काफ्काचं 'मेटॅमॉर्फोसिस' - न संपणारं गारुड (Kafkacha 'metamorphosis' na sampanara garud)



पुस्तक - काफ्काचं 'मेटॅमॉर्फोसिस' - न संपणारं गारुड (Kafkacha 'metamorphosis' na sampanara garud)
लेखक - डॉ. सुहास भास्कर जोशी (Dr. Suhas Bhaskar Joshi)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १३५
प्रकाशन - डिसेंबर २०२३, राजहंस प्रकाशन
ISBN - 978-81-91469-02-03
छापील किंमत -रु. २०० /-

जागतिक साहित्य, प्रभाव टाकणारं साहित्य, स्वतःची शैली निर्माण करणारा लेखक, नवीन तत्वचिंतनात्मक मांडणी करणारा लेखक अशा संदर्भातल्या साहित्यिक लेखांमध्ये "काफ्का" हे नाव बऱ्याच वेळा वाचलं होतं. पण अजूनपर्यंत मी त्याचं लिखाण काही वाचलं नव्हतं. उत्सुकता होतीच. त्यामुळे वाचनालयात नवीन पुस्तकांच्या विभागात हे ताजं, कोरं आणि आकर्षक पुस्तक बघितल्यावर लगेच घेतलं. पुस्तक वाचताना कळलं की फ्रान्झ काफ्का हा जर्मन भाषेत लिखाण करणारा लेखक होता. आणि "मेटॅमॉर्फोसिस" ही त्याची अतिशय गाजलेली लघुकादंबरी किंवा दीर्घकथा. तिचं मूळ जर्मन नाव Die Verwandlung. १९१२ मध्ये काफ्काने लिहिली. १९१५ मध्ये प्रकाशित झाली. त्याची अनेक इंग्रजी भाषांतरं झाली आहेत. त्यापैकी इयन जॉनस्टन ह्यांनी केलेल्या इंग्रजी अनुवादाचा मराठी अनुवाद ह्या पुस्तकात आहे.

ही कादंबरी पहिल्या वाक्यापासून खिळवून ठेवते. "एके दिवशी सकाळी अस्वस्थ करणाऱ्या स्वप्नातून ग्रेगॉर सॅम्सा त्याच्या अंथरुणात जागा होत होता, तेव्हा त्याला जाणवलं की त्याचं रूपांतर एका राक्षसी आकाराच्या किड्यात झालं आहे. आपल्या चिलखतासारख्या पाठीवर तो पडून राहिला .." अशा एका चमत्कृतीपूर्ण प्रसंगासमोर लेखक आपल्याला उभे करतो. ग्रेगोर आपल्या नव्या शरीराचा काहीही खळखळ न करता स्वीकार करतो. पण ह्या किड्याच्या शरीराशी जुळवून घेणं जरा कठीण जातं. मग त्याच्या घरच्यांना हे भयानक वास्तव कसं कळतं, त्यांच्या प्रतिक्रिया कशा होतात ह्याचं चित्रमय वर्णन पुस्तकात आहे. सुरुवातीला कुतूहल, मग भीती, मग काळजी आणि मग वास्तवाचा स्वीकार अशा टप्प्यावरून ग्रेगोर आणि त्याचं कुटुंबीय चालत राहतं. घरातला "कमावता हात" असणारा ग्रेगोर ह्या अवस्थेत सापडल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सुद्धा थोडी खालावते. त्याचा परिणाम त्यांच्या संबंधांवरही होतो. भाऊ म्हणून , मुलगा म्हणून त्याच्याकडे बघायचं का "अजस्त्र ओंगळ प्राणी" म्हणून बघायचं ? त्याच्याशी जखडून घ्यायचं का त्याला सोडून द्यायचं ? इतरांना कळून द्यायचं का लपवायचं ? असे कितीतरी प्रश्न इथे उभे राहतात. त्यातून पुढे काय होतं? ग्रेगोरला घरी ठेवतील का घराबाहेर काढतील ? तो असाच जगेल का मरेल ? तो पुन्हा माणूस होईल का? आणि मुळात तो किडा किंवा प्राणी झालाच का ? हे सगळं समजून घ्यायचं असेल तर हे पुस्तक वाचा !

"मेटॅमॉर्फोसिस" अर्थात रूपांतर मध्ये, पहिला प्रसंग हाच चमत्कृतीपूर्ण आहे. बाकी पुढचं कथानक अगदी बुद्धिगम्य पटणारं असं आहे. कल्पनारंजनाचा अतिरेक झाला नाही. त्यामुळे आपण सुद्धा "खरंच असं झालं तर काय होईल" ह्या मानसिक खेळात रममाण होतो. त्यामुळे पुढे वाचायची उत्सुकता टिकून राहते. भाषांतर सुद्धा चांगलं आणि प्रवाही झालं आहे. मूळ कथानकात फक्त "पाश्चात्त्य" पार्श्वभूमीतच घडू शकेल असा भाग फार नाही. त्यामुळे तिकडचे संदर्भ मराठीत आणतानाची ओढाताण नाही. आपण त्या गोष्टीशी लगेच "रिलेट" करू शकतो.

ह्या पुस्तकात ५५ पानी भाषांतर आहे. त्यानंतर नंतर काफ्काचं आयुष्य, व्यक्तिमत्त्व, लेखन ह्याची माहिती दिली आहे. तर त्यानंतर ह्या साहित्यकृतीचं आस्वादात्मक विश्लेषण आहे. काफ्काने कथेत किड्याचं/प्राण्याचं नाव सांगितलेलं नाही. तर मोघम वर्णन आहे. असं का असावं? माणसाचा किडा झाला ह्यात प्रतीकात्मकता असेल तर त्याचा काय अर्थ असेल ? ज्या व्यक्तिरेखा त्यात आहेत त्यातून कुठले मानवी स्वभाव लेखकाला दाखवायचे आहेत ? ह्याचा धांडोळा घ्यायचा प्रयत्न आहे.

शंभर वर्ष होऊन गेली तरी "मेटॅमॉर्फोसिस"चं गारूड कायम आहे. देशोदेशीच्या लेखकांनी "माणसाचं अचानक प्राण्यात रूपांतर झालं आणि पुढे काय घडलं" ह्या धर्तीवर कथा, कादंबऱ्या , नाटकं लिहिली आहेत. प्रत्येकात प्राणी वेगळे. कधी गेंडे, कधी झुरळ तर कधी कोल्हे. त्यातून साधलेली प्रतीकात्मकता वेगळी आणि सुचवलेला सामाजिक, राजकीय अर्थ सुद्धा वेगळा. काफ्काच्या वेळीच ब्रिटिश लेखकाने "तरुणीचं रूपांतर कोल्हीमध्ये" ह्या धर्तीवर कथा लिहिली ती कथा थोडक्यात आहे. विशेष म्हणजे काफ्काने स्वतः 
ती कथा वाचली होती. आणि "ती माझं अनुकरण नसून वेगळी कलाकृती आहे" असं म्हटलं होतं. अशी आठवण पुस्तकात सांगितली आहे. अजून काही पाश्चात्य उदाहरणे आहेत. सध्याचा जपानी लेखक हारुकी मुराकामीने उलट कथा लिहिली आहे की "एका प्राण्याचं ग्रेगोर सॅम्सा मध्ये रूपांतर झालं आहे. विलास सारंग, जी.ए. कुलकर्णी ह्या भारतीय लेखकांच्या पण भन्नाट कथा ह्याच प्रकारात मोडतात त्याची सविस्तर चर्चा आहे. पुस्तकाच्या प्रस्तावनेत सुद्धा वसंत आबाजी डहाके ह्यांनी काफ्काचं असं रसग्रहण केलं आहे.
भारतीय पुराणकथांमध्ये असे चमत्कार, विचित्र प्राणी, शाप-उ:शाप ह्यांच्या खूप कथा आहेत. त्यातल्या काही कथासुद्धा ह्या साच्यात बसणाऱ्या असतील असं मला वाटतं. पण अशा पौराणिक किंवा लोकसाहित्यातील गोष्टींचा उल्लेख पुस्तकात नाहीये.  काफ्काचे पूर्वसुरी त्यातून शोधता आले असते. पण कदाचित लेखकाला ही चर्चा  आधुनिक काळातील साहित्या पुरतीच करायची असावी.  


काही पाने उदाहरणादाखल

लेखकाची माहिती


अनुक्रमणिका


मेटॅमॉर्फोसिस मधील एक प्रसंग. किड्याच्या शरीराशी जुळवून घ्यायचा प्रयत्न आणि ग्रेगोरची बहीण भीत भीत त्याची कशी काळजी घेते त्याबद्दल


मेटॅमॉर्फोसिस मधून काय सूचित करायचं असेल ह्याबाद्दल लेखकाचं विश्लेषण



काफ्काएस्क इतर कथा ... माणसांचे झाले गेंडे; तसेच जी.एं ची एक कथा ह्याबद्दल



हे पुस्तक वाचून फक्त "मेटॅमॉर्फोसिस"च वाचायला मिळालं नाही तर, काफ्का बद्दल कळलं. एखाद्या कलाकृतीचे वेगवेगळे अर्थ कसे काढता येऊ शकतात हा विश्लेषणाचा भाग समजला. एकाच सूत्रावर आधारित पण तरीही भिन्न साहित्यकृती गोळा करण्याचा लेखकाचा प्रयत्न भावाला. त्यातून "माणूसपण", त्याच्या भावना, समस्या ह्या जगभर किती सारख्या आहेत हे यथार्थ चित्र उभं राहील. असं हे "फुल पॅकेज" पुस्तक माझ्या सारख्या "काफ्का"ला अपरिचित व्यक्तीला भावलं नाही तरच नवल. त्यातून काफ्काचं अजून वाचायची इच्छा तर होतेच पण लेखक सुहास जोशी ह्यांचं इतर लेखन वाचायची उत्सुकता सुद्धा तयार होते !



———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

भारतीय अर्थकारण (Bharatiya Arthakaran)




पुस्तक - भारतीय अर्थकारण (Bharatiya Arthakaran)
लेखक - चंद्रशेखर टिळक (Chandrashekhar Tilak)
भाषा- मराठी (Marathi)
पाने - १८३
प्रकाशन - मोरया प्रकाशन, जानेवारी २०२४
ISBN - 978-93-92269
छापील किंमत - २२५/- रु.

२०१४ साली भारतात मोदी सरकार आल्यापासून त्यांनी अनेक लहानमोठे निर्णय घेतले आहेत ज्यातून भारतीय अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होत आहेत. प्रत्येक निर्णय घेण्यामागचं कारण वेगळं, त्याचा परिणाम वेगळा आणि यशापयश सुद्धा वेगळं. काही निर्णय लोकांना आवडले; काही नाही. काही निर्णय खूप चर्चिले गेले तर काहींची फार वाच्यता झाली नाही. पण ह्या सगळ्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम आपल्या आयुष्यावर, उत्पन्नावर, खर्चावर होत आहे. जसे सरकारचे निर्णय आपल्यावर परिणाम करतायत तशी स्थानिक आणि जागतिक परिस्थितीसुद्धा आपल्यावर परिणाम करते. कोरोना हे त्याचं मोठे उदाहरण. जगात होणाऱ्या युद्धांमुळे पेट्रोलचे चढते-उतरते दर आपण बघत असतोच. एक सर्वसामान्य नागरिक म्हणून सरकारी निर्णय किंवा जागतिक परिस्थिती ह्यावर आपले थेट नियंत्रण काहीच नसते. पण त्याबद्दल कुतूहल नक्कीच असते. आपापल्या कुवतीनुसार आणि ज्ञानानुसार त्यावर चर्चा करायलाही आपल्याला आवडते. आपलं हेच कुतूहल काही प्रमाणात शमवण्याचं, चर्चा करायला काही सकस मुद्दे देण्याचं काम "भारतीय अर्थकारण" हे पुस्तक करतं. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक ह्यांनी २०१९ ते २०२३ ह्या काळातल्या मोदी सरकारच्या निर्णयांवर आणि ह्या काळातल्या इतर आर्थिक घडामोडींवर प्रसंगोपात लिहिलेल्या लेखांचा हा संग्रह आहे.

चंद्रशेखर टिळक हे नाव सुपरिचित आहेच. तरी त्यांचा पुस्तकात दिलेला परिचय वाचा.



काही दिवसांपूर्वीच ह्याचे प्रकाशन झाले. त्यांनतर डोंबिवलीत अर्थसंकल्पावर टिळकांचे विश्लेषण व्याख्यान झाले तेव्हा हे पुस्तक विकत घेऊन लेखकाची सही घेण्याची संधी सुद्धा मिळाली.



अनुक्रमणिका




अनुक्रमणिकेवरून लक्षात आलं असेल की पहिला भाग "जनरल" आर्थिक घडामोडींवर, समाजात होणाऱ्या बदलांवर आहे तर दुसरा भाग मोदी सरकारचे अर्थसंकल्प, काही खास घोषणा ह्यांच्यावर आहे. काही लेखांबद्दल थोडं सांगतो म्हणजे पुस्तकाची कल्पना येईल.

"चाल"बाज चीन" - जून २०२० मधला हा लेख आहे. चीनने भारताच्या हद्दीत घुसखोरी केली, दोन्ही सैन्यांची चकमक झाली अशा बातम्या तेव्हा येत होत्या. चीनला भारताचा भाग गिळंकृत करायचा आहे हाच माझ्यासारख्याचा समज. ह्या घटनेचं अजून काही पैलू ह्या लेखात मांडले आहेत. इथे फक्त भौगोलिक आक्रमण नाही तर भारताच्या वाढत्या अर्थव्यवस्थेला "नाट लावण्याचं" कामसुद्धा चीनला करायचं आहे. भारताची परदेशी चलन साठ्यात वाढ होते आहे, परकीय गुंतवणूक वाढत आहे. चीनचा भविष्यातला स्पर्धक तयार होतो आहे. तो प्रवास थोपवण्यासाठी चीनचं हे पाऊल असू शकतं. युद्धाचे ढग भारतावर घोंगावतायत असं दिसलं की गुंतवणूकदार हात आखडता घेणार, शेअर बाजार मंदावणार असे नकारात्मक परिणाम भारतावर होतील.

बदलला ग्राहक, बदलता बाजार - कोरोनामुळे "घरून काम", "घरपोच सेवा" ह्याचं प्रस्थ कसं वाढलं आहे, त्यातून दुकानांपासून हॉटेल पर्यंत आणि मोठ्या कंपन्यांपासून पूजेला येणाऱ्या गुरुजींपर्यंत प्रत्येकाची कामाची शैली कशी बदलली आहे ह्याचं निरीक्षण.

आर्थिक सुधारणांची तिशी - १९१९ साली भारतात आर्थिक उदारीकरण झालं. त्यांनतर आलेल्या सर्व सरकारांनी सुधारणांची दिशा तीच ठेवली; भले ते सरकार कुठल्याही पक्षाचे असो. आपण "यू टर्न" घेतला नाही. असं लेखकाचं निरीक्षण आहे. तीस वर्षांत अर्थव्यवस्थेत मोठे बदल काय झाले आहेत ह्याचे ठळक मुद्दे लेखकाने सांगितले आहेत.

नोटाबादलीनंतर रोकड व्यवहार - नोव्हेंबर २०२० मधला लेख आहे. कोरोना लाट तेव्हा चालू होती. तेव्हा अर्थव्यवस्थेत रोकड व्यवहार वाढले होते असं लेखकाचं निरीक्षण आहे. नोटाबादलीनंतर रोकड व्यवहार कमी होत होते, डिजिटल वाढत होते. पण कोरोनात रोकड पुन्हा वाढली, भविष्यात परत कमी होईल. लोकांच्या वर्तणुकीत हा बदल का होतो ह्याबद्दल लेखकाने आपलं मत मांडलं आहे.

सोने एके सोने - सोन्यातली आपली गुंतवणूक आर्थिक कमी आणि भावनिक जास्त असते. ह्या अनुत्पादक खर्चातून अर्थव्यवस्थेवर कसा ताण पडतो. त्यासाठी सरकारने आणलेले "गोल्ड बॉण्ड" ह्या सगळ्याची संगती मांडली आहे.

"आत्मनिर्भर भारत" - १२ मे २०२० रोजी मोदीजींनी "आत्मनिर्भर भारत" योजनेची घोषणा झाली. ते भाषण ऐकल्यावर लेखकाच्या मनात आलेले विचार, शंका-कुशंका ह्याबद्दल.

"डिजिटल रुपया" - डिजिटल रुपया म्हणजे बिटकॉइन/क्रिप्टो करन्सी नाही. पण म्हणजे नक्की काय आहे हे लेखातून कळलं नाही तरी; हे काहीतरी भारी, वेगळं आणि भारतासाठी चांगलं आहे असा विश्वास लेखकाने जागवला आहे.

"अर्थसंकल्प आणि गुलजार" - अर्थसंकल्प म्हटल्यावर तो काहींच्या अपेक्षापूर्तीचा तर काहींच्या अपेक्षाभंगाचा दिवस. सरकारची कामगिरी छानच दिसेल अशा गोंडस शब्दांत मंत्र्यांचा भाषण करण्याचा दिवस. ह्या भावभावना ज्यातून व्यक्त होतात अशा गुलजारांच्या कवितांशी सांगड घालण्याचा आगळाच प्रयत्न.

इतर लेख दरवर्षीच्या अर्थसंकल्पाचा आढावा आहे. लेखकाला जाणवलेल्या वैशिष्ट्यपूर्ण घोषणा काय आहेत हे सांगितलं आहे. तसंच अर्थमंत्री काय बोलले, किती बोलले, काय नाही बोलले, "between the lines" काय म्हणाले आणि त्याचा अर्थ कसा लावायचा ह्यावर "expert comments" आहेत. निर्णय दिसताना आर्थिक असला तरी त्यामागे राजकीय गणित काय असेल ह्याचे आडाखे बांधले आहेत. सरकारचे निर्णय "संदिग्ध" किंवा "अनाकलनीय" वाटत असतील तर तसे सुद्धा स्पष्ट सांगितले आहे. त्यामुळे टिळक जरी भाजप आणि मोदी समर्थक असले तरी लेख लिहिताना "सगळंच छान, सगळंच गोड" असं लिहिलेलं नाही. "एक खुले पत्र निर्मला सीतारामन यांना" हा लेख तर त्या कशा गोंधळलेल्या/संदिग्ध वाटल्या ह्यावरच आहे. 
मात्र एकूणच "सडकून टीका", "कठोर निंदा", "खोट्या दाव्यांची पोलखोल" मात्र नाही. त्यादृष्टीने मोदी समर्थकांना आवडेल असं पुस्तक. जे चालू आहे ते चांगलं चालू आहे हा त्यांचा विश्वास दृढ होईल. पण "कट्टर"मोदी विरोधकांना पानोपानी मतभेदासाठी जागा दिसतील; हे मात्र नक्की.

काही पाने उदाहरणादाखल

"युद्ध आणि शेअर बाजार"


"आर्थिक सुधारणांची तिशी"
२०१८ च्या अर्थसंकल्पाविषयी

२०२१ च्या अर्थसंकल्पाविषयी



लेखक अर्थतज्ज्ञ आहेत तसेच उत्तम वक्ते आहेत, साहित्यावर प्रेम करणारे आहेत, स्वतः ललित लेखक सुद्धा आहेत. त्यामुळे आर्थिक नीतींची चर्चा करताना त्यांच्यातला "शब्दप्रेमी", "साहित्यप्रेमी" कायम हजर असतो. शाब्दिक कोट्या, शब्दचमत्कृती, खेळकर शैली, क्वचित तिरकस टोमणे; छोटी छोटी वाक्ये अशा लेखनशैलीतून धमाल करत पुस्तक जाते. जणू टिळक आपल्याशी गप्पा मारतायत असंच वाटतं. त्यामुळे विषय जड असला तरी पुस्तक अजिबात कंटाळवाणं होत नाही. पण काही लेख जास्तच शाब्दिक झाले आहेत; अर्थतज्ञापेक्षा "लेखक" जास्त झाला आहे असं सुद्धा वाटलं. "अर्थसंकल्प उंबरठ्यावर", "सुखाचा शोध की पिंपळपान", "तिळगुळ घ्या गोड बोला" हे लेख वाचताना तसं वाटलं.

हे पुस्तक असं खेळीमेळीच्या शैलीत लिहिल्यामुळे पटपट वाचून झालं. पण पूर्ण झाल्यावर लक्षात आलं की हे पुस्तक पुन्हा वाचायला हवं. कारण शैली हलकीफुलकी असली तरी मुद्दे "जड", "महत्वाचे", "विचार करण्याजोगे आहेत". ते पुन्हा वाचून त्याच्या अनुषंगिक वाचन अजून केलं पाहिजे. ज्यातून आपली जाणीव समृद्ध होईल.

ह्या पुस्तकातून मला किती कळलं हे आत्मपरिक्षण करताना मला जाणवलं की स्वतःच्या वैयक्तिक आर्थिक गुंतवणुकीचे निर्णय हुशारीने घेण्यात कमी पडणारा मी, "अर्थमंत्र्यांचं कसं चुकलं किंवा कसं बरोबर आहे" हे वाचायची हौस ठेवतो. आणि मला शाळेत असताना आम्हाला शिकवलेली एक मजेशीर कव्वाली आठवली.

हम छोटे छोटे बच्चे है हम, पढना पढाना क्या जाने ?
हम छोटे छोटे बच्चे है हम, पढना पढाना क्या जाने ?

मम्मी बोली तुम टीचर बनो,
मम्मी बोली तुम टीचर बनो,
मगर ..
मगर ..
हम खुदकी पढाई कर ना सके, लोगोंको पढाना क्या जाने ?
हम छोटे छोटे बच्चे है हम, पढना पढाना क्या जाने ?

मम्मी बोली तुम डॉक्टर बनो,
मम्मी बोली तुम डॉक्टर बनो,
मगर ..
मगर ..
हम अपनी दवाई पी ना सके, लोगोंको पिलाना क्या जाने ?
हम छोटे छोटे बच्चे है हम, पढना पढाना क्या जाने ?

मम्मी बोली तुम इंजिनियर बनो,
मम्मी बोली तुम इंजिनियर बनो,
मगर ..
मगर ..
हम अपना घर बना ना सके, लोगोंका बनाना क्या जाने ?
हम छोटे छोटे बच्चे है हम, पढना पढाना क्या जाने ?


असो, लेखकाच्या नादाने माझ्यातला शब्दप्रेमी जागा झाला वाटतं. तुमच्यातला शब्दप्रेमी, "अर्थ"प्रेमी, वाचनप्रेमी, मोदीप्रेमी, चिकित्साप्रेमी जागा करून हे पुस्तक नक्की वाचा.





———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

Chandrayaan-3 (चंद्रयान - ३)





पुस्तक - Chandrayaan-3 (चंद्रयान - ३)
लेखक - अजेय लेले (Ajey Lele)
भाषा - English (इंग्रजी)
पाने - १३६
प्रकाशन - रूपा पब्लिकेशन, २०२३
ISBN - 978-93-5702-686-4
छापील किंमत - रु. २५०/-

२३ ऑगस्ट २०२३ रोजी भारताचे "चंद्रयान" चंद्रावर यशस्वीरीत्या उतरले आणि एक इतिहास घडला. सर्व भारतीयांच्या माना अभिमानाने आणि आनंदाने उंचावल्या. क्रिकेट विश्वचषकातला अटीतटीचा अंतिम सामना ज्या उत्सुकतेने भारतीय पाहतात तीच उत्सुकता, हुरहूर एक वैज्ञानिक घटना बघण्यासाठी भारतीयांनी दाखवली. चंद्रावर उतरण्याचा ह्याआधीचा प्रयत्न - चंद्रयान-२ - अगदी शेवटच्या क्षणी असफल झाला होता. के सिवन आणि पंतप्रधान मोदी ह्यांची साश्रू नयनांनी झालेली भेट आपल्या मनावर कोरली गेली. त्या अपयशातून स्वतःला सावरून, धडा घेऊन इसरोने ही मोहीम यशस्वी केली ह्यामुळे आनंद द्विगुणित झाला. आपण सर्वांनीच शास्त्रज्ञांचे आणि भारत सरकारचे अभिनंदन केले, कौतुक केले.

पण सर्वसामान्य माणसांनी ही घटना फक्त एक "सोहळा" म्हणून मर्यादित ना ठेवता, ह्या घटनेबद्दल, प्रकल्पाबद्दल आपलं ज्ञान वाढवलं पाहिजे. ह्यातली तांत्रिक आणि वैज्ञानिक माहिती समजून घेतली पाहिजे. आपापल्या बुद्धीच्या कुवतीनुसार एक पाऊल तरी पुढे टाकलं पाहिजे. माझं हे मत जर तुम्हाला मान्य असेल तर अजेय लेले लिखित Chandrayaan-3 पुस्तक तुम्हाला मदतरूप होईल.

आधी लेखकाची ओळख करून घेऊया. पुस्तकात दिलेली लेखकाची माहिती


इंटरनेट वर दिलेली त्यांची माहिती ( https://www.idsa.in/profile/alele )
Group Captain Ajey Lele (Retd.) was a Senior Fellow at the Manohar Parrikar Institute for Defence Studies and Analyses and headed its Centre on Strategic Technologies. He started his professional career as an officer in the Indian Air Force in 1987 and took early retirement from the service to pursue his academic interests. He has a Masters degree in Physics from Pune University, and Masters and MPhil degrees in Defence and Strategic Studies from Madras University. He has done his doctorate from the School of International Studies, Jawaharlal Nehru University (JNU), New Delhi. His specific areas of research include issues related to Weapons of Mass Destruction (WMD), Space Security and Strategic Technologies. He has contributed articles to various national and international journals, websites and newspapers. He has authored ten books and has also been an editor for seven books. He is a recipient of K. Subrahmanyam Award (2013) which is conferred for outstanding contribution in the area of strategic and security studies.
Gp Capt Ajey Lele is on the Editorial Committee of the Journal of Defence Studies.

चंद्रयान मोहिमेची सर्व अंगांनी ओळख व्हावी हा लेखकाचा उद्देश दिसतो. 
अनुक्रमणिकेवर एक नजर टाका


India scripts history - भारताच्या अवकाश संशोधनाच्या प्रवासाचा थोडक्यात मागोवा. भारताने चंद्र मोहिमेचा विचार करायला २००३ सुरुवात केली. त्यामागे काय विचार होता

The dynamics of the moon - मोहिमेसाठी "चंद्र"च का ? ह्या प्रश्नाचं उत्तर सविस्तरपणे दिलं आहे. चंद्र आणि पृथ्वीचा संबंध, चंद्रावर असू शकणारी खनिजे, लांब पल्ल्याच्या मोहिमांसाठी एक थांबा असे नाना पैलू ह्यात आहेत.

India's first two missions to the moon - चंद्रयान-१ आणि २ मोहिमा काय होत्या. त्यांची उद्दिष्टे. यानाची रचना. यशापयश. यान म्हणजे फक्त वाहन नाही तर त्यात वेगवेगळी यंत्रे असतात ; रडार, क्ष-किरण प्रक्षेपक, कॅमेरे वगैरे. आणि हे फक्त भारताचंच नाही तर इतर देशही अशा मोहिमांत सहभागी होऊन आपापली यंत्र यानातून पाठवतात.

Chandrayaan-3:ISRO's moon supremacy - चंद्रयान-३ यानाची रचना, त्यातली यंत्रे ह्यांची माहिती. हे यान पृथ्वीवरून थेट चंद्रापर्यंत पोचलं नाही तर आहि पृथ्वीभोवती फिरत फिरत एक विशिष्ट उंचीवरून चंद्राकडे गेलं आणि तिथे चंद्राभोवती फिरत फिरत खाली उतरलं. हा प्रवास सोप्या शब्दांत समजावला आहे. यान उतरल्यावर पुढे काय झालं हे सांगितलं आहे.

Learning from Chandrayaan-2's failure - चंद्रयान-२ का अपयशी ठरलं ह्याची इसरो ने शोधलेली कारणं आणि त्यानुसार चंद्रयान-३ मध्ये काय बदल केले गेले. अनंत अवकाशात संपूर्णपणे अनोळखी ठिकाणी काय काय घडू शकेल ह्याचा फक्त कल्पनेनेच विचार करून शास्त्रज्ञांना सगळी तयारी करावी लागते. तशी दणकट यंत्र बनवावी लागतात. त्याचं सॉफ्टवेअर लिहावं लागतं. मी स्वतः एक "सॉफ्टवेअर इंजिनियर" असल्याने "unclear requirement" साठी कोडिंग करताना किती त्रास झाला असेल ह्याची मी कल्पना करू शकतो.

Industry and people - हा प्रकल्प इसरो चा असला तरी सगळी यंत्र काही इसरो तयार करत नाही. ते काम "आउटसोर्स" असतं. भारतातल्या वेगवेगळ्या सरकारी आणि खाजगी कंपन्या ह्यासाठी लागणारे यंत्रांचे भाग बनवतात. आणि सर्वात शेवटी सगळं एकत्र होऊन प्रक्षेपक, त्याची यंत्रणा, यान बनतं. हे काम करणाऱ्या महत्त्वाच्या कंपन्या आणि त्यांचं काम ह्याबद्दल प्रत्येकी दोनचार ओळीचा आढावा आहे. उच्च दर्जा सांभाळणं, अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करणं, ठरलेल्या वेळेत काम पूर्ण करणं हे सगळं प्रत्येक कंपनी करते. त्यामुळे शास्त्रज्ञांच्या विचारांना मूर्त स्वरूप देणारे हे भागीदार आहेत. हा विचार वाचकांच्या मनावर ह्यातून बिंबवला जातो.

Global moon agenda - अमेरिका, रशिया, चीन, जपान, उ. कोरिया, द.कोरिया, इस्रायल ह्या प्रगत देशांनी कुठल्या चंद्रसफरी केल्या आहेत; पुढे त्यांच्या काय योजना जाहीर झाल्या आहेत ह्याची थोडक्यात माहिती आहे. ह्यातून भारत जगात कुठे आहे ह्याचं भान येतं. चंद्रयान-३ हा मोठा टप्पा आहे आणि पल्ला खूप लांबचा आहे ह्याची जाणीव होते.

Moon rovers: An overview - प्रत्यक्ष अंतराळवीर चंद्रावर उतरणे आणि "रोव्हर" अर्थात यांत्रिक बग्गी चंद्रावर फिरणे हे दोन पर्याय मानवापुढे उपलब्ध आहेत. दोन्हीचे स्वतःचे फायदेतोटे आहेत. आत्तापर्यंत झालेल्या देशोदेशीच्या महत्वपूर्ण मोहिमांमध्ये बग्गीचा वापर कसा केला गेला ह्याची माहिती आहे.

India's moon tryst - पुढे काय ? भारताचा चंद्राबद्दलची पुढची योजना अजून निश्चित समोर आलेली नाही. चंद्रावर स्वारी करायच्या राजकीय स्पर्धेत उतरायचं; का सहकारी-संशोधन करायचं का आणि काही हा प्रश्न विचारत पुस्तकाचा समारोप केला आहे.

पुढे संदर्भांची यादी आणि index आहे. पुस्तकात यानाचे आणि चंद्राचे रंगीत फोटो सुद्धा आहेत.
एक दोन पाने उदाहरणादाखल वाचून बघा.
चंद्र का ?



यानात काय काय असतं.. त्यातला एक भाग ?


सहभागी कंपन्यांबाबद्दलच्या यादीतला एक भाग


रोबोट बग्गी का अंतराळवीर ?



असं हे "short and sweet" पुस्तक आहे. विषय "रॉकेट सायन्स"चा आहे. तो कठीण आणि अतितांत्रिक असला तरी तो सोप्या भाषेत मांडला आहे. सर्वसामान्यांना झेपेल इतपतच तांत्रिक तपशील दिलेला आहे. त्यामुळे पुस्तकाचं वाचन माहितीपूर्ण होतं तरी विद्वत्जड होत नाही. रंजक होतं. प्रत्येक भारतीयाने आणि विशेषतः विद्यार्थी व तरुणांनी हे सकस वाचन अवश्य करावं.

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
——————————————————————————— 

स्त्री : व्यक्त-अव्यक्त Stree : Vyakta-Avyakta



पुस्तक - स्त्री : व्यक्त-अव्यक्त Stree : Vyakta-Avyakta
लेखिका - ऋता पंडित Ruta Pandit
भाषा - मराठी
पाने - २५२
प्रकाशन - अमलताश बुक्स, नोव्हेंबर २०२३
छापील किंमत - रु. २५०/-
ISBN - 978-93-6013-740-3

पुरुषप्रधान समाजात एक स्त्री म्हणून जगताना लहानपणापासून वृद्धत्वापर्यंत, शाळा-कॉलेज पासून नोकरीपर्यंत, घरगुती जबाबदाऱ्यांपासून नोकरी-व्यवसायात यशस्वी होण्यापर्यंत अनेक वैशिट्यपूर्ण परिस्थितून जावं लागतं. स्त्रीचं कुटुंबातलं व घरातलं स्थान आणि काम अर्थात "चूल-मूल हीच प्राथमिक जबाबदारी" ही विचारसरणी मानवी व्यवस्थेचा एक भाग आहे. पुरुषसमोर स्त्रीने दुय्यम भूमिका घेतली पाहिजे ही धारणा सुद्धा मानवी समाजव्यवस्थेचा भाग आहे. ह्याची तीव्रता आणि लवचिकपणा ह्यात देश, धर्म, राज्य, जात, आर्थिक वर्ग ह्यानुसार कमीजास्त फरक पडत असेल. पण लसावि मात्र सारखाच आहे. ह्या लसाविला तोंड देत, कधी सांभाळत, कधी दुर्लक्ष करत स्त्रिया आपली वाट चोखाळत आहेत. त्यांनी ह्या वाटेवर पुढे जावं ह्यासाठी संवेदनशील मनाचे पुरुषही त्यात हातभार लावत आहेत. मग खरंच कशी आहे आजची परिस्थिती ? बदलाच्या ह्या टप्प्यावर आपण कुठपर्यंत पोचलो आहोत; सध्या कुठल्या समस्या आहेत; काय बदल घडत आहेत ? ह्याचा मागोवा घेणारं "स्त्री : व्यक्त-अव्यक्त" पुस्तक आहे.

लेखिकेची पुस्तकात दिलेली माहिती




स्त्रियांच्या अनुभवविश्वाचे असंख्य पैलू मांडणाऱ्या लेखांचा हा संग्रह आहे. "मन", "जीवनाचा अनुभव" आणि "शरीर" अशा तीन भागांत हे लेख विभागले आहेत. एकूण ४३ लेख आहेत त्यामुळे प्रत्येकाबद्दल सांगणं कठीण आहे. पण थोडक्यात गोषवारा द्यायचा प्रयत्न करतो.

लेखिकेने एकेक प्रश्न किंवा वैशिष्ट्यपूर्ण परिस्थिती घेतली आहे. त्यामध्ये स्त्री/मुलगी कसा विचार करते; आपली समाजव्यवस्था नकळतपणे कशी प्रभाव टाकते, त्यातून होणारं नुकसान, आव्हाने आणि त्यावर थोडक्यात उपाय असं साधारण लेखांचं स्वरूप मला वाटलं. ह्यातल्या काही काही गोष्टी पुरुष व्यक्तींच्या समस्या सुद्धा असू शकतील. तर काही गोष्टी खास स्त्रियांनाच अनुभवायला येतील अशा आहेत.

अनुक्रमणिका




काही लेखांबद्दल सांगतो

"डिप्रेशन : एक कटू वास्तव" - कोरोना काळात सगळे घरी बसले तेव्हा बायकांना स्वयंपाकपाणी, आवराआवरी सांभाळून ऑफिसकाम करावं लागलं. त्याचा नेहमीपेक्षा जास्त ताण आला. तसाच काही वेळा प्रसूती नंतर काहींना नैराश्याचा आजार होऊ शकतो.

"आली (स्वतःशी) लग्न घडी समीप" - sologamy म्हणजे स्वतःशीच लग्न करणे. ही विचित्र कल्पना काही लोकांनी म्हणे परदेशात आणि भारतातही प्रत्यक्षात आणली. नंतर स्वतःशी घटस्फोटसुद्धा घेतला ! ह्या नव्या येऊ घातलेल्या ट्रेंड बद्दल.

"एकटी परी नाही एकाकी" - अविवाहित, घटस्फोटित किंवा परित्यक्ता अशा "एकट्या" महिलांना येणारे अनुभव. एकटी स्त्री - स्वतःहून स्वीकारलेलं एकटेपण असेल तर आनंदी राहू शकते ना ? तिचं आनंदी असणं समाजाने का स्वीकारू नये ?

"नैतिक चौकटीच्या अल्याड-पल्याड" - विवाहबाह्य संबंध; विवाहपूर्व शारीरिक संबंध ह्याबद्दल काय नैतिक आणि काय अनैतिक हे विचार प्रत्येक समाजात वेगळे आहेत. ते समाजाने न ठरवता त्या त्या स्त्रीने-पुरुषाने ठरवावं, एकाच नात्यातून सगळं मिळत नसेल तर इतर पर्याय शोधण्याची मुभा असली पाहिजे असा धाडसी विचार लेखिका मांडते.

"अप्रेझलच्या निमित्ताने" - कर्मचाऱ्यांना पदोन्नती देताना फक्त कामाची गुणवत्ता बघितली जाते का ? महिला कर्मचारी असेल तर कळतनकळतपणे इतर बाबी मनात येत असतील ना ? घरच्या जबाबदाऱ्यांमुळे तिला वाढीव कामासाठी जास्त वेळ देणं जमेल का? बाई म्हणजे हळवी; मग तिला कठोर निर्णय घेता येतील का ? त्यातून मार्ग कसा काढता येईल ?

"तकरार के दरवाजे : खुले या बंद" - कामाच्या ठिकाणी होणारी लैंगिक छळवणूक, मिळणारे टोमणे, दिसण्यावरून दिल्या जाणाऱ्या कमेंट्स किंवा "आडून आडून सूचना". ह्याबद्दल कुठला कायदा आहे, आवाज का उठवला पाहिजे ह्याबद्दल

"उणे-अधिक माझ्यात" - imposter phenomenon म्हणजे स्वतःबद्दल विनाकारण शंका घेणं. यश मिळूनही हे आपल्याला योगायोगाने मिळालं असेल, आपली खरी एवढी लायकी नाही असं वाटण. हे पुरुष व्यक्तीलाही वाटू शकतं. पण बायकांमध्ये हे प्रमाण जास्त आहे असं एका सर्वेक्षणाच्या आधारे म्हटलं आहे.

"दिवाळी दडपण आणि ती" - दिवाळीच्या आधीची साफसफाई, मग घरी फराळ करणं, आलंगेलं बघणं आणि हे सगळं कामाचा व्याप सांभाळून करण्यात बायकांचा पिट्ट्या पडतो. म्हणून कुटुंबीयांनी हातभार लावला पाहिजे किंवा सरळ बाहेरून विकत पदार्थ आणणे, साफसफाई पैसे देऊन करवून घेतली पाहिजे हे सुचवणारा लेख.

"आईपणाचा काटेरी मुकुट" - आदर्श माता म्हणजे ती जिने अपत्यांसाठी सर्वस्व अर्पण केलं; ही आपली व्याख्या. पण आई होऊनही स्वतःचं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व घडवू शकली ती खरी आदर्श माता म्हटली पाहिजे. त्यात "मुलाबाळांचं सगळं करून" मग "स्वतःला वेळ" अशी अपेक्षा नाही तर, तिच्या जबाबदाऱ्या इतरांनी वाटून घेऊन तिला "स्वतःचा वेळ" देणं अपेक्षित आहे.

"ये जवानी है दिवानी" - वयात आलेल्या मुलांच्या लैंगिक भावनांना, समस्यांना, प्रश्नांना उत्तर देताना.

"पिरियड लिव्ह" - टाटा स्टील, झोमॅटो इ. काही कंपन्यांत मासिक पाळीसाठी महिला कर्मचाऱ्यांना रजेची खास सोय करण्यात आली. त्यावर दोन्ही बाजूंनी काय मतं मांडली गेली ह्याबद्दल.


काही पाने उदाहरणादाखल
लादलेली नाती 

स्त्रीने महत्त्वाकांक्षी का असू नये ?


What Women Want


हे लेख पूर्वप्रकाशित आहेत. वृत्तपत्र मासिकांत येणाऱ्या लेखांना शब्दसंख्येची मर्यादा असते. तेवढ्याच शब्दांत एखादी समस्या, तिचं कारण-निराकरण, दुसरी बाजू, तिसरी बाजू ह्या सगळ्या मुद्द्यांना स्पर्श करून लेख समतोल, सुडौल बनवावा लागतो. पण त्यातून कशातही खोलात जात येत नाही. लेखांची ही मर्यादा पण एक पुस्तक म्हणून वाचताना सतत जाणवते. त्यामुळे पूर्ण पुस्तक वाचूनही खूप भरीव असं हाताला लागल्याचं समाधान मिळत नाही. लेखिकेला मांडायच्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, तिचं ज्ञानसुद्धा झळकतं आहे पण ते तितक्या ताकदीने पुस्तकातून पोचत नाहीये असं मला वाटलं. लेखसंग्रह करण्याऐवजी मजकुराचं पुनर्लेखन केलं असतं तर छान झालं असतं; असं मला वाटलं. मग लेख एकत्र करून, मुद्द्यांची पुनरावृत्ती टाळून, काही भाग गाळून, काही भागावर खोलात जाऊन लिहिता आलं असतं.

पण हे पुस्तक जो वाचेल तो आपल्या घरातल्या आणि कामाच्या ठिकाणच्या महिलांबद्दल अधिक संवेदनशील होईल, सजग होईल हे मात्र नक्की. खूप जड, खूप दीर्घ असं वाचण्याची सवय नसणाऱ्या लोकांना सुद्धा एकेक लेख सुटा सुटा वाचायची सोय असल्यामुळे दडपण न घेता वाचता येईल. ह्या पुस्तकाची जमेच्या बाजू.

एखाद्या चालू व्हिडिओचा स्क्रिनशॉट घेऊन - तो क्षण कॅप्चर करावा आणि त्याचं वर्णन करावं त्याप्रमाणे तसा बदलत्या समाजाच्या ह्या व्हिडिओचा आजचा "स्क्रिनशॉट" घेतलाय असं मला वाटलं. आज आपण सगळे ती परिस्थिती बघतोय , जगतोय त्यामुळे वाचताना खूप वेगळं, धक्कादायक वाटणार नाही. पण अजून पन्नास शंभर वर्षांनी मागे वळून बघताना हे पुस्तक खूप रंजक वाटेल. काय फरक असेल तेव्हा ? खरंच; तेव्हा परिस्थिती फार वेगळी असेल हे नक्की पण ती चांगल्या अर्थाने वेगळी असावी हीच अपेक्षा. अशी अपेक्षा पूर्ण व्हायची असेल तर स्त्री-पुरुष प्रत्येकालाच अजून संवेदनशील आणि परिपक्व व्हावे लागेल. ऋता पंडित ह्यांचं हे पुस्तक त्यात निश्चित मदतरूप ठरेल !

लेखिका ऋता पंडित ह्यांनी स्वतः हे पुस्तक मला वाचायला उपलब्ध करून दिले ह्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. आणि त्यांच्या पुढील लेखनासाठी खूप शुभेच्छा !

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

सुगंध गमावलेला मोगरा (Sugandh gamavalela mogara)

पुस्तक - सुगंध गमावलेला मोगरा (Sugandh gamavalela mogara) लेखक - बेन्यामिन (Benyamin) अनुवादक - ए आर नायर , जे ए थेरगावकर (A.R.Nair, J.A. Th...