जा जरा पूर्वेकडे (Ja jara purvekade)




पुस्तक - जा जरा पूर्वेकडे (Ja jara purvekade)
लेखक - आशुतोष जोशी (Ashutosh Joshi)
अनुवाद - सविता दामले, मोहना प्रभुदेसाई जोगळेकर (Savita Damle, Mohna Prabhudesai Joglekar)
भाषा - मराठी (Marathi)
मूळ पुस्तक - Journey to the east (जर्नी टू द ईस्ट)
मूळ पुस्तकाची भाषा - English (इंग्रजी)
पाने - १७५
प्रकाशन - ब्लीच पब्लिशिंग 2025
ISBN - 978-93-342-9139-1
छापील किंमत - रु. ५००/-

समाज माध्यमांवर पोस्ट वाचताना, व्हिडिओ बघताना कळलं की आशुतोष जोशी या पंचवीस-तिशीतल्या तरुणाने कोकणापासून बंगालच्या उपसागरापर्यंत पदयात्रा केली आहे. ह्या प्रवासापूर्वी तो इंग्लंडमध्ये फोटोग्राफीची व्यावसायिक कामे करत होता. पण त्याने भारतात परत यायचं ठरवलं. ही पदयात्रा केली. आणि सध्या तो त्याच्या गावी गावकऱ्यांसाठीचे काही सामाजिक प्रकल्प राबवतो आहे. ह्या जुजबी माहितीवरून त्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि त्याच्या प्रवासाबद्दल उत्सुकता वाटून त्याचे पुस्तक मी विकत घेतलं. "जा जरा पूर्वेकडे" या पुस्तकात त्याने त्याच्या पदयात्रेतल्या अनुभवांबद्दल लिहिले आहे. १८५० किलोमीटर इतकी लांब ही पदयात्रा होती त्याला ६७ दिवस लागले.

हे पुस्तक त्याच्या प्रवासाची रोजनिशी नाहीये. प्रवासाचा सुरुवातीचा दिवस, शेवटचा दिवस आणि मधल्या काळात घडलेल्या दहा पंधरा घटना त्यात आहेत. एखादा प्रसंग आणि त्यावर आधारित त्याचं बरंचसं तत्वचिंतन असं निवेदनाचं स्वरूप आहे.

पुस्तक वाचताना कळतं की मर्यादित सामान एका ढकलगाडीत घालून तो प्रवास करत होता. कधी कुणाच्या घरी, कधी देवळात, तर कधी उघड्यावरती तंबू ठोकून त्याने मुक्काम केला. वाटेतल्या लागणाऱ्या गावांमध्ये गावकऱ्यांनी त्याला खायला दिलं. काहीवेळा घरीही राहायला देऊन पाहुणचार केला. असं काहीमिळालं नाही तेव्हा त्याच्या स्वतः कडची मॅगी किंवा पॅकेट फूड खाऊन दिवस काढला. ऊन, पाऊस, जंगली दमटपणा, सिमेंटचा रस्ता, कच्चा रस्ता माळरान अशा वेगवेगळ्या परिस्थितीतून त्याने प्रवास केला.

काही पाने उदाहरणादाखल

लेखकाची पुस्तकात दिलेली माहिती.


गावकऱ्याशी संवाद आणि शेतीबद्दल चिंतन.



नक्षलप्रभावित भागात शिरताना पोलिसांनी चौकशी केली.



पंचविशीतला एक तरुण पदयात्रेवर निघतोय हे किती धाडसाचं आहे! अशा प्रवासात स्वतःला शारीरिक व मानसिक दृष्ट्या खंबीर ठेवणं महत्त्वाचं आहे. अनोळखी प्रदेशातून जाताना कधी त्रासदायक तर कधी चिंतेत टाकणारी परिस्थिती समोर येणार; तर कधी अनपेक्षित आनंदाचे क्षणही येणार. आशुतोषचं हे धाडस, त्याला आलेले अनुभव आणि त्यातून त्याच्या मनावर विचारांवर झालेला परिणाम हे सगळं ह्या पुस्तकात सापडेल असं वाटून मोठ्या औत्सुक्याने मी हे पुस्तक वाचायला घेतलं. परंतु पुस्तकाने माझी निराशा केली.

ज्या प्रसं
गांचं वर्णन केलं आहे त्या प्रसंगांचा स्थलकालाचा संदर्भच बहुतेक वेळा लागत नाही. अगदी सुरुवात म्हणजे त्याचं नरवण गाव कोकणात नक्की कुठे आहे हे मला माहिती नाही. शेवट ज्या गावात झाला ते माहिती नाही. त्याचा प्रवासाचा मार्ग कसा होता ते समजत नाही. नकाशा नाही तरी एखादं रेखाचित्र हवं होतं. रोजनिशी सारखं वर्णन नसल्यामुळे अचानक उड्या मारत मारत एका गावातलं वर्णन मग कुठल्यातरी पुढच्या गावाचं वर्णन मग त्याच्या पुढचं असं आहे. त्यामुळे मध्ये किती वेळ गेला, किती अंतर गेलं, काय केलं काही समजत नाही. त्यामुळे त्या प्रवासाचं गांभीर्य आपल्यापर्यंत पोहोचत नाही.

पुस्तकाच्या सुरुवातीला आशुतोष म्हणतो की परदेशात राहत असताना भारतात
ल्या  "कृषी कायदे" विरोधी आंदोलनाच्या बातम्या त्याने बघितल्या. शेतीच्या समस्या त्याला जाणवल्या. त्या नीट समजून घ्याव्यात हाही पदयात्रेचा उद्देश होता. पण पुस्तकात बघितलं तर; आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची भेट आणि गावातल्या एक दोन लोकांशी बदलत्या पीक पद्धती बद्दल बोलणं या व्यतिरिक्त काही खास संशोधनात्मक प्रसंग नाहीत. डोळेसपणे बातम्या बघणाऱ्या, वृत्तपत्रीय लेख वाचणाऱ्या कुठल्याही माणसाला जी जुजबी माहिती या समस्यांबद्दल असेल तेवढेच त्याला प्रत्यक्ष चालूनही समजली; असा समज वाचकाचा झाला तर नवल नाही. कदाचित त्याची वैयक्तिक समज खूप वाढली असेलही पण इथे ते ध्वनित होत नाही.

जंगलातल्या प्रवासात जाताना अस्वल अगदी त्याच्या जवळ आलं होतं. हल्ला व्हायची वेळ आली होती. हा एक प्रसंग वगळता पायी चालणे, उघड्यावर राहणे ह्यामुळे घडलेला कुठलाही थरारक प्रसंग पुस्तकात नाही. पदयात्रा करताना त्याला वारंवार संकटं यायला हवी होती आणि मग ती वाचायला आम्हाला मजा आली असती असं मला म्हणायचं नाहीये. मी सुरुवातीला म्हटलं तसं स्वतःची शारीरिक-मानसिक खंबीरता टिकवणे आणि स्वतःच्या रोजच्या सोयी करणे यासाठी केलेली धडपड सुद्धा वाचकाला समजून घ्यायला आवडलं असतं. पण पुस्तक त्याही बाबतीत लंगडं आहे. त्याला आलेले अजून अनुभव, भेटलेली माणसं, दिसलेला निसर्ग ह्यांचा अजून उल्लेख हवा होता. एक सलगता आली असती.

तिसरा पैलू म्हणजे सामाजिक परिस्थितीबद्दलचं त्याचं मुक्त चिंतन. एकूणच कथनाचा सूर असा आहे की शहरातले लोक आरामात जगतात आणि गावातले लोक फारच दुःखी आहेत. शहरातल्या लोकांना गावातल्या लोकांची जाण नाहीये. शहरातले लोक फक्त तंत्रज्ञानाचा आनंद घेत आहेत तर गावातले लोक मात्र निसर्गाशी तल्लीन झालेले आहेत. राग, क्रोध, ईर्षा हे सगळे अवगुण फक्त शहरी लोकांमध्ये आहेत. गावातले लोक मात्र मुक्त, स्वच्छंदी, आनंदी. हे काळंपांढरं चित्र फार खटकतं. एका प्रसंगात तो साधारणपणे असं म्हणतो की "माळरानावर भरपूर पाऊस पडत होता आणि दोन-तीन शेतकरी तिथे निवांत एकमेव च्या पाठीला पाठ लावून निवांत झोपले होते. द्वेषाचं ओझं त्यांच्या मनावर नव्हतं
पाऊस थांबल्यावर ते उठले. आकाश निरभ्र तशी त्यांची मनही निरभ्र. ते कसा छान आनंद घेत होते. शहरातल्या लोकांनी असा आनंद घेतला नसता". पण खरंच असं असेल का? ते शेतकरी पावसाचा आनंद घेत असतील, का कामाच्या चिंतेत असतील? आता हा पाऊस किती वेळ पडणार, यावर्षी जास्त पडणार, का कमी पडणार; ही भीती मनात नसेल का? तो पाऊस अवकाळी असेल तर त्यांच्याही मनात पावसाबद्दल शिव्याच असतील ना! दुसऱ्या एखाद्या गावकऱ्याकडे शेत जास्त आहे किंवा त्याची जमीन जास्त उपजावू आहे अशी असूयाही असेल. खेड्यात राहणाऱ्या लोकांमधली बांधांवरून भांडणं, भाऊबंदकी कोणाला ठाऊक नाही? "एक वेळ शहरातली कटकट परवडली पण भावकीतली भांडण नकोत", असं म्हणणारे कितीतरी गावकरी आपल्याला आजूबाजूलाही दिसतील. त्यामुळे लेखकाची शहरी जीवनाबद्दलची अनास्था, वैयक्तिक नावड आणि खेड्याबद्दलच्या काहीतरी रोमँटिक कल्पनारंजन अशा भावनेतूनच पूर्ण पुस्तक लिहिलं आहे. सरकार, नागरी व्यवस्था, आधुनिक जीवनपद्धती ह्यांना सरसकट अपराधी ठरवण्याची भूमिकाही दिसते. त्यामुळे त्याची तात्विक मल्लिनाथी ठिसूळ पायावर उभी आहे असंच मला वाटलं.

हे पुस्तक मूळ इंग्रजीत आहे. लेखकाने त्याच्या परदेशी परिचितांना डोळ्यासमोर ठेवून गोष्टींचं वर्णन केलं आहे असं जाणवतं. भारतात लग्नाच्या वेळी मांडव घालतात; काही वेळा काही खेड्यांमध्ये लोक प्रातर्विधीसाठी बाहेर जातात; भारतात स्थानिक राजकारणी आणि कॉन्ट्रॅक्टर याचं साटंलोटं असतं अशा प्रकारचे उल्लेख आहेत. सर्वसामान्य भारतीय वाचकाला हे नित्यनियमाचे आहे. पण कदाचित ही वर्णन परदेशी लोकांना दुर्लक्षित भारत ह्यात दिसला
. म्हणून सुरुवातीला तीन परदेशी लेखकांनी पुस्तकाची भलावण केलेली आहे. मला मुन्नाभाई एमबीबीएस मधल्या "आय वॉन्ट पुअर पीपल हंग्री पीपल" ह्या प्रसंगाची आठवण मला झाली.

असो ! पुस्तक जरी भावलं नसलं तरी आशुतोष सारखा परदेशात राहून आलेला उच्चशिक्षित, चिंतनशील तरुण कृतीशील होऊन आपल्या सभोवतालालकडे डोळसपणे बघतो आहे, त्याच्या क्षमतांनुसार प्रत्यक्ष काम करतो आहे हे खूप स्वागतार्ह आहे. त्याच्या कामासाठी खूप शुभेच्छा. त्याचा आयुष्याचा प्रवास सुखकर आणि यशस्वी होवो. आणि त्या प्रवासाचे पुस्तक काही वर्षांनी आपल्याला वाचायला मिळो ही सदिच्छा!!


——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

तिमिरपंथी (Timirapanthi)


पुस्तक - तिमिरपंथी (Timirapanthi)
लेखक - ध्रुव भट्ट (Dhruv Bhatt)
अनुवाद - सुषमा शाळिग्राम (Sushama Shaligram)
भाषा - मराठी (Marathi)
मूळ पुस्तक - तिमिरपंथी 
(Timirapanthi)
मूळ पुस्तकाची भाषा - गुजराती
प्रकाशन - मेहता पब्लिशिंग हाऊस 
जुलै २०१८.
ISBN - 9789387789951
छापील किंमत - ३२० रु. 

चोरीच्या दरोड्याच्या बातम्या ऐकल्या की आपल्याला त्या चोरांचा राग येतो.
 दरोडेखरांची भीती वाटते. पोलिसांनी त्वरित कारवाई करून त्यांना पकडावं फटकवावं, अशी जबरदस्त शिक्षा करावी की पुन्हा कधी कोणी चोरी करू नये. असं मनात येतं. पोलीस चोरांना पकडतातही. मुद्देमाल काही वेळा परत मिळतो. पण चोरीच्या घटना मात्र थांबत नाहीत. उलट प्रत्येक वेळी चोरी करण्याचं तंत्र प्रगत होत जातं आणि चोर पोलिसांचा खेळ रंगतच जातो. हा खेळ आजचा नाही तर अनादी कालापासून चालत आलेला आहे. भारतीय समाजव्यवस्थेत जिथे एक काम म्हणजे एक जात/समाज अशी वर्गवारी झाली. तिथे चोरी हे सुद्धा एक काम आहे, एक हस्तकला आहे आणि ती वापरून उपजीविका चालवणे हे सुद्धा योग्यच आहे असे मानणारा एक समाज निर्माण झाला. अशाच समाजाची कहाणी म्हणजे "तिमिरपंथी" हे पुस्तक.

चोरी करणं, दरोडा घालणं याचेही वेगवेगळे प्रकार आहेत. लोकांच्या घरात शिरून चोरी करणे, शेतातले धान्य चोरणे, लोकांची गायईगुरे चोरणे, वाटसरूचे दागिने पैसे लुटणे, दुकान किंवा सावकारी पेढ्यांवर दरोडा घालून माल लुटणे असे कितीतरी प्रकार. गंमत म्हणजे ह्या प्रत्येक प्रकाराने चोरी करणारे लोक हे पुन्हा या चोरांच्या उपजाती. म्हणजे एका उपजातीत फक्त घरात आणि शेतीत चोरी करून धान्य चोरणार. पैशांना हात लावणार नाही. स्वतःच्या आवश्यकते पुरतंच वस्तू चोरणार जास्ती चोरणार नाही. फक्त रात्री चोरी करणार दिवसाढवळ्या चोरी करणार नाहीत. अशा एका "अडोडीया" नावाच्या उपजातीतल्या एका कुटुंबावर आधारित तिमिरपंथी ही कादंबरी आहे. ब्रिटिश काळातला किंवा स्वातंत्र्य मिळाल्यावरच्या पहिल्या काही वर्षातला काळ ह्यात आहे. गुजरात राजस्थानचा परिसर आहे.

"सती" या मुलीच्या लहानपणापासून ती थोडी मध्यमवयीन होईपर्यंतच्या घटना यात आहेत. सतीच्या आजीच्या तोंडून आधीच्या काळातले किस्से, चोरीच्या घटना सतीपर्यंत आणि वाचकांपर्यंत पोहोचतात. सतीच्या स्वतःच्या चोरीच्या सहसामधून समकालीन चोरीच्या गोष्टी कळतात. चोरीची कला एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कशी सुपूर्त होते हे पण दिसतं.

या जाती भटक्या-विमुक्त म्हणाव्या अशा. त्यांचा तांडा आज एका गावात तर उद्या दुसऱ्या गावात, काही दिवसांनी पुढच्या गावात असा सतत फिरत असे. गावाच्या बाहेर राहायचं वेगवेगळ्या रूपात गावात फिरायचं. कधी विक्रेता म्हणून; कधी सुरीला धार लावणारा म्हणून किंवा काही काम काढून. फेरफटका मारताना सावज हेरून ठेवायचं आणि मग रात्रीच्या अंधारात कार्यभाग उरकायचा. लोकांना कळायच्या आत तांडा दुसरीकडे गेलेला. लोकांना संशय आलाच तरी लोक तांड्याकडे वळेपर्यंत चोरलेल्या वस्तू बाजारात कुठेतरी विकल्या जाणार. सोनं वितळवलं जाणार. मुद्देमालाचा मागमूसही राहणार नाही इतकी सफाई.

ब्रिटिशांनी अशा जातींना ओळखून त्यांना गावाच्या बाहेर कुंपणाच्या आत स्वतंत्र वस्ती अर्थात सेटलमेंट मध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या सेटलमेंट मध्ये राहायचं आणि रोज सकाळ संध्याकाळी पोलीस स्टेशनवर हजेरी लावायची.  जेणेकरून कोणी चोरी करून फरार झाला नाहीये हे स्पष्ट व्हावे. तरीसुद्धा गावात चोरी झाली तर पोलीस येऊन या सेटलमेंट मधल्या लोकांना पकडून बेदम मारून चौकशी करायचे. सतीचे कुटुंबीय अशा सेटलमेंट मध्ये नव्हते. अजूनही गावोगावी तांडा घेऊन भटकतच होते पण त्यांचे काही नातेवाईक मात्र सेटलमेंट मध्ये राहत होते. सतीपण लग्नानंतर सेटलमेंट मध्ये राहायला लागते. त्यामुळे या कादंबरीत तांड्यातलं आणि सेटलमेंटमधलं दोन्हीकडचं आयुष्य आपल्यासमोर उभं राहतं.

लेखक मनोगतात म्हणतो
"नगरात वस्त्यांवर पाड्या-तांड्यात राहणाऱ्या कित्येकांना भेटून मी त्यांच्या कहाण्या ऐकल्या. ज्या काळातल्या गोष्टी मला कळत गेल्या त्या काळाप्रमाणेच या लिखाणातही वेगवेगळ्या काळाचा समावेश आहे. अगदी अलीकडचा उल्लेख १९९३ च्या जवळपासचा थोडा पुढे मागे आहे. त्यानंतर कथा आजच्या घडी पर्यंत आणण्याचा प्रयत्न मी केला नाही. नवलाची गोष्ट अशी की ज्यावेळी ज्या कोणापाशी आजच्या काळाचा विषय निघाला त्या प्रत्येकाने मला एकच विचारलं "अब तो विद्या कडे? - आज आता विद्या कुठे आहे"

चोरी करणे यात काही पाप नाही. जसं जंगलामध्ये वाघ- सिंह हरिण, ससे यांची शिकार करतात त्याप्रमाणे आपण चोर सुद्धा आपली कला वापरून दुसऱ्याकडचं सामान चोरतो. त्यात त्याला त्रास द्यायचा उद्देश नसतो. पण हेच आपलं पारंपारिक काम आहे. अशी निखळ भावना त्यांच्या मनात दृढ आहे . जातीचे स्वतःचे काही नीतिनियमही आहेत. चित्रपटात म्हणतात तसं "बेईमानी का काम इमानदारी से करनेका". गावातलं सावज ज्याने हेरलं आहे त्याला म्हणायचं या कामातला "मालक". त्याने या कामासाठी लोक निवडायचे. चोरी कधी, कुठे, कशी करायची हे सगळं मालक ठरवणार. बाकीच्यांनी फक्त त्याबरहुकूम काम करायचं. चोरीच्या ऐवजातला मुख्य वाटा मालकाला मिळणार. घेतलेल्या जोखमीच्या प्रमाणत भागीदारांना वाटा मिळणार. चोरीबद्दल कोणी कुणाला सांगायचं नाही. ना आपल्या मित्रमंडळीत ना आपल्या घरी. ना त्याची कोणी चौकशी करायची. सगळा मामला गुप्ततेवर आणि परस्पर विश्वासावर अवलंबून.

पण... चोरी करता करताना लोकांना जाग आली आणि लोकांनी पकडलं तर मात्र बेदम मारहाण. संतापाच्या भरात केलेल्या मारहाणीत चोराचा जीवही जायचा. या भीतीमुळेच सतत सावध राहावं लागतं आणि लोकांची चाहूल लागली तर काम अर्धवट टाकून पळावं लागतं. सतीची आजी "नानकी" आणि तिच्या आजूबाजूच्या बायका यांच्या संवादातून असे घडलेले किस्से सतीला कळतात आणि त्यातून चोराने कसं वागलं पाहिजे; काय केले पाहिजे; काय नाही केलं पाहिजे याचे "सुसंस्कार" तिच्यावर होत असतात. तिच्यातली चोर घडत असते.. नव्हे नव्हे चोर नव्हे... कलाकार !!

सेटलमेंट चा कायदा, नव्याने होता असलेला शिक्षणाचा प्रसार ह्यामुळे सतीच्या मनातही आपल्या वस्तीतल्या मुलांनी शिकावं, काही वेगळा काम धंदा शिकावा अशी इच्छा मनात उमटू लागते. पण वंशपरंपरेने चोरी करणाऱ्या या लोकांवर बाहेरच्या समाजाचा सहज विश्वास बसत नाही आणि कितीही प्रयत्न केला तरी चोरीचा शिक्का पुसला जात नाही याची जाणीवही तिला होत असते. तर दुसरीकडे; हा शिक्का पुसण्याची तयारी तिच्याच समाजात नसते. "चोरी सोडून पुस्तकं शिकणं, दुसरं काम करणं म्हणजे आपण आपल्या पूर्वजांनी केलेल्या कलेचा कामाचा अपमान करतो आहोत; आपल्या मुलांनी आपली कलाच चालवली पाहिजे" हे त्यांचं म्हणणं असतं. हेही वास्तव पुस्तकात दिसतं.

पुस्तकामध्ये चोरांच्या प्रकारांचे, त्यांच्या "विद्ये"बद्दलचे संस्कृत शब्द पण दिले आहेत. काही वाक्य बघा.

... सती स्वतः "मालक" होती विठ्ठल केवळ 'वटाविक' ( भागीदार चोर) होता.
... शास्त्रात सुद्धा हेच सांगितले की ' त्रप'ने (स्वतःच्या निष्काळाचीपणामुळे अचानक अडचणीत सापडलेला चोर) कुठेही थांबायचं नसतं.
... शिवाय आत शिरलेला 'कुसुमाल'(फुलांसारखी लोभस वस्तू चोरणारा) आपला कार्यभाग साधत असतो.
... तायु (चोर)
.. लट (लांडीलाबडी करून लुटणारा)
... कसबी वर्गानुनं(चोरांनं) ही कला साध्य केली असेल, नाही असं नाही. पण खिसेकापू म्हणवणारा प्रत्येक पटच्चर (सार्वजनिक जागी लुटणारा) खिसा कापतो हे खोटं.
आयुर्वेद, धनुर्वेद ह्या सारखा कुठला "चौर्यवेद" ग्रंथ आहे ज्यातून हे शब्द घेतले आहेत कल्पना नाही.

आता काही पानं उदाहरणादाखल वाचा.
पुस्तकात दिलेली लेखकाची माहिती 


कुठल्या जातीच्या घरी चोरताना कशी काळजी घ्यावी याबद्दलचं लोकगीत

एका दरोड्याची तयारी आणि तो करता करता जुना एक किस्सा.


सती पोलिसांशी भांडून आली, मुलांना शिकवायचं म्हणतेय..त्यावर जात पंचायतीत चर्चा


पुस्तकाची निवेदन शैली म्हणजे फक्त किश्श्यांची जंत्री नाही तर एक सलग कथानक आहे. सतीच्या आयुष्यातला प्रसंग आणि त्या प्रसंगाच्या वेळी झालेल्या बोलण्यातून भूतकाळातल्या घटना कळतात. मग पुन्हा आत्ताची घटना व पुन्हा मागे. असा काळ पुढे मागे सरकत राहतो. पुस्तक वाचताना आपण चोरांच्या बाजूचे होतो.. आता हे "कलाकार" कशी "कला" दाखवतात याची उत्सुकता आपल्याला लागते. ते यशस्वी व्हावेत, मारहाण न होता त्यांना पळता यावं अशी आपली इच्छा होते ह्याची गंमत वाटते. रहस्यकथा, गुन्हेगारी कथा, पोलीसकथा ह्यांपेक्षा पुस्तकाचा बाज वेगळा आहे हे लक्षात आलं असेलच. म्हणून हे पुस्तक म्हणजे "जावे चोरांचीया वंशा तेव्हा कळे" असा अनुभव देणारं आहे. 


——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

काकांचे स्वप्न (Kakanche Swapn)



पुस्तक - काकांचे स्वप्न (Kakanche Swapn)
भाषा - मराठी (Marathi)
मूळ पुस्तक - द्यादुश्किन सोन (Dyadushkin son)
मूळ लेखक - फ्योदर दस्तयेवस्की (Fyodor Dostoevsky )
मूळ पुस्तकाची भाषा - रशियन (Russian)
अनुवाद - अविनाश बिनीवाले (Avinash Biniwale)
पाने - २०३
प्रकाशन - काँटिनेंटल प्रकाशन १९८७. दुसरी आवृत्ती २०१३
छापील किंमत - रु. १७५/-
ISBN - दिलेला नाही

फ्योदर दस्तयेवस्की - ज्याचा बहुतेक वेळा उल्लेख डोटोव्हस्की असाही केला जातो - हा गाजलेला रशियन लेखक, कादंबरीकार. त्याची कादंबरी थेट रशियन भाषेतून मराठीत आणण्याचं मोठं काम श्री. अविनाश बिनीवाले ह्यांनी केलं आहे. विशेष म्हणजे ह्या पुस्तकाची प्रत थेट त्यांच्याकडून मला भेट म्हणून मिळाली ही अजून आनंदाची गोष्ट.

कादंबरीचे कथानक १९व्या शतकातल्या रशियातल्या समाजात घडणारे आहे. मुख्य शहरांपासून दूर एका छोट्या गावात घटना घडतात. मोठमोठ्या जमिनी असणारे जमीनदार, त्यांच्या शेतात राबण्यासाठी शेकडो गुलाम आणि त्यातून मिळणारे उत्पन्न पिढीजात वाढत जाऊन जणू अतिश्रीमंत स्थानिक राजेच झालेले लोक तेव्हा होते. असेच एक व्यक्तिमत्त्व इथे नायक आहेत; ते म्हणजे "प्रिन्स". आता उतारवयाला लागलेले, केस-डोळे-पाय-कान ह्या सगळ्यातला जोम गेलेला. पण खोट्या केसांपासून खोट्या लाकडी पायांपर्यंत सगळं वापरून अजून आपण उत्साही तरुण आहोत असं दाखवणारी ही वल्ली आहे. ऐकू कमी येतंय म्हणून मोघम काहीतरी बोलून हो हो करायचं, खोटं हसायचं. तरुणपणी केलेल्या आणि ना केलेल्या पराक्रमांच्या गोष्टी लोकांना ऐकवत राहायचं अशी विनोदी वल्ली.

ह्या म्हातारबुवांची काळजी करतोय हे दाखवण्याची चढाओढ त्यांच्या जवळच्या नातेवाईकांमध्ये आणि त्यांच्याशी संबंध येणाऱ्या इतर लोकांमध्ये सुद्धा आहे. सगळ्यांचा डोळा प्रिन्सच्या संपत्तीवर आहे. तर काही नातेवाईक त्याला आता असहाय्य, डोक्यावर परिणाम झालेला म्हातारा असं दाखवून संपत्तीचा सांभाळ ते करू शकत नाहीत असं दाखवून संपत्ती हडप करायचा प्रयत्न सुद्धा करतायत.

तर असे हे प्रिन्स प्रवास करता करता एका गावात येतात. बऱ्याच वर्षानंतर त्या गावात त्यांचं येणं होतं त्यामुळे त्या गावातले, त्यातल्या त्यात प्रतिष्ठित, मोठी घर असणारे लोक प्रिन्सचे स्वागत आपल्याला करायला मिळो; त्यांच्याशी सलगी वाढायला मिळो आणि त्यातून काहीतरी फायदा आपल्याला मिळो अशा लोभाने हुरळून जातात. प्रिन्स बरोबर त्यांच्या लांबच्या नात्यातला एक पुतण्या -मझग्ल्यागोफ - सुद्धा असतो जो याच गावात राहत असतो. या गावातल्या जहांबाज बाई मार्या ची मुलगी झिना वर तो प्रेम करत असतो. एकतर्फी प्रेमच. हा पुतण्या आपल्या काकाला मार्याच्या घरी घेऊन येतो. मार्या ही संधी साधून प्रिन्सचं आपल्या मुलीवर लक्ष जावं, त्यांनी तिच्याशी लग्न करावं असा बेत रचते. पण म्हाताऱ्या माणसाशी लग्न करायला झिना कशी तयार होणार? त्यामुळे मार्या तिला वेगवेगळ्या मार्गाने पटवायचा प्रयत्न करते. "त्याच्याशी लग्न कर आणि राणी सारखी रहा. थोडेच दिवसात तो मरून गेला की तू पुन्हा तुझ्या आवडत्या माणसाशी लग्न कर" असं आमीष दाखवते आणि बरीच वेगळी वेगळी कारण तिला देते. झिनाच्या मनात अजून पहिला प्रियकर असतो; ज्याच्याबरोबर लग्न करणं घरच्यांच्या विरोधामुळे शक्य झालेलं नसतं. मर्याचा डाव मझग्ल्यागोफला कळल्यावर तोही अस्वस्थ होतो; तर मार्या त्याला उलटसुलट सांगून त्यालाही घोळात घेते. पण झिना आपल्या हातून जाणार की काय असं त्याला वाटत राहतं. नोकर मंडळींकडून जेव्हा गावातल्या इतर बायकांना ही गोष्ट कळते तेव्हा काही अस्वस्थ होतात कारण प्रिन्स आपल्या हातून जाणार की काय असं त्यांना वाटतं. त्याची ही गोष्ट.

मार्या, झिना, पुतण्या इतर बायका ह्यांचा एकेमकांशी बोलत बोलत कसा शह-काटशह देतात ; त्यांच्या वागण्याचा-बोलण्याचा फार्स हा या कादंबरीचा मुख्य भाग आहे एकूण कथानक खूप विनोदी नाही पण हलकफुलक आहे. काही वेळा प्रसंग गमतीशीर आहेत तर काही वेळा ते जरा ओढून काढून आणल्यासारखे वाटतात. एकूण संवादाची भाषा खूपच नाटकी आहे पूर्वीच्या मराठी नाटकांमध्ये जसे नाटकी संवाद होते तशीच परिस्थिती पूर्वी रशियन कथानगांमध्येही रशियन कथनशैलीमध्येही असावं असं दिसतंय. पात्रांचं गुपित गोष्टी पण मोठयाने बोलणं आणि दुसऱ्याच्या कानावर पडणं, एखाद्या पात्राने घरातच लपून राहून प्रसंग ऐकणं असले प्रसंग आहेत. चक्रम-विसराळू-गोंधळलेला म्हातारा आहेच जोडीला. प्रिन्स, मझग्ल्यागोफ, मार्या, झिना, मार्याचा नवरा, झिनाचा पहिला प्रियकर ही पात्र चांगली रंगवली आहेत. मार्याचे संवाद छान आहेत. त्यामुळे आपण सहज पुढे पुढे वाचत राहतो. कादंबरीच्या शेवटी सगळ्यांचेच डावपेच फसल्यावरती पुढे काय झालं हे लेखकाने उपसंहार पद्धतीने सांगितलं आहे.

काही पाने उदाहरणादाखल

प्रिन्सचं वर्णन




मार्याचा झिनाला पटवायचा प्रयत्न



गावातल्या बायका मार्याचा डाव हाणून पाडण्यासाठी तिच्या घरीच ठिय्या मारतात तेव्हा



अविनाश बिनीवाले ह्यांनी अनुवादाला पूर्ण न्याय दिला आहे. व्यक्तींची आणि जागांची रशियन नावे सोडल्यास सगळं मराठी आहे आणि मराठमोळं आहे. म्हणी, वाक्प्रचार ह्यांच्या वापरातून सहज संवादी अनुवाद झाला आहे. त्यामुळे रशियन वातावरण आणि मराठी निवेदन हातात हात घालून जातं. त्यामुळेच पुस्तक वाचनीय झालं आहे. जर भाषांतर बोजड झालं असतं तर वाचण्यातला रस फार लवकर निघून गेला असता.


ही कादंबरी वाचताना २०० वर्षांपूर्वीचा रशिया, तेव्हाची परिस्थिती, लोक कसे विचार करत होते, लग्न संस्थेकडे बघण्याचा रशियन दृष्टिकोन इ. आपल्याला कळतं त्यामुळे रंजक कथानकाच्या ओढीपेक्षा या पैलूंची माहितीसाठी पुस्तक वाचता येईल. एका प्रथितयश कादंबरीकाराची कादंबरी कशी होती, तेव्हा कादंबरीची शैली कशी असायची हे आपल्याला कळेल.

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

अनुभाषिते (Anubhashite)



पुस्तक - अनुभाषिते (Anubhashite)
लेखिका - मंजिरी धामणकर (Manjiri Dhamankar)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १४८
प्रकाशन - अल्टिमेट असोसिएट्स. मी २०२५
छापील किंमत - रु. २५०/-
ISBN - 978-93-91763-61-9

भारताची प्राचीन भाषा संस्कृत अतिशय समृद्ध आहे. वेद-उपनिषदे, रामायण, महाभारत, आयुर्वेद, काव्य, अर्थशास्त्र, स्थापत्यशात्र अशा हजारो ग्रंथांनी आपले पारंपरिक ज्ञान जतन केले आहे. मोठमोठी काव्ये आणि ग्रंथ जसे प्रसिद्ध आहेत तसा अजून एक प्रकार लोकप्रिय आहे तो म्हणजे "सुभाषित". एक मोठा आशय, संदेश, आयुष्याबद्दल मार्गदर्शन करणारा दोन किंवा चार ओळींच्या श्लोक म्हणजे सुभाषित असं ढोबळमानाने म्हणता येईल. वेगवेगळ्या उपमा देऊन मुद्दा स्पष्ट करणे, शब्द-अक्षरं ह्यांच्या पुनरुक्तीतून नादमाधुर्य साधणे, दोन ओळींची शेवटची अक्षरे समान ठेवणे (यमक जुळवणे) अशा नाना प्रकारांनी ही सुभाषिते आपल्यापर्यंत ज्ञान व भाषासौंदर्य पोचवतात. ज्यांनी शाळेत संस्कृतचा थोडा अभ्यास केला असेल त्यांना ही सुभाषिते थोडी आठवत असतील. अजूनही काही पाठ असतील. म्हणी, वाक्प्रचारांप्रमाणे सहज बोलता बोलता सुभाषितांचा वापरही कोणी करत असेल. काहीवेळा तर चारपाच शब्दांची एखादी संस्कृत ओळ आपण म्हणीसारखी वापरतो. पण ती ओळ एका श्लोकाचा - सुभाषिताचा - भाग आहे हे आपल्या लक्षात येत नाही. "अतिपरिचयादवज्ञा", "बादरायण संबंध", "वसुधैव कुटुंबकम्" हे ऐकल्यासारखं वाटतंय ना? हे शब्द सुभाषितांचे भाग आहेत. त्यामुळे सुभाषिते वाचणे व ती आचरणात आणणे हे प्रत्येकासाठी उपयुक्त आहे. सुभाषितांच्या शब्दांचा, रचेनचा आस्वाद घेत 
ती वाचली तर गंमत अजूनच वेगळी. परीक्षेच्या दडपणाखाली पाठांतर केलं असेलही आणि आता विसरालाही असाल. पण आता निखळ आनंदासाठी सुभाषितं वाचून बघा, समजून बघा, पाठ करून बघा. त्यासाठी वाचा हे पुस्तक "अनुभाषिते".

लेखिका मंजिरी धामणकर ह्यांनी आपल्यासाठी उत्तमोत्तम सुभाषिते निवडून त्यांचा मराठीत अर्थ दिला आहे. त्याचबरोबर मराठीतही श्लोक स्वरूपात त्याचं भाषांतर दिलं आहे. त्या सुभाषिताची गंमत, शब्दांचं वेगळेपण सांगितलं आहे. आणि हे सगळं निवेदन लेखिका आपल्याशी संवाद साधते आहे अशा पद्धतीने लिहिलं आहे. त्यामुळे तुम्हाला संस्कृत भाषा येत असो वा नसो, तुम्हाला ह्या पुस्तकाचा आनंद घेता येईल.

पुस्तकात २८ प्रकरणे आहेत. एकेक विषय घेऊन त्या त्या विषयांशी संबंधित सुभाषिते दिली आहेत. त्यामुळे आपल्या पूर्वजांनी एक संदेश किती वेगवेगळ्याप्रकारे आपल्याला सांगितला आहे हे समजतं. तर काही वेळा काही शब्द, उपमा, साहित्यिक संकेत पुन्हापुन्हा येतात तेव्हा त्या सगळ्या गोष्टी पूर्वी किती रूढ झाल्या होत्या हे ही जाणवतं. सुभाषितांचा संदेश गांभीर्याने घ्यायचा असला तरी ते सांगताना काही वेळा विनोदी शैली सुद्धा दिसते. त्यासाठी मूर्खांची लक्षणे बघण्यासारखी आहेत.

काही पाने उदाहरणादाख
ल...

अनुक्रमणिका


मित्र ह्या विषयी सुभाषित


कधी बोलावं आणि कधी बोलू नये हे "कोकिळेला" सांगणारी सुभाषितं.. "लेकी बोले सुने" लागे ह्या न्यायाने आपल्यालाच सांगतायत.


प्रहेलिका अर्थात कोडी सुद्धा आहेत.


पुढची लक्षणे आणि स्वतःचे वागणे ताडून बघूया. काही साम्य आढळलं तर "सावर रे !"


वरील उदाहरणे वाचून ही सुभाषितं किती अर्थगर्भ आहेत, लेखिकेने त्याचा अर्थ कसा थोडक्या आणि सोप्या शब्दांत सांगितला आहे हे लक्षात आलं असेलच. मराठीतले श्लोक सुद्धा मराठीतली सुभाषितेच झाली आहेत. त्यामुळे "अनुभाषिते" हे नाव सार्थ आहे.

भाषा हा माझ्या आवडीचा विषय असल्यामुळे पुस्तक मला आवडलेच. लेखिका मंजिरीताई आणि मी एकाच "पुस्तकप्रेमी" नावाच्या व्हॉट्सअप आधारित साहित्यिक चळवळीचे सदस्य आहोत. आणि ह्या समूहाच्या संमेलनात पुस्तकाचे अनौपचारिक प्रकाशन काही सदस्यांच्या हस्ते झाले त्यातला मी एक होतो. त्यामुळे पुस्तक अधिकच जवळचे झाले. 
पुस्तकाचे औपचारिक प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले त्यालाही मी उपस्थित होतो.

तर असे हे पुस्तक लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना वाचनीय आणि आचरणीय आहे. संग्राह्य आहे.



——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

शरद जोशी शोध अस्वस्थ कल्लोळाचा! (Sharad Joshi - Shodh asvastha kallolacha!)

पुस्तक - शरद जोशी शोध अस्वस्थ कल्लोळाचा! (Sharad Joshi - Shodh asvastha kallolacha!) 
लेखिका - वसुंधरा काशीकर भागवत (Vasundhara Kashikar - Bhagwat)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १५३
प्रकाशन - राजहंस प्रकाशन ऑक्टो २०१६
 
छापील - किंमत दोनशे रुपये
ISBN 978-81-7434-978-6

शेतकऱ्यांची आंदोलने, आत्महत्या, हमीभावाचा प्रश्न याबद्दलच्या बातम्या आणि चर्चांमध्ये एक नाव नेहमी ऐकण्यात येतं ते म्हणजे - शरद जोशी. शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा किंबहुना मुक्त बाजारपेठेचा फायदा त्यांना घेता यावा अशी त्यांची भूमिका होती हे साधारण ऐकून मला माहिती होतं. "इंडिया विरुद्ध भारत" ही संकल्पना सुद्धा त्यांनी मांडली आहे असही ऐकलं होतं . या तीन शब्दातून खूप मोठा आशय, सामाजिक दरी, विकासाचं दुभंग चित्र आपल्यासमोर उभे राहतं. त्यामुळे त्यांच्याबद्दल अजून जाणून घ्यायची उत्सुकता होती. म्हणून ह्या पुस्तकाचा फोटो फेसबुकवर बघितल्यावर ते विकत घेऊन वाचून काढले.

पुस्तक लेखनेच्या प्रेरणे बद्दल लेखिका मनोगतात म्हणते "... शेतकरी संघटक, आंदोलक, नेता, अर्थशास्त्री ही शरद जोशींची ओळख इतिहासात राहीलच पण हे हिमनगाचं वर दिसणार एक टोक आहे असं शरद जोशींच्या व्यक्तिमत्वाबाबत म्हणता येईल. यापलीकडचे तीन चतुर्थांश शरद जोशी लोकांसमोर आणले पाहिजेत असं वाटलं. शरद जोशींची ज्ञानलालसा, अनुभव घेण्यासाठी वाटेल ती किंमत देण्याची तयारी, जोखीम पत्करण्यासाठी लागणारे अचाट साहस, जीवनाचा शोध घेण्याची धडपड, अखंड कार्यमग्नता, विषयाच्या मुळापर्यंत जाऊन त्याला भेदण्याची वृत्ती, तर्कभक्ती, भाषेच्या शुद्धतेचा आग्रह हे सगळं लोकांना कळलं पाहिजे असं कळकळीने वाटलं..."

लेखिका वसुंधरा काशीकर या शरद जोशींच्या संघटनेच्या कार्यकर्त्या किंवा आंदोलनकर्त्या नव्हेत. त्या दोघांची घरगुती ओळख होती. वयाने त्या जोशींपेक्षा बऱ्याच लहान तरीही पुस्तके वाचणे, सामाजिक चिंतन करणे, गझल, कविता अशा अनेक आवडीनिवडी जुळल्या. छान मैत्रीचे नाते निर्माण झाले. त्यातून वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या निमित्ताने भेटी झाल्या आणि चर्चाही झाल्या. त्या वेगवेगळ्या भेटींचे अनुभव आपल्याला सांगितले आहेत. शरद जोशी ह्यांच्या व्यक्तिमत्त्वाची विविधांगी अंगाने कशी ओळख झाली हे आपल्याला कळतं आणि ते पैलूही कळतात. बरीच वर्षे लेखिका शरद जोशींच्या संपर्कात असल्यामुळे वयाच्या आणि कारकिर्दीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर त्यांच्यात झालेले बदल, त्यांच्या अभिव्यक्तीत झालेले बदल आणि तरीही त्यामागे एका वैचारिक अधिष्ठानाचं सातत्य सुद्धा या पुस्तकातून आपल्याला दिसतं. जोशींनी मांडलेले मुद्दे आणि त्यावर लेखिकेचे स्वतःचे विचार मंथन लेखिकेने पुस्तकात मांडले आहे. जोशींच्या शब्दांमागची त्यांची भूमिका समजून घेण्याचा प्रयत्न या पुस्तकात आहे.

पुस्तक कालानुक्रमे असे मांडलेले वर्णन नाही . तर १८ लेखांचा संग्रह आहे. एकेक मध्यवर्ती संकल्पना घेऊन त्याबाबत जोशींचे अनुभव, त्यांच्या लिखाणातून त्यांनी मांडलेले विचार, त्यावर लेखिकाचे भाष्य असे लेखाचे स्वरूप आहे. काही निवडक लेखांबद्दल सांगतो म्हणजे स्वरूप साधारण लक्षात येईल.

"साहित्य, भाषा आणि शरद जोशी" नावावरून लक्षात आलं असेल की शरद जोशींचे वाचन प्रेम साहित्यप्रेम याबद्दलचा हा लेख आहे. "दुनिया की नसीहत पर भी" या लेखात उत्तरआयुष्यात त्यांना सतावणारा एकाकीपणा जाणवतो. बुद्धिवादी तर्कनिष्ठ अशा भूमिकेतून भक्तीयोगाचा अभ्यास करायचा तो अनुभवायचा त्यांचा प्रयत्न आपल्याला दिसतो.

"योगदान" या लेखामध्ये त्यांनी मांडलेली वैचारिक भूमिका व तत्त्वज्ञान याचा वेध घेतला आहे. एखादं आंदोलन हे विशिष्ट विषयापुरतं असतं. तो विषय मार्गी लागला की आंदोलन संपतं. पण विचारधारा व तत्त्वज्ञान हे दीर्घकाळ टिकणारं असतं. येणाऱ्या काळात कशी वाटचाल करावी याचं मार्गदर्शक ठरतं. त्यामुळे असं संचित आपल्या अनुयायांना देऊ शकणारा नेता हा खरा द्रष्टा, लोकोत्तर नेता. त्याबाबतीत शरद जोशी कसे उजवे ठरतात या लेखातून आपल्याला कळतं.

तरुणपणी शरद जोशी हे युनायटेड नेशन्स मध्ये स्वित्झर्लंड मध्ये काम करत होते पण शेती विषयक प्रश्नाच्या तळमळीतून त्यांनी ती नोकरी सोडली पत्नी आणि दोन मुलींसह ते भारतात आले महाराष्ट्रात कोरडवाहू शेती घेऊन स्वतः शेतीत त्यांनी प्रयोग केले प्रचंड ज्ञान आणि विद्वत्तेला अशा प्रकारे प्रत्यक्ष अनुभवाची जोड देऊन ते शेतकरी प्रश्नाकडे उतरले. म्हणूनच जीन्स शर्ट घालणारा हा नेता, ब्राह्मण नेता बहुजन समाजाने आपला मानला. त्यांच्या अनुयायांनी त्यांच्याबद्दल व्यक्त केलेल्या भावना, त्यांच्या मृत्यूपश्चात दिसलेले अनुयायांमध्ये दिसलेले भावुक क्षण हे सुद्धा लेखांमध्ये दिसतात.

आता काही पाने
 उदाहरणादाखल

पुस्तकात दिलेली लेखिकेची माहिती 
अनुक्रमणिका

स्वातंत्र्य हे शरद जोशींसाठी सर्वोच्च मूल्य कसं होतं हे सांगणारा लेख

परदेशातली नोकरी सोडून भारतात येण्याच्या निर्णयावर लेखिकेच्या मनातले विचारतरंग

शरद जोशींचं वक्तृत्व कसं होतं ह्याबद्दल.


सतत चिंतन करणे; प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेणे; त्यासाठी नवनवीन प्रयोग करणे ही एका अर्थाने सकारात्मक अस्वस्थता. शरद जोशींनी ती आयुष्यभर जोपासली असे या पुस्तकातून जाणवते. म्हणून "शोध अस्वस्थ कल्लोळाचा" हे उपशीर्षक पटते.

या पुस्तकांची रचना लेखसंग्रह स्वरूपाची असल्यामुळे प्रत्येक लेख स्वतंत्र स्वयंपूर्ण ठेवण्याचा लेखिकाचा प्रयत्न दिसतो. त्यामुळे कुठल्याही क्रमाने लेख वाचले तरी आपल्याला काही अडचण नाही. पण त्यामुळे बऱ्याच लेखांमध्ये मुद्द्यांची पुनरावृत्ती होते. विश्लेषणाच्या एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे तपशील जात नाही.

मी जेव्हा पुस्तक विकत घेतलं तेव्हा मला असं वाटलं की हे शरद जोशींचं चरित्र आहे. किमान त्यांच्या कामाची माहिती देणारे आणि त्याचे विश्लेषण करणारे पुस्तक असेल. पण पुस्तक वाचल्यावर लक्षात आलं की ते तसं नाही. हे लेखिकेचं अनुभवकथन आहे. तिचं स्वतःचं त्यावरचं भाष्य आहे. लेखिका प्रत्यक्ष कार्यकर्ती किंवा आंदोलनकर्ती नसल्यामुळे तिचे अनुभव थेट त्या कार्याच्या गाभ्याला भिडणारे नाहीत. ही या लेखनाची मर्यादा आहे. त्या कार्यकर्त्यांचे अनुभव, शरद जोशींच्या कुटुंबीयांचे अनुभव, समकालीनांचे विचार हे जर मांडता आले असते तर पुस्तक अजून प्रभावी झालं असतं.

माझ्यासारख्याला ज्याला शरद जोशींच्या आयुष्याची, कामाची आणि त्याच्या परिणामांची झालेल्या परिणामांची फारच जुजबी माहिती आहे त्याला हे पुस्तक तितकं रिलेट करता येत नाही. हे पुस्तक वाचताना सतत असं वाटत राहतं की आधी आपण शरद जोशींचं चरित्र वाचावं किंवा थेट त्यांनी केलेलं लिखाण वाचावं. असं वाटायला लावणं हेच कदाचित ह्या पुस्तकाचं यश म्हणावं लागेल.


——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

श्रील प्रभुपाद (Shrila Prabhupad)

पुस्तक - श्रील प्रभुपाद (Shrila Prabhupad)
लेखक - हिंदोल सेनगुप्ता (Hindol Sengupta)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - २७२
मूळ पुस्तक - Sing Dance & Pray (सिंग, डान्स अँड प्रे )
मूळ पुस्तकाची भाषा - इंग्रजी (English)
अनुवाद - डॉ. शुचिता नांदापूरकर- फडके आणि सौ. नयना पिकळे
(Dr. Shuchita Nandapurkar-Phadke And Nayna Pikale)
प्रकाशन - हेडविग मीडिया हाऊस, एप्रिल २०२५
ISBN - 978-81-967886-0-5
छापील किंमत - ४५०/- रु.

भारतीय संस्कृती, हिंदुधर्म, वेदांमधील ज्ञान, तत्वज्ञान हे हजारो वर्षे चालत आलेले आहे. त्याबद्दल जगभरातल्या विद्वानांना आकर्षण आणि उत्सुकता नेहमीच राहिली आहे. त्यातून ह्या सगळ्या गोष्टी देशोदेशी नक्कीच पोचल्या असतील. पण त्या सर्वसामान्य परदेशी लोकांपर्यंत पोचवण्याचं; इतकंच नव्हे तर त्यांची जीवनपद्धती भारतीय करण्याचं काम फार थोड्या व्यक्तींना, संस्थांना जमले असेल. त्यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे "इस्कॉन" - "हरे कृष्णा" चळवळ. परदेशी गोरे लोक भगवी वस्त्रे लेवून, मुंडन करून, "हारे रामा हारे ख्रीश्ना" असा नाचत, वाद्य वाजवत जप करतायत हे दृश्य तुम्ही बघितलं असेलच. "भगवद्गीता - जशी आहे तशी" ह्या पुस्तकाची विक्री करणारे देशी- परदेशी संन्यासी बघितले असतील. हे सगळे "इस्कॉन" - "हरे कृष्णा" चळवळीचे सदस्य. श्रीकृष्ण हे आराध्य दैवत, गीता, भागवत हे महत्त्वाचे धर्मग्रंध आणि "हरे राम हरे कृष्ण" हा जप, जगन्नाथाची रथयात्रा आणि अन्नदानाचे आयोजन ही व्यवच्छेदक लक्षणे आपल्या सहज लक्षात येतील. जागोजागी असणारी मोठमोठी "इस्कॉन मंदिरे" आणि त्यांचे भव्यदिव्य कार्यक्रम ह्यातून ही संस्था आर्थिक दृष्ट्याही भरभराटीला आली असल्याचं ही जाणवेल. एकाअर्थी ही संस्था आणि तिचे साधक हे भारताचे सांस्कृतिक राजदूतच आहेत. अशी ही महत्त्वाची धार्मिक संस्था कशी सुरु झाली, देशाबाहेर कशी पसरली आणि अ-भारतीय लोकांमध्ये इतका आमूलाग्र बदल कशी घडवू शकली हे जाणणं निश्चित औत्सुक्याचं आहे. म्हणूनच तिचे संस्थापक श्रील प्रभुपाद ह्यांचं हे चरित्र वाचनीय आहे.

श्रील प्रभुपाद ह्यांचं मूळ नाव अभय चरण डे. त्यांचा जन्म १८९६ मध्ये कलकत्त्यातील एका सुखवस्तू पण धार्मिक घरात झाला. गौडीय वैष्णव परंपरांचे ते पालन करत. महाराष्ट्रातील भक्ती परंपरेप्रमाणे बंगाल मधली चैतन्य महाप्रभु ह्या संतांमुळे प्रचलित झालेली ही परंपरा. त्यांच्या धार्मिक वृत्तीची जोपासना लहानपणीच झाली असली तरी इतर बहुतेक संतांप्रमाणे लहानपणापासून ते एक विरक्त म्हणून राहिले नाहीत. ते संसारी होते. त्यांनी लग्न केले, मुलाबाळांसह संसार केला, नोकरी केली, व्यवसाय केला, यश अपयश पचवले. पण कृष्णभक्ती आणि सांसारिक मोहापासून दूर जाण्याची इच्छा सतत मनात तेवत राहिली. म्हणून त्यांनी ह्याविषयावर पुस्तके लिहिणे, मासिक चालवणे असे उद्योग स्वखर्चाने सुरु केले. शंभर वर्षांपूर्वीच्या त्या काळात कागदाच्या टंचाईपासून वर्गणीदार गोळा करण्यापर्यंत सगळे झगडे ते करत होते. झाशी, वृंदावन, प्रयाग अशा ठिकाणी राहून मुख्य धंदा आणि प्रकाशनाचा जोडधंदा सांभाळत होते. पण भारतात त्यांना फार प्रतिसाद मिळत नव्हता. शेवटी वयाच्या सत्तरीत त्यांनी संन्यास घेतला आणि त्यांच्या गुरूच्या आदेशानुसार पुस्तकांद्वारे जगभर कृष्णभक्तीचा प्रसार करायला निघाले. वयाच्या सत्तरीत जेव्हा माणसे शरीराने, मनाने सर्व व्यापांतून निवृत्त होऊन आराम करण्याच्या मनःस्थितीत असतात तेव्हा अभय चरण डे अर्थात संन्यासानंतरचे भक्तिवेदांत नव्या उमेदीने कार्यविस्ताराला परदेशी निघाले. हे वाचून आश्चर्यचकित व्हायला होते. पुस्तकात हाआधीचा कालखंड, त्यांचे तोपर्यंतचे काम ह्याची बऱ्यापैकी माहिती आहे.

त्यानंतर पुस्तकात पुढचा भाग सविस्तर आहे. अमेकरिकेच्या प्रवासातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. तरी ते पुढे जातच राहिले. पहिल्यांदा ते पेन्सिलव्हिनिया इथे परिचितांकडे राहिले. त्यांनी लोकांना इंग्रजीतून प्रवचन द्यायला सुरुवात केली. त्यावेळची अमेरिका मोठ्या सामाजिक आणि सांस्कृतिक घुसळणीतून जात होती. व्हियेतनाम युद्धासाठी तरुणांना जबरदस्तीने सैन्यात भरती व्हावे लागत होते, त्यामुळे अस्वस्थता होती. काळे - गोरे ह्यांचा वांशिक संघर्ष होता. श्रीमंतांना सर्व भौतिक सुखं मिळत असूनही समाधान नव्हते. त्यातून दारू आणि अमली पदार्थांचे सेवन वाढले होते. प्रस्थापित भांडवलशाही विरुद्ध झगडे होते. ह्या भयंकर परिस्थितीचे वर्णन लेखकाने व्यवस्थित केले आहे. त्यातून प्रभुपादांच्या आगमनाची आणि पुढील कामाची पार्श्वभूमी आणि प्रत्ययकरिता स्पष्ट झाली आहे.

"भक्तिवेदांत" ह्या नावाने त्यांनी आपले काम सुरु केले. प्रवचने, नामस्मरण आणि पुस्तक/मासिकांची विक्री ह्यातून ते संदेश पसरवत होते. स्वतः सुरात गात भजन करायचे. अन्नदान करायचे. "अमली पदार्थांची धुंदी थोडाच वेळ टिकेल पण पेक्षा कृष्णभक्तीची धुंदी चढली नाही की ती उतरणार नाही" असा त्यांचा उपदेश असे. सुरवातीला बेघर, अमली पदार्थांचे सेवन करणारे किंवा तणावग्रस्त अशा लोकांना हे काहीतरी वेगळं असल्याचं जाणवून ते प्रभुपदांकडे आकर्षित झाले. त्यांना अनुयायी मिळायला सुरुवात झाली. इतरांकडून आर्थिक मदत मिळायला सुरवात झाली. दुकानाच्या एका छोट्या गाळ्यात पहिले मंदिर सुरु झाले. अनुयायी मिळत होते. पण पाश्चिमात्य संस्कृतीशी पूर्णपणे वेगळे अशी त्यांची नियमावली होती. मांसाहार, अमली पदार्थाचं सेवन वर्ज्य होतं. साधारण लग्न संसाराला परवानगी होती. जपजाप, आरती ह्या दिनचर्येला महत्व होते. आश्रम म्हणजे काय, त्याचे नियम काय असावेत, दीक्षा कशी द्यायची ह्याचे पायंडे प्रभुपाद घालून देत होते. कितीतरी प्रसंगांतून हे पायाभरणीचे दिवस पुस्तकात उलगडून दाखवले आहेत.

पुढच्या भागात अमेरिकेत त्यांनी केलेला प्रवास, "बीटल्स" ह्या प्रसिद्ध वाद्यवृदांतील संगीतकार जॉर्ज हॅरिसन, प्राध्यापक ॲलन जिन्सबर्ग अशा प्रथितयश व्यक्तींनी घेतलेलं केलेलं शिष्यत्व, लंडनचा प्रवास आणि तिथलं काम असे प्रसंग आहेत. पुढे जगभरचा प्रवास, ठिकठिकाणी केंद्रांची स्थापना ह्याचा प्रसंगोपात उल्लेख आहे. कामाचा व्याप वाढला तसा संस्था म्हणून दैनंदिन व्यवहारांकडे बघणे, पैशाचं व्यवस्थापन ह्याचाही ताण वाढू लागला. अल्पावधीतच चळवळ फोफावली हे चांगलं असलं तरी कार्यकर्ते-साधक नवशिकेच होते. शिकवण पूर्ण अंगी मुरायच्या आधीच त्यांच्यावर एकेका केंद्राची जबाबदारी आली होती. त्यातून मतभेद, चुकीचे निर्णय, वैयक्त्तिक महत्त्वाकांक्षा असे दोषही संस्थेत दिसू लागले. प्रभुपाद पत्रांद्वारे लोकांना कसे मार्गदर्शन करत, त्यांनी नियामक मंडळ कसे सुरु केले, वाद कसे झाले असा कटू भाग सुद्धा पुस्तकात आहे.

युरोप-अमेरिकेत यश मिळाल्यावर भारतीयांचे कुतूहल वाढले, आदर वाढला असे म्हणायला हरकत नाही. त्यानंतर मायापूर(प. बंगाल), वृंदावन, मुंबई इथे मोठमोठी मंदिरे आणि केंद्रे उभारायचे प्रकल्प त्यांनी हाती घेतले. तरी सगळं अगदी सुतासारखं सरळ झालं नाही. कधी जागेचे वाद तर कधी स्थानिकांकडून कार्यकर्त्यांवर जीवघेणे हल्ले असेही प्रकार झाले. असे पुस्तकात उल्लेख आहेत. अमेरिकेत कोर्ट कचेऱ्यांनाही तोंड द्यावं लागलं. इस्कॉनवाले लोकांचा बुद्धीभ्रंश करून स्वतःच्या कह्यात आणतात. जणू काही चेटूक करून लोकांना वाममार्गाला लावतात असाच आरोप झाला. तेव्हा संस्थेने काय प्रतिवाद केला ते पुस्तकात आहे. ख्रिश्चन लोक धर्मांतरित होतायत हे बघून चर्चने सुद्धा बदनामी करायचा प्रयत्न केला. तेव्हाही संस्थेला प्रतिवाद करावा लागला. त्याचेही प्रसंग पुस्तकात आहेत.

अशा प्रकारे प्रभुपादांच्या वैयक्तिक आणि संस्थात्मक संघर्षातून इस्कॉन नावारूपाला आली. वयाच्या सत्तरीनंतर केलेले हे अद्वितीय कार्य आहे. १९७७ मध्ये वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांच्या आवडत्या वृंदावन धामी त्यांनी आपला देह ठेवला. त्यांनी निर्माण केलेली ग्रंथसंपदा जगाला कायम मार्गदर्शक राहील आणि त्यातून ते आपल्यात आहेत असा संदेश त्यांनी अखेरीस दिला. त्यांच्या अंतिम दिवसांत निवृत्तिपर होत असूनही रात्र रात्रभर जागून ते अविरत लेखन करत होते.


आता काही पाने उदाहरणादाखल वाचूया  

लेखकाबद्दल पुस्तकात दिलेली माहिती
गांधीजींना प्रभुपदांचा सल्ला  


अमेरिकेतली परिस्थिती आणि आपल्या संस्कारांचा गाभा ह्यादोन्हीचा तोल सांभाळत केलेले कार्य आणि सामाजिक सहभाग 
परदेशी भक्तांचे अनुभव कथन 


पुस्तक असं माहितीने भरलेलं आहे. ह्यात लोकांच्या मुलाखती, दोन व्यक्तींमधल्या संवादाचे वेचे, टीव्ही वरच्या कार्यक्रमातले अंश, खटल्यातल्या प्रतिवादाचा अंश, अशा वेगवेगळ्या पद्धतीने मजकुराची रचना केली आहे. त्यामुळे ते एकसुरी होत नाही. पण अमेरिकन संदर्भ नीट ठाऊक नसल्यामुळे काही जागांचे, प्रसंगांचे उल्लेख लगेच समजले नाहीत. ते थोडं गुगल करून बघावं लागलं. अनुवादही चांगला झाला आहे. पण बऱ्याच ठिकाणी मूळ पुस्तकाची निवेदनशैलीच - विशेषतः संवाद लिहिले आहेत तिचे - जरा ठोकळेबाज असावी असं वाटलं, साहजिकच त्याचा परिणाम अनुवादावर झाला आहे.

प्रभुपादांचे जीवन व त्यांचे कार्य ह्याबद्दल प्राथमिक ओळख करून घेण्यासाठी उत्तम पुस्तक आहे. अजून माहिती हवी असणाऱ्यांसाठी शेवटी संदर्भ सूची आहेच. 


——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

जा जरा पूर्वेकडे (Ja jara purvekade)

पुस्तक - जा जरा पूर्वेकडे (Ja jara purvekade) लेखक - आशुतोष जोशी (Ashutosh Joshi) अनुवाद - सविता दामले, मोहना प्रभुदेसाई जोगळेकर (Savita Dam...