બહેરો હસે બે વાર (बहेरो हसे बे वार/ bahero hase be var)



पुस्तक :- બહેરો હસે બે વાર (बहेरो हसे बे वार)
लेखक :- તારક મહેતા (तारक मेहता)
भाषा :- ગુજરાતી (गुजराती)


"तारक मेहता का उल्टा चश्मा" ही लोकप्रिय हिंदी मालिका ज्यांच्या लेखनावर आधारित आहेत ते लेखक म्हणजे तारक मेहता. "दुनियाने उंधा चश्मा" या नावने एक गुजराती विनोदी लेखमालिका ते "चित्रलेखा" मासिकात लिहितात. 

या तारक मेहतांच्या विनोदी लेखांचा संग्रह "बहेरो हसे बे वार". हे लेख साधारण नव्वदीच्या दशकातले असावेत. कारण यतले बरेचसे लेख राजकारणावर आधारलेले अहेत आणि त्यात रजीव गांधी, आघाडी सरकारं, तत्कालीन निवडणुका, वाढता भ्रष्टाचार, महागाई इ. चा संदर्भ येतो. 

"..उल्ट चश्मा" जितकी खळखळून हसायला लावते किंवा मेहतांच्या आधी वाचलेल्या विनोदी कादंबऱ्या जितक्या खुसखुशीत वाटल्या तितके हे लेख नाहीत. तेव्हाचे संदर्भ मला माहित नसतील हे एक कारण असेल. आणि संदर्भ माहीत असला तरी एखाद्या ताज्या घटनेवर लिहिलं जाणारं लेखन ती गोष्ट जुनी झाल्यावर तितकंच अपील होईल असं नाही. हे देखील एक कारण असावं. 


त्यामुळे तारक मेहता या नावाच्या वलयापोटी खूप हसायच्या तयारीने हे लेख वाचायला घेतले तर भ्रमनिरास होण्याची शक्यता जास्त.


 ------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
------------------------------------------------------------


----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------

Churchill (चर्चिल)





पुस्तक :- चर्चिल (Churchill)
भाषा :- इंग्रजी (English)
लेखक :- रॉय जेन्किन्स (Roy Jenkins )

ब्रिटनचे सर्वात प्रसिद्ध पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांचं हे चरित्र आहे. हे पुस्तक नसून एकहजार पानांचा मोठा ग्रंथच आहे. हजार पानंही अगदी बारीक टायपात छापलेली आहेत.

चर्चिल घराण्याच्या इतिहासापसून सुरुवात करून चिर्चिल यांच्या मृत्युपर्यंत पूर्ण इतिहास यात आहे. प्रत्येक प्रसंगाचं अतिशय बारकाईने वर्णन केलेलं.

चर्चिल यांनी दुसऱ्या महायुद्धात केलेलं ब्रिटनचं नेतृत्त्व फार प्रसिद्ध आहे. त्यामुळे आणि "युद्धस्य कथा रम्या" या अनुभवाप्रमाणे मी पण थेट युद्धाचा भागच वाचायला घेतला. पण खरं सांगू? वर्णन इतकं तपशीलवार आहे की वाचायचा कंटाळाच आला. चुर्चिल कुठल्या दिवशी किती वाजता बाहेर पडले, कधी झोपले, कधी उठले, कोणाबरोबर जेवले, काय खाल्लं, कुठे राहिले, काय बोलले हे इतकं तपशीलवार आहे की मोठं चित्र (broader view) मिळालाच नाही.

चर्चिल यांच्या पंतप्रधानपदाची शर्यत, पाय उतार झाल्यावरचे दिवस यांच्या बद्दलची काही पानंही वाचली. पण ब्रिटनच्या राजकारणची, त्यातल्या व्यक्तींची फार माहिती नसल्याने पुन्हा एकदा सविस्तर-ससंदर्भ वाचन जड गेलं.

तत्कालीन भारतीय स्वातंत्र्यचळवळ आणि भारतीय नेते यांबद्दल काय संदर्भ आलाय हे शोधलं पण फार काही मिळलं नाही. गांधी, नेहरू यांबद्दल एकदोन ठिकाणी एकदोन ओळींचा उल्लेख आहे; फार नाही.

शेवटी शंभरेक पानं वाचून मी हा ग्रंथ वाचायचा नाद सोडून दिला. चर्चिल यांचं व्यक्तिमत्त्व आणि कर्तृत्व समजून घेण्यासाठी एखादं दोनतीनशे पानी चरित्र मिळालं तर वाचलं पाहिजे. हा ग्रंथ ज्यांना इतिहासाची प्रचंड आवड आहे किंवा ब्रिटनच्या राजकारणावर संशोधन करत असतील तर नक्कीच वाचनीय आणि संदर्भ ग्रंथ म्हणून उपयोगी आहे.


------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
------------------------------------------------------------


----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------

मन में है विश्वास (Man Main Hai Vishvas)




पुस्तक :- मन में है विश्वास (Man Main Hai Vishvas) 
लेखक :- विश्वास नांगरे-पाटील (Vishwas Nangre Patil )
भाषा :- मराठी

विश्वास नांगरे-पाटील हे एक तरूण, तडफदार आणि स्वच्छ प्रतिमेचे पोलिस अधिकारी म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहेत. मुंबईवरच्या २६/११ च्या हल्ल्यात त्यांनी दाखवलेल्या धैर्यशाली नेतृत्वासाठी आणि प्रत्यक्ष पोलीस कारवाईतील सहभागासाठी त्यांना राष्ट्रपती पारितोषिक मिळालं आहे. समाजाला बरोबर घेऊन काम करण्याच्या त्यांच्या पद्धतीमुळे त्यांच्या लोकप्रियतेत सदैव भर पडत आहे. आपल्या या कर्तृत्त्वाने ते तरूणांचा आदर्श बनले नसते तरच नवल. आणि म्हणूनच विश्वासजी आपल्या या आत्मकथनातून तरूणांशी संवाद साधतायत. तरूणांना -विशेषतः यूपीएससी-एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या ग्रामीण तरूणांना - स्वानुभवातून मार्गदर्शन करायच्या तळमळीपोटी त्यांनी हे पुस्तक लिहिलं आहे.

२०० पानी पुस्तकाच्या सुरुवातीच्या प्रकरणांत त्यांनी आपलं बालपण, शाळा, कॉलेजच्या वयातल्या आठवणी सांगितल्या आहेत. यशस्वी व्यक्ती म्हणजे ती लहानपणी खूप हुशार, सज्जन, एकपाठी, सर्वगुणसंपन्न असणार असाच आपला समज असतो. पण ते लहानपणीचा खोडकर, मस्ती करणार, चुका करणारा विश्वास आपल्यासमोर ठेवतात. तरूणपणातला टर्रेबाज, टुकाऱ्या करत फिरणारा, काही वेळा चुकीच्या मार्गाने जाऊ लागलेला तरूणही आपल्या दिसतो. आणि हीच बाब आपल्याला अधिक भावते. शेकडा ९०% मुलं अशीच असतात पण म्हणून ती सगळी वाया गेलेली नसतात. ज्याप्रमाणे विश्वासजींना सावरणारं, रागावणारं, ओरडणारं कुणीतरी  - घरचे असतील, शिक्षक असतील किंवा कधी मित्र - भेटत गेलं तसं जर त्यांनाही भेटलं तर तेही सावरू शकतील. आपल्यातल्या सुप्त गुणांना वाव देऊ शकतील हा विचार आपल्या मनात रुजतो.

पुढची जवळपास दीडशे पानं त्यांच्या स्पर्धापरीक्षेच्या अनुभवाबद्दल आहेत. आत्ताचे यशस्वी पोलीस अधिकारी आहेत म्हणजे त्यांनी परीक्षा अगदी सहज-डाव्या हातचा मळ असल्यासारखी पास केली असेल असा आपला ग्रह होऊ शकतो. पण त्यांनाही यश-अपयश बघावं लागलं, आशा-निराशेच्या झोकांड्या खाव्या लागल्या होत्या. पुन्हा-पुन्हा स्वतःला प्रोत्साहित करावं लागलं. वाईट सवयींपासून, संगती पासून, प्रलोभनांपासून स्वतःला जाणीवपूर्वक बाजूला काढावं लागलं. गावाकडनं आलेला मुलगा, इंग्रजी कच्चं असणारा, इंग्रजी संभाषण सफाईदारपणे न जमणारा मुलगा हा न्यूनगंड त्यांनाही वाटला. पण न्यूनगंडामुळे ते थांबले नाहीत तर त्यावर मात करायचे उपाय शोधले आणि प्रगती करत राहिले. हे सगळं तरूणांना कळावं हाच तर त्यांचा पुस्तक लिहिण्यामागचा मूळ उद्देश आहे.

बहुतांश ग्रामीण विद्यार्थ्यांप्रमाणे त्यांनाही तयारीसाठी कोल्हापूर, मुंबई, पुणे अशी भ्रमंती करावी लागली. गैरसोयीच्या अवस्थेत राहणं, खाण्यापिण्याची आबाळ सोसावी लागली. स्पर्धापरीक्षांच्या अभ्यासाचा अवाका मोठा त्यामुळे तयारी करता करता कंटाळा यायचा तर कधी अपयशाच्या विचारांनी आत्मविश्वास जायचा. विश्वासरावांनी स्वतःला कसं अभ्यासाला लावलं हे खरंच प्रेरणादायी आहे. फक्त स्पर्धापरीक्षा देणऱ्यांसाठीच नाही तर कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी धडपडणाऱ्या, कष्ट करायला तयार असणऱ्या प्रत्येकासाठी आहे.

पुस्तकात शेवटची काही पाने २६/११ च्या हल्ल्याच्या वेळाच्या कारवाई बद्दल आणि राष्ट्रपती पारितोषिकाबद्दल आहे. या प्रसंगाविषयी अजून खुलासेवार लिहिता आलं असतं. पण हा प्रसंग एका स्वतंत्र पुस्तक लिहिण्यासारखा आहे; तसंच प्रस्तुत पुस्तकाचा उद्देश वेगळा असल्यामुळे त्यांनी फार लिहिणं टाळलं असेल. पुस्तकात त्यांच्या रेव्ह पार्टीवरची कारवाई,दरोड्यातल्या गुन्हेगारांचा पाठलाग, सामजिक सलोखा निर्माण करून गुन्हेगारी रोखण्याचे उपक्रम इ.ची ओळख प्रसंगोपात होते. 

विश्वासरावांचं काम आणि त्यांची मेहनत हे वाचनीय आहेच पण त्यांची लेखनशैलीही तितचीच प्रवाही आणि प्रभावी आहे. प्रसंगाला अनुसरून त्यांनी बोधकथा, मान्यवरांचे उद्गारही दिले आहेत. तरूणपणातल्या खोड्यांचे प्रसंग आणि त्यांच्या मित्रांचे, गावाकडच्या व्यक्तींचं वर्णन पण मजेशीर आहे. विश्वासरावांनी मराठी साहित्य, इतिहास हे विषय घेऊन उच्च शिक्षण घेतल्यामुळे हे पुस्तक वाचताना आपण एका पोलिसाने लिहिलेलं पुस्तक वाचतोय असं न वाटता एखाद्या सराईत लेखकाने लिहिलेलं आहे असंच वाटत राहतं. 

त्यांनी अजून लिहावं - त्यांच्या पोलीस सेवेच्या अनुभवाबद्दल, उपक्रमांबद्दल, सामाजिक मुक्त चिंतनाबद्दल. वाचकांच्या उड्या पडल्याशिवाय राहणार नाही.




------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )
------------------------------------------------------------





----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------

पाडस (padas)


पुस्तक :- पाडस
मूळ पुस्तक : द यर्लिंग ( The Yearling )
मूळ लेखिका : मार्जोरी किनन रॉलिंग्ज (Marjorie Kinnan Rawlings)
मूळ भाषा :- इंग्रजी (English)
अनुवाद : राम पटवर्धन (Ram Patwardhan)
प्रकाशन : मौज प्रकाशन

श्री. विशाल विजय कुलकर्णी यांनी केलेले समीक्षण त्यांच्या परवानगीने आणि सौजन्याने

बॅक्स्टर वाडीचा उमदा, दिलखुलास पेनी बॅक्स्टर, त्याची (आपली बरीच मुले गमावल्यामुळे चिडचिडी झालेली) स्थूल पत्नी ओरी आणि त्यांचा बऱ्याच मुलांनंतर जगलेला अल्लड, शैशव आणि पौगंडावस्थेच्या काठावर उभा मुलगा 'ज्योडी' आणि ज्योडीचा एकुलता एक मित्र , त्याने पाळलेलं एक हरणाचं 'पाडस' अर्थात फ्लॅग ! खरेतर हि कथा ज्योडी आणि फ्लॅगची , त्यांच्यातल्या नात्याची आहे. हि कथा सगळी संकटे झेलत, हसतमुखाने जगणाऱ्या आपल्या बायको मुलांबरोबरच आपल्या शेतांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या पेनीची आहे, हि कथा नशिबाने चकवलेल्या, वरवर खाष्ट, कजाग वाटणाऱ्या ओरीची सुद्धा आहे.

मार्जोरी किनन रॉलिंग्ज यांची ही कादंबरी ज्योडी नावाच्या या एकाकी, फारसे कुणी मित्र नसलेल्या आणि त्यामुळे मैत्रीसाठी आसुसलेल्या मुलाबद्दल आहे. या एप्रिलपासून पुढच्या एप्रिलपर्यंत असा साधारण वर्षभराचा काळ कादंबरीत आहे. या एका वर्षात ज्योडीच्या मानसिक वयात आणि स्वभावात होत गेलेले बदल, त्याचं स्वतःच्याही नकळत आपलं बालपण मागे टाकणं हा सगळा प्रवास. निसर्गाच्या कायम बदलत्या रुपांच्या पार्श्वभूमीवर, ज्योडीच्या आयुष्यात आलेल्या एका हरणाच्या पिल्लाच्या माध्यमातून, त्याच्या ज्योडीबरोबरच्या नात्यातून हि कथा फुलत जाते.

निसर्गचक्र चालूच राहतं. या वर्षाच्या कालावधीत जे घडतं. जे तपशील येतात, ते शेती, जंगल आणि ज्योडी बॅक्स्टर आणि त्याचे आईवडील राहत असतात, त्या भागाचा एकंदरीत भूगोल यांचा संदर्भ घेऊन कथानक पुढे सरकत राहते. यात मध्येच काही मैलांवर राहणाऱ्या फॉरेस्टर कुटुंबाचा आणि त्यांच्या पांगळ्या मुलाचा फॉडरविगचा संदर्भ येतो. त्याचा अकाली मृत्यूही ज्योडीचा बरेच काही शिकवून जातो. लेखिकेने अगदी बारीक बारीक तपशील तरलपणे नोंदवत ज्योडीचा हा प्रवास रेखाटला आहे.

पेनीच्या गोळीची शिकार झालेल्या एका हरणीचे सैरभैर झालेले पाडस घेऊन ज्योडी घरी येतो. त्याच्या बारकुश्या झुपकेदार शेपटीमुळे फॉडरविगने त्याला फ्लॅग हे नाव दिलय. फ्लॅग बरोबर एकाकी ज्योडीची जोडी जमते. अल्पावधीत त्या दोघांमध्ये एक बिलक्षण नाते निर्माण होते. पण फ्लॅग वाढत असतो. निसर्गाच्या सानिध्यात वाढलेलं ते निष्पाप लेकरू मानवाच्या म्हणजे पेनीच्या वसाहतीत त्रासदायक ठरायला लागतं. त्याचं आनंदात इकडे तिकडे बागडणं पेनीच्या शेतीचं नुकसान करायला लागतं. आपल्या कुटुंबियांसाठी लागणारं अन्न वाचवायचं कि ते हरणाचं पाडस, ज्योडीचा फ्लॅग, त्याला वाचवायचं या द्विधा मनस्थितीत पेनी अडकतो. शेवटी तो हा निर्णय ज्योडीवरच सोपवतो.

ज्योडीचा निर्णय काय असेल? त्याच्या एकटेपणातला त्याचा एकमेव जोडीदार फ्लॅग कि.......
----------------------------------------------------------------------------------------------------------





His Forbidden passion (हीज फॉरबिडन पॅशन )




पुस्तक :- हीज फॉरबिडन पॅशन  (His Forbidden passion)
भाषा :- इंग्रजी (English)
लेखिका :- अ‍ॅन मॅदर (Ann Mather)


ही एक प्रणय कादंबरी आहे. लंडन मध्ये राहणऱ्या एका तरूणीला -क्लीओला- एके दिवशी एक तरूण - डॉमिनिक- घरी भेटायला येतो आणि तिला सांगतो की तिचे आईवडील हे तिचे खरे आईवडील नसून दत्तक आई वडील आहेत. तिची खरी आई तिच्या जन्माच्या वेळीच वारली. डॉमिनिकचे दत्तक वडील हे त्या तरूणीचे जैविक पिता. अनैतिक संबंध लपवण्यासाठी क्लिओची आई वारल्यावर त्यांनी क्लिओला दत्तक देऊन टाकली. हे ऐकून तिच्या भावविश्वाला प्रचंड हादरा बसतो. 

डॉमिनिकच्या उद्योगपती आजोबांना आपल्या अखेरच्या दिवसात या नातीची आठवण येत असते आणि तिला कायमचं आपल्या कुटुंबात परत आणण्याची त्यांची इच्छा असते. ही जबाबदारी ते डॉमिनिक वर सोपवतात. तो तिला घेऊन कॅरिबियन बेटांवरच्या त्यांच्या साम्राज्यात घेऊन येतो. त्यातून त्यांची ओळख वाढते आणि दृढ संबंधात ते गुंततात.

डॉमिनिक हा दत्तक मुलगा आणि क्लिओ दुसऱ्या स्त्रीपासून झालेली मुलगी म्हणजे खरं म्हटलं तर भाऊ-बहीण. पण पाश्चात्त्य संस्कृती प्रमाणे ते एकमेकांना तसं मानत नाहीत. आधी शरीरसंबध जुळतात आणि मग प्रेमसंबंध !

एकूण कादंबरी काही खास नाही. प्रणयकथा, एकदोन शृंगार प्रसंग असं वाचायला आवडत असेल त्यांना प्रवासात वगैरे टईमपास म्हणून ठीक आहे. 


------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
------------------------------------------------------------





----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------

माणसे आरभाट आणि चिल्लर (Manase arabhat ani chillar)




पुस्तक :- माणसे आरभाट आणि चिल्लर (Manase arabhat ani chillar)
भाषा :- मराठी (Marathi)
लेखक :- जी.ए. कुलकर्णी (G.A. Kulkarni) 


जी.ए. कुलकर्णी हे मराठी साहित्यविश्वातील मान्यवर नाव. जी.एंच्या निधनापश्चात प्रकाशित झालेले हे पुस्तक आहे. यात जी.एंनी त्यांच्या लहानपणी त्यांचा ज्यांच्याशी संबंध आला अशा व्यक्तींचं व्यक्तिचित्रण रेखाटलं आहे. 
(पण या त्यांच्या खऱ्या आठवणी आहेत का लेखक एका काल्पनिक निवेदकाच्या भूमिकेत आहे हे कळत नाही.)
पुस्तकात त्यांचे शाळा मास्तर, शाळू सोबती, आजोबा, आजोबांचे मित्र, स्थानिक जहागिरदार, गावातल्या काही व्यक्ती इ. आपल्याला भेटतात. काही चिल्लर काही आरभाट. 

पुस्तकात लेखकानेच लिहिले आहे की - "आरभाट हा एक गुणी कानडी शब्द आहे. आरभाट म्हणजे खानदानी, भव्य, थाटामाटाचा. जेवण कसे होते? आरभाट, मन्सूरांचे गाणे कसे झाले? आरभाट, हृशिकेशला गंगा कशी आहे, तर आरभाट"

पुस्तकात प्रत्येक व्यक्तीवर स्वतंत्र कथा/लघुनिबंध नाहीत तर पूर्ण पुस्तक हेच एक सलग वर्णन आहे. एखाद्या वृद्ध व्यक्तीने आपल्या लहानपणच्या आठवणी गप्पा मारताना सांगाव्यात तसा एकूण निवेदनाचा बाज आहे. बोलण्याच्या/लिहिण्याच्या ओघात जशी माणसं आठवतात, जे प्रसंग येतात तसे ते आपल्याला सांगत जातात. कधी एखाद्या व्यक्तीवर काही ओळीच येतात तर काही व्यक्तींची भेट प्रसंगोपात पुन्हा पुन्हा होते आणि त्यांचं व्यक्तीचित्र जास्त स्पष्ट होतं. 

उदा. दातार मास्तर - नेमस्त स्वभाव, गडकऱ्यांच्या साहित्यावर मनापासून प्रेम करणारे, क्रिकेटमधल्या सी.के. नायडूंचे भक्त, गरीबीतही तत्त्वांशी तडजोड न करणारे - असे पैलू आपल्याला दिसतात. 

तर दुसरं व्यक्तिचित्र म्हणजे विट्ठल याचं. हा विठ्ठल लेखकाच्या आजोबांच्या मित्राकडे आश्रित म्हणून राहणारा मुलगा. मित्राचं निधन झाल्यावर पुन्हा एकदा निराश्रित होतो. आश्रयदात्याने ठेवालेली पुंजी घेऊन जगण्यासाठी शहरात येतो, पडेल ती कामं करतो, डॉक्टर होतो पण परिस्थितीशी झगडा संपत नाही. अनेक वर्षांनी तो लेखकाला पुन्हा भेटतो आणि लेखकाने गाव सोडल्यानंतर गावात कायकाय घाडलं, दातार मास्तरांच्या आणि विठ्ठलच्या आयुष्यात कायकाय घाडलं ते समजतं.

दातार मास्तर, विठ्ठल या दोन व्यक्ती सोडल्या तर बाकी व्यक्ती खास लक्षात राहत नाहीत. बहुतेक जीएंनाही बाकी व्यक्ती "चिल्लर" वर्गवारीत टाकलं असावं. वेगवेगळ्या मास्तरांच्या लकबी, शिकवण्याच्या-मारण्याच्या-ओरडण्याच्या पद्धती; शाळूसोबत्यांच्या खोड्यांचे किस्से मजेदार आहेत. मनोरंजक आहेत. 
पुस्तकातील वर्णनाप्रमाणे लेखकाचे लहानपण चांगलं, सुखासमाधानात गेल्यासारखं वाटतं पण लेखक मात्र मोठेपणच्या आठवणी सांगताना गावापासून दूर जायचा, तिथल्या व्यक्तींपासून संबंध विसरायच्या प्रयत्नात दिसतो. जणू काही त्याला आयुष्यातला एखादा कटू/अपमानास्पद कालखंड विसरायचा आहे. ते का? हे समजत नाही. विचित्र वाटतं.

शेवटची साताठ पाने लेखकाने परमेश्वर, नियती, माणसाचे अपूर्णत्त्व इ. वर मुक्त चिंतन आहे. त्यातली काहीकाही वाक्ये फार छान आहेत.
"सत्याचा नेहमी विजय होतो- आज ना उद्या ! हे सूत्र कधीच खोटे ठरवता येत नाही, कारण त्यातील मेख अशी आहे ती आज ना उद्या या शब्दांत ! माणसाचे आयुष्य टिचभर आणि काळ अनंत आहे. शतकानुशतके गेली तरी पुन्हा कोडगेपणाने हसत ’आज ना उद्या’ असे म्हणत स्वतःचा आब राखता येतो. पण तेवढ्यात सत्याच्या विजयाची आशाळभूतपणे वाट पाहणऱ्या माणासाची माती देखील नष्ठ होऊन जाते आणि तो सत्याचा विजय पराभवापलीकडे गेलेला आसतो. हे म्हाणजे एखाद्या दरिद्री माणसाच्या हातावर कागदाचा तुकडा ठेवून त्यावर यावर लिहिलेली प्रचंड रक्कम दोनशे लक्ष वर्षे आठ महिने एकोणतीस दिवसांनंतर मिळून तुझे दारिद्र्य नष्ट होईल" असे सांगण्यासारखे आहे"

"उपरवाले के घर में देर है, लेकिन अंधेर नही" वा, काय सुरेख अनुप्रास जोडले आहेत! पण देर तरी का असावा? ते घर म्हणजे आम्ही रोज पाहतो तसली एखादी कचेरी आहे की काय ? अंधार नाही , प्रकाश आहे का? चंगली गोष्ट आहे. पण केवळ दिवे जळत आहेत म्हणून काम चालू आहे असा अर्थ होत नाही."

विचारंचं प्रचंड वादळ त्याच्या डोक्यात उठलं आहे आहे आणि त्या वादळात, कल्लोळात लेखक भराभर शब्द उतरवत गेला आहे असं वाटतं असे तुटक तुटक परिच्छेद आहेत.

एकूण जी.एंचं पुस्तक म्हणून ज्या अपेक्षेने मी पुस्तक वाचायला घेतलं तितकं ते "अरभाट" वाटलं नाही पण वाचनातून "चिल्लर" विरंगुळा-टाईमपासच झाला.

------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
------------------------------------------------------------





----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)

----------------------------------------------------------------------------------

सांजसावल्या (sanjasavalya)



पुस्तक :- सांजसावल्या (sanjasavalya)
लेखक :- वि.स. खांडेकर (V.S. Khandekar)
भाषा :- मराठी

"सांजसावल्या" हा ज्येष्ठ साहित्यिक वि.स. खांडेकरांचा शेवटचा लघुनिबंधसंग्रह. यातील काही लेख "मौज","श्री",स्वराज्य","रविवार सकाळ" इ. नियतकालिकांमध्ये तेव्हा प्रसिद्ध झालेले तर काही अप्रकाशित आहेत.

सन १९७४ ते १९७६ या कालखंडातील हे निबंध आहेत. १९७६ च्या सप्टेंबरमध्ये खांडेकरांचं निधन झालं होतं. त्यामुळे आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यावर - शारिरिक जराजर्जरता, आलेलं अंधत्व, कौटुंबिक त्रास अशा - शारिरिक आणि मानसिक अवस्थेत लिहिले गेलेले आहेत. त्यामुळे बरेचसे लेख हे सिंहावलोकन करणारे आहेत. दैव, नियती, मानवी जीवनातील आशावाद, प्रयत्नवाद आणि दैववाद यांमधला झगडा इ. विषयांवरचे आहेत.
उदा. "देवघर" या निबंधात तारुण्यातल्या बुद्धीवादाकडे निखळ दृष्टीने पाहत खांडेकर त्याची चिकित्सा करतात. "आंधळी-कोशिंबीर" मध्ये माणसे नियतीला कशी नावे ठेवतात पण कर्तृत्वाचं श्रेय मात्र नियतीला न देता स्वतःकडे ठेवायचा दांभिकपणा करतात हे दाखवलं आहे. "दीर्घायुष्य" लेखात माणसाला खरंच दीर्घायुष्य का हवं असतं आणि ते शाप किंवा वरदान कसं ठरू शकतं याचा ऊहापोह  आहे.

काही लेख गंमतीदारही आहेत. "शब्द बापुडे केवळ वारा!" मध्ये एका तरूणी आणि वृद्धाचा स्त्री-पुरुष समानतेवरचा मजेशीर संवाद; "अजि म्या ब्रह्म पाहिले" हा अ‍ॅलर्जी वरचा लेख इ.

प्रत्येक लेखात वि.स. काही विचार मांडून शेवट करतात. ती वाक्ये अवतरणे म्हणून संग्राह्य आहेत. उदा. अ‍ॅलर्जी बद्दलच्या लेखाचा शेवट ते असा करतात. "जिथे शरीराची अ‍ॅलर्जी शोधून काढणं कठीण तिथं मानवी शरीर आणि मन यांना एका साच्यात बसवणं विज्ञानाला अशक्य आहे. प्रत्येक मनुष्य हे एक वेगळं विश्व आहे. अशी कोट्यवधी विश्वं जी परमशक्ती लीलेने निर्माण करते तिच्यापुढे माणसाच्या बुद्धीलाहि नकळत नतमस्तक व्हावं लागतं. कारण मनुष्य स्वतःला कितीही स्वतंत्र मानत असला तरी तो निसर्गाचाच एक भाग आहे."

एक वृद्ध गांधीवादी आणि एक तरूण प्राध्यापक यांच्यातला हृदयपरीवर्तनावरचा वितंडवाद ऐकून ते म्हणतात "वैचित्र्यपूर्ण दृश्यविश्वापेक्षा माणसाच्या मनातील अदृश्य गुंतागुंत फार गहन आहे. प्रत्येक मनुष्य दुसऱ्याहून अंतर्बह्य वेगळा असतो. अशा स्थितीत एकाला जाणवणारे सत्य दुसऱ्याला पूर्णपणे कसे पटावे?..सत्यशोधनाच्या नावाखाली आपण सर्व सत्याभासाची किंवा अर्धवट सत्याची बाजू घेत असतो. साहजिकच दोन अहंकारंची टक्कर सुरू होते".

"पूर्व दिव्य ज्यांचे त्यांना" मध्ये इतिहास आणि त्याचा पुढच्या पिढीवर परीणाम याबद्दल ते लिहितात. "स्मृती, अनुभव आणि स्वप्न हे त्रिकुट मानवी मनावर अधिराज्य करीत असतं. पावलोपावली या तिन्हींचा समतोल साधणं हे सफल जिवनाचं मुख्य सूत्र आहे. भूतकाळ घरातल्या वृद्धासारखा, वर्तमानकाळ तरूणासारखा, आणि भविष्यकाळ बालकासारखा असतो.."

या निबंधांतली खांडेकरंची शैली सहज, ओघवती आणि गप्पा मारल्यासारखी आहे. खूप विनोदी नाही पण नर्मविनोदी-खुसखुशीत आहे. हे लेख वाचताना मला पु.लंच्या लेखांची आठवण झाली. पण पुलंचे लेख जास्त विनोदी आणि त्यातला गंभीर भाग खूप सखोल तत्वचिंतन करणारा आहे असं मला वाटतं.

खांडेकरांनी ज्या विषयांना हात घातला आहे, जे रोजच्या जगण्यातले अनुभव मांडले आहेत आणि जी मल्लिनाथी केली आहे तितपत लिखाण सध्या साध्या-साध्या माणसांनी केलेल्या ब्लॉगलेखनातही आढळेल. खांडेकरांच्या काळात ब्लॉग असते तर त्यांनीही "मला सुचलं ते","मनोगत","स्वान्तःसुखाय" अशा टिपिकल नावाने ब्लॉगच लिहिला असता.
सध्या फेसबुक, व्हॉट्सपच्या जमान्यात फिलॉसोफी झाडणारे, कौटुंबिक, सामाजिक संदेश देणारे इतके मेसेज येतात की हे पुस्तक वाचताना असाच कुठलातरी मेसेज किंवा जरा चंगला मराठी ब्लॉग वाचतोय असंच वाटलं आणि पुलंच्या "असा मी असामी" मधलं एक वाक्य आठवलं - "थोर माणसं देखील काही फारसं निराळं म्हणतात असं नाही पण ती थोर असतात हे महत्वाचं." :)


------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
------------------------------------------------------------





----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------



वैदिक हिंदू ग्रंथ परंपरा : स्वरूप, सार आणि संवाद (Vaidik Hindu Granth Parampara : Swarup, Sar Ani Samvad)

पुस्तक - वैदिक हिंदू ग्रंथ परंपरा : स्वरूप, सार आणि संवाद (Vaidik Hindu Granth Parampara : Swarup, Sar Ani Samvad) लेखक - माधव जोशी (Madhav ...