ब्रँड गुरु (Brand Guru)



पुस्तक - ब्रँड गुरु (Brand Guru)
लेखिका - जान्हवी राऊळ (Janhavi Raul)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १४२
प्रकाशन - बिग आयडिया पब्लिकेशन , मार्च २०१२
ISBN - दिलेला नाही
छापील किंमत - रु. २२५/-

कुठलाही व्यवसाय सुरु केल्यावर आपलं उत्पादन ग्राहकापर्यंत पोचावं, त्याने ते पुन्हापुन्हा खरेदी करावं आणि लोकप्रिय व्हावं असं स्वप्न बघणं, ध्येय ठेवणं स्वाभाविक आहे. हे ध्येय गाठण्यासाठी मालाची गुणवत्ता उत्तम ठेवणं आणि त्याचा वापर केल्यावर लोकांना समाधान मिळणं ह्याचा भाग मोठा आहे. तरीही "बोलणाऱ्याची माती खपते, न बोलणाऱ्याचे सोनंही विकलं जात नाही" हे आपलं पारंपरिक शहाणपण आहेच ! त्यामुळे विक्री होण्यासाठी "मार्केटिंग", जाहिरात आवश्यकच. ह्या जाहिरातींतून तुम्ही लोकांना स्वतः बद्दल सांगता, माझं उत्पादन कसं चांगलं, उपयुक्त, फायदेशीर आहे ते सांगता. विक्रीनंतरही वेगवेगळ्या मार्गाने ग्राहकांच्या संपर्कात राहता. त्यातून तयार होतो तुमचा ब्रँड. तुमचं नाव, उत्पादनं, बोधचिन्ह (लोगो), घोषवाक्य (टॅगलाईन) सगळं लोकांच्या मनात ठसतं. हा प्रवास सोपा नाही, कमी कालावधीचा नाही. सहज, आपोआप होईल असाही नाही. अतिशय गांभीर्याने करायची ही कृती आहे. ती कशी केली पाहिजे, कसा विचार केला पाहिजे ह्याची जाण वाढवणारं हे पुस्तक आहे.

पुस्तकातल्या लेखिकेच्या मनोगतातल्या माहितीनुसार त्यांनी रहेजा स्कुल ऑफ आर्टस् मधून कमर्शियल आर्टसची पदवी घेतली. पतीच्या जाहिरातक्षेत्रातील १८ वर्षांच्या अनुभवानंतर स्वतःचा व्यवसाय सुरु केला. त्यात त्यांनी उतार चढाव बघितले. त्या आज यशस्वी ब्रँड सल्लागार आणि स्वतःच्या "बिग आयडिया कम्युनिकेशन" या कंपनीच्या सर्वेसर्वा आहेत. त्यांचे पतीही नोकरी सोडून "बिग आयडिया"त सहभागी झाले आहेत .

ह्या पुस्तकात ब्रॅंडिंग चे वेगवेगळे पैलू कसे महत्त्वाचे आहेत. हे प्रकरणवार सांगितले आहे. ब्रँड म्हणजे काय, तो तयार करायचा म्हणजे काय, त्यासाठी कसा विचार करायचा इथपासून सुरुवात केली आहे. स्वतःकडे, आपल्याच धंद्याकडे, उत्पादनाकडे वेगवेगळ्या कोनातून बघण्यासाठी प्रश्नावली दिली आहे. त्याची उत्तरं निश्चित झाली की आता हे ब्रॅण्डिंग सांधण्याचे मार्ग - बोधचिन्ह (लोगो), घोषवाक्य (टॅगलाईन) , माहितीपुस्तक , विक्रीयोग्य वस्तू, प्रेझेंटेशन , कंपनीने छापलेली दिनदर्शिका, टीशर्ट इ. वर एकेक प्रकरण आहे. उदा.  कुठला रंग कुठली भावना दर्शवतो. त्यानुसार आपल्या लोगोमध्ये रंगनिवड कशी करावी लागते. ग्रीटिंग कार्ड, बिझनेस कार्ड कसे कलात्मक करता येईल. माहितीपुस्तिकेचे महत्त्व. प्रदर्शनात मांडण्याच्या तक्त्यांचे विविध प्रकार. प्रत्येक मार्गाची माहिती पोचवण्याची पद्धत वेगळी, सामर्थ्य निराळे त्यामुळे त्यामागची अभिव्यक्तीकला सुद्धा निराळी. ब्रॅण्डिंग करणाऱ्या कंपन्यांना तांत्रिकता, कलात्मकता, लोकभावना ह्याची कशी कसरत करावी लागत असेल हे त्यातून जाणवते.

काही पाने उदाहरणादाखल
अनुक्रमणिका



ब्रॅण्डिंग प्रश्नावलीची सुरुवात



एका मार्गाबद्दल विचार



वाचकाला प्रोत्साहित करणारे पान


ब्रॅण्डिंगचा प्रत्येक मार्ग स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. आणि तसे व्यवसायिक अभ्यासक्रम सुद्धा आहेत. त्यामुळे एका पुस्तकातून ते सगळं मांडणं आणि समजून येणं शक्यच नाही. पण ह्या क्षेत्रात काम न करणाऱ्या; टीव्ही, सोशल मीडिया, वृत्तपत्रे ह्यात जाहिरात बघणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीला ब्रॅण्डिंग जगताचे दार किलकिले करून आत डोकावण्याची संधी ह्या पुस्तकातून मिळते. नव-व्यावसायिकांनी हे पुस्तक वाचले तर ब्रॅण्डिंगबद्दलची त्यांची जाणीव विकसित होईल. इतरांचं ब्रॅण्डिंग बघताना ते कसं केलं आहे हे थोडं अजून समजून घ्यायचाही आपण प्रयत्न करू.

हे तांत्रिक विषयावरचं पुस्तक आहे. अशावेळी आपल्याला मराठी शब्दांपेक्षा इंग्रजी शब्दांची जास्त सवय असते. ते लक्षात घेऊन लेखिकेने मराठी शब्दांबरोबर कंसात इंग्रजी शब्दही दिले आहेत. काहीवेळा पूर्ण वाक्य, प्रश्न पुन्हा इंग्रजीतही दिले आहेत. हे योग्यच. त्यामुळे मराठी माणसाला मराठी पुस्तक वाचण्यात अडचण येणार नाही !! मात्र ही द्विभाषिकता डोक्यात ठेवून लिखाण केल्यामुळे असेल पण बऱ्याच ठिकाणी मराठी मजकूर हा इंग्रजीचे बोजड भाषांतर झाल्यासारखा आहे. तो अजून ओघवता करता आला असता.

हे पुस्तक हातात घेताना लेखिकेच्या ह्या क्षेत्रातला अनुभव वाचायला मिळेल अशी माझी अपेक्षा होती. त्यांनी केलेली कामे, त्यांचे ग्राहक, मिळालेला प्रतिसाद, चुका, अनपेक्षित बरावाईट प्रतिसाद असं काही वाचायला मिळेल असे वाटले होते. पीयूष पांडे ह्यांच्या "पांडेपुराण" सारखे काहीतरी. पण तसे अजिबात झाले नाही. त्यामुळे हे पुस्तक जरा पाठ्यपुस्तकासारखे रुक्ष झाले आहे.

पुस्तक वाचताना माझे भाषा शिकवण्याचे उपक्रम, पुस्तक परीक्षणाचा उपक्रम ह्यांचं पण ब्रॅण्डिंग करावं असं वाटू लागलं. ह्या उपक्रमांतून विक्री किंवा कमाई अपेक्षित नसली तरी लक्ष्यप्रेक्षकांपर्यंत (target audience) पोचण्यासाठी असं काहीतरी केलं पाहिजे. बिगरसरकारी संस्था, समाजोपयोगी प्रकल्प ह्यंनासुद्धा ब्रॅण्डिंगची आवश्यकता असतेच.

विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग ह्याबद्दल मराठीत पुस्तक असेल तर त्याचे मला कौतुक वाटते. मराठी ज्ञानभाषा करण्यातले ते योगदान असते. लेखक मराठी, मूळ पुस्तक मराठी असेल तर ते कौतुक दुणावते. इथे स्वतःच्या कामाने मराठी माणसाचा ठसा ह्या क्षेत्रात उमटवणारी व्यक्ती मराठी पुस्तक लिहिते आहे. त्यामुळे कौतुक तीणावले ! जान्हवीताईंनी स्वानुभवरचे पुस्तक लिहिले आहे का मला माहिती नाही. पण तसे नसेल तर नक्की लिहावे.


——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
व्यवसाय करणाऱ्यांनी आवा ( आवर्जून वाचा )
इतरांनी जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

नागालँडच्या अंतरंगात (Nagalandchya Antarangat)




पुस्तक - नागालँडच्या अंतरंगात (Nagalandchya Antarangat)
लेखिका - अर्चना जगदीश (Archana Jagadeesh)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - २००
प्रकाशन - प्रफुल्लता प्रकाशन, नोव्हेंबर २०१७
छापील किंमत - रु. २५०/-
ISBN - 978-81-87549-85-7

डिसेंबर २०२४ मध्ये पुण्यात झालेल्या "विश्व मराठी संमेलना"तल्या पुस्तक प्रदर्शनात ज्येष्ठ प्रकाशक गुलाब सकपाळ आणि त्यांची कन्या द्वितीया सोनावणे (त्याही प्रकाशक) ह्यांची भेट झाली. भेट झाली. ह्याआधी फक्त फेसबुकवर गप्पा झाल्या होत्या. प्रत्यक्ष भेटून सर्वांना आनंद झाला. काकांनी मला भेट देण्यासाठी त्यांच्या प्रकाशनाचे पुस्तक मला निवडायला सांगितले. तेव्हा ह्या पुस्तकाने माझे लक्ष वेधले. मी फारसा न वाचलेला विषय असल्यामुळे उत्सुकता वाटली. पुस्तक चाळल्यावर कळले की ह्या पुस्तकाला २०१७, १८ मध्ये मान्यवर संस्था व वाचनालयांचे पुरस्कार मिळाले आहेत. ह्या भेटीसाठी काकांचे मनापासून आभार.



लेखिका अर्चना जगदीश ह्या वनस्पतिशास्त्रज्ञ आणि संशोधक आहेत. १९९४ मध्ये त्यांनी ह्याविषयातली पी.एच.डी. मिळवली आहे. भारत सरकारच्या "वनस्पती सर्वेक्षण विभागा"त त्यांनी पुण्यात काही वर्षे नोकरी केली. कामासाठी आणि आवडीमुळे सह्याद्री पर्वत आणि इतर डोंगराळ भागांत त्यांची भटकंती चालू होती. ईशान्य भारताच्या पर्वतराजींमध्ये दडलेल्या घनदाट जंगलांचे आकर्षण तेव्हापासून त्यांना होते. पुढे त्यांनी सरकारी नोकरी सोडून स्वतःची स्वयंसेवी संस्था काढून ह्याच विषयात स्वतःच्या रुचीनुसार काम सुरु केले. त्यातूनच नागालँडच्या सरकारने सुरु केलेल्या एका प्रकल्पावर काम करण्याची संधी त्यांना मिळाली. "नेपेड"नावाचा हा प्रकल्प तिथल्या लोकांची जीवनपद्धती, वनस्पती वैविध्य, शेतीच्या पद्धती ह्यांचे सर्वेक्षण, नोंदी करणे व त्यातून ग्रामविकासाचे उपाय सुचवणे असा बहुउद्देशीय होता. त्यासाठी १९९०च्या दशकात अर्चनाजींनी नागालँड मध्ये बरेच महिने प्रवास केला. सुदूर दुर्गम खेडेगावांत जाऊन गावकऱ्यांशी भेटीगाठी घेतल्या. दुभाषांमार्फत लोकांशी संवाद साधला. जंगलात जाऊन पानं-फुलं गोळा केली. ह्या सगळ्या अनुभवांचे वर्णन पुस्तकांत आहे. त्यांनी अरुणाचल प्रदेशला सुद्धा भेट दिली होती. त्या अनुभवावर एक लेख आहे. 

महाराष्ट्रापासून खूप दूर, दुर्गम असलेला नागालँड. तिथे नागा आदिवासी राहतात. ख्रिश्चन मिशनऱ्यांनी त्यांचे पूर्ण धर्मांतरण केले आहे. नागा सशस्त्र बंडखोरी, सीमावर्ती भाग असल्यामुळे घुसखोरी अशा सुरक्षाविषयक समस्या सुद्धा आहेत. इतपतच माहिती मला होती. टीव्हीवरच्या बातम्या, समाजमाध्यमे, वर्तमानपत्रातले लेख ह्याममध्ये पण नागालँड हा काही नेहमी येणारा विषय नाही. त्यामुळे हे पुस्तक माहिती वाढवणारे आहे. पण बघितलेल्या ठिकाणांचे स्थलवर्णन नाही. प्रवासवर्णन नसलं तरी ह्यातलं "प्रवासाचं"वर्णन वाचण्यासारखं आहे. पुणे - कोलकाता - दिमापूर विमान प्रवास आणि मग बस, छोट्या गाड्या तर कधी मैलोनमैल चालत इष्टजागी पोचायला लागायचं. प्रत्येक प्रवासाचं हे दिव्य वाचताना ते लोक मुख्य भारतापासून (इंडियन प्लेन्स पासून) किती दुरावलेले आहेत हे जाणवते.

आदिवासींची शेती पद्धती म्हणजे "झूम" पद्धती. जंगल तोडून जागा शेतीयोग्य करतात. तिथे एकदोन वर्ष शेती केली की ती जागा सोडून दुसरी जागा साफ करतात. असं करत करत साताठ वर्षांनी पुन्हा पाहिल्याजागी येतात. तोपर्यंत तिथे पुन्हा रान माजलेलं असतं. शेती कशी करतात, त्यात काय लावतात, पुरुष कुठली कामं करतात, बायका कुठली कामं करतात याचं सुद्धा सविस्तर वर्णन आहे. किती वर्षांनी पुन्हा त्याच जागी यायचं, झाडं कशी तोडायची, प्रत्येक जागेला काय म्हणायचं हे सुद्धा प्रत्येक जमातीनुसार वेगवेगळं आहे. एक छोटं राज्य असलं तरी कितीतरी जमाती, उपजमाती आहेत. त्यांचं खानपान वेगळं, बोलीसुद्धा वेगळ्या. इतक्या, की एकमेकांनाही न समजणाऱ्या. तिथल्या तिथे फिरताना सुद्धा वेगवेगळ्या दुभाषांची गरज पडावी. हे वाचल्यावर जाणवतं की दुर्गमतेमुळे किती कप्पे पडले आहेत. आपल्या भाषेचा, जमातीचा टोकाचा अभिमान बाळगला गेला तर पदोपदी संघर्षाला वाव आहे. "विविधतेत एकता", "हम सब एक है" ह्या घोषणा किती आव्हानात्मक आहेत.


इतके महिने तिकडे राहिल्यावर तिथलं वेगवेगळ्या प्रकारचं खाणं त्यांनी "बघितलं" तरी. नागा लोक सर्वभक्षी. चिकन, मटण हे साधं झालं. डुक्कर, गायबैल खाणं नेहमीचंच. इतकंच काय खारी, पक्षी, किडे, अळ्या, मधमाश्या असं सगळं खातात. कुत्र्याचं मांस हे तर "स्वादिष्ट". शहरातल्या बाजारांत, गावच्या बाजारांत असा मांडलेला "रानमेवा" त्यांनी बघितला. तांदळाची दारू "झू" हे तर सर्वमान्य पेय. अशा काही गमती त्यात आहेत. खाण्यापिण्याच्या अशा सवयी वाचून असं वाटतं की भारतापेक्षाही चिनी लोकांशी जास्त साम्य आहे. दिसण्यातही तसे ते मंगोलवंशीय. त्यामुळे पुन्हा एकदा "विविधतेत एकता" टिकवण्याचं जबरदस्त आव्हान लक्षात येतं. पुस्तकात असं म्हटलं आहे की नागा जमाती म्यानमार मध्ये सुद्धा आहेत. मनात असा विचार आला की निसर्गाच्या ह्या लेकरांना "निसर्गापासून दूर गेलेल्या लेकरां"नी असं कृत्रिम सीमांनी विभागून टाकलं आहे.

आदिवासी सगळे मिळून मिसळून काम करणारे. पण तरीही तिथे गावाचा/जमातीचा राजा अशी संकल्पना आहेच. पण तो राजा म्हणजे काही फार श्रीमंत , महालात राहणार असा नाही. इतरांपेक्षा थोडी मोठी झोपडी आणि केवळ एक मनाची पदवी असंच. पूर्वीच्या काळी मुलगा वयात आला की त्याला दुसऱ्या जमातीच्या माणसाला मारून त्याचं मुंडकं आणायला लागे. मात्र ते नरभक्षी नव्हेत. आता ही परंपरा मागे पडली आहे. पण "हेड हंटिंग" च्या कवट्या त्यांनी बघितल्या. गावात एका सार्वजनिक झोपडीत अशा कवट्या ठेवल्या जात. अशा झोपड्या म्हणजे गावाच्या वयस्करांनी आपलं शहाणपण पुढच्या पिढीकडे देण्याच्या जागा. नागा वनवासींच्या अशा त्यांना दिसलेल्या प्रथांविषयी ही त्यांनी लिहिलं आहे. तिथल्या फुटीरतावादी, सशस्त्र बंडखोरांशीही अवचित गाठ पडली. ती क्रूर नजर, हिसंक कृत्य ह्यातून सुदैवाने त्या सुखरूप बाहेर पडल्या. त्याचे दोन थरारक किस्सेही आहेत. स्थानिकांशी त्याविषयी जास्त न बोलता, आपल्या कामावर लक्ष देण्याचे धोरण ठेवून त्यांनी स्वतःला अलिप्त व सुरक्षित ठेवले.

पुस्तकात ९४-९५ च्या आसपासचा नागालँड आहे. तिथल्या लोकांना सुद्धा मुख्य भारताप्रमाणे विकसित व्हायचं आहे, तरुणांना साहजिकपणे शहरी जगण्याचं आकर्षण आहे. पैसे मिळवण्यासाठी तिथे नगदी पिकं आणि लाकूडतोड मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. शहरात राहून आलेली, जीन्स टीशर्ट घालणारी मुलं शेती-जंगल आधारित जगण्यापासून दूर जात आहेत. त्याला चूक तरी कसं म्हणणार ? पण काहीतरी चुकतंय हे खरं. म्हणूनच नागालँडची जाणीव वाढवून पण विकास करायचा म्हणजे नक्की काय, कसा, लोकसहभाग कसा मिळवायचा , प्रयोग आर्थिकदृष्टया सक्षम कसे करायचे असे असंख्य प्रश्न मनात घेऊनच त्यांनी आपल्या संशोधन कामाचा शेवट केल्याचं लक्षात येतं.

आता काही पानं उदाहरणादाखल वाचा.

नागांच्या सर्वभक्षित्वाची एक झलक



सर्वांनी मिळून घरं - झोपड्या बांधायची पद्धत



अंतर्गत प्रवासाची काठिण्यपातळी आणि दिसणारं निसर्गसौंदर्य




असं हे पुस्तकाचं स्वरूप आहे. ह्यात प्रवास असला तरी हे नमुनेदार प्रवासवर्णन नाही. संशोधनपर कामाशी संबंधित असलं तरी रुक्ष आकडेवारी, तांत्रिक तपशील नाहीत. वने, शेती, सामाजिक पद्धती ह्यांचं हे दस्तऐवजीकरणही नाही. तर प्रवास करताना, माणसांना भेटताना सहजपणे काय दिसलं, जाणवलं, वेगळेपण भावलं ह्याच्या नोंदी आहेत. लेखिकेने आपल्याशी मारलेल्या गप्पा आहेत. त्यामुळे बऱ्याच वेळा त्याच त्या प्रकारच्या वर्णनाची पुनरुक्तीही जाणवते. ती थोडी कमी करता आली असती. तिथला भूगोल आणि दिशा आपल्या परिचयाच्या नाहीत त्यामुळे प्रवासाची दिशा कळत नाही. अजून नकाशे टाकून ते सांगायला हवं होतं. पुस्तकात फक्त मुखपृष्ठाच्या आत सहा फोटो आहेत. वर्णनाच्या बाजूला अजून फोटो किंवा रेखाचित्रे हवी होती. लेखिकेने केलेल्या संशोधनाचं/सर्वेक्षणाचं काय निष्पन्न झालं हा प्रश्न, "नेपेड" प्रकल्पात त्याचा काय हातभार लागला हे मला कळलं नाही. पुस्तक वाचताना आपण लेखिकेचे सह-सर्वेक्षक बनतो. त्यामुळे "आपल्या" सर्वेक्षणाची फलश्रुती काय हे न कळल्यामुळे चुटपुट लागते.

अर्चनाजींच्या धाडसामुळे, मन लावून केलेल्या कामामुळे आणि ते पुस्तक स्वरूपात आणल्यामुळे नागालँड सारख्या आपल्याच देशाच्या एका भागाबद्दलची आपली जाणीव वाढेल. ती अजून वाढली पाहिजे अशी उत्सुकता होईल हे नक्की. अशा अनवट मराठी पुस्तकासाठी लेखिका अर्चना जगदीश आणि प्रकाश गुलाब सकपाळ ह्यांचे आभार.

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

स्टीव्ह जॉब्स (Steve Jobs)



पुस्तक - स्टीव्ह जॉब्स (Steve Jobs)
लेखक - डॉ. अनंत लाभसेटवार (Dr. Anant Labhsetwar)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - २१८
प्रकाशन - विजय प्रकाशन. जून २०१४
छापील किंमत - रु. २५०/-
ISBN - दिलेला नाही.

"ॲपल" हा शब्द उच्चारल्यावर काही लोकांच्या डोळ्यासमोर सफरचंद येईल तर बहुतेक जणांच्या डोळ्यासमोर येईल "आयफोन". ॲपल कंपनीचा "आयफोन" एक महागडा फोन. दिसायला देखणा, हाताळायला सोपा, उत्तम छायाचित्रे काढता येणारा असा फोन गेली कित्येक वर्षे मोबाईल वापरणाऱ्यासांठी "स्टेस्टस सिम्बॉल" झाला आहे. ॲपलचाच लॅपटॉप "मॅक"सुद्धा तंत्र जगतात लोकांची प्रथम क्रमांकाची पसंती असते. हातात धरण्याजोगा, वागवायला सोपा "आयपॅड" आणि भरपूर गाणी ऐकायला देणारा "आयपॉड" देखील तितकेच लोकांच्या आवडीचे. आज आपण कॉम्प्युटर वापरताना माउस वापरतो आणि "चिन्हांवर"(आयकॉन) वर क्लिक करतो त्या तंत्रज्ञानाची सुरुवात केली ती देखील ॲपलनेच. तंत्रज्ञानाच्या युगात मोलाची कामगिरी ॲपल करू शकली ह्याचं कारण तिचा सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्सची दृष्टी, कलात्मकता, स्वतःच्या निर्णयांवर ठाम राहण्याची वृत्ती, अपयश पचवून पुन्हा उभारी घेण्याची क्षमता आणि बरंच काही. अशा स्टीव्ह जॉब्सचे चरित्र डॉ. लाभसेटवारांनी मराठीत लिहिलं आहे.

स्टीव्हच्या कुटुंबाच्या पार्श्वभूमीपासून सुरुवात करून, त्याचा जन्म, बालपण, शिक्षण, त्यातली धरसोड ह्याबद्दल सुरुवातीच्या प्रकरणात माहिती आहे. त्याचा जन्म अरबी वडील आणि अमेरिकन आईच्या पोटी त्यांच्या लग्नाच्या आधीच झाला. नाचक्की टाळण्यासाठी जन्म झाल्या झाल्या तो दत्तक दिला गेला. एका कष्टकऱ्याच्या घरात. त्यामुळे आपल्या जैविक वडिलांशी त्याचे संबंध कायमचे दुरावले. दत्तक गेल्याबद्दलचा न्यूनगंड तयार झाला. त्याची वृत्ती लहानपणापासून बंडखोर झाली. तरुणपणात तर चक्क अमली पदार्थांच्या व्यसनात बुडाला. "हिप्पी" लोकांची बेपर्वा जीवनशैली त्याने स्वीकारली. कसाबसा कॉलेजात शिकत राहिला. एका नशेडी, वाया गेलेल्या, उद्धट मुलाचं वर्णन आपण वाचतो आहोत असंच वाटतं. पण विजेवर चालणाऱ्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू ह्यांचे आकर्षण त्याला होते. त्या वस्तू उघडून बघायच्या, पुन्हा जोडून बघायच्या. ही त्याची सवयच पुढे जाऊन "ॲपल"झाली. स्टीव्हचा हा सगळा प्रवास सविस्तर मांडला आहे.

ॲपलचा दुसरा साहसंस्थापक - स्टीव्ह वोझनीयॅक - अर्थात वॉझ. ते दोघं एकत्र प्रयोग करत असताना वॉझने सुटे भाग जुळवून संगणक तयार केला. त्यासाठी स्वतः संगणक प्रणाली लिहिली. सगळं हौसेपोटी, आवडीपोटी चालू होतं. फक्त वॉझ असता तर ते काम तिथेच विरूनही गेलं असतं. पण स्टीव्हची उद्योगशीलता व दूरदृष्टी तिथे कमी आली. लोकांनी सुटेभाग घेऊन घरगुती संगणक बनवण्यापेक्षा आपण असे छोटेखानी तयार संगणक विकले तर लोक ते विकत घेतील. त्यातून फायदा होईल हे त्याच्या लक्षात आलं आणि सुरू झाली "ॲपल". कायदेशीर कंपनी स्थापन करणे, भागीदारी ठरवणे, मग भांडवलदार गोळा करणे, त्यांचा हिस्सा ठरवणे हे सगळे सोपस्कार झाले. अमेरिकन संस्कृतीतले वातावरण उद्योगाला किती पोषक होते हे सुद्धा इथे जाणवते.

पुढच्या प्रकरणांमध्ये स्टीव्हची स्वतःची मते कशी होती आणि त्यांनी कंपनीची वेगवेगळी उत्पादने कशी घडवली ह्याची स्वविस्तर वर्णने आहेत. यंत्रांची माणसाला भीती वाटता कामा नये. ते ओबडधोबड नाही तर सुंदर दिसलं पाहिजे, हाताळायला सोपं पाहिजे हा त्याचा आग्रह - हट्टच. ते साधायचं तर यंत्रांची सामुग्री (हार्डवेअर) आणि प्रणाली (सॉफ्टवेअर) सुद्धा आपलंच पाहिजे. हा दुसरा हट्ट. आणि इतकं सगळं झालं की ते सुंदर उत्पादन विकायचं ते सुद्धा नजाकतीने. दुकानात जाणे, चौकशी करणे, विकत घेणे हे सुद्धा लोकांना आनंददायक, छाप पडणारे वाटले पाहिजे. म्हणून "ॲपल स्टोअर" सुरु झाली. हा सगळा प्रवास, ॲपलच्या प्रत्येक उत्पदनाची जन्म कहाणी, त्यावेळचे किस्से प्रत्यक्ष वाचण्यासारखेच आहेत.

हे सगळं वाचून असा समज होईल की स्टीव्ह फारच लोकप्रिय असेल व ॲपल नेहमीच यशस्वी ठरली असेल. पण तसं नाही. "हिप्पी" स्टीव्हचं वागणं आयुष्यभर चक्रमपणाचं राहिलं. पुस्तकात असं वर्णन आहे की तरुणपणात अनेक दिवस अंघोळ न केल्यामुळे त्याच्या अंगाला घाण वास येत असे. राहणं ओंगळ होतं. लोकांना ते सहन करून काम करावं लागायचं. बोलणं अतिशय तुसडं. दुसऱ्याला थेट प्रश्न, पाणउतारा, शिवीगाळ नेहमीचीच तेही चारचौघांत. कंपनीच्या कामात लोक कसे टिकले, "पापी पेट का सवाल" किंवा "येडXXX असला तरी त्याचं बोलणं खरं ठरतं आणि कंपनीला पैसा मिळतो" असा फायद्याचा विचार करून राहिले असतील बिचारे. पण जेव्हा हे चुकीचं ठरलं तेव्हा थेट स्टीव्हलाच "ॲपल"च्या बाहेर काढलं गेलं. स्वतःच्या घरातून बाहेर काढल्याचा धक्का त्याला पचवावा लागला. त्या दिवसांत त्याने "ॲनिमेशन" क्षेत्रातली "पिक्सर" कंपनी काढली. नावारूपाला आणली. "टॉय स्टोरी" चित्रपटाला ऑस्कर मिळाला. अजून बरेच चित्रपट गाजले. आणि त्यानंतर त्याचं "डिस्नी"शी पण "वाजलं". मायक्रोसॉफ्ट चा बिल गेट्स आणि तो एकाचवेळी प्रतिस्पर्धक, टोकाचे टीकाकार आणि तरी एकमेकांसाठी काम करणारे होते. स्टीव्हच्या व्यक्तिमत्त्वाची ही नकारात्मक बाजू, थोडी व्यावसायिक क्रूर बाजूसुद्धा पुस्तकात सविस्तर मांडली आहे.

स्टीव्ह बाहेर पडल्यावर "ॲपल" बरी चालली पण काही वर्षांनी आर्थिक संकटात सापडली. हळूहळू स्टीव्ह पुन्हा "ॲपल"मध्ये येऊ लागला आणि पुढे त्याने पुन्हा कंपनीचा ताबा घेतला. पुढे नवी उत्पादने बाहेर आली. त्याला अचानक कर्करोगाने ग्रासले. तरी शेवटची चारपाच वर्षे आयफोनच्या नव्या आवृत्त्यांनी बाजारपेठ गाजवली. त्याच्या मृत्यूपश्चात सुद्धा गाजवत आहे. असा मोठा चरित्रपट पुस्तकात आहे.

काही पाने उदाहरणादाखल

अनुक्रमणिका

तरुण स्टीव्हचा भारत प्रवास



स्टीव्हच्या सौंदर्य दृष्टीबद्दल



"पिक्सर" कंपनीतला स्टीव्हचा "हम करे सो कायदा"




एक गंमत जाणवली. २०१४ मधले लेखकाचे निरीक्षण आहे की फोन कॉम्प्युटरची निर्मिती अमेरिकेत व्हावी असा आग्रह अमेरिकी राष्ट्रध्यक्ष धरत होते. ॲपल चीन मध्ये उत्पादन करत होते. आणि भारताकडे ढुंकूनही पाहत नाही. गंमत म्हणजे १० वर्षांनी अमेरिकी राष्ट्रध्यक्ष तोच आग्रह धरतायत. फक्त आता म्हणतायत की भारतात उत्पादन पुरे. भारताच्या "मेक इन इंडिया" ने कसा बदल घडवला आहे हे असं आपसूक समोर येतं. 

स्टीव्हचं हे लोकविलक्षण व्यक्तिमत्त्व, अस्थिर कौटुंबिक संबंध, टोकाची घृणास्पद वागणूक आणि त्याचवेळी सौंदर्यदृष्टीचे टोक गाठणे, जमान्याच्या चार पावलं पुढे जाणारी उत्पादने तयार करून अख्ख्या जगालाच पुढे नेणे हे सगळं समजून घेण्यासाठी हे चरित्र वाचलंच पाहजे. लेखकाने ओघवत्या शैलीत लिहिलं आहे त्यामुळे वाचायला मजा येते. काही काही मुद्द्यांची पुनरावृत्ती झाली आहे ती कदाचित कमी करता आली असती.

प्रत्येक इंग्रजी शब्दाला मराठी प्रतिशब्द देण्याचा लेखकाचा प्रयत्न (स्टीव्ह सारखा हट्ट) दिसतो. उदा. "कृष्णधवल रंगाच्या पटलावर रंगीत चित्र उमटवण्याचा शोध लावला.. पटलावर माहिती उपलब्ध करून देण्यासाठी उंदरावर टिचकी मारण्याचा शोध लावला". "विभागीय दुकानातून (Departmental store ) फिरताना .. ", "संगणक कृत्या (Application)", "स्मरण चकत्या (memory chips)", "कुठल्याही संगणकाचं आतडं म्हणजे चकत्यांचे फलक (Chip boards)", "प्रदर्शनात गाळे (stall) आरक्षित केले" इ. हे वाचताना गंमत वाटते. हे शब्द योग्य आहेत. आपण ते वापरत राहिले पाहिजेत म्हणजे ते रुळतील. त्यासाठी लेखकांचे विशेष अभिनंदन. एक चुकीची वाक्यरचना मात्र पूर्ण पुस्तकभर खटकते. "केले जाते", "समजली जाईल", "बोलला गेला" ह्या कर्मणी वाक्यांमध्ये पुस्तकभर "केल्या जाते", "समजल्या जाईल", "बोलल्या गेला" अशी वाक्यरचना आहे. ही मुद्रितशोधनाची चूक का लेखकाच्या बोलीचा प्रभाव?

पुस्तकाचे सहशीर्षक यथायोग्य आहे. "काव्य आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालून मानवी जीवन सुखकर करणारा". विषय, आशय आणि मांडणी ह्या दृष्टीने उपयुक्त पुस्तकासाठी लेखक डॉ. लाभसेटवारांचे आणि प्रकाशकांचे आभार.


——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

विद्रोह (Vidroh)




पुस्तक - विद्रोह (Vidroh)
लेखक - हेन्री डेन्कर (Henry Denker)
अनुवाद - लीना सोहोनी (Leena Sohoni)
भाषा - मराठी (Marathi)
मूळ पुस्तक - Outrage (आऊटरेज)
मूळ पुस्तकाची भाषा - इंग्रजी (English)
पाने - १८८
प्रकाशन - मेहता पब्लिशिंग हाऊस. सप्टेंबर १९८९
छापील किंमत - रू. २९९ /-
ISBN -978-93-5720006

१९८२ साली प्रकाशित झालेली ही अमेरिकन सामाजिक कादंबरी लीनाजींनी १९८९ मध्येच मराठीत आणली आहे. २०२४ मध्ये पुनर्मुद्रण होऊन पुन्हा मराठी वाचकांसमोर आली आहे.



कादंबरीची सुरुवात होते.. रिऑर्डन नावाचा मध्यमवयीन माणूस बंदूक घ्यायला आलाय. अगदी मध्यमवर्गीय, नोकरदारासारखा साधा माणूस बंदूक विकत घेतो. त्या संध्याकाळी एका व्यक्तीचा माग काढून थेट गोळ्या घालून त्याला ठार करतो. शांतपणे पोलिसांकडे येऊन जबानी देतो की मी खून केलाय. मला पकडा. कायद्याने काय शिक्षा व्हायची आहे ती होऊ द्या.

तो सांगतो की हा खून त्याने केलाय कारण.. "जॉन्सनने माझ्या मुलीवर बलात्कार केला होता, तिची हत्या केली होती. सगळे साक्षी पुरावे असूनही काहीतरी तांत्रिक कारणास्तव न्यायालयाने त्याला सोडून दिलं होतं. माझी मुलगी गेलीच. तिच्या आठवणीने झुरून बायकोही केली. घर उद्ध्वस्त झालं. आणि हा मात्र मोकाट फिरतोय..म्हणून मी त्याला मारलं."

ह्याला खून म्हणायचं ? कायदा हातात घेणं म्हणायचं? व्यवस्थेने न्याय नाकारला तर स्वतः न्याय मिळवणं चूक का बरोबर? ह्या कृत्यासाठी शिक्षा व्हायला पाहिजे की खुनामागचा हेतू बघता त्याला निर्दोष मानलं पाहिजे? रिऑर्डन ला वाटतं म्हणून दुसरी व्यक्ती अपराधी मानायची का? दोषी कोण आणि निर्दोष कोण हे ठरवायचा अधिकार न्यायव्यवस्थेला दिलाय मग असं कोणी स्वतः निवडा कसा करू शकेल? सगळेच असं वागले तर...

हे सगळे प्रश्न उभे राहतात जेव्हा रिऑर्डन चा खटला सुरू होतो तेव्हा. "मला वकील नको, गुन्हा कबूल आहे" असं ते म्हणाला तरी न्यायाधीश त्याला एक वकील देतात. एक तरुण होतकरू वकील - बेन. रिऑर्डन बद्दल त्याला सहानुभूती वाटतेय. पण सगळे पुरावे उघड रिऑर्डनविरुद्ध आहेत आणि त्याला स्वतःलाच सुटायची इच्छा नाही. अशावेळी बेनने कसं वागावं ? बेन खटला कसा लढवतो. न्यायालयात युक्तीवाद कसे होतात. आणि शेवट काय होतो हे कादंबरी वाचल्यावरच तुम्हाला कळेल.

अमेरिकेत सर्वसामान्य लोकांमधून बारा पंधरा लोक "ज्युरी" म्हणून लोक निवडले जातात. त्या ज्युरींनी साक्षी पुरावे ऐकून आरोपी दोषी की निर्दोष हे ठरवायचं. भावना मध्ये न आणता फक्त तथ्यांवर आधारित निर्णय घ्यायचा. आणि त्यावर न्यायाधीशांनी निकाल सुनावायचा अशी पद्धत. त्यामुळे दोन्हीकडचे वकील कायद्याचा कीस पडतात तसंच ज्युरी लोकांना आपल्या बाजून वळवायचा कसा प्रयत्न करतात हे रंजक आहे. आधीच्या खटल्यात न्याय कसा मिळाला नाही हे दाखवताना बेन न्यायव्यवस्थेलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतो. तर कितीही भावनिक प्रसंग असला तरी तथ्य आणि नियम ह्यांवरच निर्णय कसा घ्यावा लागतो ही दुसरी बाजूही पुढे येते.

ह्या खटल्यात जसा नैतिक-अनैतिकतेचा पेच लेखकाने उभा केला आहे तसा प्रत्येक पात्राच्या स्वभावानुसार प्रसंगांकडे बघण्याचा वेगवेगळा प्रकारही छान रंगवलाय. ज्युरीची जबाबदारी घ्यायला काही जण उत्सुक तर काहीजण नाईलाजानं. केवळ सनसनाटी बातम्या मिळवण्यासाठी आधाशी पत्रकार आणि ह्या केस मधून एक धमाकेदार पुस्तक होईल ह्यासाठी धडपडणारा एजंट. बेनला आठवणींच्या रूपातून मार्गदर्शन करणारे त्याचे काका, त्याची प्रेयसी, कडक न्यायाधीश अशी कितीतरी छोटी मोठी पात्रं ह्यात येतात. त्यामुळे विषय गंभीर असला तरी कथन रंजक होतं. न्यायालयीन नाट्य असलं तरी ते अतितांत्रिक होत नाही. ती चर्चा अशी गुंफली आहे की आधीच्या खटल्यात काय नियमकानून लागू झाले, आत्ता काय लागू होतात हे आपल्याला समजतं. त्यामुळे ती साधार गोष्ट वाटते. दोन्ही बाजूंचे म्हणणे, अडचणी, भावना नीट समजतात.

काही पाने उदाहरणादाखल.

बेनशी सहकार्य करायला नकार देणारा रिऑर्डन



बलात्काराच्या खटल्यात निकाल देणाऱ्या न्यायाधीशाला पण साक्षीला बोलवा अशी मागणी बेन करतो तेव्हा.



ज्युरी लोकांनी भावनिक का होऊ नये हे सरकारी वकिलाचं सुस्पष्ट म्हणणं


पुस्तक वाचताना वाचकही आपोआपच ज्युरी होतो. आणि आपल्या मनातला निकाल लागतोय का नाही ह्याची उत्सुकता वाटत राहते.

मूळ पुस्तकाचा अनुवाद प्रथितयश अनुवादिका लीना सोहनी ह्यांनी केला आहे. तो त्यांच्या नावाला साजेसा ओघवता झाला आहे. कायदेशीर संज्ञांमध्ये मराठी आणि इंग्रजी शब्दांचा मेळ साधत भाषांतर केलं आहे. त्यामुळे हे मराठी पुस्तकच वाटतं.

पुस्तकाचा विषय आणि आशय लक्षात आला असेलच. तर पुस्तक वाचा आणि... "युवर ऑनर, रिऑर्डनचा खटला तुमच्यासमोरही चालावा... साक्षी, पुरावे, नियम, समाजाला त्यातून मिळणारी दिशा तुम्हीही ठरवा".

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

डोंगराएवढा (Dongaraevadha)



पुस्तक - डोंगराएवढा (Dongaraevadha)
लेखक - शिवराम कारंत (Shivram Karant)
अनुवादक - उमा वि. कुलकर्णी (Uma V. Kulkarni)
भाषा - मराठी (Marathi)
मूळ पुस्तक - बेट्टद जीव (Bettada Jeeva) (ಬೆಟ್ಟದ ಜೀವ)
मूळ पुस्तकाची भाषा - कन्नड (Kannada)
प्रकाशन - मेहता पब्लिशिंग हाऊस , १९८५
पाने - १४८
छापील किंमत - रु. १८०/-
ISBN - 9788171617661

उत्तर कर्नाटकातल्या डोंगरदऱ्यांत वसलेल्या एका छोट्या खेड्यातली ही गोष्ट आहे. कादंबरीचा निवेदक - शिवराम नावाचा तरुण - एका गावाहून दुसऱ्या गावी आडवाटेने चालत चालला होता. चालता चालता उशीर झाला, अंधार पडला आणि तो रस्ता चुकला. योगायोगाने तिथले दोन गावकरी त्याला भेटले. त्याला म्हणाले, "आता इतक्या उशीरा, अंधारातून तुमच्या गावी पोचणं कठीण आहे. आजचा दिवस इथे राहा. सकाळी पुन्हा जा". हाच बरा पर्याय वाटून तो त्यांच्याबरोबर थांबायचं ठरवतो. पण गावकऱ्यांचं अगत्य इतकं की एका रात्रीपुरता करायचा मुक्काम आठवाडाभर लांबतो. गावकऱ्यांशी गप्पागोष्टी होतात, गावात आणि आजूबाजूला फिरणं होतं. त्या गप्पांचं, फिरण्याचं हे वर्णन म्हणजे ही रसाळ कादंबरी आहे.

शिवराम ब्राह्मण असल्यामुळे गावकरी त्याला गावातल्या ब्राह्मणाच्या घरी घेऊन जातात. गोपालय्या आणि शंकरम्मा असं हे वृद्ध दांपत्य आहे. ते त्याची प्रेमाने राहायची व्यवस्था करतात. हे दांपत्य, त्यांचा मानलेला मुलगा-सून, शेजारी "देरण्णा", कामगार "बट्ट्या" ह्या सगळ्यांशी भेटणं, बोलणं होतं. गोपालय्यांच्या घरी, त्यांच्या मानलेल्या मुलाच्या घरी आग्रहाने खाऊपिऊ घालणं होतं.

गावाभोवती हिरवेगार डोंगर, गर्द झाडी आहे. धबधबे, झरे, नदी अशी पाण्याची मुबलकता आहे. स्वच्छ हवेमुळे प्रसन्न वातावरण. पण शहरापासून, गाडीरस्त्यापासून फार दूर. दुर्गम ठिकाण. त्यामुळे फारच थोडे लोक तिथे राहतायत, तांदूळ, ऊस ह्यांची शेती करतायत. नारळ , सुपारीच्या बागा राखतायत. निसर्ग अनंत हस्ताने द्यायला तयार आहे पण तितक्याच हातांनी परत घ्यायला ही तयार आहे. पाऊस, वादळ, माकडांचा उच्छाद आहे. रानातल्या हत्तींची झुंड शिरून ऊस आणि पोफळीच्या बागांची नासधूस करतात. रात्री अपरात्री वाघाची डरकाळी तर जवळून ऐकू येते. असं असूनही लोक इथे राहतायत. त्यात आपल्या मायभूमीचं प्रेम आहे. थोडा सवयीचा भाग आहे. त्याहून अधिक म्हणजे गोपालय्यांची जिद्द आहे. डोंगराशी सलगी करत पण रान मोकळं करून शेत-मळे-बागा उभारायची दुर्दम्य इच्छा आहे. तरुणपणात त्यांनी कष्ट करून हा भाग कसा रंगरूपाला आणला हे त्याला समजतं आणि अजूनही योग्य साथ मिळाली तर नव्याने काही आणायची जिद्द जाणवते.

दुर्गम भागामुळे माणसांची वस्ती कमी. बाहेरून येणाऱ्याजाणाऱ्यांची वर्दळही नगण्यच. त्यामुळे माणसाला माणूस भेटणे हे ही अप्रूपच. त्यामुळे पाहुण्यांना काय काय दाखवू आणि काय नको असं त्यांना होत असतं. त्यामुळे थंडगार नदीत अंघोळ, वाघाची शिकार, दाट अरण्यातून भटकंती असे बरेच प्रसंग घडतात. फिरून आल्यावर पाहुणे दमले असतील म्हणून अंगाला तेल लावून गरम काढत पाण्याने अंघोळीची सोय करतातच. आणि वर पाहुणा संकोचतोय हे बघून स्वतः अंगाला तेल लावून देतात. असा लोभाचा धबधबाच जणू ! तरी शहरी 
शिवरामला लक्षात येतं की कितीही सुंदर वाटलं तरी आपण काही अशा एकलकोंड्या ठिकाणी राहू शकणार नाही बुवा ! म्हणूनच गोपालय्या, शंकरी, गावकरी ह्यांचा पाहुणचार, कष्ट हास्यविनोद करत स्वतःचं जीवन सुसह्य करण्याचा प्रत्यन ह्याचं कौतुक त्याला वाटतं.

ह्या वर्णनाला एक समांतर धागा सगळ्यांच्या बोलण्यातून येत असतो की गोपालय्या आणि शंकरम्मा ह्यांचा मुलगा तरुणपणी शिकायला म्हणून शहरात गेला. मधून मधून तो गावी येत असे. मग नोकरी लागल्यावर गावाला त्याचं येणंजाणं कमी होत गेलं. आणि आता ते बंदच झालं. मुलाची भेट व्हावी म्हणून म्हातारा म्हातारी तळमळतायत. बोलताना पुन्हा पुन्हा तो विषय निघतोय, आणि पुन्हा पुन्हा काहीतरी हास्यविनोद करून ते अश्रू लपवत विषय मागे टाकतायत. मानलेल्या मुलाला त्याच्या मुलांना आता आपलं समजून वागतायत. आपला पाहुणा शहरातून आलेला आहे. कदाचित त्याला आपला मुलगा कधी दिसला, भेटला तर त्याने मुलाला आपली अवस्था सांगावी; आईवडिलांना भेटायला जायला सांगावं; अशी वेडी आशासुद्धा बाळगतायत. तो मुलगा कोण असेल का नसेल परत आला ? ह्याचा उलगडा कादंबरी वाचल्यावरच होईल.

काही पाने उदाहरणादाखल
गावापासून थोडा लांब असलेला गोपालय्यांचा "काटेमुलू" मळा बघायला सगळे जातात तो चालण्याचा प्रसंग.



कन्नड ब्रह्माणांमधल्या जाती पोटजातींमधल्या स्वभाववैविध्यावर मिश्किल टिप्पणी



म्हाताऱ्या नवराबायकोच्या समंजस वागण्याचं, लटक्या रागाचं आणि पुन्हा एकमेकांची चेष्टा करण्याचं अप्रूप 
शिवरामला वाटतं. तेव्हाचा संवाद.



पुस्तकात दिलेली लेखकाची माहिती


पुस्तकात दिलेली अनुवादिकेची माहिती


सुरुवातीपासून जाणवणारे एक लहानसे रहस्य आणि त्याचा उलगडा हे नाट्य असले तरी तो पुस्तकाचा मूळ गाभा नाही असं मला वाटलं. त्या परिस्थितीचं, माणसांचं वर्णन हेच कादंबरीचे कथाबीज आहे. बाहेर निसर्ग-डोंगर-वन्यप्राणी  ह्यांच्याशी जुळवून घेत आणि मनात ह्या विरहाशी जुळवून घेत, कटुता न बाळगता, जमेल तितक्या आनंदाने, परोपकाराने, परिपक्वतेने जगणाऱ्या "डोंगराएवढे" व्यक्तिमत्त्व असणाऱ्या गोपालय्यांची ही कहाणी आहे. शहरी जीवन आणि गावाकडचं जीवन ह्यातला फरक हलकेच सुचवणारी, निसर्गाचं मोहक वर्णन करणारी, निसर्गाच्या आव्हानाची जाणीव करून देणारी, गावाकडच्या लोकांच्या प्रेमळ आतिथ्याची ही कहाणी आहे. लेखकाची लेखणी समर्थ आहेच. शब्द-वाक्प्रचार ह्यांची गंमत, चित्रमय वर्णन, तो निसर्ग, तिथल्या माणसांचा भोळेपणा-चतुरपणा ही वातावरणनिर्मिती गुंतवून ठेवणारी आहे. मूळ कन्नड पुस्तकाचा उमा ताईंनी केलेला मराठी अनुवाद तितकाच ताकतीचा ... "डोंगराएवढा" ! त्यामुळे कादंबरी संपली, रहस्य कळले तरी आता गोपालय्या, शंकरम्मा, नारायण वगैरे मंडळींच्या आयुष्यात पुढे काय होईल हे लेखकाने सांगत राहावे आणि आपण वाचत राहावे असे वाटते.

नेटवर शोधताना कळले की ह्या कादंबरीवर कन्नड चित्रपटही आहे. तोही कादंबरीप्रमाणेच लोकप्रिय आहे. 
https://www.youtube.com/watch?v=iZbV9gxBAKM


——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

बांधावरची बाभळ (Bandhavarachi babhal)





पुस्तक - बांधावरची बाभळ (Bandhavarachi babhal)
लेखक - प्रकाश नावलकर (Prakash Navalkar)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १७२
प्रकाशन - न्यू इरा पब्लिशिंग हाउस. डिसेंबर २०२४
छापील किंमत - रू. २८०/-
ISBN -978-93-94266-96-4

लेखक प्रकाश नावलकर यांनी मला हे पुस्तक वाचायला भेट म्हणून दिलं याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो. प्रकाश नावलकर लिखित हा दुसरा कथासंग्रह आहे.
लेखकाचा पुस्तकात दिलेल्या परिचय.

महाराष्ट्रातील खेड्यात घडणाऱ्या प्रसंगांवर आधारित या कथा आहेत. अशा प्रकारच्या कथा कादंबऱ्यांमध्ये आढळून येणारे नेहमीचे प्रसंग त्यात आहेत. म्हणजे शेतीवर आधारित जगणं त्यामुळे ऋतू बदलला की शेतकऱ्यांच्या कामाची लगबग होते. निसर्गाच्या कोपालाही तोंड द्यावा लागतं. अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेलं पीक गमावून बसण्याची पाळी येते. शेतीच्या कामांचं स्वरूपही खूप मेहनतीचं एकट्यादुकट्याचं काम नव्हे. सहाजिकच त्यातून गावकऱ्यांचे व्यवसाय, अलुतेदार- बलुतेदार एकमेकांवर अवलंबून असतात. शेतात एकमेकांच्या कामात त्यांना मदतीला जातात. पिढ्यानपिढ्या एकाच गावात नांदल्यामुळे घरोघरी ओळखी असतात, आपुलकी असते आणि प्रसंगी पिढीजात वैरही असतं. सरपंच, पाटील असे गावातल्या सत्तेचे अधिकारी असतात तसेच तर मोलमजुरी करून पोट भरणारे गावकरीही असतात. प्रत्येकाचं समाजातलं स्थान आणि मान ठरलेला असतो. त्यामुळे लग्नासारख्या कौटुंबिक गोष्टीतही सरपंच, पाटील, शिक्षक अशा प्रतिष्ठितांचं मत विचारात घेतलं जातं. त्यांच्या संमतीने व्यवहार होतात. अडीअडचणीला गावकरी एकमेकांच्या मदतीला येतात. एखाद्या घरी कर्ता पुरुषमाणूस नसेल तर भावकीतले मोठे लोक पुढाकार घेऊन लग्नकार्य पार पाडतात तर कधी भांडणांमध्ये मध्यस्थी करतात. अशा कितीतरी प्रसंगांनी भरलेलं हे पुस्तक आहे.

काही गोष्टी मात्र खास आवडल्या
"बांधावरची बाभळ" मध्ये धनगरांचं जगणं आणि त्यांच्यावर झालेल्या चोरांच्या हल्ल्याची गोष्ट आहे. "भागू अक्का" ही रानमेवा विकणाऱ्या गरीब भागूचं व्यक्तिचित्र आणि गावातल्या माणुसकीचं चित्र आहे. "रामुतात्या" मध्ये घराकडे दुर्लक्ष करून राजकारण्यांच्या सतरंज्या उचलणाऱ्याचं उदाहरण दाखवलं आहे. "सुमीचं प्रेम" मध्ये नुकतीच वयात आलेली सुमी पैलवान संजय कडे आकर्षित होते आणि कशी लाईन मारते याचं मजेशीर वर्णन आहे. "पेसाटी" मध्ये गावच्या मस्तवालांना तोंड देणाऱ्या बाईची गोष्ट आहे. ह्यांमध्ये नाट्य आहे, उत्कंठा आहे आणि सुरुवात ते शेवट असा कथानकाचा प्रवास चांगला होतो.

पण बाकी बऱ्याच कथांमध्ये सुरुवात छान रंगवली आहे. त्यातून आपण मुख्य प्रसंगापर्यंत येतो. काहीतरी नाट्य घडणार असं आपल्याला वाटत असतानाच ते मुख्य नाट्य मात्र अगदीच दोन परिच्छेदात फार फार तर एका पानात उरकून टाकलं आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी विरस झाला.
अगदी सुरुवातीची शर्यती कथा बैलगाड्या शर्यतीवर आहे. त्यात बैलगाडा शर्यतीसाठी मालक आणि बैल जोडी कशी तयार होते याचं खूप छान वर्णन केलं आहे आता शर्यत कशी रंगणार म्हणून आपण पुढे वाचायला जातो तर ते पण अगदीच फुस्स होऊन संपून जातं.
"विश्वास" या गोष्टीमध्ये नवीन लग्न झालेलं जोडपं नवरीच्या माहेरी येतं. तेव्हा तिच्या घरी तिचा जुना मित्र येतो. त्याच्याबद्दल नवऱ्याला सांगते. नंतर हाच मित्र तिच्या सासरी येऊन, "मी तिचा बॉयफ्रेंड आहे" असं सांगतो. आता इथून पुढे खरं नाट्य सुरू होणार असतं. पण...घरात थोडा वाद होतो. नवरा मात्र बायकोची बाजू घेतो आणि सगळं संपतं.

तर पुस्तकातल्या काही गोष्टी या "गोष्टी" नसून तर खेड्यात नियमितपणे करणारे प्रसंग आहेत. उदाहरणार्थ "हरवलेली म्हैस" मध्ये एक म्हैस हरवते. तिचे मालक सगळे चिंतेत असतात. आणि संध्याकाळी ती म्हैस परत येते. "आणि सुपारी फुटली" मध्ये एका मुलीचा बघण्याचा कार्यक्रम, पसंती आणि देण्याघेण्याची बोलणी होतात इतकंच आहे. तर जणू याचा पुढचा भाग असावा असं "गावाकडचे लगीन" या कथेत मुलीला लहानपणापासून चांगलं वळण लावलं, घरच्या कामाची सवय लावली, मग स्थळ बघून लग्न ठरतं, लग्नाचे विधी होतात आणि मुलगी सासरी जाते असं सगळं वर्णन आहे. या सगळ्या गोष्टींमधलं वर्णन तो तो प्रसंग डोळ्यासमोर उभा करणारं आहे त्यामुळे वाचायला छान वाटतं. फक्त त्या गोष्टी न वाटता एखाद्याचा कौटुंबिक फोटो अल्बम आपण बघतो आहोत असं वाटतं.


या गोष्टींमधलं निवेदन प्रमाण भाषेऐवजी ग्रामीण भाषेतच केलेलं आहे त्यामुळे ते सगळे एकजनसी चांगलं वाटतं. बहुतेक कथांमध्ये प्रसंगांचा वेग चांगला आहे. थोडक्यात पण प्रसंग समजेल अशी शैली आहे. त्यामुळे आपण कुठेही रेंगाळत कंटाळत नाही.
काही पाने उदाहरणादाखल
अनुक्रमणिका

"बांधावरची बाभळ" गोष्टीतला धनगरांचा एका गावातून दुसऱ्या गावात गेल्यावर मुक्काम करण्याचा प्रसंग.


"म्हवू" मधला मधाचे पोळे काढण्याचा प्रसंग.

"पाणी" कथेतील नळावरचे भांडण

अशा एकूण वेगवेगळ्या ढंगाच्या गोष्टी आहेत. सगळ्या गोष्टींमध्ये खरंतर चांगलं कथाबीज आहे. पण वर म्हटलं तसं जितक्या ताकदीने पहिला भाग रंगवला आहे तितक्या ताकदीने पुढचा भाग रंगवला असता तर एक छान ग्रामीण कथासंग्रह मराठी वाचकांना मिळाला असता यात शंका नाही.


——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

ब्रँड गुरु (Brand Guru)

पुस्तक - ब्रँड गुरु (Brand Guru) लेखिका - जान्हवी राऊळ (Janhavi Raul) भाषा - मराठी (Marathi) पाने - १४२ प्रकाशन - बिग आयडिया पब्लिकेशन , मा...