वर्दीतल्या माणसाच्या नोंदी (Vardeetalya manasachya nondi)



पुस्तक - वर्दीतल्या माणसाच्या नोंदी (Vardeetalya manasachya nondi)
लेखक - सदानंद दाते (Sadanand Date)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १४४
प्रकाशन - समकालीन प्रकाशन. डिसेंबर २०२१
छापील किंमत - रु. २००/-
ISBN - 978-93-86622-78-5


"पोलीस" हा शब्द उच्चारल्यावर प्रत्येकाच्या मनात येणारे भाव वेगवेगळे असतील. सगळं नीट सुरु असताना अचानक "पोलीस आले" म्हणजे काहीतरी भानगड झाली असं वाटून भीती वाटेल. वादावादी झालेल्या, तक्रार झालेल्या ठिकाणी पोलीस आले की आता पापभिरू माणसाच्या मागेच नक्की लचांड लागणार; पंचनामा, साक्ष ह्यासाठी पोलीस स्टेशनच्या वाऱ्या कराव्या लागणार हे मनात येऊन त्रागा केला जाईल. "आता बघा, वरून फोन आला की नाहीतर पैसे दाबले की गुन्हेगार सुटणार" असा तुच्छतादर्शक स्वर निघेल. पण दंगल, जाळपोळ चालू असताना पोलीस आले की आश्वस्त वाटेल. देशविघातक आंदोलनाच्या वेळी पोलिसांनी लाठीमार, गोळीबार केला की "असंच सडकवलं ह्या लोकांना पाहिजे पोलिसांनी" असं म्हणून कौतुक केलं जाईल. एखाद्या अपहृत मुलाची सुटका केली, चोरटी टोळी पकडली, एन्काउंटर मध्ये गुंडाचा खात्मा केला की "भले शाब्बास, पोलिसांना आता सरळ मोकळा हात दिला पाहिजे" असं म्हणताना आश्वस्त वाटेल. तर नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात पोलीस जवान शहीद किंवा २६/११ च्या हल्ल्यात बलिदान देऊन अतिरेक्यांना थोपवणारे पोलीस दिसले की कृतज्ञतेने डोळे पाणावतील. पोलीस दलाबद्दल भावांनांचे हे कितीतरी रंग. प्रत्येक रंग आपापल्या जागी, आपापल्या वेळी तितकाच खरा. एका "खाकी वर्दी"मुळे आपल्याला इतके रंग दिसतात. तर ती वर्दी प्रत्यक्ष चढवल्यावर किती रंग दिसत असतील ?

खाकी वर्दीच्या आतल्या माणसाने स्वतःकडे बघितलं आणि इतरांनाही बघू दिलं तर काय दिसेल हे मांडणारं पुस्तक आहे - "वर्दीतल्या माणसाच्या नोंदी". पुस्तकाचे लेखक सदानंद दाते हे सध्या राष्ट्रीय तपास संस्थेचे (NIA) सध्याचे प्रमुख आहेत. ते १९९० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत ते ह्या पदावर असतील. त्या आधी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (ATS)चे प्रमुख होते. मुंबईत झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी अतुलनीय शौर्य दाखवले होते. त्याबद्दल त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्र पोलीस दलात अनेक महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केले आहे. सीबीआय मध्ये त्यांनी काम केले आहे. कर्त्यव्यदक्ष, कर्तबगार आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून पोलीस दलात आणि सर्वसामान्य लोकांमध्येही त्यांनी नावलैकिक मिळवलेला आहे.

अशा सदानंद दाते ह्यांनी पोलीस दलातल्या प्रवेशापासून पुस्तक लेखनापर्यंतच्या कालावधीतल्या महत्त्वाच्या अनुभवांबद्दल ह्या पुस्तकात लिहिले आहे. पण हे त्यांचे आत्मचरित्र नाही. गुन्हे शोधांची थरारक कथामाला नाही. पोलीस दलातल्या "आतल्या" खबरा सांगणारे पुस्तक नाही. प्रसिद्ध व्यक्तींची नावे घेऊन, लफडी बाहेर काढून, गौप्यस्फोट करून सनसनाटी निर्माण करणारे पुस्तकही नाही. बराच माल-मसाला हाताशी असूनही स्वयंपाक्याने सात्त्विक थाळी रांधावी तसे पुस्तकाचे सात्विक स्वरूप आहे. सात्विक, पौष्टिक, वैचारिक खाद्य वाचकाला मिळावे हा त्यांचा उद्देश आहे. चांगले - वाईट अनुभव जसे आले तसे गोपनीयतेच्या मर्यादेत राहून त्यांनी लिहिले आहेत. पोलीस दलात प्रवेश करणारा उमेदवार ते एक सक्षम अधिकारी हे जडणघडण कशी होत गेली, व्यक्तिमत्त्व विकास कसा होत गेला हे दाखवलं आहे. स्वतःकडे, पोलिसांकडे आणि व्यवस्थेकडे बघायचा दृष्टिकोन कसा परिपक्व होत गेला हे आपल्याला समजतं.

हे पुस्तक छोट्या छोट्या लेखांचा संग्रह आहे. एकेक मुद्दा घेऊन त्या संबंधीचे महत्त्वाचे प्रसंग, त्यांचे आधीचे विचार, त्यात झालेला बदल, कामाची परिणामकारकता अशा प्रकारे तो मुद्दा स्पष्ट केला आहे. उदा. पोलिसांवर असणारा राजकीय दबाव हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय. त्याबद्दल ते लिहितात ".. अनेकांना असं वाटतं, की पोलीस अधिकाऱ्यांना अनेक वरिष्ठांकडून किंवा राजकारण्यांकडून बेकायदा आदेश दिले जातात, आणि नोकरी टिकवण्यासाठी त्यांना ते पाळावेच लागतात. पण माझे प्रत्यक्ष अनुभव सांगतात की ते आदेश नसून विनंती असते. कारण आपण करायला सांगतोय ते बेकायदा असल्याची जाणीव त्या अधिकाऱ्यालाही असतेच. आपण सौम्यपणे 'हे शक्य नाही' असं सांगितलं तर आपल्यावर चुकीचं काम करण्याची सक्ती कोणीही करू शकत नाही. .... आपल्या शक्तीप्रमाणे आपण आपल्या आसापसाच्या गैरव्यवहारांची साखळी काही प्रमाणात तोडूही शकतो". अशाप्रकारे परिस्थितीचं वस्तुनिष्ठ स्वरूप ते लिहितात.

काही लेखांबद्दल सांगतो.
"पोलीस दलातला प्रवेश", "सुरवातीचे दिवस" - पोलीस दलात IPS अधिकारी म्हणून जॉईन झाल्यावर वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करायला मिळाले. रत्नागिरीला पहिल्याच दिवशी अधिकाऱ्याने थेट भाषणच द्यायला सुरुवात केली. "मोठ्या कामावर लक्ष द्या, दारू जुगाराच्या अड्ड्यांवर धाडी टाकण्यात धन्यता मानू नका ", वगैरे. पण लोकांच्या तक्रारी त्यासंबंधीच येऊ लागल्या. म्हणून कारवाई केली तर सहाव्या दिवशीच बदली ! पुढे विदर्भात नक्षलग्रस्त भागात काम करायला लागले/मिळाले. नक्षलग्रस्त शरण यावेत ह्यासाठी आदिवासींच्या साथीने जनजागृती केली ते अनुभव आहेत. आणि पोलीस भरती करताना स्थानिक राजकारण्याचा दबाव कसा आला हे अनुभव आहेत.

कामाचा भक्कम पाया : वाचन आणि मनन - यशस्वी माणसे भरपूर वाचतात. त्यावर चिंतन करतात. गुण आणि बदल आत्मसात करतात. सदानंद दाते त्या मालिकेतील एक. लहानपणापासून असलेली वाचनाची आवड त्यांनी पोलीस दलातल्या व्यग्र दिनाचर्येतही जोपासली आहे.

विरोधाभासांच्या राजधानीत, झेड सिक्युरिटीच्या अंतरंगात, पोलिसांची परीक्षा - उत्सवी गर्दी - हे सगळे लेख विशिष्ट प्रकारच्या बंदोबस्तावर आधारित आहेत. मुंबई महानगरात ड्युटी करताना, सण उत्सव, बंद, मोर्चे ह्यांना नेहमी तोंड द्यावं लागतं. जातीय दंगली होतात. एकेकडे श्रीमंत वस्ती तर दुसरीकडे अति गरिबी. थोड्या पैशांसाठी गुन्हेगारी करणारे लोक आढळतात. परिस्थती लवकरात लवकर निवळण्यासाठी पोलीस दलाला कुशल काम करावं लागतं. मुंबई दंगल, "मुंबई बंद", झोपडपट्टीवरची कारवाई असे हातघाईचे प्रसंग पुस्तकात आहेत. तत्कालीन उपपंतप्रधान अडवाणींच्या मुंबई दौऱ्याच्या उदाहरणातून अशा VIP दौऱ्यांसाठी प्रत्येक मिनिटाचे प्लँनिंग का आणि कसे करावे लागते हे समजते.

२६/११, फोर्स वनची जडणघडण - २६/११च्या हल्ल्याच्या वेळी दाते स्वतः कामा हॉस्पिटल मध्ये होते. तुटपुंज्या शास्त्रास्त्रांनिशी कसाब आणि इतर अतिरेक्यांना बराच काळ रोखून धरण्याची कामगिरी बजावली. तो प्रसंग त्यांच्या शब्दांतच वाचण्यासारखा आहे. ह्या हल्ल्यानंतर अशा प्रसंगाला तोंड देण्यासाठी विशेष पथक तयार केले गेले. त्यात सामील झालेल्या सदस्यांसाठी ध्येयधोरणे कशी ठरवली, ट्रेनिंग कसे दिले, गुणवत्ता कशी राखली याचे अनुभव सांगितले आहेत.

पुढच्या काही प्रकरणांत पोलीस दलातले चांगले अधिकारी कसे काम करत; त्यांचे वागणे बघून लेखकाने काय शिकवण घेतली हे सांगितले आहे. पोलीस दलातला भ्रष्टाचार त्यांनी नाकारला नाहीये. स्वतःच्या परीने भ्रष्टाचाराचा मुकाबला कसा केला, स्वच्छ वागणे कसे राखले, त्यासाठी कधी वरिष्ठांची नाराजी किंवा बदलीची शिक्षा मिळाली हे अनुभव लिहिले आहेत.

पोलिसांचे काम समाजापर्यंत पोचण्यासाठी पत्रकार, वृत्तपत्रे, दूरदर्शन वाहिन्यांची मदत होते. तर सनसनाटी बातम्या, पेरलेल्या बातम्या, खऱ्या घटनेला चुकीचा रंग देणे ह्याचा त्रासही पोलिसांना होतो. दात्यांनी केलेल्या पोलीस भरतीला असा चुकीचा रंग देऊन बातम्या प्रसारित केल्यावर ते अस्वस्थ झाले. पण ज्येष्ठ पत्रकार अरुण टिकेकर ह्यांच्या सल्ल्याने ह्या बातम्यांना किती महत्व द्यायचं ह्याचं तारतम्य वाढलं.

भ्रष्टाचार भारतीय समाजात अंतर्बाह्य मुरलेला आहे. राजकारणी आणि पोलीस हे त्याच समाजातून येतात म्हणून भ्रष्ट असतात. अशा सामाजिक परिस्थितीत बदल होण्यासाठी काय करावं लागेल; ते किती मोठं कार्य आहे; ह्याबद्दल त्यांचं चिंतन आहे. असा आदर्श समाज निर्माण व्हायला खूप वेळ लागेल. ह्या सामाजिक सत्याचा स्वीकार केला तरच किमान आपल्या हातातल्या गोष्टींमध्ये बदल घडवू शकू असे त्यांचे प्रतिपादन आहे. अशी परिपक्वता येण्यासाठी विपश्यनेचाही उपयोग झाल्याचा उल्लेख आहे. त्यांनी अमेरीकेत जाऊन वर्षभर अभ्यास केला, मग पी.एच.डी . मिळवली. ह्या अभ्यासातून त्यांनी पोलीस व्यवस्थेचे जागतिक भान मिळवले. हे सगळे अनुभव वाचताना कळते की नेहमीच्या पोलीस अधिकारी प्रतिमेपेक्षा ते का आणि कसे वेगळे ठरतायत.

काही पाने उदाहरणादाखल
अनुक्रमणिका


मुंबईतील झोपडपट्टी कारवाई वेळच्या बंदोबस्ताचा अनुभव



वरिष्ठांचा अहंकार दुखावल्यामुळे दिला जाणारा त्रास



पोलीस व्यवस्थेच्या दुरवस्थेबद्दल चिंतन



पोलीस खात्यातल्या स्वतःच्या प्रगतीसह स्वतःच्या मानसिक प्रगतीचा आणि पुढे सामाजिक प्रगतीचा आलेख मांडत हे पुस्तक पूर्ण होते. त्यामुळे हे पुस्तक फक्त वैयक्तिक अनुभवांच्या नोंदी न राहता एकूणच सध्याचा भारतीय समाजाबद्दलच्या नोंदी आहेत. नक्कीच वाचनीय आणि चिंतनीय आहेत. विशेष म्हणजे भाषा अतिशय प्रवाही आहे. प्रत्येक मुद्दा, प्रसंग थोडक्यात पण परिस्थितीची कल्पना येईल इतक्या तपशीलासह मांडला आहे. त्यामुळे कमी पानांतही मोठा आशय आहे.

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

रेडी फॉर टेक ऑफ (Ready for take off)



पुस्तक - रेडी फॉर टेक ऑफ (Ready for take off)
लेखक - सचित जैन (Sachit Jain)
अनुवाद - शुभदा पटवर्धन (Shubhada Patawardhan)
भाषा - मराठी
मूळ पुस्तक - Ready for take off (रेडी फॉर टेक ऑफ)
मूळ पुस्तकाची भाषा - English (इंग्रजी)
पाने - २६१
प्रकाशन - मनोविकास प्रकाशन ऑगस्ट २०१२
छापील किंमत - रुपये २५०/-
ISBN 978- 93-81636-98-5

लहानपणी आपण पंचतंत्र, इसापाच्या गोष्टींमधून कसे वागावे, कसे वागू नये , कसे जगावे याचे धडे शिकत असतो. गोष्टीरुपात सांगितल्यामुळे आपल्याला वाचताना मजा येते आणि त्या गोष्टीचे तात्पर्य मनात उतरते. कुठलाही जड उपदेश असा गोष्टीच्या स्वरूपात किंवा गोष्टीच्या वेष्टनात दिला की तो जास्त सुसह्य होतो हा आपला नेहमीचा अनुभव आहे. याचाच पुढचा प्रकार म्हणजे कथेच्या आडून उपदेश न देता प्रत्यक्ष कथेमध्येच दोन-तीन पात्रांच्या संवादातून एखादी गहन चर्चा घडवून आणली जाते. वाचकाला नीतिनियमांचं थेट शिक्षण दिलं जातं. भारतीय परंपरेमधील रामायण महाभारतासारखे ग्रंथ, संस्कृत काव्य किंवा ऐतिहासिक राजांनी लिहिलेले ग्रंथ बघितले तर दोन पात्रांच्या संवादात वेगवेगळ्या मुद्द्यांवर गहन चर्चा झालेली आढळते. राजाने कसे वागावे, ऋषीमुनींनी कसे वागावे, संसारी माणसाने काय करावे काय टाळावे याची सूत्रे तिथे असतात. अगदी भगवद्गीता हा सुद्धा कृष्ण-अर्जुनाचा संवाद महाभारताच्या मध्ये आहे. भीष्म-युधिष्ठिर संवाद विदुराचे संवाद, रामायणातील वालीचा प्रसंग, रावणाच्या अंतिम वेळचे संवाद यातून वेगवेगळे विषय वाचकांसमोर मांडले आहेत. हीच परंपरा चालवत आधुनिक व्यवस्थापनशास्त्राचे धडे देण्याचे काम सचित जैन यांनी "रेडी फॉर टेक ऑफ" पुस्तकात केले आहे.

ही एक काल्पनिक कादंबरी आहे. पण त्याला लेखकाच्या स्वानुभवाची जोड आहे. पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार स्वतः सचित जैन उच्चविद्याविभूषित आहेत आणि त्यांनी वर्धमान ग्रुप नावाच्या कंपनीत व्यवस्थापन उत्पादन, मार्केटिंग, इ. आर. पी. इम्प्लिमेंटेशनअशा विविध विभागांचे नेतृत्व केले आहे. या स्वानुभवातून त्यांनी एका कंपनीच्या प्रमुखाची कथा आपल्यासमोर मांडली आहे.

या कथेचा नायक अनुराग हा आय आय एम अहमदाबाद मधून एमबीए केलेला, दिल्लीच्या स्टीफन्स कॉलेज मधून अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केलेला आहे. व्यवसायाने इन्व्हेस्टमेंट बँकर. सिटी बँकेसारख्या नावाजलेल्या संस्थेत आर्थिक विश्लेषक, इन्व्हेस्टमेंट सल्लागार, मर्जर - टेक ओव्हर वगैरे करोडोंच्या उलाढाली मध्ये काम करणारा. पण त्याला प्रत्यक्षात एखादी कंपनी चालवण्याचा अनुभव नाही. तशी इच्छाही नाही. त्याची ओळख अरुण सेहगल नावाच्या प्रसिद्ध "टेक ओव्हर टायकून" यांच्याशी झाली आहे. यास हे गल्ली अजंता स्टील नावाची कंपनी विकत घेतली आहे. पूर्वी चांगली चालणारी पण आता व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळे अकार्यक्षमतेमुळे डबघाईला आलेली ही कंपनी चांगली चालवून ती नावारूपाला आणावी असा सेहगल यांचा मानस असतो. त्यासाठी योग्य माणूस म्हणून ते अनुरागची निवड करतात. कंपनी चालवण्यात सर्वस्वी नवखा असणारा अनुराग हो नाही करता करता एकदाची ती जबाबदारी स्वीकारतो. आपलं शिक्षण, इतक्या वर्षांचा अनुभव, जुन्या सहकाऱ्यांचा सल्ला व पत्नीचा सल्ला घेत घेत कंपनीचं नेतृत्व करायला लागतो. कंपनी हळूहळू सुधारू लागते .दीड दोन वर्षातच कंपनी तोट्यातून बाहेर येते आणि पुढे मोठी झेप घेण्यास सिद्ध होते. "रेडी फॉर टेक ऑफ" होते. हा प्रवास आपल्याला कादंबरीत दिसतो.

इथे अनुराग स्वतःच आपली गोष्ट सांगतोय. स्थिरस्थावर झालेल झालेलं करियर आणि लठ्ठ पगाराची नोकरी सोडून अनोळखी भूमिका स्वीकारताना त्याची घालमेल होते. पण सेहगल, त्याची पत्नी ह्यांचा त्याच्यावरचा विश्वास व प्रोत्साहन; स्वतःचं चिंतन यातून शेवटी तो ही जोखीम स्वीकारायला तयार होतो. कंपनीचा प्रमुख म्हणून आता त्याच्याकडे निर्णय घेण्याची शक्ती आहे. जबाबदारी आहे. तो म्हणेल तसं लोक आता वागणार आहेत. त्यामुळे त्याचा प्रत्येक निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. तो सुरुवातीला ही कंपनी नक्की कशी चालते, स्टील उत्पादन कसं होतं हे सगळं आपल्या हाताखालच्या लोकांकडून समजून घेतो. आधीच्या व्यवस्थापनाने कशी कार्यशैली ठेवली आहे हे समजून घेतो. त्यात काय बदल करायला लागतील याची चाचणी करायला लागतो. आय एम मध्ये शिकताना घेतलेला पुस्तकी अनुभव, इतर मित्रांचे सल्ले आणि कंपनीतल्या लोकांची प्रत्यक्ष भेटीगाठी यातून धडपडत तो स्वतःचा मार्ग चोखाळतो. परिस्थिती वरती आपली मांड ठोकतो. हा प्रवास वाचणे रंजक आहे.

प्रसंगाच्या ओघात अनुराग वेगवेगळ्या विभाग प्रमुखांशी चर्चा करतो. कर्मचाऱ्यांशी मीटिंग घेतो. कंपनीत काय चांगलं चालू आहे, काय वेगळं करायला पाहिजे, मॅनेजमेंटची तत्त्व काय, ती कशी अमलात आणता येतील, त्यासाठीची आव्हाने काय अशी सगळी चर्चा होते. ही सगळी चर्चा म्हणजे; सुरुवातीला मी म्हटलं तसं, व्यवस्थापनशास्त्राचे धडे आहेत. एखाद्या कंपनीच्या मिनिट्स ऑफ मीटिंग असाव्यात त्या पद्धतीने मुद्दा क्रमांक एक, मुद्दा क्रमांक दोन, मुद्दा क्रमांक तीन असे मुद्दे क्रमवार मांडले आहेत. मग, "मी असं म्हणालो", "श्री शर्मा असं म्हणाले", "श्री अग्निहोत्री असं म्हणाले" , "अरुणने हा प्रश्न उपस्थित केला"; अशी ती चर्चा शब्दांकित केलेली आहे. अनुराग एखादी कल्पना सांगतो. इतर लोक त्याला प्रश्न विचारतात. असं लिहीत तो तो मुद्दा स्पष्ट केला आहे. अनुरागला जेव्हा एखादा निर्णय घेणे अवघड जातं, काय करावं याबद्दल त्याच्या मनात गोंधळ होतो तेव्हा तो त्याची बायको, त्याची मित्रमंडळी यांच्याबरोबरही बोलतो. ती चर्चाही व्यवस्थापन शास्त्राच्या संकल्पनांभोवतीच घडते. तिथेही पुन्हा मुद्दा क्रमांक एक- दोन - तीन अशा पद्धतीने वर्णन आहे.

अनुरागला दोन मुली आहेत. त्या वयात येण्याच्या बेतात आहेत इतकी वर्षे करिअरच्या मागे धावताना मुलींना द्यायला पुरेसा वेळ मिळालेला नाही. त्याची चुटपुटही त्याला कधी कधी लागते. त्या प्रसंगात व्यवस्थापन शास्त्रातल्या संकल्पना घरगुती वातावरणातही कशा वापरता येतील असा विचार त्याच्या मनात येतो. बायकोशी झालेल्या संवादात तो भाग येतो.

कंपनीचा प्रमुख म्हणून काम करताना आर्थिक आणि तांत्रिक आव्हानांबरोबरच मानसिक आव्हाने कशी असतात हे आपल्या लक्षात येतं. निर्णय घेताना होणारी घालमेल, अनोळखी परिस्थितीत जोखीम उचलताना होणारा त्रास, बॉस म्हणून लोकांशी जाणून-बुजून कठोरपणे कसं वागावं लागतं हे कळतं. "नवा गडी नवं राज्य" या उक्तीप्रमाणे बॉस बदलला की सगळ्या कंपनीचं वातावरण बदलतं, संस्कृती बदलते. लोक काही वेळा ती नाईलाजाने स्वीकारतात पण नंतर त्याचा उपयोग झालेला दिसल्यावर खुशही होतात. कंपनीच्या मालकीत झालेला हा बदल मध्यमस्तरीय आणि अगदी खालच्या कामगारवर्गात कसा झिरपतो हे कादंबरीत दाखवलं आहे.

काही पाने उदाहरणादाखल

अनुक्रमणिका



कंपनीत आणि स्वतःत काय बदल केले ते अनुराग सेहगल ला सांगतो तो प्रसंग



अनुरागची मुलगी सहज सांगून जाते की "मला बॉयफ्रेंड आहे, हल्ली सगळ्यांनाच असतात", तेव्हा त्याचा आणि बायकोचा संवाद




वेळ, श्रम फुकट घालवणाऱ्या मूल्यरहित कामांबद्दलची चर्चा



एकूण कादंबरीची रचना मला आवडली. जिथे थेट शिकवण आहे तिथे सुद्धा ती ललित अंगाने, लोकांच्या भावभावना टिपत मांडल्यामुळे रुक्ष झालेली नाही. वाचायला चांगली वाटते. कंपनी मधल्या फॉर्मल मीटिंगमध्ये अशा पद्धतीने मुद्देसूच चर्चा होणं, लोकांना जबाबदारी देणं, पुनरावलोकन करणं हे सगळं अतिशय नैसर्गिक आहे. त्यामुळे कादंबरीच्या फ्लोमध्ये ते व्यवस्थित बसतं. पण अनुराग आणि त्याची बायको किंवा अनुराग आणि त्याचे मित्र यांच्यातल्या चर्चा सुद्धा मुद्दा एक, मुद्दा दोन, मुद्दा तीन अशा पद्धतीने मांडल्या आहेत ते फारच ओढून ताणून बसवलेलं वाटतं. ते अजून थोडं अप्रत्यक्ष पद्धतीनेच लिहायला हवं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे बॉस म्हणतोय म्हणून लोकांनी त्या निर्णयाची अंमलबजावणी करणं योग्यच आहे. पण इच्छा नसताना जेव्हा काम करावं लागतं तेव्हा त्यात टंगळमंगळ होणं, चुका होणं किंवा कामातल्या अडचणींबद्दल तक्रारी केल्या जाणंही स्वाभाविक आहे. पण पुस्तकात मात्र त्या पैलूचा फार विचार नाही. लोकांना बॉसचं म्हणणं पटतं ते पूर्ण क्षमतेने कामाला लागतात; काही छोटे मोठे बदल करतात आणि झटपट रिझल्ट मिळतात. असं फारच गुडी-गुडी वातावरण आहे. कादंबरीत असा उल्लेख आहे की पूर्वीचे व्यवस्थापन हे कामगारांशी कामगार संघटनेतल्या नेत्यांच्या माध्यमातून बोलायचं. त्यांना टाळून जाणं खूप कठीण आहे असा इशारा विभाग प्रमुख अनुरागला देतात. तरी अनुराग या पद्धतीत बदल करतो आणि थेट कामगारांशी संवाद साधतो. अशावेळी कामगार पुढाऱ्यांमध्ये नाराजी पसरणं; त्यांनी कामगारांना भडकवणं किंवा थेट अनुरागशी वाद घालणं अपेक्षित आहे पण पुस्तकात तसं काही दिसत नाही. सगळं सहजगत्या होतं. व्यवस्थापन शास्त्रातल्या संकल्पना प्रत्यक्ष राबवणं अतिशय सोपं आहे, लोकांच्या मानसिकतेत बदल करणे सोपं आहे असाच आपला समज होईल.

योगायोगाने, मी जिथे काम करतो ती कंपनी सुद्धा दुसऱ्या कंपनीने अधिकग्रहीत केली. त्यामुळे हे पुस्तक वाचताना मी अनुराग च्याजागी आमच्या कंपनीचे नवे व्यवस्थापन आल्यावर त्यांनी पण असाच विचार केला असेल का? असेच निर्णय घेतले असतील का? अशी तुलना करत होतो. आमच्याही नव्या कंपनीप्रमुखाची व्यवस्थापनशैली खूप वेगळी आहे. ती राबवताना मोठ्या प्रमाणावर कामगार कपात करावी लागली. त्यामुळे लोकांच्या मनात कायम धाकधूक असते. दोन वर्षे झाली तरी नव्या संस्कृतीशी जुळून घेताना सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना अडचणी आहेत. अधिग्रहणाची ही बाजू मांडण्यात पुस्तक कमी पडतं. इथे अनुरागचं आत्मनिवेदन असल्यामुळे इतरांच्या भावभावना मांडण्याची मुभा निवेदनाला नाही. त्याऐवजी त्रयस्थ निवेदकाच्या भूमिकेतून पुस्तक लिहिलं असतं तर हा पैलू ही जोरकसपणे मांडता आला असता असं मला वाटलं.

व्यवस्थापन शास्त्राबद्दल ललित प्रकारात लिहिलेलं मराठी पुस्तक दिसत नाहीत. त्यादृष्टीने हा अनुवाद मराठी साहित्यात वेगळी भर टाकतो आहे. शुभदा पटवर्धन ह्यांनी अनुवाद चांगला केला आहे. बहुतेक सर्व तांत्रिक संज्ञा मराठीतूनच लिहिल्या आहेत. पण सध्या तांत्रिक बाबतीत इंग्रजीच्या सवयीमुळे मनातल्या मनात उलट इंग्रजी भाषांतर केलं की ते लगेच लक्षात येतं. त्यात अनुवादिकेचा काही दोष नाही. शक्य तितक्या सोप्या मराठीतच त्यांनी लिहिलं आहे.

असं हे वेगळ्या धाटणीचं पुस्तक वाचून बघा. त्यातली काही तत्वे नवीन असतील तर काहींची उजळणी होईल. व्यवस्थापन विषयक काही वाचायची इच्छा असेल तर हे पुस्तक निवडून बघू शकता.

हॅशटॅग दिवाळी अंक २०२५ (Hashtag Diwali issue 2025)



पुस्तक - हॅशटॅग दिवाळी अंक २०२५ (Hashtag Diwali issue 2025)
संकल्पना व प्रकाशक - पुंडलिक पै. पै फ्रेंड्स लायब्ररी, डोंबिवली (Pundalik Pai. Friend's Library Dombivli)
संपादक - डॉ. योगेश जोशी (Dr. Yogesh Joshi)
अतिथी संपादक - डॉ. विठ्ठल कामत (Dr. Viththal Kamat)
निर्मिती सहाय्य - डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन (Dr. Shrikant Shinde Foundation)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - २०२
छापील किंमत - रु. ३००/-
ISBN - दिलेला नाही


"पै फ्रेंड्स लायब्ररी" हे डोंबिवलीतील लोकप्रिय वाचनालय आहे. नेहमीच्या पुस्तकांबरोबरच दिवाळीच्या दिवसांत दिवाळी अंक सुद्धा तिथे वाचायला उपलब्ध असतात. तेही मोठ्या प्रमाणात. पण फक्त पुस्तके वाचायला उपलब्ध करून देऊन न थांबता वेगवेगळे साहित्यिक उपक्रम करून वाचनसंस्कृती वाढवणारे हे वाचनालय आहे. "बुक स्ट्रीट", "पुस्तक आदान प्रदान", पुस्तक प्रदर्शने, पुस्तक प्रकाशने, मुलाखती, सादरीकरणे, मुलांसाठी गोष्ट वाचन असे नवनवीन आणि रंजक उपक्रम. (https://www.facebook.com/friendslibrary वर तुम्हाला फोटो बघता येतील). दिवाळी अंकांच्या कालावधीची सुरुवात पण धूमधडाक्यात "दिवाळी अंक पूजनाने होते". हे सगळे उपक्रम " फ्रेंड्स लायब्ररी"चे पुंडलिक पै अर्थात "पै काका" राबवत असतात. गेल्यावर्षीपासून ह्या उपक्रमांत भर पडून स्वतःचा आता दिवाळी अंक काढायलाही सुरुवात केली आहे. पै काकांनी मला हा अंक वाचायला उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार.


ह्या वर्षीच्या अंकाचा विषय आहे "प्रवास". पण हा प्रवास म्हणजे "प्रवासवर्णन", "स्थळ वर्णन" इतकाच मर्यादित नसून; तो व्यक्ती, संस्था, उपक्रम, तत्वज्ञान, उद्योगक्षेत्र ह्यांची उभारणी, विकास कसा झाला ह्याचा मागोवा; ह्या अर्थी आहे. त्यामुळे दिवाळी अंक माहितीपूर्ण आणि वैचारिक लेखांची मेजवानी झाला आहे.


अनुक्रमणिकेवर एक नजर टाका.


चाळीस लेख आणि दोनशेहून अधिक पाने असल्यामुळे प्रत्येक लेखाची माहिती देणं जरा कठीण आहे. पण काही लेखांची माहिती देतो म्हणजे वैविध्याची आणि मजकुराच्या दर्जाची कल्पना येईल.

पहिला लेख "व्रतस्थ व पर्यावरणस्नेही व्यवसायिकाची यशोगाथा". हा लेख विठ्ठल कामतांची मुलाखत आणि माहिती असा मिश्र आहे. पंचतारांकित हॉटेलची साखळी उभी करणारे विठ्ठल कामत हे लोकप्रिय व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी उद्योगाची सुरुवात का केली, लहानपण कसं होतं, उद्योग विस्तारातले मोठे टप्पे कुठले ह्याबद्दल थोडक्यात पण महत्त्वाची माहिती मिळते. अशाच प्रकारे अजून काही उद्योगांवर लेख आहेत. उदा. घरात कपडे वाळत घालण्यासाठी सोपी योजना पुरवणारे "ईझीड्राय" , "पितांबरी", डोंबिवलीतील प्रसिद्ध "कानिटकर लाडूवाले" आणि "हेमंत सुगंधी भांडार" आणि अजून काही उद्योग ह्यांवरचे लेख आहेत. एक छोटी पण सर्वांना आवश्यक अशी गोष्ट कल्पकतेने तयार करून सुरु झालेले हे उद्योग आता चांगलेच नावारूपाला आले आहेत. त्यांचा प्रवास समजून घेणं ज्ञानवर्धक आहे.

एकनाथ शिंदे, नितीन गडकरी, सुषमा स्वराज, एकनाथ शिंदे, श्रीधर फडके, रामदास फुटाणे, अशोक पत्की, हृदयनाथ मंगेशकर आणि अजून काही नामवंतांच्या जीवन प्रवासाबद्दल लेख आहेत.

रेल्वे विषयक दोन लेख आहेत. आशियातील पहिल्या महिला मोटरमन सुरेखा यादव ह्यांच्यावर एक लेख आहे. तर "रुळानुबंध" पुस्तकाचे लोकप्रिय लेखक आणि स्वतः इंजिन ड्रयव्हर असणाऱ्या गणेश कुलकर्णी ह्यांनी जगात रेल्वे कशी सुरु झाली, तिच्या तंत्रज्ञानात महत्वाचे बदल कसे झाले, ती पूर्वीपेक्षा जास्त वेगवान, सुरक्षित, आरामदायी कशी झाली ह्याची रोचक माहिती देणारा लेख लिहिला आहे... "रेल्वेचा प्रवास". "मेट्रो वुमन" अश्विनी भिडे ह्यांच्यावर एक लेख आहे. तर मुंबईच्या बेस्ट बसमधील प्रवासाचे किस्से सांगणारा रवी प्रकाश कुलकर्णी ह्यांचा लेख आहे. लता मंगेशकर तरुणपणी गाण्याचा रियाज करण्यासाठी बेस्ट प्रवास कसा करत; नूरजहाँच्या आठवणी असे अपरिचित किस्से ह्यात वाचायला मिळतील.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी निमित्ताने "शताब्दी प्रचारक संकल्पनेची" असा लेख ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर ह्यांनी लिहिला आहे. सु. ग. शेवडे, सच्चिदानंद शेवडे, परीक्षित शेवडे ह्या एकाच कुटुंबातील तीन पिढ्या आपल्या लेखन व वक्तृत्वातून राष्ट्रपेमी विचारांच्या प्रचार-प्रसारासाठी कसे काम करतायत हा "कौटुंबिक प्रवास" एका लेखात आहे. अजून एकदोन सामाजिक कामांची चांगली माहिती देणारे लेख आहेत.

वाचकांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या ग्रंथाली प्रकाशन आणि चळवळीच्या सुवर्णमहोत्सवी वाटचाली बद्दल एक लेख आहे. "कॉर्पोरेट दिंडी" पुस्तक, टाटा समूह, विशेषतः रतन टाटांबरोबर केलेल्या कामाच्या अनुभवांवरच्या व्याख्यानांसाठी जास्त प्रसिद्ध असलेल्या माधव जोशींनी वेगळ्याच विषयांवर लेख लिहिले आहेत. ते म्हणजे ज्ञानेश्वरीचे रसग्रहण आणि "भारतीय शास्त्रीय संगीताची वाटचाल".

क्रीडा विषयक "भारतीय क्रिकेटचा इतिहास" असा कौस्तुभ चाटेंचा लेख आहे. ते स्वतः क्रिकेटला वाहिलेला "क्रिककथा" असा दिवाळी अंक काढतात. त्यांच्या व्यासंगाची ओळख ह्या लेखातून होईल. सचिन तेंडुलकरचे गुरु रमाकांत आचरेकर ह्यांच्यावर एक छोटा लेख आहे.

काही पाने उदाहरणादाखल
विठ्ठल कामतांच्या आठवणी



श्रीधर फडके आणि शांता शेळके ह्यांनी एकत्र काम केले ते प्रसंग


रेल्वे इंजिनांच्या विद्युतीकरणाचा प्रवास


"बायको गेली माहेरी काम करी पितांबरी" अशा पितांबरीचा प्रवास


"भारतीय क्रिकेटचा इतिहास"


अशाप्रकारे साहित्य, संस्कृती, कला, क्रीडा, उद्योग, चित्रपट, संगीत, रेल्वे -मेट्रो, सामाजिक कार्य अशा आपल्या आयुष्याच्या नानाविध अंगांना स्पर्श करणारा हा दिवाळी अंक आहे. लेख लिहिणारे सुद्धा मान्यवर, अभ्यासू अशी व्यक्तिमत्त्वे आहेत. प्रत्येक पान वाचनीय, माहितीपूर्ण आहे. ह्यावर्षीच्या दिवाळी अंकांच्या वाचनीय अंकांच्या यादीत "हॅशटॅग"चा नक्की समावेश करा.

अंक विकत घेण्यासाठी अंकात दिलेली माहिती पुढीलप्रमाणे


——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

जॅपनीझ रोझ (Japanese Rose)



पुस्तक - जॅपनीझ रोझ (Japanese Rose)
लेखिका - रेई किमुरा (Rei Kimura)
अनुवाद - स्नेहल जोशी (Snehal Joshi)
भाषा - मराठी (Marathi)
मूळ पुस्तक - Japanese Rose (जॅपनीझ रोझ)
मूळ पुस्तकाची भाषा - English (इंग्रजी)
पाने - १८९
प्रकाशन - मेहता पब्लिशिंग हाऊस. फेब २०१२
छापील किंमत - रु. २००/-
ISBN - 978-81-8498-334-0

दुसऱ्या महायुद्धाचे दिवस. जपानची बाजू आणि विरुद्ध बाजू ह्यांची चांगलीच जुंपलेली. एकीकडे युरोपवर बॉम्बवर्षाव होतोय तर दुसरीकडे जपानवर. राजधानी टोकियोही त्यातून सुटलेली नाहीये. जपानची आगेकूच आग्नेय आशियात चालू आहे. पर्ल हार्बर वर जपानने हल्ला करून अमेरिकेला अचानक मोठा दणका दिला आहे. युद्ध अजून भडकतं आहे. अजून सैनिक युद्धात पाठवा, अजून विमानं हल्ल्यात उतरवा !! आता मूळचं सैन्य कमी पडू लागल्यामुळे सक्तीची सैन्य भरती सुरु झाली आहे. अठरा वर्षांचे धडधाकट तरुण सक्तीने सैन्यात पाठवले जातायत. प्रचार असा होतोय की ; आपला देश संकटात आहे. जपानची, सम्राटाची इभ्रत वाचवण्यासाठी प्रत्येकाने त्याग केला पाहिजे. सर्व उद्योगधंदे आता सैनिकी कामासाठी वळवले पाहिजेत. तरुण मुलं, त्यांच्या आया, त्यांच्या प्रेयसी सगळेच मानसिक उद्धवस्तता अनुभवतायत. एकीकडे देशासाठी काहीतरी केल्याचे समाधान तर दुसरीकडे स्वतःचे तारुण्य, स्वतःची स्वप्ने आणि जिवलग ह्यांना कायमचे मुकण्याची खात्री. एकीकडे देशभक्तीची लाट आणि दुसरीकडे स्वतः गोळ्याखाऊन मरणे किंवा दुसऱ्याला मारणे ह्या विचारानेच गर्भगळीत होणे.

अशाच अस्वस्थ वातावरणात नायिका "सायुरी मायामोटो" आणि तिची मैत्रीण "रैको" आहेत. त्या टोकियोपासून दूर गावात राहतायत. "सायुरी"चा भाऊ आणि रैकोचा होणारा नवरा सैन्यात जबरदस्ती भरती झाले आहेत. आता त्यांना आपण जवळजवळ गमावलंच ह्या भावनेने त्या दोघी त्या दोघांना भेटायला टोकियोला निघतात. युद्ध, बॉम्बहल्ला, रक्तबंबाळ नागरिक, छिन्न विछिन्न देह त्या प्रत्यक्ष अनुभवतात. जीवनावश्यक वस्तूंचाच नव्हे तर जीवनाचाच जिथे भरवसा नाही अशा अवस्थेत घसरत चाललेली नैतिकताही त्या बघतात.

दुर्दैवाने "सायुरी"चा भाऊ, रैकोचा होणारा नवरा आणि रैको हे तिघेही वेगवेगळ्या बॉंबहल्ल्यात मरण पावतात. हे युद्ध आता "सायुरी"चं वैयक्तिक युद्ध होतं. शत्रू सैन्याविरुद्ध तिच्या मनात सूडाग्नी पेटतो. आपणही सैन्यात जाऊ. शत्रूला मारताना मरून जाऊ हा विचार तिच्या मनात घर करतो. पण सैन्यात स्त्रियांना तेव्हा प्रवेश नव्हता. मग ती ठरवते पुरुष वेषांतर करून सैन्यात घुसायचं. तिचा तो प्रयत्न यशस्वीही होतो. शत्रूवर हल्ला करण्याची संधीही मिळते. ती "कामिकाझी" पायलट - म्हणजे शत्रूवर विमान आदळवून आत्मघातकी हल्ला करणारा पायलट - बनते.

पण ऐन युद्धाच्या धामधुमीत, वेषांतराच्या आत दडलेलं तिचं स्त्रीमन एकाकडे आकर्षित होतं. देशासाठी काहीतरी करायचं पण ह्या युद्धाचा देशाला खरंच काही फायदा होतोय का ? जिवलगांचा सूड घ्यायचा, का आपलं प्रेमजीवन खुलवण्यासाठी जिवंत राहायचं ? वेषांतर उघड झालं तरी सैन्याला फसवणुकीची जबर शिक्षा आणि दिलेल्या कामगिरीत नापास झालो तरी जबर शिक्षा. काय होईल सायुरीचं ? ते समजून घेण्यासाठी ही कादंबरी नक्की वाचा.

पुरुष म्हणून सैन्यात भरती होणे, ते निभावताना आलेली आव्हाने, मानसिक आंदोलने हे लेखिकेने अगदी समरसून लिहिलं आहे. सायुरीचं सोंग आता उघडकीस येतंय की काय अशी धाकधूक आपल्याला वाटते. वेषांतर आणि त्याचे परिणाम हा जरी कादंबरीचा कळसाध्याय असला तरी सैन्यात जायच्या निर्णयापर्यंत पोचण्याचा सायुरीचा प्रवास हा सुद्धा तितकाच परिणामकारक आहे. टोकियोवरच्या हल्ल्यामुळे होणारा विध्वंस, नर्स म्हणून काम करताना जखमी आणि मृतांची अवस्था हे प्रसंग वाचताना अंगावर काटा येतो. वाचताना आपणही त्या युद्धग्रस्त जपानमध्येच आहोत असंच वाटू लागतं. तिचा भाऊ, तिची आई, वडील, रैको ह्या प्रत्येकाची अगतिकता, हातातून वाळूसारखं निसटून चाललेलं आयुष्य वाचताना आपणही अस्वस्थ होतो. पुढे काय होईल ह्याच्या उत्सुकतेने वाचत राहतो. दुसरं महायुद्ध आणि तेव्हा झालेली हानी हा घडून गेलेला इतिहास आहे, तो काही बदलता येणार नाही. पण पुस्तक वाचताना वाटत राहतं की काहीतरी आता पुढे काहीतरी चमत्कार घडेल आणि ती सर्व पात्र सुखाने पुन्हा नांदू लागतील. लेखिकेच्या लिखाणाची ही ताकद आहे.
इंटरनेटवरच्या माहितीनुसार ही सत्य घटना नाही. काल्पनिक कादंबरी आहे.

काही पाने उदाहरणादाखल

लेखिकेची पुस्तकात दिलेली माहिती

सक्तीच्या सैन्य भरतीमुळे पसरलेली विकलता



"हिरो मियामोटो"ह्या नावाने वावरणाऱ्या सायुरी आणि प्रशिक्षक ताकुशी ह्यांच्यातील एक प्रसंग.


अयशस्वी "कामिकाझी" पायलटची चौकशी. "कामिकाझी"ने "जिंकू किंवा मरू"हाच बाणा बाळगला पाहिजे. तिसरा पर्याय नाही.



नुकत्याच झालेला भारत-पाक संघर्ष, तेव्हा शिगेला पोचलेली देशभक्ती आणि युद्धसदृश परिस्थिती ह्याची आठवण झाली. 'पाक'ला धडा शिकवा, आरपार युद्ध करा, "होऊन जाऊ दे" ची मागणी करणारे लोक युद्धाबाबत, त्याने शहरोशहरी, घरोघरी निर्माण होऊ शकणाऱ्या विक्राळ परिस्थितीबाबत खरेच संवेदनशील होते का ? ह्याच नाही, कुठल्याही दोन देशांत युद्ध होईल तेव्हा देशभक्ती-स्वाभिमान-त्याग आणि वैयक्तिक सुख-भविष्याची ओढ-मरण्यामारण्याची भीती ह्यांची रस्सीखेच अशीच होईल ना ! ह्यदृष्टीने हे पुस्तक जपानची, सायुरीची गोष्ट राहत नाही. तर प्रत्येक माणसाची होते.

स्नेहल जोशी ह्यांनी केलेला मराठी अनुवाद अगदी योग्य. मूळ मराठी पुस्तकच वाटावं असा हा अनुवाद आहे.


——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

संघातील मानवी व्यवस्थापन (Sanghatil Manavi Vyvasthapan)



पुस्तक - संघातील मानवी व्यवस्थापन (Sanghatil Manavi Vyvasthapan)
लेखक - नितीन गडकरी आणि शैलेश पांडे (Nitin Gadkari & Shailesh Pande)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १५१
प्रकाशन - राजहंस प्रकाशन, एप्रिल २०२५
छापील किंमत - रू. २५०/-
ISBN 978-81-19625-88-8

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नुकतीच (विजयादशमी २०२५) आपली शताब्दी पूर्ण केली. ह्यानिमित्ताने संघाची स्थापना, शंभर वर्षांचा प्रवास ह्याबद्दल विविध माध्यमात चर्चा होत आहे. नागपूरला मोजक्या लोकांनिशी सुरु झालेली संघटना इतकी वर्षे कशी चालली, वाढली आणि भारतीय समाजकारणात-राजकारणात इतकी महत्त्वाची कशी झाली ह्याचं अप्रूप, कौतुक अनेकांना आहे. त्याचवेळी द्वेष आणि असूयाही आहे. संघाचे योगदानाबद्दल अनेकांना कौतुक आहे तर संघ-विचारांना अनेकांना पराकोटीचा विरोधही आहे. बऱ्याच वेळा ही चर्चा एकतर्फी होते. म्हणजे संघाकडून अधिकृतरित्या प्रत्येक वादविवादावर उत्तर दिलं जात नाही. मात्र संघाशी संबंधित व्यक्ती आपली मते, संघाची मूल्ये प्रकट करतात. अशा प्रकटीकरणात एक महत्त्वाचं पुस्तक नुकतंच प्रकाशित झालेलं दिसलं ते म्हणजे नितीन गडकरी लिखित "संघातील मानवी व्यवस्थापन". नितीन गडकरी हे - रोडकरी , पूलकरी , टोलकरी, विकासपुरुष - अशा नावांनी प्रसिद्ध असलेले केंद्रीय मंत्री आहेत. लहानपणापासून संघ स्वयंसेवक, तरुण वयात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) चे कार्यकर्ते मग भाजपचे कार्यकर्ते, नेते, राष्ट्रीय अध्यक्ष इतकंच काय पंतप्रधान पदासाठी भाजपमधील योग्य व्यक्तींपैकी एक अशी ख्याती मिळवणारे आहेत. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने संघ कसा आहे हे बघणं औचित्यपूर्ण आहे.

हे पुस्तक संघाचा कालसूत्रबद्ध इतिहास नाही तर संघाच्या स्थापनेचे कारण, ध्येय, कार्यपद्धती, वेळोवेळी होत गेलेला बदल ह्या सगळ्यामागे काय तत्वज्ञान आहे ह्यावर भर देणारे आहे. त्याहून महत्त्वाचे म्हणजे, ही सगळी तात्त्विक चर्चा, उदात्त हेतू केवळ नेत्यांच्या मनात किंवा कागदावर राहिले नाहीत तर लाखो स्वयंसेवकांच्या मनात ते बिंबले गेले आहेत. तीनचार पिढ्या ते विचार अमलात येतायत. आणि त्यातून संघाची ताकद वाढते आहे. त्यामुळे "थेअरी" ते "प्रॅक्टिकल" हे अंतर संघाने कसं कापलं हे बघणंही औत्सुक्याचं आहे. त्यावर लेखकाने आपलं मत मांडलं आहे. ह्यात एकूण १६ लेख आणि चार परिशिष्टे आहेत. अनुक्रमणिकेवर एक नजर टाकली की त्यांचा अंदाज येईल.

दैनंदिन शाखा हे संघाच्या ताकदीचं उगमस्थान आहे. लहानपणापासून मुले शाखेत जातात, खेळ खेळतात, शूरवीरांच्या गोष्टी ऐकतात, देशभक्तीपर गाणी म्हणतात, मोठ्यांचे विचार ऐकतात. त्यातून संघाचा विचार मनात रुजतो. व्यक्ती कायमची कामाशी जोडली जाते. मोठेपणी ती कुठल्याही क्षेत्रात काम करत असेल तरी देशभक्ती, स्वबांधवप्रीती , समाजऋण हे भाव मनात ठेवूनच ती काम करते. ही शाखा कशी चालते, त्याबद्दल वेगवेगळ्या सरसंघचालकांचं मत काय आहे हे पुस्तकात दिलं आहे. त्यामुळे संघाच्या शाखेत कधी न गेलेल्या व्यक्तीला संघाचं हे उघड गुपित जाणून घ्यायची संधी पुस्तक देते.

पुढच्या बऱ्याच प्रकरणांमध्ये ह्या पुढची प्रगत रचना, संघटनेतील उतरंड, प्रचारक, संलग्न संस्थांची स्थापना ह्याची माहिती दिली आहे. ही माहिती तांत्रिक नाही. कार्यकर्त्यांना कसे प्रेरित केले जाते, मूळ मूल्ये कशी अधोरेखित केली जातात हे सांगितलं आहे. कुठलीही व्यक्ती परिपूर्ण नाही. पण त्या व्यक्ती एकत्र येऊन पूर्णांकासारखे काम करू शकतात; हा भाव रुजवला जातो. म्हणून संघात कार्यकर्ता महत्त्वाचा आहे पण व्यक्तिपूजा नाही, असे लेखकाचे प्रतिपादन आहे. ही स्वयंसेवी संस्था आहे. त्यामुळे ज्याला स्वतः त्याग करायची मनापासून इच्छा आहे तोच ह्यात सामील होईल, हे खरेच. पण सामील झाल्यावर त्या त्यागाला अनुरूप काम मिळतं. आपल्यासारखेच समाजप्रेमी लोक मिळतात. हे सगळं सातत्याने कसे होते, ह्याबद्दलचे वर्णन पुस्तकात आहे.


संघाचं नेतृत्त्व करणाऱ्या सरसंघचालकांचा, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि निर्णयांचा मोठा वाटा संघाच्या यशात आहे. डॉ. हेडगेवारांपासून आत्ताच्या सरसंघचालकांपर्यंत प्रत्येकाच्या विचारांची, निस्पृहतेची थोडक्यात ओळख दिली आहे. सरसंघचालक बाळासाहेब देवरस आणि त्यांचे बंधू भाऊराव देवरस ह्यांच्याशी लेखकाचा प्रत्यक्ष परिचय आला. त्यामुळे त्यांच्यावर स्वतंत्र लेख आहेत. पुढील चार लेखांत पुन्हा संघाची तात्त्विक भूमिका मांडली आहे. अभाविप, विश्व हिंदू परिषद, वनवासी कल्याण आश्रम, विवेकानंद केंद्र इ. महत्वाच्या संस्था कुठल्या कुठल्या टप्प्यावर झाली हा भाग निवेदनाच्या ओघात आला आहे.

एकूणच ह्या पुस्तकात तत्वज्ञानाचा, "थेअरी"चा भाग जास्त आहे. गीता, उपनिषदे, धर्मग्रंथे ह्यांच्यातील श्लोक व वचने जी भारतीय विचारपद्धतीचा आधार आहे त्यांचा उल्लेख आहे. केवळ स्वातंत्र्य मिळून उपयोग नाही तर पुन्हा पारतंत्र्यात जायला नको ह्यासाठी स्वतःची शक्ती विकसित झाली पाहिजे हा विचार पुन्हा पुन्हा मांडला आहे. कार्यकर्त्याने कसे समर्पण करावे हे सांगितले आहे. सरसंघचालक आणि इतर मोठ्या नेत्यांची वचने आहेत. पण असे वाटले की तोच तोच भाग पुन्हा पुन्हा येतो. नितीन गडकरी स्वतः कार्यकर्ते म्हणून कसे घडले, त्यांचे व्यक्तिमत्त्व कसे घडले, त्यांचे गुणदोष कसे बदलले हे सगळं सविस्तर येईल असं वाटलं होत. त्याची अगदी एकदोन उदाहरणे आहेत. ती पण फार मोघम - वरवरची.

"व्यक्ती तितक्या प्रकृती", "मतभेद", "घर म्हटलं कि भांड्याला भांडं लागणारच" ह्या समस्या संघात पण असणारच. पण त्यांवर कशी मात केली जाते हा भाग फार येत नाही. कार्यकर्त्याशी बोललं जातं, वाटल्यास जबाबदाऱ्या बदलल्या जातात इतपत लिहून बोळवण केली आहे. एकूणच सगळे "स्वयं"सेवक असल्यामुळे सगळं आपसूक सुरळीत होत असावं असं पुस्तक वाचून वाटू लागतं. "मानवी व्यवस्थापना"बद्दलच्या पुस्तकात ह्या पैलूचा वस्तुनिष्ठ विचार आवश्यक होता.


काही पाने उदाहरणादाखल वाचा


शाखेची माहिती बद्दलच्या प्रकरणातील दोन पाने


संघाच्या दृष्टीने, धर्म, आत्मतत्त्व


कुशल संघटक/नेता कसा असावा ह्याबद्दलच्या प्रकरणातील दोन पाने


तुम्ही संघाच्या शाखेत कधी गेला नसाल, संघाचे मूळ विचार काय आहेत हे माहिती नसेल तर हे पुस्तक तुम्हाला संघाची वैचारिक बैठक आणि कामाचा विस्तार ह्याबद्दल चांगली माहिती मिळेल. संघाची जुजबी माहिती असेल तरी काही नवे पैलू कळतील. तात्विक चर्चेची पुनरुक्ती टाळून नितीन गडकरींची किंवा इतरांची वैयक्तिक उदाहरणे, अंतर्गत संघर्षाची उदाहरणे, नवीन ध्येये ठरवण्याची प्रक्रिया ह्या सगळ्या बाबी पुढच्या आवृत्तीत आल्या तर "व्यवस्थापन" समजून घेण्याच्या दृष्टीने पुस्तक अजून माहितीपूर्ण ठरेल.


——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

तौलनिक लोकमान्य (Taulanik Lokamany)




पुस्तक - तौलनिक लोकमान्य (Taulanik Lokamany)
लेखक - चंद्रशेखर टिळक (Chandrashekhar Tilak)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १२८
प्रकाशन - भाग्यश्री प्रकाशन सप्टेंबर २०२५ 
ISBN - 978-81-987168-1-1
छापील किंमत रुपये २००/-



लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक अग्रगण्य नाव. त्यांचे वृत्तपत्रातले लेख, भाषणे, भारतभर केलेले दौरे, आणि स्वतः भोगलेला तुरुंगवास यातून ब्रिटिश सत्तेविरुद्ध जनमानस जागृत झाले. ब्रिटिश विरोधी जनतेच्या भावना मांडणाऱ्या त्यांच्या आधीच्या भारतीय नेत्यांपेक्षा त्यांची भूमिका जास्त जहाल, कृतीशील होती. थेट "स्वराज्य मिळविणारच" हे ठासून सांगणारी होती. स्वातंत्र्याची चळवळ टिळकांच्या आधी सुरू झाली होती. टिळकांनी तिला मोठा लोकाश्रय मिळवून दिला. त्यांच्या निधनानंतरही ती चळवळ पुढे चालत राहून शेवटी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले.

टिळक जसा स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करत होते तसाच प्रयत्न इतर अनेक महान व्यक्तिमत्व सुद्धा करत होती. प्रत्येकाची आपापली विचारसरणी होती, आपापली आंदोलनाबद्दलची धारणा होती. परस्पर विरोधी मते होती. जहाल- मवाळ, सशस्त्र- नि:शस्त्र, सैन्यात जावं की न जावं, सामाजिक सुधारणा आधी का राजकीय स्वातंत्र्य आधी, सुधारणांसाठी ब्रिटिशांचे सहकार्य घ्यावे की न घ्यावे, पारंपारिक स्वदेशी विचार घ्यावा का आधुनिक पाश्चिमात्य विचार आचरावा ... असे असंख्य मतभेदाचे मुद्दे होते. प्रत्येकाची कार्यशैली वेगळी होती आणि समाजावर प्रभाव टाकण्याची क्षमता देखील वेगळी.

त्यामुळे कुठेही एका चरित्र नायकाचा अभ्यास करताना त्याचे तत्कालीन नेत्यांची आलेले संबंध नक्कीच अभ्यासनीय ठरतात. या नेत्याने आपल्या पूर्वसुरींकडून काय बोध घेतला होता हे समजणं महत्त्वाचं असतं. तर हा नेता दिवंगत झाल्यावर काय झालं त्यांचे विचार टिकले का काळाच्या कसोटी उतरले का हे जाणणं देखील महत्त्वाचं आहे. एकूणच हा प्रचंड मोठ्या अभ्यासाचा आणि व्यासंगाचा विषय आहे. ज्याला इतिहासात खरंच मनापासून रस आहे तोच हे करू जाणो. पण इतरांनी मात्र नाराज व्हायचं कारण नाही. कारण लोकमान्य टिळकांच्या संदर्भात असा अभ्यास करून ते सार रूपात आपल्यासमोर मांडण्याचं मोठं काम लेखक चंद्रशेखर टिळक यांनी सदर पुस्तकाच्या रूपात केलं आहे.

लेखकाची पुस्तकात दिलेली ओळख


हे पुस्तक २५ लेखांचा संग्रह आहे यात पहिल्या बारा लेखांमध्ये लोकमान्य टिळक आणि एक एक भारतीय नेतृत्व याची तुलना केलेली आहे. दोघांचा स्वभाव, विचार, कामाची पद्धत केलेले लिखाण, लोकांचा प्रतिसाद, परदेश प्रवास, भोगलेल्या शिक्षा अशा वेगवेगळ्या पैलूंद्वारे सारखेपणा आणि फरक दाखवून दिलेला आहे. यात शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास असे टिळकांच्या आधीच्या दोन विभूती आहेत. गांधीजी, योगी अरविंद, स्वामी विवेकानंद, गोपाळ कृष्ण गोखले, न्यायमूर्ती रानडे आणि सावरकर, विनोबा भावे ही त्यांच्या कार्यकाळच्या आसपास झालेली व्यक्तिमत्व आहेत. गंमत म्हणजे पुस्तकाची सुरुवात होते ती अटलजी, मोदीजी आणि इंदिरा गांधी ह्यांच्याशी तुलनेतून.

अनुक्रमणिका



समकालीन लोकांवरच्या लेखात टिळक आणि दुसरी व्यक्ती ह्यांची भेट कधी, कुठे झाली होती, त्यांच्यात कुठल्या मुद्द्यावर चर्चा झाली होती, त्यांनी एकत्र काम केले किंवा नाही, एकमेकांवर टीका कशी केली, एकमेकांची स्तुती कधी केली, त्यांच्याबद्दल इतर पत्रकार किंवा नेते काय म्हणत अशी उदाहरणे दिली आहेत. 
लेखकाने तुलनेसाठी घेतलेले काही मुद्दे आपल्याला आश्चर्यचकितही करतील. उदा. टिळक आणि सावरकर ह्यांच्या जीवनावर आधारित कलाकृती किती आणि त्या व्यावसायिक दृष्ट्या किती चालल्या (किंबहुना नाही चालल्या) असाही मुद्दा घेतलाय. टिळक आणि आगरकर ह्यांच्या लेखनशैलीची देखील तुलना आहे. "गीतारहस्य" व "गीताई" ह्यांच्यातले साम्यभेद एका लेखात आहेत. असे विचार डोक्यात येणं आणि त्याबरहुकूम माहिती गोळा करून ती मांडणं ह्याबद्दल लेखकाला प्रणाम.

शेवटचे दहा बारा लेख हे टिळक आणि एखादे ठिकाण, समुदाय, वस्तू ह्यांचा पुन्हा पुन्हा संपर्क कसा आला किंवा आलेला संपर्क कसा महत्त्वाचा ठरला ह्याची माहिती आहे. टिळकांनी स्वातंत्र्य लढ्यात मुसलमानांचा सहभाग मिळवण्यासाठी प्रयत्न केले. त्यातून काँग्रेस व मुस्लिम लीग ह्यांच्यातला "लखनौ करार" झाला होता. तो वादग्रस्त ठरला पण. टिळकांबद्दल मुस्लिम समाजात किती विश्वासाची भावना होती हे त्या प्रकरणातून दिसतं. टिळक समाजाचा सर्वांगीण विकास करणारे राजकीय नेते होते. त्यांनी कामगार चळवळीला कसा पाठिंबा दिला हे एका लेखात आहे. टिळकांचा अर्थकारणाचा अभ्यासही दांडगा होता. "बॉम्बे स्वदेशी" कंपनीत ते संचालक सदस्य होते. समभाग (शेअरची) किंमत किती ठेवावी, कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ता म्हणून कंपनीचे शेअर द्यावेत इ. निर्णय त्याकाळात त्यांनी घेतले. "टिळक आणि शेअर बाजार " लेख वाचताना ही अपरिचित बाजू पुढे येते.

काही पाने उदाहरणार्थ
टिळक आणि रामदास

टिळक आणि योगी अरविंद

टिळक आणि मुसलमान

परकीयांच्या शब्दांत टिळक


कितीही लिहिलं आणि कितीही व्यक्तिमत्त्वांशी तुलना करत लिहिलं तरी अजून लिहायला वाव राहणारच. तरी कामगार कायदे, आर्थिक बाबी ह्याबद्दल वाचताना आंबेडकरांची आठवण झाली. आर्थिक, कायदेशीर बाबी, ब्राह्मण-ब्राह्मणेतरांकडे बघायचा दृष्टिकोन हे मुद्दे घेऊन आंबेडकर- टिळक एखादं प्रकरण जोडता आलं तर छान. "अर्थकारणी लोकमान्य" ह्या आगामी पुस्तकात तो मुद्दा सविस्तर येणार आहे.
ह्या पुस्तकात उल्लेख झालेल्या टिळकांच्या आयुष्यातल्या घटना वाचकाला नीट माहिती असतील तर विवेचन व्यवस्थित कळेल. तो गृहपाठ वाचकानेच केला पाहिजे. तरी.. सूरत काँग्रेस, लखनौ करार, चिरोल खटला ह्यांच्याबद्दल सुरुवातीलाच तपशील दिले तर मदत होईल. "मुसलमान" प्रकरण वाचताना मी आत्ता नेट वर शोधून वाचलं की नक्की सहकार्य म्हणजे काय करार केला होता. ते वाचल्यावर चित्र अजून स्पष्ट झालं.

सुरुवातीला म्हटलं तसं लेखकाच्या अभ्यासाचं, व्यासंगाचं सार आपल्या समोर असल्यामुळे हे लेख वाचताना शाळेतलं "नवनीत गाईड" वाचतो आहे असं वाटलं. "टिळक आणि अमुक अमुक ह्यांच्यातील पाच फरक आणि पाच साम्यस्थळे सांगा; "टिळक आणि अमुक अमुक आव्हान ह्यावर शंभर ओळींचा निबंध लिहा".. अशा प्रश्नाची तयार उत्तर म्हणजे एकेक लेख. त्यामुळे ह्या लेखांमध्ये मुद्द्याला ओझरता स्पर्श करून लेखक पुढच्या मुद्द्याकडे वळतो. ते वाचताना तयार उत्तर मिळाल्याचा आनंद आपल्याला मिळेल. तर अभ्यासू वाचकाला प्रत्येक तुलनेचा मुद्दा अभ्यासाची नवीन वाट दाखवेल.

पुस्तकातले विवेचनाचे स्वरूप वस्तुनिष्ठ तुलना आहे. कुठल्याही महापुरुषाला कमी लेखण्याचा किंवा चढे दाखवण्याचा हेतू ह्यात दिसत नाही. छुपा अजेंडा दिसत नाही. अजेंडा असलाच तर; तो हा असावा की लोकमान्यांचे विचार, कर्तृत्व आजही किती अभ्यासनीय, अनुकरणीय आहे; समाज आणि शासन पातळीवर त्याबद्दलची अनास्था दूर केली तर आपलंच भलं आहे हे जाणवून देणे !

वर्दीतल्या माणसाच्या नोंदी (Vardeetalya manasachya nondi)

पुस्तक - वर्दीतल्या माणसाच्या नोंदी (Vardeetalya manasachya nondi) लेखक - सदानंद दाते (Sadanand Date) भाषा - मराठी (Marathi) पाने - १४४ प्रक...