शीतपेटीतून जेव्हा जाग येते (Shitpetitun Jevha Jaag Yete)



पुस्तक - शीतपेटीतून जेव्हा जाग येते (Shitpetitun Jevha Jaag Yete)
लेखक - क्षितिज देसाई (Kshitij Desai)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १०४
प्रकाशन - सृजनसंवाद प्रकाशन, सप्टेंबर २०२५
छापील किंमत - २५०/-
ISBN - 978-93-91895-55-6

मराठीतून चांगल्या विज्ञानकथा किंवा कल्पनारंजन(फँटसी) प्रकारचं लेखन इतर साहित्यप्रकारांइतकं मोठ्या प्रमाणावर दिसत नाही. त्यामुळे मराठीत असं लेखन दिसलं तर मी मुद्दामून वाचायचा प्रयत्न करतो. विशेषतः त्यात नवीन लेखकाचं नाव दिसलं तर ह्या लेखकाने काय वेगळे प्रयोग केले असतील ह्याची जास्त उत्सुकता वाटते. त्यामुळे क्षितिज देसाई हे मला अनोळखी नाव आणि त्याचा विज्ञानकथा संग्रह ह्याबद्दल फेसबुक पोस्ट्स बघितल्यावर पुस्तक लगेच विकत घेतले. आवडलेही. पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार कळले की क्षितिज च्या कथा २०११ पासून प्रकाशित होतायत. हा त्याचा दुसरा कथासंग्रह आहे.

पुस्तकात दिलेली लेखकाची माहिती


पुस्तकात नऊ कथा आहेत. भविष्यात विज्ञान - तंत्रज्ञान ह्यांच्या प्रगतीने आपल्या जगण्यात काय बदल घडतील, त्यातून काय नवीन समस्या तयार होतील, त्यावरचे उपाय पण कसे अभिनव असतील ह्याची कल्पना करणाऱ्या ह्या कथा आहेत. रहस्यभेद न करता कथांचे विषय थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो

ब्ल्यूबेरीचं ब्रेसलेट - भविष्यात माणूस इतका प्रगती साधेल की परग्रहांवरही मानवी वस्ती होईल. वस्ती आली की तिचे व्यवस्थापन करणारी व्यवस्था आली. मग आज जशा upsc - mpsc स्पर्धा परीक्षा असतात तशा तेव्हाही mpsc परीक्षा असतील. मात्र "मार्स पब्लिक सर्व्हिस कमिशन". तिची निवडप्रक्रिया सुद्धा आधुनिक. फक्त उमेदवाराची बुद्धीच नाही तर नैतिकता कशी तपासली जाईल, त्यासाठी थेट डोक्यात कसे डोकावतील ह्याची भन्नाट कल्पना.

ओरिगामीचं ओबडधोबड ऑर्किड - परग्रहांवर वस्ती झाली की तिकडे समाजव्यवस्था तयार होणार. त्यापाठोपाठ नव्या व्यवस्थेला विरोध करणारे विरोधक सुद्धा तयार होतील. कदाचित परग्रहवासी अतिरेकी सुद्धा तयार होतील. अशा अतिरेक्यांच्या अंतराळात होणाऱ्या कारवाईला विरोध करण्याची योजना कशी आखली जाते आणि त्यात यंत्रमानव कसे काम करतात याबद्दल ची कथा.

इंडेक्स पेशंट - टाईम ट्रॅव्हल / कालप्रवास अर्थात भूतकाळात परत जाण्याचे तंत्रज्ञान हा सर्व विज्ञान कथांचा एक आवडीचा विषय. या कथेत सरकारी व्यवस्थेला कळतं की एक व्यक्ती कालप्रवास करून भूतकाळात गेली आहे. पण ती व्यक्ती सरकारमान्य किंवा योग्य परवानगी घेऊन गेलेली नाही. मग ती कोण? कशासाठी? हे शोधण्यासाठी सरकारी अधिकारी पण कालप्रवास करून मागे जातात. कालप्रवास अधिक चोर-पोलीस अशी गोष्ट. तिचा शेवट मात्र अगदी अनपेक्षित.

शीतपेटीतून जेव्हा जाग येते - अमर व्हायची इच्छा प्रत्येक माणसालाच असते. समजा तसं होता आलं तर? आपलं शरीर जपून ठेवता आलं आणि आपल्याला हवं तेव्हा भविष्यात पुन्हा जागा होत आलं तर? जाग आल्यावर नव्या काळाशी, नव्या सभोवतालाशी जोडून घ्यावे लागेल. मेंदूमध्ये नवे ज्ञान भरावे लागेल. पण आपली ओळख तर तीच राहील. एक तंत्रज्ञान कंपनी अशी सेवा लोकांना पुरवते आहे. शीतपेटीत लोकांना ठेवते. पण इथे झालं असं की कथानायक शीतपेटीतून उठला आणि त्याला देह मात्र दुसऱ्याच माणसाचा मिळाला. आता पुढे काय?

रोबोनॅप - आज आपल्या प्रत्येकाकडे मोबाईल फोन आहे. ती गरज झाली आहे. भविष्यात यंत्रमानव सुद्धा 
असेच अतिशय कॉमन होतील. प्रत्येक माणसाकडे, घरोघरी यंत्रमानव असतील; आपली काम करून देण्यासाठी, आपलं मनोरंजन करण्यासाठी. जणू आपले ते सहकारीच. तेव्हा गुन्ह्याचं प्रकारही बदलेल. आज मोबाईल चोरीला जातात तसा भविष्यात यंत्रमानव चोरीला गेला तर? आपला सहचर असणारा रोबो किडनॅप (रोबोनॅप) झाला तर?

एआय विरुद्ध विक्रांत - यंत्रमानव कॉमन होतील. सैन्यात सैनिकांच्या बरोबरीने यंत्रमानव काम करतील. मग फितूर म्हणून सुद्धा एखादा यंत्रमानवच सैन्यात घुसला तर? अगदी माणसासारखा दिसणारा वागणारा एआय वापरणारा फितूर यंत्रमानव आला तर ? त्याला ओळखायचं कसं ?

देही देवाचा वास - हातचलाखी आणि विज्ञानातले प्रयोग करून आपण चमत्कार करतो आहेत असे भासवणारा बुवा लोकांना फसवतोय. त्याचा पर्दाफाश करणारी एक तरुणी कशी करते ते वाचा.

बुद्धी विरुद्ध बळ - ह्या कथेतही पुन्हा तंत्रज्ञान वापरून दुसऱ्याची फसवणूक आणि त्याची पोलखोल आहे. पण इथे फसवणूक एक खेळाडू करतोय. कायम जिंकावं म्हणून खुबीने आणि लपूनछपून तंत्रज्ञान वापरतोय.

ह्या नऊ कथा आपल्याला आजच्या काळापासून दूर भविष्यापर्यंत, घरापासून मंगळापर्यंत, बुद्धिबळाच्या पटापासून आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या पटापर्यंत, यंत्रमानवांच्या भावभावनांपासून भविष्यात जाग्या झालेल्या खऱ्याखुऱ्या माणसांच्या भावनांपर्यंत सफर घडवून आणतात. आपण त्या सफरीचा समरसून आनंद घेतो. शेवटच्या दोन कथांमध्ये दाखवलेली फसवणूक कदाचित आजही घडू शकेल असं तंत्रज्ञान आसपास आहे. त्यामुळे कल्पना किती झपाट्याने सत्य होतायत ह्याची जाणीव होते. म्हणून इतर कथांमधले तंत्रज्ञान आत्ता उपलब्ध नसलं तरी या कल्पना शक्यतेच्या टप्प्यात आहेत असं आपल्याला वाटतं. त्यातून या गोष्टी अतर्क्य वाटत नाहीत. खरंच असं होऊ शकतं असा विश्वास वाचकाच्या मनात निर्माण करतात. असं झालं तर काय काय होईल याबद्दल वाचकांनाही विचार प्रवृत्त करतात.

मुख्य कल्पनेच्या गाभ्याप्रमाणेच कथांची लेखनशैलीही दृश्यात्मक आहे. कमीत कमी वर्णनात लेखक परिस्थिती आपल्यासमोर उभी करतो. अनावश्यक वर्णनाचा फापटपसारा मांडलेला नाही. निवेदन व संवाद असं दोन्ही वापरलेलं आहे त्यामुळे कथा एकसुरी होत नाही. योग्य तिथे इंग्रजी व मराठी शब्द वापरून तोही मेळ चांगला साधला आहे. प्रसंगही वेगवान घडतात आणि उत्सुकता शेवटपर्यंत टिकून राहते. एक कथा वाचून झाली की लगेच पुढची वाचायची इच्छा निर्माण होते. एका बैठकीत पुस्तक वाचून संपवलंत तर नवल नाही.

काही पाने उदाहरणे दाखल
माणूस मंगळावर गेला तसा पृथ्वीवरचा भ्रष्टाचारही तिथे पोहोचला तर ?



कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणारा फितूर कसा शोधायचा ?



क्षितिज देसाई २०११ पासून विज्ञानकथालेखन करतो आहे. आता त्याच्या इतर गोष्टी वाचायची उत्सुकता आहे. हे पुस्तक वाचून झाल्यावर त्याच्याशी संपर्क साधला तेव्हा कळलं की तोही मूळचा डोंबिवलीकर आहे. माझा गाववाला! त्यातही आयटी क्षेत्रात काम करणारा. त्यामुळे कौतुक अजूनच वाढले. क्षितिजच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा ! क्षितिजच्या लेखनाने मराठी विज्ञानकथांचे क्षितिज कायम उजळत राहो !!



——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

No comments:

Post a Comment

शीतपेटीतून जेव्हा जाग येते (Shitpetitun Jevha Jaag Yete)

पुस्तक - शीतपेटीतून जेव्हा जाग येते (Shitpetitun Jevha Jaag Yete) लेखक - क्षितिज देसाई (Kshitij Desai) भाषा - मराठी (Marathi) पाने - १०४ प्र...