त्सुबाकी स्टेशनर्स (Tsubaki Stationers)

पुस्तक - त्सुबाकी स्टेशनर्स (Tsubaki Stationers)
लेखक - इतो ओगावा (Ito Ogawa)
अनुवाद - मयुरेश कुलकर्णी (Mayuresh Kulkarni)
भाषा - मराठी (Marathi)
मूळ पुस्तक - ツバキ文具店 (त्सुबाकी बुंगुतेन) Tsubaki Bunguten
मूळ पुस्तकाची भाषा - जपानी (Japanese)
प्रकाशन - कलासक्त. ऑगस्ट २०२५
छापील किंमत - रु. ५५०/-
ISBN- 978-81-944022-7-5

सध्याच्या संपर्कक्रांतीच्या जगात व्हिडीओ कॉल च्या माध्यमातून क्षणार्धात पृथ्वीवरच्या दुसऱ्या टोकावरच्या माणसाला बघून त्याच्याशी बोलता येतं. काही माहिती पाठवायची असेल तर व्हॉट्सअप, ईमेलद्वारे ती तात्काळ पाठवता येते. दुसऱ्याला मेसेज पोचले की नाही, त्याने वाचले की नाही हे सुद्धा समजते. त्यामुळे पूर्वीसारखं एकेमेकांना पत्र लिहायचं प्रमाण फारच नगण्य झालं आहे. तरीही ज्यांनी पूर्वी पत्र लिहिली आहेत त्यांना ते जुने दिवस आठवतात. गंमत अशी झाली आहे की; पत्र ह्या माध्यमाच्या मर्यादाच आता त्या माध्यमाची वैशिष्ट्य वाटतात. ईमेल आपण टाईप करतो, पत्र हाताने लिहितो. लिहिणाऱ्याचा वैयक्तिक स्पर्श त्याला असतो. ईमेल कितीही मोठा लिहू शकतो, कितीही मोठी अटॅचमेंट पाठवू शकतो. पण हाताने पत्र लिहिताना मजकुराला काही मर्यादा पडतात. दोन-तीन पाने लिहिली तरी किती मोठं पत्र लिहिलं आहे असं वाटणार. त्यामुळे कमी जागेत, कमी शब्दांत जास्तीत जास्त माहिती, मजकूर, भावभावना प्रभावीपणे मांडणे आवश्यक होते. लिहिणाऱ्याच्या विचारांचा, शब्दांचा तिथे कस लागतो. शब्दांव्यतिरिक्त पत्राचा कागद, त्यावरची नक्षी, सजावट, हस्ताक्षरातले बदल, त्यात काढलेली चित्र , रेघोट्या, पत्राबरोबर पाठवलेलं एखादं फूल, सुगंधाचा थेंब ह्यातून "शब्देविण संवादु"ही करता येतो. असं मनापासून लिहिल्यावर ते कधी पोचेल, वाचणाऱ्याला काय वाटेल, तो काय उत्तर देईल, त्याचं उत्तर कधी येईल ह्याची वाट बघावी लागते. "त्वरित प्रतिसादाच्या" instant gratification च्या जमान्यात असे वाट बघणे, झुरणे सुद्धा आपण विसरलो आहोत ते पुन्हा मिळवल्याचा अनुभव येईल.

पत्रलेखनाच्या ह्या वैशिष्ट्यांची जाणीव असणाऱ्या व्यक्तींभोवती फिरणारी ही कादंबरी आहे. जपानमध्ये टोकियोपासून जवळ असणाऱ्या कामाकुरा गावात घडणारी ही ही गोष्ट आहे. कमाकुरा अगदी खेडेगाव नाही पण खूप मोठे शहरही नाही. तिथल्या जुन्या मंदिरांमुळे ते पर्यटकांनाही भुरळ घालणारे समुद्राकाठचे छान गाव आहे. या गावात "त्सुबाकी स्टेशनर्स" नावाचं स्टेशनरीचं दुकान आहे. दुकान चालवणारी तरुण हातोको अमेमिया काही वर्षे परदेशात राहून आता जपानला परत आली आहे. दुकानाच्या वरच तिचं घर आहे. पूर्वी तिची आजी आणि ती तिथे राहायचे. पण काही महिन्यांपूर्वी तिच्या आजीचं निधन झाल्यानंतर ती पुन्हा जपानला आली आणि हे दुकान चालवायला लागली आहे. कागद, पेन्सिल, पेनं शालेय वस्तू दुकानात मिळतातच पण पत्रलेखन हे ह्या दुकानाचे वैशिष्ट्य आहे.

कामापुरा गावातल्या लोकांना आपल्या नातेवाईकांना, सहकाऱ्यांना, मित्र-मैत्रिणींना काही खास प्रसंगी पत्रच लिहाविशी वाटतात. वर म्हटल्याप्रमाणे, फोन ई-मेल यापेक्षा पत्रातून आपल्या भावना चांगल्या पोचतील असं त्यांना वाटतंय. पण पत्रलेखनाची सवय गेली असल्यामुळे म्हणा, भाषेवर तितकं प्रभुत्व नाहीये म्हणा किंवा अगदी हस्ताक्षर चांगलं नाही म्हणा अशा कारणांमुळे त्यांना ते पत्र स्वतः लिहायचं नाहीये. ते कोणाकडूनतरी लिहून घ्यायचे आहे. हे काम करायची हातोकोची आजी. पत्रलेखन करून घेणाऱ्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे, व्यक्तिमत्व कसं आहे, पत्र कोणाला पाठवायचं आहे, पत्रातून राग, लोभ, ताटातूट, विरह अशा कुठल्या भावना व्यक्त करायची आहे हे सगळं लक्षात घेऊन प्रत्येक पत्राला स्वतंत्र, अनोखं करण्याचा तिच्या आजीचा प्रयत्न असायचा. त्यामुळे त्या त्या प्रसंगाला साजेसा कागद, रंग, शाईचा कमीअधिक गडदपणा, पत्राची नक्षी, पत्राला लावायचा स्टॅम्प, पत्र घालायचा लिफाफा, हे सगळं सगळं वेगवेगळं असायचं. त्सुबाकी स्टेशनर्स कामाकुराच्या लोकांमध्ये जिव्हाळ्याचं होतं . ही कला आपल्या नातीतही उतरावी अशी आजीची मनापासून इच्छा होती. त्यामुळे लहानपणापासून हातोकोकडून चांगली अक्षरं गिरवून घेणं, पत्रलेखनाचे सर्व नियम सोपस्कार व संकेत तिने घटवून घेतले होते. आजीच्या माघारी हातोको आता पहिल्यांदाच स्वतंत्रपणे या कामात उतरलीये. आता तिला कोण कोण व्यक्ती भेटतात आणि किती वैशिष्ट्यपूर्ण पत्र तिला लिहावी लागतात याची ही गोष्ट आहे.

एक व्यक्ती येऊन सांगते की आमचा माझा आता घटस्फोट होणार आहे. आम्ही नवराबायकोने एकत्र चांगलं आयुष्य घालवलं. पण बायकोला दुसरा कोणीतरी आवडू लागला आहे. ते दोघं लग्न करणार आहेत. जे लोक माझ्या लग्नाला आले होते त्या सगळ्यांना आमच्या घटस्फोटाची बातमी कळवायची आहे. पत्रात आमच्या सहजीवनात घेतलेला आनंद दिसू दे. आमच्यात कटुता नाही पण घटस्फोट होतोय याचा खेद मात्र नक्की आहे. हे सगळं त्या पत्रातून येऊ द्या.

दुसरी एक व्यक्ती येते. तिला तिच्या तरुणपणीच्या प्रेयसीला पत्र पाठवायचं असतं. तो आणि ती दोघेही आता आपल्या संसारात रमले आहेत. परत एकत्र भेटण्याची शक्यता नाही. पण तरीही एकदा नुसती आठवण जगवायची इच्छा आहे. हे पत्र प्रेमपत्र वाटता कामा नये. माझ्या प्रेयसीच्या संसारात त्याने काही खळबळ माजू नये. आपल्या भावना तिच्यापर्यंत तरी पोचाव्यात. अतिशय तरल आणि कठीण कामगिरी हातोकोवर येते.

असे बरेच प्रसंग या कादंबरीत येतात. प्रत्येक वेळी ती कसा विचार करते, कुठले शब्द वापरते, कशी वाक्यरचना करते, कुठला कागद घेते, अक्षर कसं काढते, पेन शाई कशी निवडते हे सगळं वर्णन वाचत वाचत कादंबरी रंगते. पत्रलेखनाचे किस्से हा कथानकाचा एक भाग आहे. हातोकोचे आणि तिच्या आजीचे संबंध हा कादंबरीच्या प्रसंगांच्या पार्श्वभूमीवरती येणारा धागा आहे. हातोकोला तिची आजी एकटीने वाढवतेले आहे. हातोकोचे आई-वडील कोण हे आजीने तिला कधी सांगितलं नाही. आजही हातोको पत्रलेखन करत असली तरी लहानपणी जेव्हा आजी तिला शिस्त लावत होती, इतर मुलांप्रमाणे मजा करू न देता सतत अक्षर सुधारायचा सराव करायला लावत होती ते तिला आवडत नव्हतं. हळूहळू आजीबरोबर तिचे संबंध कटू होत गेले. ताणले गेले. ती आजीला सोडून परदेशी गेली. आजीच्या माघारी पत्रलेखन करायचं ठरवल्यावर तिला पदोपदी आजीने शिकवलेल्या गोष्टी आठवतात. आजूबाजूच्या लोकांच्या बोलण्यातून आजीबद्दलच्या काही गोष्टी कळतात. आपल्या ग्राहकांच्या भावना शब्दात मांडताना ती स्वतःच्या भावनांचाही नकळत विचार करते . आजीच्या आणि तिच्या नात्याचा पुन्हा पुन्हा विचार करते.

पत्रलेखनाच्या कामातून तिची काही वैशिष्ट्यपूर्ण लोकांशी ओळख होते. मैत्री होते. शेजारणीशी मैत्री होते. त्यांच्या गप्पा, कामाकुरात फिरणं, हॉटेलिंग करणं ह्यातून कामाकुरा गाव, तिथली शांतता, स्वच्छता, निसर्गसौंदर्य, जुनी मंदिरं, चेरीब्लॉसम प्लमब्लॉसम सारखी निसर्गाची लोभसवाणी रूपं, तिथली जीवनपद्धती हे सगळं नेपथ्य उभं राहतं. हे सगळं कादंबरीला आणि कथानकाला पोषकच आहे.

कादंबरी हळूहळू उमलत जाणाऱ्या फुलाप्रमाणे हातोकोचं व्यक्तिमत्व, तिचा भूतकाळ, तिच्या आजीचं व्यक्तिमत्त्व थोडं थोडं उलगडत एका सुंदर वळणावर येऊन पूर्ण होते. पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटले तसं नवरसांपैकी शांतरस हे या कादंबरीचं वेगळेपण आहे. कादंबरीत कुठेही फार मोठं नाट्यमय, धक्कादायक असं काही घडत नाही, तरी प्रत्येक पानात काही ना काही घडत असतंच. एकाच प्रसंगाचं विनाकारण तपशीलवार वर्णन करून पानंच्या पान भरली आहेत असंही नाही. पत्रलेखनाच्या कामातून वेगवेगळे किस्से आपल्यासमोर येतात. पण कुठलाही किस्सा ताणलेला नाही. पत्र सांगणाऱ्या व्यक्तीचे वर्णन, हातोकोची निवड प्रक्रिया आणि पत्राचा झालेला परिणाम असं समजून कथानक पुढे सरकतं. एखाद्या शांत जलप्रवाहात लहान नाव वल्हवत वल्हवत आपण आपल्याच गतीने हळूहळू पुढे सरकावं, आजूबाजूची दृश्य बघावी त्यापद्धतीच्या शांततेचा निवांततेचा अनुभव हे पुस्तक आपल्याला देतं. जपानी संस्कृती, तिथली खाद्यपद्धती, मंदिरं, पत्रलेखनाचे नियम व संकेत या गमतीजमतीही आपल्याला वाचायला मिळतात.

मयुरेश कुलकर्णी यांनी थेट जपानीतून मराठीत याचं भाषांतर केलं आहे. इंग्रजी पुस्तकावरून नाही. भाषांतर अप्रतिमच झालं आहे. फक्त मजकूरच नाही, तर नायिकेने लिहिलेल्या पत्रांमधली शब्दरचनासुद्धा त्या त्या पत्राला साजेशी अशी वेगळी वेगळी ठेवण्यात मयुरेशने यश मिळवलं आहे. वर्णनात जपानची भूमी आणि शब्दांत मराठी माती असा मिलाफ सुंदर जमला आहे.

काही पाने उदाहरणादाखल

लेखिकेची पुस्तकात दिलेली माहिती.


सासूबाईंना साठाव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पत्र लिहा.




नवीन वर्षाचे स्वागत करण्याच्या वेगळ्या समजुती



कामकुरातली भटकंती




कथानकात आलेल्या पत्रांमध्ये हातोकोने काय लिहिले याच बरोबरीने, कसं हस्ताक्षर काढलं आणि सरतेशेवटी ते पत्र कसं दिसलं हे समजणंसुद्धा वाचकासाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळे मूळ पुस्तकात जपानी हस्तलिखित पत्रांचे फोटो छापले आहेत. मयुरेशने सुद्धा देवनागरी लिपी वेगवेगळ्या पद्धतीने लिहून त्या पत्रांचे फोटो छापलेले आहेत. पुस्तक निर्मितीत, पुस्तक छपाईत हा एक वेगळाच प्रयोग आहे. मराठीतही उत्तमपणे साधला गेला आहे.

कथाबीज, कथा घडते ती जागा व तिथली संस्कृती आणि कादंबरीचा बाज या सगळ्यातच नेहमी वाचायला मिळणाऱ्या मराठी किंवा अनुवादित पुस्तकांपेक्षा खूप वेगळेपणा आहे. वैशिष्ट्य आहे. मराठी वाचकांसाठी हा अनुभव आणल्याबद्दल एक वाचक म्हणून आणि मराठी भाषा प्रेमी म्हणून मयुरेशचे व प्रकाशकाचे मनापासून आभार मानतो.

मयुरेशची पुस्तकात दिलेली माहिती


फेसबुक वर तृप्ती कुलकर्णी यांनी पोस्ट लिहून या पुस्तकाचा परिचय करून दिला होता. नंतर तन्वी राऊत हिने लिहिलेला परिचय मी वाचला होता. ते दोन्ही परिचय वाचून पुस्तक वाचायची इच्छा निर्माण झाली. पुस्तक विकत घेतलं आणि ते आवडलं. म्हणून तृप्तीजी आणि तन्वी यांचेही आभार. तृप्ती कुलकर्णी चालवत असलेल्या ऑनलाइन मुलाखती आणि सादरीकरण्याच्या उपक्रमात मागच्या महिन्यात मयुरेशची मुलाखत घेण्यात आली (Youtube link https://www.youtube.com/watch?v=IacLsc72JGM). तेव्हा तो या पुस्तकाबद्दल बोलला. जपानी पुस्तकांच्या वाचनाचे अनुभव, त्याची जपानी भाषेबद्दलची व जपानी साहित्याबद्दलची ओढ आमच्या लक्षात आली. म्हणून त्याने अजून उत्तमोत्तम जपानी पुस्तकांचा अनुवाद मराठीत करावा असा त्याला आग्रह करतो.

तुम्ही हे पुस्तक वाचा आणि तुमचा अनुभव मला नक्की कळवा.



——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

सफाई (saphai)




पुस्तक - सफाई (Saphai)
लेखक - सुमेध वडावाला रिसबूड आणि उत्तमकुमार जैन (Sumedh Wadawala Risbud & Uttamkumar Jain)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १३६
प्रकाशन - नवता बुक वर्ल्ड. ऑक्टोबर २०१३
छापील किंमत रु. १४०/-
ISBN - दिलेला नाही

सुमेध वडावाला रिसबूड ह्यांनी केलेले आत्मकथनांचे शब्दांकन अप्रतिम असते. त्यांची तशी तीन चार पुस्तके मी वाचली आहेत. त्या पुस्तकांची मी लिहिलेली परीक्षणे सुमेधजींनी वाचली होती. त्यांना ती आवडली. त्या ओळखीतून काही दिवसांपूर्वी त्यांना प्रत्यक्ष भेटायचा योग आला. भरपूर गप्पा झाल्या. माझ्या वाचनाला आणि पुस्तक परिचय देण्याच्या उपक्रमाला त्यांनी प्रोत्साहित केले. 



ह्यावेळी आत्मकथनाऐवजी त्यांनी लिहिलेली ललित कादंबरी वाचली. "सफाई" ही एक सामाजिक कादंबरी आहे. दलित वर्गातल्या आणि शहरात राहूनही शहरी प्रगतीपासून काहीशा तुटक राहिलेल्या समाजाची ही कहाणी आहे. हा समाज म्हणजे सफाई कामगार समाज आहे. गावोगावी शहरोशहरी स्वतः घाणीत उतरून स्वच्छतेचे काम करणारा, नागरिकांचे आरोग्य जपणारा हा समाज. घाणीत राहून समाजासाठी काम करणाऱ्या या व्यक्तींकडे बघण्याचा दृष्टिकोन खरं म्हणजे कृतज्ञतेचा असला पाहिजे. पण ह्या समाजातील व्यक्ती आजूबाजूला असेल तर त्या व्यक्तीलाच घाणीसारखं झटकून टाकण्याची प्रतिक्षिप्त क्रिया काही लोकांकडून घडते. तर दुसरीकडे सफाई कामगार समाजातले काही लोकसुद्धा शिक्षण, स्वच्छता,आरोग्य यासाठी उपलब्ध असलेल्या सरकारी सोयीसुविधा यांकडे दुर्लक्ष करून व्यसन, उधारी, वाईट संगती यांच्या दुष्टचक्रातच अडकून राहतात आणि पुढच्या पिढीलाही जबरदस्ती त्यात अडकवून ठेवतात. अशा दुहेरी सामाजिक परिस्थितीच्या खड्ड्यात रुतलेलं रथचक्र उद्धरण्याचं धाडस करू पाहणाऱ्या मायलेकींची ही गोष्ट आहे.

लक्ष्मी ही सफाई कामगार. तिची मुलगी समिधा. या दोघी कथेच्या नायिका. समिधाने दहावीची परीक्षा दिली आहे. लक्ष्मीचा नवरा फार विशेष काम करत नाहीये. तरी दारू आणि जुगाराच्या व्यसनापायी उधारी करत बायकोच्या जीवावर जगतोय. आजूबाजूच्या सगळ्या घरातली म्हणावी तर हीच स्थिती. या परिस्थितीतून बाहेर निघायचं तर मुलीने शिकलं पाहिजे यासाठी लक्ष्मी घरच्यांचा विरोध पत्करून मुलीला शिकवते आहे.

समिधा दहावीतलीच असली तरी मूळची समंजस, संवेदनशील स्वभावाची. बुद्धीने हुशार. त्यात वडिलांची व्यसनाधीनता, आई-वडिलांचं त्यावरून होणारं भांडण, तुटपुंज्या पगारात आईचं घर चालवणं. हे तिच्या चांगलं लक्षात आलं आहे. परिस्थितीने तिला जणू अकाली प्रौढ केलं आहे.

या दोघींच्या आयुष्यात घडणाऱ्या दोन-तीन महिन्यातल्या घटना येथे मुख्य आहेत आणि पात्रांच्या संवादातून लक्ष्मीच्या तरुणपणाच्या, तिच्या सासूच्या काही गोष्टी कळतात. त्यांच्या वस्तीची एकूणच वैचारिक दयनीयता लक्षात येते. घर आणि नोकरी सांभाळताना लक्ष्मीची होणारी तारांबळ, कमीत कमी पैशात घर चालवणं याचा ताण, समिधासाठी पुरेसा खर्च आपण करू शकत नाही याची अपराधीपणाची भावना याचं मनोज्ञ चित्रण आहे. तर केवळ कुंकवाला आधार असणाऱ्या नवऱ्याची चिडही येते, जुने सुखाचे क्षण आठवून आपलेपणाही वाटतोय, त्याच्या व्यसनाला पैसेही द्यावे लागतायत आणि आता व्यसनाशिवाय दुसरं तो काय करणार असा समंजसपणाही मनात येतो. लक्ष्मीच्या मनाची ही विदीर्ण अवस्था छोट्या छोट्या प्रसंगातून आपल्यासमोर पूर्णपणे उभी राहते.

समिधाला मात्र वडिलांचा मनस्वी तिरस्कार वाटत असतो. ती तो स्पष्टपणे बोलूनही दाखवते. बाप-मुलगी, आई-मुलगी आणि नवरा-बायको अशा त्रिकोणातली ही रस्सीखेच आहे.

लक्ष्मी आणि समिधाच्या शिक्षणातून प्रगती साधण्याच्या प्रयत्नांना यश येईल का? बाहेरच्या समाजातले कुठले मदतीचे हात तिला उभारी देतील? तुच्छतेचे कुठले कटाक्ष कसे घायाळ करतील? तिची धडपड समजून घेण्याची कुवत त्या वस्तीतल्या लोकांकडे असेल का? रथचक्र उद्धरेल का ? या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी ही कादंबरी वाचा.

वाचनीय कादंबरी आहे. दोन प्रमुख नायिका असल्या तरी इथल्या प्रत्येक प्रसंगातून, त्यात क्षणभर डोकावणाऱ्या माणसांतून समाजातल्या माणसांच्या वेगवेगळ्या रंगछटा दिसतात आणि हळूहळू चित्र पूर्ण होऊ लागतं. लक्ष्मी, तिचा नवरा, तिची सासू, लक्ष्मीच्या लोकल मधल्या मैत्रिणी, तिला मदत करणारे काही जण आणि वस्तीतले लोक या सगळ्यांची वर्णने , त्यांच्या तोंडचे संवाद नैसर्गिक वाटतात. फक्त समिधाच्या तोंडचे संवाद हे फारच पोक्त, प्रौढ भाषेतले, पुस्तकी वाटतात. त्या मुलीला घरच्या परिस्थितीची जाण आहे हे आपण समजू शकतो पण जणू तिने जगाचाच अनुभव घेतला आहे असं तिचं बोलणं, आईला आणि तिऱ्हाईतांना शिकवणं हे तितकं नैसर्गिक वाटलं नाही.
कादंबरीच्या पहिल्या भागात प्रसंग सविस्तरपणे येतात आणि शेवटच्या काही पानांमध्ये फार पटपट प्रसंग घडून कादंबरी संपते.

काही पाने उदाहरणादाखल.

पैशाची तंगी, बापाचं वागणं आणि समिधाचा राग दाखवणार आहे प्रसंग



दहावीत बोर्डात पहिली आल्याबद्दल नगरसेवक सत्कार करायल येतात तेव्हा समिधाच्या बोलण्यातून वस्तीची व्यथा व्यक्त होते



समाजात बदल घडताना तो अचानक पूर्ण समाजाचा होणार नाही तर तो बदल हळूहळू आधी एकेका व्यक्तीचा, त्याच्या कुटुंबाचा होईल. अशा अनेक व्यक्ती आणि कुटुंबाच्या बदलातून रूपात सामाजिक परिवर्तनाचे प्रमाण वाढेल. ही जाणीव करून देणारी ही कादंबरी आहे.

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

त्सुबाकी स्टेशनर्स (Tsubaki Stationers)

पुस्तक - त्सुबाकी स्टेशनर्स (Tsubaki Stationers) लेखक - इतो ओगावा (Ito Ogawa) अनुवाद - मयुरेश कुलकर्णी (Mayuresh Kulkarni) भाषा - मराठी (Mar...