पुण्यभूमी भारत (Punyabhumi Bharat)

पुस्तक - पुण्यभूमी भारत (Punyabhumi Bharat)
लेखिका - सुधा मूर्ती (Sudha Murty)
अनुवादिका - लीना सोहोनी (Leena Sohoni)
मूळ पुस्तक - The old man and his god (Discovering the spirit of India) द ओल्ड मॅन अँड हिज गॉड - डिस्कव्हरिंग द स्पिरिट ऑफ इंडिया
मूळ पुस्तकाची भाषा - इंग्रजी (English)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १६६
प्रकाशन - ऑक्टोबर २००६, मेहता पब्लिशिंग हाऊस
ISBN - 9788177667608

इन्फोसिस फाउंडेशनच्या प्रमुख सुधा मूर्ती आपल्या समाजसेवेसाठी प्रसिद्ध आहेत. पैसा-प्रसिद्धी-मान मिळूनही त्यांची साधी राहणी, कुटुंबवत्सल वागणं ह्यामुळे त्यांच्याबद्दल आदराइतकाच आपलेपणाही वाटतो. त्यांचं ह्या पुस्तकातलं लेखनही त्यांच्या सरळ वागण्याचं, दुसऱ्याला समजून घेण्याच्या वृत्तीचं प्रतिबिंब आहे. त्यांच्या कुटुंबातल्या, मित्रपरिवारातल्या व्यक्तींच्या बऱ्यावाईट अनुभवांचे वर्णन त्यांनी ह्यात केलं आहे. त्याचबरोबरीने समाजसेवेचे अनुभव सुद्धा लिहिले आहेत. सुनामीग्रस्त, पूरग्रस्त लोकांसाठी त्यांनी काम केलं आहे. आर्थिक, सामाजिक दुर्बल वस्त्यांत काम केलं आहे. त्यांच्या फाउंडेशन मध्ये अनेक तरुण व्यक्तींचं सहकार्य त्यांना मिळतं. ह्या समाजकामासाठी विविध कंपन्या, उद्योगपती देणग्या देतात. त्यांच्याशी संपर्क ठेवून निधी संकलन करावं लागतं. सरकारी अधिकारी आणि शासन यंत्रणेशी संबंध ओघाने येतोच. अशा प्रकारे गरजू व्यक्ती, त्यांना मदत देणारे, कामात हातभार लावणारे, कामात आडकाठी आणणारे, गरीब-मध्यमवर्गीय-श्रीमंत, सगळ्या प्रकारच्या व्यक्तींशी त्यांचा संबंध येतो. "पिंडे पिंडे मतिर्भिन्ना" उक्तीप्रमाणे लोकांच्या वागण्याचे, विचार करण्याचे नाना रंग नाना ढंग त्यांना दिसतात. ते जसे दिसले तसे आपल्यासमोर इथे उलगडले आहेत.

ह्यात ३१ लेख आहेत. प्रत्येक लेखाची एक मध्यवर्ती कल्पना आहे. त्याभोवती आलेले चांगले-वाईट, अपेक्षित-अनपेक्षित असे अनुभव सांगितले आहेत. उदा. मातृत्व ह्या पहिल्याच लेखात त्यांनी त्यांच्या भाषणाचा एक प्रसंग सांगितला आहे. भाषणात त्या आईची महती सांगतात. आई मुलांसाठी कशी त्याग करते, खस्ता खाते, प्रसंगी संकटं झेलते वगैरे. भाषण श्रोत्यांनाही भावलं. पण त्या कार्यक्रमानंतर एक मुलगी त्यांना भेटून स्वतःची जन्मकथा सांगते. लहानपणी त्या मुलीला अंधत्व येऊ लागलं. औषधोपचारासाठी आईवडिलांकडे पैसे नव्हते. एकेदिवशी आईवडील बसस्टँडवर घेऊन आले. तिला बिस्किटाचा पुडा दिला. तिथेच थांब म्हणाले. आणि जे गेले ते कायमचेच. परत कधी आलेच नाहीत. ती मुलगी अनाथ म्हणून बेवारस वाढली. ती मुलगी विचारते "गरीबी ही मातृत्वापेक्षा जास्त मोठी असते का हो?"

ह्या उलट शेवटच्या "सलाम नमस्ते" लेखात गरिबीतली सामाजिक बांधिलकी दिसते. एक गरजू गरीब माणूस पत्नीच्या औषधोपचारांसाठी सुधाजींकडून पन्नास हजार रुपये घेतो. काही महिन्यांनी तीन हजार रुपये परत आणून देतो. म्हणतो की, "औषधोपचारांना प्रतिसाद मिळणं कठीण दिसतंय, मृत्यू अटळ आहे हे कळल्यावर माझ्या पत्नीने अजून खर्च करायला नकार दिला. उरलेले पैसे मॅडमना परत करा. दुसऱ्या कोणाच्या कामी ते येतील असं म्हणाली. म्हणून हे उरलेले पैसे". हे वाचून आपणही अवाक होतो.

सगळ्या कहाण्या गरिबीच्या नाहीत. श्रीमंत दानशूर व्यक्तींनी स्वतःहून कशी मदत केली, कोणा अधिकाऱ्याने कशी मदत केली ह्याची उदाहरणे आहेत. घर - बांगला - गाडी सगळं असून सतत दुसऱ्याशी तुलना करून आपल्यातली असलेली-नसलेली उणीव बघून दुःखी होणाऱ्या श्रीमंत मैत्रिणीची गोष्ट आहे. तर "निवडीचं स्वातंत्र्य" मध्ये दोन मैत्रिणींची गोष्ट आहे. दोघी जिवाभावाच्या मैत्रिणी. शाळेपासून कॉलेजपर्यंत कायम एकत्र राहणाऱ्या. पुढे लग्नानंतर दोघींच्या वाटा वेगळ्या झाल्या. दोघी दोन शहरांत गेल्या. एकीच्या नवरा आर्थिक प्रगती साधून श्रीमंत झाला. तर दुसरी मध्यमवर्गीयच राहिली. तरीही श्रीमंत मैत्रीण पूर्वीच्याच आपुलकीने बोलत राहिली, भेटायचा प्रयत्न करत राहिली. गरीब मैत्रिणीने स्वतःच समज करून घेतला की आपण आता मैत्रिणीच्या योग्यतेचे नाही. तिच्यासारख्या महागड्या वस्तू भेट देऊ शकत नाही. ह्या दोन मैत्रिणींचा - सुधाजींच्या विद्यार्थिनींचा - समेट घालून देण्याचं काम सुधाजी करतात. "प्रेमाची किंमत पैशात करायची नसते. चुकीच्या कल्पना मनात बाळगून चांगल्या मैत्रीला तडा जाऊ देऊ नको. न्यूनगंड बाळगू नको." असा सल्ला देतात. बरेच लेख असे "सुधाजींच्या बोधकथा" प्रकारचे आहेत.

"दुधारी सुरी" मध्ये प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व असण्याचे फायदेतोटे कसे अनुभवायला येतात ह्याचे अनुभव सांगितले आहेत. नावाच्या वजनामुळे सरकार दरबारी कामं लवकर होतात हा फायदा आहे. पण संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला मनापासून आपलेपणा वाटत असेल असं नाही. सुधाजींशी आपली ओळख आहे हे जगाला दाखवून कॉलर ताठ करण्यासाठी जवळीक साधणारेही पुष्कळ असतात. अशी दोन तीन अपेक्षाभंगाची उदाहरणं त्यांनी मोकळेपणे सांगितली आहेत. त्यांना एका लग्नाचं आमंत्रण मिळालं होतं. अगदी आग्रहाचं. लग्नाच्या दिवशी नवरानवरीबरोबर छान फोटोही काढले गेले. पण "जेवून जा", "जेवलात ना" हे विचारायची तसदीही घेतली नाही. यजमानांच्या घरच्या मंडळींनी बोलत बोलत थेट मांडवाच्या बाहेरच आणून सोडलं की!

आफ्रिकेतली जंगल सफारी, तिबेट भेट, पाकिस्तान भेट अशी काही प्रवास वर्णनं सुद्धा आहेत. "पुण्यभूमी भारत" हा तिबेट भेटीवरचा लेख आहे. तिकडे भेटलेली तिबेटी महिला म्हणते की दलाई लामांना भारताने आश्रय दिला आहे. भारत पुण्यभूमी आहे. त्यावरून ह्या लेखाचं आणि लेखावरून पुस्तकाचं शीर्षक घेण्यात आलं आहे.

काही पाने उदाहरणादाखल

श्रीमंतीचं प्रदर्शन करावं की करू नये. दोन मैत्रिणी दोन तऱ्हा



"मला काहीच प्रॉब्लेम नाही" असं सांगणाऱ्या नीताची खरी अवस्था वेगळीच असते. "आधी" आणि "नंतर"चे एकेक पान.



सुखी आयुष्याबद्दल


लीनाजींनी केलेला अनुवाद सरस आहे. ओघवत्या मराठीतला आहे. त्याला १००% गुण !

"पुण्यभूमी भारत" हे शीर्षक वाचून हे पुस्तक भारताची प्राचीन परंपरा, तीर्थक्षेत्रे किंवा महान व्यक्ती वगैरे बद्दलचे असेल अशी माझी कल्पना झाली. तसं काही ह्या पुस्तकात नाही. माणसांच्या बऱ्यावाईट तऱ्हा तर प्रत्येक समाजात आहेतच. त्यामुळे पुस्तकाच्या पाठमजकूरातील (ब्लर्ब) "भारतीय समाजाचा आत्माच या पुस्तकाच्या रूपानं प्रतिबिंबित झाला आहे" हे वाक्य मला पटलं नाही. शीर्षकही नाही.

मुखपृष्ठ मात्र शीर्षकाला साजेसं आणि आतल्या मजकुराला साजेसं आहे. झेंड्याचे तीन रंग आणि एखाद्या गवताळ कुरणाचे निसर्गदृश्य असा मोहक संगम साधलाय.

पुस्तकातले प्रसंग, वर्णनं फार आगळीवेगळी नाहीत. केवळ सुधाजींसारख्या प्रसिद्ध व्यक्तीलाच येतील असे नाहीत. सर्वसामान्य वाचकाच्या आयुष्यात, आजूबाजूलाही असे अनुभव येत असतील. फार नैतिक तिढे आहेत अशातलाही भाग नाही. ती व्यक्ती असं का वागली असा शोध घेण्याचा प्रयत्नही नाही. त्यामुळे लेख वाचायला चांगले, समजायला सोपे असले तरी खूप भरीव वाचल्याचं समाधान मिळालं नाही.


——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

No comments:

Post a Comment

पुण्यभूमी भारत (Punyabhumi Bharat)

पुस्तक - पुण्यभूमी भारत (Punyabhumi Bharat) लेखिका - सुधा मूर्ती (Sudha Murty) अनुवादिका - लीना सोहोनी (Leena Sohoni) मूळ पुस्तक - The old ...