संघातील मानवी व्यवस्थापन (Sanghatil Manavi Vyvasthapan)



पुस्तक - संघातील मानवी व्यवस्थापन (Sanghatil Manavi Vyvasthapan)
लेखक - नितीन गडकरी आणि शैलेश पांडे (Nitin Gadkari & Shailesh Pande)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १५१
प्रकाशन - राजहंस प्रकाशन, एप्रिल २०२५
छापील किंमत - रू. २५०/-
ISBN 978-81-19625-88-8

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नुकतीच (विजयादशमी २०२५) आपली शताब्दी पूर्ण केली. ह्यानिमित्ताने संघाची स्थापना, शंभर वर्षांचा प्रवास ह्याबद्दल विविध माध्यमात चर्चा होत आहे. नागपूरला मोजक्या लोकांनिशी सुरु झालेली संघटना इतकी वर्षे कशी चालली, वाढली आणि भारतीय समाजकारणात-राजकारणात इतकी महत्त्वाची कशी झाली ह्याचं अप्रूप, कौतुक अनेकांना आहे. त्याचवेळी द्वेष आणि असूयाही आहे. संघाचे योगदानाबद्दल अनेकांना कौतुक आहे तर संघ-विचारांना अनेकांना पराकोटीचा विरोधही आहे. बऱ्याच वेळा ही चर्चा एकतर्फी होते. म्हणजे संघाकडून अधिकृतरित्या प्रत्येक वादविवादावर उत्तर दिलं जात नाही. मात्र संघाशी संबंधित व्यक्ती आपली मते, संघाची मूल्ये प्रकट करतात. अशा प्रकटीकरणात एक महत्त्वाचं पुस्तक नुकतंच प्रकाशित झालेलं दिसलं ते म्हणजे नितीन गडकरी लिखित "संघातील मानवी व्यवस्थापन". नितीन गडकरी हे - रोडकरी , पूलकरी , टोलकरी, विकासपुरुष - अशा नावांनी प्रसिद्ध असलेले केंद्रीय मंत्री आहेत. लहानपणापासून संघ स्वयंसेवक, तरुण वयात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) चे कार्यकर्ते मग भाजपचे कार्यकर्ते, नेते, राष्ट्रीय अध्यक्ष इतकंच काय पंतप्रधान पदासाठी भाजपमधील योग्य व्यक्तींपैकी एक अशी ख्याती मिळवणारे आहेत. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने संघ कसा आहे हे बघणं औचित्यपूर्ण आहे.

हे पुस्तक संघाचा कालसूत्रबद्ध इतिहास नाही तर संघाच्या स्थापनेचे कारण, ध्येय, कार्यपद्धती, वेळोवेळी होत गेलेला बदल ह्या सगळ्यामागे काय तत्वज्ञान आहे ह्यावर भर देणारे आहे. त्याहून महत्त्वाचे म्हणजे, ही सगळी तात्त्विक चर्चा, उदात्त हेतू केवळ नेत्यांच्या मनात किंवा कागदावर राहिले नाहीत तर लाखो स्वयंसेवकांच्या मनात ते बिंबले गेले आहेत. तीनचार पिढ्या ते विचार अमलात येतायत. आणि त्यातून संघाची ताकद वाढते आहे. त्यामुळे "थेअरी" ते "प्रॅक्टिकल" हे अंतर संघाने कसं कापलं हे बघणंही औत्सुक्याचं आहे. त्यावर लेखकाने आपलं मत मांडलं आहे. ह्यात एकूण १६ लेख आणि चार परिशिष्टे आहेत. अनुक्रमणिकेवर एक नजर टाकली की त्यांचा अंदाज येईल.

दैनंदिन शाखा हे संघाच्या ताकदीचं उगमस्थान आहे. लहानपणापासून मुले शाखेत जातात, खेळ खेळतात, शूरवीरांच्या गोष्टी ऐकतात, देशभक्तीपर गाणी म्हणतात, मोठ्यांचे विचार ऐकतात. त्यातून संघाचा विचार मनात रुजतो. व्यक्ती कायमची कामाशी जोडली जाते. मोठेपणी ती कुठल्याही क्षेत्रात काम करत असेल तरी देशभक्ती, स्वबांधवप्रीती , समाजऋण हे भाव मनात ठेवूनच ती काम करते. ही शाखा कशी चालते, त्याबद्दल वेगवेगळ्या सरसंघचालकांचं मत काय आहे हे पुस्तकात दिलं आहे. त्यामुळे संघाच्या शाखेत कधी न गेलेल्या व्यक्तीला संघाचं हे उघड गुपित जाणून घ्यायची संधी पुस्तक देते.

पुढच्या बऱ्याच प्रकरणांमध्ये ह्या पुढची प्रगत रचना, संघटनेतील उतरंड, प्रचारक, संलग्न संस्थांची स्थापना ह्याची माहिती दिली आहे. ही माहिती तांत्रिक नाही. कार्यकर्त्यांना कसे प्रेरित केले जाते, मूळ मूल्ये कशी अधोरेखित केली जातात हे सांगितलं आहे. कुठलीही व्यक्ती परिपूर्ण नाही. पण त्या व्यक्ती एकत्र येऊन पूर्णांकासारखे काम करू शकतात; हा भाव रुजवला जातो. म्हणून संघात कार्यकर्ता महत्त्वाचा आहे पण व्यक्तिपूजा नाही, असे लेखकाचे प्रतिपादन आहे. ही स्वयंसेवी संस्था आहे. त्यामुळे ज्याला स्वतः त्याग करायची मनापासून इच्छा आहे तोच ह्यात सामील होईल, हे खरेच. पण सामील झाल्यावर त्या त्यागाला अनुरूप काम मिळतं. आपल्यासारखेच समाजप्रेमी लोक मिळतात. हे सगळं सातत्याने कसे होते, ह्याबद्दलचे वर्णन पुस्तकात आहे.


संघाचं नेतृत्त्व करणाऱ्या सरसंघचालकांचा, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि निर्णयांचा मोठा वाटा संघाच्या यशात आहे. डॉ. हेडगेवारांपासून आत्ताच्या सरसंघचालकांपर्यंत प्रत्येकाच्या विचारांची, निस्पृहतेची थोडक्यात ओळख दिली आहे. सरसंघचालक बाळासाहेब देवरस आणि त्यांचे बंधू भाऊराव देवरस ह्यांच्याशी लेखकाचा प्रत्यक्ष परिचय आला. त्यामुळे त्यांच्यावर स्वतंत्र लेख आहेत. पुढील चार लेखांत पुन्हा संघाची तात्त्विक भूमिका मांडली आहे. अभाविप, विश्व हिंदू परिषद, वनवासी कल्याण आश्रम, विवेकानंद केंद्र इ. महत्वाच्या संस्था कुठल्या कुठल्या टप्प्यावर झाली हा भाग निवेदनाच्या ओघात आला आहे.

एकूणच ह्या पुस्तकात तत्वज्ञानाचा, "थेअरी"चा भाग जास्त आहे. गीता, उपनिषदे, धर्मग्रंथे ह्यांच्यातील श्लोक व वचने जी भारतीय विचारपद्धतीचा आधार आहे त्यांचा उल्लेख आहे. केवळ स्वातंत्र्य मिळून उपयोग नाही तर पुन्हा पारतंत्र्यात जायला नको ह्यासाठी स्वतःची शक्ती विकसित झाली पाहिजे हा विचार पुन्हा पुन्हा मांडला आहे. कार्यकर्त्याने कसे समर्पण करावे हे सांगितले आहे. सरसंघचालक आणि इतर मोठ्या नेत्यांची वचने आहेत. पण असे वाटले की तोच तोच भाग पुन्हा पुन्हा येतो. नितीन गडकरी स्वतः कार्यकर्ते म्हणून कसे घडले, त्यांचे व्यक्तिमत्त्व कसे घडले, त्यांचे गुणदोष कसे बदलले हे सगळं सविस्तर येईल असं वाटलं होत. त्याची अगदी एकदोन उदाहरणे आहेत. ती पण फार मोघम - वरवरची.

"व्यक्ती तितक्या प्रकृती", "मतभेद", "घर म्हटलं कि भांड्याला भांडं लागणारच" ह्या समस्या संघात पण असणारच. पण त्यांवर कशी मात केली जाते हा भाग फार येत नाही. कार्यकर्त्याशी बोललं जातं, वाटल्यास जबाबदाऱ्या बदलल्या जातात इतपत लिहून बोळवण केली आहे. एकूणच सगळे "स्वयं"सेवक असल्यामुळे सगळं आपसूक सुरळीत होत असावं असं पुस्तक वाचून वाटू लागतं. "मानवी व्यवस्थापना"बद्दलच्या पुस्तकात ह्या पैलूचा वस्तुनिष्ठ विचार आवश्यक होता.


काही पाने उदाहरणादाखल वाचा


शाखेची माहिती बद्दलच्या प्रकरणातील दोन पाने


संघाच्या दृष्टीने, धर्म, आत्मतत्त्व


कुशल संघटक/नेता कसा असावा ह्याबद्दलच्या प्रकरणातील दोन पाने


तुम्ही संघाच्या शाखेत कधी गेला नसाल, संघाचे मूळ विचार काय आहेत हे माहिती नसेल तर हे पुस्तक तुम्हाला संघाची वैचारिक बैठक आणि कामाचा विस्तार ह्याबद्दल चांगली माहिती मिळेल. संघाची जुजबी माहिती असेल तरी काही नवे पैलू कळतील. तात्विक चर्चेची पुनरुक्ती टाळून नितीन गडकरींची किंवा इतरांची वैयक्तिक उदाहरणे, अंतर्गत संघर्षाची उदाहरणे, नवीन ध्येये ठरवण्याची प्रक्रिया ह्या सगळ्या बाबी पुढच्या आवृत्तीत आल्या तर "व्यवस्थापन" समजून घेण्याच्या दृष्टीने पुस्तक अजून माहितीपूर्ण ठरेल.


——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

तौलनिक लोकमान्य (Taulanik Lokamany)




पुस्तक - तौलनिक लोकमान्य (Taulanik Lokamany)
लेखक - चंद्रशेखर टिळक (Chandrashekhar Tilak)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १२८
प्रकाशन - भाग्यश्री प्रकाशन सप्टेंबर २०२५ 
ISBN - 978-81-987168-1-1
छापील किंमत रुपये २००/-



लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक अग्रगण्य नाव. त्यांचे वृत्तपत्रातले लेख, भाषणे, भारतभर केलेले दौरे, आणि स्वतः भोगलेला तुरुंगवास यातून ब्रिटिश सत्तेविरुद्ध जनमानस जागृत झाले. ब्रिटिश विरोधी जनतेच्या भावना मांडणाऱ्या त्यांच्या आधीच्या भारतीय नेत्यांपेक्षा त्यांची भूमिका जास्त जहाल, कृतीशील होती. थेट "स्वराज्य मिळविणारच" हे ठासून सांगणारी होती. स्वातंत्र्याची चळवळ टिळकांच्या आधी सुरू झाली होती. टिळकांनी तिला मोठा लोकाश्रय मिळवून दिला. त्यांच्या निधनानंतरही ती चळवळ पुढे चालत राहून शेवटी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले.

टिळक जसा स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करत होते तसाच प्रयत्न इतर अनेक महान व्यक्तिमत्व सुद्धा करत होती. प्रत्येकाची आपापली विचारसरणी होती, आपापली आंदोलनाबद्दलची धारणा होती. परस्पर विरोधी मते होती. जहाल- मवाळ, सशस्त्र- नि:शस्त्र, सैन्यात जावं की न जावं, सामाजिक सुधारणा आधी का राजकीय स्वातंत्र्य आधी, सुधारणांसाठी ब्रिटिशांचे सहकार्य घ्यावे की न घ्यावे, पारंपारिक स्वदेशी विचार घ्यावा का आधुनिक पाश्चिमात्य विचार आचरावा ... असे असंख्य मतभेदाचे मुद्दे होते. प्रत्येकाची कार्यशैली वेगळी होती आणि समाजावर प्रभाव टाकण्याची क्षमता देखील वेगळी.

त्यामुळे कुठेही एका चरित्र नायकाचा अभ्यास करताना त्याचे तत्कालीन नेत्यांची आलेले संबंध नक्कीच अभ्यासनीय ठरतात. या नेत्याने आपल्या पूर्वसुरींकडून काय बोध घेतला होता हे समजणं महत्त्वाचं असतं. तर हा नेता दिवंगत झाल्यावर काय झालं त्यांचे विचार टिकले का काळाच्या कसोटी उतरले का हे जाणणं देखील महत्त्वाचं आहे. एकूणच हा प्रचंड मोठ्या अभ्यासाचा आणि व्यासंगाचा विषय आहे. ज्याला इतिहासात खरंच मनापासून रस आहे तोच हे करू जाणो. पण इतरांनी मात्र नाराज व्हायचं कारण नाही. कारण लोकमान्य टिळकांच्या संदर्भात असा अभ्यास करून ते सार रूपात आपल्यासमोर मांडण्याचं मोठं काम लेखक चंद्रशेखर टिळक यांनी सदर पुस्तकाच्या रूपात केलं आहे.

लेखकाची पुस्तकात दिलेली ओळख


हे पुस्तक २५ लेखांचा संग्रह आहे यात पहिल्या बारा लेखांमध्ये लोकमान्य टिळक आणि एक एक भारतीय नेतृत्व याची तुलना केलेली आहे. दोघांचा स्वभाव, विचार, कामाची पद्धत केलेले लिखाण, लोकांचा प्रतिसाद, परदेश प्रवास, भोगलेल्या शिक्षा अशा वेगवेगळ्या पैलूंद्वारे सारखेपणा आणि फरक दाखवून दिलेला आहे. यात शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास असे टिळकांच्या आधीच्या दोन विभूती आहेत. गांधीजी, योगी अरविंद, स्वामी विवेकानंद, गोपाळ कृष्ण गोखले, न्यायमूर्ती रानडे आणि सावरकर, विनोबा भावे ही त्यांच्या कार्यकाळच्या आसपास झालेली व्यक्तिमत्व आहेत. गंमत म्हणजे पुस्तकाची सुरुवात होते ती अटलजी, मोदीजी आणि इंदिरा गांधी ह्यांच्याशी तुलनेतून.

अनुक्रमणिका



समकालीन लोकांवरच्या लेखात टिळक आणि दुसरी व्यक्ती ह्यांची भेट कधी, कुठे झाली होती, त्यांच्यात कुठल्या मुद्द्यावर चर्चा झाली होती, त्यांनी एकत्र काम केले किंवा नाही, एकमेकांवर टीका कशी केली, एकमेकांची स्तुती कधी केली, त्यांच्याबद्दल इतर पत्रकार किंवा नेते काय म्हणत अशी उदाहरणे दिली आहेत. 
लेखकाने तुलनेसाठी घेतलेले काही मुद्दे आपल्याला आश्चर्यचकितही करतील. उदा. टिळक आणि सावरकर ह्यांच्या जीवनावर आधारित कलाकृती किती आणि त्या व्यावसायिक दृष्ट्या किती चालल्या (किंबहुना नाही चालल्या) असाही मुद्दा घेतलाय. टिळक आणि आगरकर ह्यांच्या लेखनशैलीची देखील तुलना आहे. "गीतारहस्य" व "गीताई" ह्यांच्यातले साम्यभेद एका लेखात आहेत. असे विचार डोक्यात येणं आणि त्याबरहुकूम माहिती गोळा करून ती मांडणं ह्याबद्दल लेखकाला प्रणाम.

शेवटचे दहा बारा लेख हे टिळक आणि एखादे ठिकाण, समुदाय, वस्तू ह्यांचा पुन्हा पुन्हा संपर्क कसा आला किंवा आलेला संपर्क कसा महत्त्वाचा ठरला ह्याची माहिती आहे. टिळकांनी स्वातंत्र्य लढ्यात मुसलमानांचा सहभाग मिळवण्यासाठी प्रयत्न केले. त्यातून काँग्रेस व मुस्लिम लीग ह्यांच्यातला "लखनौ करार" झाला होता. तो वादग्रस्त ठरला पण. टिळकांबद्दल मुस्लिम समाजात किती विश्वासाची भावना होती हे त्या प्रकरणातून दिसतं. टिळक समाजाचा सर्वांगीण विकास करणारे राजकीय नेते होते. त्यांनी कामगार चळवळीला कसा पाठिंबा दिला हे एका लेखात आहे. टिळकांचा अर्थकारणाचा अभ्यासही दांडगा होता. "बॉम्बे स्वदेशी" कंपनीत ते संचालक सदस्य होते. समभाग (शेअरची) किंमत किती ठेवावी, कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ता म्हणून कंपनीचे शेअर द्यावेत इ. निर्णय त्याकाळात त्यांनी घेतले. "टिळक आणि शेअर बाजार " लेख वाचताना ही अपरिचित बाजू पुढे येते.

काही पाने उदाहरणार्थ
टिळक आणि रामदास

टिळक आणि योगी अरविंद

टिळक आणि मुसलमान

परकीयांच्या शब्दांत टिळक


कितीही लिहिलं आणि कितीही व्यक्तिमत्त्वांशी तुलना करत लिहिलं तरी अजून लिहायला वाव राहणारच. तरी कामगार कायदे, आर्थिक बाबी ह्याबद्दल वाचताना आंबेडकरांची आठवण झाली. आर्थिक, कायदेशीर बाबी, ब्राह्मण-ब्राह्मणेतरांकडे बघायचा दृष्टिकोन हे मुद्दे घेऊन आंबेडकर- टिळक एखादं प्रकरण जोडता आलं तर छान. "अर्थकारणी लोकमान्य" ह्या आगामी पुस्तकात तो मुद्दा सविस्तर येणार आहे.
ह्या पुस्तकात उल्लेख झालेल्या टिळकांच्या आयुष्यातल्या घटना वाचकाला नीट माहिती असतील तर विवेचन व्यवस्थित कळेल. तो गृहपाठ वाचकानेच केला पाहिजे. तरी.. सूरत काँग्रेस, लखनौ करार, चिरोल खटला ह्यांच्याबद्दल सुरुवातीलाच तपशील दिले तर मदत होईल. "मुसलमान" प्रकरण वाचताना मी आत्ता नेट वर शोधून वाचलं की नक्की सहकार्य म्हणजे काय करार केला होता. ते वाचल्यावर चित्र अजून स्पष्ट झालं.

सुरुवातीला म्हटलं तसं लेखकाच्या अभ्यासाचं, व्यासंगाचं सार आपल्या समोर असल्यामुळे हे लेख वाचताना शाळेतलं "नवनीत गाईड" वाचतो आहे असं वाटलं. "टिळक आणि अमुक अमुक ह्यांच्यातील पाच फरक आणि पाच साम्यस्थळे सांगा; "टिळक आणि अमुक अमुक आव्हान ह्यावर शंभर ओळींचा निबंध लिहा".. अशा प्रश्नाची तयार उत्तर म्हणजे एकेक लेख. त्यामुळे ह्या लेखांमध्ये मुद्द्याला ओझरता स्पर्श करून लेखक पुढच्या मुद्द्याकडे वळतो. ते वाचताना तयार उत्तर मिळाल्याचा आनंद आपल्याला मिळेल. तर अभ्यासू वाचकाला प्रत्येक तुलनेचा मुद्दा अभ्यासाची नवीन वाट दाखवेल.

पुस्तकातले विवेचनाचे स्वरूप वस्तुनिष्ठ तुलना आहे. कुठल्याही महापुरुषाला कमी लेखण्याचा किंवा चढे दाखवण्याचा हेतू ह्यात दिसत नाही. छुपा अजेंडा दिसत नाही. अजेंडा असलाच तर; तो हा असावा की लोकमान्यांचे विचार, कर्तृत्व आजही किती अभ्यासनीय, अनुकरणीय आहे; समाज आणि शासन पातळीवर त्याबद्दलची अनास्था दूर केली तर आपलंच भलं आहे हे जाणवून देणे !

संघातील मानवी व्यवस्थापन (Sanghatil Manavi Vyvasthapan)

पुस्तक - संघातील मानवी व्यवस्थापन (Sanghatil Manavi Vyvasthapan) लेखक - नितीन गडकरी आणि शैलेश पांडे (Nitin Gadkari & Shailesh Pande) भा...