

पुस्तक - बांधावरची बाभळ (Bandhavarachi babhal)
लेखक - प्रकाश नावलकर (Prakash Navalkar)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १७२
प्रकाशन - न्यू इरा पब्लिशिंग हाउस. डिसेंबर २०२४
छापील किंमत - रू. २८०/-
ISBN -978-93-94266-96-4
लेखक प्रकाश नावलकर यांनी मला हे पुस्तक वाचायला भेट म्हणून दिलं याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो. प्रकाश नावलकर लिखित हा दुसरा कथासंग्रह आहे.
लेखकाचा पुस्तकात दिलेल्या परिचय.

महाराष्ट्रातील खेड्यात घडणाऱ्या प्रसंगांवर आधारित या कथा आहेत. अशा प्रकारच्या कथा कादंबऱ्यांमध्ये आढळून येणारे नेहमीचे प्रसंग त्यात आहेत. म्हणजे शेतीवर आधारित जगणं त्यामुळे ऋतू बदलला की शेतकऱ्यांच्या कामाची लगबग होते. निसर्गाच्या कोपालाही तोंड द्यावा लागतं. अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेलं पीक गमावून बसण्याची पाळी येते. शेतीच्या कामांचं स्वरूपही खूप मेहनतीचं एकट्यादुकट्याचं काम नव्हे. सहाजिकच त्यातून गावकऱ्यांचे व्यवसाय, अलुतेदार- बलुतेदार एकमेकांवर अवलंबून असतात. शेतात एकमेकांच्या कामात त्यांना मदतीला जातात. पिढ्यानपिढ्या एकाच गावात नांदल्यामुळे घरोघरी ओळखी असतात, आपुलकी असते आणि प्रसंगी पिढीजात वैरही असतं. सरपंच, पाटील असे गावातल्या सत्तेचे अधिकारी असतात तसेच तर मोलमजुरी करून पोट भरणारे गावकरीही असतात. प्रत्येकाचं समाजातलं स्थान आणि मान ठरलेला असतो. त्यामुळे लग्नासारख्या कौटुंबिक गोष्टीतही सरपंच, पाटील, शिक्षक अशा प्रतिष्ठितांचं मत विचारात घेतलं जातं. त्यांच्या संमतीने व्यवहार होतात. अडीअडचणीला गावकरी एकमेकांच्या मदतीला येतात. एखाद्या घरी कर्ता पुरुषमाणूस नसेल तर भावकीतले मोठे लोक पुढाकार घेऊन लग्नकार्य पार पाडतात तर कधी भांडणांमध्ये मध्यस्थी करतात. अशा कितीतरी प्रसंगांनी भरलेलं हे पुस्तक आहे.
काही गोष्टी मात्र खास आवडल्या
"बांधावरची बाभळ" मध्ये धनगरांचं जगणं आणि त्यांच्यावर झालेल्या चोरांच्या हल्ल्याची गोष्ट आहे. "भागू अक्का" ही रानमेवा विकणाऱ्या गरीब भागूचं व्यक्तिचित्र आणि गावातल्या माणुसकीचं चित्र आहे. "रामुतात्या" मध्ये घराकडे दुर्लक्ष करून राजकारण्यांच्या सतरंज्या उचलणाऱ्याचं उदाहरण दाखवलं आहे. "सुमीचं प्रेम" मध्ये नुकतीच वयात आलेली सुमी पैलवान संजय कडे आकर्षित होते आणि कशी लाईन मारते याचं मजेशीर वर्णन आहे. "पेसाटी" मध्ये गावच्या मस्तवालांना तोंड देणाऱ्या बाईची गोष्ट आहे. ह्यांमध्ये नाट्य आहे, उत्कंठा आहे आणि सुरुवात ते शेवट असा कथानकाचा प्रवास चांगला होतो.
पण बाकी बऱ्याच कथांमध्ये सुरुवात छान रंगवली आहे. त्यातून आपण मुख्य प्रसंगापर्यंत येतो. काहीतरी नाट्य घडणार असं आपल्याला वाटत असतानाच ते मुख्य नाट्य मात्र अगदीच दोन परिच्छेदात फार फार तर एका पानात उरकून टाकलं आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी विरस झाला.
अगदी सुरुवातीची शर्यती कथा बैलगाड्या शर्यतीवर आहे. त्यात बैलगाडा शर्यतीसाठी मालक आणि बैल जोडी कशी तयार होते याचं खूप छान वर्णन केलं आहे आता शर्यत कशी रंगणार म्हणून आपण पुढे वाचायला जातो तर ते पण अगदीच फुस्स होऊन संपून जातं.
"विश्वास" या गोष्टीमध्ये नवीन लग्न झालेलं जोडपं नवरीच्या माहेरी येतं. तेव्हा तिच्या घरी तिचा जुना मित्र येतो. त्याच्याबद्दल नवऱ्याला सांगते. नंतर हाच मित्र तिच्या सासरी येऊन, "मी तिचा बॉयफ्रेंड आहे" असं सांगतो. आता इथून पुढे खरं नाट्य सुरू होणार असतं. पण...घरात थोडा वाद होतो. नवरा मात्र बायकोची बाजू घेतो आणि सगळं संपतं.
तर पुस्तकातल्या काही गोष्टी या "गोष्टी" नसून तर खेड्यात नियमितपणे करणारे प्रसंग आहेत. उदाहरणार्थ "हरवलेली म्हैस" मध्ये एक म्हैस हरवते. तिचे मालक सगळे चिंतेत असतात. आणि संध्याकाळी ती म्हैस परत येते. "आणि सुपारी फुटली" मध्ये एका मुलीचा बघण्याचा कार्यक्रम, पसंती आणि देण्याघेण्याची बोलणी होतात इतकंच आहे. तर जणू याचा पुढचा भाग असावा असं "गावाकडचे लगीन" या कथेत मुलीला लहानपणापासून चांगलं वळण लावलं, घरच्या कामाची सवय लावली, मग स्थळ बघून लग्न ठरतं, लग्नाचे विधी होतात आणि मुलगी सासरी जाते असं सगळं वर्णन आहे. या सगळ्या गोष्टींमधलं वर्णन तो तो प्रसंग डोळ्यासमोर उभा करणारं आहे त्यामुळे वाचायला छान वाटतं. फक्त त्या गोष्टी न वाटता एखाद्याचा कौटुंबिक फोटो अल्बम आपण बघतो आहोत असं वाटतं.
या गोष्टींमधलं निवेदन प्रमाण भाषेऐवजी ग्रामीण भाषेतच केलेलं आहे त्यामुळे ते सगळे एकजनसी चांगलं वाटतं. बहुतेक कथांमध्ये प्रसंगांचा वेग चांगला आहे. थोडक्यात पण प्रसंग समजेल अशी शैली आहे. त्यामुळे आपण कुठेही रेंगाळत कंटाळत नाही.
काही पाने उदाहरणादाखल
अनुक्रमणिका

"बांधावरची बाभळ" गोष्टीतला धनगरांचा एका गावातून दुसऱ्या गावात गेल्यावर मुक्काम करण्याचा प्रसंग.

अशा एकूण वेगवेगळ्या ढंगाच्या गोष्टी आहेत. सगळ्या गोष्टींमध्ये खरंतर चांगलं कथाबीज आहे. पण वर म्हटलं तसं जितक्या ताकदीने पहिला भाग रंगवला आहे तितक्या ताकदीने पुढचा भाग रंगवला असता तर एक छान ग्रामीण कथासंग्रह मराठी वाचकांना मिळाला असता यात शंका नाही.
——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-