काकासाहेब चितळे सहवेदनेतून समृद्धीकडे (Kakasaheb Chitale - Sahavedanetun Samruddhikade)

पुस्तक - काकासाहेब चितळे सहवेदनेतून समृद्धीकडे (Kakasaheb Chitale - Sahavedanetun Samruddhikade)
लेखिका - वसुंधरा काशीकर (Vasundhara Kashikar)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - २६५
प्रकाशन - सकाळ प्रकाशन, जुलै २०२५
छापील किंमत रु.४९९/-
ISBN 978-93-49487-78-9

"चितळे बंधू मिठाईवाले" हे नाव ऐकलं नाही असा महाराष्ट्रातील माणूस विरळाच. पुण्यासारख्या ऐतिहासिक सांस्कृतिक नगरीची एक ओळख बनलेला "चितळे बंधू" हा ब्रँड आहे. चितळ्यांची बाकरवडी, श्रीखंड, इतकंच काय, दुकानाच्या चालूबंद असण्याच्या वेळा हा सुद्धा लोकांच्या आवडीचा आणि चर्चेचा विषय राहिलेला आहे. चितळे दूध, चक्का, तूप इतर दुग्धजन्य पदार्थ मिठाया तिखट मिठाचे पदार्थ या सगळ्यांचे चाहते महाराष्ट्रभर पसरलेले आहेत. परदेशस्थ मराठी माणसांमुळे ही नाममुद्रा सातासमुद्रापलीकडेही पोचली आहे. चव, स्वच्छता, मालाचा दर्जा ह्यातली उत्तमता त्यांनी कायम राखली आहे. त्यांच्या उत्पादनांमध्ये व व्यवसायामध्ये दिवसेंदिवस वृद्धीच होते आहे. एका मराठी माणसाने सुरू केलेला, त्याच्या कुटुंबीयांनी वाढवलेला आणि चौथ्या पिढीपर्यंत एकत्र राहून प्रगतीपथावर राखलेला हा उद्योग असल्यामुळे सहसा उद्योगाच्या वाटेला न जाणाऱ्या मराठी माणसासाठी अजूनच कौतुकाचा आहे.

मला तर त्यांच्या मिठाया आणि तिखटमिठाचे पदार्थ इतके आवडतात की वरचेवर दुकानात खरेदी होत असते. मित्रांना - सहकाऱ्यांना काही खाऊ न्यायाचा असेल तर तो हमखास चितळेंचाच असतो. त्यामुळे मला तर माझे मित्र थट्टेने चितळ्यांचा ब्रँड अम्बॅसेडरच म्हणतात. त्यांच्या दोन कारखान्यांना खाजगी भेट देण्याची संधी योगायोगाने मिळाली. त्यांचे वर्णन फेसबुकवरच्या माझ्या पोस्टमध्ये वाचू शकाल

https://www.facebook.com/kaushik.lele/posts/pfbid0raGA1C4bdzD1Z8RAQsSWH7s3HsZq56nXazzDPh4AqnWijNy4cKqsEZXxGpktMWNrl

https://www.facebook.com/kaushik.lele/posts/pfbid0rBsfxsyuAUQr6t7oZNRENjCg4CTuV82DBYcsKWxZcQ1e97PMS1fku6qxm3hRTAHfl

सांगली जवळच्या भिलवडी गावामध्ये भास्कर चितळे अर्थात बाबासाहेब चितळे यांनी एक छोटा दुधाचा धंदा सुरू केला. त्या बीजाचा आज वटवृक्ष झालेला आपल्याला दिसतो. या विस्तारात बाबासाहेबांची मुलं, सुना, नातवंडं आणि आता पतवंडंही कार्यरत आहेत. बाबासाहेबांचे चिरंजीव दत्तात्रय उर्फ काकासाहेब चितळे हे त्यापैकी एक. काकासाहेबांच्या कर्तृत्वाची, दातृत्वाची आणि सहृदयतेची विविधांगी ओळख करून देणारं असं हे पुस्तक आहे. या आधी मी काकासाहेबांबद्दल काही विशेष वाचलं नव्हतं. चितळे समूहाच्या सामाजिक कामाबद्दलही विशेष माहिती नव्हती. पण या पुस्तकातून त्या दोन्ही बद्दल फार छान ओळख झाली. चितळ्यांच्या खास पेढ्यांसारखं उद्योजगतेच्या गोड खव्याच्या आत सामाजिक बांधिलकीचं सारण कसं भरलेलं आहे हे जाणवलं.

पुस्तक वाचल्यावर असं वाटलं की, नवनवीन तंत्रज्ञान आणून, नवीन संकल्पना राबवून काकासाहेबांनी केवळ उद्योग वाढ केली असती तरीही एक यशस्वी उद्योगपती म्हणून आपल्या मनात कौतुकाचे स्थान मिळवते झाले असते. पण काकासाहेबांचं वैशिष्ट्य असं की त्यांनी आपला धंदा वाढवताना नफेखोरी केली नाही. आपले ग्राहक, पुरवठादार कर्मचारी यांची पिळवणूक करून उत्पन्नाचे मोठमोठे आकडे गाठण्याची खेळी केली नाही, उलट या सर्वांचा आर्थिक, सामाजिक व वैचारिक विकास कसा होईल याची काळजी घेतली. त्याचे योग्य परिणाम दिसलेच. मालक-कर्मचारी, मालक-पुरवठादार असे कोरडे संबंध न राहता ते संबंध परस्पर विश्वासाचे झाले, जिव्हाळ्याचे झाले. चितळे समूहाच्या विस्तारित कुटुंबाचे ते सगळे भाग झाले. इतकं केलं असतं तरी एक सहृदय उद्योजक म्हणून आपला आदर दुणावला असता. पण काकासाहेब इतक्यावर थांबले नाहीत. ते ज्या गावात उद्योग करत होते त्या "भिलवडी" गावाचा, पंचक्रोशीचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले. शिक्षण संस्था आणि इतर सामाजिक कामांना भरभरून देणग्या दिल्या. गरजूंना मदत केली. इतकं केलं असतं तरी ते दानशूर सहृदय उद्योजक ठरले असते. पण काकासाहेब फक्त देणग्या देऊन थांबले नाहीत तर जिथे आर्थिक मदत केली आहे तिथे तिथे आपल्या अनुभवाचा वापर करून योग्य मार्गदर्शन केलं. वेगवेगळ्या संस्था सुरू केल्या. त्यांच्या दैनंदिन कामात भाग घेऊन संस्था कार्यप्रवण केल्या. ग्रामस्वच्छतेसाठी श्रमदान असो, महापूर येऊन गेल्यावर गावात झालेला गाळ काढण्याचे असो; काम काका हातात कुदळ-फावडं घेऊन कमला पुढे. शेजाऱ्यापाजाऱ्यांच्या घरी लग्नकार्य किंवा दुःखद प्रसंग असो, संस्थेच्या कामासाठी आलेल्या पाहुण्यांची उठबस असो; काका तिथे प्रत्यक्ष काम करत होते. हे वाचल्यावर तर कर्ता सुधारक, दानशूर, सहृदय यशस्वी उद्योजक अशी किती विशेषणे त्यांना लावावी ! समजत नाही.

इतक्या सगळ्या गोष्टींमध्ये व्यग्र असणाऱ्या माणसाला घरच्यांना वेळ देणं, आपल्या मुलानातवंडांशी प्रेमाचे संबंध ठेवण्यासाठी पुरेसा वेळ आणि मानसिक स्थैर्य मिळणं कठीण जातं. बऱ्याच वेळा आपण बघतो की महापुरुषांच्या सावलीत त्यांची पुढची पिढी तितकी यशस्वी वाढत नाही. समाजासाठी वाहून घेतलेल्या लोकांच्या कामाची झळ कुटुंबीयांना भोगावी लागते. पण पुस्तकात दिलेल्या वर्णानुसार काकांचे आपल्या घरच्या मंडळींशी सुद्धा अतिशय प्रेमाचे, आनंदाचे संबंध होते. एकत्र कुटुंब म्हणून नांदणाऱ्या चितळे घरात घरच्या आनंदाच्या आणि अडचणीच्या प्रसंगातही काका उपलब्ध होते.

भारतीय परंपरेने सांगितलेले चार पुरुषार्थ धर्म-अर्थ-काम आणि मोक्ष. या ऐहिक जगातले धर्म, अर्थ आणि काम हे पुरुषार्थ काकासाहेबांनी साधले आहेत. चौथा पुरुषार्थही नक्कीच परमेश्वराने त्यांना आनंदाने दिला असेल.

चरित्र नायकाची ही धावती ओळख वाचून तुम्हाला पुस्तकाबद्दल नक्कीच उत्सुकता वाटत असेल त्यामुळे थोडं पुस्तकाच्या मजकुराबद्दल सांगतो. पुस्तकात एकूण २२ प्रकरणं आहेत. त्यात काकांनी केलेल्या वेगवेगळ्या कार्याची वर्गवारी केलेली आहे. 
काही प्रकरणाबद्दल थोडक्यात सांगतो म्हणजे कल्पना येईल.

"अशी म्हैस सुरेख बाई" - म्हशीचं दूध हा चितळ्यांचा मुख्य धंदा. त्यासाठी चांगल्या जातीच्या, भरपूर दूध देणाऱ्या म्हशी निवडण्यासाठी काका परराज्यात जायचे. परिसरातील शेतकऱ्यांना, पशुपालकांना म्हशी घेण्यासाठी मदत करायचे. म्हशींचे आरोग्य सांभाळण्यासाठी डॉक्टरांची सोय त्यांनी उपलब्ध करून दिली. म्हशींचा विमा काढण्याच्या प्रक्रियेत सुद्धा त्यांनी लक्ष घालून ती शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त सोपी कशी होईल हे बघितले. आजाराने म्हशी दगावणे, अपघात होणे किंवा परराज्यातून म्हैस आणताना अपघात होणे या सगळ्या गोष्टींसाठी कमीत कमी हप्त्यामध्ये जास्तीत जास्त विमा कवच त्यांनी शेतकऱ्यांना मिळवून दिलं.

"भिलवडी चे गाडगेबाबा" - गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान २००२ साली भिलवडीत राबविण्यात आलं. त्यात काकांनी पुढाकार घेतला. कामाचं पूर्ण नियोजन केलं. गटारे बांधणे, शौचालये बांधणे, उद्यान तयार करणे, वृक्षारोपण करणे, वैद्यकीय शिबिर घेणे, कचरा व्यवस्थापन करणे अशा प्रत्येक गोष्टीत त्यांनी स्वतःचा अनुभव आणि नेनेतृत्त्वगुण कामाला लावले. जिथे शासकीय मदत वा गावाचा निधी कमी पडत होता तिथे चितळे समूहातर्फे पैसे देऊन काम मार्गी लावलं. राज्यात भिलवडीचा दुसरा क्रमांक आला.

"सार्वजनिक वाचनालय आणि भिलवडी शिक्षण संस्था" - फक्त इमारत बांधून, चांगली पुस्तकं तिथे आणून काका थांबले नाहीत तर जास्तीत जास्त लोक तिथे यावेत यासाठी वाचन कट्टा, पुस्तक भेट असे कार्यक्रमही राबवले. शिशुवर्गापासून उच्च शिक्षणापर्यंत सोयी उभारण्यात मोठा सहभाग घेतला.

"मी अजून जहाज सोडलेलं नाही" - भिलवडीला आलेल्या दोन महापुरात काकासाहेब भिलवडी न सोडता तिथेच राहिले. लोकांना बाहेर काढणं, जनावरांना बाहेर काढणं, बाहेरगावाहून मदत आणणं आणि त्याचं योग्य वाटप करणं ह्या सगळ्यात त्यांनी जीवाचं रान केलं ते सगळे प्रसंग यात आहेत.

काकांचे भाऊ, मुलं, सुना, नातू यांच्या काकांविषयीच्या आठवणी दोन लेखात आहेत तर. "व्रतस्थ इमानाची यात्रा ८५ वर्षांची" ह्या लेखात चितळे समूहाच्या स्थापनेपासून आतापर्यंतच्या प्रगतीचा धावता आढावा घेतला आहे. कुटुंबातल्या कुठल्या व्यक्ती कुठल्या जबाबदारीवर आहे याची माहिती दिलेली आहे.

काही पाने उदाहरणादाखल

आजूबाजूच्या होतकरू तरुणांना स्वतः आर्थिक मदत करणे, स्वतःची पत खर्ची घालून बँकेकडून मोठ्या रकमांची कर्ज मिळवून देणे आणि परतफेडीची योग्य व्यवस्था लावणे याबद्दलची दोन पाने


फक्त धान्यशेती आणि दूध इतपतच मर्यादित न राहता शेतकऱ्यांनी फळबागा कराव्यात, नवीन प्रकारची पिकं घ्यावी यासाठीही ते प्रोत्साहन देत. मार्गदर्शन करत. आर्थिक मदत देत आणि पुढाकार घेऊन संस्थात्मक काम करत त्यातील एक उदाहरण.

असंख्य सामाजिक विषयात काम करणारे काकासाहेब नेत्रदानासाठीही सक्रिय होते त्याबद्दल



अशा पद्धतीने काकासाहेबांच्या सामाजिक कामाची माहिती अतिशय जोरकसपणे या पुस्तकात येते हे या पुस्तकाचं  नक्की यश आहे. पण काकासाहेबांचं पूर्ण चरित्र किंवा त्यांचा जीवनपट असा डोळ्यासमोर येत नाही. सर्वसामान्य वाचकांना चितळ्यांची मिठाई माहिती आहे पण "चितळे बंधू" म्हटल्यावर चितळ्यांच्या कुटुंबात कोण कोण आहेत; कोण उद्योगात आहेत; त्यांची परस्पर नाती काय हे माहिती नाही. त्यामुळे ह्या चितळ्यांपैकी काकासाहेब हे नक्की कोणाचे कोण हे आधी स्पष्ट व्हायला हवं होतं. चितळे वंशवृक्षाची माहिती, काकासाहेबांच्या आयुष्यातले मुख्य टप्पे, त्याचा काळ, त्याची ठिकाणं हे थोडक्यात सांगायला हवं होतं. ही स्थलकालनिश्चिती झाल्यावर पुढची प्रकरणे अजून परिणामकारक झाली असती. प्रत्यक्ष चितळे डेअरी साठी 
त्यांनी केलेलं काम हे देखील तुटक तुटकपणे समोर येतं. ते अजून जोरकसपणे यायला हवं होतं. त्यांच्या बुद्धीचा, तांत्रिक कौशल्याचा वापर त्यांनी प्रत्यक्ष डेअरी साठी कसा केला; काय काय पद सांभाळली, कुठल्या भूमिका निभावल्या, उत्पादनांची संख्या गुणवत्ता आणि उत्पन्न कसं वाढवलं हा सगळा भाग तितका जोरकसपणे येत नाही. त्यांनी उद्योगात मिळवलेले यश आणि "उत्तम व्यवहाराने जोडलेले धन" हे त्यांच्या पुढच्या सामाजिक कामासाठी एक मजबूत पाया झाले आहे. तो पाया कसा घडला हे सविस्तर वाचायला मिळणं आवश्यक होतं.पुढच्या आवृत्तीत त्यात एक प्रकरण सुरुवातीला जोडावं असं मला वाटतं.

काकासाहेबांचं काम जितक्या सकारात्मकतेने आणि ऊर्जेने भरलेलं आहे ते तितक्याच ऊर्जाभरल्या शब्दांनी आपल्यासमोर आणलं आहे वसुंधरा काशीकर यांनी. निवेदन, एखाद्या व्यक्तीच्या मुलाखतीतला भाग, थोडी माहिती अशा स्वरूपातलं लेखन अतिशय प्रवाही आहे. थेट लोकांच्या तोंडून काकासाहेबांचे अनुभव ऐकतोय आहोत असंच वाटतं. लेखिकेने वाचकाने घ्यायचा बोध सोप्या शब्दांत सांगितला आहे. गाण्याच्या ओळी, गजलेच्या ओळी, उद्धृते ह्यांनी मजकूर नटलेला आहे. म्हणूनच पुस्तक रुक्ष चरित्र किंवा कामाची जंत्री असं होत नाही. ही एक सुंदर ललित कलाकृती आहे.

"सकाळ प्रकाशना"ने पूर्ण मजकूरही वेगवेगळ्या रंगात सादर केला आहे. ठळक शीर्षक, त्याच्याखाली दाट रेघ, डावीकडचे पानभर रेखाचित्र, चित्र मजकूर ठळक दाखवण्यासाठी रंगांचा वापर केला आहे. "Kaka says" असं म्हणत काकांची त्या त्या प्रसंगाला साजेशी वाक्ये ठळक दिलेली आहेत. वृत्तपत्रे लेखातील चौकटीप्रमाणे. यामुळे हे पुस्तक सुद्धा तितकंच देखणं आणि अभिरुचीपूर्ण झालं आहे.

पुस्तकात भरपूर फोटोही आहेत विशेष म्हणजे प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला एक छान रेखाचित्र आहे. अनंत खासबारदार यांनी ही चित्रे काढली आहेत. एक उदाहरण पहा.

महापुराच्या वेळी काकांनी केलेल्या कामा ची ओळख करून देणारे हे चित्र किती यथायोग्य आहे, सुरेख आहे, आकर्षक आहे. "अ पिक्चर इज वर्थ थाउजंड वर्ड्स" चा प्रत्यय देणारं आहे.

तर असं हे पुस्तक वाचाच. हवं तर चितळ्यांची श्रीखंड आणि बाकरवडी खात खात पुस्तक वाचा 😀😀. काकासाहेबांच्या कामाची गोडी चाखताना पदार्थांची गोडी आणि खुमारीही वाढेल. लक्ष्मी आणि सरस्वतीचं एकत्र वास्तव्य दिसेल. आपल्या वकुबानुसार समाजासाठी काही करायची ऊर्मीही वाढेल.

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

जा जरा पूर्वेकडे (Ja jara purvekade)




पुस्तक - जा जरा पूर्वेकडे (Ja jara purvekade)
लेखक - आशुतोष जोशी (Ashutosh Joshi)
अनुवाद - सविता दामले, मोहना प्रभुदेसाई जोगळेकर (Savita Damle, Mohna Prabhudesai Joglekar)
भाषा - मराठी (Marathi)
मूळ पुस्तक - Journey to the east (जर्नी टू द ईस्ट)
मूळ पुस्तकाची भाषा - English (इंग्रजी)
पाने - १७५
प्रकाशन - ब्लीच पब्लिशिंग 2025
ISBN - 978-93-342-9139-1
छापील किंमत - रु. ५००/-

समाज माध्यमांवर पोस्ट वाचताना, व्हिडिओ बघताना कळलं की आशुतोष जोशी या पंचवीस-तिशीतल्या तरुणाने कोकणापासून बंगालच्या उपसागरापर्यंत पदयात्रा केली आहे. ह्या प्रवासापूर्वी तो इंग्लंडमध्ये फोटोग्राफीची व्यावसायिक कामे करत होता. पण त्याने भारतात परत यायचं ठरवलं. ही पदयात्रा केली. आणि सध्या तो त्याच्या गावी गावकऱ्यांसाठीचे काही सामाजिक प्रकल्प राबवतो आहे. ह्या जुजबी माहितीवरून त्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि त्याच्या प्रवासाबद्दल उत्सुकता वाटून त्याचे पुस्तक मी विकत घेतलं. "जा जरा पूर्वेकडे" या पुस्तकात त्याने त्याच्या पदयात्रेतल्या अनुभवांबद्दल लिहिले आहे. १८५० किलोमीटर इतकी लांब ही पदयात्रा होती त्याला ६७ दिवस लागले.

हे पुस्तक त्याच्या प्रवासाची रोजनिशी नाहीये. प्रवासाचा सुरुवातीचा दिवस, शेवटचा दिवस आणि मधल्या काळात घडलेल्या दहा पंधरा घटना त्यात आहेत. एखादा प्रसंग आणि त्यावर आधारित त्याचं बरंचसं तत्वचिंतन असं निवेदनाचं स्वरूप आहे.

पुस्तक वाचताना कळतं की मर्यादित सामान एका ढकलगाडीत घालून तो प्रवास करत होता. कधी कुणाच्या घरी, कधी देवळात, तर कधी उघड्यावरती तंबू ठोकून त्याने मुक्काम केला. वाटेतल्या लागणाऱ्या गावांमध्ये गावकऱ्यांनी त्याला खायला दिलं. काहीवेळा घरीही राहायला देऊन पाहुणचार केला. असं काहीमिळालं नाही तेव्हा त्याच्या स्वतः कडची मॅगी किंवा पॅकेट फूड खाऊन दिवस काढला. ऊन, पाऊस, जंगली दमटपणा, सिमेंटचा रस्ता, कच्चा रस्ता माळरान अशा वेगवेगळ्या परिस्थितीतून त्याने प्रवास केला.

काही पाने उदाहरणादाखल

लेखकाची पुस्तकात दिलेली माहिती.


गावकऱ्याशी संवाद आणि शेतीबद्दल चिंतन.



नक्षलप्रभावित भागात शिरताना पोलिसांनी चौकशी केली.



पंचविशीतला एक तरुण पदयात्रेवर निघतोय हे किती धाडसाचं आहे! अशा प्रवासात स्वतःला शारीरिक व मानसिक दृष्ट्या खंबीर ठेवणं महत्त्वाचं आहे. अनोळखी प्रदेशातून जाताना कधी त्रासदायक तर कधी चिंतेत टाकणारी परिस्थिती समोर येणार; तर कधी अनपेक्षित आनंदाचे क्षणही येणार. आशुतोषचं हे धाडस, त्याला आलेले अनुभव आणि त्यातून त्याच्या मनावर विचारांवर झालेला परिणाम हे सगळं ह्या पुस्तकात सापडेल असं वाटून मोठ्या औत्सुक्याने मी हे पुस्तक वाचायला घेतलं. परंतु पुस्तकाने माझी निराशा केली.

ज्या प्रसं
गांचं वर्णन केलं आहे त्या प्रसंगांचा स्थलकालाचा संदर्भच बहुतेक वेळा लागत नाही. अगदी सुरुवात म्हणजे त्याचं नरवण गाव कोकणात नक्की कुठे आहे हे मला माहिती नाही. शेवट ज्या गावात झाला ते माहिती नाही. त्याचा प्रवासाचा मार्ग कसा होता ते समजत नाही. नकाशा नाही तरी एखादं रेखाचित्र हवं होतं. रोजनिशी सारखं वर्णन नसल्यामुळे अचानक उड्या मारत मारत एका गावातलं वर्णन मग कुठल्यातरी पुढच्या गावाचं वर्णन मग त्याच्या पुढचं असं आहे. त्यामुळे मध्ये किती वेळ गेला, किती अंतर गेलं, काय केलं काही समजत नाही. त्यामुळे त्या प्रवासाचं गांभीर्य आपल्यापर्यंत पोहोचत नाही.

पुस्तकाच्या सुरुवातीला आशुतोष म्हणतो की परदेशात राहत असताना भारतात
ल्या  "कृषी कायदे" विरोधी आंदोलनाच्या बातम्या त्याने बघितल्या. शेतीच्या समस्या त्याला जाणवल्या. त्या नीट समजून घ्याव्यात हाही पदयात्रेचा उद्देश होता. पण पुस्तकात बघितलं तर; आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची भेट आणि गावातल्या एक दोन लोकांशी बदलत्या पीक पद्धती बद्दल बोलणं या व्यतिरिक्त काही खास संशोधनात्मक प्रसंग नाहीत. डोळेसपणे बातम्या बघणाऱ्या, वृत्तपत्रीय लेख वाचणाऱ्या कुठल्याही माणसाला जी जुजबी माहिती या समस्यांबद्दल असेल तेवढेच त्याला प्रत्यक्ष चालूनही समजली; असा समज वाचकाचा झाला तर नवल नाही. कदाचित त्याची वैयक्तिक समज खूप वाढली असेलही पण इथे ते ध्वनित होत नाही.

जंगलातल्या प्रवासात जाताना अस्वल अगदी त्याच्या जवळ आलं होतं. हल्ला व्हायची वेळ आली होती. हा एक प्रसंग वगळता पायी चालणे, उघड्यावर राहणे ह्यामुळे घडलेला कुठलाही थरारक प्रसंग पुस्तकात नाही. पदयात्रा करताना त्याला वारंवार संकटं यायला हवी होती आणि मग ती वाचायला आम्हाला मजा आली असती असं मला म्हणायचं नाहीये. मी सुरुवातीला म्हटलं तसं स्वतःची शारीरिक-मानसिक खंबीरता टिकवणे आणि स्वतःच्या रोजच्या सोयी करणे यासाठी केलेली धडपड सुद्धा वाचकाला समजून घ्यायला आवडलं असतं. पण पुस्तक त्याही बाबतीत लंगडं आहे. त्याला आलेले अजून अनुभव, भेटलेली माणसं, दिसलेला निसर्ग ह्यांचा अजून उल्लेख हवा होता. एक सलगता आली असती.

तिसरा पैलू म्हणजे सामाजिक परिस्थितीबद्दलचं त्याचं मुक्त चिंतन. एकूणच कथनाचा सूर असा आहे की शहरातले लोक आरामात जगतात आणि गावातले लोक फारच दुःखी आहेत. शहरातल्या लोकांना गावातल्या लोकांची जाण नाहीये. शहरातले लोक फक्त तंत्रज्ञानाचा आनंद घेत आहेत तर गावातले लोक मात्र निसर्गाशी तल्लीन झालेले आहेत. राग, क्रोध, ईर्षा हे सगळे अवगुण फक्त शहरी लोकांमध्ये आहेत. गावातले लोक मात्र मुक्त, स्वच्छंदी, आनंदी. हे काळंपांढरं चित्र फार खटकतं. एका प्रसंगात तो साधारणपणे असं म्हणतो की "माळरानावर भरपूर पाऊस पडत होता आणि दोन-तीन शेतकरी तिथे निवांत एकमेव च्या पाठीला पाठ लावून निवांत झोपले होते. द्वेषाचं ओझं त्यांच्या मनावर नव्हतं
पाऊस थांबल्यावर ते उठले. आकाश निरभ्र तशी त्यांची मनही निरभ्र. ते कसा छान आनंद घेत होते. शहरातल्या लोकांनी असा आनंद घेतला नसता". पण खरंच असं असेल का? ते शेतकरी पावसाचा आनंद घेत असतील, का कामाच्या चिंतेत असतील? आता हा पाऊस किती वेळ पडणार, यावर्षी जास्त पडणार, का कमी पडणार; ही भीती मनात नसेल का? तो पाऊस अवकाळी असेल तर त्यांच्याही मनात पावसाबद्दल शिव्याच असतील ना! दुसऱ्या एखाद्या गावकऱ्याकडे शेत जास्त आहे किंवा त्याची जमीन जास्त उपजावू आहे अशी असूयाही असेल. खेड्यात राहणाऱ्या लोकांमधली बांधांवरून भांडणं, भाऊबंदकी कोणाला ठाऊक नाही? "एक वेळ शहरातली कटकट परवडली पण भावकीतली भांडण नकोत", असं म्हणणारे कितीतरी गावकरी आपल्याला आजूबाजूलाही दिसतील. त्यामुळे लेखकाची शहरी जीवनाबद्दलची अनास्था, वैयक्तिक नावड आणि खेड्याबद्दलच्या काहीतरी रोमँटिक कल्पनारंजन अशा भावनेतूनच पूर्ण पुस्तक लिहिलं आहे. सरकार, नागरी व्यवस्था, आधुनिक जीवनपद्धती ह्यांना सरसकट अपराधी ठरवण्याची भूमिकाही दिसते. त्यामुळे त्याची तात्विक मल्लिनाथी ठिसूळ पायावर उभी आहे असंच मला वाटलं.

हे पुस्तक मूळ इंग्रजीत आहे. लेखकाने त्याच्या परदेशी परिचितांना डोळ्यासमोर ठेवून गोष्टींचं वर्णन केलं आहे असं जाणवतं. भारतात लग्नाच्या वेळी मांडव घालतात; काही वेळा काही खेड्यांमध्ये लोक प्रातर्विधीसाठी बाहेर जातात; भारतात स्थानिक राजकारणी आणि कॉन्ट्रॅक्टर याचं साटंलोटं असतं अशा प्रकारचे उल्लेख आहेत. सर्वसामान्य भारतीय वाचकाला हे नित्यनियमाचे आहे. पण कदाचित ही वर्णन परदेशी लोकांना दुर्लक्षित भारत ह्यात दिसला
. म्हणून सुरुवातीला तीन परदेशी लेखकांनी पुस्तकाची भलावण केलेली आहे. मला मुन्नाभाई एमबीबीएस मधल्या "आय वॉन्ट पुअर पीपल हंग्री पीपल" ह्या प्रसंगाची आठवण मला झाली.

असो ! पुस्तक जरी भावलं नसलं तरी आशुतोष सारखा परदेशात राहून आलेला उच्चशिक्षित, चिंतनशील तरुण कृतीशील होऊन आपल्या सभोवतालालकडे डोळसपणे बघतो आहे, त्याच्या क्षमतांनुसार प्रत्यक्ष काम करतो आहे हे खूप स्वागतार्ह आहे. त्याच्या कामासाठी खूप शुभेच्छा. त्याचा आयुष्याचा प्रवास सुखकर आणि यशस्वी होवो. आणि त्या प्रवासाचे पुस्तक काही वर्षांनी आपल्याला वाचायला मिळो ही सदिच्छा!!


——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

काकासाहेब चितळे सहवेदनेतून समृद्धीकडे (Kakasaheb Chitale - Sahavedanetun Samruddhikade)

पुस्तक - काकासाहेब चितळे सहवेदनेतून समृद्धीकडे (Kakasaheb Chitale - Sahavedanetun Samruddhikade) लेखिका - वसुंधरा काशीकर (Vasundhara Kashika...