ब्रँड गुरु (Brand Guru)



पुस्तक - ब्रँड गुरु (Brand Guru)
लेखिका - जान्हवी राऊळ (Janhavi Raul)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १४२
प्रकाशन - बिग आयडिया पब्लिकेशन , मार्च २०१२
ISBN - दिलेला नाही
छापील किंमत - रु. २२५/-

कुठलाही व्यवसाय सुरु केल्यावर आपलं उत्पादन ग्राहकापर्यंत पोचावं, त्याने ते पुन्हापुन्हा खरेदी करावं आणि लोकप्रिय व्हावं असं स्वप्न बघणं, ध्येय ठेवणं स्वाभाविक आहे. हे ध्येय गाठण्यासाठी मालाची गुणवत्ता उत्तम ठेवणं आणि त्याचा वापर केल्यावर लोकांना समाधान मिळणं ह्याचा भाग मोठा आहे. तरीही "बोलणाऱ्याची माती खपते, न बोलणाऱ्याचे सोनंही विकलं जात नाही" हे आपलं पारंपरिक शहाणपण आहेच ! त्यामुळे विक्री होण्यासाठी "मार्केटिंग", जाहिरात आवश्यकच. ह्या जाहिरातींतून तुम्ही लोकांना स्वतः बद्दल सांगता, माझं उत्पादन कसं चांगलं, उपयुक्त, फायदेशीर आहे ते सांगता. विक्रीनंतरही वेगवेगळ्या मार्गाने ग्राहकांच्या संपर्कात राहता. त्यातून तयार होतो तुमचा ब्रँड. तुमचं नाव, उत्पादनं, बोधचिन्ह (लोगो), घोषवाक्य (टॅगलाईन) सगळं लोकांच्या मनात ठसतं. हा प्रवास सोपा नाही, कमी कालावधीचा नाही. सहज, आपोआप होईल असाही नाही. अतिशय गांभीर्याने करायची ही कृती आहे. ती कशी केली पाहिजे, कसा विचार केला पाहिजे ह्याची जाण वाढवणारं हे पुस्तक आहे.

पुस्तकातल्या लेखिकेच्या मनोगतातल्या माहितीनुसार त्यांनी रहेजा स्कुल ऑफ आर्टस् मधून कमर्शियल आर्टसची पदवी घेतली. पतीच्या जाहिरातक्षेत्रातील १८ वर्षांच्या अनुभवानंतर स्वतःचा व्यवसाय सुरु केला. त्यात त्यांनी उतार चढाव बघितले. त्या आज यशस्वी ब्रँड सल्लागार आणि स्वतःच्या "बिग आयडिया कम्युनिकेशन" या कंपनीच्या सर्वेसर्वा आहेत. त्यांचे पतीही नोकरी सोडून "बिग आयडिया"त सहभागी झाले आहेत .

ह्या पुस्तकात ब्रॅंडिंग चे वेगवेगळे पैलू कसे महत्त्वाचे आहेत. हे प्रकरणवार सांगितले आहे. ब्रँड म्हणजे काय, तो तयार करायचा म्हणजे काय, त्यासाठी कसा विचार करायचा इथपासून सुरुवात केली आहे. स्वतःकडे, आपल्याच धंद्याकडे, उत्पादनाकडे वेगवेगळ्या कोनातून बघण्यासाठी प्रश्नावली दिली आहे. त्याची उत्तरं निश्चित झाली की आता हे ब्रॅण्डिंग सांधण्याचे मार्ग - बोधचिन्ह (लोगो), घोषवाक्य (टॅगलाईन) , माहितीपुस्तक , विक्रीयोग्य वस्तू, प्रेझेंटेशन , कंपनीने छापलेली दिनदर्शिका, टीशर्ट इ. वर एकेक प्रकरण आहे. उदा.  कुठला रंग कुठली भावना दर्शवतो. त्यानुसार आपल्या लोगोमध्ये रंगनिवड कशी करावी लागते. ग्रीटिंग कार्ड, बिझनेस कार्ड कसे कलात्मक करता येईल. माहितीपुस्तिकेचे महत्त्व. प्रदर्शनात मांडण्याच्या तक्त्यांचे विविध प्रकार. प्रत्येक मार्गाची माहिती पोचवण्याची पद्धत वेगळी, सामर्थ्य निराळे त्यामुळे त्यामागची अभिव्यक्तीकला सुद्धा निराळी. ब्रॅण्डिंग करणाऱ्या कंपन्यांना तांत्रिकता, कलात्मकता, लोकभावना ह्याची कशी कसरत करावी लागत असेल हे त्यातून जाणवते.

काही पाने उदाहरणादाखल
अनुक्रमणिका



ब्रॅण्डिंग प्रश्नावलीची सुरुवात



एका मार्गाबद्दल विचार



वाचकाला प्रोत्साहित करणारे पान


ब्रॅण्डिंगचा प्रत्येक मार्ग स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. आणि तसे व्यवसायिक अभ्यासक्रम सुद्धा आहेत. त्यामुळे एका पुस्तकातून ते सगळं मांडणं आणि समजून येणं शक्यच नाही. पण ह्या क्षेत्रात काम न करणाऱ्या; टीव्ही, सोशल मीडिया, वृत्तपत्रे ह्यात जाहिरात बघणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीला ब्रॅण्डिंग जगताचे दार किलकिले करून आत डोकावण्याची संधी ह्या पुस्तकातून मिळते. नव-व्यावसायिकांनी हे पुस्तक वाचले तर ब्रॅण्डिंगबद्दलची त्यांची जाणीव विकसित होईल. इतरांचं ब्रॅण्डिंग बघताना ते कसं केलं आहे हे थोडं अजून समजून घ्यायचाही आपण प्रयत्न करू.

हे तांत्रिक विषयावरचं पुस्तक आहे. अशावेळी आपल्याला मराठी शब्दांपेक्षा इंग्रजी शब्दांची जास्त सवय असते. ते लक्षात घेऊन लेखिकेने मराठी शब्दांबरोबर कंसात इंग्रजी शब्दही दिले आहेत. काहीवेळा पूर्ण वाक्य, प्रश्न पुन्हा इंग्रजीतही दिले आहेत. हे योग्यच. त्यामुळे मराठी माणसाला मराठी पुस्तक वाचण्यात अडचण येणार नाही !! मात्र ही द्विभाषिकता डोक्यात ठेवून लिखाण केल्यामुळे असेल पण बऱ्याच ठिकाणी मराठी मजकूर हा इंग्रजीचे बोजड भाषांतर झाल्यासारखा आहे. तो अजून ओघवता करता आला असता.

हे पुस्तक हातात घेताना लेखिकेच्या ह्या क्षेत्रातला अनुभव वाचायला मिळेल अशी माझी अपेक्षा होती. त्यांनी केलेली कामे, त्यांचे ग्राहक, मिळालेला प्रतिसाद, चुका, अनपेक्षित बरावाईट प्रतिसाद असं काही वाचायला मिळेल असे वाटले होते. पीयूष पांडे ह्यांच्या "पांडेपुराण" सारखे काहीतरी. पण तसे अजिबात झाले नाही. त्यामुळे हे पुस्तक जरा पाठ्यपुस्तकासारखे रुक्ष झाले आहे.

पुस्तक वाचताना माझे भाषा शिकवण्याचे उपक्रम, पुस्तक परीक्षणाचा उपक्रम ह्यांचं पण ब्रॅण्डिंग करावं असं वाटू लागलं. ह्या उपक्रमांतून विक्री किंवा कमाई अपेक्षित नसली तरी लक्ष्यप्रेक्षकांपर्यंत (target audience) पोचण्यासाठी असं काहीतरी केलं पाहिजे. बिगरसरकारी संस्था, समाजोपयोगी प्रकल्प ह्यंनासुद्धा ब्रॅण्डिंगची आवश्यकता असतेच.

विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग ह्याबद्दल मराठीत पुस्तक असेल तर त्याचे मला कौतुक वाटते. मराठी ज्ञानभाषा करण्यातले ते योगदान असते. लेखक मराठी, मूळ पुस्तक मराठी असेल तर ते कौतुक दुणावते. इथे स्वतःच्या कामाने मराठी माणसाचा ठसा ह्या क्षेत्रात उमटवणारी व्यक्ती मराठी पुस्तक लिहिते आहे. त्यामुळे कौतुक तीणावले ! जान्हवीताईंनी स्वानुभवरचे पुस्तक लिहिले आहे का मला माहिती नाही. पण तसे नसेल तर नक्की लिहावे.


——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
व्यवसाय करणाऱ्यांनी आवा ( आवर्जून वाचा )
इतरांनी जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

नागालँडच्या अंतरंगात (Nagalandchya Antarangat)




पुस्तक - नागालँडच्या अंतरंगात (Nagalandchya Antarangat)
लेखिका - अर्चना जगदीश (Archana Jagadeesh)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - २००
प्रकाशन - प्रफुल्लता प्रकाशन, नोव्हेंबर २०१७
छापील किंमत - रु. २५०/-
ISBN - 978-81-87549-85-7

डिसेंबर २०२४ मध्ये पुण्यात झालेल्या "विश्व मराठी संमेलना"तल्या पुस्तक प्रदर्शनात ज्येष्ठ प्रकाशक गुलाब सकपाळ आणि त्यांची कन्या द्वितीया सोनावणे (त्याही प्रकाशक) ह्यांची भेट झाली. भेट झाली. ह्याआधी फक्त फेसबुकवर गप्पा झाल्या होत्या. प्रत्यक्ष भेटून सर्वांना आनंद झाला. काकांनी मला भेट देण्यासाठी त्यांच्या प्रकाशनाचे पुस्तक मला निवडायला सांगितले. तेव्हा ह्या पुस्तकाने माझे लक्ष वेधले. मी फारसा न वाचलेला विषय असल्यामुळे उत्सुकता वाटली. पुस्तक चाळल्यावर कळले की ह्या पुस्तकाला २०१७, १८ मध्ये मान्यवर संस्था व वाचनालयांचे पुरस्कार मिळाले आहेत. ह्या भेटीसाठी काकांचे मनापासून आभार.



लेखिका अर्चना जगदीश ह्या वनस्पतिशास्त्रज्ञ आणि संशोधक आहेत. १९९४ मध्ये त्यांनी ह्याविषयातली पी.एच.डी. मिळवली आहे. भारत सरकारच्या "वनस्पती सर्वेक्षण विभागा"त त्यांनी पुण्यात काही वर्षे नोकरी केली. कामासाठी आणि आवडीमुळे सह्याद्री पर्वत आणि इतर डोंगराळ भागांत त्यांची भटकंती चालू होती. ईशान्य भारताच्या पर्वतराजींमध्ये दडलेल्या घनदाट जंगलांचे आकर्षण तेव्हापासून त्यांना होते. पुढे त्यांनी सरकारी नोकरी सोडून स्वतःची स्वयंसेवी संस्था काढून ह्याच विषयात स्वतःच्या रुचीनुसार काम सुरु केले. त्यातूनच नागालँडच्या सरकारने सुरु केलेल्या एका प्रकल्पावर काम करण्याची संधी त्यांना मिळाली. "नेपेड"नावाचा हा प्रकल्प तिथल्या लोकांची जीवनपद्धती, वनस्पती वैविध्य, शेतीच्या पद्धती ह्यांचे सर्वेक्षण, नोंदी करणे व त्यातून ग्रामविकासाचे उपाय सुचवणे असा बहुउद्देशीय होता. त्यासाठी १९९०च्या दशकात अर्चनाजींनी नागालँड मध्ये बरेच महिने प्रवास केला. सुदूर दुर्गम खेडेगावांत जाऊन गावकऱ्यांशी भेटीगाठी घेतल्या. दुभाषांमार्फत लोकांशी संवाद साधला. जंगलात जाऊन पानं-फुलं गोळा केली. ह्या सगळ्या अनुभवांचे वर्णन पुस्तकांत आहे. त्यांनी अरुणाचल प्रदेशला सुद्धा भेट दिली होती. त्या अनुभवावर एक लेख आहे. 

महाराष्ट्रापासून खूप दूर, दुर्गम असलेला नागालँड. तिथे नागा आदिवासी राहतात. ख्रिश्चन मिशनऱ्यांनी त्यांचे पूर्ण धर्मांतरण केले आहे. नागा सशस्त्र बंडखोरी, सीमावर्ती भाग असल्यामुळे घुसखोरी अशा सुरक्षाविषयक समस्या सुद्धा आहेत. इतपतच माहिती मला होती. टीव्हीवरच्या बातम्या, समाजमाध्यमे, वर्तमानपत्रातले लेख ह्याममध्ये पण नागालँड हा काही नेहमी येणारा विषय नाही. त्यामुळे हे पुस्तक माहिती वाढवणारे आहे. पण बघितलेल्या ठिकाणांचे स्थलवर्णन नाही. प्रवासवर्णन नसलं तरी ह्यातलं "प्रवासाचं"वर्णन वाचण्यासारखं आहे. पुणे - कोलकाता - दिमापूर विमान प्रवास आणि मग बस, छोट्या गाड्या तर कधी मैलोनमैल चालत इष्टजागी पोचायला लागायचं. प्रत्येक प्रवासाचं हे दिव्य वाचताना ते लोक मुख्य भारतापासून (इंडियन प्लेन्स पासून) किती दुरावलेले आहेत हे जाणवते.

आदिवासींची शेती पद्धती म्हणजे "झूम" पद्धती. जंगल तोडून जागा शेतीयोग्य करतात. तिथे एकदोन वर्ष शेती केली की ती जागा सोडून दुसरी जागा साफ करतात. असं करत करत साताठ वर्षांनी पुन्हा पाहिल्याजागी येतात. तोपर्यंत तिथे पुन्हा रान माजलेलं असतं. शेती कशी करतात, त्यात काय लावतात, पुरुष कुठली कामं करतात, बायका कुठली कामं करतात याचं सुद्धा सविस्तर वर्णन आहे. किती वर्षांनी पुन्हा त्याच जागी यायचं, झाडं कशी तोडायची, प्रत्येक जागेला काय म्हणायचं हे सुद्धा प्रत्येक जमातीनुसार वेगवेगळं आहे. एक छोटं राज्य असलं तरी कितीतरी जमाती, उपजमाती आहेत. त्यांचं खानपान वेगळं, बोलीसुद्धा वेगळ्या. इतक्या, की एकमेकांनाही न समजणाऱ्या. तिथल्या तिथे फिरताना सुद्धा वेगवेगळ्या दुभाषांची गरज पडावी. हे वाचल्यावर जाणवतं की दुर्गमतेमुळे किती कप्पे पडले आहेत. आपल्या भाषेचा, जमातीचा टोकाचा अभिमान बाळगला गेला तर पदोपदी संघर्षाला वाव आहे. "विविधतेत एकता", "हम सब एक है" ह्या घोषणा किती आव्हानात्मक आहेत.


इतके महिने तिकडे राहिल्यावर तिथलं वेगवेगळ्या प्रकारचं खाणं त्यांनी "बघितलं" तरी. नागा लोक सर्वभक्षी. चिकन, मटण हे साधं झालं. डुक्कर, गायबैल खाणं नेहमीचंच. इतकंच काय खारी, पक्षी, किडे, अळ्या, मधमाश्या असं सगळं खातात. कुत्र्याचं मांस हे तर "स्वादिष्ट". शहरातल्या बाजारांत, गावच्या बाजारांत असा मांडलेला "रानमेवा" त्यांनी बघितला. तांदळाची दारू "झू" हे तर सर्वमान्य पेय. अशा काही गमती त्यात आहेत. खाण्यापिण्याच्या अशा सवयी वाचून असं वाटतं की भारतापेक्षाही चिनी लोकांशी जास्त साम्य आहे. दिसण्यातही तसे ते मंगोलवंशीय. त्यामुळे पुन्हा एकदा "विविधतेत एकता" टिकवण्याचं जबरदस्त आव्हान लक्षात येतं. पुस्तकात असं म्हटलं आहे की नागा जमाती म्यानमार मध्ये सुद्धा आहेत. मनात असा विचार आला की निसर्गाच्या ह्या लेकरांना "निसर्गापासून दूर गेलेल्या लेकरां"नी असं कृत्रिम सीमांनी विभागून टाकलं आहे.

आदिवासी सगळे मिळून मिसळून काम करणारे. पण तरीही तिथे गावाचा/जमातीचा राजा अशी संकल्पना आहेच. पण तो राजा म्हणजे काही फार श्रीमंत , महालात राहणार असा नाही. इतरांपेक्षा थोडी मोठी झोपडी आणि केवळ एक मनाची पदवी असंच. पूर्वीच्या काळी मुलगा वयात आला की त्याला दुसऱ्या जमातीच्या माणसाला मारून त्याचं मुंडकं आणायला लागे. मात्र ते नरभक्षी नव्हेत. आता ही परंपरा मागे पडली आहे. पण "हेड हंटिंग" च्या कवट्या त्यांनी बघितल्या. गावात एका सार्वजनिक झोपडीत अशा कवट्या ठेवल्या जात. अशा झोपड्या म्हणजे गावाच्या वयस्करांनी आपलं शहाणपण पुढच्या पिढीकडे देण्याच्या जागा. नागा वनवासींच्या अशा त्यांना दिसलेल्या प्रथांविषयी ही त्यांनी लिहिलं आहे. तिथल्या फुटीरतावादी, सशस्त्र बंडखोरांशीही अवचित गाठ पडली. ती क्रूर नजर, हिसंक कृत्य ह्यातून सुदैवाने त्या सुखरूप बाहेर पडल्या. त्याचे दोन थरारक किस्सेही आहेत. स्थानिकांशी त्याविषयी जास्त न बोलता, आपल्या कामावर लक्ष देण्याचे धोरण ठेवून त्यांनी स्वतःला अलिप्त व सुरक्षित ठेवले.

पुस्तकात ९४-९५ च्या आसपासचा नागालँड आहे. तिथल्या लोकांना सुद्धा मुख्य भारताप्रमाणे विकसित व्हायचं आहे, तरुणांना साहजिकपणे शहरी जगण्याचं आकर्षण आहे. पैसे मिळवण्यासाठी तिथे नगदी पिकं आणि लाकूडतोड मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. शहरात राहून आलेली, जीन्स टीशर्ट घालणारी मुलं शेती-जंगल आधारित जगण्यापासून दूर जात आहेत. त्याला चूक तरी कसं म्हणणार ? पण काहीतरी चुकतंय हे खरं. म्हणूनच नागालँडची जाणीव वाढवून पण विकास करायचा म्हणजे नक्की काय, कसा, लोकसहभाग कसा मिळवायचा , प्रयोग आर्थिकदृष्टया सक्षम कसे करायचे असे असंख्य प्रश्न मनात घेऊनच त्यांनी आपल्या संशोधन कामाचा शेवट केल्याचं लक्षात येतं.

आता काही पानं उदाहरणादाखल वाचा.

नागांच्या सर्वभक्षित्वाची एक झलक



सर्वांनी मिळून घरं - झोपड्या बांधायची पद्धत



अंतर्गत प्रवासाची काठिण्यपातळी आणि दिसणारं निसर्गसौंदर्य




असं हे पुस्तकाचं स्वरूप आहे. ह्यात प्रवास असला तरी हे नमुनेदार प्रवासवर्णन नाही. संशोधनपर कामाशी संबंधित असलं तरी रुक्ष आकडेवारी, तांत्रिक तपशील नाहीत. वने, शेती, सामाजिक पद्धती ह्यांचं हे दस्तऐवजीकरणही नाही. तर प्रवास करताना, माणसांना भेटताना सहजपणे काय दिसलं, जाणवलं, वेगळेपण भावलं ह्याच्या नोंदी आहेत. लेखिकेने आपल्याशी मारलेल्या गप्पा आहेत. त्यामुळे बऱ्याच वेळा त्याच त्या प्रकारच्या वर्णनाची पुनरुक्तीही जाणवते. ती थोडी कमी करता आली असती. तिथला भूगोल आणि दिशा आपल्या परिचयाच्या नाहीत त्यामुळे प्रवासाची दिशा कळत नाही. अजून नकाशे टाकून ते सांगायला हवं होतं. पुस्तकात फक्त मुखपृष्ठाच्या आत सहा फोटो आहेत. वर्णनाच्या बाजूला अजून फोटो किंवा रेखाचित्रे हवी होती. लेखिकेने केलेल्या संशोधनाचं/सर्वेक्षणाचं काय निष्पन्न झालं हा प्रश्न, "नेपेड" प्रकल्पात त्याचा काय हातभार लागला हे मला कळलं नाही. पुस्तक वाचताना आपण लेखिकेचे सह-सर्वेक्षक बनतो. त्यामुळे "आपल्या" सर्वेक्षणाची फलश्रुती काय हे न कळल्यामुळे चुटपुट लागते.

अर्चनाजींच्या धाडसामुळे, मन लावून केलेल्या कामामुळे आणि ते पुस्तक स्वरूपात आणल्यामुळे नागालँड सारख्या आपल्याच देशाच्या एका भागाबद्दलची आपली जाणीव वाढेल. ती अजून वाढली पाहिजे अशी उत्सुकता होईल हे नक्की. अशा अनवट मराठी पुस्तकासाठी लेखिका अर्चना जगदीश आणि प्रकाश गुलाब सकपाळ ह्यांचे आभार.

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

स्टीव्ह जॉब्स (Steve Jobs)



पुस्तक - स्टीव्ह जॉब्स (Steve Jobs)
लेखक - डॉ. अनंत लाभसेटवार (Dr. Anant Labhsetwar)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - २१८
प्रकाशन - विजय प्रकाशन. जून २०१४
छापील किंमत - रु. २५०/-
ISBN - दिलेला नाही.

"ॲपल" हा शब्द उच्चारल्यावर काही लोकांच्या डोळ्यासमोर सफरचंद येईल तर बहुतेक जणांच्या डोळ्यासमोर येईल "आयफोन". ॲपल कंपनीचा "आयफोन" एक महागडा फोन. दिसायला देखणा, हाताळायला सोपा, उत्तम छायाचित्रे काढता येणारा असा फोन गेली कित्येक वर्षे मोबाईल वापरणाऱ्यासांठी "स्टेस्टस सिम्बॉल" झाला आहे. ॲपलचाच लॅपटॉप "मॅक"सुद्धा तंत्र जगतात लोकांची प्रथम क्रमांकाची पसंती असते. हातात धरण्याजोगा, वागवायला सोपा "आयपॅड" आणि भरपूर गाणी ऐकायला देणारा "आयपॉड" देखील तितकेच लोकांच्या आवडीचे. आज आपण कॉम्प्युटर वापरताना माउस वापरतो आणि "चिन्हांवर"(आयकॉन) वर क्लिक करतो त्या तंत्रज्ञानाची सुरुवात केली ती देखील ॲपलनेच. तंत्रज्ञानाच्या युगात मोलाची कामगिरी ॲपल करू शकली ह्याचं कारण तिचा सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्सची दृष्टी, कलात्मकता, स्वतःच्या निर्णयांवर ठाम राहण्याची वृत्ती, अपयश पचवून पुन्हा उभारी घेण्याची क्षमता आणि बरंच काही. अशा स्टीव्ह जॉब्सचे चरित्र डॉ. लाभसेटवारांनी मराठीत लिहिलं आहे.

स्टीव्हच्या कुटुंबाच्या पार्श्वभूमीपासून सुरुवात करून, त्याचा जन्म, बालपण, शिक्षण, त्यातली धरसोड ह्याबद्दल सुरुवातीच्या प्रकरणात माहिती आहे. त्याचा जन्म अरबी वडील आणि अमेरिकन आईच्या पोटी त्यांच्या लग्नाच्या आधीच झाला. नाचक्की टाळण्यासाठी जन्म झाल्या झाल्या तो दत्तक दिला गेला. एका कष्टकऱ्याच्या घरात. त्यामुळे आपल्या जैविक वडिलांशी त्याचे संबंध कायमचे दुरावले. दत्तक गेल्याबद्दलचा न्यूनगंड तयार झाला. त्याची वृत्ती लहानपणापासून बंडखोर झाली. तरुणपणात तर चक्क अमली पदार्थांच्या व्यसनात बुडाला. "हिप्पी" लोकांची बेपर्वा जीवनशैली त्याने स्वीकारली. कसाबसा कॉलेजात शिकत राहिला. एका नशेडी, वाया गेलेल्या, उद्धट मुलाचं वर्णन आपण वाचतो आहोत असंच वाटतं. पण विजेवर चालणाऱ्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू ह्यांचे आकर्षण त्याला होते. त्या वस्तू उघडून बघायच्या, पुन्हा जोडून बघायच्या. ही त्याची सवयच पुढे जाऊन "ॲपल"झाली. स्टीव्हचा हा सगळा प्रवास सविस्तर मांडला आहे.

ॲपलचा दुसरा साहसंस्थापक - स्टीव्ह वोझनीयॅक - अर्थात वॉझ. ते दोघं एकत्र प्रयोग करत असताना वॉझने सुटे भाग जुळवून संगणक तयार केला. त्यासाठी स्वतः संगणक प्रणाली लिहिली. सगळं हौसेपोटी, आवडीपोटी चालू होतं. फक्त वॉझ असता तर ते काम तिथेच विरूनही गेलं असतं. पण स्टीव्हची उद्योगशीलता व दूरदृष्टी तिथे कमी आली. लोकांनी सुटेभाग घेऊन घरगुती संगणक बनवण्यापेक्षा आपण असे छोटेखानी तयार संगणक विकले तर लोक ते विकत घेतील. त्यातून फायदा होईल हे त्याच्या लक्षात आलं आणि सुरू झाली "ॲपल". कायदेशीर कंपनी स्थापन करणे, भागीदारी ठरवणे, मग भांडवलदार गोळा करणे, त्यांचा हिस्सा ठरवणे हे सगळे सोपस्कार झाले. अमेरिकन संस्कृतीतले वातावरण उद्योगाला किती पोषक होते हे सुद्धा इथे जाणवते.

पुढच्या प्रकरणांमध्ये स्टीव्हची स्वतःची मते कशी होती आणि त्यांनी कंपनीची वेगवेगळी उत्पादने कशी घडवली ह्याची स्वविस्तर वर्णने आहेत. यंत्रांची माणसाला भीती वाटता कामा नये. ते ओबडधोबड नाही तर सुंदर दिसलं पाहिजे, हाताळायला सोपं पाहिजे हा त्याचा आग्रह - हट्टच. ते साधायचं तर यंत्रांची सामुग्री (हार्डवेअर) आणि प्रणाली (सॉफ्टवेअर) सुद्धा आपलंच पाहिजे. हा दुसरा हट्ट. आणि इतकं सगळं झालं की ते सुंदर उत्पादन विकायचं ते सुद्धा नजाकतीने. दुकानात जाणे, चौकशी करणे, विकत घेणे हे सुद्धा लोकांना आनंददायक, छाप पडणारे वाटले पाहिजे. म्हणून "ॲपल स्टोअर" सुरु झाली. हा सगळा प्रवास, ॲपलच्या प्रत्येक उत्पदनाची जन्म कहाणी, त्यावेळचे किस्से प्रत्यक्ष वाचण्यासारखेच आहेत.

हे सगळं वाचून असा समज होईल की स्टीव्ह फारच लोकप्रिय असेल व ॲपल नेहमीच यशस्वी ठरली असेल. पण तसं नाही. "हिप्पी" स्टीव्हचं वागणं आयुष्यभर चक्रमपणाचं राहिलं. पुस्तकात असं वर्णन आहे की तरुणपणात अनेक दिवस अंघोळ न केल्यामुळे त्याच्या अंगाला घाण वास येत असे. राहणं ओंगळ होतं. लोकांना ते सहन करून काम करावं लागायचं. बोलणं अतिशय तुसडं. दुसऱ्याला थेट प्रश्न, पाणउतारा, शिवीगाळ नेहमीचीच तेही चारचौघांत. कंपनीच्या कामात लोक कसे टिकले, "पापी पेट का सवाल" किंवा "येडXXX असला तरी त्याचं बोलणं खरं ठरतं आणि कंपनीला पैसा मिळतो" असा फायद्याचा विचार करून राहिले असतील बिचारे. पण जेव्हा हे चुकीचं ठरलं तेव्हा थेट स्टीव्हलाच "ॲपल"च्या बाहेर काढलं गेलं. स्वतःच्या घरातून बाहेर काढल्याचा धक्का त्याला पचवावा लागला. त्या दिवसांत त्याने "ॲनिमेशन" क्षेत्रातली "पिक्सर" कंपनी काढली. नावारूपाला आणली. "टॉय स्टोरी" चित्रपटाला ऑस्कर मिळाला. अजून बरेच चित्रपट गाजले. आणि त्यानंतर त्याचं "डिस्नी"शी पण "वाजलं". मायक्रोसॉफ्ट चा बिल गेट्स आणि तो एकाचवेळी प्रतिस्पर्धक, टोकाचे टीकाकार आणि तरी एकमेकांसाठी काम करणारे होते. स्टीव्हच्या व्यक्तिमत्त्वाची ही नकारात्मक बाजू, थोडी व्यावसायिक क्रूर बाजूसुद्धा पुस्तकात सविस्तर मांडली आहे.

स्टीव्ह बाहेर पडल्यावर "ॲपल" बरी चालली पण काही वर्षांनी आर्थिक संकटात सापडली. हळूहळू स्टीव्ह पुन्हा "ॲपल"मध्ये येऊ लागला आणि पुढे त्याने पुन्हा कंपनीचा ताबा घेतला. पुढे नवी उत्पादने बाहेर आली. त्याला अचानक कर्करोगाने ग्रासले. तरी शेवटची चारपाच वर्षे आयफोनच्या नव्या आवृत्त्यांनी बाजारपेठ गाजवली. त्याच्या मृत्यूपश्चात सुद्धा गाजवत आहे. असा मोठा चरित्रपट पुस्तकात आहे.

काही पाने उदाहरणादाखल

अनुक्रमणिका

तरुण स्टीव्हचा भारत प्रवास



स्टीव्हच्या सौंदर्य दृष्टीबद्दल



"पिक्सर" कंपनीतला स्टीव्हचा "हम करे सो कायदा"




एक गंमत जाणवली. २०१४ मधले लेखकाचे निरीक्षण आहे की फोन कॉम्प्युटरची निर्मिती अमेरिकेत व्हावी असा आग्रह अमेरिकी राष्ट्रध्यक्ष धरत होते. ॲपल चीन मध्ये उत्पादन करत होते. आणि भारताकडे ढुंकूनही पाहत नाही. गंमत म्हणजे १० वर्षांनी अमेरिकी राष्ट्रध्यक्ष तोच आग्रह धरतायत. फक्त आता म्हणतायत की भारतात उत्पादन पुरे. भारताच्या "मेक इन इंडिया" ने कसा बदल घडवला आहे हे असं आपसूक समोर येतं. 

स्टीव्हचं हे लोकविलक्षण व्यक्तिमत्त्व, अस्थिर कौटुंबिक संबंध, टोकाची घृणास्पद वागणूक आणि त्याचवेळी सौंदर्यदृष्टीचे टोक गाठणे, जमान्याच्या चार पावलं पुढे जाणारी उत्पादने तयार करून अख्ख्या जगालाच पुढे नेणे हे सगळं समजून घेण्यासाठी हे चरित्र वाचलंच पाहजे. लेखकाने ओघवत्या शैलीत लिहिलं आहे त्यामुळे वाचायला मजा येते. काही काही मुद्द्यांची पुनरावृत्ती झाली आहे ती कदाचित कमी करता आली असती.

प्रत्येक इंग्रजी शब्दाला मराठी प्रतिशब्द देण्याचा लेखकाचा प्रयत्न (स्टीव्ह सारखा हट्ट) दिसतो. उदा. "कृष्णधवल रंगाच्या पटलावर रंगीत चित्र उमटवण्याचा शोध लावला.. पटलावर माहिती उपलब्ध करून देण्यासाठी उंदरावर टिचकी मारण्याचा शोध लावला". "विभागीय दुकानातून (Departmental store ) फिरताना .. ", "संगणक कृत्या (Application)", "स्मरण चकत्या (memory chips)", "कुठल्याही संगणकाचं आतडं म्हणजे चकत्यांचे फलक (Chip boards)", "प्रदर्शनात गाळे (stall) आरक्षित केले" इ. हे वाचताना गंमत वाटते. हे शब्द योग्य आहेत. आपण ते वापरत राहिले पाहिजेत म्हणजे ते रुळतील. त्यासाठी लेखकांचे विशेष अभिनंदन. एक चुकीची वाक्यरचना मात्र पूर्ण पुस्तकभर खटकते. "केले जाते", "समजली जाईल", "बोलला गेला" ह्या कर्मणी वाक्यांमध्ये पुस्तकभर "केल्या जाते", "समजल्या जाईल", "बोलल्या गेला" अशी वाक्यरचना आहे. ही मुद्रितशोधनाची चूक का लेखकाच्या बोलीचा प्रभाव?

पुस्तकाचे सहशीर्षक यथायोग्य आहे. "काव्य आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालून मानवी जीवन सुखकर करणारा". विषय, आशय आणि मांडणी ह्या दृष्टीने उपयुक्त पुस्तकासाठी लेखक डॉ. लाभसेटवारांचे आणि प्रकाशकांचे आभार.


——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

राक्षस आणि पोपटाची ॲडल्ट कथा (Rakshas ani popatachi adult katha)

पुस्तक - राक्षस आणि पोपटाची ॲडल्ट कथा (Rakshas ani popatachi adult katha) लेखक - श्रीकांत बोजेवार (Shrikant Bojewar) भाषा - मराठी (Marathi) ...