टारफुला (Tarphula)





पुस्तक - टारफुला (Tarphula)
लेखक - शंकर पाटील (Shankar Patil)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - २८९
ISBN - 978-81-7766-829-2

टारफुला ही जुनी, प्रसिद्ध आणि लोकप्रिय कादंबरी आहे. खेडेगावातल्या सत्ताकारणावर आधारित आहे, स्वातंत्र्यपूर्व काळातलं, कोल्हापूर संस्थानातलं हे खेड. पाटील, तलाठी, कुलकर्णी, चावडी, त्यावरचे सनदी , तराळ वगैरे पारंपरिक गावगाड्याची रचना तिथे आहे, गावचा पाटलाची सत्तेवर बळकट पकड. त्यामुळे गावातले लोक आणि आजूबाजूच्या डोंगरदर्यांत राहणारे गुन्हेगार लोक हे सुद्धा त्याला वचकून असत. पण अश्या पाटलाच्या आकस्मिक निधनामुळे पाटीलकीची खुर्ची रिकामी होते. सत्तेची ही पोकळी भरून काढण्यासाठी गावातले बलाढ्य लोक सरसावतात आणि त्यातून पुढे काय घडतं; हा ह्या कादंबरीचा मुख्य विषय.

पाटील गेल्यावर "कुलकर्णी" पद सांभाळणारे पंत कारभार हाकायचा प्रयत्न करतात. पण सत्ता राबवायची तर जे सामर्थ्य असलं पाहिजे ते नसल्यामुळे ते दुबळे ठरतात. पुढे गावात एक बदली पाटील येतो. तो आधीच्या पाटलासारखा कर्तबगार, शूर त्यामुळे गावाच्या दुफळीवर, टग्यालोकांवर जरब बसावी म्हणून तो आपलं बळ दाखवतो. त्यातून काही सुखावतात तर काही दुखावतात. मग दुखावलेली मंडळी आपल्याला त्रास देऊ नये म्हणून तो स्वतःची तागे मंडळी जमवतो. सत्ता डोक्यात जाऊन नको ते धंदेकरतो. गावातली परंपरागत हाडवैरं उफाळून येतात. त्यात ह्या गटाला त्या गटाशी झुंजवून आपलं स्थान टिकवण्याची त्याची धडपड चालू राहते. त्यामुळे कधी दोन गट एकत्र येऊन तिसऱ्या गटातल्या व्यक्तीचा खून करतात तर नंतर हेच विरोधी दोघांचं जमून पहिल्या विरुद्ध कारस्थान करतात.

सामर्थ्य नाही म्हणून सत्ता गेलेले कुलकर्णी गावाने पहिले तसे अतिसामर्थ्याच्या नादात सत्ता कशासाठी हेच विसरलेला पाटील गावाला बघावा लागतो. सत्तेसाठी बेभरवशी आणि हिंसक खेळ रंगतो.

"टारफुला" वाचताना नेमकं महाराष्ट्रातलं सत्ता नाट्य घडतं आहे. आज २६ जून २०२२ आहे. शिवसेनेचे आमदार बंड करून गुवाहाटीला गेले आहेत. आणि कुठला गट कोणाबरोबर. कोणाची सत्ता जाणार कोणाची येणार. हा निर्णय अधांतरी आहे  कालचे विरोधी आजचे मित्र. आणि कालचे मित्र आज हाडवैरी. संघर्ष आणि बाचाबाची. त्यामुळे आज राज्यात जे घडतं आहे तेच गावपातळीवर कसं घडतं हेच "टारफुला" ने दाखवलं आहे. 

पहिल्या पाटलांच्या वचकाचं वर्णन


आबा कुलकर्णीची भीती दाखवणारा प्रसंग


बदली पाटील कशी जबरदस्ती करतो तो प्रसंग . एक परीट त्याची बायको विहिरीत पाय घसरून पडली म्हणून सांगायला येतो. तर तूच तिला मारलीस असा बनाव करून पाटील त्याला लुबाडायला बघतो. 

गावातलं हाडवैर दाखवणारा पाटील आणि गावकऱ्यातला एक संवाद 


खेडं म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात वसलेलं; टुमदार घरांचं; परस्पर जिव्हाळा असणाऱ्या माणसांचं असा माझ्यासारख्या शहरी लोकांचा समज असतो. पण खेड्यातही राजकारण आहेच. तेही जहरी आणि हिंसक. आजच नाही तर ७० वर्षांपूर्वी सुद्धा (आणि त्या आधी सुद्धा असेलच). सत्ता-सामर्थ्य ह्यांचा सनातन खेळ मराठी खेड्याच्या नेपथ्यावर दाखवणारी ही कादंबरी आहे.

कादंबरीत पटापट प्रसंग घडतात. कुठेही पाल्हाळ लावलेला नाही. विनाकारण स्थलवर्णन, पात्रवर्णन केलेलं नाही. त्यामुळे एकही पान रटाळ नाही. पाहिल्या पानापासून कादंबरी जी पकड घेते ते शेवटच्या पानापर्यंत. प्रसंगांचं वर्णन परिणामकारक आहे. आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहत. पात्रांच्या संवादात साहजिकच तिथली ग्रामीण बोली येते. तिची मजा घेत खटकेबाज संवाद वाचताना आणि धमाल येते. त्यामुळेच कादंबरी एकीकडे रंजक आणि दुसरीकडे विचार करायला लावणारी आहे.

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
——————————————————————————— 

No comments:

Post a Comment

अधर्मकांड (adharmakand)

पुस्तक - अधर्मकांड (adharmakand) लेखक - उदय भेंब्रे (Uday Bhembre) अनुवादिका - अकल्पिता राऊत देसाई (Akalpita Raut-Desai) भाषा - मराठी (Marat...