दिशा आणि वाटा काही प्रवास नोंदी (Disha ani vata : Kahi pravasanondi)





पुस्तक - दिशा आणि वाटा : काही प्रवास नोंदी (Disha ani vata : Kahi pravasanondi)
लेखक डॉक्टर आशुतोष जावडेकर (Dr. Ashutosh Javdekar)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १९१
प्रकाशन - पद्मगंधा प्रकाशन डिसेंबर २०२४
छापील किंमत - रू. ३५०/-
ISBN 978-81-946458-4-9

आपल्यापैकी बहुतेकांना फिरायला जायला आवडतं. नवनवीन ठिकाणं बघायला आवडतं. तिथे वैविध्यपूर्ण पदार्थ खाणं, खरेदी करणं आवडतं. तितकंच आवडतं घरी परत आल्यावर तो सगळा अनुभव आपल्या घरच्या मंडळींना, मित्र-मैत्रिणींना सांगणं. अशीच आवड लेखकालाही आहे आणि त्यातून या प्रवास नोंदी पुस्तक रूपाने आपल्यासमोर आल्या आहेत. लेखक आशुतोष जावडेकर हे एकटे किंवा आपल्या पत्नी, आई, मुलीसोबत परदेशात वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करून आले आहेत. त्या प्रवासात त्यांना जाणवलेले महत्त्वाचे, रंजक, माहितीपर, काहीतरी वेगळे असे अनुभव त्यांनी शब्दबद्ध केले आहेत.

त्यात गमतीजमती आहेत, कधी गंभीर प्रसंग किंवा ओढवलेलं संकट आहे. झालेली फजिती आहे तशीच नव्याने कळलेली माहिती आहे. थोडं स्थलवर्णन, थोडं प्रवासाचं वर्णन, थोडं खाण्यापिण्याचं वर्णन आणि थोडं तिथल्या लोकांचं वर्णन असा प्रकार आहे. त्यातूनच वाचकाच्या मनात सुद्धा त्या त्या ठिकाणाबद्दल उत्सुकता चाळवली जाते. प्रवास करण्याची, तिकडे जाऊन तो अनुभव घेण्याची इच्छा निर्माण होते. नकारार्थी अभिप्राय वाचून एखाद्याची योजना बारगळूही शकेल. भेट दिलेल्या ठिकाणच्या इतिहास, भूगोल, संस्कृती, वर्तमान याचा सविस्तर अभ्यास आहे असा दावा न करता त्या मर्यादित काळात आपल्याला काय दिसलं, काय जाणवलं हे सांगायची निखळ उर्मी घेऊन लिहिलेलं पुस्तक आहे. प्रवासाचं वर्णन म्हणून ते इंटरेस्टिंग आहेच वर त्यात लेखकाची शैली सुद्धा अगदी समोर बसून गप्पा मारतोय अशी आहे. त्यामुळे पुस्तक वाचायला मजा येते.
अनुक्रमाणिकेवर नजर टाकली की तुम्हाला लक्षात येईल त्यांनी कुठल्या कुठल्या ठिकाणांचे वर्णन केलं आहे.

परदेशात जाताना बहुतेक मध्यमवर्गीय आणि मध्यमवयीन लोक हे एखाद्या टुरिस्ट कंपनीच्या पॅकेज टूर मधून जातात. सहाजिकच मुख्य पर्यटनस्थळं बघून होतात. प्रवासाची आखणी, तिकिटाचे बुकिंग हा सगळा व्याप आपल्याला करावा लागत नाही. तर त्याच्या उलट काही जण बॅक पॅकर्स म्हणजे छोटेसे सामान घेऊन परदेशात जातात. मनाला येईल तसा प्रवास करतात. कुठेही राहतात. कोणालाही लिफ्ट मागून प्रवास करतात. मिळेल ते खातात वगैरे वगैरे. या दोन्ही टोकांचा मध्य म्हणजे लेखकाची प्रवासाची पद्धत. टूर कंपनी बरोबर न जाता इंटरनेटवरनं पूर्ण माहिती काढून, परिचितांचा सल्ला घेऊन त्यांनी स्वतः आखणी केली आहे. काय बघायचं, कुठे राहायचं, कसा प्रवास करायचा हे सगळं ठरवलं. फक्त पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या ठिकाणांना भेटी न देता त्यापेक्षा थोड्या हटके पण तितकंच निसर्ग सौंदर्य किंवा ऐतिहासिक-भौगोलिक महत्त्व असणारी अशी ठिकाणे निवडली. रेल्वे, ट्राम, बस अशा सार्वजनिक वाहनांनी प्रवास केला. हॉटेल्स, गेस्ट हाऊस किंवा सर्विस अपार्टमेंट अशा ठिकाणी राहिले. त्यामुळे स्थानिक लोकांशी, स्थानिक भाषेशी त्यांचा जास्त जवळून परिचय झाला. म्हणूनच त्यांचा अनुभव सर्वसामान्य पर्यटकांपेक्षा थोडा वेगळा आहे. त्यांनी अनुभवलेली ठिकाण सुद्धा वेगळी आहेत.
वर्णनाचं दुसरा वैशिष्ट्य म्हणजे ते फक्त स्थलवर्णन करत नाहीत तर स्वतःच्या मनात तेव्हा आलेले विचार, आलेल्या भावना यांचे उत्कट चित्रण सुद्धा करतात. त्यामुळे बाहेर चालणारा प्रवास आणि अंतर्मनात होणारा विचारांचा प्रवास सुद्धा आपल्याला दिसतो.
पुस्तक वाचताना जाणवतं की एकूणच त्यांचा प्रवासाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक आहे. नवनवीन अनुभव वेचण्याकडे कल आहे. सगळं काही अगदी आपल्या घरातल्यासारखं, आपल्या गावातल्या सारखं मिळणार नाही; काही गैरसोयी होतील याची मानसिक तयारी ठेवून, भरपूर चालायची तयारी ठेवून त्यांनी प्रवास केला आहे. त्यामुळे त्यांचा सूर फार क्वचितच तक्रारदाराचा होतो. युरोपमध्ये फिरताना स्वित्झर्लंड मध्ये त्यांना काही वेळा भारतीय गौरेतर वंशाचे असल्यामुळे वंशभेदाचा अनुभव आला ते सुद्धा त्यांनी लिहिले आहे.
काही पानं उदाहरणादाखल
स्वित्झर्लंड मधला रेल्वे प्रवास आणि तिथल्या लोकांचं अगत्य


बाली मधल्या उबूड गावाचं प्रसन्न वर्णन.




पुस्तकाच्या पहिल्या अर्ध्या भागात परदेशी प्रवास वर्णन आहेत तर दुसऱ्या अर्ध्या भागात भारतीय प्रवास वर्णन आहेत. पण भारतीय प्रवासवर्णनांमध्ये स्थलवर्णनाचा भाग कमी आणि आत्मनिवेदनाचा भाग जास्त आहे असं मला वाटलं. लेखक एखाद्या ठिकाणी गेला आहे किंवा त्याने एखादे दृश्य बघितले मग त्याच्या मनात काय भावभावनांचे तरंग उमटले हा सगळा भाग जास्त येतो.
विमान प्रवास करताना हवेत उडण्याची मजा आपण घेतो त्याचवेळी आपण अधांतरी लटकतो आहोत हे जाणून धाकधूक वाढते. त्याउलट रेल्वे प्रवास जमिनीवरून होतो पण खूप वेळ बसावं लागतं. गाडीत नाना प्रवासी भेटतात. गाडीच्या धडक धडक शी आपली लय जुळली तर विचाराची तंद्री लागते. या प्रत्येक प्रवासाबद्दल आपापली काही मतं, आवडीनिवडी, आठवणी आणि विचारविश्व नक्की असणार. असं लेखकाचं अनुभवविश्व आपल्याला इथे बघायला मिळतं. लेखक फारच संवेदनशील तरल मनाचा आहे असं आपल्याला जाणवतं. त्यामुळे लहान लहान अनुभवातून लेखक विचारप्रवृत्त होतो. त्याला जुन्या कविता, कथा कादंबऱ्यातली उधृतं आठवतात. लेखकाला जाणवलेल्या भावनांशी आपण काही वेळा स्वतःला जोडून घेऊ शकतो. तर काही वेळा घडलेली घटना व त्यातून लेखकाने गाठलेलं भावनांचं टोक हे फारच ताणलेलं आहे असंही वाटू शकतं. लागोपाठ दोन-तीन लेख वाचल्यावर साधारण पुढच्या लेखांचा अंदाज आपल्याला येतो. त्या दृष्टीने परदेशप्रवास मधल्या लेखांपेक्षा दुसऱ्या भागातल्या लेखांमध्ये मला तोचतोचपणा जाणवला. ते कमी रंजक वाटले.
भाषणांचे प्रवास मधील दोन पाने.


असे हे पुस्तकाचे स्वरूप आहे. परदेशी प्रवासाचच्या वर्णनात गोष्टींची रंजकता आहे. तर दुसऱ्या भागात जणू आपलेच विचार शब्दांकित झाल्याने पुनःपरिचयाची चव आहे. चला फिरायला जावूया, वेगळं काहीतरी अनुभवूया, नेहमीच्या प्रवासाचे जरा वेगळेपणाने बघूया असं नक्कीच वाटेल.


लेखक आशुतोष जावडेकर ह्यांच्याबरोबर वेगवेगळ्या कार्यक्रमात भेटी आणि गप्पा झाल्या होत्या. विश्व मराठी संमेलनात हे पुस्तक मी विकत घेतलं. त्या संमेलनात झालेल्या भेटीचा फोटो.



——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

No comments:

Post a Comment

बांधावरची बाभळ (Bandhavarachi babhal)

पुस्तक - बांधावरची बाभळ (Bandhavarachi babhal) लेखक - प्रकाश नावलकर (Prakash Navalkar) भाषा - मराठी (Marathi) पाने - १७२ प्रकाशन - न्य...