातल्या पहिल्या काही व्यक्तींपैकी आहेत. आणि त्यांनी ह्या विषयाचा अभ्यासक्रमसुद्धा तयार केला आहे.

६) दत्ता पाटील - अमेरिकेत याहू कंपनीत काम करणारे दत्ताजी आपल्या महाराष्टातल्या खेडेगावातल्या पाणी प्रश्नाने अस्वस्थ झाले. मग त्यांनी सुट्टी घेऊन, गावी येऊन स्वतः पुढाकार घेऊन गावकऱ्यांना एकत्र आणलं. लोकसहभागातून जलसंधारणाची कामं केली आणि गाव पाणीदार केलं.

७) अनिमा पाटील-साबळे - अवकाशात प्रवास करणारे अंतराळवीरांचे अनुभव हे रोमांचक असतात. आपल्यालासुद्धा अशी सफर करायला मिळावी अशी स्वप्न आपण बघतो. पण हे स्वप्न पुरं व्हावं ह्यासाठी पाठपुरावा करावा करणारे खूप थोडे. पण लग्नानंतर, एक मूल झालं असताना अमेरिकेत राहताना आपल्या ह्या स्वप्नाचा पाठपुरावा अनिमाजींनी केला. त्यासाठीचे कोर्सेस, पदवी, अभ्यासक्रम पूर्ण करत "नासा"मध्ये प्रवेश मिळवला. सध्या त्या वेगवेगळ्या संशोधन प्रकल्पांत काम करत आहेत. अंतराळ प्रवासासाठीची जी शारीरिक, मानसिक तयारी लागते त्याबद्दलच्या काही प्रयोगांत भाग घेत आहेत. त्यांचा इथपर्यंतचा प्रवास आणि सध्याचं काम फारच रोचक आहे.
त्यांच्या एका संशोधन प्रकल्पाबद्दल..



८) शिरीष फडतरे आणि मेधा ताडपत्रीकर - प्लॅस्टिक पासून इंधननिर्मिती करून प्लॅस्टिक कचऱ्याच्या प्रश्नावर सकारात्मक उत्तर शोधणारे उद्योजक

९) आशिष महाबळ - कॅलिफोर्निया विद्यापीठात अंतराळ संशोधन, मराठी विज्ञान कथा लेखन, नाण्यांचा संग्रह, संस्कृत भाषेचा अभ्यास अश्या बहुरंगी प्रतिभेचे धनी

१०) प्रकाश यादगिरे - गावातल्या मुलांना गणिताची गोडी लागावी म्हणून गावातल्या घरांच्या भिंतींवर गणिताची सूत्रे, प्रमेये लिहिण्याचा अभिनव प्रयोग राबवणारे विद्यार्थीप्रिय शिक्षक.

११) प्रदीप लोखंडे - भारतातल्या ४९हजार खेड्यांची माहिती असलेला डेटाबेस तयार करणारे आणि १९९३ पासून "रिलेशनशिप मार्केटिंग"ची अभिनव कल्पना राबवणारे उद्योजक.
(सुमेध वडावाला(रिसबूड) ह्यांनी लिहिलेले "प्रदीप लोखंडे, पुणे-१३" हे पुस्तक मी पूर्वी वाचले होते. त्याचे परीक्षण पुढील लिंकवर वाचू शकाल
http://learnmarathiwithkaushik.com/courses/pradeep-lokhande-pune-13/)

१२) अतुल वैद्य - हिंदी सिनेसंगीताच्या कराओके सिस्टीमचे आद्य निर्माते; इप्रसारण ह्या इंटरनेट रेडिओचे संस्थापक संचालक

१३) दिनेश वैद्य - भारतीय संस्कृतीचे परंपरागत ज्ञान असंख्य पोथ्यांमध्ये विखुरलेले आहे. ह्या पोथ्या जुन्या आणि बऱ्याचवेळा जीर्ण झाल्यामुळे ते ज्ञान कायमचं लुप्त होईल का काय अशी भीती आपल्याला भेडसावते आहे. पौरोहित्य म्हणजे "गुरुजी" म्हणून काम करणाऱ्या दिनेश वैद्यांना ह्या परिस्थितीने अस्वस्थ केले. हे ज्ञान कायमस्वरूपी जतन व्हावे म्हणून स्वतःच्या पैशाने प्राचीन हस्तलिखितं आणि पोथ्यांचे डिजिटायझेशन त्यांनी सुरु केले.



मला सांगायला अभिमान वाटतो की , विश्वसंवाद वर मंदारजींनी माझीही मुलाखत घेतली आहे. माझ्या ऑनलाईन मराठी आणि गुजराथी शिकवण्याच्या उपक्रमाबद्दल आम्ही गप्पा मारल्या आहेत. तो भाग आपण पुढील लिंकवर ऐकू शकाल. https://www.youtube.com/watch?v=2BRHC2aPXqI


विश्वसंवाद च्या युट्युब चॅनलची लिंक https://www.youtube.com/c/Vishwasamwaad

ह्या पुस्तकात किती वेगवेगळी व्यक्तिमत्व तुम्हाला भेटतील ह्याचा अंदाज आला असेलच. मंदार कुलकर्णी ह्यांची मुलाखतीची शैली ही खूप छान आहे. मुलाखतींपेक्षा सहज गप्पा असंच हे स्वरूप आहे. तरी नेमके प्रश्न विचारून ह्या व्यक्तींचं काम समजावून घेतलं आहे, त्याचं वेगळेपण अधोरेखित केलं आहे. ह्या कामामागच्या प्रेरणा; त्यासाठी घ्यावे लागलेले कष्ट हे सुद्धा छान उलगडून घेतलं आहे. ह्या मुलाखती अचंबित करणाऱ्या आहेत, प्रेरणादायी आहेत ! विशेषतः तरुणांना करियर म्हणून किंवा समाजकार्य करण्यासाठी मळलेल्या वाट सोडून काहीतरी कल्पक विचार करायला लावणाऱ्या आहेत.

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

અંબાજી એક્સપ્રેસ (अंबाजी एक्प्रेस Ambaji Express)




पुस्तक - અંબાજી એક્સપ્રેસ अंबाजी एक्प्रेस (Ambaji Express)
भाषा - ગુજરાતી गुजराथी Gujarati
लेखिका - અર્ચના દેસાઈ अर्चना देसाई Archana Desai 
पाने - ?  (स्टोरीटेल वर ऐकायला दोन तास)
ISBN - दिलेला नाही

हे गुजराती पुस्तक मी "स्टोरीटेल"वर ऐकलं. एक छान कौटुंबिक आणि प्रेम कहाणी आहे. अमेरिकेत राहणाऱ्या अनिवासी भारतीय कुटुंबात आई आणि मुलगी अशा दोघीच आहे. आई टिपिकल गुजराती पण आता न्यूयॉर्कमध्ये भारतीय जेवणाचं छोटं रेस्टोरंट चालवते आहे. तिच्या श्रद्धाळू स्वभावाला अनुसरून ती देवीला नवस बोलते की, "माझी मुलगी - जागृती - डॉक्टर झाली तर जागृती चालत तुझ्या दर्शनाला येईल". ते ही मुलीला ना विचारता; ना सांगता. जागृती डॉक्टर होते आणि रिझल्ट लागल्या लागल्या ह्या नवसाचा बॉम्ब तिच्या डोक्यावर पडतो. मग आई-मुलीचा थोडा वाद होतो. पण आई, मावशी वगैरे घरची मंडळी तिला असं काही करू देत नाहीत.

तेवढ्यात तिचा अमेरिकन बॉयफ्रेंड पण तिच्याबरोबर चालत यात्रा करायला तयार होतो. त्याला हे सगळं - कुटुंबाचं प्रेम, ही आस्था वगैरे सगळं खूप क्युट वाटत असतं.

जागृतीची मैत्रीण तिला युक्ती सुचवते की तू आईला सांग कि तुझा अमेरिकन बॉयफ्रेंड तिला चालणार असेल तरच ती हे करेल. आई कशीबशी त्याला तयार होते आणि हे दोघे भारतात मावशीकडे येतात.

मग पुढे काय काय होतं .. जुने मित्र, कुटुंबातले दुरावलेले नातेवाईक भेटतात, चालत जाताना त्रास होतो. तिच्या आणि आसपासच्या सगळ्या पात्रांत त्यातून एक नवीन विचारसंगती तयार होते. लग्न, प्रेम, नातेसंबंध, श्रद्धा ह्या सगळ्याबद्दल आपापली मतं नव्याने चाचपून बघतात. जुना मित्र भेटतो. तो बॉयफ्रेंड असेल का ? प्रेमाचा त्रिकोण तयार होईल का नाही ? हे मी सांगत नाही.

एकूण सुखांत शेवट आहे. पण पुढे काय घडू शकेल ह्याबद्दल वेगवेगळे पर्याय खुले ठेवत कथा संपते. गोष्टीत बरेच कच्चे दुवेही आहेत. काही पात्रं पूर्वी तशी का वागली हे काळत नाही. आणि अचानक वागण्यात बदल कसा झाला ते कळत नाही.

पण एक हलकीफुलकी मनोरंजक कथा. ऐकायला चांगली आहे. स्टोरीटेल वरच्या सगळ्या अभिवाचकांचं सादरीकरण, पार्श्वसंगीत अतिशय योग्य आणि आकर्षक. त्यामुळे ऐकायला मजा येते 


———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

अधर्मकांड (adharmakand)

पुस्तक - अधर्मकांड (adharmakand) लेखक - उदय भेंब्रे (Uday Bhembre) अनुवादिका - अकल्पिता राऊत देसाई (Akalpita Raut-Desai) भाषा - मराठी (Marat...